शनिवार, जुलै 5, 2025
Home Blog Page 382

नवीन आणि सशक्त महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प करूया – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर राष्ट्रध्वजाला वंदन

मुंबई, दि. २६ : सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित समारंभात दिली. सर्वांनी एकत्र येऊन नवीन आणि सशक्त महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प करूया आणि एक ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करूया, असे आवाहन त्यांनी केले.

भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथे आयोजित मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला वंदन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) डॉ. निखिल गुप्ता, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, तिन्ही सेना दलांचे वरिष्ठ अधिकारी, राज्यपालांच्या पत्नी सुमती, दक्षिण ऑस्ट्रेलिया राज्याचे मंत्री जो. झेकॅक्स, विविध देशांच्या वकिलातीमधील वरिष्ठ पदाधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, वीर सावरकर आणि सर्व महान नेते आणि समाजसुधारक यांना अभिवादन करून राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी राज्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या १०० दिवसांत लोककल्याणासाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांना गती देण्यासाठी सर्व विभागांना आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. याचबरोबर सर्व सरकारी सेवा सामान्य लोकांपर्यंत पोहोचत असल्याची खात्री करण्यासाठी ऑनलाइन आणि मोबाइल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

सरकारी कामाला गती देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चा उपयोग केला जात आहे. गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ‘महापे’ येथे सायबर सुरक्षा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे, ज्यामुळे पोलिसांना गुन्ह्यांच्या तपासात मदत होईल. थेट विदेशी गुंतवणुकीसाठी (एफडीआय) महाराष्ट्र हे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण राहिले आहे आणि एफडीआय आकर्षित करण्यात राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे, ही अतिशय अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. खरीप हंगाम २०२३ करिता कापूस व सोयाबीन उत्पादन करणाऱ्या राज्यातील ६८ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये २ हजार ८०० कोटींहून अधिक रकमेची आर्थिक मदत जमा करण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले.

उदंचन जलविद्युत प्रकल्प धोरणांतर्गत, सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) द्वारे ३८ प्रकल्पांसाठी सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या प्रकल्पांमुळे ५५,९७० मेगावॅट वीज निर्मिती करण्यात मदत होईल आणि २.९५ लाख कोटी इतकी गुंतवणूक आकर्षित होईल. याशिवाय ९०,३९० रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय घेण्याची भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आलेली आहे. याअंतर्गत राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील विवाहित महिला, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला आणि अशा कुटुंबातील एका अविवाहित महिलेला १५०० रुपये प्रति महिना दिला जात असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. या योजनेंतर्गत जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत सुमारे २ कोटी ४६ लाख महिला लाभार्थ्यांना सुमारे २१ हजार कोटी रुपयांचा आर्थिक लाभ देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी ऑलिम्पिक स्पर्धेतील पदक विजेत्यांसाठी रोख बक्षिसामध्ये ४ ते ५ पटीने वाढ करण्यात आलेली असून जागतिक स्तरावरील स्पर्धेत पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना देण्यात येणाऱ्या रोख पारितोषिकांच्या रकमेत देखील दहा पटीने वाढ करण्यात आली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी राज्यपाल यांच्या भाषणाचा मराठी अनुवाद अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी वाचून दाखवला.

संचलनात विविध पथकांचा सहभाग

यावेळी झालेल्या संचलनात भारतीय नौदल, गोवा पोलीस, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल, बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र दल, बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दल, मुंबई लोहमार्ग पोलीस दल, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याचे सी-६० पथक, गृहरक्षक दल (पुरुष), बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, गृहरक्षक दल (महिला), राज्य उत्पादन शुल्क विभाग, वन विभाग, मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल, सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा, नागरी संरक्षण दल (पुरुष/ महिला), राष्ट्रीय सेवा योजना (मुले/मुली) एम.सी.एम गर्ल्स हायस्कूल काळाचौकी, सी. कॅडेट कोअर (मुली), सी. कॅडेट कोअर (मुले), रोड सेफ्टी पेट्रोल (मुली) रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल, दहिसर मुंबई, रोड सेफ्टी पेट्रोल (मुले) डॉ. अँटोनिओ डासिल्वा हायस्कूल दादर, मुंबई, रोड सेफ्टी पेट्रोल (मुली) अंजुमन ए इस्माईल हायस्कूल, बांद्रा मुंबई, रोड सेफ्टी पेट्रोल (मुले) रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल, दहिसर मुंबई, रोड सेफ्टी पेट्रोल (मुली) मनपा शाळा पंतनगर, घाटकोपर (पूर्व) मुंबई, रोड सेफ्टी पेट्रोल मनपा माणिकलाल एम. पी. एस इंग्लिश हायस्कूल, घाटकोपर मुंबई, स्टुडन्ट पोलीस कॅडेट (मुले-मुली) बृहन्मुंबई महानगरपालिका ब्रास बँड पथक, पाईप बँड पथक, महिला निर्भया वाहन पथक, नौदलाची वाहने, अग्निशमन दलाची वाहने आदींनी सहभाग घेतला. कमांडर सुमितसिंग चौहान हे संचलन प्रमुख होते.

संचलनात सहभागी वाहने

यावेळी भारतीय नौदलाचे एअरक्राफ्ट कॅरिअर (आयएनएस विक्रांत) (विमान वाहक युद्ध पोत), भारतीय नौसेना सुरत (विध्वंसक युद्ध पोत), वाघशीर पाणबुडी, तेजस फायटरजेट अँड अनमॅनेड एरियल व्हेईकल (हवेतून हवेत व जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र), ब्रह्मोज मिसाईल (जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र), वरुणास्त्र टोरपेडो,  इंडीजिनीअस रॉकेट लॉन्चर वेपन (पाण्यावरून पाण्याच्या आत मारा करणारे क्षेपणास्त्र) तर बृहन्मुंबई पोलीस दलाचे वाहतूक पोलीस मोटर सायकल पथक (४० गाड्या) आणि महिला निर्भय पथक (चार वाहने), तसेच बृहन्मुंबई अग्निशमन दलातील मिनी वॉटर टेंडर, २४ मीटर उंचीचे कम्बाईन फायर आणि ३२ मीटर टर्न टेबल लॅडर या वाहनांचा समावेश होता.

जनहिताचे संदेश देणारे चित्ररथ

राज्य शासनाच्या विविध विभागांनी जनहिताचे संदेश देणाऱ्या चित्ररथांसह संचलनात सहभाग घेतला. यामध्ये सहभागी झालेले विभाग (कंसात चित्ररथाचा विषय) पुढील प्रमाणे : सार्वजनिक बांधकाम (२४ तासात अष्टविनायक दर्शन), वन (आईच्या नावे एक झाड), आदिवासी विकास (वाघबारस), पर्यटन (महाराष्ट्र अनलिमिटेड), मराठी भाषा (अभिजात मराठी), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य (अनुसूचित जाती आणि विशेष घटकांचा सर्वांगीण विकास), मृद व जलसंधारण (जलयुक्त शिवार आणि गाळमुक्त धरण), कृषी (नैसर्गिक शेती), ऊर्जा (अक्षय ऊर्जा), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण (शाश्वत अन्नपूर्णतेकडून सर्वस्पर्शी अन्न शाश्वततेकडे), पाणीपुरवठा आणि स्वच्छता (अटल भूजल योजना आणि जलजीवन मिशन), इतर मागास बहुजन कल्याण (ज्ञानदीप समतेचा), ग्रामविकास व पंचायत राज (लखपती दीदी आणि ग्रामीण घरकुल), कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता (कौशल्ययुक्त महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र), झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (झोपडपट्टी पुनर्वसन), नगरविकास (सिडको)(शहरांचे शिल्पकार), गृह (वाहतूक नियंत्रण शाखा)(गतिमान रस्त्यांचे रक्षक), कामगार (महाराष्ट्राची शान कामगारांचा सन्मान) सांस्कृतिक कार्य (महाराणी ताराराणी यांचे ३५० वे जन्म वर्ष).

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित या समारंभात सांस्कृतिक कार्य संचालनाकडून किरण सुरेश शिंदे, अरुण सुरेश शिंदे, विवेक विनोद शिंदे, अरुण सुरेश शिंदे यांनी सनई चौघडा वादन केले. तर शिबानी जोशी आणि नरेंद्र बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले.

००००

किनारी रस्त्यामुळे वेळ आणि इंधनाची बचत तर प्रदूषणापासून मुक्ती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २६ : धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्याच्या उत्तर वाहिनीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाले. किनारी रस्त्यामुळे मुंबईकरांच्या प्रवासाच्या वेळेत तसेच इंधनामध्ये मोठी बचत होणार असून प्रदूषणापासून मुक्ती मिळण्यामध्ये हा मार्ग महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सांस्कृतिक कार्य तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव डॉ. अश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अमित सैनी, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर आदी यावेळी उपस्थित होते.

 

याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, मुंबई किनारी रस्त्याचे ९४ टक्के काम पूर्ण झाले असून आज उत्तरवाहिनी मार्गाचे उद्घाटन झाले आहे. प्रजासत्ताक दिनी हा मार्ग नागरिकांना समर्पित होत असून उद्या सोमवार दि. २७ जानेवारी पासून या मार्गासह अन्य तीन आंतरमार्गिका खुल्या होणार आहेत. यामध्ये मरीन ड्राईव्ह कडून प्रभादेवीकडे जाण्यासाठीची आंतरमार्गिका, मरीन ड्राईव्ह कडून बिंदूमाधव ठाकरे चौकाकडे जाणारी आंतरमार्गिका तसेच बिंदूमाधव ठाकरे चौकातून सागरी सेतूला जोडणारी आणि वांद्रेच्या दिशेने जाणारी आंतरमार्गिका यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रजासत्ताक दिनी उत्तरवाहिनीचे लोकार्पण होत असून या मार्गामुळे मुंबईकरांच्या जीवनात मोठा बदल घडेल, असा विश्वास व्यक्त केला. किनारी रस्त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तांत्रिक कामाचे त्यांनी यावेळी कौतुक केले.

या रस्त्याचे दुभाजक सुशोभीकरण करण्यात येत असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. हे सुशोभीकरण मे.टाटा सन्स लिमिटेड ॲण्ड अफेलेटसकडून करण्यात येत आहे.

दृष्टिक्षेपात प्रकल्प…

  • धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारा रस्ता दक्षिण या मार्गाचे लोकार्पण झाले. यामुळे मरीन ड्राईव्हकडून सागरी सेतूकडे जाणारी वाहतूक उत्तर वाहिनी पुलावरून सुरू होणार.
  • मरीन ड्राईव्हकडून प्रभादेवीकडे जाण्यासाठी आंतरमार्गिका सुरू होणार. मरीन ड्राईव्हकडून बिंदू माधव ठाकरे चौकाकडे जाणारी आंतरमार्गिका सुरू होणार.
  • बिंदू माधव ठाकरे चौकातून सागरी सेतूला जोडणारी आणि वांद्रेच्या दिशेने जाणारी आंतरमार्गिका देखील सुरू होणार.
  • वाहतूक स्थिती : १२ मार्च २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत ५० लाख वाहनांचा प्रवास तर दररोज सरासरी १८ ते २० हजार वाहनांचा प्रवास.
  • धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पामधील महत्त्वाचा टप्पा म्हणजे मुंबई किनारा रस्ता प्रकल्प व वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडणारा पुल. या पुलाची एकूण लांबी ८२७ मीटर असून वजन २४०० मेट्रीक टन इतके आहे.
  • धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) हा प्रकल्प शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत बांधण्यात येत आहे.
  • आजतागायत या प्रकल्पाचे ९४ टक्के काम पूर्ण झाले आहे.
  • प्रकल्पाचे फायदे : वेळेची सुमारे ७० टक्के बचत, तर इंधनात ३४ टक्के बचत. याचे फलित म्हणून परकीय चलनाचीही बचत. ध्वनी प्रदूषण व वायुप्रदूषणात घट होण्यास मदत. ७० हेक्टर हरित क्षेत्राची निर्मिती. मुंबईकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी हरितक्षेत्रात सायकल ट्रॅक, सार्वजनिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक, खुले प्रेक्षागृह साकारण्यात येत आहेत. या प्रकल्पामुळे मुंबईकरांना नवीन विहारक्षेत्र लाभणार. या प्रकल्पात सागरी संरक्षण भिंतीची उभारणी. यामुळे किनाऱ्याची धूप होणार नाही आणि समुद्राच्या उंच लाटांपासून प्रकल्पाचे संरक्षण होईल.
  • प्रकल्पाची वैशिष्ट्ये : बोगदा खनन संयंत्राच्या साहाय्याने भारतातील सर्वात मोठ्या व्यास (१२.१९ मीटर) असलेल्या बोगद्याची निर्मिती. भारतात प्रथमच रस्ते वाहतूक बोगद्यांमध्ये सकार्डो वायूजीवन प्रणालीचा वापर. भारतामध्ये प्रथमच एकलस्तंभ (मोनोपाईल) उभारून पुलाची बांधणी. एकाच प्रकल्पामध्ये पुन:प्रापण करून रस्ता, पूल, उन्नत मार्ग, उतरण मार्ग अच्छादित बोगदा, समुद्रक्षेत्र तसेच टेकडीखालून बोगदा, आरक्षणाची निर्मिती. भारतात सर्वप्रथम समुद्रकिनारी भरती-ओहोटी क्षेत्राखालून बोगद्याचे खनन व बांधकाम. या प्रकल्पात प्रवाळांच्या वसाहतींचे स्थलांतर ९० टक्के यशस्वी.
  • प्रकल्पाचा एकूण खर्च १३ हजार ९८३ कोटी.

0000

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदन कार्यक्रम

चंद्रपूर, दि. 26 : शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित, महिला, युवक-युवती यांच्यासह दुर्बल घटकाला विकासाचा केंद्रबिंदू मानून राज्य सरकार विकासाच्या मार्गावर वाटचाल करीत आाहे. यात चंद्रपूर जिल्हा प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर राहावा, यासाठी तन-मन-धनाने या जिल्ह्याचा पालकमंत्री आणि राज्याचा आदिवासी विकास मंत्री म्हणून सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबध्द आहोत, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी  दिली.

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सर्वश्री सुधाकर अडबाले, सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त विपील पालीवाल यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, स्वातंत्र्यसंग्राम सैनिक, जेष्ठ नागरिक आदी उपस्थित होते.

शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी सदैव कटिबध्द आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले, जिल्हा प्रशासनाने अनेक उपक्रमातून येथील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे. स्वातंत्र्याच्या इतिहासापासून स्वत:ची ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याला ऐतिहासिक गोंडकालीन वंशाचा वारसा लाभला आहे. या वारसामुळेच येथील संस्कृती बहरली आहे. त्याचे आपण साक्षिदार आहोत. अशा ऐतिहासिक आणि विविधतेने नटलेल्या, वनभूमी, खनिज संपत्तीने परिपूर्ण असलेल्या, तसेच जल, जंगल, जमीन आणि आदिवासी संस्कृतीचा वारसा जपणा-या चंद्रपूर जिल्ह्याचा पालकमंत्री आणि राज्याचा आदिवासी विकास मंत्री म्हणून आज ध्वजारोहण करताना आज मनस्वी आनंद होत आहे.

आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी येथील क्रांतीकारकांनी 1857 मध्ये इंग्रजांविरुध्द क्रांतीची मशाल हाती घेतली. 15 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री भारत स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आले. देश स्वतंत्र झाला तरी देशाचा कारभार भारतीयांच्या हातात नव्हता. आपल्या देशाचा कारभार आपल्याच पध्दतीने चालावा, यासाठी भारताची स्वतंत्र राज्यघटना तयार करण्याचे काम सुरू झाले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता यावर आधारीत तसेच बहुभाषिक, बहुसांस्कृतिक आणि अनेक धर्माचा समावेश असलेल्या या देशाची राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी तयार झाली. तो दिवस आपण ‘संविधान दिन’ म्हणून दरवर्षी साजरा करीत असतो. तसेच भारतीय संविधानाचे हे अमृत महोत्सवी वर्ष सुध्दा आहे.

पुढे पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, चंद्रपूर या नावाने प्रसिध्द असलेला हा जिल्हा प्राचीन काळी ‘लोकापूर’ या नावाने ओळखला जात होता. ब्रिटीशांच्या कारकिर्दीत म्हणजे 1874 पासून हा जिल्हा चांदा या स्वतंत्र नावाने गणला जाऊ लागला. कालांतराने त्याचे नामांतर इंद्रपूर आणि त्यानंतर जानेवारी 1964 चंद्रपूर असे झाले. क्रांतीकारक आणि हुतात्म्यांच्या बलिदानातून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यांच्या बलिदानाने मिळालेल्या स्वातंत्र्याचं सुराज्यात रुपांतर करण्याची जबाबदारी शासन, प्रशासन यांच्यासह प्रत्येक भारतीयाचीसुध्दा आहे. यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तत्पुर्वी पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर त्यांनी परेड संचलनाची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्वातंत्र संग्राम सैनिक, उपस्थित मान्यवरांची आस्थेने विचारपूस केली.

शहिदांच्या कुटंबियांना स्मृतीचिन्ह : पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते शहिदांच्या कुटुंबातील वीर नारी, वीर पिता, वीर माता, शौर्य चक्र प्राप्त जवानांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यात वीरपत्नी वैक्कमा गोपाल भिमनपल्लीवार, वीरपत्नी अरुणा सुनील रामटेके, वीर माता पार्वती वसंत डाहुले, वीर पिता वसंतराव डाहुले, वीरमाता छाया नवले, वीरपिता बाळकृष्ण नवले, शौर्य चक्र प्राप्त सुबेदार शंकर मेंगरे यांचा समावे होता. 

उत्कृष्ट काम करणा-या ग्रामपंचायतींचा सत्कार : लोकपयोगी योजनांमध्ये उत्कृष्ट कार्य करणा-या ग्रामपंचायतींचा यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात आकापूर (ता. नागभीड), चिचबोडी (ता. सावली),  माजरी (ता. भद्रावती).

००००००

 

लोककल्याणाचा विचार डोळ्यासमोर ठेवून विधानमंडळाची वाटचाल – सभापती प्रा. राम शिंदे

मुंबई, दिनांक २६ जानेवारी – भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला वंदन केले. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

आपले विधानमंडळ लोककल्याणाचा विचार दीपस्तंभाप्रमाणे डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करीत आहे, असे सांगून सभापती प्रा. शिंदे यांनी विधानमंडळाचे काम अधिक प्रभावी होण्यासाठी प्रश्नोत्तराचा तास विनाव्यत्त्यय होणे, समिती पद्धत अधीक सक्षम करणे, चर्चेनंतरच विधेयक संमत होणे आणि अर्थसंकल्पीय बाबींवर सदस्यांना मार्गदर्शन, ही आपली पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज अग्रक्रमासाठी चतु:सुत्री राहील, असे यावेळी स्पष्ट केले. भारतीय प्रजासत्ताक आणि भारतीय राज्यघटना अमृत महोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देत राज्यघटनेमुळे भारतातील संसदीय लोकशाही वैश्विकस्तरावर अधिक प्रभावी आणि प्रगल्भ झाल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा लोककल्याणकारी राज्य संकल्पनेचा विचार पुढे नेला. त्यांच्या जन्म त्रिशताब्दीनिमित्त प्रा. राम शिंदे यांनी अभिवादन केले.

याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (१) (कार्यभार) जितेंद्र भोळे, सचिव (२) (कार्यभार) डॉ. विलास आठवले यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते ध्वजवंदन

मुंबई, दि. 26 : भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते आज दिमाखात ध्वजवंदन करण्यात आले.

वांद्रे पूर्व येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या समारंभास आमदार वरुण सरदेसाई, मुंबईं उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अतिरिक्त पोलिस आयुक्त परमजीत सिंग दहिया, पोलिस उपआयुक्त मनिष कलवानिया यांनी सलामी दिली.

या कार्यक्रमास माजी आमदार झिशान सिद्दिकी, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, शहीद परिवाराचे कुटुंबिय, शासकीय अधिकारी, पोलिस, क्रीडा मार्गदर्शक क्रीडा पटू, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री ॲड.शेलार यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय खो खो क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळालेल्या प्रशिक्षक, खेळाडू तसेच गुणवंत मार्गदर्शक व क्रीडापटू यांचा सत्कार करण्यात आला. यात केनिया पुरुष व स्त्री खो-खो संघाचे मुख्य प्रशिक्षक डॉ.नरेंद्र विठ्ठल कुंदर, खो-खो विश्वविजेत्या भारतीय संघामध्ये प्रतिनिधीत्व केलेले अनिकेत भगवान पोटे यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे, सन 2022- 23 या वर्षांकरिता क्रीडा मार्गदर्शक रमेश सकट, खेळाडू जान्हवी जाधव, अमन सिंग, रितिका महावर, अक्षता ढोकळे, प्रशांत गोरे, आदित्य खमासे आणि रितेश बोराडे यांना गुणवंत खेळाडू क्रीडा पुरस्कार देण्यात आले. सन 2023- 24 या वर्षांकरिता क्रीडा मार्गदर्शक योगेश पवार, खेळाडू निधी राणे, अभिषेक प्रसाद, आंचल गुरव, अर्ना पाटील, आकाश गोसावी आणि नमन महावर यांना गुणवंत खेळाडू क्रीडा पुरस्कार देण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महात्मा गांधी विद्यालयाचे शिक्षक राहुल प्रभू यांनी केले.

 

0000

संजय ओरके/विसअ

भारतीय प्रजासत्ताकाचा ७५ वा वर्धापन दिनोत्सव; विभागीय आयुक्तालयात तिरंग्यास मानवंदना

अमरावती, दि. 26 : भारतीय प्रजासत्ताकाच्या 75 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज प्रभारी विभागीय आयुक्त सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत तिरंग्यास मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी श्री. कटियार यांनी उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत व राज्यगीतानंतर पोलीस पथकाव्दारे तिरंग्यास मानवंदना देण्यात आली. यावेळी अपर आयुक्त गजेंद्र बावणे, उप आयुक्त रमेश आडे, राजीव फडके, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, तहसीलदार प्रज्ञा काकडे यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

0000

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ध्वजवंदन

मुंबई, 26: भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी ध्वज फडकवून भारतीय तिरंग्यास वंदन केले.

 यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांसह राज्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी महाराष्ट्र पोलीस दलाच्यावतीने राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करून राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. यावेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

00000

सुनिल डहाळे/प्रतिवेदक

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा

मुंबई, दि. 26 :  भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योगकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे झालेल्या शासकीय सोहळ्यात राष्ट्रीय ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

 यावेळी जिल्हाधिकारी रवि कटकधोंड, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम कारभारी, उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, नागरिक, अधिकारी, कर्मचारी यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा सैनिक कार्यालयामार्फत वीर पत्नी यांचा सत्कार मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच विविध विभागातील वैशिष्ट्यपूर्ण कार्य केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.

000

प्रजासत्ताक दिन : राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे ध्वजवंदन

मुंबई, दि. 26 :   देशाच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी महाराष्ट्र राजभवन येथे राष्ट्रध्वज फडकावून ध्वजाला मानवंदना दिली.

राष्ट्रगीत तसेच राज्यगीत झाल्यानंतर राज्य राखीव पोलीस दल व महाराष्ट्र पोलीस दलातर्फे सलामी देण्यात आली.

राज्यपाल राधाकृष्णन यांनी पत्नी सुमती यांचेसह राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व उपस्थित लहान मुलांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच मिठाई वाटप केले.

000

Republic Day: Governor C. P. Radhakrishnan unfurls National Tricolourat Raj Bhavan

Maharashtra Governor C. P. Radhakrishnan unfurled the National Tricolour on the occasion of the 76th Republic Day at Raj Bhavan Mumbai on Sun (26 Jan).

Officers and staff of Raj Bhavan and platoons of the State Reserve Police Force and Maharashtra Police saluted the flag even as the National Anthem and  State Song was played.

Governor Radhakrishnan  joined by his wife Sumathi Radhakrishnan exchanged Republic Day greetings and distributed sweets to all those present on the occasion.

0000

पद्म पुरस्कार जाहीर : महाराष्ट्राला एकूण १४ पद्म पुरस्कार

नवी दिल्ली दि. 25:  देशातील सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली.  महाराष्ट्रातून  माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व  गजल गायक पंकज उधास यांना मरणोत्तर तसेच ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांना पद्म भूषण तर 11 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणा-या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. गृह मंत्रालयाकडून आज या मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.  सार्वजनिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी  दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व दिवंगत गजल गायक पंकज उधास  आणि  चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांना  पद्म भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

11 मान्यवरांना यांना पद्मश्री जाहीर

कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्रातील 6 मान्यवरांना पद्मश्री जाहीर झाले आहेत यात सुलेखनकार अच्युत पालव, मराठी चित्रपसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, शास्त्रीय गायक अश्विनी भिडे देशपांडे, पार्श्व  गायिका जस्पिंदर नरुला, ज्येष्ठ बासरी वादक रानेद्र भानू मजुमदार, ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांना जाहीर झाले आहेत.

व्यापार व उद्योग क्षेत्रात वेगळा ठसा उमटविणाऱ्या अरूंधती भट्टाचार्य यांना तर पर्यावरण आणि वनसंवर्धन करणारे चैत्राम पवार सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी महाराष्ट्राचे अरण्य ऋषी वन्यजीव अभ्यासक मारोती चीतमपल्ली यांना, तर कृषी क्षेत्रात भरीव कामगिरीसाठी सुभाष शर्मा आणि वैद्यकीय क्षेत्रातील उत्तम कार्यासाठी विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार आज जाहीर झाले आहेत.

या वर्षी एकूण 139 पद्म पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये 07 पद्म विभूषण, 19 पद्म भूषण आणि  113 पद्मश्री पुरस्कार सामील आहेत. यासह  23 महिला तर 10 हे परदेशी नागरिक आहेत. 13 मान्यवरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत.

0000

ताज्या बातम्या

बिहारमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण यशस्वीरित्या सुरू

0
मुंबई, दि. ५ : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) उपक्रमांतर्गत बिहारमध्ये १.५ कोटी घरांना बूथ स्तर अधिकारी (Booth...

शेतकऱ्यांना आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील : कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

0
नाशिक, दि. 4 जुलै, 2025 (जिमाका वृत्तसेवा): रस्ते वीज व पाणी या शेतकऱ्याच्या मूलभूत गरजा असून पूर्ण करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आवश्यक उपलब्ध करून देण्यासाठी...

कामात कुचराई करणाऱ्यांची गय न करता शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पुरवा – केंद्रीय आरोग्य...

0
बुलढाणा,दि. 4 (जिमाका) : सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यत आरोग्य सेवा सहज ,सुलभ आणि माफक दरात पोहचविण्याचा केंद्र सरकारचा हेतू आहे . हा हेतू साध्य करण्यासाठी आणि...

‘माये’चं दूध… नवजातांसाठी संजीवनी!

0
जळगावच्या 'ह्युमन मिल्क बँके'तून २०००हून अधिक बाळांना मिळाला जीवनदायी आधार आईपण म्हणजे माया, वात्सल्य आणि त्याग. पण काही वेळा ही आई काही कारणांमुळे बाळाला दूध...

बॉम्बे बार असोसिएशनतर्फे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार

0
मुंबई, दि. ४ : मुंबई उच्च न्यायालयाची ही इमारत, बॉम्बे बार असोसिएशन आणि इथल्या माझ्या सहकाऱ्यांनी मला घडवलं. आज जे काही आहे ते या...