शुक्रवार, मे 16, 2025
Home Blog Page 1640

सातत्याने प्रयत्न करण्याची खेळातून प्रेरणा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

सोलापूर येथे २३ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

सोलापूर: जीवनात प्रगती करायची असेल तर सातत्याने प्रयत्न करण्याची आवश्यकता असते. खेळ सातत्याने प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा देतात, असे प्रतिपादन कुलपती तथा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

तेविसाव्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस, कुलसचिव डॉ.विकास घुटे, प्रभारी प्र-कुलगुरु डॉ. विकास कदम, क्रीडा संचालक सुरेश पवार आदी उपस्थित होते.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, खेळ दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनायला हवा. कारण खेळामुळे शरीर स्वस्थ राहते आणि स्वस्थ शरीरात कणखर मन असते. खेळ खिलाडूवृत्ती वाढीस लावतात. ज्यामुळे जीवनातील कोणत्याही आव्हानाला सामोरे जाणे शक्य होते.

महाराष्ट्रातील फार कमी खेळाडूंना ऑलिम्पिक स्पर्धेत यश मिळवता आले आहे. या क्रीडा महोत्सवातून ऑलिम्पिक पदक पटकावण्याची जिद्द बाळगणारे खेळाडू तयार होतील, अशी अपेक्षा मला आहे, असे राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले.

कुलगुरू डॉ.फडणवीस यांनी क्रीडा स्पर्धेबाबत आणि त्यासाठी केलेल्या तयारी बाबत माहिती दिली.

तत्पूर्वी, विविध विद्यापीठाच्या संघांनी शानदार संचलनाने राज्यपाल कोश्यारी यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले.

श्री.पवार यांनी प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ.घुटे यांनी आभार मानले.

या स्पर्धेत राज्यातील वीस विद्यापीठातील2703 खेळाडू सहभागी झाले आहेत. 350 संघ व्यवस्थापक आणि 400 पंचही या स्पर्धेसाठी आले आहेत. या स्पर्धेसाठी आले आहेत. या स्पर्धेच्या नियोजनासाठी विद्यापीठ प्रशासनाने अतिशय नियोजनबद्ध व्यवस्था केली आहे.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी तुळजापूर येथे घेतले आई तुळजाभवानीचे दर्शन

उस्मानाबाद : महामहीम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज महाराष्ट्राची कुलदेवता आई श्रीतुळजाभवानी मातेचे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, उपविभागीय अधिकारी रामेश्‍वर रोडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.टिपरसे, तहसिलदार सौदागर तांदळे, योगिता कोल्हे, नगरपालिका मुख्याधिकारी आशिष लोकरे, मंदिर प्रशासनाचे श्री.झंपलवाड, श्री.इंतूले, गणेश मोटे आदींची उपस्थिती होती.

लोकांचे जीवन सुकर करणे हेच लोकसेवा हमी कायद्याचे उद्दिष्ट – संजय कोठारी

‘गतिमान लोकसेवा देण्यात शासनाची भूमिका’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

नागपूर,दि.21:लोकांचे जीवन सुकर करणे हे लोकसेवा हमी कायद्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गतिमान व पारदर्शक लोकसेवा देण्यासाठी किमान शासन, कार्य प्रणालीतील सुसूत्रता, साधेपणा आणि लोकसेवा देण्यासाठी असलेली कालमर्यादा ही त्रिसूत्री आहे,असे प्रतिपादन राष्ट्रपतींचेसचिव संजय कोठारी यांनी आज येथे केले.

‘गतिमान लोकसेवा देण्यात शासनाची भूमिका’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे संजय कोठारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी उपस्थित लोकसेवकांना ते मार्गदर्शन करीत होते. हॉटेल रॅडीसन ब्ल्यू येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी  महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय, लोकसेवा व तक्रार निवारण आयोगाच्या उपसचिव  श्रीमती रेणू अरोरा, कोकण विभाग लोकसेवा हक्क आयोगाच्या आयुक्त मेधा गाडगीळ, सामान्यप्रशासन विभागाच्या  सचिव श्रीमती अंशू सिन्हा, नागपूर विभागीय आयुक्त संजीव कुमार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

तसेच यावेळीकेंद्र शासनाच्या प्रशासकीय सुधारणा आणि तक्रार निवारण विभागाचे अतिरिक्त सचिव व्ही. श्रीनिवास, पंजाबच्या लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनदीपसिंग संधू,  हरयाणा लोकसेवा आयोगाचे  आयुक्त  हरदीपकुमार, कर्नाटकच्या प्रशासकीय सुधारणा विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती शालिनी रजनीश, दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्राच्या सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव राजीव यदुवंशी, तामिळनाडूचे माहिती व तंत्रज्ञान आयुक्त संतोष मिश्रा, केरळच्या प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या सदस्या श्रीमती शीला थॉमस, रेल्वेचे कार्यकारी  संचालक विवेक श्रीवास्तवतसेच देशभरातून आलेले प्रशासकीय अधिकारी सहभागी झाले होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. या परिषदेत देशभरातील 22 राज्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

यावेळी मार्गदर्शन करताना संजय कोठारी म्हणाले, लोकांचे जीवन सुकर करणे हे प्रशासकीय  सेवेचे उद्दिष्ट आहे. प्रशासकीय प्रक्रियेचे सखोल ज्ञान नागरिकांना असणे अपेक्षित नाही.  मात्र लोकसेवा हमी कायदा हा लोकांना विहित कालावधीत पारदर्शक सेवेची हमी देतो.  ते म्हणाले की, या कायद्यामुळे खऱ्या अर्थाने लोकांच्या हातात अधिकार आले आहेत.

लोकांना अधिकाधिक गतिमान आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी केवळ लोकांचा सहभाग घेतला आणि आपले निर्णय हे लोकांना कळवले तरी अनेक प्रश्नांचे आपोआप निराकरण होत असते. एका अर्थाने हे सरकार ते नागरिक असे सत्तांतरच म्हणायला हवे, असे मत त्यांनी यावेळी मांडले. लोकसेवकांमध्ये जनतेच्या सेवेची जाणीव निर्माण करणे हे तर अत्यंत आवश्यक आहेच. मात्र उत्तम सेवा देण्यासाठी किमान प्रशासकीय प्रक्रिया, जी प्रशासकीय प्रक्रिया राबवायची त्यात अत्यंत सोपेपणा आणणे, आणि द्यावयाच्या सेवेसाठी आवश्यक असलेली कालमर्यादा यांचे पालन केले तरी  लोकांना खऱ्या अर्थाने उत्तम व पारदर्शक सेवा आपण देऊ शकतो.  या नंतरचा भाग आहे तो तक्रार निवारण व संबंधितांवर कारवाईचा. या परिषदेत सहभागी झालेल्या नवीन अधिकाऱ्यांनी या त्रिसूत्रीनुसार आपण जनतेला अधिकाधिक गतिमान सेवा नवनवीन पद्धतींनी कशी देऊ शकू? याबाबत विचारमंथन करणे गरजेचे आहे. लोकांना अधिकाधिक ई- प्रणालींचा वापर करुन सेवा देणे शक्य आहे. त्याचा वापरही आपण करीत आहोत, मात्र नवीन अधिकाऱ्यांनी आपल्या नवकल्पनांचा अवश्य अंतर्भाव करावा. अनेक प्रश्नांचे उत्तर हे थेट लोकांमध्ये सहभागी होऊन त्यांच्याशी संवाद साधल्याने प्राप्त होतात असा आपला अनुभवही त्यांनी यावेळी सांगितला. ते म्हणाले की, आपले नागरिक हे जबाबदार व हुशार आहेत. त्यांचे जीवन अधिकाधिक सुकर करण्यासाठी आपण प्रयत्न करुया असेही आवाहन त्यांनी शेवटी केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातमहाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय म्हणाले की, पारदर्शकता, गतिमानता आणि कालमर्यादा हे तीन प्रमुख सूत्र सेवा हमी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आहेत. विशिष्ट कालावधीत सेवा न मिळाल्यास नागरिकांच्या तक्रारी वाढतात.  या जबाबदारीचे भान आणून देण्यासाठी या कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे. ही जाणीव वृद्धिंगत करुन  अधिकाधिक गतिमान, पारदर्शक सेवा देण्यासाठी आपण काय करु शकतो? याचे विचारमंथन या परिषदेत होणार आहे. यावेळी क्षत्रिय यांनी सेवा हमी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाने केलेल्या प्रयत्नांची माहितीही उपस्थितांना दिली.

श्रीमती रेणू अरोरा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आणि विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी आभार मानले.सूत्रसंचालन श्वेता शेलगावकर यांनी केले.

धान खरेदीत दिरंगाई होऊ नये यासाठी दक्षता घेण्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश

नागपूर, दि.20 : शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र योजनेअंतर्गत भंडारा जिल्ह्यातील केंद्रे तातडीने सुरु करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज जिल्हा प्रशासन आणि मार्केटिंग फेडरेशनला दिले. याबरोबरच धान खरेदीत दिरंगाई होऊ नये याची दक्षता घ्यावी असे निर्देशही त्यांनी दिले.

भंडारा जिल्हा सहकारी कृषी औद्योगिक संघाला 2019-20 या खरीप हंगामाकरिता शासकीय आधारभूत धान खरेदी योजनअंतर्गत मिटेवाणी, बघेडा, बेळगाव, भंडारा,वरठी व कांद्री येथे धान खरेदी केंद्र सुरु करण्याच्या परवानगीसंदर्भात विधानसभा अध्यक्ष श्री. पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

यावेळी श्री. पटोले यांनी शेतकऱ्यांची धान खरेदी तातडीने सुरु करण्याचे निर्देश दिले. अवकाळी पाऊस आणि लांबलेल्या धान खरेदीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी खरेदीसंदर्भात झालेल्या दिरंगाईबाबत संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीला आमदार राजू माणिकराव कारेमोरे, जिल्हाधिकारी प्रदीप चंद्रन, महाराष्ट्र राज्य को.ऑप.फेडरेशनचे अधिकारी उपस्थित होते.

विधानपरिषद लक्षवेधी

विदर्भ व कोकणातील रोजगार संधी वाढविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखणार – सुभाष देसाई

नागपूर, दि. 21 :  शासकीय नोकऱ्यांमध्ये विदर्भ व कोकणातील तरुणांचा जास्तीत जास्त समावेश व्हावा, यासाठी त्यांना स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून विदर्भ व कोकणात रोजगार संधी वाढविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येणार असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.

विधानपरिषदेत सदस्य ख्वाजा बेग यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर श्री. देसाई बोलत होते.

श्री. देसाई म्हणाले, नागपूर कराराप्रमाणे शासकीय नोकऱ्यांमध्ये विदर्भातील तरुणांचे प्रमाण पुरेसे आहे. कोकणातील तरुणांचे लोकसंख्येच्या प्रमाणात शासकीय नोकऱ्यांमध्ये प्रमाण कमी आहे. या दोन्ही विभागातील तरुणांचे नोकऱ्यांमधील प्रमाण आणखी वाढावे, यासाठी येथील तरुणांना स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे.

या चर्चेत सदस्य श्री. बेग, डॉ. रणजित पाटील, श्री. जोगेंद्र कवाडे आदींनी भाग घेतला.

००००

विनाअनुदानित शाळांना अनुदानासंदर्भात प्रचलित धोरण राबविण्यासंदर्भात शासन सकारात्मक – बाळासाहेब थोरात

नागपूर, दि. 21 : राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यासाठी पूर्वीच्या प्रचलित अनुदान धोरण अंमलात आणण्याबाबत राज्य शासन विचार करत असून लवकरच याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज येथे दिली.

विधानपरिषदेत सदस्य श्री. विक्रम काळे यांनी कायम विना अनुदानित शाळांच्या अनुदानासंदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते.

श्री. थोरात म्हणाले की, विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याची प्रचलित पद्धत होती. मात्र, ती बंद करण्यात आली आहे. या शाळांना शंभर टक्के अनुदान देण्यासाठी पूर्वीप्रमाणेच प्रचलित अनुदान धोरण अंमलात आणण्यासाठी मंत्रीमंडळ बैठकीत सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच अनुदान देण्याच्या अटीसंदर्भातही योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

या चर्चेत सदस्य सर्वश्री नागो गाणार, डॉ. रणजित पाटील, प्रा. अनिल सोले, श्रीकांत देशपांडे यांनी सहभाग घेतला.

०००००

दोंडाईचा-निमगुळ एसटी अपघात प्रकरणी मयत, जखमींना आर्थिक मदत – सुभाष देसाई

नागपूर, दि. 21 : शिंदखेडा- दोंडाई ते निमगुळ एसटी बस अपघातातील मयत प्रवाशांच्या वारसांना प्रत्येकी दहा लाख रूपयांप्रमाणे १ कोटी रुपये व बस चालकास ७ लाख १८ हजार ९६० रूपये तसेच जखमी प्रवाशांना २३ हजार रूपयांची तात्कालिक आर्थिक मदत देण्यात आली आहे अशी माहिती परिवहनमंत्री सुभाष देसाई यांनी विधानपरिषदेत दिली.

या संबंधीची लक्षवेधी सूचना सदस्य विद्या चव्हाण यांनी मांडली होती.

यावेळी श्री. देसाई म्हणाले, दिनांक 18 ऑगस्ट, 2019 रोजी शहादा आगाराची बस  औरंगाबाद-शहादा मार्गावर धावत असताना सुमारे 22.35 वाजता निमगुळ गावाजवळ तावखेडा फाटा येथे समोरुन भरधाव वेगात येणारा कंटेनर व बसची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात बसमधील एकूण 52 प्रवाशांपैकी 11 प्रवासी व बसचा चालक आणि त्रयस्थ कंटेनर वाहनाचा चालक 01 असे एकूण 13 व्यक्ती मृत झाल्या व कर्तव्यावरील 01 वाहक व 38 प्रवासी असे एकूण 39 व्यक्ती जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने उपचारार्थ शासकीय रुग्णालय दोंडाईचा शहादा, नंदुरबार व धुळे येथे व परिसरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बसमधील 11 मयतांचे वारसांना प्रत्येकी रु. 10,000/- प्रमाणे एकूण रु. 1,10,000/- व जखमी व्यक्तींना एकूण रु. 23,000/- एवढी तात्कालीक आर्थिक मदत देण्यात आली. तसेच नुकसान भरपाईची मागणी करण्याचे पी फॉर्म देण्यात आले आहेत. बसमधील मयत 11 प्रवाशांपैकी 10 प्रवाशांना राज्य परिवहन नियमांनुसार मयत प्रकरणी प्रत्येकी रु. 10 लाख रक्कम देण्यात आली. मयत प्रवाशी श्री. इद्रिस नासिर मणियार मु. पो. तळोदा यांचे वारसांचा वाद असल्याने त्यांनी अद्याप पी फॉर्म व कागदपत्रे सादर न केल्याने त्यांना नुकसान भरपाई अदा झालेली नाही. पी फॉर्म व कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यांना त्वरीत नुकसान भरपाई रक्कम अदा करण्यात येईल. मयत रा. प. चालक श्री. मुकेश नगीन पाटील यांना श्रमिक नुकसान भरपाई तरतुदींतर्गत रु. 7 लाख 18 हजार 960 एवढी आर्थिक मदत देण्यात आलेली आहे. तसेच राज्य परिवहन नियमानुसार कामगिरीवरील कर्मचारी यांचेकरिता अपघात सहाय्यता निधी योजनेअंतर्गत रु. 10 लाख किंवा त्यांचे वारसांस नोकरी देण्यात येईल, असे श्री. देसाई यांनी सांगितले.

या चर्चेत सदस्य सुधीर तांबे यांनी भाग घेतला.

0000

आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांच्या 

समस्या सोडविण्यासाठी बृहद आराखडा करणार – डॉ.नितीन राऊत

नागपूर, दि. 21 : आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांच्या समस्या सोडविण्यासाठी बृहद आराखडा तयार करणार असून अनुसूचित जाती व जमातीसाठींच्या योजनांवर केंद्र व राज्य सरकारकडून उपलब्ध होणारा निधी शंभर टक्के खर्च होण्यासाठी कर्नाटक व तेलंगणा राज्याच्या धर्तीवर कायदा करणार असल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी विधानपरिषदेत दिली.

यासंबंधीची लक्षवेधी सूचना सदस्य रवींद्र फाटक यांनी मांडली होती.

डॉ.राऊत म्हणाले, अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींनी उच्च शिक्षण घेणे सुलभ व्हावे याकरिता आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय वसतिगृह योजना राबविण्यात येते. या शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना निवास, आहार, आवश्यक शैक्षणिक साहित्य इ. सोयी सुविधा मोफत पुरविण्यात येतात. शासकीय वसतिगृह प्रवेशाकरिता तसेच स्वयम् योजनेचा लाभ देण्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. राज्यात अनुसूचित जमातीच्या मुलांसाठी 285 व मुलींसाठी 210 अशी एकूण 495 शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. या वसतिगृहांची एकूण मंजूर क्षमता 58795 इतकी असून त्यापैकी 53 हजार 355 विद्यार्थ्यांना आतापर्यंत प्रवेश देण्यात आला आहे. त्याव्यतिरिक्त वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या 20 हजार  संख्येच्या मर्यादेत विद्यार्थ्यांना स्वयम् योजनेचा लाभ देण्यात येत असून चालू वर्षी त्यापैकी 7 हजार 119 विद्यार्थ्यांना आतापर्यंत येाजनेंतर्गत लाभ देण्यात आला आहे.

सन 2019-20 या शैक्षणिक वर्षाकरिता डहाणू प्रकल्प कार्यालयांतर्गतच्या 17 वसतिगृहांसाठी एकूण 1849 अर्ज पात्र ठरले होते. त्यापैकी वसतिगृहाची एकूण मंजूर विद्यार्थी प्रवेश क्षमता 1450 व वसतिगृहाच्या इमारतींमध्ये जागा उपलब्ध असल्याने वाढीव 100 अशा एकूण 1550 विद्यार्थ्यांना माहे 15 डिसेंबर 2019 पर्यंत प्रवेश देण्यात आलेला आहे. तसेच स्वयम् योजनेंतर्गत ऑनलाईन संगणकीय प्रणालीवर 42 विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांचे अर्ज स्वयम् योजनेच्या लाभासाठी कॉलेज स्तरावर मंजुरीसाठी प्रलंबित असून कॉलेज स्तरावरुन हे अर्ज त्वरित निकाली काढण्यासाठी प्रत्येक कॉलेजसाठी प्रकल्प क्षेत्रातील कर्मचाऱ्याची नियुक्त करण्याबाबत प्रकल्प अधिकारी, डहाणू यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. पात्र विद्यार्थ्यांना त्वरीत लाभ देण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच आदिवासी विकास विभागाच्या मदतीने एक आदिवासी विद्यार्थिनी उच्च शिक्षणासाठी परदेशात गेली असल्याचेही डॉ.राऊत यांनी सांगितले.

या चर्चेत सदस्य सर्वश्री डॉ.परिणय फुके, विक्रम काळे, अंबादास दानवे, जोगेंद्र कवाडे, श्रीमती विद्या चव्हाण यांनी सहभाग घेतला.

००००

वंजारी समाजाच्या आरक्षणाबाबत शासन सकारात्मक

– डॉ.नितीन राऊत

नागपूर, दि. 20 : वंजारी समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळण्याबाबत क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक आरक्षण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांचे  निवेदन राज्य मागासवर्ग आयोगाकडे अभिप्रायार्थ पाठविण्याची कार्यवाही विभागामार्फत करण्यात येईल. आयोगाचे अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर आवश्यक त्या संविधानिक प्रक्रियेचा अवलंब करुन वंजारा समाजाच्या आरक्षणाबाबतच्या मुद्यावर शासन सकारात्मक भूमिका घेईल, असे इमाव, सावशैमाप्र, विजाभज  व विमाप्र कल्याण मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज विधान परिषदेत सांगितले.

यासंबंधीची लक्षवेधी सूचना सदस्य नरेंद्र दराडे यांनी मांडली होती.

डॉ.राऊत म्हणाले, या लक्षवेधीअन्वये विजाभज प्रवर्गाला विहित करण्यात आलेल्या 11 टक्के आरक्षणापैकी 2 टक्के आरक्षण वंजारी समाजाला दिले असून, हे आरक्षण वंजारी समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात नसल्यामुळे वंजारी समाज आरक्षणापासून वंचित राहत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आणण्यात आली आहे.

कोणत्याही समाजासाठी आरक्षणाची टक्केवारी निश्चित करताना त्या समाजाचा आर्थिक स्तर, मागासलेपणा, लोकसंख्या तसेच अन्य अनुषंगिक बाबी विचारात घेऊन संपूर्ण राज्यात सर्वेक्षण करण्यात येते. सर्वेक्षणाअंती राज्य मागासवर्ग आयोगाच्या निदर्शनास आलेल्या वस्तुस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे आरक्षणाबाबतची शिफारस आयोगामार्फत शासनाकडे केली जाते. आयोगाकडून प्राप्त शिफारशीवर विचारविनिमय करुन आरक्षणाचे प्रमाण निश्चित करण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात येतो. वंजारी समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल.

या चर्चेत विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, सदस्य, सर्वश्री विनायक मेटे, सुरेश धस यांनी सहभाग घेतला.

००००

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अतिविशेषोपचार रुग्णालय नागपूरसाठी उच्च दर्जाच्या सोयीसुविधा पुरविण्याबाबत लवकरच बैठक – बाळासाहेब थोरात

नागपूर, दि. 21 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय नागपूर येथे रुग्णांना चांगल्या व उच्च दर्जाच्या सोयीसुविधा पुरविण्याबाबत शासन प्रयत्नशील असून लोकप्रतिनिधी व त्यातील संबधित अधिकाऱ्यांची   लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज विधानपरिषदेत दिली. यासंबधीची लक्षवेधी सूचना सदस्य अनिल सोले यांनी मांडली होती.

श्री. थोरात म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय संलग्नित अतिविशेषोपचार रुग्णालय, नागपूर येथे उपचारार्थ येणाऱ्या बाह्यरुग्णांची संख्या 550 ते 600 असून दररोज साधारणत: 230 ते 250 आंतररुग्ण दाखल होत असतात. या रुग्णालयातील दैनंदिन स्वच्छतेची कामे कंत्राटी सेवेच्या कर्मचाऱ्यांकडून व संस्थेच्या नियमित सफाईगार कर्मचाऱ्यांकडून केली जाते. रुग्णालयाची इमारत चार मजली असून  त्यामध्ये दोन उद्वाहने कार्यरत आहेत. त्यामुळे रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत नाही. रुग्णालयाच्या वॉर्डातील जैविक कचरा संकलन केंद्रात ठेवला जातो. हा जैविक कचरा नागपूर महानगरपालिका मान्यताप्राप्त कंपनीकडून संकलित केंद्रातून दररोज उचलला जातो. रुग्णालयामधील अजैविक कचराही महानगरपालिकेमार्फत उचलला जातो. यामुळे दुर्गंधी पसरत नाही. रुग्णालयातील रुग्णांना लागणारे जेवण रुग्णालयातील पाकगृहातून व आहारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार तयार केले जाते. जेवणाच्या दर्जाची तपासणी वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येते. रुग्णांना पोषक आहार आवश्यक असणाऱ्या कॅलरीजप्रमाणे पुरविला जातो. रुग्णालय प्रशासनामार्फत रुग्णाच्या आरोग्याबाबत व त्याअनुषंगाने पुरवावयाच्या सुविधेबाबत योग्य काळजी घेतली जाते. तरीसुद्धा नागरिक व लोकप्रतिनिधींना याबाबत काही शंका असल्यास संबंधितांची लवकरच रुग्णालयात बैठक आयोजित केली जाईल, असे श्री. थोरात यांनी सांगितले.

या चर्चेत डॉ.रणजित पाटील, रामदास आंबटकर, नागोराव गाणार, गिरीष व्यास, जोगेंद्र कवाडे, प्रकाश गजभिये, निलय नाईक आदींनी सहभाग घेतला.

००००

गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी समिती – जयंत पाटील

नागपूर, दि. 21 :  राज्य शासनाने गिरणी कामगारांना घरे पुरविण्यासाठी सुरु केलेल्या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी  लोकप्रतिनिधी व गिरणी कामगार संघटना प्रतिनिधी यांची समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री जयंत पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली.

या संबंधीची लक्षवेधी सूचना सदस्य प्रसाद लाड यांनी मांडली.

श्री.पाटील म्हणाले, बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावली 1991 मधील सुधारित 58 (1) ब नुसार मुंबईतील गिरण्यांची मोकळी जागा व शिल्लक चटई क्षेत्र यांचे वाटप साधारणत: प्रत्येकी 1/3 हिस्सा बृहन्मुंबई महानगरपालिका, म्हाडा व गिरणीमालक यांना देण्याची तरतूद आहे. म्हाडास उपलब्ध होणाऱ्या जमिनीवर गिरणी कामगारांसाठी 2/3 गाळे व संक्रमण सदनिकांसाठी 1/3 गाळे बांधण्याची तरतूद आहे. म्हाडाने गिरणी कामगारांच्या माहिती संकलनासंदर्भात राबविलेल्या तीन मोहिमांमध्ये सुमारे 1 लाख 74 हजार गिरणी कामगार/त्यांच्या वारसांनी गिरणी कामगारांच्या घरांसाठी अर्ज केले आहेत. गिरणी कामगारांना लवकरात लवकर घरे मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी ही समिती काम करेल, असे श्री.पाटील यांनी सांगितले.

या चर्चेत विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाई जगताप, भाई गिरकर आदींनी सहभाग घेतला.

0000

रायगड जिल्ह्यातील आरोग्य योजनेच्या अनियमिततेची विभागामार्फत चौकशी – जयंत पाटील

नागपूर, दि. 21 : रायगड जिल्ह्यामध्ये शासनाच्या वतीने आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत माता व बालकांसाठी शालेय मुलांसाठी, क्षयरोग, कुष्ठरोग नियंत्रण इत्यादी आरोग्यविषयक बाबींसाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांमध्ये अनियमितता असल्याची लोकप्रतिनिधींची तक्रार असल्याने या योजनेतील अनियमिततेची विभागामार्फत चौकशी करणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.

या संबंधीची लक्षवेधी सूचना सदस्य अनिकेत तटकरे यांनी मांडली.

या चर्चेत सदस्य सर्वश्री निरंजन डावखरे, रणजित पाटील आदींनी सहभाग घेतला.

0000

शिरवळ ते बारामती रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करणार – डॉ.नितिन राऊत

नागपूर, दि. 21 : पुणे जिल्ह्यातील शिरवळ ते बारामती एमआयडीसीला जोडणाऱ्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम  दहा वर्षापासून सुरु आहे. यामध्ये शिरवळ ते लोणंद व फलटण ते बारामती रस्त्याचे काम सध्या अपूर्ण असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री डॉ. नितिन राऊत यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.

या संबंधीची लक्षवेधी सूचना सदस्य रामहरी रुपनवर यांनी मांडली.

यावेळी श्री.राऊत म्हणाले, पुणे जिल्ह्यातील शिरवळ ते बारामती एमआयडीसीला जोडणाऱ्या चौपदरी रस्त्याच्या कामामध्ये बारामती-फलटण, रा.मा.10 कि.मी. 42/400 ते 64/300 (एकूण लांबी 29.90 कि.मी.) आणि शिरवळ-लोणंद-फलटण कि.मी. 80/00 ते 136/00 (एकूण लांबी 56.00 कि.मी) अशी एकूण 77.90 कि.मी. लांबीचा एकूण रु. 355.65 कोटी रकमेचे चौपदरीकरणाचे काम खासगीकरणांतर्गत हाती घेण्यात आले होते. रस्त्याचे 65 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित 35 टक्के वेळीच भूसंपादन न झाल्यामुळे ऑक्टोबर 2012 पासून काम बंद आहे. या संबंधीच्या सर्व अडचणी सोडवून या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याची माहिती मंत्री श्री.राऊत यांनी दिली.

यावेळी उपसभापतींनीही या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम लवकर करण्याचे निर्देश दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पवित्र दीक्षाभूमीला भेट

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे घेतले दर्शन

नागपूर, दि. 20 :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पवित्र दीक्षाभूमीला भेट दिली. सर्वप्रथम दीक्षाभूमीच्या स्तुपासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्प वाहून वंदन केले. स्तूपातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन गौतम बुद्धाच्या मूर्तीला पुष्प वाहून वंदन केले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम आणि आदिवासी विकास मंत्री डॉ.नितीन राऊत, खासदार विनायक राऊत, माजी खासदार प्रकाश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दीक्षाभूमी आगमन प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, डॉ. सुधीर फुलझेले, ॲड. आनंद फुलझेले यांनी पुष्पगुच्छ  देऊन  त्यांचे स्वागत केले. शाल, दीक्षाभूमीची प्रतिमा देऊन मुख्यमंत्री यांचा सत्कार केला. स्तूपातील बांधकाम करण्यात येत असलेल्या सभागृहाची पाहणी केली. दीक्षाभूमीला भेट देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांशी  मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी हस्तांदोलन करुन त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. दीक्षाभूमीला भेट देण्यास आलेल्या नागरिकांची यावेळी उपस्थिती होती. 00000

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने पवित्र दीक्षाभूमि को भेट दी

डॉ. आंबेडकर के अस्थिकलश का किया दर्शन

नागपुर,दि.20 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने आज पवित्र दीक्षाभूमि को भेट दी। सर्वप्रथम उन्होंने दीक्षाभूमि के स्तुप के सामने स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर के अर्धाकृति प्रतिमा को पुष्प अर्पित कर उन्हें वंदन किया।  स्तूप के सामने स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर के अस्थिकलश का दर्शन लेकर गौतम बुद्ध की प्रतिमा को पुष्प अर्पित कर उन्हें वंदन किया।

इस दौरान सार्वजनिक बांधकाम एवं आदिवासी विकास मंत्री डॉ. नितीन राऊत,सांसद विनायक राऊत,पूर्व सांसद प्रकाश जाधव प्रमुखता से उपस्थित थे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का दीक्षाभूमि में आगमन होने के अवसर पर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिति के सदस्य विलास गजघाटे,डॉ. सुधीर फुलझेले,ॲड. आनंद फुलझेले ने उन्हें पुष्पगुच्छ  देकर उनका  स्वागत किया। साथ ही शाल,दीक्षाभूमि की प्रतिमा देकर मुख्यमंत्री श्री. ठाकरे का सत्कार भी किया। इस भेट के दरमियान श्री. ठाकरे ने स्तूप में बनाए जा रहे सभागृह का निरीक्षण किया। इस अवसर पर दीक्षाभूमि को भेट देने के लिए आए छात्रों से मुख्यमंत्री ठाकरे ने हस्तांदोलन कर उनकी शुभकामनाएं स्वीकार की। दीक्षाभूमि को भेट देने के लिए आये नागरिकों को बड़ी संख्या में उपस्थिति इस दौरान थी।

००००


CM visited sacred Diksha bhoomi

paid visit to the Dr. Ambedkar’s Asthi Kalash

Nagpur, date.20:CM Uddhav Thackeray visited sacred Dikshabhoomi today.  First, he offered flowers and paid tribute to the Ambedkar’s statue that is placed in front of Dikshabhoomi stupa. Then he paid respect to the Dr. Babasaheb Ambedkar’s Asthi Kalash, offered flowers, and bowed to the idol of Gautam Buddha.

PWD and Tribal Development Minister Dr. Nitin Raut, MP Vinayak Raut, former MLA Prakash Jadhav was present at the time. Members of Dr. Babasaheb Ambedkar Monument Committee Vilas Gajghate, Dr. Sudhir Phulzele, and Adv. Anand Phulzele welcomed CM Uddhav Thackeray with a flower bouquet. They honored the CM with a shawl and replica of Dikshabhoomi. Shri. Thackeray surveyed the hall under construction in Dikshabhoomi. CM Thackeray shook hands with and accepted wishes from the student visitors on the visit to the Dikshabhoomi. People who had come to visit Dikshabhoomi were present at the moment in a large number.

0000

विद्यार्थ्यांनी जागतिक पातळीवर यश संपादन करण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

अमरावती येथे आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

अमरावती, दि. 20 : आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी उपलब्ध साधनसामुग्रीच्या आधारावर एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली आहे. विद्यार्थ्यांमधील क्रीडागुण हेरून विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षणासह साधनसामुग्री उपलब्ध करून दिल्यास हे विद्यार्थी जागतिक किर्तीचे होऊ शकतील. विद्यार्थ्यांनीही सातत्यपूर्ण मेहनत, जिद्दीने जागतिक पातळीवर यश संपादन करावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात आयोजित आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.  अध्यक्षस्थानी पद्मश्री प्रभाकरराव वैद्य हे होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, महापौर चेतन गावंडे, प्रधान सचिव मनिषा वर्मा, विभागीय आयुक्त पियूष सिंह आदी उपस्थित होते.

श्री. कोश्यारी म्हणाले की, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी एव्हरेस्टची चढाई केल्याचे कौतुक आहे. आपल्यातील तीन विद्यार्थ्यांनी हे लक्ष्य ठेवले आणि पूर्ण केले. येत्या काळात उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनीही अशाच प्रकारचे भव्य लक्ष्य ठेऊन ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत.आश्रमशाळेत राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी मेहनत आणि जिद्दीने स्पर्धेत सहभागी होऊन यशस्वी व्हावे.

केंद्र आणि राज्य शासन विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित करीत आहे. यासाठी आवश्यक निधीही उपलब्ध करून देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा. स्पर्धेत सहभागी व्हावे. शिक्षकांनीही त्यांना प्रोत्साहित करावे. योग्य प्रशिक्षणाने हे विद्यार्थी ऑलिंपिकमध्ये सहभागी होऊन पदक प्राप्त करतील, असा विश्वास श्री. कोश्यारी यांनी व्यक्त केला.

सुरूवातीला राज्यपाल श्री. कोश्यारी यांचे पारंपरिक नृत्याने स्वागत करण्यात आले. त्यांनतर राज्यपाल यांनी मिशन शौर्य, अटल आरोग्य वाहिनी, कायापालट, कौशल्य विकास, पेसा, कराडी पथ आदी गॅलरीचे उद्घाटन केले. राणी दुर्गावती आणि बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करुन झेंडावंदन आणि दीपप्रज्वलनाने स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. राज्यपाल यांनी क्रीडा ज्योत प्रज्वलित केली. राज्यपाल यांना सहभागी खेळाडूंनी मानवंदना दिली.

केंद्रीय राज्यमंत्री श्री. धोत्रे यांनी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात अनेक नामवंत खेळाडू घडले आहेत. अशा ठिकाणी या स्पर्धा होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. स्पर्धेसाठी आवश्यक असलेले सहकार्य करण्यात येतील. तसेच अशा स्पर्धांमधून आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

श्रीमती वर्मा यांनी प्रास्ताविक केले. नागपूर आदिवासी आयुक्त कार्यालयाने आश्रमशाळा तपासणीसाठी तयार करण्यात आलेल्या ई-निरिक्षण अॅप, तसेच क्रीडा स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

राज्यपालांच्या हस्ते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील वसतिगृहाचे उद्घाटन

अमरावती,दि. 20 :येथीलसंतगाडगेबाबाअमरावतीविद्यापीठातउभारण्यातआलेल्यावसतिगृहाचेउद्घाटनराज्यपालभगत सिंहकोश्यारीयांच्याहस्तेझाले.

सुमारेदीडकोटीरुपयेखर्चूनबांधण्यातआलेल्यायावसतिगृहामुळेविद्यापीठातसंशोधनकरणाऱ्या25संशोधकछात्रांच्यानिवासाचीसोयहोणारआहे.

यावेळीकेंद्रीयमानवसंसाधनविकासखात्याचेराज्यमंत्रीसंजयधोत्रे,कुलगुरुडॉ.मुरलीधरचांदेकरयांच्यासहमान्यवरउपस्थितहोते.यावेळीराज्यपालांनीसंतगाडगेबाबायांच्यापुतळ्यासपुष्पांजलीवाहूनअभिवादनकेले.

ज्ञानाचा उपयोग करताना देशहिताला सर्वोच्च प्राधान्य द्या – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

अमरावती,दि.20  : मूल्यांशिवाय शिक्षण व्यर्थ आहे,याची तरुण पिढीने जाणीव ठेवावी आणि शिक्षणासोबत प्राप्त झालेल्या ज्ञानाचा  उपयोग करताना देशहित सदैव डोळ्यासमोर ठेवावे असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा छत्तिसावा  दीक्षांत समारंभ राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मानव संसाधन विकास,दूरसंचार,इलेक्ट्रानिक्स,माहिती तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री संजय धोत्रे उपस्थित होते. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर,प्र- कुलगुरु राजेश जयपूरकर, यांच्यासह विविध अधिष्ठाता,व्यवस्थापन समिती सदस्यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

दीक्षांत समारंभात पारंपरिक उपदेश करण्यापूर्वी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राज्यपाल म्हणाले, आज विविध पदके आणि पारितोषिके मिळविणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण मोठे आहे,हे पाहून आपल्याला अत्यंत आनंद झाला आणि समाधान वाटले. सर्व मुलींचे आपण मनापासून कौतुक करतो. या मुलींच्या कामगिरीचा समाजातील अपप्रवृत्तींना धाक वाटेल.

आपला देश मोठ्या कष्टाने आणि अनेकांच्या बलिदानानंतर स्वतंत्र झाला आहे. इतिहासात या देशाचा मोठा लौकिक होता. तोच लौकिक पुन्हा मिळवून देण्यासाठी आज प्रयत्न होत असताना विद्यार्थ्यांनी या प्रयत्नांमध्ये सर्व शक्तीनिशी सहभागी होण्याचा संकल्प केला पाहिजे. देशनिष्ठा आणि देशासाठीचे कर्तव्य या सर्वोच्च बाबी आहेत,याची सदैव जाणीव ठेवली पाहिजे.आयुष्यात छोट्या वाटणाऱ्या बाबींना मोठे महत्त्व असते. छोट्या छोट्या गोष्टी मूल्यांचा संस्कार करतात,असेही राज्यपाल म्हणाले.

पदवी प्राप्त करण्याचा दिवस हा साफल्याचा दिवस असून आज ज्यांना पदवी प्राप्त होत आहे,त्यांची साधना यशस्वी होण्यास सुरुवात झाली आहे. पुढील आयुष्यातही मेहनतीवर विश्वास ठेवा असे ते म्हणाले.

यावेळी राज्यपालांनी  नेहमी खरे बोला,कर्तव्याचे पालन करा,आत्मोन्नती होईल असे वाचन करा,कर्तव्यापासून विचलित होऊ नका,मानवजातीच्या हिताचा व उत्कर्षाचा विचार करुन निर्दोष कर्माचेच आचरण करा व सदाचाराचे अनुकरण करा असा  पारंपरिक दीक्षांत उपदेश संस्कृत श्लोकांच्या माध्यमातून केला.आपल्या दीक्षांत भाषणात केंद्रीय मंत्री धोत्रे यांनी विद्यार्थ्यांना प्रबोधन परंपरेशी नाते टिकवून ठेवण्याचे आवाहन केले.

आज विज्ञान-तंत्रज्ञान- उद्योग या क्षेत्रात नवकल्पनांना महत्त्व प्राप्त झाले आहे,असे नमूद करुन राज्यमंत्री श्री. धोत्रे म्हणाले की, ग्रामीण जीवनातील कल्पकतेतून विद्यार्थ्यांनी नवकल्पनांबाबत प्रेरणा घ्यावी. आज उभ्या असलेल्या समस्या सोडविण्यासाठी आपण संपादन केलेल्या ज्ञानाचा उपयोग करा असे आवाहन त्यांनी केले. व्यावसायिक शिक्षण हा उच्च शिक्षणाचा अविभाज्य भाग असणे तसेच व्यावसायिक शिक्षणात कौशल्याधारीत अभ्यासक्रमाचा समावेश केला जाणे या बाबी महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना स्थानिक आणि जागतिक प्रश्नाचे भान हवे असे नमूद करुन त्यांनी महिलांवर अन्याय आणि अत्याचार होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले.नैसर्गिक शेती,पर्यावरण रक्षण आदी बाबींचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी प्रास्ताविक व स्वागतपर भाषण केले. आजच्या समारंभात158पारितोषिकांचे वितरण केले जात असून480संशोधकाना आचार्य पदवी देऊन सन्मानित केले जात असल्याचे सांगितले.

यावेळी व्यासपीठावर कुलसचिव डॉ. तुषार देशमुख,परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख आणि विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता  आणि व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.

विधानपरिषद लक्षवेधी

अपूर्ण एसआरए प्रकल्प पूर्ण करण्यासंदर्भात

मार्ग काढण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमणार

– जयंत पाटील

नागपूर,दि. 20 : मुंबई शहर,उपनगरातील झोपडपट्टी पुनर्विकास धोरणानुसार (एसआरए) पुनर्विकासाचे प्रकल्प पूर्ण व्हावेत,ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी विधीमंडळ सदस्य व या क्षेत्रातील तज्ज्ञांची एक समिती नेमणार असल्याची घोषणा गृहनिर्माणमंत्री जयंत पाटील यांनी आज विधानपरिषदेत केली.

सदस्य सर्वश्री किरण पावसकर,हेमंत टकले,आनंद ठाकूर,ख्वाजा बेग,श्रीमती विद्या चव्हाण यांनी एसआरए संदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर मंत्री श्री. पाटील बोलत होते.

श्री. पाटील म्हणाले,एसआरएनुसार अनेक प्रकल्पांना मंजुरी दिली जाते. मात्र पुढे अडचणी येतात व विकासक ते प्रकल्प  पूर्ण करत नाही. प्रकल्प सुरू करताना विकासकाने मान्य केलेल्या अनेक गोष्टी इमारतीमध्ये केल्या जात नाहीत. त्यामुळे तो प्रकल्प रखडला जातो. अशा प्रकल्पांची छाननी करून त्यावर निर्णय घेण्यासाठी झोपडपट्टी प्राधिकरणाकडे पाठविण्यासाठी ही समिती काम करेल. तसेच इमारती दर्जासंदर्भातही ही समिती सूचना करेल.

पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना देण्यात येणाऱ्या थकित भाड्यासंदर्भातही तातडीने पुढील आठवड्यात बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल. तसेच एसआरए धोरणानुसार राबविण्यात येणारे प्रकल्प सुरळीतपणे होण्यासाठी व सामान्य मुंबईकरांच्या हितासाठी राज्य शासन योग्य ती कार्यवाही करेल,असेही त्यांनी सांगितले.

या चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,सदस्य सर्वश्री किरण पावसकर,सुरेश धस,विद्या चव्हाण,भाई गिरकर,जोगेंद्र कवाडे यांनी भाग घेतला.

००००

साखर कारखान्यांना आर्थिक संकटातून

बाहेर काढण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील – जयंत पाटील

नागपूर,दि. 20 : राज्यातील साखर कारखान्यांची सध्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी व या स्थितीतून या क्षेत्राला बाहेर काढण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करणार असल्याचे सहकारमंत्री जयंत पाटील यांनी आज येथे सांगितले.

विधानपरिषदेत सदस्य सदाशिव खोत यांनी साखर कारखान्यांच्या एफआरपी संदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर श्री. पाटील बोलत होते.

श्री. पाटील म्हणाले,राज्यातील साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना थकित एफआरपीची रक्कम देण्यासंदर्भात साखर आयुक्तांकडून प्रयत्न करण्यात येत असून सन 2018-19 या पूर्वीच्या गळीत हंगामातील थकित 1557.59 कोटी रक्कमेपैकी 84 टक्के म्हणजेच 1305.44 कोटी रक्कम वसूल करण्यात आली आहे. उर्वरित थकीत रक्कम वसूल करण्याची कार्यवाही सुरू आहे. साखर कारखान्यांच्या आर्थिक अवस्थेसंदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. कारखान्यांना यातून बाहेर काढून साखर उद्योगाला पुनरुज्जीवीत करण्यासाठी कार्यक्षम कारखान्यांना मदत करण्याचे काम राज्य शासन करणार आहे. आर्थिक संकटात असलेल्या कारखान्यांचे पुनर्रचना करण्याचा विचार सुरू आहे. तसेच नाबार्डच्या सूचनांमुळे एनडीआर चांगला नसेल तर बँका कारखान्यांना कर्ज देत नाहीत. याविषयावरही ‘नाबार्ड’शी बोलून मार्ग काढण्यात येईल,असेही त्यांनी सांगितले

यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,सदस्य सर्वश्री रामराव पाटील,सुरजितसिंह ठाकूर आदींनी सहभाग घेतला.

००००

राज्यातील डम्पिंग ग्राऊंड प्रश्नी समिती

आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न लवकरच सोडविणार

एकनाथ शिंदे

नागपूर दि.20 :कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रांतर्गत असलेल्या आधारवाडी डम्पिंग ग्राउंडच्या कचरा टाकण्यासंबंधितच्या व अन्य समस्या तेथील स्थानिक नागरीक व प्रशासनाशी चर्चा करून लवकरच सोडविणार असून राज्यातील इतर शहरातील असे प्रश्नही सोडविण्यासाठी समिती स्थापन करु, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली.

यासंबंधीची लक्षवेधी सूचना सदस्य जगन्नाथ शिंदे यांनी मांडली.

यावेळी मंत्री श्री. शिंदे म्हणाले,कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील घनकचरा आधारवाडी डंपिंग ग्राऊंड येथील कचरा डेपोवर (क्षेत्रफळ5.88हेक्टर) महानगरपालिका स्थापन होण्याच्या पूर्वीपासून टाकण्यात येतो. सद्यस्थितीत कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात प्रतिदिन सरासरी650मेट्रीक टन इतका कचरा निर्माण होतो. त्यापैकी100मे. टन कचऱ्याची विल्हेवाट लावली जात असून,उर्वरित550मे. टन कचरा आधारवाडी डंपिंग ग्राऊंडवर टाकण्यात येतो त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

या समस्या सोडविण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात12ठिकाणी शास्त्रोक्त भरावभूमी तयार करण्याचा निर्णय नसून मौजे उंबर्डे,मौजे बारावे व मौजे मांडा या3ठिकाणीच शास्त्रोक्त भरावभूमी तयार करणे, 13ठिकाणी बायोगॅस प्रकल्प उभारणे तसेच घनकचरा वाहतुकीसाठी वाहने खरेदी करणे या बाबींचा स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सविस्तर प्रकल्प अहवालात समावेश करण्यात आला आहे. हे प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर दैनंदिन700मे. टन घनकचऱ्यावर प्रक्रिया करणे शक्य होईल. मौजे उंबर्डे व मौजे बारावे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर आधारवाडी येथे कचरा टाकणे बंद करून हे डंपिंग ग्राऊंड शास्त्रोक्तरित्या बंद करण्याबाबतची कार्यवाही महापालिकेस सुरू करता येईल,असे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने कळविलेले आहे. राज्यातील शहरांमध्ये डम्पिंग ग्राऊंडच्या समस्या सोडविण्यासाठी समितीची निर्मिती करण्यात येणार असल्याचेही श्री.शिंदे यांनी सांगितले.

या चर्चेत सदस्य सर्वश्री हेमंत टकले,प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी सहभाग घेतला.

0000

छाया उपजिल्हा रुग्णालय प्रकरणी

दोषींवर कारवाई करणारजयंत पाटील

नागपूर दि.20 :ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील कै.बी.जी. छाया उपजिल्हा रूग्णालयातील9रूग्णांवर उपचार करताना व त्यानंतर झालेल्या त्रासाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.

यासंबंधीची लक्षवेधी सूचना सदस्य भाई जगताप यांनी मांडली.

यावेळी श्री. पाटील म्हणाले,कै. बी. जी. छाया उपजिल्हा रुग्णालय,अंबरनाथ येथे12महिलांना अशक्तपणा,डेंग्यू ताप,ताप,विषमज्वर इ. आजारामुळे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी9रुग्णांना तापाच्या उपचारासाठी सेट्रीयाझोन1ग्रॅम हे इंजेक्शन रात्री9च्या सुमारास देण्यात आले. जंतूसंसर्गामुळे येणाऱ्या तापासाठी हे औषध वापरण्यात येते. त्यामुळे चुकीचे औषध दिले हे खरे नाही. इंजेक्शन दिल्यानंतर अर्ध्या तासाने या रुग्णांनी उलट्या व मळमळ होत असल्याची तक्रार केली. रुग्णालयातील डॉक्टरांनी या रुग्णांवर उपचार केले. परंतु उलट्या व मळमळ थांबत नसल्यामुळे इंजेक्शन दिलेल्या9रुग्णांना पुढील उपचारासाठी व इंजेक्शन न दिलेल्या3रुग्णांना हा त्रास होत नसतानाही विनंतीमुळे मध्यवर्ती रुग्णालय,उल्हासनगर येथे दाखल केले. तेथेही उपचारादरम्यान9पैकी6रुग्णांच्या उलट्यांची तीव्रता वाढल्याने क्रिटी केअर रुग्णालय,उल्हासनगर येथे स्थलांतरीत करण्यात आले. प्रकृती सुधारल्यामुळे मध्यवर्ती रुग्णालय,उल्हासनगर येथील रुग्णांना दि.4डिसेंबर, 2019रोजी तर क्रिटी केअर रुग्णालय,उल्हासनगर येथील दाखल6रुग्णांना दि5डिसेंबर, 2019रोजी घरी सोडण्यात आले.

उपसंचालक,आरोग्य सेवा,मुंबई मंडळ,ठाणे यांचे दि6डिसेंबर, 2019च्या आदेशान्वये या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता समिती गठित करण्यात आली होती. या समितीने दि16डिसेंबर, 2019  रोजी सादर केलेल्या अहवालामध्ये आवश्यकतेनुसार इंजे. सेट्रीयाझोन दिल्याने,निर्जतूक सिरिंज वापरल्याचे तसेच औषधाची मुदत दि5फेब्रुवारी, 2021असल्याचे नमूद केले असून,या इंजेक्शनमुळे यापुर्वी कोणत्याही रुग्णास त्रास झाला नसल्याचेही स्पष्ट केले आहे. तसेच रुग्णांच्या अहवालामध्ये हेच औषध या रुग्णांना दिल्याचे नमूद आहे. या घटनेनंतर इंजेक्शन सेट्रीयाझोनच्याBatch No. 19, Cl-104चा वापर त्वरीत थांबविण्यात आला असून अन्न व औषधी प्रशासन विभागाकडे नमुना तपासणीसाठी देण्यात आलेला आहे. याबाबतचा अहवाल अप्राप्त आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे श्री.पाटील यांनी सांगितले.

तसेच राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रिक्त पदे व अन्य समस्यांचा सर्वंकष आढावा घेऊन राज्यातील जनतेला चांगल्या आरोग्य सेवा देण्याचा शासन प्रयत्न करणार असल्याचेही श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

या चर्चेत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,सदस्य सर्वश्री हेमंत टकले,अनंत गाडगीळ,गिरीष व्यास,अमरनाथ राजूरकर,महादेव जानकर यांनी सहभाग घेतला.

0000

दीक्षाभूमीच्या विकासासाठी मंजूर 100 कोटींपैकी

40 कोटी रु. नागपूर प्राधिकरणाकडे सुरक्षित

छगन भुजबळ

नागपूर,दि.20 :दिक्षाभूमीच्या विकासासाठी2018मध्ये100कोटींच्या कामांना तत्वत: मंजुरी दिली असून त्यापैकी रुपये40कोटी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आले आहेत. हा निधी प्राधिकरणाच्या खात्यावर सुरक्षित आहे. दीक्षाभूमीच्या विकासकामांना आवश्यकतेनुसार पाहिजे तेवढा निधी देण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानपरिषदेत दिली.

यासंबंधीची लक्षवेधी सूचना सदस्य प्रकाश गजभिये यांनी मांडली.

यावेळी श्री.भुजबळ म्हणाले, प्रधान सचिव,सामाजिक न्याय यांच्या अध्यक्षतेखाली27नोव्हेंबर2019रोजी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण,नागपूर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती व सबंधित वास्तूशास्त्रज्ञ यांची संयुक्त बैठक घेऊन प्रस्तावित विकास बांधकाम व आराखडा यांचे नियोजन करताना मुख्य स्तूपास बाधा येणार नाही,मुख्य स्तूप दुरुन दिसण्यास अडचण येणार नाही,तसेच मुख्य स्तूपाच्या सौंदर्यास बाधा येणार नाही,याबाबी विचारात घेऊन सुधारित प्रस्ताव तयार करुन तो15दिवसात उच्चस्तरीय समितीसमोर सादर करण्याच्या सूचना  नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण,नागपूर यांना दिल्या. त्याप्रमाणे नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सुधारित अंदाजपत्रक प्राप्त करुन घेऊन विभागामार्फत ते उच्चस्तरीय सचिव समितीसमोर सादर करण्यात येणार असल्याचे श्री. भुजबळ यांनी सांगितले.

या चर्चेत सदस्य श्री. गिरीष व्यास यांनी सहभाग घेतला.

0 0 0

शिक्षकांना कॅशलेस आरोग्य योजना लागू करणार

बाळासाहेब थोरात

नागपूर,दि.20 :राज्यातील मान्यताप्राप्त व अनुदानित खाजगी,प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालय यातील पूर्णवेळ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना कॅशलेस आरोग्य योजना लवकरच लागू करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री श्री.बाळासाहेब थोरात यांनी दिली.

यासंबंधीची लक्षवेधी सूचना सदस्य दत्रातय सावंत यांनी मांडली.

यावेळी श्री.थोरात म्हणाले,सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती लागू आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक,अध्यापक विद्यालय यातील पूर्णवेळ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना स्वत:साठी अथवा आपल्या कुटुंबियासाठी आरोग्य विभागामार्फत मान्यता दिलेल्या27आकस्मिक व5गंभीर आजारावरील उपचारार्थ आंतररुग्ण कालावधी झालेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती शासनाकडून करण्यात येते. ही खर्च प्रतिपूर्ती आता कॅशलेस स्वरुपात करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु आहे.

या चर्चेत सदस्य सर्वश्री डॉ.रणजीत पाटील,श्रीकांत देशपांडे,निरंजन डावखरे,बाळाराम पाटील,श्रीमती मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला.

0 0 0

ताज्या बातम्या

क्रीडापटूंसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करून द्या – मंत्री आदिती तटकरे

0
मुंबई, दि. १५: मौजे धाटव येथे तालुका क्रीडा संकुलाच्या डागडुजीचे तसेच क्रीडापटूंना सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. जे क्रीडा प्रकार मोठ्या प्रमाणात खेळले जातात, त्या...

माणगांव शहरातील नागरी समस्यांचे मान्सूनपूर्व निराकरण करा – मंत्री आदिती तटकरे

0
मुंबई, दि. १५: माणगांव शहरातील बारमाही वाहणारी काळनदी ही माणगांव शहराची जीवनवाहिनी आहे. या काळनदीचे पुनर्जीवन, जीर्णोद्धार आणि संवर्धन करण्याच्या प्रक्रियेस गती देण्यासाठी पर्यावरण...

केळीच्या कल्स्टर डेव्हलपमेंटसाठी शासनाचे सर्वतोपरी सहकार्य – मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

0
मुंबई, दि. १५ : केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी डिजिटल शेती शाळा असे नाविन्यपूर्ण उपक्रम प्रभावीपणे राबवा. केळी संशोधनाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. जळगाव जिल्ह्यात केळी पिकाच्या...

फणस लागवड क्षेत्र वाढीसाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करा – मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

0
मुंबई, दि. १५ : फणस उत्पादन लागवडीखालील क्षेत्र वाढावे, यासाठी दापोली कृषी विद्यापीठाने सर्वसमावेशक असा आराखडा तयार करावा. फणसाच्या विविध जातीची दर्जेदार कलमे तयार...

आदिवासी विभागाच्या योजनांमध्ये महिलांना प्राधान्य द्या – मंत्री डॉ. अशोक वुईके

0
मुंबई, दि. १५ : आदिवासी विभागाच्या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ महिलांना आणि शालेय विद्यार्थ्यांना व्हावा, यासाठी या घटकांवर विशेष लक्ष केंद्रित करावे, असे निर्देश...