शनिवार, मे 17, 2025
Home Blog Page 194

छत्रपती शिवाजी महाराजांना विभागीय आयुक्तालयात अभिवादन

अमरावती, दि. १९ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

यावेळी उपायुक्त संतोष कवडे, राजेंद्र फडके, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, तहसीलदार प्रज्ञा काकडे यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

०००

आंतरराष्ट्रीय मुखरोग शल्यचिकित्सक सप्ताह; ११ ते १७ फेब्रुवारी विविध कार्यक्रम संपन्न

मुंबई, दि. १९ : महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिनस्त असलेले शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, मुंबई येथे मुख शल्यचिकित्साशास्त्र विभागामार्फत ११ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी, २०२५ दरम्यान “मुखरोग शल्यचिकित्सक सप्ताह” साजरा करण्यात आला.

मुखरोग शल्यचिकित्सक सप्ताहाच्या अनुषंगाने आरोग्य भवनच्या सभागृहामध्ये ११ फेब्रुवारी, २०२५ रोजी एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले उपस्थित होते. तसेच सहसंचालक (दंत) डॉ. विवेक पाखमोडे, मुख शल्यचिकित्साशास्त्र विषय तज्ज्ञ डॉ. अशोक डबीर, महाराष्ट्र राज्य मुख शल्यचिकित्साशास्त्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण शेनॉय यांच्यासह मुंबई शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. वसुंधरा भड(पाटील) आदी उपस्थित होते.

त्याचप्रमाणे १२ फेब्रुवारी २०२५ रोजी शस्त्रक्रियेदरम्यान देण्यात येणाऱ्‍या टाक्यांचे प्रशिक्षण कार्यशाळा तसेच मुख कर्करोगावरील जनजागृतीसाठी व्हिडिओ आणि पोस्टर बनवण्याच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. १३ फेब्रुवारी २०२५ रोजी विभागाने मरिनड्राईव्हच्या परिसरात मुखकर्करोगाची आणि तंबाखूच्या हानिकारक परिणामांची जनजागृती करण्यासाठी एका वॉकथॉन कार्यक्रमाच्या आयोजनासोबतच माहिती पत्रिकांचे वितरण केले. तसेच १४ ते १७ फेब्रुवारी २०२५ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मुखकर्करोगाची तपासणी व जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत शिबीरामध्ये एक हजार ७७९ रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबीरामध्ये टॅक्सीचालकांचे समुपदेशन करुन तंबाखू सेवनाने होणाऱ्‍या आजारांबाबत माहिती देवून मुख शल्यचिकित्साशास्त्र विषयाच्या राष्ट्रीय परिषदेमार्फत प्राप्त ध्वनीचित्रफित देखील शिबिरादरम्यान प्रदर्शित करुन जनजागृती करण्यात आली.

आंतरराष्ट्रीय मुखरोग शल्यचिकित्सक सप्ताहाचे आयोजन मुंबई शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय संस्थेच्या अधिष्ठाता डॉ. वसुंधरा भड(पाटील) यांच्या मार्गदर्शनाखाली मुख शल्यचिकित्साशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. अभिलाषा यादव यांनी केले होते.

००००

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे अभिवादन

मुंबई, दि. १९ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता तथा मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

सामान्य प्रशासन विभागाचे उप सचिव दिलीप देशपांडे, अपर सचिव सचिन कावळे, सहायक कक्ष अधिकारी नितीन राणे, नितीन बच्छाव, विजय शिंदे यांच्यासह उपस्थित अधिकारी व  कर्मचाऱ्यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

000

शिवजयंती निमित्त राज्यपालांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन

मुंबई, दि. १९ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज उद्यान मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी मुंबईचे उपनगरचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार अनिल देसाई, आमदार सुनिल शिंदे व महेश सावंत, मुंबई महानगर पालिकेचे प्रशासक भूषण गगराणी, राज्यपालांचे प्रधान सचिव डॉ प्रशांत नारनवरे, अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी, तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने क्रीडा भवन येथे आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन सहभागी झाले.

यावेळी बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या संगीत कला अकादमीच्या वतीने शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पाळणा, पोवाडा, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रचलेली शिवरायांची आरती आदी गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.

00000

शिवजयंतीनिमित्त राज्यपालांचे शिवरायांना अभिवादन

मुंबई, दि. १९ :  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज राजभवन मुंबई येथे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, राज्यपालांचे परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिवरायांना अभिवादन केले.

0000

राज्य शासनाच्यावतीने किल्ले संवर्धनाचे काम सातत्याने सुरु- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

पुणे, दि. १९: छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित किल्ले हे आमच्याकरीता मंदिरापेक्षाही मोठे असून त्यांचे  जतन आणि संवर्धनाचे काम राज्य शासनाच्यावतीने सातत्याने सुरु आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार,आमदार शरद सोनवणे, बापूसाहेब पठारे, माजी आमदार अतुल बेनके, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य आशाताई बुचके, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे आदी उपस्थित होते.

शिवजन्मोत्सवाच्यानिमित्त नागरिकांना शुभेच्छा देवून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे योद्धे असण्यासोबतच उत्तम प्रशासक होते. विविध व्यवस्थापनाचे गुरु होते, शिवरायांनी आपले संपूर्ण आयुष्य जनतेच्या कामी लावले म्हणून आदर्श राजा,जाणता राजा, श्रीमंत योगी म्हणून आपण त्यांचे स्मरण करतो.

स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे विविध विकास कामे सुरु आहेत. त्याचप्रमाणे शिवनेरीचाही विकास करण्यात येत आहे. छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून कसल्याही प्रकारची अतिक्रमणे राहणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात येत आहे.

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यातील १२ गड किल्ले  नामांकनासाठी निवडले आहेत. हे गडकिल्ले स्थापत्यशास्त्र, जलसंवर्धन, पर्यावरणशास्त्राचे उत्तम नमुना असून याबाबत पॅरिस येथील होणाऱ्या महासभेत येत्या आठवड्यात सादरीकरण करण्यात येणार आहे. हे गड किल्ले जागतिक वारसास्थळे होतील आणि जगातील लोक ते बघण्याकरीता येतील, अशा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुगल साम्राज्यात विविध राजे, राजवाडे मांडलिकत्व पत्कारत असताना मराठी मुलखात अनाचार, अत्याचार सुरु होते. माँ जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना याविरुद्ध प्रतिकार करुन स्वराज्याकडे नेण्याची जबाबदारी दिली. छत्रपती महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करुन मावळ्यांची फौज तयार केली; यामाध्यमातून देव, देश आणि धर्माची लढाई सुरु करुन स्वराज्य स्थापनेतून खऱ्याअर्थाने भारताचा आत्मभिमान जागृत केला. आजच्या १४० कोटी लोकसंख्येच्या आत्मभिमानी भारताच्या मागे छत्रपती शिवरायांची प्रेरणा असून ते आमचे आराध्य दैवत आहेत.

येत्या ५ वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा ४०० वा शिवजन्मोत्सव साजरा करणार आहोत. किल्ले शिवनेरीवर आल्यानंतर येथील मातीतून स्वराज्याची स्फूर्ती, तेज मिळते. यातून प्रेरणा घेऊन राज्याची सेवा करण्याकरीता आम्ही येथे येतो. राज्यशासनामार्फत शिवनेरी परिसरातील विकासकामे पूर्ण करण्यासाठी आम्ही कार्यरत राहू असे श्री. फडणवीस म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले सुराज्य निर्माण करण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘सर्वसमावेशक कारभार’ डोळ्यासमोर ठेवून काम करण्यात येत असून त्यांना अभिप्रेत असलेले सुराज्य निर्माण करण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध आहे;  लोकल्याणकारी राज्य निर्मितीकरीता यापुढेही प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाचे साक्षीदार असून त्यांनी यामध्ये प्राण फुंकले आहे. हे गड किल्ले अभियांत्रिकी, स्थापत्य शास्त्राचा एक उत्तम नमुना आहे.  याठिकाणी आल्यावर आपल्याला एक वेगळ्याप्रकारची ऊर्जा, प्रेरणा मिळते. म्हणून या गड किल्ल्याची देश विदेशातही लोकप्रियता आहे. त्यामुळे गड किल्ले, जुन्या मंदिरांचे जतन आणि संवर्धनाची कामे करण्यात येत आहे.गड किल्यांवर येणाऱ्या पर्यटकांना सोई-सुविधा उपलब्ध करुन एक सर्किट तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे श्री. शिंदे म्हणाले.

शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती करताना पर्यावरणाचे रक्षण केले. छत्रपती शिवरायांची आरमारी ताकत नौदलाकरीता प्रेरणादायी आहे. नौदलाच्या ध्वजावर शिवप्रतीमेला समाविष्ट केले ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.

भारत पाकिस्तान सीमेवर कुपवाडा, आग्र्याला देखील दिवाण-ए- आम तसेच विविध देशातही शिवाजी महाराजांची जयंती गतवर्षीपासून साजरा करण्यात येत आहे. महाराजाची वाघनखे ब्रिटनहून भारतात आणण्यात आली असून ती बघण्यासाठी नागरिक, विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत आहे.असे ते म्हणाले.

किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी कमी पडून देणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार

छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट, किल्ले खऱ्याअर्थाने त्यांची दौलत आहे, ते आपले शक्तीस्थान, स्फूर्तीस्थान असून त्यांचे जतन, संवर्धन करणे ही राज्य शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे राज्यशासनाच्यावतीने किल्ले शिवनेरी, रायगड, प्रतापगड, सिंहगड, पुरंदर आदी किल्ले परिसरात विविध विकासकामे करीत आहेत, किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित प्रसंग, त्यांनी घेतलेले प्रत्येक निर्णय स्वराज्याचे हित, जनतेचे कल्याण डोळ्यासमोर ठेऊन दूरदृष्टीने निर्णय घेतलेला होता. सामाजिक एकोपा, न्याय, सुशासन आणि लोकल्याणाची शिकवण दिली. त्यामुळे आजच्या शिवजयंतीच्यानिमित्ताने छत्रपती शिवरायांच्या विचारावर निष्ठा ठेवून काम करण्याचा संकल्प करुया, महाराष्ट्राला आणखी महान राष्ट्र करण्यासाठी एकजुटीने, एकदिलाने काम करुया, शिवरायांची शिकवण आणि त्यांच्या विचारांचा वसा पुढे नेताना महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सर्वांनी योगदान द्यावे, हीच खरी शिवजयंतीची प्रचिती ठरेल, असे श्री. पवार म्हणाले.

आमदार श्री. सोनवणे यांनी आपले विचार व्यक्त केले

प्रारंभी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. राष्ट्रगीत तसेच ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताची धून पोलीस बँड पथकाने वाजवून सलामी दिली. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. यावेळी जिल्हा परिषद शाळच्या लहान विद्यार्थ्यांच्या पथकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग सुंदर पद्धतीने सादर केले.

त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बाल शिवाजी व माॅं जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी वाहीली.

यावेळी मुख्यमंत्री यांच्या हस्ते माजी आमदार बाळासाहेब दांगट, डॉ. अमोल डुंबरे, जालिंदर कोरडे आणि राजाभाऊ पायमोडे यांना शिवनेर भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी  गोविंद शिंदे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मुळे यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.

00000

साहित्य संमेलनाध्यक्षांनी मांडलेल्या मराठी भाषाविचारांचा परिचय करून देणारा संदर्भग्रंथ पुस्तक परिचय

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्लीत होत आहेत. या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर विविध ३१ साहित्य संमेलन अध्यक्षांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून मांडलेल्या भाषा विचारांचा चिकित्सक अभ्यास समाविष्ट असलेल्या ग्रंथाचा परिचय करून देत आहेत धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील महाराष्ट्रातील नव्या पिढीचे समीक्षक डॉ फुला बागूल..

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत’ अ.भा. मराठी साहित्य संमेलनांचे मोठे योगदान आहे. या संमेलनांनी ‘मराठीभाषा व साहित्य समृद्धी बरोबरच मराठी भाषकांचे ऐक्य निर्माण करून महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. न्या. रानडे यांच्या अध्यक्षतेखाली १८७८  मध्ये पुणे येथे पहिले ग्रंथकार संमेलन संपन्न झाले. आज या संमेलनांनी शंभरीकडे वाटचाल सुरू केली आहे. भारताची राज‌धानी असलेल्या दिल्ली येथे ९८ मराठी साहित्य संमेलन २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाले संपन्न होत आहे. आपल्या मराठी भाषेला ‘अभिजात मराठी’ हा सन्मान प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन अधिक उत्साहात होत असल्याचे जाणवते.

या साहित्य संमेलनांनी स्वातंत्र्यपूर्वकाळात ‘मराठीभाषासमृद्धी व स्वभाषासरंक्षण’ या जाणिवेतून महत्त्वाचे कार्य केले आहे. १८७८ ते १९४७ या कालखंडात ३१ साहित्य संमेलनाध्यक्षांनी आपल्या अध्यक्षीय भाषणांतून मराठीभाषेच्या जडण-घडणी संदर्भात भाषिक विचार मांडलेत. या विचारांचा चिकित्सक परामर्श  संशोधनाच्या भूमिकेतून प्रा डॉ. प्रभाकर जोशी यांनी त्यांच्या  ‘मराठी साहित्य संमेलन आणि भाषाविचार’ या ग्रंथात  घेतला आहे. पुणे येथील स्नेहवर्धन प्रकाशन यांनी हा  ग्रंथ अमळनेर येथे झालेल्या ९७ व्या मराठी साहित्य संमेलनात अध्यक्ष प्रा.डॉ. रविंद्र शोभणे व मान्यवरांच्या शुभहस्ते प्रकाशित केला.

स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांचे राज्य होते. त्यांनी राज्यव्यवहार, शिक्षण क्षेत्रातील भाषिक व्यवहार  इंग्रजीतून सक्तीने सुरु केला. मुंबई विद्यापीठात शिक्षणाचे माध्यम इंग्रजीच होते. संस्कृत व मराठी भाषेचा, परिचय इंग्रजीतूनच होत होता. मराठी भाषेला दुय्यम स्थान मिळाले होते. इंग्रजी मिश्रित मराठी सर्वत्र रूढ झाली. त्याच काळात विविध  संमेलनाध्यक्षांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून भाषा रक्षणाचे व  संवर्धनाचे विचार मांडले. या सर्वांनी मराठी भाषेचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक आपल्या अध्यक्षीय भाषणातून भाषिक विचार मांडलेत. या भाषिक विचारात मराठी प्रमाणभाषा, शुद्धलेखन, व्याकरणविचार, भाषाशुद्धीची चळवळ, प्राथमिक, माध्यमिक उच्च शिक्षणाचे माध्यम, मराठीभाषा, मराठीसाठी स्वतंत्र विद्यापीठ, शासनव्यवहारात मराठीचा वापर, परिभाषेची आवश्यकता, लिपीसुधारणा, भाषावार प्रांत रचनेच्या मागणीतून मराठी भाषकांसाठी महाराष्ट्र प्रांतरचना, मराठीचे अभिजात भाषा म्हणून असलेले वैभव इत्यादी प्रश्नांच्या संदर्भातील  विचार आपल्या अध्यक्षीय भाषणांतून विविध संमेलनाध्यक्षांनी  जे  थोर साहित्यिकही होते , त्यांनी मांडले आहेत. या लेखकांमध्ये ह. ना आपटे, माधवराव पटवर्धन, न. चिं. केळकर, श्री. कृ.कोल्हटकर, शि.म. परांजपे, वा.म.जोशी, सयाजीराव गायकवाड, भवानराव पंत प्रतिनिधी, श्री.व्यं.केतकर, वि. दा. सावरकर, द.वा. पोतदार, ना.सी.फडके, वि.स. खांडेकर, प्र.के.अत्रे, न र फाटक, ग.त्र्यं. माडखोलकर इत्यादी प्रसिद्ध साहित्यिकांचा समावेश आहे. त्या काळात महाराष्ट्र एकसंघ नव्हता . मराठी भाषकांना एकत्र आणून त्यांच्यात ‘भावनिक ऐक्य’ निर्माण करण्याचे कार्य या संमेलनाच्या माध्यमातून झालेल्या भाषिकमंथनाने केल्याचा निष्कर्ष प्रस्तुत ग्रंथातून अभ्यासपूर्ण  पद्धतीने मांडलेला आहे. अध्यक्षांच्या या भाषिक विचारांची फलश्रुती म्हणजे ‘मराठी भाषकांसाठी स्वतंत्र पुणे विद्यापीठाची स्थापना, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, शिक्षणाचे माध्यम मराठी, शासनव्यवहारात मराठी होय.  १८७८ ते १९४७ या ७० वर्षाच्या कालखंडात ३१ संमेलनाध्यक्षांनी मराठी भाषिक प्रश्नांच्या संदर्भात केलेल्या विचारमंथनाचे साधार विवेचन या ग्रंथात लेखकाने केले आहे. स्वातंत्र्यपूर्वकालीन भाषिक प्रश्नांची शास्त्रशुद्ध मांडणी प्रस्तूत ग्रंथात असल्यामुळे तत्कालीन भाषिक जडणघडणीच्या अभ्यासासाठी प्रस्तुत ग्रंथ मार्गदर्शक ठरतो.

 मराठी साहित्य संमेलन आणि भाषा विचार(१८७८ ते १९४७) प्रा .डॉ प्रभाकर ज. जोशी, स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे

पुस्तक परिचय

प्रा.डॉ.फुला बागुल, साहित्य समिक्षक, शिरपूर, धुळे

मो 982 2934874 /9420605208

0000

छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आजही दिशादर्शक- पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि.१९ (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराज भुत, भविष्य आणि वर्तमान बदलणारे दैवत, अद्भूत शक्ती होते. त्यांनी ३५० वर्षापूर्वी राबविलेली निती, धोरणे आजच्या काळातही आम्हा सगळ्यांसाठी दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

शिव जयंतीनिमित्त प्रशासनाच्यावतीने ‘जय छत्रपती शिवाजी – जय भारत’ पदयात्रेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते. यात्रेच्या शुभारंभाप्रसंगी पालकमंत्री श्री.राठोड बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड आदी उपस्थित होते.

महाराजांचे कार्य, शौर्य, सामाजिकता, त्यांनी त्या काळात राबविलेली ध्येय, धोरणे युवा पिढीला समजावी यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने संपुर्ण भारतभर जय छत्रपती शिवाजी – जय भारत पदयात्रा उपक्रम राबविण्यात येत आहे. महाराजांनी त्या काळात स्वराज्य निर्मितीसाठी वापरलेले कौशल्य आजही तितकेच महत्वाचे आहे. राज्याच्या, समाजाच्या विकासासाठी महाराजांच्या कामाचे अनुकरण दिशादर्शक आहे, असे पुढे बोलतांना पालकमंत्री म्हणाले.

महाराजांचे कार्य डोळ्यासमोर ठेऊन सुराज्य उभे करण्याचा प्रयत्न राज्यात केला जात आहे. महाराजांनी दाखविलेल्या मार्गावर आपण सगळे मार्गक्रमन करीत आहोत. भारत युवकांचा देश आहे. देशाच्या विकासात युवकांचे महत्वाचे योगदान लाभणार आहे. त्यामुळे युवकांना महाराजांचे कार्य अवगत होणे फार आवश्यक आहे. पदयात्रेच्या निमित्ताने शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना महाराज समजून घेता येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी राज्यातील संपुर्ण ३६ जिल्ह्यांमध्ये पदयात्रा काढण्यात आली आहे. महाराजांचे कार्य यातून युवा पिढीला समजेल असे सांगितले. डॅा.ताराचंद कंठाळे यांनी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारे व्याख्यान दिले. शिवाजी महाराज आदर्श राजा होते. वेगवेगळ्या लोकांना सोबत घेऊन कल्याणाचे काम त्यांनी केले. स्त्रीयांचा अवमान होणार नाही, याची त्यांनी काळजी घेतली. स्त्रीयांसाठी स्वतंत्र खाते त्यांनी त्यावेळी केले होते. अस्पृश्यता निवारण, सामाजिक समरसता यासाठी देखील महाराजांचे कार्य होते, असे डॅा.कंठाळे यांनी सांगितले

सुरुवातीस पालकमंत्र्यांसह सर्व मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून त्यांना अभिवादन केले. त्यानंतर पदयात्रेला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. पालकमंत्री पदयात्रेत देखील सहभागी झाले होते. पदयात्रेत विविध शाळेच्या विद्यार्थ्यांच्या पथकांनी ढोलताशा, लेझिम, पांरपारिक वेषभूषा, सांस्कृतिक कार्यक्रम, मल्लखांब, पारंपारिक व ऐतिहासिक बाबींचे सादरीकरण केले. शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरून जिल्हा क्रीडा संकुल येथे रॅलीचा समारोप झाला.

0000

मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे…

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आणि जेष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिन जगात मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेचे स्मरण करत असताना मराठीतील कितीतरी चांगले शब्द काळाच्या ओघात लोप पावले आहेत असे शब्द हुडकून बोली भाषेत त्याचा सर्वांनी वापर केला पाहिजे, केवळ मराठी दिनाच्या निमित्ताने मराठीबद्दल बोलून तिला घासून लख्ख करण्यापेक्षा दरवेळी मराठीच्या अस्तित्वासाठी आपण सर्वांनी झटले पाहिजे. भ्रमणध्वनीवर सध्या मराठी भाषेचे विविध ‘अ‍ॅप्स’ही आले आहेत अशा तंत्रज्ञानाचा स्पर्श मराठीला झाला असला तरी तिचा वापर राजभाषा, ज्ञानभाषा आणि व्यवहाराची भाषा म्हणून वाढला पाहिजे, अन्यथा इतर भाषांच्या आक्रमणात अमृताची भाषा मागे पडेल.अशी भीती मला वाटते .

मराठी भाषेची खरी घसरण सुरू झाली ती १९९१च्या आसपास. मराठी मंडळींनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालायला सुरुवात केली. इंग्रजी भाषेला विरोध करण्याचे कारण नाही. ती जगाची भाषा आहे आणि ती न येऊन चालणारे नाही, हे खरे असले तरी काळाच्या ओघात इंग्रजी भाषाच श्रेष्ठ असे जे अवडंबर माजवले गेले, तिथे मराठीचा ऱ्हास सुरू झाला.

आपला देश बहुसांस्कृतिक असून प्रत्येक मैलागणिक भाषा बदलते आणि म्हणूनच बहुभाषेच्या आधाराने भाषा टिकते आणि विकसित होते. मराठी ही ओळख टिकवणे आपले कर्तव्यच आहे. मराठी ही केवळ साहित्य भाषा म्हणून त्याकडे पाहून चालणार नाही. ती संस्कारभाषा, ज्ञानभाषा आणि व्यवहारभाषा होणे गरजेची आहे. नवे ज्ञानविज्ञान मराठी माध्यमातून सुलभपणे येण्यासाठी भाषा तज्ज्ञां कडून विश्वसनीय आणि प्रमाणभूत साधने उपलब्ध झाली पाहिजे.

अद्ययावत ज्ञाननिर्मितीच्या कामात सहज सुलभपणे उपलब्ध होणारी ज्ञानभाषा म्हणून मराठीची वाढ झाली पाहिजे. ज्ञानविज्ञान, तत्त्वज्ञान आणि कला यांच्यातील संशोधन मराठीतून उपलब्ध होणे गरजेचे आहे. विखुरलेल्या मराठी समाजाला मराठीच्या माध्यमातून जोडून घेत या सर्व समाजाचे भाषाज्ञान वाढवणे आवश्यक आहे. मराठी भाषेला सक्षम करण्यासाठी आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी आपण सर्व मराठी जणांनी आणि महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला व केंद्र शासनाने अभिजात दर्जा देऊन त्यावर मोहोर अमटवली आता आपण सर्वजण मराठी भाषा वृध्दींगत करण्यासाठी कसोसीने प्रयत्न करूया.

संस्कृत नंतर सर्व भाषांत मराठी भाषा अधिक सात्त्विक आहे. प्रायोगिक स्तरावर प्रत्येकाने तिचे वैभव टिकवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत,  ‘माय मराठी’ला तिचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मराठी भाषिकांनी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपण दृढ निश्चय करूया आणि संघटितपणे ‘मराठी’चे रक्षण तसेच संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करूया !  आणि प्रत्येक मराठी माणसांनी आजच्या मराठी दिनी ठरवलं पाहिजे की माझी मराठी ही माझी जबाबदारी नाही का ? महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे. मराठी ही राजमान्य, लोकमान्य राज्यभाषा झाल्याला आता अनेक वर्ष होऊन गेले, तरी महाराष्ट्रातही मराठीला योग्य स्थान नाही. हे मनातील शल्य व्यक्त करताना कवी कुसुमाग्रज असे म्हणतात, ” महाराष्ट्राच्या राजधानीत मंत्रालयासमोर मराठी भाषा, डोक्यावर राज्य मान्यतेचा सोनेरी मुकुट घालून उभी आहे. परंतु तिच्या अंगावरचे वस्त्र फाटके आहेत.” मराठीचे स्वतःचे राज्य असावे, मराठीला राजभाषेचा मान मिळावा म्हणून वर्षानुवर्षे हजारो मराठी सुपुत्रांनी धडपड केली, संघर्ष केले. प्रसंगी बलिदान ही केले.

प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे, चिं. वि. जोशी, ग. दि. माडगूळकर, वि. स. खांडेकर, ना. सि. फडके, साने गुरुजी यांच्या सारख्या साहित्यिकांनी मराठीत आपल्या साहित्याची भर घालून मराठी भाषा मराठी माणसाच्या मनामनात जागृत ठेवली.आज सामाजिकशास्त्रे, तत्त्वज्ञान, चित्रकला, साहित्य, संगीत, नाटक यासारख्या कलांचे समीक्षा-विचार मराठीत मूळ धरू लागले आहेत. तर एकीकडे इंग्रजीच्या वाढत्या आक्रमणाने मूळ मराठी भाषाच बदलत चालली आहे.

दैनंदिन बोली भाषेतून मराठीचे संवर्धन करणे, मराठीचे सौंर्दय, खानदानीपणा टिकवून ठेवणे हे प्रत्येक मराठी भाषकाचे कर्तव्य आहे.

मायमराठीचा जयजयकार असो’ म्हणा, ‘गर्व से कहो हम मराठी है’ म्हणा किंवा ‘वुई वॉन्ट मराठी’ म्हणा… आपल्यातली मराठीपणाची ज्योत तेवत ठेवणं महत्त्वाचं आहे. भाषा आणि संस्कृतीची स्पंदनं प्रथम मनात उमटतात, नंतर ती उच्चारांतून आणि कृतीतून प्रकटतात. केवळ दिखाऊ पणासाठी मराठीचं प्रेम नको, आंतरिक जाणीवांतून ते प्रकट होत राहिलं, तर भाषा आणि संस्कृती कधीच मरत नाही.असे मला वाटते.

आपली स्वाक्षरी मराठीतून करा ! ‘गुड मॉर्निंग’च्या ठिकाणी ‘शुभ प्रभात’ म्हणा ! मुलांना ‘मम्मी-डॅडी’ नको, तर ‘आई-बाबा’ म्हणायला शिकवा !  दूरभाषवर बोलतांना ‘हॅलो’ म्हणण्यापेक्षा ‘नमस्कार’ म्हणून बोलण्यास प्रारंभ करा ! सणाच्या शुभेच्छा मराठीतून द्या, उदा. ‘हॅपी दिवाली’च्या ठिकाणी ‘शुभ दीपावली’ म्हणा ! मुलांना ‘हॅरी पॉटर’ वाचायला न देता ‘पंचतंत्रा’तील कथा आणि साने गुरुजी यांची पुस्तके वाचायला द्या ! दारावर पाटी मराठीतून लावा ! ‘नावात इंग्रजी अक्षरांनी आद्याक्षरे न लिहिता, मराठी (मातृभाषेतील) आद्याक्षरे वापरा. हे काम आपण शाळांमधून करू शकत नाही का ?  म्हणजेच माझी मराठी ही माझी जबाबदरी नाही का ? मराठी ही निव्वळ भाषाच नाही तर ती एक संस्कृती आहे.

मराठी भाषेचा इतिहास खूप आधीपासून म्हणजेच अगदी राष्ट्रकुट राजापासून अस्तित्वात आहे. मराठी भाषा लवचिक आहे. थोड्या‌ थोड्या फरकाने शब्दांचे अर्थ बदलतात. मुंबईची मराठी भाषा। हल्ली खिचडी भाषा झाली आहे. शुद्ध मराठी राहिली नाही. तिच्यात हिंदी, मराठी, इंग्रजी यांची भेसळ झाली आहे. हिंदी आणि इंग्रजी सिनेमा पाहून भाषा अशी झाली आहे. पूर्वी मराठीला मान नव्हता, पण आता काही प्रमाणात आहे. आणि आता केंद्र शासनाने आपल्या मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे, त्यामुळे भाषा संवर्धनाचे मोठे काम यापुढे होणार यात शंका नाही. परंतु आपण सर्व मराठी भाषकांनी एकत्रीत येऊन मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करूया!

‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ !

‘जाहले खरेच धन्य ऐकतो मराठी’।।

 

पद्माकर मा कुलकर्णी

अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा जुळे सोलापूर.

सारस्वती जन्मभू : आदिपर्व

दक्षिण हिंदुस्थानातील सर्वात प्राचीन देश म्हणून विदर्भाचे नाव घेण्यात येते. रामायण, महाभारत, रघुवंश आदी प्राचीन ग्रंथांमधून विदर्भाचे संदर्भ येतात. कवी राजशेखरने ‘सारस्वती जन्मभू’ म्हणून या भूमीला प्रशस्तिपत्र बहाल केले आहे. मराठी भाषेची जननी म्हणूनही तिचा उल्लेख करण्यात येतो.

काळ कुणासाठी थांबत नाही. गतकाळाची पुनरावृत्तीही होत नाही. या काळाच्या विशाल पडद्यावर अनेक ऋषिमुनी आणि लेखक कवी आपल्या शब्दांची अक्षरनोंद ठेवून व आपले अस्तित्व चिरंजीव करून पडद्याआड निघून जातात. वाचकांच्या हाती उरतो तो या आठवणीतील अक्षरांचा अमोल ठेवा… विदर्भाच्या सुवर्णाक्षरांतले एक पान इंद्रपुरीचे आहे. एके काळची संपन्न आणि विख्यात नगरी म्हणजे इंद्रपुरी म्हणजेच अमरावती. तिच्या प्राचीनतेच्या खुणा आज जागोजागी आढळतात. ऋग्वेदातील काही सूक्तांचा द्रष्टा आणि आर्यपुरुष अगस्ती ऋषी यांची पत्नी विदर्भ राजकन्या लोपामुद्रा, नळराजाची राणी दमयंती, श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी आणि दशरथ राजाची आई इंदुमती येथल्याच मातीत जन्मल्या. या चारही विदर्भकन्यांचा इतिहास अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर तहसीलीतील ‘कौडिण्यपूर’ या एकेकाळच्या विदर्भाच्या राजधानीच्या नावाने जगाला ज्ञात आहे.

सालबर्डी

याच जिल्ह्यात सातपुडा पर्वताच्या रम्य कुशीत सालबर्डी वसली आहे. येथे वाल्मिकी ऋषींचा आश्रम होता. सीता इथेच आश्रयाला होती. लव-कुश ह्याच ठिकाणी वाढले अणि राम-सीतेचे पुनर्मिलन येथेच झाले, अशी आख्यायिका आहे. श्री चक्रधरस्वामींनीही येथेच तप केले होते.

येथले रिद्धपूर म्हणजे महानुभावपंथीयांची काशी. या पंथाचे चौथे कृष्ण श्री गोविंद प्रभू यांचे वास्तव्य रिद्धपूरला होते. त्यांच्याकडून चक्रधर स्वामींनी ज्ञान प्राप्त केले आणि महानुभाव पंथ पुरस्कृत केला. (तेरावे शतक) अनेक पुरोगामी तत्त्वांची बांधिलकी स्वीकारलेला हा पंथ येथूनच पुढे भारतभर पसरला. चक्रधरस्वामींची शिष्या महदंबा महानुभाव वाङ्मयात आद्य कवयित्री म्हणून प्रसिद्ध आहे. तिचा चक्रधरांच्या स्तुतीपर लिहिलेला अभंग लीळाचरित्रात आहे. तद्वतच ‘धवळे’ हे तिचे एक सुंदर कथागीत असून गेयता हे त्याचे वैशिष्ट्य आहे. आजही महानुभावांच्या मठातून हे धवळे सामूहिकरित्या म्हटले जाते. देश-विदेशातील संशोधक आजही रिद्धपूरला येत असतात.

 राजज्योतिषी कृष्ण:

या भूमीत अंदाजे सतराव्या शतकात एक प्रसिद्ध ज्योतिष घराणे होऊन गेले. या घराण्यातला विद्वान ज्योतिषी आणि ग्रंथकार कृष्ण याने काही ग्रंथांची निर्मिती केली. बीजगणितावर टीकाग्रंथ लिहून स्वतःचे काही नवे सिद्धांत मांडले. त्यावेळचा राजा जहांगीर याने त्याला आपल्या दरबारात राजज्योतिषी म्हणून मानाचे स्थान दिले.

सुर्जी-अंजनगाव

साहित्याचा अभिजात वारसा मिळालेले एक गाव सुर्जी अंजनगाव. संत एकनाथ महाराजांच्या शिष्यपरंपरेतले विदर्भकवी श्री देवनाथ महाराज (इ.स. १७५४-१८३१) हे अंजनगावचेच. श्री. राजेश्वरपंत कमाविसदार यांच्या कुळात सुर्जी येथे ‘देवराज’ जन्माला आले. त्यांना कुस्त्यांचा भारी शौक. ‘निरुद्योगी’ म्हणून घरी आईशी व मोठ्या बंधूशी भांडण झाले. त्यामुळे ते सुर्जीच्या हनुमान मंदिरात गेले आणि ध्यान लावले. योगायोगाने या २७ वर्षांच्या ब्रह्मचारी देवरावांची संत एकनाथांच्या संप्रदायातील तेरावे पुरुष श्री गोविंदनाथ यांच्याशी गाठ पडली. गोविंदनाथांनी त्यांच्यावर अनुग्रह केला.

आणि त्यांचे ‘देवनाथ’ हे सांप्रदायिक नाव ठेवले. तेव्हापासून त्यांचा काव्यप्रवास आणि कीर्तने यांना प्रारंभ झाला. या निमित्ताने ते भारतभर फिरले. संत नामदेव महाराजानंतर पंजाबात जाऊन समाजप्रबोधनाचे कार्य श्री देवनाथांनीच केले. अनेक ठिकाणी आपले मठ स्थापन केले. आज मुख्य मठ सुर्जीला आहे.

श्री देवनाथ महाराज या मुख्य पीठावर विराजमान झाले. त्यांच्यानंतरचे पीठाधीश श्री दयाळनाथ महाराज हेही श्रेष्ठ प्रतीचे आख्यानक कवी होते. त्यानंतरच्याही पीठाधीशांनी काव्यरचना केल्या. श्री देवनाथ व श्री दयाळनाथ यांची कविता प्रासादिक आहे. द्रौपदीचा कृष्णासाठीचा धावा दयाळनाथ या शब्दांत बद्ध करतात- ‘ये धावत कृष्णा बाई अति कनवाळे निज जन मन सर समराळे.’ हृदय हेलावून टाकणारी अशी ही रचना आहे. श्री दयाळनाथांचे निधन वयाच्या ४८ व्या वर्षी (इ.स.१८३६) हैद्राबाद येथे झाले. श्री देवनाथांच्या निधनाची कथा मात्र मती गुंग करून टाकणारी आहे. रामनवमीच्या निमित्ताने ग्वाल्हेरला ते कीर्तन करण्यासाठी गेले. अपार गर्दीत त्यांनी कीर्तन सुरू केले. एवढ्यात मंडपाला आग लागली. शेकडो लोक मारले गेले. देवनाथ महाराज बाहेर पडणार तोच कुणीतरी त्यांना कुत्सितपणे म्हणाले, ‘नैन छिन्दती शस्त्राणी, नैन दहती पावक.’ हे ऐकून देवनाथांनी त्या इसमाला घट्ट पकडून ठेवले आणि त्याच्यासोबतच ते अग्निदेवतेच्या स्वाधीन झाले. श्री देवनाथांची समाधी ग्वाल्हेरला आहे अन् त्यांनी स्थापित केलेला मठही तेथे आहे.

अमरावती : काही वेधक नोंदी

अमरावती हे नाटककारांचे गाव आहे, तसेच ते नाट्यवेड्यांचे गाव आहे. नामवंत कंपनींची नाटके अमरावतीला आली की ती पाहण्यासाठी दूरदूरून नाटकांचे रसिक येत. छकडा, पायटांगी व सायकल ही त्यावेळची वाहने. काही श्रीमंत व्यक्ती घोडा वा घोडागाडी वापरत. जमेल त्या वाहनाने माणसे येत. रात्रभर नाटकांचा आस्वाद घेत. त्या काळची नाटकंही ‘रात्रीचा समय सरूनी येत उषःकाल हा…’ अशा स्वरूपाची असत.

अमरावती लेखक-कवींचेही गाव आहे. या शहराने महाराष्ट्राला ‘साहित्य-सोनियाच्या खाणी’ दिल्या आहेत. मराठी कवितेला मुक्तछंद देणारे कवी अनिल येथेच शिकले. कुसुमावती देशपांडेही येथल्याच. कुसुमावतींचे वडील जयवंत कविता लिहीत. शालेय जीवनापासूनच कुसुमावती येथल्या साहित्य विशेष आणि सांस्कृतिक कार्यक्रमात हिरिरीने भाग घेत. ‘कुसुमानिल’ यांचे प्रेम येथेच फुलले.

बेडेकर इथलेच

विश्राम बेडेकर यांचा जन्म अमरावतीचाच. त्यांची नाटक व चित्रपटातील कामगिरी सर्वांना परिचित आहे. ‘ब्रह्मकुमारी’ हे त्यांचे पहिले नाटक दि.१५/६/१९३३ रोजी रंगभूमीवर आले. (संगीत- मास्टर दीनानाथ) त्यानंतर त्यांनी मोजकेच लेखन केले. त्यांच्या वास्तव्यातली अमरावती, विदर्भ महाविद्यालय, मित्रमंडळी आणि येथे भोगलेले दारिद्र्य… या साऱ्या आठवणी त्यांनी आपल्या आत्मचरित्र ग्रंथातून (एक झाड दोन पक्षी) मांडल्या आहेत. बेडेकरांचे वडील रेल्वे स्टेशन परिसरातील आळशी राममंदिराचे पुजारी होते.

कवी कृष्णमूर्ती, गोपाळराव बेडेकर, बा. सं. गडकरी, ना. कृ. दिवाणजी, दादासाहेब आसरकर, डॉ. श्री. व्यं. केतकर, काकासाहेब सहस्रबुद्धे. वि. रा. हंबर्डे, रा. द. सरंजामे, डॉ. भवानराव म्हैसाळकर, मा. ल. व्यवहारे, पु. य. देशपांडे, खापर्डे बंधू, वीर वामनराव जोशी, नानासाहेब बामणगावकर, कृष्णाबाई खरे, अ. तु. वाळके, जा. दा. राऊळकर, वासुदेवशास्त्री खरे, तात्यासाहेब सबनीस, भाऊसाहेब असनारे, अप्रबुद्ध, संत गुलाबराव महाराज, संत तुकडोजी महाराज, गीता साने, सुदामजी सावरकर, विमलाबाई देशपांडे आदींनी आपल्या लेखनकर्तृत्वाने आपला काळ गाजवला आहे. संत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, श्लोक, अभंग आणि इतर लेखन यांची जनमानसावरील पकड आजही कायम आहे. त्यांचे एकूणच लेखन चिरंजीवी ठरले आहे.

वाचता वाचता

जुन्या लेखनकर्तृत्वाचा धांडोळा घेताना काही संस्मरणे वाचनात आली.

सुप्रसिद्ध कादंबरीकार बाळकृष्ण संतुराम गडकरी, यवतमाळचे यशवंत खुशाल देशपांडे आणि डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर हे तिघेही जिवाभावाचे मित्र होते. ते एकाच शाळेत शिकत. नगर वाचनालयात ग्रंथवाचन करीत आणि मराठी वाङ्‌मयावर चर्चा घडवत.

सुप्रसिद्ध कादंबरीकार गीता साने अमरावतीतली १९२६ मध्ये प्रथम श्रेणीत मॅट्रिक होणारी पहिली मुलगी. सायन्स कॉलेजचीही पहिली विद्यार्थिनी. लग्नानंतर आडनाव न बदलविणारी पहिली मराठी लेखिका ! उत्तर प्रदेश व बिहारमध्ये स्त्री-शिक्षणाचा प्रसार करणारी पहिली विदर्भकन्या !

कवी गणपतराव देशमुख हे स्वामी शिवानंद नावाने ओळखले जायचे. अमरावती नगरपालिकेत ते लिपिक होते. इंग्रज अधिकाऱ्यांविरुद्ध कविता रचल्यामुळे १९०७ साली त्यांना सात वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा फर्मावली होती. परंतु पुढे वऱ्हाडात पाय ठेवू नये, या अटीवर त्यांना मुक्त करण्यात आले. कविता लेखनामुळे तुरुंगात जाणारा हा पहिलाच वैदर्भीय कवी असावा.

डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी लेखन केले नसले तरी ते अनेक लेखकांचे प्रेरणास्थान होते. डॉ. वि. भि. कोलते यांनी आपल्या आत्मचरित्रात (अजूनि चालतोचि वाट) भाऊसाहेबांच्या अनंत उपकारांचे स्मरण मोठ्या हृद्यतेने केले आहे. भाऊसाहेबांबद्दल एक विशेष माहिती मिळाली. त्यांना स्वतःचे नाव इंग्रजीत Panjab ऐवजी Punjab लिहिणे योग्य वाटत नसे. कुणी असे लिहिल्याचे लक्षात आले की ते नावातल्या ‘यू’ अक्षराचा ‘ए’ करीत.

सुप्रसिद्ध नट-दिग्दर्शक गजानन जागिरदार अमरावतीलाच चौथीपर्यंत शिकले. सुप्रसिद्ध नाटककार जयराम केशव ऊर्फ भाऊसाहेब असनारे यांनी आपले आयुष्य संगीत नाटकांना वाहून टाकले. आजही असनारे घराण्याची आजची पिढी संगीत, वादन आणि गायन या क्षेत्रात नाव मिळवित आहे. परंतु आज हे कुटुंब सांगलीला स्थायिक झाले आहे.

दादासाहेब खापर्डे ह्यांनी हिराबाई बडोदेकरांना ‘गानकोकिळा’ पदवी अमरावतीलाच प्रदान केली होती.

पूर्वी राजकमल चौकात ‘महाराष्ट्र प्रकाशन’ या नावाची सुप्रसिद्ध प्रकाशन संस्था होती. या प्रकाशनाने आचार्य अत्रे, गो. नी. दांडेकर, जयवंत दळवी इ. नामवंत लेखकांची काही पुस्तके एका काळात प्रकाशित केली होती. कादंबरीकार ह. ना. आपटे यांनी ‘जयध्वज’ नावाचे नाटक लिहून त्याचा पहिला प्रयोग १९०५ च्या सुमारास अमरावतीला केला होता. विख्यात लेखक रा. भि. जोशी हे अमरावतीला शिकले आणि काही वर्षे अमरावतीच्या डेप्युटी कमिशनरच्या ऑफिसात नकलनवीस म्हणून काम केले. ह.भ.प. ल. रा. पांगारकर हे काही काळ अमरावतीला शिक्षक होते. डॉ. श्री. व्य. केतकर हे त्यांचे विद्यार्थी. अमरावतीच्या एके काळच्या साहित्य आणि सांस्कृतिक जीवनाचा हा धावता आढावा.

लेखक सुरेश अकोटकर (भावचित्रे )

अमरावती

ताज्या बातम्या

अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे काम १५ जुलैपर्यंत पूर्ण करा – पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सार्वजनिक बांधकाम...

0
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर विद्यापीठास भेट देऊन स्मारकाचा घेतला आढावा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवासाठी ५० लाखांचा निधी जाहीर सोलापूर, दि. 16- पुण्यश्लोक...

आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी एक टीम म्हणून कर्तव्यभावनेने काम करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्न ठाणे,दि.16(जिमाका):- आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी एक टीम म्हणून कर्तव्यभावनेने काम करावे. जनतेच्या हिताच्या कामांसाठी...

‘भारत माता की जय’च्या गजरात दुमदुमली कामठी नगरी – ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर कामठीत तिरंगा...

0
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सहभाग; तिरंगा यात्रेत हजारो लोकांची गर्दी नागपूर  दि. 16 : पाकिस्तान विरोधातील 'ऑपरेशन सिंदूर' च्या यशानंतर भारतीय लष्कराचे आभार आणि त्यांच्या सन्मानार्थ नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे...

पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई करणार –  महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
महसूल विभागाच्या अखत्यारित असलेल्या नाल्यांवरील अतिक्रमणांबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय नागपूर,दि. 16 : शेतकऱ्यांना वेळेवर मदत व्हावी, त्यांना आर्थिक अडचणीतून मार्ग मिळावा या उदात्त दृष्टीकोनातून शासनाने पीककर्ज...

बळीराजाच्या कल्याणासाठी शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच लोकप्रतिनिधींनीही एकत्रित पुढाकार घ्यावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न ठाणे,दि.16(जिमाका):- बळीराजा हा आपल्या सर्वांचा अन्नदाता आहे. त्याच्या कल्याणासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे, पुढाकार घेणे आवश्यक आहे. यासाठी गटशेती,...