रविवार, जून 8, 2025
Home Blog Page 300

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते थिएटर अकॅडमी येथील नवीन इमारतीचे भूमिपूजन

पुणे, दि. ३१: मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून महाराष्ट्रीय मंडळाच्या आवारात ‘थिएटर अकॅडमी’त कलाकारांसाठी बांधण्यात येणाऱ्या इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे, सिद्धार्थ शिरोळे थिएटर अकॅडमीचे अध्यक्ष प्रसाद पुरंदरे तसेच थिएटर अकॅडमी व महाराष्ट्रीय मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. राज ठाकरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, या इमारतीच्या कामासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतीमध्ये कलाकारांसाठी राहण्याची व्यवस्था, सरावासाठी सभागृह, बहुउद्देशीय हॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्रीय मंडळ ही संस्था १०० वर्षांपासून तर थिएटर अकॅडमी ५० वर्षापासून कार्यरत आहे.

मुकुंदनगर येथील थिएटर अकॅडमी ही संस्था बाबासाहेब पुरंदरे यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन लाभलेली संस्था आहे. महाराष्ट्रीय मंडळ ही संस्था पोलीस भरती आणि सैन्य भरतीसाठी जाणाऱ्या मुलांकरीता मोलाचे कार्य करत आहे. या संस्थांच्या कार्यासाठी शासन पाठीशी आहे, असे श्री. शिंदे म्हणाले.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी थिएटर अकॅडमीची पाहणी केली.

०००

सात कलमी कृती कार्यक्रमाने नागरिकांचे जीवन सुलभ आणि प्रशासन अधिक गतिशील बनेल – पालक सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी

नंदुरबारदिनांक 31 जानेवारी, 2025 (जिमाका) : शासनाच्या 100 दिवसांच्या सात कलमी कृती कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे नागरिकांचे  दैनंदिन जीवन अधिक सुकर तसेच सुलभ होईल आणि प्रशासन अधिक गतिशील बनेल, असा विश्वास राज्याचे उच्च  आणि तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालक सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी यांनी आज व्यक्त केला.

जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित बैठकीत त्यांनी विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून 100 दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमाच्या निर्देशांचे पालन करण्यासंदर्भात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त एस, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे,  सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा (नंदुरबार), अनय नावंदर (तळोदा),  कृष्णकांत कनवारीया (शहादा) तहसिलदार डॉ. जी. व्ही. एस. पवनदत्ता, उच्च व तंत्र शिक्षण सहसंचालक कपील सिंघल यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत प्रशासनाच्या कार्यक्षमतेत सुधारणा घडवून आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा, नागरिकांच्या तक्रारी, कार्यालयीन स्वच्छता, उद्योजकांसाठी सुलभ प्रक्रिया आणि शासनाच्या महत्त्वाच्या योजनांच्या अंमलबजावणीवर विशेष भर देताना  पालक सचिव बी वेणूगोपाल रेड्डी यांनी सर्व शासकीय कार्यालयांना आपली संकेतस्थळे अद्ययावत आणि सायबर सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले. प्रत्येक कार्यालयाने सेवा हमी कायद्यात अधिकाधिक सेवा वेळेत देण्याबरोबरच  माहिती अधिकार कायद्याअंतर्गत नागरिकांना मिळणारी सर्व आवश्यक माहिती आधीच उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून त्यांना माहिती मागण्यासाठी कार्यालयात यावे लागू नये. यामुळे प्रशासनावरचा ताण कमी होईल आणि नागरिकांना वेगवान सेवा मिळेल. शासकीय कार्यालयांमध्ये संपूर्ण स्वच्छता मोहिम राबवून अनावश्यक कागदपत्रे हटवावीत आणि वापरात नसलेली, निकामी वाहने निर्लेखित करण्याची प्रक्रिया त्वरीत राबवावी, असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यालयीन वातावरण अधिक सुटसुटीत आणि कार्यक्षम करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे. कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी, बैठकीच्या सोयी, प्रसाधनगृहांची स्वच्छता आणि आवश्यक सुविधांची उपलब्धता याची खात्री करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम

नागरिकांचे जीवन अधिक सोपे करण्यासाठी किमान सुधारणा किंवा नाविन्यपूर्ण उपक्रम प्रत्येक कार्यालयाने हाती घ्यावेत, असे निर्देश पालक सचिवांनी दिले. हे उपक्रम तंत्रज्ञानाच्या मदतीने जलद सेवा पुरवण्यावर आधारित असावेत. याशिवाय, नागरिकांच्या तक्रारी आणि प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रत्येक कार्यालयाने अधिकाऱ्यांच्या उपस्थितीची वेळ निश्चित करावी आणि तसा फलक स्पष्टपणे प्रदर्शित करावा, जेणेकरून नागरिकांना कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळेत अधिकाऱ्यांची भेट घेता येईल, हे माहीत राहील. प्रलंबित अर्जांची संख्या शून्यावर आणण्यासाठी साप्ताहिक आढावा बैठक घेऊन प्रकरणे निकाली काढण्यावर भर द्यावा, लोकशाही दिनी येणाऱ्या तक्रारींची  तत्काळ जागेवरच सोडवणूक करावी, असे निर्देश त्यांनी दिले. यामुळे नागरिकांच्या तक्रारी तालुका आणि जिल्हा स्तरावरच निकाली निघतील आणि मंत्रालयात अनावश्यक गर्दी होणार नाही.

उद्योजक आणि गुंतवणूकदारांना सुलभ प्रक्रिया उपलब्ध करणे

नंदुरबार सारख्या  आकांक्षित  जिल्ह्यात उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणुकीस चालना देण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्या जागेवर सोडवता कशा येतील, याची खात्री करण्यास प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश पालक सचिवांनी दिले. जिल्हाधिकारी आणि विभागीय अधिकाऱ्यांनी स्थानिक उद्योजक आणि गुंतवणूकदार यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांच्या अडचणी सोडवण्यावर भर द्यावा. जिल्ह्यातील माहिती तंत्रज्ञान, कृषी प्रक्रिया उद्योग, पर्यटन, लघु व मध्यम उद्योग यांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना तयार करण्याची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले.

महत्त्वाच्या प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी आणि देखरेख

शासनाच्या महत्त्वाच्या प्रकल्पांना अधिकाऱ्यांनी नियमितपणे भेटी द्याव्यात आणि त्याची प्रगती तपासावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले. यामध्ये शाळा, अंगणवाडी केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा रुग्णालये, जलसंधारण प्रकल्प, रस्ते, कृषी केंद्रे आणि अन्य विकासकामे यांचा समावेश आहे. तालुका आणि गाव पातळीवरील महत्त्वाच्या योजनांचा कार्यानुभव प्रत्यक्ष पाहून गरज असल्यास सुधारणा कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. प्रशासनाने ठराविक वेळापत्रक तयार करून अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींसह ठिकठिकाणी भेटी द्याव्यात, यावर भर देण्यात आला.

उत्तम सोयी-सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करणे

शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालक सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी यांनी  दिले. कार्यालयांमध्ये पिण्याचे पाणी, बैठकीच्या सोयी, प्रसाधनगृहांची स्वच्छता, विश्रांतीसाठी जागा आणि आवश्यक सुविधा उत्तम दर्जाच्या असाव्यात, तसेच लोकांना आपुलकीने वागणूक देण्यावर  त्यांनी भर दिला. तसेच, गरजेनुसार विशेष मदत केंद्रे किंवा माहिती कक्ष सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या, जेणेकरून नागरिकांना त्यांच्या अर्ज, योजनांची माहिती सहज मिळेल. बैठकीत पालक सचिव वेणूगोपाल रेड्डी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सर्व सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. प्रत्येक विभागाने १०० दिवसांत झालेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा वेळोवेळी त्याचा आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सर्व विभागांचे समन्वयाने काम सुरू : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जिल्ह्यातील नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने गंभीरपणे कार्यवाही हाती घेतली असून, यामुळे प्रशासकीय प्रक्रियांमध्ये पारदर्शकता आणि गती येणार आहे. या कृती कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व विभाग समन्वयाने काम करत असल्याचे यावेळी सादरीकरण करताना जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी सांगितले.

सर्वप्रथम महाज्योती संस्थेमार्फत जेईई/नीट/एमएचटी-सीईटी  ऑनलाईन परिक्षा पर्व प्रशिक्षणासाठी इतर मागावर्गीय, भटक्या जाती-विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील 14 पात्र विद्यार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात टॅब चे वितरण पालक सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत तयार केलेली जिल्हा आर्थिक समालोचन अहवाल पुस्तिका 2024 याचे विमोचन करण्यात आले.

या विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण करण्यात आले..

अदित्य राजळे, अदित्य चौधरी, अंजली कोळी, अनुष्का धनगर, अर्पिता पटेल, आर्यन वाडीले, आसावरी पाटील, अश्विन धनगर, अथर्व शिनकर, अवधूत बिरारी, भुमिका गवळी, भुमिका चौधरी, मोहित लामगे, तन्मय लामगे.

नगर विकास विभाग महाराष्ट्राच्या विकासाचा कणा- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे, दि. ३१: शहरी आणि ग्रामीण भागाचा सुनियोजित विकास करण्याचे काम नगर विकास विभागाच्यावतीने करण्यात येते; विभागाचे अधिकारी- कर्मचारी शहरी आणि ग्रामीण भागातील नगररचनेचे खऱ्या अर्थाने शिल्पकार आहेत, त्यामुळे नगर विकास विभाग हा महाराष्ट्राच्या विकासाचा कणा आहे, असे प्रतिपादन असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

नगरविकास, नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागाच्यावतीने आयोजित गुणवंत अधिकारी व कर्मचारी पुरस्कार वितरण समारंभप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव इंजि. असीम गुप्ता, नगर रचना संचालक अविनाश पाटील, डॉ. प्रतिभा भदाणे, सुलेखा वैजारपूरकर, सुनील मरळे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक नागरिकरण असलेले राज्य आहे, शहरी भागातील वाढती लोकसंख्या, पर्यावरणाची हानी, वाढते प्रदूषण, पिण्याचे पाणी आदी आव्हाने स्वीकारुन नगर रचना विभागाने पायाभूत सुविधा निर्मितीबाबतचे नियोजन करावे. शहराचा गतिमान विकास करताना तो सर्वसमोवशक, सुनियोजित आणि शाश्वत असला पाहिजे. तापमान वाढ, हवामान बदलांचा विचार करुन शहरी व ग्रामीण भागाचा पर्यावरणपूरक विकास करावा लागेल. मलनि:सारण प्रकल्पांतर्गत प्रक्रिया केलेले पाणी बागबगीचा, औद्यागिक क्षेत्र तसेच बांधकामाकरिता वापर करणे बंधनकारक करण्यातबाबतचा निर्णय घ्यावा लागेल.

प्रलंबित प्रकल्प गतीने पूर्ण मार्गी लावणे ही राज्य शासनाची प्राथमिकता

विकासाची विषयपत्रिका घेऊन प्रलंबित प्रकल्प गतीने पूर्ण करण्यावर राज्यशासनाचा भर आहे, त्यामुळे शहराचा विकास कालबद्ध पद्धतीने विकास करणे आपली जबाबदारी आहे. अधिकारी- कर्मचाऱ्यांनी प्रलंबित नगर रचना आराखड्याची कामे वेळेत मार्गी लावावेत. नागरिकांची गैरसोय टाळण्याकरीता कठोर पावले उचलावीत. विकास आराखडा तयार करताना सार्वजनिक हीत विचारात घेऊन नागरिकांना अधिकाधिक सोई-सुविधा मिळाल्या पाहिजे, येत्या काळात शहरांची अनियंत्रित वाढ होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी.

महानगरपालिका व नगरपालिकांनी ‘शहर आराखडा शाखा’ निर्माण करा

शहरातील वाढते नागरिकरण, त्यातून निर्माण होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याकरीता महानगरपालिका व नगरपालिकेने ‘शहर आराखडा शाखा’ निर्माण करावी. यामध्ये तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करावी. मुंबई व ठाण्याच्या धर्तीवर पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास ‘समूह विकास’ (क्लस्टर डेव्हलपमेंट) पद्धतीने केला पाहिजे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करुन दिल्यास त्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होईल.

कामकाजात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करण्यावर भर द्यावा

विभागाने कामकाजात भौगोलिक माहिती यंत्रणा अर्थात ‘जीआयएस’ आधारित नगर नियोजन, कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे. विभागाने नगररचनाकार, लोकसहभाग, विविध सामाजिक संस्थाना सोबत घेऊन नागरिकांना सुविधा देण्याची कामे करावीत. शहरात सुशोभीकरणाच्या स्पर्धा आयोजित कराव्यात. शहरातील संकल्पनेत नाविन्य असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण (ऑयकॉनिक) इमारती बांधण्यावर करण्याकरिता विकसकांना प्रोत्साहित केले पाहिजे. नागरिकांच्या हिताचे निर्णय घेऊन प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे शासन भक्कमपणे उभे आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

नगर विकास विभागाने सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय समतोल राखून विकास करावा- अजित पवार

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, पुणे शहरापेक्षा पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या 2054 साली अधिक होण्याचा आणि दोन्ही शहराची मिळून ती सुमारे 2 कोटी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागाने हा महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रातील नगरविकास आराखडे आणि नगरविकास इतक्यापुरताच मर्यादित विचार न करता या क्षेत्रांचा सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय समतोल राखून विकास साधावा.

ते पुढे म्हणाले की, शहरातील वाढती लोकसंख्या, नदी प्रदूषण, पाणी, कचरा, अरुंद रस्ते, जमीन, वाहतूक समस्या, हवामानातील बदल, वाढते तापमान आदी आव्हानांचा सामना करुन पुढे जाण्याची गरज आहे. शहराच्यातील सार्वजनिक वाहतूक सुरळीत ठेवण्याकरिता योग्य पद्धतीने नियोजन करुन वाहतुकीचे प्रश्न मार्गी लावण्यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यामुळे नगर रचना विकास आराखडे वेळेत मंजूर करुन कामे मार्गी लावावीत. हा विभाग शहरीकरणाच्या प्रवासातील महत्त्वाचा घटक झाला आहे. या अनुषंगाने विभागाने विविध बाबींचा विचार करुन आधुनिक काळाच्या गरजा लक्षात घ्याव्यात.

पारदर्शक व सुनियोजित पद्धतीने शहर व ग्रामीण नियोजनाची कामे करुन विकासाची दिशा ठरविण्यादृष्टीने कामे करावीत. महानगरपालिकेने ठराविक क्षेत्र आरक्षित करुन केवळ वृक्ष लागवडच केली पाहिजे. हरित व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन नियोजन करणे गरजेचे आहे. शहरालगत असलेल्या गावांतील नागरिकांना सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हावा तसेच सर्वसमावेशक विकास कामे होतील, याबाबत दक्षता घ्यावी.

चांगल्या काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कष्टाचे, निष्ठेचे आणि उत्कृष्ट कार्याचा गौरव होतो. प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये सुप्त गुण असतात, त्यांच्या अंगी असलेल्या विविध कल्पना, सूचनांचा विभागाला लाभ झाला पाहिजे. हा त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा सोहळा आहे, असेही श्री. पवार म्हणाले.

श्री. गुप्ता म्हणाले, नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागात नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याकरीता काम करण्यासोबत याकरीता आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर राहणार आहे. विभागांर्तगत देण्यात येणाऱ्या परवानग्या आनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

श्री. पाटील यांनी विभागाच्यावतीने करण्यात येणाऱ्या कामाबाबत माहिती दिली.

यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘स्वराज्य अभियंता हिरोजी इंदूलकर’ पुरस्काराचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना वितरण करण्यात आले.  यावेळी नगर विकास विभाग आणि सीईपीटी अहमदाबाद, गोखले इन्स्टिट्यूट, पुणे, आयआयटी रुरकी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेयर्स या संस्थांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

कार्यक्रमापूर्वी उपमुख्यमंत्र्यांनी विभागाच्यावतीने लावण्यात आलेल्या प्रदर्शनास भेट देऊन विभागाशी संबंधित विविध बाबींची माहिती घेतली.

यावेळी सुधारित ‘एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली’चे आणि ‘नियोजन विचार’ या मासिकाचे प्रकाशन करण्यात आले.

०००

प्रवेशासाठी डिजिटल पडताळणी पद्धतीचा अवलंब; ज्येष्ठ नागरिकांना नाममात्र शुल्क आकारण्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे निर्देश

छत्रपती संभाजीनगर, दि.३१(जिमाका)-विभागीय क्रीडा संकुलात अनधिकृत व्यक्तींचा प्रवेश रोखण्यासाठी डिजिटल पद्धतीने चेहरा ओळखीची पद्धत अवलंबावी. तसेच ६० वर्षे व त्यापेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तिंना विभागीय क्रीडा संकुलात चालण्याच्या व्यायामासाठी वार्षिक १०० रुपये इतके नाममात्र शुल्क आकारावे. जे केवळ त्यांच्या नोंदणीसाठीच्या प्रक्रियेकरिता वापरले जावे,असे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज दिले.

विभागीय क्रीडा संकुल समितीची बैठक आज विभागीय क्रीडा संकुलात पार पडली. विभागीय आयुक्त दिलीप गावडे, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई तसेच विभागीय क्रीडासंकूल समितीचे सदस्य उपस्थित होते.

पालकमंत्री शिरसाट यांनी आढावा घेऊन माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी सांगितले की, विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर व  विविध क्रीडा प्रकारांच्या विशेष मैदानावर सराव करण्यासाठी व नियमित व्यायामासाठी येणाऱ्या खेळाडू व नागरिकांनाच प्रवेश देण्यात यावा. अन्य अनधिकृत व्यक्तींचा प्रवेश रोखण्यासाठी डिजीटल पद्धतीने चेहरा ओळख ही पद्धती अवलंबावी. बालेवाडी येथील क्रीडा संकुलात खेलो मोअरही पद्धत वापरली जाते त्याप्रमाणे अत्याधुनिक पद्धती वापरावी. प्रत्येक क्रीडा प्रकार, इनडोअर आऊटडोअर या सेवांसाठी वेगळे दर निर्धारित केले जावे. तसेच ज्यांचे वय ६० वर्षापेक्षा अधिक आहे असे केवळ प्रकृतीस्वास्थ्यासाठी सकाळी वा सायंकाळी चालण्यासाठी मैदानात येतात अशा नागरिकांना नाममात्र रजिस्ट्रेशन करीता शुल्क आकारावे. वय वर्षे १८ ते ६० या व्यक्तिंकरीताच शुल्क आकारावे. शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना शुल्क आकारु नये,असे निर्देश पालकमंत्री शिरसाट यांनी दिले. प्रत्येक व्यक्ती खेळाडुची डिजीटल नोंदणी करावी. त्यांच्या चेहऱ्याचे स्कॅनिंग करुन ओळख पटविण्याची यंत्रणा बसवावी. अंधारलेल्या भागात उजेडाची व्यवस्था करावी. सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी सैनिक कल्याण कार्यालयामार्फत माजी सैनिकांची नेमणूक करावी. अवैध व्यक्तिंचा प्रवेश रोखण्यासाठी कडक उपाययोजना करावी. प्रत्येक खेळासाठी प्रशिक्षक म्हणून सेवा देणाऱ्या व्यक्ति म्हणून राष्ट्रीय पातळीवरील खेळाडुंनाच मान्यता द्यावी. तसेच सिंथेटीक धावनपथ तयार करण्याचे कामाबाबत कायदेशीरबाबी तपासून त्वरीत निर्णय घ्यावा. दोन लक्ष लिटरची भुमिगत पाण्याची टाकी बांधण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश पालकमंत्री शिरसाट यांनी दिले.

लातूर पोलिसांकडून महिला, मुलींसाठी राबविण्यात येणारे उपक्रम कौतुकास्पद – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

लातूर, दि. 31 : जिल्हा पोलीस दलाच्या भरोसा सेलमार्फत करण्यात आलेल्या समुपदेशनामुळे अनेक कुटुंबे विभक्त होण्यापासून वाचली आहेत. तसेच आणि अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षामार्फत जिल्ह्यातील बेपत्ता मुलींचा शोध घेवून त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात येत आहे. तसेच मुलांना दामिनी पथकविषयी माहिती देण्यासाठी ‘इन्स्पेक्टर दामिनी’ पुस्तिका तयार करण्यात आली आहे. पोलीस विभागाचे महिला, मुलींसाठी राबविण्यात येणारे हे उपक्रम कौतुकास्पद असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज येथे सांगितले.

पालकमंत्री ना. भोसले यांच्या हस्ते कोनशिला अनावरण व फित कापून पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या भरोसा सेल इमारतीचे लोकार्पण झाले. या इमारतीमध्ये भरोसा सेल, अनैतिक मानवी व्यापार वाहतूक प्रतिबंधक कक्ष आणि दामिनी कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षांची पालकमंत्री ना. भोसले यांनी पाहणी केली. तसेच येथील कामकाजाची माहिती घेतली.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख, कार्यकारी अभियंता देवेंद्र निळकंठ, उपअभियंता संजय सावंत, पोलीस उपअधीक्षक गजानन भातलवंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यावेळी उपस्थित होते.

पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणांमुळे होणाऱ्या कौटुंबिक वादावर वेळीच तोडगा निघाला नाही तर अनेकदा घटोस्फोट, एकमेकांवर गुन्हे दाखल करण्यापर्यंत वाद वाढतो. हे टाळण्यासाठी भरोसा सेलमार्फत जोडप्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे.  गेल्या वर्षी जवळपास ४९१ जोडप्यांमध्ये समेट घडवून आणण्यात आला आहे. त्यामुळे ही कुटुंबे विभक्त होण्यापासून वाचली आहेत. या जोडप्यांचे आईवडील, मुले यांच्या आयुष्यात येणारी संकटे यामुळे दूर झाली आहेत. या कक्षाने यापुढेही असेच संवेदनशीलपणे काम करावे, असे पालकमंत्री ना. भोसले म्हणाले.

भरोसा सेलच्या माध्यमातून वयोवृद्ध नागरिकांनाही मदत करण्यात येत आहे. तसेच अनैतिक मानवी व्यापार वाहतूक प्रतिबंधक कक्षाने गेल्या वर्षभरात जवळपास १३२ बेपत्ता मुलींना शोधून त्यांच्या पालकांकडे सुपूर्द केल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी प्रास्ताविकात सांगितले.

भरोसा सेलच्या समुपदेशनाने समेट घडलेल्या जोडप्यांचा यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात पालकमंत्री ना. भोसले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच भरोसा सेल इमारतीचे बांधकाम गतीने पूर्ण केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय सावंत, कनिष्ठ अभियंता वर्षा सोनटक्के, सार्वजनिक बांधकाम विद्युत उपअभियंता दत्तात्रय इंगळे यांच्यासह कंत्राटदार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. भरोसा सेल, अनैतिक मानवी व्यापार वाहतूक प्रतिबंधक कक्षातील अधिकारी, कर्मचारी यांचाही पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

साहित्य अकादमी पुरस्कार प्रक्रियेत बदल

नवी दिल्ली, दि. ३१: साहित्य अकादमीने मान्यता दिलेल्या २४ भारतीय भाषांमधील दरवर्षी दिल्या जाणाऱ्या देशातील सर्वात प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कारांच्या निवड प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे.

साहित्य अकादमीने पहिल्यांदाच लेखक, प्रकाशक आणि त्यांच्या हितचिंतकांकडून वर्ष  २०२५ च्या मुख्य पुरस्कारासाठी २४ भाषांमधील पुस्तके निवडण्यासाठी आमंत्रित केले आहे. पुस्तके सादर करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२५ आहे.

२०२५ च्या पुरस्कारांसाठी १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांची एक प्रत अर्ज भरून विचारार्थ पाठवता येईल.

याबद्दलची सविस्तर माहिती अकादमीच्या https://sahitya-akademi.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ही माहिती देशभरातील 24 भाषांमधील पोहचविण्याचे आवाहन सचिव के. श्रीनिवासन यांनी या प्रसिद्धी प्रत्रकाद्धारे केले आहे.

०००

 

फॉरेन्सीक प्रकरणांच्या विश्लेषणामध्ये ४० टक्क्यांची वाढ

मुंबई, दि. ३१ : न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात २०२४ मध्ये फॉरेन्सिक प्रकरणांच्या प्राप्तीमध्ये २२ टक्के वाढ झाली आहे. प्राप्त झालेल्या प्रकरणांची संख्या जानेवारी २०२४ मध्ये २० हजार ६५८ वरून डिसेंबर २०२४ मध्ये २५ हजार २५८ पर्यंत वाढली आहे. त्याचवेळी, प्रकरणांच्या विश्लेषण क्षमतेत महत्त्वपूर्ण सुधारणा झाली आहे. जानेवारी २०२४ मध्ये १६ हजार १० वरून डिसेंबर २०२४ मध्ये २२ हजार ७७० प्रकरणांचे विश्लेषण करण्यात आले आहे. विश्लेषण करण्यात आलेल्या अहवालांमध्ये ४० टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली आहे.

या वाढीला हाताळण्यासाठी आणि प्रकरणांचे निराकरण वेगाने करण्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळा संचालनालयाने भरती आणि आधुनिक तंत्रज्ञानावर भर दिला आहे. २०२४ मध्ये संचालनालयाने ५३ पदांची भरती केली आहे. ज्यामध्ये दोन उपसंचालक, तीन सहाय्यक संचालक, ३३ पदे सहाय्यक रासायनिक विश्लेषक, १५ पदे  वैज्ञानिक अधिकारी (सायबर) यांची आहेत. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग  १७ सहाय्यक संचालकांची भरती प्रक्रिया पार पडत आहे. यासोबतच वर्ग तीन कर्मचाऱ्यांची पदभरतीदेखील करण्यात येत आहे.

संचालनालय प्रलंबित प्रकरणांच्या निवारणासाठी विशेष उपाययोजना करीत आहे. आवश्यकतेनुसार कंत्राटी कर्मचारी घेण्यात येत आहे. यामध्ये १७० फॉरेन्सिक पदे, वर्ग चार ची १६६ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आली आहे. उर्वरित पदे राष्ट्रीय फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी (NFSU) द्वारा भरली जाणार आहेत. तसेच फॉरेन्सिक क्षमतांचा विस्तार आणि सायबर फॉरेन्सिक विश्लेषणाची गती वाढवून प्रलंबित प्रकरणांच्या निवारणासाठी सेमी-ऑटोमॅटिक प्रोसेसिंग सोल्युशन व डिजिटल फॉरेन्सिक्समधील उत्कृष्टता केंद्र यावर काम करण्यात येत आहे. हे प्रकल्प अत्याधुनिक फॉरेन्सिक वर्क स्टेशन्स, डेटा मिळविण्याची उपकरणे, प्रगत डेटा प्रक्रिया आणि विश्लेषणाचे उपाय एकत्र करतात.  ज्यामुळे सायबर प्रकरणांच्या तपासण्याची गती आणि अचूकता मोठ्या प्रमाणात सुधारली आहे.

उच्च संवेदनशील प्रकरणांना संचालनालय प्राधान्य देत आहे. यामध्ये पॉस्को प्रकरणे (बालकांचे लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा), अंडर ट्रायल प्रीझनर प्रकरणे, न्यायालयांकडून आदेश दिलेली प्रकरणे यांचा समावेश आहे. या ठोस उपक्रमांसह संचालनालय महाराष्ट्र न्यायवैद्यक विज्ञान सेवा मजबूत करण्यासाठी, प्रकरणांचे निराकरण वेगाने करण्यात येत असल्याची माहिती विभागाने दिली आहे.

०००

निलेश तायडे/विसंअ

 

मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची नागपूर येथील प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेला भेट

नागपूर, दि.31 :  प्रादेशिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेमार्फत होत असलेले काम न्यायदानाच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. गुन्हेगारांवर जरब बसविण्याकरिता गुन्ह्यांचा तपास व त्याची शास्त्रीय मीमांसा वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. यादृष्टीने नागपूर येथील प्रयोगशाळेत वर्षाला सुमारे 40 हजार केसेस हाताळल्या जात असल्याने येथील यंत्रणा व प्रयोगशाळा महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहे. या प्रयोगशाळेच्या सक्षमीकरणासाठी मंत्रालय पातळीवर संबंधित असलेल्या कामांचा आढावा सुजाता सौनिक यांनी प्रयोगशाळेला भेट देऊन घेतला.

प्रयोगशाळेचे उपसंचालक डॉ.व्ही.जे. ठाकरे यांनी प्रयोगशाळेची माहिती देऊन येथे होत असलेल्या विविध तपासण्यांची माहिती दिली. दरवर्षाला 40 हजार प्रकरणांमध्ये सुमारे 300 प्रकरणे ही प्राणी व वन्यजीवांची असतात. सायबरच्या केसेस इथे येतात. सर्व प्रकारच्या तपासणीसाठी ही प्रयोगशाळा सक्षम असल्याची माहिती डॉ. ठाकरे यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना दिली. नागपूर येथून मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन ही संकल्पना विकसित झाली असून आता त्याचा राज्यपातळीवर विस्तार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष देऊन नागपूरसाठी नव्या 5 मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करुन दिल्याची माहिती त्यांनी दिली. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी सर्व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.

एसटी प्रवाशांनी तिकिटाचे पैसे द्यावे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. ३१:  प्रवाशांच्या तक्रारी व वाहकांना होणारा त्रास याची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दखल घेऊन सुट्ट्या पैशावरून वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद होऊ नये,  यासाठी एसटीने प्रवाशांनी यूपीआय पेमेंटद्वारे तिकिटाचे पैसे देण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळत, असून मागील काही दिवसांपासून यूपीआय पेमेंटद्वारे मिळणारे उत्पन्न दुपटीने वाढले आहे.

याबरोबरच महामंडळाने परिपत्रक काढून वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी अग्रधन रकमेमध्ये १०० रुपयापर्यंत सुट्टे पैसे देण्याची निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे वाहक आणि प्रवासी यांच्यातील सुट्ट्या पैशावरुन होणारे वाद टाळले जाऊ शकतात.

एस. टी. महामंडळाने प्रत्येक वाहकाकडे अँड्रॉइड इलेक्ट्रॉनिक तिकीट इशू मशीन (ETIM) दिले आहेत. या मशीनच्या माध्यमातून यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढले जाऊ शकते. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट काढताना या यूपीआय पेमेंटचा वापर केल्यास सुट्ट्या पैशामुळे होणारे वाद टाळता येतील, अशी सूचना मंत्री श्री. सरनाईक यांनी केली होती. त्यानुसार महामंळाने युपीआय पेमेंट वाढविण्यासाठी प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांमध्ये यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढणाऱ्यां प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून मागील काही दिवसांच्या तुलनेमध्ये यूपीआय पेमेंटद्वारे मिळणारे उत्पन्न दुपटीने वाढले आहे. तसेच एका परिपत्रकाद्वारे सूचना देऊन वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी आग्रधन म्हणून सुट्टे पैसे देण्यात यावेत, अशा सूचना महामंडळाने स्थानिक प्रशासना दिल्या आहेत. भविष्यात वाहक आणि प्रवासी यांच्यामध्ये सुट्ट्या पैशावरून वाद उद्भभवणार नाहीत, याची काळजी महामंडळाने घ्यावी, अशी सूचना देखील परिवहन मंत्री  प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

०००

निलेश तायडे/विसंअ

विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी उत्पन्नवाढीचे स्त्रोतही बळकट करा – मुख्य सचिव सुजाता सौनिक

नागपूर,दि.31 :  येथील पायाभूत सुविधा व विकास कामांना असलेली गती समाधानकारक आहे. अनेक विकासकामे अजून सुरु आहेत. महानगराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन भविष्यातील नेमक्या गरजा लक्षात घेऊन नियोजनावर भर दिला पाहिजे. विकासकामांना जी काही गती मिळते ती विविध विभागाच्या परस्पर सहकार्यावर अवलंबून असते हे सूत्र सर्व विभागप्रमुखांनी लक्षात घेतले पाहिजे. प्रकल्प उभारतांना लागणारे भांडवल व त्याच्यातील आर्थिक संतुलन साध्य होण्याकरिता महसुली उत्पन्न कसे वाढेल यावर अधिक जबाबदारीने काम करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांनी  केले.

मेट्रो भवनला त्यांनी भेट देऊन  महामेट्रो, नागपूर विकास प्राधिकरण, महानगरपालिका अंतर्गत सुरु असलेल्या विकास कामाचा आढावा घेतला. यावेळी महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रावण हर्डीकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, नासुप्र सभापती श्री. संजय मीणा, महा मेट्रो संचालक (स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग) श्री अनिल कोकाटे,  संचालक (वित्त) श्री. हरेंद्र पांडे, संचालक (प्रकल्प) श्री. राजीव त्यागी उपस्थित होते.

एक ट्रिलियन डॉलरची आर्थिक व्यवस्था आपल्याला साकारायची आहे. यासाठी नागपूर विकास प्राधिकरण, मनपा, महामेट्रो व इतर प्राधिकरणांनी सकारात्मक ऊर्जा घेऊन पुढे आले पाहिजे. आपण ज्या-ज्या ठिकाणी प्रकल्प साकारले आहे त्या प्रकल्पाच्या ठिकाणी तेथील प्रसिद्ध झालेल्या उद्योग व्यवसायांना प्राधान्याने सामावून घेतले पाहिजे. यातून प्रत्येक ठिकाणी व्यवसायाची एक सक्षम साखळी निर्माण होईल. महामेट्रोला प्रत्येक स्टेशनवर यादृष्टीने मोठी संधी असून एक विकासाचा मार्ग यातून निर्माण होईल, असा विश्वास मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी व्यकत्‍ केला. मेट्रो स्टेशन येथे उपलब्ध व्यवसायिक जागेवर स्थानिक कला तसेच खाद्य पदार्थ यांना कश्या प्रकारे पुढे आणता येईल व प्रेरित करता येईल या करता उपाय योजना करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

विकास कामांच्या विस्तारासमवेत आपल्या आर्थिक क्षमताही विस्तारल्या पाहिजेत. जोपर्यंत आपण प्रत्येक प्रकल्पातील व्यावसायिक क्षमता वाढविणार नाही तोपर्यंत विकासाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही. आपले स्त्रोत हे आपण बळकट केली पाहिजे. यासाठी प्रत्येक विभागाने, कार्यालयाने आपली टीम बळकट केली पाहिजे. आपल्या विभागातील प्रत्येक व्यक्ती महत्वाचा आहे ही भावना मानव संसाधनाच्या दृष्टीने आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

श्रीमती सौनिक यांनी मेट्रोभवन येथील एक्सपरियन्स सेंटर, सिटी सेंटर मॉडेल, ऑपरेशनल कंट्रोल सेंटर (ओसीसी) याची माहिती घेतली. मेट्रो ट्रेनचे कामकाज आणि ऑपरेशनल कंट्रोल सेंटरच्या इतर बाबीबाबत देखील त्यांना माहिती प्रदान करण्यात आली. मेट्रो ऑपरेशन्सच्या डॉट नेट, 6-डी बीम मॉडेल, गेल्या काही वर्षांमध्ये साध्य केलेली प्रगती, अंमलबजावणी दरम्यानची आव्हाने इत्यादींचे सादरीकरण करण्यात आले.

आढावा बैठकीदरम्यान श्रीमती सौनिक मंत्रालय स्तरावरुन आवश्यक सर्व सहकार्य असलेले सहकार्य करु, असे सांगितले. फर्स्ट अँड लास्ट माईल कनेटिव्हिटी अंतर्गत नागपूर महानगरपालिका सोबत योग्यरित्या नियोजन करून मल्टीमॉडेल इंटिग्रेशन करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या.

नागपूर शहरामध्ये नागपूर मेट्रोच्या रूपात अतिशय चांगली वाहतूक प्रणाली तयार करण्यात आली आहे, आंतराराष्ट्रीय दर्ज्याची पायाभूत सुविधा आज नागपूर, पुणे शहरामध्ये उपलब्ध आहे हे अभिमानाची बाब आहे. मेट्रोचे तिकीट दर सर्वसामान्य व्यक्तींना परवडणारे आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

ताज्या बातम्या

‘जॉन डिअर’ने महाराष्ट्रात स्मार्ट मशिन्स तयार करून जगात निर्यात कराव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. ८ :  जॉन डिअर इंडियातील पुण्यातील प्रकल्पाने  ‘मेक इन महाराष्ट्र’ला महत्त्व दिले असून त्यांनी कृषी क्षेत्राला समृद्ध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना संपन्न करण्यासाठी उन्नत तंत्रज्ञानावर...

राज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. 8 : प्राथमिक आरोग्यावर भर दिल्यास विशेषोपचार असलेल्या संदर्भ सेवांवरील ताण कमी होतो. त्यामुळे संपूर्ण राज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करण्यावर...

ह्युंदाई मोटरच्या प्रोजेक्ट H2OPE अंतर्गत गडचिरोलीतील शाळांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

0
मुंबई, दि. 8 - गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम, आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील शाळांमध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या ह्युंदाई मोटरच्या 'प्रोजेक्ट H2OPE' (होप)...

सर्व शासकीय कार्यालयात सौर ऊर्जेचा  वापर सुरू करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. ७ :  राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात डिसेंबर २०२५ पर्यंत सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार असून प्रधानमंत्री सूर्य घर योजना राज्यात प्रभावीपणे राबविणार असल्याचे...

राज्यात काल मुंबई शहर जिल्ह्यात सर्वाधिक ४१ मिमी पाऊस

0
मुंबई, 8 : राज्यात मागील 24 तासांमध्ये (8 जून रोजी सकाळपर्यंत) मुंबई शहर जिल्ह्यात सर्वाधिक 41 मिमी पाऊस झाला आहे. तर रायगड 20.8 मिमी, धाराशिव 13.8 मिमी, ठाणे 7.9 मिमी, रत्नागिरी जिल्ह्यात 6.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे. राज्यात कालपासून आज 8 जून  रोजी...