गुरूवार, जून 26, 2025
Home Blog Page 1617

नागपूर येथील ‘वनभवन’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या लोकार्पण; उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वन अधिकारी व कर्मचाऱ्यांचा होणार सन्मान

नागपूर, दि. १७ : नवीन प्रशासकीय इमारत ‘वनभवन’चा उद्घाटन सोहळा आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदक वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या, रविवार, दि. १८ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता होणार आहे.  यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

नवीन प्रशासकीय इमारत वनभवन ही ‘झिरो माईल’ परिसरामध्ये असून या इमारतीमध्ये वनविभागाची एकूण 14 कार्यालये आहेत. त्यात एकूण 254 अधिकारी व कर्मचारी यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पूर्व यांच्या अधिनस्त सर्व कार्यालये, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), वनसंरक्षक (कार्य आयोजन व सामाजिक वनीकरण), उपवनसंरक्षक नागपूर वनविभाग, उपवनसंरक्षक (कार्य आयोजन) व विभागीय वन अधिकारी (सामाजिक वनीकरण) ही कार्यालये आहेत.

 नागपूर वनवृत्तामधील भंडारा, गोंदिया, वर्धा व नागपूर या जिल्ह्याबरोबरच अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली या परिसरातून नागपूर मुख्यालयाच्या ठिकाणी क्षेत्रीय कामाबाबत किंवा सामाजिक वनीकरण व वन्यजीव या विविध विभागाशी कोणत्याही प्रश्नांशी निगडीत काम असल्यास, काही मदत हवी असल्यास, शेतकरी किंवा सामान्य नागरिक या इमारतीमध्ये आल्यानंतर त्याला शहरात वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागणार नाही. त्याचबरोबर या इमारतीच्या कार्य कक्षेबाहेरील निर्णय घेण्यासाठीचा प्रश्न निर्माण झाल्यास रामगिरी रोडवरील मुख्य इमारतीमधील कार्यालयात त्याला समन्वय साधण्यास व त्यादृष्टीने मार्गदर्शन करण्यास या इमारतीतील कार्यालयाची भूमिका मोठी राहणार आहे. या इमारतीचे बांधकाम हे हरितगृह संकल्पनेवर आधारित आहे.

नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद‌्घाटनानंतर वसंतराव देशपांडे सभागृह येथे वनसेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वनसेवेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पदक वितरण समारंभ पार पडेल.  यामध्ये वन्यजीव संरक्षण व्यवस्थापन, उत्पादन, विस्तार, नावीन्यपूर्ण, धाडसी कार्य केलेल्या एकूण 53 वन अधिकारी कर्मचा-यांचा पदक व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात  येणार आहे.

कार्यक्रमाला नागपूर जिल्ह्यातील सर्व खासदार व आमदार यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. प्रधान सचिव (वने) बी. वेणुगोपाल रेड्डी व प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) डॅा. वाय.एल.पी.राव यावेळी उपस्थित असतील.

00000

पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे कल्याण येथे आयाेजन; ५ हजार उमेदवारांनी केली नोंदणी

ठाणे, दि 17 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत कल्याण  येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा संपन्न झाला या महारोजगार मेळाव्यात ५ हजार उमेदवारांनी नोकरीसाठी नाव नोंदणी केली. यावेळी  कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार बालाजी किणीकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते उमेदवारांना नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले.

नामांकित उद्योग, कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी

मेळाव्यामध्ये क्वेस कॉर्पोरेशन लिमिटेड, एएससीआयआय प्रा. लि., स्टेल्थ हेल्थ मॅनेजमेंट, रिलायबल लॅब्स, घार्डा केमिकल्स, हॉकीन्स कुकर्स, पीएसएन सप्लाय चेन सोल्युशन्स, आदिश कन्सलटन्सी, इंडो अमाईन्स, रिलायबल एचयूबी इंजिनिअरीग (इंडिया), पितांबरी प्रॉडक्टस्, भारत गिअर्स, सुयश ग्लोबल, सँडस् सिनर्जी, पुरोहीत टेक्सटाईल अँड प्रॉडक्टस्, प्रोमोज इंजिनिअरींग, जेड रबर प्रॉडक्ट, कल्पवृक्ष, कनेक्ट वेल इंडस्ट्रीज, बीईडब्ल्यू इंजिनिअरींग, मार्करीच ॲप्रल, नेक्सजी ॲप्रल एलएलपी आदी विविध नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. नववी, दहावी, पदवीधर, आयटीआय, इंजिरिअरिंग इत्यादी शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांसाठी बँक ऑफीस जॉब, एचआर ॲडमिन, एज्युकेशन कौन्सलर, हाऊसकेअर नर्स, आयटी जॉब्स, बँक ऑफिसर, सेल्स ऑफिसर, सेल्स एक्झिक्यूटिव्ह, टेली कॉलर, स्टोअर इन्चार्ज, कस्टमर सर्व्हिस, फोन बँकिंग, ब्रांच बँकिंग, फॅसिलिटी अटेंडंट हाउसकिंपिंग, वॉर्ड बॉय, पॅन्ट्री बॉय, डाटा सायंटिस्ट, सॉफ्टवेअर डेव्हलपर, कारपेंटर, वेल्डर, सिक्युरिटी गार्ड, ऑफिस बॉय, इलेक्ट्रीशियन, ड्रायव्हर, प्लंबर अशा विविध प्रकारची एकुण 13 हजार 109 रिक्तपदे उपलब्ध होती.

स्वयंरोजगारासाठी विविध महामंडळांचा सहभाग

मेळाव्यामध्ये स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांकरिता स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन देणारी विविध शासकीय महामंडळे सहभागी होणार असून यामध्ये अण्णाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ इत्यादी महामंडळांच्या विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल लावण्यात येणार असून याद्वारे विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत राज्यात राबविण्यात येत असलेल्या प्रशिक्षण योजनांची माहितीही देण्यात आली.

००००

जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घराला शुद्ध पाणी देणार – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

येणाऱ्या ३० वर्षांत वाढणारी लोकसंख्या विचारात घेऊन पाण्याचे नियोजन

नंदुरबार : दिनांक १७ डिसेंबर २०२२ (जिमाका वृत्त) ‘हर घर जल’ या संकल्पनेतून जलजीवन मिशनच्या माध्यमातून गावागावतील प्रत्येक घरात आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तिसाठी पाणी पोहोचविण्याचा मानस आहे. तसेच येणाऱ्या ३० वर्षातील लोकसंख्या वाढीचा दर लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे.

केंद्र सरकार व राज्य शासनाच्या जल जीवन मिशन योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद नंदुरबार कडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील मंजुर योजनांच्या तालुक्यातील दुधाळे येथील भूमीपूजन सोहळ्यात डॉ.गावित बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित नंदुरबारच्या एमजीपी योजनेचे अधिकारी श्री. निकुंभे,श्रावण चव्हाण,सविता जयस्वाल,बापू पवार, जालिंदर पवार, बेबीबाई गावित,सरलाबाई पवार,दीपक पवार,रमेश बोरसे,पावबा मोरे,नरेंद्र पाटील,जगदिश पाटिल,मक्खन कोळकर, ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, ५५ लिटर पाणी प्रति व्यक्ती प्रति दिन याप्रमाणे पुरविण्यात यावे, असे मानक या योजनेचे आहेत. या मानकाप्रमाणे २०२४ पर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासन आणि प्रशासन प्रयत्नशील आहे. या योजनेसाठी केंद्रशासन ५० टक्के, राज्यशासन ५० टक्के आणि १० टक्के लोकवर्गणी अशी निधीची उपलब्धता राहणार आहे. योजना पूर्ण झाल्यावर ती यशस्वीपणे चालविल्यास आणि देखभाल दुरुस्ती योग्य रीतीने केल्यास ग्रामपंचायतीला योजनेच्या एकूण खर्चाच्या १० टक्के रक्कम प्रोत्साहन बक्षीस म्हणून देण्याची यात तरतूद आहे, असेही यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले

मागेल त्याला घर देणार

घरकुलांच्या विविध योजनांच्या माध्यमातून प्रत्येकाला घर देण्याची मोहीम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आली असून ज्यांचा पात्रतेच्या निकष यादीत समावेश होवू शकलेला नाही, अशाही मागणी करणाऱ्या प्रत्येक समुदायातील व्यक्तिला पुढील वर्षात हक्काचे घर मिळवून देणार असल्याचेही यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित म्हणाल्या, प्रत्येक ग्रामीण भागातील व्यक्तीस, स्वयंपाकासाठी आणि घरगुती वापरासाठी शुद्ध, पुरेसा आणि शाश्वत पाणीपुरवठा सर्वकाळ आणि सर्व परिस्थितीत सोयीच्या ठिकाणी उपलब्ध करून देणे हा योजनेचा गाभा आहे. त्यानुसार २०२४ पर्यंत देशातील ग्रामीण भागातील घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रति दिन, गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करणे. यानुसार आदिवासी पाडे, शाळा, अंगणवाडी, वसतिगृहे आदी ठिकाणीही नळ जोडणी देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

कार्यक्रमास मोठ्या संख्येने अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर जल जीवन मिशन योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद नंदुरबार कडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील मंजुर पातोंडा, वाघोदा,खोंडामळी (८ गावे )व उमर्दे (६गावे) या योजनांच्या भुमीपूजनही पालकमंत्री यांच्या हस्ते करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.

भूमिपूजनाचे कार्यक्रम

उद्या (रविवार, दि. १८ डिसेंबर २०२२) जलजीवन मिशन अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आलेल्या कोपर्ली, सारंगखेडा, कुकावल, वडाळी व प्रकाशा येथील योजनांचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नंदुरबार यांच्यावतीने देण्यात आली आहे.

00000000000

जगात स्वाभिमानाने जगण्यासाठी आदिवासींना शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही- आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित

यवतमाळ ,दि १० जिमाका:- आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी  शिक्षणाशिवाय पर्याय नाही. जगात स्वाभिमानाने जगायचं असेल तर शिक्षण घ्यावेच लागेल.  आदिवासी बांधवांमध्ये शिक्षणाचा टक्का पाहिजे तसा वाढला नाही, त्यामुळे मुलांमध्ये शिक्षणाची गोडी लागण्यासाठी  जिल्ह्याच्या ठिकाणी १ हजार क्षमतेचे मुलांचे व ५०० क्षमतेचे मुलींची आश्रमशाळा बांधण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी आदिवासी प्रकल्प कार्यालय,आदिवासी वसतिगृह भूमिपूजन आणी मुलींचे वसतिगृह लोकार्पण प्रसंगी सांगितले.

            पांढरकवडा येथे एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या भूमिपूजन प्रसंगी आमदार प्रा.अशोक उईके, संजीव रेड्डी- बोदकुरवार, आदिवासी अप्पर आयुक्त सुरेश वानखडे, प्रकल्प अधिकारी याशनी नागराजन, नगराध्यक्ष वैशाली नहाटे, आदिवासी बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता उज्वल डाबे उपस्थित होते.

            शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणे आदिवासी विद्यार्थ्यांनाही उत्तम दर्जाच्या शाळा, चांगल्या सुविधा आणि शिक्षक देण्याचा प्रयत्न आहे. म्हणूनच आश्रमशाळेच्या इमारती सुसज्ज आणि परिपूर्ण बांधण्याचे नियोजन करण्यात येत आहे. शिक्षणाच्या दर्जाप्रमाणे व्यवसाय किंवा नोकरी देण्यासाठी ॲप तयार करण्यात येईल. त्या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्यावर त्या पद्धतीचे व्यवसाय शिक्षण त्यांना देण्यासाठी योजना तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षेसाठी प्रशिक्षण अकॅडमी तसेच खेळाडूंसाठी स्पोर्ट्स अकॅडमी तयार करण्यात येणार आहे.

            सर्व आश्रम शाळा सीबीएसई अभ्यासक्रमाप्रमाणे राबाविण्याचा प्रयत्न असणार आहे. उत्पन्नाच्या आधारे स्मॉल स्केल इंडस्ट्री काढुन त्यात आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध होईल यादृष्टीने योजना आखण्यात येत असल्याचेही श्री. गावित यांनी सांगितले. आश्रम शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी शाळेतच नियमित उपस्थित राहावेत, यासाठी आश्रम शाळेच्या आवारातच शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान बांधण्याचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            आदिवासी बांधवांना त्यांच्या मागणीप्रमाणे सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची हमी त्यांनी दिली.आदिवासी बांधवांना  शेतीत चांगले उत्पन्न काढण्यासाठी मेहनतीने शेती करावी, त्यासाठी लागणाऱ्या सुविधा त्यांना पुरविण्यात येईल, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

            जनगणनेच्या वेळी प्रत्येक आदीवासी बांधवाने त्यांचे नाव नोंदवले जाईल याची काळजी घ्यावी. कारण या माहितीच्या आधारावरच आदिवासींसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना तयार होणार आहेत असे श्री. गावित म्हणाले.

            याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते आश्रम शाळेतील इयत्ता दहावी व बारावीतील प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ई-रिक्षा चे वाटप, दालमील, शेळीपालन, सूक्ष्म सिंचन, वैयक्तिक व सामूहिक वन हक्क पट्टे  लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. त्याचबरोबर सामूहिक वन हक्कचा चांगला आराखडा तयार करणाऱ्या गावांनी आराखड्याची प्रत मंत्री महोदयांना सादर केली.

            यावेळी प्राध्यापक अशोक उइके आणि संजीव रेड्डी बोदकुरवार यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक याशनी नागराजन यांनी केले.

जितका प्रवास तितकाच पथकर !

नागपूर ते मुंबई ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’च्या नागपूर ते शिर्डी या मार्गाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवार 11 डिसेंबर रोजी नागपुरात होत आहे. त्यानिमित्ताने या मार्गावरील पथकराविषयीच्या माहितीपर हा लेख…

समृद्धी महामार्गाच्या निर्मितीसाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च आला आहे. त्यामुळे या मार्गावरून जाताना सर्वसामान्य नागरिकांना अधिकचा पथकर लागेल, असा गैरसमज निर्माण होऊ शकतो. मात्र, यातील वस्तुस्थिती अशी आहे की, जेवढा तुम्ही प्रवास कराल, तेवढाच तुम्हाला पथकर भरावा लागणार आहे.

निर्गमन पथकर

समृद्धी महामार्गावर प्रवास करण्याचे वैशिष्ट्य म्हणजे निर्गमन पथकर (एक्झिट टोल).  निर्गमन पथकर म्हणजे काय?, तर निर्गमन पथकर म्हणजे बाहेर पडताना देता येणारा कर… याचाच अर्थ तुम्ही जितके अंतर या मार्गावरुन कापले, तितकेच पैसे तुम्हाला द्यावे लागतील. समृद्धी महामार्गाने नागपूर ते मलकापूर असा प्रवास केला, तर मलकापूरपर्यंत जितके अंतर होईल, तितकाच पथकर तुम्हाला द्यावा लागेल, तुमच्याकडून मुंबईपर्यंतच्या प्रवासाचा पथकर वसूल केला जाणार नाही.

पहिल्या टप्प्यात (नागपूर ते शिर्डी)  मुख्य मार्गिकेवर फक्त वायफळ येथे पथकर नाका असणार आहे. इतर इंटरचेंजेस धरून एकूण 19 नाके आहेत. निर्गमन पथकर पद्धतीनुसार समृद्धी महामार्गावर जेवढ्या अंतराचा प्रवास होईल, तेवढाच पथकर आकारण्यात येणार असल्याने सद्य:स्थितीत नागपूर ते शिर्डी हलक्या वाहनांकरिता सुमारे 900 रुपये एवढा पथकर असेल. पथकर हा फास्ट टॅग, कार्ड, वॅालेट, रोख अथवा ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे.

आपत्कालीन व्यवस्था

महामार्गावर अपघात किंवा बिघाड झाल्यास हेल्पलाईन 1800-2332233, 8181818155 या  क्रमांकावर मदतीसाठी संपर्क साधता येईल. महामार्गावर ठिकठिकाणी हेल्पलाईन क्रमांक प्रदर्शित करण्यात येतील. आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी रुग्णवाहिकेकरीता 108 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. १५ रुग्णवाहिका, १५ शीघ्र प्रतिसाद वाहने, १२२ सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत.

उद्घाटनानंतर समृद्धी महामार्ग सर्वांसाठी खुला होईल. सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रवास करावा, द्रुतगती महामार्गावर कुठेही वाहने उभी करू नयेत, सीट बेल्टचा वापर करावा, वेग मर्यादेचे पालन करुन वाहनधारकांनी सुरक्षित व गतिमान प्रवासाचा आनंद घ्यावा.

जिल्हा माहिती कार्यालय, नागपूर

*****

जमीन अधिग्रहण संदर्भात जनतेला अद्ययावत माहिती द्या – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

 मुंबई, दि.7 :- मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प आणि रेवस-कारंजा पूल या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे जलद वाहतूक तसेच व्यापारउद्दिम, दळणवळण यांना चालना मिळणार असून वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. त्यादृष्टीने हा प्रकल्प वेळेत सुरु व्हावा आणि बाकी असलेल्या कामांसंदर्भात जमीन अधिग्रहण विषयक प्रश्न उद्भवू नयेत, यासाठी जनतेला अद्ययावत माहिती जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात यावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज दिले.

आज विधानसभा अध्यक्ष यांच्या दालनात मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प व रेवस-कारंजा पूल कामांच्या सद्यस्थिती संदर्भात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि सिडको यांचेतर्फे सादरीकरण करण्यात आले. याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष यांनी पूर्ण झालेल्या कामांचा आढावा घेत या प्रकल्पाचे मूळ उद्दिष्ट गाठले जावे आणि भविष्यात गर्दीच्या ठिकाणी “बॉटलनेक” परिस्थिती निर्माण होऊ नये, यादृष्टीने महत्त्वाच्या सूचना दिल्या.

एमटीएचएलचा हा प्रकल्प शिवडी येथे सुरु होऊन चिर्ले येथे संपतो. रेवस-कारंजा प्रकल्प सिडको द्रोणागिरी जवळ सुरु होऊन रेवसकडे जातो. रेवस-कारंजा प्रस्तावित पुलाची लांबी ८.८ कि.मी. आहे.  याबाबतची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून या प्रकल्पाचे काम डिसेंबर, 2025 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.  रेवस ते रेवदंडा मार्ग विभागात जमीन खरेदी-विक्री व बांधकामाचे व्यवहार वेगात सुरु आहेत.  स्थानिक शेतकऱ्यांचे आणि रहिवाश्यांचे नुकसान होऊ नये म्हणून प्रस्तावित महामार्गाची आखणी, नकाशा, बाधित होणारे सर्व्हे नंबर याबाबतची माहिती जिल्हाधिकारी यांनी तातडीने प्रसिद्ध करावी, असे निर्देश ॲङ श्री. राहुल नार्वेकर यांनी दिले.

समुद्रात मार्ग उभारणीचे काम अत्याधुनिक पद्धतीने सुरु आहे, याबाबतचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे जलद दळणवळणाची सुविधा उपलब्ध होणार असून पर्यायाने विकासाचा पुढील टप्पा गाठला जाणार आहे. हे काम वेगाने पूर्ण होत असल्याबद्दल ॲङ श्री. राहुल नार्वेकर यांनी समाधान व्यक्त केले असून तातडीने सदर प्रकल्प कार्यान्वित व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

०००

जालना जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी चालविले वाहन

जालना, दि.4 (जिमाका) :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 4 डिसेंबर रोजी जालना जिल्ह्यातून जाणाऱ्या हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाची पाहणी केली. जालना जिल्ह्यातून समृद्धीचा 42 किलोमीटरचा मार्ग जात आहे. या संपूर्ण मार्गावर मोटर वाहनाने प्रवास करत त्यांनी मार्गाची पाहणी केली. स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वाहन चालवित होते.

आज दुपारी समृद्धी महामार्गावरील जालना तालुक्यातील जामवाडी येथे मोटार वाहनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केले. याप्रसंगी आमदार नारायण कुचे, माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, उपविभागीय अधिकारी संदिपान सानप आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आज सकाळी समृद्धी मार्गाच्या नागपूर येथील झिरो पाँईट येथून प्रवासाला सुरुवात केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः समृद्धी महामार्गावर वाहन चालवत होते. त्यांच्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसले होते.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी लोकार्पण होत असलेल्या या समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या टप्प्याची आज पाहणी केली.

जालना जिल्ह्यात 42 किमीचा मार्ग

हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग जालना जिल्ह‌्याच्या जालना व बदनापूर तालुक्यांतून जातो. जिल्ह्यातील या महामार्गाचे अंतर सुमारे 42 कि. मी. इतके आहे. टोल प्लाझा / इंटरचेंज 1 असून निधोना, ता. जालना येथे हा टोल प्लाझा / इंटरचेंज आहे. जालना व बदनापूर तालुक्यातील सुमारे 25 गावांतून हा महामार्ग जातो. नाव्हा, वरुड, कडवंची, नंदापूर, थार, अहंकार देऊळगाव, दहेवाडी, पानशेंद्रा, श्रीकृष्णनगर, जामवाडी, गुंडेवाडी, जालना, तांदुळवाडी, आंबेडकरवाडी, निधोना, कडगाव, नजीकपांगरी, केळीगव्हाण, भराडखेडा, निकळक, अकोला, गोकुळवाडी, सोमठाणा, दुधनवाडी आणि गेवराईबाजार अशी या गावांची नावे आहेत.
बुलडाणा जिल्हयातून येणारा समृध्दी महामार्ग जालना जिल्ह्याच्या जालना तालुक्यातील नाव्हा येथून सुरू होऊन बदनापूर तालुक्यातील गेवराईबाजार येथून पुढे औरंगाबाद जिल्ह्याकडे हा महामार्ग जातो.

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत उद्या राज्यस्तरीय कार्यक्रम

मुंबई, दि.2 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जागतिक दिव्यांग दिनानिमित्त उद्या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. शनिवारी, 3 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता मुंबई विद्यापीठाचे दीक्षांत सभागृह, फोर्ट, मुंबई येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार  अरविंद सावंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे,  दिव्यांग  कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी केले आहे.

0000

संध्या गरवारे/विसंअ

जगभरात महाराष्ट्राचा नावलौकिक आणि शहरांचे ब्रँडिंग करण्याची संधी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २: भारताला जी २० परिषदेचे अध्यक्षपद मिळाले ही अतिशय गौरवशाली बाब असून महाराष्ट्रात या परिषदेच्या १४ बैठका होणार आहेत. त्यानिमित्त आपल्या राज्याच्या विकासासोबतच संस्कृती आणि शहरांचे ब्रँडींग करण्याची संधी आहे. जगभरात महाराष्ट्राचा नावलौकीक वाढावा यासाठी शहर सौंदर्यीकरण, स्वच्छता यांवर भर देऊन जास्तीत जास्त लोकांचा सहभाग यात वाढवावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

जी २० परिषदेनिमित्त महाराष्ट्रात होणाऱ्या बैठकांच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.

दि. १ डिसेंबरपासून भारताला जी २० परिषदेचे अध्यक्षपद मिळाले असून ते ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत भारताकडे राहणार आहे. या कालावधीत देशभरात परिषदेच्या १६१ बैठका होणार असून त्यापैकी १४ बैठका महाराष्ट्रात होतील. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर या महानगरांमध्ये या बैठका होणार आहेत.

दि. १३ ते १६ डिसेंबर या कालावधीत मुंबईमध्ये परिषदेच्या विकास कार्य गटाची बैठक होणार आहे. त्यानंतर पुणे येथे येत्या १६ आणि १७ जानेवारीला पायाभूत सुविधा कार्यगटाची तर औरंगाबाद येथे १३ व १४ फेब्रुवारीला बैठक होणार आहे. २१ आणि २२ मार्चला नागपूर येथे रिग साईड इव्हेंट होणार आहे. त्यानंतर मुंबईत २८ आणि ३० मार्च, १५ ते २३ मे आणि ५ व ६ जुलै, १५ व १६ सप्टेंबर २०२३ या कालावधीत विविध बैठका होतील. पुणे येथे १२ ते १४ जून, २६ ते २८ जून या कालावधीत बैठका होणार आहेत. या परिषदेच्या आखणी व नियोजनाकरिता चार अधिकाऱ्यांची समन्वय समिती नेमण्यात आली आहे.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या देशाला जी २० परिषदेचे अध्यक्षपद मिळाले आहे. देश आणि आपल्या राज्याचा जगात नावलौकीक करण्यासाठी ही संधी असून त्यासाठी शहर सौंदर्यीकरणावर अधिक भर द्यावा. रस्त्यांची दुरूस्ती, चौकांचे सुशोभीकरण, रोषणाई या बाबींवर भर देऊन परिषदेच्या बैठक काळात शहरांचा चेहरामोहरा बदलावा, आपल्या राज्याचे आणि शहराचे जगात ब्रँडींग करण्यासाठी याचा उपयोग करून घ्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, जी २० परिषदेचे अध्यक्षपद मिळणे मोलाचे आहे. एकदा अध्यक्षपद मिळाले की त्यानंतर २० वर्ष ते मिळत नाही. त्यामुळे आपल्याला देशाचे आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करण्याची संधी मिळाली आहे. या परिषदेच्या बैठकांच्या आयोजनात कुठलीही उणीव राहू देऊ नका. या कार्यक्रमांमध्ये नागरिकांचा, विविध खासगी संस्था, संघटनांना देखील सहभागी करून घ्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले.

परिषदांच्या बैठक काळात राज्यात होणाऱ्या विविध कार्यक्रमाबाबत आणि त्यांच्या तयारीबाबत मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी सादरीकरण केले. मुंबई महापालिका आयुक्त आय. ए. चहल यांनी मुंबईत सुरू असलेल्या तयारीची माहिती दिली. पुणे, औरंगाबाद आणि नागपूर विभागीय आयुक्तांनी बैठकांसाठी सुरू असलेल्या नियोजनाची माहिती दिली.

००००

राज्यपालांच्या उपस्थितीत ‘वॉक फॉर ह्युमॅनिटी’ संपन्न

मुंबई, दि. 26 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘द वॉक फॉर  ह्युमॅनिटी’ हा समाजातील विविध उपेक्षित घटकांचे मनोबल वाढवणारा कार्यक्रम मुंबई येथे संपन्न झाला.

अंकिबाई घमंडीराम गोवाणी ट्रस्टतर्फे मातृशक्तीच्या सन्मानासाठी आयोजित या  कार्यक्रमात कर्करोग पीडित, तृतीयपंथी, अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या महिला, दिव्यांग मुले, आदिवासी तसेच वेश्या व्यवसायातील महिला सहभागी झाल्या.

यावेळी ट्रस्टच्या विश्वस्त निदर्शना गोवाणी, रमेश गोवाणी, मंजू लोढा, शायना एन.सी. प्रामुख्याने उपस्थित होत्या.

००००

Governor attends ‘Walk for Humanity’ 

Mumbai Dated 26 : Governor Bhagat Singh Koshyari attended a programme ‘The Walk for Humanity’ in support of various under previeaged sections of society held in Mumbai.

The Walk for Humanity was organized by the Ankibai Ghamandiram Gowani Trust to support and build an inclusive society.

Cancer patients, members of the transgender community, divyang children, acid attack victims, tribal women and sex workers participated in the walk

Trustee Nidarshana Gowani, Ramesh Gowani, Manju Lodha, Shaina NC and others attend the program.

0000

ताज्या बातम्या

छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळी विविध मान्यवरांकडून विनम्र अभिवादन

0
कोल्हापूर, दि. २६ : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त, त्यांच्या जन्मस्थळी विविध मान्यवरांकडून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण...

भारत निवडणूक आयोगाच्या ईसीआय-नेटचे यशस्वी पहिले पाऊल

0
मुंबई, दि. २५ : भारताच्या निवडणूक आयोगाने (ECI) विकसित केलेले ‘इसीआय-नेट’ (ECINET) हे नवे ‘वन-स्टॉप’ डिजिटल व्यासपीठ नुकत्याच पार पडलेल्या पाच विधानसभा पोटनिवडणुकांत (केरळ, गुजरात, पंजाब व पश्चिम बंगाल) पहिल्यांदाच कार्यान्वित केले....

झुडपी जंगल जमिनीवरील कुटुंबांना दिलासा देणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. २५ : सर्वांसाठी घरे योजनेला राज्य शासनाचे प्राधान्य असल्याचे सांगून या अनुषंगाने विदर्भातील झुडपी जंगल जमिनीवरील नागरिकांची १९९६ पूर्वीची घरे कायदेशीर करुन त्यांना दिलासा देण्यात येईल, असे...

‘सीएमआरसी’ अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणार – महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

0
मुंबई, दि. २५ : ‘माविम’तर्फे स्थापन करण्यात आलेल्या ‘सीएमआरसी’ अंतर्गत कार्यरत कर्मचा-यांचे मानधन तसेच त्यांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे. त्यांनी मांडलेले प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न...

महाराष्ट्र कृषी व औद्योगिक विकासासाठी सज्ज – पणन मंत्री जयकुमार रावल

0
मुंबई, दि. 25 : "आंतरराष्ट्रीय गुंतवणूक वाढवण्यासाठी महाराष्ट्र सज्ज असून, कृषी व औद्योगिक क्षेत्रात नवीन संधी निर्माण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे," असे प्रतिपादन पणन व राजशिष्टाचार मंत्री...