शनिवार, ऑगस्ट 9, 2025
Home Blog Page 1706

कौशल्यविषयक अभ्यासक्रमातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

नागपूर, दि. 23 : गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात आदिवासी भागातील मुलामुलींना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. विद्यापीठाने कौशल्यविषयक अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे. अशा सूचना राज्यपाल तथा गोंडवाना विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी दिल्या.

आज राजभवनातील सभागृहात गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या प्रश्नाबाबत आयोजित आढावा सभेत श्री. कोश्यारी बोलत होते. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, वनविभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, राज्यपालांचे प्रधान सचिव संतोषकुमार, वित्त विभागाच्या सचिव श्रीमती शैला ए., विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीना, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रभारी संचालक शैलेश देवळाणकर व शिक्षण विभागाच्या उपसचिव प्राची जांभेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. कोश्यारी म्हणाले, विद्यापीठासाठी लागणाऱ्या भूसंपादनासाठी अधिसूचना काढण्यात यावी. विद्यापीठासाठी ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात येईल, त्या शेतकऱ्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे मोबदला देण्यात यावा. त्या शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना या विद्यापीठात चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. तसेच स्थानिकांना विद्यापीठात काही प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. आदिवासी आणि नक्षलग्रस्त जिल्ह्यात गोंडवाना विद्यापीठ असल्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि रोजगाराभिमुख शिक्षण येथूनच मिळाले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

 श्री. मुनगंटीवार म्हणाले, गोंडवाना विद्यापीठासाठी लागणारी जमीन अधिग्रहित करण्यात यावी. त्यासाठी शासन नियमाप्रमाणे मोबदला देता येईल. विद्यापीठातील विद्यार्थ्यांना उत्तुंग भरारी घेताना त्यांना अडचणी येणार नाही, याची दक्षता घ्यावी. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन विद्यापीठासाठी लागणाऱ्या आवश्यक जमिनीची भूसंपादन प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी. गोंडवाना विद्यापीठाला वन व आदिवासी क्षेत्रातील विद्यापीठाचा दर्जा मिळाला पाहिजे. त्यामुळे दर्जेदार शैक्षणिक सुविधा आणि केंद्र सरकारकडून निधी मिळण्यास मदत होईल.नाविन्यपूर्ण शैक्षणिक सुविधा गोंडवाना विद्यापीठात निर्माण झाल्या पाहिजेत. अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

आमदार डॉ. होळी म्हणाले, विद्यापीठाकरीता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात येणार आहे, त्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला देताना त्यांच्या मुलांना रोजगाराच्या दृष्टीने कौशल्यविषयक प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून द्यावा.

श्री. रस्तोगी म्हणाले, देशातील वन व आदिवासी विद्यापीठाचा दर्जा मिळालेल्या इतर विद्यापीठात कशाप्रकारच्या शैक्षणिक सुविधा व दर्जा देण्यात आला आहे, हे बघून त्या दृष्टीने गोंडवाना विद्यापीठासाठी काम करण्यात येईल.

श्री. मीणा यांनी गोंडवाना विद्यापीठासाठी उपलब्ध असलेली जमीन आणि संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीबाबतची माहिती नकाशाच्या माध्यमातून राज्यपालांना यावेळी दिली.

डॉ. श्री. बोकारे म्हणाले, गोंडवाना विद्यापीठात विविध कौशल्यविषयक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे. काही अभ्यासक्रम नव्याने सुरू करण्यात येतील. सध्या 17 एकर  जागेवर विद्यापीठाचा परिसर आणि इमारती आहे. विद्यापीठाला आणखी 100 एकर जमीन आता उपलब्ध झाली आहे. ज्या जमिनीची विद्यापीठाला आवश्यकता आहे, ती जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भूसंपादनासाठी लागणारा निधी उपलब्ध होणार आहे. दहावी आणि बारावीनंतर शिक्षण प्रवाहात नसलेल्या मुलांना विद्यापीठ कौशल्यविषयक प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेल. चंद्रपूर येथे विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करणे प्रस्तावित असल्याचे सांगून विद्यापीठाविषयी इतर माहिती त्यांनी यावेळी दिली.

000000

पाणी पुरवठा योजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही – मंत्री गुलाबराव पाटील

चंद्रपूर,दि.२३: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जलजीवन मिशन ही योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत चिमूर, नागभिड व ब्रम्हपूरी तालुक्यांना ३०० कोटी रुपये मिळाले असून या क्षेत्रातील ९० टक्के गावे नळजोडणीद्वारे जोडली गेली आहेत. या क्षेत्रातील पाणी पुरवठ्याच्या योजनांसाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

जलजीवन मिशन अंतर्गत शंकरपूर येथे चिमूर, नागभिड व ब्रम्हपूरी तालुक्यातील ३०० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे आभासी पद्धतीने लोकार्पण व भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडले, यावेळी ते बोलत होते.

चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडीया, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाचे मुख्य अभियंता राजेंद्र काटपल्लीवार, अधीक्षक अभियंता प्रशांत बुरडे, उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, कार्यकारी अभियंता विनोद उद्धरवार, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता ओमराज हेडाऊ, कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे आदी उपस्थित होते.

जलजीवन मिशन अभियानामध्ये केंद्र सरकारचा ५० टक्के व राज्य शासनाचा ५० टक्के सहभाग आहे. ग्रामीण भागात घराघरातील नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचविणे हे शासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. असे सांगून मंत्री श्री. पाटील म्हणाले की, या अभियानांतर्गत ३२ हजार गावांचे डिपीआर तयार करण्याचे कार्य केले. पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून सर्वात मोठे काम या क्षेत्रात झाले आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, नळ योजनेतून ४० लिटर प्रतिदिन प्रतिमाणसे पाणीपुरवठा होत होता, आता ५५ लिटर प्रतिदिन प्रतिमाणसे पाणीपुरवठा होणार आहे. विज बिलाची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी सर्व पाणी पुरवठ्याच्या योजना सोलर प्रणालीवर कार्यान्वित करण्यात आल्या आहे. या योजनेच्या माध्यमातून घरपोच पिण्याचे पाणी मिळत असल्याने महिलांचा त्रास कमी झाला असून पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. जलजीवन मिशन योजनेतंर्गत या क्षेत्रात चांगले काम करा, निकृष्ठ कामे केल्यास दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

आमदार श्री. भांगडीया म्हणाले की, केंद्र सरकार जल जीवन मिशन देशात राबवित आहे. देशात व राज्यभरात मोठ्या प्रमाणात कामे सुरु आहेत. हर घर नल से जल या योजनेच्या माध्यमातून महिलांचा त्रास कमी होणार आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून सुमारे ३००  कोटी रु. निधी या क्षेत्रासाठी मिळवून दिला आहे. जलजीवन मिशन अतंर्गत पाणीपुरवठा योजनेचा सर्वप्रथम व सर्वाधिक लाभ चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरला मिळाला आहे. तत्पुर्वी, मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते संत जगनाडे महाराज सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन पार पडले.

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे यांनी प्रास्ताविक केले.

किशोर गलांडे यांनी सूत्रसंचालन केले तर राजू देवतळे यांनी आभार मानले.

 

000

 

आमदार मुक्ता टिळक यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुणे, दि. २३ : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.  शासनाच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल,  माजी मंत्री रमेश बागवे, बाळा भेगडे, विजय शिवतारे, माजी आमदार जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार  देशमुख आदी उपस्थित होते.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, आमदार मुक्ता टिळक यांनी सुरुवातीच्या काळात नगरसेवक म्हणून काम केले. नगरसेवक असतांना सभागृह नेता,स्थायी समितीवरही काम केले. पुणे महानगर पालिकेत २०१७ मध्ये त्यांनी पुणे शहराच्या महापौर पदाची जबाबदारी उत्तमरितीने पार पाडली. लोकमान्य टिळकांचा विचार त्या स्वतः जगत होत्या. सामाजिक कार्यात योगदान देताना त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी प्रसंगी संघर्षही केला.  संघटनेचा आदेश कार्यकर्ता म्हणून आपली भूमिका कशी पार पाडावी हे   राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीवेळी मुक्ताताईनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. टिळक कुटुंबियांना दु:ख सहन करण्याची शक्ती ईश्वर देवो, असे ते म्हणाले.

आमदार मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राजकीय, सामाजिक, उद्योग, कला, साहित्य, सांस्कृतिक आदी क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

000

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले आमदार मुक्ता टिळक यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

पुणे, दि. २३ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केसरीवाडा येथे आमदार मुक्ता टिळक यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार प्रविण दरेकर, माधुरी मिसाळ, माजी मंत्री विजय शिवतारे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना श्री.फडणवीस म्हणाले की, आमच्या सर्वांसाठी हा अत्यंत दु:खाचा दिवस आहे. पुण्याच्या संपुर्ण सामाजिक-राजकीय पटलावर अत्यंत संघर्षशील व्यक्तिमत्व म्हणून मुक्ताताईंचा परिचय आहे. त्या नगरसेविका, महापौर आणि आमदार म्हणून जनतेशी जोडल्या गेल्या होत्या. टिळक घराण्याचा वारसा समर्थपणे सांभाळत होत्या. गेली तीस वर्षे भारतीय जनता पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या म्हणून स्वत:च्या मेहनतीने आणि जनसंपर्काच्या बळावर सामान्य कार्यकर्तीपासून वेगवेगळ्या पदापर्यंत त्या पोहोचल्या.

मुक्ताताई कल्पक होत्या, चांगल्या वक्त्या होत्या. राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणूकीच्या वेळी प्रकृती बरी नसतानाही त्या मतदान करायला आल्या. त्यांच्या प्रकृतीमुळे त्यांना प्रवास न करण्याची विनंती केली होती. मात्र, पक्षासाठी अशा स्थितीतही येऊन त्यांनी मतदान केले. असे समर्पित नेतृत्व, कार्यकर्ता निघून जाणे ही पक्षाची आणि समाजाची न भरून निघणारी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी टिळक कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी शैलेश टिळक, कुणाल टिळक, श्रुतिका टिळक, चैत्राली टिळक-भागवत, हर्षद भागवत, रोहित टिळक, दीपक टिळक, प्रणिती टिळक उपस्थित होते.

खासदार गिरीश बापट यांची भेट

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात खासदार गिरीश बापट यांची भेट घेऊन प्रकृतीविषयी माहिती घेतली. खासदार बापट यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते लवकर बरे होऊन घरी परततील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

000

संसदीय अभ्यासवर्गात रविवारी विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, उपसचिव विलास आठवले यांचे मार्गदर्शन

नागपूर, दि. 23 : राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने राज्यातील विद्यापीठांतील राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 49 व्या संसदीय अभ्यासवर्गात रविवार दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वा. ‘कार्यपालिका व न्यायपालिका यांच्यातील परस्पर संबंध’ याविषयावर विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत हे मार्गदर्शन करणार आहेत. तर सकाळी 11 वा. ‘भारतीय संविधान आणि विधिमंडळाची रचना, कार्यपद्धती व कायदा तयार करण्याची प्रक्रिया’ या विषयावर विधानमंडळाचे उपसचिव विलास आठवले हे मार्गदर्शन करणार आहेत.

भारतातील संसदीय लोकशाही कशा पद्धतीने कार्यरत आहे, कार्यकारी मंडळावर विधानमंडळामार्फत कशा प्रकारे नियंत्रण ठेवले जाते, त्यासाठी कोणकोणत्या संसदीय आयुधांचा  वापर केला जातो, अर्थसंकल्पीय प्रक्रिया, विधिमंडळाची समिती पद्धती, कायदा तयार करण्याची प्रक्रिया इत्यादीबाबतची प्रत्यक्ष माहिती नामांकित संसदपटू व तज्ज्ञांच्या व्याख्यानांमधून तसेच सभागृहाच्या प्रत्यक्ष कामकाजाच्या अवलोकनाद्वारे विद्यार्थ्यांना या व्याख्यानांतून मिळत असते.

००००

दत्तात्रय कोकरे/जिमाअ/23.12.22

संसदीय अभ्यासवर्गात सोमवारी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, दै. सकाळचे संपादक संदीप भारंबे यांचे मार्गदर्शन

नागपूर, दि. 23 : राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने राज्यातील विद्यापीठांतील राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 49 व्या संसदीय अभ्यासवर्गात सोमवार दिनांक 26 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वा. ‘विधिमंडळाचे कामकाज आणि प्रसारमाध्यमांची भूमिका व जबाबदारी’ या विषयावर दै.सकाळ, नागपूर आवृत्तीचे संपादक संदीप भारंबे मार्गदर्शन करणार आहेत तर सकाळी 9.30 वा. ‘संसदीय लोकशाहीत सत्तारुढ आणि विरोधी पक्षांचे स्थान, कर्तव्ये आणि विधिमंडळातील भूमिका’ या विषयावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार मार्गदर्शन करणार आहेत.

भारतातील संसदीय लोकशाही कशा पद्धतीने कार्यरत आहे, कार्यकारी मंडळावर विधानमंडळामार्फत कशाप्रकारे नियंत्रण ठेवले जाते, त्यासाठी कोणकोणत्या संसदीय आयुधांचा  वापर केला जातो, अर्थसंकल्पीय प्रक्रिया, विधिमंडळाची समिती पद्धती, कायदा तयार करण्याची प्रक्रिया इत्यादी बाबतची प्रत्यक्ष माहिती नामांकित संसदपटू व तज्ज्ञांच्या व्याख्यानांमधून तसेच सभागृहाच्या प्रत्यक्ष कामकाजाच्या अवलोकनद्वारे विद्यार्थ्यांना या व्याख्यानांतून मिळत असते.

००००

दत्तात्रय कोकरे/जिमाअ/23.12.22

 

 

विधानपरिषदेत दिवंगत मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली

नागपूर, दि. 23 : विधानसभेच्या सदस्या मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने त्यांना विधानपरिषदेमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडलेला शोक प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

या शोकप्रस्तावात डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, दिवंगत मुक्ता शैलेश टिळक यांचा जन्म १७ ऑगस्ट १९६५ रोजी मध्यप्रदेश राज्यातील ग्वाल्हेर येथे झाला. त्यांचे शिक्षण एम. ए. (मानसशास्त्र), डी. बी. एम., डी. एम. एम. पर्यंत झाले होते. दिवंगत टिळक यांनी आनंदवन मित्र मंडळाच्या अध्यक्षा, लोकमान्य टिळक विचार मंचच्या विश्वस्त म्हणून कार्य केले. त्यांनी इंटरनॅशनल लेप्रसी युनियनच्या उपाध्यक्षा, पुणे येथील प्रेरणा महिला मंडळाच्या संस्थापिका तसेच दृष्टी महिला विचार मंचच्या कार्यकारिणी सदस्या म्हणूनही उत्तम कार्य केले होते. लोकमान्य दैनंदिनीच्या त्या संपादिका होत्या.

दिवंगत टिळक या भारतीय जनता पक्ष पुणे शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्षा म्हणूनही कार्यरत होत्या. सन २००२ ते २०१९ या कालावधीत पुणे महानगरपालिकेच्या सदस्या, तसेच सन २०१७ ते २०१९ या कालावधीत पुणे महानगरपालिकेच्या महापौर होत्या. त्या सन २०१९ मध्ये पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाल्या होत्या. त्यांनी गौरवशाली काम केले होते, असेही डॉ. गोऱ्हे यांनी शोकप्रस्तावात म्हटले.

००००

धोंडिराम अर्जुन/ससं/

विधानसभेत मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली

मुक्ता टिळक यांच्या निधनाने समाजाचे नुकसान – अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

नागपूर, दि. 23 : विधानसभा सदस्य मुक्ता टिळक यांच्या निधनाने केवळ एका पक्षाचेच नव्हे तर संपूर्ण समाजाचे नुकसान झाले आहे, अशा शब्दांत विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी शोक भावना व्यक्त केल्या.

ॲड.नार्वेकर म्हणाले, दिवंगत टिळक यांनी आनंदवन मित्र मंडळाच्या अध्यक्षा, लोकमान्य टिळक विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षा म्हणून काम केले होते. त्यांनी इंटरनॅशनल लेप्रसी युनियनच्या उपाध्यक्षा, पुणे येथील प्रेरणा महिला मंडळ आणि दृष्टी महिला मंचच्या संस्थापिका म्हणून काम केले होते. लोकमान्य दैनंदिनीच्या त्या संपादिका होत्या. सन २०१९ मध्ये कसबा मतदारसंघातून त्या विधानसभेवर निवडून आल्या होत्या.

लोकप्रतिनिधींनी पक्षनिष्ठा आणि कर्तव्य कसे बजावावे याचे त्या मूर्तिमंत उदाहरण होत्या. आजारी असतानासुद्धा त्या सभागृहाच्या कामकाजात सहभागी होत असत. अशा निष्ठावान, कर्तृत्ववान लोकप्रतिनिधींच्या निधनाने  केवळ पक्षाचेच नव्हे तर  संपूर्ण समाजाचे नुकसान झाले आहे, अशा शब्दांत ॲड. नार्वेकर यांनी शोक भावना व्यक्त केल्या.

आदर्श लोकप्रतिनिधी गमावला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कसबा मतदारसंघातील आमदार श्रीमती मुक्ता टिळक यांच्या निधनाने एक उत्तम समाजसेविका आणि आदर्श लोकप्रतिनिधी आपण गमावल्या आहेत. अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिवंगत टिळक यांना श्रद्धांजली अर्पण केली.

आपल्या शोक भावना व्यक्त करताना श्री. शिंदे म्हणाले, श्रीमती टिळक यांचे सर्वपक्षीय लोकांसोबत सलोख्याचे संबंध होते. उच्चशिक्षित असलेल्या मुक्ताताई या आमदार होण्यापूर्वी नगरसेविका होत्या. 2017 साली पुणे महानगरपालिकेच्या महापौर म्हणूनही त्या विराजमान झाल्या होत्या.

मुक्ताताईंनी लोकप्रतिनिधी म्हणून सर्वांना सोबत घेऊन काम केले. काही दिवसांपूर्वी आजारी असतानादेखील त्यांनी राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी रुग्णवाहिकेतून येऊन मतदान केले.

त्यांच्या कुटुंबियांना मुक्ताताईंच्या निधनाचे हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो, आपण सर्व त्यांच्या दु:खात सहभागी आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

***

अर्चना शंभरकर/विसंअ/

हडस विद्यालयाच्या सहअध्यायी मित्र गटाचे राज्यपालांशी हितगुज

नागपूर, दि. २३ : नागपूर येथील हडस विद्यालयात सन १९७० मध्ये इयत्ता १० वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या सहअध्यायी मित्रांच्या गटाने आज राजभवन येथे राज्यपाल भगत‍ सिंह कोश्यारी यांची भेट घेत त्यांच्याशी विविध विषयांवर हितगुज केले.

राज्यपाल श्री. कोश्यारी यावेळी त्यांच्याशी संवाद साधतांना म्हणाले की, भारतीय संस्कार आज प्रत्येक व्यक्तीत रुजले पाहिजे. प्रत्येक व्यक्ती हा संस्कारक्षम असला पाहिजे. युवा पिढीमध्ये भारतीय संस्काराची गरज आहे. आपली संस्कृती आदर्श आहे.

या गटातील मित्र नागपूर, पुणे आणि मुंबई येथे राहत असून विविध समाजपयोगी उपक्रम राबवित आहेत. गरीब विद्यार्थ्यांना मदत करणे, पर्यावरणपूरक उपक्रम राबविणे अशा उपक्रमात योगदान देत आहेत.

सहअध्यायी १९७० च्या या गटाचे अविनाश पाठक, गणेश जिभेणकर, दिलीप पाठक, डॉ. गंगाधर गोखले, श्रीमती सरीता पवार, मनोहर भोसले, निला भोसले, संजू भुसारी, निरंजन नाझर, दिलीप भाटवडेकर, विकास जोशी, अनुरूपा पाठक, वंदना पाठक, भारती गोखले, निला भोसले, सुप्रिया भुसारी, सुवर्णा नगरकर, कल्पना पाध्ये, मधुरा पाध्ये, सविता भाटवडेकर, माधुरी भोयर व मोहिनी जोशी यांची उपस्थिती होती.                                                                       000

रेडक्रॉस सोसायटीमध्ये लोकांचा सहभाग वाढवा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

नागपूर, दि. २३ : देशात परोपकाराची भावना आजही कायम आहे. इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांना मदत करण्यात येते. इंडियन रेडक्रॉस सोसायटी ही जुनी आणि महत्त्वाची संस्था आहे. रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात समाजपयोगी कामे करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना सहभागी करुन घ्यावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

राजभवन येथे राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते इंडियन रेडक्रॉस सोसायटी शाखा भंडाराच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात श्री. कोश्यारी बोलत होते. राज्यपालांचे प्रधान सचिव संतोषकुमार, उपसचिव श्वेता सिंगल, इंडियन रेडक्रॉस सोसायटी शाखा भंडाराचे अध्यक्ष डॉ. अशोक ब्राह्मणकर, उपाध्यक्ष डॉ. चंद्रमणी गुप्ता व सचिव डॉ. नितीन तुरस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.

रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून विविध लोकोपयोगी कामे करण्यात येतात. प्रत्येक व्यक्ती जागरूक झाला तर आपण आपल्या परिसरातील समस्यांवर मात करू शकतो, असे राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले.

राज्यपालांच्या हस्ते डॉ. चंद्रमोहन गुप्ता यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानपत्र, गौरवचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच ८१ वेळा रक्तदान करणारे प्रीतम राजाभोज, ४०० आजीवन रेडक्रॉस सोसायटीचे सदस्य करणारे ललित थानथराटे, २४ पदव्या प्राप्त करणारे ॲड. डॉ. सौरभ गुप्ता यांना देखील सन्मानित केले.

डॉ. ब्राह्मणकर यांनी प्रास्ताविकातून इंडियन रेडक्रॉस सोसायटी शाखा भंडारा राबवित असलेल्या विविध उपक्रम व कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी इंडियन रेडक्रॉस सोसायटी शाखा भंडाराचे हेमंत चंदावस्कर, डॉ. नितीन तुरस्कर, दिनेश पंचबुद्धे, प्रीतम राजाभोज, राजीव खवसकर, डॉ. निलेश गुप्ता, अमित वसानी, हनुमानदास अग्रवाल, किशोर चौधरी, रतन कळंबे, दीपक व्यवहारे, वासुदेव निर्वाण, डॉ. विशाखा गुप्ते, मीरा भट्ट, सुचिता गुप्ता व सुनीता गुप्ता यांची उपस्थिती होती.

000

ताज्या बातम्या

पहिल्या स्मार्ट इंटेलिजंट सातनवरी या गावातील डिजिटल उपक्रमामध्ये ग्रामस्थानांचा सहभाग आवश्यक – विजयलक्ष्मी बिदरी

0
ग्रामस्थांसोबत संवाद, इंटरनेट, वायफाय सुविधेचा वापर करा; ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत विविध कंपन्यांचा सहभाग नागपूर, दि. 8: देशातील सर्वात स्मार्ट इंटेलिजंट गाव म्हणून निवड झालेल्या...

गोडोली तळे सातारच्या सौंदर्यात भर घालेल – पालकमंत्री शंभूराज देसाई

0
सातारा, दि.8 : सातारा येथील गोडोली तळ्याच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामाची पाहणी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी करुन सातारा नगरपालिकेने अत्यंत चांगल्या...

ग्रामीण भागातील प्रत्येक भगिनी स्वयंपूर्ण व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील – ग्राम विकास मंत्री जयकुमार...

0
सातारा (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील प्रभाग संघांना आज रक्षाबंधन सणानिमित्त ऑनलाइन राज्यस्तरीय समुदाय निधी वितरण सोहळ्यामध्ये ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या...

शेतकऱ्यांचे हित आणि एपीएमसी आधुनिकीकरणासाठी केंद्र व राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घ्यावी – मंत्री...

0
नवी दिल्ली, 8:- शेती उत्पादन व्यवस्थापन, शेतकऱ्यांना योग्य मोबदला, साठवणूक सुविधांचे आधुनिकीकरण आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (एपीएमसी) पायाभूत सुविधा विकासासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय...

पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश; ८५९.२२ कोटी...

0
उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जल सिंचनासाठी महत्वपूर्ण निर्णय मुंबई, दि. ८:- अमळनेर तालुक्यातील (जि. जळगाव) पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत...