रविवार, ऑगस्ट 17, 2025
Home Blog Page 1681

प्रजासत्ताक दिन मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम

मुंबई, दि. 24- भारतीय प्रजासत्ताकाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर 26 जानेवारी रोजी मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाची रंगीत तालीम आज झाली. यावेळी सहसचिव तथा सह मुख्य राजशिष्टाचार अधिकारी रामचंद्र धनावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) अनुप कुमार सिंह यांच्यासह वरिष्ठ शासकीय तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते.

आज झालेल्या रंगीत तालमीत भारतीय नौदल, तेलंगना पोलीस पथक, राज्य राखीव पोलीस बल, बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र बल, बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दल, मुंबई रेल्वे पोलीस दल, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याचे सी-60 पथक, गृहरक्षक दल पुरूष व महिला,  बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल यांच्यासह विविध पथ दल, विभाग, शाळा, पथक यांनी सहभाग घेतला.

तसेच, राज्य शासनाच्या 16 विभागांनी जनहिताचे संदेश देणाऱ्या चित्ररथांसह तालमीत सहभाग घेतला.

उत्कृष्ट संचलन पुरस्कार

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 1 मे 2022 रोजी झालेल्या महाराष्ट्र दिन समारोहात उत्कृष्ट संचलन केलेल्या पथकांना अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) अनुप कुमार सिंग यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. यामध्ये बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथकास प्रथम, बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दलास द्वितीय तर राज्य राखीव पोलीस बलास तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.

00000

बाळासाहेबांची अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण, विचार, वारसा घेऊन आमची वाटचाल –  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबई, दि.२३ : स्व. बाळासाहेब ठाकरे हे हिमालया एवढे उत्तुंग व्यक्तिमत्व होते. त्यांच्या विचारातून अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ आणि ऊर्जा सर्वसामान्यांना मिळाली. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि मराठी माणसाच्या एकजुटीसाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांची शिकवण, विचार आणि ऐंशी टक्के समाजकारणाचा वारसा घेऊन पुढे जात आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            विधान मंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात आज सायंकाळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषद  उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे,  विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी खासदार गजानन किर्तीकर, माजी मंत्री रामदास कदम यांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.

            मुख्यमंत्री  श्री. शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांवर आणि त्यांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या  प्रत्येकासाठी हा दिवस महत्वाचा आहे. अनेक कार्यकर्ते विधिमंडळात त्यांच्यामुळे पोहोचू शकले. मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेबांचे तैलचित्र लावले जातेय हा महत्वाचा क्षण आहे. बाळासाहेबांनी खऱ्या अर्थाने लोकांसाठी राज्य चालवले. सर्वसामान्यांपर्यंत  सत्ता पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. बाळासाहेबांच्या परीस स्पर्शाने अनेकांचे सोने झाले, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की,  त्यांचे विचार ऐकताना ऊर्जा येते आणि प्रेरणा मिळते. अन्याय विरूध्द लढण्याचे बळ मिळते. बाळासाहेब आमचे कुटुंबप्रमुख होते. ते गुरुस्थानी होते.

            शत्रू राष्ट्रालाही त्यांची जरब वाटायची. ते उत्तुंग आणि हिमालयाएवढं व्यक्तिमत्त्व होते. मात्र, तितकेच ते कोमल हृदयाचे होते. लोकांच्या अडचणी बाबत ते कायम जागरूक असायचे, अशी आठवण त्यांनी सांगितली. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, धाडस आणि आत्मविश्वास बाळासाहेबांनी दिला. त्यांच्या विचारात ओतप्रोत राष्ट्रभक्ती भरलेली होती.  विचारांशी तडजोड त्यांनी कधी केली नाही. सर्वसामान्यांच्या हितासाठी त्यांनी रिमोट कंट्रोलचे काम केले असल्याचे त्यांनी नमूद केले.

            बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वात अनेक विचारधारांचा मिलाफ आढळून यायचा. विभिन्न क्षेत्रातील अनेकांवर संकटे आली तेव्हा त्यांच्या पाठीमागे बाळासाहेब खंबीरपणे उभे राहिले. कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम त्यांनी नेहमी केले, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचे काम स्व. बाळासाहेबांनी केले – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मुंबईतील जसा विशाल महासागर आहे तसे आणि आवश्यक तेव्हा तुफानापेक्षा अधिक संघर्ष करणारे बाळासाहेब यांचे व्यक्तिमत्त्व होते. महाराष्ट्र आणि देशाच्या नेत्यांच्या मांदियाळीतले वेगळेपण दाखवणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.

            बाळासाहेब यांच्यामध्ये एक ऊर्जा होती. ती कायम कार्यकर्त्यांमध्ये रुजविण्याचे काम केले. त्यांचा मनाचा मोठेपणा हा त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही अनुभवल्याची आठवण उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितली.

            ते म्हणाले की, स्पष्टवक्तेपणा हा बाळासाहेबांचा गुण होता. एकदा बोललेले वक्तव्य परत घेण्याची वेळ त्यांनी येऊ दिली नाही. तत्वासाठी कायम राजकारण केले. त्यांनी कधी जातपात पहिली नाही. अनेकांना त्यांनी निवडून आणून दाखवले. जातिव्यवस्थेचा  पगडा कमी करण्याचे काम त्यांनी केल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

            बाळासाहेबांच्या तैलचित्रातून प्रत्येक जण प्रेरणा घेईल. विचारांची प्रतिबद्धता त्यांनी  शिकवली. त्या विचारांसोबत असणे हीच त्यांना श्रद्धांजली होईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

            विधानसभेचे अध्यक्ष ॲड. नार्वेकर म्हणाले, की स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे समाजकारणाची संधी मिळाली. त्यांनी सामान्यांतील सामान्य माणसावर विश्वास दाखविला. त्यांच्या विचारानुसार महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे.

            केंद्रीय मंत्री श्री. राणे म्हणाले की,  स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हितासाठी संघटना स्थापन केली. त्यांनी मराठी माणसाला प्रतिष्ठा मिळवून दिली.

            विधानपरिषद उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, जातीपातीच्या पलिकडे जाऊन बाळासाहेबांनी काम केले.

            श्री. राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला.  विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते श्री. दानवे यांनी बाळासाहेब हे देशाला दिशा देणारे नेतृत्व होते, असे सांगितले

            विधानसभेतील विरोधी पक्षनेते श्री. पवार म्हणाले की, स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व उत्तुंग होते. त्यांचे राष्ट्रहिताचे विचार  नेहमीच मार्गदर्शक ठरतील. मराठी माणसांच्या हक्कासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी लढा दिला. त्यांच्यामुळेच मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे होऊ शकला.

            मंत्री श्री. केसरकर यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, की बाळासाहेब ठाकरे उत्कृष्ट व्यंगचित्रकार, संपादक आणि सामाजिक सुधारणांचे अग्रणी होते. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत योगदान दिले.

यावेळी विधान सभेचे अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांच्या संकल्पनेवर आधारित आणि ज्येष्ठ पत्रकार दिलीप चवरे लिखित ‘झंझावात’ हा बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित माहितीपट दाखविण्यात आला. चित्रकार किशोर नांदिवडेकर यांचा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी विधानभवन परिसरात बाळासाहेबांच्या जीवनावरील चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

            अभिनेते प्रसाद ओक यांनी सूत्रसंचालन केले तर आभार विधानसभा उपाध्यक्ष श्री. झिरवाळ यांनी मानले. कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, विविध देशांचे वाणिज्य दूत, नागरिक उपस्थित होते.

०००००

 

 

 

बीड जिल्ह्यातील रोहन बहीर याला ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

नवी दिल्ली, २३ :बीड जिल्ह्यातील रोहन बहीर याने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, नदीच्या पुरात वाहून जाणाऱ्या महिलेचे प्राण वाचविले. या साहसी शौर्याबद्दल त्याला ‘ प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ ने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

येथील विज्ञान भवनात केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2023’ प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार प्रदान सोहळ्यात केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी,  केंद्रीय महिला व बाल विकास राज्य मंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई, सचिव इंदिवर पांडे मंचावर उपस्थित होते.

याप्रसंगी देशभरातील 11 बालकांना सहा विविध श्रेणींमध्ये त्यांनी केलेल्या उल्लेख‍नीय कामगिरीसाठी ‘ प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने आज सन्मानित करण्यात आले. यामध्ये 6 मुले आणि 5 मुलींचा समावेश आहे. राज्यामधून बीड जिल्ह्यातील रोहन बहीर या बालकाला त्याने केलेल्या शौर्यासाठी गौरविण्यात आले.  प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराचे स्वरूप पदक, 1 लाख रूपये रोख आणि प्रमाणपत्र असे आहे.

रोहन याने असे वाचविले प्राण

बीड जिल्ह्यातील राजुरी नवगण येथील रोहन बहीर याने गावातील डोंगरी नदीला आलेल्या पुरात पाय घसरून पडलेल्या महिलेला स्वत:च्या जीवाची पर्वा न करता मोठ्या साहसाने वाचविले. रोहनच्या  समय सूचकतेमुळे महिलेचे प्राण वाचले. त्याच्या या शौर्यासाठी आज त्याला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कला आणि संस्कृती, शौर्य, नवोपक्रम (Innovation), शैक्षणिक, समाजसेवा आणि क्रीडा अशा क्षेत्रात  ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि राष्ट्रीय स्तरावर ज्यांना मान्यता मिळाली, अशा 5 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांची निवड करण्यात आली होती.

यावर्षी देशभरातून निवडलेल्या 11 मुला-मुलींना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये कला आणि संस्कृती क्षेत्रात (4), शौर्य (1), नवोपक्रम (2), समाजसेवा (2) अशा  क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

०००

महाप्रित व आय.आय.टी. मुंबई यांच्यात कार्बन कॅप्चरिंग व ग्रीन हायड्रोजन तंत्रज्ञानाबाबत सामंजस्य करार

             मुंबई, दि. २३ : महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) व भारतीय प्रौद्योगिक संस्थान, मुंबई (आय.आय.टी. मुंबई) यांच्यात कार्बन कॅप्चरिंग व ग्रीन हायड्रोजन तंत्रज्ञानाबाबत संयुक्त प्रकल्प राबविण्याच्या दृष्टिकोनातून सामंजस्य करार करण्यात आला.

या करारावेळी महाप्रितचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी (भा.प्र.से.), महाप्रितचे मुख्य महाव्यवस्थापक  शरणप्पा कोल्लूर, दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

आय.आय.टी. बॉम्बेचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद अत्रे, नॅशनल सेंटर फॉर एक्सलन्स इन कार्बन कॅप्चरचे समन्वयक डॉ. विक्रम विशाल, सहप्राध्यापक डॉ. अर्णब दत्ता, महाप्रितचे संचालक (संचलन) वि. ना. काळम पाटील, कार्यकारी संचालक (संचलन) सुनील पोटे, कार्यकारी संचालक (प्रशासन) प्रशांत गेडाम, मुख्य महाव्यवस्थापक उमाकांत धामणकर उपस्थित होते.

या सामंजस्य कराराव्दारे भारतीय प्रौद्योगिक संस्थान, मुंबई येथील विकसित करण्यात आलेल्या कार्बन कॅप्चर व किफायतशीर ग्रीन हायड्रोजन तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प संयुक्तपणे राबविण्यात येणार आहे.

सद्यस्थितीत जागतिक तापमानवाढीच्या समस्येवर या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात जनजागृती निर्माण होऊन व नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे ही समस्या सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे.

००००

संध्या गरवारे/विसंअ

कोकण रेल्वे परिसरातील ३७ स्थानकांचे होणार सुशोभीकरण

मुंबई, दि.२३ : कोकण रेल्वे महामंडळ अंतर्गत येणाऱ्या राज्यातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलाड रेल्वे स्थानकापासून मदूरे रेल्वेस्थानकापर्यंत एकूण ३७ रेल्वेस्थानके आहेत. ही रेल्वे स्थानके मुख्य मार्गापर्यंत जोडणाऱ्या पोहोच मार्गांची देखभाल व दुरुस्तीची कामे लवकरच सुरु करण्यात येणार आहे. यामुळे कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. रेल्वे स्थानकापासून मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांचा लवकरच कायापालट होणार आहे. त्याचप्रमाणे, रेल्वे स्थानकाच्या परिसराचेही मोठ्या प्रमाणात सुशोभिकरण होणार आहे. यासंदर्भात कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित व सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे, कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित व सार्वजनिक बांधकाम विभाग, यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला, यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, आमदार निरंजन डावखरे, आमदार योगेश कदम, कोकण रेल्वेचे  संचालक राजेश भडंग, मुख्य अभियंता नागनाथ राव,  मुख्य व्यवस्थापक गिरीश करंदीकर, उप अभियंता सुधीर कुलकर्णी, राजन तेली, दिपक पटवर्धन, केदार साठे, आदी उपस्थित होते.

कोकणातील पर्यटन स्थळांची ख्याती देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर पोचवण्यासाठी येथील पायाभूत सुविधांचा विकास होणे अत्यंत आवश्यक आहे. आज झालेल्या सामंजस्य करारामुळे  कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील रस्त्यांचा विकास होईल, जेणेकरून पर्यटन आणि स्थानिक विकासाला चालना मिळेल असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत १० वर्षापर्यंत  देखभाल दुरुस्ती करणार – मंत्री रविंद्र चव्हाण

कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित व सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या परस्पर सहकार्यामुळे  ही  सर्व कामी गतीने पूर्ण होतील, तसेच कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो चाकरमान्यांना याचा खऱ्याअर्थाने लवकरच फायदा होईल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

कोकणातील  पर्यटनाला चालना देण्याकरिता रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग कोकण रेल्वे स्थानकाच्या पोहोच मार्गाची देखभाल दुरुस्ती व परिसरातील सुशोभीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रस्त्यांची १० वर्षापर्यंत देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे. भविष्यात हा सामंजस्य करार ३० वर्षापर्यंत वाढविण्याची तरतूद करण्यात आली आहे.

या सामंजस्य करारानुसार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रेल्वे स्थानकांच्या  पोहोचमार्गाचे डांबरीकरण व सिमेंट काँक्रिटीकरण करुन या परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या सर्व प्रमुख रेल्वे स्थानक परिसराचे सुशोभीकरण याच सामंजस्य कराराअंतर्गत हाती घेण्यात येणार आहे. या सुशोभीकरणाच्या अंतर्गत रेल्वे प्रवाश्यांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या रेल्वे स्थानकांचा परिसर हा अत्याधुनिक स्वरुपाचा करण्याचा आमचा मानस असल्याचेही मंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.

००००

संध्या गरवारे/विसंअ

‘दिलखुलास’ कार्यक्रमात कवी निलेश मदाने यांचे उद्या काव्य सादरीकरण

मुंबई, दि. २३: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ज्येष्ठ कवी व विधिमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांचे काव्य सादरीकरण प्रसारित होणार आहे. हा कार्यक्रम राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर बुधवार दि. २४ जानेवारी रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल.

राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत मराठी भाषांचा प्रचार व प्रसार होण्यासाठी राज्यात १४ ते २८ जानेवारी २०२३ या कालावधीत ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने ज्येष्ठ कवी श्री. मदाने यांनी दिलखुलास कार्यक्रमातून कवितांचे सादरीकरण केले आहे.

०००

ग्रामीण भागातील तरूणांना मिळणार रोजगारासह कौशल्य प्रशिक्षण

मुंबई, दि. २३ : राज्याच्या ग्रामीण भागातील अत्यल्प उत्पन्न असलेल्या तरूण-तरुणींना रोजगारासह कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी राज्य शासन आणि लाईटहाऊस कम्युनिटीज फाऊंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार करण्यात आला. मंत्रालयात झालेल्या या कराराप्रसंगी आयुक्त डॅा. रामास्वामी एन, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी, लाईटहाऊस कम्यूनिटीज फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश नटराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी रूची माथूर यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या करारानुसार कौशल्य, रोजगार, उद्योगजकता आणि नाविन्यता विभाग आणि लाईटहाऊस कम्युनिटीज फाऊंडेशन यांच्या सहयोगाने राज्यातील मागास जिल्ह्यात विशेषत: ग्रामीण भागात रोजगारासह कुशल मनुष्यबळाचा विस्तार करण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. ‘लाईटहाऊस : कौशल्य आणि उपजीविका केंद्र’ (Lighthouse: Center for Skilling and Livelihoods) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कार्यक्रमाद्वारे कमी उत्पन्न असलेल्या समुदायांसोबत काम करणार आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांना सशक्त करणे आणि त्यांच्यात क्षमता विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे. या सहभागातून, लाईटहाऊस कम्युनिटीज फाऊंडेशन संपूर्ण राज्यामध्ये लाईटहाऊस केंद्रांद्वारे कौशल्य आणि उपजीविका कार्यक्रम राबवेल, ज्यामध्ये भारत सरकार मान्यताप्राप्त महाराष्ट्र आधारित मॉडेल करिअर सेंटर्स (MCC) आणि 18-35 वयोगटातील ग्रामीण तरुण वर्गाचा समावेश असलेल्या आकांक्षी जिल्ह्यांना प्राधान्य देईल. हा सहा महिन्यांचा कार्यक्रम असेल. ज्याची सुरुवात मूलभूत अभ्यासक्रम, करिअर समुपदेशन आणि व्यावसायिक प्रशिक्षणापासून ते कार्यक्रम पूर्ण झाल्यावर उद्योग भागीदारांसह रोजगार उपलब्ध करून देण्यापर्यंत होईल.

000

पवन राठोड/ससं

लोकाभिमुख प्रशासनाच्या यशस्वीतेसाठी ई – गव्हर्नन्स उपयुक्त

मुंबई, दि. २३ : शासनाच्या  लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आणि गतिमानतेने जनसेवा उपलब्ध करून देण्यात ई गव्हर्नन्स संकल्पना सर्वार्थाने उपयुक्त असल्याचे मत ई गव्हर्नन्स परिषदेतील विविध विषयांवरील चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले.

केंद्र सरकारच्या प्रशासकीय सुधारणा, सार्वजनिक तक्रार विभाग (डीएआरपीजी)आणि  राज्य शासनाच्या सहकार्याने, आयोजित करण्यात आलेल्या “ई-गव्हर्नन्स” या विषयावरील दोन दिवसीय प्रादेशिक परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या परिषदेत पहिल्या दिवशी विविध विषयांवर चर्चासत्रे घेण्यात आली.

“सुशासन आणि स्टार्टअप परिसंवाद” या विषयावरील पहिल्या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी, कर्नाटक सरकारच्या, कार्मिक आणि प्रशासकीय सुधारणा विभागाचे मुख्य सचिव डॉ. श्रीवत्स कृष्णा होते. या  सत्रात  सहभागी विविध स्टार्टअप कंपन्यांच्या प्रतिनिधींनी शासनाने प्रामुख्याने शिक्षण आणि आरोग्य सुविधा बळकटीकरणासाठी व्यापक उपाययोजना राबविण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. शिक्षणावरील गुंतवणूक वाढवण्याची आणि त्यात प्रामुख्याने प्राथमिक शिक्षण सुविधांसाठी लक्ष देणे गरजेचे आहे. वैद्यकीय उपचारांना पूरक ठरणारे स्टार्टअप वाढवणे नागरीकांना पूरक आरोग्य सुविधा मिळण्यासाठी सहायक ठरतील. तसेच रोजगार आणि सोयी सुविधांची उपलब्धता वृद्धिंगत करण्यासाठी नवीन उद्योजकतेला प्रोत्साहन दिले पाहिजे, शासनाने स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करत त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मत या चर्चासत्रात सहभागी झालेले श्रीकांत वेलामकाणी, अश्विन डमेरा, आकात वैश्य , सिद्धार्थ शहा  यांनी व्यक्त केले.

भारतीय लोक प्रशासन संस्था, आयआयपीएचे  महासंचालक डॉ. एस.एन. त्रिपाठी यांच्या अध्यक्षतेखाली  “ई-प्रशासन  पुरस्कार उपक्रम” या विषयावरील दुसरे  सत्र झाले. यामध्ये जिल्हा प्रशासन ते  पंचायत स्तरावर ई गव्हर्नन्स उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना जलद आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात आलेल्या उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.   पंचायत स्तरावरील कार्यालये आणि कार्य प्रणालीत करण्यात येत असलेल्या  बदलांबाबतची  माहिती केंद्रीय सहसचिव आलोक नागर यांनी दिली. त्रिनेत्रा संकल्पनेच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कशा प्रकारे यंत्रणा गतीने आणि पारदर्शकपणे कार्यान्वित होते,  याबाबत नरसिंह कोमर, आयपीएस चेअरमन ‘टास्क फोर्स ऑन विश्वास’ आणि अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) यांनी सादरीकरण केले. माईनमित्रा , मिनरल मार्ट या प्रणालीचा वापर करून पारदर्शकपणे जिल्हा प्रशासन कशा पद्धतीने उत्खनन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवत लोकाभिमुखपणे काम करत आहे , याबद्दल उत्तर प्रदेशचे विशेष सचिव विपीन कुमार यांनी सविस्तर माहिती दिली.

प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाचे अतिरिक्त सचिव, अमर नाथ, यांच्या अध्यक्षतेखाली  ‘ई-प्रशासन  पुरस्कार उपक्रम’ या विषयावर  सादरीकरण करण्यात आले. यामध्ये पीएम स्वनिधी तसेच स्वनिधी से समृद्धी यासह इतर विविध  योजनेच्या माध्यमातून महिला, नागरिकांना अधिक व्यापक प्रमाणात सुलभतेने अर्थसहाय्य करणे हे केवळ तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून शक्य झाल्याचे  निती आयोगाचे महासंचालक  संजय कुमार यांनी सांगितले. तर लोकांच्या तक्रारींचा निपटारा तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कशा प्रकारे तत्परतेने करता येतो , याबद्दल प्रा.निशिथ श्रीवास्तव, आयआयटी कानपूर यांनी सांगितले.  तर राजस्थानमधील हनुमानगरच्या जिल्हा दंडाधिकारी रुक्मिणी सिहाग यांनी गंगा कालवा नियंत्रण यंत्रणेच्या संगणकीकरण प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना पाणी वाटपाबाबत देण्यात येणाऱ्या संदेश उपक्रमाची माहिती सादर केली. तर तक्रार निवारण ऑनलाईन सुविधा,एक खिडकी योजना यामाध्यमातून केरळ राज्यात राबविण्यात येत असलेल्या इ गर्व्हनन्सच्या उपक्रमांची माहिती डॉ.आशा थॉमस, अपर मुख्य सचिव,केरळ यांनी दिली.

०००

राजू धोत्रे, विसंअ / वंदना थोरात, स.सं

ई-गव्हर्नन्स क्षेत्रातील महाराष्ट्राच्या बेस्ट प्रॅक्टिसेस सर्वोत्तम

मुंबई, दि. २३ : महाराष्ट्र शासनाच्या सध्या सुरु असलेल्या महाराष्ट्र स्थलांतर प्रणाली, रस्ता गुणवत्तेसाठी कृत्रिम बुद्धिमतेचा वापर, वेध अप, ई रजिस्ट्रेशन प्रणाली या महत्वपूर्ण उपक्रमाविषयी आज झालेल्या विभागीय ई गव्हर्नस परिषदेत सविस्तर माहिती देण्यात आली. या सत्राच्या अध्यक्षस्थानी यशदाचे महासंचालक एस. चोकलिंगम होते.

महाराष्ट्र शासनाने ई-गव्हर्नन्सवर विशेष भर दिला आहे. शासनाशी संबंधित कामासाठी नागरिकांना शासकीय कार्यालयात यावे लागू नये. घरबसल्या त्यांना सर्व सुविधा मिळाव्यात तसेच ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून नागरिकांना सर्व शासकीय सेवा-सुविधा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासन विविध प्रणाली विकसित करीत आहे. शासनाच्या योजनाचा लाभ, तसेच एकूण सर्व सेवा सुविधा याबरोबरच माहिती संकलित करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे.

महाराष्ट्र मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टीम (महा एमटीएस)

महाराष्ट्रात स्थलांतराचे प्रमाण अधिक आहे.  हे स्थलांतर स्थलांतरित कुटुंबातील बालके, किशोरवयीन मुली, गरोदर आणि स्तनदा महिलांच्या आरोग्य व पोषण स्थिती व सुरक्षिततेवर सर्वाधिक परिणाम करते. या स्थलांतराच्या कालावधीदरम्यान सार्वत्रिक आरोग्य आणि पोषण लाभ / योजनांची परस्पर कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टीम (महा एमटीएस) ची निर्मिती करण्यात आली आहे.याविषयी वनामतीच्या संचालक मिताली सेठी यांनी माहिती दिली.

या प्रणालीमुळे स्थलांतरित लाभार्थींसाठी शासकीय सेवा वितरण अखंडितपणे सुरु राहील. यामध्ये लसीकरण, आरोग्य तपासणी, एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) आणि एकात्मिक बाल संरक्षण सेवा (ICPS) इ. सेवा अंतर्भूत आहेत. सन 2021-22 मध्ये महा एमटीएस प्रणाली अंमलबजावणीकरिता अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, जालना, नंदुरबार आणि पालघर या ६ स्त्रोत जिल्ह्यांमध्ये पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला होता. या पथदर्शी प्रकल्पाचे अभ्यासावरून पुढील टप्प्यात महा एमटीएस प्रणालीचे राज्यव्यापी सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. महा एमटीएस प्रणाली तांत्रिक उपयोजनांसोबत प्रशासकीय यंत्रणा, टोल-फ्री हेल्पलाईन आणि इतर नाविन्यपूर्ण मार्गांसह काम करत आहे; ज्यामुळे अंगणवाडी सेविका (AWW), आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मजबूत संपर्कजाळ्याद्वारे अधिकाधिक स्थलांतरित लोकांपर्यंत पोहोचता येईल असेही श्रीमती सेठी यांनी सांगितले.

शासकीय जमा लेखांकन पध्दती

माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून शासनाकडे जमा होणारा महसूल व महसूलंतर जमा रकमा इलेक्ट्रॉनिक पध्दतीने शासनाच्या तिजोरीत जमा कराव्यात, याकरिता “शासकीय जमा लेखांकन पद्धती” (Government Receipt Accounting System-GRAS) या प्रणालीची निर्मिती करण्यात आलेली आहे. याकरिता बँकिग क्षेत्रात होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स सुविधांचा वापर करून जनतेला विनासायास महाराष्ट्र शासनाचा कर व अन्य भरणा करता यावा या उद्देशाने ही निर्मिती करण्यात आल्याची माहिती राधिका रस्तोगी यांनी दिली.

इंटरनेट बँकिंग सुविधेचा वापर व बँकांच्या ई-पेमेंट गेटवे पद्धतीचा उपयोग या प्रणालीत करण्यात आला आहे. जिल्हा कोषागार कार्यालयात मुद्रांक विक्रीबाबत मुद्रांक विक्रेत्याकडून (Stamp vendors) रोख रक्कम / धनाकर्ष न स्विकारता यापुढे “ग्रास” प्रणालीमार्फतच ई-पेमेंटद्वारे स्विकारण्याची कार्यवाही सुरु आहे.  जिल्हा कोषागारातर्फे मुद्रांक विक्रीबाबत मुद्रांक विक्रेत्यांकडून ( Stamp vendors) रोख रक्कम / धनाकर्ष न स्विकारता “ग्रास” प्रणाली मार्फतच इलेक्ट्रॉनिक पध्दतीनेच स्विकारण्यासाठीची प्रक्रिया सुरु असल्याचेही श्रीमती रस्तोगी यांनी सांगितले.

संख्यानिहाय मूलभूत साक्षरता’, या संकल्पनेवर आधारित वेध ॲप

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी हे वेध ॲप विकसित केले आहे. विद्यार्थी-शिक्षक आणि शाळा यांचा इत्यंभूत तपशिल ठेवणारे अद्ययावत ॲप राज्यभरातील शिक्षण व्यवस्थेत अमलात येणार आहे. त्या अगोदर नाशिकमध्ये ‘पायलट प्रोजेक्ट’व्दारे हे ॲप अमलात आणले. पालघर जिल्ह्यात सहायक जिल्हाधिकारी म्हणून श्रीमती मित्तल यापूर्वी कार्यरत होत्या. तेथील आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक पटावरील उपस्थिती बघून त्यांनी अत्यंत संवेदनशीलपणे ‘फाऊंडेशन लिटरसी अँड न्यूमरसी’ तथा ‘एफएलएन-वेध’ या नावाने ॲप विकसित केले होते. या ॲपव्दारे कार्यक्षेत्रातील सर्व शाळांमधील प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक आणि शाळेचा इत्यंभूत तपशिल प्रोफाइलला अपलोड केला आहे. इतकेच नव्हे तर प्रत्येक विद्यार्थ्याचा आरोग्यविषयक सूक्ष्म तपशीलदेखील त्यावर अपलोड करण्यात आला आहे. या ॲपच्या ट्रॅकिंगव्दारे नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा तपशील विषयनिहाय अद्ययावत ठेवला जाणार आहे. आधारकार्ड ज्याप्रमाणे नागरिकांचा इत्थंभूत तपशील दर्शविते त्याप्रमाणे हे ॲप विद्यार्थ्याचा सर्व पट निरीक्षकांसमोर मांडू शकेल. याव्दारे शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य अबाधित ठेवण्यास मदत होणार असल्याची माहिती श्रीमती मित्तल यांनी दिली.

ॲपमध्ये चार लॉग इन देण्यात आलेले आहे. शिक्षक, शाळा, डॉक्टर आणि ॲडमीन. शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांचा डेटा वेळोवेळी अपलोड करतील, त्यानुसार त्यांना विद्यार्थ्याची प्रगती समजेल. यातील माहिती तुलनात्मक असल्याने विद्यार्थी कुठे कमी पडतोय का ते लक्षात येईल. त्यामुळे महत्त्वाच्या बाबींवर लक्ष्य केंद्रित करता येईल. ॲडमीन म्हणून लॉग इन असलेले अधिकारी सर्व माहिती घेवून शाळांना योग्य सूचना करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

रस्ते गुणवत्ता तपासणी कृत्रिम बुद्धिमत्ता दृष्टिकोन

महाराष्ट्रातील रस्ते अधिक गुणवत्तापूर्ण करण्यासाठी  सगळ्या रस्त्यांच्या गुणवत्तेचे आणि इतर माहितीचे विश्लेषण करून या निर्मितीमध्ये असलेल्या त्रुटी शोधली जातील. काही ठिकाणे म्हणजे जिथे सहसा लक्ष दिले जात नाही  ती  बाब तपासली जाईल.

रस्त्याची निर्मिती करतांना त्यामध्ये अनेक सुधारणा करणे यासाठी एक वैशिष्ट्यपूर्ण कृत्रिम बुद्धिमत्ता दृष्टिकोन  असलेला प्रकल्प रस्ते पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केली जाऊ शकते असे सहायक जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी या प्रणाली विषयी माहिती देतांना सांगितले.

ई-रजिस्ट्रेशन प्रणाली

राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागामार्फत नागरिकांसाठी सुरू केलेल्या आणि यशस्वी ठरलेल्या ‘ई-रजिस्ट्रेशन’ प्रणालीची माहिती राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी दिली.

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने नागरिकांसाठी अनेक सुविधा ऑनलाइन सुरू केल्या आहेत. त्यापैकी एक ‘ई-रजिस्ट्रेशन’ ही प्रणाली आहे.

या प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाइन भाडेकरार घरबसल्या, तर सदनिकांचा प्रथम विक्री करारनामा (फर्स्ट सेल) बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयातूनच नोंदविता येतो. त्यामुळे या कामांसाठी नागरिकांना दस्त नोंदणी कार्यालयात जाण्याची गरज राहिलेली नाही. ही प्रणाली यशस्वीपणे राबविण्यात येत असून नागरिकांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे, असेही श्री हर्डीकर यांनी यावेळी सांगितले.

०००

मनीषा पिंगळे/विसंअ

सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्यास प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि. २३ : पायाभूत सुविधा आणि आवश्यक मनुष्यबळ देऊन राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी शासनाचे प्राधान्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, खासदार राहुल शेवाळे, आमदार आशिष शेलार, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, सचिव नवीन सोना, आरोग्य आयुक्त धीरज कुमार, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक डॉ. स्वप्नील लाळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. आजच्या दिनी वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवा करणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांचा सत्कार करताना अतिशय आनंद होत आहे. आपल्या राज्यातील आरोग्य विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी चांगले काम केले आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले की, आरोग्य क्षेत्रात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातून काम केले जात आहे. रुग्णवाहिका सुरू करण्याची संकल्पना बाळासाहेब ठाकरे यांची आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्थेला रुग्णवाहिका, पायाभूत सुविधा, यंत्रसामग्री, मनुष्यबळ देऊन बळकटीकरण केले जाणार आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून रुग्णांना मोठ्या प्रमाणावर मदत देण्यात येत आहे. मुंबईत २५० ठिकाणी ‘आपला दवाखाना’ सुरू करण्यात आला आहे. घराशेजारी आरोग्य व्यवस्था पुरविण्यासाठी हे दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. मातामृत्यू कमी करण्यासाठी आरोग्य विभाग कसोशीने प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

आरोग्य मंत्री डॉ. सावंत म्हणाले की, ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे साडेचार कोटी महिलांची तपासणी केली आहे. दुसऱ्या टप्प्यात शस्त्रक्रिया करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. याचबरोबर बाल सुरक्षा अभियानात १८ वर्षांखालील मुलामुलींची तपासणी केली जाणार आहे.

प्रास्ताविक आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी, तर आभार उपसंचालक कैलास बाविस्कर यांनी मानले.

कार्यक्रमात स्वयंसेवी संस्थेचा पुरस्कार हॅलो मेडिकल फाऊंडेशन, अणदूर, उस्मानाबाद.

उत्कृष्ट डॉक्टर डॉ. प्रमोद पोतदार, शरीर विकृती शास्त्र, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, अमरावती.

डॉ. उमेश कदम, वैद्यकीय अधीक्षक, सेवा रुग्णालय, कोल्हापूर, डॉ. सदानंद राऊत, पुणे

पत्रकाराचा – संदीप आचार्य, सहयोगी संपादक, दैनिक लोकसत्ता, ठाणे

उत्कृष्ठ कर्मचारी पुरस्कार – धर्मा विश्वासराव वानखेडे, आरोग्य सहाय्यक, अमरावती. मिलिंद मनोहर लोणारी, स्वच्छता निरीक्षक, जळगाव. प्रशांत संभाप्पा तुपकरी, आरोग्य कर्मचारी, हिंगोली. किशोर वैद्य, आरोग्य कर्मचारी, नागपूर. दिलीप बाबूराव कचेरे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, पुणे यांना प्रदान करण्यात आले.

प्रत्येकी एक लाख रुपये रोख, सन्मान चिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

०००

रवींद्र राऊत/विसंअ

ताज्या बातम्या

कानडवाडी येथील १० एम.व्ही.ए. पॉवर ट्रान्सफॉर्मरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

0
सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : मिरज तालुक्यात 33/11 के.व्ही. कानडवाडी उपकेंद्र येथील 10 एम.व्ही.ए. पॉवर ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते...

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या चौंडी येथील राष्ट्रीय स्मारक विकासासाठी पहिल्या टप्यात ५० कोटींची तरतूद, प्रकल्प सर्वेक्षणास २१ लाख रुपये मंजूर

0
सभापती प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश; सिना नदीवर होणार २ बुडीत बंधारे, १५० कोटी खर्च अपेक्षित मुंबई , दिनांक 16 :- विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या पुढाकारातून श्री क्षेत्र चौंडी येथे 'स्टॅच्यू ऑफ...

राज्यात १६ ते २१ ऑगस्ट २०२५ दरम्यान अतिवृष्टीचा इशारा

0
मुंबई, दि. १६ :- भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीच्या आधारे, राज्यात पुढील काही दिवसात १६ ते २१ ऑगस्ट २०२५...

शाहू महाराजांच्या समाजपरोपकारी कार्याला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडून अभिवादन

0
समाधीस्थळाला भेट कोल्हापूर, दि. १६ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला भेट देऊन त्यांना अभिवादन केले. याप्रसंगी...

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
विविध विकासकामे, योजनांच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत निर्देश सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : सांगली जिल्हा हा नेतृत्त्व करण्यास संधी देणारा जिल्हा आहे. या जिल्ह्याने...