बुधवार, जुलै 16, 2025
Home Blog Page 231

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’चा आढावा

  • कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ करणार आदिवासी गावांचे सूक्ष्म सर्वेक्षण

जळगाव, दि. ०७ (जिमाका): जिल्ह्यातील आदिवासी भागांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत २१ विभागांकडून करण्यात येणाऱ्या कामांची माहिती घेण्यात आली.

यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या समाजकार्य विभागाला ५६ आदिवासी गाव व पाड्यांमधील मूलभूत सुविधा व विकासासाठी सूक्ष्म सर्वेक्षण आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. बैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, उपवनसंरक्षक जमीर शेख, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या समाजकार्य विभागाचे प्रमुख डॉ.अजय पाटील, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी व संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

राज्यमंत्री खडसे यांनी दिलेल्या महत्त्वाच्या सूचना

  • पशुवैद्यकीय सुविधा वाढविणे: सध्या असलेल्या ६ पशुवैद्यकीय रुग्णालयांमध्ये सुधारणा करणे व आवश्यकतेनुसार नवीन केंद्र उभारणे.
  • कौशल्यविकास: आदिवासी विद्यार्थ्यांना गरजेच्या कौशल्यांचे प्रशिक्षण विद्यापीठाच्या अहवालाच्या आधारे देण्याचे निर्देश.
  • एलपीजी गॅस वितरण: गरजूंना गॅस कनेक्शन देण्यासाठी विशेष प्रयत्न.
  • कृषी उद्योग विकास: कृषी विभागाने प्रस्तावित ५३ शेतकरी गटांसाठी उद्योग व्यवसायाचे नियोजन करावे, ‘आत्मा’ प्रकल्पातून मदत मिळवून द्यावी.
  • जलसिंचन प्रकल्प: रावेर, यावल, मुक्ताईनगर भागातील वनक्षेत्रात जलसिंचन प्रकल्प उभारून पाणी जंगलातच मुरवण्याचे नियोजन करण्यात यावे.
  • प्रकल्पांचे कालबद्ध नियोजन: सर्व विभागांनी नियोजन ठरलेल्या वेळेत पूर्ण करावे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही येत्या काही दिवसांत विभागनिहाय आढावा घेण्याचे जाहीर केले.

०००

नैसर्गिक शेतीसाठी राज्य, केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी – केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

  • स्वावलंबी आणि गरीबीमुक्त गावांसाठी सर्वांचा पुढाकार आवश्यक

नंदुरबार दि. ०७,(जिमाका): दर्जेदार अन्न निर्मितीसाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळाले तर देशातील प्रेत्येक गाव स्वावलंबी बनेल आणि गरीबीमुक्त होईल. त्यासाठी सरकार सोबत जनतेचा पुढाकार आवश्यक आहे. तसेच नैसर्गिक शेतीसाठी केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कृषि, शेतकरी कल्याण मंत्री तथा ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले आहे.

डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार आणि राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग, महाराष्ट्रद्वारे सिलेज आधारित परिसर विकास कार्यक्रम (CADP) अंतर्गत उभारण्यात आलेल्या कृषक ज्ञान विज्ञान मंडपम् आणि महिलांसाठी तंत्रज्ञान पार्क या वास्तूंच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित, विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी आमदार सर्वश्री आमशा पाडवी, राजेश पाडवी, कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठ जळगावचे कुलगुरु डॉ. विजय माहेश्वरी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, एमसीआरसीएम मुंबईचे कार्यकारी अधिकारी निलेश सागर, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ.भा. कार्यकारीणी सदस्य मा.वी. भागय्याजी, भा.कृ.अ.नु.प.अटारी पुण्याचे संचालक डॉ. एस.के. रॉय, योजक (पुणे) चे  अध्यक्ष डॉ. गजानन डांगे, राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे सदस्य सचिव डॉ. एन.जी. शहा, डॉ. हेडगेवार सेवा समिती अध्यक्ष केदारनाथ कवडीवाले, सचिव डॉ, नितीन पंचभाई, कृषि विज्ञान केद्र प्रमुख राजेंद्र दहातोंडे, कोळदाचे सरपंच मोहिनी वळवी आदी यावेळी उपस्थित होते.

केंद्रीय कृषिमंत्री मंत्री चौहान म्हणाले, शेतकऱ्यांच्या आजच्या कार्यक्रमासाठी मी प्रमुख अतिथी नसून एक सेवक म्हणून उपस्थित आहे, एक शेतकऱ्यांच्या परिवारातील सदस्य म्हणून या डॉ. हेडगेवार सेवा समितीच्या कृषी विज्ञान केंद्रात मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली त्यामुळे मी स्वत:ला भाग्यशाली समजतो. लोकशाहीत इकडे आणि जनता तिकडे असे चालत नाही, तशाने कामही होत नाही. जोपर्यंत दोघे मिळून एकत्र येत नाहीत तोपर्यंत विकास शक्य नाही. मला कल्पना आहे, येथील लोक मागणारे नाहित, झुकणारेही नाहीत, थेट निधड्या छातीने, आत्मविश्वासाने पुढे जाणारे आहेत. फक्त त्यांना गरज योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.

ते पुढे म्हणाले, जेव्हा अमेरिकेसारख्या युरोपियन देशांचा जन्मही झाला नव्हता, तेव्हा भारताच्या ढाक्क्यात रेशीम वस्त्र बनत होते. तंत्रविज्ञानाच्या जोरावर पोलाद बनवून जगभरात निर्यात केले जात होते. अनादी काळापासून येथील आदिवासी बांधव आपल्या शेतीची औजारे स्वत: बनवत होते, स्वावलंबी होते. आज याच बांधवांना थोडे कौशल्याचे शिक्षण आणि मार्गदर्शन लाभले तर ते संपूर्ण मानवी समुदायाला समृद्ध करू शकतात. आणि असे शिक्षण आणि मार्गदर्शनाचे काम या कृषि विज्ञान केंद्रात सुरू आहे, हे काम म्हणजे समाजाला उभे करण्याचे महान कार्य आहे.

ते पुढे म्हणाले, आपण खूप नाही पण कमीतकमी क्षेत्रात कमीतकमी काय करू शकतो,  यावर सर्वांनी विचार करण्याची गरज आहे. संपूर्ण जिल्ह्यात नाही पण काही गावातील काही एकर मर्यादित क्षेत्रात नैसर्गिक शेती करून किटकनाशकमुक्त, कॅन्सरमुक्त शेतीला चालना द्यायला हवी. त्यामुळे जमीनीचे आरोग्य टिकून राहील आणि उत्पादकताही वाढेल. नैसर्गिक शेतीसाठी भारत सरकार शेतकऱ्यांना सदैव प्रोत्साहन देत असून त्यासाठी लागणाऱ्या प्रयोग व औजारांसाठी केंद्र सरकार प्रति एकर रुपये 4 हजारांचे सहाय्य करते आहे. भविष्यात ते कायम राहील, याची मी ग्वाही देतो.

“रहिमन पानी राखिए, बिन पानी सब सून।” या हिंदी दोह्याचा संदर्भ देत केंद्रीय मंत्री चौहान म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणतात, ‘कॅश द रेन’ म्हणजे पावसाचे वाहून जाणारा प्रत्येक थेंब जमिनीत कसा मुरवता येईल, यासाठी उपाययोजना करायला हव्यात. मनरेगाच्या माध्यमातून त्यासाठी आत्ताच कामे हाती घ्यायला हवीत. त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. तापी नदीच्या उपलब्ध पाण्याचा वापर शेतीसाठी करायला हवा. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून तुषार सिंचनाचे प्रयोग करून शेतात पाणी मुरवता येऊ शकेल.

कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून येथील महिलांनी भगरीपासून बिस्किटे बनवली आहेत, दाळीवर प्रक्रिया करणारी यंत्रे विकसित केली आहेत. आज अशाच छोट्या थोड्या-छोट्या प्रयोगांमधून देशात सुमारे 1 कोटी 48 लाख महिला लखपती दिदी झाल्या आहेत. आज देशातील महिला आपल्या पायावर उभ्या राहून शेती आणि मातीचे विज्ञान शिकून शेती प्रक्रिया उद्योग मोठ्या दिमाखाने चालवत आहेत. येणाऱ्या काळात शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील अंतर कमी करून दोघांच्या फायद्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे यावेळी केंद्रीय मंत्री चौहान यांनी सांगितले. ते म्हणाले, मोठ्या शहरांमध्ये शेतमाल विक्रीसाठी लागणारा वाहतूक खर्च केंद्र सरकार करण्याच्या विचारात आहे.

विश्वकर्मा सारख्या योजनेत गावातील विविध पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांचे सर्वेक्षण करा, प्रशिक्षण द्या, त्यांना सविधा द्या, गाव स्वावलंबी आणि गरीबीमुक्त करा. ही योजना आपल्या जिल्ह्यात राबवून आपले गाव, जिल्हा आदर्श बनविण्यासाठी आपल्या सर्वांना पुढे यावे लागेल असेही केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी यावेळी सांगितले.

शाश्वत शेतीच्या विकासासाठी शासन सर्वोतोपरी मदत करणार -पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

देशातील 70 टक्के लोकांचा व्यवसाय शेतीवर आधारित आहे. शेती हा अत्यंत गुंतागुतीचा विषय असून शाश्वत शेतीशिवाय शेतकरी त्यात रमत नाही. शेती व्यवसायातून स्थलांतरित होण्याची मानसिकता मोठ्या प्रमाणात असताना कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी सुरू असलेले प्रयत्न नक्कीच शाश्वत शेतीतून या भागाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. अशा या शाश्वत शेतीच्या प्रयत्नांसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, असे यावेळी राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.

यावेळी शेतकरी मेळावा, बचत गटांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात पुण्यातील योजक संस्थेचे अध्यक्ष डॉ. गजानन डांगे यांच्या पुस्तकांचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

०००

पत्रकारांना मंत्रालयात दुपारी २ वाजेनंतर प्रवेशाचे निर्देश पत्र रद्द

मुंबई, दि. ७ : विविध दैनिक, वृत्तवाहिन्यांचे पत्रकार व प्रतिनिधींना प्रवेशासाठी त्यांचे ओळखपत्र (आरएफआयडी कार्ड) व सर्व सुरक्षा विषयक तपासणी करून दुपारी २ वाजेनंतर मंत्रालयात प्रवेश देण्यात यावा, असे निर्देश पत्र २४ मार्च २०२५ रोजी निर्गमित करण्यात आले होते. पत्रकारांना मंत्रालयात प्रवेशाबाबतचे हे निर्देश गृह विभागाकडून रद्द करण्यात आले आहे, असे कक्ष अधिकारी डॉ. प्रविण ढिकले यांनी कळविले आहे.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध शासकीय कार्यक्रमांचे आयोजन 

मुंबई, दि. ७ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी दादर येथे १४ आणि १५ एप्रिल २०२५ रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अभिवादन समारंभ, भीमगीते, पुस्तक स्टॉल आणि स्काऊट गाईड्स हॉल येथे विशेष कार्यक्रमांद्वारे जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन नागरीकांनी विविध कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक तथा बार्टीचे महासंचालक सुनिल वारे यांनी केले आहे.

या विशेष सप्ताहाचा समारोप १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समता रॅलीने होणार आहे. तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये समतादुतांमार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध कार्यक्रमाद्वारे साजरी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पुणे येथील बार्टीच्या कार्यालयात  जयंतीनिमित्त आजपासून १४ एप्रिल पर्यंत भारतीय संविधान अमृत महोत्सव सप्ताह संमेलनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबवले जाणार आहेत. यामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व आरोग्यविषयक मार्गदर्शन, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन, अभिवाचन कार्यक्रम, दुर्मिळ छायाचित्र आणि ग्रंथप्रदर्शन यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाची रुपरेषा :

  • ८ एप्रिल रोजी पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात डॉ. अनिरुद्ध वनकर यांच्या भीम गीताचा कार्यक्रम दुपारी २: ३० ते ५:३० यावेळेत आयोजित करण्यात आला आहे.
  • १० एप्रिल रोजी १२ तास वाचन दिन उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना आणि अधिकाऱ्यांना सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत अभ्यासासाठी प्रेरित करण्यात येईल.
  • ११ एप्रिलला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरील नाट्य सादर करण्यात येणार आहे.

0000

शैलजा पाटील/विसंअ/

‘छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, मराठा शौर्य स्मारकाच्या कामास गती देणार’- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. ७ : आग्रा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणे’, पानिपत येथील ‘काला अंब’ येथे ‘मराठा शौर्य स्मारक’ उभारणे यासाठी पर्यटन, सांस्कृतिक व पुरातत्व विभागाने लवकरात लवकर स्मारक उभारण्यात येणाऱ्या‍ ठिकांणाची पाहणी करावी असे निर्देश पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली या कामांचे संपूर्ण समन्वयन केले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगतिले. मंत्रालयातील दालनात आयोजित पत्रकार परिषदेत  मंत्री श्री.देसाई बोलत होते. यावेळी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल उपस्थित होते.

पर्यटनमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, “ज्या वास्तूत छत्रपती शिवाजी महाराजांना मुघलांनी नजरकैदेत ठेवले होते,  त्या वास्तूचे ठिकाण सर्व तज्ज्ञ लोकांकडून माहिती करून घेवून विहित परवानग्या घेवून तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल. पानिपतच्या तिसऱ्या लढाईला २६४ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त “काला अंब” परिसरात आयोजित मराठा शौर्य दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती. त्यांनी या ऐतिहासिक स्थळी मराठा योध्यांच्या स्मरणार्थ भव्य स्मारक उभारण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात येणार आहे. या दोन्ही स्मारकांच्या उभारणीसाठी शासन राज्यस्तरीय समितीचे गठन करून जमीन अधिग्रहण, या कामांसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करणे ही काम प्राधान्याने करण्यात येणार आहेत असेही ते म्हणाले.

मराठा साम्राज्याच्या पराक्रमाचा जागर देशभर होवून, नव्या पिढीला मार्गदर्शक ठरेल – मंत्री जयकुमार रावल

राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, आग्रा येथे आग्रा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारल्यामुळे या वास्तूस नवसंजीवनी मिळणार असून, महाराजांच्या पराक्रमाचे स्मरण कायमस्वरूपी राहील. महाराष्ट्रातील तसेच संपूर्ण देशातील पर्यटक आणि इतिहासप्रेमींसाठी हे स्मारक एक प्रेरणादायी स्थळ ठरेल. तसेच पानिपतमधील “काला अंब” येथे भव्य स्मारक उभारले जाणार आहे हे स्मारक देखील राष्ट्रप्रेम, सर्वधर्मसमभाव आणि शौर्याचे प्रतीक ठरेल, मराठा साम्राज्याच्या पराक्रमाचा जागर देशभर करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास  ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

पुनर्वसनाच्या ठिकाणी सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्या – मंत्री शिवेंद्रसिंह भोसले

सातारा, दि. ०७:  महू-हातगेघर प्रकल्पांतर्गत बाधितांच्या पुनर्वसनाबरोबरच इतर ज्या ठिकाणी प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन झाले आहे त्या ठिकाणी सोयी- सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. प्रकल्पग्रस्तांचे जे प्रश्न जिल्हास्तरावर सुटतील ते तातडीने सोडवाव्यात, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात विविध प्रकल्प बाधितांच्या प्रश्नांबाबत मंत्री भोसले यांनी बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रभारी अपर जिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, कार्यकारी अभियंता अमर काशीद, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड, प्रांताधिकारी राहुल बारकुल यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.


धरणामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत भूसंपादीत केलेल्या तथापि, उपयोगात न आणलेल्या जमिनीवर शेरे उठवून देण्याची कार्यवाही प्रांताधिकारी सातारा यांनी करावी, अशा सूचना करुन सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले म्हणाले, महू धरणावरील अस्तित्वातील रिंगरोडचे काम हे काही ठिकाणी संपादन नकाशाप्रमाणे झाले नाही. अस्तित्वातील रिंगरोड व संपादन नकाशावरील रिंगरोड मधील तफावतीची खातरजमा करुन घ्यावी. त्याचबरोबर पुनर्वसन ठिकाणी मिळालेल्या शेत जमिनीसाठी पाणी मिळण्यासाठीही कार्यवाही करावी.
प्रकल्पग्रस्तांना वर्ग 2 च्या जमिनी देण्यात आलेल्या आहेत. अशा जमिनी  वर्ग 1 करुन देण्याची मागणी होत आहे. यांच्या मागणीनुसार  जमिनी वर्ग 1 मध्ये करुन द्याव्यात. तसेच ज्या प्रकल्पग्रस्तांना मिळालेल्या गावठाणाची जागेची मोजणी करावयाची आहे त्यांनी 20 एप्रिलपर्यंत अर्ज सादर करावेत. या मोजणीची रक्कम कृष्णा खोरे विकास महामंडळाने भरावी, अशा सूचनाही सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांनी बैठकीत केल्या.
ज्या प्रकल्पग्रस्तांना आर्थिक स्वरुपात लाभ पाहिजे, अशा प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी आर्थिक माणीचा अर्ज सादर करावा. अर्ज एकत्र करुन त्यांचा विशेष प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. मंत्रालयस्तरावर याचा पाठपुरावा केला लाईल.  हातगेघर ग्रामस्थांच्या मागणीनुसार नवीन उपसा सिंचन योजनेबाबत जलसंपदा  मंत्री यांच्यासोबत बैठक घेतली जाईल हा प्रश्नही मार्गी लावाला जाईल, अशी ग्वाहीही मंत्री भोसले यांनी बैठकीत दिली.
आंबळे पुरक जलाशय प्रकल्पाचा मंत्री भोसले यांनी घेतला आढावा
आंबळे जलाशय सातारा तालुक्यातील मौजे आंबळे येथे आहेत. या प्रकल्पग्रस्तांची आर्थिक स्वरुपात लाभ द्यावा, अशी मागणी आहे. खास बाब म्हणून प्रकल्पग्रस्तांचा प्रस्ताव कारणांसह शासनाकडे सादर करावा. याच्या मंजुरीसाठी प्रयत्न केले जातील.
कात्रेवाडी येथे सोयी – सुविधा उपलब्ध करुन द्यामंत्री भोसले
कात्रेवाडी ता. जावली हे गाव सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत येते. या गावासाठी प्रशासनाने सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांनी दिल्या. कात्रेवाडी हे गाव बफर झोनमध्ये येत आहे. यामुळे नागरिकांना विविध सोयी-सुविधा देताना अडचणी येत आहेत. वन विभागाने सोयी-सुविधांसाठी विविध परवानग्या द्याव्यात. जीओ लॉजीकल सर्व्हे ऑफ इंडियाने या गावाचा सर्व्हे केला असून हे गाव स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार त्यांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही मंत्री भोसले यांनी बैठकीत दिल्या.
०००

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून ‘आषाढीवारी’ पूर्वतयारीचा आढावा

पुणे, दि. ०७: पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी स्वच्छ, शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासह पालखी मार्गावरील रस्ते, पालखीतळ दुरुस्तीसाठीचे प्रस्ताव दोन दिवसांत सादर करा. पालखी मार्गावरील रस्ते दुरुस्तीच्या अडचणीवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्त्याच्या कामांना मान्यता व निधी उपलब्ध करुन देण्याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आषाढीवारी पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, अपर आयुक्त अरुण आनंदकर, उपायुक्त विजय मुळीक, नितीन माने, दत्तात्रय लांघी, तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे सातारा, सोलापूर, नाशिक व जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षक उपस्थित होते.

मंत्री गोरे म्हणाले, प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी, पालखी मार्ग व विसावा स्थानांवर स्वच्छता राखली जाईल, याची विशेष खबरदारी घ्यावी. स्वच्छतेसाठी पुरेशा प्रमाणात फिरती शौचालये आणि अधिक प्रमाणात स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. टँकरमधील पाण्याच्या शुद्धतेबाबत नियमित तपासणी करावी. पाण्याच्या स्रोतांचे शुद्धीकरणही व्यवस्थित होईल याकडे लक्ष द्यावे. पालखी मार्गावरील रेस्टॉरंट, हॉटेल्स यांची स्वच्छता व अन्न शुद्धतेची खात्री करावी. तसेच पंढरपूर शहरातील कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ व वाहनांची व्यवस्था करावी, पंढरपूर शहरात सोलापूर जिल्हा परिषद व पोलीस प्रशासनाने ड्रोनद्वारे नियंत्रण ठेवण्यासाठी संयुक्त व्यवस्थापन यंत्रणा तयार ठेवावी, वारीदरम्यान देण्यात आलेल्या कामांसाठी कंत्राटदारांकडून अटी व शर्तीचे पालन करुन कामे होण्यासाठी त्यांच्यावर शासकीय यंत्रणेने अंकुश ठेवावा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. ग्रामपंचायतींना आगाऊ निधी देण्याची व्यवस्था करण्यात येईल असे सांगून पालखी सोहळ्यादरम्यान पिण्याचे पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही देखील मंत्री गोरे यांनी दिली.

विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी सादरीकरणाद्वारे करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. स्वच्छ आणि निर्मल वारीसाठी विशेष नियोजन करण्यात आले असून पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी, प्रथमोपचार पेट्या, निवारा केंद्र, हिरकणी कक्ष आदी सुविधांसोबत वारकऱ्यांना आरोग्य सुविधा देण्यात येणार असल्याचे सांगून स्वच्छ, निर्मल व सुरक्षित वारीसाठी सर्व विभागांनी समन्वय ठेऊन दिलेल्या सूचनांचे पालन करावे तसेच स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेऊन पोलीस वाहतूक विभागाने पाण्याचे टँकर पालखी तळ व विसाव्याच्या ठिकाणी वेळेत पोहोचतील याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी मंत्री गोरे यांनी आषाढीवारीच्या अनुषंगाने सर्वच जिल्ह्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पुणे, सातारा, सोलापूर, नाशिक व जळगाव मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली.

०००

आदिवासीबहुल जिल्ह्याला सक्षम व तंत्रसुसज्ज आरोग्य सेवेची सर्वांची जबाबदारी – पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

नंदुरबार, दि. ०७ (जिमाका): आरोग्य हा शासनाच्या विकास धोरणाचा केंद्रबिंदू आहे. नंदुरबारसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्याला सक्षम व तंत्रसुसज्ज आरोग्य सेवा देणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. अशा आरोग्य मंथन शिबिरांमुळे आपण आरोग्य विषयक धोरणांना नवसंजीवनी देऊ शकतो. त्यामुळे आरोग्य विभागातील सर्वांनी आपल्या कामात सेवाभाव ठेवून कर्तव्यपरायणतेने काम करणे गरजेचे आहे. त्यातूनच जिल्ह्यातील आरोग्य निर्देशांक सुधारतील आणि जनतेचे जीवन अधिक आरोग्यदायी बनेल, असे प्रतिपादन कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले आहे.

ते आज जिल्हा नियोजन भवन मधील सभागृहात जागतिक आरोग्य दिनानिमित्त नंदुरबार जिल्ह्यात 7 ते 9 एप्रिल दरम्यान तीन दिवसीय ‘आरोग्य मंथन शिबिर’ जिल्हा नियोजन भवन, नंदुरबार येथे आयोजित करण्यात आले असून त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या वेळी माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित, आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कांताराव सातपुते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे तसेच विविध आरोग्य संस्थांचे प्रमुख आणि तज्ज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी आदिवासी भागातील आरोग्य विषयांचा अभ्यास करण्यासाठी स्थापलेल्या राज्यस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची नियुक्ती झाल्याबद्दल पालकमंत्री ॲड. कोकाटे यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

यानंतर जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आपले मनोगत व्यक्त करत सांगितले की, “नंदुरबार जिल्ह्याच्या भौगोलिक आणि सामाजिक परिस्थितीमुळे आरोग्य सेवा पुरवताना अनेक अडचणी निर्माण होतात. त्या अडचणींवर मात करण्यासाठी आणि सेवा अधिक दर्जेदार करण्यासाठी हे शिबिर उपयुक्त ठरेल.” तसेच, शिबिराच्या शेवटच्या दिवशी आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांना दर्जेदार सेवा देण्याची शपथ घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या शिबिराचे प्रास्ताविक करताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र भिकाजी सोनवणे यांनी सांगितले की, “या मंथन शिबिरात आरोग्य कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात येणार असून, गटचर्चा करून त्यावर उपाययोजना सुचवण्यात येणार आहेत. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिप्राय घेऊन ठोस निर्णय घेण्याचा उद्देश आहे.

शिबिराच्या प्रारंभी. पालकमंत्री ॲड. कोकाटे यांच्या हस्ते आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या काही वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या शिबिरात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची सद्यस्थिती, आगामी योजना, मातृ मृत्यू व बालमृत्यू दर कमी करण्यासाठीचे प्रयत्न, ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचवण्याचे उपाय, टेलीमेडिसिनसारख्या नवकल्पनांची अंमलबजावणी या विषयांवर सखोल चर्चा करण्यात येणार आहे.

विविध पथकांनी आरोग्यसेवांवरील कार्यपद्धतींबाबत सादरीकरण केले. तसेच आरोग्य सेवा पोहोचवताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर संभाव्य उपायांवर खुले चर्चासत्रही आयोजित करण्यात आले.या गटचर्चांतून आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या अभिप्रायांची नोंद घेण्यात येणार असून, त्या आधारे जिल्ह्यातील आरोग्य सेवेचे सशक्तीकरण करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना राबवण्यात येतील, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

०००

जिल्ह्याची ओळख निर्माण करणारे ब्रँड उत्पादन ‘उमेद’ अंतर्गत तयार करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली, दि. ०७ (जिमाका): जिल्हा परिषद ‘उमेद’ अंतर्गत चांगले काम सुरू आहे. महिलांनी तयार केलेल्या वस्तुंना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. सोशल मीडिया, पोर्टल वापरून त्यांनी तयार केलेल्या वस्तुंचे प्रोजेक्शन करावे. उमेद अंतर्गत स्वयंसहाय्यता बचत गटांनी जिल्ह्याची ओळख निर्माण करणारे कोणतेही एक उत्पादन तयार करावे. त्याचा ब्रँड तयार करावा. त्यानंतर त्याचे जिल्हा व तालुका स्तरावर युनिट सुरू करता येईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

राज्य शासनाच्या 100 दिवस कृती आराखड्यांतर्गत आढावा व जिल्हा परिषदेच्या विविध लोकोपयोगी नाविन्यपूर्ण उपक्रमांचे लोकार्पण अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृहात आयोजित कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) प्रमोद काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव मंचावर उपस्थित होते.

लोकशाहीत जिल्हा परिषद हा एक महत्त्वाचा घटक आहे. सांगली जिल्हा परिषदेने उमेद, जटायू व वरदान अशी तीन पोर्टल वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग यांच्या सहकार्याने विकसित केली आहेत, याबद्दल समाधान व्यक्त करून पालकमंत्री पाटील म्हणाले, अमली पदार्थविरोधी उपक्रम, सलाम बॉम्बे स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने 100 टक्के तंबाखूमुक्त शाळा उपक्रम, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जीवन सुरक्षा ठेव योजना, ड्रोनद्वारे खते, औषधे फवारणीबाबतची योजना अशा अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना जिल्हा परिषदेच्यावतीने राबविण्यात येत आहेत, ही बाब कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.

शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारे लिक्विड फर्टिलायझर आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे वाचतात, ड्रोनच्या सहाय्याने खते व औषध फवारणी अशी मोठी क्रांती आलेली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे प्रत्येक गोष्टीत मोठी क्रांती घडते, असे सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले, जिल्हा परिषद शिक्षण विभागाने अमली पदार्थविरोधी उपक्रमामध्ये निबंध, जिंगल, लघुचित्रफीत, पोस्टर आदि स्पर्धा घेतल्या. नशामुक्तीसाठी हे मोठे माध्यम ठरणार आहे, असे ते म्हणाले.

यावेळी पालकमंत्री पाटील यांनी सांगली जिल्हा हा तंबाखूमुक्त शाळा जिल्हा म्हणून जाहीर केला. राज्यात जळगांवनंतर सांगली हा दुसरा तंबाखूमुक्त शाळा जिल्हा ठरला आहे. जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य उपक्रमात उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम व स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र यासाठी केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. नशामुक्त भारत अभियान अंतर्गत घेतलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

तीन नाविन्यपूर्ण पोर्टलचे उदघाटन

जिल्हा परिषदेने उमेद, जटायू व वरदान अशी तीन पोर्टल वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग यांच्या सहकार्याने विकसित केली आहेत. या तीन्ही पोर्टलचे अनावरण पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. जिल्ह्यातील महिला स्वयंसहायता बचतगटांच्या उत्पादनांना प्रोत्साहन व विविध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी उमेद हा डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला आहे. नशामुक्ती अभियानांतर्गत अमली पदार्थ विरोधी उपक्रम व प्रबोधन यांची एकत्रित माहिती देण्यासाठी जटायु हे पोर्टल विकसीत करण्यात आले आहे. तसेच जिल्हा परिषद व त्याअंतर्गत विविध विभाग संस्था यांच्यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) उपलब्ध होण्यासाठी वरदान हे पोर्टल विकसित करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली.

दिव्यांग विद्यार्थी जीवन सुरक्षा ठेव योजना (दिविजा)

यावेळी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने कार्यान्वित दिव्यांग विद्यार्थी जीवन सुरक्षा ठेव योजना (दिविजा) प्रमाणपत्र पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत यांच्यासह पालक, विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना 10 हजार रूपयांचे अर्थसहाय्य मिळणार असून विहित मुदतीनंतर दामदुप्पट परतावा मिळणार आहे. 100 दिवस कृती आराखड्यांतर्गत केवळ 10 दिवसात या योजनेची संकल्पना अंमलात आणून प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली.

माझ्या गावचा धडा उपक्रम पथदर्शी

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेला माझ्या गावचा धडा हा उपक्रम कौतुकास्पद असून हा एक पथदर्शी शैक्षणिक उपक्रम असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री पाटील यांनी यावेळी केले. या उपक्रमाद्वारे सांगली जिल्ह्यातील शिक्षकांनी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी गाव, तालुका व जिल्ह्याचे वैशिष्ट्य सांगणारे धडे लिहिले आहेत. यामुळे मुलांना आपल्या गावची, परिसराची, जिल्ह्याची माहिती मिळणार आहे. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड व माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. शिक्षिका स्वाती शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

विविध उपक्रमांची पाहणी व लोकार्पण

बैठकीपूर्वी पालकमंत्री पाटील यांनी जिल्हा परिषद प्रांगणातील उमेद स्वयंसहायता बचत गट स्टॉलला भेट देऊन पाहणी केली. यावेळी स्वयंसहायता बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या पदार्थांची पाहणी करून त्या पदार्थांना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या.

हिरकणी कक्षाचे लोकार्पण, बाल संसाधन व विकास केंद्रास भेट

यावेळी पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते महिला व बालविकास विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या हिरकणी कक्ष व जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या चिमुकल्यांसाठी पाळणाघराचे उद्घाटनही करण्यात आले. तसेच, जिल्हा परिषद बाल संसाधन व विकास केंद्र येथे मध्यवर्ती ठिकाणी निर्माण झालेल्या कक्षातून जिल्ह्यातील अंगणवाड्यांशी थेट संपर्काची सुविधा निर्माण झाली आहे. याचेही उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

बाल संसाधन व विकास केंद्राच्या सुविधेचा अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन, सूचना करण्यासाठी उपयोग होणार आहे. या माध्यमातून अंगणवाडी सेविकांनाही काही सूचना करावयाच्या असल्यास तर त्या करू शकतात. अंगणवाडी सेविका या एकूणच लहान मुलांवर संस्कार,  शिक्षणाची ओळख करून देण्याबरोबरच जे जे काही चांगले आहे ते मुलांपर्यंत व त्यांच्या पालकापर्यंत पोहोचविण्याचे माध्यम आहे. मुलांचा, पालकांचा प्रतिसादही या माध्यमातून अंगणवाडी सेविका देवू शकतील. या सोयी सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले. यावेळी या कक्षाबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल विकास) संदीप यादव यांची सविस्तर माहिती दिली.

नशामुक्त सांगली स्टिकरचे अनावरण

यावेळी उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत तयार करण्यात आलेले नशामुक्त सांगली स्टिकर्स वाहनांना चिटकवून त्या स्टिकर्सचे अनावरण पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या वाहनावरती नशामुक्त सांगली हे स्टिकर्स लावून व्यसनमुक्तीबाबत प्रबोधन करण्यात येत आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे आदी उपस्थित होते.

तीन शववाहिन्यांचे लोकार्पण

जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने प्राप्त ३ शववाहिन्यांचे लोकार्पण यावेळी पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जिल्हा परिषदेच्या तळमजल्यावरील दिशादर्शक फलकाचे अनावरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद मुख्य वित्त व लेखा अधिकारी विठ्ठल चव्हाण, कार्यकारी अभियंता भारती बिराजे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

प्रलंबित नागरी सेवा सुविधा प्रकल्प तातडीने पूर्ण करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.७ : मुलुंड विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित नागरी सेवा सुविधा प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना येथे दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृह येथे मुलुंड विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित नागरी सेवासुविधांसंदर्भातील झालेल्या बैठकीत त्यांनी संबंधितांना निर्देश दिले.

या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, मुलुंड विधानसभा आमदार मिहीर कोटेचा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मनपा आयुक्त भूषण गगराणी, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिम कुमार गुप्ता, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार,  मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, संजय गांधी नॅशनल पार्कच्या संचालिका अर्चना पाटील, यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी मुंबई उपनगर जिल्हा, मौजे मुलुंड, तालुका कुर्ला येथील  शासकीय जागेवर महसूल भवन व न्यायालीन इमारत बांधण्याच्या  प्रलंबित प्रस्तावावर तत्पर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

मुलुंड येथे दर्जेदार पर्यटन केंद्र निर्माण होण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशित केले.  मुलुंड पश्चिम येथे असलेल्या प्रियदर्शनी क्रीडा संकुलाचे (कालिदास सभागृह) नुतनीकरणाचे  काम तातडीने पूर्ण करावे. मुलुंड उपनगर परिसरातील नागरिकांसाठी नाहूर परिसरात रेल्वे टर्मिनल उभारण्यासाठी जागा तसेच इतर आवश्यक बाबी तपासून पाहाव्यात. मुलुंड पूर्व येथील महानगर पालिकेच्या कचराभूमीवर पडलेल्या कचराची विल्हेवाट पूर्ण करावी. मुलुंड पूर्व येथे मंजूर झालेले तालुका क्रीडा संकुल उभारणीस प्रक्रिया गतीने सुरुवात करावी. तसेच मुलुंड पूर्व येथील लोकसंख्या लक्षात घेता या परिसरात पेट्रोल पंपसाठी  जागा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी संबंधित यंत्रणांना दिले.

००००

वंदना थोरात/विसंअ

 

ताज्या बातम्या

विधानसभा इतर कामकाज

0
अर्धा तास चर्चा ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण करणार -पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील मुंबई, दि. १६: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक...

एस.टी. बस चालकाचा मुलगा विरोधी पक्षनेता होणे, ही लोकशाहीची मोठी देणगी – मुख्यमंत्री देवेंद्र...

0
मुंबई, दि. १६: "एस.टी. बस चालकाचा मुलगा आपल्या कर्तृत्वाच्या बळावर राज्य विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता होतो, ही बाब अभिमानास्पदच आहे. कोणी कुठेही जन्माला आला तरी...

अंबादास दानवे हे विधानपरिषदेत चर्चेची उंची वाढवणारे विरोधी पक्षनेते – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
मुंबई, दि. १६ : अंबादास दानवे हे विधानपरिषदेतील चर्चेची उंची वाढवणारे आणि संयमी, परखड भूमिका मांडणारे विरोधी पक्षनेते असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...

कामगार विभागाच्या नव्या अभ्यासक्रमामुळे न्यायालयांवरील ताण कमी होईल – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

0
मुंबई,  दि. १६ : कामगार विभागांतर्गत कार्यरत ना. मे. लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था या राज्यातील एकमेव शैक्षणिक संस्थेमार्फत, उद्योग व आस्थापनांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी कायदेशीर...

धुळ्यात उद्योग विस्तारासाठी लॉजिस्टिक हब उभारणीला गती द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. १६ : धुळे शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार नागरी सुविधा आणि उद्योग विस्तारासाठी लॉजिस्टिक हब (ड्राय पोर्ट व स्टोरेजसाठी विशेष टर्मिनल) उभारणे अत्यावश्यक आहे....