शनिवार, जून 28, 2025
Home Blog Page 408

कुकडी व घोड कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत रब्बीसाठी पाण्याची आवर्तने सोडण्याचा निर्णय

अहिल्यानगर, दि. ०६: कुकडी प्रकल्पातून सध्या सुरू असलेले रब्बी आवर्तन क्र .१ गृहीत धरून एकूण चार तसेच घोड प्रकल्पातून यापूर्वी खरीप हंगामात दिलेले एक आवर्तन तसेच सध्या सुरू असलेले रब्बी हंगामातील आवर्तन क्र.१ अशी दोन धरून एकूण चार आवर्तन देण्याचा निर्णय राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कुकडी संयुक्त प्रकल्प  कालवा सल्लागार समिती बैठकीत घेण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या या बैठकीस आमदार काशिनाथ दाते, विक्रम पाचपुते (दूरदृश्य प्रणालीद्वारे) , ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके, शरद सोनवणे, नारायण आबा पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, कृष्णा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील (दूरदृश्य प्रणालीद्वारे), समितीची सदस्य आदी  उपस्थित होते.

मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, शेवटच्या टोकापर्यंत पाणी मिळेल असे सूक्ष्म नियोजन पाटबंधारे विभागाने करावे. पीक पाहणी नुसार  नियोजन करावे. प्रत्यक्षात पिकांचा प्रकार आणि गरज लक्षात घेऊन पाणी द्यावे. पाण्याचे आवर्तन सोडताना स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घ्याव्यात.

सर्व भागात, पोटचाऱ्यांना समन्यायी पद्धतीने पाणी मिळेल याकडे लक्ष द्यावे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना काटकसरीने सर्व शेतकऱ्यांना पाण्याच्या पाळ्या देण्याचे नियोजन करावे जेणेकरुन पुढील आवर्तनांसाठी अधिक पाणी उपलब्ध होऊ शकेल. पिंपळगाव जोगा कालव्याच्या विशेष दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करावा असे निर्देशही त्यांनी दिले.

पुणे जिल्हा परिषदेने पाणी साठविण्यासाठी साठवण तलावाच्या पर्यायावरही विचार करावा. कुकडी कालव्यालगतची झाडे – झुडुपे काढण्यासाठी साखर कारखान्यांनी जेसीबी उपलब्ध करून दिल्यास इंधनासाठी  निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. धरणातील गाळ काढण्याचे काम प्राधान्याने हाती घेण्यात यावे, यासाठी उद्योग संस्थांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीचा उपयोग करावा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी पाणी सोडण्याच्या नियोजनाबाबत  उपस्थित आमदारांनी विविध सूचना केल्या.

कुकडी संयुक्त प्रकल्पात येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगे व डिंभे मिळून एकूण १९.४३६ टी.एम.सी. पाणीसाठा उपलब्ध आहे. कुकडी डावा कालव्याद्वारे दुसऱ्या आवर्तनासाठी  २० फेब्रुवारीपासून पाणी सोडण्याचे  बैठकीत ठरले. तसेच कुकडी प्रकल्पाचे आगामी  आवर्तन पूर्ण झाल्यानंतर शिल्लक राहिलेला पाणीसाठा, तसेच पुढील पावसाळ्यापूर्वीची टंचाईची परिस्थिती पाहून उन्हाळी आवर्तनाबाबत  स्वतंत्र निर्णय घेण्यात येईल, असे श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

घोड प्रकल्पात २.४६ टी.एम.सी. पाणीसाठा उपलब्ध आहे. प्रकल्पाचे दुसरे आवर्तन २० फेब्रुवारीपासून  सोडण्याचे नियोजन असल्याचे यावेळी सांगण्यात आले. श्रीगोंदा आणि शिरूरच्या लोकप्रतिनिधींसोबत चर्चा करून नियोजन करावे अशी सूचना मंत्रीमहोदयांनी केली.

बैठकीच्या सुरवातीला कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा व नियोजनाबाबत सादरीकरण केले.

बैठकीस कार्यकारी अभियंता प्रवीण घोरपडे, प्रशांत कडूस्कर, उत्तम धायगुडे, राजेंद्र धोडपकर आदी उपस्थित होते.

०००

 

जळगावमधील पत्रकारांच्या ‘नव्या गृहनिर्माण सोसायटी’साठी मदत करणार – मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, दि. ०६ (जिमाका): पत्रकार संघाकडून पत्रकारांना हेल्मेट देणे ही अत्यंत स्तुत्य गोष्ट असल्याचे सांगून पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, त्यामुळे त्यांच्या लिखाणातून आम्हालाही योग्य तो बोध मिळतो. अप्रत्यक्षपणे पत्रकार हे आमचे मार्गदर्शक असल्याचे सांगून जळगावमधील पत्रकारांसाठी नवी गृहनिर्माण सोसायटी काढण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई आयोजित दर्पणदिनानिमित्त दर्पणकार पुरस्कार व हेल्मेट वितरण कार्यक्रमात बोलत होते.जिल्हा नियोजन भवन येथे हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी आमदार सुरेश भोळे, नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, पुणे येथील ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जैन इरिगेशनचे जनसंपर्क अधिकारी अनिल जोशी, जिल्हा दूध संघाचे सदस्य अरविंद देशमुख, ज्येष्ठ पत्रकार सचिन जोशी, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी प्रवीण सपकाळे, सचिन गोसावी, प्रवीण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी मंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार सुरेश भोळे, डीआयजी दत्तात्रय कराळे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, संपादक संजय आवटे यांच्या हस्ते प्रिंट मिडियाचे पत्रकार चंद्रशेखर जोशी, सुनील पाटील, सुधाकर जाधव, चेतन साखरे, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार किशोर,संजय महाजन, विजय वाघमारे, डिजिटल मीडियाचे नरेंद्र पाटील, निलेश पाटील, छायाचित्रकार सचिन पाटील यांना दर्पण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

माध्यमात जशी बातमीसाठी स्पर्धा असते तशी स्पर्धा आमच्या क्षेत्रातही झाली आहे अशी मिश्किल टिप्पणी करून पत्रकारांचे जे प्रश्न असतील ते सोडविण्याचा आमचा प्रयत्न असून पत्रकारांसाठी जळगावमध्ये नवी गृहनिर्माण सोसायटी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी अधोरेखित केले. पत्रकार दिनानिमित्त सर्व माध्यम प्रतिनिंधीना यावेळी शुभेच्छा दिल्या.

पत्रकारांचे स्थान समाजात खूप मोठे असल्याचे सांगून ते स्थान कायम राहिलं पाहिजे. तुम्ही माध्यमात कामं करणारी बुद्धीजीवी लोकं आहात त्यामुळे समाजाला योग्य दिशा देण्याचे काम तुमच्या हातून होते. हे सगळे करतांना तुमचे आरोग्यही तेवढेचं महत्त्वाचे असून त्यासाठी सर्व पत्रकारांनी आरोग्य विमा उतरवावा, असा महत्वाचा सल्ला सुरेश भोळे यांनी यावेळी दिला.

पोलिसांचे आणि पत्रकारांचे संबंध रोजचेच असतात. पत्रकार म्हणून तुम्हीच तुमचे कर्तव्य बजावता, पोलीस म्हणून आम्ही आमचे कर्तव्य पार पाडतो. पत्रकारिता करतांना चुका दाखविणे हे तुमचे काम आहे ते करत रहा. फक्त्त कोणी तुमच्या पत्रकारितेमुळे नाउमेद होणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे  यांनी केले.

तर जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी होण्यापूर्वी माझ्या जीवनाची सुरुवात ही पत्रकारितेतून झाली असून आकाशवाणी मध्येही मी काम केलेले आहेत. पत्रकारितेमध्ये पहिली गोष्ट शिकलो ती म्हणजे कोणत्या गोष्टीची बातमी  करायला पाहिजे आणि कोणती बातमी करायला नको. चार जणांची बातमी वाचून बातमी करणे म्हणजे तिला इंटेलिजन्स काम केले असे म्हणत नाही तर  फिल्ड पत्रकरितेवर जोर देण्याचा सल्ला त्यांनी दिला.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी जळगावच्या पत्रकारांचे कौतुक करताना म्हणाले की,  “ मी आजपर्यंत ज्या ज्या भागात नोकरी केली त्या भागातील पत्रकारांपेक्षाही जळगावच्या पत्रकारांच्या बातमीचा वेग अधिक आहे. माझ्या टेबलवर एखाद्या फाईलवर सही झाल्यानंतर एका तासात ती बातमी बाहेर येते. हेल्मेट वाटपाचा निर्णय अत्यंत स्तुत्य असून जळगावमध्ये दरवर्षी 500 अपघात होऊन लोकं दगावतात त्यापैकी 400 जण दुचाकीवरचे असतात. या हेल्मेटमुळे त्यांचे प्राण वाचतील,  याबाबत पोलिसांकडून जागृती केली जातेच आहे. यात पत्रकार संघाने पुढाकार घेतला असल्यामुळे या जागृतीला वेग येईल असे प्रतिपादन डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले.

यावेळी पत्रकारांना मार्गदर्शन करताना ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे म्हणाले की, पत्रकारांच्या बातमीचा केंद्रबिंदू हा सामान्य माणूस असावा, त्याच्यासाठी तुमची पत्रकरिता असावी. शासन, प्रशासन जिथे चुकते तिथे त्यांची चुक दाखविण्याचे काम पत्रकारांचे असल्याचे सांगून येथून पुढे एआय हे तंत्र आणि माणूस म्हणून आपण पत्रकार अशी स्पर्धा असणार आहे. त्यामुळे योग्य कंटेट तुमच्याकडे असणं आता गरजेचं असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. दर्पण हा वारसा फार मोठा आहे. मात्र तो वारसा विसरता कामा नये त्या दृष्टीने आपण काम करत राहिले पाहिजे. जगात काहीही बंद पडेल पण मुद्रित माध्यम बंद पडणार नाही. आजही  लोकांचा मुद्रित माध्यमावर लोकांचा विश्वास असल्याचे प्रतिपादन श्री. आवटे यांनी केले.

०००

खत उत्पादक कंपन्यांनी लिंकिंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी – मंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर, दि. ०६ (जिमाका): शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून खत उत्पादक कंपन्यांनी कोणत्याही परिस्थितीत लिंकिंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच लिंकिंग झाल्याचे आढळल्यास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी करुन कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबिटकर यांनी दिल्या.

शासकीय विश्रामगृह येथे मंत्री श्री. आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागाचे अधिकारी, खत उत्पादक कंपन्या आणि निविष्ठा विक्रेत्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, आत्माच्या प्रकल्प संचालक रक्षा शिंदे, स्मार्ट प्रकल्पाच्या नोडल अधिकारी प्रणाली चव्हाण, करवीर चे उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, किरण पाटील,  कृषी विकास अधिकारी सारिका रेपे तसेच कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. आबिटकर म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत लिंकिंग न करता आगामी काळात जिल्ह्यात सर्व खतांचा मुबलक पुरवठा होईल, असे नियोजन खत उत्पादक कंपन्या आणि कृषी विभागाने करावे. तसेच जिल्ह्यातील दुर्गम भागात सर्व खतांचा मुबलक पुरवठा होईल याचीही खबरदारी घ्यावी. गुणवत्तापूर्ण खतांचा पुरवठा होण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यातील सर्व निविष्ठा विक्रेत्यांच्या तपासण्या करा. निविष्ठा केंद्रांमध्ये दर्जेदार खते, बी बियाणे व कीटकनाशके विक्रीसाठी उपलब्ध होतील, तसेच निविष्ठाबाबत कोणतीही तक्रार येणार नाही, याची खबरदारी निविष्ठा विक्रेत्यांनी घ्यावी.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी चालू हंगामाच्या दृष्टिकोनातून उपलब्ध सर्व खतांची माहिती दिली. जिल्ह्यात कोणत्याही खतांचा तुटवडा नसल्याचे त्यांनी सांगितले.

सद्यस्थितीत जिल्ह्यात 46 हजार 757 मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. त्यामध्ये 16 हजार 143 मेट्रिक टन युरिया आहे, असे सांगितले.

यापुढेही सर्व खतांचा गुणवत्तापूर्ण व मुबलक पुरवठा होईल याचे नियोजन कृषी विभागाने केल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रम नको;कार्यवाही करा

निविष्ठा विक्रेत्यांच्या बैठकीनंतर मंत्री श्री.अबिटकर यांनी आत्मा व स्मार्ट विभागातील योजनांचा आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले, कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी शेतकरी व शेतीशी नाळ जोडून काम करावे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यासाठी नाविन्यपूर्ण योजना व उपक्रम प्राधान्याने राबवावेत. तसेच शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण द्यावे. जिल्ह्यात रेशीम शेती व बांबू उत्पादन, मध उत्पादनासाठी पोषक वातावरण आहे, याचा विचार करुन  रेशीम व बांबू शेती, मध उत्पादन व विक्रीला चालना देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करा. हे करत असताना कार्यक्रम घेण्याऐवजी त्या त्या योजनांची, उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करा, अशा सूचना ही त्यांनी दिल्या.

०००

लेखणीतून सामान्यांना न्याय देण्याची पत्रकारांची भूमिका – प्रा.डॉ.अशोक उईके

यवतमाळ, दि. ०६ (जिमाका): स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या काळातही पत्रकारांची भूमिका मोलाची राहिली आहे. लेखणीच्या माध्यमातून पत्रकारांनी सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे सेवाव्रत कायम ठेवले. एक मोठा वारसा जिल्ह्याच्या पत्रकारीतेला असून पत्रकाराचा सन्मान आयुष्यभर बाळगू, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी केले.

जेष्ठ नागरीक भवनात श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातमंत्री अशोक उईके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, जेष्ठ पत्रकार अनिरुद्ध पांडे, श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत राऊत, सचिव अमोल ढोणे उपस्थित होते.

प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले. मराठी भाषेतील दर्पन हे पहिले वृत्तपत्र 6 जानेवारी 1832 रोजी सुरु केले. त्यामुळे हा दिवस मराठी पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो. लेखणीच्या माध्यमातून संविधानातील अधिकार व हक्क सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्याची भूमिका पत्रकारांची राहिली आहे. मला आगामी काळात एक चांगले आरोग्य शिबीर घेण्याच्या दृष्टीने आपले सहकार्य राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. सोबतच पत्रकार भवनाच्या संदर्भातही पुढाकार घेउन मदत करु, अशी ग्वाही त्यांनी दिली.

सर्वोत्तम पत्रकार भवन यवतमाळात निर्माण झाले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी आपण पुढाकार घेऊ, अशी हमी त्यांनी दिली. कार्यक्रमाचे अतिथी तथा जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड यांनीही आपल्या भाषणातून जिल्ह्यातील पत्रकारांची भूमिका नेहमी सहकार्याची राहत असल्याचे सांगितले. जेष्ठ पत्रकार अनिरुद्ध पांडे यांनी पत्रकारीतेच्या बदलत्या संदर्भावर भाष्य केले. एखादी बातमी सुटल्याची खंत वाटणे हे पत्रकारीता जिवंत असल्याचे लक्षण होय, असे ते म्हणाले. कुणासोबत कसेही संबंध असले तरी पत्रकाराने सत्य मांडले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

प्रास्ताविक श्रीकांत राऊत यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन केशव सवळकर यांनी केले. आभार सुरेंद्र राऊत यांनी मानले. या कार्यक्रमाला पत्रकार दिनेश गंधे, गणेश बयास, नितीन पखाले, राजकुमार भितकर, नितीन भागवते, अविनाश साबापुरे, विवेक गावंडे, विवेक कवठेकर, नागेश गोरख, गणेश राऊत, मेहमुद नाथानी, रुघुवीरसिंह चव्हाण, विरेंद्र चौबे, चेतन देशमुख, रुपेश उत्तरवार, प्रविण देशमुख, अमोल शिंदे, किशोर जुनुनकर, प्रा. विवेक विश्‍वरुपे, दिपक शास्त्री, संजय सावरकर, श्‍याम वाढई, तुषार देशमुख, मनिष जामदळ, अतुल राऊत, सुधीर मानकर, लक्ष्मणलाल खत्री, विवेक वानखेडे, जयंत राठोड, संजय राठोड, नितीन भुसरेड्डी, राहूल वासनिक, विजय बुंदेला, अनिकेत कावळे, मकसूद अली, सय्यद मतीन सय्यद मुनाफ, रवीश वाघ, गौतम गायकवाड, नितीन राऊत, श्‍याम आरगुलवार आदी उपस्थित होते.

०००

केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवा – राज्यमंत्री मेघना बोर्डीकर 

परभणी, दि. ०६ (जिमाका) : नागरिकांना लोककल्याणकारी योजनांचा तत्परतेने लाभ मिळावा यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजना परभणी जिल्ह्यात प्रभावीपणे राबवाव्यात, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत श्रीमती बोर्डीकर यांनी आज विविध विभागांचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीस जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे,  महानगर पालिका आयुक्त धैर्यशील जाधव, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे आदींसह आरोग्य, सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज वितरण कंपनी, महिला व बालकल्याण, महाऊर्जा, ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी आरोग्य, महिला व बालकल्याण, वीज वितरण, महाऊर्जा, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचा आढावा घेतला. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अद्यावत करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केला जाईल, असे सांगून त्या म्हणाल्या की, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी  रुग्णसेवा जबाबदारीने करावी. रुग्णांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ देऊ नये. वेळेवर उपचार देण्याबरोबरच नागरिकांना आरोग्य विषयक योजनांचा प्राधान्याने लाभ द्यावा. सर्व रुग्णालये, आरोग्य केंद्र स्वच्छ ठेवावीत. त्या ठिकाणी पाणी व शौचालयाची पुरेशी व्यवस्था करावी. दिव्यांग रुग्णांना वेळेत उपचार द्यावेत. जिल्ह्यात एकही बालक कुपोषित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. बालविवाह होणार नाहीत, याबाबत खबरदारी घ्यावी. एचएमपीव्ही विषाणू बाबत बोलताना त्या म्हणाल्या की, सध्या चिंतेचे कारण नसले तरी आरोग्य यंत्रणेने दक्ष रहावे. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, मात्र पुरेशी काळजी घ्यावी.राज्यमंत्री श्रीमती बोडींकर म्हणाल्या की, वीज वितरण विषयक तक्रारींचे तात्काळ निराकरण करावे. शेतकऱ्यांना अखंडित वीज द्यावी. प्रधानमंत्री सूर्य घर योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. प्रलंबित पाणी पुरवठ्याच्या योजना तातडीने मार्गी लावाव्यात. विशेषत: ग्रामीण भाग, तांडा वस्तींवर पाणी पुरवठा प्राधान्याने करावा. शाळा, अंगणवाडी यांना नळ कनेक्शनद्वारे पाणी द्यावे.

प्रारंभी संबंधित विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी प्रशासन दक्ष असून विविध योजनांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल, असे सांगितले.

         बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्ह्यातील केकर जवळा ता. मानवत, उखळी ता. सोनपेठ, पेठशिवणी ता. पालम, असोला ता. परभणी, भोगाव ता. जिंतूर, लोहगाव ता. परभणी  येथे नव्याने सुरु करण्यात येत असलेले प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकांचे राज्यमंत्री श्रीमती बोडींकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन करण्यात आले. तसेच टीबी मुक्त भारत अभियान या जनजागृतीपर वाहनालाही हिरवी झेंडी दाखविण्यात आली.

०००

 

‘एचएमपीव्ही’बाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – मंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर, दि. ०६ (जिमाका): राज्यातील नागरिकांनी एचएमपीव्ही (HMPV) बाबत कोणत्याही अफवांवर, सोशल मीडियावरील बाबींवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरांजी येथे इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय सुविधा पाहण्यासाठी आले असता ते बोलत होते.

राज्याचा आरोग्य विभाग अत्यंत सक्षम असून आरोग्य विभागाच्या माध्यमातून कोरोनासारख्या गंभीर आजारालाही परतून लावले. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि स्वत:ची काळजी घ्यावी, असे ते म्हणाले.

बेंगलोरमध्ये एचएमपीव्ही (HMPV) व्हायरसचा रुग्ण आढळून आला आहे. त्याबाबत देशपातळीवरील आरोग्य विभागाची यंत्रणा काम करेल. राज्यातील नागरिकांनी या आजाराबाबत योग्य ती काळजी घेण्यासाठी आरोग्य विभाग योग्य ते निर्देश देईल. याबाबत बैठक घेण्यात येणार असून बैठकीच्या माध्यमातून आरोग्य विभागाचे अधिकारी, सर्व डॉक्टर्स यांना सूचना देण्यात येतील. नागरिकांनी या आजराबाबत घाबरुन न जाता आरोग्य विभागाच्या आवश्यक त्या सूचनांचे पालन करावे.

कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या ज्या मार्गदर्शक सूचना होत्या त्याच सूचना या आजारासाठी असणार आहेत. आरोग्य विभागाच्या माध्यमातून या सूचना प्रकाशित करण्यात येणार आहेत. एचएमपीव्ही (HMPV) व्हायरस या संसर्गजन्य आजारासाठी जी काळजी घ्यायला हवी जसे हात स्वच्छ धुणे, शिंकताना, खोकताना रुमाल वापरणे अशा गोष्टींचे नागरिकांनी पालन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

०००

नवी मुंबई, नागपूर, शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.०६ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह नागपूर, शिर्डी विमानतळाचे काम गतीने करून दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित राज्यातील सर्व विमानतळाच्या बांधकाम प्रगतीच्या कामासंदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, विमान वाहतूक हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. केंद्र सरकार आणि राज्य शासनाला आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करणे फार गरजेचे आहे. देश ५ ट्रिलीयन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना, हे क्षेत्र फार महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन म्हणून काम करत आहे. या क्षेत्रातील बारीक सारीक गोष्टीवर देश आणि राज्याला काम करावे लागणार आहे. या क्षेत्रातील वाढती संख्या विचारात घेऊन पायाभूत सुविधांचा विस्तार करावा लागणार आहे. सोलापूर आणि कोल्हापूर येथे नाईट लँडिंग होईल, असे नियोजन करण्याचे त्यांनी निर्देश दिले.

शिर्डी नाईट लँडिंग सुविधा लगेच सुरू करा. नागपूर आणि शिर्डी विमानतळाचे अडलेले प्रश्न ३१ मार्चपर्यंत सोडवा. जळगाव येथे नवीन टर्मिनल इमारत तयार करा, पुरंदर विमानतळ जागा अधिग्रहण प्रक्रिया लवकर सुरू करा. पालघर विमानतळ उभारणीसाठी प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, वाढवण बंदर हे केंद्र आणि राज्य शासनाचा महत्त्वाचा प्रकल्प होणार आहे. जगातील सर्वात मोठ्या १० बंदरापैकी एक हे बंदर असेल. देशातील सर्वात मोठी व्यापारी वाहतूक या ठिकाणाहून होणार आहे. या भागातून बुलेट ट्रेन, कोस्टल रोड जाणार आहे. याठिकाणी चौथी मुंबई साकारणार आहे. यासाठी वाढवण येथे तात्काळ नवीन विमानतळाचा निर्णय घेणे, आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कामाची चांगली प्रगती असून, अधिक गतीने काम सुरू करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. नवी मुंबई विमानतळ 85% पूर्ण झाले आहे. या विमानतळाची क्षमता मुंबई विमानतळापेक्षा दुप्पट असणार आहे. कामे गुणवत्तापूर्ण कालमर्यादेत करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या. यावेळी त्यांनी राज्यातील 11 विमानतळांचा आढावा घेतला.

अमरावतीत एअर इंडियाची फ्लाईंग अकॅडमी सुरू होणार असून ही आशियातील सर्वात मोठी अकादमी असणार आहे.

ज्या विमानतळावर रात्री विमान उतरण्याची सुविधा आहे. तेथेही काही अडचणी येत असल्याचे समजले आहे. काही विमानतळाची कामे अनेक दिवसांपासून सुरू आहेत. उशीर का होत आहे याची कारणे शोधून लवकरात लवकर मार्ग काढून कामे पूर्ण करावी असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी नवी मुंबई, नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळांचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. यामध्ये झालेले काम, उर्वरित कामासाठी लागणारा कालावधी, प्रलंबित परवानग्या,आर्थिक बाजू, जमीन संपादन अशा विविध घटकांचा आढावा घेतला. याबरोबर राज्यातील सर्व  विमानतळांचा सादरीकरणाच्या माध्यमातून आढावा घेतला.

यावेळी  नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सहसचिव रुबिना अली, असंगबा चुबा एओ, सहसंचालक नयोनिका दत्ता, जे. टी. राधाकृष्ण, प्रादेशिक कार्यकारी, भारतीय विमानतळ प्राधिकरण, पश्चिम क्षेत्राचे वरिष्ठ अधिकारी फैज अहमद किडवाई, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कार्यकारी अधिकारी, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कार्यकारी अधिकारी यांच्यासह मुख्यमंत्री सचिवालय तसेच विविध विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव, सचिव आदी उपस्थित होते.

०००

 

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना लोकायुक्तांकडून कामकाजासंबंधीचा अहवाल सादर

मुंबई, दि. ०६ : राज्याचे लोक आयुक्त न्या. वि. मु. कानडे (नि.) व उप लोक आयुक्त संजय भाटिया यांनी सोमवारी (दि. 6) राज्यपाल सी. पी.  राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेऊन त्यांना आपल्या कामकाजासंबंधीचा 51 वा वार्षिक एकत्रित अहवाल  सादर केला.

लोकायुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार २०२3 या अहवालाधीन वर्षात लोकायुक्त कार्यालयाकडे 4 हजार 790 नवीन तक्रारी नोंदविण्यात आल्या. वर्षाच्या सुरुवातीला 4 हजार 583 प्रकरणे प्रलंबित होती. अशा प्रकारे सन २०२3 मध्ये 9 हजार 373 प्रकरणे कार्यवाहीकरिता उपलब्ध झाली.

नोंदणी केलेली 4 हजार 555 प्रकरणे अहवालाधीन वर्षात निकाली काढण्यात आली आणि सन २०२3 च्या वर्षअखेरीस 4 हजार 818 प्रकरणे प्रलंबित राहिली, असे लोकायुक्त कार्यालयाकडून यावेळी कळविण्यात आले.

महाराष्ट्रातील लोक आयुक्त संस्थेने गेल्या पाच दशकांमध्ये अनेक तक्रारदारांची गाऱ्हाणी दूर केली असून गेल्या काही वर्षात ७५ टक्के पेक्षा जास्त तक्रारींमधील तक्रारदारांच्या गाऱ्हाण्यांचे निवारण करण्यात आले असल्याचे नमूद करण्यात आले.

०००

राज्यातील गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्या – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

मुंबई, दि. ०६ : गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध होण्यासाठी  योजना राबविण्यात येतात. प्रत्यक्ष लाभार्थींपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी. प्रकल्पांची कामे तातडीने सुरू करावीत, असे निर्देश गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या गृहनिर्माण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणाले, सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळातर्फे (महा हाऊसिंग), म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे स्वतःचे घराचे स्वप्न साकार होत आहे. मुंबई शहर आणि परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे घरांची मागणीही वाढत आहे. राज्यातील प्रगतीपथावरील गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी यंत्रणांनी कामांची गती वाढवावी.

ज्येष्ठ नागरिक धोरण २०२४, प्रधानमंत्री आवास योजना, गिरणी कामगारांना घरे, सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना, धोकादायक इमारतींचा पुनर्विकास या विषयावरही यावेळी चर्चा करण्यात आली.

या बैठकीस गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही.आर. श्रीनिवास, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

 

संविधान व कायद्यांबाबत जागरुकतेसाठी विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. ०६:  लोकशाहीचे बळकटीकरण, सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी भारतीय संविधान आणि देशाच्या नियम-कायद्यांबाबत नागरिकांमध्ये जागरुकता असणे आवश्यक आहे. ही जागरुकता निर्माण करण्यासह समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित पीडित बांधवांना त्यांचे हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, न्यायप्रिय वकिल म्हणून भविष्यात महत्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत मंत्रालयात आयोजित संवादभेटी दरम्यान केले.

पुणे येथील श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या विधी महाविद्यालयाच्या पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी, प्राचार्या सिद्धकला भावसार, सहयोगी प्राध्यापक भानुदास गर्जे आदींसह आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, विधी आदी अनेक मुद्यांवर विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, विद्यार्थी हा जीवनभर विद्यार्थी राहिला पाहिजे. वयाच्या पन्नाशीनंतरही शिकत राहण्याची वृत्ती कायम राहिली पाहिजे. शिकत असताना त्यात्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींसोबत काम केले पाहिजे. त्यांच्याकडून व्यवसायातील बारकावे समजून घेतले पाहिजेत. जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघितलं पाहिजे. आज विधी शाखेचे विद्यार्थी असलेले तुम्ही सर्वजण उद्या यशस्वी वकील बनाल, परंतु वकिल बनण्याआधी आजचे आदर्श विद्यार्थी, उद्याचे आदर्श नागरिक बना, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कला, क्रीडा, साहित्य अगदी वकिलीच्या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी स्वत:ला सातत्याने सिद्ध करत रहावे लागते. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी प्रचंड अभ्यास, अथक परिश्रम आणि चिकाटी आवश्यक असते. त्याची तयारी ठेवा. भारतीय संविधान तसेच कायद्यांनी सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे, निर्भयपणे, निष्पक्षपणे, निष्ठेने पार पाडण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध विषयांवरच्या प्रश्नांना उपमुख्यमंत्र्यांनी दिलखुलास उत्तरे दिली. या संवादातून राज्याचा लोकनेता, कुटुंबातील ज्येष्ठ मार्गदर्शक, एका दिलखुलास मित्राचे दर्शन घडले, अशी भावना सहभागी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. सागर खुरवड, महादेव पाटील, अनुज बसाळे, अमित काकडे, शंतनु दाते, हरिष मिनेकर आदी विद्यार्थी, प्रतिनिधींसोबत पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी या संवादात सहभाग घेतला.

०००

 

ताज्या बातम्या

सरन्यायाधीश पदापर्यंतच्या प्रवासात नागपूरचे योगदान महत्वपूर्ण – सरन्यायाधीश भूषण गवई  

0
नागपूर, दि २७ : नागपूर शहरासोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. दरवर्षी धम्मप्रवर्तन दिनी आई- वडीलांसोबत दिक्षाभूमीवर येत असे. पुढे वकिली व न्यायदान क्षेत्रात नागपूर जिल्हा व...

‘संवादवारी’च्या प्रदर्शनाला सणसर येथे वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
पुणे, दि.२७: डोक्यावर विठ्ठल-रुखमाईची मूर्ती, तुळशी वृंदावन, हातात टाळ, वीणा, भागवत धर्माचा पताका हाती घेत पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरकडे मार्गस्थ वारकऱ्यांची पाऊले माहिती व...

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे इंदापूर तालुक्यात आगमन

0
पुणे, दि. २७: 'हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी ' या भावनेसह, टाळ-मृदंगाच्या गजरात, 'ज्ञानोबा- माऊली...

नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी जिल्हा परिषदेच्या पाठीशी राहू – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
सांगली, दि. २७ (जि. मा. का.) : जिल्हा परिषदेच्या योग दिनाच्या कार्यक्रमात साडेपाच लाखांच्या आसपास नागरिक सहभागी झाले. यातून सांगली जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास...

गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी पोलीस दलाने प्रभावी प्रतिबंधात्मक यंत्रणा कार्यान्वित करावी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
पोलीस दादा, पोलीस दीदींनी घरोघरी प्रबोधन करण्याच्या सूचना तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, पोलीस पाटील यांची कार्यशाळा घेण्याचे निर्देश  सांगली, दि. २७ (जि. मा. का.) : कायदा व...