शनिवार, जून 28, 2025
Home Blog Page 410

‘आपलं सरकार’ वेब पोर्टल नव्या स्वरूपात उपलब्ध करा- मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई, दि. ०६: महाराष्ट्र शासनाच्या 485 सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देणारे ‘आपलं सरकार’ (1.0) वेब पोर्टल अधिक सक्षम, अद्ययावत करुन नव्या स्वरूपात तयार करावे. त्याचबरोबर नागरिकांना जलद माहिती उपलब्ध होण्यासाठी आपलं सरकारचे ‘ॲप’ तयार करुन या सुविधा मोबाईलवर उपलब्ध होतील या दृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

 

माहिती तंत्रज्ञान विभागाच्या मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटीया, राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान संस्थेच्या संचालक सपना कपूर, महाआयटीचे प्रकल्प अधिकारी राहुल सुर्वे, महाआयटीचे प्रकल्प अधिकारी किरण पाटील यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. शेलार म्हणाले की, आपलं सरकार ही वेबसाईट अपग्रेड करुन नव तंत्रज्ञानाचा वापर करुन वेबसाईट नव्या स्वरूपात तयार करण्यात यावी. नागरिकांना जलद सुविधा उपलब्ध होतील, तसेच कोणत्याही सेवा सुविधेसाठी अर्ज करताना वेबसाईट वापरण्याची पद्धत सुलभ असायला हवी, अधिक क्षमतेचा रॅम वापरून चॅट बॉट सारख्या सुविधांसह  एआय (कृत्रिम बुद्धीमत्तेचा) चा वापर करुन  त्या वेबसाईट वापरण्यास सुलभ बनवाव्यात. तसेच आपलं सरकारचे एक ॲप तयार करुन  सुविधा ॲपवरुन उपलब्ध करुन देण्यात याव्यात.

महाराष्ट्र शासनाच्या 485 सेवा नागरिकांना आपलं सरकार वेबसाईटच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. अन्य राज्यांचा यासंदर्भातील अभ्यास करुन महाराष्ट्र शासनाच्या 485 व्यतिरिक्त 285 अधिकच्या नवीन सेवा ऑनलाईन देण्याची तयारी केली असून लवकरच या सुविधा उपलब्ध होतील. यावर महाराष्ट्र शासनाचे विविध विभाग आणि महाआयटी कंपनी काम करीत आहे. या सेवा कार्यान्वित झाल्यानंतर 770 सेवा ऑनलाईन देणारे महाराष्ट्र हे देशातील ऑनलाईन सेवा देणाऱ्या पहिल्या पाच राज्यांमध्ये येईल. या दृष्टीने विभागाने तयारी सुरु केली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

केंद्र सरकारने डेटा सुरक्षेसाठी तयार केलेल्या कायद्यानुसार राज्याचा ‘स्टेट ओन क्लाउड’ तयार करण्याचे निर्देशही मंत्री ॲड. शेलार यांनी दिले.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

 

 

आनंददायी शिक्षणाद्वारे राज्याचा लौकिक वाढवा- मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. ०६:  शिक्षणसंस्थेचे यश व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण देण्यात संस्थाचालकांची भूमिका अत्यंत मोलाची राहणार आहे. यासाठी संस्था चालकांनी या शिक्षण पद्धतीत सक्रिय सहभाग घेऊन शिक्षण क्षेत्रात राज्याचा लौकिक निर्माण करण्यास पुढे यावे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित गुणवत्तापूर्ण, आनंददायी शिक्षण पद्धती या विषयावर नामांकित शिक्षण संस्था आणि शैक्षणिक संस्थांच्या मान्यताप्राप्त संघटनांच्या प्रतिनिधींच्या चर्चासत्रात मंत्री श्री. भुसे बोलत होते.

मंत्री श्री. भुसे म्हणाले की, सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण महत्त्वाचे आहे. देशाची आदर्श भावी पिढी घडविण्यासाठी शिक्षणसंस्था शिक्षण प्रसाराचे काम अविरतपणे करत आहेत. यापुढे कौशल्य व तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण देण्यावर भर द्यावा. संस्थेत शैक्षणिक वातावरण अधिक पोषक ठेवण्यात संस्थाचालकांची मोठी जबाबदारी असते. त्यामुळे शिक्षण संस्थांनी आनंददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षण पद्धतीत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करावेत.

मंत्री श्री. भुसे म्हणाले की, शालेय शिक्षण विभागाचा कृतिवर अधिक भर असल्याने  शिक्षण संस्थेच्या चांगल्या कामास, उपक्रमास सहकार्य केले जाईल. शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञ, संस्थाचालक यांच्या अनुभवाचा लाभ घेऊन शिक्षण विभागाचे काम समन्वयाने पुढे नेऊया. शिक्षण संस्थांच्या  मागण्याबाबत शालेय शिक्षण विभाग नेहमीच सकारात्मक आहे.

चर्चासत्रात संस्थाचालक व संघटनेच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या शिक्षक भरती, संच मान्यता, पवित्र पोर्टल, ११ वी प्रवेश प्रक्रिया, रोस्टर तपासणी, जुनी पेन्शन, सेवा ज्येष्ठता, अशैक्षणिक कामे यासंदर्भातील मुद्यांचा प्राधान्याने विचार केला जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

चर्चासत्रास आमदार  ज्ञानेश्वर म्हात्रे, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी, महेश पालकर, बालभारतीचे के.बी. पाटील आणि शिक्षण संस्था चालक व शैक्षणिक संस्थांच्या मान्यताप्राप्त संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

०००

एकनाथ पोवार/विसंअ/

 

एन.डी. स्टुडिओसाठी व्यावसायिक कृती आराखडा तयार करा – मंत्री ॲड. आशिष शेलार

मुबंई, दि. ०६ : एन.डी. स्टुडिओचे अद्ययावतीकरण करुन तेथे चित्रपट निर्मिती व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने त्या क्षेत्रातील तज्ज्ञ सल्लागार नियुक्त करावे. व्यावसायिक कृती आराखडा तयार करुन एनडी स्टुडिओची आर्थिक सक्षमता वाढविण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

एन.डी. स्टुडिओच्या अद्ययावतीकरणाच्या कामासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक झाली. यावेळी आमदार महेश बालदी, सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्यासह फिल्मसिटी  तसेच एन.डी. स्टुडिओचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. शेलार म्हणाले की, मराठी निर्माते, कलाकार, तंत्रज्ञ  यांना सहाय्यक  ठरतील अशा पूरक सुविधा उपलब्ध करुन देण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य शासनाची आहे. त्यादृष्टीने एन.डी. स्टुडिओचे अद्ययावतीकरण हे भविष्यातील मनोरंजन क्षेत्रातील बदल लक्षात घेऊन करण्यात यावे. याच्या परिपूर्ण आराखडा निर्मितीसाठी तज्ज्ञ सल्लागारांचे मार्गदर्शन घेण्यात यावे. या स्टुडिओच्या माध्यमातून अधिकाधिक रोजगार संधी निर्माण करण्यावर भर देताना त्यात स्थानिकांना प्राधान्य द्यावे. तसेच या स्टुडीओत उपलब्ध रिकाम्या जागेचा अधिक योग्य वापर करण्याच्या दृष्टीनेही नियोजन करावे. या ठिकाणी बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रामुख्याने मराठी सिरियल्स, सिनेमा, वेब सिरीज ओटीटी माध्यमात काम करणाऱ्या निर्माते, कलाकारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात, अशा सूचना मंत्री श्री. शेलार यांनी दिल्या.

०००

वंदना थोरात/विसंअ/

महाराष्ट्र परिचय केंद्र येथे मराठी पत्रकार दिन

नवी दिल्ली, ६  : महाराष्ट्र परिचय केंद्र येथे  मराठी पत्रकार दिनानिमित्त प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्यांनीही जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबई येथे ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ या  मराठी आणि इंग्रजी भाषेतील पाक्षिकाची सुरूवात करून मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. पाश्चात्य विद्या व शिक्षण आत्मसात करून ‘दर्पण’च्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकरांनी समाजात नवीन जीवनमूल्ये रूजविली. त्यांच्या कार्याची आठवण म्हणून ६ जानेवारी हा दिवस ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

००००

उद्योग, व्यवसाय व आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३१ जानेवारी पर्यंत सादर करण्याचे आवाहन

मुंबई, दि. ६ : केंद्र व राज्य शासन, विविध आस्थापना व त्यांचे अंगिकृत उद्योग, व्यवसाय, महामंडळे, महापालिका, तसेच खासगी क्षेत्रातील आस्थापनांनी त्यांच्याकडील मनुष्यबळाचे तिमाही विवरणपत्र येत्या ३१ जानेवारी पर्यंत सादर करावे, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त अ. मु. पवार यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

दर तिमाहीअखेर (मार्च, जून, सप्टेंबर, डिसेंबर) विवरण सादर करणे बंधनकारक आहे. पंचवीस किंवा अधिक लोक काम करतात अशा सर्व आस्थापना, उद्योग, व्यापार कारखाने यांना सेवायोजन कार्यालये यांनी रिक्तपदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारा कायदा १९५९ व अंतर्गत नियमावली १९६० नुसार मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ईआर-१ प्रत्येक तिमाही संपल्यानंतर ३० दिवसांच्या आत सादर करणे बंधनकारक आहे. तसेच ज्या उद्योजकांनी महास्वयंम वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्या उद्योजकांनी ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी. हे विवरणपत्र (ER-I) ऑनलाईन पध्दतीने https://rojgar.mahaswaym.gov.in  या वेबपोर्टलवर सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेचा वापर करुन ३१ जानेवारी,  २०२५ पर्यंत विवरणपत्र (ईआर-१) सादर करावे,

मुंबई शहर जिल्हा अंतर्गत येणारे सर्व नियोक्ते, आस्थापना यांनी https://rojgar.mahaswaym.gov.in  या वेबपोर्टलवर तिमाही विवरणपत्र ईआर १ सादर करण्याची दक्षता घ्यावी. या वेबसाइटच्या एम्प्लॉयर (List a Job ) या टॅबवर क्लिक करुन एम्प्लॉयर लॉगइनमध्ये युजर आयडी व पासवर्ड वापरून लॉगइन करावे आणि ईआर रिपोर्टमध्ये ईआर -१ या ऑप्शनवर क्लिक करुन तिमाही विवरणपत्र ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहिती , मार्गदर्शन अथवा तांत्रिक अडचण असल्यास mumbaicity.employment@gmail.com  या ईमेलवर संपर्क करावा. ३१ डिसेंबर, २०२४ च्या तिमाही अखेर हजेरी पटावर असलेल्या सर्व मनुष्यबळाच्या माहितीचे विवरणपत्र ईआर ३१ जानेवारी, २०२५ पर्यंत महास्वयम वेबसाईटवर ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे. हे विवरणपत्र ऑफलाईन स्विकारले जाणार नाही, असे सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर यांनी कळविले आहे.

0000

‘दिलखुलास’ कार्यक्रमात पोलीस अधीक्षक रूपाली अंबुरे यांची मुलाखत

मुंबई, दि. : रस्त्यांवरील अपघात आणि त्यामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी दरवर्षी जानेवारी महिन्यात ‘रस्ता सुरक्षा’ मोहीम राबविण्यात येते. यासाठी परिवहन व महामार्ग सुरक्षा विभागामार्फत विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येतात. नागरिकांनी रस्तासुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपले व इतरांचे आयुष्य सुरक्षित ठेवावे, असे आवाहन महामार्ग सुरक्षा विभागाच्या पोलीस अधीक्षक रूपाली अंबुरे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून केले आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मिती ‘दिलखुलास’ कार्यक्रमात पोलीस अधीक्षक श्रीमती अंबुरे यांची मुलाखत मंगळवार दि. ७, बुधवार दि. ८, गुरूवार दि. ९ आणि शुक्रवार दि. १० जानेवारी २०२५ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

रस्ता सुरक्षा ही आपल्या दैनंदिन जीवनातील अतिशय महत्त्वाची बाब आहे. रस्ते अपघात आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण मोठे आहे. ही बाब विचारात घेवून केंद्र सरकार आणि राज्य शासनामार्फत रस्ता सुरक्षा मोहीम राबविण्यात येते. या मोहिमेच्या माध्यमातून रस्ते वाहतूक व महामार्ग रस्त्यांवरील सुरक्षितता सुधारण्यासाठी तसेच लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांनी स्पीडगनचा वापर करून अतिवेगावर नियंत्रण आणणे, हेल्मेटचा वापर करणे तसेच वाहतूक नियमावलीचे पालन करणे इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मोहिमेची राज्यात करण्यात येणारी अंमलबजावणी याबाबत ‘दिलखुलास’ कार्यक्रमात पोलीस अधीक्षक श्रीमती अंबुरे यांनी माहिती दिली आहे.

०००

पोलीस यंत्रणांनी दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्याबरोबरच महिलांच्या गुन्ह्यांमागील कारणांचा शोध घ्यावा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

कोल्हापूर, दि. ६ जानेवारी २०२५ : महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे गुन्हे निकाली काढण्यासाठी आरोपींचा तातडीने शोध घेवून त्यांच्यावर कारवाई करा, महिलांची फसवणूक करणाऱ्यांची साखळी तोडून काढा, पोलीस यंत्रणांनी महिला अत्याचारासंदर्भातील गुन्ह्यांच्या दोषसिध्दीचे प्रमाण वाढविण्याबरोबरच गुन्ह्यांमागील कारणांचा शोध घ्यावा, अशा सूचना त्यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

कोल्हापूर दौऱ्यांतर्गत, कोल्हापूर परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांमधील महिला अत्याचार विषयक गुन्ह्यांचे प्रतिबंध करण्याबाबत केलेली कार्यवाही व उपाययोजना संदर्भात डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज (सोमवार, ६ जानेवारी २०२५) रोजी बैठक पार पडली.

मागील वर्षभरात महिला अत्याचार विषयक घटनांमध्ये दाखल गुन्हे व त्यामध्ये झालेल्या कार्यवाहीतील प्रगती, अल्पवयीन मुलींवरील अत्याचार यासंदर्भात केलेल्या कार्यवाही, सदर गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्याच्या अनुषंगाने उपाय योजना, अंधश्रद्धा निर्मूलन, जातपंचायत, जेष्ठ नागरिक सुरक्षा अशा विविध मुद्द्यांवर प्रामुख्याने या बैठकीत आढावा घेण्यात आला.

या बैठकीस आमदार राजेश क्षीरसागर, कोल्हापूर परिक्षेत्राचे प्र. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस अधिक्षक जयश्री देसाई, शौमिका महाडिक प्रत्यक्ष तर सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, साताराचे पोलीस अक्षीक्षक समीर शेख, पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर,सांगली,सातारा पुणे व सोलापूर ग्रामीणमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या गुन्ह्यांचा शोध लावण्याबरोबर घडलेल्या गुन्ह्यांच्या मूळ कारणांपर्यत जाण्याचा प्रयत्न करावा अशा सूचना देवून उपसभापती डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या, “पॉक्सोअंतर्गत लहान मुलींच्यावर होणाऱ्या अत्याचारा संदर्भात गुन्ह्याचा तपास करताना पिडीतेची ओळख गुप्त राहील, तसेच पिडीतांनी व त्यांच्या कुटुंबियांना कोणताही त्रास होवू नये याची दक्षता घ्यावी. शाळा, महाविद्यालयांमध्ये भरोसा सेलच्या माध्यमातून मार्गदर्शनपर कार्यशाळांचे आयोजन करावे. ऑनलाईन प्रशिक्षणासंदर्भात कार्यवाही करावी. चर्चासत्रांचे आयोजन करावे. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्यांसंदर्भातील अद्ययावत माहिती फलकांवर लावण्यात यावी, असेही डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

तसेच डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, लहान मुलींवर होणारे अत्याचार टाळण्यासाठी शाळामध्ये “गुड टच बॅड टच ”  या संदर्भात प्रशिक्षण द्यावे, प्रशिक्षीत मुलींचे गट तयार करुन या संदर्भांत जनजागृती करावी. “अत्याचारग्रस्त पीडितांची वैद्यकीय तपासणी अथवा उपचार करताना योग्य दक्षता घ्यावी. त्यांच्यासाठी स्वतंत्र कक्षाची सोय करण्याबाबत कार्यवाही करावी. साक्षीदार संरक्षण कायद्याचे तंतोतंत पालन करुन त्यांची योग्य अंमलबजवाणी करावी. पिडीतांना  कोर्टात घेवून जातानाही याबाबत योग्य दक्षता घेण्यात यावी. चार्ज शिट दाखल करताना कायद्याचे पालन करावे. दंड संहितेनुसार बी समरीचे पुर्नरिक्षण करणाच्या सूचनाही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी शेवटी दिल्या.

यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांनी तपास यंत्रणा अधिक गतिमान करण्याचे आदेश देवून कायद्यासंदर्भातील सर्वसाधारण सूचनांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना दिल्या. कोल्हापूर परिक्षेत्रात सीसीटीव्हीचे प्रमाण वाढविण्यात यावे असे निदेश देवून महिला अत्याचार तपास यंत्रणेसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याबाबत सूचीत केले.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी परिक्षेत्रातील जिल्हानिहाय कामकाज व गुन्हांच्या तपाससंदर्भांत आढावा यावेळी घेतला.बैठकीला महिला कक्षामध्ये कार्यरत असणारे अधिकारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

००००

 

मुंबई महानगर क्षेत्रात ‘केबल कार’ प्रकल्पाचा मानस – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. ६ : रस्ते वाहतूक, रेल्वे तसेच मेट्रो यासारख्या सार्वजनिक वाहतूक सेवांवरील वाढता ताण लक्षात घेता भविष्यात ‘केबल कार’ सेवा विकसित होणे आवश्यक आहे. त्यासाठी या प्रकल्पाचे सर्वेक्षण करून विकास आराखडा (DPR) तयार करणे गरजेचे आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटी दरम्यान या प्रकल्पाच्या सादरीकरणाद्वारे मुंबई क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या दृष्टीने या प्रकल्पाची आवश्यकता मांडण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

नवी दिल्ली येथे ७ जानेवारी रोजी होणाऱ्या ‘विकसित भारत २०४७’ या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या लक्ष्य प्राप्तीच्या दृष्टीने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सर्व राज्यांच्या परिवहन मंत्र्यांच्या बैठकीस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित राहणार आहेत.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सादरीकरणानंतर मुंबई महानगर क्षेत्रामध्ये ‘केबल कार’ प्रकल्प राबवण्यासाठी केंद्र सरकारद्वारे ‘पर्वतमाला परियोजना’ अंतर्गत  सार्वजनिक खासगी भागीदारी (PPP) अथवा केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त आर्थिक भागिदारीने  रोप वे विकसित करण्याचा मानस असून यासंदर्भातील विकास आराखडा तयार करुन तत्वत: मान्यता घेण्याचा प्रयत्न राहील, असेही मंत्री श्री. सरनाईक यांनी सांगितले.

मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्यादृष्टीने या प्रकल्पाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पालघर पासून रायगड जिल्ह्यातील उरण-पेणपर्यंत पसरलेल्या एकूण क्षेत्रामध्ये नागरिकरणाचा वेग वाढत आहे.  मुंबई महानगर क्षेत्रातील वाढते नागरीकरण, वाहनांची वाढती संख्या, नवीन रस्ते व रेल्वे सेवा, प्रदूषण याबाबत काही धोरणात्मक निर्णय घेऊन आधुनिक तंत्रज्ञान व पाश्चात देशातील यशस्वी नाविन्यपूर्ण प्रकल्पाचा अभ्यास करून वाहतूक समस्या सोडवण्यासाठी ठोस प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे.

मुंबई महानगरास प्राप्त झालेले महत्त्वपूर्ण भौगोलिक स्थान, सागरी किनारा खाडीचा प्रदेश, एलिफंटासारखी प्राचीन लेणी, माथेरानसारखे थंड हवेचे पर्यटन स्थळ, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यासारखी हरित चादर जतन करून मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी ‘रोपवे’च्या माध्यमातून ‘केबल कार’ प्रकल्प राबवणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी व्यक्त केले आहे.

0000

सहकार क्षेत्रात पुरुषांसह महिलांनाही सामावून घेण्याचे शासनाचे धोरण – मंत्री बाबासाहेब पाटील

सोलापूर दि.०५ (जिमाका): राज्याला सहकार चळवळ अत्यंत फायदेशीर ठरली असून या चळवळीत पुढील काळात पुरुषाबरोबरच महिलांनाही सामावून घेण्याचे शासनाचे धोरण आहे, व त्या दृष्टीने शासन पावले टाकत असल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.

सोलापूर शहरातील अंत्रोळीकरनगर येथे त्यांच्या हस्ते ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँकेच्या 22 व्या शाखेचे उद्घाटन झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.  यावेळी खासदार प्रणिती  शिंदे, आमदार विजयकुमार देशमुख, माजी आमदार दिलीप माने, प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे, जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड तसेच बँकेचे चेअरमन सोमनाथ गायकवाड, नवीन शाखेचे व्यवस्थापक विनोद कुलकर्णी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या सहकार विभागाच्या धोरणानुसार राज्यातील एकही नागरिक सहकार चळवळीपासून वंचित राहणार नाही या दृष्टीने शासन प्रयत्न करत आहे. त्यासाठी पुढील काळात सहकार चळवळीत महिलांचाही समावेश महत्त्वपूर्ण असल्याचे सहकार मंत्री श्री. पाटील यांनी सांगून राज्यातील एकही गरजू नागरिक सावकाराकडे पैशासाठी जाणार नाही. यासाठी सहकार क्षेत्रातील सर्व बँकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. तसेच सहकार चळवळीत प्रचंड मोठी ताकद असून त्या त्या भागात व्यापार, उद्योगधंदे यासह सर्वांगीण विकासाला भरघोस मदत यातून होऊ शकते व महाराष्ट्रातील अनेक भागात तसे घडलेले आहे व पुढेही याच पद्धतीने सहकार क्षेत्राने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

सोलापूर येथे ब्रह्मदेव दादा सहकारी बँकेचे काम उत्कृष्ट असून यातून या भागातील गोरगरीब नागरिकांना वित्तीय सहाय्य मिळत असून हे काम बँकेने पुढेही तसेच चालू ठेवावे व अशीच प्रगती करावी, अशा शुभेच्छा सहकार मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या. यावेळी खासदार प्रणिती शिंदे, आमदार विजयकुमार देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त करून बँकेच्या 22 व्या शाखेला शुभेच्छा दिल्या.

तर माजी आमदार दिलीप माने यांनी ब्रह्मदेव दादा सहकारी बँकेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या केलेल्या कामाच्या प्रगती अहवाल प्रस्ताविकात मांडला. प्रारंभी फित कापून व त्यानंतर दीप प्रज्वलन करून सहकार मंत्री व मान्यवरांनी बँकेच्या शाखेचे उद्घाटन केले.

जनकल्याण सोसायटीला भेट

सदर बाजार येथील जनकल्याण मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन सोसायटीच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली व जनकल्याण सोसायटीने गोरगरीब नागरिकांना कर्ज पुरवठा करून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी माजी आमदार दीपक साळुंखे, जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, चेअरमन राजेंद्र हजारे, सीईओ आशा हजारे यांची उपस्थिती होती.

०००

 

राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

सोलापूर, दि. ५(जिमाका): संपूर्ण राज्याच्या शहरी व ग्रामीण भागात सहकार चळवळ रुजलेली आहे. किंबहुना संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्याला आघाडीवर ठेवण्यात सहकार चळवळीचा मोठा वाटा आहे. त्यामुळे राज्यातील सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.

सोलापूर येथे आयोजित सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभ व स्मरणिका प्रकाशन प्रसंगी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील मार्गदर्शन करत होते. यावेळी भारतीय रिझर्व बँकेच्या मध्यवर्ती मंडळाचे संचालक सतीश मराठे, आमदार सर्वश्री विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र कोठे, समारंभाचे स्वागत अध्यक्ष राजशेखर शिवदारे, बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे, व्हाईस चेअरमन सुचेता थोबडे, बँकेचे सर व्यवस्थापक रामलाल शर्मा, सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, जिल्हा सहकारी बँकेचे प्रशासक कुंदन भोळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

सहकार मंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचा विकास ग्रामीण भागात रुजलेल्या सहकार चळवळीमुळे मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. देशातील अन्य राज्याचा विचार केला तर त्या राज्यामध्ये सहकार चळवळ व्यवस्थितपणे रुजलेली नाही, त्यामुळे शहरी व ग्रामीण भागात आवश्यक तेवढा विकास न झाल्यामुळे त्या राज्यातील नागरिक रोजगारासाठी महाराष्ट्र राज्यासह अन्य विकसित राज्यात स्थलांतर करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे आपल्या राज्यातील सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांना अधिक बळ देण्याचे धोरण शासनाने निश्चित केलेले असल्याचे त्यांनी सांगितले.

सहकारी चळवळीचे महत्त्व जाणून केंद्रीय सहकार विभागाने संपूर्ण देशभरात पुढील पाच वर्षात दहा हजार पेक्षा अधिक सहकारी संस्था स्थापित करण्याचे धोरण ठरवलेले आहे. राज्याचे सहकार विभाग ही सहकारी संस्थांमध्ये नव तंत्रज्ञानाचा वापर करून सहकारी संस्थांच्या उन्नतीला चालना देण्यासाठी सहकार्याची भूमिका निभावणार आहे. सहकारी संस्थांनी आपली विश्वासाहर्ता टिकवण्यासाठी आरबीआय ने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे

असून कोणतीही सहकारी संस्था यशस्वी होण्यासाठी प्रामाणिकता, स्वच्छता व शिस्तबद्धता या तीन गुणांचा अंगीकार करावा, असे आवाहनही सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सुचित केले.

सोलापूर जिल्ह्यातील 32 नागरी सहकारी बँकापैकी 27 बँकांची परिस्थिती चांगली असून ही बाब सोलापूर जिल्ह्यात सहकार चळवळ व्यवस्थितपणे सुरू असल्याचे मंत्री श्री. पाटील यांनी सांगून सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभास शुभेच्छा देऊन या बँकेसह सर्व सहकारी बँकांना सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

भारतीय रिझर्व बँकेच्या मध्यवर्ती मंडळाचे संचालक सतीश मराठे यांनी देशभरात जवळपास चौदाशे सहकारी बँका असून त्यातील एक तृतीयांश बँका महाराष्ट्र राज्यात कार्यरत आहेत असे सांगून सहकार चळवळीला भाग भांडवल निर्माण करण्याचा मोठा प्रश्न असल्याचे सांगून सहकार कायद्यात बदल करून बँकांना भांडवल निर्मिती करण्यासाठी शासनाने विचार करावा. टेक्नॉलॉजी फंड निर्माण करून शासनाने सहकारी संस्थांना वित्तीय सहाय्य उपलब्ध करून द्यावे त्याप्रमाणेच कर्ज वसुली प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

आमदार सर्वश्री विजयकुमार देशमुख सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, व देवेंद्र कोठे यांनी आपले मनोगत व्यक्त करून सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी समारंभानिमित्त बँकेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रारंभी स्वागत अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांनी केले व बँकेच्या वाटचालीची माहिती दिली तर बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे यांनी बँकेने 1974 पासून आज रोजी पर्यंत केलेल्या व राबवलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सर्व लोकप्रतिनिधी व मान्यवर यांच्या हस्ते सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली तर बँकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे आभार बँकेच्या संचालक मंडळाकडून मानण्यात आले.

०००

 

ताज्या बातम्या

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते नागपूर उच्च न्यायालय वकील संघाच्या नवीन बार रूमचे उद्घाटन

0
नागपूर, दि. २८:  उच्च न्यायालय वकील संघाच्या नवीन बार रूमचे उद्घाटन सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण आर. गवई यांच्या हस्ते नागपूर येथे पार पडले. उच्च न्यायालय दुसरा...

कोल्हापूर चित्रनगरीत पोस्ट प्रोडक्शनसाठी एफटीआयमार्फत चित्रपट शिक्षणाला सुरुवात होणार

0
मराठी सिनेमासाठी योगदान दिलेल्या कलाकारांची माहिती देणाऱ्या संग्रहालयाची स्थापना चित्रनगरीमधील ४४ कोटींच्या चित्रीकरण स्थळांचे लोकार्पण व भूमिपूजन कोल्हापूर, दि. २८: चित्रपट निर्मितीसमोर कलात्मकता, सृजनशीलता...

संविधानाच्या उद्देशिकेतील मूल्यांचा अंगीकार व्हावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मरणासाठी संविधान उद्देशिका पार्क एक महत्वाचे पाऊल - सरन्यायाधीश भूषण गवई संविधान उद्देशिका पार्कद्वारे संविधानातील मौलिक विचार जनतेपर्यंत पोहचतील -...

आदिवासी समाजाच्या विकासासाठी प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान – मंत्री डॉ. अशोक...

0
पुणे, दि. २८: आदिवासी जमातीच्या आर्थिक व सामाजिक विकासाकरीता ‘प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ राबविण्यात येत आहे. शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा नागरिकांना लाभ...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वैनगंगा कोरंबी येथील जलपर्यटन प्रकल्पाची पाहणी

0
भंडारा,दि. २८: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा कोरंबी येथील जलपर्यटन प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार नरेंद्र भौंडेकर,अतिरीक्त...