सोमवार, जुलै 7, 2025
Home Blog Page 358

पंचायत समित्यांसाठीच्या चारचाकी वाहनांचे वितरण

कोल्हापूर, दि.०२ (जिमाका):  जिल्हा परिषदेच्या आजरा, भुदरगड, शाहूवाडी, पन्हाळा, कागल व शिरोळ या पंचायत समित्यांसाठीच्या चारचाकी वाहनांचे आज सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या दालनाचेही उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई तसेच सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी व विभाग प्रमुख, गट विकास अधिकारी यावेळी उपस्थित होते.

केंद्र सरकार व  राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोनातून गट विकास अधिकारी यांना गावपातळीवर भेटी देण्यासाठी ही वाहने उपयुक्त ठरतील. ही वाहने  जिल्हा परिषदेच्या निधीतून घेण्यात आली आहेत.

स्त्रियांनी चिरस्थायी, शाश्वत लिखान करावे – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे, दि. ०२: स्त्रियांच्या साहित्यात लिहिण्याची सुरूवात पुरुषांनी केल्यामुळे स्त्रियांचे अंतरंग लेखनातून यायला वेळ लागला. आता स्त्रिया स्वत: लिहित असल्यामुळे त्यांचे मनोगत व्यक्त होत आहे. स्त्रियांनी चिरस्थायी आणि शाश्वत राहिल असे लेखन केले पाहिजे, असे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

विश्व मराठी संमेलनात आयोजित ‘मराठी भाषा आणि स्त्री साहित्य’ या विषयीच्या चर्चासत्रात त्या बोलत होते. या चर्चासत्रात मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, साहित्यिका डॉ. सिसिलिया कार्व्हालो या देखील सहभागी झाल्या होत्या. निवेदन उत्तरा मोने यांनी केले.

डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या, स्त्रियांना आपल्या कामाची प्रेरणा अनेकदा पुरुषांकडूनच मिळाल्याचे आपण पाहतो. स्त्री संघटना आणि स्त्रियांनी नेहमी सांगितले आहे की, स्त्रियांची भूमिका पुरूषविरोधी नसून पुरुषी वर्चस्वाविरुद्ध आहे. पुरुषाची भूमिका ही सहकाऱ्याची, मित्राची असावी. पुरुषांचा आणि स्त्रियांचा प्रवास जेव्हा माणूसपणाकडे जाईल तेव्हा अजून चांगले घडेल, असेही त्या म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या, गेल्या ५० वर्षात स्त्रियांच्या जाणीवांचा प्रभाव समाजावर मोठ्या प्रमाणात पडला आहे. स्त्रियांना अबला समजण्याची भूमिका आता बदलली आहे. पंचायत राजमध्ये ५० टक्के आरक्षण ही स्त्रियांसाठी महत्त्वाची बाब ठरली आहे. तथापि, स्त्रियांकडे पाहण्याची नजर आणि भूमिका बदलणे हे आव्हान अजून समोर आहे. त्यामुळे स्त्रियांनी कोणत्याही टिकेला न घाबरता निर्भिडपणे नेहमी लिहिते राहिले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

श्रीमती भिडे म्हणाल्या, भाषा आणि आशय हे एकाच बाबीचे दोन पैलू आहेत. स्त्रियांनी, स्वत:ला वाटतेय म्हणून लिहिले पाहिजे. आशयाची समृद्धी भाषेतून येते. पूर्वी स्त्रिया घरात असत त्यामुळे त्यांचे अनुभव विश्व खूप छोटे होते. स्त्रिया जेव्हापासून घराच्या बाहेर पडू लागल्या तेव्हापासून त्यांचे अनुभव विश्व विस्तारले असून आशयदार लेखन करू लागल्या आहेत. असे असतानाही लेखकाच्या पुस्तकातील पात्रात जी अलिप्तता पाहिजे ती अद्याप स्त्रियांच्या साहित्यात आलेली नाही. हळूहळू अनुभवातून ती जायला काही वेळ लागेल. आजच्या स्त्रिया नोकरी, मोठ्या पदांवर, कॉर्पोरेट जगतात वावरू लागल्या असल्या तरी अद्याप तेथील आशय स्त्रियांच्या साहित्यात आलेला नाही, असेही त्या म्हणाल्या.

श्रीमती कार्व्हालो म्हणाल्या, भाषा आणि साहित्य हे काळाला जोडणारे असावे. लेखक, कवि, कवयित्री जेव्हा बोलतात ते समाजाचे मनोगत होते. आपल्या संत कवयित्रींनी श्री विठ्ठलाला आपल्या घरातील पुरुष मानले. त्यातून त्यांनी समस्त स्त्रियांचे मनोगत मांडले. जे आपली पणजी, आजी बोलू शकली नाही ते आताच्या स्त्रिया लिहून व्यक्त होत आहेत, ही चांगली बाब आहे, असेही त्या म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या, जितका माणूस सजग होत असतो तितकी भाषेची समृद्धी सतत होत असते. बोलीभाषेत लेखन झाले पाहिजे. काळाच्या पडद्याआड गेलेले शब्द पुन्हा बाहेर काढले पाहिजेत. महिला लेखकांचा कोश, स्त्रियांच्या कार्याचे कोश तयार केले पाहिजेत. व्याकरणाच्या क्षेत्रात त्या पुढे आल्या पाहिजेत. लोकविज्ञानाचे अभियान करण्यात महिला पुढे आल्या पाहिजेत, असेही त्या म्हणाल्या.

०००

पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मानाची गदा प्रदान

अहिल्यानगर दि.०२:  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या ६७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताबासाठी झालेल्या लढतीत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करीत विजतेपद पटकाविले. स्पर्धेचा विजेता पृथ्वीराज मोहोळ याला उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते मानाची गदा प्रदान करण्यात आली. राज्यातील क्रीडा विकासाला चालना देताना प्रत्येक खेळासाठी आवश्यक आर्थिक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही श्री.पवार यांनी दिली.

मॅट विभागात नांदेडचा (मूळचा पुण्याच्या राजगुरुनगरमधील राक्षेवाडीचा) डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात लढत झाली. यात पृथ्वीराज मोहोळ विजेता ठरला. माती विभागातून सोलापूर जिल्ह्याचा महेंद्र गायकवाड आणि परभणीचा साकेत यादव यांच्यात अंतिम लढत झाली. यात महेंद्र गायकवाड विजेता ठरला.

अहिल्यानगर येथील वाडिया पार्कमध्ये कै.बलभिम अण्णा जगताप क्रीडानगरीत  झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संग्राम जगताप, माऊली खटके, काशिनाथ दाते,  महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै.रामदास तडस, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आदी उपस्थित होते.

स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, राज्यातील क्रीडा रसिकांनी या स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला. स्पर्धेसाठी पारितोषिकेही  मोठी ठेवण्यात आली आहेत. गेले पाच दिवस स्पर्धेच्या भव्य आयोजनाचा आनंद राज्याच्या जनतेला घेता आला. यापुढेदेखील या स्पर्धेचे आयोजन करतांना या स्पर्धेचे दिमाखदार आयोजनाचे आव्हान आयोजकांसमोर असेल. खेळांना प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्य शासनदेखील प्रयत्नशील आहे.  प्रत्येक खेळाच्या विकासासाठी राज्य शासन सहकार्य करेल आणि अहिल्यानगरच्या क्रीडा विकासासाठीदेखील आवश्यक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे भव्य आयोजन झाल्याचे नमूद करून केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ म्हणाले, ही मानाची स्पर्धा आहे. स्व.मामासाहेब मोहोळ यांनी या स्पर्धेला सुरूवात केली. त्यानंतर राज्यात कुस्तीच्या वैभवात भर पडून ही परंपरा आणखी पुढे जात आहे. महाराष्ट्र कुस्तीची पंढरी आहे. राज्याने देशाला अनेक मल्ल दिले. महाराष्ट्राच्या तीन मल्लांना शासनाने वर्ग एक दर्जाच्या पदावर नियुक्ती दिली आहे.  येत्या काळातही कुस्तीला राजाश्रय मिळेल असा विश्वास व्यक्त करून राज्याची ही परंपरा अधिक समृद्ध करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कुस्ती खेळाला डोपींगसारख्या प्रकाराने गालबोट लागू नये यासाठी  येत्या काळात अधिक प्रयत्न होतील असे त्यांनी सांगितले.

विधान परिषदेचे सभापती प्रा.शिंदे  यांनी जिल्ह्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल राज्य शासन आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाला धन्यवाद दिले. कुस्तीप्रेमी जनता चांगल्या खेळालाच प्रोत्साहन देते असे सांगून त्यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, महाराष्ट्र केसरी स्पर्धा अहिल्यानगर वासियांसाठी मोठी पर्वणी आहे. वाडिया पार्कचे मोठ्या स्टेडिअममध्ये रुपांतर करायचे आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या क्रीडा विकासाला चालना मिळेल असे सांगून त्यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उत्तम आयोजनाबद्दल संयोजकांचे अभिनंदन करून क्रीडा मंत्री भरणे म्हणाले, २००५ मध्ये अहिल्यानगरमध्ये ‘हिंद केसरी’ स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. राज्याला कुस्तीची गौरवशाली परंपरा आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्याने मल्ल दिले आहेत. अहिल्यानगरच्या क्रीडा विकासासाठी शासनाकडून आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

प्रास्ताविकात आमदार जगताप यांनी कुस्ती स्पर्धेविषयी माहिती दिली. लाल मातीच्या खेळातून संस्कार होत असल्याने राज्यभरात या खेळाचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या कुस्ती स्पर्धेमुळे  अहिल्यानगरचे नाव प्राधान्याने घेतले जाईल असे ते म्हणाले.

माजी आमदार अरुण जगताप, पद्मश्री पोपट पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, माजी खासदार सुजय विखे पाटील, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, सरचिटणीस हिंदकेसरी पै. योगेश दोडके, चित्रपट दिग्दर्शक प्रविण तरडे,   जिल्हा कुस्तीगीर कार्याध्यक्ष संघाचे संतोष भुजबळ आदी उपस्थित होते.

०००

 

नागपुरातील छोट्या मैदानांच्या विकासासाठी १५० कोटींचा निधी देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. ०२ : खासदार क्रीडा महोत्सवाच्या आयोजनातून नागपूर शहराची क्रीडा क्षेत्रातील वाटचाल गतीने सुरू आहे. शहरात ७०० कोटींच्या खर्चातून मानकापूर क्रीडा संकुलाच्या पुनर्निमाणाद्वारे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा येत्या दोन वर्षात उपलब्ध होणार आहेत. स्थानिक खेळाडुंना सरावासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील छोट्या मैदानांचा विकास करण्यात येईल व यासाठी  महाराष्ट्र शासनाच्यावतीने १५० कोटींचा निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

येथील यशवंत स्टेडियमवर आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपाचे मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, आमदार प्रवीण दटके, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, महोत्सवाचे संयोजक संदीप जोशी, अर्जुन पुरस्कार प्राप्त दिव्यांग खेळाडू शितल देवी, क्रिकेटपटू मोहित शर्मा आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून नागपूर व विदर्भातील खेळाडुंना मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. ५८ क्रीडा प्रकारात विजेत्यांना १२ हजारांवर पदके प्रदान करण्यात आली आहेत, ही अभिमानास्पद बाब आहे. खासदार सांस्कृतिक महोत्सव व क्रीडा महोत्सवातून विदर्भातील गुणवान कलाकार व खेळाडू पुढे येत आहेत. यातून विदर्भ व नागपूरचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवणारे कलाकार व खेळाडू घडतील. शहरात ऑलिम्पीकसह आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने आवश्यक सर्व क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने ७०० कोटींच्या निधीतून मानकापूर विभागीय क्रीडा संकुलाच्या पुनर्निमाणाचे कार्य सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले की, गत सात वर्षांपासून खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून खेळाडूंना संधी उपलब्ध करून देणे, त्यांचा व्यक्तीमत्व विकास साधणे व नेतृत्वही घडवणे हा या मागील मुख्य उद्देश आहे. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शहरातील क्रीडा मैदानाच्या विकासासाठी यापूर्वी १०० कोटींचा निधी दिला आहे. अजूनही छोट्या मैदानांच्या विकासासाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते खेळाडू, प्रशिक्षक आदींना उल्लेखनीय कामगिरीसाठी क्रीडा महर्षी, क्रीडा प्रशिक्षक, क्रीडा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले. शितल देवी आणि मोहित शर्मा यांनीही यावेळी उपस्थितींना मार्गदर्शन केले. खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक संदीप जोशी यांनी प्रास्ताविक केले.

खासदार क्रीडा महोत्सवाचे हे सातवे वर्ष आहे. १२ जानेवारी २०२५ पासून यावर्षीच्या खासदार क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली. २१ दिवस चाललेल्या महोत्सवात ५८ क्रीडा प्रकारात ७७ हजार ६६३ स्पर्धक सहभागी झाले. नागपुरातील ६९ मैदानावर स्पर्धा घेण्यात आल्या. एकूण दीड कोटींची बक्षीस तर १२ हजार ३१७ पदके प्रदान करण्यात आले.

०००

 

आदिवासींसाठी सर्वसमावेशक आरोग्य धोरण करू –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

▪️पारंपारिक आदिवासी उपचार व आधुनिक वैद्यकाचा एकात्मिक उपयोजन महत्वपूर्ण

▪️सेवाभावी संस्थांच्या सहयोगातून गडचिरोली जिल्हा होणार मलेरिया मुक्त

▪️आदिवासी समाजातील निसर्गपूरक उपचाराला आधुनिकतेची जोड मिळावी

नागपूर, दि. ०२ : एम्स  येथील तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत आदिवासींच्या आरोग्याबाबत झालेले तज्ज्ञांचे विचारमंथन अधिक मोलाचे आहे. याबाबत आता पुढचे पाऊल म्हणून परिषदेतील उपस्थित झालेले प्रश्न, त्याची असलेली उत्तरे, तज्ज्ञांच्या सूचना यांना अधोरेखित करून आरोग्य विद्यापीठ, एम्सच्या माध्यमातून आदिवासींच्या आरोग्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे सर्वसमावेशक असे आरोग्य धोरण तयार केले जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ’एम्स’ नागपूर येथे आयोजित आदिवासी आरोग्य परिषदेच्या समारोप समारंभात ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त), ’एम्स’ नागपूरचे संचालक डॉ. प्रशांत जोशी,  परिषदेचे संयोजक डॉ. संजीव चौधरी, विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ उपस्थित होते.

या आरोग्य धोरणात आदिवासींच्या आरोग्य विषयक मूलभूत प्रश्नांवर निश्चित उपाययोजनांचा आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी कुलगुरूंना केल्या. हे धोरण केवळ महाराष्ट्रीय स्तरापुरते मर्यादित न राहता राष्ट्रीय व वैश्विक स्तरावर उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याला महाराष्ट्र शासनातर्फे सर्वातोपरी सहकार्य केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

हजारो वर्षांपासून आदिवासी समाज आपल्या उपजत ज्ञानावर स्वतःचे अस्तित्व टिकून आहे. काळाच्या प्रवाहात अनेक स्थित्यंतरे झाली, मात्र आदिवासी संस्कृती टिकून राहिली. यातील मूल्य, विविध भागातील पारंपारिक आदिवासी उपचार आणि आधुनिक वैद्यकाचा एकत्रित विचार करुन त्याचे उपयोजन केल्यास आदिवासींच्या आरोग्यविषयक मुलभुत सुविधांवर उत्तरे प्राप्त होऊ शकतील असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

आजही आदिवासी क्षेत्रात कुपोषण, सिकलसेल आणि मलेरिया यासारखे मूलभूत प्रश्न आहेत. यावर राज्यशासन व केंद्रसरकारतर्फे विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. अनेक योजनांना यशदेखील प्राप्त होत आहे. सिकलसेल आजार निर्मूलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करूयात, असे आवाहन त्यांनी केले.

या परिषदेसाठी निवडलेले स्थळ व ठिकाण याबद्दल त्यांनी संयोजकांना धन्यवाद दिले. आदिवासी गोंड राजा बख्त बुलंद शाह हे या शहराचे संस्थापक होते. इथे आदिवासी संस्कृतीच्या पाऊलखुणा आहेत असे त्यांनी सांगितले.

बिल गेट्स फाउंडेशन, सनफार्मा, आयसीएमआरए यांच्या सहयोगातून आदिवासी गडचिरोली जिल्हा मलेरियामुक्त करू असे त्यांनी सांगितले.

आदिवासींच्या आरोग्य समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी  MUHS FIST-25  परिषद महत्त्वपूर्ण आहे. या परिषदेच्या माध्यमातून एकत्रित झालेला डेटा धोरण निश्चितीसाठी महत्वपूर्ण आहे विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले.

’एम्स’ नागपूरचे संचालक डॉ. प्रशांत जोशी यांनी प्रास्ताविकात सांगितले की, आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि ’एम्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासींच्या आरोग्य समस्यांसाठी सुरु करण्यात आलेली परिषद नक्कीच जागतिक स्तरावर नावलौकिक करणार आहे. ’एम्स’ तर्फे विविध योजना कार्यान्वीत करण्यात आल्या आहे त्याचा सकारात्मक परिणाम मुर्त रुपात दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.

आदिवासी भागातील लोकांच्या आरोग्य समस्यांसाठी  MUHS FIST-25 च्या यासाठी आरोग्य विद्यापीठाने व ’एम्स’ ने केलेल सहकार्य महत्वपूर्ण आहे.  आदिवासींच्या आरोग्य समस्या सोडविण्यासाठी परिषदेच्या माध्यमातून तरुण पिढीसाठी आदर्श निर्माण झाला आहे. जेणेकरुन सामाजिक काम करण्याची नवीन टीम तयार होईल असे परिषदेचे आयोजक सचिव डॉ. संजीव चौधरी यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी एम्स परिसरात उभारण्यात आलेल्या ट्रायबल व्हिलेज येथे भेट देवून पाहणी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दर्शन दक्षिणदास यांनी केले तसेच उपस्थितांचे आभार MUHS FIST-25 चे संयोजन समितीचे सदस्य संदीप राठोड यांनी केले.

०००

 

 ५० हजार हक्काची घरे देण्यासाठी मिशन मोडवर काम करा -पालकमंत्री प्रकाश आबिटकर 

  • ‘आम्ही सोबती घरकुलाचे’ मोहीमेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

कोल्हापूर, दि. ०२ (जिमाका): प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व अन्य राज्यस्तरीय योजनांतून कोल्हापूर जिल्ह्यातील गरजू कुटुंबांसाठी कमीत कमी 50 हजार हक्काची घरे उपलब्ध करुन देण्यासाठी महसूल, समाज कल्याण, जिल्हा परिषद व संबंधित यंत्रणेने मिशन मोडवर काम करावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केल्या.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण- टप्पा 2 ची आढावा बैठक पालकमंत्री श्री. आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार अशोक माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश गोडसे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे आदी उपस्थित होते.

यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळा सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षित केल्याबद्दल पालकमंत्री श्री. आबिटकर यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, सरपंच व गट विकास अधिकारी, ग्रामसेवक यांना सन्मानित करण्यात आले.

पालकमंत्री श्री. आबिटकर म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वपूर्ण योजना असून राज्य शासनही या योजनेला सर्वतोपरी सहकार्य करत आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मधून जिल्ह्यातील 44 हजार लाभार्थ्यांना या आर्थिक वर्षात घरकुलाचा लाभ देण्यात येणार असून अन्य राज्यस्तरीय योजनांमधून 10 हजार घरकुले अशाप्रकारे किमान 50 हजारांहून अधिक घरकुलांचा लाभ जिल्ह्यातील लाभार्थ्यांना देण्यासाठी चोख नियोजन करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. गरजू कुटुंबांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणेने समर्पित भावनेने काम करावे. लाभार्थ्यांची यादी निश्चित करण्यापासून ते त्यांच्या गृह प्रवेशा पर्यंतची सर्व कामे वेळेत व गतीने मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व ग्रामसेवकांनी परस्पर समन्वय साधून झोकून देऊन काम करावे, असे त्यांनी सूचित केले.

आम्ही सोबती घरकुलाचेया मोहीमेचा पालकमंत्री श्री.आबिटकर यांच्या हस्ते शुभारंभ

प्रधानमंत्री आवास योजना व अन्य राज्यस्तरीय घरकुल योजनेतून लाभार्थ्यांसाठी घरकुले उभी करताना त्यांना मूलभूत सुविधा देणे आवश्यक आहे. यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून ‘आम्ही सोबती घरकुलाचे’ ही मोहीम कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येणार असून या मोहिमेचा शुभारंभ श्री.आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला.

या मोहिमेमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सोबतीने तसेच सर्व प्रशासकीय यंत्रणेमार्फत घरकुल लाभार्थ्यांच्या सोयीसाठी सर्व योजनांचा कृतीसंगम एकाच व्यासपीठावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. बहुतांश लाभार्थी हे ग्रामीण व डोंगरी भागात राहत असल्यामुळे त्यांना चांगल्या सुविधा, आरोग्य, शिक्षण व अन्य सुविधा पुरवून त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. यामुळे लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होईल.

या विषयाच्या अनुषंगाने पालकमंत्री श्री. आबिटकर म्हणाले, जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना घरकुले उपलब्ध करुन देताना ‘आम्ही सोबती घरकुलाचे’ या मोहिमेअंतर्गत पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, आरोग्य, शिक्षण, रस्ते, वीज पुरवठा, कौशल्य प्रशिक्षण, गृह कर्ज देण्यासाठीही चोख नियोजन करा. त्याचबरोबर यासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या देण्याचे काम संबंधित विभागांनी वेळेत पूर्ण करावे. जिल्ह्यातील बहुतांश लाभार्थी हे ग्रामीण व डोंगरी भागात राहत असल्यामुळे त्यांना चांगल्या सुविधा, आरोग्य, शिक्षण व अन्य सुविधा पुरवून त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यासाठी प्रयत्न करा. तसेच ही मोहीम राज्याला मार्गदर्शक ठरेल अशा पद्धतीने काम करुन मोहीम यशस्वी करा, असेही त्यांनी सूचित केले.

जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, आजवर प्रत्येक योजना कोल्हापूर जिल्ह्यात यशस्वीपणे राबवण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचे काम प्रभावीपणे करून राज्यात कोल्हापूर जिल्हा अग्रेसर ठरण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.

१० एप्रिल पर्यंत घरकुल बांधून पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना बक्षीस

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी या योजनेचे सादरीकरण केले. ते म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजने मधून चालू आर्थिक वर्षात सुमारे 700 कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला उपलब्ध झाला आहे. प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात जवळपास 94 टक्के घरकुले पूर्ण करण्यात आली आहेत. या दुसऱ्या टप्प्यातही घरे उपलब्ध करुन देताना विविध योजनांचा कृती संगम घडवून लाभार्थ्यांना सर्व सोयीसुविधांनी युक्त घरकुले उपलब्ध करुन देण्याचे नियोजन केले आहे. घर गृहलक्ष्मीचे, प्रधानमंत्री सूर्य घर, गृह कर्ज, हर घर जल, उज्वला गॅस, स्वच्छ भारत मिशन, तसेच वीज कनेक्शन देण्यात येणार आहे. तसेच नाविन्यपूर्ण योजनेतून बहुमजली इमारती उभ्या करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प म्हणून प्रीकास्ट तंत्रज्ञानाचा वापर करुन घरकुलाची निर्मिती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

आम्ही सोबती घरकुलाचे या मोहिमे अंतर्गत घरकुलाचे काम स्पर्धात्मक होण्यासाठी एक विशेष प्रतियोगिता सुरु करण्यात आली आहे. 2 फेब्रुवारी ते 10 एप्रिल 2025 या कालावधीत घराचे काम पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना बक्षीस स्वरुपात गृहोपयोगी वस्तू देण्यात येणार असून लाभार्थ्यांनी या मोहिमेचा लाभ घेवून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी 10 एप्रिल पर्यंत आपले घरकुल बांधून पूर्ण करावे, असे आवाहन कार्तिकेयन एस. यांनी केले.

बैठकीला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नाबार्डचे व्यवस्थापक, गटविकास अधिकारी, ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक तसेच संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

०००

नूतनीकरण केलेल्या जिल्हाधिकारी दालनाचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूर,दि. ०२ : जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी यांच्या सुसज्ज दालनाचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या नूतनीकरण केलेल्या दालनासह राजर्षी शाहू सभागृह, अभ्यागतांसाठी प्रतिक्षा कक्ष व स्वीय सहायक कक्षाचेही नूतनीकरण करण्यात आले आहे.  यावेळी नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास, औकाफ  राज्यमंत्री तथा सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ, खासदार छत्रपती शाहु महाराज, खासदार धैर्यशील माने, सर्वश्री आमदार चंद्रदीप नरके, अमल महाडिक, डॉ. अशोकराव माने, शिवाजी पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे आदी उपस्थित होते.

०००

जळव ते बामणेवाडी रस्ता कामाचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते भूमिपूजन

सातारा दि.२ (जिमाका):  मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्रमांक २ रिसर्च अँड डेव्हलपमेंट या योजनेमधून मंजूर टीआर १७ ते सीपीआर ७ जळव ते बामणेवाडी या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाले.

जळव ते बामणेवाडी या काँक्रिटीकरण रस्ता कामाचे भूमिपूजन जळवफाटा येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच रामचंद्र पवार , विश्वास पवार , विजयराव सपकाळ,  अभियंता कांबळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले की, जळव ते बामणेवाडी या रस्त्याच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता दहा कोटी 17 लाखाची असून तांत्रिक मंजुरी आठ कोटी पंधरा लाखाची मिळाली आहे या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी दहा वर्षात 47 लाख 64 हजार रुपये लागणार आहेत. या अनेक वर्षे मागणी होत असलेल्या रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना चांगली सुविधा निर्माण होणार आहे. सदरचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच कामाचा दर्जा चांगला राखावा अशी सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी यांनी दिली.

०००

परदेशात मराठीचे जतन, संवर्धन करणाऱ्या मराठी माणसांच्या संस्थांना आर्थिक मदत देणार- मंत्री उदय सामंत

पुणे, दि. ०२: राज्य शासनाची कोणतीही आर्थिक मदत न घेता परदेशात आपली मराठी माणसे मराठीचे संवर्धन, जतन करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन या परदेशातील मराठीचे काम करणाऱ्या संस्थांच्या मागे राज्य शासन आर्थिक ताकत निश्चितपणे उभी करेल, अशी ग्वाही मराठी भाषा मंत्र उदय सामंत यांनी दिली. पुढील वर्षात होणारे चौथे विश्व मराठी संमेलन हे नाशिक येथे आयोजित करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

फर्ग्युसन महाविद्यालय येथे आयोजित तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी रितेश देशमुख यांना पहिला ‘विश्व मराठी संमेलन- कलारत्न पुरस्कार’ देण्यात आला.

मंचावर राज ठाकरे, सयाजी शिंदे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, माजी आमदार उल्हास पवार, पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे आदी उपस्थित होते.

मराठी भाषेचा मंत्री असणे यामुळे मी मला भाग्यवान समजतो, अशी भावना व्यक्त करुन मंत्री श्री. सामंत म्हणाले, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी ही 2 हजार वर्षापूर्वीची असल्याचे पुरावे केंद्राकडे सादर करण्यासाठी 12 वर्षे लागली. परंतु, गतवर्षी आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आता राज्याच्या अर्थसंकल्पात मराठी भाषा विभागाला भरीव तरतूद करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

या संमेलनासाठी परदेशातून आलेल्या मराठी माणसांना येण्यासाठी आर्थिक मदत देण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु, यापैकी 80 टक्क्याहून अधिक जणांनी ही मदत नाकारली असून ती रक्कम मराठीच्या संवर्धनासाठी मराठी भाषा विभागाने वापरावी असे सांगितले आहे. हे मराठी माणसाचे मोठेपण आहे, असेही श्री. सामंत म्हणाले.

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, इतर देश, राज्यातील लोक जसे आपल्या भाषेवर ठाम राहतात, त्याप्रमाणे मराठी माणसाने आपल्या भाषेवर ठाम राहिले पाहिजे. आपल्या साहित्यिकांनी मार्ग दाखविला पाहिजे, बोलले पाहिजे. चांगले- वाईट समाजाला सांगितले पाहिजे. साहित्यिक जेव्हा बोलतील, तेव्हा लोक त्यांना ऐकतील आणि त्यांची पुस्तकेही वाचतील; आणि पुस्तकांतून प्रबोधन होईल. तरुणांनी पुस्तके वाचली पाहिजेत. पुस्तकांचा आणि ज्ञानाचा प्रचार प्रत्येक मराठी घरात गेला पाहिजे. महाराष्ट्र हा मराठी भाषिक म्हणून एकत्र आला पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

अभिनेते श्री. देशमुख म्हणाले, मराठी घरात जन्म घेणे हेच आपले भाग्य असते. आपण १० वर्षात हिंदी चित्रपटसृष्टीत काम केल्यानंतर वडिलांनी मराठी चित्रपटांच्या अनुषंगाने विचारल्यानंतर ‘लय भारी’ हा चित्रपट केला जो प्रचंड लोकप्रिय ठरला. गेल्या १३ वर्षात केवळ मराठी चित्रपटांचीच निर्मिती केल्याचे श्री. देशमुख यांनी आवर्जून सांगितले.

आपले आयुष्य पुस्तकातून घडल्याचे सांगून अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले, दुसऱ्याने सांगून विचार बदलत नसतात. आपण आपल्यापासून सुरुवात केल्यावरच बदल होऊ शकतो. आपल्याला इतर कोणत्याही भाषेतील चित्रपटात काम करायचे असल्यास त्यातील संवाद हे मराठीतच लिहून घेतो आणि बोलतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

०००

नवकल्पना आणि संशोधनाच्या आधारे ज्ञानाधिष्ठित भारताची निर्मिती करणे शक्य- डॉ. रघुनाथ माशेलकर

  • विश्व मराठी संमेलनात मराठी उद्योजकांच्या चर्चासत्राचे आयोजन

पुणे, दि. २:  संपूर्ण जगात ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेला खूप महत्त्व आहे; नवकल्पना आणि संशोधनाच्या माध्यमातून ज्ञानाधिष्ठित भारताची निर्मिती  करुन मोठी मजल मारू शकतो, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.

‘विश्व मराठी संमेलन – २०२५’ अंतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुख्य मंच येथे आयोजित मराठी उद्योजकांच्या चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्रात ‘बीव्हिजी ग्रुप’चे प्रमुख हणमंतराव गायकवाड, नाशिक येथील सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदे, गर्जे मराठी ग्लोबलचे आनंद गानू देखील सहभागी झाले होते. चर्चासत्राचे निवेदन जयू भाटकर यांनी केले.

जगामध्ये हवामान बदलाची समस्या मोठी असून त्यावर मात करण्यासाठी हायड्रोजन फ्युएल सेल व इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या बॅटरी उत्पादनात भारतामध्ये सर्वात जास्त काम महाराष्ट्रात करण्यात येत आहे. त्यामुळे हरित ऊर्जेच्या तंत्रज्ञानात आपण जगात नेतृत्व करू शकतो, असे सांगून डॉ. माशेलकर म्हणाले, देशाच्या १५ टक्के औद्योगिक उत्पादन महाराष्ट्रात होते. तथापि, औद्योगिक उत्पादन क्षेत्रात संशोधनासाठी खूप कमी गुंतवणूक होत असते. त्यामुळे काल जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात खासगी क्षेत्रासाठी करण्यात आलेली २० हजार कोटी रुपयांची तरतूद खूप महत्त्वाची करणार आहे, असेही ते म्हणाले.

संशोधन हे पैशाचे ज्ञानात रूपांतर करते, तर नवकल्पना या ज्ञानाचे पैशांमध्ये रूपांतर करतात, असे सांगून ते पुढे म्हणाले, नवकल्पनांच्या आधारे स्टार्टअप निर्माण होण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. २०१६ मध्ये असलेली ४७६ च्या तुलनेत २०२१ मध्ये देशात ७० हजार स्टार्टअप निर्माण झाले आहेत. त्यातील २०१६ मध्ये वर्षाला त्यापैकी युनिकॉर्न स्टार्टअप निर्माण व्हायचा, मात्र २०२१ मध्ये दर आठवड्याला एक युनिकॉर्न येत आहे. त्यातही ५० टक्के हे महाराष्ट्रातील तिसऱ्या व दुसऱ्या स्तरातील शहरातून येत आहेत ही त्यातील आणखी विशेष बाब आहे. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा उभ्या राहणे हे त्यामागील महत्वाचे कारण आहे, असेही ते म्हणाले.

शिक्षण हे भविष्य घडवते असे सांगून, तुम्ही कुठे जन्मलात, कोणाच्या पोटी जन्मला, आपल्या परिस्थितीत जन्मला याला महत्त्व नसते, तर तुमचे भविष्य तुमच्या हातात असते, असा मोलाचा सल्ला डॉ. माशेलकर यांनी तरुणांना दिला. पाच वर्षांपूर्वी नवीन शैक्षणिक धोरण आल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी माशेलकर समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर आज एआयमुळे जगात खूप बदल झाला आहे. त्यामुळे केवळ ‘शिक्षणाचा हक्क’ याबाबतच नव्हे तर ‘योग्य शिक्षण’ आणि ‘योग्य मार्गाने शिक्षण’ यावरही भर द्यावा लागेल. तंत्रज्ञान वेगाने बदलत असल्याने या शिक्षणाचा बदलणाऱ्या भविष्यामध्ये वेगळा विचार करावा लागेल, असेही ते म्हणाले.

हणमंतराव गायकवाड यांनी दहा बाय दहाच्या खोलीतून झालेला आपल्या संघर्षमय जीवनाचा प्रवास उलगडून सांगितला. ते पुढे म्हणाले, टेल्को कंपनीमध्ये काम करत असताना काम करत असताना समाजासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने ‘भारत विकास प्रतिष्ठान’ची स्थापना केली.  ‘बीव्हिजी’ या नाममुद्रेची स्थापना करून आपल्या गावच्या लोकांना मोठ्या कंपन्यांत स्वच्छतेचे काम दिले. पुढे राष्ट्रपती भवन, संसद, प्रधानमंत्री कार्यालय, सर्वोच्च न्यायालय, विमानतळे जागतिक महत्वाच्या कंपन्या आदी ठिकाणी सचोटीने, प्रामाणिकपणे काम करत स्वच्छतेचे काम मिळवले. प्रत्येकात पुढे जाण्याची प्रचंड ताकद आहे फक्त कष्ट करण्याची तयारी पाहिजे आणि रात्रंदिवस ध्यास घेतला पाहिजे, असा सल्ला त्यांनी युवा वर्गाला दिला.

आपली संस्था कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य तसेच आयुर्वेदामध्ये संशोधन करीत आहे. दहा कोटी लोकांच्या आयुष्यात बदल घडवणे, दहा लाख लोकांना काम देणे आणि शंभर देशात आपल्या संस्थेला घेऊन जाणे हे आपले स्वप्न आहे, असे सांगून श्री. गायकवाड पुढे म्हणाले, संपूर्ण जग विस्तारले आहे. ब्रिटिश राणीने ब्रिटिशांना जी प्रेरणा दिली होती की संपूर्ण जगात जाऊन राज्य करा, ती प्रेरणा आपल्या तरुणांनी घ्यायची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद यांचा आदर्श घेतला पाहिजे. तसेच आपल्या मनातील कक्षा रुंदावल्या पाहिजेत. भारत सरकारने ‘बीव्हिजी’ बरोबर एक कंपनी स्थापन केली असून आता तीस लाख नोकऱ्या यातून उपलब्ध आहे. फक्त यासाठी घराचे स्वरूप आणि शिक्षण यातील तफावत भरून काढली पाहिजे, असेही ते म्हणाले.

श्री. गानू म्हणाले, परदेशात गेल्यावर आपल्या देशासाठी खूप काही करण्याची गरज आहे असे लक्षात आले. त्यावेळी दोन औषध कंपन्या स्थापन केल्या. यश, पैसे मिळत होते. परंतु, हे फक्त स्वतःसाठी करत असल्याची भावना होती. मग समाजासाठी काम केले पाहिजे ही भावना निर्माण झाली आणि २००५ पासून सामाजिक कार्य सुरू केले. त्यातून गर्जे मराठी ग्लोबल ना- नफा संस्थेची स्थापना केली. आज संस्थेत २५ देशातील १५ हजाराहून अधिक लोक एकत्र येऊन काम करत आहेत. जगभरातील मराठी माणसांचे जाळे निर्माण करणे, धडपडणाऱ्या कष्टाळू नव्या पिढीचे मार्गदर्शक बनणे, त्यांना उद्योजकता, व्यवसायासाठी मदतीची यंत्रणा करणे यासाठी काम करण्यात येत आहे. नव्या पिढीला उद्योगासाठी परदेशात जाण्यासाठी, परदेशातील आपल्या माणसांना भारतात उद्योगासाठी येण्यासाठी, नवीन उद्योग स्थापन करण्यास मार्गदर्शन करण्यास आपली संस्था तयार असून राज्य शासनही त्यासाठी आम्हाला मदत करत आहे, असेही ते म्हणाले.

श्री. शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि हक्क मिळविण्यासाठी, आपल्या कष्टाचे दाम मिळविण्यासाठी सकारात्मक मार्ग स्वीकारून शेतकऱ्यांना एकत्र केले आणि सह्याद्री फार्म्सची स्थापना केली. १० शेतकऱ्यांपासून सुरुवात करून आज २६ हजार शेतकरी या शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद आहेत. ही सर्व सभासद शेतकरी मालक असलेली पूर्ण सहकारी तत्त्वावरील कॉर्पोरेट कंपनी आहे. टोमॅटो, द्राक्षे, भाजीपाला उत्पादनासाठी सभासदांना सर्व प्रकारचे सहाय्य, ताजा कृषी माल विक्री व्यवस्था, काढणीपश्चात प्रक्रिया यात काम करण्यात येत आहे. भारतीय शेतकरी जगामध्ये आपला झेंडा रोवू शकतो हे आपल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी दाखविले आहे. कंपनीने पुढील काळात पूर्ण राज्यभरात पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्यानुसार काम सुरू आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी डॉ. माशेलकर यांचा जीवनपट व कार्यावर आधारित चित्रफीत दाखविण्यात आली.

०००

 

मंत्रालय प्रवेशासाठीच्या एफआरएस तंत्रज्ञानामुळे सुरक्षितता, पारदर्शकतेमध्ये होणार वाढ

मुंबई, दि. ०२: मंत्रालयामध्ये प्रवेशासाठी लागू करण्यात आलेल्या फेस डिटेक्शनवर आधारित एफआरएस तंत्रज्ञानामुळे मंत्रालयाच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होण्याबरोबरच शासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता आणि गती येण्यात मदत होणार आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी या सर्वांनी या प्रणालीसाठीची आवश्यक नोंदणी करून घ्यावी, जेणेकरून सर्वांचा प्रवेश सुलभ होईल, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

या प्रणालीमुळे मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख सुनिश्चित होणार आहे. अनधिकृत प्रवेशाला चाप बसणार आहे. अनुचित प्रवेश रोखले जाणार असून त्यामुळे मंत्रालयाच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होणार आहे. या तंत्रज्ञानामुळे अनधिकृत प्रवृत्तींनाही चाप बसणार आहे. यामुळे मंत्रालयातील गर्दीवर नियंत्रण येऊन शासकीय कामकाजात अधिक सुलभता आणि पारदर्शकता येऊ शकेल. या तंत्रज्ञानामुळे योग्य व्यक्तींना अधिकृतपणे प्रवेश मिळणार असून त्यामुळे लोकांची कामे जलद गतीने होण्यात मदत मिळणार आहे.

अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांच्या प्रवेशासाठी विविध सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवेशामध्ये अडचणी येणार नाहीत. तथापि, यासाठी सर्व संबंधितांनी फेस डिटेक्शनसंदर्भातील नोंदणी करणे आवश्यक राहील. सर्वांनी यासाठीची नोंदणी आणि फेस डिटेक्शन त्वरित करून घ्यावे.

अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या  फेस रीडिंग संदर्भातील आवश्यक डेटा हा तातडीने अपलोड करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जेणेकरून फेस रीडिंग प्रणाली अपडेट होऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रवेश सुलभ होईल.

मंत्रालय सुरक्षेच्या अनुषंगाने मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांचे फेशियल रिकॉग्नीनेशन   आणि आरएफआयडी कार्ड आधारित प्रवेश देण्यात येत आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त मंत्रालयातील १० हजार ५०० अधिकारी/कर्मचारी यांचा तपशिल सदर प्रणालीमध्ये सादर करण्यात आलेला आहे. त्यानुषंगाने कार्यान्वयन कंपनीमार्फत सर्व प्रवेशद्वार येथे फेशियल रिकॉग्नीनेशन यंत्रणा प्रस्थापित करण्यात आली आहे.  ही यंत्रणा ‘ गो लाईव्ह’  करण्यात आली आहे.  जानेवारी २०२५ पासुन मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारी यांना फेशियल रिकॉग्नीनेशन व आरएफआयडी कार्ड आधारित प्रवेश देण्यात येत आहे.

मंत्रालय हे ठिकाण अत्यंत संवेदनशील व महत्त्वाचे असल्याने सदर आस्थापनेची सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्याअनुषंगाने मंत्रालय अंतर्गत सुरक्षा प्रकल्प राबविण्याचा निर्णय शासन स्तरावरुन घेण्यात आला आहे. सुरक्षा प्रकल्प हा  एक आणि दोन टप्प्यात राबविण्यात येत आहे.  मंत्रालय परिसर एकात्मिक सुरक्षा आणि देखरेख अंतर्गत टप्पा २ हा प्रकल्प हा टप्पा एक या प्रकल्पाचा नैसर्गिक विस्तार म्हणून टप्पा २ प्रकल्प राबविण्यात येत आहे.

मंत्रालय सुरक्षा प्रकल्प  टप्पा – २ मधील कामांचे कार्यान्वयन व वार्षिक देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. तसेच अभ्यांगताना तसेच क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना डिजी प्रवेश या ॲप आधारीत ऑनलाईन प्रणालीमार्फत मंत्रालय प्रवेश सुनिश्चीत करण्यात येणारआहे.

०००

कर्नाटक परिवहनच्या प्रतिष्ठित सेवेचे प्रयोग महाराष्ट्रातही शक्य – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. ०२: कर्नाटक राज्य परिवहन सेवेची लांब पल्ल्याची ‘प्रतिष्ठित सेवा’ अतिशय लोकप्रिय असून आदरातिथ्य व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या सेवेला प्रवाशांची चांगली पसंती आहे. अशाच प्रकारचा प्रयोग महाराष्ट्रात देखील करणे शक्य आहे,  असे प्रशंसोद्गार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काढले. कर्नाटक दौऱ्यावर असताना बंगळुरू येथील कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाच्या भेटी दरम्यान ते बोलत होते.

मंत्री  प्रताप सरनाईक यांनी बंगळुरू येथे कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांच्यासोबत कर्नाटक राज्याचे परिवहन मंत्री डॉ. रामलिंगा रेड्डी यांच्यासह राज्याचे परिवहन सचिव डॉ. एन. व्ही. प्रसाद व कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष रिझवान नवाब तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, नितीन मैद (महाव्यवस्थापक वाहतूक) व नंदकुमार कोलारकर (महाव्यवस्थापक यंत्र ) हे अधिकारी उपस्थित होते.

या वेळी मंत्री श्री. सरनाईक यांनी कर्नाटक राज्य परिवहन सेवेद्वारे चालवल्या जाणाऱ्या अंबारी, ऐरावत, राजहंस यासारख्या प्रीमियम सेवेच्या बसेस बरोबर इतर बसेसची पहाणी केली.  तसेच या बसेस कशा पद्धतीने चालवल्या जातात याची माहिती घेतली. आदरातिथ्य व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या बस सेवेला प्रवाशांची चांगली पसंती आहे. खाजगी बसेसच्या तुलनेमध्ये सुरक्षित आणि वेळेवर सेवा देण्यासाठी या बस सेवा अतिशय प्रसिद्ध आहे.

या वेळी कर्नाटक परिवहन सेवेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या राज्यात सध्या चालवल्या जात असलेल्या सर्व प्रकारच्या बसेस मंत्री श्री.  सरनाईक यांना दाखविल्या. त्यामध्ये 9 ते 15 मीटर पर्यंतच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बसेस उभ्या करण्यात आल्या होत्या. अगदी डोंगरी भागापासून हम रस्त्यावर धावतील अशा वेगवेगळ्या इंजिन आणि आसन क्षमतेच्या, विविध सोयी -सुविधा असलेल्या बसेस कशाप्रकारे गरजेनुसार प्रवाशांसाठी उपलब्ध केले जातात, याची माहिती यावेळी त्यांना देण्यात आली. तसेच लांब पल्ल्याची सेवा देणाऱ्या बसेस मध्ये ‘वायफाय’ पासून ‘युरिनल’ पर्यंत सोयीसुविधा प्रवाशांसाठी कशा प्राप्त करून दिल्या जातात. तसेच ई-तिकीट आणि ऑनलाईन तिकीट बुकिंग ची सेवा देखील प्रवाशांना उपलब्ध करून दिली आहे, हे देखील यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी मंत्री श्री. सरनाईक यांना सांगितले.

दरम्यान परिवहन सेवेच्या सादरीकरणात माहिती देताना, संपूर्ण राज्याचे व्यवस्थापन वेगवेगळ्या चार प्रादेशिक विभागांमध्ये विभागण्यात आले असून त्यासाठी प्रत्येक विभागाला आयएएस दर्जाचे एक अधिकारी नेमण्यात आलेले आहेत. तसेच राज्यस्तरावर या सर्वांचे संचालन करण्यासाठी वरिष्ठ आयएएस दर्जाचे अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्यामुळे एकूण राज्याच्या परिवहन सेवेमध्ये सुसूत्रता आणणे आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा प्राप्त करून देणे यासाठी प्रशासकीय रचनेमध्ये केलेले सकारात्मक बदल महत्त्वाची भूमिका बजावतात यांची माहिती देखील मंत्री श्री. सरनाईक यांना देण्यात आली.

मंत्री श्री. सरनाईक म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे की, इतर राज्यात ज्या चांगल्या गोष्टी घडत आहेत, त्यांना भेट देऊन त्या आपल्या राज्यात कशा अमलात आणता येतील याचा अभ्यास करावा.  जेणेकरून विविध ठिकाणच्या नाविन्यपूर्ण योजना आपल्या राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होतील. याचाच एक भाग म्हणून कर्नाटक राज्य मार्ग परिवहन सेवेमार्फत चालवल्या जाणाऱ्या ऐरावत, अंबारी, राजहंस यासारख्या प्रतिष्ठित लांब पल्ल्याच्या सेवेची माहिती करून घेणे, तसेच त्यांच्या प्रादेशिक परिवहन व्यवस्थापनाचा अभ्यास करणे, त्याबरोबर त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी राबवत असलेल्या प्रोत्साहन योजना जाणून घेण्यासाठी या दौऱ्याची आखणी केली होती. यावेळी बंगळुरू येथील कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्यालयात कर्नाटक परिवहन सेवेचे सादरीकरण करण्यात आले.

०००

ताज्या बातम्या

आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत जेईई – सीईटीची कोचिंग

0
चंद्रपूर, दि. 6 : ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाखाणण्याजोगी असते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे किंवा संधी उपलब्ध न झाल्यामुळे असे विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे...

पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडून आदिवासी विकास विभागाचा आढावा

0
चंद्रपूर, दि. 6 : पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शनिवारी, जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाचा आढावा घेतला. तसेच राज्य शासनाने सुरू केलेल्या 100 दिवस प्रशासकीय...

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रयाण

0
मुंबई, दि. ६ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने आज दुपारी २.०० वाजता कोची येथे प्रयाण झाले. यावेळी  अतिरिक्त मुख्य सचिव व...

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!

0
ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत मुंबई, दि.  : - ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ प्रकल्पांचे कौतुक

0
पंढरपूर दि. ६  : पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच व्हिडिओ...