गुरूवार, जुलै 3, 2025
Home Blog Page 30

‘विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी मत नोंदवावे

मुंबई, दि. २०: ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ चे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी विविध १६ क्षेत्र निहाय नागरिकांचे मत, अपेक्षा, आकांक्षा व प्राथम्यक्रम जाणून घेण्याच्या दृष्टीने राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. उपलब्ध करुन देण्यात आलेल्या क्युआर कोडवर नागरिकांनी आपले मत नोंदवून विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेमध्ये योगदान द्यावे. या सर्वेक्षणामध्ये नागरिकांची कोणतीही वैयक्तिक माहिती संकलित करण्यात येणार नाही. https://wa.link/o93s9m यावर आपले मत नोंदवावे, असे आवाहन नियोजन विभागाकडून करण्यात आले आहे.

केंद्र सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन २०४७ पर्यंत विकसित भारत -भारत@२०४७ करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था सन 2029 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर व सन 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचविणे हे राज्याचे ध्येय आहे. राज्याच्या ध्येयाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने प्रत्येक क्षेत्राचा ठसा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर उमटावा यासाठी ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ चे व्हिजन जाहीर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  दि. ६ मे २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत १५० दिवसाच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे.

या कार्यक्रमामध्ये व्हिजन डॉक्युमेंट (Vision Document) तयार करण्यात येणार आहे. व्हिजन डॉक्युमेंट (Vision Document) तयार करताना दीर्घकालीन, मध्यमकालीन व अल्पकालीन अशी टप्पानिहाय उद्दिष्टे ठेवण्याचे निर्देश सर्व विभागांना देण्यात आले आहेत. व्हिजन डॉक्युमेंट (Vision Document) चा आराखडा तयार करण्यासाठी १६ संकल्पनांवर आधारीत क्षेत्रनिहाय गट बनविण्यात आले आहेत. यामध्ये कृषि, शिक्षण, आरोग्य, ग्राम विकास, नगरविकास, भूसंपदा, जलसंपदा, पायाभूत सुविधा, वित्त, उद्योग, सेवा, सामाजिक विकास, सुरक्षा, सॉफ्ट पॉवर, तंत्रज्ञान व मानव विकास/ मनुष्यबळ व्यवस्थापन असे हे क्षेत्रनिहाय गट असतील. या सर्व गटांनी प्रगतशील, शाश्वत, सर्वसमावेशक व सुशासन यावर आधारित आराखडा तयार करावयाचा आहे. आराखडा तयार करताना त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती, शासकीय/अशासकीय संस्थांशी सल्लामसलत करण्यात येणार आहे.

विकसित महाराष्ट्राच्या व्हिजन मध्ये नागरिकांचे मत, अपेक्षा, आकांक्षा व प्राथम्यक्रम जाणून घेण्याच्या दृष्टीने राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण अभियानाचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिनांक १७ जून, २०२५ रोजी झाले आहे. सर्व आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपासून गावपातळीवरील कार्यालय प्रमुखांनी सर्वेक्षणामध्ये सर्व नागरिकांनी आपले अभिप्राय नोंदवावेत यासाठी दर्शनी भागावर फलक लावावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  दिले आहेत. यामध्ये नागरिकांनी क्युआर कोडवर आपले मत नोंदवून विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेमध्ये योगदान द्यावे. या सर्वेक्षणामध्ये सहभाग घेतलेल्या नागरिकांची कोणतीही वैयक्तिक माहिती संकलित करण्यात येणार नाही.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे प्रस्ताव एकत्र शासनाकडे सादर करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. २० : सातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध शासकीय विभागांचे नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाईचे एकत्र प्रस्ताव शासनाकडे तातडीने पाठवावे. नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

पालकमंत्री देसाई यांनी जिल्ह्यातील अतिवृष्टी पूरपरिस्थिती व पर्जन्यमान स्थितीचा आढावा दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, अभय काटकर, सार्वजनिक बांधकाम विगाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पावसामुळे पिण्याचे पाणी गढूळ येत आहे या पाण्यामुळे पोटदुखी, जुलाब, उलट्या अशा आजारांना सामारे जावे लागते ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीने उपचार द्यावे, यासाठी वैद्यकीय अधिकारी यांनी मुख्यालय सोडू नये. प्राथमिक व ग्रामीण रुग्णालयात पुरेसा औषधासाठा करुन ठेवावा, अशा सूचनाही पालकमंत्री देसाई यांनी केल्या.

अतिवृष्टीमुळे सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या योजना तसेच विद्युत पोल, विद्युत तारा तुटल्या आहेत, याचेही नुकसानीचे प्रस्ताव सादर करावेत. जिल्ह्यातील विविध वाहतूक मार्गावर भुस्खलन झाल्यास तेथील राडा रोड काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने यंत्रणा तयार ठेवावी. शाखा अभियंता यांनी मान्सून कालावधीत आपल्या तालुक्यात रहावे, अशा सूचनाही पालकमंत्री देसाई यांनी केल्या.

मोठ्या धरणात 32 टक्के तर लहान धरणांमध्ये 60 टक्के पाणीसाठा झाला आहे. लहान धरणातून अंदाजे पुढील आठवड्यात विसर्ग सोडला जाईल. कुठलीही दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासन सज्ज आहे. जिल्ह्यात तीन रस्ते बंद असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु असल्याचे जिल्हाधिकारी पाटील यांनी बैठकीत सांगितले.

०००

विविध विकासकामे वेळेत पूर्ण करण्यावर भर : पालकमंत्री अतुल सावे

नांदेड, दि. २० : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध विकास कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी भर देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले. आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील नियोजन भवनाच्या सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, खासदार रविंद्र चव्हाण, खासदार नागेश पाटील आष्टीकर, खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, हरिद्रा संशोधन प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील, आमदार विक्रम काळे, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार भिमराव केराम, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद बोंढारकर, आमदार राजेश पवार, आमदार जितेश अंतापूरकर, आमदार बाबुराव कोहळीकर, आमदार श्रीजया चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा नियोजन अधिकारी अर्जून झाडे तसेच जिल्ह्यातील सर्व विभागाचे अधिकारी आदींची उपस्थिती होती.

सुरवातीला 30 जानेवारी 2025 रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या अनुपालनास मान्यता देण्यात आली. तसेच गेल्या वर्षी म्हणजेच सन 2024-25 मध्ये झालेल्या 748 कोटी 99 लाख 95 हजार रुपये खर्चास मान्यता खर्चास मंजूरी देण्यात आली.  जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना अशा एकत्रित जिल्हा वार्षिक योजनेच्या 2025-26  साठी आर्थिक तरतुदीच्या विनियोजनाबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

सन 2025-26 साठी सर्वसाधारणसाठी 587 कोटी, अनुसूचित जाती उपयोजना 164 कोटी, आदिवासी उपयोजनेसाठी 642 कोटी 20 हजार रुपये याप्रमाणे एकुण 815 कोटी 20 लाख 20 हजार रुपये  मंजूर तरतूद आहे. याबाबत आढावा घेण्यात आला.

महावितरण-परिवहन विभागाची कामे लवकरच मार्गी

जिल्ह्यात सध्या महावितरणच्या कामाबाबत येणाऱ्या तक्रारी लक्षात घेऊन याबाबत लवकरच महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येईल. यात सर्व अडचणी सोडविण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली. यासोबतच परिवहन विभागाबाबत ज्या काही लोकांच्या समस्या आहेत त्याबाबतही लवकरच बैठक घेवून हा प्रश्न निकाल काढण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

स्मशानभूमीसाठी प्रत्येक आमदारांना 1 कोटी रुपये निधी 

जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मतदारसंघातील निधी अभावी प्रलंबित व प्रगतीपथावर असलेल्या कामाबाबत माहिती पालकमंत्री अतुल सावे यांना दिली. यावेळी लोकप्रतिनिधींनी काही गावांमध्ये स्मशानभूमीबाबत मागणी केली. त्यावर प्रत्येक आमदारांना स्मशानभूमीसाठी 1 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे पालकमंत्री अतुल सावे यांनी स्पष्ट केले.

शासकीय कार्यालयावर सोलार पॅनल

येत्या डिसेंबर पर्यंत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयावर सोलर पॅनल उभारणार असल्याची माहिती पालकमंत्री अतुल सावे यांनी यावेळी दिली. यामध्ये कार्यालयाच्या वीज बिलाची बचत होवून विजेच्या बिलापासून मुक्ती मिळणार आहे.

शेतकऱ्यांना मदतीसाठी पाठपुरावा

जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या पावसामुळे केळी आणि पपई पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे होऊन त्याबाबतचा अहवाल शासनास सादर केला आहे. याबाबत शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी या बैठकीत सांगितले.

डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयास ईटपी म्हणजेच प्रयोगशाळेत जी रसायने वापरले जातात त्यांना शुद्धीकरण करुन ते नाल्यात सोडणे कामासाठी 75 लाख रुपये मंजूर केले आहे. दिव्यांगाचा जो निधी आहे तो निधी खर्च करण्यावर भर देऊ,असेही त्यांनी सांगितले. जलजीवन मिशन कामांचा आढावा घेऊन त्यांनी संबंधितांना उपयुक्त सूचना दिल्या.

यावेळी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधीनी आपआपल्या मतदार संघातील कामाचा माहिती, प्रश्न, अडचणी पालकमंत्री सावे यांच्यासमोर मांडल्या. या सर्व समस्यांची सोडवणूक  करण्यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे पालकमंत्री सावे यांनी यावेळी यंत्रणाना सांगितले. तसेच जिल्ह्यातील काही भागात ड्रग्जस, अवैध धंदे, अंमली पदार्थाची वाहतुकीच्या तक्रारी आहेत. पोलिसांनी याकडे लक्ष वेधण्याचे त्यांनी सांगितले.

०००

विधानभवनमध्ये २३, २४ जून रोजी संसद आणि राज्यांच्या अंदाज समित्यांची राष्ट्रीय परिषद

मुंबई, दि. २० : संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद मुंबईत होणा असून महाराष्ट्र विधानभवन येथे २३ व २४ जून, २०२५ रोजी या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

परिषदेला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह, राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, लोकसभेच्या अंदाज समितीचे समिती प्रमुख डॉ. संजय जयस्वाल, महाराष्ट्र विधानमंडळाच्या अंदाज समितीचे समिती प्रमुख अर्जुन खोतकर उपस्थित राहणार आहेत. परिषदेच्या समारोपानंतर दिनांक २४ जून, २०२५ रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची पत्रकार परिषद होईल.

या राष्ट्रीय परिषदेमध्ये “प्रशासनीक कार्ये सक्षमपणे आणि अल्पव्ययासह होतील याची सुनिश्चिती करण्यासाठी अर्थसंकल्पीय अंदाजांचे पुनर्विलोकन आणि प्रभावी नियंत्रण यासाठी अंदाज समितीची भूमिका” या विषयावर विचारमंथन होईल.

या दोन दिवसीय परिषदेमध्ये संसद, सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या अंदाज समित्यांचे समिती प्रमुख आणि सदस्य सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सर्व सदस्य आणि महाराष्ट्रातील संसद सदस्य देखील या परिषदेस उपस्थित राहणार आहेत.

०००

‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ अंतर्गत आदिवासी समाजाच्या गावात १७ प्रकारच्या योजना राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • स्मारकस्थळी महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र उभारणार
  • गोद्री फत्तेपूर येथे गोर बंजारा आणि लबाना कुंभ स्मृतीस्थळी विविध विकास कामांचे ई-भूमिपूजन

जळगाव, दि. २० जून (जिमाका): ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’अंतर्गत राज्यातील आदिवासी गावांमध्ये १७ प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी करून आदिवासी समाजाचा कायापालट केला जाणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

धरणगाव येथे उभारण्यात आलेल्या क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे उद्घाटन व जामनेर तालुक्यातील गोद्री फत्तेपूर येथे गोर बंजारा आणि लबाना कुंभ स्मृतीस्थळी पाच कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे ई-भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धरणगाव येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, पद्मश्री चैत्राम पवार, अनिल भालेराव, शरदराव ढोले, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृती स्मारक अत्यंत सुंदर झाले आहे. राणी दुर्गावती, भगवान बिरसा मुंडा, सिद्धू-कान्हू, तंट्या मामा, झलकारी बाई, राघोजी भांगरे, भिमा नाईक, रुमाल्या नाईक, राणा पुंजा भिल यांच्यासारख्या अनेक नायकांचे दर्शन या स्मारकात घडते. हे स्मारक केवळ ऐतिहासिक नाही, तर येथे आश्रमशाळा असून अस्मिता जागवण्याचे कार्यही केले जाते. भविष्यात येथे महिलांसाठी कौशल्य विकास व फळप्रक्रिया प्रशिक्षण केंद्र उभारले जाईल. संस्कृती संवर्धनाचाही उपक्रम येथे राबविण्यात येईल.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याचा लढा सुरू केला आणि त्यानंतर जनजाती समाजातील अनेक नायकांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला. परंतु, त्यांचा इतिहास दुर्लक्षित राहिला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने अशा नायकांची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

खाज्याजी नाईक यांनी १८५७ च्या समरात भिल्ल जमातीचे ३० हजार लढवय्ये उभे करून महाराष्ट्र व मध्यप्रदेशात मोठा लढा दिला. त्यांच्या लढ्यामुळे इंग्रजांची सत्ता हादरली. इंग्लंडहून त्यांना ठार करण्याचे आदेश आले. त्यांच्यावर त्या काळी दोन हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते. त्यांनी इंग्रजांचा खजिना लुटून शस्त्र खरेदी केली. ‘जिथे अन्याय, तिथे खाज्याजी नाईक’ हे समीकरण बनले होते. अंबापाणीच्या लढाईत महिलांनीही शौर्य दाखवले. खाज्याजी नाईक अधिक काळ जगले, असते तर कदाचित इंग्रजांना लवकर भारत सोडावा लागला असता, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘धरती आबा’ योजनेंतर्गत राज्यातील आदिवासी गावांमध्ये १७ प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी होणार आहे. केंद्र सरकारने यासाठी ८० हजार कोटी रुपये मंजूर केले असून, पुढील ५ वर्षांत एकही आदिवासी बांधव बेघर राहणार नाही. त्यांना शिक्षण, आरोग्य, पोषण, रोजगार व रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

गोर बंजारा समाजाने देशभरात बावड्या, तलाव व पाणवठे उभारून समाजसेवा केली आहे. अशा समाजाच्या प्रेरणास्थळी गोद्री येथे सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

कार्यक्रमात शरदराव ढोले, अनिल भालेराव, पद्मश्री पवार यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृती स्मारक समितीचे सचिव विलास महाजन यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गोद्री येथील प्रसंगांवर आधारित पुस्तक भेट देण्यात आले.

खाज्याजी नाईक स्मृतीस्थळाचे उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाची कोनशिला अनावरण करून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांनी स्मृतीस्थळाची पाहणी केली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी खाज्याजी नाईक यांच्या स्मृती मंदिराला भेट देऊन अभिवादन केले.

०००

रा. स्व. संघ ही सर्वसमावेशक संघटना – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. २० : रा.स्व. संघ हे उच्चवर्णीयांची संघटना आहे हा हेतूपुरस्सर पसरवलेला गैरसमज आपल्या पुस्तकातून दूर करताना संघ ही सर्वसमावेशक संघटना असल्याची वस्तुस्थिती रमेश पतंगे यांनी आपल्या पुस्तकातून अधोरेखित केली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.

लेखक व विचारवंत रमेश पतंगे लिखित ‘व्हाय आर वी इन द आरएसएस?…. ‘ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते राजभवन येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

पूर्वी संघासाठी कार्य करणाऱ्यांना शासनात पदे स्वीकारता येत नसत, असे सांगून आज देशाचे पंतप्रधान, अनेक राज्यांचे राज्यपाल व मुख्यमंत्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

देशात भूकंप, नैसर्गिक आपदा व रेल्वे अपघात होतात त्यावेळी संघाचे स्वयंसेवक नेहमीच सेवा कार्यात अग्रेसर असतात, असे राज्यपालांनी सांगितले.

उत्तर पूर्वेच्या  राज्यातील लोकांना देशाच्या मुख्य प्रवाहाशी भावनेने जोडण्याचे काम रा.स्व. संघ करीत असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या स्थापनेचे शताब्दी वर्ष साजरे करीत असताना रमेश पतंगे यांचे संघावरील पुस्तक प्रकाशित होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करताना राज्यपालांनी लेखक पतंगे तसेच अनुवादक डॉ अश्विन रांजणीकर यांचे अभिनंदन केले.

यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी पुस्तकातील निवडक उतारे वाचून दाखवले तर ‘आम्ही संघात का आहोत …’ या श्री.पतंगे यांच्या मूळ मराठी पुस्तकाचे अनुवादक डॉ. अश्विन रांजणीकर यांनी आपले विचार व्यक्त केले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी तसेच उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी हे देखील पूर्वी संघ प्रचारक होते.

रा. स्व. संघ आपल्या स्वयंसेवकांना भारत मातेच्या गौरवासाठी काम करण्यास सांगतो, या कारणास्तव आपण आयुष्यभर संघासाठी कार्य केले, असे रमेश पतंगे यांनी सांगितले. पुस्तकाचे भाषांतर सर्व प्रमुख भारतीय भाषांमध्ये होणार असल्याची माहिती श्री. पतंगे यांनी यावेळी दिली.

रा. स्व. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘साप्ताहिक विवेक’तर्फे प्रकाशित या पुस्तकाला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची प्रस्तावना आहे.

0000

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा; पुणे घाट परिसरात पुढील २४ तासाकरिता ऑरेंज अलर्ट

मुंबई, दि. 20 : कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) मार्फत उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

राज्यात मागील २४ तासांमध्ये (२० जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) रत्नागिरी जिल्ह्यात ४१.७ मिमी पाऊस झाला आहे. तर ठाणे जिल्ह्यात ४१.६ मिमी, पालघर ४१.६ मिमी, रायगड जिल्ह्यात ४०.१ मिमी  आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात ३१.७ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज २० जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे  ४१.६, रायगड ४०.१, रत्नागिरी ४१.७,  सिंधुदुर्ग २४.२, पालघर ४१.६, नाशिक २७.४, धुळे १.५, नंदुरबार ४, जळगाव ३.४, अहिल्यानगर ८.४, पुणे २८, सोलापूर २,  सातारा २६.५,  सांगली ५.४,  कोल्हापूर १७.४, छत्रपती संभाजीनगर ७.२, जालना ५.५, बीड ४.८,  लातूर ०.६, धाराशिव ३.३, नांदेड ३.७,  परभणी ३, हिंगोली ७.८, बुलढाणा ६.५, अकोला ११.६, वाशिम ७.६ अमरावती १२, यवतमाळ ९.७, वर्धा १०.७, नागपूर ५.९, भंडारा ३.२, गोंदिया ३.९, चंद्रपूर २.६ आणि गडचिरोली जिल्ह्यात १.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात पाण्यात बुडून दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात भिंत पडून दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. तर जालना जिल्ह्यात वीज पडून एका प्राण्याचा मृत्यू झाला आहे.

राज्य आपत्कालीन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर आहे.       पुणे विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे खडकवासला धरण मुठा नदी १५,०९२ क्यूसेक, बंडगार्डन बंधारा पुणे-२४,४१६ क्युसेक, भिमा नदी दौंड पूल विसर्ग १०,८३३ क्युसेक, घोड नदी घोड धरण  ४,००० क्युसेक, कण्हेर धरण सातारा ५०० क्युसेक, वेण्णा नदी-१,००० क्युसेक विसर्ग सुरू असून नदी किनाऱ्या लागत गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील गोदावरी नदी नांदूर मधमेश्वर धरणातून  २२,३४५ क्युसेक, सीना नदी – सीना धरणातून  २८९ क्युसेक विसर्ग सुरू आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खेड, दापोली नगरपालिका हद्दीमध्ये पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. बोरघर वावे तर्फे नातू चिंचवली या रस्त्यावरच्या पुलावर पाणी गेल्याने रस्ता बंद होता. वनोशी अंगणवाडी पन्हाळे फणसूर रस्त्याच्या मधील पुलावर पुराचे पाणी आल्याने रस्ता बंद करण्यात आला होता. सद्यस्थित वाहतूक सुरळीत चालू आहे. चिंचगर कोरेगाव भैरवी रोड मधील रस्त्यावर पुलावर पुराचे पाणी आल्याने रस्ता बंद करण्यात आला होता. सद्यस्थित वाहतूक सुरळीत चालू आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ (गुहागर- चिपळूण-विजापूर) सोनपात्र वळणाजवळ दरड कोसळयाने काही काळ वाहतूक बंद करून दरड बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. तसेच अतिवृष्टीमुळे  चिपळूण, दापोली येथे झाड कोसळून आणि भिंत पडून खासगी मालमत्तांचे नुकसान झाली असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे.

०००००

एकनाथ पोवार/विसंअ/

‘दिलखुलास’ कार्यक्रमात मंत्री जयकुमार गोरे यांची मुलाखत

मुंबई, दि. 20 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘आषाढी वारी’ निमित्त  शासनामार्फत करण्यात आलेले नियोजन व सोयी-सुविधा’ या विषयासंदर्भात ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

पंढरपूरची ‘आषाढी वारी’ ही वारकऱ्यांची श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीचा उत्सव आहे. या वारीतील प्रत्येक वारकऱ्याचा प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा यासाठी राज्य शासनाने यंदा अधिक व्यापक नियोजन केले आहे. वारीमध्ये यंदा शासनाने आरोग्य सेवा, पाणीपुरवठा, वाहतूक नियोजन, आपत्कालीन व्यवस्था, स्वच्छता मोहीम आणि सुरक्षा यावर विशेष भर दिला आहे. तसेच ‘मुख्यमंत्री निवारा सुविधा’ ही यंदाच्या वारीतील नवी भर असून, यामाध्यमातून हजारो वारकऱ्यांना विश्रांतीसाठी निवासाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासनाच्या विविध विभागांच्या समन्वयातून, स्थानिक प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने ही वारी अधिक सुसंगठित आणि सुरक्षित करण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. वारकरी परंपरेतील या महत्त्वाच्या सोहळ्यात शासनाची भूमिका आणि जनहितकारी उपाययोजनांची माहिती याविषयावर मंत्री श्री. गोरे यांनी ‘दिलखुलास’ व ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत सोमवार दि.23 आणि मंगळवार दि. 24 जून 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

000000

जयश्री कोल्हे/ससं/

मंत्रालयात ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

मुंबई, दि. 20 : मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने योगा प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. ‘इन्स्टिट्युट ऑफ योगा’ यांच्या सहयोगाने आयोजित या प्रात्यक्षिक कार्यक्रमासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, राज्यमंत्री पंकज भोयर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, इन्स्टिट्युट ऑफ योगाचे सह संचालक ऋषी योगेश यांच्यासह विविध विभागांचे सचिव, उपसचिव, अधिकारी आणि कर्मचारी  उपस्थित होते.

यावेळी इन्स्टिट्युट ऑफ योगाच्या मार्गदर्शकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच योगाच्या महत्त्वाविषयी माहिती दिली. यावेळी पर्वतासन, शवासन यासारख्या योगांची प्रत्यक्षिके उपस्थितांनी केली. तसेच अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धामध्ये सुवर्ण पदक विजेते मंत्रालयीन अधिकारी जगन्नाथ लांडगे, दत्ताराम सावंत आणि योगिता जाधव यांनी योग प्रात्यक्षिके सादर केलीत.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगाव येथील ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन

जळगाव, दि. २० जून (जिमाका वृत्तसेवा) : धरणगाव  येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यात येत असून यामध्ये प्रस्तावित खाटांची वाढ करत एकूण ५० खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभारले जाणार आहे. या रुग्णालयाची मुख्य इमारत व वैद्यकीय अधिकारी निवासस्थानाच्या बांधकामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

धरणगाव शहराला लागून एकूण २ हेक्टर क्षेत्रफळाच्या या जागेवर उपजिल्हा रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर उभारले जाणार आहे. या प्रकल्पासाठी शासनाकडून ३९ कोटी ४६ लाख ७५ हजार इतक्या निधीस प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.

या श्रेणीवर्धनामुळे धरणगाव तालुक्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम होणार आहेत. नव्याने विविध वैद्यकीय अधिकारी पदांची निर्मिती करण्यात येणार असून, शस्त्रक्रिया, स्त्रीरोग व प्रसूती, बालरोग, बधिरीकरण आदी सेवांसाठी तज्ज्ञ अधिकारी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे परिसरातील गरजू आणि अत्यवस्थ रुग्णांना अत्याधुनिक रुग्णसेवा उपलब्ध होणार आहे.

000

ताज्या बातम्या

विधानसभा कामकाज

0
राज्यात वाळू वाहतुकीसाठी काही अटींसह २४ तास परवानगी  महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मुंबई, दि. ३  : राज्यात सायंकाळी ६ ते सकाळी ६ या कालावधीत वाळू वाहतुकीवर...

विधानसभा प्रश्नोत्तरे 

0
शासकीय रुग्णालयांमध्ये सिटीस्कॅन आणि एमआरआय मशीन खरेदीसाठी निधी उपलब्ध करून देणार - उपमुख्यमंत्री अजित पवार वैद्यकीय शिक्षण विभागाकडील खरेदी शासन नियमानुसारच - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ मुंबई, दि....

विभागीय आयुक्त कार्यालयात कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत प्रशिक्षण

0
छत्रपती संभाजीनगर दि.3 (विमाका): राज्य शासनाच्या 150 दिवस कार्यक्रमा अंतर्गत तसेच प्रशासनातील कामकाज अधिक गतिमान, अचूक व पारदर्शक करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात कृत्रिम बुद्धिमत्ता...

शाळाबाह्य विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा शासनाचा प्रयत्न – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

0
मुंबई, दि. 3 : शासन विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या, शाळाबाह्य विद्यार्थी आणि शिक्षणाच्या गुणवत्तेसंदर्भात गंभीर असून सर्वंकष उपाययोजना राबवत आहे. यु-डायस (UDISE) प्रणालीच्या आकडेवारीनुसार विद्यार्थ्यांची...

कनिष्ठ सहाय्यक पदोन्नती प्रक्रिया २६ जिल्हा परिषदांमध्ये पूर्ण – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

0
मुंबई, दि. 3 : कनिष्ठ सहाय्यक पदावर पदोन्नती व अनुकंपा तत्वावरील नियुक्ती संदर्भात 40:50:10 या प्रमाणानुसार सुधारित सेवा प्रवेश नियमानुसार 26 जिल्हा परिषदांमध्ये प्रक्रिया...