बुधवार, मे 14, 2025
Home Blog Page 37

सुरक्षा रक्षक मंडळाच्या नोंदणीकृत कर्मचाऱ्यांचा खाकी गणवेश; १ मे पासून अंमलबजावणी – कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर

मुंबई, दि. 29 : राज्यातील नोंदणीकृत सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी खाकी रंगाच्या गणवेशास शासनाने मान्यता दिली. यामध्ये टोपी निळ्या रंगाची असून, त्यावर सुरक्षा रक्षक मंडळाचा लोगो व नाव असणार आहे. त्याचबरोबर कामगार दिनाचे औचित्य साधून हा खाकी गणवेश दि. 1 मे 2025 पासून राज्यभरात अंमलात येणार असल्याची माहिती कामगार मंत्री ॲड. फुंडकर यांनी दिली.

महाराष्ट्र राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळाच्या नोंदणीकृत सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी नव्याने निश्चित करण्यात आलेल्या खाकी रंगाच्या गणवेशाचे अनावरण कामगार मंत्री ॲड. फुंडकर यांच्या हस्ते नरीमन भवन, मुंबई येथे करण्यात आले.

सुरक्षा रक्षकांच्या गणेवेशाच्या रंग खाकी असावा, अशी मागणी विविध संघटना व सुरक्षा रक्षकांनी शासनाकडे केली होती. कामगार मंत्री यांनी ही मागणी मान्य केली आहे. राज्यभरात जिल्हानिहाय 16 सुरक्षा रक्षक मंडळे कार्यरत असून आता 1 मे पासून राज्यातील सर्व सुरक्षा रक्षकांच्या गणवेशात एकसमानता असणार आहे. या उपक्रमामुळे सुरक्षा रक्षकांची ओळख एकसंघ राहील व त्यांच्या शिस्तबद्धतेत भर पडेल. तसेच या नव्या गणवेशामुळे राज्यातील सुरक्षा व्यवस्थेला अधिक सुसंगत व व्यावसायिक स्वरूप प्राप्त होणार असल्याचेही कामगार मंत्री ॲड.फुंडकर यांनी यावेळी सांगितले.

0000

संजय ओरके/विसंअ/

महाबळेश्वर येथे २ ते ४ मे २०२५ रोजी ‘महाराष्ट्र महापर्यटन उत्सव’चे आयोजन – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

Screenshot

मुंबई, दि. २९ : महाबळेश्वर येथे २ ते ४ मे २०२५ रोजी ‘महाराष्ट्र महापर्यटन उत्सव’चे आयोजन केले आहे. या उत्सवाच्या निमित्ताने महाबळेश्वर येथे ६० पंचतारांकित टेन्ट्स असतील, त्यात राहण्याची वेगळी अनुभूती लोकांना मिळणार आहे. लेझर शो, विविध पर्यटन सहली, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी महाराष्ट्राच्या महसूली विभागातील महत्वाच्या पर्यटन स्थळाचे ‘ब्रॅण्डींग’ करण्यासाठी महापर्यटन उत्सव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.

मंत्रालयातील  मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर कक्ष येथे आयोजित पत्रकार परिषदेत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई बोलत होते. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सुर्यवंशी, पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल उपस्थित होते.

पर्यटन मंत्री देसाई म्हणाले की, यावर्षी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) वतीने महाबळेश्वर येथे “महापर्यटन उत्सव : सोहळा महाराष्ट्राचा” या तीनदिवसीय उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 2 ते 4 मे यादरम्यान सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर गीरीस्थानी येथे हा उत्सव संपन्न होणार आहे.

महाराष्ट्र महापर्यटन उत्सवचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन

‘महाराष्ट्र महापर्यटन उत्सव’चे उद्घाटन 2 मे रोजी सायंकाळी 5 वाजता गोल्फ क्लब मैदान इथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, यांच्यासह अनेक पर्यटनप्रेमी यावेळी उपस्थित राहतील. या उत्सवाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन भेट देणार असून त्यांच्या हस्ते शनिवार, 3 मे रोजी ‘छत्रपती प्रतापसिंह वन उद्यानाच्या नुतनीकरण पश्चात लोकार्पण सोहळा’ तसेच ‘पेटिट लायब्रेरीच्या नुतनीकरण केलेल्या वास्तूचे’ उदघाटन होणार आहे.

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र पर्यटक सुरक्षा दल

पहलगाम मध्ये पर्यटकांवर झालेला भ्याड हल्ला लक्षात घेता पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ‘महाराष्ट्र पर्यटक सुरक्षा दल’ हा पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. थमिक तत्वावर तीन महिन्यासाठी महाबळेश्वर येथे 3 मे 2025 पासून पर्यटन सुरक्षा दल राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत कार्यान्वित होईल. महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाचा 4 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे.

पर्यटन उत्सवात विविध साहसी उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम

या उत्सवात विविध नामवंत कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम, किल्ले आणि शास्त्र प्रदर्शनी, फूड फेस्टिव्हल, साहसी खेळांचे उपक्रम, मुलांसाठी कार्यशाळा, हेलिकॉप्टर राईड, ड्रोन शो, फूड स्टॉल, मंदिर तथा अन्य पर्यटन स्थळांना भेटी, फोटोग्राफी कार्यशाळा, तरंगता बाजार (फ्लोटिंग मार्केट), लेझर शो, योग सत्र आणि मोर्निंग रागाज – वाद्य संगीत, फन रन आणि सायक्लथॉन परिसंवाद- जल पर्यटनातील संधी, बायोडायनामिक फार्मिंग शाळा, महाराष्ट्राचे पर्यटन धोरण, कार्निवल परेड, हैप्पी स्ट्रीट, बोट प्रदर्शनी व कार्यशाळेचे आयोजन केले आहे. तसेच महाराष्ट्राचे पर्यटन धोरण 2024, जलपर्यटनातील संधी आणि कृषी पर्यटन या विषयांवरील तीन परिषदा होणार आहेत.

महोत्सवात पंचतारांकित टेंट्स आणि हेलिकॉप्टर राईड

महाबळेश्वर इथे 60 पंचतारांकित टेंट्स असतील, त्यात राहण्याची वेगळी अनुभूती लोकांना मिळणार आहे. यातील काही टेंट्स गोल्फ क्लब ग्राउंडजवळ, तर उर्वरित टेंट्स हे मौजे भोसे येथे मॅप्रो गार्डनजवळ असतील. महाबळेश्वर येथील सगळ्या पॉइंट्सचे उंचीवरून दर्शन घेण्याची संधी उत्सवाच्या निमित्ताने उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा टॉप व्ह्यू बघता यावा यासाठी तिन्ही दिवस सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत हेलिकॉप्टर राइडची व्यवस्था मौजे भोसे येथील बाबा दुभाष फार्मवरून करण्यात आली आहे. याशिवाय सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत दुभाष फार्म, पाचगणी टेबल टॉप आणि हॉर्स रायडिंग मैदान तापोळा इथे पॅराग्लायडिंग, पॅरासेलिंग, पाण्यातील खेळ अशा विविध साहसी खेळांच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

किल्ले आणि शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन

महाराष्ट्राचा गड किल्ल्यांचा इतिहास लक्षात घेऊन वेण्णा लेकच्या शेजारील छत्रपती प्रतापसिंह उद्यानात सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत किल्ले आणि शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात स्वराज्यातील 10 मुख्य किल्यांच्या प्रतिकृती बनवल्या जाणार आहेत. तसेच युद्धात वापरल्या जाणाऱ्या जवळपास 1000 शिवकालीन पुरातन शस्त्रांचा समावेश या प्रदर्शनात असणार आहे.

वेण्णा लेकमध्ये लेझर शो आणि किडस झोनची उभारणी

वेण्णा लेक फेस्टिव्हल हे देखील या महोत्सवाचे एक आकर्षण आहे. यात तंत्रज्ञान आणि कलेचा अभूतपूर्व संगम असलेला लेझर अँड लाइट शो 2 आणि 3 मे रोजी सायंकाळी दाखवला जाईल. तर 4 मे रोजी ड्रोन शो होईल. यात साताऱ्याशी निगडित इतिहासाचे सुंदर सादरीकरण 300 ड्रोन्सच्या माध्यमातून करण्यात येईल. उत्सवात सहभागी होणाऱ्या तसेच स्थानिक मुलांसाठी सेठ गंगाधर मखारिया गार्डन इथे किड्स झोनची उभारणी करण्यात येणार आहे. लहान मुलांसाठी कुंभार कला, चित्रकला, कथाकथन, फोटोग्राफी याविषयीच्या कार्यशाळाही आयोजित करण्यात आल्या आहेत.

फूड फेस्टिव्हल आणि फ्ली मार्केटचे आयोजन

महाराष्ट्राची खाद्य परंपरा लक्षात घेऊन उत्सवात तिन्ही दिवस खाद्यप्रेमींसाठी सेठ गंगाधर मखारिया हायस्कूल येथे फूड फेस्टिव्हल आणि फ्ली मार्केटचे आयोजन करण्यात आले आहे. या फूड फेस्टिव्हलमध्ये वैशिष्ट्य म्हणजे यात महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र, कोकणसह सर्व ठिकाणच्या प्रसिद्ध खाद्यपदार्थांसोबत सातारा आणि माण भागातील विशेष अशा खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असतील.यासोबतच क्राफ्ट आणि महिलांच्या विविध उत्पादनांचे स्टॉल्स फ्ली मार्केटमध्ये असतील.

कार्निव्हल परेड या भव्य सांस्कृतिक शोभायात्रेचे आयोजन

उत्सवात कार्निव्हल परेड या भव्य सांस्कृतिक शोभायात्रेचे आयोजन 3 मे रोजी सायंकाळी 4 वाजता करण्यात आले आहे. याशिवाय पावली, आदिवासी नृत्य, वासुदेव, गोंधळी, कडकलक्ष्मी, संबळ वादन अशा लोप पावत असलेल्या पारंपरिक कलांचा परिचय करून दिला जाईल. कार्निव्हल परेड साबणे रोडवरील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौकापासून निघेल आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात परेडचा समारोप होईल.

योग सत्रांचे आयोजन

या उत्सवात 3 व 4 मे रोजी विल्सन पॉइंट येथे सकाळी 6 ते 7 या वेळेत डॉ. गजानन सराफ आणि सहकारी हे योगसत्र घेणार आहेत. पहिल्या दिवशी बासरीवादक अमर ओक हे मॉर्निंग रागाज हा वाद्य संगीताचा कार्यक्रम सादर करतील. फन रन आणि सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. विल्सन पॉइंटपासून सुरू होणाऱ्या या फन रनची सांगता आराम चौकात आराम गेस्ट हाऊसच्या मैदानावर होईल. 4 तारखेला योग सत्रानंतर हॅपी स्ट्रीट या आगळ्यावेगळ्या आनंदमयी सत्राचे आयोजन विल्सन पॉइंट इथे करण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यातील पंचगंगा मंदिर, कृष्णाई मंदिर येथे भेटीची व्यवस्था करण्यात आले आहे. अनुभवात्मक पर्यटनांतर्गत ग्रामीण गाव, प्राचीन मंदिर, कृषी पर्यटन, स्ट्रॉबेरी फार्म सहल आयोजित करण्यात येणार आहेत. महापर्यटन महोत्सवात तिन्ही दिवस नामवंत कलावंतांच्या रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी उपस्थितांसाठी असणार आहे. महाराष्ट्राची ऐतिहासिक श्रीमंती पर्यटनाच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचावी या हेतूने राज्य शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाच्या पुढाकारातून आयोजित महापर्यटन महोत्सवात अधिकाधिक पर्यटक सहभागी होतील असेही पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

००००

संध्या गरवारे/विसंअ/

वारणा व कडवी नदीतून बंदिस्त पाईपलाईनद्वारे शेतीसाठी पाणीपुरवठा करणेबाबत सर्वेक्षण करावे – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई दि. २९ :- सांगली जिल्ह्यातील वाकुर्डे उपसा योजनेच्या धर्तीवर खोची ता. हातकणंगले येथील वारणा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरून शासकीय उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून बंद पाईपलाईनच्या माध्यमातून शेतीसाठी पाणीपुरवठा करावे. तसेच कडवी नदीवर सावे (ता.शाहूवाडी) गावच्या हद्दीतून जुळेवाडी खिंडीत पाणी उपसाद्वारे उचलून बंदिस्त पाईपलाईनद्वारे लाभक्षेत्रातील गावातील सिंचनासाठी उपसा सिंचन योजना राबवण्याबाबत सर्व्हेक्षण करून याबाबतचा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या.

जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, मुख्य अभियंता व सह सचिव प्रसाद नार्वेकर यांच्यासह संबधित अधिकारी उपस्थित होते. तर आमदार विनय कोरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, पाणी उपलब्धता लक्षात घेऊन या योजनांसाठी सविस्तर सर्वेक्षणाचे काम सुरू करावे.  कृष्णा पाणी तंटा लवादाच्या मर्यादेत राहून पाणी उपलब्धतेनुसार नियोजन करावे. तसेच प्रकल्पातील पाणी उपलब्धतेनुसार लाभक्षेत्राचा सविस्तर अभ्यास करावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

पुणेगाव धरण पाणी वापराबाबतही यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस आमदार राहुल आहेर, जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, मुख्य अभियंता व सह सचिव प्रसाद नार्वेकर उपस्थित होते.

मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले, लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मंजूर असलेले पाणी उपलब्ध झाले पाहिजे. मंजूर पाणी विहित कालावधीत सोडण्याबाबत विलंब झाल्यास यासाठी दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड्स संस्थेच्या निवडणूक प्रक्रियेची नियमावली तयार करण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई दि.२९ :- स्काऊट गाईड ही एक चळवळ आहे. महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड्स ही संस्था राज्यात विशेषतः ग्रामीण भागात शालेय विद्यार्थी, युवक – युवतींमध्ये नेतृत्व, समाजसेवा, पर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्यांचा विकास घडवण्याचं काम करत आहे. लोकशाही प्रक्रियेनुसार या संस्थेची निवडणूक होणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर स्काउट्स आणि गाईड्सचे राज्य मंडळ, जिल्हा मंडळ यांची निवडणूक प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टीने नियमावली तयार करण्यासाठी चार सदस्यीय समितीची स्थापना करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड्स या संस्थेची निवडणूक घेण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मंत्रालयातील समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, स्काउट्स आणि गाईड्स संस्थेची निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी नियमावली तयार करण्यासाठी नियुक्त समितीने राज्य कार्यकारी मंडळाची स्थापना, युवा कार्यक्रम आणि प्रशिक्षणासंबंधी विविध कार्यक्रम, राज्यसंस्थेच्या पुढील वाटचालीसंबंधी,कामकाजासंदर्भात मार्गदर्शन करणे, जिल्हा समित्या नेमणे यासंदर्भात अहवाल सादर करावा. त्यानंतर राज्य संस्थेच्या उपविधीत बदल करण्यासाठी भारत स्काउट्स आणि गाईड्स राष्ट्रीय कार्यालय, नवी दिल्ली या संस्थेकडून मान्यता घ्यावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड्स संस्थेच्या तत्कालीन उपविधीनुसार निवडणूक प्रक्रियेद्वारे अध्यक्ष आणि राज्य मुख्य आयुक्त यांची नियुक्ती होत होती. या निवडून आलेले पदाधिकाऱ्यांचा कालावधी पाच वर्षे होता. या पदाधिकाऱ्यांच्या कार्य कालावधीमध्ये नियमांचे पालन न करता सेवा प्रवेश नियमांमध्ये नियमबाह्य बदल करणे व इतर प्रशासकीय बाबतीतील गैरप्रकाराच्या  तक्रारींबाबत चौकशी होऊन जुलै २०२० मध्ये राज्य मंडळ व राज्य कार्यकारी समिती या दोन्ही समित्या शासनाने बरखास्त केल्या होत्या.

या बैठकीस क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार विजयसिंह पंडित, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय,क्रीडा व युवक कल्याण आयुक्त हिरालाल सोनवणे, क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे, भारत स्काउट्स आणि गाईड्स नवी दिल्लीचे राजकुमार कौशिक व महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड्स संस्थेचे पदाधिकारी शोभना जाधव, आर.डी.वाघ, शरद दळवी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

000000

 

 

 

राज्याचे जहाजबांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर धोरण मंजूर – मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास मंत्री नितेश राणे

  • जहाज बांधणी उद्योगात १८ हजार कोटी गुंतवणुकीसह ३ लाख ३० हजार रोजगार निर्मिती           

मुंबई, दि. 29 : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर धोरण मंजूर करण्यात आल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली. तसेच या धोरणाच्या माध्यमातून राज्यात 2047 पर्यंत 18 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 3 लाख 30 हजार नोकऱ्यांची निर्मिती होणार असल्याचेही मंत्री राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मंत्रालय व विधीमंडळ पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री राणे बोलत होते.

जहाज उद्योगाविषयी धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे सांगून मंत्री राणे म्हणाले की, या धोरणामुळे राज्यात जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती, जहाज पुनर्वापर आणि जहाज तोडणी या उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येणार आहे. तसेच या माध्यमातून देशाच्या 5 ट्रिलीयन अर्थव्यवस्थेमध्ये राज्याचा महत्त्वाचा वाटा असणार आहे. देशातील सुमारे 33 टक्के जहाज उद्योग हा राज्यात सुरू व्हावा आणि 2030 पर्यंत राज्यात जहाज उद्योगामध्ये 6 हजार 600 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 40 हजार रोजगार निर्मितीचे  उद्दीष्ट आहे. तसेच या क्षेत्रात गुंतवणूक यावी यासाठी नुकताच मत्यव्यवसाय व बंदरे विभागाने नेदरलॅंडचा दौरा केला आहे. त्यावेळी राज्यात अडीच ते तीन हजार कोटी गुंतवणुकीची तयारी तेथील कंपन्यांनी दाखवली आहे.  या धोरणामुळे या गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. या उद्योगासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ राज्यातच तयार करण्यासाठी युवक-युवतींना प्रशिक्षण देण्याची तरतुदही या धोरणामध्ये करण्यात आली असल्याचेही मंत्री राणे यांनी सांगितले.

मंत्री राणे म्हणाले की, या धोरणातील तरतुदीनुसार राज्यात येणाऱ्या गुंतवणुकदारांसाठी महाराष्ट्र सागरी मंडळ ही संस्था सहकार्याचे काम करेल. या माध्यमातून महाराष्ट्र सागरी मंडळास महसुलाचे नवीन स्त्रोत निर्माण होऊन मंडळाची स्थिती मजबूत होण्यास मदत होणार आहे. तसेच कुशल मनुष्यबळ  राज्यात तयार होणार असल्याने राज्यातील युवक युवतींना रोजगाराच्या मोठ्या संधी भविष्यात निर्माण होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सागरी व्यापार आणि उद्योगास जालना देण्याचे धोरण स्वीकारले आहे. जहाज निर्मितीमध्ये देशाचा क्रमांक उंचावण्यासाठी या धोरणाचा उपयोग होणार असल्याचेही मंत्री राणे यांनी सांगितले.

राज्याला एक प्रमुख जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर केंद्र बनवणे, कौशल्य आणि उत्पादकता यावर भर देणारे कुशल मनुष्यबळ तयार करणे, प्रकल्प अंमलबजावणीकरिता तांत्रिकदृष्ट्या प्रगत क्षेत्राला प्रोत्साहन देणे, संशोधन आणि विकासामध्ये महत्वपूर्ण गुंतवणूक आणि सहकार्याद्वारे नाविन्यपुर्णतेस चालना देणे, रोजगार निर्मिती हे या धोरणाची ध्येय आहे. या धोरणानुसार पुढील प्रमाणे विकासाचे मॉडेल असणार आहे. सागरी शिपयार्ड समुह स्थापना व जागा निश्चित करणे (30 कि.मी. च्या परिघात), एकल शिपयार्ड आणि जहाज पुनर्वापर सुविधांचा विकास, पायाभूत सुविधा, पुरक उद्योग व कौशल्य सुविधा उपलब्ध करणे, विकासासाठी यंत्रणा उभी करणे. विकास यंत्रणांकडून एमएमबीच्या पुर्वपरवानगीने विकास, एमएमबी पारदर्शक निविदा पद्धतीने खासगी विकासकांना जमीन वाटप करेल. भांडवली अनुदान –प्रकल्प किंमतीच्या 15 टक्के, कौशल्य विकासासाठी प्रोत्साहन, कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासासाठी 50 टक्के किंवा 1 कोटी, संशोधन आणि विकास सुविधांसाठी प्रोत्साहन 60 टक्के किंवा 5 कोटी रुपये, या प्रमाणे आर्थिक साहाय्य असणार आहे.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

 

सेवा पंधरवडा उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी –  राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, 29 : ऊर्जा विभागाने सेवा पंधरवडा उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करावा, असे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांनी केले.

निर्मल भवन येथे ऊर्जा विभागातर्फे २८ एप्रिल ते १२ मे, २०२५ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवाड्याच्या तयारीचा आढावा घेताना राज्यमंत्री श्रीमती साकोरे – बोर्डीकर बोलत होत्या. यावेळी महावितरणचे उपसचिव नारायण कराड, सह सचिव उद्धव डोईफोडे, मुख्य विद्युत निरीक्षक संदीप पाटील, महावितरणचे संचालक अरविंद बाधिकर उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील अधीक्षक अभियंता आणि विद्युत निरीक्षक दुरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

सेवा पंधरवड्याची शपथ  विभागाच्या प्रत्येक कार्यालयात घेण्यात यावी. पंधरवड्याच्या निमित्ताने ऊर्जा विभागाच्या सर्व कार्यालयांना आवश्यक त्या सोयीसुविधांनी सुसज्ज करावे, जेणेकरून कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांना अधिक चांगली सेवा मिळेल. तसेच नागरिकांच्या तक्रारी  वेळेत सोडवण्याची कार्यपद्धती अधिक प्रभावी करावी, असे राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी सांगितले.

0000

परभणीच्या पुरातत्व वारशाचे संवर्धन करून जागतिक स्तरावर नेणार – पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, दि. 29 : परभणी जिल्ह्यातील पुरातत्व वास्तूंना योग्य त्या संवर्धनाची आणि विकासाची गरज आहे. या ऐतिहासिक वारशाचे जतन करून पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यात येईल. या माध्यमातून परभणी जिल्ह्याचे सांस्कृतिक महत्त्व जागतिक स्तरावर नेता येईल, असे प्रतिपादन महिला व बालविकास राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांनी केले.

निर्मल भवन येथे परभणी जिल्ह्यातील पुरातत्व वास्तूंचे संवर्धन व विकास कामांचा आढावा राज्यमंत्री श्रीमती साकोरे – बोर्डीकर यांनी घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी पुरातत्व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी, सहायक संचालक अमोल गोटे व दुरदृश्य प्रणालीद्वारे परभणी जिल्ह्याचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

परभणी जिल्ह्यात असलेल्या सर्व बारवांना संरक्षित करण्यात यावे. चारठाणा गाव हेरिटेज गाव करण्यासाठी नियोजन करावे. तसेच धारासूर येथील गुप्तेश्वर मंदिराच्या बाजूची जागा भूसंपादित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पुरातत्व विभागाला सहकार्य करावे, अशी सूचनाही राज्यमंत्री श्रीमती साकोरे – बोर्डीकर यांनी केली.

0000

मोहिनी राणे/ससं/

पेसा कायदा अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रशिक्षणाचे आयोजन करा – मंत्री डॉ. अशोक वुईके

मुंबई, दि. 29 : राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना आदिवासी उपयोजनेअंतर्गत 5% थेट निधी पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपलब्ध करून दिला जातो. आदर्श पेसा गाव निर्मितीसाठी नागरिकांमध्ये त्यांच्या हक्क आणि जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. या उद्देशासाठी पेसा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सरपंच व ग्रामसेवक यांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करावे, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले.

मंत्रालयात मंत्री डॉ.अशोक वुईके यांच्या अध्यक्षतेखाली पेसा 5% थेट निधीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, राज्यपेसा संचालक शेखर सावंत तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री डॉ. वुईके म्हणाले, पेसा कायदा 24 डिसेंबर 1996 अस्तित्वात आला आणि महाराष्ट्र राज्याचे यासंदर्भातील नियम 2014 साली लागू करण्यात आले. विभागाच्या एकूण आदिवासी घटक योजना निधीपैकी ५% निधी पेसा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींना दिला जातो. आदर्श पेसा गाव निर्मितीसाठी नागरिकांमध्ये त्यांच्या हक्क आणि जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी पेसा कायद्याची जनजागृती होणे आवश्यक असून ग्रामपंचायत स्तरावरील पेसा समित्यांची पुनर्रचना करावी असे त्यांनी यावेळी संबंधितांना सांगितले.

या बैठकीत पेसा कायदा 1996 अंतर्गत तयार करण्यात आलेल्या पेसा नियमांची अंमलबजावणी, तसेच पेसा 5% थेट निधी बाबत सविस्तर आढावा घेण्यात आला आणि अंमलबजावणी प्रक्रियेतील अडचणी व उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली.

****

शैलजा पाटील/विसंअ/

‘आयआयसीटी’ व शिक्षणाच्या क्षेत्रात युट्यूबने सहकार्य करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 29 : भारतात ‘क्रिएटिव्हिटी’ला तोड नाही. देशात मोठ्या प्रमाणावर ‘क्रिएटिव्हिटी’  असून त्यामध्ये मुंबईचे स्थान अग्रगण्य आहे. मुंबई हे देशाचे ‘क्रिएटिव्ह कॅपिटल’ आहे. पुढील काळात मुंबईत आयआयसीटी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी) स्थापन करण्यात येणार आहे. या इन्स्टिट्यूटच्या रचनेमध्ये युट्यूबचा सहभाग आवश्यक आहे. राज्यात शिक्षणाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या सहकार्याने बदल घडविण्यासाठी युट्यूबने सहकार्य केल्यास निश्चितच सकारात्मक परिणाम दिसतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

हॉटेल ताज एंड, वांद्रे येथे युट्यूबचे मुख्य कार्यकारी अधिकारी नील मोहन यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये मुंबईमधील क्रिएटिव्ह इकॉनॉमी, मुंबईमध्ये होणारी ‘वेव्हज’ समिट,  मुंबई ,महाराष्ट्र व देशात यूट्यूबचे फॉलोअर, युट्यूबचा विस्तार,  शिक्षण आणि अन्य क्षेत्रात होणारा उपयोग यावर चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, सचिव श्रीकर परदेशी,  विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे उपस्थित होते.

चर्चेदरम्यान मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील दुर्गम भागात शिक्षणासाठी युट्यूब  हे चांगले माध्यम होऊ शकते.  शैक्षणिक साहित्य विविध क्रिएटिव्हिटी वापरून युट्यूबवर टाकल्यास विद्यार्थी आवडीने पाहत त्याचे आकलन करतात.  क्रिएटरच्या माध्यमातूनही असे शैक्षणिक साहित्य युट्यूबवर टाकल्यास त्यांच्या शिकवण्याची पद्धत ही त्यांना आवडून विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत त्यांचे विषय समजू शकतात. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बद्दल युट्यूबमुळे होऊ शकतात. त्यासाठी शिक्षण क्षेत्रात युट्युबने शासनास सहकार्य करावे.

मुंबईमध्ये स्थापन करण्यात येणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी मध्ये युट्युबने शासनासोबत काम करावे. संस्थेची रचना, अभ्यासक्रम, तसेच भविष्यातील क्रिएटिव्हिटीचे क्षेत्र निवडून त्यावर प्रमाणपत्र अभ्यासक्रम, शॉर्ट टर्म, लाँग टर्म अभ्यासक्रम संस्थेमार्फत सुरू करण्यात येतील. यामध्ये यूट्यूब महत्त्वाची भूमिका बजावू शकते. जगाचे ‘क्रिएटिव्ह कॅपिटल’  बनण्याची क्षमता मुंबईमध्ये आहे. अशा मुंबई शहरात ही संस्था स्थापन करण्यात येणार आहे. युट्यूबमुळे अनेक ‘ क्रिएटिव्ह’  लोक आपले कौशल्य जगासमोर आणत आहेत. त्यांच्यातील माहीत नसलेले कला गुण युट्यूबमुळे समोर येत आहेत.  अशा व्यक्ती युट्यूब  चॅनेल चालवून आपली ‘क्रिएटिव्हिटी’ जगासमोर आणतात.  या चॅनलच्या माध्यमातून बऱ्यापैकी उत्पन्नही त्यांना मिळत असते, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

मंत्रिमंडळ निर्णय

टेमघर प्रकल्पाची उर्वरित कामे, गळती रोखण्याच्या कामांसाठी ४८८ कोटी ५३ लाखांच्या खर्चास मान्यता

पुणे जिल्ह्यातील टेमघर प्रकल्प (ता. मुळशी) प्रकल्पाच्या उर्वरित कामांसाठी व गळती प्रतिबंधक उपाययोजनांसाठी ४८८ कोटी ५३ लाख रुपयांच्या खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

मौजे लवार्डे-टेमघर (ता.मुळशी) येथे मुठा नदीवर ३.८१२ अघफू साठवण क्षमतेचे दगडी धरण बांधण्यात आले आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत या प्रकल्पातून पुणे शहरास ३.४०९ अब्ज घन फूट पिण्याचे पाणी आणि  धरणाच्या खालच्या बाजूस नदीवरील पाच कोल्हापूरी बंधाऱ्यांच्या माध्यमातून मुळशी तालुक्यातील नऊ गावांतील हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनास सुविधा उपलब्ध होईल, असे नियोजन आहे.  धरणात २०१०-११ पासून पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होत असून, धरणातून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. प्रकल्पातील पाण्याचा पूर्णपणे लाभ घेता यावा यासाठी गळती रोखणे आवश्यक असल्याने गळती प्रतिबंधक उर्वरित कामे व मजबुतीकरणासाठी फेब्रुवारी २०२५ मध्येच मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार आता पुढे उर्वरित कामे व गळती रोखण्याच्या उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

–०—

भिक्षागृहातील व्यक्तीला आता पाच रुपयांऐवजी ४० रुपये मेहनताना मिळणार; १९६४ नंतर प्रथमच बदल

भीक मागण्याचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या भिक्षागृहातील व्यक्तिचे पुनवर्सन करण्याच्या उद्देशाने त्याने केलेल्या कामासाठी दररोज चाळीस रुपये मेहनताना देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

आतापर्यंत १९६४ पासून दरमहा पाच रुपये मेहनताना दिला जात असे. भीक मागण्याची वृत्ती कमी व्हावी या उद्देशाने राज्यात महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध कायदा १९६४ पासून अस्तित्वात आहे. त्या अंतर्गत राज्यात भीक मागणाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी १४ भिक्षेकरी गृह सुरु आहेत. या भिक्षेकरी गृहात ४ हजार १२७ इतक्या व्यक्तिंचे पुनर्वसन करण्यात येते. या संस्थेत दाखल झालेल्या व्यक्तिला भिक्षागृहातून बाहेर पडल्यानंतर स्वतःचा उदरनिर्वाह करता यावा याकरिता शेती तसेच लघु उद्योगांचे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येते. असे प्रशिक्षण घेणाऱ्या व्यक्तिला यापुर्वी दरमहा पाच रुपये इतका मेहनताना देण्यात येत असे. हा मेहनताना आता दररोज चाळीस रुपये करण्यात येणार आहे. यातून भीक मागण्याची वृत्ती कमी होऊन, अशा व्यक्तिंना कामाची गोडी लावता येणार आहे. या निर्णयामुळे भिक्षेकऱ्यांना आत्मनिर्भरतेकडे नेण्यासाठी एक मोठे पाऊल ठरणार आहे.

–०—

केंद्राच्या पीएम-यशस्वी शिष्यवृत्ती योजनेच्या मार्गदर्शक सूचना लागू करण्याचा निर्णय

प्रधानमंत्री – यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अॅवार्ड स्किम फॉर व्हायब्रंट इंडिया (PM- YASASVI ) या एकत्रिकृत शिष्यवृत्ती योजनेच्या केंद्राच्या मार्गदर्शक सूचना राज्यात लागू करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

या योजनेंतर्गत ओबीसी आणि डीएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिक पूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत केंद्र सरकारने २०२१-२२ ते २०२५-२६ वर्षांकरिता जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आल्या आहेत. यानुसार इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना द्यायच्या शिष्यवृत्तीचे प्रमाण केंद्र हिस्सा साठ टक्के आणि राज्य हिस्सा चाळीस टक्के, असे असणार आहे. याबाबतचा शासन निर्णय २३ जून २०२३ रोजी जारी झाला आहे. त्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत कार्योत्तर मंजुरी देण्यात आली.

–०—

पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी महा इनविट संस्थेची स्थापना

इनविट स्थापन करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य

राज्यात रस्ते व पूल आदी पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी आणि भांडवल उभारणीसाठी ‘महा इनविट’ (Maha InvIT – Infrastructure Investment Trust) स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

या निर्णयामुळे पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधी संकलनास नवे व्यासपीठ उपलब्ध होणार असून खासगी व सार्वजनिक गुंतवणूकदारांना स्थिर परताव्याची संधी मिळणार आहे.

‘महा इनविट’ अंतर्गत शासन ट्रस्ट स्थापन करणार असून, त्यात प्रायोजक, गुंतवणूक व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक अशी रचना असणार आहे. हा ट्रस्ट सेबीच्या नियमानुसार कार्यान्वित केला जाईल. इनविट (InvIT) ही संकल्पना १९६० मध्ये अमेरिकेमध्ये अंमलात आणली गेली होती. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण –एनएचएआयने २०२० मध्ये नॅशनल हायवे इन्फ्रा ट्रस्ट स्थापन करून निधी उभारला होता. त्याच धर्तीवर महाराष्ट्र अशी संस्था स्थापन करणारे पहिलेच राज्य ठरले आहे.

महा इनविटद्वारे सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि महाराष्ट्र पायाभूत सुविधा महामंडळ यांच्या निवडक मालमत्ता या ट्रस्टमध्ये हस्तांतरित केल्या जातील. यामुळे भविष्यातील महसूली उत्पन्न एकरकमी स्वरुपात ट्रस्टला मिळेल आणि त्यातून नवीन प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध होणार आहे.

राज्य सरकारने महा इनविटसाठी ‘स्पेशल पर्पज व्हेईकल’ (SPV) स्थापन करण्यालाही तत्त्वतः मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे राज्यात दीर्घकालीन गुंतवणूक आकर्षित होणार असून, पायाभूत सुविधा क्षेत्रात तरलता वाढेल, उच्च व्याजदराच्या कर्जावरचा अवलंब कमी होईल आणि रस्ते प्रकल्पांच्या गुणवत्तेमध्ये लक्षणीय सुधारणा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

–०—

 जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती सुविधा, जहाज पुनर्वापर सुविधा धोरणास मंजुरी

राज्याच्या जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती सुविधा व जहाज पुनर्वापर सुविधा धोरण-२०२५ ला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

राज्याच्या सागरी क्षेत्राची गरज, बाजार पेठांची स्थिती, उद्योजकांच्या अपेक्षा या बाबी लक्षात घेऊन बंदर विकास धोरणात वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत. सध्या महाराष्ट्र सागरी विकास धोरण-२०२३ अनुसार अंमलबजावणी करण्यात येते. या धोरणात जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर या क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र या क्षेत्राच्या विकासासाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता होती. यासाठी या धोरणास मान्यता देण्यात आली.

केंद्र सरकारने मेरीटाईम इंडिया व्हिजन -२०३० आणि मेरीटाईम अमृतकाल व्हिजन-२०४७ यांच्या माध्यमातून भारताला सन २०३० पर्यंत जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती उद्योगांत जगातील पहिल्या दहा देशांत आणि जहाज पुनर्वापर क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर नेण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. तसेच भारताला जहाज बांधणी क्षेत्रात सन २०४७ पर्यंत पहिल्या पाच देशांत नेण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या बाबी विचारात घेऊन जहाज बांधणी जहाजदुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर क्षेत्रांवर समर्पित लक्ष केंद्रीत करणे शक्य व्हावे यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात आले आहे. धोरण तयार करताना आंतरराष्ट्रीय स्तरावरील आघाडीच्या देशांची धोरणे, देशातील इतर राज्यांची धोरणे यांचा अभ्यास करण्यात आला आहे.

धोरणाचे अपेक्षित फायदे – या धोरणाच्या माध्यमातून जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर क्षेत्राच्या विकासाकडे समर्पित लक्ष देणे शक्य होणार आहे. या धोरणातील तरतुदींमुळे बंदर प्रकल्प विकासक नवीन जहाज पुनर्वापर प्रकल्प निर्माण करु शकतील. यामुळे बंदराचा वॉटर फ्रंट आणि जमिनीचा पुरेपूर वापर होण्याबरोबरच जहाज पुनर्वापर सुविधा उपलब्ध होईल. जहाज बांधणी प्रकल्पांमुळे नवीन भारतीय जहाजांची बांधणी आणि दुरुस्ती करता येईल. जहाज पुनर्वापर सुविधा मुळे आयुर्मान संपलेल्या जहाजांचे तोडकाम करणे शक्य होईल. यातून राज्यातील जहाज बांधणी जहाजदुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर क्षेत्राच्या विकासाला दिशा मिळेल

–०—

 पीक विमा योजनेत बदलास मंजुरी, कापणी प्रयोगावर आधारित योजना

सर्वसमावेशक पीक विमा योजनेत बदल करुन, पीक कापणी प्रयोगांवर आधारित सुधारित पीक विमा योजना राबविण्यास आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शेतकऱ्यांकडून शेतकरी हिस्सा, खरीप पिकासाठी दोन टक्के रब्बी पिकासाठी दीड टक्के व नगदी पिकांना पाच टक्के याप्रमाणे ठेवण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

या निर्णयानुसार एक रुपयात विमा देण्याऐवजी आता शेतकरी हिस्सा खरीपासाठी दोन टक्के, रब्बीसाठी १.५ टक्के आणि नगदी पिकांना पाच टक्के ठेवण्यासही मान्यता देण्यात आली.

राज्यात सध्या २६ जून २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३ ते रब्बी हंगाम २०२५-२६ हंगामासाठी लागू करण्यात आली आहे. मात्र या योजनेच्या अंमलबजावणी तक्रारी येत असल्याने या त्यामध्ये बदल करून आता सुधारित पीक विमा योजना राबविण्यात येणार आहे. ही योजना राबविताना नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही निविदा प्रक्रिया राबविल्या नंतर प्राप्त होणारी विमा हप्ता दरांच्या तुलनात्मक माहितीच्या आधारे राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीच्या मान्यतेनंतर योजना राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. याबरोबरच प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत राबविण्यात येणारी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आहे त्या स्वरूपात चालू ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आली.

–०—

कृषी पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणाऱ्या नव्या योजनेस मंजुरी

शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढून पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी नवीन योजना राबविण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

वातावरण अनुकूल शेतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी शेतकऱ्यांना सक्षम बनविणे आवश्यक आहे. शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी पुढील पाच वर्षांत दरवर्षी पाच हजार कोटी याप्रमाणे एकूण २५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यास मंजुरी देण्यात आली.

योजनेच्या परिणामकारक रितीने अंमलबजावणी व्हावी यासाठी शेतकरी आणि संबंधित घटकांना प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिकासाठी मंजूर तरतुदींच्या एक टक्के रक्कम राखीव ठेवण्यास मंजुरी देण्यात आली. योजनेचे मूल्यमापन करण्यासाठी मंजूर तरतुदींच्या ०.१ टक्के रक्कम राखीव ठेवण्यास मंजुरी देण्यात आली. हे मूल्यमापन त्रयस्थ संस्थेकडून करुन घेण्यात येणार आहे. योजनेत अत्यल्प, अल्प भूधारक, दिव्यांग आणि महिला शेतकरी यांना प्राधान्य दिले जाणार आहे. जिल्हानिहाय उद्दीष्ट निश्चित करुन प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा या तत्त्वावर योजना राबविण्यात येईल.

या योजनेसाठी आर्थिक तरतूद अर्थसंकल्पित त्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या योजनेत अंतर्भूत करायच्या घटक अथवा बाबींसाठी सध्या राज्यस्तरावर अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या विविध योजनांमध्ये उपलब्ध असलेल्या निधीचा वापर करण्यास मान्यता देण्यात आली.

–०—

 आदिवासी समाजाच्या धर्तीवर गोवारी समाजबांधवांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम

आदिवासी विकास विभागातर्फे अनुसूचित जमातीसाठी सुरू असलेल्या योजनांच्या धर्तीवर गौंड गोवारी समाजाच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबविण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यात शिक्षण, निवास, रोजगार, उद्योग आणि स्पर्धा परीक्षांसाठी  प्रशिक्षण अशा विविध क्षेत्रांतील बहुआयामी योजनांचा समावेश राहणार आहे.

सहा हजार विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी शाळेत प्रवेश – “गोवारी समाजाच्या अंदाजे ६००० विद्यार्थ्यांना दरवर्षी जवळच्या शहरांतील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिली पासून इयत्ता बारावी पर्यंत शिक्षण देण्यास येणार. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासूनच  या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.शाळेच्या नियमानुसार विद्यार्थ्यांसाठी रेनकोट, भोजन, निवास खर्च, ट्युशन फी, सुरखा अनामत, शिक्षण शुल्क इत्यादीसाठीचे  शुल्क संबंधित निवासी शाळेस अदा करण्यात येईल  हे शुल्क संबंधित विद्यार्थी इयत्ता १२ वी उत्तीर्ण होईपर्यंत देण्यात येईल. मात्र या विद्यार्थ्यास दरवर्षी उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.

घरकुल योजना  – गोवारी समाजासाठी घरकुल-टप्पा-१ अंतर्गत दहा हजार  घरे बांधण्यास मंजुरी देण्यात आली. त्यासाठी १२५ कोटी रूपयांच्या निधीसही मंजूरी देण्यात आली. (त्यासाठी) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न  १.२० लाखांपेक्षा कमी असावे, लाभार्थ्यांचे स्वतःच्या अथवा कुटुंबियांच्या मालकीचे राज्यात पक्के घर नसावे, लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा,) लाभार्थी कुटुंबाने महाराष्ट्र राज्यात कोणत्याही विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या  घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. या योजनेत विधवा/विधुर, दिव्यांग,) अनाथ, परितक्त्या, कच्च्या घरामध्ये राहणारे, घरात कोणीही कमावत नाही अशा महिला, पूरग्रस्त क्षेत्रातील रहिवासी असा प्राधान्यक्रम असणार आहे. योजनेंतर्गत किमान २६९ चौ. फूट इतक्या क्षेत्रफळ असलेल्या घरकुलाचे बांधकाम करण्यात येईल.  मंजूर सर्वसाधारण क्षेत्रातील घरकुलासाठी प्रति घरकुल १.२० लक्ष व ४ टक्के प्रशासकीय निधी रु.४८०० तसेच राज्य शासनाने घोषित केलेल्या डोंगराळ दर्गम क्षेत्रासाठी प्रति घरकुल रु.१.३० लक्ष व ४ टक्के प्रशासकीय निधी रु.५२०० याप्रमाणे  देण्यात येईल.

या योजनेतील लाभार्थ्यांना मनरेगा अंतर्गत अनुज्ञेय असलेले ९०/९५ दिवस (रु.१९,५७०/- पर्यंत) अकुशल मजुरीच्या स्वरुपात संबंधित जलसंधारण आणि मनरेगा विभागांतर्गत अभिसरणाद्वारे अनुज्ञेय राहील. तसेच शौचालय बांधकामासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत देय असलेले १२,००० किंवा या योजनेंतर्गत केंद्र शासनामार्फत वेळोवेळी लागू होणाऱ्या प्रोत्साहनपर अनुदान मिळण्यास लाभार्थी पात्र असेल.

स्टॅंड अप इंडिया –  समाजातील तरूणांनी उद्योग उभे करावेत आणि समाज आणि राज्याच्या विकासात हातभार लावावा यासाठी गोवारी समाजातील नवउद्योजक लाभार्थ्यांना एकूण प्रकल्प किमतीच्या लाभार्थी यांच्या हिश्श्यामधील २५ टक्के मधील जास्तीत जास्त १५ टक्के रक्कमेचे अनुदान देण्यात येईल. पात्र ला नवउद्योजक यांनी १० टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित  १५ टक्के राज्य शासनामार्फत देण्यात येईल.

स्पर्धा परीक्षेची तयारी – “गोवारी” या समाजातील विद्यार्थ्यांसाठी पदवी अभ्यासक्रम किमान ६० टक्के गुणासह उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना संघ लोकसेवा आयोग तसेच राज्य लोकसेवा आयोग यांच्यामार्फत घेण्यात येत असलेल्या स्पर्धा परीक्षेत भाग घेणाऱ्या युवक व युवतींना पूर्व तयारी करणे, परीक्षेसाठी आवश्यक अभ्यास साहित्य व इतर अनुषंगिक सुविधा उपलब्ध करुन देणे तसेच यासाठी आवश्यक ते मुलभूत निवासी प्रशिक्षण देण्यासाठी महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) या संस्थेच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात  येणार आहे. त्यासाठी ५०  लाख  रुपये इतका निधी मंजूर करण्यासही मान्यता देण्यात आली.

तसेच  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत बसण्यासाठी परीक्षा शुल्कात आर्थिक सवलत देण्यात येत आहे. यासाठी २५  लाख रूपये निधी महाज्योती संस्थेस उपलब्ध करुन देण्यात  येत आहे.

सैन्य आणि पोलिस भरती – लष्करातील सैनिक भरती व राज्यातील पोलिस भरतीसाठी पूर्व प्रशिक्षण देणे, स्पर्धा परीक्षेत भाग घेणाऱ्या युवक व युवतीना यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी आवश्यक ती पुर्व तयारी करणे यासाठी आवश्यक ते मुलभूत प्रशिक्षण देण्यासाठी “महाज्योती या संस्थेच्या माध्यमातून ही योजना राबविण्यास तसेच यासाठी रु.५० लक्ष इतका निधी मंजूर करण्यास शासन माद्वारे मान्यता देण्यात आली.

या योजनांमुळे गोवारी समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात मूलभूत परिवर्तन होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे

–०—

 मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळाची कर्ज मर्यादा १० वरुन १५ लाख रुपये

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ आणि वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत दिल्या जाणाऱ्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा दहा लाख रुपयांवरुन पंधरा लाख रुपयांपर्यंत वाढविण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

वैयक्तिक व्याज परतावा योजना २०१९ मध्ये कार्यान्वित झाली. तेंव्हा पासून महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाचे १ हजार ८६७ लाभार्थी आहेत. वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचे ३३९ लाभार्थी आहेत. या  योजनेची मर्यादा पंधरा लाख रुपयांपर्यंत वाढविल्यामुळे कराव्या लागणाऱ्या अतिरिक्त आर्थिक तरतुदीस मंजुरी देण्यात आली.

या दोन्ही महामंडळांच्या मार्फत राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच त्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी दहा लाख रुपयांपर्यंतची वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना राबवण्यात येत आहे. पण आता लघू व मध्यम उद्योग सुरु करण्याकरिता आता अधिकची भांडवली व पायाभूत गुंतवणूक आवश्यक ठरू लागली आहे. तसेच कच्चा मालाच्या किमतीत झालेली दरवाढ यामुळे या कर्ज मर्यादेत वाढ करावी अशी मागणी सातत्याने होत होती. या मागणीचा विचार करून आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ही मर्यादा पंधरा लाख रुपयांपर्यंत वाढविण्यास मंजूरी देण्यात आली.

–0—

महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर

महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण, २०२५ ला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

हे धोरण २०३० पर्यंत लागू राहील. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक अशा येत्या पाच वर्षांसाठी १ हजार ९९३ कोटी रुपयांच्या निधीच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली. या धोरणामुळे इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन व वापरास मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे. चार्जिंग विषयक पायाभूत सुविधांचा विस्तार करून आणि पर्यावरणीय शाश्वतता, आर्थिक वाढ व उर्जा सुरक्षिततेमध्ये योगदान देणाऱ्या शाश्वत आणि नाविन्यपूर्ण परिवहन उपाययोजनांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. यामुळे राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर व विक्रीमध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे.

या धोरणांतर्गत स्वच्छ गतिशीलता संक्रमण मॉडेल (Clean Mobility Transition Model)राबवले जाणार आहे. याअंतर्गत २०३० पर्यंत राज्यातील वाहतूक क्षेत्रातून होणारे कार्बन तसेच प्रदुषणकारी वायू, तसेय हरित गृह वायू (GHG) उत्सर्जने रोखण्याचे उद्दिष्ट आहे. या धोरणांतर्गत राज्यात विक्री व नोंदणी झालेल्या सर्व इलेक्ट्रिक वाहनांना मोटार वाहन करातून तसेच नोंदणी प्रमाणपत्राच्या किंवा नुतनीकरण शुल्कातून माफी देण्यात आली आहे. राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार होण्यासाठी राज्यामध्ये चार्जिंग विषयक पायाभूत सुविधांचा भक्कम विकास करण्यात येणार आहे. राज्य व राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक २५ कि.मी. अंतरावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सुविधांची उभारली जाणार आहे.

इलेक्ट्रिक वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढावा यासाठी वाहन खरेदीत २०३० पर्यंत सवलत दिली जाणार आहे. इलेक्ट्रिक दुचाकी, तीन चाकी, चारचाकी (परिवहनेत्तर), राज्य परिवहन उपक्रमाच्या बसेस (M3,M4) तसेच खासगी, राज्य/शहरी परिवहन उपक्रमांतील बसेस यासाठी मूळ किंमतीच्या १० टक्के सवलत दिली जाणार आहे. तर इलेक्ट्रिक तीनचाकी मालवाहू वाहने, चारचाकी (परिवहन -M1), चारचाकी हलके मालवाहू वाहन, चारचाकी मालवाहू वाहने (एन २, एन ३) तसेच शेतीसाठीचे इलेट्रिक ट्रॅक्टर व एकत्रित कापणी यंत्र वाहनांसाठी मूळ किमतीच्या १५ टक्के सवलत दिली जाणार आहे.

पथकरात सूट : – या धोरणांतर्गत मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग, अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू, हिंदूहृय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग (समृद्धी महामार्ग) यावर प्रवास करणाऱ्या सर्व चारचाकी प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना व बसेसना पथकर पूर्ण माफ करण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील अन्य राज्य व राष्ट्रीय महामार्गावर चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांना पथकरात पन्नास टक्के इतकी सवलत देण्यात येईल.

–०—

राज्यात ॲप बेस वाहनांसाठी धोरण लागू

राज्यात अॅप बेस वाहनांसाठी समुच्चयक धोरण (Aggregators Policy) लागू करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यात अॅप बेस वाहनांसाठी समुच्चयक धोरण तयार करण्याकरिता सुधीरकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचा अहवाल, मोटार वाहन अधिनियम व नियमातील तरतुदी याअनुषंगाने राज्यामध्ये हे समुच्चयक धोरण लागू करण्यात आले आहे. या धोरणांतर्गत ॲप बेस वाहन सेवा सुरू करण्यासाठी संबंधित वाहन मालकास विविध सुरक्षाविषय बाबींची पुर्तता करावी लागणार असून यामुळे प्रवाशांची सुरक्षितता निश्चित होणार आहे. राईड पूलिंगचा पर्याय निवडणाऱ्या महिला प्रवाशांना सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून केवळ महिला चालक, प्रवाशांसोबताचा प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून जाणार आहे.

ॲप बेस वाहनांसाठी संबंधित अर्जदाराने मार्गदर्शक तत्त्वांसह माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० अंतर्गत  सर्व तरतुदींचे पालन करणे आवश्यक आहे. अॅप बेस वाहनांसाठी अॅग्रीगेटरकडे सुरक्षा मानकांची पुर्तता करणारे अॅप / संकेतस्थळ असणे आवश्यक राहील. वाहनांचे रिअल टाईम जीपीएस ट्रॅकिंग, आपत्कालीन संपर्क क्रमांक, चालकांची चारित्र्य पडताळणी करणे आवश्यक असेल. चालकांना मान्यताप्राप्त संस्थांमध्ये प्रशिक्षण घेणे तसेच चालक व सहप्रवाशी यांच्यासाठी विमा आवश्यक करण्यात आला आहे. प्रवाशांना आणि चालकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे जलद निराकरण सुनिश्चित करण्यासाठी, तक्रारींचे निवारण करण्यासाठीची यंत्रणा असणे आवश्यक करण्यात आले आहे. राज्यात समुच्चयक धोरण लागू करण्याबाबतची नियमावली स्वतंत्रपणे प्रकाशित केली जाणार आहे.

0000

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

0
मुंबई, दि.१४ : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आमदार प्रकाश सोळंके, अमरावतीचे...

महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
महारेलद्वारे मुंबईतील पहिला केबल स्टेड रोड ओवर ब्रिज मुंबई, दि. १३ : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे ब्रिजचे काम महारेलनी हाती घेतले आहे. आतापर्यंत...

महाराष्ट्राला नागरी क्षेत्रातील प्रकल्पांसाठी आवश्यक सहकार्य करणार – केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर

0
मुबंई, दि. १३: महाराष्ट्रात मेट्रोचे जाळे अधिक विस्तारीत करण्यासाठी तसेच नागरी क्षेत्रातील विविध प्रकल्पांच्या व्यापक अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व सहाकार्य केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून  करण्यात येईल,असे...

चिंचघाट उपसा सिंचन योजनेला गती द्या – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १३: चिंचघाट उपसा सिंचन योजना नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात प्रस्तावित महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्प आहे. या योजनेचा उद्देश कृषी क्षेत्रात सिंचन सुविधा वाढवून शेतकऱ्यांना...

युवकांनी  ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून नोंदणी करावी – मंत्री चंद्रकांत पाटील

0
मुंबई, दि. १३ : आपत्ती व्यवस्थापन, वैद्यकीय सेवा, पोलीस दल, अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन यंत्रणांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग असणे महत्त्वाचे आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यास...