शनिवार, जून 28, 2025
Home Blog Page 411

महाराष्ट्र परिचय केंद्र येथे मराठी पत्रकार दिन

नवी दिल्ली, ६  : महाराष्ट्र परिचय केंद्र येथे  मराठी पत्रकार दिनानिमित्त प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्यांनीही जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबई येथे ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ या  मराठी आणि इंग्रजी भाषेतील पाक्षिकाची सुरूवात करून मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. पाश्चात्य विद्या व शिक्षण आत्मसात करून ‘दर्पण’च्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकरांनी समाजात नवीन जीवनमूल्ये रूजविली. त्यांच्या कार्याची आठवण म्हणून ६ जानेवारी हा दिवस ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

००००

उद्योग, व्यवसाय व आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३१ जानेवारी पर्यंत सादर करण्याचे आवाहन

मुंबई, दि. ६ : केंद्र व राज्य शासन, विविध आस्थापना व त्यांचे अंगिकृत उद्योग, व्यवसाय, महामंडळे, महापालिका, तसेच खासगी क्षेत्रातील आस्थापनांनी त्यांच्याकडील मनुष्यबळाचे तिमाही विवरणपत्र येत्या ३१ जानेवारी पर्यंत सादर करावे, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त अ. मु. पवार यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

दर तिमाहीअखेर (मार्च, जून, सप्टेंबर, डिसेंबर) विवरण सादर करणे बंधनकारक आहे. पंचवीस किंवा अधिक लोक काम करतात अशा सर्व आस्थापना, उद्योग, व्यापार कारखाने यांना सेवायोजन कार्यालये यांनी रिक्तपदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारा कायदा १९५९ व अंतर्गत नियमावली १९६० नुसार मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ईआर-१ प्रत्येक तिमाही संपल्यानंतर ३० दिवसांच्या आत सादर करणे बंधनकारक आहे. तसेच ज्या उद्योजकांनी महास्वयंम वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्या उद्योजकांनी ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी. हे विवरणपत्र (ER-I) ऑनलाईन पध्दतीने https://rojgar.mahaswaym.gov.in  या वेबपोर्टलवर सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेचा वापर करुन ३१ जानेवारी,  २०२५ पर्यंत विवरणपत्र (ईआर-१) सादर करावे,

मुंबई शहर जिल्हा अंतर्गत येणारे सर्व नियोक्ते, आस्थापना यांनी https://rojgar.mahaswaym.gov.in  या वेबपोर्टलवर तिमाही विवरणपत्र ईआर १ सादर करण्याची दक्षता घ्यावी. या वेबसाइटच्या एम्प्लॉयर (List a Job ) या टॅबवर क्लिक करुन एम्प्लॉयर लॉगइनमध्ये युजर आयडी व पासवर्ड वापरून लॉगइन करावे आणि ईआर रिपोर्टमध्ये ईआर -१ या ऑप्शनवर क्लिक करुन तिमाही विवरणपत्र ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहिती , मार्गदर्शन अथवा तांत्रिक अडचण असल्यास mumbaicity.employment@gmail.com  या ईमेलवर संपर्क करावा. ३१ डिसेंबर, २०२४ च्या तिमाही अखेर हजेरी पटावर असलेल्या सर्व मनुष्यबळाच्या माहितीचे विवरणपत्र ईआर ३१ जानेवारी, २०२५ पर्यंत महास्वयम वेबसाईटवर ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे. हे विवरणपत्र ऑफलाईन स्विकारले जाणार नाही, असे सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर यांनी कळविले आहे.

0000

‘दिलखुलास’ कार्यक्रमात पोलीस अधीक्षक रूपाली अंबुरे यांची मुलाखत

मुंबई, दि. : रस्त्यांवरील अपघात आणि त्यामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी दरवर्षी जानेवारी महिन्यात ‘रस्ता सुरक्षा’ मोहीम राबविण्यात येते. यासाठी परिवहन व महामार्ग सुरक्षा विभागामार्फत विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येतात. नागरिकांनी रस्तासुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपले व इतरांचे आयुष्य सुरक्षित ठेवावे, असे आवाहन महामार्ग सुरक्षा विभागाच्या पोलीस अधीक्षक रूपाली अंबुरे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून केले आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मिती ‘दिलखुलास’ कार्यक्रमात पोलीस अधीक्षक श्रीमती अंबुरे यांची मुलाखत मंगळवार दि. ७, बुधवार दि. ८, गुरूवार दि. ९ आणि शुक्रवार दि. १० जानेवारी २०२५ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

रस्ता सुरक्षा ही आपल्या दैनंदिन जीवनातील अतिशय महत्त्वाची बाब आहे. रस्ते अपघात आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण मोठे आहे. ही बाब विचारात घेवून केंद्र सरकार आणि राज्य शासनामार्फत रस्ता सुरक्षा मोहीम राबविण्यात येते. या मोहिमेच्या माध्यमातून रस्ते वाहतूक व महामार्ग रस्त्यांवरील सुरक्षितता सुधारण्यासाठी तसेच लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांनी स्पीडगनचा वापर करून अतिवेगावर नियंत्रण आणणे, हेल्मेटचा वापर करणे तसेच वाहतूक नियमावलीचे पालन करणे इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मोहिमेची राज्यात करण्यात येणारी अंमलबजावणी याबाबत ‘दिलखुलास’ कार्यक्रमात पोलीस अधीक्षक श्रीमती अंबुरे यांनी माहिती दिली आहे.

०००

पोलीस यंत्रणांनी दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्याबरोबरच महिलांच्या गुन्ह्यांमागील कारणांचा शोध घ्यावा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

कोल्हापूर, दि. ६ जानेवारी २०२५ : महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे गुन्हे निकाली काढण्यासाठी आरोपींचा तातडीने शोध घेवून त्यांच्यावर कारवाई करा, महिलांची फसवणूक करणाऱ्यांची साखळी तोडून काढा, पोलीस यंत्रणांनी महिला अत्याचारासंदर्भातील गुन्ह्यांच्या दोषसिध्दीचे प्रमाण वाढविण्याबरोबरच गुन्ह्यांमागील कारणांचा शोध घ्यावा, अशा सूचना त्यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

कोल्हापूर दौऱ्यांतर्गत, कोल्हापूर परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांमधील महिला अत्याचार विषयक गुन्ह्यांचे प्रतिबंध करण्याबाबत केलेली कार्यवाही व उपाययोजना संदर्भात डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज (सोमवार, ६ जानेवारी २०२५) रोजी बैठक पार पडली.

मागील वर्षभरात महिला अत्याचार विषयक घटनांमध्ये दाखल गुन्हे व त्यामध्ये झालेल्या कार्यवाहीतील प्रगती, अल्पवयीन मुलींवरील अत्याचार यासंदर्भात केलेल्या कार्यवाही, सदर गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्याच्या अनुषंगाने उपाय योजना, अंधश्रद्धा निर्मूलन, जातपंचायत, जेष्ठ नागरिक सुरक्षा अशा विविध मुद्द्यांवर प्रामुख्याने या बैठकीत आढावा घेण्यात आला.

या बैठकीस आमदार राजेश क्षीरसागर, कोल्हापूर परिक्षेत्राचे प्र. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस अधिक्षक जयश्री देसाई, शौमिका महाडिक प्रत्यक्ष तर सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, साताराचे पोलीस अक्षीक्षक समीर शेख, पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर,सांगली,सातारा पुणे व सोलापूर ग्रामीणमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या गुन्ह्यांचा शोध लावण्याबरोबर घडलेल्या गुन्ह्यांच्या मूळ कारणांपर्यत जाण्याचा प्रयत्न करावा अशा सूचना देवून उपसभापती डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या, “पॉक्सोअंतर्गत लहान मुलींच्यावर होणाऱ्या अत्याचारा संदर्भात गुन्ह्याचा तपास करताना पिडीतेची ओळख गुप्त राहील, तसेच पिडीतांनी व त्यांच्या कुटुंबियांना कोणताही त्रास होवू नये याची दक्षता घ्यावी. शाळा, महाविद्यालयांमध्ये भरोसा सेलच्या माध्यमातून मार्गदर्शनपर कार्यशाळांचे आयोजन करावे. ऑनलाईन प्रशिक्षणासंदर्भात कार्यवाही करावी. चर्चासत्रांचे आयोजन करावे. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्यांसंदर्भातील अद्ययावत माहिती फलकांवर लावण्यात यावी, असेही डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

तसेच डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, लहान मुलींवर होणारे अत्याचार टाळण्यासाठी शाळामध्ये “गुड टच बॅड टच ”  या संदर्भात प्रशिक्षण द्यावे, प्रशिक्षीत मुलींचे गट तयार करुन या संदर्भांत जनजागृती करावी. “अत्याचारग्रस्त पीडितांची वैद्यकीय तपासणी अथवा उपचार करताना योग्य दक्षता घ्यावी. त्यांच्यासाठी स्वतंत्र कक्षाची सोय करण्याबाबत कार्यवाही करावी. साक्षीदार संरक्षण कायद्याचे तंतोतंत पालन करुन त्यांची योग्य अंमलबजवाणी करावी. पिडीतांना  कोर्टात घेवून जातानाही याबाबत योग्य दक्षता घेण्यात यावी. चार्ज शिट दाखल करताना कायद्याचे पालन करावे. दंड संहितेनुसार बी समरीचे पुर्नरिक्षण करणाच्या सूचनाही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी शेवटी दिल्या.

यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांनी तपास यंत्रणा अधिक गतिमान करण्याचे आदेश देवून कायद्यासंदर्भातील सर्वसाधारण सूचनांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना दिल्या. कोल्हापूर परिक्षेत्रात सीसीटीव्हीचे प्रमाण वाढविण्यात यावे असे निदेश देवून महिला अत्याचार तपास यंत्रणेसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याबाबत सूचीत केले.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी परिक्षेत्रातील जिल्हानिहाय कामकाज व गुन्हांच्या तपाससंदर्भांत आढावा यावेळी घेतला.बैठकीला महिला कक्षामध्ये कार्यरत असणारे अधिकारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

००००

 

मुंबई महानगर क्षेत्रात ‘केबल कार’ प्रकल्पाचा मानस – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. ६ : रस्ते वाहतूक, रेल्वे तसेच मेट्रो यासारख्या सार्वजनिक वाहतूक सेवांवरील वाढता ताण लक्षात घेता भविष्यात ‘केबल कार’ सेवा विकसित होणे आवश्यक आहे. त्यासाठी या प्रकल्पाचे सर्वेक्षण करून विकास आराखडा (DPR) तयार करणे गरजेचे आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटी दरम्यान या प्रकल्पाच्या सादरीकरणाद्वारे मुंबई क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या दृष्टीने या प्रकल्पाची आवश्यकता मांडण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

नवी दिल्ली येथे ७ जानेवारी रोजी होणाऱ्या ‘विकसित भारत २०४७’ या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या लक्ष्य प्राप्तीच्या दृष्टीने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सर्व राज्यांच्या परिवहन मंत्र्यांच्या बैठकीस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित राहणार आहेत.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सादरीकरणानंतर मुंबई महानगर क्षेत्रामध्ये ‘केबल कार’ प्रकल्प राबवण्यासाठी केंद्र सरकारद्वारे ‘पर्वतमाला परियोजना’ अंतर्गत  सार्वजनिक खासगी भागीदारी (PPP) अथवा केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त आर्थिक भागिदारीने  रोप वे विकसित करण्याचा मानस असून यासंदर्भातील विकास आराखडा तयार करुन तत्वत: मान्यता घेण्याचा प्रयत्न राहील, असेही मंत्री श्री. सरनाईक यांनी सांगितले.

मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्यादृष्टीने या प्रकल्पाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पालघर पासून रायगड जिल्ह्यातील उरण-पेणपर्यंत पसरलेल्या एकूण क्षेत्रामध्ये नागरिकरणाचा वेग वाढत आहे.  मुंबई महानगर क्षेत्रातील वाढते नागरीकरण, वाहनांची वाढती संख्या, नवीन रस्ते व रेल्वे सेवा, प्रदूषण याबाबत काही धोरणात्मक निर्णय घेऊन आधुनिक तंत्रज्ञान व पाश्चात देशातील यशस्वी नाविन्यपूर्ण प्रकल्पाचा अभ्यास करून वाहतूक समस्या सोडवण्यासाठी ठोस प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे.

मुंबई महानगरास प्राप्त झालेले महत्त्वपूर्ण भौगोलिक स्थान, सागरी किनारा खाडीचा प्रदेश, एलिफंटासारखी प्राचीन लेणी, माथेरानसारखे थंड हवेचे पर्यटन स्थळ, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यासारखी हरित चादर जतन करून मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी ‘रोपवे’च्या माध्यमातून ‘केबल कार’ प्रकल्प राबवणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी व्यक्त केले आहे.

0000

सहकार क्षेत्रात पुरुषांसह महिलांनाही सामावून घेण्याचे शासनाचे धोरण – मंत्री बाबासाहेब पाटील

सोलापूर दि.०५ (जिमाका): राज्याला सहकार चळवळ अत्यंत फायदेशीर ठरली असून या चळवळीत पुढील काळात पुरुषाबरोबरच महिलांनाही सामावून घेण्याचे शासनाचे धोरण आहे, व त्या दृष्टीने शासन पावले टाकत असल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.

सोलापूर शहरातील अंत्रोळीकरनगर येथे त्यांच्या हस्ते ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँकेच्या 22 व्या शाखेचे उद्घाटन झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.  यावेळी खासदार प्रणिती  शिंदे, आमदार विजयकुमार देशमुख, माजी आमदार दिलीप माने, प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे, जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड तसेच बँकेचे चेअरमन सोमनाथ गायकवाड, नवीन शाखेचे व्यवस्थापक विनोद कुलकर्णी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या सहकार विभागाच्या धोरणानुसार राज्यातील एकही नागरिक सहकार चळवळीपासून वंचित राहणार नाही या दृष्टीने शासन प्रयत्न करत आहे. त्यासाठी पुढील काळात सहकार चळवळीत महिलांचाही समावेश महत्त्वपूर्ण असल्याचे सहकार मंत्री श्री. पाटील यांनी सांगून राज्यातील एकही गरजू नागरिक सावकाराकडे पैशासाठी जाणार नाही. यासाठी सहकार क्षेत्रातील सर्व बँकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. तसेच सहकार चळवळीत प्रचंड मोठी ताकद असून त्या त्या भागात व्यापार, उद्योगधंदे यासह सर्वांगीण विकासाला भरघोस मदत यातून होऊ शकते व महाराष्ट्रातील अनेक भागात तसे घडलेले आहे व पुढेही याच पद्धतीने सहकार क्षेत्राने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

सोलापूर येथे ब्रह्मदेव दादा सहकारी बँकेचे काम उत्कृष्ट असून यातून या भागातील गोरगरीब नागरिकांना वित्तीय सहाय्य मिळत असून हे काम बँकेने पुढेही तसेच चालू ठेवावे व अशीच प्रगती करावी, अशा शुभेच्छा सहकार मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या. यावेळी खासदार प्रणिती शिंदे, आमदार विजयकुमार देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त करून बँकेच्या 22 व्या शाखेला शुभेच्छा दिल्या.

तर माजी आमदार दिलीप माने यांनी ब्रह्मदेव दादा सहकारी बँकेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या केलेल्या कामाच्या प्रगती अहवाल प्रस्ताविकात मांडला. प्रारंभी फित कापून व त्यानंतर दीप प्रज्वलन करून सहकार मंत्री व मान्यवरांनी बँकेच्या शाखेचे उद्घाटन केले.

जनकल्याण सोसायटीला भेट

सदर बाजार येथील जनकल्याण मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन सोसायटीच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली व जनकल्याण सोसायटीने गोरगरीब नागरिकांना कर्ज पुरवठा करून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी माजी आमदार दीपक साळुंखे, जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, चेअरमन राजेंद्र हजारे, सीईओ आशा हजारे यांची उपस्थिती होती.

०००

 

राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

सोलापूर, दि. ५(जिमाका): संपूर्ण राज्याच्या शहरी व ग्रामीण भागात सहकार चळवळ रुजलेली आहे. किंबहुना संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्याला आघाडीवर ठेवण्यात सहकार चळवळीचा मोठा वाटा आहे. त्यामुळे राज्यातील सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.

सोलापूर येथे आयोजित सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभ व स्मरणिका प्रकाशन प्रसंगी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील मार्गदर्शन करत होते. यावेळी भारतीय रिझर्व बँकेच्या मध्यवर्ती मंडळाचे संचालक सतीश मराठे, आमदार सर्वश्री विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र कोठे, समारंभाचे स्वागत अध्यक्ष राजशेखर शिवदारे, बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे, व्हाईस चेअरमन सुचेता थोबडे, बँकेचे सर व्यवस्थापक रामलाल शर्मा, सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, जिल्हा सहकारी बँकेचे प्रशासक कुंदन भोळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

सहकार मंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचा विकास ग्रामीण भागात रुजलेल्या सहकार चळवळीमुळे मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. देशातील अन्य राज्याचा विचार केला तर त्या राज्यामध्ये सहकार चळवळ व्यवस्थितपणे रुजलेली नाही, त्यामुळे शहरी व ग्रामीण भागात आवश्यक तेवढा विकास न झाल्यामुळे त्या राज्यातील नागरिक रोजगारासाठी महाराष्ट्र राज्यासह अन्य विकसित राज्यात स्थलांतर करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे आपल्या राज्यातील सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांना अधिक बळ देण्याचे धोरण शासनाने निश्चित केलेले असल्याचे त्यांनी सांगितले.

सहकारी चळवळीचे महत्त्व जाणून केंद्रीय सहकार विभागाने संपूर्ण देशभरात पुढील पाच वर्षात दहा हजार पेक्षा अधिक सहकारी संस्था स्थापित करण्याचे धोरण ठरवलेले आहे. राज्याचे सहकार विभाग ही सहकारी संस्थांमध्ये नव तंत्रज्ञानाचा वापर करून सहकारी संस्थांच्या उन्नतीला चालना देण्यासाठी सहकार्याची भूमिका निभावणार आहे. सहकारी संस्थांनी आपली विश्वासाहर्ता टिकवण्यासाठी आरबीआय ने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे

असून कोणतीही सहकारी संस्था यशस्वी होण्यासाठी प्रामाणिकता, स्वच्छता व शिस्तबद्धता या तीन गुणांचा अंगीकार करावा, असे आवाहनही सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सुचित केले.

सोलापूर जिल्ह्यातील 32 नागरी सहकारी बँकापैकी 27 बँकांची परिस्थिती चांगली असून ही बाब सोलापूर जिल्ह्यात सहकार चळवळ व्यवस्थितपणे सुरू असल्याचे मंत्री श्री. पाटील यांनी सांगून सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभास शुभेच्छा देऊन या बँकेसह सर्व सहकारी बँकांना सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

भारतीय रिझर्व बँकेच्या मध्यवर्ती मंडळाचे संचालक सतीश मराठे यांनी देशभरात जवळपास चौदाशे सहकारी बँका असून त्यातील एक तृतीयांश बँका महाराष्ट्र राज्यात कार्यरत आहेत असे सांगून सहकार चळवळीला भाग भांडवल निर्माण करण्याचा मोठा प्रश्न असल्याचे सांगून सहकार कायद्यात बदल करून बँकांना भांडवल निर्मिती करण्यासाठी शासनाने विचार करावा. टेक्नॉलॉजी फंड निर्माण करून शासनाने सहकारी संस्थांना वित्तीय सहाय्य उपलब्ध करून द्यावे त्याप्रमाणेच कर्ज वसुली प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

आमदार सर्वश्री विजयकुमार देशमुख सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, व देवेंद्र कोठे यांनी आपले मनोगत व्यक्त करून सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी समारंभानिमित्त बँकेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रारंभी स्वागत अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांनी केले व बँकेच्या वाटचालीची माहिती दिली तर बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे यांनी बँकेने 1974 पासून आज रोजी पर्यंत केलेल्या व राबवलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सर्व लोकप्रतिनिधी व मान्यवर यांच्या हस्ते सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली तर बँकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे आभार बँकेच्या संचालक मंडळाकडून मानण्यात आले.

०००

 

देशाच्या आर्थिक विकासयात्रेत जैन समाजाचे अनन्यसाधारण योगदान -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. ०५: अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याबरोबरच समाजाला आपल्याला काय देता येईल, याचा विचार जैन समाज करतो. या सामाजिक उत्तरदायित्वासह देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात जैन समाजाचा मोठा वाटा असून भारताच्या आर्थिक विकासयात्रेतही अनन्यसाधारण योगदान असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या नागपूर विभागाच्या नवीन व्यवस्थापन समिती, महिला आणि युवा शाखेची स्थापना आणि शपथविधी सोहळा सूर्या नगर येथील नैवेद्यम इस्टोरिया येथे पार पडला त्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी माजी खासदार अजय संचेती, जितो शिखर संघटनेचे अध्यक्ष विजय भंडारी, महासचिव ललीत डांगी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, जितो या संघटनेच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याबरोबरच समाजसेवेचे कामही केले जाते. गरजूंपर्यंत सेवा पोहोचविण्याचे काम जैन संघटनेच्या माध्यमातून होत असते. भगवान महावीर यांनी आपल्याला सर्वसमावेशक विचार करण्याची शिकवण दिली आहे. हीच शिकवण आपण सर्वांनी पुढे नेण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

वेल्थ, नोकरी आणि संधी निर्माण करणे यापेक्षा मोठी देशभक्ती नाही. आज आपण पाचवी अर्थव्यवस्था झालो आहे. तीन वर्षात आपण जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

नागरिकांना दारिद्र्यातून बाहेर काढायचे असल्यास त्यांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. जगातील विकसित देशांकडे पाहिल्यास त्यांच्या विकासात महिलांचेही योगदान लक्षणीय असल्याचे पहावयास मिळते. एकूण लोकसंख्येच्या 50 टक्के हिस्सा असणारा महिला वर्ग हा अर्थव्यवस्थेचा भाग होण्याची गरज आहे. भारतालाही विकसित अर्थव्यवस्था म्हणून 2047 पर्यंत पुढे यायचे असल्यास महिलांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देत त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

०००

महा ‘मेट्रो’ने देशात नवीन कार्यसंस्कृती आणली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. ०५: महा ‘मेट्रो’ ने देशात सर्वात जलद गतीने पूर्ण होऊन जनतेला उत्कृष्ट सेवा उपलब्ध करून दिली आहे, त्यामुळेच नागपूरच्या पायाभूत सुविधा व नागरीकांच्या जीवनात अमूलाग्र बदल झाल्याने देशात नवीन कार्यसंस्कृती निर्माण केल्याचा गौरवपूर्ण उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

येथील क्रॉसवर्ड येथे एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक यांच्या ‘बेटर दॅन द ड्रिम्स’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृतीचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्य हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अर्थ व नियोजन राज्य मंत्री ॲड. आशिष जयस्वाल, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापक संचालक ब्रिजेश दीक्षित मंचावर उपस्थित होते.

नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील यशस्वीते नंतर दुसऱ्या टप्प्यालाही सुरुवात झाली आहे. दुसरा टप्पा हा ग्रामीण क्षेत्राशी जोडण्यात येत असल्यामुळे  जनतेलाही चांगल्या सेवा मिळणार असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले की  मेट्रोने केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण नियोजनामुळे देशातील इतर राज्यातूनही मागणी होत आहे. मेट्रोमुळे नागपूर शहराच्या जीवनशैलीतही बदल झाला आहे. या परिवर्तनाची यशोगाथा या पुस्तकाच्या माध्यमातून सादर करण्यात आली आहे.

राज्यातील पहिली मेट्रो मुंबईत सुरू झाली आणि ती अकरा वर्षात अकरा किलोमीटरचा टप्पा पूर्ण करु शकली. परंतु, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केवळ पाच वर्षात तीनशे किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला आहे. नागपूर मेट्रो चार वर्षात 32 किलोमीटर, दुसऱ्या टप्प्यातील कामालाही सुरुवात झाली आहे त्याप्रमाणेच पुणे मेट्रो सुद्धा अत्यंत जलदगतीने पूर्ण झाली असल्यसाचे सांगताना श्री. फडणवीस म्हणाले की, या कामाचे श्रेय तत्कालीन प्रबंध संचालक ब्रिजेश दीक्षित यांचे आहे.

मेट्रो ची सुरुवात करताना नागपूर मेट्रो कंपनीची स्थापना करण्यात आली त्यानंतर पुण्याच्या मेट्रो चे काम या कंपनीमार्फतच सुरू करण्यात आले. पुणेकरांनी नागपूरची कंपनी पुण्याची मेट्रो तयार करेल का अशी शंका निर्माण केली त्यामुळे महामेट्रो ही कंपनी स्थापन करण्यात आली.

प्रारंभी या पुस्तकाच्या लेखिका सरिता कौशिक यांनी नागपूर मेट्रोमुळे जीवनशैलीवर झालेल्या परिणामांची ओळख, वेगवेळ्या घटकातील लोकांवर परिणाम करणाऱ्या घटना, झालेला विकास, तसेच शहराचा इतिहास या पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्यात आल्याचे सांगितले.

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. दीक्षित यांनी नागपूर मेट्रोची सुरुवात आणि त्या मागील संकल्पना आणि ती प्रत्यक्ष उतरविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.

प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘बेटर दॅन ड्रिम्स’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन केले. यावेळी नागपूर मेट्रोच्या विविध टप्यातील घटनांचा उल्लेख आपल्या भाषणात केला. स्वागत राजू अरोरा यांनी तर कार्यक्रमाचे संचालन निधी काळे यांनी केले.

००

‘महारेरा’ कायद्यामुळे ग्राहकांना संरक्षण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागूपर दि. ०५ : गृहनिर्माण क्षेत्रातील विकासकांना महारेरा कायद्याअंतर्गत प्रकल्पांची नोंदणी करणे आवश्यक करण्यात आल्यामुळे ग्राहकांना संरक्षण मिळाले आहे, विकासकांनीही सर्वसामान्य जनतेला चांगल्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

चिटणवीस सेंटर येथे ‘होमेथॉन प्रॉपर्टी एक्सपो 2.0’ चे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास एक्सपोचे अध्यक्ष घनशाम ढोकणे, सचिन  मेहेर, राहूल बोंद्रे, कुणाल पढोळे, अजय बोरकर, अजय केसरे, संजय महाजन उपस्थित होते.

एकाच छताखाली बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांनी विविध गृहनिर्माण व भूखंड या बद्दल संपूर्ण माहिती उपलब्ध करुन दिल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपल्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी या प्रदर्शनाच्या माध्यमातून संधी उपलब्ध झाल्याचे सांगतांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, की यापूर्वी अनधिकृत भूखंड खेरदीचे प्रकार होत होते पंरतु, अधिकृतपणे खरेदी करणे यामुळे सोयीचे होणार आहे. अशा प्रकारचे प्रदर्शन दरवर्षी आयोजित करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.

या एक्सपोमध्ये 65 हून अधिक बिल्डर व 350 हून अधिक डेव्हलपर्स यांनी सहभाग घेतला आहे. नागपूर शहरातील नागरिकांना त्यांच्या मागणीप्रमाणे पूर्व प्रकल्पामध्ये नोंदणी करणे सुलभ होणार आहे.

या वेळी मुख्यमंत्र्यांनी होमेथॉन -2 या प्रॉपटी एक्सपोतील विविध दालनांना भेट देऊन विकासकांच्या विविध प्रकल्पांची पाहणी केली.

०००

ताज्या बातम्या

सूर्यकांत मांढरे यांच्या जुन्या मराठी सिनेमांचे मोफत प्रदर्शन – मंत्री ॲड. आशिष शेलार

0
कोल्हापूर, दि. २८ : येत्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून बाराशे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून, ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत...

वसतिगृहातील विद्याथ्यांची प्रवेश क्षमता वाढविणार – मंत्री संजय शिरसाट

0
नागपूर, दि. २८: अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात प्रवेशासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यार्थी क्षमतेत वाढ करण्याची गरज लक्षात घेऊन वसतिगृहाची प्रवेश क्षमता वाढविण्यासाठी प्रस्ताव...

क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कडबनवाडी येथे जिप्सी सफारी उपक्रमाचे...

0
पुणे, दि.२८: क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कडबनवाडी येथील गवताळ प्रदेशामध्ये जिप्सीमधून करण्यात येणाऱ्या सफारी उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. नागरिकांनी...

कोकण किनारपट्टीला ३.४ ते ३.८ मीटर उंच लाटांचा इशारा

0
मुंबई, दि. २८: भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे कोकण किनारपट्टीला 27 जून 2025 रोजीचे 5.30 पासून ते 29 जून 2025 रोजचे 11.30 पर्यंत 3.4 ते...

बिहारमध्ये ‘विशेष व्यापक पुनरिक्षण मोहीमे’ला उत्साहात सुरुवात

0
मुंबई, दि.२८: भारतात संविधान हा सर्वोच्च कायदा आहे. सर्व नागरिक, राजकीय पक्ष आणि भारत निवडणूक आयोग संविधानाचे पालन करतात. भारतीय संविधानातील अनुच्छेद ३२६ नुसार,...