शनिवार, जून 7, 2025
Home Blog Page 293

आदिवासींसाठी सर्वसमावेशक आरोग्य धोरण करू –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

▪️पारंपारिक आदिवासी उपचार व आधुनिक वैद्यकाचा एकात्मिक उपयोजन महत्वपूर्ण

▪️सेवाभावी संस्थांच्या सहयोगातून गडचिरोली जिल्हा होणार मलेरिया मुक्त

▪️आदिवासी समाजातील निसर्गपूरक उपचाराला आधुनिकतेची जोड मिळावी

नागपूर, दि. ०२ : एम्स  येथील तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत आदिवासींच्या आरोग्याबाबत झालेले तज्ज्ञांचे विचारमंथन अधिक मोलाचे आहे. याबाबत आता पुढचे पाऊल म्हणून परिषदेतील उपस्थित झालेले प्रश्न, त्याची असलेली उत्तरे, तज्ज्ञांच्या सूचना यांना अधोरेखित करून आरोग्य विद्यापीठ, एम्सच्या माध्यमातून आदिवासींच्या आरोग्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे सर्वसमावेशक असे आरोग्य धोरण तयार केले जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ’एम्स’ नागपूर येथे आयोजित आदिवासी आरोग्य परिषदेच्या समारोप समारंभात ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त), ’एम्स’ नागपूरचे संचालक डॉ. प्रशांत जोशी,  परिषदेचे संयोजक डॉ. संजीव चौधरी, विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ उपस्थित होते.

या आरोग्य धोरणात आदिवासींच्या आरोग्य विषयक मूलभूत प्रश्नांवर निश्चित उपाययोजनांचा आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी कुलगुरूंना केल्या. हे धोरण केवळ महाराष्ट्रीय स्तरापुरते मर्यादित न राहता राष्ट्रीय व वैश्विक स्तरावर उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याला महाराष्ट्र शासनातर्फे सर्वातोपरी सहकार्य केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

हजारो वर्षांपासून आदिवासी समाज आपल्या उपजत ज्ञानावर स्वतःचे अस्तित्व टिकून आहे. काळाच्या प्रवाहात अनेक स्थित्यंतरे झाली, मात्र आदिवासी संस्कृती टिकून राहिली. यातील मूल्य, विविध भागातील पारंपारिक आदिवासी उपचार आणि आधुनिक वैद्यकाचा एकत्रित विचार करुन त्याचे उपयोजन केल्यास आदिवासींच्या आरोग्यविषयक मुलभुत सुविधांवर उत्तरे प्राप्त होऊ शकतील असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

आजही आदिवासी क्षेत्रात कुपोषण, सिकलसेल आणि मलेरिया यासारखे मूलभूत प्रश्न आहेत. यावर राज्यशासन व केंद्रसरकारतर्फे विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. अनेक योजनांना यशदेखील प्राप्त होत आहे. सिकलसेल आजार निर्मूलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करूयात, असे आवाहन त्यांनी केले.

या परिषदेसाठी निवडलेले स्थळ व ठिकाण याबद्दल त्यांनी संयोजकांना धन्यवाद दिले. आदिवासी गोंड राजा बख्त बुलंद शाह हे या शहराचे संस्थापक होते. इथे आदिवासी संस्कृतीच्या पाऊलखुणा आहेत असे त्यांनी सांगितले.

बिल गेट्स फाउंडेशन, सनफार्मा, आयसीएमआरए यांच्या सहयोगातून आदिवासी गडचिरोली जिल्हा मलेरियामुक्त करू असे त्यांनी सांगितले.

आदिवासींच्या आरोग्य समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी  MUHS FIST-25  परिषद महत्त्वपूर्ण आहे. या परिषदेच्या माध्यमातून एकत्रित झालेला डेटा धोरण निश्चितीसाठी महत्वपूर्ण आहे विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले.

’एम्स’ नागपूरचे संचालक डॉ. प्रशांत जोशी यांनी प्रास्ताविकात सांगितले की, आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि ’एम्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासींच्या आरोग्य समस्यांसाठी सुरु करण्यात आलेली परिषद नक्कीच जागतिक स्तरावर नावलौकिक करणार आहे. ’एम्स’ तर्फे विविध योजना कार्यान्वीत करण्यात आल्या आहे त्याचा सकारात्मक परिणाम मुर्त रुपात दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.

आदिवासी भागातील लोकांच्या आरोग्य समस्यांसाठी  MUHS FIST-25 च्या यासाठी आरोग्य विद्यापीठाने व ’एम्स’ ने केलेल सहकार्य महत्वपूर्ण आहे.  आदिवासींच्या आरोग्य समस्या सोडविण्यासाठी परिषदेच्या माध्यमातून तरुण पिढीसाठी आदर्श निर्माण झाला आहे. जेणेकरुन सामाजिक काम करण्याची नवीन टीम तयार होईल असे परिषदेचे आयोजक सचिव डॉ. संजीव चौधरी यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी एम्स परिसरात उभारण्यात आलेल्या ट्रायबल व्हिलेज येथे भेट देवून पाहणी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दर्शन दक्षिणदास यांनी केले तसेच उपस्थितांचे आभार MUHS FIST-25 चे संयोजन समितीचे सदस्य संदीप राठोड यांनी केले.

०००

 

 ५० हजार हक्काची घरे देण्यासाठी मिशन मोडवर काम करा -पालकमंत्री प्रकाश आबिटकर 

  • ‘आम्ही सोबती घरकुलाचे’ मोहीमेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

कोल्हापूर, दि. ०२ (जिमाका): प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व अन्य राज्यस्तरीय योजनांतून कोल्हापूर जिल्ह्यातील गरजू कुटुंबांसाठी कमीत कमी 50 हजार हक्काची घरे उपलब्ध करुन देण्यासाठी महसूल, समाज कल्याण, जिल्हा परिषद व संबंधित यंत्रणेने मिशन मोडवर काम करावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केल्या.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण- टप्पा 2 ची आढावा बैठक पालकमंत्री श्री. आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार अशोक माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश गोडसे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे आदी उपस्थित होते.

यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळा सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षित केल्याबद्दल पालकमंत्री श्री. आबिटकर यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, सरपंच व गट विकास अधिकारी, ग्रामसेवक यांना सन्मानित करण्यात आले.

पालकमंत्री श्री. आबिटकर म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वपूर्ण योजना असून राज्य शासनही या योजनेला सर्वतोपरी सहकार्य करत आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मधून जिल्ह्यातील 44 हजार लाभार्थ्यांना या आर्थिक वर्षात घरकुलाचा लाभ देण्यात येणार असून अन्य राज्यस्तरीय योजनांमधून 10 हजार घरकुले अशाप्रकारे किमान 50 हजारांहून अधिक घरकुलांचा लाभ जिल्ह्यातील लाभार्थ्यांना देण्यासाठी चोख नियोजन करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. गरजू कुटुंबांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणेने समर्पित भावनेने काम करावे. लाभार्थ्यांची यादी निश्चित करण्यापासून ते त्यांच्या गृह प्रवेशा पर्यंतची सर्व कामे वेळेत व गतीने मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व ग्रामसेवकांनी परस्पर समन्वय साधून झोकून देऊन काम करावे, असे त्यांनी सूचित केले.

आम्ही सोबती घरकुलाचेया मोहीमेचा पालकमंत्री श्री.आबिटकर यांच्या हस्ते शुभारंभ

प्रधानमंत्री आवास योजना व अन्य राज्यस्तरीय घरकुल योजनेतून लाभार्थ्यांसाठी घरकुले उभी करताना त्यांना मूलभूत सुविधा देणे आवश्यक आहे. यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून ‘आम्ही सोबती घरकुलाचे’ ही मोहीम कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येणार असून या मोहिमेचा शुभारंभ श्री.आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला.

या मोहिमेमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सोबतीने तसेच सर्व प्रशासकीय यंत्रणेमार्फत घरकुल लाभार्थ्यांच्या सोयीसाठी सर्व योजनांचा कृतीसंगम एकाच व्यासपीठावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. बहुतांश लाभार्थी हे ग्रामीण व डोंगरी भागात राहत असल्यामुळे त्यांना चांगल्या सुविधा, आरोग्य, शिक्षण व अन्य सुविधा पुरवून त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. यामुळे लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होईल.

या विषयाच्या अनुषंगाने पालकमंत्री श्री. आबिटकर म्हणाले, जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना घरकुले उपलब्ध करुन देताना ‘आम्ही सोबती घरकुलाचे’ या मोहिमेअंतर्गत पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, आरोग्य, शिक्षण, रस्ते, वीज पुरवठा, कौशल्य प्रशिक्षण, गृह कर्ज देण्यासाठीही चोख नियोजन करा. त्याचबरोबर यासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या देण्याचे काम संबंधित विभागांनी वेळेत पूर्ण करावे. जिल्ह्यातील बहुतांश लाभार्थी हे ग्रामीण व डोंगरी भागात राहत असल्यामुळे त्यांना चांगल्या सुविधा, आरोग्य, शिक्षण व अन्य सुविधा पुरवून त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यासाठी प्रयत्न करा. तसेच ही मोहीम राज्याला मार्गदर्शक ठरेल अशा पद्धतीने काम करुन मोहीम यशस्वी करा, असेही त्यांनी सूचित केले.

जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, आजवर प्रत्येक योजना कोल्हापूर जिल्ह्यात यशस्वीपणे राबवण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचे काम प्रभावीपणे करून राज्यात कोल्हापूर जिल्हा अग्रेसर ठरण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.

१० एप्रिल पर्यंत घरकुल बांधून पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना बक्षीस

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी या योजनेचे सादरीकरण केले. ते म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजने मधून चालू आर्थिक वर्षात सुमारे 700 कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला उपलब्ध झाला आहे. प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात जवळपास 94 टक्के घरकुले पूर्ण करण्यात आली आहेत. या दुसऱ्या टप्प्यातही घरे उपलब्ध करुन देताना विविध योजनांचा कृती संगम घडवून लाभार्थ्यांना सर्व सोयीसुविधांनी युक्त घरकुले उपलब्ध करुन देण्याचे नियोजन केले आहे. घर गृहलक्ष्मीचे, प्रधानमंत्री सूर्य घर, गृह कर्ज, हर घर जल, उज्वला गॅस, स्वच्छ भारत मिशन, तसेच वीज कनेक्शन देण्यात येणार आहे. तसेच नाविन्यपूर्ण योजनेतून बहुमजली इमारती उभ्या करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प म्हणून प्रीकास्ट तंत्रज्ञानाचा वापर करुन घरकुलाची निर्मिती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

आम्ही सोबती घरकुलाचे या मोहिमे अंतर्गत घरकुलाचे काम स्पर्धात्मक होण्यासाठी एक विशेष प्रतियोगिता सुरु करण्यात आली आहे. 2 फेब्रुवारी ते 10 एप्रिल 2025 या कालावधीत घराचे काम पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना बक्षीस स्वरुपात गृहोपयोगी वस्तू देण्यात येणार असून लाभार्थ्यांनी या मोहिमेचा लाभ घेवून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी 10 एप्रिल पर्यंत आपले घरकुल बांधून पूर्ण करावे, असे आवाहन कार्तिकेयन एस. यांनी केले.

बैठकीला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नाबार्डचे व्यवस्थापक, गटविकास अधिकारी, ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक तसेच संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

०००

नूतनीकरण केलेल्या जिल्हाधिकारी दालनाचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूर,दि. ०२ : जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी यांच्या सुसज्ज दालनाचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या नूतनीकरण केलेल्या दालनासह राजर्षी शाहू सभागृह, अभ्यागतांसाठी प्रतिक्षा कक्ष व स्वीय सहायक कक्षाचेही नूतनीकरण करण्यात आले आहे.  यावेळी नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास, औकाफ  राज्यमंत्री तथा सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ, खासदार छत्रपती शाहु महाराज, खासदार धैर्यशील माने, सर्वश्री आमदार चंद्रदीप नरके, अमल महाडिक, डॉ. अशोकराव माने, शिवाजी पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे आदी उपस्थित होते.

०००

जळव ते बामणेवाडी रस्ता कामाचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते भूमिपूजन

सातारा दि.२ (जिमाका):  मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्रमांक २ रिसर्च अँड डेव्हलपमेंट या योजनेमधून मंजूर टीआर १७ ते सीपीआर ७ जळव ते बामणेवाडी या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाले.

जळव ते बामणेवाडी या काँक्रिटीकरण रस्ता कामाचे भूमिपूजन जळवफाटा येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच रामचंद्र पवार , विश्वास पवार , विजयराव सपकाळ,  अभियंता कांबळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले की, जळव ते बामणेवाडी या रस्त्याच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता दहा कोटी 17 लाखाची असून तांत्रिक मंजुरी आठ कोटी पंधरा लाखाची मिळाली आहे या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी दहा वर्षात 47 लाख 64 हजार रुपये लागणार आहेत. या अनेक वर्षे मागणी होत असलेल्या रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना चांगली सुविधा निर्माण होणार आहे. सदरचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच कामाचा दर्जा चांगला राखावा अशी सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी यांनी दिली.

०००

परदेशात मराठीचे जतन, संवर्धन करणाऱ्या मराठी माणसांच्या संस्थांना आर्थिक मदत देणार- मंत्री उदय सामंत

पुणे, दि. ०२: राज्य शासनाची कोणतीही आर्थिक मदत न घेता परदेशात आपली मराठी माणसे मराठीचे संवर्धन, जतन करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन या परदेशातील मराठीचे काम करणाऱ्या संस्थांच्या मागे राज्य शासन आर्थिक ताकत निश्चितपणे उभी करेल, अशी ग्वाही मराठी भाषा मंत्र उदय सामंत यांनी दिली. पुढील वर्षात होणारे चौथे विश्व मराठी संमेलन हे नाशिक येथे आयोजित करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

फर्ग्युसन महाविद्यालय येथे आयोजित तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी रितेश देशमुख यांना पहिला ‘विश्व मराठी संमेलन- कलारत्न पुरस्कार’ देण्यात आला.

मंचावर राज ठाकरे, सयाजी शिंदे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, माजी आमदार उल्हास पवार, पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे आदी उपस्थित होते.

मराठी भाषेचा मंत्री असणे यामुळे मी मला भाग्यवान समजतो, अशी भावना व्यक्त करुन मंत्री श्री. सामंत म्हणाले, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी ही 2 हजार वर्षापूर्वीची असल्याचे पुरावे केंद्राकडे सादर करण्यासाठी 12 वर्षे लागली. परंतु, गतवर्षी आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आता राज्याच्या अर्थसंकल्पात मराठी भाषा विभागाला भरीव तरतूद करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

या संमेलनासाठी परदेशातून आलेल्या मराठी माणसांना येण्यासाठी आर्थिक मदत देण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु, यापैकी 80 टक्क्याहून अधिक जणांनी ही मदत नाकारली असून ती रक्कम मराठीच्या संवर्धनासाठी मराठी भाषा विभागाने वापरावी असे सांगितले आहे. हे मराठी माणसाचे मोठेपण आहे, असेही श्री. सामंत म्हणाले.

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, इतर देश, राज्यातील लोक जसे आपल्या भाषेवर ठाम राहतात, त्याप्रमाणे मराठी माणसाने आपल्या भाषेवर ठाम राहिले पाहिजे. आपल्या साहित्यिकांनी मार्ग दाखविला पाहिजे, बोलले पाहिजे. चांगले- वाईट समाजाला सांगितले पाहिजे. साहित्यिक जेव्हा बोलतील, तेव्हा लोक त्यांना ऐकतील आणि त्यांची पुस्तकेही वाचतील; आणि पुस्तकांतून प्रबोधन होईल. तरुणांनी पुस्तके वाचली पाहिजेत. पुस्तकांचा आणि ज्ञानाचा प्रचार प्रत्येक मराठी घरात गेला पाहिजे. महाराष्ट्र हा मराठी भाषिक म्हणून एकत्र आला पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

अभिनेते श्री. देशमुख म्हणाले, मराठी घरात जन्म घेणे हेच आपले भाग्य असते. आपण १० वर्षात हिंदी चित्रपटसृष्टीत काम केल्यानंतर वडिलांनी मराठी चित्रपटांच्या अनुषंगाने विचारल्यानंतर ‘लय भारी’ हा चित्रपट केला जो प्रचंड लोकप्रिय ठरला. गेल्या १३ वर्षात केवळ मराठी चित्रपटांचीच निर्मिती केल्याचे श्री. देशमुख यांनी आवर्जून सांगितले.

आपले आयुष्य पुस्तकातून घडल्याचे सांगून अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले, दुसऱ्याने सांगून विचार बदलत नसतात. आपण आपल्यापासून सुरुवात केल्यावरच बदल होऊ शकतो. आपल्याला इतर कोणत्याही भाषेतील चित्रपटात काम करायचे असल्यास त्यातील संवाद हे मराठीतच लिहून घेतो आणि बोलतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

०००

नवकल्पना आणि संशोधनाच्या आधारे ज्ञानाधिष्ठित भारताची निर्मिती करणे शक्य- डॉ. रघुनाथ माशेलकर

  • विश्व मराठी संमेलनात मराठी उद्योजकांच्या चर्चासत्राचे आयोजन

पुणे, दि. २:  संपूर्ण जगात ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेला खूप महत्त्व आहे; नवकल्पना आणि संशोधनाच्या माध्यमातून ज्ञानाधिष्ठित भारताची निर्मिती  करुन मोठी मजल मारू शकतो, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.

‘विश्व मराठी संमेलन – २०२५’ अंतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुख्य मंच येथे आयोजित मराठी उद्योजकांच्या चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्रात ‘बीव्हिजी ग्रुप’चे प्रमुख हणमंतराव गायकवाड, नाशिक येथील सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदे, गर्जे मराठी ग्लोबलचे आनंद गानू देखील सहभागी झाले होते. चर्चासत्राचे निवेदन जयू भाटकर यांनी केले.

जगामध्ये हवामान बदलाची समस्या मोठी असून त्यावर मात करण्यासाठी हायड्रोजन फ्युएल सेल व इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या बॅटरी उत्पादनात भारतामध्ये सर्वात जास्त काम महाराष्ट्रात करण्यात येत आहे. त्यामुळे हरित ऊर्जेच्या तंत्रज्ञानात आपण जगात नेतृत्व करू शकतो, असे सांगून डॉ. माशेलकर म्हणाले, देशाच्या १५ टक्के औद्योगिक उत्पादन महाराष्ट्रात होते. तथापि, औद्योगिक उत्पादन क्षेत्रात संशोधनासाठी खूप कमी गुंतवणूक होत असते. त्यामुळे काल जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात खासगी क्षेत्रासाठी करण्यात आलेली २० हजार कोटी रुपयांची तरतूद खूप महत्त्वाची करणार आहे, असेही ते म्हणाले.

संशोधन हे पैशाचे ज्ञानात रूपांतर करते, तर नवकल्पना या ज्ञानाचे पैशांमध्ये रूपांतर करतात, असे सांगून ते पुढे म्हणाले, नवकल्पनांच्या आधारे स्टार्टअप निर्माण होण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. २०१६ मध्ये असलेली ४७६ च्या तुलनेत २०२१ मध्ये देशात ७० हजार स्टार्टअप निर्माण झाले आहेत. त्यातील २०१६ मध्ये वर्षाला त्यापैकी युनिकॉर्न स्टार्टअप निर्माण व्हायचा, मात्र २०२१ मध्ये दर आठवड्याला एक युनिकॉर्न येत आहे. त्यातही ५० टक्के हे महाराष्ट्रातील तिसऱ्या व दुसऱ्या स्तरातील शहरातून येत आहेत ही त्यातील आणखी विशेष बाब आहे. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा उभ्या राहणे हे त्यामागील महत्वाचे कारण आहे, असेही ते म्हणाले.

शिक्षण हे भविष्य घडवते असे सांगून, तुम्ही कुठे जन्मलात, कोणाच्या पोटी जन्मला, आपल्या परिस्थितीत जन्मला याला महत्त्व नसते, तर तुमचे भविष्य तुमच्या हातात असते, असा मोलाचा सल्ला डॉ. माशेलकर यांनी तरुणांना दिला. पाच वर्षांपूर्वी नवीन शैक्षणिक धोरण आल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी माशेलकर समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर आज एआयमुळे जगात खूप बदल झाला आहे. त्यामुळे केवळ ‘शिक्षणाचा हक्क’ याबाबतच नव्हे तर ‘योग्य शिक्षण’ आणि ‘योग्य मार्गाने शिक्षण’ यावरही भर द्यावा लागेल. तंत्रज्ञान वेगाने बदलत असल्याने या शिक्षणाचा बदलणाऱ्या भविष्यामध्ये वेगळा विचार करावा लागेल, असेही ते म्हणाले.

हणमंतराव गायकवाड यांनी दहा बाय दहाच्या खोलीतून झालेला आपल्या संघर्षमय जीवनाचा प्रवास उलगडून सांगितला. ते पुढे म्हणाले, टेल्को कंपनीमध्ये काम करत असताना काम करत असताना समाजासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने ‘भारत विकास प्रतिष्ठान’ची स्थापना केली.  ‘बीव्हिजी’ या नाममुद्रेची स्थापना करून आपल्या गावच्या लोकांना मोठ्या कंपन्यांत स्वच्छतेचे काम दिले. पुढे राष्ट्रपती भवन, संसद, प्रधानमंत्री कार्यालय, सर्वोच्च न्यायालय, विमानतळे जागतिक महत्वाच्या कंपन्या आदी ठिकाणी सचोटीने, प्रामाणिकपणे काम करत स्वच्छतेचे काम मिळवले. प्रत्येकात पुढे जाण्याची प्रचंड ताकद आहे फक्त कष्ट करण्याची तयारी पाहिजे आणि रात्रंदिवस ध्यास घेतला पाहिजे, असा सल्ला त्यांनी युवा वर्गाला दिला.

आपली संस्था कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य तसेच आयुर्वेदामध्ये संशोधन करीत आहे. दहा कोटी लोकांच्या आयुष्यात बदल घडवणे, दहा लाख लोकांना काम देणे आणि शंभर देशात आपल्या संस्थेला घेऊन जाणे हे आपले स्वप्न आहे, असे सांगून श्री. गायकवाड पुढे म्हणाले, संपूर्ण जग विस्तारले आहे. ब्रिटिश राणीने ब्रिटिशांना जी प्रेरणा दिली होती की संपूर्ण जगात जाऊन राज्य करा, ती प्रेरणा आपल्या तरुणांनी घ्यायची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद यांचा आदर्श घेतला पाहिजे. तसेच आपल्या मनातील कक्षा रुंदावल्या पाहिजेत. भारत सरकारने ‘बीव्हिजी’ बरोबर एक कंपनी स्थापन केली असून आता तीस लाख नोकऱ्या यातून उपलब्ध आहे. फक्त यासाठी घराचे स्वरूप आणि शिक्षण यातील तफावत भरून काढली पाहिजे, असेही ते म्हणाले.

श्री. गानू म्हणाले, परदेशात गेल्यावर आपल्या देशासाठी खूप काही करण्याची गरज आहे असे लक्षात आले. त्यावेळी दोन औषध कंपन्या स्थापन केल्या. यश, पैसे मिळत होते. परंतु, हे फक्त स्वतःसाठी करत असल्याची भावना होती. मग समाजासाठी काम केले पाहिजे ही भावना निर्माण झाली आणि २००५ पासून सामाजिक कार्य सुरू केले. त्यातून गर्जे मराठी ग्लोबल ना- नफा संस्थेची स्थापना केली. आज संस्थेत २५ देशातील १५ हजाराहून अधिक लोक एकत्र येऊन काम करत आहेत. जगभरातील मराठी माणसांचे जाळे निर्माण करणे, धडपडणाऱ्या कष्टाळू नव्या पिढीचे मार्गदर्शक बनणे, त्यांना उद्योजकता, व्यवसायासाठी मदतीची यंत्रणा करणे यासाठी काम करण्यात येत आहे. नव्या पिढीला उद्योगासाठी परदेशात जाण्यासाठी, परदेशातील आपल्या माणसांना भारतात उद्योगासाठी येण्यासाठी, नवीन उद्योग स्थापन करण्यास मार्गदर्शन करण्यास आपली संस्था तयार असून राज्य शासनही त्यासाठी आम्हाला मदत करत आहे, असेही ते म्हणाले.

श्री. शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि हक्क मिळविण्यासाठी, आपल्या कष्टाचे दाम मिळविण्यासाठी सकारात्मक मार्ग स्वीकारून शेतकऱ्यांना एकत्र केले आणि सह्याद्री फार्म्सची स्थापना केली. १० शेतकऱ्यांपासून सुरुवात करून आज २६ हजार शेतकरी या शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद आहेत. ही सर्व सभासद शेतकरी मालक असलेली पूर्ण सहकारी तत्त्वावरील कॉर्पोरेट कंपनी आहे. टोमॅटो, द्राक्षे, भाजीपाला उत्पादनासाठी सभासदांना सर्व प्रकारचे सहाय्य, ताजा कृषी माल विक्री व्यवस्था, काढणीपश्चात प्रक्रिया यात काम करण्यात येत आहे. भारतीय शेतकरी जगामध्ये आपला झेंडा रोवू शकतो हे आपल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी दाखविले आहे. कंपनीने पुढील काळात पूर्ण राज्यभरात पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्यानुसार काम सुरू आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी डॉ. माशेलकर यांचा जीवनपट व कार्यावर आधारित चित्रफीत दाखविण्यात आली.

०००

 

मंत्रालय प्रवेशासाठीच्या एफआरएस तंत्रज्ञानामुळे सुरक्षितता, पारदर्शकतेमध्ये होणार वाढ

मुंबई, दि. ०२: मंत्रालयामध्ये प्रवेशासाठी लागू करण्यात आलेल्या फेस डिटेक्शनवर आधारित एफआरएस तंत्रज्ञानामुळे मंत्रालयाच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होण्याबरोबरच शासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता आणि गती येण्यात मदत होणार आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी या सर्वांनी या प्रणालीसाठीची आवश्यक नोंदणी करून घ्यावी, जेणेकरून सर्वांचा प्रवेश सुलभ होईल, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

या प्रणालीमुळे मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख सुनिश्चित होणार आहे. अनधिकृत प्रवेशाला चाप बसणार आहे. अनुचित प्रवेश रोखले जाणार असून त्यामुळे मंत्रालयाच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होणार आहे. या तंत्रज्ञानामुळे अनधिकृत प्रवृत्तींनाही चाप बसणार आहे. यामुळे मंत्रालयातील गर्दीवर नियंत्रण येऊन शासकीय कामकाजात अधिक सुलभता आणि पारदर्शकता येऊ शकेल. या तंत्रज्ञानामुळे योग्य व्यक्तींना अधिकृतपणे प्रवेश मिळणार असून त्यामुळे लोकांची कामे जलद गतीने होण्यात मदत मिळणार आहे.

अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांच्या प्रवेशासाठी विविध सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवेशामध्ये अडचणी येणार नाहीत. तथापि, यासाठी सर्व संबंधितांनी फेस डिटेक्शनसंदर्भातील नोंदणी करणे आवश्यक राहील. सर्वांनी यासाठीची नोंदणी आणि फेस डिटेक्शन त्वरित करून घ्यावे.

अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या  फेस रीडिंग संदर्भातील आवश्यक डेटा हा तातडीने अपलोड करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जेणेकरून फेस रीडिंग प्रणाली अपडेट होऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रवेश सुलभ होईल.

मंत्रालय सुरक्षेच्या अनुषंगाने मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांचे फेशियल रिकॉग्नीनेशन   आणि आरएफआयडी कार्ड आधारित प्रवेश देण्यात येत आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त मंत्रालयातील १० हजार ५०० अधिकारी/कर्मचारी यांचा तपशिल सदर प्रणालीमध्ये सादर करण्यात आलेला आहे. त्यानुषंगाने कार्यान्वयन कंपनीमार्फत सर्व प्रवेशद्वार येथे फेशियल रिकॉग्नीनेशन यंत्रणा प्रस्थापित करण्यात आली आहे.  ही यंत्रणा ‘ गो लाईव्ह’  करण्यात आली आहे.  जानेवारी २०२५ पासुन मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारी यांना फेशियल रिकॉग्नीनेशन व आरएफआयडी कार्ड आधारित प्रवेश देण्यात येत आहे.

मंत्रालय हे ठिकाण अत्यंत संवेदनशील व महत्त्वाचे असल्याने सदर आस्थापनेची सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्याअनुषंगाने मंत्रालय अंतर्गत सुरक्षा प्रकल्प राबविण्याचा निर्णय शासन स्तरावरुन घेण्यात आला आहे. सुरक्षा प्रकल्प हा  एक आणि दोन टप्प्यात राबविण्यात येत आहे.  मंत्रालय परिसर एकात्मिक सुरक्षा आणि देखरेख अंतर्गत टप्पा २ हा प्रकल्प हा टप्पा एक या प्रकल्पाचा नैसर्गिक विस्तार म्हणून टप्पा २ प्रकल्प राबविण्यात येत आहे.

मंत्रालय सुरक्षा प्रकल्प  टप्पा – २ मधील कामांचे कार्यान्वयन व वार्षिक देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. तसेच अभ्यांगताना तसेच क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना डिजी प्रवेश या ॲप आधारीत ऑनलाईन प्रणालीमार्फत मंत्रालय प्रवेश सुनिश्चीत करण्यात येणारआहे.

०००

कर्नाटक परिवहनच्या प्रतिष्ठित सेवेचे प्रयोग महाराष्ट्रातही शक्य – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. ०२: कर्नाटक राज्य परिवहन सेवेची लांब पल्ल्याची ‘प्रतिष्ठित सेवा’ अतिशय लोकप्रिय असून आदरातिथ्य व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या सेवेला प्रवाशांची चांगली पसंती आहे. अशाच प्रकारचा प्रयोग महाराष्ट्रात देखील करणे शक्य आहे,  असे प्रशंसोद्गार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काढले. कर्नाटक दौऱ्यावर असताना बंगळुरू येथील कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाच्या भेटी दरम्यान ते बोलत होते.

मंत्री  प्रताप सरनाईक यांनी बंगळुरू येथे कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांच्यासोबत कर्नाटक राज्याचे परिवहन मंत्री डॉ. रामलिंगा रेड्डी यांच्यासह राज्याचे परिवहन सचिव डॉ. एन. व्ही. प्रसाद व कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष रिझवान नवाब तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, नितीन मैद (महाव्यवस्थापक वाहतूक) व नंदकुमार कोलारकर (महाव्यवस्थापक यंत्र ) हे अधिकारी उपस्थित होते.

या वेळी मंत्री श्री. सरनाईक यांनी कर्नाटक राज्य परिवहन सेवेद्वारे चालवल्या जाणाऱ्या अंबारी, ऐरावत, राजहंस यासारख्या प्रीमियम सेवेच्या बसेस बरोबर इतर बसेसची पहाणी केली.  तसेच या बसेस कशा पद्धतीने चालवल्या जातात याची माहिती घेतली. आदरातिथ्य व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या बस सेवेला प्रवाशांची चांगली पसंती आहे. खाजगी बसेसच्या तुलनेमध्ये सुरक्षित आणि वेळेवर सेवा देण्यासाठी या बस सेवा अतिशय प्रसिद्ध आहे.

या वेळी कर्नाटक परिवहन सेवेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या राज्यात सध्या चालवल्या जात असलेल्या सर्व प्रकारच्या बसेस मंत्री श्री.  सरनाईक यांना दाखविल्या. त्यामध्ये 9 ते 15 मीटर पर्यंतच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बसेस उभ्या करण्यात आल्या होत्या. अगदी डोंगरी भागापासून हम रस्त्यावर धावतील अशा वेगवेगळ्या इंजिन आणि आसन क्षमतेच्या, विविध सोयी -सुविधा असलेल्या बसेस कशाप्रकारे गरजेनुसार प्रवाशांसाठी उपलब्ध केले जातात, याची माहिती यावेळी त्यांना देण्यात आली. तसेच लांब पल्ल्याची सेवा देणाऱ्या बसेस मध्ये ‘वायफाय’ पासून ‘युरिनल’ पर्यंत सोयीसुविधा प्रवाशांसाठी कशा प्राप्त करून दिल्या जातात. तसेच ई-तिकीट आणि ऑनलाईन तिकीट बुकिंग ची सेवा देखील प्रवाशांना उपलब्ध करून दिली आहे, हे देखील यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी मंत्री श्री. सरनाईक यांना सांगितले.

दरम्यान परिवहन सेवेच्या सादरीकरणात माहिती देताना, संपूर्ण राज्याचे व्यवस्थापन वेगवेगळ्या चार प्रादेशिक विभागांमध्ये विभागण्यात आले असून त्यासाठी प्रत्येक विभागाला आयएएस दर्जाचे एक अधिकारी नेमण्यात आलेले आहेत. तसेच राज्यस्तरावर या सर्वांचे संचालन करण्यासाठी वरिष्ठ आयएएस दर्जाचे अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्यामुळे एकूण राज्याच्या परिवहन सेवेमध्ये सुसूत्रता आणणे आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा प्राप्त करून देणे यासाठी प्रशासकीय रचनेमध्ये केलेले सकारात्मक बदल महत्त्वाची भूमिका बजावतात यांची माहिती देखील मंत्री श्री. सरनाईक यांना देण्यात आली.

मंत्री श्री. सरनाईक म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे की, इतर राज्यात ज्या चांगल्या गोष्टी घडत आहेत, त्यांना भेट देऊन त्या आपल्या राज्यात कशा अमलात आणता येतील याचा अभ्यास करावा.  जेणेकरून विविध ठिकाणच्या नाविन्यपूर्ण योजना आपल्या राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होतील. याचाच एक भाग म्हणून कर्नाटक राज्य मार्ग परिवहन सेवेमार्फत चालवल्या जाणाऱ्या ऐरावत, अंबारी, राजहंस यासारख्या प्रतिष्ठित लांब पल्ल्याच्या सेवेची माहिती करून घेणे, तसेच त्यांच्या प्रादेशिक परिवहन व्यवस्थापनाचा अभ्यास करणे, त्याबरोबर त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी राबवत असलेल्या प्रोत्साहन योजना जाणून घेण्यासाठी या दौऱ्याची आखणी केली होती. यावेळी बंगळुरू येथील कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्यालयात कर्नाटक परिवहन सेवेचे सादरीकरण करण्यात आले.

०००

विकास कामांच्या नियोजनात स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवा – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

  • पुढील वर्षासाठी ४२१ कोटींच्या अतिरीक्त मागणीसह एकुण ९४० कोंटींचा शासनाकडे प्रस्ताव
  • अनुसूचित जाती उप योजनेसह एकुण १०६० कोटी रूपयांचा प्रारूप आराखडा

कोल्हापूर, दि.०२ : जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणमधून पुढिल आर्थिक वर्ष 2025-26 साठी नियोजन विभागाकडून वळविलेला तात्पुरता नियतव्यय 518.56 कोटींचा असून यामध्ये जिल्ह्यातील यंत्रणांकडील 421.47 कोटींच्या अतिरिक्त मागणीनुसार एकुण 940.03 कोटींच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली. विभागास्तरावरील येणाऱ्या 7 फेब्रुवारीच्या बैठकीत यातील जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी मागणी करणार असल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला अध्यक्षस्थानी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास, औकाफ  राज्यमंत्री तथा सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ, खासदार शाहु महाराज छत्रपती, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत असगावकर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार डॉ.अशोकराव माने, आमदार शिवाजी पाटील, आमदार राहूल आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे यांच्यासह कार्यान्वयीन यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

वर्ष 2025-26 मध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 518 कोटी 56 लाख रुपये अर्थसंकल्पीत तरतूद करण्यात आली आहे. तर अनुसूचित जाती उपयोजना (विशेष घटक योजना) 118 कोटी रुपये तर ओ.टी.एस.पी. योजनेत 2 कोटी 32 लाख रुपयांची अर्थसंकल्पीत तरतूद करण्यात आली आहे. तीनही घटकांमध्ये अतिरिक्त 421.47 कोटींची मागणी आहे. अशा प्रकारे सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून 1060.15 कोटी रूपयांचा प्रारूप आराखडा शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. सन 2024-25 साठी जिल्हा वार्षिक योजनेसाठी (सर्वसाधारण) 567 कोटींच्या अर्थसंकल्पीत तरतूद करण्यात आली होती. यापैकी 230 कोटी 40 लाख रूपये  निधी प्राप्त झाला आहे. आज अखेर रक्कम रूपये 114 कोटी 96 लाखांचा निधी खर्च करण्यात आलेला आहे.  प्राप्त तरतूदीपैकी 63 टक्के निधी खर्च झाला आहे. सन 2024-25 अंतर्गत अनुसुचित जाती योजनेसाठी (विशेष घटक योजना) 118 कोटींच्या अर्थसंकल्पीत तरतूद करण्यात आली असून, यापैकी 37 कोटी 62 लाख निधी प्राप्त झाला आहे. दिनांक 20 जानेवारी 2025 अखेर 34 कोटी 86 लाख निधी खर्च करण्यात आलेला आहे.  प्राप्त तरतूदीपैकी 93  टक्के निधी खर्च झाला आहे. आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील क्षेत्रात 2 कोटी 32 लाख अर्थसंकल्पीत तरतूद करण्यात आली असून, यापैकी 93 लाख निधी प्राप्त झाला आहे. दिनांक 20 जानेवारी 2025 अखेर 30 लाख निधी खर्च करण्यात आलेला आहे. प्राप्त तरतूदीपैकी 32 टक्के निधी खर्च झाला आहे.  या सर्व झालेल्या खर्चास यावेळी मंजूरी देण्यात आली.

विकास कामांच्या नियोजनात स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवा – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

जिल्हास्तरावरून अनेक विकासकामांचे नियोजन होते, त्याला मंजुरी दिली जाते. निधीही वर्ग केला जातो. या प्रक्रियेत संबंधित तालुक्यातील आमदार व खासदार यांच्याशी समन्वय ठेवून योजनांना मंजुरी द्या. त्यांनी दिलेल्या सूचना प्राधान्याने त्या त्या योजनेत समाविष्ट करा, अशा सूचना पालकमंत्री श्री. आबिटकर यांनी दिल्या. तसेच कोणतेही नवीन कामांचे प्रस्तावही सादर करताना ते संबंधित लोकप्रतिनिधींना माहित असावेत. आरोग्य व शिक्षण हे दोन घटक विकास प्रक्रियेला बळ देणारे आहेत. सुदृढ व शिक्ष‍ित समाज निर्माण करण्यासाठी या दोन घटकांना अधिकचा निधी येत्या काळात देणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील शाळांबाबत जिल्हा परिषदेने चांगला उपक्रम हाती घेतला आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रही येत्या काळात आधुनिक होत आहेत. समृद्ध शाळा व समृद्ध अंगणवाडी हा उपक्रम येत्या पाच वर्षात जिल्ह्यात राबविण्याचे नियोजन केले जात आहे. तसेच शहरातील 100 वर्षांहून अधिक जुन्या शाळांबाबतही सीएसआर व लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात कामे हाती घेतली जाणार आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

कोल्हापूरच्या विकासातील महत्त्वाचे घटक यात श्री करवीर निवासिनी अंबाबाई विकास आराखडा, श्री जोतिबा विकास आराखडा, कन्व्हेंशन सेंटर आदी महत्त्वाच्या विषयांबाबत राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री स्तरावर बैठक लावून सर्व प्रकल्पांना गती देण्यासाठी पुढिल काळात प्रयत्न केले जाणार आहेत. कोल्हापूरच्या विकासासाठी केंद्र व राज्य स्तरावरील अधिकचा निधी कसा आणता येईल याबाबतही चांगले नियोजन केले जाईल असे पालकमंत्री श्री.  आबिटकर यांनी सांगितले.

कोल्हापूरच्या विकासासाठी सर्व मिळून प्रयत्न करू – सह-पालकमंत्री, माधुरी मिसाळ

कोल्हापूर मध्ये अनेक धार्मिक स्थळांचा विकास करताना दक्षिण काशीच्या धर्तीवर तो केला जाईल. सर्व नियोजित कामे मार्गी लावून स्थानिक गरजांच्या अनुषंगाने येत्या काळात विकासकामे केली जातील. कोल्हापूरचा विकास साधत असताना सर्व मिळून प्रयत्न करू असे सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले. यावेळी त्यांनी चंदगड येथील मागणीनुसार पाच एसटी बसेस देण्याचे जाहीर केले.

जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या मागणीस अनुसरुन मौजे. सैतवडे तालुका गगनबाबडा,  मौजे. गोकुळ शिरगाव तालुका करवीर व  मौजे. मांगनूर तालुका कागल  या तीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बांधकाम मंजूरीसाठी शासनास मंजुरीसाठी पाठविण्यास या समितीने मान्यता दिली. जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता यांनी सादर केलेल्या आजरा तालुक्यातील मौजे मडिलगे येथील पांडवकालिन रामलिंग मंदिर देवालय परिसरास पर्यटन स्थळास ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात आले. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सादर केलेल्या जिल्ह्यातील 1 लाखावरील भाविक भेट देत असलेल्या गडहिंग्लज तालुक्यातील 6 गावांना यात्रा स्थळांना क वर्ग यात्रास्थळ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये गडहिंग्लज तालुक्यातील हसुर चंप्पू गावातील श्री. हनुमान मंदिर, हनिम्मनाळ गावातील श्री. हनुमान मंदिर, कनुल गावातील श्री. बीरदेव मंदिर, कनुल गावातील हजरत इब्राहिम चिस्तीया तीर दर्गा,  हेब्बाळ कनुल  गावातील श्री. रामलिंगेश्वर मंदिर व  दुंडगे गावातील श्री. हनुमान मंदिरांचा समावेश आहे.

उपस्थित आमदार यांनी जिल्ह्यातील महापूर प्रश्न, मंदिर विकास आराखडे, राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन, शेतकऱ्यांसाठी वीज, पिण्याच्या पाण्याच्या योजनेवरील सौर प्रकल्प, विकास कामादरम्यान उकरण्यात आलेले रस्ते पुर्ववत करणे, जल जीवन मिशन, ग्रामीण रस्ते, 91 पाणी पुरवठा योजनांना रखडलेली वीज जोडणी तसेच इचलकरंजी मधील गुन्हेगारी, गांजा तस्करी आदी विषायावर चर्चा केली. यामध्ये पालकमंत्री प्रकश आबिटकर यांनी युवा वर्गात आढळून येणारा गांजा वापराबाबत कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला दिले. यासाठी तरूण वर्गाला त्या त्या ठिकाणी योग्य शिक्षा देवून त्यांना गांजा सेवनापासून परावृत्त करा, असे सांगितले.

सभेच्या सुरूवातीला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे पुस्तक भेट देवून स्वागत केले. तसेच प्रास्ताविक जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे यांनी केले. सभेतील कामकाजावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विकास कामांबाबत व झालेल्या खर्चाबाब‍त सादरीकरण केले.

०००

‘जीबीएस’साठी आरोग्य यंत्रणा सज्ज – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली, दि. ०२ (जिमाका) : गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आजाराच्या रूग्णांवर यापूर्वीही उपचार करण्यात आले आहेत. या आजाराचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

गुइलेन-बॅरे सिंड्रोम अर्थात ‘जीबीएस’ आजाराचा जिल्ह्यातील आढावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज  आरोग्य विभागाकडून घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्ह्याच्या पालक सचिव विनिता वेद सिंगल, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, मिरजचे अधिष्ठाता डॉ. गुरव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी विजयकुमार वाघ आदि उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले की, या आजाराबाबत नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. लक्षणे दिसल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. सांगली जिल्ह्यात जीबीएसचे आतापर्यंत 9 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 3 व शहरी भागातील 3 रुग्ण असून जिल्ह्याबाहेरील 2 व राज्याबाहेरील 1 रुग्ण आहे. त्यापैकी 4 रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाकी सर्व रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. गत तीन वर्षात या आजाराचे निदान झालेल्या पैकी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी पुरेशी काळजी घ्यावी. पाणी उकळून पिणे, स्वत:ची रोगप्रतिकारक्षमता वाढविणे तसेच स्वच्छ पाण्याचा आग्रह धरणे या उपाययोजना महत्त्वाच्या असून त्याबाबत जनजागृती करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

दररोजच्या रुग्णांची संख्या आणि बरे होणाऱ्या रुग्णांची आकडेवारी दररोज न चुकता सायंकाळी अद्ययावत करावी. त्यासाठी रुग्ण उपचार घेत असलेल्या रुग्णालयांशी संपर्क साधण्यासाठी आरोग्य विभाग आणि महानगरपालिकेने संपर्क अधिकारी नेमावेत, असे पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

०००

अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन समन्वयाने काम करावे-पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली, दि. ०२ (जिमाका) : जिल्ह्यात आवश्यक विकासात्मक कामे करण्यासाठी शासन व सीएसआरमधून आवश्यक निधी उपलब्ध करून घेऊ. सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन समन्वयाने काम करावे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पूर्ण केलेल्या कामांची प्रातिनिधीक पाहणी करणार, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण व अनु. जाती उपयोजना) संबंधी जिल्हा परिषदस्तर व राज्यस्तर कार्यान्वयन यंत्रणांच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठकीस जिल्ह्याच्या पालक सचिव विनिता वेद सिंगल, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह जिल्हास्तरीय यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

राज्य, जिल्हा परिषद व महापालिका, नगरपालिका स्तरावरील कार्यन्वयीन यंत्रणांचा तपशीलवार आढावा घेताना पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, सन 2023-24 ची संपूर्ण विकास कामे मार्च 2025 पूर्वी पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी. त्याचवेळी चालू सन 2024-25 या वर्षातील राज्य व स्थानिक स्तरीय यंत्रणांनी उर्वरित सर्व प्रशासकीय मान्यता 15 दिवसात पूर्ण करतानाच राज्य यंत्रणांनी 31 मार्च 2025 पूर्वी त्यांचा संपूर्ण खर्च होईल याची दक्षता घ्यावी, अनुसूचित जाती उपयोजना 2024-25 च्या प्रशासकीय मान्यता अत्यल्प असून सर्व प्रशासकीय मान्यता 15 दिवसात होतील यासाठी गांभीर्याने कार्यवाही करावी, असे त्यांनी निर्देशित केले.

लोकप्रतिनिधींच्या सूचना व स्थानिक गरज विचारात घेऊन जिल्ह्यातील विकासाचे नियोजन करावे, असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, जिल्हा नियोजन समितीतून मिळणाऱ्या निधीचा विनियोग करताना प्रशासकीय व आर्थिक शिस्त पाळावी. कामे विहित मुदतीत पूर्ण होतील व कोणताही निधी समर्पित करावा लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. विकासात्मक कामे करताना चांगले प्रयोग करा. मूलभूत कामे करताना निधी कमी पडू देणार नाही. प्रत्येक महिन्याला ‍विविध विभागांच्या कामांचा आढावा घेण्यात येईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पालक सचिव विनिता वेद सिंगल म्हणाल्या की, बदलापूरसारख्या घटना टाळण्यासाठी प्रत्येक शाळेत मुलामुलींचे प्रबोधन करावे. यासाठी स्वतंत्र तक्रार पेटी ठेवावी, महसूल व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनीच ती उघडावी. तसेच, शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सहावी ते आठवीपर्यंतच्या मुलांचे करियर कौन्सिंलिंग करावे, करार तत्त्वाने सेवा घेतलेल्या नॉन टिचिंग स्टाफची चारित्र पडताळणी करून घ्यावी.

हार, पुष्पगुच्छ न आणण्याचे आवाहन

जिल्ह्यात विविध ठिकाणी दौरे, बैठका, कार्यक्रमावेळी हार, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला जातो. पण आपण हार, पुष्पगुच्छ स्वीकारणार नसल्याने ते कोणीही सत्कारासाठी आणू नयेत. तसेच कार्यक्रमस्थळी फटाके फोडून प्रदूषण करू नये, असे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले.

०००

पाणी फवारणी व धूलीकण कमी करणाऱ्या वाहनाचे लोकार्पण

कोल्हापूर, दि. ०२ (जिमाका): बहुउद्देशीय स्प्रेअर आणि डस्ट सप्रेशन वाहनाचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर व सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पार पडलेल्या कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहु महाराज छत्रपती, खासदार धैर्यशील माने, आमदार सर्वश्री अमल महाडिक, चंद्रदीप नरके, डॉ. अशोकराव माने, राहूल आवाडे, शिवाजी पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त डॉ. के.मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, सहा.आयुक्त संजय सरनाईक, जल अभियंता हर्षजित घाटगे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे  आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत प्राप्त निधीमधून वाहन खरेदी करण्यात आले असून यासाठी 1 कोटी 32 लाख  इतका खर्च आला आहे. वॉटर मिस्ट सिस्टम वापरुन वातावरणातील धूलीकण सेप्रेशन करणे, रस्ते स्वच्छ करण्यासाठी पाणी मारणे, रोड डिव्हायडर क्लिनिंग करणे, रोडवर पाणी स्प्रिकिंग करणे, रोड डिव्हायडर क्लिनिंग करणे, ग्रीन बेल्ट शॉवर सिस्टिम, डिव्हायडर मधील झाडांना पाणी मारणे यासाठी याचा चांगला उपयोग होणार आहे हाय ट्री वॉटर सिस्टिम आणि तातडीच्या कालावधीमध्ये फायर फायटरसाठी वाहनाचा वापर केला जाणार आहे.

०००

सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी घेतले करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन

कोल्हापूर, दि. ०२ (जिमाका): नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास, औकाफ राज्यमंत्री तथा सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. त्यानंतर कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी पुष्प अर्पण केले. यावेळी आमदार शिवाजी पाटील, कोल्हापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, समाज कल्याण सहायक आयुक्त सचिन साळे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

०००

 

ताज्या बातम्या

व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ६ :- भारतीय संस्कृती आणि संत वाङ्मयाचे वैभव आपल्या लेखनातून, व्याख्यानातून दृग्गोचर करणारा व्यासंगी परंपरेचा एक मोठा दुवा निखळला आहे, अशा शोकभावना...

वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार...

0
सातारा दि. ६ :  संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची संख्या मोठी असणार आहेत. वारकऱ्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी प्रत्येक...

“पालखी सोहळ्याचे काटेकोर नियोजन; महिलावर्गाची विशेष काळजी घेणार” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
जळगाव, दि. ६ – राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुक्ताईनगर येथील कोथळी गावातील संत मुक्ताबाई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या...

बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा

0
मुंबई, ६ : बकरी ईद अर्थात ईद-उल-अजहाच्या पवित्र पर्वानिमित्त जनतेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण आपल्या जीवनात शांतता, समृद्धी,...

‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा

0
मुंबई, दि. ०६ :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना ‘ईद-उल-अज़हा’ अर्थात ‘बकरी ईद’च्या शुभेच्छा दिल्या असून, या पर्वाच्या निमित्ताने सामाजिक ऐक्य, सलोखा, सौहार्द...