सोमवार, जुलै 7, 2025
Home Blog Page 303

चला, अभिमानाने मराठीत बोलूया, लिहूया आणि तिचा सन्मान वाढवूया

मराठी भाषा ही भारताच्या महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा असून सुमारे ८ कोटी लोकांची मातृभाषा आहे. संस्कृतप्रभवित असलेल्या या भाषेचा समृद्ध साहित्यिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. मराठी भाषेचा उगम साधारणतः ९ व्या- १० व्या शतकात प्राकृत-अपभ्रंशातून झाला. याचा उल्लेख अनेक शिलालेखांमध्ये आढळतो. ११ व्या शतकातील हेमाडपंती लिपी आणि संत ज्ञानेश्वरांचे ज्ञानेश्वरी हे ग्रंथ मराठी भाषेच्या प्राचीनतेचे साक्षीदार आहेत. शिवकालीन काळात मराठीला अधिक महत्त्व प्राप्त झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीचा वापर करून तिला सन्मान दिला.

मराठीत संत, कवी, लेखक, विचारवंत यांनी अमूल्य योगदान दिले आहे. संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांच्या अभंगांनी भक्तिसंप्रदाय वृद्धिंगत केला. आधुनिक काळात पु. ल. देशपांडे, वि. स. खांडेकर, शिवाजी सावंत, राम गणेश गडकरी यांसारख्या लेखकांनी साहित्यविश्व समृद्ध केले.

आजच्या डिजिटल युगात मराठी भाषा विविध माध्यमांतून पुढे जात आहे. मराठी चित्रपट, साहित्य, वृत्तपत्रे आणि समाजमाध्यमे यामुळे ती अधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे. शालेय आणि उच्च शिक्षणात मराठीला अधिक महत्त्व मिळावे यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत.

मराठी भाषेसमोर इंग्रजीच्या प्रभावाचे मोठे आव्हान आहे. तरुण पिढीला मराठीकडे आकर्षित करण्यासाठी तंत्रज्ञान, शिक्षण आणि उद्योगांमध्ये मराठीचा अधिकाधिक वापर करण्याची गरज आहे.

मराठी ही केवळ एक भाषा नसून ती महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि संस्कृतीचा आत्मा आहे. तिचे जतन आणि संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे. चला, अभिमानाने मराठीत बोलूया, लिहूया आणि तिचा सन्मान वाढवूया!

तुषार पिलाजी उरकांदे

वरिष्ठ लिपीक

जिल्हा माहिती कार्यालय

गोंदिया

भाषेच्या इतिहासात अकोल्याचे स्थान अनन्यसाधारण

‘तुमचा अस्मात् मी नेणे गा : मज श्रीचक्रधरे निरुपल्ली मऱ्हाटी : तियाचि पुसा :’ हा मराठी बाणा व-हाडाने कायम जपला आहे. संत चक्रधरांचे शिष्य आचार्य नागदेव हे व-हाडातील. त्यांनी केशिराजांसारख्या संस्कृतज्ञ शिष्यांकडून त्यांनी मराठी भाषेत ग्रंथरचना करवून घेतली. मराठी भाषेच्या इतिहासात व-हाडभूमीचे आणि अकोल्याचेही स्थान अनन्यसाधारण आहे.

महानुभाव पंथाचे संस्थापक श्रीचक्रधर यांनी आपल्या तत्त्वज्ञानाचा मराठी या लोकभाषेत प्रचार केला. पंथाचे आचार्य नागदेव यांनीही हा दृष्टिकोन कटाक्षाने आचरणात आणला. या तत्वज्ञान व लोकभाषेच्या आग्रहापोटी मराठी भाषेत अमूल्य ग्रंथसंपदा निर्माण झाली. याच भूमीत मराठी भाषेचा आद्य मराठी ग्रंथ लीळाचरित्र लिहिला गेला.

श्री चक्रधर स्वामींनी ज्ञान आणि भक्ती यांचा समन्वय करून तत्त्वज्ञानाचा प्रसार केला. धर्माचे तत्वज्ञान जनभाषेत सांगितले. श्री चक्रधरस्वामी आणि पुढे इतर संतांनी केलेला लोकभाषेचा पुरस्कार हे या काळातील एक मोठे सांस्कृतिक कार्य होते. हा व-हाडाचा आणि महाराष्ट्राचा गौरवास्पद इतिहास आहे.

महानुभाव पंथांमध्ये सात ग्रंथ प्रसिद्ध आहेत. यापैकी ज्ञानप्रबोध या ग्रंथाचे लिखाण पं. विश्वनाथ बाळापूरकर यांनी अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे केले होते. या ग्रंथात बाराशे ओव्या असून, काव्याची बैठक पारमार्थिक आहेते. काव्य व तत्त्वज्ञान यांचा संगम; वैराग्याची व भक्तीची शिकवण या ग्रंथात आहे.

महानुभाव पंथाचे आद्य प्रवर्तक सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांनी अकोला जिल्ह्यात आठ ठिकाणी भेट दिल्याचे सांगितले जाते. त्यात मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी व माना, अकोला तालुक्यातील येळवण, बार्शिटाकळी तालुक्यातील बार्शिटाकळी व भटाळी, तसेच पातूर तालुक्यातील आलेगाव व भटाळी या गावांचा समावेश आहे. चक्रधरस्वामींच्या जिल्ह्यातील संचारामुळे येथील भूमीत तीर्थक्षेत्रे व त्यांना अनुसरणारा संप्रदाय निर्माण झाली.

संकलन : हर्षवर्धन पवार, अकोला

ही साहित्य संमेलने कोणाची?

दिल्ली येथे दिनांक २१,२२,२३ फेब्रुवारी २०२५ या काळात डॉ. तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, पुणे आणि सरहद्द, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे. या संमेलनाचे उद्घाटक प्रत्यक्ष पंतप्रधान मोदी आहेत . ७१ वर्षानंतर दिल्लीत असे साहित्य संमेलन दुसऱ्यांना भरत आहे .१९५४ साली  ३७ वे साहित्य संमेलन लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत भरले होते. त्यावेळी उद्घाटन होत असताना व्यासपीठावर पंतप्रधान नेहरू आणि लोकसभेचे सभापती ग .वा. माळवणकर उपस्थित होते. या दोन्ही साहित्य संमेलनांची वैशिष्ट्ये म्हणावित ती म्हणजे दोन्ही साहित्य संमेलनांना त्या त्या काळचे देशाचे पंतप्रधान व्यासपीठावर उपस्थित राहिले आहेत.

* साहित्य संमेलनाची पूर्वपिठीका –

इ.स. १८७८ मध्ये पुणे येथे पहिले मराठी साहित्य संमेलन न्यायमूर्ती रानडे आणि लोकहितवादी यांच्या पुढाकारातून झाले होते. त्या संमेलनाचा  मुख्य उद्देश ग्रंथ प्रसारास चालना देणे हा होता .त्यामुळे अशा विचारांच्या मंडळींनी एकत्र येऊन विचार विनिमय करावा म्हणून हे संमेलन आयोजित केले होते. त्यावेळी या संमेलनास ग्रंथकार सभा किंवा ग्रंथकार  परिषद असे म्हटले गेले होते. यात विविध ग्रंथकारांना आमंत्रित करण्यात आले होते. तशा पद्धतीचे आवाहन ज्ञानप्रकाश मध्ये ७ फेब्रुवारी १८७८ मध्ये प्रकाशित करण्यात आलेले होते.

या परिषदेचे अध्यक्ष न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे होते. नंतर दुसरे वार्षिक मराठी साहित्य संमेलन २४ मे १८८५ मध्ये पुणे येथे कृष्णशास्त्री राजवाडे यांच्या अध्यक्षतेखाली भरणार होते. या संमेलनाचे निमंत्रण आयोजक न्यायमूर्ती रानडे यांनी महात्मा फुले यांना पत्राद्वारे पाठविले होते. त्यावेळी महात्मा फुल्यांनी या ग्रंथकार सभेस उद्देशून ‘उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या तुमच्या घालमोड्या दादांच्या साहित्य संमेलनाला मी येणार नाही ‘असे कडक शब्दांत संबोधले होते. या पत्रातील महत्त्वाचा मुद्दा पुढीलप्रमाणे होता -सामान्यतः मानवी हक्कांचा विचार करण्यास जी मंडळी नकार देतात. जे ते इतरांना मान्य करत नाहीत आणि त्यांच्या वर्तनानुसार भविष्यात ते मान्य करण्याची शक्यता कमी आहे त्यांच्या परिषदा आणि पुस्तके आपल्याला अर्थपूर्ण वाटत नाहीत.

महात्मा फुले यांचे हे पत्र ११ जून १८८५च्या ज्ञानोदय वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते. महत्वाची बाब म्हणजे या साहित्य संमेलनाच्यावेळी निमंत्रितांपैकी ज्या मंडळींनी आपल्या भावना पत्रांद्वारे कळविल्या होत्या अशा एकूण 43 पत्रांचे वाचन केले गेले .आणि त्यात पहिले पत्र महात्मा फुले यांचे होते. खरे तर हा आयोजकांचा मोठेपणा होता.

* साहित्य संमेलनाचे वेळोवेळी होत गेलेले नामांतर-

अगदी सुरुवातीचे म्हणजे १८५८ चे पुणे येथे संपन्न झालेले साहित्य संमेलन हे ग्रंथकार संमेलन किंवा ग्रंथकार सभा,परिषद  म्हणून नामनिर्देशित झाले. त्यानंतर १९०७ मध्ये या संमेलनास लेखक संमेलन असे संबोधले गेले. तर १९०९मध्ये महाराष्ट्र साहित्य संमेलन असे त्याचे नामाभिधान केले गेले. मध्यंतरीच्या काळात पुन्हा एकदा मराठी साहित्य संमेलन असे नाव बदलण्यात आले. १९३५ ते १९५३ या काळात महाराष्ट्र साहित्य संमेलन या नावाने ओळखले जाऊ लागले. पुन्हा १९५४ मध्ये मराठी साहित्य संमेलन असे नाव योजले गेले. १९६१ मध्ये अखिल भारतीय मराठी महामंडळाकडे साहित्य संमेलनाचा कारभार गेला. कारण त्यावेळेस या महामंडळाची स्थापना करण्यात आली.

ही स्थापना करताना मराठी भाषेचे, साहित्याचे आणि संस्कृतीचे प्रश्न सोडविण्यासाठी  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने भरविणे हा उद्देश ठरविण्यात आला.  तेव्हापासून आजपर्यंत संमेलने भरविण्याची  ही परंपरा कायम आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ ही संस्था संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यावर महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, मुंबई साहित्य संघ ,मुंबई, विदर्भ साहित्य संघ, नागपूर आणि मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद या संस्थांचे मिळून  स्थापन करण्यात आली. दर तीन वर्षांनी या महामंडळांची जबाबदारी वरील चारपैकी एका साहित्य संस्थेकडे जात असते. आणि ती  साहित्य संस्था अखिल भारतीय मराठी  महामंडळाच्या सहकार्याने संमेलनाचे आयोजन करत असते . या महामंडळाशी आजूबाजूच्या राज्यांतील मराठी साहित्य संस्थाही निगडित झालेल्या आहेत.

* अखिल भारतीय साहित्य संमेलनाचेवेळी वा आधी  उद्भवणारे वाद –

दरवर्षी होणारी साहित्य संमेलने ही कुठल्या ना कुठल्या तरी वादाला बळी पडतात . हे वाद उद्भवण्यात वेगवेगळी कारणे निमित्तमात्र ठरतात  . पैकी काहीची यादी पुढील प्रमाणे तयार करता येईल -१) महामंडळांतर्गत कार्यरत असणाऱ्या घटक संस्थांचे अंतर्गत वाद ,२) संमेलनस्थळ ठरवण्यावरून वाद ,३) अध्यक्षपद निवडण्याच्या पद्धतीवरून/निवडीवरून वाद,४) आयोजकांमुळे निर्माण झालेले वाद,5) आयोजनात ,व्यासपीठावर राजकारणी मंडळींची हजेरी असण्यावरून वाद,६) सरकारी अनुदानावरून होणारे वाद,७) महामंडळाशी संलग्न नसणाऱ्या इतर काही मराठी भाषक साहित्य संस्था किंवा साहित्यिक यांच्याकडून उद्भवणारे वाद,८) अध्यक्षपदाची निवडणूक लढवितांना वेगवेगळ्या उमेदवारांमध्ये निर्माण  झालेले वाद,९) निवडून येण्यापूर्वी वा निवड झाल्यावरही एखाद्या उमेदवाराच्या /अध्यक्षाच्या पुस्तकावरून ,विधानावरून निर्माण झालेले वाद,१०) वादग्रस्त बाबींच्या विरोधात राज्यातील काही राजकीय ,सामाजिक, साहित्यिक ,सांस्कृतिक संघटनांनी विरोध दर्शनासाठी सुरू केलेले आंदोलनात्मक वा इतर स्वरूपाचे वाद,११)  अध्यक्षीय भाषणातील एखाद्या मुद्द्यावरून निर्माण झालेला वाद,१२) तत्कालीन देश -राज्य काल परिस्थितीवरून  निर्माण होणारे वाद ,१३) आयोजनातील ढिसाळपणामुळे निर्माण होणारे संमेलनोत्तर वाद,१४) मानापमान नाट्यावरून उद्भवणारे वाद,१५) महामंडळाने वा आयोजकांनी गरजू घटकांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल करण्यावरून उपस्थित झालेले वाद.दरवर्षी होणारी साहित्य संमेलने अशा कुठल्या ना कुठल्या वादाला जन्म देत असतात. यावर्षीच्या साहित्य संमेलनप्रक्रियेत असा कुठलाही लक्षवेधी वाद निर्माण झाला नाही. तरी एका बाबीने  साहित्यक्षेत्रात खळबळ उडवून दिली .ती बाब म्हणजे  ९८व्या साहित्य संमेलनासाठी परदेशातून आमंत्रित म्हणून येणाऱ्या व्यक्तींना सरकारने आवश्यकतेपेक्षा कितीतरी अधिक रक्कम बहाल करणे.

* साहित्य संमेलनाची उपयुक्तता-

साहित्य संमेलन हे महाराष्ट्राचे आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे. आज गावपातळीपासून ते वैश्विक पातळीपर्यंत मराठीची साहित्य संमेलने आयोजित केली जात आहेत .त्यात विश्व ,अखिल भारतीय, राज्यस्तरीय, प्रादेशिक ,प्रांतिक ,नगरीय, उपनगरीय, जिल्हास्तरीय ,ग्रामीण ,दलित, आदिवासी, महिला,कामगार,जातीय,व्यावसायिक , बालकुमार ,नवोदित, युवा, आंबेडकरी ,ख्रिस्ती अशा वेगवेगळ्या शीर्षकांनी ही संमेलने आयोजित करण्याचा झपाटा फार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अलीकडेच ३ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केलेला आहे. ही  सर्व मराठी भाषकांसाठी एक आनंदाची आणि गौरवाची बाब आहे. ह्या गोष्टी मराठी भाषेच्या संपन्नतेसाठी आवश्यक अशा आहेत . मात्र अलीकडे अ . भा . साहित्य संमेलने समाजविन्भुख होत आहेत की काय असा प्रश्न पडतो. ही संमेलने कोणासाठी? सामान्य जनांसाठी,आयोजकांसाठी , साहित्यिकांसाठी की राजकारण्यांसाठी ? त्यामुळे पुन्हा एकदा महात्मा फुले यांची ती विधाने आठवू लागतात. ही संमेलने ‘घालमोड्या दादांची’च हे पटते. महात्मा फुलेंनी अशा संमेलनांकडून ज्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या त्या ही संमेलने कितपत वास्तवात आणतात हा प्रश्न उरतोच. तरीही ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

_ बाबाराव मुसळे,

ज्येष्ठ साहित्यिक,वाशिम

गे मराठी भाषा

माय मराठी किती वर्णू मी तुझी अप्रतिम गाथा

अभिजात भाषा म्हणतांना गर्वाने टेकतो माथा

प्राचीन तुझा इतिहास सांगतो तुच उच्च भाषा

तुझा गोडवा तुझी सरलता हिच तुझी उन्मेषा

स्वर व्यंजने सह बाराखडी तुझा अवयवी थाट

वेदकालीन जन्म तुझा, तूच अभिमानाची वाट

पाषाणी तुझी सापडली पाऊले तूच अजरामर

ग्रंथामध्ये साहित्यिकांची लेखनीत तूच तलवार

कुठे कोकणी कुठे वऱ्हाडी बोलकी तुझी लेकरे

नांदत ओठी महाराष्ट्राच्या भूमीत तूच अवतरे रे

गे मराठी तूझी ओळख होतीस कधीची पोरकी रे

अभिजात मराठी होता, मराठी माणसात गौरवे रे

प्रा. नरेंद्र पोतदार

हरिओम नगर, फॉरेस्ट ऑफिस मागे

 मु.पो.तह.- तिरोड जि. गोंदिया

शिवव्याख्यानांच्या आयोजनातून राजधानीत शिवजयंती उत्साहात

नवी दिल्ली 20 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्ली येथे भव्य आणि ऐतिहासिक शिवजयंती सोहळा उत्साहात झाला. या सोहळ्यात खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि व्याख्याते विशाल गरड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत तरुणाईला प्रेरणादायी संदेश दिला.

ओल्ड राजेंद्र नगर येथील बढा बाजार रोड येथे काल सायंकाळी उशिरा पार पडलेल्या या सोहळ्याचे आयोजन सरहद, पुणे, जाणता राजे प्रतिष्ठान (दिल्ली) आणि शौर्य स्मारक ट्रस्ट (पानिपत) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने सोहळ्याची सुरुवात झाली.

या कार्यक्रमास खासदार डॉ. अमोल कोल्हे प्रमुख पाहुणे होते. आपल्या भाषणात ते म्हणाले की, शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रापुरते सीमित नसून संपूर्ण भारतभूमीचे रक्षण करणारे थोर योद्धा होते. शिवरायांच्या दूरदृष्टीमुळे स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात आली. नव्या पिढीने त्यांचा आदर्श घेणे ही काळाची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहासापुरते मर्यादित नाहीत, तर ते एक विचारधारा आहेत. त्यांच्या नेतृत्वाचा आदर्श घेतल्यास देश अधिक सक्षम होईल.”

श्री. गरड यांनी शिवचरित्र या विषयावर प्रभावी व्याख्यान देऊन शिवरायांच्या युद्धनीती, प्रशासन कौशल्य आणि लोककल्याणकारी निर्णयांवर सखोल प्रकाश टाकला. ते म्हणाले, शिवजयंती हा केवळ सण नाही, तर मराठ्यांच्या पराक्रमाची गौरवशाली आठवण आहे. अशा कार्यक्रमांमुळे नव्या पिढीला शिवचरित्राची महती समजेल. दिल्लीसारख्या ठिकाणीही छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या विचारांचा प्रसार फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, तर तो राष्ट्रीय स्तरावरही प्रभावी ठरला आहे.

माजी राजदूत आणि साहित्यिक डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी संभाजी महाराजांचा आदर्श घेत महाराष्ट्र देशाला कसे योगदान देऊ शकतो, यावर भाष्य केले. ते म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा मंत्र दिला, तर शाहू महाराज, महात्मा फुले, आगरकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज परिवर्तनासाठी मोलाचे योगदान दिले आहे.”

या सोहळ्यातील मुख्य आकर्षण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेल्या सिंहगर्जना ढोलताशा पथकाच्या दमदार सादरीकरणाचे होते. त्यांच्या वादनाने संपूर्ण परिसर दुमदुमुन गेला.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सहसंयोजक लेशपाल जवळगे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. “जय भवानी, जय शिवाजी”च्या गगनभेदी घोषणांनी आणि ढोल-ताशांच्या निनादात या भव्य सोहळ्याची सांगता झाली.

000

राजधानीत बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

नवी दिल्ली, दि. 20 : बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती महाराष्ट्र सदनात आज साजरी करण्यात आली.

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महाराष्ट्र सदनातील उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

महाराष्ट्र परिचय केंद्रात आज बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती) (प्रशासन) हेमराज बागुल यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी कार्यालयातील उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

0000

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. २० : मराठी वृत्तपत्राचे जनक, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव सचिन कावळे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

सामान्य प्रशासन विभागाचे सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, नितीन राणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक कक्ष अधिकारी विजय शिंदे यांनीही बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून यावेळी अभिवादन केले.

 

0000

प्रवीण भुरके/ ससं/

साहित्य संमेलन स्मरणिका : एक वाङ्मयीन दस्तावेज

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने….

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर प्रथमच होणारे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशाची राजधानी दिल्लीत होत आहेत.  या संमेलनाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असून हे संमेलन 70 वर्षानंतर दिल्लीत होत आहेत हेही विशेष आहेत. या संमेलनावेळी स्मरणिका प्रकाशित करण्यात येते. याबाबत अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाचे प्रा. डॉ. रमेश माने यांचा लेख….

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने स्मरणिकेची निर्मिती केली जाते. आजवर ९७ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने संपन्न झालीत. या संमेलनानिमित्त त्या त्यावेळी स्मरणिका प्रकाशित केल्या गेल्या. साहित्य संमेलने पार पडून जातात, संमेलनात चर्चा, विविध परिसंवाद, कविसंमेलने, मुलाखती, कथाकथन, इत्यादि भरगच्च कार्यक्रम असतात. त्यातील काव्य, कथा, भाषा, साहित्यविचार, मुलाखती ऐकताना सर्वच ग्रहण करता येत नाही. काही विचार हवेत विरून जातात. परंतु स्मरणिकेच्या माध्यमातून, विविध लेखांच्या माध्यमातून प्रकाशित झालेला लेखनविचार मात्र स्मरणिकेच्या निमित्ताने संस्मरणीय राहतो. अशा स्मरणिका वाङ्मयीन आणि सांस्कृतिकदृष्ट्या एक वैभवसंपन्न दस्तावेज ठरतात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकांवर काही लोकांनी शोधनिबंध आणि शोध प्रबंध देखील निर्माण केलेले आहेत. यावरून या स्मरणिकांचं मूल्य आपल्या लक्षात येईल.

आजवर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने महाराष्ट्रासह बृहन्महाराष्ट्रातही झाली आहेत. अशी संमेलने ज्या प्रदेशात असतात त्या प्रदेशातील आयोजक संस्थेचा वाङ्मयीन, सांस्कृतिक व सामाजिक कार्याच्या लेखाजोखा स्मरणिकेच्या माध्यमातून वाचकांना कळतो. त्या संस्थेचा दैदीप्यमान इतिहासही कळतो. त्या संस्थेत आजपर्यंत साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील आलेली मान्यवर मंडळी कळते. एकूणच त्या आयोजक संस्थेची वैभवशाली परंपरा माहित होते. नव्याने सुरू झालेल्या संस्थांना त्या कार्यातून प्रेरणा मिळते. म्हणून असे लेख स्मरणिकेतून वाचायला मिळतात.

संमेलन ज्या परिसरात असते त्या परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक, वाङ्मयीन व इतर महत्वाची वैशिष्ट्ये प्रस्तुत संमेलनाच्या शीर्षकगीतातून कळतात. अशा गीताचाही समावेश स्मरणिकेत असतो. स्थानिक आयोजकांनी व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांची साहित्य संमेलनाच्या आयोजनामागील भूमिका कळते. शिवाय साहित्य महामंडळ, संमेलनाचे कार्याध्यक्ष, आयोजक संस्थेचे पदाधिकारी व  संपादक मंडळाची ओळख होते. याशिवाय तेथील श्रध्दास्थाने, प्रमुख पाहुणे, संमेलन पत्रिकेतील मान्यवर साहित्यिकांचा परिचय होतो. यानिमित्ताने कोण कुठल्या वाङ्मयप्रकारात लेखन करतात ते कळते. स्थानिक साहित्यिकांचे वाङ्मयीन योगदान लक्षात येते. मान्यवरांच्या संदेशातून त्यांची संमेलनविषयक भावना कळते. त्या गावात किंवा परिसरात यापूर्वी संमेलन भरविले असेल तर त्या गतसंमेलनविषयीच्या काही आठवणी लेख किंवा जुन्या छायाचित्रांवरून कळतात. शिवाय त्या संमेलनातील वाद-प्रतिवाद, चर्चा, वेगळेपण कळते. (जसे की, १९५२ साली अमळनेर येथे झालेल्या ३५ व्या महाराष्ट्र मराठी साहित्य अधिवेशनात अत्रे-फडके वाद खूप गाजला होता.) अशा वैशिष्ट्येपूर्ण नोंदी ज्ञात होतात. तसेच संमेलनाध्यक्षांचा एकूण वाङ्मयीन कार्य व त्यांना मिळालेल्या मानसन्मानाची माहिती मिळते.

स्मरणिकेच्या विविध विभागाची रचना केलेली असते. त्यात मराठी साहित्याची समकालीन सद्यस्थिती किंवा वर्तमान मराठी साहित्य, समकालीन मराठी साहित्याची वाटचाल अशा वेगवेगळ्या संकल्पनेवर (थीमवर) आधारित लेख समाविष्ट असतात. यात कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र- आत्मचरित्र, ललितगद्य, वैचारिक, समीक्षा, बालसाहित्य, विनोदी साहित्य, भाषांतरीत साहित्य, इत्यादि वाङ्मयप्रकाराचा लेखनप्रवास वाचण्यास मिळतो. तसेच मराठी भाषा, तिची विविधता, मराठी भाषेचे महात्म्य, ताम्रपट, शिलालेख यांच्या संदर्भखुणा आणि विशेष आदींच्या नोंदी कळतात.

ज्या प्रदेशात संमेलन भरविले जाते त्या प्रदेशातील सामाजिक, सांस्कृतिक, वाङ्मयीन, आध्यात्म, पौराणिक, ऐतिहासिक, लोककला, इतर विविध कला त्यांची परंपरा, नियतकालिके, दिवाळी अंक, ग्रंथालये, खाद्यसंस्कृती, पोशाख, बोलीभाषा, बोलीचे विविध प्रकार, सण-उत्सव, श्रद्धा, लोकमानस, लोकतत्त्व, व्यक्तिविशेष, विविध वाङ्मयप्रकारातील लेखन जसे की, कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र-आत्मचरित्र, वगैरे विषयी लेख अंतर्भूत असतात. याखेरीज एक स्वतंत्र विभागही त्यात निर्माण करता येऊ शकतो, तो म्हणजे काही विशिष्ट कलाकृतींच्या वाङ्मयीन योगदानावर किंवा विशेष लक्षणीय ठरलेल्या आणि  सुवर्णमहोत्सवी टप्पा गाठलेल्या कलाकृतींवर लेख समाविष्ट केले जाऊ शकतात. अमळनेर येथे संपन्न झालेल्या ९७ व्या संमेलनाच्या स्मरणिकेत तसा प्रयोग केला गेला. उदाहरण- ‘रानातल्या कविता- ना. धों. महानोर (प्रा. इंद्रजीत भालेराव), पाचोळा- रा. रं. बोराडे (डॉ. गणेश मोहिते), सूड – बाबुराव बागूल (प्रा. ज्ञानेश्वर कांबळे), संध्याछाया-जयवंत दळवी (सुदेष्णा कदम), बहिणाबाईची गाणी- बहिणाबाई चौधरी (प्रा. बी. एन. चौधरी) अशा प्रातिनिधिक परंतु साहित्यप्रांतात मैलाचा दगड ठरलेल्या कलाकृतींच्या योगदानावर अभ्यासपूर्ण लेखांचा समावेश केला होता. काव्य विभागात जुन्या कवींच्या स्मृति जाग्या करता येऊ शकतात. मागील संमेलनातील स्मरणिकेत खान्देशातील दिवंगत कवींच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ‘काव्यस्मृतिगंध’ हा एक उपघटक केला होता. त्यात खान्देशातील महत्वाचे वाङ्मयीन योगदान देणाऱ्या कवींच्या एकेक कवितांचा सन्मान केला होता. तर दुसऱ्या उपघटकात सद्यस्थितीत लेखन करणाऱ्या नव्या-जुन्या विविध जाणिवेच्या कवी-कवयित्रींच्या काव्याचा सन्मान करता येतो किंवा केला आहे. तसेच काही स्थानिक कवींच्या प्रातिनिधिक कविताही घेता येऊ शकतात. जो ‘खान्देश वैभव’ मध्ये प्रयोग केला आहे.

काही विशेष मुलाखतीही स्मरणिकेत समाविष्ट करता येतात. मागील वर्षी संमेलन अमळनेरात असल्याने अमळनेर ही भूमी पूज्य सानेगुरुजी यांची कर्मभूमी म्हणून परिचित आहे. म्हणून अशा भूमीत संमेलन होत असल्याने सानेगुरुजींच्या पुतणी सुधाताई साने-बोडा यांची संजय बच्छाव यांनी घेतलेली मुलाखत समाविष्ट केली आहे. या मुलाखतीतून सानेगुरुजींच्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला. गुरुजींच्या कामाची अनेक पैलू कळाली. म्हणून अशा वैशिष्ट्येपूर्ण मुलाखती घेता येतात.

स्थानिक प्रदेशाची वैशिष्ट्ये नोंदविणाऱ्या स्मरणिकेच्या  मुखपृष्ठाची निर्मिती स्थानिक चित्रकाराकडून करता येते. त्याचबरोबर काही प्रासंगिक किंवा लेखाला अनुसरून उत्तम रेखाटनेही घेता येऊ शकतात. त्यातूनही कलात्मकतेची अनुभूती घेता येते. संमेलनाच्या व स्मरणिकेच्या निमित्ताने जाहिरात देणाऱ्या दातृत्त्ववान लोकांची, संस्थाची ओळख होते. शिवाय विविध लेखकांची लेखनाच्या माध्यमातून ओळख होते.

एकूणच साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेतून वाचक आणि लेखक हा नक्कीच समृद्ध होत असतो. कारण तो एक वाङ्मयीन दस्तावेज असतो. अर्थात कुठलाही दस्तावेज हा समाज आणि संस्कृतीसाठी वैभवसंपन्न ठरत असतो.

(लेखकाने अमळनेर येथे संपन्न झालेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ‘खान्देश वैभव या स्मरणिकेचे संपादन केले आहे.)

प्रा. डॉ. रमेश माने

(मराठी विभाग)

प्रताप महाविद्यालय, अमळनेर, जि. जळगाव.

संपर्क – ९८९०३३१२३७

मराठी प्रकाशनाची दोनशे वर्षे

नवी दिल्ली येथे २१-२२-२३ फेब्रुवारी २०२५ रोजी ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे.  मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशाच्या राजधानीत होणारे हे साहित्य संमेलन महत्त्वाचे आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आम्हीही सज्ज आहोत. या संमेलन निमित्ताने ‘मराठी प्रकाशनाची दोनशे वर्षे’ या लेखाद्वारे सुरुवातीच्या कालखंडातील लेखन-प्रकाशन क्षेत्राचा घेतलेला हा आढावा…!

मराठी प्रकाशनाचे आद्य प्रवर्तक म्हणून कलकत्त्याच्या डॉ. विल्यम कॅरी यांच्याकडे पहिले जाते. त्यांनी बंगालमधील श्रीरामपूर येथे सन १८०५ मध्ये प्रकाशित केलेल्या ‘मराठी भाषेचे व्याकरण’ या देवनागरी लिपीतील पुस्तकाने मराठी पुस्तकांच्या प्रकाशनाची मुहूर्तमेढ रोवली. एकोणिसाव्या शतकात भारतात पोर्तुगीजांनी मुद्रणयंत्रे आणून धर्मप्रचाराच्या दृष्टीने काही ग्रंथ प्रकाशित केले. त्याला व्यावसायिक स्वरूप नव्हते. कालांतराने सरकारी व खाजगी शाळांसाठी क्रमिक पुस्तकांची आवश्यकता भासू लागल्यावर मराठी साहित्यिकांच्या मदतीने सरकार स्वतः पुस्तके तयार करून वाटप करू लागले. एकोणिसाव्या शतकाच्या अखेर २,१९३ पुस्तके प्रसिद्ध झाल्याची नोंद मिळते. विसाव्या शतकातही शालेय पुस्तकांचीच प्रकाशने अधिक होती. १९१९ मध्ये पहिले महायुद्ध संपले. भारताचे इतर देशांशी वैचारिक दळणवळण सुरू झाले. विल्यम कॅरी हे ख्रिस्ती धर्मोपदेशक, मराठी भाषेचे व्याकरणकार आणि कोशकार, तसेच मराठी ग्रंथांचे देवनागरी लिपीतील आद्य मुद्रक, मराठी आणि मोडी गद्य मुद्रणाचा ओनामा करणारे पहिले इंग्रज पंडित, वनस्पतिशास्त्रज्ञ, बहुश्रुत आणि बहुभाषी भाषांतरकार होते. दिनांक १० जानेवारी १८०० रोजी कलकत्त्यापासून २९ किलोमीटरवर असलेल्या श्रीरामपूर येथील डॅनिश वसाहतीत आले. तेथे त्यांनी चर्च व शाळा काढली. एक छापखाना उभारला. ते बंगाली, संस्कृत आणि पौर्वात्य संस्कृती भाषांशिवाय ते इंग्रजी, फ़्रेंच, लॅटिन, ग्रीक, हिब्रू भाषांत पारंगत होते. आपल्या छापखान्यातून सन १८३४ पर्यंत त्यांनी बंगाली व मराठीसह नागरी, संस्कृत, हिंदी, कोंकणी, गुजराती, कानडी, तेलुगू, पंजाबी, उडिया, अरेबिक, पर्शियन, चिनी आदि चाळीस भाषांमधून ख्रिस्ती धर्मग्रंथांच्या दोन लक्ष बारा हजार प्रती छापून प्रसिद्ध केल्या होत्या. सन १८०५ ते १८२५ दरम्यान मराठी भाषेत, देवनागरी लिपीत त्यांनी सेंट मॅथ्यूचे शुभ वर्तमान, बायबलचा नवा करार, जुना करार वगैरे १४ धार्मिक ग्रंथ प्रकाशित केले. सन १८१० साली केरी यांनी ‘अ डिक्शनरी ऑफ मराठा लँग्वेज’ हा मराठी भाषेचा शब्दकोश तयार केला. ६५२ पृष्ठांच्या या शब्दकोशात नऊ ते दहा हजार मराठी शब्दांचा इंग्रजीत अर्थ दिला आहे. सन १८१४ साली ‘सिंहासन बत्तीशी’ हे संस्कृत पुस्तकाचे मराठीत भाषांतर त्यांनी प्रसिद्ध केले. या पुस्तकात राजा विक्रमादित्याच्या सिंहासनाच्या बत्तीस कथा ३२ पुतळ्यांच्या मुखातून वदवल्या आहेत. १८१६ साली ‘रघुजी भोसल्याची वंशावळी’ हे पुस्तक मराठी भाषेत आणि मोडी लिपीत लिहून मुद्रित केले.

‘लिखिलेल्या ४९ पृष्ठांपेक्षा अधिक मजकूराला मुद्रित करून प्रकाशन योग्य करणे ग्रंथ !’ अशी युनेस्कोने ग्रंथाची व्याख्या केलेली आहे. जगाचा विचार करता या व्यवसायास नवव्या शतकाच्या मध्यास चीनमध्ये सुरुवात झाली. तोपर्यंत ग्रंथाच्या नकला तयार होत असतं. मुद्रणामुळे ग्रंथाच्या प्रती निर्दोष व त्वरेने तयार करता येऊ लागल्या. यूरोपात पंधराव्या शतकात खिळामुद्रण सुरू झाले. सोळाव्या शतकात हा धंदा फ्रान्समध्ये स्थिर झाला आणि तेथून इंग्लंडमध्ये गेला. जगात, बांधलेल्या पृष्ठांच्या ग्रंथाचे अस्तित्त्व चौथ्या शतकापासून, रोमन युगापासूनच आढळते. सन १५०१ मध्ये आल्दो मानूत्स्यो या नागरिकाने ग्रंथाचा अवाढव्य आकार बदलून त्याला आजचा आकार आणला. प्राचीन ग्रंथ हस्तलिखित स्वरूपाचे, मोठ्या आकाराचे असत. थोलकाधीअर नावाच्या लेखकाचे थोलकाप्पियम हे पुस्तक २ हजार ५०० वर्षांपूर्वीचे जुने आहे. पूर्वी ग्रंथप्रकाशक असा स्वतंत्र व्यवसाय नव्हता. हस्तलिखितांच्या प्रती तयार करणारा ‘प्रकाशक’ असायचा. त्याच्या दुकानात कागदाच्या अथवा कातड्याच्या मोठमोठ्या गुंडाळ्यांवर ग्रंथ लिहिले जात असे. कालांतराने चर्च, विद्यापीठे, गिल्ड्‌स, मुद्रक व प्रकाशक अशी प्रकाशन व्यवसायाची स्थित्यंतरे क्रमाक्रमाने होत गेली. अनेक शतकांच्या मार्गक्रमणेतून पुस्तकांची मागणी वाढू लागली. लेखकांना लोकप्रियता मिळू लागली. अठराव्या शतकाच्या अखेरीस पुस्तकविक्रेते आणि ग्रंथालये यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. अठराव्या शतकाच्या सुरुवातीला इंग्लंडमध्ये दरवर्षी सु. ९३ ग्रंथ प्रसिद्ध होत. पूर्वीच्या काळी ग्रंथनिर्मितीच्या खर्चासाठी राजेराजवाडे, सरदार, धनिक यांची मदत घ्यावी लागे.

खरतरं ग्रंथप्रकाशन हे अतिशय कठीण, कौशल्याचे व जिकीरीचे काम ! ग्रंथाचा विषय, व्याप्ती, पृष्ठसंख्या, त्याला मिळणारे ग्राहक, त्याचे रास्त मूल्य यांचा विचार प्रकाशकाला करावा लागतो. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत ग्रंथप्रकाशन हा भारतात व्यवसाय होऊ शकला नाही. सन १८६७ मध्ये कार्यवाहीत आलेल्या ‘द प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स अॅक्ट’ मुळे ग्रंथनिर्मिती व्यवहारास आकार प्राप्त होत गेला. स्वतंत्र महाराष्ट्र राज्यात सार्वजनिक ग्रंथालय विकास योजनेमुळे ग्रंथालयांची संख्या वाढली. ब्रिटिश सत्ता भारतात पक्की झाल्यानंतर राज्यकारभार चालविण्यासाठी दुय्यम दर्जाच्या नोकरवर्गाची गरज निर्माण झाली. त्यासाठी त्यांनी शाळा उघडल्या. या शाळांतून देशी भाषा हेच माध्यम होते. सन १८३३ मध्ये ‘मेकॉले मिनिट’ प्रसिद्ध झाले. शाळेतील देशी भाषांचे स्थान इंग्रजीला मिळाले. या शाळांमुळे ग्रंथप्रकाशनास चालना मिळाली. महाराष्ट्रात छापून तयार झालेले पहिले पुस्तक ‘पंचोपाख्यान’ होय. ते सन १८२२ मध्ये बाँबे करिअर छापखान्यात छापून प्रसिद्ध करण्यात आले होते. सन १८४७ साली लेखाधिकार कायदा (इंडियन कॉपीराइट ॲक्ट) संमतझाला, ग्रंथकारास संरक्षण मिळाले. सन १८६७ च्या ग्रंथनोंदणी कायद्यामुळे सरकारकडे पुस्तके येऊ लागली. १८६७ च्या पूर्वीच्या प्रकाशित ग्रंथास ‘दोलामुद्रिते’ / ‘आद्यमुद्रिते’ म्हणत. दोलामुद्रितांच्या काळात मराठी भाषेत १२८ प्रकाशकांनी ४३५ ग्रंथ प्रकाशित केले होते. त्याहीपूर्वी प्रकाशने शिलामुद्रित असत. सन १८६७ नंतर खिळामुद्रण सुरू झाले. टॉमस ग्रॅहॅम यांनी या मुद्रणकलेची सुरुवात केली. मराठीतील पहिले पंचांग सन १८५८ मध्ये गणपत कृष्णाजी यांनी शिळाप्रेसवर छापले. कॅरी, एल्‌फिन्स्टन, कँडी, जार्व्हिस, मोल्सवर्थ या ब्रिटिशांनी मराठी भाषेवर प्रेम केल्याचे दिसते. याकाळात परशुरामपंत गोडबोले यांचे नवनीत (१८५४), बाबा पदमनजी यांची यमुनापर्यटन (१८५७) कादंबरी, कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचे साक्रेतिसाचे चरित्र (१८५२), अमरापूरकर यांचे प्रबोधचंद्रोदय (१८५१) नाटक ही मराठीतील काही नामांकित प्रकाशने होती. सन १७९५ मध्ये नाना फडणीस यांनी तयार केलेल्या श्रीमद्‌भगवद्‌गीतेच्या लाकडी ठशांपासून तो खिळामुद्रणापर्यंत ५० वर्षांत मराठी प्रकाशकांनी बरीच मजल मारली. सन १८५९ च्या सुमारास गोविंद रघुनाथ केतकर यांच्या ज्ञानसागर शिळा छापखान्यात एका ग्रंथाच्या १५० प्रती निघत होत्या. भाषा समृद्ध करण्यासाठी कोशवाङ्‌मयही समृद्ध करण्याचा प्रयत्न मराठी पंडितांच्या मदतीने ब्रिटिशांकडून सुरु झाला. यातून डॉ. विल्यम कॅरी यांचा मराठी-इंग्रजी कोश (१८०५), बाळशास्त्रींचा मराठी-इंग्रजी कोश (१८२०), मोल्सवर्थ-कँडी यांचा मराठी-इंग्रजी कोश (१८३१), रत्नकोश (१८६१), हंसकोश (१८६३) निर्माण झाले. मुद्रक, प्रकाशक व विक्रेते या घटकांनी एकत्र यावे. कोणाकडून या मंडळींवर अन्याय झाल्यास त्याचा प्रतिकार करता यावा, या हेतूने त्या काळात प्रिंटर्स, पब्लिशर्स, बुकसेलर्स असोसिएशन या नावाची संस्था आद्य मराठी मुद्रक-प्रकाशक जावजी दादाजी यांनी सन १८९३ ला स्थापन केली. न्या. रानडे यांनी १८७४ मध्ये मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी या नावाची संस्था स्थापन केली. केशव भिकाजी ढवळे, जगत्‌हितेच्छू प्रकाशनाचे गोंधळेकर, कर्नाटक प्रकाशनाचे मंगेश नारायण कुलकर्णी, दामोदर सावळाराम यंदे, मनोरंजक ग्रंथ प्रकाशन मंडळी, तुकाराम पुंडलिक शेटे आदिंनी प्रकाशन व्यवसायासाठी प्रयत्न केले. मनोरंजन मासिकाचे संपादक काशिनाथ रघुनाथ मित्र, गणेश महादेव वीरकर मंडळी मराठी प्रकाशन क्षेत्रात कार्यरत होती. मात्र मराठी जनतेने ग्रंथखरेदीच्या बाबतीत उदासीनवृत्ती दाखविल्यामुळे त्यांना फारसे यश मिळाले नाही.

सन १८९४-९५ च्या डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रॅन्स्लेशन सोसायटीच्या अहवालात, ‘मराठी भाषेत ग्रंथ कमी होतात. याचे कारण मराठे लोकांत ग्रंथकर्तृत्व-शक्ती कमी आहे हे नाही, तर ग्रंथवाचनाची अभिरुची कमी आहे हे होय. म्हणून उपयुक्त व मनोरंजक ग्रंथ तयार करून ते अल्प किंमतीने लोकांस विकत देता येतील, अशी तजवीज केली पाहिजे’ अशी नोंद आढळते. रियासतकार सरदेसाई, नाथमाधव, पारगावकर, सावरकर, खांडेकर वगैरेंचे वाङ्‌मय सन १९२० ते १९४० दरम्यान गणेश महादेव आणि कंपनी यांनी प्रसिद्ध केले. सन १९१४ मध्ये के. भि. ढवळे प्रकाशन संस्था स्थापन झाली. ग्रंथनिर्मिती, लेखकांची निवड, सचोटीचे व्यवहार आणि मराठी वाङ्‌मयाबद्दलचे प्रेम ही या संस्थेची वैशिष्ट्ये होती. मराठी ग्रंथांना रूपसंपन्न करण्याचे याच संस्थेला जाते. स्वातंत्र्योत्तर काळात माध्यमिक व उच्च अभ्यासक्रमांत मराठीला स्थान मिळू लागले. मराठी ग्रंथप्रकाशनांची संख्या वाढली. भाषेच्या दृष्टीने विचार करता प्रकाशनाबाबत सन १९६४ साली इंग्रजी व हिंदी या भाषांच्या खालोखाल मराठीचा क्रम राहिला आहे. सन १९७० मध्ये मराठीत १,५१४ पुस्तके प्रसिद्ध झाली. देशमुख आणि कं., पुणे काँटिनेंटल प्रकाशन, पुणे व्हीनस प्रकाशन, पुणे मौज प्रकाशन, मुंबई मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई पॉप्युलर प्रकाशन, मुंबई ठाकुर आणि कं., अमरावती सुविचार प्रकाशन, नागपूर व उद्यम प्रकाशन, नागपूर ही त्यावेळची काही प्रमुख नावे होतं. दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने, काही खाजगी संस्थांनी श्रेष्ठ ग्रंथांस पारितोषिके देऊन या व्यवसायाला उत्तेजन देण्याचा अभिनंदनीय कार्यक्रमही चालू केला. ग्रंथालयासाठी स्वतंत्र खाते स्थापन झाले. साक्षरता प्रसारासाठी खेडेगावापर्यंतही ग्रंथांचे लोण पोहोचविण्यात आले. विश्वविद्यालये, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ, भारत सरकार वगैरे संस्थाही उपयुक्त ग्रंथांस अनुदान देऊ लागल्या. दुर्दैवाने इतक्या प्रयत्नातून सावरूनही आजचा मराठी वाचक तितका जागरूक झालेला नाही. ग्रंथालयासारख्या उपक्रमाबाबत मराठी माणूस मागे आहे. वाचकांना ग्रंथ विकत घेणे परवडावे म्हणून लोकप्रिय ग्रंथांच्या स्वस्त आवृत्त्या, प्रकाशनपूर्व सवलत-योजना, खंडशः पैसे देऊन ग्रंथ-खरेदी करण्याची योजना यांबाबत अलिकडे मराठी प्रकाशकांनी प्रयत्न सुरु केले आहेत. जगात युनेस्कोसारख्या आंतरराष्ट्रीय संस्था, ग्रंथप्रदर्शने, परिसंवाद, चर्चासत्रे वगैरेच्या साहाय्याने या धंद्याची बैठक भक्कम पायावर उभी करीत आहेत. पश्चिम जर्मनीत फ्रँकफुर्ट येथे दरवर्षी भरत असलेले आंतरराष्ट्रीय ग्रंथ-प्रदर्शन, दिल्लीच्या प्रगती मैदानावर भरणारे वर्ल्ड बुक फेअर आज प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातही ग्रंथ प्रदर्शने होतात. त्यांचे प्रमाण घटलेले आहे. ग्रंथ हे शिक्षणाचे प्रमुख माध्यम हे तत्त्व गृहीत धरून सरकारने साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ माध्यमातून प्रयत्न सुरु केले. सन १९७३ दरम्यान ग्रंथमुद्रणास योग्य अशा कागदाचे दुर्भिक्ष्य, छपाईच्या दरातील वाढ यांमुळे पुस्तकांच्या किंमती वाढल्या आणि वाढत्या महागाईमुळे विक्री कमी झाली. भारतातील आजच्या बहुतेक प्रकाशन संस्था व्यक्तिगत मालकीच्या आहेत. भारतातील इंग्रजी, संस्कृत भाषांतील ग्रंथांना परदेशांतील वाचनालयांतून मागणी आहे.

पुण्याचा विचार करता शनिवार पेठ, नारायण पेठ हा भाग मुख्यत: मुद्रण, छपाई क्षेत्राने व्यापलेला आहे. याच भागातील सदाशिव पेठेमध्ये शनिपारजवळ फिरताना ‘दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशन’ची इमारत दिसते. पुण्यात सन १९१० च्या दशकात प्रिंटिंग क्षेत्र वेगाने विकसित होत असताना कागदटंचाई, प्रशिक्षित मनुष्यबळाची वानवा निर्माण झाल्याने या क्षेत्रातील काही ध्येयवादी व्यक्तींनी एकत्र येऊन १९ मे १९१९ या दिवशी पुणे मुद्रक संघाचे हे रोपटे लावले होते. आता या संस्थेचा वटवृक्ष झाला आहे. महाराष्ट्रात सन १९७०-८० च्या दशकापर्यंत पुण्या-मुंबईसह औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, नाशिक शहरात मोजके प्रकाशक कार्यरत होते. महाराष्ट्रभर विद्वान लेखकांची मांदियाळी होती. वाचकप्रेम अनुकरणीय होतं. प्रकाशनविश्व जोरात कार्यरत होतं. नंतरच्या कालखंडात हळूहळू नवनवीन प्रकाशन संस्था उदयाला येत गेल्या. वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी शासनाने सकारात्मक योजना राबवल्या. विसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत अनेकांनी प्रकाशन संस्था उभारल्या. एकविसाव्या शतकात पुस्तके प्रकाशित करण्याबाबतचा प्रकाशकांचा दृष्टीकोन बदलला. माहितीपर, अनुवादित, वाचकाला वाचायला आवडणाऱ्या पुस्तकांचे प्रमाण वाढले. दुर्दैवाने सर्वच प्रकाशकांना भरपूर पैसा मिळतो हा चुकीचा समज या काळात अधिक दृढ झाला. प्रकाशन व्यवसायातील नैतिकतेसंदर्भातील अनेक बाबी ठळकपणे चर्चिल्या जाऊ लागल्या. शाळांमधील ग्रंथालयांच्या खरेदीवर शासकीय अनुदानाचा परिणाम होत गेला. कमी-जास्त किंमती, खरेदीतील अधिक सवलती यामुळे काही प्रकाशन संस्था डबघाईला आल्या. विविध कारणांमुळे ग्रंथालयामध्ये दर्जेदार पुस्तके मिळणे दुर्मीळ झाले. ग्रंथालयांच्या खरेदीत गुणात्मकता असायला हवी. ते सामाजिकदृष्ट्या अधिक महत्त्वाचे आहे. असे मुलभूत सिद्धांत अडगळीत गेले. परिणामस्वरूप ग्रंथालयापासून वाचक दुरावला. या साऱ्यावर सारासार विचारमंथन होण्यासाठीच या संमेलनाचे प्रयोजन असावे. आजही महाराष्ट्रात ‘एक लेखक एक प्रकाशक’ या संकल्पनेवर कार्यरत असलेले लेखक आहेत. अगदीच नाही म्हणायला गेली काही दशके ‘एक लेखक एक प्रकाशक’ या विचारानुसार कार्यरत लेखक-प्रकाशक आपल्याला भेटतात. त्यांना सर्वांसमोर आणल्यास लेखक-प्रकाशक संवाद समन्वयाचे गुपित उलगडता येऊ शकेल.

अडचणींचा डोंगर उभा असला तरीही, सातत्याने उत्तमोत्तम पुस्तके काढणारे प्रकाशक आपल्या व्यक्तिगत वाचकांच्या आणि ग्रंथ प्रदर्शनांच्या बळावर भाषिक सामर्थ्य टिकवून ठेवण्याचा प्रयत्न पूर्वीपासून करताहेत. पूर्वी प्रकाशक पायाला भिंगरी लावून सर्वदूर प्रवास करत. चांगल्या मराठी प्रकाशकांची चांगली पुस्तके आजही ग्रंथ प्रदर्शनाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचत असतात. चालणारी पुस्तके वर्षभर चालतात. परंतु धावणाऱ्या दोन पुस्तकांसाठी प्रकाशकांना इतर दहा पुस्तकांची निर्मिती करावी लागते. अशा पुस्तकांनाही ग्रंथ प्रदर्शनातून उठाव मिळतो. त्यामुळे पुस्तक प्रदर्शनाचा चांगला फायदा होतो. दुर्दैवाने आज राज्यात ग्रंथ प्रदर्शनासाठी लागणाऱ्या हॉलची वाढलेली भाडी, वाहतूक व प्रवास खर्च, कामगारांचे पगार, मुक्कामाचा खर्च, मंडप किंवा अन्य सुविधांचा खर्च आणि तुलनेने विक्रीच्या व्यस्त प्रमाणामुळे ग्रंथ विक्रेत्यांना मिळणाऱ्या उत्पन्नाचे गणित बिघडलेले दिसते. अनेक प्रकाशकांनी बाहेरगावची ग्रंथ प्रदर्शने बंद केली आहेत. खरतरं ही प्रदर्शने गावोगावची सांस्कृतिक भूक भागविण्याचे काम करतात. त्यामुळे शासनाने अशा उपक्रमांना सढळ हाताने मदत करायला हवी आहे. म्हणूनच या संमेलनाच्या निमित्ताने भरलेला ‘ग्रंथमहोत्सव’ अधिक महत्त्वाचा आहे. आज जगभर असलेल्या महाराष्ट्र मंडळांच्या माध्यमातून मराठी माणसांपर्यंत वस्तूंप्रमाणे मराठी पुस्तकांची निर्यात होण्याच्या मुद्द्यावर विचार होणे गरजेचे आहे. शासकीय ग्रंथप्रदर्शनात प्रकाशकांचा सहभाग आणि वाचकांची सोय पाहिली जायला हवी. ‘आयएसबीएन’ क्रमांकाची उपलब्धी सहज व्हायला हवी. लेखक-प्रकाशकांना सरकारी विश्रामगृहांत मुक्कामासाठी सवलत मिळायला हवी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संगणकीय मराठी टंकलेखन युनिकोड वापरासाठी शासनाने पुढाकार घ्यायलाच हवा आहे. अलिकडे जवळपास प्रकाशक लेखकांकडून टाईप केलेला मजकूर मिळावा असा आग्रह करीत असतात. आजच्या युगात ‘युनिकोड वापर कार्यशाळा’ ही एक मोठी आवश्यकता म्हणून पुढे येते आहे.

ग्रंथाचे संपादन आणि मुद्रितशोधन हा या क्षेत्रातील अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. परदेशातील प्रकाशकांकडे असणाऱ्या संपादकांप्रमाणे मराठीत आता ही पद्धत रूढ होते आहे. पत्रकार, त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून आपल्या वृत्तपत्रे, नियतकालिकातील सदरांची पुस्तके काढण्याचे प्रमाण वाढते आहे. वाढत्या सामाजिक, राजकीय जाणीवांमुळे वैचारिक साहित्याचे दालन फुलू लागले आहे. मराठी पुस्तकांना मागणी आहे. वाचकांना वैविध्यपूर्ण पुस्तके हवी आहेत. नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुस्तके नव्या, तरुण वाचकांपर्यंत पोहोचवण्याची गरजही वाढली आहे. कॉपीराइट हा अनेक ठिकाणाचा कळीचा मुद्दा आहे. हक्क अबाधित असा उल्लेख नसला तरीही कॉपीराइट असतोच. लेखकाच्या मृत्यूनंतर ६० वर्षांपर्यंतच हा कायदा लागू होतो. नव्याने लेखनादि क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या पिढीसाठी या गोष्टी नीट समजून घेण्याचे हे संमेलन योग्य व्यासपीठ आहे. मराठी साहित्याचे चांगले मार्केटिंग व्हायला हवे आहे. फेसबुक, व्हॉट्सअप आदि तंत्रज्ञानामुळे नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. ‘वाचक नाहीत’ ही तक्रार चुकीची आहे. ई-बुक, ऑडिओ बुक हा मूळ छापील पुस्तकांना पर्याय नसून त्या नवतंत्रज्ञानाने युक्त संधी असल्याचे समजून घ्यायला हवे आहे. बनावट पुस्तकांचा (पायरेटेड) मुद्दा सर्वत्र अत्यंत गंभीर आहे. पायरेटेड पुस्तके कशी रोखावीत ? यावर आजही ठोस उत्तर मिळालेले नाही. लेखक आणि प्रकाशक नात्याचे अनेक पैलू राहिलेले आहेत. या दोनही ठिकाणी विश्वास, आपुलकी आणि सौहार्द समानतेच्या मांडवाखाली आणण्याचा प्रयत्न करणारे हे संमेलन आहे.

पुस्तक विकलं जाण्यासाठी आम्ही नवोदितांनी, ‘लेखक लिहितो आणि प्रकाशक छापतो’ यामधला पुस्तकाचा निम्मा शिल्लक प्रवास समजून घेण्याची गरज आहे. तो समजला तर चांगल्या पुस्तकांची निर्मिती शक्य आहे. पूर्वी लेखक, संपादक आणि प्रकाशक यांच्यात लेखनाविषयी चर्चा होतं. योग्य आणि अचूक लेखन वाचकापर्यंत पोहोचवायची कळकळ त्यामागे असायची. आताची पिढी या साऱ्याकडे व्यवसाय म्हणून अधिक बघते. कधीकधी लेखनाची गुणवत्ता चांगली असते, पण विक्रीमूल्य कमी असतं. तेव्हा प्रकाशकीय अंदाजाचा कस लागतो. आजही मराठी वाचक पुस्तकाच्या किंमतीचा खूप विचार करतो. तुलनेने अधिक किंमतीची इंग्रजी विकत घेतली जातात. सध्या तंत्रज्ञानामुळे आमूलाग्र बदल घडलेत. संगणकायुगाने अलिकडे प्रिंट ऑन डिमांड पद्धत जन्माला घातली. साहित्यिक आणि वाचक जवळ आले आहेत. वितरण यंत्रणा बदलत आहेत. सोशल मीडिया, तंत्रज्ञानामुळे लेखकाला वाचकांपर्यंत पोहोचणे सोपे झाले आहे. इंटरनेट, ईमेल, फेसबुक, व्हॉटस्अप, गुगलप्लस, ई-बुक, डिजिटल प्रिंटिंग आदि तंत्रज्ञानामुळे हे क्षेत्र पूर्णतः ढवळले गेले आहे. आज वाचकांची प्रगल्भता कमालीची वाढते आहे. पुढचा काळ कागदी प्रकाशकांचा नाही. असे काही ठिकाणी म्हंटले जाते, त्यात सर्वथा सत्यता नसावी. आज महाराष्ट्रात राजहंस, मॅजेस्टिक, मेहता पब्लिशिंग हाऊस, पॉप्युलर, मौज, ग्रंथायन, वरदा बुक्स, प्रगती अभियान, उत्कर्ष, रोहन, केशव भिकाजी ढवळे प्रकाशन, काँटिनेंटल प्रकाशन, मनोविकास, अनुबंध, देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा. लि., परचुरे प्रकाशन, लोकवाङमय गृह – मुंबई, साकेत, स्नेहवर्धन, मधुश्री, विश्वकर्मा, मायबोली, रसिक आदिंसह सुमारे पाचशे हून अधिक प्रकाशन संस्था कार्यरत असाव्यात. तरुण वर्ग वाचत नाही, ही टीका अन्यायकारक आहे. तरुण वर्ग वाचत असतो. त्यांच्या वाचनाचे विषय, माध्यमं बदलत आहेत. त्यांच्या पसंतीस उतरतील असे विषय, पुस्तकंच येत नसतील तर ते काय वाचणार ? असा एक प्रश्न पुढे येत असतो. दुर्दैवाने जुनी जड वैचारिक पुस्तकं आजची पिढी वाचत नाही. आजचा वाचक चार पुस्तकं चाळून, बघून, त्यावर नजर टाकून मग पुस्तक विकत घ्यायचं की नाही ते ठरवतो. प्रकाशकांनी वाचकांपर्यंत पोहोचायला हवं हे सत्य आहे. प्रकाशकांना वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी आता ऑनलाईन माध्यमांचा वापर करावा लागतो आहे. भविष्यात प्रकाशन संस्थांना पुस्तकांच्या मुद्रित कॉपींबरोबर ई-बुक्सही तयार करावी लागणार आहेत. मराठीत अनुवादित पुस्तकांचं प्रमाण आणि मागणीही वाढते आहे

आज लेखक स्वयं-प्रकाशनाबद्दल पाऊले उचलताना दिसतात. काही भक्कम यशही मिळवतात. अशांसाठी किमान लेखनाचे संपादन, पुस्तकाचा आकार, पुस्तकाचे मुखपृष्ठ, छपाई, पुस्तक बांधणी, वितरण, कमिशन, आय.एस.बी.एन. आदि बाबींचा किमान विचार करायला हवा, याची जाणीव करून देणारे हे संमेलन आहे. आजही पुस्तक हातात पडलं की काही वाचक एका बैठकीत ते वाचतात. पुस्तकातल्या विषयाचा विचार करतात. काही वेळा त्यातल्या व्यक्तिरेखेत गुंततात. एखाद्या वाक्यात हरवतात. हे सगळं लेखकाला अनुभवायला मिळतं. वर्तमान युगात, याही पुढे जाऊन ‘लेखक लिहितो आणि प्रकाशक छापतो’ यामधला पुस्तक निर्मितीचा प्रवास समजून घेतला तर नवलेखकांकडून अधिकाधिक दर्जेदार ग्रंथ निर्मिती शक्य होईल. मराठी ग्रंथनिर्मिती क्षेत्रात चैतन्य प्रस्थापित होईल.

000

-धीरज वाटेकर मो. ९८६०३६०९४८

छत्रपती शिवाजी महाराजांचे आग्रा येथे भव्य स्मारक उभारणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रामसिंगची कोठी असलेल्या जागेचे अधिग्रहण करणार

लाल किल्ल्यात शिवजन्मोत्सवाचा सोहळा उत्साहात

आग्रा, दि . १९ : आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या रामसिंगच्या कोठीत ठेवण्यात आले होते ती सध्याच्या मीनाबाजार भागातील जागा महाराष्ट्र सरकार अधिग्रहित करणार असून तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आग्रा येथे केली. यासंदर्भात आपण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शिवजयंतीनिमित्ताने आग्रा येथील ऐतिहासिक लाल किल्ला येथे अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘शिवजन्मोत्सव भारतवर्ष का ‘ या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. या अनोख्या महोत्सवाच्याआयोजनाचे हे तिसरे वर्ष आहे. यावेळी केंद्रीय मंत्री एस पी बघेल, उत्तर प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे , सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, , फतेहपूर सिक्रीचे खासदार राजकुमार चहर, आग्र्याच्या महापौर हेमलता कुशवाह, आग्रा जिल्हा पंचायत अध्यक्षा डॉ. मंजू भदौरिया, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार परिणय फुके यांच्यासह  छावा या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते विकी कौशल, या चित्रपटाचे निर्माते नितीन विजन, कार्यक्रमाचे आयोजक व प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील आदी उपस्थित होते.

आग्रा येथे शिवजन्मोत्सव साजरा करण्याचे महत्त्व आणि औचित्य अत्यंत अभिमानास्पद असून हा उपक्रम सर्व शिवप्रेमींना ऊर्जा देणारा असल्याचे गौरवोद्गार काढून मुख्यमंत्री म्हणाले, आग्रा येथे महाराजांनी दाखवलेला स्वाभिमान प्रेरणादायी असून या सुटकेनंतर महाराजांनी पुन्हा नव्याने स्वराज्य उभे केले. परकीयांचे दुराचारी शासन संपुष्टात आणून हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीची प्रेरणा राजमाता जिजाऊंनी महाराजांना दिली, स्वराज्याची स्थापना करणारे शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. ते उत्तम प्रशासक, महिलांच्या सन्मानाचे रक्षणकर्ते होते.  महाराष्ट्राचे समाजभान महाराजांनी जागे केले. समाजातील विविध छोट्या घटकांना, बारा बलुतेदार जातीसमूहांना एका सूत्रात गुंफून त्यातून इमान जपणारे लढवय्ये मावळे उभे केले. जे देव, देश आणि धर्मासाठी निष्ठेने लढल्याने जगात आदर्शवत असे हिंदवी स्वराज्य उभे राहिले. देशाची सूत्रे हाती घेतल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही रायगडावर येऊन प्रेरणा घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार आम्ही वाटचाल करत असून बलशाली भारत आणि बलशाली महाराष्ट्र निर्माण करण्याचा आमचा निर्धार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

छत्रपती संभाजी महाराजांचा योग्य आणि जाज्वल्य इतिहास समोर आणल्याबद्दल छावा चित्रपटाचे निर्माते अभिनंदनास पात्र असल्याची प्रशंसा मुख्यमंत्र्यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील कादंबऱ्या वाचून आपण प्रभावित झाल्याचे सांगून केंद्रीय मंत्री बघेल म्हणाले, या उपक्रमामुळे राष्ट्रभावना निर्माण होण्यास मोठी मदत होईल .महाराजांच्या शौर्य आणि धाडसामुळे या पुढील काळात आग्रा हे शिवाजी महाराजांच्या नावानेही ओळखले जाईल . तसेच मुंबई -आग्रा हा महामार्ग या पुढील काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखला जावा, अशी सूचनाही त्यांनी केली .

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून पाठबळातून हा अनोखा कार्यक्रम साकारण्याचे सांगून मंत्री शेलार म्हणाले, महाराजांच्या जीवनातील एकेका प्रसंगावर महानाट्य तयार होऊ शकते इतके ते प्रेरणादायी आहे.आग्रा येथून महाराजांनी सुटका करून घेतलेला दिवस हा युक्ती दिवस म्हणून साजरा करण्यात येईल असे अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

श्री योगेंद्र उपाध्याय यावेळी म्हणाले, आग्रा येथे महाराजांना कैदेत ठेवलेली जागा निश्चित करण्यासाठी अनेक इतिहासकारांशी विचार विमर्श केला.त्यातून रामसिंगची कोठी असलेली जागा निष्पन्न झाली. या जागेवर महाराजांचे भव्य स्मारक व्हावे. आग्रा येथे आयोजित जन्मोत्सवाचा हा उपक्रम अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे सांगून अभिनेते विकी कौशल म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज ही व्यक्ती नव्हे तर एक विचारधारा व वैश्विक प्रेरणा आहे. आघाडीवर राहून नेतृत्व करणारे ते अत्यंत द्रष्टे नेते होते. समकालिन राजांपेक्षा महाराज वेगळे होते. ते माझे सुपर हिरो आहेत. छावा चित्रपटाच्या माध्यमातून महाराजांचा विचार जगात पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे श्री. विजन म्हणाले

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी केले. आमदार परिणय फुके यांनी आभार मानले.

प्रारंभी महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले . शिवजन्मोत्सवानिमित्त पाळणा पूजन झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा येथील सुटकेच्या प्रसंगावर आधारित नाट्याचेही सादरीकरण झाले. कोल्हापूर येथील पथकाकडून महाराष्ट्राची ऐतिहासिक परंपरा दर्शवणारी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके करण्यात दाखवण्यात आली

कार्यक्रमापूर्वी  येथील महिला भगिनींनी औक्षण करत मुख्यमंत्र्यांचे आत्मीयतेने स्वागत केले. या अनोख्या स्नेहपूर्ण स्वागताने मुख्यमंत्री भारावले. तसेच या कार्यक्रमादरम्यान  छत्रपती संभाजीनगर येथील खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या चैतन्य तुपे  या मुलाने व त्याच्या आई-वडीलांनी या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या सुटकेसाठी तत्परतेने प्रयत्न केल्याबद्दल आभार मानले.

0000

ताज्या बातम्या

आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत जेईई – सीईटीची कोचिंग

0
चंद्रपूर, दि. 6 : ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाखाणण्याजोगी असते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे किंवा संधी उपलब्ध न झाल्यामुळे असे विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे...

पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडून आदिवासी विकास विभागाचा आढावा

0
चंद्रपूर, दि. 6 : पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शनिवारी, जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाचा आढावा घेतला. तसेच राज्य शासनाने सुरू केलेल्या 100 दिवस प्रशासकीय...

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रयाण

0
मुंबई, दि. ६ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने आज दुपारी २.०० वाजता कोची येथे प्रयाण झाले. यावेळी  अतिरिक्त मुख्य सचिव व...

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!

0
ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत मुंबई, दि.  : - ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ प्रकल्पांचे कौतुक

0
पंढरपूर दि. ६  : पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच व्हिडिओ...