शनिवार, ऑगस्ट 2, 2025
Home Blog Page 1627

महाराष्ट्र लोकसेवा आयोग : सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

मुंबई, दि. १ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२२ मधील अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला आहे.

69 पदांसाठी झालेल्या परीक्षेमध्ये मंत्रालयीन विभागातून शिवकुमार चंद्रकांत माशाळकर (बैठक क्रमांक – MB001044) हे व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातून अविनाश पंढरीनाथ बडधे (बैठक क्रमांक – MB002014) हे प्रथम आले आहेत. उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व सीमांकन गुण आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

या अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे, अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत, आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे, असे लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

000000

राजू धोत्रे/विसंअ/

माता रमाई आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्म वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. 1- माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या 7 फेब्रुवारी रोजीच्या जयंती निमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील वणंद या त्यांच्या जन्मस्थानी आयोजित कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सामाजिक न्याय विभागामार्फत संपूर्ण सहकार्य करण्यात यावे. त्याचप्रमाणे माता रमाई यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्म वर्षानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी सूचना शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली.

चालू वर्ष हे माता रमाई आंबेडकर यांचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मवर्ष आहे. यानिमित्त शासनाच्या वतीने राज्यात सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, या विविध सामाजिक संघटनांनी केलेल्या मागणीबाबत श्री.केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) चे महासंचालक धम्मज्योती गजभिये, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस, परिवहन, बेस्ट आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.केसरकर म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यातील वणंद येथील माता रमाई यांच्या स्मारकाचे अद्ययावतीकरण करून तेथे येणाऱ्या अनुयायांना जिल्हा प्रशासनामार्फत सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. यासाठी सामाजिक न्याय विभागाने सहकार्य करावे. मुंबईत माता रमाई यांच्या वरळी येथील स्मारक परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन तेथे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. चैत्यभूमी जवळील दर्शक दिघेचे (व्ह्युविंग डेक) सुशोभिकरण करण्यात यावे. शाळांमधून वर्षभर माता रमाई यांच्याशी संबंधित विविध कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे. यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. रमाई आवास योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने प्रयत्न करावेत, अशी सूचनाही त्यांनी केली. चेंबूर येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहाला माता रमाई यांचे नाव देण्याबाबत प्रस्ताव सादर करावा. तसेच भोईवाडा येथील बौद्ध पंचायत समिती कार्यालयाच्या जागेत अधिक सुविधा देण्याबाबत सामाजिक न्याय विभागाने पाहणी करावी, अशी सूचनाही श्री.केसरकर यांनी केली.

सचिव श्री.भांगे यांनी यावेळी सामाजिक न्याय विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लीकन सेना, विश्वशांती सामाजिक संस्था, रमाई प्रतिष्ठान, ऑल इंडिया बँक फोरम, एचपीसीएल, रिपब्लीकन का.सेना, बौद्धजन पंचायत समिती आदी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/

अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 1 : राज्यातील अकृषी विद्यापीठे व अशासकीय अनुदानित महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

मंत्रालयात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अकृषी विद्यापीठे व अशासकीय अनुदानित महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत संयुक्त कृती समितीसमवेत बैठक झाली. या बैठकीसाठी आमदार ज्ञानराज चौगुले, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर संघटनेचे अध्यक्ष प्रकाश म्हसे, महासचिव रावसाहेब त्रिभुवन, अजय देशमुख, डॉ.आर.बी.सिंह, डॉ. नितीन कोळी, रा.जा. बढे, संघटनेचे पदाधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत सुधारित सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना, १०,२०,३० लाभाची योजना विद्यापीठ व महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करणे, दि. १ जानेवारी २०१६ ते ३१ ऑक्टोबर २०२० अखेरची प्रत्यक्ष सातवा वेतन आयोग लागू झाला त्या दरम्यानच्या फरकाची थकबाकी  व १ हजार ४१० विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षेकतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरणे, सहाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी गृहीत धरून त्या आधारे सातवा वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू करणे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले, या प्रलंबित मागण्यांमुळे राज्य शासनावर येणाऱ्या वित्तीय भाराचा अभ्यास करून याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून अर्थसंकल्प‍िय अधिवेशनापूर्वी पुन्हा आढावा घेण्यात येईल या मागण्या बाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे सांगून कर्मचारी कृती समितीने संप मागे घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

000

काशीबाई थोरात/विसंअ/

औद्योगिक गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा ‘मैत्री’ कायदा – उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा केंद्र (मैत्री) कायदा, 2022 या विधेयकामुळे गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल आणि मैत्री कक्षाला वैधानिक दर्जा मिळाल्याने उद्योगासाठी लागणाऱ्या परवानग्या सुलभ आणि अधिक वेगवान होतील, असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.

काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा केंद्र (मैत्री) कायदा, 2022 या विधेयकाच्या मसुद्यास मान्यता देण्यात आली आहे. या विधेयकामध्ये उद्योगांसाठीच्या परवानग्या सुलभ आणि अधिक वेगवान करणे, त्याबाबत यंत्रणांची जबाबदारी निश्चित करण्याच्या तरतुदी आहेत. महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा (मैत्री) विधेयक विधिमंडळात सादर करण्यास मंत्रीमंडळाची मान्यता मिळाली आहे.

गुंतवणुकीला प्रोत्साहन, औद्योगिक सुविधा, व्यवसाय सुलभीकरण व उद्योगांसाठी आवश्यक परवानग्या / मंजुरी आणि सेवा कालमर्यादेत देण्याच्या दृष्टिने कायद्याद्वारे गुंतवणूकदार सुविधा केंद्र/ गुंतवणूक प्रोत्साहन एजन्सी म्हणून एक खिडकी प्रणालीला अधिकार देण्यासाठी उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा केंद्र (मैत्री) कायदा, 2022 आणला जाणार आहे.

प्रस्तावित मैत्री कायदा

उद्योग स्थापन करताना आणि तदनंतर आवश्यक परवानग्या व मंजुरी देणे, गतिमान व पारदर्शी पद्धतीने देण्यासाठी कायद्यांतर्गत ऑनलाईन एकल खिडकी प्रणाली तयार करणे, महाराष्ट्रात गुंतवणूक वाढविणे व त्यासाठी सर्व माहिती उपलब्ध करून देण्यासाठी पोर्टल विकसित करणे, राज्यातील तक्रार निवारण यंत्रणेसह व्यवसाय सुलभता सुनिश्चित करण्यासाठी एक परिसंस्था विकसित करणे, तसेच सर्व संबंधित विभागांसोबत समन्वय ठेवून उद्योगांसाठी विहित कालावधीत सेवा मिळवून देणे हा या कायद्याचा प्रमुख उद्देश आहे.

मैत्री कायद्यातील तरतुदी

अधिकार प्रदत्त समिती विकास आयुक्त (उद्योग) यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात येईल. या समितीला नियम, मार्गदर्शक तत्वे व कार्यपद्धती तयार करणे तसेच विहित कालमर्यादेचे उल्लंघन झालेल्या अर्जावर निर्णय घेण्याचे अधिकार राहतील. ज्या अधिकाऱ्यांनी वेळेत परवानगी दिलेली नाही त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागविण्याचे अधिकार समितीला राहतील.

अर्ज निकाली काढणे- सक्षम प्राधिकाऱ्याने विहित कालावधीत अर्जाचा निपटारा न केल्यास त्या अर्जावर अधिकार प्रदत्त समिती निर्णय घेईल.

पर्यवेक्षकीय समिती- प्रधान सचिव (उद्योग) यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती धोरणात्मक शिफारशींसह विलंब झालेल्या प्रकरणामध्ये शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यास सक्षम राहील.

एक अर्ज नमुना (Common application form)- उद्योग  व्यवसाय सुरु करण्याकरिता  आवश्यक परवानगीसाठी लागणारे एकत्रित अर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

तपासणीचे सुसूत्रीकरण- विभाग प्रत्येक युनिटची तपासणी न करता यादृच्छिक (Randomly) निवडीच्या आधारे संयुक्त तपासणी करू शकतील. जेणेकरुन उद्योगांना होणारा त्रास कमी होईल.

ऑनलाइन प्रणाली रचना- गुंतवणुकदारांना मिळणाऱ्या परवाना सुविधा व माहिती मिळण्यासाठी मदत देणे, औद्योगिक, व्यावसायिक किंवा व्यवसायाशी संबंधित बाबींसाठी ऑनलाईन प्रणालीवर उद्योगांना मिळणाऱ्या सेवा वेळोवेळी अद्ययावत करण्यात येतील.

मैत्री कायद्याचे अपेक्षित परिणाम

  • गुंतवणुकदारांना एका ठिकाणी व जलद पद्धतीने सर्व परवानग्या मिळणे शक्य होईल.
  • देशांतर्गत व विदेशी गुंतवणूकीसाठी राज्य पसंतीचे ठिकाण बनेल.
  • राज्यामध्ये रोजगार निर्मिती होईल.
  • एक खिडकी प्रणालीमार्फत सर्व परवानग्या एका ठिकाणी मिळाल्यामुळे उद्योग उभा करण्यासाठी व तो चालविण्यासाठी येणारा खर्च (Cost of Doing Business) कमी होईल. त्यामुळे राज्यातील उद्योगांची स्पर्धात्मकता वाढेल.
  • मैत्री कायद्याच्या अंमलबजावणीसाठी उद्योगमंत्री व मुख्यमंत्री यांच्या स्तरावर आढावा घेतील.

****

विसंअ/अर्चना शंभरकर/ उद्योग/

गृह विभागाने उत्पादन शुल्क विभागास जागा हस्तांतरणाबाबत तत्काळ कार्यवाही करावी – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई दि १ : गृह विभागाकडील सातारा येथील जागा राज्य उत्पादन शुल्क विभागास हस्तांतरणाबाबत महसूल, गृह व राज्य उत्पादन शुल्क विभागांनी समन्वयाने चर्चा करून तात्काळ निर्णय घ्यावा, अशा सूचना राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

आज मंत्रालयात श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सातारा यथील गृह विभागाकडील जागा राज्य उत्पादन शुल्क विभागास हस्तांतरण व विभागाचा आढावा याबाबत बैठक घेण्यात आली.

या बैठकीस राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, अपर पोलीस महासंचालक संजय कुमार वर्मा, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी , साताऱ्याचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी (दूरदृश्य प्रणाली द्वारे)उपसचिव युवराज अजेटराव यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सातारा येथील उत्पादन शुल्क विभागाच्या इमारतीचे बांधकाम आराखडा तसेच विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना कार्यालयाच्या आवारात देण्यात येणाऱ्या सेवा सदनिकांचे बांधकाम आराखडाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

विभागाच्या माध्यमातून महसूली स्रोत वाढविण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावे, अशा सूचना संबंधितांना दिल्या. या विभागाशी संबंधित गुन्ह्यांना आळा बसावा यासाठी गुन्हे उघडकीस आणण्याकरीता गुप्त माहिती देणारे खबऱ्यांची यंत्रणा पोलीस विभागाप्रमाणे अधिक सक्षम करण्याची गरज आहे, असे मत मंत्री देसाई यांनी व्यक्त केले.

००००

शैलजा देशमुख/विसंअ

कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई दि १: कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीची व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

मंत्रालयात मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्ती व प्रलंबित कामाबाबत बैठक घेण्यात आली.

या बैठकीस मुख्य अभियंता संतोष शेलार, अधिक्षक अभियंता धनंजय देशपांडे, उप विभागीय अधिकारी पाटण सुनील गाडे, उप विभागीय अधिकारी उत्तम दिघे उपस्थित होते.

मंत्री श्री. देसाई म्हणाले, कराड ते चिपळूण राष्ट्रीय महामार्ग या रस्त्याचे पाटण तालुक्यातील ४८ कि.मी. पैकी ३४ कि.मी. रस्त्याचे काम पूर्ण झालेले असून उर्वरित १४ कि.मी.च्या कामाबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी.ज्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती आवश्यक आहे, तेथे डांबरीकरणातून दुरुस्ती करण्याच्या सूचना श्री. देसाई यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.

००००

शैलजा देशमुख/विसंअ

पवना धरण प्रकल्पग्रस्तांबाबत गावनिहाय सर्वेक्षण करावे – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. १ : पवना प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात येणाऱ्या क्षेत्राबाबत प्रत्यक्ष वाटपाचे क्षेत्र निश्चित करावे. तसेच क्षेत्र उपलब्धतेबाबत सर्वेक्षण करून गावनिहाय अहवाल तयार करावा, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

आज मंत्रालयात मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मावळ तालुक्यातील पवना धरण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत बैठक घेण्यात आली.

या बैठकीस आमदार सुनील शेळके, पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय मोरे, डीआरओ रोहिणी आखाडे,जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. पाटील,मदत व पुनर्वसन विभागाचे कक्ष अधिकारी अभिजीत गावडे,तहसीलदार सुनील शेळके तसेच प्रकल्पग्रस्तांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, पवना धरण प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन वाटप प्रकरणी उच्च न्यायालयाने प्रकरण यथास्थिती ठेवण्याचे आदेश दिले असल्याने जमीन वाटपाची कार्यवाही करण्यात आलेली नाही. याबाबतच्या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी विधि व न्याय विभागाचे मत घ्यावे. महसूल, मदत व पुनर्वसन, जलसंपदा आणि भूमी अभिलेख विभागाने एकत्रित बनविलेल्या अहवालाची फेर तपासणी करावी.

राज्य शासन प्रकल्पग्रस्तांच्या पाठिशी असून पवना धरण प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबतची कार्यवाही करण्यात येईल, असेही मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.

0000

शैलजा देशमुख/विसंअ

सर्वसामान्य नागरिकांच्या आशा, आकांक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प – उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई, दि. १ : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत मांडलेला अर्थसंकल्प हा सामान्य नागरिकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारा सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

मंत्री श्री. सामंत म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करीत असून सर्वसमावेशक विकास, वंचित घटनांना प्राधान्य, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमता विस्तार, हरित विकास, युवक, आर्थिक क्षेत्राचा विकास या सात विषयांवर लक्ष केंद्रित करणारा हा अर्थसंकल्प आहे. भारत जगातील १० व्या अर्थव्यवस्थेवरून ५ वी अर्थव्यवस्था झाली आहे.

उद्योगांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा

या अर्थसंकल्पात उद्योग विभागासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. कोविडमध्ये नुकसान झालेल्या छोट्या व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.  छोट्या व मध्यम उद्योगांसाठी जाहीर करण्यात आलेली क्रेडिट रिव्हॅम्प स्किम १ एप्रिलपासून अंमलात येणार असून त्यासाठी ९ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचा २ लाख कोटींच्या मोफत क्रेडिट गॅरंटी मिळण्यात फायदा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मंत्री श्री. सामंत म्हणाले, ७५ लाख कमावणाऱ्या व्यावसायिकांना करामध्ये सूट तर  ३ कोटींपर्यंत उलाढाल असलेल्या छोट्या उद्योगांना करामध्ये सूट देण्याचा निर्णय आजच्या अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे स्टील इंडस्ट्रीला लागणाऱ्या कच्च्या मालासाठी ( Raw Material ) सवलत देण्यात येणार आहे. ‘एक जिल्हा एक उत्पादन’ साठी मॉल बनविणार असून राज्याच्या उत्पादनांना चालना देण्यासाठी युनिटी मॉल स्थापन करण्यात येणार आहे. राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी हा मॉल सुरू करण्यात येणार आहे.

अर्थसंकल्पात मच्छिमार बांधवांसाठी ६ हजार कोटींची तरतूद केलेली आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या रकमेमध्ये ६६% आर्थिक वाढ केली असून, यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न साकार होणार आहे. मोबाईल फोन आणि इलेक्ट्रिक गाड्यांच्या किंमती स्वस्त होणार असल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.

००००

विसंअ/अर्चना शंभरकर/उद्योग/

लोकाभिमुख, विकासात्मक प्रकल्पांसाठी सौदी अरेबियाच्या गुंतवणुकीचे स्वागत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १:- सौदी अरेबियाच्या उद्योग आणि गुंतवणुकीचे महाराष्ट्रात स्वागतच असेल. लोकाभिमुख, विकासात्मक प्रकल्प आणि उद्योजकतेसाठी महाराष्ट्र नेहमीच सौदी अरेबियाचा मित्र राहील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. सौदी अरेबियाचे भारतातील राजदूत सलेह इद अल हुसेनी यांची मुख्यमंत्री शिंदे यांची आज येथे सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. राजदूत अल हुसेनी यांनीही महाराष्ट्र हे सर्वच बाबतीत गतिमान राज्य असून येथील गुंतवणूक दोन्ही देशांचे संबंध आणखी दृढ करणारे ठरतील असा विश्वास व्यक्त केला.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या भेटीप्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी तथा राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांच्यासह सौदी अरेबियाचे दूतावास प्रमुख सुलेमान इद अल कुताबी आदी उच्चाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य आहे. उद्योगासह विविध क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात सर्वाधिक पोषक वातावरण आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताच्या विकासाचे स्वप्न पाहिले आहे. त्या दिशेने काम करणारे राज्य म्हणून आमची ओळख आहे. नुकताच दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत जगभरातील अनेक उद्योगांनी सुमारे १ लाख ३७ हजार कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे करार केले आहेत. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. येत्या काही काळात मुंबईचा पायाभूत सुविधांची दृष्टीने कायापालट झालेला असेल. आम्ही उद्योगस्नेही धोरण स्वीकारले आहे. अन्न प्रक्रिया उद्योग, हरित ऊर्जा अशा माध्यमातून पर्यावरण स्नेही गोष्टींना प्राधान्य दिले आहे. या दृष्टीने सौदी अरेबियाच्या विविध प्रकल्प, गुंतवणूक यांचे आम्ही स्वागतच करू.

यावेळी श्री अल हुसेनी यांनी महाराष्ट्र आणि विशेषत: मुंबईचे कौतुक केले. ते म्हणाले, भारत हा विविधतेने नटलेला सुंदर देश आहे. येथील कला क्षेत्रदेखील समृद्ध आहे. आम्हाला या कलाक्षेत्रात संयुक्तपणे काम करण्याची इच्छा आहे. आम्ही भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहोत. महाराष्ट्र हे एक सक्षम राज्य आहे, त्यामुळे यातील मोठा भाग महाराष्ट्रात येईल, यात शंका नाही. अन्न व ऊर्जा या क्षेत्रांना आम्ही  प्राधान्य देण्याचे आमचे धोरण आहे. भारताशी आणि पर्यायाने महाराष्ट्राशी आमचे उभयपक्षीय संबंध आणखी दृढ होतील असे आमचे प्रयत्न आहेत.

श्री अल हुसेनी यांनी सहा महिन्यांपूर्वी भारतातील राजदूत म्हणून पदभार स्वीकारला आहे. नवी दिल्लीबाहेर एखाद्या शहराला दिलेली पहिली भेट ही मुंबईची असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर होण्याच्या प्रयत्नांना पाठबळ देणारा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि.१: गरिबांना आधार मध्यमवर्गीयांना दिलासा उद्योगांना उभारी आणि पायाभूत सुविधांना उत्तेजन देणारा असा हा केंद्रीय अर्थसंकल्प आहे. रोजगार निर्मिती, शेतकरी, कामगार, महिला, युवक अशा समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प असून त्याचे राज्याच्या वतीने मनापासून स्वागत करतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.

देशाच्या आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाला या अर्थसंकल्पाद्वारे चालना मिळणार असल्याचे सांगतानाच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.

अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री म्हणाले, देशाच्या अमृतकाळातला पहिला अर्थसंकल्प श्रीमती सीतारामन यांनी आज मांडला. शहरी आणि ग्रामीण असा संतुलन साधणारा हा अर्थसंकल्प असून मध्यमवर्गीय, बळीराजा, उद्योजक, युवक, महिला अशा सर्व घटकांना सुखावून टाकणारा हा अर्थसंकल्प आहे. जगभरात होणाऱ्या नव्या बदलांच्या आणि त्याच्या आव्हानांचा विचार करणारा असा भविष्यवेधी अर्थसंकल्प मांडल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी श्रीमती सीतारामन यांचे अभिनंदन केले आहे.

पायाभूत सुविधा, कृषी, रोजगार, पर्यावरण अशा सर्वंच क्षेत्रांसाठी अतिशय भरीव तरतूद या अर्थसंकल्पात दिसते. पायाभूत सुविधांसाठी १० लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचा महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांना फायदा होईल त्यामुळे निश्चितच सकारात्मक परिणाम महाराष्ट्रामध्येही दिसून येईल. कर रचनेमध्ये ७ लाखांपर्यंतची केलेली उत्पन्नाची मर्यादा विशेषता मध्यमवर्गास दिलासा देणारी आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

गेले तीन वर्षे कोविड संकटात होती. त्यातून बाहेर येण्यासाठी या नव्या कर रचनेचा फायदा होणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात मांडलेली सप्तर्षी कल्पना खरोखरच वाखाणण्याजोगी असल्याचे सांगत यामध्ये सर्वंकष विकास, अंत्योदय योजना, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक दडलेल्या क्षमतांचा विकास, युवाशक्ती, वित्तीय क्षेत्र यांचा समावेश केलेला आहे. यातून आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीचे चित्र स्पष्ट होते.

काही निर्णय महाराष्ट्रात आपण राबवत असलेल्या योजना, प्रकल्प, संकल्पनांशी एकरूप असे आहेत. इंडिया अॅट १०० (India@100) या धोरणात चार क्षेत्रांना केंद्रीभूत मानण्यात आले आहे. त्यामध्ये महिला सक्षमीकरण, पीएम विकास म्हणजेच आपल्या पारंपारिक कारागिरांचा सन्मान, पर्यटन आणि हरित विकास यांचा समावेश आहे. या चारही क्षेत्रात आपण महाराष्ट्रात यापूर्वीच काम सुरु केले आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

देशामध्ये महाराष्ट्रातील लघुउद्योग हे सर्वाधिक कार्यक्षम समजले जातात. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांकरिता क्रेडिट हमी योजनेमध्ये प्रस्तावित सुधारणांमुळे हे लघुउद्योग अधिक उत्पादनक्षम होतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रामध्ये कालच पौष्टिक तृणधान्य वर्षाचा शुभारंभ करण्यात आला. हैदराबाद येथील मिलेट सेंटर ऑफ एक्सलन्सला केंद्र सरकारने दिलेला सपोर्ट खरोखरच कौतुकास्पद आहे. या तृणधान्ये वर्ष साजरे करीत असताना त्याची अर्थसंकल्पात तरतूद होणे हे निश्चितच स्वागतार्ह आहे. आम्हाला खात्री आहे की हे तृणधान्य वर्ष महाराष्ट्राच्या एकूण बाजारपेठेसाठी नक्कीच पोषक असेल.

अर्थसंकल्पात कृषी आणि सहकार क्षेत्राला मोठे प्राधान्य दिले आहे. सहकार तर महाराष्ट्राचे सामर्थ्य आहे. मागच्या आठवड्यामध्ये दिल्लीत सहकारी साखर कारखान्याच्या विविध मागण्यांवर एक बैठक घेतली होती.त्या बैठकीमध्ये सहकारी साखर कारखान्यांच्या आयकर संबंधी विषयावर चर्चा झाली. याबाबतीत  तोडगा काढू असे आश्वासन केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह  यांनी दिले होते. आज सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये या विषया संदर्भात मोठी घोषणा झाली असून  ज्या सहकारी साखर कारखान्यांवर लायबिलिटी होती त्यामध्ये  सुमारे दहा हजार कोटी रुपयांचा दिलासा या सहकारी साखर कारखान्यांना मिळणार आहे.  शेतमालाच्या साठवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात विकेंद्रीत स्वरुपात व्यवस्था उभारण्यात येणार आहे. त्यासाठी विविध कार्यकारी सोसायाट्या, मत्स्य आणि दुग्धविकास संस्थांना मदत केली जाणार आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना आपला माल योग्य वेळी बाजारात आणणे सोयीचे होणार आहे.

देशभरात १५७ नर्सिंग महाविद्यालये स्थापन केली जाणार आहेत. याचा फायदा महाराष्ट्रालाही निश्चितच होईल. कारण यापूर्वीच आपण वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास सुरुवात केली आहे. त्यांना जोडूनच ही महाविद्यालये सुरू होतील.

पीपीई मॉडेलद्वारे पर्यटन तसेच मच्छीमारांसाठी ६००० कोटी रुपयांची गुंतवणूक या योजना महाराष्ट्राला नक्कीच फायदेशीर ठरणार आहेत. महाराष्ट्राला ७२० किमी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून पर्यटनादेखील मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

गरिबांना २०२४ पर्यंत मोफत रेशन मिळणार असून आत्तापर्यंत मोफत रेशनचा ८० कोटी लोकांना फायदा झाला आहे. पीएम अन्नपूर्णा कौशल्य योजनेची सुरुवात होणार असल्याने देशातील गरिबांची काळजी घेणारे हे मोदी सरकार आहे हे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे देशात पुढील वर्षांत ५० विमानतळे उभारण्याचा संकल्प करून मोदी सरकारने नव्या भारताची वाटचाल स्पष्ट केली आहे.

जुनी वाहने बदलण्याचा निर्णय प्रदूषण कमी करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल. युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी ३० स्किल इंडिया सेंटर उभारण्यात येणार आहेत. रोजगारासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. हरित विकासावर भर देताना हरित ऊर्जा साठी ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद स्वागतार्ह आहे. ग्रीन हायड्रोजन मिशन राबवण्यात येणार आहे. त्यासाठी १९ हजार ७०० कोटीची तरतूद केली गेली आहे.

एकूणच समाजातल्या सर्व घटकांना प्राधान्य देणारा तसेच त्यांना विकासाच्या वाटचालीत सामावून घेणारा असा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प प्रत्येक भारतीयाला सुखावणारा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

खेळाडूंना अधिकाधिक दर्जेदार व अद्ययावत सुविधा पुरविण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
तीन कोटी रुपयांचे बक्षिस प्रदान नागपूर, दि. ०२ : महाराष्ट्र शासनाने कायम क्रीडा क्षेत्राला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आहे. खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षक देण्याचा प्रयत्न आहे. राज्यातील...

जैवविविधतेचे संवर्धन, स्थानिक रोजगार आणि पर्यावरण पर्यटनासाठी जंगल सफारी महत्त्वाचा टप्पा ठरणार !- पालकमंत्री...

0
पालकमंत्र्यांनी सफारीचे पाच हजार रुपये देऊन दोन तिकीट केले बुक जळगाव दि. २ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) - “सातपुडा जंगल सफारी हा ग्रामीण विकास आणि पर्यावरण...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाईन रित्या...

0
पुणे, दि. ०२: भविष्यात शेतीला निश्चितच चांगले दिवस येणार असून त्यासाठी शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून कृषी विभागाने लोकाभिमुख पद्धतीने कार्यरत रहावे, असे निर्देश राज्याचे कृषीमंत्री...

निवडणूक आयोगाकडून बीएलओ आणि पर्यवेक्षकांच्या मानधनात वाढ

0
मुंबई, दि.०२ :– भारत निवडणूक आयोगाने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचे वार्षिक मानधन दुप्पट करण्याचा तसेच बीएलओ पर्यवेक्षकांचे मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय,...

रायगड जिल्ह्यातील आरोग्य व शैक्षणिक सुविधा वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील –  उपमुख्यमंत्री अजित पवार

0
 रायगड जिमाका दि. ०२ -  रायगड जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याकरीता राज्यशासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार...