रविवार, जून 29, 2025
Home Blog Page 412

महा ‘मेट्रो’ने देशात नवीन कार्यसंस्कृती आणली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. ०५: महा ‘मेट्रो’ ने देशात सर्वात जलद गतीने पूर्ण होऊन जनतेला उत्कृष्ट सेवा उपलब्ध करून दिली आहे, त्यामुळेच नागपूरच्या पायाभूत सुविधा व नागरीकांच्या जीवनात अमूलाग्र बदल झाल्याने देशात नवीन कार्यसंस्कृती निर्माण केल्याचा गौरवपूर्ण उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

येथील क्रॉसवर्ड येथे एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक यांच्या ‘बेटर दॅन द ड्रिम्स’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृतीचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्य हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अर्थ व नियोजन राज्य मंत्री ॲड. आशिष जयस्वाल, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापक संचालक ब्रिजेश दीक्षित मंचावर उपस्थित होते.

नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील यशस्वीते नंतर दुसऱ्या टप्प्यालाही सुरुवात झाली आहे. दुसरा टप्पा हा ग्रामीण क्षेत्राशी जोडण्यात येत असल्यामुळे  जनतेलाही चांगल्या सेवा मिळणार असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले की  मेट्रोने केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण नियोजनामुळे देशातील इतर राज्यातूनही मागणी होत आहे. मेट्रोमुळे नागपूर शहराच्या जीवनशैलीतही बदल झाला आहे. या परिवर्तनाची यशोगाथा या पुस्तकाच्या माध्यमातून सादर करण्यात आली आहे.

राज्यातील पहिली मेट्रो मुंबईत सुरू झाली आणि ती अकरा वर्षात अकरा किलोमीटरचा टप्पा पूर्ण करु शकली. परंतु, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केवळ पाच वर्षात तीनशे किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला आहे. नागपूर मेट्रो चार वर्षात 32 किलोमीटर, दुसऱ्या टप्प्यातील कामालाही सुरुवात झाली आहे त्याप्रमाणेच पुणे मेट्रो सुद्धा अत्यंत जलदगतीने पूर्ण झाली असल्यसाचे सांगताना श्री. फडणवीस म्हणाले की, या कामाचे श्रेय तत्कालीन प्रबंध संचालक ब्रिजेश दीक्षित यांचे आहे.

मेट्रो ची सुरुवात करताना नागपूर मेट्रो कंपनीची स्थापना करण्यात आली त्यानंतर पुण्याच्या मेट्रो चे काम या कंपनीमार्फतच सुरू करण्यात आले. पुणेकरांनी नागपूरची कंपनी पुण्याची मेट्रो तयार करेल का अशी शंका निर्माण केली त्यामुळे महामेट्रो ही कंपनी स्थापन करण्यात आली.

प्रारंभी या पुस्तकाच्या लेखिका सरिता कौशिक यांनी नागपूर मेट्रोमुळे जीवनशैलीवर झालेल्या परिणामांची ओळख, वेगवेळ्या घटकातील लोकांवर परिणाम करणाऱ्या घटना, झालेला विकास, तसेच शहराचा इतिहास या पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्यात आल्याचे सांगितले.

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. दीक्षित यांनी नागपूर मेट्रोची सुरुवात आणि त्या मागील संकल्पना आणि ती प्रत्यक्ष उतरविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.

प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘बेटर दॅन ड्रिम्स’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन केले. यावेळी नागपूर मेट्रोच्या विविध टप्यातील घटनांचा उल्लेख आपल्या भाषणात केला. स्वागत राजू अरोरा यांनी तर कार्यक्रमाचे संचालन निधी काळे यांनी केले.

००

‘महारेरा’ कायद्यामुळे ग्राहकांना संरक्षण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागूपर दि. ०५ : गृहनिर्माण क्षेत्रातील विकासकांना महारेरा कायद्याअंतर्गत प्रकल्पांची नोंदणी करणे आवश्यक करण्यात आल्यामुळे ग्राहकांना संरक्षण मिळाले आहे, विकासकांनीही सर्वसामान्य जनतेला चांगल्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

चिटणवीस सेंटर येथे ‘होमेथॉन प्रॉपर्टी एक्सपो 2.0’ चे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास एक्सपोचे अध्यक्ष घनशाम ढोकणे, सचिन  मेहेर, राहूल बोंद्रे, कुणाल पढोळे, अजय बोरकर, अजय केसरे, संजय महाजन उपस्थित होते.

एकाच छताखाली बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांनी विविध गृहनिर्माण व भूखंड या बद्दल संपूर्ण माहिती उपलब्ध करुन दिल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपल्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी या प्रदर्शनाच्या माध्यमातून संधी उपलब्ध झाल्याचे सांगतांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, की यापूर्वी अनधिकृत भूखंड खेरदीचे प्रकार होत होते पंरतु, अधिकृतपणे खरेदी करणे यामुळे सोयीचे होणार आहे. अशा प्रकारचे प्रदर्शन दरवर्षी आयोजित करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.

या एक्सपोमध्ये 65 हून अधिक बिल्डर व 350 हून अधिक डेव्हलपर्स यांनी सहभाग घेतला आहे. नागपूर शहरातील नागरिकांना त्यांच्या मागणीप्रमाणे पूर्व प्रकल्पामध्ये नोंदणी करणे सुलभ होणार आहे.

या वेळी मुख्यमंत्र्यांनी होमेथॉन -2 या प्रॉपटी एक्सपोतील विविध दालनांना भेट देऊन विकासकांच्या विविध प्रकल्पांची पाहणी केली.

०००

पायाभूत विकास कामांमध्ये महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे योगदान मोलाचे

नागपूर,दि. ०५: पायाभूत सुविधा विकासात महाराष्ट्र आता भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. देशात सर्वाधिक पायाभूत विकासाची कामे आपल्या राज्यात सुरू आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका बाजूला केंद्र सरकारमार्फत हाती घेतलेल विविध प्रकल्प व दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र शासनाने घेतलेले विविध प्रकल्प यातून समृद्ध महाराष्ट्र घडत आहे. येत्या काळात महारेल मार्फत 200 रेल्वे उड्डाणपूल व भुयारी मार्गाची कामे पूर्ण केली जात आहेत. मेट्रो, राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग, विमानतळ विकास, बंदरांचा विकास अशा सर्व क्षेत्रात राज्यात आपण दूरदृष्टी ठेवून विकास कामे हाती घेतल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

राज्यातील विविध ठिकाणी महारेलने उभारलेल्या ७ उड्डाणपुलांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय क्रीडा मैदान येथे आयोजित या समारंभास वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल,  विधान परिषद सदस्य कृपाल तुमाने,  आमदार कृष्णा खोपडे, वाशिमचे आमदार श्याम खोडे,  महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच धुळे येथून पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल,  धामनगाव रेल्वे येथून आमदार प्रताप अडसड,  आमदार किशोर जोरगेवार व विविध मान्यवरांनी या सोहळ्यात ई – सहभाग घेतला.

राज्याच्या समतोल विकासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यावर आम्ही सुरवातीपासूनच भर दिला आहे. सुरेश प्रभू रेल्वे मंत्री असतांना मी तेव्हा राज्याचा मुख्यमंत्री या जबाबदारीतून महाराष्ट्रातील रेल्वे उड्डाणपूल व इतर प्रकल्पाबाबत आग्रह धरला होता. राज्यात अत्यावश्यक असलेल्या रेल्वे उड्डाणपूल व भुयारी मार्गांची संख्या लक्षात घेता हे काम वेगाने पूर्ण होण्यासाठी एका कंपणीची नितांत आवश्यकता त्यावेळी भासली होती. वेळेत प्रकल्प पूर्ण व्हावेत यासाठी भारतीय रेल्वे व महाराष्ट्र शासन यांच्या सयुक्त सहभागातून महारेल ही स्वतंत्र कंपणी आपण साकारली. एका वर्षात 25 उड्डाणपूल उभारण्याचा आदर्श महारेलने स्थापीत करुन दाखवला. महारेलने त्यांच्यावर टाकलेला विश्वास हा सार्थ ठरविला असे गौरवोद्गार मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी काढले. ज्या कामांचे आम्ही भूमिपूजन केले ती सर्व कामे प्रत्यक्षात दिलेल्या मुदतीत साकार करुन दाखवित आहोत. दळणवळण व सुलभ वाहतुकीच्या दृष्टीने राज्यात अनेक ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल व भुयारीमार्ग आवश्यक आहेत. महारेल या कंपनीला दिलेली कामे त्यांनी कमी कालावधीत गुणवत्तापूर्ण ऊभारुन एक नवा मापदंड निर्माण केला असल्याचे ते म्हणाले. महारेलला यापुढे कामाची कमतरता भासनार नाही. आम्हाला वेग आणि गुणवत्ता याचा सुवर्णमध्य साधणारे अधिकारी व संस्था आवश्यक असल्याचे सांगून त्यांनी गुणवत्तेचा गौरव केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल यांनी केले.

00000

 

पत्रकार दिनासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता या भविष्यवेधी संकल्पनेची निवड योग्य- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

पुणे, दि. ०५: पत्रकार संघटनेने यावर्षीच्या पत्रकार दिनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही नाविन्यपूर्ण आणि भविष्यवेधी संकल्पना निवडली आहे. आज ‘एआय’ ही माध्यमांसहित सर्व उद्योगांमध्ये एक परिवर्तनकारी शक्ती म्हणून उदयास आली असताना ही निवड योग्यवेळी आणि महत्त्वाची आहे, असे मत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केले.

मराठी पत्रकार संघाच्यावतीने हॉटेल जे. डब्ल्यू. मेरियट येथे आयोजित ‘महाराष्ट्राची पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स मीडिया हॅकॅथॉन’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुढारी समूहाचे अध्यक्ष योगेश जाधव, दैनिक लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर, रुपेरी किनार फाउंडेशनच्या संस्थापक कल्पना जावडेकर, मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी आदी उपस्थित होते.

मराठी पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला या हॅकेथॉनला उपस्थित राहताना आनंद होत असल्याचे सांगून राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले की, आजचा दिवस राज्याच्या पत्रकारिता क्षेत्रासाठी विशेष महत्त्वाचा आहे. राज्यातील पत्रकारितेच्या उल्लेखनीय प्रवासाचे स्मरण करताना, आपण त्याच्या समृद्ध वारशावर आणि या सतत विकसित होत असलेल्या परिस्थितीत पुढे जाण्याच्या मार्गावर प्रकाश टाकला पाहिजे.

बाळशास्त्री जांभेकर यांनी आपल्या दूरदृष्टीने ६ जानेवारी १८३२ रोजी पहिले मराठी वृत्तपत्र ‘दर्पण’च्या रूपाने महाराष्ट्रातील पत्रकारितेचा पाया रचला, त्यांचा वारसा महाराष्ट्रातील पत्रकारांना आजही प्रेरणा देत आहे. दरवर्षी हा दिवस साजरा करण्यासाठी सर्व पत्रकार आणि मराठी पत्रकार संघटनेच्या कौतुकास्पद प्रयत्नांबद्दल राज्यपालांनी शुभेच्छा दिल्या.

आज नवीन घडामोडीला कोणीही थांबवू शकत नाही. एआयमुळे सर्व क्षेत्रात शास्त्रीय विकास होणार आहे. पूर्वी वायरच्या सहाय्याने होणारा दूरसंचार नंतर वायरलेसच्या माध्यमातून, त्यापुढील काळात सॅटेलाईटच्या तर आताच्या काळात संगणक अशा माध्यमातून होत आहे. ‘एआय’ हे माध्यम असले तरी बातमी देणारा पत्रकार हा नि:पक्षपाती असला पाहिजे. पत्रकारांकडून सत्य आणि नि:पक्षपाती वृत्तांकनामुळे भारतीय लोकशाही अधिक सुदृढ होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

घटना जशी असेल तशी जनतेपर्यंत पोहोचविल्यास आपली प्रगती घडून येणार आहे. २०२७ पर्यंत विकसित भारत होण्याचे लक्ष्य हे देशाच्या नागरिकांपर्यंत जोपर्यंत सत्य पोहोचत नाही तोपर्यंत पूर्ण होऊ शकणार नाही. त्यासाठी प्रतिभावान पत्रकार महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. पत्रकार भीतीशिवाय, सत्याच्या बाजूने तसेच समाजाच्या कल्याणासाठी लिहितात, अवैध काम करणाऱ्यांना उघडे पाडत असल्यामुळे प्रशासनाला त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी लागते.

जेव्हा आपली हृदयापासून खात्री होते तेव्हा जिज्ञासू वृत्ती तयार होते. सुरुवातीला आपल्या कार्याला स्वीकारले गेले नाही तरी काम करत राहिल्यास एक ना एक दिवस जनता आपल्याकडून चांगल्या बाबी नक्कीच स्वीकारेल. त्यासाठी जनतेसमोर काम करण्याचे, सत्य सांगण्याचे आणि सत्य प्रस्थापित करण्याचे धैर्य आपल्याकडे असले पाहिजे, असा सल्ला राज्यपालांनी यावेळी दिला.

आपण आधुनिक आर्थिक विकास तसेच आधुनिक शास्त्रीय विकासाला स्वीकारणे आवश्यक आहे. पत्रकारितेत एआय-चालित नवोपक्रमांना चालना देण्याच्या दृष्टिकोनावर आधारित ही कार्यशाळा आहे. युवकांना, ते जनतेपर्यंत सत्य कसे पोहोचवू शकतात हे माहिती झाले पाहिजे. यादृष्टीने या हॅकेथॉनमध्ये अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेण्याच्या प्रयत्न अतीशय चांगला आहे. या हॅकॅथॉनच्या माध्यमातून जनतेपर्यंत सत्य पोहोचविणारे दहा नागरिक जरी निर्माण करु शकलो तरी ते खूप मोठे यश असेल.

मराठी भाषा महान भाषा असून तीला आपली स्व:ताची संस्कृती आणि वारसा आहे. ही एक सर्वात जुन्या भाषेपैकी असून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे त्यांनी आभार मानले.

पत्रकारिता ही भयापासून, मर्जीपासून आणि सत्याशिवाय अन्य कोणत्याही बाबीपासून मुक्त असली पाहिजे. ज्यात या देशाचे खरे यश सामावलेले आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी श्री. जाधव, श्री. बाविस्कर तसेच श्रीमती जावडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. किरण जोशी यांनी स्वागत केले.

यावेळी राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांना सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमात ‘संपादक व्रतस्त पुरस्कार’ पुढारी समूहाच्या संपादक स्मिता योगेश जाधव, दैनिक लोकमतचे यदू जोशी, दै. सकाळच्या कार्यकारी संपादक शीतल पवार, न्यूज १८ लोकमतचे विलास बडे यांना देण्यात आले. तसेच विशेष पुरस्कार रुपेरी किनारच्या श्रीमती कल्पना जावडेकर, एड्यूटेकचे निलेश खेडेकर यांना देण्यात आले.

हॅकॅथॉनमध्ये उत्कृष्ट काम केलेल्या महाविद्यालयांना पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.

यावेळी विविध माध्यमांचे पत्रकार, पत्रकारिता अभ्यासक्रमाचे तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयांचे विद्यार्थी उपस्थित होते.

०००

आदिवासी समाजातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी शासन प्रयत्नशील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • आदिवासी विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाह व्यापण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न
  • आदिवासी कल्याणाच्या सर्व उपक्रमांसाठी राज्य शासन भक्कमपणे पाठीशी

नागपूर,दि. ०५: आदिवासींमध्ये उपजतच क्रीडा गुण असतात. त्याला स्पर्धात्मक वातारवण ,तंत्रशुद्धता आणि कौशल्याची जोड देवून आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यवासायीक खेळाडू घडविण्यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्न करीत आहे. आदिवासी मुला-मुलींमध्ये मुख्य प्रवाह व्यापण्याची शक्ती निर्माण होत आहे यास अधिक वेग देण्यासाठीही राज्य शासन प्रयत्न करीत आहे. आदिवासींच्या कल्याणासाठी राबवायच्या सर्व नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी राज्य शासन भक्कमपणे आदिवासी विभागाच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

आदिवासी विकास विभागाच्यावतीने येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित तीन दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या समारोप व बक्षिस वितरण समारंभाप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके, विभागाचे सचिव विजय वाघमारे, आदिवासी विकास विभाग नागपूरचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, गेल्या काही वर्षांमध्ये आदिवासी समाजातील खेळाडुंनी धनुर्विद्या,ॲथलॅटिक्स आणि देशी खेळांमध्ये चमकदार कामगिरी केल्याचे चित्र देशभर दिसून येत आहे. आदिवासींमध्ये उपजतच विविध क्रीडा गुण असतात या गुणांना स्पर्धात्मक वातावरण,तंत्रशुद्धता व कौशल्य आधारीत उत्तम प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने विविध योजना आखल्या आहेत. याद्वारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम व्यावसायिक खेळाडू येणाऱ्या काळात या समाजातून निर्माण होतील.

राज्याचा आदिवासी विभाग आणि आश्रमशाळांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न सुरु असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, आदिवासी मुलांसाठी राज्यशासनाने नामांकित शाळांची योजना विस्तारीत करून त्यांना चांगल्या शाळांमध्ये शिकण्याची सोय करून दिली. स्वयम् योजनेच्या माध्यमातून वसतीगृहात प्रवेश न मिळू शकलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण सोडावे लागू नये यासाठी उत्तम कार्य सुरु आहे. निसर्गाचे रक्षक असणाऱ्या आदिवासिंना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य् शासनाने विविध संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. आदिवासी मुल-मुलींमध्ये मुख्य प्रवाह व्यापण्याची शक्ती निर्माण होत आहे. ही शक्ती अधिक वेगाने निर्माण होण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल. तसेच आदिवासींच्या कल्याणासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याकरिता राज्य शासन भक्कमपणे आदिवासी विभागाच्या पाठिशी उभे असल्याचेही त्यांनी सांगितले.    नाशिक विभाग राज्यात प्रथम तर नागपूर उपविजेता, मुख्यमंत्र्याच्या हस्ते सन्मान
राज्यातील ठाणे,नाशिक,अमरावती आणि नागपूर विभागांमध्ये ३ ते ५ जानेवारी २०२५ दरम्यान वैयक्तिक आणि सांघिक क्रीडा प्रकारात विविध स्पर्धा पार पडल्या. यात ४७५ गुणांसह नाशिक विभागाने प्रथम क्रमांक पटकाविला. नागपूर विभाग ४५४ गुणांसह दुसऱ्या तर २८१ गुणांसह ठाणे विभागाने तिसऱ्या क्रमांकाचे बक्षिस पटकाविले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते या तिन्ही संघाना यावेळी बक्षिस वितरीत करण्यात आले. या स्पर्धेत एकूण ९७४ मुले आणि ९०० मुलींनी सहभाग घेतला. या स्पर्धेची उर्वरीत बक्षिसे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके आणि वित्त व नियोजन राज्य मंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
तत्पूर्वी, राज्यघटनेची  ७५ कलमे मुखोद्गत असणारा शिवांश असराम, झिरो माईल आयकॉन सुप्रिया कुमार यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी सुरेश पुजारी,स्वप्निल मसराम आदींचा यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नागपूर विभागातील शासकीय आश्रमशाळांमध्ये राबविल्या जात असलेल्या ‘ब्राइटर माइंड’ उपक्रमांतर्गत डोळयाला पट्टी बांधून रंग ओळखणे, पुस्तक वाचने, मोबाईलवरील फोटो ओळखने आदिंचे विद्यार्थ्यांनी  सादरीकरण केले. उर्सुला शाळेच्या विद्यार्थीनींनी आदिवासी नृत्य सादर केले. आदिवासी विभागाचे सचिव विजय वाघमारे यांनी प्रास्ताविक केले.

०००

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जलसंपदा विभागाच्या क्रिकेट स्पर्धेचे उद्धाटन

बारामती, दि. ०५: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जलसंपदा विभागाअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे आयोजित महामंडळस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्धाटन करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, जलसंपदा विभागाअंतर्गत महामंडळस्तरीय क्रिकेट स्पर्धेला २०१८ पासून सुरुवात झाली आहे. खेळामध्ये यश -अपयश येते त्यामुळे  सर्व खेळाडूंनी सांघिक भावना अंगिकारून क्रीडावृत्ती दाखवून उत्तम पद्धतीने खेळ खेळावे.

महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाअंतर्गत पुणे पाटबंधारे मंडळाच्यावतीने पुरुष व महिलांच्या क्रिकेट सामन्याचे ५ ते ७ जानेवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ७ पुरुष व १२ महिला संघानी सहभाग घेतला आहे.

०००

परवडणाऱ्या दरात आरोग्यविषयक सेवांकरीता येत्या अधिवेशनात भरीव निधीची तरतूद करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. ०५: केंद्र सरकार व राज्य शासन मिळून सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात आरोग्यविषयक सेवा तसेच आरोग्य विमा सरंक्षणाकरीता दरवर्षी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करत आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही याकरीता भरीव निधीची तरतूद करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

सिल्व्हर ज्युबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, शासकीय महिला ग्रामीण रुग्णालय, मेडिकोज् गिल्ड संघटना, भगिनी मंडळ, बारामती स्त्रीरोगतज्ज्ञ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिलांकरीता मोफत कर्करोग निदान शिबिराच्यावेळी ते बोलत होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, सिल्व्हर ज्युबिली  शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश जगताप, शासकीय  महिला  ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापू भोई, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, सहायक मोटार वाहन निरीक्षक सूरज पाटील, मेडिकोज् गिल्डचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र चोपडे, सचिव डॉ. चंद्रकांत पिल्ले, भगिनी मंडळाच्या विश्वस्त सुनिता शाह, अध्यक्षा शुभांगी जामदार आदी उपस्थित होते.


उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, आपल्या दैनंदिन जीवनशैलीत झालेले बदल, व्यसनाधिनता,  व्यायाम व सकस आहाराचा अभाव तसेच वातावरणीय बदलामुळे विविध आजार उद्भवत आहेत. समाजात महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्करोगाचे प्रमाण वाढत असून कर्करोगाचा संपूर्ण समाजावर परिणाम होतो. त्यामुळे कर्करोगाविषयी जनजागृती करण्यासोबत महिलांची मोफत आरोग्यविषयक तपासणी करण्याच्या उद्देशाने आयोजित अशा शिबिराची खऱ्या अर्थाने समाजाला गरज आहे. कर्करोगाचे योग्यवेळी निदान करुन उपचार केल्यास हा आजार बरा होतो.
नागरिकांना आपले आरोग्य निरोगी, सदृढ ठेवण्याकरीता मेडिकोज् गिल्ड संघटनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित शिबारीचा लाभ होणार आहे. महिलांनी या शिबीरात सहभागी होवून आपली आरोग्यविषयक तपासणी करुन घ्यावी. या शिबीराच्या माध्यमातून महिलांसोबतच त्यांच्या कुटुंबियात आरोग्याच्यादृष्टीने एक नवा विश्वास निर्माण होईल. आपले आरोग्य उत्तम राहिल्यास समाजाची सेवा करता येईल. संघटनेचे आरोग्य क्षेत्रातील योगदान अनुकरणीय आहे, असे सांगून संघटनेच्या पुढील वाटचालीस उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी शुभेच्छा दिल्या.
कर्करोग निदान शिबिरात ३९८ महिलांची स्तन आणि गर्भाशय कर्करोगविषयक आरोग्य तपासणी करण्यात आली, त्यापैकी  १०८ महिलांचे निदानाकरीता नमुने घेण्यात आले.
यावेळी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या ‘रस्ते सुरक्षा’पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.

०००

 

आनंददायी शिक्षण पद्धतीच्या यशस्वीतेसाठी योगदान द्या – मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. ०५:   गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धतीत विद्यार्थी फक्त परीक्षांसाठी तयार न होता जीवनासाठी तयार होतात, आणि शिक्षण हा त्यांच्या आयुष्यातील आनंदाचा स्रोत बनतो. यामुळे शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांनी आनंददायी शिक्षण पद्धतीच्या यशस्वीतेसाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज केले.

‘गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धती’ या विषयावर जयहिंद महाविद्यालय, मुंबई येथे आयोजित चर्चसत्रात मंत्री श्री. भुसे बोलत होते. यावेळी आमदार जयंत आजगावकर, प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी आणि राज्यातील  प्राथमिक, माध्यमिक व शिक्षकेतर संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री श्री. भुसे म्हणाले की, राज्याच्या शिक्षण विभागाचे आपण सर्वचजण  एक घटक आहोत. आपण भावी पिढी घडविण्यासाठी ज्ञानदानाचे जे पवित्र काम करत आहात ते अतुलनीय व भाग्याचे आहे. गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धती हा आव्हानात्मक विषय असला तरी आपल्या सर्वांच्या सहकार्यातून तो यशस्वीपणे राबविला जाईल याची खात्री आहे. विद्यार्थ्यांसाठी असे वेगवेगळे उपक्रम राबवून शिक्षण विभागाचा एक रोडमॅप आपण ठरवू. येणाऱ्या काळात शैक्षणिक धोरण राबविताना सर्वांना सोबत घेऊन आपण काम करूया, असे आवाहन त्यांनी केले.

शिक्षकांना त्यांचे मुख्य उद्दिष्ट यशस्वीरित्या पार  पाडता यावे यासाठी त्यांना वेळ दिला जाईल. शिक्षण व शिक्षकासाठी जे-जे शक्य आहे ते केले जाईल. समाजामध्ये शिक्षकाला मानाचे स्थान आहे. हा त्याचा मान अधिक उंचावण्यासाठी शिक्षण विभागामार्फत पुढाकार घेतला जाईल. आजच्या चर्चासत्रात शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांच्या अनुभवातून चांगले मुद्दे/सूचना मिळाल्या आहेत, असे मंत्री श्री. भुसे यावेळी म्हणाले.

शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणाले की, गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धतीत आदर्श शिक्षकांच्या ज्ञानाचा, त्यांच्या अनुभवाचा उत्तम प्रकारे उपयोग करून घेण्यात येईल. अशा शिक्षकांची एक डाटा बँक तयार करून त्यांच्या ज्ञानाची, अनुभवाची शिदोरी राज्याच्या सर्व कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातील. राज्यातील ग्रामीण, आदिवासी भागातील शाळांना शिक्षण मंत्र्यांसह शिक्षण विभागाचे अधिकारी भेट देतील असेही ते म्हणाले.

मंत्री श्री. भुसे म्हणाले, शिक्षक अविरतपणे मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांच्या भविष्याला आकार देण्याचे काम करत असतो. गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धती राबवताना त्याचे घटक असणाऱ्या, ज्ञानदानाचे काम करणाऱ्या या घटकाच्या, त्यांच्या संघटनांच्या मागण्यांचा प्राधान्याने विचार केला जाईल. जे लहान-लहान प्रश्न आहेत ते त्वरित सोडवले जातील.  जे प्रश्न कायदे, नियम या संदर्भातील आहेत याबाबत सर्व संबंधितांची बैठक घेऊन त्यातूनही मार्ग काढला जाईल.  शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याबाबत शिक्षण विभागामार्फत नियमित आढावा, चर्चासत्रे आयोजित केली जातील. संघटनांनी आपल्या मागण्या लेखी स्वरूपात सादर कराव्यात.

या चर्चासत्रात शाळांमध्ये भौतिक सुविधा, संगणक प्रणालीचा वापर वाढविणे, मुख्याध्यापकांच्या नियमित कार्यशाळा,  वेतनेतर अनुदान वाढविणे, ॲकॅडमी शिक्षणावर शासनाचे नियंत्रण, जिल्हा परिषद शिक्षण विभाग पदोन्नती मध्ये  शिक्षकांना संधी, राष्ट्रीय, राज्य, विभाग, जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना वेतनवाढ, अशैक्षणिक कामापासून शिक्षकांची सुटका, जुनी पेन्शन योजना, प्रत्येक शाळेत कला व क्रीडा शिक्षक,  सीबीएससी पॅटर्न लागू करणे, माध्यमिक शिक्षक संच मान्यता ऑनलाईन व्हावी, वेतन वेळेत व्हावे, अंशदायी अनुदान लवकर मिळावे अशा मागण्या विविध शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडल्या.

आमदार जयंत आजगावकर यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

०००

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एनएसएच हॉस्पिटल अँड डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घाटन

नागपूर दि.०५: येथील गंगाबाई घाट चौक परिसरात भांगडिया फाऊंडेशनतर्फे उभारण्यात आलेल्या एनएसएच क्रिटिकल केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले.

यावेळी आमदार कृष्णा खोपडे, कृपाल तुमाने, किर्तीकुमार भांगडिया, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, रुग्णालयाचे अध्यक्ष मितेश भांगडिया, हृदयरोग विशेषज्ञ डॉ. वैभव बियाणी, बालरोग न्यूरोलॉजिस्ट डॉ. उमेश बियाणी, रेडिओलॉजिस्ट डॉ. नेहा बियाणी, स्त्रीरोग विशेषज्ञ डॉ. निकिता बियाणी, विनय बियाणी , श्रीकांत भांगडिया आदी उपस्थित होते. हॉस्पिटलच्या पदाधिकाऱ्यांकडून यावेळी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले.

एनएसएच हे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज असे रुग्णालय असून याच्या उभारणीमुळे अनेक दुर्धर आजाराच्या रुग्णांना निश्चितच योग्य उपचार मिळतील, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी एनएसएचचे अध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयातील अतिदक्षता कक्षाची यावेळी पाहणी केली व तेथील अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांबाबत  तज्ज्ञांकडून माहिती घेतली. तसेच या रुग्णालयातील विविध कक्षांनाही भेट दिली.

०००

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाला साजेशी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा घ्या – उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती, दि.५: छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे १५ ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत शहरातील रेल्वे मैदानावर आयोजन करण्यात येणार असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाला साजेशी क्रीडामय वातावरणात स्पर्धा आयोजित करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

क्रीडा विभागाच्यावतीने कबड्डी स्पर्धा आयोजनाच्या अनुषंगाने सादरीकरणवेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अभियंता अमोल पवार, महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेटकर, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव,

पुणे जिल्हा कबड्डी संघटनेचे सदस्य सतपाल गावडे, कबड्डी मार्गदर्शक दादा आव्हाड आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजनाकरीता राज्य राज्यशासनाच्यावतीने ७५ लाख रुपये अनुदान देण्यात येते. स्पर्धेच्या अनुषंगाने संपूर्ण बारामती परिसरात  कबड्डीमय वातावरण निर्माण झाले पाहिजे, याकरीता प्रत्येक बाबींचे  सूक्ष्म नियोजन करावे. सर्व संबंधित विभाग आणि समाजातील सर्व घटकांना सोबत घेवून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी  प्रयत्न करावेत. याकरीता निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे श्री. पवार म्हणाले.

या स्पर्धेत राज्यातून पुरुष व महिला प्रत्येकी १६ संघ दाखल होणार आहे. राष्ट्रकुल स्पर्धेप्रमाणे गीत गायनाची व्यवस्था करावी.  रेल्वे मैदान परिसरासह शहरात वाहतूक कोंडी होणार नाही तसेच शहरात सुरळीत वाहतुकीच्या अनुषंगाने दिशादर्शक फलक लावावेत. मजबूत प्रेक्षकागृह उभारावे.

भोजन, अल्पोपहार उत्तम आणि ताजे राहील, या बाबत दक्षता घ्यावी. खेळाडूच्या आहारामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी अन्न, दूध, फळे आदी बाबीचा समावेश करण्यात यावा. बाहेरुन येणारे खेळाडू, त्यांचे मार्गदर्शक, पंच तसेच प्रेक्षकांची गैरसोय होणार नाही, याबाबत कटाक्षाने दक्षता घ्यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी दिल्या.

श्री. कसगावडे म्हणाले की,  उप विभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धेकरीता विषयनिहाय उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. स्पर्धेच्या अनुषंगाने सदस्यांची आढावा बैठक घेवून प्रत्येक बाबीचे सूक्ष्म नियोजन करुन कामे करण्यात येत आहेत. स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे, असेही श्री. कसगावडे म्हणाले.

यावेळी भोजन, अल्पोपहार, पाणी, निवासव्यवस्था, अग्निशमन यंत्रणा, प्रेक्षकागृह, शौचालय, विद्युत व्यवस्था, बैठक व्यवस्था, ध्वनीक्षेपण यंत्रणा, मंच व्यवस्था, वाहतूक व्यवस्था आदींबाबत चर्चा करण्यात आली.

०००

ताज्या बातम्या

येत्या पाच वर्षात ‘जीएसडीपी’ ३५ लाख कोटींवर नेण्याचे ध्येय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, दि. २८: शासन ही एक संस्था आहे. संस्था म्हणून याची क्षमता आणि संस्थात्मक बांधणी योग्य रीतीने झाली तर आपण मोठे परिवर्तन साध्य करू...

संपेल वीजबिलाचा अंक, मिळेल मागेल त्याला सौर पंप !

0
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये सध्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ या योजनेविषयी चर्चा सुरू आहे. राज्य सरकारने मागेल त्याला सौरपंप ही योजना आणली आहे. याअंतर्गत 9...

सूर्यकांत मांढरे यांच्या जुन्या मराठी सिनेमांचे मोफत प्रदर्शन – मंत्री ॲड. आशिष शेलार

0
कोल्हापूर, दि. २८ : येत्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून बाराशे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून, ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत...

वसतिगृहातील विद्याथ्यांची प्रवेश क्षमता वाढविणार – मंत्री संजय शिरसाट

0
नागपूर, दि. २८: अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात प्रवेशासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यार्थी क्षमतेत वाढ करण्याची गरज लक्षात घेऊन वसतिगृहाची प्रवेश क्षमता वाढविण्यासाठी प्रस्ताव...

क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कडबनवाडी येथे जिप्सी सफारी उपक्रमाचे...

0
पुणे, दि.२८: क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कडबनवाडी येथील गवताळ प्रदेशामध्ये जिप्सीमधून करण्यात येणाऱ्या सफारी उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. नागरिकांनी...