शनिवार, जून 28, 2025
Home Blog Page 406

सिंचन व्यवस्था बळकटीकरणासाठी अन्य राज्यातील सिंचन व्यवस्थेचा तुलनात्मक अभ्यास करावा – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, दि. ७ :-  राज्यातील सिंचन व्यवस्था अधिक बळकट होण्यासाठी राज्यातील सिंचन व्यवस्था व अन्य राज्यातील सिंचन व्यवस्थेचा तुलनात्मक अभ्यास करावा. याचा राज्यातील सिंचन क्षमता वाढविण्यास मदत होईल. या अनुषंगाने जलसंपदा विभागाने कार्यवाही करावी, अशा सूचना जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री श्री. विखे पाटील यांनी आज सह्याद्री अतिथी गृह येथे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडील कामांचा आढावा घेतला. यावेळी  जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, लाभ क्षेत्र विकास सचिव संजय बेलसरे, कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता तथा सह सचिव सर्वश्री अभय पाठक, संजीव टाटू,  अभियंता प्रसाद नार्वेकर यांच्यासह गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळामार्फत सुरू असलेल्या सिंचनाच्या कामांना गती देऊन प्रकल्प कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी कृती आरखडा तयार करावा. बांधकामाधीन प्रकल्पाची कामे जलदगतीने दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करावीत. राज्यातील सिंचन क्षेत्र वाढल्यास त्याचा शेतकऱ्यांना फायदा होऊन त्यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होईल. सिंचन प्रकल्पांच्या नवीन कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता लवकर मिळाव्यात. त्यासाठीचे प्रस्ताव क्षेत्रीय स्तरावरून तातडीने पाठवावेत. सिंचन प्रकल्पाची कामे लवकर सुरू होण्यासाठी आवश्यक परवानग्या मिळवण्यासाठी पाठपुरावा करावा.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि बळीराजा जलसंजिवनी योजनेत समाविष्ट कामे विहित मुदतीत पूर्ण झाली पाहिजेत, अशा सूचना देऊन जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की,  १०० दिवसाच्या कालावधीत घेण्यात येणाऱ्या कामांचे सुयोग्य नियोजन करावे. जलसंपदा विभागाच्या योजनांसाठी आवश्यक निधी मुदतीत मिळण्यासाठी अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत लवकरच बैठक घेतली जाईल.

वॉटर अकांऊटबाबत जागरूकता निर्माण झाली पाहिजे. धरणातील पाणी, धरणातून सोडलेले पाणी, सोडलेल्या पाण्याचा झालेला वापर, आकरलेली व वसूल झालेली पाणीपट्टी  याबाबत जलसंपदा विभागाने सुयोग्य नियोजन करावे, अशा सूचना जलसंपदा मंत्र्यांनी बैठकीत दिल्या.

या बैठकीत गोदावरी खोरे महामंडळांतर्गत येणाऱ्या १०० दिवसांमध्ये ज्या प्रकल्पांचे भमिपूजन अथवा उद्घाटन करणे शक्य असेल अशा प्रकल्पांचा आढावा, प्रकल्पांमध्ये असणारा पाणीसाठा व सिंचनाची सद्यःस्थिती, नदीजोड प्रकल्पाची सद्यःस्थिती, सुरु असणारे प्रकल्प अथवा प्रकल्प घटकांच्या कामांची सद्य:स्थिती, मंजूर प्रकल्पांची सद्यःस्थिती, उपसा जलसिंचन योजना व महत्वाच्या प्रकल्पांची सद्यःस्थिती. यामध्ये प्रामुख्याने साईगंगा उपसा जलसिंचन योजनेचे हस्तांतरण व अंमलबजावणी, साकूर, ता. संगमनेर येथील प्रस्तावित उपसा जलसिंचन योजना, वांबोरी पाईप चारी टप्पा-१ दुरुस्ती / टप्पा-२, भोजापूर ता. संगमनेर येथील जलसिंचन योजना, सहकारी तत्वावर असलेल्या उपसा जलसिंचन योजनांचे तापी जलसिंचन योजनेच्या धर्तीवर नुतनीकरण करणेबाबतचे सादरीकरण, जायकवाडी प्रकल्पाची सद्यःस्थिती (पर्यटन विकास, न्यायालयीन बाबी /अहवाल), करावयाच्या नाविन्यपूर्ण योजनांचा आढावा घेण्यात आला.

०००००

एकनाथ पोवार/विसंअ/

वस्त्रोद्योग मंत्री  संजय सावकारे यांच्या हस्ते आयुक्तालयाच्या संकेतस्थळाचे अनावरण

मुंबई, दि. 7 : वस्त्रोद्योग विभागाने एनआयसी द्वारे (NIC) ‘ स्वास’ प्लॅटफॉर्मवर विकसित केलेल्या वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या https://www.dirtexmah.gov.in या संकेतस्थळाचे वस्त्रोद्योग मंत्री  संजय सावकारे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

मंत्रालयात आज वस्त्रोद्योग विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. यावेळी वस्त्रोद्योग सचिव विरेंद्र सिंह, आयुक्त संजय दैने, उपसचिव श्रीकृष्ण पवार, श्रद्धा कोचरेकर उपस्थित होते.

या संकेतस्थळावर वस्त्रोद्योग विभागाच्या धोरणांतर्गत विविध योजना, अनुदान आणि वस्त्रोद्योग क्षेत्रातील अद्ययावत सर्वसमावेशक माहिती यांचा अंतर्भाव आहे. तसेच हे संकेतस्थळ वापरकर्त्यांना सुलभरित्या हाताळण्यायोग्य बनविण्यात आले आहे. सर्व प्लॅटफॉर्मवर प्रवेशयोग्यता सुनिश्चित करण्यासाठी मोबाइलसारख्या सर्व उपकरणांद्वारे वापरता येईल, अशी सोय करण्यात आली आहे.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

सर्व वाहनांसाठी फास्ट टॅग अनिवार्य

मुंबई, दि. 7 : राज्यातील चार चाकी वाहन धारकांना एक एप्रिलपासून फास्ट टॅग अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

1 एप्रिल 2025 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. या निर्णयामुळे वाहतूक कोंडी टळून इंधनाची आणि वेळेची देखील बचत होणार आहे.

फास्ट टॅग कार्यरत नसेल तर वाहन धारकाला पथकर शुल्काच्या दुप्पट शुल्क भरावे लागेल.  त्याचप्रमाणे रोख रक्कम, स्मार्ट कार्ड, क्रेडिट, डेबिट कार्ड किंवा कोड किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे पथकर शुल्क भरायचे असेल तरी देखील दुप्पट पथकर शुल्क भरावे लागेल.

एमएसआरडीसीच्या अखत्यारीत ५० टोलनाके असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यात २३ टोल नाके आहेत. या नाक्यांवर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

0000

 

राज्यातील कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर

मुंबई, दि. 7 : राज्यातील प्रत्येक कामगाराचा विकास हा केवळ आर्थिक पातळीवर नाही तर सामाजिक, मानसिक आणि शारीरिक पातळीवरही होण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, असे कामगारांना आश्वासित करणारे मत राज्याचे कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी व्यक्त केले.

मंत्रालयात कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी भारतीय मजदूर संघ, विदर्भ प्रदेश यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतली, त्यावेळी मंत्री श्री. फुंडकर बोलत होते. यावेळी भारतीय मजदूर संघाचे  क्षेत्रीय संघटन मंत्री सी. व्ही.राजेश, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲड अनिल ढोमणे, विदर्भ प्रदेश मंत्री रवींद्र गणेशे आणि भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर म्हणाले की, महाराष्ट्र शासनाचे कामगार विषयक धोरण तयार करण्याबाबत  चर्चा करण्यात येईल. तसेच कामगारांसाठी प्रत्येक जिल्ह्यात कामगार विमा रुग्णालय स्थापन करण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल. असंघटित कामगारांच्या विकासासाठी निधी उभारण्याचे नियोजन असून या निधीच्या माध्यमातून असंघटित कामगारांसाठी विमा, आरोग्य या योजना राबवण्याचे विचाराधीन असल्याचे श्री. फुंडकर यांनी सांगितले.

भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींनी यावेळी निवेदन कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांना सादर केले. कामगारांच्या समस्या, त्यांच्या अडचणी आणि कामगार संघटनांच्या मागण्या, त्यांच्या अंमलबजावणीची स्थिती याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली

0000

मोहिनी राणे/ससं/

मुंबईतील हवेची गुणवत्ता फेब्रुवारीपर्यंत उत्तम करण्यासाठी प्रयत्न करावेत – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

मुंबई, दि. 7 : मुंबईतील हवेची गुणवत्ता सध्या असलेल्या पातळीपेक्षा चांगली असणे अपेक्षित आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीची हवा गुणवत्ता पातळी चांगली असली तरीदेखील ही गुणवत्ता पातळी फेब्रुवारीमध्ये उत्तम दर्जापर्यंत सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या. मंत्रालयात आज मुंबईतील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांविषयी बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

मुंबईमध्ये सध्या हवेतील कणांचे प्रमाण (PM 2.5 आणि PM 10) या प्रदूषणात वाढ झाली असल्याचे सांगून पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, हवेतील हे धुली कणांचे प्रमाण कमी करण्यासाठी पायाभूत सुविधांचे अथवा इमारतींचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी स्प्रिंकलरचा वापर बंधनकारक आहे. बांधकामाच्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. अनेक विकास कामे सुरू आहेत. त्याठिकाणी नियमांचे पालन होते का, याची तपासणी करावी. प्रदूषण नियंत्रणात लोकांचा सहभाग वाढावा यासाठी एक ॲप तयार करावे. या ॲपच्या माध्यमातून लोकांना प्रदूषण विषयी तक्रारी करता येतील तसेच संबंधित विभागांना कारवाई करता येईल, अशा सूचनाही मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या.

मुंबईत बेकरी आणि रेस्टॉरंटमधील तंदूर भट्टी यामुळेही प्रदूषणात भर पडत आहे. त्यासाठी या सर्व तंदूर भट्टी इलेक्ट्रिकवर, बेकरी पीएनजी वायुवर चालवण्यासाठी धोरण तयार करावे. तसेच यामध्ये काही अनुदान देण्याचाही अंतर्भाव करावा. प्रदूषण नियंत्रणाचे मासिक वेळापत्रक तयार करावे अशा सूचनाही त्यांनी बैठकीत दिल्या.

मुंबईसह महाराष्ट्रात प्रदूषणाच्या अनेक समस्या आहेत. त्या सोडवणेही महत्वाचे आहे. त्यादृष्टीने पर्यावरण विभागाने आरोग्य, एम एम आर डी ए, महानगरपालिका यांचे बरोबर समन्वय साधून या विविध विभागांच्या बैठका घेऊन त्यांना हवेचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी सूचना द्याव्यात. जल प्रदूषण, घन कचरा व्यवस्थापन, वैद्यकीय कचरा, ध्वनी प्रदूषण या इतर समस्यांवर निश्चित धोरण तयार करावे अशा सूचना मंत्री श्रीमती मुंडे यांनी दिल्या.

सध्याच्या परिस्थितीत नैसर्गिक व हवामान बदलाच्या कारणांमुळेही हवा प्रदूषणात वाढ झाली आहे. तापमानात वाढ झाल्यानंतर प्रदूषण पातळी कमी होईल असे पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

बैठकीस पर्यावरण विभागाच्या सचिव विनिता सिंगल, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे यांच्यासह, बृहन्मुंबई महानगरपालिका, एमएमआरडीए, रस्ते विकास महामंडळ, परिवहन विभाग, पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

००००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

चंद्रपूर जिल्ह्यात नवीन शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालय सुरू करण्याविषयीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवावा – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 7 : राज्याच्या अतिपूर्वेकडील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विविध उद्योग उभारले जात आहेत. त्यामध्ये अनेक प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती होत असून औद्योगिकदृष्ट्या विकसित होत असलेल्या या जिल्ह्यामध्ये कुशल मनुष्यबळाची गरज निर्माण होत आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे नवीन शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालय सुरू करण्याविषयीचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळ बैठकीत आणावा, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी दिल्या.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, चंद्रपूर जिल्हा औद्योगिक विकासाच्या दृष्टिकोनातून अधिक समृद्ध व्हावा, उद्योगासाठी कुशल मनुष्यबळ आणि स्थानिक युवकांना तांत्रिक शिक्षण मिळून रोजगार निर्मिती व्हावी यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत मागणी केली आहे. यासंदर्भातील सविस्तर प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळ बैठकीत ठेवावा. मंत्रिमंडळ बैठकीच्या मान्यतेनंतर यासाठी अधिक गती देऊन महाविद्यालय सुरू करण्यात येईल.

मंत्रालयात आज चंद्रपूर जिल्ह्यात नवीन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीला आमदार सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव, उपसचिव अशोक मांडे, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

 

राज्यात खेळाडूंसाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण करणार – क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. 7 : राज्यात प्रतिभावंत खेळाडू तयार व्हावेत तसेच खेळाडूंची राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी व्हावी, यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणार असून यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

मंत्रालयातील दालनात क्रीडा व युवक कल्याण विभागाची आज आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री श्री. भरणे बोलत होते. आढावा बैठकीसाठी क्रीडा व युवक कल्याण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, आयुक्त हिरालाल सोनवणे, उपसंचालक नवनाथ फडतरे, सुहास पाटील, उदय जोशी यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. भरणे म्हणाले, क्रीडा संकुलाच्या निधीचे सनियंत्रण व वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करावी, आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक विजेत्यांना वेळेत पुरस्कार प्रदान करण्यात यावे, शिवछत्रपती क्रीडा संकुलासह क्रीडा सुविधांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करावा अशा सूचना मंत्री श्री. भरणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीत क्रीडा विभागाचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले.

पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री श्री. भरणे म्हणाले, क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असून युवक कल्याण विभाग, अल्पसंख्याक, औकाफ विभागाच्या माध्यमातून राज्याच्या प्रगतीत भरीव योगदान देणार आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. अल्पसंख्याक घटकांसाठी  कल्याणकारी योजना राबवून त्यांना मुख्य प्रवाहात आणणार आहे.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

 

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई विद्यापीठ आणि सिद्धांता नॉलेज फाऊंडेशनची संयुक्त बैठक संपन्न

मुंबई, दि. 7 : “सिद्धांता नॉलेज फाउंडेशन” (IKS – Indic Knowledge Systems) एक शैक्षणिक  फाऊंडेशन असून भारतीय ज्ञान परंपरा, तत्त्वज्ञान, संस्कृती, आणि इतर प्राचीन शास्त्रांमध्ये असलेल्या ज्ञानाचे संवर्धन, अभ्यास आणि प्रसार करण्याचे काम करत आहे. आयकेएस (Indic Knowledge Systems) सामान्यतः भारताच्या प्राचीन ज्ञान परंपरेचे पुनरावलोकन, संवर्धन आणि आधुनिक संदर्भात त्याचे मूल्यांकन करण्याचे कार्य करते. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अंमलबजावणी करताना या संस्थेचे विद्यापीठाने सहकार्य घ्यावे आणि आराखडा तयार करावा, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बैठकीत सांगितले.

मुंबई विद्यापीठ आणि सिध्दांता नॉलेज फाऊंडेशन (आयकेएस) यांच्या समवेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण संदर्भात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तंजावरचे महाराजा राजे बाबाजी भोसले, गायत्री राजे भोसले, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी,एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू उज्ज्वला चक्रवर्ती, सिद्धांता नॉलेज फाउंडेशनचे अध्यक्ष जयकिशन झवेरी, कार्यकारी संचालक सुदर्शन जी, सत्या अत्रेयम, महाराजा तंजावर टीम प्रीत खोना, वरिष्ठ प्रबंधक प्रमोद निशाणकर  उपस्थित होते.

सिद्धांता नॉलेज फाउंडेशनने तयार केलेला अभ्यासक्रम  विद्यापीठात व महाविद्यालय स्तरावर, भारतीय ज्ञान परंपरेच्या अभ्यासक्रमाशी मॅपिंग करून  युजी आणि पीजीच्या विद्यार्थ्यांसाठी  राजे बाबाजी भोसले, तंजावर व सिद्धांता नॉलेज फाउंडेशनच्या समन्वयाने लागू करता येईल का यावर चर्चा करण्यात आली.

000

काशीबाई थोरात/विसंअ/

 

खनिकर्म विभागातील सर्व कामात सुसूत्रता आणणार – खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई

मुंबई दि. 7 : खनिकर्म विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना व उपक्रमांची अंमलबजावणी प्रभावीपणे  करून सर्व कामकाजामध्ये सुसूत्रता आणणार असल्याचे खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी   सांगितले तसेच खनिकर्म विभागातील सुरू असलेल्या कामांचा आढावा त्यांनी घेतला.

खनिकर्म मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली खनिकर्म विभागाची आढावा बैठक मंत्रालयात झाली. या बैठकीस व्यवस्थापकीय संचालक डॉ.भाऊसाहेब दांगडे, विभागाचे उपमहाव्यवस्थापक डॉ. राव, सह व्यवस्थापकीय संचालक अंजली नगरकर, खनिकर्म विभागाचे सहसचिव लक्ष्मीकांत ढोके तसेच विभागाचे  इतर अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. देसाई यांनी राज्य खनिकर्म महामंडळ व खनिकर्म विभाग, खनिकर्म विभागांतर्गत हाताळण्यात येणारे विषय, खनिज क्षेत्राची इ लिलाव प्रक्रिया जिल्हा खनिज प्रतिष्ठान, निधीचा विनियोग यासंबंधी कामकाजांचा आढावा सादरीकरणाद्वारे घेतला. राज्य खानिकर्म महामंडळ संदर्भात संचालनालयाबाबत सामान्य माहिती, राज्यातील खनिज निहाय खाणपट्टी, महसूल यशस्वीरीत्या लिलाव झालेली खनिज क्षेत्रे,एकात्मिक लीज व्यवस्थापन प्रणाली,तंत्रज्ञान अंमलबजावणी इत्यादी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे संचालनालय मार्फत चालू असलेल्या अन्वेषण प्रकल्पांचा तपशील, लिलाव झालेल्या खनिज क्षेत्राची स्थिती, खनिज उत्पादन इत्यादींचा सविस्तर आढावा मा. मंत्री यांनी घेतला.

तसेच विभागामार्फत मसुदा तयार करून सादर करण्याच्या सूचना मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या

पुढील १०० दिवसांत खनिकर्म विभागांतर्गत घ्यावयाच्या कामांचे सादरीकरण या बैठकीत करण्यात आले. निष्पादन झालेल्या आठ खाणक्षेत्रांपैकी चुनखडक या खनिजाच्या एक खाणपट्ट्याचे कार्यान्वयन करणे, जास्तीत जास्त खाणपट्टी लिलावास काढण्यासाठी राज्यांमध्ये अन्वेषण वाढविणे, एकात्मिक खाणपट्टा व्यवस्थापन, संगणकीय प्रणाली २.० लागू करणे, महाजेनको- एमएसएमसी- कोल वॉशरी यांच्या कामामध्ये सुसूत्रता आणणे, महसूल वाढीच्या दृष्टीने २०१५ च्या अधिसूचनेनुसार घोषित गौण खनिजांचे पुनर्वर्गीकरण करून त्यांचे   संनियंत्रण खनिकर्म विभागाकडे घेणे याबाबत चर्चा करण्यात आली.

****

संध्या गरवारे/विसंअ/

माजी सैनिकांच्या कल्याणासाठी योजना प्रभावीपणे राबवणार – माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई

मुंबई दि. 7 : माजी सैनिकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेवून आवश्यक तिथे सुधारणा करण्याबाबत प्रस्ताव सादर करावा असे निर्देश माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

माजी सैनिक कल्याण महामंडळाची मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस महाराष्ट्र माजी सैनिक कल्याण महामंडळाचे सचिव  डॉ.प्रशांत नारनवरे  उपस्थित होते.

मंत्री श्री. देसाई म्हणाले की, माजी सैनिक कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, स्वयंरोजगाराच्या योजनांसाठी नव्याने आवश्यक तिथे सुधारणा करण्याबाबत सर्व योजनांचा आढावा घ्यावा. माजी सैनिकांसाठी आलेला शंभर टक्के निधी खर्च करून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी असेही मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील अधिकाधिक तरुणांना भारतीय सैन्यदलांमध्ये अधिकारी म्हणून रुजू होण्यास प्रोत्साहन देण्याच्या हेतूने छत्रपती संभाजीनगर येथे स्थापन करण्यात आलेल्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाच्या संचालक मंडळाची रचना, कार्ये आणि जबाबदाऱ्या, उपलब्धी, कार्यालयीन मनुष्यबळ यांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.

****

संध्या गरवारे/विसंअ/

ताज्या बातम्या

सरन्यायाधीश पदापर्यंतच्या प्रवासात नागपूरचे योगदान महत्वपूर्ण – सरन्यायाधीश भूषण गवई  

0
नागपूर, दि २७ : नागपूर शहरासोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. दरवर्षी धम्मप्रवर्तन दिनी आई- वडीलांसोबत दिक्षाभूमीवर येत असे. पुढे वकिली व न्यायदान क्षेत्रात नागपूर जिल्हा व...

‘संवादवारी’च्या प्रदर्शनाला सणसर येथे वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
पुणे, दि.२७: डोक्यावर विठ्ठल-रुखमाईची मूर्ती, तुळशी वृंदावन, हातात टाळ, वीणा, भागवत धर्माचा पताका हाती घेत पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरकडे मार्गस्थ वारकऱ्यांची पाऊले माहिती व...

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे इंदापूर तालुक्यात आगमन

0
पुणे, दि. २७: 'हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी ' या भावनेसह, टाळ-मृदंगाच्या गजरात, 'ज्ञानोबा- माऊली...

नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी जिल्हा परिषदेच्या पाठीशी राहू – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
सांगली, दि. २७ (जि. मा. का.) : जिल्हा परिषदेच्या योग दिनाच्या कार्यक्रमात साडेपाच लाखांच्या आसपास नागरिक सहभागी झाले. यातून सांगली जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास...

गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी पोलीस दलाने प्रभावी प्रतिबंधात्मक यंत्रणा कार्यान्वित करावी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
पोलीस दादा, पोलीस दीदींनी घरोघरी प्रबोधन करण्याच्या सूचना तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, पोलीस पाटील यांची कार्यशाळा घेण्याचे निर्देश  सांगली, दि. २७ (जि. मा. का.) : कायदा व...