शनिवार, जून 28, 2025
Home Blog Page 405

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; अधिसूचना महाराष्ट्राला सुपूर्द

नवी दिल्ली, दि. ८ : मराठी भाषेला अभिजात भाषेचा मान मिळाल्याबाबतची अधिसूचना आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द केली असल्याची माहिती मंत्री श्री. सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे, अभिजात भाषा पाठपुरावा समितीचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळे तसेच ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप ढवळ व राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. शामकांत देवरे उपस्थित होते.

मराठी भाषेला मान मिळाल्याचा अभिमान

मंत्री श्री. सामंत यांनी या ऐतिहासिक प्रसंगी आनंद व्यक्त करत पत्रकारांना सांगितले की, ११ वर्षांपूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव पाठवला होता. तेव्हा ते मराठी भाषेचे राज्यमंत्री होते. याबाबतची अधिसूचना आज स्वीकारताना त्याच विभागाचा मंत्री आहे, हा मोठा योगायोग आहे. महाराष्ट्राच्या प्राकृत भाषेला हा मान मिळाल्याचा अभिमान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

प्रधानमंत्री मोदींचे महाराष्ट्राच्या जनतेकडून आभार

महाराष्ट्राच्या जनतेच्यावतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानत, मंत्री श्री. सामंत यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.

मराठी भाषेच्या विकासासाठी निधीची मागणी

केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्री. शेखावत यांच्याशी झालेल्या भेटीमध्ये मंत्री श्री. सामंत यांनी महाराष्ट्राच्या प्राकृत भाषेला निधीची अधिक उपलब्धता करून देण्याची विनंती केली. तसेच पुण्यात होणाऱ्या आगामी विश्व मराठी संमेलनाला केंद्रीय मंत्री श्री.शेखावत यांनी येण्याचे मान्य केले असल्याची माहितीही त्यांनी दिली. दिल्लीच्या साहित्य संमेलनाच्या पाठीशी राज्य शासन उभे असल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

पुढील महिन्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर अभिजात भाषेचा दर्जा हा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. मागील वर्षीपासून साहित्य संमेलनासाठी राज्य शासनाने दोन कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला असून यावर्षीही तेवढीच मदत दिली जाईल, असे मंत्री श्री. सामंत म्हणाले. दिल्लीतील मराठी शाळा सुदृढ करण्यासाठी महाराष्ट्र सरकार विशेष प्रयत्न करेल, असे मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

००००

विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत प्रशिक्षण सुद्धा महत्वाचे-  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. ८ : शिक्षण विद्यार्थ्यांना ज्ञान आणि सैद्धांतिक माहिती प्रदान करते तर प्रशिक्षण त्यांच्या कौशल्यांची आणि प्रत्यक्ष अनुभवाची जोपासना करते.  विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात  यशस्वी होण्यासाठी शिक्षणासोबतच प्रशिक्षणही अत्यंत महत्त्वाचे असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

मुंबईत आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांची छात्र संसदेच्या विद्यार्थ्यांनी भेट घेतली. विविध राज्यातील विद्यार्थी महाराष्ट्र आणि गोवा दौऱ्यावर आहेत. या विद्यार्थ्यांची मंत्री श्री.पाटील यांनी विचारपूस केली.

मंत्री श्री.पाटील म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २१ व्या शतकातल्या युवकांचे विचार, आशा आणि आकांक्षा लक्षात घेऊन नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे. यामध्ये आंतरशाखीय विषयांच्या अभ्यासावर भर, शिक्षणाची उपलब्धता आणि शिक्षणामध्ये प्रवेश, मातृभाषेमध्ये शिक्षण,जागतिक एकात्मतेवर भर यावर अधिक लक्ष केंद्रित करून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे.त्याची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.त्यामुळे शिक्षण आणि प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार आहे. प्रशिक्षण विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक ज्ञानाची व्यावहारिक उपयुक्ततता शिकवते, जे पुढे जाऊन त्यांना नोकरी मिळवण्यासाठी उपयुक्त ठरते, असे सांगून मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला विद्यार्थ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे असेही सांगितले.

००००

‘जागतिक स्पर्धेसाठी जग खुलं आहे, संधीचे सोने करा’ – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचा विद्यार्थ्यांना कानमंत्र

जळगाव, दि. 8 जानेवारी (जिमाका) : सध्याच्या युगात प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी सर्वसामान्यांना शिक्षण आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी संशोधनपर अभ्यासक्रमावर भर द्यावा. कारण आता जग तुमच्यासाठी खुले आहे. त्यामुळे वेळ वाया न घालविता संधीचे सोने करा असा कानमंत्र राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना दिला.

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. केतकी पाटील सभागृहात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी मंचावर गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, संचालिका केतकी पाटील उपस्थित होते.

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पो.अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, निवासी उपजिल्हाधिकारी भिमराव दराडे, जळगाव उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, सचिव डॉ. वर्षा पाटील, डॉ. सुहास बोरले, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, डॉ. अनिकेत पाटील, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ एन. एस. आर्विकर, डॉ. माया आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके, गोदावरी आयएमआरचे संचालक डॉ. प्रशांत वारके उपस्थित होते.

राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले की, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी वैद्यकीय महाविद्यालयासह अनेक शैक्षणिक संस्था उभारून भविष्यातील नेतृत्व घडविण्याचे कार्य केले आहे. देश आणि राज्यातील सरकारने आता दुर्गम भागातही शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच नवीन शैक्षणिक धोरण देखील आता अंमलात येत असल्याने विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या संधीचे सोने करावे, असा कानमंत्रही राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

शिक्षण हे केवळ ज्ञान मिळवण्याचे साधन नसून ते व्यक्तिमत्त्व घडवणे, मूल्ये रुजवणे आणि समाजाची करुणा व समर्पणाने सेवा करण्यासाठी असते असे सांगून डॉ. उल्हास पाटील यांच्या नेतृत्वात यांची महाविद्यालये प्रभावी शिक्षण देत असल्यामुळे ‘नॅक’ नी नामांकन देऊन त्यांच्या अभ्यासक्रमांना प्रभावी श्रेणी दिल्याचे राज्यपालांनी यावेळी अधोरेखित केले.

सप्टेंबरमध्ये जळगावला भेट दिल्याचे केले स्मरण

सप्टेंबरमध्ये जळगावला आपण भेट दिली तेव्हा या भागाच्या प्रगतीसाठी असलेल्या अपार संधींनी मला प्रभावित केले. येथील विमानतळ लवकरच विस्तारित होणार असून त्यामुळे या भागाच्या दळणवळणात मोठी सुधारणा होऊन विकासाच्या अधिक संधी चालून येतील असे सांगून उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा प्रगती आणि विकासाचे केंद्र म्हणून जलद गतीने पुढे येत आहे. अशा वेळी हे वैद्यकीय महाविद्यालय आधुनिक आरोग्यसेवेचे केंद्र बनू शकते, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले.

आपली आरोग्य सेवा जगभरात नावाजली जात आहे मात्र, उत्कृष्टतेसोबतच आरोग्यसेवा सर्वांसाठी सुलभ व परवडणारी असणे आवश्यक आहे. आपल्याला आरोग्यसेवेची उत्कृष्टता आणि परवडणारा दर्जा यांचा समतोल साधावा लागणार असल्याचे राज्यपालांनी यावेळी विशद केले.

राज्यपालांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनात असलेले प्रश्न राज्यपालांना विचारले, राज्यपालांनी यावेळी विद्यार्थ्यांना सोशल मीडियावर अधिक वेळ न घालवता अधिकाधिक ज्ञान अवगत करून घेण्याचा सल्ला दिला.

राज्यपालांनी केली नेत्र विभागाची पाहणी

राज्यपाल राधाकृष्णन यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ.एन.एस.आर्विकर यांच्याकडून नेत्ररोग विभागातील रूग्णांची माहिती जाणून घेतली व येथील रुग्णांशी संवाद साधला. याठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.प्रशांत सोळंके यांनी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे स्वागत केले. याप्रसंगी अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, डॉ.सुहास बोरले, सदस्या डॉ.केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील, डॉ.अनिकेत पाटील, डॉ.नि.तु.पाटील, डॉ.रेणुका पाटील आदी उपस्थित होते.

0 0 0 0 0 0 0 0 0 0

अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी योजनांची प्रभावी अंमलबाजवणी करावी- मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. ८ :– अल्पसंख्याक समाजाचा  सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास करण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. या योजनांची प्रभावी अमंलबजावणी करावी, नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या सूचना अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या. अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी निधी कमी पडू देणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

मंत्री श्री. भरणे यांनी आज मंत्रालयात अल्पसंख्याक विकास विभागाचा आढावा घेतला. यावेळी सचिव रुचेश जयवंशी, सहसचिव मोईन ताशिलदार, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. भरणे म्हणाले की, अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहीत आणण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी शासन कटिबद्ध आहे. अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजना, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचा निधी वाढविण्यासाठी पाठपुरावा करणे, स्वयंसहायता बचतगट योजना महत्वपूर्ण आहेत. या विभागाच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा, अशी सूचनाही त्यांनी केली.

0000

युवकांनो ड्रग्स फ्री समाज घडविण्यासाठी सैनिक म्हणून पुढे या -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे,दि.०८(जिमाका):- देशाचे आणि समाजाचे नुकसान करीत असलेल्या न दिसणाऱ्या शत्रूशी लढण्यासाठी समाजाने एकत्र येणे आवश्यक आहे. ड्रग्स व तत्सम अंमली पदार्थांच्या माध्यमातून काही लोक समाज पोखरण्याचे दुष्कर्म करीत आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी सजग राहा, सैनिक म्हणून पुढे या, हीदेखील एक प्रकारची देशभक्ती आणि समाजाची सेवा आहे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते आज नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित “नशामुक्त नवी मुंबई” अभियानाचे नवी मुंबई, वाशी येथील सिडको ऑडिटोरियम येथे उद्घाटन संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी वनमंत्री गणेश नाईक, प्रख्यात अभिनेता आणि “नशामुक्त नवी मुंबई” या उपक्रमाचे आयकॉन जॉन अब्राहम, आमदार मंदा म्हात्रे, प्रशांत ठाकूर, महेश बालदी, विधानपरिषद सदस्य विक्रांत पाटील, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, संजय येनपुरे, पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे, प्रशांत मोहिते, रश्मी नांदेडकर, संजयकुमार पाटील, महाविद्यालयीन विद्यार्थी, नशामुक्तीचे काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आदी उपस्थित होते.

“Art of silence” या मूकनाट्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तर या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या हस्ते “नशामुक्त नवी मुंबई” अभियानाच्या चित्रफितीच्या प्रकाशनाने संपन्न झाले.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस पुढे म्हणाले की, ड्रग्समुळे स्वतःच्या आयुष्यासोबत आपण देशाचेही नुकसान करतो हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. प्रवाहासोबत जाणारे अनेक असतात, परंतू चांगले करण्यासाठी प्रवाहाविरुद्ध जावे लागते, त्यासाठी शारीरिक ताकदीपेक्षा मानसिक ताकद गरजेची आहे. “नशामुक्त नवी मुंबई” हे अभियान अतिशय महत्वाचे आहे. गृह खात्याच्या पहिल्याच बैठकीत पोलिसांना सांगितले की, आपल्याला ड्रग्स विरुद्ध मोठी लढाई लढायची आहे. सरळ लढाई करता येत नाही म्हणून अंमली पदार्थांच्या देश पोखरण्याचा प्रयत्न केला जातोय.

ते म्हणाले, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी गृह विभागासंबंधी घेतलेल्या बैठकीत कॅनडाचे उदाहरण दिले. ड्रग्जमुळे कॅनडा सामाजिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडून पडला. मात्र भारत ड्रग्जविरूद्धची ही लढाई जिंकू शकतो. देशातील सर्व राज्यांनी एकमेकांना सहकार्य करीत ही लढाई एकत्र लढायला हवी. सर्वांनी एकत्र येवून संपूर्ण भारत ड्रग्स मुक्त करायचा आहे, हा आपला निर्धार असायला हवा. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या ८८२८ ११२ ११२ या टोल फ्री क्रमांकाचा प्रभावी वापर करा.

शेवटी श्री.फडणवीस यांनी नशामुक्तीसाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने घेतलेल्या पुढाकाराबद्दल नवी मुंबई पोलीस दलाचे अभिनंदन केले. तसेच सेलिब्रिटी म्हणून जॉन अब्राहम यांच्या कामाबद्दलही कौतुक केले. आणि पुन:श्च एकदा निर्धार करु या नशामुक्तीसाठी लढण्याचा, “ड्रग्स फ्री नवी मुंबई” करण्यासाठी सैनिक होण्याचे उपस्थितांना आवाहन केले.

अभिनेता जॉन अब्राहम यांनी आपल्या मनोगतात “नशामुक्त नवी मुंबई” या अभियानाच्या आयोजनाबद्दल नवी मुंबई पोलिसांचे अभिनंदन करून आपले आयुष्य हे शिस्तमय असावे. आपण आपल्या आचरणाने मित्र परिवारामध्ये आदर्श निर्माण करावा आणि एक उत्तम नागरिक म्हणून जगावे, असे आवाहन उपस्थित युवकांना केले.

याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, चांगल्या कामाचा ध्यास, हीच खरी नशा आहे. सर्वांनी चांगल्या कामाचा ध्यास घ्यावा. नवी मुंबई महानगरपालिका सर्व आघाड्यांवर प्रथम क्रमांकावर आहे. तसेच नशामुक्त अभियानातही अव्वल राहील, हा विश्वास आहे.

सुरुवातीस नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी आपल्या प्रास्ताविकात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने आतापर्यंत राबविलेल्या विविध उपक्रमांची थोडक्यात माहिती दिली.

00000

राज्यपालांच्या सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते जानकीदेवी बजाज पुरस्काराने वीणा उपाध्याय सन्मानित

मुंबई, दि.८ : आयएमसी चेंबर महिला विभागातर्फे देण्यात येणारा ३१ वा.’जानकीदेवी बजाज पुरस्कार’ श्रीजनी फाउंडेशनच्या संस्थापिका वीणा उपाध्याय यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

श्रीमती उपाध्याय यांनी बावनबुटी साडी विणणाऱ्या महिला कारागिरांना प्रोत्साहन देऊन या कलेचे पुनरुज्जीवन करताना बिहारमधील ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविल्याने हा पुरस्कार मिळत आहे.

आयएमसी सभागृहात मंगळवारी झालेल्या या कार्यक्रमाला आयएमसी महिला विभागाच्या अध्यक्ष ज्योती दोशी, उपाध्यक्ष राज्यलक्ष्मी राव, जानकीदेवी बजाज पुरस्कार समितीच्या अध्यक्षा नयनतारा जैन, उद्योगपती शेखर बजाज, नीरज बजाज तसेच बजाज कुटुंबातील सदस्य व निमंत्रित उपस्थित होते.

००००

Maharashtra Governor presents IMC Ladies Wing

‘Jankidevi Bajaj Award to VeenaUpadhyaya

Mumbai Dated 8 :Maharashtra Governor C.P. Radhakrishnan presented the 31st IMC Ladies Wing Janki Devi Bajaj Award to VeenaUpadhyaya,  Founder Secretary and CEO of Srijani Foundation and Bun.Kar Bihar on Tue (7 Jan). The award was presented for her work in the area of promoting entrepreneurship among rural women by rejuvenating the dying art of weaving BaavanbutiSaree.

President of IMC Ladies’ Wing JyotiDoshi, Vice President RajyalakshmiRao, Chairperson of Janki Devi Bajaj Puraskar committee Nayantara Jain, members of Jury and members of the Bajaj family were present.

0000

संग्रहालयांच्या माध्यमातून सांस्कृतिक श्रीमंतीचे दर्शन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ८ :- एखाद्या शहराची श्रीमंती ही तिथे राहणाऱ्या श्रीमंत लोकांवरून नाही, मोठ्या इमारती वरून नाही तर तेथील संग्रहालयांच्या माध्यमातून दिसून येते. जगातील सर्व चांगल्या शहरांमध्ये उत्तम अशी संग्रहालये आहेत. असेच एक उत्तम संग्रहालय आपण खुले करत असल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. बृहन्मुंबई महापालिकेच्या वतीने नूतनीकरण करण्यात आलेल्या डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

संग्रहालयाच्या माध्यमातून त्या देशाची, शहराचीसंस्कृती, लोक जीवन आणि इतिहास कळतो, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, आपला ऐतिहासिक वारसा भावी पिढीला पाहता यावा हा संग्रहालय उभारणीचा उद्देश आहे. आतापर्यंत झालेला विकास आणि त्यासाठी झालेली स्थित्यंतरे भावी पिढीला समजणे आवश्यक आहे. भारत हा जगातील सर्वात जुनी संस्कृती आजही नांदत असलेला एकमेव देश आहे. आपला देश संस्कृतीची खाण आहे. ती आपण जपली पाहिजे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, डॉ. भाऊ दाजी लाड हे डॉक्टर होते. पण त्यांनी आपले सर्व जीवन समाजासाठी समर्पित केले. ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी मोलाचे कार्य केले. त्यांनी या संग्रहालयातील अनेक वस्तू दिल्या आणि गोळाही केल्या. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून या संग्रहालयास ५० वर्षापूर्वी डॉ. भाऊ दाजी लाड यांचे नाव देण्यात आले. आज ५० वर्षानंतर त्यांच्या नावाचे हेच संग्रहालय नव्या रुपात जनतेसाठी खुले करताना मोठा आनंद होत आहे. पर्यटकांसाठी हे संग्रहालय एक आकर्षण असेल.  यातील वस्तू, दुर्मिळ छायाचित्रे या माध्यमातून लोकांना एक वेगळा अनुभव मिळेल. या संग्रहालयाच्या नूतनीकरणासाठी हातभार लावलेल्या सर्वांचे अभिनंदन करतो असेही श्री.फडणवीस म्हणाले.

कार्यक्रमास कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार मिलिंद देवरा, आमदार राजहंस सिंह, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, अमित सैनी, तस्मिन मेहता यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००

केंद्रीय निधीचा उपयोग करून राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करावी – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव 

मुंबई, दि. 7 : केंद्र शासन आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी विविध योजना राबवित असते. यासाठी कार्यक्रम कृती आराखडा (पीआयपी) अंतर्गत निधी राज्याला देत असतो. या निधीचा उपयोग करून राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करावी, असे निर्देश केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले.

आरोग्य भवन येथे आयोजित बैठकीत आरोग्य, आयुष आणि वैद्यकीय शिक्षण संबंधात राबविण्यात येत असलेल्या केंद्र शासनाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. बैठकीस आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री श्री. जाधव म्हणाले, केंद्र व राज्य यांच्या समन्वयातून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा जास्तीत जास्त लाभ पात्र नागरिकांना देण्यात यावा. या योजनेच्या माध्यमातून 70 वर्ष व त्यावरील वृद्धांना राज्याचे महात्मा फुले जन आरोग्य अभियान व केंद्राच्या योजनेतून दहा लाख रुपयांपर्यंत वार्षिक उपचारांचा लाभ देण्यात येत आहे. आरोग्य क्षेत्रात पायाभूत सोयी सुविधांच्या कामांना अधिक गती देऊन ती वेळेत पूर्ण करावी, असे निर्देशही बैठकीत विभागांना देण्यात आले.

केंद्र सरकारने 2025 मध्ये देश क्षयरोगमुक्त करण्याचे ठरविले आहे. यामध्ये १०० दिवसांचे क्षयरोगमुक्त भारत अभियान राबविण्यात येत आहे. क्षयरोग मुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी नि:क्षय मित्र जास्तीत जास्त जोडण्यात यावेत. दत्तक रुग्णांना नियमित फूड बास्केटचे वितरण करावे. देशात ‘ देश का प्रकृती परीक्षण ‘ अभियान राबविण्यात आले आहे. या अभियानातून नागरिकांचे प्रकृती परीक्षण करण्यात आले आहे. याबाबत जनजागृती करावी व नियमित स्तरावर राबविण्यात यावेत. केंद्रीय आरोग्य निधी योजनेअंतर्गत 15 लाख रुपयापर्यंत उपचारासाठी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मदत करण्यात येते. या योजनेचा प्रचार व प्रसार करावा, अशा सूचनाही केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री श्री. जाधव यांनी दिल्या.

बैठकीत सार्वजनिक आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आयुष विभागाकडील योजना आणि नवीन रुग्णालय निर्मिती, वैद्यकीय शिक्षण विभाग, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

तसेच याप्रसंगी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुरू असलेली आरोग्य संस्थांची बांधकामे, आयुष्मान आरोग्य मंदिर सेवा, माता बालआरोग्य, मानसिक आरोग्य, क्षयरोग मुक्त भारत अभियान , योगा प्रशिक्षण, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजना, अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग अंतर्गत केंद्र शासनाने मंजूर केलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या कामाच्या प्रगतीचा आढावाही घेण्यात आला.

या बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. निपुण विनायक, प्रधान सचिव नविन सोना, वैद्यकीय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारे, भारत सरकारचे राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक हर्ष मंगला, सहसचिव किरण वासका, वंदना जैन, आरोग्य सेवा आयुक्त अमगोथू श्री रंगा नायक, आयुक्त वैद्यकीय शिक्षण राजीव निवतकर, वस्तू खरेदी प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत डांगे, राज्य विमा योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, अन्न व औषध प्रशासन आयुक्त राजेश नार्वेकर, विविध विभागाचे संचालक व अधिकारी उपस्थित होते.

००००

नीलेश तायडे/विसंअ/

 

विद्यार्थ्यांना येणाऱ्या शैक्षणिक अडचणी तातडीने दूर कराव्यात – मंत्री अतुल सावे

मुंबई, दि. ७ : इतर मागास प्रर्वगातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व वसतिगृह मिळण्याबाबत तसेच येणाऱ्या शैक्षणिक अडचणी तातडीने दूर करून या कामाला प्राधान्य द्यावे, असे इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

मंत्री श्री. सावे यांच्या अध्यक्षतेखाली आज विभागाची आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती.

मंत्री श्री. सावे म्हणाले की, इतर मागास प्रर्वगातील मुला-मुलींसाठी वसतिगृहे सुरु करण्याबाबत जागा उपलब्ध होत नसेल, तर संबंधित जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि  जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वय साधून यावर तातडीने मार्ग काढावा. विभागांतर्गत सुरू करण्यात येणारी वसतिगृह ही सर्व सोयीसुविधा युक्त असावीत. विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे काम हे लोकांशी संबंधित योजनांशी आहे. त्यामुळे या  विभागाच्या योजना या ऑनलाईन कराव्यात. विभागांतर्गत सुरू करण्यात आलेल्या महामंडळाच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून घ्याव्यात.

मंत्री श्री. सावे म्हणाले की, उद्योगांसाठी आवश्यक असलेले तांत्रिक प्रशिक्षण देणाऱ्या आयजीटीआर या  प्रशिक्षण संस्थेशी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)  या संस्थेने सामंजस्य करार केला आहे. यानुसार उद्योगासाठीच्या तांत्रिक  प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना सहाय्य केले जाणार आहे. दर्जेदार प्रशिक्षण देण्याचे मोलाचे कार्य महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व‎ प्रशिक्षण संस्था (महाज्योती) करीत आहे. महाज्योती संस्थेच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम आलेल्या मैत्रेयी अविनाश जमदाडे हिचा नुकताच नायगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना, आश्रमशाळांच्या संच मान्यता, बंद पडलेल्या आश्रमशाळांचा आढावा, धनगर समाजाच्या विकासासाठीच्या विशेष योजना, मॅट्रिकोत्तर व मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेच्या प्रलंबित प्रकरणांचा  आढावा, इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या इतर योजना, याबाबतचा आढावाही मंत्री श्री. सावे यांनी या बैठकीत घेतला.

या बैठकीस इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल तसेच महाज्योती, अमृत या संस्थेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

 

 

आर्टीच्या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा

मुंबई, दि. ७ : मातंग समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक  असा सर्वांगीण विकास करण्यासाठी अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (आर्टी) स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेची नोंदणी पूर्ण झाली असून, मातंग समाज आणि त्यातील तत्सम जातींच्या उन्नतीकरिता विविध कौशल्य प्रशिक्षण, स्पर्धा पूर्व प्रशिक्षण योजना राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी मातंग समाजातील उमेदवारांनी आपल्या आवडीनुसार स्पर्धा परीक्षा, कौशल्य प्रशिक्षणाचे गुगल फॉर्म भरण्याचे आवाहन आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे यांनी केले आहे.

उमेदवारांनी गुगल फॉर्म भरल्यानंतर त्यांनी निवडलेल्या कौशल्य प्रशिक्षणानुसार त्यांच्या अर्जाची छाननी करुन त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कौशल्य प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. जे उमेदवार स्वयंरोजगार करण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांना व्यवसायाकरिता आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी ऑनलाईन गुगल फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. असे व्यवस्थापकीय संचालक श्री. वारे यांनी सांगितले.

असे आहेत प्रशिक्षण कोर्सेस

स्पर्धा परीक्षा : एमपीएससी, युपीएससी, बॅंक (आयबीपीएस), रेल्वे, जेईई- नीट, युजीसी- नेट/सेट, पोलीस/ मिलीटरी,

कौशल्य विकास : परदेशात नोकरी व शिक्षणाची संधी, शेतीपूरक व्यवसाय प्रशिक्षण, हार्डवेअर व सॉफ्टवेअर, तसेच कम्प्युटर सर्टिफिकेट संदर्भतील कोर्सेस.

योजना : पीएच. डी, पोस्ट पीएच.डी संशोधनासाठी अभिछात्रवृत्ती (फेलोशिप)

असा अर्ज करावा :

  • इच्छुक उमेदवारांनी https://arti.org.in या आर्टीच्या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्डवर गुगल लिंक व स्कॅनर देण्यात आले आहे.
  • उमेदवारांना गुगल लिंक किंवा स्कॅन करुन संपुर्ण फार्म भरता येईल.

0000

शैलजा पाटील/विसंअ/

 

ताज्या बातम्या

सरन्यायाधीश पदापर्यंतच्या प्रवासात नागपूरचे योगदान महत्वपूर्ण – सरन्यायाधीश भूषण गवई  

0
नागपूर, दि २७ : नागपूर शहरासोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. दरवर्षी धम्मप्रवर्तन दिनी आई- वडीलांसोबत दिक्षाभूमीवर येत असे. पुढे वकिली व न्यायदान क्षेत्रात नागपूर जिल्हा व...

‘संवादवारी’च्या प्रदर्शनाला सणसर येथे वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
पुणे, दि.२७: डोक्यावर विठ्ठल-रुखमाईची मूर्ती, तुळशी वृंदावन, हातात टाळ, वीणा, भागवत धर्माचा पताका हाती घेत पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरकडे मार्गस्थ वारकऱ्यांची पाऊले माहिती व...

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे इंदापूर तालुक्यात आगमन

0
पुणे, दि. २७: 'हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी ' या भावनेसह, टाळ-मृदंगाच्या गजरात, 'ज्ञानोबा- माऊली...

नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी जिल्हा परिषदेच्या पाठीशी राहू – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
सांगली, दि. २७ (जि. मा. का.) : जिल्हा परिषदेच्या योग दिनाच्या कार्यक्रमात साडेपाच लाखांच्या आसपास नागरिक सहभागी झाले. यातून सांगली जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास...

गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी पोलीस दलाने प्रभावी प्रतिबंधात्मक यंत्रणा कार्यान्वित करावी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
पोलीस दादा, पोलीस दीदींनी घरोघरी प्रबोधन करण्याच्या सूचना तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, पोलीस पाटील यांची कार्यशाळा घेण्याचे निर्देश  सांगली, दि. २७ (जि. मा. का.) : कायदा व...