रविवार, जून 29, 2025
Home Blog Page 415

मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती द्यावी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणाऱ्या, टिकाऊ व पर्यावरणपूरक घरांवर भर दिला जाणार
  • गिरणी कामगारांसाठी १ लाख घर बांधण्यात येणार
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण राबविणारे महाराष्ट्र पहिले राज्य
  • म्हाडा, गृहनिर्माण विभागाच्या योजनांचा नागरिकांना सुलभपणे लाभ मिळावा

मुंबई, दि.०३ : ‘सर्वांसाठी घरे’ ही महत्त्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणाऱ्या, टिकाऊ व पर्यावरणपूरक घरांवर भर द्यावा. याबाबत सविस्तर धोरण महिन्याभरात तयार करून नागरिकांना म्हाडा तसेच गृहनिर्माण विभागाच्या योजनांचा सहज सुलभपणे लाभ घेता यावा. त्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करावा. मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

राज्य शासनाच्या माध्यमातून गिरणी कामगारांसाठी सुमारे एक लाख घरे बांधण्यात येणार आहेत. मुंबईच्या विकासासाठी लवकरच क्लस्टरची योजना सुरू करण्यात येणार असून या योजनेच्या माध्यमातून मुंबईत लक्षावधी घरे उपलब्ध होतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गृहनिर्माण विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी विविध योजनांचा आणि प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला.

या बैठकीस गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह,धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस्.व्ही.आर्. श्रीनिवास, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण राबविणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरणार आहे. या धोरणानुसार विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृहे, कामगारांसाठी घरे, भाडेतत्त्वावर घरकुले, पुनर्विकास, इको फ्रेंडली घरकुले, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घरकुलांची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यात विविध गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून घरकुलांचे अनेक प्रकल्प राबवण्यात येत आहेत. मुंबईतील या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी.

गिरणी कामगारांसाठी एक लाख घर बांधण्यात येणार असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जे गिरणी कामगार त्यांच्या मूळ गावी स्थलांतरित झाले आहेत त्यांना त्यांच्या गावी घर देता येईल का याबाबत तपासणी करावी. तसेच गिरणी कामगार युनियनसोबत बैठकीचे आयोजन करावे, असे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन व इतर पुनर्वसन रखडलेले प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला चालना देण्यात आली असून हे प्रकल्प पूर्ण करून झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्याचे उद्दिष्ट आहे. एमएमआरडीए आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्या मार्फत माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर या झोपड्यांचा पुनर्विकास केला जात आहे. गृहनिर्माण विषयक माहितीसाठी केंद्रिकृत, पारदर्शक आणि वेब आधारित राज्य गृहनिर्माणबाबत माहिती पोर्टल तयार करण्यात यावे, धोकादायक इमारतीतील रहिवाशांसाठी ट्रान्झिट कॅम्प तयार करण्यात यावे त्याबाबत सविस्तर धोरण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प, पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प, मोतीलाल नगर १,२,व ३ वसाहतींचा पुनर्विकास, कामाठीपुरा क्षेत्राचा म्हाडामार्फत पुनर्विकास, पोलिसांसाठी घरे, गिरणी कामगारांसाठी घरकुल योजना, जीटीबी नगर सोयम येथील पुनर्वसन प्रकल्प, प्रधानमंत्री आवास योजना आदीबाबत आढावा घेतला.

या बैठकीत गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह यांनी सादरीकरणाद्वारे विभागाची माहिती दिली.

०००

राष्ट्रीय सुरक्षिततेच्याबाबत भारतीय सैन्यदल सक्षम- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. ०३: भारत देश राष्ट्रीय सुरक्षिततेच्या अनुषंगाने अंतर्गत आणि बाह्यबाजूने मजबूत आहे;  भारतीय सेना जगातील उत्तम सेनेपैकी एक असून भू, नौदल, वायू अशा कोणत्याही मार्गाने होणाऱ्या हल्ल्यास प्रतिकार करण्यास सैन्यदल सक्षम आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

‘समर्थ भारत सक्षम सेना’ या प्रेरक संकल्पनेअंतर्गत दक्षिण कमांडच्यावतीने रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब येथे आयोजित ‘नो युवर आर्मी’ मेळाव्याच्या उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार प्रा. मेधा कुलकर्णी, आमदार सुनील कांबळे, दक्षिण कमांडचे आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, राज्य राखीव पोलीस दलाच्या समादेशक आंचल दलाल, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कर्नल सतीश हंगे, माजी राज्य मंत्री दिलीप कांबळे, माजी आमदार विलास लांडे,आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, या मेळाव्यात भारतीय सैन्यदलाच्या क्षमता आणि संरक्षण क्षेत्रात चाललेल्या स्टार्टअप आणि नवोन्मेषाचे सुरू असलेले प्रचंड काम पाहायला मिळत आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून नागरिकांना भारतीय सैनिकांशी संवाद साधता येणार आहे, शिवाय युवकांना भारतीय सैन्यदलात भरती होण्याच्या दृष्टीने प्रेरणा मिळणार आहे. भारत देशाने सरंक्षण क्षेत्रात सुरक्षितेच्या दृष्टीने निर्माण केलेल्या विविध अत्याधुनिक उपकरणांची माहिती देणारे प्रदर्शन आयोजित केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भारतीय सैन्यदलाचे अभिनंदन केले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केंद्रीय संचार ब्युरोच्यावतीने आयोजित भारतीय सैन्याचे साहस, शौर्याच्या क्षमतेचे दर्शन घडविणाऱ्या बहुमाध्यम प्रदर्शनास भेट देवून माहिती जाणून घेतली. तसेच परिसरातील विविध संरक्षण विषयक अत्याधुनिक शस्त्रे, रणगाडे, उपकरणाची पाहणी करुन माहिती घेतली.

०००

परिवहन महामंडळाच्या नफ्यासाठी बृहत कृती आराखडा तयार करा – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, दि. ०३ : राज्यातील बस स्थानकांवर प्रवाशांना दर्जेदार सुविधा देवून स्वच्छतेची कोटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी. महिला प्रवाशांसाठी प्रत्येक बसस्थानकावर स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात यावी. एस. टी महामंडळ नफ्यात राहण्यासाठी महामंडळाने बृहत कृती आराखडा तयार करावा. यासाठी परिवहन क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, वाहतूकदार यांच्या सूचना व अभिप्रायांचा अभ्यास करावा, अशा सूचना परिवहन, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिल्या.

मंत्रालयात समिती सभागृहात आयोजित बैठकीत परिवहन विभागाचा आढावा राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी घेतला.

स्क्रॅपिंग धोरणानुसार जुन्या बसेस निकाली काढाव्यात. चालकांनी मद्यप्राशन करून बस चालविण्याच्या तक्रारी निर्दशनास आल्यास त्या पार्श्वभूमीवर वाहनचालकांची सातत्याने मद्य प्राशनासंदर्भात तपासणी करण्यात यावी. जेणेकरून प्रवाशांना सुरक्षित सेवा मिळेल, असेही राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यावेळी म्हणाल्या.

राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या की, राज्यातील परिवहन विभागाच्या कार्यालयांमध्ये परिवहन कार्यालयांमध्ये जप्त केलेल्या वाहनांची संख्या मोठी आहे. ही वाहने ठेवण्यासाठी स्वंतत्र जागा, तपासणी नाके असलेल्या जिल्ह्यांमध्ये तपासणी नाक्यांच्या जागा यासाठी उपयोगात आणण्याबाबत कार्यवाही करावी. रस्ता सुरक्षा सध्याचा ज्वलंत विषय आहे. अपघातांचे प्रमाण कमी करून यामध्ये होणारी जीवितहानी टाळण्यासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी.

यावेळी बैठकीस परिवहन विभागाचे प्रधान सचिव संजय सेठी, आयुक्त विवेक भिमनवार, राज्य परिवहन महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माधव कुसेकर, सहसचिव श्री. होळकर, परिवहन उपायुक्त श्री. कळसकर, महामंडळाचे वित्तीय सल्लागार व व्यवस्थापक गिरीश देशमुख आदी उपस्थित होते.

खाजगी बसेसना परवानगी देताना त्यामध्ये शहरातील प्रवासी चढउताराबाबत अटी व शर्ती टाकण्याबाबत पडताळणी करावी. मोठ्या शहरांमध्ये बऱ्याच प्रमाणात खासगी बसेस येतात. या बसेसच्या प्रवासी चढउतार करणाऱ्या जागा बऱ्यापैकी शहरात असल्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. अनेक वेळा यामुळे अपघात होवून जीवित हानीच्या घटना घडतात. शहरात अशाप्रकारच्या खाजगी बसेस  प्रवासी चढ उतार करण्यासाठी धोरण तयार करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

बैठकीत नवीन बस स्थानकांचे बांधकाम, प्रवासी कर, प्रवासी सवलती, आकृतीबंध, नवीन बस खरेदी आदींचा आढावाही घेण्यात आला.

०००

निलेश तायडे/विसंअ

खारफुटीचे शेत जमिनीवर होणारे अतिक्रमण थोपविण्यासाठी उपाययोजना शोधा – मंत्री भरत गोगावले

मुंबई, दि. ३ : खारफुटी जंगलांच्या जमीनीवर अतिक्रमण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होत आहे. हे अतिक्रमण थोपविण्यासाठी उपाययोजना शोधाव्यात अशा सूचना खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी दिल्या. मंत्रालयात आयोजित खारभूमी विकास विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

खारभूमी विकास मंत्री श्री गोगावले म्हणाले की, कोकणात जमीन धारण क्षेत्र कमी आहे. त्यातच या जमिनीवर खारफुटी जंगलांचे अतिक्रमण होत आहे. ही गंभीर समस्या आहे. हे अतिक्रमण थोपवले नाही तर भविष्यात कोकणातील शेतकरी मोठ्या अडचणीत येऊ शकतो. तसेच किनारपट्टीची शेत जमीन नाहीशी होण्याचा धोका आहे. सध्या पर्यावरण कायद्यामुळे खारफुटीची तोड होऊ शकत नाही. त्यामुळे पर्यावरण विभागाच्या समन्वयाने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशा सूचना मंत्री श्री. गोगावले यांनी दिल्या.

बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, खारभूमी विकास मंडळाचे मुख्य अभियंता मिलिंद नाईक, अधीक्षक अभियंता प्रशांत बोरसे यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

०००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ

राज्य मध्यवर्ती ग्रंथालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम

मुंबई, दि.०३ : उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम राज्यात दि.  1 ते 15 जानेवारी या कालावधीत विद्यार्थी आणि वाचकांसाठी राबविण्यात येत आहे.

या उपक्रमाचा शुभारंभ राज्याचे शिखर ग्रंथालय असलेल्या राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, मुंबई येथे  ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनाने करण्यात आला.

दि. १ रोजी नवीन वर्षाची सुरूवात राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, मुंबई येथील भव्य दिव्य वाचन कक्षात तसेच ग्रंथालयाच्या बाहेरील ऐतिहासिक पायऱ्यांवर बसून आपल्या आवडीच्या पुस्तकाच्या सामूहिक वाचनाने करण्यात आली.

या सामुहिक वाचन कार्यक्रमात ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, ग्रंथपाल शालिनी इंगोले,‍  लेखाधिकारी योगेश पिंपळे,  ग्रंथालय संचालनालय व राज्य मध्यवर्ती ग्रंथालयातील कर्मचारी, विद्यार्थी, आणि वाचक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

संचालक श्री.गाडेकर यांनी ‘मानवी जीवनाच्या विकासात वाचनाचे महत्व’ अधोरेखित करून  वाचन संस्‍कृती वाढविण्यास व बळकट करण्यास नवनवीन संकल्पना मांडल्या. विद्यार्थी, कर्मचारी आणि वाचक यांना पुस्तक परिक्षण व कथन स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहनही केले.

समूह वाचनाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांना ग्रंथभेट देऊन प्रोत्साहन दिले.

शालिनी इंगोले यांनी प्रास्ताविक तर सुजाता माहुलकर यांनी सूत्रसंचालन केले.

०००

काशीबाई थोरात/विसंअ

नवीन वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार सुविधा निर्माण करा – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, दि. ०३: राज्यात नव्याने होत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार सुविधा निर्माण कराव्यात. या महाविद्यालयांच्या इमारती, रुग्णालयांची बांधकामे दर्जेदार असावीत, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिल्या

राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी वैद्यकीय शिक्षण  विभागाचा आढावा घेतला. मंत्रालयात झालेल्या या आढावा बैठकीस वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे आयुक्त राजीव निवतकर, उपसचिव वैशाली सुळे, शंकर जाधव, श्वेतांबरी खडे, तुषार पवार आदी उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या की, शासनाने आरोग्य सेवा व आरोग्य शिक्षणावर सर्वाधिक लक्ष केंद्रीत केले आहे. या आरोग्य सेवा रुग्णांना विनासायास उपलब्ध व्हाव्यात. रुग्णालयात औषधांचा तुटवडा जाणवणार नाही याची दक्षता घ्यावी. याबरोबरच  वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची वसतीगृहे दर्जेदार असावीत. रुग्णालयाप्रमाणेच वसतिगृहांमध्येही स्वच्छता असावी.

वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत  आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणांतर्गत सुरू असलेली बांधकामे, साधनसामग्री, नवीन  महाविद्यालये बांधकामे प्राप्त निधी, झालेला खर्च याबाबतचा आढावा घेऊन प्राप्त निधी मार्चपूर्वी खर्च करावा, अशा सूचना राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी दिल्या.

दिवसेंदिवस कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे ही चिंतेची बाब असून कर्करोग सेवांचे बळकटीकरण करणे महत्वाचे आहे. पुणे येथे सर्व सुविधायुक्त कर्करोग रुग्णालयासाठी जागा उपलब्धतेबाबत कार्यवाही करावी,  अशा सूचना वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी दिल्या.

बैठकीत राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी राज्यातील शासकीय व खाजगी वैद्यकीय महाविद्यालये, विद्यार्थी संख्या, नवीन  वैद्यकीय महाविद्यालये पदभरती, केंद्र शासन अंतर्गत प्रकल्प, रिक्त पदे भरती प्रक्रिया, देश का प्रकृती परीक्षण अभियान, आयुष संचालनालयामार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम आदींचा आढावा घेतला.

०००

एकनाथ पोवार/विसंअ.

 

जलजीवन मिशनची कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करा – मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. ०३ : जलजीवन योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक घराला स्वच्छ आणि सुरक्षित पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट असून ग्रामीण जनतेला जलदगतीने या सुविधांचा लाभ मिळू शकेल, यासाठी प्रयत्न करावा. तसेच ग्रामीण भागातील जलजीवन मिशनच्या कामांना गती देऊन कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

मंत्रालयात पाणी पुरवठा व स्वच्छता  विभागाच्या पुढील 100 दिवसाच्या कामाकाजाच्या अनुषंगाने विभागामार्फत 100 दिवसांत करण्यात येणाऱ्या कामांचा आणि कामकाजासंदर्भात सविस्तर आढावा बैठक झाली. त्यावेळी मंत्री श्री. पाटील बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशनचे अभियान संचालक ई.रवींद्रन व विभागाचे मुख्य अभियंता उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, जल जीवन योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी, स्थानिक स्वराज्य संस्थांनी आणि संबंधित विभागांनी समन्वय साधणे आवश्यक आहे. कार्यरत नसलेल्या बोअरवेलचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. यावेळी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत 100 दिवसात करण्यात येणाऱ्या कामाकाजाचा आढावाही त्यांनी घेतला.

यावेळी विभागामार्फत 100 दिवसांच्या कृती आराखड्याचा आढावा घेण्यात आला. शंभर दिवसात गावांमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन पायाभूत सुविधा तयार करावेत. दहा हजार गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. सर्व जिल्ह्यांचे गोबरधन प्रकल्प पूर्ण करावे. प्लॅस्टीक कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्दीष्टे पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या.

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) 2.0 चा आढावा घेत त्यांनी वैयक्तिक शौचालय बांधकाम, जिल्हानिहाय कचरा संकलन वाहन स्थिती, सांडपाणी व्यवस्थापन, हागणदारी मुक्त गावांची सद्यस्थिती, वर्ष निहाय आर्थिक प्रगती, वार्षिक कृती आराखडा आदी विषयाचा आढावा घेतला.

०००

मोहिनी राणे/स.सं

 

रोजगार हमीच्या कामांची मजुरी वाढविण्यासाठी प्रस्ताव सादर करा – मंत्री भरत गोगावले

मुंबई, दि. ०३: ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांसाठी रोजगार हमीची कामे ही रोजगार मिळवून देणारी आहेत. त्यातून मिळणाऱ्या मजुरीवर त्यांची उपजीविका चालते.  त्यामुळे रोजगार हमीच्या कामांची मजुरी वाढवून देण्यासाठी प्रस्ताव सादर करावा अशा सूचना रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी दिल्या. मंत्रालयातील दालनात श्री. गोगावले यांनी रोजगार हमी विभागाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

रोजगार हमी मंत्री श्री.गोगावले म्हणाले की, अनेक जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढलेले आहेत. याचा विचार करून मजुरीचे दर ठरवण्यात यावेत. ग्रामीण भागात उद्योग उभारणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. उद्योग क्षेत्रातील मजुरीचे दर जास्त आहेत. या सर्वांचा विचार होऊन मजुरीचे दर ठरवावेत. रोजगार हमीच्या माध्यमातून शेतीविषयक कामांसाठी जास्त मजूर उपलब्ध होतील यांचे नियोजन करावे. जेणेकरून शहरांकडे होणारे स्थलांतर कमी होऊन ग्रामीण भागाचा विकास साधता येईल. रोजगार हमीचा निधी केंद्र सरकारकडून प्राप्त करून घेण्यासाठी पाठपुरावा करावा, अशा सूचनाही मंत्री श्री. गोगावले यांनी दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागाचा शंभर दिवसांचा कार्यक्रम तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने रोहयो विभागामार्फत ठोस कामे शंभर दिवसात हाती घेण्यात यावीत. हाती घेतलेली कामे वेळेत पूर्ण होतील यासाठी नियोजन करावे.  रोजगार हमी अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या फळबाग लागवड कार्यक्रमाविषयी जनजागृती करावी. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होत आहे. त्यामुळे फळबाग लागवड कार्यक्रमास प्राधान्य द्यावे, अशा सूचना श्री. गोगावले यांनी यावेळी दिल्या.

बैठकीस कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, रोहयोचे सचिव गणेश पाटील, उपसचिव अतुल कोदे, ज. व. वळवी यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

०००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ

शंभर दिवसात करावयाच्या कामांचा कृती कार्यक्रम तयार करा – मंत्री भरत गोगावले

मुंबई, दि. ३: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्या अनुषगाने कार्यक्रम निश्चित करावा अशा सूचना फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी दिल्या. मंत्रालयात झालेल्या फलोत्पादन विभागाच्या आढावा बैठकीवेळी ते बोलत होते.

फलोत्पादन क्षेत्रात महाराष्ट्र देशात आघाडीवर असल्याची बाब अभिमानास्पद असल्याचे सांगून फलोत्पादन मंत्री श्री.गोगावले म्हणाले की, राज्यात अनेक पिकांना भौगोलिक मानांकन प्राप्त आहे. त्यामुळे फलोत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. योजनेसाठी केंद्र सरकारकडून अधिकचा निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याचा पाठपुरावा करावा. कोकणात हळदी सारखी पिके घेतली जातात त्यामध्ये वाढीसाठी प्रयत्न करावेत अशा सूचना श्री. गोगावले यांनी दिल्या.

बैठकीस कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, फलोत्पादन विभागाचे संचालक कैलास पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

०००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ

ससून डॉकमध्ये कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बंधनकारक – मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. ०३: ससून डॉकमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे ओळखपत्र असणे आवश्यक आहे. ससून डॉक परिसरातील पायाभूत सुविधांची कामे विहित कालावधीत करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिले.

मंत्री श्री. नितेश राणे यांनी ससून डॉक परिसराची पाहणी करून अधिकारी, कर्मचारी व मत्स्यव्यवसायिक यांच्याशी संवाद साधला. मत्स्यव्यवसाय विभागाची इमारत, ससून डॉकमध्ये आवश्यक तेथे दुरुस्तीची कामे तत्काळ करावीत. परिसरात अत्यावश्यक असणारी कामे गतीने करावी. तसेच ससून डॉक परिसरात कार्यरत सर्व कामगारांकडे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ओळखपत्र असणे आवश्यक आहे, याबाबतही मत्स्यव्यवसाय विभागाने काटेकोरपणे लक्ष देण्याच्या सूचना श्री. राणे यांनी दिल्या.

मंत्री श्री.राणे म्हणाले की, ससून डॉक हे सर्वात जुने बंदर असून, मुंबईतील सर्वात मोठा घाऊक मासळी बाजार आहे. ससून डॉक अंतर्गत मासेमारी परवानाधारक नौका, मच्छिमारी सहकारी संस्थाशीत गृह, ससून डॉक बंदरावर आवश्यक असणाऱ्या सोयी -सुविधा, पाणी पुरवठा व्यवस्था, मासे लिलावासाठी शेड उभारणी, नवीन धक्का दुरूस्तीकरण ही कामे प्राधान्याने पूर्ण करावी. स्वच्छता गृहांची उभारणी करावी. मत्स्यव्यवसायिकांना कोणत्याही अडचणी येवू नयेत यासाठी  विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना व इतर अनुषंगिक कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी महाराष्ट्र मत्स्य उद्योग विकास मंडळाचे संचालक पंकज कुमार, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहआयुक्त (सागरी) महेश देवरे यासह मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी नीरज चाचकर, मुंबई शहरचे मत्स्यव्यवसाय अधिकारी पुलकेश कदम,ससून डॉकचे कार्यकारी अभियंता(प्रशासक)दीपक पवार यासह अधिकारी उपस्थित होते.

०००

संध्या गरवारे/विसंअ

 

 

ताज्या बातम्या

सारथी संस्थेला निधी कमी पडू दिला जाणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
पुणे, दि. 29 : सारथी संस्थेच्या कामाला गती देण्याचे काम शासनामार्फत करण्यात येत असून त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. ही संस्था नवीन...

येत्या पाच वर्षात ‘जीएसडीपी’ ३५ लाख कोटींवर नेण्याचे ध्येय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, दि. २८: शासन ही एक संस्था आहे. संस्था म्हणून याची क्षमता आणि संस्थात्मक बांधणी योग्य रीतीने झाली तर आपण मोठे परिवर्तन साध्य करू...

संपेल वीजबिलाचा अंक, मिळेल मागेल त्याला सौर पंप !

0
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये सध्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ या योजनेविषयी चर्चा सुरू आहे. राज्य सरकारने मागेल त्याला सौरपंप ही योजना आणली आहे. याअंतर्गत 9...

सूर्यकांत मांढरे यांच्या जुन्या मराठी सिनेमांचे मोफत प्रदर्शन – मंत्री ॲड. आशिष शेलार

0
कोल्हापूर, दि. २८ : येत्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून बाराशे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून, ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत...

वसतिगृहातील विद्याथ्यांची प्रवेश क्षमता वाढविणार – मंत्री संजय शिरसाट

0
नागपूर, दि. २८: अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात प्रवेशासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यार्थी क्षमतेत वाढ करण्याची गरज लक्षात घेऊन वसतिगृहाची प्रवेश क्षमता वाढविण्यासाठी प्रस्ताव...