रविवार, जून 29, 2025
Home Blog Page 416

खारफुटीचे शेत जमिनीवर होणारे अतिक्रमण थोपविण्यासाठी उपाययोजना शोधा – मंत्री भरत गोगावले

मुंबई, दि. ३ : खारफुटी जंगलांच्या जमीनीवर अतिक्रमण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होत आहे. हे अतिक्रमण थोपविण्यासाठी उपाययोजना शोधाव्यात अशा सूचना खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी दिल्या. मंत्रालयात आयोजित खारभूमी विकास विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

खारभूमी विकास मंत्री श्री गोगावले म्हणाले की, कोकणात जमीन धारण क्षेत्र कमी आहे. त्यातच या जमिनीवर खारफुटी जंगलांचे अतिक्रमण होत आहे. ही गंभीर समस्या आहे. हे अतिक्रमण थोपवले नाही तर भविष्यात कोकणातील शेतकरी मोठ्या अडचणीत येऊ शकतो. तसेच किनारपट्टीची शेत जमीन नाहीशी होण्याचा धोका आहे. सध्या पर्यावरण कायद्यामुळे खारफुटीची तोड होऊ शकत नाही. त्यामुळे पर्यावरण विभागाच्या समन्वयाने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशा सूचना मंत्री श्री. गोगावले यांनी दिल्या.

बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, खारभूमी विकास मंडळाचे मुख्य अभियंता मिलिंद नाईक, अधीक्षक अभियंता प्रशांत बोरसे यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

०००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ

राज्य मध्यवर्ती ग्रंथालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम

मुंबई, दि.०३ : उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम राज्यात दि.  1 ते 15 जानेवारी या कालावधीत विद्यार्थी आणि वाचकांसाठी राबविण्यात येत आहे.

या उपक्रमाचा शुभारंभ राज्याचे शिखर ग्रंथालय असलेल्या राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, मुंबई येथे  ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनाने करण्यात आला.

दि. १ रोजी नवीन वर्षाची सुरूवात राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, मुंबई येथील भव्य दिव्य वाचन कक्षात तसेच ग्रंथालयाच्या बाहेरील ऐतिहासिक पायऱ्यांवर बसून आपल्या आवडीच्या पुस्तकाच्या सामूहिक वाचनाने करण्यात आली.

या सामुहिक वाचन कार्यक्रमात ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, ग्रंथपाल शालिनी इंगोले,‍  लेखाधिकारी योगेश पिंपळे,  ग्रंथालय संचालनालय व राज्य मध्यवर्ती ग्रंथालयातील कर्मचारी, विद्यार्थी, आणि वाचक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

संचालक श्री.गाडेकर यांनी ‘मानवी जीवनाच्या विकासात वाचनाचे महत्व’ अधोरेखित करून  वाचन संस्‍कृती वाढविण्यास व बळकट करण्यास नवनवीन संकल्पना मांडल्या. विद्यार्थी, कर्मचारी आणि वाचक यांना पुस्तक परिक्षण व कथन स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहनही केले.

समूह वाचनाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांना ग्रंथभेट देऊन प्रोत्साहन दिले.

शालिनी इंगोले यांनी प्रास्ताविक तर सुजाता माहुलकर यांनी सूत्रसंचालन केले.

०००

काशीबाई थोरात/विसंअ

नवीन वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार सुविधा निर्माण करा – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, दि. ०३: राज्यात नव्याने होत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार सुविधा निर्माण कराव्यात. या महाविद्यालयांच्या इमारती, रुग्णालयांची बांधकामे दर्जेदार असावीत, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिल्या

राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी वैद्यकीय शिक्षण  विभागाचा आढावा घेतला. मंत्रालयात झालेल्या या आढावा बैठकीस वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे आयुक्त राजीव निवतकर, उपसचिव वैशाली सुळे, शंकर जाधव, श्वेतांबरी खडे, तुषार पवार आदी उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या की, शासनाने आरोग्य सेवा व आरोग्य शिक्षणावर सर्वाधिक लक्ष केंद्रीत केले आहे. या आरोग्य सेवा रुग्णांना विनासायास उपलब्ध व्हाव्यात. रुग्णालयात औषधांचा तुटवडा जाणवणार नाही याची दक्षता घ्यावी. याबरोबरच  वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची वसतीगृहे दर्जेदार असावीत. रुग्णालयाप्रमाणेच वसतिगृहांमध्येही स्वच्छता असावी.

वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत  आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणांतर्गत सुरू असलेली बांधकामे, साधनसामग्री, नवीन  महाविद्यालये बांधकामे प्राप्त निधी, झालेला खर्च याबाबतचा आढावा घेऊन प्राप्त निधी मार्चपूर्वी खर्च करावा, अशा सूचना राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी दिल्या.

दिवसेंदिवस कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे ही चिंतेची बाब असून कर्करोग सेवांचे बळकटीकरण करणे महत्वाचे आहे. पुणे येथे सर्व सुविधायुक्त कर्करोग रुग्णालयासाठी जागा उपलब्धतेबाबत कार्यवाही करावी,  अशा सूचना वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी दिल्या.

बैठकीत राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी राज्यातील शासकीय व खाजगी वैद्यकीय महाविद्यालये, विद्यार्थी संख्या, नवीन  वैद्यकीय महाविद्यालये पदभरती, केंद्र शासन अंतर्गत प्रकल्प, रिक्त पदे भरती प्रक्रिया, देश का प्रकृती परीक्षण अभियान, आयुष संचालनालयामार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम आदींचा आढावा घेतला.

०००

एकनाथ पोवार/विसंअ.

 

जलजीवन मिशनची कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करा – मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. ०३ : जलजीवन योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक घराला स्वच्छ आणि सुरक्षित पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट असून ग्रामीण जनतेला जलदगतीने या सुविधांचा लाभ मिळू शकेल, यासाठी प्रयत्न करावा. तसेच ग्रामीण भागातील जलजीवन मिशनच्या कामांना गती देऊन कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

मंत्रालयात पाणी पुरवठा व स्वच्छता  विभागाच्या पुढील 100 दिवसाच्या कामाकाजाच्या अनुषंगाने विभागामार्फत 100 दिवसांत करण्यात येणाऱ्या कामांचा आणि कामकाजासंदर्भात सविस्तर आढावा बैठक झाली. त्यावेळी मंत्री श्री. पाटील बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशनचे अभियान संचालक ई.रवींद्रन व विभागाचे मुख्य अभियंता उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, जल जीवन योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी, स्थानिक स्वराज्य संस्थांनी आणि संबंधित विभागांनी समन्वय साधणे आवश्यक आहे. कार्यरत नसलेल्या बोअरवेलचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. यावेळी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत 100 दिवसात करण्यात येणाऱ्या कामाकाजाचा आढावाही त्यांनी घेतला.

यावेळी विभागामार्फत 100 दिवसांच्या कृती आराखड्याचा आढावा घेण्यात आला. शंभर दिवसात गावांमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन पायाभूत सुविधा तयार करावेत. दहा हजार गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. सर्व जिल्ह्यांचे गोबरधन प्रकल्प पूर्ण करावे. प्लॅस्टीक कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्दीष्टे पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या.

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) 2.0 चा आढावा घेत त्यांनी वैयक्तिक शौचालय बांधकाम, जिल्हानिहाय कचरा संकलन वाहन स्थिती, सांडपाणी व्यवस्थापन, हागणदारी मुक्त गावांची सद्यस्थिती, वर्ष निहाय आर्थिक प्रगती, वार्षिक कृती आराखडा आदी विषयाचा आढावा घेतला.

०००

मोहिनी राणे/स.सं

 

रोजगार हमीच्या कामांची मजुरी वाढविण्यासाठी प्रस्ताव सादर करा – मंत्री भरत गोगावले

मुंबई, दि. ०३: ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांसाठी रोजगार हमीची कामे ही रोजगार मिळवून देणारी आहेत. त्यातून मिळणाऱ्या मजुरीवर त्यांची उपजीविका चालते.  त्यामुळे रोजगार हमीच्या कामांची मजुरी वाढवून देण्यासाठी प्रस्ताव सादर करावा अशा सूचना रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी दिल्या. मंत्रालयातील दालनात श्री. गोगावले यांनी रोजगार हमी विभागाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

रोजगार हमी मंत्री श्री.गोगावले म्हणाले की, अनेक जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढलेले आहेत. याचा विचार करून मजुरीचे दर ठरवण्यात यावेत. ग्रामीण भागात उद्योग उभारणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. उद्योग क्षेत्रातील मजुरीचे दर जास्त आहेत. या सर्वांचा विचार होऊन मजुरीचे दर ठरवावेत. रोजगार हमीच्या माध्यमातून शेतीविषयक कामांसाठी जास्त मजूर उपलब्ध होतील यांचे नियोजन करावे. जेणेकरून शहरांकडे होणारे स्थलांतर कमी होऊन ग्रामीण भागाचा विकास साधता येईल. रोजगार हमीचा निधी केंद्र सरकारकडून प्राप्त करून घेण्यासाठी पाठपुरावा करावा, अशा सूचनाही मंत्री श्री. गोगावले यांनी दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागाचा शंभर दिवसांचा कार्यक्रम तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने रोहयो विभागामार्फत ठोस कामे शंभर दिवसात हाती घेण्यात यावीत. हाती घेतलेली कामे वेळेत पूर्ण होतील यासाठी नियोजन करावे.  रोजगार हमी अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या फळबाग लागवड कार्यक्रमाविषयी जनजागृती करावी. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होत आहे. त्यामुळे फळबाग लागवड कार्यक्रमास प्राधान्य द्यावे, अशा सूचना श्री. गोगावले यांनी यावेळी दिल्या.

बैठकीस कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, रोहयोचे सचिव गणेश पाटील, उपसचिव अतुल कोदे, ज. व. वळवी यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

०००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ

शंभर दिवसात करावयाच्या कामांचा कृती कार्यक्रम तयार करा – मंत्री भरत गोगावले

मुंबई, दि. ३: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्या अनुषगाने कार्यक्रम निश्चित करावा अशा सूचना फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी दिल्या. मंत्रालयात झालेल्या फलोत्पादन विभागाच्या आढावा बैठकीवेळी ते बोलत होते.

फलोत्पादन क्षेत्रात महाराष्ट्र देशात आघाडीवर असल्याची बाब अभिमानास्पद असल्याचे सांगून फलोत्पादन मंत्री श्री.गोगावले म्हणाले की, राज्यात अनेक पिकांना भौगोलिक मानांकन प्राप्त आहे. त्यामुळे फलोत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. योजनेसाठी केंद्र सरकारकडून अधिकचा निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याचा पाठपुरावा करावा. कोकणात हळदी सारखी पिके घेतली जातात त्यामध्ये वाढीसाठी प्रयत्न करावेत अशा सूचना श्री. गोगावले यांनी दिल्या.

बैठकीस कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, फलोत्पादन विभागाचे संचालक कैलास पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

०००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ

ससून डॉकमध्ये कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बंधनकारक – मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. ०३: ससून डॉकमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे ओळखपत्र असणे आवश्यक आहे. ससून डॉक परिसरातील पायाभूत सुविधांची कामे विहित कालावधीत करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिले.

मंत्री श्री. नितेश राणे यांनी ससून डॉक परिसराची पाहणी करून अधिकारी, कर्मचारी व मत्स्यव्यवसायिक यांच्याशी संवाद साधला. मत्स्यव्यवसाय विभागाची इमारत, ससून डॉकमध्ये आवश्यक तेथे दुरुस्तीची कामे तत्काळ करावीत. परिसरात अत्यावश्यक असणारी कामे गतीने करावी. तसेच ससून डॉक परिसरात कार्यरत सर्व कामगारांकडे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ओळखपत्र असणे आवश्यक आहे, याबाबतही मत्स्यव्यवसाय विभागाने काटेकोरपणे लक्ष देण्याच्या सूचना श्री. राणे यांनी दिल्या.

मंत्री श्री.राणे म्हणाले की, ससून डॉक हे सर्वात जुने बंदर असून, मुंबईतील सर्वात मोठा घाऊक मासळी बाजार आहे. ससून डॉक अंतर्गत मासेमारी परवानाधारक नौका, मच्छिमारी सहकारी संस्थाशीत गृह, ससून डॉक बंदरावर आवश्यक असणाऱ्या सोयी -सुविधा, पाणी पुरवठा व्यवस्था, मासे लिलावासाठी शेड उभारणी, नवीन धक्का दुरूस्तीकरण ही कामे प्राधान्याने पूर्ण करावी. स्वच्छता गृहांची उभारणी करावी. मत्स्यव्यवसायिकांना कोणत्याही अडचणी येवू नयेत यासाठी  विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना व इतर अनुषंगिक कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी महाराष्ट्र मत्स्य उद्योग विकास मंडळाचे संचालक पंकज कुमार, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहआयुक्त (सागरी) महेश देवरे यासह मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी नीरज चाचकर, मुंबई शहरचे मत्स्यव्यवसाय अधिकारी पुलकेश कदम,ससून डॉकचे कार्यकारी अभियंता(प्रशासक)दीपक पवार यासह अधिकारी उपस्थित होते.

०००

संध्या गरवारे/विसंअ

 

 

आत्मनिर्भरतेसाठी शिक्षणासमवेत कौशल्याची जोड द्या –  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

आदिवासी मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध –  आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके

नागपूर, दि. ०३: विविध आव्हानांवर मात करुन राज्याच्या आदिवासी भागात असूनही  तुम्ही गुणवत्ता व कौशल्याच्या बळावर या राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत मजल मारली आहे याचा मला मनस्वी आनंद आहे. तुम्ही ज्या गुणवत्तेच्या आधारावर इथपर्यंत झेप घेतली आहे त्याला आता भविष्यात एखाद्या कौशल्याची जोड द्या. या कौशल्यातूनच तुमचे आत्मनिर्भरतेचे मार्ग अधिक समृद्ध होत जातील. आपल्या क्षेत्रात अधिक पारंगत होण्यासाठी तत्पर रहा, या आश्वासक शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आदिवासी युवकांना यशाचा मंत्र दिला.

आदिवासी विकास विभागाच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते, परिवहन, व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पार पडले. या समारंभास आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके, राज्याच्या आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे, नागपूर विभागाचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, माजी आमदार टेकचंद सावरकर, माजी महापौर माया इनवाते, अमरावती विभागाचे अपर आयुक्त जितेंद्र चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

आदिवासी भागातील युवकांमध्ये, युवतींमध्ये एक सुप्त शक्ती दडलेली असते. या सुप्तशक्तीला, या असामान्य गुणवत्तेला त्यांच्या शालेय जीवनापासूनच पुढे आणण्याची जबाबदारी ही त्या-त्या शाळांमधील शिक्षकांवर आहे. या मुलामुलींमधून अभियंता, डॉक्टर, शिक्षण, क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्रातील गुणवंत घडू शकतात. आदिवासी विभागात अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनी मुलांच्या उज्ज्वल भवितव्याला साकार करण्यासाठी पुढे आले पाहिजे. शिक्षणासमवेत स्पर्धा परीक्षा, उत्तम कौशल्य याची जोड कशी देता येईल यादृष्टीने आदिवासी विभागाने अधिक प्रभावी नियोजन करण्याची अपेक्षा केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी व्यक्त केली.

राज्यात आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या विविध शाळा, आश्रमशाळामधून सुमारे साडेचार लाख मुले व मुली शिक्षण घेत आहेत. यातील सर्वाधिक मुले ही वाड्यापाड्यावर, आदिवासी क्षेत्रात राहणारी मुले आहेत. यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, त्यांना शिक्षणाच्या दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाने आश्रमशाळा, निवासीशाळा सुरु करुन त्यांना पुरेसा निधी दिला आहे. आदिवासी मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध असून या क्रीडा स्पर्धातून ही मुले नवी ऊर्जा घेतील, असा विश्वास आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र आता थांबणार नाही असे स्पष्ट केले आहे. त्यासाठी आदिवासी विकास विभाग सिद्ध झाला असून या राज्य पातळीवरील स्पर्धेतून अनेक कुशल क्रीडापटूंच्या भविष्याला योग्य दिशा मिळेल, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अमरावती, ठाणे, नाशिक व नागपूर या चारही विभागातील ३० प्रकल्पातील १ हजार ८७० खेळाडूंनी मान्यवरांना मानवंदना दिली.  नागपूर येथील सेंट उर्सुला हायस्कूलच्या विद्यार्थिनी गोंडी भाषेतील स्वागत गीत सादर केले. गडचिरोली येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेतील मुला – मुलींनी आदिवासी पारंपरिक नृत्य सादर केले. या राज्यस्तरीय क्रीडा संमेलनात १४,१७ व १९ वर्षे वयोगटात सांघिक व वैयक्तिक खेळाचे आयोजन केले आहे.  राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या महासंग्रामात राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील 1 हजार 917 आदिवासी खेळाडू आपल्या अंगी असलेले क्रीडा कौशल्य व नैपुण्य दाखविणार आहेत.

यावेळी नागपूर विभागातील शासकीय आश्रम शाळांमध्ये राबविल्या जात असलेल्या ब्राइटर माईंड उपक्रमांतर्गत डोळ्याला पट्टी बांधून रंग ओळखणे, पुस्तक वाचणे, मोबाईल वरील फोटो ओळखणे, व्यक्ती ओळखणे, डब्यात ठेवलेल्या बॉलचा आवाजावरून रंग ओळखणे याचे बिनचूक सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. नागपूर विभागातील गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथील लोक बिरादरी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मलखांब कौशल्याने उपस्थित सर्वांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे संचालन जवाहर गाढवे यांनी केले. अपर आयुक्त रविंद्र ठाकरे(भाप्रसे) यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागपूर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

०००

शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार -केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान

 नाशिक, दि. जानेवारी, २०२५ (जिमाका वृत्तसेवा):  देशातील शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांच्या माध्यमातून सक्षमीकरण होईल, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण, ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी येथे केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आज सकाळी किसान सुसंवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, खासदार भास्करराव भगरे, खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार हिरामण खोसकर, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजीव सोनवणे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, आयसीआरचे संचालक डॉ. एस. के. रॉय, कृषी विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. नितिन ठोके आदी उपस्थित होते. प्रारंभी मंत्री श्री. चौहान यांनी स्वयंसहायता बचत गटांच्या स्टॉलला भेट देत महिलांशी संवाद साधला.

केंद्रीय मंत्री श्री. चौहान म्हणाले की, शेतकरी भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. प्रत्येक शेतकऱ्यामध्ये आपण देव पाहतो. शेतकऱ्यांची सेवा ही ईश्वर सेवा आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाकडून अनेकविध योजना  व उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून पीक विमा योजनाचा लाभ  तत्काळ मिळण्यासाठी  गाव व पंचायत स्तरावर उपग्रह प्रणालीद्वारे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे केली जाणार आहेत. त्यामुळे अचूक प्रक्रिया होवून शेतकऱ्यांना देय भरपाई डी.बी.टी द्वारे त्वरीत प्रदान केली जाईल. शेतकऱ्यांना पिकांचे उत्पादन घेण्यासाठी लागणारी खते ही स्वस्त दरात उपलब्ध करण्यात देण्यात येत आहेत. यासोबतच शेतकऱ्यांच्या उत्पादीत निर्यातक्षम मालाला योग्य मोबदला व बाजारपेठ  मिळण्याच्या दृष्टीने शासन सकारात्मक आहे. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष उत्पादक शेतकरी जास्त आहेत. शेतकऱ्यांना परदेशी द्राक्षांची नवनवीन वाणांची उपलब्धता कशी करता येईल यासाठी बैठकीचे आयोजन करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही केंद्रीय कृषी मंत्री श्री. चौहान यांनी योवळी सांगितले. राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ यशस्वीपणे राबविल्याबाबत केंद्रीय मंत्री श्री. चौहान यांनी  राज्य सरकारचे अभिनंदन केले.

ॲड. कोकाटे म्हणाले की, नाशिक जिल्ह्यातील शेतकरी प्रयोगशील शेतकरी आहे. येथील शेतकरी नेहमीच नाविन्याचा शोध घेतात, असे सांगत आगामी काळात कृषी विभागातर्फे ड्रोण वापराला प्राधान्य देण्यात येईल. राज्य सरकारतर्फे ऑनलाइन पोर्टल तयार करून ते महसूल विभागाशी जोडून शेतकऱ्यांना मिळणारे अनुदानाची प्रक्रिया सुलभ आणि सुटसुटीत करण्यात येईल. असेही मंत्री श्री. कोकाटे यांनी यावेळी सांगितले. यावेळी जळगाव, ता. निफाड येथील ‘नमो योजनेत’ ड्रोन प्राप्त प्रगतिशील शेतकरी दीपाली मोरे, मधुकर गवळी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीमती मोरे, श्री. गवळी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शेतकरी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

0000

एमपीएससीत मुलींमध्ये राज्यात अव्वल आलेल्या ‘महाज्योती’च्या मैत्रेयी जमदाडे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

सातारा, दि. ०३: नायगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194 जयंती निमित्त सावित्रीमाई जयंती उत्सव घेण्यात येत आहे. या ठिकाणी विविध योजनांची माहिती देण्यासाठी महाज्योतीने स्टॉलच्या माध्यमातून प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी उत्तम प्रशिक्षणाच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत 2022-23 वर्षात घेण्यात आलेल्या ‘इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी’ (राजपत्रित) पदाच्या अंतिम निकालात महाज्योती संस्थेच्या मुलींमध्ये राज्यात प्रथम आलेल्या मैत्रेयी अविनाश जमदाडे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पुण्यात राहणाऱ्या मैत्रेयी जमदाडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बहुजन कल्याण व स्त्रीशिक्षण या विचारांवर उभारण्यात आलेल्या ‘महाज्योती’ संस्थेच्या योजनांचा लाभ घेऊन हे यश प्राप्त केले आहे. या घवघवीत यशामुळे आपल्याला आनंद होत असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

०००

 

ताज्या बातम्या

बारामती येथील सायन्स अँड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर राज्याकरिता पथदर्शी ठरेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
बारामती, दि. २९: राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाच्या मदतीने ग्रामीण भागातील तरुणांना आधुनिक विज्ञानाची ओळख करुन देणाऱ्या सायन्स अँड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटरचा विद्यार्थ्यांना...

अन्न सुरक्षा हा सार्वजनिक आरोग्याचा पाया – जी. कमलावर्धन राव

0
मुंबई 29:- अन्न सुरक्षा हा सार्वजनिक आरोग्याचा पाया असून यामध्ये कोणतीही कसूर होऊ नये यासाठी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी कटाक्षाने व समन्वयपूर्वक काम करावे असे...

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

0
मुंबई, दि. 29 :   राज्यात पुढील 24 तासात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच...

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ ची परतफेड

0
मुंबई,दि. २९ - महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या  ८.२८ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२५ अदत्त शिल्लक रकमेची दि. २८ जूलै, २०२५ पर्यंत...

बेळगाव स्मार्ट सिटीमध्ये महाराष्ट्राची दादासाहेब फाळके चित्रनगरी एनडी स्टुडिओमार्फत साकारणार कला प्रकल्प

0
मुंबई, दि. 29 : महाराष्ट्राची दादासाहेब फाळके चित्रनगरी बेळगाव येथील ‘बेळगाव स्मार्ट सिटी’ मध्ये नवीन कला प्रकल्प साकारत असून आज या कामांचा सांस्कृतिक कार्य...