रविवार, मे 25, 2025
Home Blog Page 221

लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी – एक अभिमानास्पद वारसा

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती एक संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचे प्रतीक आहे. “लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी” हे वाक्य उच्चारताना हृदय अभिमानाने भरून येते, कारण ही भाषा संत, साहित्यिक, योद्धे आणि समाजसुधारकांनी समृद्ध केलेली आहे.

महाराष्ट्राच्या साहित्यपरंपरेचा अभिमान :

“बोलतो मी मराठी!” हे केवळ वाक्य नाही, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा गर्जनाट्य उद्घोष आहे. ही भाषा केवळ संवादाचे साधन नाही, तर संतांचा अभंग, शाहिरांचा पोवाडा, कीर्तनाची गोडी, बखरींचा इतिहास, नाटकाची रंगत आणि साहित्याचा अमूल्य ठेवा या साऱ्यांचे संचित आहे. मराठी भाषेचा हा प्रवास हजारो वर्षांचा आहे, आणि आजही ती तितक्याच जोमाने पुढे चालत आहे.

मराठी भाषेचा प्राचीन वारसा:

मराठी भाषा ९व्या-१०व्या शतकापासून लेखी स्वरूपात आढळते. शिलालेख, ताम्रपट, आणि संतसाहित्य हे याचे जिवंत पुरावे आहेत. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम यांनी भाषेला भावनिक आणि तात्त्विक खोलवर रुजवले, तर शाहिरांनी तिला जोश आणि चैतन्य दिले. शिलाहार आणि यादव काळातील शिलालेख: यामध्ये मराठीचा लिखित वापर दिसतो.

संत साहित्य

ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, अमृतानुभव यांसारख्या ग्रंथांनी भाषा लोकांपर्यंत पोहोचवली. शिवकालीन पत्रव्यवहार: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठी प्रशासनाची भाषा बनली. शाहीर, भारूड आणि लोकसाहित्याचा ठेवा: मराठी लोकसाहित्य हे जनसामान्यांच्या भावना व्यक्त करणारे माध्यम आहे. शाहीर तुकडोजी महाराज, शाहीर रामजोशी आणि अनंत फंदी यांचे पोवाडे

तमाशा आणि लावणीच्या माध्यमातून लोकजागृती करणारी परंपरा

भारूड, कीर्तन, गोंधळ, गवळण, ओव्या यांसारखी विविध लोकसाहित्याची रूपे हे साहित्य केवळ करमणुकीसाठी नव्हे, तर समाजप्रबोधन, राजकीय जाणीव आणि सांस्कृतिक ओळख प्रस्थापित करण्यासाठी वापरले गेले.

नाट्यसृष्टी आणि कथा-कादंबऱ्यांचा सुवर्णकाळ नाट्यपरंपरा मराठी नाट्यसृष्टीला विष्णुदास भावे यांनी 1843 मध्ये “सीता स्वयंवर” या नाटकाने प्रारंभ केला. पुढे, केशवराव भोसले, बालगंधर्व, गणपतराव जोशी, आणि पु. ल. देशपांडे यांनी नाटकाला नवा सन्मान मिळवून दिला.

काही अजरामर नाटके

संगीत नाटक: “संगीत शारदा”, “संगीत सौभद्र”, “संगीत मानापमान”

सामाजिक नाटक: “नटसम्राट”, “तो मी नव्हेच”, “संन्यस्त खड्ग”

विनोदी नाटक: “वाऱ्यावरची वरात”, “तुझे आहे तुजपाशी”

कथा आणि कादंबऱ्या :

हरिभाऊ आपटे: “पण लक्षात कोण घेतो?” (सामाजिक कादंबरी)

वि. स. खांडेकर: “ययाती” (ज्ञानपीठ पुरस्कार विजेती कादंबरी)

शिवाजी सावंत: “मृत्युंजय” (महाभारतातील कर्णावर आधारित कादंबरी)

पु. ल. देशपांडे: “बटाट्याची चाळ”, “व्यक्ती आणि वल्ली” (विनोदी साहित्य)

दया पवार, लक्ष्मण माने, नामदेव ढसाळ: दलित साहित्याचे नवे प्रवाह

समकालीन मराठी साहित्य आणि डिजिटल क्रांती

साहित्य आता पुस्तकापुरते मर्यादित राहिले नाही.

ब्लॉग, पॉडकास्ट, ऑडिओबुक, ई-बुक्स यामधून नवी पिढी मराठीत लेखन करत आहे.

“बोलतो मी मराठी” हा केवळ घोष नाही, तर महाराष्ट्राच्या अभिमानाची साक्ष आहे. मराठी भाषा आणि साहित्य हे संस्कृतीचा आत्मा, इतिहासाचा दस्तऐवज आणि समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन आहे. आपली भाषा, आपली संस्कृती जपणं ही प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी आहे. आपण मराठीत वाचले पाहिजे, लिहिले पाहिजे आणि बोलले पाहिजे – कारण, जेव्हा मराठी टिकेल, तेव्हाच महाराष्ट्राचा आत्मा जिवंत राहील!

मराठी भाषेचा ऐतिहासिक ठेवा :

मराठी भाषेचा उगम संस्कृतपासून झाला असून तिचे अस्तित्व हजारो वर्षांपासून टिकून आहे. चालुक्य, यादव आणि पेशवे काळात मराठीत अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथ आणि काव्यसंग्रह रचले गेले. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव यांनी या भाषेत भक्तीची गंगा वाहवली, तर शाहिरी परंपरेतून लढवय्या इतिहास रेखाटला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीला राज्यकारभाराची भाषा म्हणून मान्यता दिली आणि तिचा विस्तार केला.

साहित्य, कला आणि लोकसंस्कृती :

मराठी भाषा केवळ लिखित ग्रंथापुरती सीमित नाही, तर ती लोकसंस्कृतीतही खोलवर रुजली आहे. अभंग, ओवी, भारुड, लावणी, गोंधळ, गजर ही महाराष्ट्राच्या मातीतून उमललेली लोककला आजही मराठी संस्कृतीला समृद्ध करत आहे. कालिदास, पु. ल. देशपांडे, वि. स. खांडेकर, शिवाजी सावंत यांसारख्या लेखकांनी मराठी साहित्याला नवे आयाम दिले.

मराठीचा अभिमान आणि जबाबदारी :

मराठी भाषेचा अभिमान बाळगणं ही फक्त भावनिक बाब नसून ती जबाबदारी आहे. तिच्या संवर्धनासाठी मराठी माध्यमातून शिक्षणाला प्रोत्साहन द्यावे, अधिकाधिक मराठीत लेखन-वाचन करावे आणि पुढच्या पिढीपर्यंत ही भाषा सन्मानाने पोहोचवावी.

“बोलू मराठी, लिहू मराठी, टिकवू मराठी!”

आजच्या पिढीने मराठी भाषेचा अभिमान बाळगून तिचा अधिकाधिक वापर करणे गरजेचे आहे. भाषा टिकली तर संस्कृती टिकेल, आणि संस्कृती टिकली तर आपली अस्मिता कायम राहील. म्हणूनच, आपण सर्वांनी ठरवूया – “लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी!”

शेवटी म्हणावं वाटतं..

शब्दांचा सोहळा, संस्कृतीचा उत्सव!

शब्दांच्या गंधाने भारलेले, साहित्यात न्हालेले,

मराठी मातीचे सोने, आज पुन्हा नटलेले!

 

संतांचे अभंग इथे, ओवींचे गीत झाले,

शाहीरांचे पोवाडे, स्वराज्याचे रक्त झाले.

नाट्याचे पडदे उघडले, हास्यकल्लोळ फुलला,

कादंबऱ्यांच्या पानांतून, काळच जणू रंगला!

 

शब्दांमध्ये इतिहास, शब्दांमध्ये संस्कृती,

साहित्याच्या मांदियाळीत, महाराष्ट्राची कीर्ती!

लेखक, कवी, विचारवंत, साऱ्यांचा मेळा आज,

संमेलनाच्या या स्नेहात, जुळती नवे आवाज!

 

आणि पुन्हा एकदा मराठीचा झेंडा उंचावतो,

बोलतो मी मराठी… अभिमानाने मिरवतो!

०००

 

संकलन:  अनिल कुरकुटे , जिल्हा माहिती कार्यालय, वाशिम

 

गदिमा : शब्दसृष्टीचे ईश्वर  

नवी दिल्ली येथे होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने कविवर्य गजानन दिगंबर उर्फ ग. दि. माडगूळकर यांच्याबद्दल प्रकाशझोत टाकणारा प्रा. डॉ. मंजिरी महेंद्र कुलकर्णी यांचा लेख… 

            आता वंदू कवीश्वर

ते शब्दसृष्टीचे ईश्वर

असे समर्थ रामदासांनी कवींच्या बाबतीत म्हटलेले आहे. आधुनिक वाल्मिकी म्हणून ज्यांचा गौरवाने उल्लेख केला जातो ते कविवर्य गजानन दिगंबर उर्फ ग. दि. माडगूळकर हे खरोखरच शब्दसृष्टीचे ईश्वर होते. त्यांना शब्दांचे अक्षरशः वरदान होते. त्यांना एकदा एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता की “अण्णा, तुम्हाला असे अचूक, समर्पक आणि चपखल असे शब्द त्या त्या ठिकाणी कसे सुचतात ?” त्यावेळी अण्णा म्हणाले होते, “मला स्वत:लाही त्याबद्दल आश्चर्य वाटते. मात्र माझ्यासमोर शब्द अक्षरश: फेर धरून नाचतात आणि ‘मला घ्या मला घ्या, माझा कवितेमध्ये उपयोग करा’ असे जणू म्हणतात”. इतकी शब्दांवर अण्णांची हुकमत होती.

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात माडगूळ नावाचे गाव आहे. ते अण्णांचे गाव. आजही तेथे अण्णांच्या आठवणी सांगणारे काहीजण भेटतात. अण्णा त्यांच्या शेतामध्ये बसून शब्दसाधना करीत असत. त्या ठिकाणाला बामणाचा पत्रा असे म्हटले जाते. ते बामणाचा पत्रा हे ठिकाण आजही आपल्याला तेथे पहायला मिळते.

अण्णा हे स्वातंत्र्यसैनिक. महात्मा गांधीजींच्या आदेशाने ज्यांनी स्वातंत्र्ययुद्धात त्यावेळी उडी घेतली, त्यामध्ये अण्णा अग्रेसर होते. त्या स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात कलावंतांनी ठिकठिकाणी मेळे सुरू केले होते. या मेळ्यांमध्ये कथानक असे. तसेच ते कथानक विविध गीतांनी सजवलेली असे. स्वातंत्र्ययुद्ध, समाजासमोरचे प्रश्न, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले प्रतिसरकार, ब्रिटिशांच्या दंडुकेशाहीचा आणि समाजातील सावकारशाहीचा बिमोड असे अनेक विषय या गीतांमधून मांडले जात असत.

काँग्रेस सेवादलाच्या अनेक बैठका सांगली जिल्ह्यात (त्यावेळचा सातारा जिल्हा) त्यावेळी होत असत. विशेषतः आटपाडी, कुंडलमध्ये अशा बैठका सातत्याने होत असत. कारण कुंडल हे त्यावेळी औंध संस्थानमध्ये होते. त्या संस्थाचे अधिपती श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधी आणि त्यांचे चिरंजीव बॅरिस्टर आप्पासाहेब पंत यांचा स्वातंत्र्ययुद्धाला पूर्ण पाठिंबा होता. क्रांतीअग्रणी जी. डी. बापू लाड, शाहीर शंकरराव निकम यांच्यासोबतीने अण्णा स्वातंत्र्य सैनिकांच्या अनेक बैठकांना हजर असत.. पूज्य साने गुरुजीही अशा बैठकांसाठी यायचे आणि त्यावेळी सेवादलाच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन करायचे. अण्णा अनेक स्फूर्तीदायक अशी गीते रचत असत. त्या गीतांचे गायन त्यावेळी अतिशय प्रसिद्ध असलेल्या मेळ्यांमध्ये आणि काँग्रेस सेवादलाच्या बैठकांमध्ये आंदोलनांमध्ये होत असे. त्या गीतांमुळे स्वातंत्र्यसैनिकांना प्रेम मिळत असे.

अण्णांनी नंतर मराठी चित्रपटांसाठी गीतलेखन तसेच पटकथालेखन सुरू केले. अतिशय भावमधुर अशी गीते अण्णांनी लिहिलेली आहेत. ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात’, हे गीत आजही म्हणजे जवळजवळ 60 ते 65 वर्षानंतरही लोकप्रिय आहे. तमाशाप्रधान, सामाजिक समस्याप्रधान किंवा संतांच्या जीवनावरचे चित्रपट यासाठी त्यांनी लिहिलेल्या गीतांनाही रसिकांची उदंड पसंती मिळाली.

तमाशाप्रधान चित्रपटातही अण्णांनी अनेक सुंदर अशा लावण्या लिहिल्या की त्या आजही लोकांच्या आठवणीत आहेत. ‘ऐन दुपारी यमुनातीरी, खोडी कुणी काढली, बाई माझी करंगळी मोडली’, ‘बाई मी पतंग उडवीत होते’ किंवा ‘काठेवाडी घोड्यावरती’ अशा त्यांच्या अनेक लावण्या गाजलेल्या होत्या. त्याचवेळी अतिशय नितांत सुंदर आणि समाजाचे उद्बोधन करणारी गीतेही त्यांनी चित्रपटांसाठी तसेच नाटकांसाठीही लिहिली होती.

प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक राजा परांजपे यांनी तयार केलेल्या अनेक चित्रपटांचे पटकथा, संवाद आणि गीतलेखन अण्णांनी केले होते. ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटातील त्यांची सगळी गाणी आजच्या भाषेत सांगायचे तर अक्षरशः हिट झाली होती. ‘तुला पाहते रे तुला पाहते रे, जरी आंधळी मी तुला पाहते रे’, ‘जग हे बंदीशाळा’, ‘थकले रे नंदलाला’ अशी त्या चित्रपटातील गीते अक्षरश महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही त्यावेळी गाजत होती. आजही त्या गीतांची गोडी आहे. अनेक संतांच्या जीवन चरित्रावरील चित्रपटांसाठी अण्णांनी गीते लिहिली आणि तीही तेवढीच मधुर आहेत. संत गोरा कुंभार या चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेली ‘उठ पंढरीच्या राजा, वाढवेळ झाला, थवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला’, तसेच समचरण सुंदर, कासे ल्याला पितांबर’ ही गीते अतिशय लोकप्रिय झाली होती. संत दामाजीपंत यांच्या जीवनावरील चित्रपटात गदिमांनी लिहिलेले ‘निजरूप दाखवा हो, हरिदर्शनासी याहो’ हे गीतही असेच गाजले होते.

गदिमांनी अनेक लघुनिबंध लिहिले आहेत. विशेषतः हस्ताचा पाऊस, जांभळाचे दिवस अशी त्यांची लघु निबंधांची पुस्तके अतिशय प्रसिद्ध आहेत. अतिशय सहज सोपी शैली आणि लोकांना समजेल असे लेखन हे त्यांच्या साहित्याचे सगळ्यात प्रमुख वैशिष्ठ्य आहे. ते नेहमी असे म्हणायचे की माझे लेखन हे सर्वसामान्य लोकांना कळले पाहिजे. केवळ विद्वान किंवा खूप शिकलेल्या लोकांसाठीच नव्हे; तर अगदी खेड्यापाड्यातील सामान्य लोकांसाठी मला लिहायचे आहे.

अण्णांवर लहानपणापासून कीर्तन, तमाशा, भजन, प्रवचन यांचा मोठा प्रभाव झाला होता. संत साहित्याचे त्यांनी उदंड वाचन केले होते. संत ज्ञानेश्वर, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, संत शिरोमणी नामदेव महाराज, संत एकनाथ, संत रामदास अशा संतांच्या साहित्याचा त्यांनी गाढा अभ्यास केला होता. उत्तर भारतातील प्रसिद्ध संत कबीर, तुलसीदास, सूरदास आणि मीराबाई यांच्या साहित्याचाही त्यांनी सखोल अभ्यास केला होता. साहजिकच त्यांच्या कवितेवर या सर्वांच्या प्रतिमासृष्टीचा आणि प्रतिभेचाही निश्चितच परिणाम झालेला आहे. साहजिकच त्यांची शब्दकळाही त्यामुळे अतिशय ओघवती आणि समृद्ध अशी बनलेली होती.

1952 च्या दरम्यान अण्णांच्या साहित्यिक जीवनात एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आला. तो टप्पा म्हणजे गीत रामायण महाकाव्य. या गीत रामायणाने अफाट लोकप्रियता मिळवली. या गीत रामायणामधील अनेक गाणी ही आठ नऊ कडव्यांचीसुद्धा आहेत. प्रसिद्ध गायक सुधीर फडके यांचे गायन आणि गदिमांची शब्दसंपत्ती यामुळे गीतरामायण हे महाकाव्य अक्षरशः प्रचंड लोकप्रिय झाले. त्यावेळी आकाशवाणीच्या पुणे आणि मुंबई या केंद्रावरून या गीत रामायणाचे कार्यक्रम प्रथम प्रसारित झाले होते. त्याची ठराविक वेळ असायची. पहिल्या दोन-तीन दिवसातच या गीत रामायणाबद्दल लोकांना श्रद्धा आणि प्रेम वाटू लागले. तेव्हा रेडिओ फार कमी होते. त्यामुळे बऱ्यापैकी आर्थिक परिस्थिती असलेल्या एखाद्या घरात रेडिओ असे. त्या घरात आसपासचे लोक तिथे जमायचे आणि त्या रेडिओची अक्षरशः फुले वाहून आणि त्याच्यासमोर उदबत्ती लावून पूजा करायचे. मग गीत रामायण – ऐकायचे. म्हणजे लोकांनी गदिमांच्या या महाकाव्यावर किती प्रेम केले, किती श्रद्धा ठेवली हे आपल्याला यावरून कळून येईल.

गदिमांनी विपुल लेखन केले आहे. कथा, कविता, नाटक, चित्रपट कथा त्यांनी अनेक लिहिल्या. परंतु असे म्हणतात की गदिमांनी फक्त गीत रामायण जरी लिहिले असते तरीसुद्धा त्यांची कीर्ती दिगंत झाली असती. गीत रामायणामध्ये गदिमांनी अनेक ठिकाणी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. वनवासात असताना अयोध्येचा राजा भरत हा प्रभू रामचंद्रांना भेटण्यासाठी येतो. त्यावेळी त्याचे दुःख दूर करण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी त्याला अतिशय हळुवार अशा शब्दात उपदेश केला. ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हेच ते प्रसिद्ध गीत आहे. गीत रामायणातील अनेक गीते आजही लोकप्रिय आहेत. आजही त्या गीतांचे सातत्याने स्वतंत्र कार्यक्रम होतात. गदिमांच्या या गीतरामायणामुळे त्यांना आधुनिक वाल्मिकी अशी पदवी मिळाली आणि ती सार्थ अशी आहे.

–        प्रा. डॉ. मंजिरी महेंद्र कुलकर्णी

खानदेशातील अहिराणी साहित्य: उत्साहवर्धक व आशादायी प्रारंभ..

नवी दिल्ली येथे ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने खानदेशातील नावाजलेले साहित्यिक डॉ. फुला बागुल यांनी अहिराणी भाषा साहित्य यावर या लेखातून आपले विचार व्यक्त केले आहेत. शिवाय मराठी वाचकांसाठी त्यांनी अहिराणी भाषेच्या माध्यमातून निर्माण झालेल्या साहित्यकृतींची माहितीही या लेखाच्या माध्यमातून वाचकांसाठी देण्याचा प्रयत्न केला आहे…

अहिराणी ही धुळे, जळगाव, नंदुरबार या खानदेशातील तीन जिल्ह्यांत राहणाऱ्या लोकांसह गुजरातेतील व्यारा, सोनगड, बारडोली, उधना येथे खानदेशातून स्थलांतरित झालेल्या लोकांची तसेच मध्य प्रदेशातील सेंधवा, खेतिया भागात राहणाऱ्या लोकांची बोली आहे. यासह नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या तालुक्यातुनही अहिराणी बोलली जाते. साधारण दीड दोन कोटी लोकांची ती बोली असल्याचे म्हटले जाते.

प्राचीन राजे अभीर यांच्यापासून तिचा ऐतिहासिक वारसा सांगितला जातो. शिलालेखासह व मध्ययुगीन ग्रांथिक पुरावे देखील दिले जातात. प्राचीन अहिराणी लोकगीते देखील अहिराणीच्या प्राचीनत्वात भर घालतात. अहिराणीचा प्रवास प्राचीन काळापासून प्रमाण मराठी सोबतच होतो आहे. प्रमाण मराठीच्या अंतर्गत असलेली अहिराणी ही सर्वात प्रमुख व क्षेत्र बहुल बोली आहे. प्रमाण मराठीच्या तुलनेत अहिराणी साहित्याची वाटचाल मात्र अलीकडे साहित्य निर्मिती सुरू झाल्यामुळे मर्यादित आहे. अहिराणी साहित्याच्या वाटचालीचा आरंभबिंदू शिलालेखातील या ओळी असा मानला जातो.

संत ज्ञानेश्वरांनी बागलानी अहिराणीत लिहिलेली ओवी (मी तं बाई साधी भोयी/गऊ त्याना जवयी/फाडी मनी चोयी) हा अहिराणी साहित्याचा भरभक्कम ग्रांथिक पुरावा होय. मध्ययुगीन अहिराणी कवी निंबा चा उल्लेख येतो तथापि, अजून त्यांचे अहिराणी साहित्य मिळून आल्याचे ऐकिवात नाही. अर्वाचीन काळात अहिराणी साहित्याच्या प्रारंभाचा मान निर्विवादपणे दा. गो. बोरसे यांना दिला जातो.

खानदेशातील विविध लेखक, कवी, समीक्षकांनी पुढीलप्रमाणे अहिराणी व अहिराणी संदर्भातील साहित्य निर्मिती करून हा प्रवाह आरंभिला आहे.

अहिराणी काव्यसंग्रह पुढीलप्रमाणे-

१. मी कान्हाना देसनी

वनमाला पाटील …अजिंक्य प्रकाशन, वापटा, जि. वाशिम

२. नियतीना सूड ..

लतिका चौधरी .. अपेक्षा प्रकाशन, भुसावळ

३. वानोया..

चंद्रकला बाविस्कर ..

४. राम पाऱ्हाना राम ..

नानाभाऊ पाटील .. कस्तुरी प्रकाशन, अमळनेर

५. वयंबा ..

सुभाष आहिरे .. भावना प्रकाशन, धुळे

६. पाठवरना हात ..

प्रा. आ. न. पाटकरी .. पुष्पा प्रकाशन, धुळे

७. आदिम तालनं संगीत ..

सुधीर देवरे .. भाषा संशोधन प्रकाशन केंद्र, बडोदा

८. पारसमनी..

पारसमल जैन.. प्रकाशक, निला जैन

९. आपली माय अहिराणी ..

प्रा . आ . न . पाटकरी, प्रकाशक सौ . पुष्पा पाटकरी

१०. खानदेशी मेवा ..

प्रा. विमल वाणी .. प्रकाशक शंतनु येवले

११. पुरनपोयी …

रमेश बोरसे .. राऊ प्रकाशन, धुळे

१२. रापीनी धार ..

वाल्मिक अहिरे .. प्रज्ञेश प्रकाशन, पुणे

१३. गावगाडा ..

एन एच महाजन .. तिसरी आवृत्ती, अनुराग प्रकाशन, शिरपूर

१४. मी आनी मना आवकाया ..

पप्पू पाटोळे, प्रकाशक स्वरूप बोरसे

१५ लाह्या ..

नानाभाऊ माळी ..भावना प्रकाशन, धुळे

१६. मिरीगना पानी …

भगवान अहिरे … चौखंबा प्रकाशन, धुळे

१७. अभिरानी

शकुंतला पाटील .. अथर्व पब्लिकेशन्स, जळगाव

१८. सरगम

शंकर पवार .. दीक्षा प्रकाशन, धुळे

१९. नियं आभाय

लतिका चौधरी .. कस्तुरी प्रकाशन, अमळनेर

२०. मन्हा मामाना गावले जाऊ (बाल कविता) ..

आबा महाजन, अथर्व प्रकाशन, जळगाव

अहिराणी कादंबऱ्या पुढील साहित्यिकांनी लिहिल्या आहेत.

१. कायी माय

गोकूळ बागूल .. द्वि आ . कस्तुरी प्रकाशन, अमळनेर

२. आख्खी हयाती

बापूराव देसाई, सरस्वती प्रकाशन, नाशिकरोड

३. लगीन

संजीव गिरासे … राजश्री प्रकाशन, पुणे

४. आक्का ..

राजाजी देशमुख … दीपाली प्रकाशन, नाशिक

५. गलीनी भाऊ बंदकी ..

लतिका चौधरी

६. देव बोकड्यानी माणुसकी ..

प्रकाश महाले

डॉ. बापुराव देसाई यांच्या अन्य अहिराणी कादंबऱ्याही आहेत.

अमीना या कादंबरीचा अहिराणी अनुवादही झाला आहे.

अहिराणी कथा संग्रह पुढील लेखकांनी निर्मिले आहेत.

१. बठ्ठा बजार येडास्ना …

गोकूळ बागूल, कस्तुरी प्रकाशन, अमळनेर याच संग्रहाचे नाव बदलून (ज्वारी म्हनी माय) पुनर्प्रकाशित करण्यात आला .

२. गोधडीनी उब ..

प्रा. आ. न. पाटकरी .. अंकुर प्रकाशन, अकोला

३. गोठ पाटल्या ..

सौ. रत्ना पाटील .. भावना प्रकाशन, धुळे

४. पसात –

मच्छिंद्र वाघ, राहुल बूक, नाशिक

५. भोवरा –

डॉ. ज्ञानेश दुसाणे

 अहिराणी ललितगद्य या प्रांतातही पुढील लेखकांनी आपले योगदान दिले आहे.

१. आख्यान ..

रामदास वाघ, प्राजक्ता प्रकाशन, नाशिक

२. गावनं गावपन ..

सुभाष आहिरे,  भावना प्रकाशन, धुळे

३. आप्पान्या गप्पा ..

रमेश बोरसे .. अभ्यासिका प्रकाशन, कन्नड

४. चांगभलं ..

प्रा. भगवान पाटील, कस्तुरी प्रकाशन, अमळनेर

५. वानगी …

रामदास वाघ, प्राजक्ता प्रकाशन, नाशिक

६. आप्पान्या गप्पा (भाग दोन )

रमेश बोरसे, अभ्यासिका प्रकाशन, कन्नड

७. माय नावना देव

रामदास वाघ, प्राजक्ता प्रकाशन, नाशिक

८. खान्देशी बावनकशी

लतिका चौधरी, दिशोत्तमा प्रकाशन, नाशिक

९. आगारी…

संजीव गिरासे … सुधा प्रकाशन, जळगाव

अहिराणी नाट्य या प्रवाहात लिखित संहिता फक्त एकच आढळते अन्य नाटय रूपे प्रत्यक्ष सादर केली जात आहेत.

१. राम राम भावड्या …

प्रा. बी. पी. राजपूत, प्रकाशक सौ .छाया राजपूत, होळनांथे

२. पांडोबा आणि फिरस्ता (संवाद लेखन),

आत्माराम मुंगा पाटील

३. बुध्याना पोऱ्यानी मानता हा अहिराणी एकपात्री प्रयोग सुभाष आहिरे तर आयतं पोयतं सख्यानं हा अहिराणी प्रयोग प्रवीण माळी आणि खानदेसनी माटी हा प्रयोग प्रतिभा साळुंके सादर करतात.

अहिराणी समीक्षा या प्रातांत डॉ. फुला बागूल यांचे अग्रक्रमीय योगदान आहे.

१. खारं आलनं …  . फुला बागूल, प्रशांत पब्लिकेशन्स, जळगाव. या समीक्षा ग्रंथाला पुरस्कारांनी गौरविले गेले आहे. उच्चशिक्षणातही अभ्यासघटक म्हणून या ग्रंथाचा समावेश आहे. अहिराणी साहित्याच्या समीक्षेचे निकष या ग्रंथाने स्थापित केले आहेत.

अहिराणी आत्मकथन पुढील लेखकांनी लिहिले आहे.

१. शांताई

सुभाष आहिरे, भावना प्रकाशन, धुळे

अहिराणी अनुवाद या प्रांतातही काही लेखकांनी योगदान दिले आहे. उडाणेकर श्री. सुभाष यांनी व जालन्याच्या वनमाला पाटील यांनी गीतेची अहिराणी भाषांतरे केली आहेत. प्रा आ. न. पाटकरी यांचे प्रयत्नही स्तुत्य आहेत .

१. संत मीरानी भक्ती ..

प्रा. भगवान पाटील, पानफूल प्रकाशन, जळगाव

२.अमिना (मूळ उर्दू कादंबरी, मोहम्मद उमर)

अथर्व प्रकाशन, जळगाव

अहिराणी संमेलनाची अध्यक्षीय भाषणे देखील पुस्तिकेच्या रूपात प्रकाशित आहेत.

१. पाचवे अ. भा. अहिराणी साहित्य संमेलन..

सुभाष आहिरे, प्रकाशक खान्देश विकास प्रतिष्ठान, धुळे

अहिराणी संकलने देखील पुढील लेखकांनी प्रकाशित केली आहेत.

१. अहिराणी दर्शन

प्रा. सदाशिव माळी, शिवमूर्ती प्रकाशन, धुळे

२. कानबाई माता गीत संग्रह,

रामचंद्र सदाशिव व सौ. शोभा रामचंद्र चौधरी, मुद्रक का. स. वाणी संस्था, धुळे

३. कानोड जागर

प्रा. विमल वाणी, मुद्रक अक्षरा ऑफसेट, भडगाव

४.अहिरानी मायबोली,

चंद्रकांत कोळी, प्रकाशक सौ. भारती शिरसाठ, देवळाई

५.जाईचा सुगंध,

अशोक चौधरी,  कस्तुरी प्रकाशन, अमळनेर

६. लग्न सोहळा,

शकुंतला पाटील. अथर्व प्रकाशन, जळगाव

७.अहिराणी बोली भाषेतील जात्यावरील ओव्या..

डॉ. छाया निकम, अथर्व प्रकाशन, जळगाव

८.उपकार माऊलीना खरा

प्रा. अशोक शिंदे, वर्षा प्रकाशन, विसरवाडी

९. अहिराणी वाग्वैभव

अभिमन्यू पाटील .. कस्तुरी प्रकाशन, अमळनेर

अहिराणी संदर्भातील संशोधन पर ग्रंथ (मराठी भाषेतून) पुढील प्रमाणे होत.

किमान दहा पीएच. डी. प्रबंध अहिराणीवर सादर झाले आहेत.

१. आभीरायण,

गंगाधर पारोळेकर .. प्रकाशक सौ मीनाक्षी पारोळेकर, पुणे

२. खानदेशातील ग्राम दैवते आणि लोकगीते

डॉ. सयाजी पगार, का. स. वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था, धुळे

३. खानदेशी: एक स्थानिक अभ्यास

डॉ. विजया चिटणीस, प्रेस्टीज प्रकाशन, पुणे

४. अहिराणी म्हणी: अनुभवाच्या खाणी

डॉ. बाळासाहेब गुंजाळ, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर

५. बागलाणी लोकगीते आणि लोक संस्कृती

डॉ. सुरेश पाटील, प्रज्ञा प्रकाशन, नाशिक

६. समाज भाषाविज्ञान: बोलींचा अभ्यास (अहिराणी बोली)

डॉ. सुधाकर चौधरी, अथर्व प्रकाशन, जळगाव

७. अहिराणी लोक साहित्याचा अभ्यास

डॉ. शशिकांत पाटील, चिन्मय प्रकाशन, औरंगाबाद

८. अहिराणी : भाषा वैज्ञानिक अभ्यास

डॉ. रमेश सूर्यवंशी, अक्षय प्रकाशन, पुणे

९. खानदेशी स्त्री गीते

डॉ. उषा सावंत, प्रतिमा प्रकाशन, पुणे

१०. खानदेशी अहिराणी लोककथा,

डॉ . बी . एन . पाटील, प्रशांत पब्लिकेशन्स, जळगाव

११. अहिराणी लोक वाङ्मयातील लोक भाषा

डॉ. म. सु. पगारे, प्रशांत पब्लिकेशन्स, जळगाव

अहिराणी शब्दकोश देखील प्रकाशित झाला आहे.

१. अहिराणी शब्दकोश,

डॉ. रमेश सूर्यवंशी, अक्षय प्रकाशन, पुणे

अहिराणी संकीर्ण ग्रंथ / पुस्तिका  [मराठीतून लेखन] देखील प्रकाशित झाले आहेत .

१. अहिराणी लोकपरंपरा

डॉ. सुधीर देवरे, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई

२. खानदेशी साहित्य सुरभी,

डॉ. बापूराव देसाई, प्रकाशक शंतनु कुलकर्णी

३. खान्देशी संस्कृती

डॉ. बापूराव देसाई, पानफूल प्रकाशन, जळगाव

४. अहिरराष्ट्र कान्हदेश

देविदास हटकर, मुद्रक राजयोग डिजिटल, कल्याण

अशा रीतीने साहित्याच्या सर्व प्रकारात खानदेशातील अहिराणी लेखकांनी आपली निर्मिती करून अहिराणी साहित्याचा हा प्रवाह समृद्ध करण्याचा संकल्प घेतला आहे.

०००

  • डॉ. फुला बागुल, सदस्य विद्वत परिषद, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, भ्रमणध्वनी 9420605208/ 9822934874

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे महानगरपालिका अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमास भेट

पुणे, दि. 15 : पुणे महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवानिमित्त महानगरपालिकेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमास उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार सुनील तटकरे, आमदार विजय शिवतारे, चेतन तुपे, सिद्धार्थ शिरोळे, महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी श्री. पवार यांनी प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी विविध मान्यवर तसेच महानगरपालिकेतील अधिकारी- कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम पोलीस दलाने करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. 15 : राज्य सरकारच्यावतीने पोलीस दलाकरीता नवीन कार्यालये, वाहने, सीसीटिव्ही,अत्याधुनिक तंत्रज्ञान अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. पोलिसांनी गेल्या काही वर्षांमध्ये अतिशय नेत्रदीपक अशा प्रकारची कामगिरी केलेली असून येत्या काळातही सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम राज्यातील पोलीस दल करेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

पुणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात आयोजित ‘तरंग-2025’ कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार सुनेत्रा पवार, सुनील तटकरे,  आमदार अमित गोरखे, योगेश टिळेकर, विजय शिवतारे, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, सुनील शेळके, हेमंत रासने, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पुनीत बालन यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आदी उपस्थित होते.

    

श्री. फडणवीस म्हणाले, पुणे हे महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे शहर असून ते राज्याचे उत्पादन व तंत्रज्ञानाचे हब आहे; शहरात आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध नागरिक याठिकाणी येत असतात. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत राखण्यासोबत वाहतूकीच्या नियमांचे पालन झाले पाहिजे. नागरिकांना उत्तमप्रकारच्या सेवा देवून त्यांना न्याय दिला पाहिजे, अपराध घडल्यानंतर अपराध्यांना शिक्षा झाली पाहिजे या गोष्टीवर प्रचंड भर पुणे पोलिसांच्या माध्यमातून देण्यात येत असतो. पुणे पोलीसांनी गंभीर घटनेच्यावेळी चांगल्या प्रकारे जलद प्रतिसाद देत त्या घटनांचा उलगडा केलेला आहे. त्यामधील आरोपींना जेरबंद करुन शिक्षा मिळत आहे, हे आपल्याकरीता अधिक महत्त्वाचे आहे. यापुढेही पुण्यासारख्या शहरांमध्ये अधिकाधिक घटनेच्या अनुषंगाने पोलिसांचा प्रतिसादाचा वेळ कमीत कमी असला पाहिजे. पोलिसांचा वावर नागरिकांना जाणवला पाहिजे.

पोलीसांच्या कामकाजात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याच्यादृष्टीने देशातील सगळयात चांगला सायबर फ्लॅटफॉर्म राज्याने निर्माण केला आहे. केंद्र शासनाने 1945 हा क्रमांक राज्याकरीता दिला असून तक्रारदाराला 24 तासाच्या आत कारवाई करुन अहवाल देण्यात येत आहे. पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगल्या आरोग्यदायी वातावरणात जगता यावे, याकरीता पोलीस कल्याणाच्यामाध्यमातून आरोग्य, निवासस्थाने अशा अनेक गोष्टी राज्यशासनाने अजेंडावर घेवून मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे.

नागरिकांना उत्सव चांगल्याप्रकारे साजरा करता यावा, याकरीता राज्यातील पोलीस दल 24 तास बंदोबस्त करीत असतात, उत्सवाच्या काळात कुटुंबापासून दूर राहावे लागते, म्हणून अशा पोलिसांना आपल्या परिवारासोबत एखादा उत्सव साजरा करता यावा, याकरीता पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्यावतीने  पोलिसांचा उत्सव म्हणून ‘तरंग’ एक अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता सामान्य नागरिकांच्या जीवनामध्ये हास्य असले पाहिजे, त्यांना सुखशांती मिळाली पाहिजे, अपराधापासून मुक्ती मिळाली पाहिजे याकरीता पोलीस काम करीत असतात, अशा उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करुन त्यांचे अभिनंदन करुन यापुढेही अशाच प्रकारचे चांगले काम करतील, अशी अपेक्षा श्री. फडणवीस यांनी व्यक्त केली.

श्री. पवार म्हणाले, राज्यात कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत राहिले पाहिजे, जातीय सलोखा राहिला पाहिजे, शहरातील वाहतूक कोंडी सुटली पाहिजे, नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी ‘कॉप-24’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत ठेवण्याकरीता पोलीस दलाला पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असून यापुढेही राज्य सरकार कमी पडणार नाही. नागरिकांनीही आपली जबाबदारी नीटपणे पार पाडावी, असे आवाहन श्री. पवार म्हणाले.

श्री. कुमार म्हणाले, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्यावतीने मागील एक वर्षात लोकसभा व विधानसभा निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासोबत गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता विविध उपाययोजना करण्यात आल्या. यापुढे अधिक जोमाने करुन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे श्री. कुमार म्हणाले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते कॉप-24 उपक्रमाअंतर्गत दुचाकी व चारचाकी वाहनांना हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण करण्यात आले. तसेच कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांचे पाल्यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमापूर्वी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्याची चित्रफीत दाखविण्यात आली.

00000

शासकीय योजना गुणवत्तापूर्ण राबवा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूर, दि. १५ – केंद्र शासनाच्या सर्वसामान्यांसाठी विविध योजना आहेत. या योजना प्रभावीपणे व गुणवत्तापूर्ण राबवण्यात याव्यात, असे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्यातील संबंधित कार्यान्वयन यंत्रणेला आज दिले.

जिल्हा विकास समन्वय तथा संनियंत्रण समितीची (दिशा) बैठक केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. सदर येथील नियोजन भवनच्या सभागृहात झालेल्या या बैठकीला वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार कृपाल तुमाने, आमदार चरणसिंग ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर,  मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त आचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्यासह दिशा समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी नागपूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या केंद्र सरकार पुरस्कृत योजनांचा आढावा मंत्री श्री. गडकरी यांनी घेतला.

केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी स्वच्छ भारत अभियान, सक्षम अंगणवाडी व पोषण, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, अमृत 1 व 2, प्रधानमंत्री आवास योजना, पाणी व कचरा व्यवस्थापन योजना, प्रधानमंत्री स्वानिधी योजना, प्रधानमंत्री आदिवासी ग्राम विकास योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, आयुष्मान भारत आदी योजनांचा आढावा घेतला. प्रधानमंत्री आवास योजना, रस्ते विकास योजना, अमृत योजना अशा अनेक योजना सर्वसामान्यासाठी आहेत. सरकारी योजना राबविण्यात हयगय करणारे अधिकारी अथवा कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी यावेळी दिले

प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये गरिबांना घरे द्या, पण त्याचवेळी अवैधरित्या घरांचा ताबा घेणाऱ्या लोकांवर पोलिसांच्या सुरक्षेत कारवाई करावी. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचाही चुकीचे लोक लाभ घेत असतील तर त्यांच्यावर कारवाई करा, असेही श्री. गडकरी म्हणाले.

ग्रामीण भागातील कचरा व्यवस्थापन योजनेचा आढावा देखील त्यांनी घेतला. गावातून गोळा होणारा कचरा रस्त्याच्या कामात वापरता येईल का किंवा त्यातून कंपोस्ट खत तयार करता येईल का, याचा विचार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ग्रामीण भागात पाणीपुरवठा योजनेची 137 कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यावर योजनेची अंमलबजावणी करताना पाइपलाइन टाकण्यापूर्वी पाण्याचा स्रोत निश्चित करा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गात सिकलसेल, थॅलेसिमियाची मोठी समस्या आहे.  लोक सिकलसेल, थॅलेसिमियाने ग्रस्त आहेत. या आजारांवर नागपुरात उपचार व्हावा यासाठी आपण एम्समध्ये यंत्रणा तयार करीत आहोत. याच्या  अंमलबजावणीवर लक्ष द्यावे, अशा सूचना केंद्रीय मंत्री श्री.गडकरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

रस्ते अपघातात जखमी झालेल्या रुग्णाला कुठल्याही रुग्णालयात उपचार घेण्यासाठी सरकार मदत करेल. ही योजना रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयातर्फे लागू करण्यात आली आहे. या योजनेची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी यावेळी दिले.

ग्रामीण भागाच्या विकासासाठी पायाभूत सुविधांच्या विकासावर शासनाचा भर – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. 15: ग्रामीण भागांचा विकास करण्यासाठी  रस्ते, पाणी, लाईट, शाळा, आरोग्य सेवा यासारख्या पायाभूत सुविधांच्या विकासावर शासन प्राधान्याने भर देत आहे. या सुविधा पूर्णत्वास नेणे ही लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी केले.
अडुळपेठ येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोन मधून अडुळ ते डिगेवाडी रस्ता सुधारणा करणे, अडुळ साळुंखेवस्ती रस्त्यावरील ओढ्यावर  साकव  बांधणे या कामांचे संयुक्त भूमीपूजन तसेच मल्हारपेठ येथे मल्हार पेठ, मंद्रूळहवेली, पानसकरवाडी, जमदाडवाडी, नवसारवाडी यांना जोडणाऱ्या मल्हार पेठ ते जमदाडवाडी रस्त्याची सुधारणा करणे या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री श्री. देसाई यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम उपविभाग पाटणचे उपअभियंता एस. वाय. शिंदे, डीगेवाडीचे सरपंच अर्चना नलवडे, उपसरपंच राजेश शिर्के, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब पाटील, मल्हारपेठचे सरपंच आर.बी. पवार, उपसरपंच पुरुषोत्तम चव्हाण यांचेसह सर्व विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
पालकमंत्री शंभूराजे देसाई म्हणाले, गाव, वाड्या-वस्त्यांवर वॉर्ड निहाय पायाभूत सुविधांवर शासन भर देत असले तरी या सुविधांची अखंडपणे निगा राखण्यासाठी खर्च येतो.  यासाठी ग्रामपंचायतींनीसुद्धा प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी ग्रामपंचायती स्वतःचे उत्पन्न वाढवून आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत. गाव स्वच्छ राहिले पाहिजे, गावातील नाले, गटारीची स्वच्छता राखली पाहिजे. बाजारपेठांमध्ये स्वच्छता असली पाहिजे. गावे सुशोभीकरण करण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न करावेत यासाठी शासन त्यांना मदत करेल, असेही ते यावेळी म्हणाले.

पेठसह परिसर विकासासाठी सर्वंकष प्रयत्न करणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

नाशिक, दि. १५ (जिमाका वृत्तसेवा) : पेठसह परिसर विकासासाठी सर्वंकष प्रयत्न करण्यात येतील. त्याबरोबरच सर्व विभाग प्रमुखांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवाव्यात, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले.
मंत्री श्री. झिरवाळ यांच्या विशेष प्रयत्नातून उंबरपाडा (माळेगाव) आदिवासी हुतात्मा स्मारक विकास कामे करण्याचे भूमिपूजन आज करण्यात आले. त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत (ता. पेठ) यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात मंत्री श्री. झिरवाळ बोलत होते. यावेळी खासदार भास्करराव भगरे, माळेगावचे सरपंच दिलीप राऊत, माजी आमदार धनराज महाले, भास्कर गावित, भिकाजी चौधरी, दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब शिंदे, तहसीलदार मुकेश कांबळे, पेठच्या तहसीलदार आशा गांगुर्डे, गटविकास अधिकारी जे. टी. सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. झिरवाळ म्हणाले की, पेठ परिसर औद्योगिक विकासाला पूरक आहे. या भागात औद्योगिक विकासाला चालना देण्यात येईल. या भागात पर्यटन विकासाची संधी आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील. या भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी जोगमोडी परिसरात शैक्षणिक संकुल निर्मितीला प्राधान्य देण्यात येईल. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष अभियान राबविण्याच्या सूचना मंत्री श्री. झिरवाळ यांनी केली.
माजी आमदार श्री. महाले, श्री. गावित, श्री. चौधरी, गोपाळ देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.
हरिश्चंद्र देशमुख यांनी प्रास्ताविक केले. देवदत्त चौधरी यांनी परिचय करून दिला. तुषार भदाणे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पेठ पंचायत समितीचे माजी सभापती भिवाजी महाले, सामाजिक कार्यकर्ते विठोबा भोये, रामभाऊ पगारे, यशवंत जाधव, गणपत पवार, मुजफ्फर खान, एकनाथ पाटील आदींचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
०००००

सारस्वती जन्मभू : इंद्रपुरी – अमरावती

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व उत्सव अभिजात मराठीच्या निमित्ताने

दक्षिण हिंदुस्थानातील सर्वात प्राचीन देश म्हणून विदर्भाचे नाव घेण्यात येते. रामायण, महाभारत, रघुवंश आदी प्राचीन ग्रंथांमधून विदर्भाचे संदर्भ येतात. कवी राजशेखरने ‘सारस्वती जन्मभूमी’ म्हणून या भूमीचा उल्लेख केलेला आहे. याच विदर्भाच्या सुवर्णाक्षरांतले एक पान इंद्रपुरीचे आहे. तीच आजची अमरावती!

येथले रिद्धपूर म्हणजे महानुभाव पंथीयांची काशी. या पंथांचे चौथे कृष्ण श्री गोविंद प्रभू यांचे वास्तव्य रिद्धपूरला होते. (१३ वे शतक ) चक्रधर स्वामींची शिष्या महदंबा महानुभाव वाङ्मयात आद्य कवयित्री म्हणून प्रसिद्ध आहे. तिने लिहिलेले धवळे हे एक सुंदर कथागीत महानुभावांच्या मठातून सामुहिकरित्या म्हटले जाते. सुमारे 17 व्या शतकात येथे एक विद्वान ज्योतिषी आणि ग्रंथकार कृष्ण होऊन गेले. त्यांनी काही ग्रंथांची निर्मिती केली बीजगणितावर टीकाग्रंथ लिहून स्वतःचे काही नवे सिद्धांत मांडले.

संत एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेतले विदर्भ कवी म्हणजे देवनाथ महाराज (१७५४ – १८३१). त्यांनी स्थापन केलेला मुख्य मठ अंजनगाव सुर्जी येथे आहे. या मठाचे पीठाधीश देवनाथ महाराज आणि त्यानंतरचे दयाळनाथ महाराज हे आख्यानक कवी होते त्यांनी अनेक प्रसादिक कवितेची निर्मिती केली.

स्वातंत्र्यपूर्व काळात अमरावतीतल्या अनेक लेखकांनी साहित्यक्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला होता. अमरावतीला डेप्युटी कमिशनर या पदावर कार्यरत असलेला (१८५७ – ५८) कर्नल फिलिप मेडोज टेलर या इंग्रज अधिकाऱ्याने ‘ कन्फेशन ऑफ ए ठग ‘ हा ठगांच्या जीवनमानावर खळबळ जनक ग्रंथ लिहिला होता.

पंडित विष्णुपंत पाळेकर यांनी अप्रबुद्ध या टोपण नावाने ‘ब्रम्हर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र’ हा ग्रंथही अमरावतीला वास्तव्याला असतानाच लिहिला होता. (१९२६) मृगेंद्र शंकर स्वामी हे लिंगायत पंथाचे गुरु. कन्नड व मराठी या दोन्ही भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांनी मराठीतून अभंग व पद रचना केली आहे. विविध ज्ञान विस्तार हे महाराष्ट्रातले एके काळचे खूप प्रसिद्ध मासिक होते (१८६७ – १९३७).  फार महत्त्वाचे लेखन म्हणून या मासिकाने अमरावतीच्या बजाबा रामचंद्र प्रधान या लेखकाची नोंद घेतली आहे. रामकृष्ण जठार हे त्यांचे समकालीन लेखक होते. कविता, नाटक आणि भाषांतरे ही मोलाची कामगिरी या दोघांनी करून ठेवली आहे.

अमरावतीच्या सरकारी हायस्कूलमध्ये शिकवून अथवा शिकून पुढे लेखक म्हणून नावारूपास आलेल्या अनेक व्यक्ती होऊन गेल्या. प्रसिद्ध नाटककार विष्णू मोरेश्वर महाजनी, रघुनाथ तळवलकर, श्रीराम जठार, गणेश गोरे, गंगाधरपंत सबनीस हे येथील मुख्याध्यापक/शिक्षक होते. मोरोपंत जोशी, इतिहास संशोधक या. मा. काळे आणि य. खु. देशपांडे,  ज्ञानकोशकार श्री. व्यं. केतकर, कादंबरीकार बा. सं. गडकरी, आ. रा. देशपांडे उर्फ कवी अनिल, बा.ग. खापर्डे हे या शाळेचे विद्यार्थी होते. अनिलांच्या पत्नी कुसुमावती देशपांडे यासुद्धा अमरावतीच्याच.

वरुड येथील वखरे घराण्याने इसवी सन १६३४ पासून पुढे २५० वर्षे हस्तलिखित स्वरूपात सातत्याने लेखन केले आहे. ‘ब्रह्मचर्य हेच जीवन’ या नावाचा खळबळजनक ग्रंथ लिहिणारे स्वामी शिवानंद वरुड तालुक्यात राहायचे. या ग्रंथावरूनच आचार्य अत्रे यांना ‘ब्रह्मचारी’ हे नाटक लिहिण्याचे प्रेरणा झाली असे म्हणतात. येथलेच गणपत देशमुख या कवीला इंग्रज शासनाच्या विरोधात कविता लिहितो म्हणून अटक झाली होती.

 अमरावतीला नाटककार यांचे गाव म्हणतात ते खोटे नाही. महाराष्ट्रातील नामवंत नाट्यसंस्थांचा येथे महिना महिना मुक्काम असायचा. संपूर्ण जिल्ह्यातून मिळेल त्या वाहनाने नाट्यरसिक नाटके बघायला यायची.  वीर वामनराव जोशी, नानासाहेब बामणगावकर, विद्याधर गोखले, बाळकृष्ण मोहरील, नानासाहेब दिघेकर असे अनेक विख्यात नाटककार या भूमीने जन्माला घातले आहेत.

या नाटककारांवर आणि महाराष्ट्रातल्या नाट्यसंस्थांवर दादासाहेब खापर्डे (१८५४ – १९३८) यांचा वरदहस्त होता. लोकमान्य टिळकांचे ते सहकारी होते. त्यांनी पुस्तके लिहिली नसूनही त्यांचा नाट्यक्षेत्रात इतका दबदबा होता की पहिल्या नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष राहिले आहेत (नाशिक, २८ ऑगस्ट १९०५). बालगंधर्वांचे बालपण येथल्या खापर्डे वाड्यात गेले आहे. वीर वामनराव जोशींनी इंग्रज सरकार विरोधात लिहिलेल्या नाटकावर बंदी आली होती. दीनानाथ मंगेशकर यांनी महाराष्ट्रभर त्यांची नाटके गाजवली. विद्याधर गोखले यांनी संगीत नाटकांना जी अवकळा आली होती, त्यांना पुनर्जीवित केले. सुप्रसिद्ध साहित्यिक विश्राम बेडेकर जन्माने अमरावतीचेच. चित्रपट, नाटक आणि साहित्यलेखनातली त्यांची कारकीर्द बहुतेकांना ज्ञात आहे.

अमरावती जिल्हा हा साहित्य आणि संस्कृतीच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर राहिला आहे. कवी कृष्णमूर्ती, गोपाळराव बेडेकर, ना. कृ. दिवाणजी, काकासाहेब सहस्त्रबुद्धे, वि. रा.हंबर्डे, राज सरंजामे, डॉ भगवानराव म्हैसाळकर, मा. ल.  व्यवहारे, पु. य. देशपांडे, कृष्णाबाई खरे.अ. तु. वाळके, जा.दा. राऊळकर, वासुदेवशास्त्री खरे, भाऊसाहेब असनारे, संत गुलाबराव महाराज, संत तुकडोजी महाराज, गीता साने, सुदामजी सावरकर,  विमलाबाई देशपांडे आदींनी आपल्या लेखनकर्तुत्वाने एक काळ गाजवला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज  यांच्या लेखनाची जनमानसावरील पकड आजही कायम आहे. संत गाडगेबाबा यांचे शिक्षण झाले नसले तरीही त्यांच्या नावे आज अमरावती विद्यापीठ स्थापन झाले आहे.  दोन्ही डोळ्यांनी अंध असूनही गुलाबराव महाराजांनी प्रचंड साहित्य संपदा कशी निर्माण करून ठेवली असेल याचा अचंबा वाटतो.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर एक फार मोठी साहित्यिकांची पिढी अमरावती जिल्ह्यात निर्माण झाली. लेखकांचे प्रेरणास्थान डॉ. पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या शिवाजी संस्थेमुळे अनेकांना शिक्षण घेता आले. इथल्या सरकारी विदर्भ महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रातले नामवंत साहित्यिक कार्यरत होते. वि भि कोलते, नातू बाई, शंकर वैद्य, कथाकार शांताराम, रा.ग. जाधव आदी लेखक कवी येथे प्राध्यापक होते. नंतरच्या पिढीतले आपल्या आगळ्यावेगळ्या कवितांनी आणि गद्य लेखनाने एकूण मराठी साहित्यावर आपला स्वतंत्र ठसा उमटवणारे वसंत आबाजी डहाके आणि कवयित्री प्रभा गणोरकर,  लेखिका सुशीला पाटील, समीक्षक विवेक गोखले आणि प्राचार्य विजया डबीर, डॉ मधुकर आष्टीकर यांनीसुद्धा येथे प्राध्यापकी केली आहे. वसंत आबाजी डहाके यांनी नाट्यधर्मी नावाची नाट्यसंस्था स्थापन करून अनेक नाटकांचे प्रयोग केले होते.

सुप्रसिद्ध साहित्यिक ‘धग’ कार उद्धव शेळके, ‘माणूस’ कार मनोहर तल्हार, अभंगकार आणि ललित लेखक मधुकर केचे, कथाकार दे गो उदापुरे, कवी तुळशीराम काजे, प्राचार्य राम शेवाळकर, वऱ्हाडीतून अभंग लिहिणारे शरदचंद्र सिन्हा, कथाकार वामन प्रभू,आणि विख्यात कवी गझलकार सुरेश भट इ. साहित्यिकांचे लेखन चिरंजीवी ठरले आहे.

अमरावतीमध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, वनिता समाज, नगर वाचनालय आणि तपोवन या दोन संस्था आहेत. या दोन्ही संस्थांमध्ये अनेक साहित्य विशेष कार्यक्रम राबवले गेले आहेत. येथून एके काळी रंग आणि धारा नावाचे दर्जेदार मासिके प्रकाशित होत असत. महाराष्ट्रातले अनेक साहित्यिक त्यांत लेखन करीत असत. इथल्या महाराष्ट्र प्रकाशन संस्थेने अनेक थोरामोठ्या साहित्यिकांची पुस्तके प्रकाशित केली आहेत. अमरावतीत आजही अनेक प्रकाशन संस्था कार्यरत आहेत. येथल्या पॉप्युलर बुक डेपोमध्ये महाराष्ट्रातल्या सर्व नामवंत प्रकाशनाची पुस्तके उपलब्ध असतात.

१९७० च्या दशकात अमरावती आणि आजूबाजूच्या परिसरात अनेक साहित्यिकांनी आपले स्थान निर्माण केले आहे. लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. मधुकर वाकोडे, जनसाहित्य ही संकल्पना राबवून अनेकांना आपल्या अक्षर वैदर्भी या मासिकातून लिहिते करणारे डॉ सुभाष सावरकर, अगदी वेगळ्या धाटणीची कविता लिहिणारे देवानंद गोरडे, राजकीय व्यक्ती असल्या तरीही कविता लेखन करणाऱ्या उषाताई चौधरी आणि प्रकाशदादा चौधरी, निसर्गलेखक श्याम देशपांडे, कादंबरीकार डॉ रमेश अंधारे, प्रा. श्याम सोनारे, प्रा. कृष्णा चौधरी, प्रा.माणिक कानेड, केशव बोबडे,  पद्माकर निमदेव, गो ल रडके, गीत गोविंदकार मनोहर कवीश्वर, कवयित्री कविता डवरे इ. साहित्यिकांच्या या पीढीने भरभरून लिहिलेले आहे.  तदनंतरच्या पिढीत इतके साहित्यिक निर्माण झाले आहे की साऱ्यांची नोंद घेणे शक्य नाही.

लेखनाचे सर्व प्रकार हाताळून शंभरावर पुस्तके लिहिणाऱ्या आणि तितकेच पुरस्कार प्राप्त करणाऱ्या डॉ. प्रतिमा इंगोले, अनेक संस्थांचे पदाधिकारी असलेले ग्रामीण कथाकार डॉ. सतीश तराळ, सुप्रसिद्ध समीक्षक डॉ.अक्षयकुमार काळे, भावगर्भ कविता लिहून जनमानसात आपली वेगळी प्रतिमा निर्माण करणारे बबन सराडकर, मराठी साहित्याला अभंगांची अप्रतिम देण देणारे डॉ. सुखदेव ढाणके, कथा आणि ललित लेखिका मुक्ता केचे, विशेष शैलीकार कवी रमेश मगरे, कथा, कादंबरी आणि कविताकार राम देशमुख, तीव्र सामाजिक जाणीवेच्या कविता लिहिणारे प्रा. अशोक थोरात, कथाकार सुरेश आकोटकर आणि कवयित्री डॉ. रेषा, डॉ. कुमार आणि विद्या बोबडे, बहुआयामी लेखन करणारे खडू शिल्पकार डॉ राज यावलीकर, सुप्रसिद्ध कवयित्री डॉ शोभा रोकडे, कवयित्री रजनी राठी, कवी आणि गझलकार विष्णू सोळंके, कवी आणि कथाकार निळकंठ गोपाळ मेंढे, कवी आणि नाट्य अभिनेते तात्या संगेकर आणि अनुराधा संगेकर, नाटककार डॉ. सतीश पावडे, कवी कादंबरीकार मनोहर परिमल, डॉ. नरेश काठोळे, डॉ. मोना चिमोटे, भालचंद्र रेवणे, मयुरा देशमुख, सुरेश शुक्ल, विनोदी लेखक जनार्दन दातार, डॉ. गोविंद कासट, डॉ. सुभाष गवई, डॉ. शोभा गायकवाड, गजानन देशमुख, डॉ. अजय खडसे, अनिल जावळे, पक्षीमित्र आणि निसर्गमित्र प्र सु हिरूरकर इ.

 आज एक तरुण पिढी आपापल्या साहित्यविशेष क्षेत्रात दमदारपणे वाटचाल करीत आहे. डॉ. अशोक पळवेकर, सुनील यावलीकर, गझलकार नितीन भट, गझलकार अनिल जाधव, सौ. सुलभा गोगरकर, प्रीती बनारसे, प्रमोद चोबितकर, अनिल जवंजाळ, संजय खडसे, प्रा. अनिल प्रांजळे, दिगंबर झाडे, विशाल मोहोड, संदीप गावंडे, नितीन देशमुख, पवन नालट, राजेश महल्ले इ.

 येथल्या हिंदुस्थान, जनमाध्यम, मातृभूमी आणि नागपूरहून निघणाऱ्या तमाम मराठी दैनिकांनी लेखकांच्या लेखनाला प्रसिद्धी देऊन साहित्यसेवेचे मोलाचे कार्य केले आहे. काही संस्थामार्फत पुस्तकांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान केले जातात आणि साहित्य संमेलने भरवली जातात. मराठी प्रमाणेच हिंदी आणि उर्दूमध्ये लेखन करणारे बरेच साहित्यिक या मातीत जन्मले, रुजले आणि त्यांनी भरभरून साहित्यसेवा केली आहे. हिंदीमधून आपल्या ग्रंथसंपदाची निर्मिती करणारे भगवान वैद्य ‘प्रखर’ यांनी अनेक मराठी लेखकांच्या साहित्यकृतींचे हिंदी भाषेतून अनुवाद प्रकाशित केले आहेत. तेलगू लेखिका सुजनादेवी आचार्य यांनी सुप्रसिद्ध लेखक जयंत नारळीकर यांच्या एका कादंबरीचा तेलगू भाषेत अनुवाद केला आहे. कविवर्य सुरेश भट यांना उर्दूचे धडे देणारे वली सिद्दीकी हे अमरावतीचेच. साहित्य, संगीत, नाटक अशा विविध सांस्कृतिक क्षेत्रात अमरावती जिल्ह्याने दिलेले योगदान खूप मोठे आहे. त्याचाच हा धावता आढावा!

 

सुरेश आकोटकर,

अमरावती

मो.नं – 9967897975

वाचन संस्कृती वाढविण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक : पालकमंत्री जयकुमार रावल

धुळे, दिनांक 15 फेब्रुवारी, 2025 (जिमाका वृत्त) : सध्याच्या डिजिटील युगामध्ये नागरीकांचा वाचण्याकडे कल कमी होत चाललेला आहे. वाचनाने माणूस समृध्द होत असल्याने ही वाचन संस्कृती वाढविण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणे, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, धुळे, ज्येष्ठांचे टोणगांवकर ग्रंथालय, दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय धुळे ग्रंथोत्सवाचे उद्घाटन दादासाहेब रावल हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, दोंडाईचा येथे आज मान्यवरांच्या उपास्थितीत संपन्न झाले, यावेळी ते दूरदुष्यप्रणालीद्वारे देण्यात आलेल्या आपल्या शुभेच्छा संदेशात बोलत होते. या कार्यक्रमास खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, 5 वे अखिल भारतीय अहिराणी साहित्य समेलनाचे अध्यक्ष सुभाष भामरे, उद्योगपती सरकारसाहेब रावल, माजी नगराध्यक्षा नयनकुंवरजी रावल, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, अपर तहसिलदार संभाजी पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी जगदीश पाटील, खान्देश साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. सदाशिव सुर्यवंशी, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.संजीव गिरासे, ज्येष्ठ शाहीर लोककलावंत श्रावण वाणी, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवार, नाशिक विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ.दत्ता परदेशी, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाहक अनिल सोनवणे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.रावल आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले की, धुळे ग्रंथोत्सव 2024 या कार्यक्रमाचा शुभारंभ आपल्या सगळ्यांचा साक्षीने पहिल्यांदा दोंडाईचा इथे होत आहे. वाचन संस्कृती ही पूर्वीपासून आपल्या देशामध्ये आहे. पूर्वीपासून वाचन, ज्ञान प्राप्त करणं आणि त्याच्या माध्यमातून जीवन जगणं ही भारतामध्ये हजारो वर्षांपासूनची परंपरा राहिलेली आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये आणि विशेषतः आता या मोबाईलच्या युगामध्ये वाचन संस्कृतीकडे लोकांचा कल कमी होत चाललेला आहे. परंतु जो वाचेल, तोच वाचेल या उक्तीप्रमाणे सर्वांनी वाचण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणं, लोकांना प्रोत्साहित करणं, लोकांची व्यवस्था करून देणं ही देखील आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनी वाचनाकडे लहानपणापासूनच लक्ष दिले पाहिजे. त्यांना वाचनासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे असे सांगून ते म्हणाले की, येत्या काळात दोंडाईचा येथे एक मोठं वाचनालय उघडण्याचा प्रयत्न राहील.

खासदार डॉ. शोभा बच्छाव म्हणाल्या की, ग्रंथोत्सव म्हटलं म्हणजे सर्व अभ्यासकांसाठी ही एक पर्वणी असते. या दोन दिवसात याठिकाणी सर्वांना ज्ञानाचं भांडार उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी निश्चितपणे पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. पुस्तकांच्या माध्यमातून निश्चितपणे स्फूर्ती निर्माण होते. त्यामुळे सर्वांनी ऐतिहासिक कथा, कादंबऱ्या, तसेच  विविध साहित्य नियमित वाचले पाहिजे. वाचनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मार्गदर्शन होत असतं त्याचा देखील लाभ आपण निश्चितपणे घेतला पाहिजे. आपल्या ज्ञानातून प्रगल्भता आपल्याला जर वाढवायची असेल तर पुस्तक वाचले पाहिजे.  आज युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढत असतांना त्याला आळा घालायचा असेल तर तो पुस्तकांच्या माध्यमातून, ग्रंथांच्या माध्यमातूनच घालता येईल. ग्रंथाच्या माध्यमातून व्यक्तीमत्त्व विकास होतो, आपल्यात एक आत्मविश्वास निर्माण होतो आणि त्या माध्यमातून निश्चितपणे आपलं जे काही ध्येय आहे ते निश्चित करता येईल, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले की, समाजातील प्रश्न जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियमित वाचन करणे आवश्यक आहे. पुढील काळ अतिशय कठीण आहेत या पुढच्या कठीण दिवसांचा जर सामना करायचा असेल तर विद्यार्थ्यांनी  नियमित वाचन करायला पाहिजे. विद्यार्थ्यांनी पुढील आयुष्यामधील उद्दिष्ट डोळयासमोर ठेवून आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून त्यात पुढे जाणे आवश्यक आहे. याकरीता नियमित वाचनाची सवय लावावी. या ठिकाणी अनेक पुस्तकांचे स्टॉल लावण्यात आले आहे. येथून प्रत्येकाने किमान एक तरी  पुस्तक खरेदी करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

सरकारसाहेब रावल म्हणाले की, ग्रंथामध्ये खुप ताकद असल्याने विद्यार्थ्यांनी नियमित कथा, कांदबरीचे वाचन करणे आवश्यक आहे. त्यांनी यावेळी रामायण, महाभारतासह विविध ग्रंथाचे उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना ग्रंथाचे महत्व समजावून सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष अहिरे म्हणाले की, धार्मिक कुंभमेळा प्रयागराज होत असतांना दोंडाईच्या नगरीत ग्रंथाचा उत्सव होत आहेत. याचे श्रेय पालकमंत्री श्री. रावल यांना जाते. जयकुमार रावल अहिराणी बोलतात, अहिराणी सांगतात आणि अहिराणी जपतात आणि गावाच्या मातीवर काळजापासून प्रेम करतात. म्हणून महाराष्ट्र शासनाचा ग्रंथोत्सव दोंडाईचा येथे घेऊन दोंडाईचा वासीयांसाठी ज्ञानाचे भांडार उपलब्ध करुन दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथाशी मैत्री केली ते घटनाकार झाले, अबु्दल कलाम यांनी ग्रंथाशी मैत्री केली ते देशाचे देशाचे राष्ट्रपती झाले. जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनीही ग्रंथाशी मैत्री केली म्हणून ते जिल्हाधिकारी झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी  ग्रंथाची मैत्री सोडू नका, ग्रंथांसोबत आपले असलेल नाते तोडू नका. ग्रंथ हे माणसाला जगायला, वागायला शिकवतात असेही त्यांनी सांगितले.

यानंतर मान्यवरांच्या हस्ते पुस्तकांच्या स्टॉलचे उद्धटन संपन्न झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनिषा गुजराती तर अविनाश भदाणे यांनी आभार मानले. यावेळी स्वो.नि.संस्था सेक्रेटरी सी.एन.गिरासे, सचिव ललितसिह गिरासे, दादासाहेब रावल नॉलेज सिटीचे प्राचार्य के.डी.गिरासे. डी.आर.बी.ओ.डी.हायस्कुल चे प्राचार्य व्ही.बी. चौधरी, टोणगांवकर ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ.श्रीराम महाजन, गर्ल्स हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यायलयाच्या प्राचार्या एन.डी. गिरासे, यांच्यासह जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिक, लेखक, साहित्यप्रेमी, कवि, कथाकथनकार, नागरीक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रंथोत्सवाचा शुभारंभ ग्रथदिंडीने राणीमॉसाहेब मनुपादेवी राऊळ, गर्ल्स हास्कुल व ज्युनिअर कॉलेज, दोंडाईचा येथुन माजी नगराध्यक्षा ताईसो नयनकुंवरजी रावल यांच्या हस्ते तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथपुजनाने झाला. या ग्रंथदिंडीत विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी टाळ, मृदृगांसह, लेझिम नृत्य सादर केले. ही ग्रंथदिंडी राणीमॉसाहेब मनुपादेवी राऊळ, गर्ल्स हास्कुल व ज्युनिअर कॉलेज, दोंडाईचा येथून शहिद अब्दुल हमीद चौक-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-नगरपालिका मार्गे, दादासाहेब रावल हायस्कुल, दोंडाईचा येथे पोहचली. या ग्रंथदिंडीत विद्यार्थ्यांसह संयोजन समितीचे सदस्य व विविध शाळा, महाविद्यालयांचे शिक्षक, नागरीक, साहित्यप्रेमी, ग्रंथप्रेमी सहभागी झाले होते.

याठिकाणी वाचनप्रेमींसाठी भव्य ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ, साहित्य व वाड्.मय विषयक पुस्तके विक्रीसाठी स्टॉल लावण्यात आले आहे. हा ग्रंथोत्सवात सकाळी 10.00 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामुल्य प्रवेश राहणार आहे. या ग्रंथोत्सवाचा जिल्ह्यातील नागरिक, पत्रकार, विद्यार्थी, ग्रंथप्रेमी व साहित्य रसिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन संयोजन समितीमार्फत करण्यात आले येत आहे.

ग्रंथोत्सवात आज होणारे कार्यक्रम

रविवार, 16 फेब्रुवारी, 2025 रोजी सकाळी 11 ते 12 वाजे दरम्यान ‘खान्देशातील अहिराणी साहित्याची वाटचाल’या विषयावर परिसंवाद कार्यक्रम होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजीव गिरासे, साहित्य समिक्षक डॉ. फुला बागुल, प्राध्यापक डॉ. रमेश माने यांचा सहभाग असणार आहे.

दुपारी 1 ते 2 वाजे दरम्यान ‘कथाकथन’चा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहिराणी कथाकार प्रविण माळी, साहित्यिक सुरेश मोरे यांचा सहभाग असणार आहे. दुपारी 2 ते 4 वाजे दरम्यान क-कवितेचा हा बहुभाषिक कवी संमेलनाचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रभाकर शेळके असतील. ग्रंथोत्सव समारोपाचा कार्यक्रम सायंकाळी 4.30 ते 5.30 वाजता उद्योगपती सरकारसाहेब रावल यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

ताज्या बातम्या

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांत्वन

0
पुणे, दि. २४: ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ स्व. डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाषाण येथील निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. श्री....

पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आपत्ती नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्याचे आदेश

0
हेल्पलाईन क्रमांक प्रदर्शित जनतेला मिळणार अधिकृत माहिती हेल्पलाईन क्रमांक जतन करण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी दि 24 (जिमाका) :- पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्काळ संपर्कासाठी...

रोजगार हमी योजना अधिक प्रभावीपणे राबवा -रोहयो मंत्री भरत गोगावले

0
सिंधुदुर्गनगरी दिनांक २४ (जिमाका) :- रोजगार हमी योजना ही ग्रामीण विकासासाठी एक महत्त्वाची योजना आहे. ग्रामीण भागात ‘रोजगार हमी’ मुळे बदल होत आहेत. या बदलाची गती वाढवण्यासाठी...

शेतीमध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये देणार – कृषीमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे

0
 पुणे, दि.24: शेतकऱ्यांचे जीवन सुरळीत होण्यासाठी, त्यांच्या जीवनात सुटसुटीतपणा आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून गेल्या सहा महिन्यात 50 ते 55 धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. शेतीला प्रोत्साहन म्हणून शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक...

पुढील वर्षी बाल पुस्तक जत्रेत सांस्कृतिक कार्य विभागाचा सहभाग- सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार

0
पुणे, दि. 24:  ‘पुणे बाल पुस्तक जत्रा’ सारख्या उपक्रमातून बालमनावर चांगले संस्कार होत असल्याने पुढील वर्षांपासून बाल पुस्तक जत्रेत सांस्कृतिक कार्य विभागातर्फे विविध सांस्कृतिक...