शनिवार, जून 28, 2025
Home Blog Page 407

गुणवंत खेळाडू तयार होण्यासाठी विशेष प्रयत्न करणार- क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. ७: खेळाडूंना प्रोत्साहन देण्याबरोबरच युवा पिढीमध्ये खेळाची रूची वाढावी यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर राज्यात गुणवंत खेळाडू तयार होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणार असून क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याचे क्रीडा, युवक कल्याण, अल्पसंख्याक व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

मंत्रालयातील दालनात श्री.भरणे यांनीविभागाचापदभार स्विकारला. यावेळी त्यांनी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांचा सन्मान केला. क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, क्रीडा आयुक्त हिरालाल सोनावणे, सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक नवनाथ फडतरे यांसह अधिकारी उपस्थित होते.

क्रीडा मंत्री श्री. भरणे म्हणाले की, क्रीडा, युवक कल्याण विभाग, अल्पसंख्याक, औकाफ विभागाच्या माध्यमातून राज्याच्या प्रगतीत भरीव योगदान देणार आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. अल्पसंख्याक घटकांसाठीच्या  कल्याणकारी योजना प्रभावीपणेराबवून त्यांना मुख्य प्रवाहात आणणार असल्याची ग्वाही श्री.भरणे यांनी यावेळी दिली.

क्रीडा पुरस्कार विजेत्यांचा सन्मान

यावेळी जलतरण क्रीडा प्रकारात योगदान देणारे पद्मश्री मुरलीधर पेटकर यांना केंद्र शासनाच्यावतीने अर्जुन (जीवन गौरव) पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल क्रीडा मंत्री श्री. भरणे यांनी  सन्मानित केले. त्याचबरोबर क्रीडा मार्गदर्शक  दिपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार, गोळाफेक क्रीडा प्रकारात सचिन खिल्लारी यांना अर्जुन पुरस्कार, शूटींग क्रीडा प्रकारात स्वप्निल कुसाळे यांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल श्री. भरणे यांनी सन्मानित केले. विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश मिळवित देशाबरोबर राज्याचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त करीत श्री. भरणे यांनी पुरस्कार विजेत्यांना शुभेच्छा दिल्या.

०००

‘एचएमपीव्ही’ विषाणूसंदर्भात नागरिकांनी भीती बाळगू नये; काळजी घ्यावी- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, दि. ७ : जगातील अनेक देशांमध्ये ह्युमन मेटान्युमो व्हायरस ( एचएमपीव्ही ) विषाणूचा प्रभाव दिसून येत आहे. हा आजार गंभीर नसून लहान मुले, वृद्ध आणि इतर गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांनी काळजी घ्यावी, मात्र घाबरु नये, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

मंत्रालयीन दालनात एचएमपीव्ही विषाणूसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त राजीव निवतकर, संचालक डॉ अजय चंदनवाले, आयुष विभागाचे संचालक डॉ. रमण घुंगराळकर याबरोबरच राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयचे अधिष्ठाता दुरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, काही राज्यांमध्ये एचएमपीव्ही प्रकरणे आढळून आलेली आहेत. परंतू आपल्या राज्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये कारण सरकार लवकरच या परिस्थितीबद्दल सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्वे जारी करुन या रोगाला प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन आळा घालण्यासाठीप्रयत्नशील आहे.

सर्व अधिष्ठातांनी संभाव्य प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी औषधांसह ऑक्सिजन व आवश्यकता वाटल्यास विलगीकरण यासाठी तयारीत रहावे. अतिरिक्त व मुबलक औषधीसाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे संपर्क करावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. हा रोग राज्यात पसरु नये यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे व अधिष्ठातांनी सतर्क राहून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द कराव्या, अशा सूचनाही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिल्या.

या रोगासंबंधी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून नागरिकांना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. प्रतिबंधात्मक उपाय व सतर्कतेचा एक भाग म्हणून नागरिकांना खोकताना किंवा शिंकताना तोंड व नाक रुमालाने झाकण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. साबण आणि पाण्याने किंवा सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुणे, ताप व खोकला आणि शिंका अथवा सर्दी सारखी लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन रुग्णांनी सार्वजनिक ठिकाणांपासून दूर रहावे व वैद्यकीय सल्ल्यानुसार औषधी, भरपूर पाणी पिणे आणि पौष्टिक आहाराचे सेवन केल्यामुळे या रोगाचा प्रसार कमी  होण्यास मदत होईल. वैद्यकीय शिक्षण विभागाने विशेष करून संशयित रुग्णांपासून दूर राहून सदर रोगाचा प्रादुर्भाव  कमी करण्यास सहकार्य करावे, असेही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

000

गुणवत्तापूर्ण शिक्षक निवडण्यासाठी पारदर्शक निवड प्रणाली राबवावी – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. ७ : विद्यादान हे पवित्र कार्य आहे. महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये गुणवत्तेच्या आधारे शिक्षकांची निवड करण्यासाठी पारदर्शक प्रणाली निर्माण करण्याबाबत आपण आग्रही असल्याचे प्रतिपादन राज्यपाल तथा सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

स्थापनेचे १६८ वे वर्ष साजरे करीत असलेल्या मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत सर कावसजी जहाँगीर दीक्षान्त सभागृह येथे संपन्न झाला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

शिक्षकांची निवड करताना एक सामायिक परीक्षा देखील घेतली जावी या संदर्भात विचारविनिमय सुरु असल्याचे राज्यपालांनी सांगितले. सर्व विद्यापीठांनी वर्षाच्या सुरुवातीलाच वर्षभराचे शैक्षणिक वेळापत्रक तयार करावे.ते विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे व त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. जून महिन्यापर्यंत निकाल जाहीर करून एक महिन्यात दीक्षान्त समारंभ आयोजित करावे जेणेकरून विद्यार्थ्यांना पदवी लगेचच मिळेल असे राज्यपालांनी सांगितले.

महाविद्यालये व विद्यापीठ विभागांमध्ये शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मार्ग काढला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

शिक्षण ही निरंतर प्रक्रिया असून पदवी प्राप्त केल्यानंतर देखील ते आयुष्यभर सुरु असले पाहिजे असे सांगताना विद्यार्थ्यांनी इतरांशी तुलना न करता आपल्या गतीने शिकत राहिले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आरोग्यासाठी व्यायाम व चालणे या सवयी लावून घेतल्या पाहिजे व अमली पदार्थांपासून दूर राहिले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

दीक्षान्त समारंभाला सुरुवातीला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील व कौशल्य, रोजगार व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा हे उपस्थित होते. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय करंदीकर हे समारंभाचे विशेष अतिथी होते. अमेरिकेच्या सेंट लुईस विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. फ्रेड पेस्टेलो, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू डॉ. अजय भामरे, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राचार्य आणि स्नातक उपस्थित होते.

दीक्षान्त समारंभामध्ये १,६४, ४६५ स्नातकांना पदव्या, ४०१ स्नातकांना पी.एचडी. तर १८ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली.

०००

A transparent selection system should be implemented to select quality teachers

-Governor

Mumbai, 7th Jan : Governor and Chancellor of state universities C.P. Radhakrishnan today expressed the need to implemented a transparent system to select University and College teachers ‘purely on merit’.  Stating that teaching is a noble profession, he said the selection process should be transparent and based on efficiency.

The Governor was addressing the Annual Convocation of the 168 – year old University of Mumbai at the CowasjeeJehangir Hall at the University Campus in Mumbai.

Maharashtra Ministers ChandrakantPatil and MangalPrabhatLodha, Secretary Department of Science and Technology Government of India Prof AbhayKarandikar, President of St Louis University USA Dr Fred Pestello, VC of University of Mumbai Prof RavindraKulkarni, PRO VC Ajay Bhamare, officials, graduating students and invitees were present.

Degrees were conferred upon 1,64,465 candidates. While Ph.Ds degrees were awarded to 401 candidates, Gold Medals were presented to 18 candidates.

0000

‘एचएमपीव्ही’ आजाराला घाबरून जावू नका, काळजी घ्यावी सार्वजनिक आरोग्य मंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री यांचे आवाहन

मुंबई, दि. ७: एच.एम.पी.व्ही (ह्यूमन मेटा न्युमो) हे श्वसन विषाणू नवीन नसून २००१ पासून प्रचलित आहेत. हा नवीन आजार नसून आधीपासून अस्तित्वात असलेला आहे. या आजारातील विषाणू रुपांतरीत होत नाही. नागरिकांनी कुठल्याही प्रकारे घाबरून जावू नये. वैयक्तिक स्वच्छता पाळून काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंत्रालयात संयुक्तरीत्या आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केले.

पत्रकार परिषदेला सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव नवीन सोना, आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या याबाबतीत येत असलेल्या दिशा निर्देश आणि मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. या आजाराबाबत कोणीही अफवा पसरवू नये. नागरिकांनी वस्तुस्थिती लक्षात घेत अफवांवर विश्वास ठेवू नये. लहान मुले, वयोवृद्ध, दुर्धर आजार असलेल्या रुग्णांची काळजी घेणे गरजेचे आहे. आजाराच्या संदर्भामध्ये आरोग्य विभागाचे संपूर्ण पथक कार्यरत असून लवकरच विशिष्ट कार्यपद्धती जाहीर करण्यात येईल. राज्यात आरोग्य विभागाची चांगली व्यवस्था असून यंत्रणा सज्ज आहेत. असे सार्वजनिक आरोग्य मंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

या आजाराबाबत आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक म्हणाले, सध्या चीनमध्ये श्वसनविषयक आजाराच्या विषाणूबाबत समाजमाध्यमावर माहिती येत आहे. चीनमध्ये हिवाळी वातावरणामुळे श्वसन संसर्गाची वाढ अनैसर्गिक नाही. इन्फ्ल्यूंझा, आर. एस. व्ही, एचएमपीव्ही (Human Meta Pneumo Virus) यासारखे विषाणू कारणीभूत आहेत. हे विषाणू भारतासह जगामध्ये पहिल्यापासून प्रचलित आहे.

एचएमपीव्ही हा साधारणतः सौम्य आजार आहे. ज्यामध्ये सर्दी, खोकल्यासारखी लक्षणे असतात. लहान मुले, वृद्ध आणि कमकुवत प्रतिकार शक्ती असलेल्या लोकांना आजाराचा जास्त धोका असू शकतो. हा एक हंगामी रोग आहे, जो सामान्यतः आरएसव्ही आणि फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीला उद्भवतो.सद्यस्थितीत भारतामध्ये श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवाढीमध्ये वाढ आढळून आलेली नसून या स्थितीला काळजीचे कारण नाही. सर्व रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधीसाठा आहे. या आजाराला कारणीभूत असलेल्या विषाणूची तपासणी राष्ट्रीय विषाणू संस्था, पुणे येथे करण्यात येत आहे.

या आजारावर लक्षणाधारीत सहायक उपचार करण्यात येतो. या आजारावर प्रतिजैविके (antibiotics) अनावश्यक असुन कुठलीही लस किंवा उपयुक्त अशी अँन्टीव्हायरल (antiviral) औषधी नाहीत. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेऊ नयेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

आजाराबाबत पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागानेही खबरदारी म्हणून सर्व जिल्ह्यांना काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय श्वसनाचे संसर्ग वाढू नये, यासाठी लोकांनी स्वच्छतेचे मूलभूत नियम पाळावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

नागरिकांना श्वसनाच्या संसर्गापासुन बचाव करण्यासाठी ही काळजी घ्यावी

*जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकून ठेवा

*आपले हात वारंवार धुवा.

*ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.

*भरपूर पाणी प्यावे आणि पौष्टिक खावे

*संक्रमण कमी करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी उदा. शाळा व कार्यालये इ. ठिकाणी हवा खेळती असावी.

*हस्तांदोलन टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर टाळावा.

*आजारी लोकांशी जवळचा संपर्क नसावा.

*डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये.

*सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये.

*डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणे टाळावे.

*सर्दी व खोकला झाल्यास गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.

0000

‘सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर करावे’– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ७ : सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे ( ईज ऑफ लिव्हिंग) यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील प्रशासनाला येत्या शंभर दिवसांत प्राधान्याने करावयाची कामे याबाबत सविस्तर सूचना दिल्या. या सूचनांवरील कार्यवाहीबाबत १५ एप्रिल २०२५ रोजी आढावा घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, आपल्या कार्यालयाचे संकेतस्थळ सुसज्ज करावे, माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली जाईल अशी सर्व माहिती अगोदरच संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी. संकेतस्थळ सायबरदृष्ट्या सुरक्षित करावे. शासकीय कार्यालयांची स्वच्छता करावी, अनावश्यक कागदपत्रे काढून टाकावी, खराब आणि वापरात नसलेली वाहने निर्लेखित करावीत. शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह स्वच्छ राहतील, हे सुनिश्चित करावे. अधिकाऱ्यांच्या अचानक भेटी होतील, त्यावेळी ते स्वच्छ दिसले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर (ईज ऑफ लिव्हिंग) व्हावे यासाठी किमान दोन सुधारणा, नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या कार्यालयात राबविण्यात यावेत. प्रलंबित कामांची संख्या शून्यावर कशी येईल, याचा प्रयत्न करावा. अधिकारी नागरिकांना कधी उपलब्ध असतील याची माहिती फलकावर नमूद करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. नागरिकांचे स्थानिक पातळीवर सुटू शकणारे प्रश्न, समस्या तालुका, जिल्हा स्तरावरच सोडवावेत. पण असे होत नसल्याने मंत्रालयात गर्दी होते. यासाठी लोकशाही दिन सारखे उपक्रम प्रभावीपणे राबविले जावेत, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील विविध ठिकाणी गुंतवणुकीसाठी उद्योजक येतात. त्यांना कसलाही आणि कोणाकडूनही त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. हे केवळ उद्योग विभागाचे काम नाही तर क्षेत्रीय अधिकारी यांचेही काम आहे. (इज ऑफ वर्किंग) यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागांचे अधिकारी आणि उद्योजक यांच्याशी संवाद साधावा, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले

जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या कार्यक्रम आणि प्रकल्पांना भेटी दिल्या पाहिजेत. तसेच तालुका, गाव पातळीवर भेटी झाल्याच पाहिजेत. शाळा, अंगणवाडी आणि आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या पाहिजेत. यांचे वेळापत्रक निश्चित करण्यात यावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. संबंधित जिल्हा पालक सचिवांनी आपल्या जिल्ह्यात सूचनांची अंमलबजावणी केली जात आहे का याबाबत लक्ष ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.

…..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना

@ विभाग, कार्यालयाचे संकेतस्थळ अद्ययावत करावे

@ ईज ऑफ लिव्हिंग संकल्पनेवर काम करावे

@ शासकीय कार्यालयात स्वच्छता मोहिम राबवावी

@ नागरिकांच्या तक्रारी, प्रलंबित प्रकरणे निकाली काढावी

@ उद्योजकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी

@ शासनाच्या महत्वाच्या प्रकल्प आणि योजनांच्या प्रकल्पांना भेटी द्याव्यात

@ शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात

0000

नवेगावबांध व चांदपूर पर्यटक निवास पर्यटकांसाठी पर्वणी ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ७ : विदर्भाच्या गोंदिया जिल्ह्यामधे एमटीडीसीचे नवेगावबांध व भंडारा जिल्ह्यातील चांदपूर पर्यटक निवास पर्यटकांसाठी पर्वणी ठरेल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.मंत्रालय येथील मंत्रिमंडळ बैठकीनंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या नवेगाव बांध व चांदपूर पर्यटक निवासाचा लोकार्पण सोहळा आभासी पद्धतीने झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई,पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक,पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यावेळी उपस्थित होते.

नवेगाव बांध – एक आदर्श पर्यटनस्थळ

गोंदियापासून ६५ कि.मी.वर नवेगावबांध येथे राष्ट्रीय पक्षी उद्यान आहे. वनश्रीने नटलेल्या या उद्यानाचा परिसर १६५ चौ.कि.मी. आहे. येथील तलाव व वनक्षेत्र पक्षांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. येथे सैबेरियासारख्या अतिदूर प्रदेशातून येणारे पक्षी विशिष्ट हंगामात दरवर्षी येतात. नवेगांवबांध हा तलाव ११ वर्ग कि.मी. परिसरात पसरलेला आहे.

नवेगावबांध सर्वसोयीसुविधा युक्त पर्यटक निवास

नवेगावबांध या पर्यटनस्थळी पर्यटकांना राहण्याकरिता महामंडळाने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून २१ कोटींच्या निधीतून उत्तम सुविधेने सज्ज असलेले पर्यटक निवास चांदपूर या नावाने सुरू केलेले आहे.  येथे व्हीआयपीसूट, डिलक्स सूट, स्टॅंडर्ड सूट आणि ८ बेडेड डॉर्मिटरी, उपहारगृह आणि मनोरंजनासाठी स्विमींगपूल इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत.येथे एकूण १८ सुट डिलक्स,२ लेडीज डॉरमेटरी सुट, जेन्ट्स डॉरमेटरी  १ सूट,१ चेंजींग रूम,१ मॅनेजर रूम,१ वेटींग रूम आहे.

चांदपूर पर्यटक निवासाचे लोकार्पण

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून चांदपूर पर्यटक निवास हे पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. भंडारा जिल्ह्यातील चांदपूर हे एक अत्यंत निसर्गरम्य आणि धार्मीक पर्यटन स्थळ आहे.चांदपूर या पर्यटन स्थळी पर्यटकांना राहण्याकरीता महामंडळाने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून ११ कोटींच्या निधीतुन उत्तम सुविधेने सज्ज असलेले पर्यटक निवास चांदपूर या नावाने सुरू केलेले आहे. येथे डीलक्स सुटस्, डॉरमेंटरी, उपहारगृह आणि मनोरंजनासाठी स्विमींगपूल इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. अशा एकूण २४ रूम आहेत.

चांदपूर लगत पर्यटन स्थळे

गायमुख येथे अंबागड टेकडीवरील प्राचीन शिवमंदिर प्रसिध्द आहे. आंबागड किल्ला हा  भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात असणारा सातपुडा पर्वत श्रणीतील डोंगरावर असलेला किल्ला आहे.  बावनथडी नदी ही महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्याच्या ईशान्य सरहद्दीवरून जाणारी आणि गोंदिया जिल्हा व भंडारा जिल्हा या जिल्ह्यांतून वाहणारी नदी आहे. बावनथडी प्रकल्प (राजीवसागर) नावाचे धरण आहे.चंद्रभागा नदीच्या काठावर वसलेले, धापेवाडा हे सुंदर लोकप्रिय गाव असून पर्यटकांचे आकर्षण आहे.

००००

महाराष्ट्रात राबविले जाणार ‘ई – कॅबीनेट’

मुंबई, दि. ७ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या कारभारात जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता आणि गतीमानता आणण्यावर भर दिला असून त्याचाच एक भाग म्हणून ई-कॅबीनेटचा निर्णय घेतला आहे.
NIC ने विकसित केलेल्या ई-कॅबिनेट ह्या प्रणालीचे सादरीकरण आज मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केले.
मंत्रिमंडळ बैठकीसाठी कागदांचा मोठ्या प्रमाणावर होणारा वापर कमी करण्यासाठी हे संपूर्ण आयसीटी (ICT) सोल्यूशन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रणालीमुळे मा. मंत्र्यांसाठी अत्यंत सुलभ डॅशबोर्ड उपलब्ध होईल. त्याचबरोबर आवश्यक संदर्भ शोधणे, कृती बिंदू (ॲक्शन पॉइंट) पाहणे आणि घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीबाबत पुनरावलोकन करणे सोपे होईल. ई-कॅबिनेटमुळे मंत्रिमंडळ बैठकांचे, निर्णयांचे व त्यासंबंधीच्या दस्तऐवजांचे जतन होईल. मंत्रिमंडळ निर्णय आणि त्यासंबंधीचे संदर्भ शोधणे सहज शक्य होईल.आतापर्यंत होत आलेल्या पारंपरिक मंत्रिमंडळ बैठकांमध्ये येणाऱ्या विविध अडचणींवर या प्रणालीमुळे मात करता येईल. मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येणारा प्रस्ताव ऑनलाईन अपलोड करणे, तो मंत्रिमंडळासमोर चर्चेसाठी आणि निर्णयासाठी सादर करणे, त्यावर अंतिम निर्णय व त्याबाबतच्या सर्व नोंदी ठेवणे ह्या सर्व प्रक्रिया सहजरित्या पार पडणार आहेत. हा सुशासनाच्या पूर्ततेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या प्रणालीमुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी कागदपत्रांच्या वितरणासाठी शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टळून या प्रक्रियेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा तसेच मंत्रिमंडळाचा मोठा वेळ वाचणार आहे.

000

 

मंत्रिमंडळ निर्णय  

राज्यात १ एप्रिल पासून टोलनाक्यांवर फास्ट-टॅगद्वारेच पथकर भरावा लागणार

राज्यातील पथकर वसुली नाक्यांवर १ एप्रिल २०२५ पासून सर्व वाहनांचा पथकर फास्ट-टॅगद्वारेच भरावा लागणार आहे. या निर्णयानुसार सध्याच्या सार्वजनिक खाजगी सहभाग धोरण २०१४ मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

फास्ट टॅगच्या माध्यमातून पथकर वसुली झाल्यास पथकर वसुलीत अधिक सूसुत्रता, पारदर्शकता येणार आहे. पथकर नाक्यांवर वाहनांचा खोळंबा कमी होणार आहे. यातून वेळेची, इंधनाची बचत होणार आहे. फास्ट-टॅग शिवाय अन्य कोणत्याही माध्यमातून पथकर भरायचा झाल्यास किंवा फास्ट – टॅग सुरु नसेल किंवा टॅगशिवाय वाहनाने फास्ट-टॅगच्या मार्गिकेत प्रवेश केल्यास दुप्पट पथकर भरावा लागणार आहे.

राज्यात सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या १३ आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ९ रस्ते प्रकल्पांवर पथकर वसुली सुरु आहे. या ठिकाणी तसेच भविष्यात पथकर वसुल करावा लागणाऱ्या प्रकल्पांसाठी हा निर्णय लागू राहणार आहे.

—–०—–

प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ, गतीमान करण्यासाठी सुधारित महाराष्ट्र शासन कार्यनियमावली 

प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ आणि गतीमान करणारी सुधारित महाराष्ट्र शासन कार्यनियमावली प्रसिद्ध करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

या सुधारणांमध्ये मंत्रिमंडळापुढे आणावयाची प्रकरणे, मुख्यमंत्री तसेच राज्यपाल महोदय यांच्या मान्यतेसाठी सादर करावयाची प्रकरणे, मंत्रिपरिषद व मंत्रिमंडळाची कार्यपद्धती आदी बाबींसंदर्भात तरतुदीचा समावेश आहे. अशी पहिली कार्यनियमावली १९७५ ला तयार करण्यात आली होती. त्यानंतर तिसऱ्यांदा अशी सुधारित कार्यनियमावली तयार करण्यात आली आहे.

सुधारित कार्यनियमावली राज्यपाल महोदयांच्या मान्यतेनंतर शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल. कार्यनियमावलीतील बदलामुळे शासनाचा कारभार अधिक पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख होण्यास मदत होईल व त्याचा फायदा राज्यातील जनतेला होईल.

या कार्यनियमावलीत काळानुरूप सुधारणा करण्यासाठी मंत्रालयीन विभागांच्या सचिवांचा एक अभ्यास गट गठीत करण्यात आला होता. यापुर्वी त्यांनी भारत सरकारच्या व इतर राज्यांच्या नियमावलींचा तुलनात्मक अभ्यास करून कार्यनियमावलीत सुधारणा करण्याची शिफारस केली आहे.

सुधारित कार्यनियमावलीत ४८ नियम, ४ अनुसूची आणि १ जोडपत्र असून, ती नऊ भागांमध्ये विभागली आहे. पहिल्या अनुसूचीमध्ये मंत्रालयीन प्रशासकीय विभागांची नावे, दुस-या अनुसूचीमध्ये मंत्रिमंडळासमोर आणावयाच्या प्रकरणांचा सविस्तर तपशील, तिस-या अनुसुचीमध्ये मा. मुख्यमंत्री यांच्या मान्यतेसाठी सादर करावयाच्या प्रकरणांचा व चौथ्या अनुसूचीमध्ये मा. राज्यपाल यांच्या मान्यतेसाठी सादर करावयाच्या प्रकरणांचा सविस्तर तपशील दिला आहे. तसेच, जोडपत्रामध्ये मंत्रिपरिषदेची आणि मंत्रिमंडळाची कार्यपद्धती विषद केली आहे. त्याचबरोबर विधेयके सादर करण्याची कार्यपध्दती देखील सुटसुटीत करण्यात आली आहे. याशिवाय, नियोजन विभागाने करावयाच्या कामकाजाचा समावेश नव्याने कार्यनियमावलीत करण्यात आला आहे. तसेच, शासनाचा आदेश किमान अवर सचिव यांच्या स्तरावरुन काढण्याची तरतुद करण्यात आली आहे.

या शासन कार्यनियमावलीमुळे शासनाच्या कामकाजातील निर्णय प्रक्रीया अधिक सुलभ आणि गतीमान होण्यास मदत होणार आहे.

—–०—–

इंदापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या तयारीचा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून आढावा

पुणे, दि. ०६: इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने २२ ते २६ जानेवारी २०२५ दरम्यान आयोजित राज्यस्तरीय कृषी- पशु प्रदर्शन, घोडे बाजार व डॉग शोच्या अनुषंगाने क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आढावा बैठक घेतली.

यावेळी आमदार ज्ञानेश्वर कटके, विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गवसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, आत्माचे प्रकल्प संचालक सूरज मडके, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, इंदापूर तालुका कृषी अधिकारी योगेश फडतरे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी अमर फडतरे, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार जाधव आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. भरणे म्हणाले, बाजार समितीच्यावतीने भरविण्यात येणाऱ्या प्रदर्शनात शेतीशी निगडित नवीन तंत्रज्ञान, उद्योग तसेच नावीन्यपूर्ण उपक्रम याचे स्टॉल यावेत. त्यादृष्टीने कृषी विभागाने पंचायत समितीला सहकार्य करावे. इंदापूर तालुका हा शेतीतील प्रयोगांसाठी प्रसिद्ध आहे. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्यास त्यांना लाभ होऊन जीवनात परिवर्तन होऊ शकते, असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, या प्रदर्शनात शासकीय अनुदान असलेल्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती पोहचविण्यासाठी प्रयत्न करावेत. रोपवाटिकांमध्ये येणाऱ्या नवीन वाणांचाही समावेश स्टॉलमध्ये करण्यात यावा. नवीन तंत्रज्ञान विकसित केलेल्या कंपन्यांना आमंत्रित करावे. पशुपालनातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्याच्यादृष्टीने पशुसंवर्धन विभागालाही सहभागी करुन घ्यावे, असेही श्री. भरणे म्हणाले.

यावेळी श्री. जगदाळे यांनी या प्रदर्शनाच्या अनुषंगाने माहिती दिली. जिल्हा बँकेच्यावतीने नवीन तंत्रज्ञानासाठी असलेल्या कर्जवाटपाच्या योजनांच्या माहितीचा तसेच डिजिटल बँकिंग, मोबाईल बँकिंग सुविधा आदींबाबत स्टॉल लावावा, अशा सूचना त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

श्री. गवसाने तसेच श्री. काचोळे यांनीही या प्रदर्शनाच्यादृष्टीने कृषी संबंधित नवीन तंत्रज्ञान असलेल्या संस्था, उद्योग, कंपन्यांशी संपर्क साधून त्यांचे स्टॉल लागतील यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शनाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

०००

गोदावरी कालव्यातून तीन आवर्तने सोडण्यात येतील  – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी, दि. ०६:  गोदावरी खोऱ्यात डावा व उजवा कालवा खोऱ्यात तीन आवर्तने सोडण्यात येतील. अतिरिक्त पाणी बचत झाल्यास चौथे आवर्तन सोडण्याचा विचार करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

राहाता येथे झालेल्या गोदावरी डावा व उजवा कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत अध्यक्षपदावरून ते बोलत होते. याप्रसंगी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार आशुतोष काळे, आमदार हेमंत ओगले, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, समितीचे सदस्य तसेच शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, नाशिक विभाग मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे,  आदी उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की,‌ शेतकऱ्यांनी पाण्याची बचत करून अधिकचे पाणी शेतील ‌कसे उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करावेत, गोदावरी उजव्या कालवा नूतनीकरणासाठी १९१ कोटींची मान्यता शासनाने दिली आहे. डावा व उजवा कालव्याच्या चारी दुरूस्ती करिता २६० कोटींचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. त्यास मान्यता देण्यात येईल. साधारणतः ४५० कोटी फक्त गोदावरी खोऱ्यावर शासन खर्च करणार आहे. पश्चिम वाहिनीनदीचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या सर्वेक्षणासाठी ६५ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. गोदावरी खोऱ्यात नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून अतिरिक्त पाणी वळविणे हे जलसंपदा विभागाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. सर्वांना समप्रमाणात पाणी मिळावी ही शासनाची भूमिका असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, शिर्डी नगरपालिकेच्या वाया जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी चारी क्र.११, १२ व १३ मध्ये सोडण्यात येणार आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना बारामाही पाणी मिळणार आहे. पिंपळवाडी चारी क्र. १४ स्वतंत्र पाइपलाइन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

जलसंपदा विभागाकडून शेतकऱ्यांना असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार आशुतोष काळे, विवेक कोल्हे यांचीही भाषणे झाली.

गोदावरी कालव्यातील रब्वी- खरीप हंगाम २०२४-२५ च्या आवर्तन नियोजनाबाबत श्री.गोवर्धने यांनी प्रास्ताविकात माहिती दिली. रब्बी १ व उन्हाळ्यात २ आवर्तन देण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

०००

ताज्या बातम्या

सरन्यायाधीश पदापर्यंतच्या प्रवासात नागपूरचे योगदान महत्वपूर्ण – सरन्यायाधीश भूषण गवई  

0
नागपूर, दि २७ : नागपूर शहरासोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. दरवर्षी धम्मप्रवर्तन दिनी आई- वडीलांसोबत दिक्षाभूमीवर येत असे. पुढे वकिली व न्यायदान क्षेत्रात नागपूर जिल्हा व...

‘संवादवारी’च्या प्रदर्शनाला सणसर येथे वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
पुणे, दि.२७: डोक्यावर विठ्ठल-रुखमाईची मूर्ती, तुळशी वृंदावन, हातात टाळ, वीणा, भागवत धर्माचा पताका हाती घेत पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरकडे मार्गस्थ वारकऱ्यांची पाऊले माहिती व...

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे इंदापूर तालुक्यात आगमन

0
पुणे, दि. २७: 'हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी ' या भावनेसह, टाळ-मृदंगाच्या गजरात, 'ज्ञानोबा- माऊली...

नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी जिल्हा परिषदेच्या पाठीशी राहू – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
सांगली, दि. २७ (जि. मा. का.) : जिल्हा परिषदेच्या योग दिनाच्या कार्यक्रमात साडेपाच लाखांच्या आसपास नागरिक सहभागी झाले. यातून सांगली जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास...

गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी पोलीस दलाने प्रभावी प्रतिबंधात्मक यंत्रणा कार्यान्वित करावी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
पोलीस दादा, पोलीस दीदींनी घरोघरी प्रबोधन करण्याच्या सूचना तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, पोलीस पाटील यांची कार्यशाळा घेण्याचे निर्देश  सांगली, दि. २७ (जि. मा. का.) : कायदा व...