रविवार, जून 29, 2025
Home Blog Page 414

सर्व मेट्रोची कामे पूर्ण होण्याचे वेळापत्रक नव्याने तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि. ४ : एमएमआरडीए क्षेत्रातील सर्व मेट्रोंचे कामे पूर्ण होण्याचे वेळापत्रक नव्याने तयार करा;  या कामांना विलंब चालणार नाही, पुढच्या वर्षीपासून दरवर्षी किमान ५० किमी मेट्रो कार्यान्वित होतील, असे नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी श्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ उपस्थित होते.

यावेळी श्री फडणवीस म्हणाले, अनेक ठिकाणी कारशेड शिवाय मेट्रो सुरू होत आहेत, त्यामुळे मेट्रो सुरू करण्यासाठी त्यासाठी थांबू नका. जगात असे प्रयोग होत आहेत, त्याचा अभ्यास करा. त्याला तात्पुरत्या पर्यायी व्यवस्था काय आहेत, याचा आढावा घ्या. भविष्यातील सर्व संभाव्य मेट्रो प्रकल्पांचा आढावा घेत, त्यासाठी कारशेडसाठी जागा आतापासूनच आरक्षित करा. पुढच्या वर्षीपासून ५० किमी मेट्रो दरवर्षी सुरू होईल, याबाबत नियोजन करा. यावर्षी किमान २३ किमी मेट्रो सुरू होईल. तसेच मेट्रो-३ मुळे २० ते २५ किलोमीटरची त्यात आणखी भर पडेल.

इंदू मिल येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक डिसेंबर २०२५ अखेरीस पूर्ण करा. तसेच हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून या दोन्ही प्रकल्पांच्या वार्षिक देखभालीसाठी आराखडा आताच तयार करण्याच्या सूचना श्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, नगरविकास विभाग (१) चे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय मुखर्जी,  मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे,  मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी,मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे  अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार , अश्विन मुदगल, महामुंबई मेट्रो संचलन महामंडळ व्यवस्थापकीय संचालक रुबल आगरवाल, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय मुखर्जी यांनी प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचे सादरीकरण केले.

000000

धुळे जिल्ह्याचा चेहरा बदलेल अशी पथदर्शी कामे करण्याचा संकल्प : पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

धुळे, दिनांक 4 जानेवारी, 2025 (जिमाका वृत्त) : धुळे जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गामुळे उपलब्ध होणाऱ्या दळणवळणाच्या सुविधा, मध्य व पश्चिम रेल्वेला जोडणारे रेल्वे मार्ग, शैक्षणिक हब, औद्योगिक वसाहतीत उद्योगांसाठी जागा व त्यातून उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी, सिंचनाचे प्रकल्प यांना येत्या काळात अधिक गती देऊन सर्वांच्या सहकार्याने धुळे जिल्ह्याचा चेहरा बदलेल. अशी पथदर्शी कामे उभी करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नविन नियोजन सभागृहात राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री श्री. रावल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती धरतीताई देवरे, खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, ॲड. गोवाल पाडवी, आमदार काशिराम पावरा, मंजुळाताई गावित, अनुपभैय्या अग्रवाल, राघवेंद्र पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, परिविक्षाधिन अधिकारी सर्वांनंद डी, उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. रावल म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारच्या सहाकार्याने धुळे जिल्ह्यास अधिक विकासाच्या दिशेने नेण्यासाठी अपूर्ण प्रकल्पांना गती देण्यात येणार आहे. यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या फ्लॅगशिप योजनांना गती देण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबतच लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन विकास कामांना गती देण्याची गरज आहे. सुलवाडे जामफळ उपसा जलसिंचन योजना, मनमाड-धुळे-इंदौर रेल्वे मार्ग, प्रस्तावित बोरविहीर (धुळे) ते नरडाणा रेल्वे मार्गाचे कामे सुरु आहे. त्यासाठी जमिनी संपादित करण्यात आलेल्या जमिनधारकांना भूसंपादन अधिनियमानुसार मोबदला अदा करण्यात करण्यात यावा. प्रधानमंत्री आवास योजना, राष्ट्रीय महामार्गाच्या प्रस्तावित कामांना गती द्यावी. रेल्वे व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांनी आपआपसात समन्वय साधावा. स्थानिक लोकप्रतिनिधीसोबत विकासकामांविषयी वेळोवेळी चर्चा करावी. राष्ट्रीय महामार्गाची कामे करतांना ती दर्जेदार होतील याकडे लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रोसेंसिंग युनिट उभारण्यासाठी प्रयत्न करावेत. सोयाबीन खरेदीसाठी येणाऱ्या नाफेडच्या खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांच्या मालाची गुणवत्ता तपासून मालाच्या दर्जानुसार दर द्यावा. शिरपूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन भरपाईसाठी प्रस्ताव सादर करावा. मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना, प्रधानमंत्री सौर कुसूम योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुर सौरपंप वितरीत करावे. शहरातील वीजचोरी होणाऱ्या ठिकाणी धडक कारवाई करावी. कामगार विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांना गती द्यावी. महिला व बाल विकास भवनाच्या इमारतीसाठी नविन जागेची निश्चिती करावी. येत्या काळात धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे करुन धुळे जिल्ह्याचे नाव देशपातळीवर पोहचण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री श्री.रावल यांनी सांगितले.

यावेळी खासदार डॉ.शोभाताई बच्छाव, आमदार काशिराम पावरा, आमदार मंजुळाताई गावित, आमदार अनुपभैय्या अग्रवाल, आमदार राघवेंद्र पाटील यांनी जिल्ह्यातील प्रश्न व अडचणी मंत्रीमहोदयांसमोर मांडल्या.

यावेळी मनमाड-इंन्दौर, बोरविहीर-नरडाणा रेल्वे भूसंपादन, सुलवाडे जामफळ उपसा सिंचन योजना, प्रधानमंत्री आवास योजना, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पणन विभाग, राष्ट्रीय महामार्ग, औद्योगिक विकास महामंडळ, महावितरण आदी विभागांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्ह्यात प्रत्येक विभागामार्फत  सुरु असलेल्या विकास कामांची तसेच विभागाच्या प्रमुख योजनांची सद्यस्थितीची माहिती मंत्री महोदयांना जाणून घेतली.

११ रुग्णवाहिकांचे लोकार्पण

राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते आज जिल्हा परिषद, धुळे येथील आवारात 11 नविन रुग्णवाहिकांचे लोकार्पण संपन्न झाले. धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राना राज्यस्तरावरुन या 11 नविन रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत. त्या विखरण, आर्वी, धमाणे, निमगुळ, वालखेडा, बोरीस, कळंबीर, मालपुर, शिरसोला, कुसूंबा या प्राथमिक आरोग्य केंद्रास प्रत्येकी एक तर जिल्हा रुग्णालयास एक रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

यावेळी मंत्री रावल म्हणाले की, जिल्हा परिषदेमार्फत गेल्या 5 वर्षांच्या काळात खुप चांगले विकासाची कामे झाली आहे. राज्य शासनामार्फत उपलब्ध झालेल्या 11 रुग्णवाहिका या सामान्य माणुस तसेच गरीबातील गरीब माणसांना एका फोनवर रुग्णसेवेसाठी उपलब्ध करुन द्याव्यात. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 36 कोटी रुपयांचे नविन 5 प्राथमिक आरोग्य केंद्र, 17 उप केंद्र उभारले आहेत. यामाध्यमातून जनतेसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे. येत्याकाळात आरोग्य केंन्द्रात पुरेशा डॉक्टारांची व्यवस्था, औषधसाठा उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असलेल्या विद्र्यार्थ्यांना जिल्ह्यातच सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती धरतीताई देवरे, खासदार डॉ.शोभाताई बच्छाव, ॲड.गोवाल पाडवी, आमदार काशिराम पावरा, मंजुळाताई गावित, अनुपभैय्या अग्रवाल, राघवेंद्र पाटील, माजी खासदार डॉ. सुभाष भामरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती हर्षवर्धन दहिते, महिला व बाल कल्याण सभापती ज्योती बोरसे, शिक्षण व आरोग्य सभापती सोनिताई कदम, समाज कल्याण सभापती कैलास पावरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000

 

धुळे जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’च्या कोणत्याही लाभार्थ्याची चौकशी नाही –  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

धुळे, दि. ४ (जिमाका वृत्त) : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’च्या कोणत्याही लाभार्थ्याची चौकशी अथवा पडताळणी करण्याचे अद्याप शासनाचे निर्देश नाही. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या कोणत्याही लाभार्थ्यांची चौकशी करण्यात आलेली नाही अथवा त्यांचेवर कारवाई करण्यात आलेली नाही. अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.

धुळे जिल्हृ्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यीची रक्कम परत घेतल्याचे वृत्त प्रसार माध्यमाद्वारे प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी माध्यमांशी बोलतांना म्हटले आहे की, धुळे जिल्ह्यातील नकाणे गावातील महिला भिकुबाई प्रकाश खैरणार यांनी ३० सप्टेंबर, २०२४ रोजी स्वत:हून अर्ज करुन जिल्हा प्रशासनास कळविले आहे की, माझ्या अर्जास माझ्या मुलाचे आधारकार्ड जोडले गेल्याने लाभाची रक्कम त्याच्या बँक खात्यावर जमा झाली आहे. त्यामुळे सदरची रक्कम मी स्वत:हून परत करीत आहे. त्यानुसार या महिलेने स्वत:हून परत केलेली रक्कम प्रशासनाने जमा करुन घेतली असल्याचे श्री. पापळकर यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर या योजनेबाबत कुणाचा अर्ज अथवा आक्षेप प्राप्त झाल्यास त्याबाबत शासन नियमानुसार चौकशी करुन निर्णय घेण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी म्हटले आहे.

000000

सार्वजनिक आरोग्य सेवा अधिकाधिक दर्जेदार करण्यावर भर – मंत्री प्रकाश आबिटकर

पुणे, दि.०३:  आरोग्य सेवा अधिकाधिक दर्जेदार होण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून गरजू रुग्णांना तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणांनी नेहमी तत्पर रहावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.

औंध जिल्हा रुग्णालय आणि येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाला भेट देऊन विविध विभागांमार्फत पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. भेटी दरम्यान त्यांनी थेट रुग्णांशी संवाद साधून त्यांना पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेविषयी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी आरोग्य भवन येथील राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत पुण्यातील विभागवार आरोग्य सेवांचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना रुग्णालयातील स्वच्छता आवश्यक त्या चांगल्या आरोग्यविषयक सोयी सुविधा पुरविण्याच्या सूचना दिल्या.

आरोग्यमंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांनी औंध येथील जिल्हा रुग्णालयाला अधिकारी समवेत भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णांशी थेट संवाद साधून रुग्णालयात मिळणाऱ्या सुविधेबाबत प्रतिक्रिया जाणून घेतल्या. जिल्हा रुग्णालयात देण्यात येणाऱ्या सेवा, सुविधा, रुग्णालयातील विविध विभाग, बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, माता बाल आरोग्य सेवा, नवजात विशेष काळजी कक्ष, डायलिसीस सेंटर, अस्थिरोग विभाग तसेच विविध सेवा विभाग यांना भेट देऊन आरोग्य सेवांची प्रत्यक्ष पाहणी केली.

आरोग्यमंत्री श्री.अबिटकर यांनी येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाला भेट देत संपूर्ण परिसराची पाहणी केली. महिला व पुरुष कक्ष, आहार कक्ष, पुनर्वसनात्मक सेवा विभागाला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील रुग्णांशी संवाद साधला. यावेळी रुग्णालयाच्यावतीने विविध विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या सेवांबाबत माहितीचे सादरीकरण करण्यात आले. प्रादेशिक रुग्णालय बंगलोरच्या निम्हांस रुग्णालयाच्या धर्तीवर हे रुग्णालय साकारण्यात येणार असून याविषयी बांधकाम विभागाने सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

प्रादेशिक मनोरुग्णालय आदर्श कसे करता येईल याविषयी आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पुणे येथील मलेरिया, कुष्ठरोग, माता व बाल संगोपन, परिवहन, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग, आरोग्य प्रयोगशाळा, जन्म मृत्यू नोंदणी विभाग, कुटुंब कल्याण, जलजन्य आजार, हत्तीरोग या विभागांच्या कार्याविषयी राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग येथेही झालेल्या बैठकीत विविध आरोग्य सेवांचा आढावा घेतला.

बैठकीला संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, अतिरिक्त संचालक डॉ. विजय बाविस्कर,  सहसंचालक डॉ. बबिता कमलापूरकर, उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर आदि उपस्थित होते.

०००

महाराष्ट्र शासनाचे १८ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. ०३ : महाराष्ट्र शासनाच्या १८ वर्षे मुदतीच्या २ हजार कोटींच्या रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकासकामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

०७ जानेवारी, २०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस् ०७ जानेवारी, २०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान ०८ जानेवारी, २०२५  रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १८ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी ०८ जानेवारी, २०२५ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक ०८ जानेवारी, २०४३ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक जुलै ०८ आणि जानेवारी ०८ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम, १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

०००

महाराष्ट्र शासनाचे १३ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. ०३: महाराष्ट्र शासनाच्या १३ वर्षे मुदतीच्या २ हजार कोटींच्या रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकासकामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

०७ जानेवारी, २०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे, फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस्  ०७ जानेवारी, २०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान ०८ जानेवारी, २०२५  रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १३ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी ०८ जानेवारी, २०२५ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक ०८ जानेवारी, २०३८ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक जुलै ०८ आणि जानेवारी ०८ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम, १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

०००

संतांच्या निरपेक्ष जनजागृतीमुळे भारतीय संस्कृती जिवीत -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे,दि. ०३:  भारतीय संस्कृती जगातील सर्वात प्राचीन संस्कृती असून संतांनी निरपेक्षपणे जनजागृती केल्यामुळे भारतीय संस्कृती जिवीत राहीली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

श्री क्षेत्र आळंदी येथे वेदश्री तपोवन परिसरात आयोजित संत कृतज्ञता संवाद कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून संत, धर्माचार्य आणि कीर्तनकारांचे आशीर्वाद घेतले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, पर्यावरणीय व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, आमदार उमा खापरे, आमदार सर्वश्री महेश लांडगे, शंकर जगताप, अमीत गोरखे, आचार्य स्वामी गोविन्ददेव गिरी महाराज, हभप ब्रम्हगीरी मारोती महाराज कुसेकर, भास्करगिरी महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मारुती महाराज कुरेकर  यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, भारतीय संस्कृती जगातीलसर्वात प्राचिन संस्कृती आहे. पाच हजार वर्षापूर्वीच्या सिंधू संस्कृतीमधील आजही आढळत असलेले अवशेष पूर्णपणे विकसीत आहेत. संत आणि धर्माचार्यांनी निरपेक्षपणे जनजागृती केल्यामुळे ही संस्कृती जिवीत राहीली. पथभ्रष्ट झालेल्या राजसत्तेला संतांच्या विचारांनी हटविल्यामुळे आपल्या संस्कृतीला कुणीही संपवू शकले नाही.

आपला देश प्रगती करतानाच बलशाली होतोय, हे सहन न झाल्यामुळे देश आणि विदेशातील विघातक शक्तींनी एकत्र येऊन एक प्रकारचे षडयंत्र रचून देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र संतांनी समाजामध्ये जागरुकता निर्माण करुन हे प्रयत्न हाणून पाडले. भारताची संस्कृती आणि विचार जेव्हा कमकुवत झाले त्या-त्यावेळी आपण गुलामगीरीत गेलो. येथील संतांनी समाज जागृत केला आणि एकसंघ समाज निर्माण केला आणि दिग्वीजयी भारत आपल्याला पाहायला मिळाला.

हिंन्दू जीवन पद्धतीमध्ये निर्गुण निराकार आहे, सगुण साकार आहे. प्रत्येकाची जीवनपद्धती वेगळी असूनही या जीवन पद्धतीमुळे भारत एकसंघ आहे. पूज्य गोविन्ददेव गिरी महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी समाज जागृतीचे मोठे कार्य केले आहे. सर्व समाज एक आहे, देश एक आहे पासून ते वसुधैव कुटुंबकम विचार त्यांनी मांडला. त्यामुळे समाजामध्ये जागृती निर्माण झाली असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गोमातेची सेवा ही केवळ धर्मकार्य नसून राष्ट्रकार्य आहे. गोसेवा आणि नदी स्वच्छतेसाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. शेतीतील अडचणी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी गोसेवेचे महत्व वाढले पाहिजे. तसेच ज्या प्रकारे गंगानदी स्वच्छ केली जात आहे, त्याचप्रमाणे इंद्रायणी, गोदावरी, चंद्रभागा स्वच्छ वाहणाऱ्या नद्या बनवण्यासाठी येत्या काळात संपूर्ण क्षमतेने प्रयत्न केले जाईल. फेसाळलेल्या इंद्रायणीच्या पुनरुज्जीवनाचा संकल्प आम्ही पूर्ण करु, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यकत् केला.कार्यक्रमाला राज्याच्या विविध भागातून आलेले संत, किर्तनकार, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

०००

रवींद्र नाट्य मंदिर फेब्रुवारी अखेरपर्यंत खुले व्हावे – मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई, दि. ०३:  पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्‍या नुतनीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करुन नाट्य, सिनेमा कलावंत आणि प्रेक्षकांना रवींद्र नाट्य मंदिर फेब्रुवारीअखेर खुले करु देता येईल, या दृष्‍टीने कामाचे नियोजन करावे, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी आज अधिका-यांना दिले.

महाराष्‍ट्र शासनाच्‍या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्‍या नुतनीकरणाचे काम वेगाने सुरू असून आज या कामाची पाहणी मंत्री श्री. शेलार यांनी केली. यावेळी अकादमीच्‍या संचालक मीनल जोगळेकर यांच्‍यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबधित अधिकारी उपस्थित होते.

नुतनीकरण करताना कलावंत व प्रेक्षकांना अद्यावत सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात येत असून रवींद्र नाट्य मंदिरात नाटक अथवा सिनेमा पाहता येणार आहे. त्‍यासाठी मोठी एलईडी स्क्रिन व सिनेमासाठी आवश्‍यक असणारा डॉल्‍बी साऊंड सिस्‍टीमही उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहे. तर नाटकांसाठी लागणारी साउंड सिस्‍टीमही अद्यावत करण्‍यात आली असून आसन व्‍यवस्‍थाही आरामदायी करण्‍यात आली आहे. मिनी थि‍अटरमध्‍ये  अशाच प्रकारे नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम यासह सिनेमासाठीही सर्व सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार असून नाटक, सांस्कृतिक, संगीत, साहित्यिक कार्यक्रमांसह मराठी सि‍नेमांसाठी ही दोन थिएटर उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहेत.

कलावंतांना जे आवश्‍यक आहेत, त्‍या पद्धतीने सुसज्‍ज असे मेकअप रुम व थिएटरच्‍या सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात येत असून कलादालन व इतर दालने अत्‍यंत देखण्‍या स्‍वरुपात उभारली जात आहेत. शिवाय बाहेर छोटे खुले नाटयगृहही तयार करुण्‍यात येत आहे. या संपूर्ण वास्‍तूला मराठेशाहीचा साज चढवण्‍यात येणार आहे. तसेच आतील भागात मराठी कला संस्‍कृती व नाट्य परंपरेचा विचार करुन सजावट करण्‍यात येणार आहे. आज मंत्री ॲड आशिष शेलार यांनी या संपुर्ण कामाची पाहणी करुन समाधान व्‍यक्‍त केले तसेच काही सूचनाही केल्‍या.

०००

संजय ओरके/विसंअ

अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून विभागाच्या कामाचा आढावा

मुंबई, दि. ०३ : डिसेंबर महिन्यातील धान्य वितरणाच्या अनुषंगाने राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे आज विभागाच्या कामाचा आढावा घेतला. डिसेंबर महिन्यात राज्यात प्राप्त नियतनाच्या एकूण 92.09% धान्याचे वितरण झाले असून, उर्वरित वितरणामध्ये आलेल्या अडचणींच्या अनुषंगाने आज धनंजय मुंडे यांनी सबंध राज्याच्या पुरवठा विभागाची ई-बैठक बैठक घेतली.

ई – पॉस मशीन वरील अडचणी, पोर्टलचे सर्वर डाऊन, यांसह विविध अडचणींची तसेच धान्य वितरणाची जिल्हा निहाय वस्तुनिष्ठ आकडेवारी धनंजय मुंडे यांनी त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. ठाण्यात सर्वाधिक ९८.५९ तर धुळे जिल्ह्यात सर्वात कमी 81.69 टक्के इतके धान्य वितरण डिसेंबर महिन्यात झाले असून ही आकडेवारी शंभर टक्क्यांकडे घेऊन जाण्यासाठी ऑनलाईन व अन्य तांत्रिक अडचणी दूर करण्यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी विभागाला निर्देश दिले असून या संदर्भात सर्व संबंधितांची पुढील आठवड्यात आणखी एक बैठक घेणार असल्याचे मंत्री श्री. मुंडे यांनी विभागाला निर्देश दिले आहेत.

सर्वर डाऊन असणे, किंवा अन्य कारणांनी ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये विविध योजनेतील लाभार्थींना धान्य वितरण डिसेंबर महिन्यात होऊ शकले नाही, त्यांना या महिन्यांमध्ये मुदतवाढ देण्याबाबतचे प्रस्ताव तातडीने देण्याबाबतही मंत्री श्री. मुंडे यांनी संबंधित जिल्ह्यांना निर्देश दिले आहेत.

भंडारा जिल्ह्यातील उर्वरित साखर उपलब्ध करून देणे त्याचबरोबर नागपूर विभागातील पुरवठा निरीक्षक व अन्य रिक्त पदे भरून देण्याबाबतचा प्रस्ताव देखील स्वतंत्ररीत्या मागवण्याबाबत धनंजय मुंडे यांनी संबंधितांना या बैठकीत निर्देश दिले आहेत. एफसीआयकडे विविध करार काही दिले व अन्य असलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने पुढील आठवड्यातील बैठकीमध्ये त्यावर निर्णय घेतला जाईल असेही मंत्री श्री. मुंडे यांनी यावेळी सांगितले.

विविध जिल्ह्यांमध्ये ज्या ठिकाणी धान्याचे रॅक उतरवले जातात, त्या भागातील रस्ते व अन्य सुविधांच्याबाबतही स्वतंत्र आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल असेही श्री. मुंडे म्हणाले आहेत. ई – पॉस मशीनवर डेटा उपलब्ध करून देणे, सर्वर डाऊन च्या समस्या यासह सर्वच्या सर्व तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्यासंदर्भात मंत्री श्री.मुंडे  यांनी स्वतंत्र निर्देश दिले आहेत.

या बैठकीस अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव, उपसचिव, शिधावाटप संचालनालयाचे नियंत्रक, पुरवठा विभागाचे सर्व उपयुक्त तसेच राज्यातील सर्व जिल्ह्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी व उपनियंत्रक आदी उपस्थित होते.

०००

दत्तात्रय कोकरे/विसंअ

मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती द्यावी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणाऱ्या, टिकाऊ व पर्यावरणपूरक घरांवर भर दिला जाणार
  • गिरणी कामगारांसाठी १ लाख घर बांधण्यात येणार
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण राबविणारे महाराष्ट्र पहिले राज्य
  • म्हाडा, गृहनिर्माण विभागाच्या योजनांचा नागरिकांना सुलभपणे लाभ मिळावा

मुंबई, दि.०३ : ‘सर्वांसाठी घरे’ ही महत्त्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणाऱ्या, टिकाऊ व पर्यावरणपूरक घरांवर भर द्यावा. याबाबत सविस्तर धोरण महिन्याभरात तयार करून नागरिकांना म्हाडा तसेच गृहनिर्माण विभागाच्या योजनांचा सहज सुलभपणे लाभ घेता यावा. त्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करावा. मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

राज्य शासनाच्या माध्यमातून गिरणी कामगारांसाठी सुमारे एक लाख घरे बांधण्यात येणार आहेत. मुंबईच्या विकासासाठी लवकरच क्लस्टरची योजना सुरू करण्यात येणार असून या योजनेच्या माध्यमातून मुंबईत लक्षावधी घरे उपलब्ध होतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गृहनिर्माण विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी विविध योजनांचा आणि प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला.

या बैठकीस गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह,धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस्.व्ही.आर्. श्रीनिवास, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण राबविणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरणार आहे. या धोरणानुसार विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृहे, कामगारांसाठी घरे, भाडेतत्त्वावर घरकुले, पुनर्विकास, इको फ्रेंडली घरकुले, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घरकुलांची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यात विविध गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून घरकुलांचे अनेक प्रकल्प राबवण्यात येत आहेत. मुंबईतील या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी.

गिरणी कामगारांसाठी एक लाख घर बांधण्यात येणार असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जे गिरणी कामगार त्यांच्या मूळ गावी स्थलांतरित झाले आहेत त्यांना त्यांच्या गावी घर देता येईल का याबाबत तपासणी करावी. तसेच गिरणी कामगार युनियनसोबत बैठकीचे आयोजन करावे, असे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन व इतर पुनर्वसन रखडलेले प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला चालना देण्यात आली असून हे प्रकल्प पूर्ण करून झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्याचे उद्दिष्ट आहे. एमएमआरडीए आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्या मार्फत माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर या झोपड्यांचा पुनर्विकास केला जात आहे. गृहनिर्माण विषयक माहितीसाठी केंद्रिकृत, पारदर्शक आणि वेब आधारित राज्य गृहनिर्माणबाबत माहिती पोर्टल तयार करण्यात यावे, धोकादायक इमारतीतील रहिवाशांसाठी ट्रान्झिट कॅम्प तयार करण्यात यावे त्याबाबत सविस्तर धोरण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प, पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प, मोतीलाल नगर १,२,व ३ वसाहतींचा पुनर्विकास, कामाठीपुरा क्षेत्राचा म्हाडामार्फत पुनर्विकास, पोलिसांसाठी घरे, गिरणी कामगारांसाठी घरकुल योजना, जीटीबी नगर सोयम येथील पुनर्वसन प्रकल्प, प्रधानमंत्री आवास योजना आदीबाबत आढावा घेतला.

या बैठकीत गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह यांनी सादरीकरणाद्वारे विभागाची माहिती दिली.

०००

ताज्या बातम्या

येत्या पाच वर्षात ‘जीएसडीपी’ ३५ लाख कोटींवर नेण्याचे ध्येय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, दि. २८: शासन ही एक संस्था आहे. संस्था म्हणून याची क्षमता आणि संस्थात्मक बांधणी योग्य रीतीने झाली तर आपण मोठे परिवर्तन साध्य करू...

संपेल वीजबिलाचा अंक, मिळेल मागेल त्याला सौर पंप !

0
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये सध्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ या योजनेविषयी चर्चा सुरू आहे. राज्य सरकारने मागेल त्याला सौरपंप ही योजना आणली आहे. याअंतर्गत 9...

सूर्यकांत मांढरे यांच्या जुन्या मराठी सिनेमांचे मोफत प्रदर्शन – मंत्री ॲड. आशिष शेलार

0
कोल्हापूर, दि. २८ : येत्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून बाराशे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून, ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत...

वसतिगृहातील विद्याथ्यांची प्रवेश क्षमता वाढविणार – मंत्री संजय शिरसाट

0
नागपूर, दि. २८: अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात प्रवेशासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यार्थी क्षमतेत वाढ करण्याची गरज लक्षात घेऊन वसतिगृहाची प्रवेश क्षमता वाढविण्यासाठी प्रस्ताव...

क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कडबनवाडी येथे जिप्सी सफारी उपक्रमाचे...

0
पुणे, दि.२८: क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कडबनवाडी येथील गवताळ प्रदेशामध्ये जिप्सीमधून करण्यात येणाऱ्या सफारी उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. नागरिकांनी...