शनिवार, मे 10, 2025
Home Blog Page 174

साहित्यिक व साहित्याचे प्रयोजन ?

(राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मुळ भाषणातील अंशातून )

साहित्यिक व साहित्याचे प्रयोजन काय ? या प्रश्नाचे उत्तर देतांना राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात. मी साहित्य पुस्तकातून शिकलो नाही. अफाट जनसागरातून, हृदयाच्या गाभाऱ्यातून, आंतरिक उचंबळीतून मी साहित्य शिकलो. साहित्याची कल्पना ह्या जनसागरात मिळाली. पद्धतशीर जीवन जगण्याला सुरुवात जेथे झाली, तेथे साहित्यिकांचा समूह आला. पद्धतशीर जीवन जगण्याचे ज्ञान येणे, जीवनाचे सक्रिय-तत्त्वज्ञान समजू लागणे हे ज्याला साधले, तोच साहित्यिक व आचाराविचारातील शुद्धता, संकुचित वृत्तीचा लोप, संघर्षहीनता, परस्पर सहकार्याची ओढ, गरिबांबद्दल प्रेमभावना, समाजोन्नतीच्या कल्पना याविषयीच्या विचारांची निर्मिती म्हणजे साहित्य.

साहित्यिक व साहित्या बाबतची  आपली  भुमिका विशद करतांना महाराज पुढे म्हणतात, प्रत्येकाला आपली भावना विश्वव्यापी करावयाची आहे. प्रथम आप्त व नंतर विश्‍वालाच आपले घर मानणे, किंबहुना ‘हे सारे चराचर विश्‍व माझेच स्वरूप आहे’ ही जीवनाची अत्युच्य कल्पना असून ती साऱ्या समाजात पसरावयाची आहे. परंतु, या उच्चतेला पोहचण्यासाठी पायऱ्यांनी जावे लागुन अनुभव घ्यावे लागणार आहेत. महात्मा गांधीच्या सेवाग्रामला अखिल भारतीय कुंभार परिषदेत महाराज सहभागी झाले ते म्हणतात, साहित्य मी कुंभारांच्या सामानात, मडक्यातही पाहिले. मी तेही साहित्यच समजतो. जीवनाला सामान पुरविणारे, साहित्याचा पुरवठा करणारे ते सारे साहित्य ! काही साहित्य कलात्मक असेल, काही साहित्य कलात्मक नसेल, काही कलागुणात कमी पडेल. पण कलात्मकतेचा-अंश कमी असणारे जीवनसाहित्य हे साहित्यच नव्हे, असे म्हणता येणार नाही. असे वाद जगात सर्वत्र चालले आहे. नाट्यसाहित्य किती विशाल आहे ? सारे साहित्य जगाच्या पसाऱ्यात रंगले आहे.

 आपापल्या परीने ह्या साहित्यातला रंग अनुभवावयाचा आहे. हा अनुभव घेणाऱ्या साहित्यिकात एखादा, परब्रह्माच्या महानंदात रमून साहित्याच्या पराकोटीला आपल्या साहित्यिक भावना नेऊ शकतो व महान साहित्यिक म्हणून तो अमरही ठरतो. त्याची कला, त्याचे साहित्य अजरामर विश्‍वात्मक ठरते. साहित्यिकांतील दशकानुशके चालत असलेल्या वादावर गुरुकुंज आश्रम येथे 1953 मध्ये संपन्न झालेल्या  साहित्य संमेलनच्या अध्यक्षीय भाषणातून भाष्य करतांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, कुणी म्हणतात, विदर्भ साहित्य-संमेलनाचे प्रयोजन नाही. कुणाचा विरोध महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आयोजनाला  होतो. कुणाला हिंदी साहित्य संमेलनाची आवश्यकता नाही असे वाटते. परंतु ह्या कशाचेच प्रयोजन नाही असे नाही. प्रांतिक भाषांची किंवा एका राष्ट्रभाषेचीच संमेलने भरावी, असे नसून, कुटुंब साहित्याचीही संमेलने भरावी, ग्रामसाहित्याची संमेलने व्हावी, सर्व भारतीय भाषांची एकत्र संमेलने व्हावी, इतकेच नव्हे तर, विश्‍वसाहित्य संमेलनाचीही नितांत आवश्यकता आहे, अशी अपेक्षा महाराज मानव कल्याणासाठी व्यक्त करतात. मानव कल्याणासाठी साहित्यिकांकडून अपेक्षा व्यक्त करताना, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात, माणसाला मानव करावयाचे आहे; त्याला दानव होवु द्यायचे नाही, त्याला सर्व जीवनाचे मनोहर हृदयंगम दर्शन घडवायचे आहे. त्यातले मांगल्य, त्यातले अभिजात सौंदर्य, त्यातले सारे वर्म व मर्म अनुभवावयाचे ज्ञान त्याला द्यावयाचे आहे. हे एक भव्य व दिव्य कार्य आहे, हे दिव्य कार्य साहित्यिकांनी करायला हवे आहे. परंतु बरेच साहित्यिक विकृतीच्या मार्गाने जातात असे खेदाने म्हणावे लागते. कला, बुद्धी वा भावना यांचा दुरुपयोग होतो, तो होऊ नये. आमच्या साहित्यिकांनीही आपल्या साहित्याचा दुरुपयोग होणार नाही यासाठी जागरूक असले पाहिजे. आम्हाला सर्व गोष्टींची गरज आहे.

साहित्य हे मिरविण्यासाठी, झब्बूशाहीसाठी व दीन-दुबळ्यांच्या झोपडया चिरडण्यासाठी नाही. जगाला जागवण्यासाठी, जगाच्या निरीक्षणासाठी, जगाच्या विशालतेत विलीन होण्याचे शिक्षण घेण्यासाठी साहित्य आहे. साहित्याने भराभर उड्या मारत अथवा अंतराळातून उडत जायला नको. अशा तकलादू क्षणजीवी साहित्याचे भवितव्य विनाशाकडे वळणारे असते. असे साहित्य जिवंतही राहत नाही , त्याचा उपयोगही होत नाही व परिणामकताही त्यात उरत नाही. लढाईत शंभर वीरांवर वार करीत-मारीत समोर चाललात, मागे काय होत आहे इकडे तुमचे लक्ष नाही. वस्तुत: तुम्ही पुढे जात आहात आणि मागचे मरणारे उठून उभे होत आहेत. हे निष्फळ युद्ध आणि परिणाम न करणारी तुमची विनाशी कला एकाच कक्षेत येतात. याप्रमाणे लढणाऱ्या वीरांची गुलामी जशी नष्ट होत नाही तद्वतच तुमची ही वरवरची साहित्यनिर्मिती ही सुद्धा एक गुलामीच ठरते.

 आमच्या समाजात उत्तम विचार, उत्तम गरजा यांची पूर्तता करावयाची आहे. तळमळ वाटणाऱ्यांनी हे करायला हवे. साहित्यिक त्यातून सुटत नाही. आचार-विचारांचा प्रचार नाही तोवर देश सुधारणेचा विचार व्यर्थ होय! आमच्या येथे शेकडा शंभर लोकांना तसा धर्म -समजतो पण त्यातही वास्तवता शेकडा दहांनाही कळत नाही. साप दिसला, भीती वाटली; झाला तो आमचा देव! झाड पडले, झाले झाड देव! जो आघात करील, जो दाखला देईल, तो आमचा धर्म होतो. आमच्या धर्मकल्पनांची, आमच्या सामाजिक जीवनाची ही अधोगती आहे. ही नष्ट व्हावी असे साहित्यिकास वाटणार नाही, तर तो साहित्यिक तरी कसला? संपूर्ण लोकात मानवता वाढावी, विषमतेची दरी मिटावी व अधमता सोडावी ही धर्माची प्रगती आहे. समाजाची उन्नती आहे. साहित्यिकांचा हातभार यासाठी लागावा; नाहीतर ते केवळ ‘भुईला भार’च आहेत असे नाईलाजाने म्हणावे लागेल.  मानवाच्या कल्याणासाठी साहित्याची आवश्यकता स्पष्ट करतांना राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज देशातील विषमतेचे उदाहरण देवुन म्हणतात, आमच्या समाजातल्या रूढ्यांनी आमचे जीवन बरबटले आहे. श्रीमंताच्या घरी जेवणावळी सुरु असतांना त्याचवेळी त्याच्याच घराबाहेर ‍भुकेलेली माणसे उष्ट्या पत्रावळीवरील अन्न मिळविण्यासाठी आपसात भांडतांना दिसणारे चित्र भयावह आहे. ज्या देशात, ज्या प्रांतात, ज्या गावात साहित्य संमेलने भरावी, त्याच गावातल्या, त्याच प्रांतातल्या, त्याच देशातल्या साहित्यात मात्र प्राण्यांपेक्षाही खराब जीवन जगणाऱ्या अश्या दीन-दरिद्री भुकेकंगालांचे प्रतिबिंब उमटु नये, हा दैवदुर्विलासच नव्हे तर काय? साहित्याने आता ही जाणीव करून घेतली पाहिजे. त्याशिवाय साहित्याची व्याख्याच होऊ शकत नाही. महाराज म्हणतात काही साहित्यिकांचे साहित्य कदाचित दुसरे असू सकते. परंतु मला या देशात ‘तरी तसे साहित्य नको आहे. मला मानव कल्याण साधणारे जीवनसाहित्य हवे आहे. समाजातल्या वैषम्याच्या भिंती, विषम स्थिती निवळणारे साहित्य व तसे साहित्य निर्माण करणारे साहित्यिक मला या देशात हवे आहेत. हे कार्य काही कीर्तनांनी करतील, काही भजनांनी करतील, काही कायद्यांनी करतील. आम्ही हे कार्य विचारांची पेरणी करून, साहित्याच्या माध्यमाने केले पाहिजे! साहित्याच्या शक्तीची जाणीव मला आहे. साहित्याची महान शक्ती जगातील मोठेया शक्तींपैकी एक आहे. त्यात बाणेदारपणा आहे. तेज आहे, ओज आहे. या शक्तीचा उपयोग माझ्या समाजाला व्हावा आमच्या देशाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी ही शक्ती भक्तीभावाने वेचली गेली पाहिजे. समाजाचा विकास कोणत्याही साधनाने का होईना, शीर्घ गतीने व्हावा ही तळमळ आम्हाला लागली पाहिजे. सर्व समाजाला पुढे न्यायला साहित्यिकांचे संमेलन हा एक स्तुत्य उपक्रम आहे. यातुन समाजाला जीवनाचे साहित्य, जीवनाचे सामान मिळेल, जीवनाची सेवा मिळेल, सर्व काही मिळेल, अशी विविधांगी दृष्टी साहित्यिकांची असावी! जनसंख्येवर कार्याचे मोजमाप होत नाही. काही थोड्या फार साहित्यिकांनी माझे विचार आत्मसात केल्यास मला समाधान वाटेल! दुसरा शिकलेलाही माणूस आम्ही उचलून धरू शकतो; साहित्य हे जर सर्व समाजाला सामर्थ्य देऊन पुढे नेण्याचे, प्रोत्साहन देण्याचे साधन आहे, तर साहित्य संघाचे वा साहित्य संमेलनाचे क्षेत्र मूठभरासाठीच मोकळे न राहता समाजव्यापी व्हायला हरकत नाही. म्हणूनच साहित्य संघात उपेक्षित कलांवतांनाही आता सदस्य करून घेतले पाहिजेत,त्यांच्यासाठी साहित्याचे दरवाजे, साहित्याचे सारे रस्ते मोकळे व्हावे! “यारे यारे लहान थोर, भलते याती नारी नर” ही भावना साहित्य संघाने ठेवून आपल्या क्षेत्राचा विस्तार करायला हवा; तरच ते साहित्य आणि तरच तो साहित्यिकांचा संघ! अशी अपेक्षा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यिकांकडुन करतात.

संकलन :

-प्रा.राजेश बोबडे ,

 गुरुकुंज मोझरी, जि -अमरावती.

8087949566/ rajesh772@gmail.com

महाराष्ट्र शासनाचे १४ व १५ वर्षे मुदतीचे १,००० कोटी रुपयांचे तर १२ व १३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

महाराष्ट्र शासनाचे १४ वर्षे मुदतीचे १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. २० : महाराष्ट्र शासनाच्या १४ वर्षे मुदतीच्या १,००० कोटींच्या रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकासकामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

२५ फेब्रुवारी, २०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस्  २५ फेब्रुवारी, २०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान २७ फेब्रुवारी, २०२५  रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १४ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी २७ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक २७ फेब्रुवारी २०३९ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक ऑगस्ट २७ आणि फेब्रुवारी २७ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम, १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

महाराष्ट्र शासनाचे १५ वर्षे मुदतीचे १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

महाराष्ट्र शासनाच्या १५ वर्षे मुदतीच्या १,००० कोटींच्या  रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकासकामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

२५ फेब्रुवारी, २०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस्  २५ फेब्रुवारी, २०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान २७ फेब्रुवारी, २०२५  रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १५ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी २७ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक २७ फेब्रुवारी २०४० रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक ऑगस्ट २७ आणि फेब्रुवारी २७ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम, १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

महाराष्ट्र शासनाचे १२ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

महाराष्ट्र शासनाच्या १२ वर्षे मुदतीच्या 1500 रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकासकामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

२५ फेब्रुवारी, २०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस् २५ फेब्रुवारी, २०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान २७ फेब्रुवारी, २०२५ रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १२ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी २७ फेब्रुवारी, २०२५  पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक २७ फेब्रुवारी, २०३७ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक ऑगस्ट २७ आणि फेब्रुवारी २७ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम, १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

महाराष्ट्र शासनाचे १३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

महाराष्ट्र शासनाच्या १३ वर्षे मुदतीच्या 1500 रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकासकामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

२५ फेब्रुवारी, २०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस् २५ फेब्रुवारी, २०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान २७ फेब्रुवारी, २०२५  रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १३ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी २७ फेब्रुवारी, २०२५ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक २७ फेब्रुवारी, २०३८ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक ऑगस्ट २७ आणि फेब्रुवारी २७ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम, १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

००००

राज्यात खेळाचे उत्कृष्ट केंद्र चंद्रपुरात बनविण्यासाठी प्रयत्न करणार- क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

गोंडवाना विद्यापीठातर्फे २६ व्या आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन

चंद्रपूर, दि. २० : राज्याच्या टोकावर असलेले चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांबद्दल काहीतरी वेगळेच ऐकायला येते. मात्र येथे आल्यावर जाणवते की, विकासाच्या क्षेत्रात हा भाग राज्याच्या इतर भागापेक्षा कितीतरी पुढे आहे. क्रीडा क्षेत्राच्या सोयीसुविधा सुद्धा येथे अतिशय चांगल्या आहेत. त्यामुळे राज्यात चंद्रपूर हे खेळाचे उत्कृष्ट केंद्र करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार, अशी ग्वाही केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली.

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या वतीने विसापूर येथील क्रीडा संकुल येथे आयोजित २६ व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करतांना त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर आमदार सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू श्रीराम कावळै, कुलसचिव डॉ. अनिल विरेखण, डॉ. श्याम खंडारे, अनिता लोखंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड आदी उपस्थित होते.

या क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या निमंत्रणावरून चंद्रपूर येथे पहिल्यांदाच येण्याचा योग आला, असे सांगून क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाल्या, आजच्या धकाधकीच्या युगात मैदानी खेळ, खेळणे आवश्यक आहे. मोबाईलच्या जगातून बाहेर निघून विद्यार्थी, तरुण-तरुणी आणि नागरिकांनी रोज किमान दोन तास रोज खेळावे. खेळामुळे आपले शारीरिक आणि मानसिक उत्कृष्ट राहण्यास मदत होते.

२०३६ मध्ये होणा-या ऑलंपिक स्पर्धेत चंद्रपूर आणि गडचिरोली या भागातील खेळाडू ऑलिंपिक मध्ये खेळावे असा प्रयत्न आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा आहे. त्यासाठी क्रीडा राज्यमंत्री म्हणून नक्कीच प्रयत्न केला जाईल. तरुणांनी क्रीडा हे क्षेत्र करियर साठी निवडावे. या महोत्सवात कबड्डी टेनिस व बुद्धिबळ असे ८ क्रीडा प्रकार समाविष्ट आहेत.

क्रीडा महोत्सवाचे कौतुक करताना त्या म्हणाल्या, हा उपक्रम सरकारच्या क्रीडा धोरणाला ग्रामीण आणि शहरी पातळीवर प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीकोनाचा एक भाग आहे. तसेच भविष्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यासाठी केंद्र सरकार अशा क्रीडा उपक्रमांना भक्कम पाठिंबा देण्यास कटिबद्ध आहे. हा महोत्सव केवळ खेळांसाठीच नव्हे, तर विद्यार्थ्यांना एकत्रित आणून महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीला चालना देण्याचा एक अनोखा उपक्रम ठरणार आहे, असेही केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सांगितले.

प्रास्ताविकात विद्यापीठाचे प्र-कुलगुरू श्रीराम कावळे म्हणाले राज्यातील विविध विद्यापीठामधून जवळपास ३५०० खेळाडू त्यांचे प्रशिक्षक व्यवस्थापक असे एकूण ४ हजार नागरिक येथे आले आहेत. चंद्रपूर -गडचिरोली ही व्याघ्र भुमी आहे. या भुमीत सर्व खेळाडूंचे मी विद्यापीठाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो.

तत्पुर्वी खेळाडूंनी पथसंचलनातून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. क्रीडा ज्योत प्रज्वलन आणि खेल भावना शपथ घेऊन कार्यक्रमाची सुरूवात झाली. कार्यक्रमाचे संचालन शिल्पा आठवले यांनी तर आभार कुलसचिव डॉ. अनिल विरेखण यांनी मानले.

००००००

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत घेतला विविध विषयांचा आढावा

नागपूर, दि. २० : महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात नागपूर शहर व ग्रामीण भागात पोलीस स्टेशन उभारण्यासह विविध विषयांसह बैठक घेत आढावा घेतला.

आयुक्तालयाच्या सभागृहात आयोजित या बैठकीस प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. माधुरी खोडे-चवरे, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी,  पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक व केंद्रस्थ अधिकारी नरेश झुरमुरे, मुख्य वनसंरक्षक ए. श्रीलक्ष्मी आदी यावेळी उपस्थित होते.

नागपूर शहर व परिसरात वाढती लोकसंख्या लक्षात घेता गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस विभागाच्या नागपूर ग्रामीण, शहर व आयुक्तालय हद्दीत नव्याने पोलीस स्टेशन उभारण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करून शासनास सादर करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. यासोबतच महसूल व वने, मृद व जलसंधारण विभागासंदर्भातील विविध विषयांवर श्री. बावनकुळे यांनी यावेळी निर्देश दिले.

०००००

‘मनपा’च्या विद्यार्थ्यांचा ‘कला का कारवा’

मुंबई दि. 20 : फोटोग्राफीचे आकर्षण होते…पण कधी शक्य होईल असे वाटले नव्हते. पण, सलाम बॉम्बे संस्थेने आमच्या शाळेतील मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रशिक्षण वर्ग सुरू केले. शाळेच्या अभ्यासाव्यतिरिक्त ज्या मुलांना गायन, नृत्य, अभिनय, मीडिया, फोटोग्राफी यामध्ये रूची असेल अशा मुलांना याचा लाभ मिळाला. आज त्यांच्यामुळे फोटोग्राफी क्षेत्रात करियर करू शकत असल्याचे अंधेरीच्या विद्याविकास शाळेतील माजी विद्यार्थी कुशल महाले याने सांगितले. आज तो फोटोग्राफीचा व्यवसायही करतो आणि महानगरपालिकेच्या शाळेतील मुलांना प्रशिक्षणही देतो.

सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्यावतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ‘कला का कारवा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भुषण गगराणी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फाऊंडेशनच्या वरिष्ठ उपाध्यक्ष राजश्री कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिना रामचंद्रन, कादंबरी कदम, सहायक व्यवस्थापक दिपक पाटील, हृदयगंधा मिस्त्री उपस्थित होते.

विद्यार्थ्यांमध्ये अपार क्षमता आहेत. सलाम बॉम्बे फाऊंडेशनसारख्या संस्था या‍ विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देतात आणि योग्य संधी मिळाल्यास हे विद्यार्थी पारंपरिक शिक्षणाच्या पुढे जाऊन विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करू शकतात असे आयुक्त गगराणी यांनी यावेळी सांगितले.

सलाम बॉम्बे फाऊंडेशन मुंबईतील महानगरपालिका आणि शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या कलांना वाव मिळण्यासाठी तांत्रिक आणि शास्त्रीय प्रशिक्षण देते. कला अकॅडमीमार्फत चित्रकला, नृत्य, नाट्य आणि माध्यम कौशल्ये शिकवली जातात. ‘कला का कारवा’ या कार्यक्रमामार्फत विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.  मुंबईतील शाळांतील मुलांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

‘कला का कारवा’ कार्यक्रमात शास्त्रीय नृत्य, नाटिका, राजस्थानचे घुमर, गुजरातचे भवई लोकनृत्य, महाराष्ट्राचे कोळी नृत्य, छत्तीसगढचे मोरपंखी, महाराष्ट्राचे लोकनाट्य, महिलांच्या हक्क आणि अधिकारावर भाष्य करणारे संवाद, अध्यात्म, सामाजिक, राजकीय विषयावर भाष्य करणारे नाटक यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केले. अंशु मिश्रा, कामिनी विश्वकर्मा या मुलींनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने मासिकाचे प्रकाशन केले. मासिक कसे असावे, त्याचे विषय, लेखन, छपाई याबद्दल हे काम करत असताना माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तर साधना महाविद्यालयाच्या मयुर इंगळे यांनी विद्यार्थ्यांच्या सहायाने लोककलाकार वासुदेव या विषयावर डॉक्युमेंट्री बनवली. मीडिया क्षेत्रात विद्यार्थ्यांना भविष्यात करियर करता यावे यासाठी त्यांना टीव्ही,  प्रिंट, वेब, अशा विविध माध्यमांचे प्रशिक्षण देण्यात येते. या आर्ट अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करियरचा मार्ग सापडतो त्यांना प्लेसमेंट मिळावी यासाठीही प्रयत्न करण्यात येतात, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

हातमाग कापड स्पर्धाः इफरा अंजूम प्रथम तर शबाना गिराम द्वितीय

छत्रपती संभाजीनगर,दि.२०(जिमाका)- शासनाच्या वस्त्रोद्योग विभागामार्फत हातमाग कापड उत्कृष्ट नमुन्याची विभागीय हातमाग कापड स्पर्धा २०२४-२५- आज देवगिरी नागरी सहकारी बॅंक लि. प्रशिक्षण केंद्र क्रांती चौक, भुविकास बॅंअक इमारत येथे आयोजीत करण्यात आली. या स्पर्धेसाठी १३ विणकरांनी आपला सहभाग नोंदवून आपले वाण सादर केले. विभागीय आयुक्त दिलीप गावडे हे यावेळी उपस्थित होते. प्रादेशीक उपायुक्त वस्त्रोद्योग प्रशांत सदाफुले यांनी त्यांचे स्वागत केले व उपक्रमाची माहिती दिली. या स्पर्धेत इफरा अंजूम यांना प्रथम क्रमांक मिळाला त्यांना २५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. शबाना बेगम फहीम अहेमद गिराम यांना द्वितीय क्रमांक मिळाला त्यांना २० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. तर इमरान अहमद कुरेशी हिमरु शाल उत्पादक यांना तिसरा क्रमांक मिळाला. त्यांना १५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली ही विभागस्तरीय हातमाग कापड स्पर्धा पार पडली.  स्पर्धेसाठी एकूण १३ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.त्यापैकी तीन उत्कृष्ट  स्पर्धकांची निवड समितीने केली आहे. अध्यक्षस्थानी दिलीप गावडे हे होते. कार्यक्रमाचे आयोजन  सदस्य सचिव  प्रशांत सदाफुले यांनी केले. निवड समितीमध्ये जिल्हा माहिती अधिकारी, सहाय्यक संचालक, विणकर सेवा केंद्र मुंबई आशुतोष जोशी, विभाग प्रमुख शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय योगेश साठे यांचा समावेश होता. कार्यक्रम यशस्वी होण्यास तांत्रिक सहाय्यक मधुकर गांधीले, लेखापाल श्रीमती रेणुका कुंजर, प्रमुख लिपिक शेख इजाज, घोडेराव, फजल सिद्दिकी व संतोष वाघ यांनी सहकार्य केले.

०००००

वर्ध्याच्या वाङ्मय समृद्धीचे पूर्वसुरी वैभव

वरदा – वर्धा हे जिल्ह्याचे नाव साऱ्या दिगंतात प्रसिद्ध आहे. ते महात्मा गांधीजींच्या सेवाग्राम वास्तव्यामुळे. प्रशासकीय दृष्ट्या जिल्ह्याचा इतिहास केवळ दीड-पावणेदोनशे वर्षाचा असला तरी जिल्ह्याच्या अस्तित्वाच्या खुणा मात्र, या आधीच्या शतकात शोधता येतात, त्या प्राचीन- मध्ययुगीन कालखंडात गुणाढ्यसारख्या पैशाची भाषेच्या विद्वान, जगविख्यात ‘ब्रहत्कथां’ च्या जनकाच्या रूपात, त्याच्या हिंगणघाट तालुक्यात पोथरा या गावातील वास्तव्यामुळे ! वैश्विक दृष्ट्या लोकभाषा व लोककथांचा मुळारंभ म्हणून गुणाढ्यांनी लिहिलेल्या या बृहत्कथांकडे पाहिले जाते. गुणाढ्याची मूळ लेखनसंहिता आज उपलब्ध नाही.

गुणाढ्याच्या लोककथांचा आधार घेऊन क्षेमेंद्र यांनी ‘बृहत्कथा’ व सोमदेव यांनी ‘कथासरितासागर’ या दोन संस्कृत ग्रंथांची निर्मिती केली. ज्येष्ठ संशोधक व विदर्भातील लोकसाहित्याचे प्रख्यात अभ्यासक डॉ. भाऊ मांडवकर यांनी गुणाढ्य हे हिंगणघाट तालुक्यातील पोथरा गावातील मूळ रहिवासी असल्याचा दावा आपल्या ‘आदिजन’ या ग्रंथामध्ये केला आहे. ए. बेरेडल कीथ नावाच्या पाश्चिमात्त्य संशोधकाने कम्बोडिया येथे प्राप्त झालेल्या एका अभिलेखाच्या आधारे गुणाढ्याचा कालखंड शोधण्याचा प्रयत्न केला.

जागतिक साहित्यक्षेत्रात गुणाढ्याच्या कलाकृतीबाबत रोज नवी चर्चा होत असताना डॉ. भाऊ मांडवकरांच्या या संशोधनाकडे वैदर्भीय नव्या लोकसाहित्य अभ्यासकांनी दुर्लक्ष केल्याचे दिसते, वाशीम (वत्सगुल्म )आणि वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट पोथराशी थेट संबध असणारा गुणाढ्य त्यातच अलीकडील काळात तो काश्मिरी होता, या तर्कावर अभ्यासकांमध्ये चर्वितचर्वण केल्या जात आहे. हा युक्तिवाद वैदर्भीय सांस्कृतिक विश्वाला धोक्याचा ठरू शकतो. देवळीचे मिरणनाथ महाराजांचे रामजी हरी फुटाणे उर्फ हरीसुत यांनी दीड शतकापूर्वी लिहिलेले गीतेवरील अभंग वृत्तात अतिशय सुमधुर भाष्य संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. गणेश मालधुरे यांनी अलीकडील काळात प्रकाशात आणले आहे. संत साहित्यात भर टाकणारे आहे.

महत्त्वाचा गुणाढ्याचा हा संदर्भ सोडल्यास वर्ध्याच्या वाडमयीन परंपरेची मुळे खऱ्या अर्थाने रुजली ती आधुनिक काळातील स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर कालखंडात ती म्हणजे गांधीजींच्या आगमनानंतरच! म्हणूनच असे म्हटल्या जाते वर्धा जिल्ह्याला फारशी साहित्य परंपरा नाही. नभांगणात अधूनमधून एखादा दुसरा तारा चमकावा, असं कधी कधी घडत असतं. एकतर गांधी, विनोबांच्या राजकीय परंपरेने या जिल्ह्याचे अवघे विश्व झाकोळल्या गेलेले आहे. अजूनही हा जिल्हा या छायेतून बाहेर पडलेला नाही. परंतु याच गांधी, विनोबांच्या वास्तव्याने काही विद्वान, संस्कृती, साहित्य व कलापुरुषांचा वर्ध्याला स्पर्श झाला, हेही तेवढेच खरे!.

स्वतः विनोबा भावे (११ सप्टेंबर १८९५ – १५ नोव्हेंबर १९८२) संत, प्राच्यविद्या पारंगत व थोर साहित्यिक होते. ‘गीताई’, ‘मधुकर’सारखी अजरामर रचना, ‘गीता प्रवचने’ सारखे अजोड साहित्य त्यांनी निर्मिले.

ज्यात अष्टादशी (सार्थ), ईशावास्यवृत्ति, उपनिषदांचा अभ्यास, गीताई-चिंतनिका, गुरूबोध सार (सार्थ), जीवनदृष्टी, भागवत धर्म-सार, लोकनीती, विचार पोथी साम्यसूत्र, साम्यसूत्र वृत्ति, स्थितप्रज्ञ-दर्शन ही विनोबाची विपुल ग्रंथ संपदा आहे. विनोबांचा वारसा दादा धर्माधिकारी यांनी ( जन्म इ.स. १८८९ तर मृत्यू १ डिसेंबर, १९८५) त्यांच्या आपल्या गणराज्याची घडण (मराठी), गांधीजी की दृष्टी, तरुणाई, दादांच्या बोधकथा, बाग १ ते ३, दादांच्या शब्दांत दादा, भाग १, २., नागरिक विश्वविद्यालय – एक परिकल्पना, प्रिय मुली, मानवनिष्ठ भारतीयता, मैत्री, क्रांतिवादी तरुणांनो, लोकशाही विकास आणि भविष्य, सर्वोदय दर्शन, स्त्री-पुरुष सहजीवन, हे ग्रंथ तर त्यांचे सुपुत्र न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी (जन्मतारीख: २० नोव्हेंबर, १९२७ मृत्यू: ३ जानेवारी, २०१९) यांनीही अंतर्यात्रा, काळाची पाऊले, न्यायमूर्ती का हलफनामा (हिंदी), भारतीय संविधानाचे अधिष्ठान, मंझिल दूरच राहिली!, माणूसनामा, मानवनिष्ठ अध्यात्म, लोकतंत्र एवं राहों के अन्वेषण (हिंदी), शोध गांधींचा, समाजमन, सहप्रवास, सूर्योदयाची वाट पाहूया आदी ग्रंथातून विपुल लेखन केले आहे .

पु. य. देशपांडे (जन्म ११ डिसेंबर १८९९ मृत्यु २६ जुलै १९८६ ) यांच्या बंधनाच्या पलिकडे, सदाफुली , अनामिकाची चिंतनिका -1962 साहित्य अकादमी पुरस्कार भेविघोष- धर्मघोष, काळी राणी, मयूरपंख, विशाल जीवन कादंबऱ्या व गांधीजीच का? हे वैचारिक लेखन, आचार्य काका कालेलकर यांची गुजराथी – हिंदी- मराठीतील वैविध्यपूर्ण साहित्य संपदा, भदंत आनंद कौसल्यायन, भवानीप्रसाद मिश्र, शंकरराव देव, आचार्य जावडेकर, श्रीकृष्णदास जाजू, श्रीमन्नारायण, कुंदर दिवाण, रामेश्वर दयाल दुबे, डॉ. म. गो.बोकरे, मदालसा नारायण, प्रा. निर्मला देशपांडे, मधुकरराव चौधरी, ठाकूरदासजी बंग, सुमनताई बंग यांची वैचारिक लेखनाची परंपरा डॉ. अभय बंग पुढे नेतांना दिसतात गांधीवादी साहित्य परंपरा इथेच थांबत नाही, तर पुढच्या काळात बौद्ध पंडित प्रो. धर्मानंद कोसंबी या प्रभावळीत येऊन सामील होतात. वामनराव चोरघडे यांच्या संस्कारक्षम कथांच्या पहिला संग्रहाचा बहर येथेच बहरतो आणि पुढे मराठी लघुकथेच्या मांदियाळीत दाखल होतांना दिसतो, त्यांची खरी ‘जडण घडण’ (आत्मचरित्र, १९८१) वर्ध्यातच झालेली आहे. तर आजही ‘खादीशी जुळले नाते’ या आत्मकथनातून रघुनाथ कुलकर्णी यांनी स्वतःच्या जीवनप्रवासातून भारताच्या खादी क्षेत्रातील वाटचालीचं खरखुरं चित्र रेखाटलं आहे .

कवी मंगेश पाडगावकरांना ‘जिप्सी’ची भेट याच गांधीनगरीत होते, आधुनिमराठी कवितेचे जनकत्व ज्यांना बहाल केले गेले, त्या केशवसुतांचे बालपण वर्ध्यात मामांकडे गेलेले! गांधीजींच्या वर्ध्यात येण्यापूर्वी महात्मा फुलेंची ओळख साऱ्या जगाला करून दिली ती याच शहराने, ते त्यांचे पंढरीनाथ पाटील यांनी लिहिलेले चरित्र येथील जिनदासजी चवडे यांनी छापून नि प्रसिद्ध करूनच ! जीनदासजी चवडे यांनी विपुल अशी जैन साहित्य निर्मिती करून त्याकाळात पहिला अद्यावत छापखाना काढून, सत्यशोधक चळवळीच्या साहित्य निर्मितीस प्रकाशनाच्या माध्यमातून मोठे बळ दिले होते. तसेच सत्यशोधकी पत्रकारितेचे वैचारिक व प्रबोधनाचे सत्र यावेळी वर्ध्यात यांच्यामुळे निर्माण झाल्याचे दृष्टीपथात येते. याच काळात पूर्व विदर्भात जीनदास चवडे बंधूंची संगीत नाटके खूप गाजलीच नव्हे, तर या भागात संगीत नाटकांचे लेखन व सादरीकरणाचे प्रवर्तनकत्व त्यांना जाते.

वर्ध्यात महात्मा गांधीजी येण्यापूर्वी लोकमान्य टिळक येथे आलेले होते, पुढे त्यांचे प्रत्यक्षपणे वर्ध्याशी नातेही जुळलेले. गांधीजींची पत्रकारिता व स्वातंत्र्य लढ्याची मुहूर्तमेढ सेवाग्राम येथून झालेली असल्याने हा कालखंड गांधीवादी साहित्याने प्रभावित झालेला; परंतु संतसाहित्याची परंपरा ल. रा. पांगरकरांसारखे व्यासंगी अभ्यासक, प्रा. अ.ना.देशपांडे, प्रा.मा.शं वाबगावकर, सुप्रसिद्ध कवी आणि वक्ते मधुकर केचेंचा जन्म देखील वर्धा नदीच्या कुशीत असलेल्या अंतोरा या गावचा, लेखक कादंबरीकार व संशोधक डॉ. भाऊ मांडवकर यांनी वर्ध्यात शिक्षण व काही काळ नोकरी निमित्त केलेले वास्तव्य या साहित्य प्रांतात छाप पाडून गेले.

विजयराज बोधनकर हे मुळात चित्रकार असून ते सध्या मुंबईत स्थायिक असलेले लेखक म्हणून त्यांचे गागरा हे आर्वी तालुक्यातील धनोडी बहाद्दर च्या आठवणीवरील पुस्तक, साहित्यिकांची स्वभावचित्रे व आपला स्वभाव जाणून घ्यायची असेल तर त्यांची अर्कचित्रे लक्षणीय ठरावी.

एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांनी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय मुसाफिरी केली ते पंडित कवी मोरोपन्तांच्या केकावलीचे भाष्यकार श्रीधर विष्णु परांजपे, त्यांचे पुत्र भाषा व संतसाहित्याचे अभ्यासक भा. श्री. परांजपे यांचे वसंताच्या खुणा, दख्खनचा वाघ, नवनाथ, मत्स्येंद्रनाथ, मुलांसाठी माडखोलकर, तर डॉ. जयंत परांजपे ‘ग्रेस आणि दुर्बोधता’ या पुस्तकांच्या रूपाने पुढे चालविलेली दिसते. देवळीचे मिरणनाथ महाराजांचे रामजी हरी फुटाणे उर्फ हरीसुत यांनी दीड शतकापूर्वी लिहिलेले गीतेवरील अभंग वृत्तात अतिशय सुमधुर भाष्य संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. गणेश मालधुरे यांनी अलीकडील काळात प्रकाशात आणले आहे. संत साहित्यात भर टाकणारे आहे.

डॉ. सदाशिव डांगे – हिंदूधर्म आणि तत्वज्ञान, अश्वत्थाची पाने, क्रिटीक ऑन संस्कृत ड्रामा हे पुस्तके आहेत. म. ल. वऱ्हाडपांडे – कोल्हटकर आणि हिराबाई, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, भ्रमर परागु ट्रॅडिशन्स ऑफ इंडियन थिएटर, गोविंद विनायक देशमुख – कालसमुद्रातील रत्ने (३ खंड) पद्माकर गणेश चितळे – इमला, भोगनृत्य, पोर्टर, डाळिंबाचे दाणे, समीक्षक डॉ. वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे यांची या मनाचा पाळणा, कोल्होबाची करामत, भारतीय स्त्रीरत्ने, नागपुरी बोली : भाषाशास्त्रीय अभ्यास करून नागपुरी बोलीची सुरुवात सेलू तालुक्यातील महाबळा या गावापासून होते हे सप्रमाण सिद्ध केले आहे, न्यायतीर्थ स्वामी सत्यभक्त यांचे सत्येश्वर गीता, दिव्य दर्शन, सत्यामृत आदी असंख्यग्रंथ रचना त्यांनी केली. नंतरच्या कालखंडात मो. दा. देशमुख, दिवाकर देशपांडे, डॉ. मधुकर आष्टीकर यांनी नाटककार, विनोदी लेखक म्हणून नावलौकिक मिळविला.

मो. दा. देशमुखांच्या घराण्याचा न्यायदंड या नाटकाने इतिहास घडविला. यानंतरच्या कालखंडात दे. गं. सोटे यांनी सोटेशाही व वऱ्हाडी शब्दकोश निर्माण केला, प्राचार्य डॉ. विद्याधर उमाठे, विजय कविमंडन ‘रेसकोर्स’ यांच्यासारखी लेखक-कवींची पिढी उदयाला आलेली दिसते. सर्वोत्कृष्ट कथांचे कालखंडानुसार संपादन करणारे डॉ. राम कोलारकर हे मूळ हिंगणघाट येथीलच. ‘ज्वाला आणि फुले’चे कवी आणि विख्यात समाजसेवक बाबा आमटे यांचे जन्मगावही हेच, आर्वीचे आजोळ असणारे तत्वज्ञानाचे अभ्यासक आणि सौंदर्याचे व्याकरण लिहिणारे डॉ . सुरेंद्र बारलींगे तसेच दलित साहित्यातील पहिल्या पिढीचे अग्रगण्य कथाकार अमिताभ हेही हिंगणघाटचे. नाट्यसमीक्षक द. रा. गोमकाळे, पाच नाटके चे लेखक श्रीराम अट्रावलकर, नाटककार नाना ढाकुलकर यांनी – त्यागवती रमाई आणि रावणावर लिहिलेले लंकेश कादंबरी त्यासह अनेक नाटिका लिहिल्या आहेत. हे निर्विवाद वाडमयीन वैभव वर्ध्याची वाड्मय समृद्धी स्पष्टपणे अधोरेखित करणारे आहे .

डॉ. राजेंद्र मुंढे

आर्वी नाका, ज्ञानेश्वर नगर, वर्धा

चलभाष  – ९४२२१४००४९

वाचन संस्कृती वाढविण्यासोबतच ग्रंथालय चळवळ बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार – पालकमंत्री संजय राठोड

पालकमंत्र्यांच्याहस्ते ‘यवतमाळ ग्रंथोत्सवा’चे उद्घाटन

यवतमाळ, दि.२० (जिमाका) : अलिकडे वाचनाबाबत उदासीनता दिसून येत आहे. नवीन पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे वाचन संस्कृती वाढविण्यासोबतच ग्रंथालय चळवळ अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करु, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

ए.पी.जे.अब्दुल कलाम अभ्यासिकेच्या परिसरात आयोजित दोन दिवशीय यवतमाळ ग्रंथोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथालय संघाचे राज्याध्यक्ष प्रा.गजानन कोटेवार तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रंथालय सहायक संचालक डॉ.राजेश पाटील, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कविता महाजन, जिवन पाटील, पराग पिंगळे, शिक्षण विस्तार अधिकारी स्मिता घावडे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मनोज रणखांब, विनोद देशपांडे आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना पुस्तक वाचनाची गोडी लागावी, चांगली पुस्तके एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, यासाठी ग्रंथोत्सव घेतला जातो. वाचनामुळे जीवन समृद्ध होते. आपली कल्पना व विचारशक्ती प्रगल्भ होते, शब्दसंपत्ती वाढते आणि ज्ञानाचा विस्तार होतो. वाचनामुळे आपले व्यक्तिमत्त्व खुलते, आत्मविश्वास वाढतो आणि जीवनाला सकारात्मक दिशा मिळते, असे पालकमंत्री म्हणाले.

ग्रंथोत्सवामुळे विविध विषयांवरील पुस्तके कमी किमतीत आणि सहज मिळतील. शाळा, महाविद्यालये आणि ग्रंथालये या उपक्रमाचा लाभ घेऊन वाचन संस्कृतीला बळ देतील, हा विश्वास आहे. आज घरोघरी मोबाईलमुळे वाचन कमी झाले आहे. यासाठी मुलांना दोष देवून पालक सुटका करून घेवू शकत नाही. आई-वडिलच तासंतास मोबाईलवर राहत असतील तर मुलांकडून आपण त्यांनी पुस्तके हातात घेऊन वाचन करावे, अशी अपेक्षा करू शकणार नाही. त्यामुळे पालकांनी देखील वाचन वाढवणे आवश्यक आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.कोटेवार यांनी वाचन संस्कृती टिकवण्यासाठी ग्रंथालय चळवळ जिवंत ठेवणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात ही चळवळ कायम ठेवण्यासाठी शासनमान्य ग्रंथालयांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. ग्रंथालयांचे अनुदान, कर्मचाऱ्यांचे वेतन व अन्य समस्या यावेळी श्री.कोटेवार यांनी मांडल्या. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा ग्रंथालय अधिकारी कविता महाजन यांनी ग्रंथोत्सवाच्या आयोजनामागची भूमिका विषद केली.

दोन दिवशीय ग्रंथोत्सवात आज उद्घाटनानंतर मी सावित्रीबाई बोलते हा एकपात्री प्रयोग अपुर्वा सोनार  व ऋतिका गाडगे यांनी सादर केला. नायब तहसिलदार रुपाली बेहरे यांनी अहिल्या हा एकपात्री प्रयोग सादर केला. दोन दिवस चालणाऱ्या ग्रंथोत्सवास भेट देऊन नागरिकांनी पुस्तके खरेदी व विविध कार्यक्रमांचा आनंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

000

पोलीस हवालदार निलेश दयाळ व सागर गोगावले यांचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते सत्कार

सातारा दि. २०: झारखंड राज्यातील रांची येथे झालेल्या ६८ व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये सातारा पोलीस दलातील बीडीडीएस पथकातील श्वान सुर्या याने एक्सप्लोझीव्ह इव्हेंट या स्पर्धा प्रकारामध्ये सुवर्ण पदक जिंकून महाराष्ट्र पोलीस व सातारा जिल्हा पोलीस दलाची मान उंचावलेली आहे. त्याबद्दल श्वान सुर्या व प्रथम हँडलर पोलीस हवालदार निलेश दयाळ व दुय्यम हँडलकर सागर गोगावले यांचा सत्कार पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते करण्यात आला.

पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी संतोष पाटील पोलीस अधीक्षक समीर शेख अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले सुर्या श्वानाने अनेक गुन्हे उकल करण्यात मोठी मदत केली आहे. सुर्याने सुवर्ण पदक पटकवून सातारा पोलीस दलाची मान उंचावलेली आहे. पहिल्या व दुसऱ्या प्रशिक्षकाने सुर्या श्वानाला चांगले प्रशिक्षण दिले आहे. पोलीस दलातील श्वानांसाठी राहण्यासाठी व्यवस्थेसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करुन दिला जाईल. पोलीस अधीक्षक श्री. शेख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दल चांगले काम करीत आहे हे काम आणखीन चांगल्या पद्धतीने करावे. ज्या सुविधा पोलीस दलाला लागतील त्या उपलब्ध करुन दिल्या जातील ग्वाहीही देवून सुर्यासाठी पालकमंत्री श्री. देसाई यांनी एक लाखांचे बक्षीसही जाहीर केले.

६८ व्या आखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये सुर्याने वेगवेगळ्या प्रकारच्या आर्टीकलमधून ५५ आर्टीकल शोधून प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. अशा प्रकारचे सुवर्णपदक सातारा जिल्हा पोलीस दलास प्रथम व महाराष्ट्रात पोलीस दलास २०१४ नंतर प्राप्त झाले आहे असे पोलीस अधीक्षक श्री. शेख यांनी सांगितले.

००००

साहित्य संमेलने : परंपरा आणि परिप्रेक्ष

साहित्य संमेलनाची परंपरा आता शतकी वाटचाल करीत आहे. मात्र या परंपरेत अनेक परिप्रेक्ष या साहित्यसंमेलने आणि त्यातून निर्माण होणाऱ्या साहित्य प्रवाह, संमेलनांचे स्वरुप, त्यातून व्यक्त होणारे विषय याबाबत अनेक परिप्रेक्ष तयार होतांना दिसतात. त्याचाच धांडोळा घेतलाय ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यीक प्रशांत गौतम यांनी.

नवी दिल्ली येथे ७२ वर्षापूर्वी ऑक्टोंबर महिन्यात ५४ वे साहित्य संमेलन झाले होते. तेव्हा, महाराष्ट्र राज्याची निर्मितीही झाली नव्हती आणि अ.भा.मराठी साहित्य महामंडळही अस्तित्वात नव्हते. या ५४ व्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरु यांनी केले होते. अध्यक्ष होते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी,आणि स्वागताध्यक्ष होते,काकासाहेब गाडगीळ. त्यानंतर दिल्लीत साहित्यसंमेलन होत आहे ते यंदाच. ९८ व्या संमेलनासाठी उद्घाटक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी लाभले आहेत,अध्यक्षपदाचा बहुमान डॉ.ताराबाई भवाळकर यांना मिळाला आहे.तर स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, त्या अनुषंगाने देशाच्या राजधानीत होणाऱ्या साहित्य संमेलनास महत्व आहे.

साहित्य संमेलनाची परंपरा शतकाकडे

दोन मराठी माणसं एकत्र आली की साहित्य संस्था निर्माण होतात, असे म्हणतात ते खरेच आहे. आधीच्या काळात तेच होते, आणि आताच्या काळात ही तेच आहे. यात काहीही बदल झालेला नाही. संस्था व संमेलने वर्धिष्णू असतात. वर्षानुवर्ष हा साहित्याचा प्रवाह हा अखंड सुरुच असतात.  साहित्य संमेलनाची परंपरा आता शतकाकडे जाते आहे. या प्रदिर्घ कालखंडात किती तरी बदल झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात मराठी भाषेचे अस्तित्व टिकवण्यासाठी संस्था आल्या. नंतर त्यांचा विस्तार झाला. पुढील काळात याच साहित्य संस्थांचे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ अस्तित्वात आले. संमेलने त्या आधीही ‘ग्रंथकार संमेलन, महाराष्ट्र साहित्य संमेलन’, या नावाने भरतच होती. तेव्हा निवडणूक नव्हती.

१९६४ साली अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय झाला आणि १९६५ साली महामंडळाचे पहिले संमेलन हैदराबादेत समीक्षक प्रा.वा.ल. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली भरले. तेव्हा पासून ही परंपरा अखंडीत आहे.

नवी दिल्लीत तर यंदाचे संमेलन ७२ वर्षाने होत आहे. हे संमेलन झाले तेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मितीही झाली नव्हती. तो काळ संयुक्त महाराष्ट्र चळवळीने भारावलेला होता. दिल्लीचे संमेलन १९५४ साली झाले आणि १ मे १९६० साली महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. आणि मराठी साहित्यात साठोत्तरी प्रवाह यायला सुरूवात झाली.

मराठवाड्याच्या संदर्भात सांगायचे तर आजपर्यंत मराठवाड्यात झालेल्या सात संमेलनाचे अध्यक्षपद मराठवाड्याबाहेरील लेखकांनी भूषवले. केवळ एका संमेलनाचे अध्यक्षपद भूमीपुत्र भारत सासणे यांनी भूषवले. अनंत काणेकर (छत्रपती संभाजीनगर), शंकर पाटील (नांदेड), व्यंकटेश माडगुळकर (अंबाजोगाई), नारायण सुर्वे (परभणी), प्रा.द.मा.मिरासदार (परळी), प्रा.रा.ग.जाधव (छत्रपती संभाजीनगर), फादर फ्रान्सिस दिब्रिटो (धाराशीव), भारत सासणे (उदगीर) असे सांगता येईल. तर मराठवाड्यातील लेखक  डॉ.यू.म.पठाण (पुणे), डॉ.नागनाथ कोत्तापल्ले (चिपळून), प्रा.फ.मु.शिंदे(सासवड), लक्ष्मीकांत देशमुख (बडोदा), डॉ.श्रीपाल सबनीस (पिंपरी-चिंचवड), नरेंद्र चपळगावकर(वर्धा) येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

मराठी साहित्य संस्कृती,कशी असते हे पाहयचे असेल तर साहित्य संमेलन चळवळीचा इतिहास आणि सद्याचे वर्तमान बघायला हवे. जगात मराठी ही अशी भाषा आहे की फक्त तिचाच साहित्य संमेलनाचा उत्सव उदंड उत्साहात होत असतो. आज सर्वाधिक साहित्य संमेलने ही मराठी भाषेचीच होतात. तालुका, जिल्हा, विभाग, राज्य पातळीवर तर मोठ्या संख्येने संमेलने होतात. विश्व मराठी साहित्य संमेलन होतात; पण कायम लक्षात राहातात ती प्रतिवर्षी होणारी अ.भा.मराठी साहित्य संमेलने. ही संमेलने नव्या-जुन्या लेखकांना हक्काचे व्यासपीठ देतात, वाचकांना आपल्या आवडीचा लेखक भेटतो आणि ग्रंथ प्रदर्शनातून  त्याचे आवडीचे पुस्तक मिळते. अशा ग्रंथ प्रदर्शनातून प्रकाशकांनाही फायदा होतो.

१९८९ साली पहिली जागतिक मराठी साहित्य परिषद मुंबईयेथे कुसुमाग्रजांच्या अध्यक्षतेखाली भरली होती. नंतरच्या काळातही सातत्य राहिले. साहित्य महामंडळानेही अशा तीन चार जागतिक मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. यात गाजले ते सॅन होजे व (अमेरिका), दुबई येथील संमेलन, या निमित्ताने मराठीचा झेंडा साता समुद्रापार फडकला.  राज्य सरकारने प्रतिवर्षी जिल्हा व विभागीय स्तरावर मराठी साहित्य संमेलन भरवण्याचा चांगला उपक्रम सुरू केला आहे. छोट्या व आटोपशीर संमेलनास प्रतिसादही उत्तम लाभतो. तसेच राज्य सरकारने तीन विश्व मराठी साहित्य संमेलनं आयोजित केली. मुंबई, नवी मुंबई आणि पुणे. पुण्यात नुकत्याच झालेल्या विश्वसंमेलनात तर कोट्यावधीची आर्थिक उलाढाल झाली, विक्रमी पुस्तक विक्री झाली. म्हणून प्रत्येक रसिक,वाचकांना साहित्य संमेलनाची उत्सुकता असते,तशी देशाच्या  राजधानीत होणाऱ्या संमेलनाचीही आहे.

बृहन्महाराष्ट्रातील संमेलने

या मराठी साहित्य संमेलनास अनेक परंपरा आहेत. या ९८ वर्षातील २४ संमेलनं ही महाराष्ट्रा बाहेर झालेली आहेत. बडोदे, इंदूर, ग्वाल्हेर, बेळगाव, मडगाव, हैदराबाद, कारवार, अहमदाबाद, नवी दिल्ली, भोपाळ, रायपूर(छत्तीस गड) पणजी, घुमान(पंजाब) यातील काही ठिकाणी दोन-तीन वेळा संमेलने भरली आहेत. बृहन्महाराष्ट्रात तर बडोदा येथील वाड.मय परिषद यांची संमेलन वाटचाल अमृत महोत्सवाकडे सुरू आहे. नवी दिल्ली येथील बृहन्महाराष्ट्र मंडळाचीही तेवढीच अधिवेशनं झालीत. या शिवाय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनंही एका काळात भरली होती.

परंपरेची रुजुवात

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी सुरू केलेली  १८७८ पासून सुरु असलेली ही परंपरा अखंडीत राहिली असती, त्यात सातत्य राहिले असते तर दिल्लीचे संमेलन हे ९८ ऐवजी १४७ वे ठरले असते. या प्रवाहात विविध कारणाने खंड पडला; हे मात्र खरे. स्वातंत्र्यपूर्व काळात संमेलनाचे आयोजन करणे ही साधी बाब नव्हती, त्यावर मात करीत संमेलन सातत्य राखण्याचा प्रयत्न तत्कालीन लेखक व कार्यकर्त्यांनी केला होता. तेव्हा पासूनचा आज पर्यंतचा साहित्य संमेलनाचा प्रवास फारच रंजक आहे,कसा तो आपण जाणून घेवू या!

साहित्यसंमेलनांची परंपरा

यंदाच्या संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. ताराबाई भवाळकर या नियोजित आहेत. आयोजक पुण्यातील सरहद्द संस्था आहे. संजय नहार हे संस्थापक अध्यक्ष आहेत. सरहद्दचे कश्मीर भागात उत्तम, शैक्षणिक, सामाजिक काम आहे. याच आयोजकांनी संत साहित्याचे अभ्यासक  डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली  घुमान येथील ८८ वे साहित्य संमेलन चांगले आयोजित केले होते. नंतरच्या वर्षी बहुभाषा संमेलनही डॉ.गणेश देवी यांच्या अध्यक्षतेखाली घुमान येथेच घेतले होते. दिल्ली येथील साहित्य संमेलनाचेही तेच आयोजक आहेत.

पहिले मराठी साहित्य संमेलन ७ फेब्रुवारी १८७८ या दिवशी पुण्यात न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते. या संदर्भात  “ज्ञानप्रकाश ” या नियतकालिकात रानडे आणि लोकहितवादी(गोपाळ हरी देशमुख)यांचे संयुक्त निवेदन प्रसिध्द झाले. ग्रंथकार संमेलन भरविण्याचा प्रस्ताव आला, त्यास ५० साहित्यिकांचा पाठिंबा होता. खरे तर रानडे यांचे एकही पुस्तक नसले तरी त्यांनीच संमेलनाचे अध्यक्षपद भूषवावे, असा लोकहितवादींसह अन्य प्रतिष्ठीत लेखकांचा आग्रह होता. २४ मे १८८५ या दिवशी पुण्यात दुसरे ग्रंथकार संमेलन झाले. कृष्णाशास्त्री राजवाडे हे अध्यक्ष होते. संमेलनासाठी न्या.रानडे यांनी पुढाकार घेतला होता.

तो काळ  होता संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा. साल होते १९५७. तत्कालीन औरंगाबाद आणि आताचे छत्रपती संभाजनगर येथे लघुनिबंधकार अनंत काणेकर यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन सरस्वती भुवन प्रशालेत झाले. मराठी साहित्यातील ऐकापेक्षा एक दिग्गज लेखक-दत्तो वामन पोतदार, कुसुमाग्रज, आचार्य अत्रे, पु.ल.देशपांडे, वसंत बापट, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर अशी ग्रेट मंडळी हजर होती. यात “, संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे “, असा ठराव मंजूर झाला. पु.ल.देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली इचलकरंजीत सुवर्ण महोत्सवी संमेलन झाले. कराडला जेव्हा १९७५ साली आणीबाणीच्या काळात जे अ.भा.मराठी साहित्य संमेलन झाले. त्याच्या अध्यक्ष दुर्गाबाई भागवत तर स्वागताध्यक्ष यशवंतराव चव्हाण  होते. मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या प्रश्नाने पुण्यातील पु.भा.भावे यांच्या अध्यक्षते खालचे व कथालेखक  वा.कृ.चोरघडे यांच्या अध्यक्षतेखालचे  चंद्रपुर येथील संमेलन फारच गाजले होते. १९८१ मध्ये ५६ वे संमेलन मध्यप्रदेशात रायपूर येथे झाले.अध्यक्ष होते गंगाधर गाडगीळ. नगर येथे झालेले संमेलन उंचीवर नेणारेच होते. ऐतिहासिक कादंबरीकार ना.स.इनामदार अध्यक्ष होते. गुलजार उद्घाटक तर गिरीष कर्नाड समारोपात होते. एप्रिल १९९८ मध्ये परळी वैजनाथ येथे साहित्यसंमेलन झाले. द.मा.मिरासदार हे संमेलनाचे अध्यक्ष होते. समारोपात ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या लेखिका महाश्वेतादेवी हजर होत्या.आशा भोसले यांच्या गाण्यांची मैफल रंगली होती, अशा प्रकारे सामाजिक प्रश्नांवरही साहित्यसंमेलनातून भुमिका मांडण्यात आली आहे.

महिला अध्यक्षांची परंपरा

शतकाकडे वाटचाल करणाऱ्या या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून महिलांना मान मिळाला तो सहा महिला साहित्यिकांना. कुसुमावती देशपांडे(ग्वाल्हेर), दुर्गा भागवत(कराड), शांताबाई शेळके(आळंदी),  डॉ.विजया राजाध्यक्ष(इंदूर), डॉ.अरुणा ढेरे(वर्धा)आणि आत्ताच्या संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष डॉ.ताराबाई भवाळकर(नवी दिल्ली).

संमेलन गाजतात लक्षात राहातात ती उत्तम नियोजन,भोजन व्यवस्थेमुळे. अशा संमेलनातून ग्रंथ विक्री उदंड होते,ती संमेलने यशस्वी होतात. संमेलन म्हटले की वाद-विवाद सोबतच येतात. असे असले तरी जगभरातील मराठी भाषक संमेलनावर फार प्रेम करतो,गर्दी करतो. संमेलन येण्याची उत्सुकता साहित्यप्रेमी वाचकांना असते आणि संमेलन संपले की रिकाम्या मांडवाकडे पाहून हुरहुर वाटते,आणि काही दिवसांनी पुन्हा संमेलनाचे दिवस आनंद घेवून येतात..

००००

लेखक – प्रशांत गौतम

(लेखक हे साहित्यिक, ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

 

 

ताज्या बातम्या

दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहण्याचे निवृत्तीवेतनधारकांना आवाहन

0
मुंबई, दि. 9 : संचालनालय, लेखा व कोषागारे तसेच अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई व सर्व कोषागार कार्यालये यांच्यामार्फत सर्व निवृत्तीवेतनधारकांना सूचित करण्यात येते...

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्यासंदर्भातील शासन निर्णय जारी

0
मुंबई, दि.9 : राज्यातील मच्छिमार व मत्स्यसंवर्धक यांना कृषी क्षेत्राप्रमाणे विविध पायाभूत सुविधा व सवलती उपलब्ध करून देण्यासाठी मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्यासंदर्भातील शासन...

खाजगी बाजार व थेट बाजारांच्या सुविधांची तपासणी करावी – पणन मंत्री जयकुमार रावल ...

0
पुणे, दि. 9 : राज्यात शेतकऱ्यांना शेतमाल विक्री साठी कृषी उत्पन्न बाजार समिती व्यतिरिक्त 105 खाजगी बाजार तसेच थेट बाजार कार्यरत आहेत. काही खाजगी...

आधुनिक कृषी तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा – पालकमंत्री नितेश राणे

0
सिंधदुर्गनगरी दि ०९ (जिमाका) : कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना अनेक प्रकारे मदत झाली आहे. नवीन आणि सुधारित...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्र विकासाचा प्रस्ताव सादर करावा – उच्च व तंत्रशिक्षण...

0
नाशिक, दि. ९ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक येथील उपकेंद्राच्या इमारतीत येत्या जून महिन्यापासून विविध अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन करावे. रस्ते, वीज, पाणी...