रविवार, जून 29, 2025
Home Blog Page 413

बारामतीच्या वैभवात भर घालणारी शिवसृष्टी उभारा-उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती, दि.५: छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास जगासमोर येईल यादृष्टीने प्राचीन आणि आधुनिकतेचा संगम साधून बारामतीच्या वैभवात भर घालणारी भव्यदिव्य शिवसृष्टी उभारण्यात यावी, बारामती परिसरात सुरु असलेल्या विविध सार्वजनिक विकासकामांच्या पाहणीप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्देश दिले.

श्री. पवार यांनी तालुका फळरोपवाटिका, शिवसृष्टी, जलतरण तलाव, कन्हेरी वनोद्यान येथे सुरूअसलेल्या सार्वजनिक विकासकामांची पाहणी करुन संबंधित अधिकांऱ्याकडून माहिती घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेटकर, उपविभागीय कृषी अधिकारी तुळशीराम चौधरी आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, शिवसृष्टीची कामे करताना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील, याबाबत दक्षता घ्यावी. शिवसृष्टीचे काम पूर्ण झाल्यावर नागरिकांना हेवा वाटेल, असे कामे करावीत. परिसरात अधिकाधिक वृक्षाची लागवड करुन संपूर्ण परिसर हिरवेगार राहील, असे नियोजन करावे. कोणतीही कामे प्रलंबित राहणार नाहीत, याबाबत दक्षता घ्यावी,याकरीता आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.

तालुका फळरोपवाटिका कन्हेरी दुरुस्तीची किरकोळ कामे पूर्ण करुन घ्यावीत. संरक्षक भिंती आणि रस्ताच्या बाजूला वृक्षारोपण करावे. परिसरात शोभिवंत झाडे लावावीत. कुंड्यामध्येही वाढ करावी. आंबा, नारळ, सीताफळ येथील मातृवृक्षाची पाहणी करून त्याची व्यवस्थितपणे देखभाल  करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या.

कन्हेरी वनोद्यान परिसरातील विकास कामे करीत असताना  कमी प्रमाणात पानगळ होणारी, सरळ वाढणारी, अधिकाधिक सावली देणाऱ्या स्थानिक प्रजातींचे वृक्षारोपण करा. वृक्षारोपण केल्यानंतर ती जगली पाहिजेत याकडे लक्ष द्यावे.

प्रवेशद्वाराला वनोद्यानाशी सुसंगत रंगरंगोटी करावी. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेदृष्टीने तसेच चढतांना-उतरतांना अडथळा निर्माण होणार नाही, अशा पायऱ्याची व बैठक व्यवस्था करावी. तलावात नौकाविहार सुरु करावे. तलावातील पाण्यासह परिसर स्वच्छ राहील, याची दक्षता घ्यावी. कामे झाल्यानंतर ती नैसर्गिक वाटली पाहिजेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.

नव्याने उभारण्यात येणाऱ्या जलतरण तलावाची कामे करताना दर्जेदार, टिकाऊ फरश्या बसवाव्यात. भिंती, फरशांमधील फटी राहता कामा नये.  महिलांच्या सुरक्षिततेचाही विचार करण्यात यावा. नागरिकांना चढ-उतर करण्यासाठी सोईस्कर पायऱ्या बसवाव्यात. विकासकामे करताना कॅनलच्या भिंतीला अडथळा निर्माण होणार नाही,याबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल, मुख्याधिकारी महेश रोकडे, वन परिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे,तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव आदी उपस्थित होते.

०००

 

शंकरपटाच्या लोकप्रियतेवर माळेगावच्या गर्दीचे शिक्कामोर्तब; हजारो शेतकऱ्यांनी अनुभवला ५८ बैल जोड्यांचा सहा तास थरार 

नांदेड दि. ४ जानेवारी : लाईन क्लिअर…जोडी सोडा… जोडी मालकासाठी खुशखबर… तीन सेकंद 38 पाँईट… आणि वायुगतीने… विक्रमी वेळेत अंतर पार… पाठोपाठ शेतकऱ्यांच्या टाळ्या शिट्ट्या… अशा माळेगावच्या माळरानावरील धावत्या समालोचनात ५८ बैल जोड्यांनी डोळ्यांचे पारणे फेडणारा थरार रचला. शंकर पटाच्या गर्दीने हा खेळ तुफान लोकप्रिय असल्याचे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले.

शेती,मातीत रमणाऱ्या शेतकऱ्यांचा माळेगावचा शंकरपट म्हणजे जीव की प्राण. न्यायालयाच्या निर्णयानंतर गेल्या वर्षीपासून पुन्हा बैलगाड्यांच्या शर्यतीला सुरुवात झाली आहे.  बंदी उठल्यावरचा आजचा  माळेगावचा दुसरा शंकरपट. आज गर्दीचे सर्व उच्चांक मोडत माळेगावात मराठवाडा, विदर्भातील तसेच बाजूच्या राज्यातील शेतकऱ्यांनी या शंकरपाटासाठी गर्दी केली होती. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातून यासाठी बैलजोडी आल्या होत्या. त्यामुळे यंदाचा शंकरपठ अतिशय चुरशीचा गर्दीचा आणि उत्कंठेचा ठरला आहे.

माळेगावात आज दुपारपासून 58 जोडीनी आपले कसब दाखविले. सायंकाळी साडेपाच पर्यंत हा थरार सुरू होता.

माळेगावच्या यात्रेला आज एक आठवडा झाला. 29 डिसेंबरच्या पालखी यात्रेनंतर सुरू झालेली माळेगावची यात्रा आज शंकर पटाने गाजवली उद्या माळेगाव यात्रेची आणखी एक परंपरा असणाऱ्या कुस्तीच्या फडाने शासकीय कार्यक्रमाची सांगता होणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनीही आज शंकरपटाचा आनंद घेतला. त्यानंतर आमदार बालाजी कल्याणकर यांनी देखील यात्रेला भेट दिली.

तत्पूर्वी आज या कार्यक्रमाचे उद्घाटन आ. आनंदराव बोंढारकर यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, पोलीस अधिकारी अश्विनी जगताप, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, नरेगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडीलवार, सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. दिनेश महेर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डाॅ. प्रवीणकुमार घुले, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, सरपंच प्रतिनिधी हनुमंत धुळगंडे, गट विकास अधिकारी दशरथ आडेराघो,  पंचायत समितीचे माजी सभापती आनंदराव शिंदे, अंबादास जाहागीरदार, अशोक मोरे, नरेंद्र गायकवाड, उद्धव शिंदे, विस्तार अधिकारी धनंजय देशपांडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

प्रारंभी खंडोबाच्या प्रतिमेचे पूजन करून दुपारी एक वाजता शंकरपट शर्यतीला सुरुवात झाली. या शर्यतीसाठी नांदेडसह पालम, गंगाखेड, पूर्णा, परभणी, लातूर, अहमदपुर, हिंगोली आदी ठिकाणांहून 58 बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. वेगवान धावणाऱ्या बैलजोड्यांनी उपस्थित लाखो प्रेक्षकांना अक्षरशः थक्क केले. शेतकऱ्यांसाठी ही स्पर्धा केवळ मनोरंजन नाही तर त्यांच्या मेहनतीचा व बैलांवरील प्रेमाचा सन्मान असल्याचे यावेळी एका शेतकऱ्यांनी बोलून दाखवले. पंच म्हणून जनार्दन मंदाडे व नागेश मंदाडे यांनी काम पाहिले.शंकरपटाचे पहिले पारितोषिक 31 हजार, द्वितीय 21 तर तृतीय पारितोषिक 11 हजार रुपये आहे.तसेच काही जणांना प्रोत्साहनपर बक्षीस दिले जातात.

0000

विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी केली पाणीपुरवठा योजनेची पाहणी

छत्रपती संभाजीनगर, दि.04, (विमाका) :- विभागीय आयुक्त श्री. दिलीप गावडे यांनी आज  जायकवाडी धरणातील उद्भव विहीर (जॅकवेल) पासून ते नक्षत्रवाडी येथील जलशुदधीकरण केंद्र येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.

पाहणी दौऱ्यावेळी मनपा आयुक्त जी. श्रीकांत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता श्रीमती मनीषा पलांडे, नगरपालिका प्रशासन सह आयुक्त देविदास टेकाळे, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे  प्रकल्प संचालक श्री. रविंद्र इंगोले, मजीप्रचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी, महानगर पालिकेचे कार्यकारी अभियंता श्री. फालक काझी, ठेकेदाराचे प्रतिनिधी श्री. महेंद्र गोगुलोथु यांच्यासह सबंधित यंत्रणेचे प्रमुख उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री गावडे यांनी मजीप्रा, कंत्राटदार कंपनी आणि महापालिकेच्या सबंधित यंत्रणेला कामाबाबत तत्पर राहण्याच्या सूचना दिल्या. महापालिका व कंपनीतर्फे करण्यात येणारी उपाययोजना याबाबत माहिती घेतली. रस्त्याच्या सुरू असलेल्या कामामुळे पाइपलाइनला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही, याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

तसेच योजनेचे काम नियोजनपूर्वक व गुणवत्तापूर्वक करावे असेही विभागीय आयुक्त गावडे म्हणाले. जायकवाडी धरणक्षेत्रातील जॅकवेल, चितेगाव येथे सुरू असलेले मुख्य जलवाहिनीचे काम, फारोळा येथील २६ दशलक्ष प्रतिदिन क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र, नक्षत्रवाडी येथील ३९२ दशलक्ष प्रतिदिन क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र, नक्षत्रवाडी येथील मुख्य संतुलन जलकुंभ या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी पाहणी करून अडचणीही जाणून घेतल्या.  महावितरण तसेच मजिप्रा,राष्ट्रीय महामार्ग यांना कामाबाबत सूचना केल्या.

 

*****

पत्रकारांसाठी व्यापक आरोग्य शिबीर आयोजित करू

बुलढाणा, दि.४ (जिमाका) : सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांना आपल्या लेखणीतून वाचा फोडणाऱ्या पत्रकारांच्या सुदृढ आरोग्यासाठी आयुष मंत्रालयाच्या पुढाकाराने सर्वदायी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येईल, असे केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हा पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीच्या सत्काराप्रसंगी पत्रकारांना आश्वस्त केले.

मराठी पत्रकार परिषद संलग्नित बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड झाली असून गुरुवारी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी त्यांचा सत्कार केला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या त्यांच्या कार्यालयात हा सत्कार कार्यक्रम पार पडला. यावेळी बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी पत्रकारांसाठी व्यापक स्तरावर आरोग्य शिबीराची मागणी केली होती. या मागणीला तात्काळ होकार देत केंद्रीय राज्यमंत्री ना. जाधव यांनी आरोग्य शिबीरासाठी आयुष मंत्रालय पुढाकार घेईल आणि पत्रकारांसाठी सर्वदायी आरोग्य शिबीर आयोजित केले जाईल, असे आश्वस्त केले.

बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे नुकतेच गठन करण्यात आले आहे. बुलढाणा दौर्‍यावर आलेले केंद्रीय राज्यमंत्री ना.जाधव यांनी अविरोध निवड झालेले जिल्हाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत, सरचिटणीस कासिम शेख, कार्याध्यक्ष वसीम शेख, सहसचिव शिवाजी मामलकर, महिला सेल जिल्हाध्यक्ष कु.मृणाल सावळे, सोशल मिडीया प्रमुख संजय जाधव यांचा सत्कार केला. याशिवाय मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य उपाध्यक्षपदी चंद्रकांत बर्दे यांची आणि अधिस्वीकृती परिषदेच्या सदस्यपदी राजेंद्र काळे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. पत्रकार प्रा. युवराज वाघ यांनी या सत्कार सोहळ्याचे संचलन करीत नवीन कार्यकारिणीचा परिचय करुन दिला.

यावेळी  केंद्रीय राज्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक डॉ. गोपाल डिके, चंद्रकांत काटकर, पत्रकार विश्वास पाटील, गजानन काळुसे, सुरेखा सोमनाथ सावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

०००

‘सज्जनांची सक्रियता राष्ट्र निर्माणासाठी प्रेरक’… हे आर्य चाणक्य यांचे विचार आजही उपयुक्त – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.४: सज्जनांची निष्क्रियता ही राष्ट्र घसरणीला कारणीभूत ठरते. तर, सज्जनांनी सक्रिय होणे हेच राष्ट्र निर्माणासाठी प्रेरक असते, हे आर्य चाणक्य यांचे विचार आजच्या काळातही लागू पडतात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

शेठ गोकुळदास तेजपाल, नाट्यगृह  येथे चाणक्य नाटकाच्या १७१० व्या प्रयोगाला मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपस्थिती लावली. त्यावेळी श्री. फडणवीस बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, चाणक्य नाटकाच्या १७१० व्या प्रयोगाला उपस्थिती ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. एखाद्या नाटकाचे इतके प्रयोग ही खरोखरच हिमालया एवढी बाब आहे. पस्तीस वर्ष सलगपणे मनोज जोशी हे चाणक्यांची भूमिका करत आहेत. लोकांपर्यंत आर्य चाणक्य यांचे काम ते पोहोचवत आहेत. या नाटकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आर्य चाणक्य यांचे विचार लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम होत असल्याचे त्यांनी सांगितले.

मनोज जोशी यांनी नाटक आणि चित्रपटातून दर्जेदार अभिनय केला. चाणक्य नाटकाच्या प्रयोगातून एक प्रकारे त्यांची आराधना त्यांनी केली. एक प्रकारे राष्ट्रीय कार्यच श्री. जोशी यांनी केले. आर्य चाणक्य यांचे विचार आजही मार्गदर्शक. त्यामुळे जोपर्यंत आपल्या पिढ्या  हे विचार अंगिकारत राहील, तोपर्यंत या देशाला, येथील संस्कृती, परंपरेला धोका नाही, असे मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मोठ्या संख्येने नाट्यरसिक उपस्थित होते.

000

सागरी किनारा मार्गावरील बोगद्याजवळ हुल्लडबाजी करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई

मुंबई, दि. 4: सागरी किनारा मार्गावरील बोगद्याजवळ आज दुपारी 4 च्या दरम्यान दोन युवक निष्काळजी व भरधाव वेगाने हुल्लडबाजी (कार रेसिंग) करत वाहने चालविताना आढळून आले आहे. यामधील वाहन क्रमांक एम. एच 12 एफ वाय 7263 या वाहनाचा सागरी किनारा रस्त्याचे भिंतीला धडकून अपघात झाला. या वाहन चालकावर मलबार हिल पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र मोटार वाहन विभागाकडून एम एच 12 एफ वाय 7263 व एम एच 03 एडब्ल्यू 2255 ही वाहने दोन्ही वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्यांना मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, दोन्ही वाहन चालकांचे परवाना तीन महिन्यांकरिता निलंबित करण्यात आला आहे.

राज्यामध्ये 1 जानेवारी ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. रस्ते अपघात नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने सन-2025 या वर्षात रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त विविध विभागांमार्फत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

अनेक शहरांमध्ये, विशेषतः महामार्गावर तरूण मुले बाईक रेसिंग अथवा कार रेसिंग करत असल्याचे आढळून आले आहे. याप्रकारे वाहन चालविणे हे मोटार वाहन कायद्याच्या भंग करणारे असून यामुळे निष्पाप नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. यासंदर्भात परिवहन विभागाने मोहिम सुरू केली आहे. जर अशा पध्दतीने वाहने चालविणारे आढळून आल्यास अशा व्यक्तींची वाहने जप्त करण्यात येवून अशा वाहनांची भारतीय न्याय संहिता, मोटार वाहन अधिनियम 1988 कलम अन्वये गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

याची सर्व नागरिकांनी नोंद घेऊन नियमानुसारच वाहने सुरक्षितपणे चालवावीत, असे आवाहन सहपरिवहन आयुक्त रवि गायकवाड यांनी केले आहे.

000

 

सायबर सुरक्षा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 4 : महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प सुरू करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी पूर्ण क्षमतेने करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे गृह विभागाच्या पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सायबर सुरक्षा प्रकल्पांतर्गत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित गव्हर्नन्स, रिस्क व कंम्प्लायन्स करण्यात यावे. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स करिता नवीन पदे निर्माण करावी. नक्षलविरोधी उपक्रमांमध्ये नक्षल प्रभावित जिल्ह्यांमध्ये नवीन सशस्त्र चौक्या उभारण्याच्या कामाला गती द्यावी तसेच केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र कारागृह नियमावलीचे प्रारुप तयार करण्यात यावे, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्या.

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त सर्व प्रयोग शाळांचे संगणकीकरण करणे सुरू आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या पाच प्रयोग शाळांचे संगणकीकरण तसेच प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा येथे प्रकल्पाचे डाटा सेंटर उभारण्यात आले आहे, अशी माहिती गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंग चहल यांनी दिली. यावर अमरावती, कोल्हापूर, नांदेड, ठाणे, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, चंद्रपूर या प्रयोगशाळांचे संगणकीकरण करावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

या बैठकीस कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ.पंकज भोयर, गृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदम, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंग चहल, अपर मुख्य सचिव ओ पी गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे,  मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

000

शहरांतील कुपोषण मुक्तीसाठी विशेष उपक्रम राबवा; झोपडपट्टी परिसरात कुपोषण मुक्तीवर भर द्या! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि. 4 : राज्याच्या  ग्रामीण भागासोबतच शहरी भागातील विशेषत: मुंबई महानगरातील झोपडपट्टी परिसरात कुपोषण मुक्तीची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे महिला व बालविकास विभागाला दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे महिला व बालविकास विभागाच्या पुढील १०० दिवसात करावयाच्या कामांचा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर, गृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदम, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव श्रीमती अश्विनी भिडे, सचिव डॉ. श्रीकर परदेशी, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, महिला व बालविकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांसोबत समन्वय साधून शहरातील झोपडपट्टी परिसरात कुपोषण मुक्तीच्या योजना राबवाव्यात. महिला व बालकांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजना प्रभावीपणे राबविण्याबाबत आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. त्याचबरोबर अंगणवाडी केंद्रातील शौचालये स्वच्छ ठेवणे, त्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे, नागरी बाल विकास केंद्र तातडीने सुरू करण्यावर भर द्यावा.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरील पुस्तकाचे प्रकाशन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवताना प्रत्येक टप्प्यात केलेल्या कामगिरीचा आढावा घेणाऱ्या “द ईनसाईड स्टोरी ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” पुस्तकाचे प्रकाशन यावेळी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉ.अनुप कुमार यादव यांनी हे पुस्तक लिहीले आहे.

 

000

राज्यात ठिकठिकाणी इनोव्हेशन हब विकसित करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.4 : राज्यांतील तरूणांमध्ये कौशल्य विकास करीत असताना त्यांच्या मध्ये नाविन्यता विकासासाठी  ठिकठिकाणी इनोव्हेशन हब विकसित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, विभागामार्फत अल्प कालावधीचे प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत एक लाख दहा हजार युवकांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये अद्यावत प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून प्रशिक्षण क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी  नियोजन करा. औद्योगिक आस्थापनांचा सहयोग वृध्दिंगत करण्यात येणार आहे. स्टार्टअप सहाय्य योजनेतून महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.विभागाच्या योजनांसाठी आवश्यक निधी देण्यात येणार आहे. कुशल महाराष्ट्र रोजगारयुक्त महाराष्ट्र तयार करण्यात येणार असल्याचे, श्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

बैठकीस कौशल्य, रोजगार, उद्योजकता  आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव इक्बाल सिंग चहल, अपर मुख्य सचिव ओ पी गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव गणेश पाटील, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.

 

0000

 

नियोजन प्राधिकरणांचे सक्षमीकरण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि.4 – राज्यातील विविध नियोजन प्राधिकरणांचे सक्षमीकरण करुन त्यांचे कामकाज कंपनीच्या धर्तीवर करावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज नगरविकास विभागाच्या आगामी शंभर दिवसांच्या कामकाज नियोजनाबाबत बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. सह्याद्री राज्य अतिथी गृह येथे झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, राज्य मंत्री माधुरी मिसाळ, राज्य मंत्री पंकज भोयर आदी उपस्थित होते.

नगरविकास विभाग(एक)चे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता यांनी विभागाचे सादरीकरण केले. त्यांनी सादरीकरणातून नगरविकास विभागाच्या अखत्यारीत असलेले विविध नियोजन प्राधिकरण यांचे सक्षमीकरण करणे, शहरां जवळील सुमारे साडेतीन हजार गावांत रस्ते विकासाचे नियोजन करणे, राज्यातील दहा लाखांवरील शहरांत नागरी संकल्प प्रकल्प राबविणे, इमारत परवाने देण्याच्या प्रक्रियेचे संगणकीकरण करणे, पर्यटन धोरणानुसार एकत्रित नागरी विकास आणि नियंत्रण नियमावलीत बदल करण्याबाबतची माहिती दिली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, राज्यातील शहरांच्या विकासासाठी निधी खर्च करण्याची आवश्यकता आहे. शहरातील पायाभूत विकासासाठी भांडवली गुंतवणूक करावीच लागणार आहे. मात्र यासाठी निधी उभारण्यासाठी नाविन्यपूर्ण आर्थिक पर्याय उभारले पाहिजेत, अशा सूचना दिल्या.

राज्यातील प्रत्येक शहरात चित्रपटांसाठीची थिएटरची संख्या वाढण्याची गरज आहे. यासाठी सध्या असलेल्या सिंगल स्क्रीन थिएटरना काही सवलती देता येईल का, तसेच मराठी नाटक आणि चित्रपट एकाच थिएटरमध्ये दाखवता येईल का याबाबत विचार करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. सोलापूर स्मार्ट सिटीच्या पाणी पुरवठा योजनेच्या निधी साठीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात यावी. यामुळे सोलापूरवासियांच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी.गुप्ता, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ. श्रीकर परदेशी आदी अधिकारी उपस्थित होते.

000

 

ताज्या बातम्या

येत्या पाच वर्षात ‘जीएसडीपी’ ३५ लाख कोटींवर नेण्याचे ध्येय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, दि. २८: शासन ही एक संस्था आहे. संस्था म्हणून याची क्षमता आणि संस्थात्मक बांधणी योग्य रीतीने झाली तर आपण मोठे परिवर्तन साध्य करू...

संपेल वीजबिलाचा अंक, मिळेल मागेल त्याला सौर पंप !

0
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये सध्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ या योजनेविषयी चर्चा सुरू आहे. राज्य सरकारने मागेल त्याला सौरपंप ही योजना आणली आहे. याअंतर्गत 9...

सूर्यकांत मांढरे यांच्या जुन्या मराठी सिनेमांचे मोफत प्रदर्शन – मंत्री ॲड. आशिष शेलार

0
कोल्हापूर, दि. २८ : येत्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून बाराशे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून, ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत...

वसतिगृहातील विद्याथ्यांची प्रवेश क्षमता वाढविणार – मंत्री संजय शिरसाट

0
नागपूर, दि. २८: अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात प्रवेशासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यार्थी क्षमतेत वाढ करण्याची गरज लक्षात घेऊन वसतिगृहाची प्रवेश क्षमता वाढविण्यासाठी प्रस्ताव...

क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कडबनवाडी येथे जिप्सी सफारी उपक्रमाचे...

0
पुणे, दि.२८: क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कडबनवाडी येथील गवताळ प्रदेशामध्ये जिप्सीमधून करण्यात येणाऱ्या सफारी उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. नागरिकांनी...