शनिवार, जून 28, 2025
Home Blog Page 1605

विधानसभा प्रश्नोत्तरे

बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहीम गतिमान करणार – मंत्री गिरीष महाजन

नागपूर, दिनांक २९ : “राज्यातील बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहीम गतिमान करण्यात येईल, तसेच अशा डॉक्टरांना कायद्यानुसार अधिकाधिक कडक शिक्षा कशी करता येईल, यासाठी कायद्यात काही सुधारणा करता येतील का, याचा विचार करण्यात येईल”, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य संजय बनसोडे यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावेळी उत्तर देताना मंत्री श्री. महाजन यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले की, बोगस डॉक्टर शोधण्यासाठी जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय समिती आहेत. त्या समिती सदस्यांना नियमित बैठका घेऊन त्यांना कार्यक्षमतेने काम करण्याच्या सूचना देण्यात येतील. सध्याच्या कायद्यानुसार या प्रकरणात सापडलेले बोगस डॉक्टर कायद्यातील तरतुदीचा लाभ घेऊन सुटतात. त्यामुळे अशा बोगस डॉक्टरांना कडक शिक्षा देण्याबाबत कायद्यात कडक तरतूद करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहितीही मंत्री श्री. महाजन यांनी दिली.

याशिवाय, जिल्हा तेथे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय स्थापन करण्याचा आपण निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रशिक्षित डॉक्टर येत्या काळात उपलब्ध होतील. त्याचबरोबर ग्रामीण भागातील ग्रामीण आरोग्य केंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पूर्णवेळ डॉक्टर्स उपस्थित राहतील, याबाबतही सूचना देण्यात येतील, असे मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.

लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात ४ बोगस डॉक्टरांविरोधात कारवाई करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

000

दीपक चव्हाण/विसंअ

 

राज्यातील पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी

पदभरती करणार – मंत्री गुलाबराव पाटील

 

नागपूर, दि. २९ : पाणीपुरवठा विभागातील कामाला गती मिळावी यासाठी या विभागातील  1313 जागा भरण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक तालुक्यातील एक उपअभियंता पद भरण्यात येणार आहे. राज्यातील पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत दिली.

मौजे गढी ता. गेवराई जि.बीड येथे कार्यान्वित असलेल्या पाणीपुरवठा योजनेत झालेल्या गैरव्यवहाराबाबत सदस्य लक्ष्मण पवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना मंत्री श्री. पाटील बोलत होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, या पाणीपुरवठा योजनेचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. द्रुतगती मार्ग व वन विभाग यामुळे या पाणीपुरवठा योजनेसाठी अडचण निर्माण होते. यामध्ये संबंधितांना नोटीस दिली आहे. स्थानिक ग्रामपंचायतीकडून पाणी  दिले जाते आहे.यासाठी आपण नवीन योजना प्रस्तावित करीत आहेत. या योजनेच्या माध्यमातून 55 हजार लिटर पाणी देण्याचा मानस आहे.सोलर करतांना योजना प्रस्तावित केली पाहिजे. छोटे असो वा मोठे, या योजनेसाठी जागा उपलब्ध करून देणार आहोत. तसेच यापुढे त्यांना सोलरवर घेण्याचा मानसआहे.ज्या ठिकाणी सोलरचे काम होईल, तेथे चांगले काम करण्यात येणार आहे. १०५ गावाची योजना धिम्या गतीने काम चालू आहे त्याबाबत ते काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करु, असेही त्यांनी यावेळी सांगितले

या प्रश्नाच्या वेळी सदस्य धनंजय मुंडे, प्राजक्त तनपुरे, राम सातपुते, रोहित पवार, यशोमती ठाकूर यांनी सहभाग घेतला होता.

00000

प्रवीण भुरके/ससं/ 

राज्यातील ६० हजार अंगणवाड्यांना वीज जोडणीसाठी

२० कोटी रुपयांची तरतूद करणार – मंत्री मंगलप्रभात लोढा

नागपूर, दि. २९ : “राज्यातील ६० हजार अंगणवाड्यांना वीज जोडणी नाही. तेथे वीज जोडणी देण्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करून येत्या तीन महिन्यात या सगळ्या अंगणवाड्यांना वीज पुरवठा होईल”, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज विधानसभेत दिली. याशिवाय, अंगणवाडी कार्यकर्तींना मानधन वाढविण्याचा प्रस्ताव नियोजन विभागाकडे पाठविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

सदस्य सुनील टिंगरे यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. लोढा यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले की, राज्यात १ लाख १० हजार अंगणवाड्या आहेत. त्यापैकी ९५ हजार ग्रामीण भागात तर १५ हजार शहरी भागात आहेत. ग्रामीण भागात अंगणवाड्यांचे वीज देयक देण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांची असते. परंतु काही ठिकाणी निधी अभावी हे पैसे दिले गेले नसल्याने अशा अंगणवाड्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. राज्यात वीज जोडणी नसलेल्या ६० हजार अंगणवाड्या आहेत. महिला व बालविकास विभागाकडून २ कोटी रुपयांची तरतूद करून तेथे वीज जोडणी दिली जाईल, अशी माहिती मंत्री श्री. लोढा यांनी दिली.

याशिवाय, अंगणवाड्या बळकटीकरणासाठी आपण राज्यातील ५ हजार अंगणवाड्या स्मार्ट बनवत आहोत. याशिवाय, अंगणवाडी दत्तक योजना आपण राबवित आहोत. त्यासाठी समाजातील विविध संस्था, उद्योग यांना पत्र पाठवून त्यांच्या सीएसआर मधून निधी मिळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मंत्री श्री. लोढा यांनी दिली.

ग्रामविकास विभागाला सांगून जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून १० टक्के निधी महिला व बालविकास विभागाला देण्याचा निर्णय यापूर्वी झाला आहे. तो निधी मिळाला तर हा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

अंगणवाड्यांमध्ये सामान्य कुटुंबातील मुले शिकतात. त्यांच्यासाठी आपण विविध उपक्रम हाती घेत आहोत. मुंबई मध्ये आपण २०० कंटेनर अंगणवाडी सुरू केल्या आहेत. याशिवाय, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये २०० बालवाडी सुरू करण्यात आल्याची माहिती मंत्री श्री. लोढा यांनी दिली.

या चर्चेत सदस्य राहुल कुल, बाळासाहेब पाटील, संग्राम थोपटे, यशोमती ठाकूर यांनी सहभाग घेतला.

000

दीपक चव्हाण/विसंअ/

 

विधानसभा लक्षवेधी

पिंपरी चिंचवड शहरातील समस्यांबाबत लोकप्रतिनिधींसमवेत

बैठक घेणार – मंत्री उदय सामंत

 

नागपूर, दि. २९ : पिंपरी चिंचवड शहरात नव्याने निर्माण होणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना पाणीपुरवठापार्किंग व्यवस्थामैला शुद्धीकरण प्रकल्पघनकचरा व्यवस्थापनवाहतूकसीसीटीव्हीबांधकाम परवानगी इत्यादी मुलभूत सुविधांबाबत महानगरपालिकेकडे मागणी होत आहे. त्याअनुषंगाने सर्व लोकप्रतिनिधीसह नगरविकास विभागातील अधिकारीपरिवहन विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.

याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य महेश लांडे यांनी उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना श्री. सामंत बोलत होते.

मंत्री श्री. सामंत म्हणाले कीपिंपरी-चिंचवड शहरात आयटी क्षेत्र तसेच औद्योगिक आस्थापनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पिंपरी चिंचवड शहरामध्ये रहिवासी लोकसंख्येमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रात रहिवासी इमारतीच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात सध्या दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. तथापिआंध्रा धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी १०० दशलक्ष लिटर प्रतीदिन इतका साठा मंजूर असून निघोज बंधाऱ्यातून पाणी उचलण्यात येणार आहे. या पाणीपुरवठा योजनेची सर्व कामे पूर्ण झाली असून लवकरच पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे.

ते म्हणाले, महानगरपालिका क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ अन्वये मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या (१०० किलो पेक्षा जास्त) गृहनिर्माण संस्थानी ओल्या कचऱ्यावर गृहनिर्माण संस्थेच्या आवारातच प्रक्रिया करणे आवश्यक आहे. एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०२० मधील नियम १३.४ नुसार चार हजार चौ.मी. पेक्षा जास्त बांधकाम क्षेत्रासाठी OWC बंधनकारक असल्याने त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवारराहुल कुल यांनी सहभाग घेतला.

000

प्रवीण भुरके/ससं/

मुंबई शहरातील प्रदूषण नियंत्रणासाठी १४ ठिकाणी हवा

तपासणी केंद्र – मंत्री दीपक केसरकर

मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता सुधारली पाहिजे व मुंबईकरांना स्वच्छ हवा मिळाली पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. यासाठी मुंबईत १४ ठिकाणी हवा तपासणी केंद्रे उभारण्यात आली असून त्यातील तीन तपासणी केंद्रे कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहेत. याबाबत आराखडा तयार करण्यात आला असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता वेळोवेळी तपासण्यात येतेअशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिली.

मुंबई शहरातील हवेचा दर्जा अतिशय वाईट असल्याची केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोंद केल्या बाबत लक्षवेधी सूचना सदस्य अतुल भातकळकर यांनी उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना मंत्री श्री. केसरकर बोलत होते.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले कीमुंबईतील हवेचे प्रदूषण कमी झाले पाहिजे. यावर तोडगा काढण्यासाठी 15 दिवसात  सर्व लोकप्रतिनिधींसमवेत बैठक घेऊन त्यांच्या सूचना व हरकती यांचा विचार करून त्याबाबत निर्णय घेण्यात येईल. मुंबई वायू प्रदूषण नियंत्रण कृती आराखड्यातील मार्गदर्शक सुचनांनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी सौर उर्जेचे विविध स्रोत तयार करणेइलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणेवाहतूक सिग्नलमध्ये सुसूत्रता आणणेस्मशानभूमीत पाईप्ड नॅचरल गॅसचा (PNG) वापर करणेस्वयंचलित वातावरणीय वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्रे (CAAQMS) प्रस्थापित करणेकचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्पाची स्थापना करणेरस्त्यांची साफसफाई करण्याकरीता यांत्रिक झाडूचा वापर करणे तसेच मियावाकी संकल्पनेवर आधारीत जैव विविधतेच्या दृष्टिने उद्याने विकसित करणे इत्यादी उपाययोजनांवर भर देण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत हवेतील प्रदूषण कमी करण्याकरिता पाच वाहतूक नाक्यांजवळ धुळ क्षमन संयंत्रे बसविण्याकरिता निविदा मागविण्यात आल्या असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

हवा प्रदूषण नियंत्रण करण्याकरिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत हवेची गुणवत्ता चाचणीपर्यावरण दक्षता केंद्राची स्थापनावाहतूक कोंडीच्या ठिकाणी वायु संयंत्रणेची उभारणीहवा प्रदूषण कमी करण्यासंदर्भात सर्व संबंधितांना निर्देश देणेइ. कार्यवाही करण्यात येते. हिवाळ्यात हवेच्या कमी तापमानामुळे व वेगवान वाऱ्याच्या अभावाने जमिनीलगतची प्रदूषके ही उंचीवरील हवेत मिसळण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे सततच्या तयार होणाऱ्या प्रदूषकांचा निचरा न झाल्याने हवेतील त्याचे प्रमाण वाढत जाते. शहरीकरणामुळे मुंबईतील बहुतांशी उद्योग नजिकच्या ठाणे व रायगड जिल्ह्यात स्थलांतरीत झाले आहेत. मुंबईतील जागेच्या वाढत्या किंमती व औद्योगिक प्रक्रियेतील रसायनांचा वापर इ. बाबींमुळे बहुतांशी उद्योजकांनी त्यांचे उद्योग मुंबई परिसरात बंद करुन पर्याप्त जागी स्थलांतरीत करण्यात आले आहेत. आक्टोबर २०२२ मध्ये करण्यात आलेल्या वायु सर्वेक्षणाच्या अहवालानुसार तरंगणाऱ्या धुलिकनांची संख्या वाढल्याने हवेची गुणवत्ता खराब होते. हवेतील हे धूलिकन खाली राहावे यासाठी नवीन यंत्रणेचा प्रायोगिक तत्वावर वापर करणार असल्याचे मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री आदित्य ठाकरेयोगेश सागर यांनी सहभाग घेतला.

000

 

 

सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठास ५० कोटी रुपये – मंत्री अब्दुल सत्तार

नागपूर, दि. २९ :  “परभणी येथील  वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठास ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ५० कोटी रुपये कृषी संशोधन आणि इतर अनुषंगिक उपक्रमासाठी देण्याचा निर्णय घेतला असून त्यापैकी २५ कोटी रुपये तात्काळ उपलब्ध करून देण्यात येईल आणि उर्वरित निधी आवश्यकतेनुसार देण्यात येईल”, अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज विधानसभेत दिली. तसेच कृषी विद्यापीठातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया येत्या तीन महिन्यात सुरू करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले

विधानसभा सदस्य डॉ. राहुल पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. सत्तार यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले की, कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून कृषी विकासाचे काम होत आहे. कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण आदी माध्यमातून कृषी बळकटीकरण आणि शेतकऱ्यांचे हित साधण्यासाठी या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.

विद्यापीठांस ५० वर्ष पूर्ण झाल्या निमित्त ५० कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे.

000

दीपक चव्हाण/विसंअ/

राज्यातील कॅन्टोन्मेंट बोर्डांना निधी उपलब्ध करणार – मंत्री उदय सामंत

नागपूर, दि. २९ : “राज्यातील कॅन्टोन्मेंट बोर्डांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरविकास विभागाकडून कालबद्ध कार्यक्रम आखून या  कॅन्टोन्मेंट बोर्डांना निधीही उपलब्ध करून दिला जाईल”, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली

याबाबतची लक्षवेधी सूचना सिद्धार्थ शिरोळे यांनी उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना श्री सामंत बोलत होते.

श्री. सामंत म्हणाले की, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विकासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला पाहिजे तो दिला जात नाही. कॅन्टोन्मेंट बोर्डाला महाराष्ट्र शासनाच्यावतीने जीएसटीचा हिस्सा दिला जात नाही. या बोर्डाचा पायाभूत सुविधांचा विकास  कारण्याबाब महाराष्ट्र शासन निधी उपलब्ध करून देतो.

राज्यातील  देहू, आळंदी, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, खडकी, देवळाली, या कॅन्टोन्मेंट बोर्डासाठी नगरविकास विभागामार्फत 2018 मध्ये निर्णय घेतला त्याप्रमाणे नगरी विकास विभागाकडून या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पायाभूत सुविधांना साठी निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे.त्या प्रमाणे निधी उपलब्ध करून दिली जातो.

या लक्षवेधी सूचनेत सदस्य श्रीमती माधुरी मिसाळ, सरोज अहिरे यांनी सहभाग घेतला.

0000

प्रवीण भुरके/ससं/

पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्राचा सुधारित अहवाल पाठविणार – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

नागपूर, दि. २९ : “जैवविविधता आणि वातावरणीय बदलांचा विचार करून पश्चिम घाट पर्यावरण संवदेनशील क्षेत्राची अंतिम अधिसूचना निर्गमित करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाकडून शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करून केंद्र सरकारकडे सुधारित अहवाल पाठविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. तत्पूर्वी संबंधित भागातील लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेण्यात येईल”, असे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत सांगितले.

सदस्य भास्करराव जाधव यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. त्यांनी सांगितले, “पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्र अंतिम करण्याचा राज्याचा अहवाल केंद्र सरकारला सादर करण्याच्या अनुषंगाने २० ऑगस्ट २०२० रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत फेरसादरीकरणाचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार १३ डिसेंबर २०२१ रोजीच्या पत्रान्वये प्रारुप अधिसूचनेत २,१३३ गावांपैकी २,१११ गावे अंतिम अधिसूचनेमध्ये समाविष्ट करणे, विभाजनाने तयार झालेली ४२ गावे समाविष्ट करणे व २२ गावे वगळण्याबाबत राज्याचा अहवाल केंद्र शासनास सादर करून पश्चिम घाट पर्यावरण संवेदशनशील क्षेत्राची अंतिम अधिसूचना निर्गमित करण्याची विनंती केली होती”.

“केंद्र सरकारतर्फे सहा जुलै २०२२ रोजी पुन:श्च याबाबतची प्रारुप अधिसूचना जारी करण्यात आली असून त्यामधील तरतुदी व समाविष्ट गावे ३ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या प्रारुप अधिसूचनेप्रमाणेच आहेत. अधिसूचनेत एकूण २,१३३ गावांचा समावेश असून त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यातील २९२ गावे आहेत. अधिसूचनेतील तरतुदीनुसार पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात खाणकाम, औष्णिक ऊर्जा प्रकल्प, लाल श्रेणीतील उद्योग, मोठ्या बांधकाम प्रकल्पांना प्रतिबंध करण्यात आला आहे. मात्र, अधिसूचनेतील तरतुदींच्या अनुषंगाने स्थानिक लोकप्रतिनिधींचे पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील समाविष्ट गावागावांत जाऊन त्यांचे मत, अभिप्राय, सूचना प्राप्त करून घेतल्या जात आहेत. याबाबत केंद्रीय मंत्री महोदयांसमवेत मुंबईत बैठकीचे आयोजन करण्यात येईल. या बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संबंधित लोकप्रतिनिधी आणि अभ्यासकांचे मत जाणून घेण्यात येईल. त्यानुसार पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्राची अंतिम अधिसूचना निर्गमित करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनास सुधारित अहवाल पाठविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे”, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सहभाग घेतला.

०००००

गोपाळ साळुंखे/स.सं. 

सफाई कामगार वारसांच्या प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती – मंत्री उदय सामंत

नागपूर, दि.२९: “सफाई कामगारांच्या वारसांसाठी लाड-पागे समितीने केलेल्या शिफारशींच्या सोबतच इतर प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमण्यात आली असून, या समितीच्या शिफारशींना मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता घेऊन लाभ दिले जातील,” असे  उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत एका लक्षवेधीला उत्तर देतांना सांगितले.

या विषयावर सदस्य सर्वश्री संजय केळकर, संजय गायकवाड, योगेश सागर, आशिष जयस्वाल आदिंनी लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला होता.

श्री. सामंत पुढे म्हणाले, “सफाई कामगार वारसांच्या विषयांशी निगडीत प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी तत्कालीन कामगार आयुक्त श्री. लाड आणि तत्कालीन सभापती श्री.पागे यांच्या समितीने केलेल्या शिफारसी शासनाने सन १९७५ ला स्वीकारल्या. त्यानंतर वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित करण्यात आले. हे सर्व शासन निर्णय एकत्रित  करून लाड -पागे समितीने केलेल्या शिफारसींनुसार सफाई कामगारांना शासकीय सेवेचा लाभ देण्याबरोबरच इतर विषयांवरचा अहवाल या उपसमितीमार्फत देण्यात येणार आहे.”

“ शासकीय सेवेचा लाभ देतांना सफाई कामगारांच्या वारसांच्या कामाचं स्वरूप कसे असेल? भरती प्रकिया कशी राबविता येईल? वेतन भत्ते काय असावेत? पंधरा वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या कामगारांच्या वारसांची नोंदणी करून घेणे, त्यांना कायमस्वरूपी निवासस्थान देणे आदी सभागृहात सदस्यांनी सुचविलेल्या विषयांचा अंतर्भाव करण्यात येणार आहे”, असे श्री सामंत यांनी सांगितले.

0000

अर्चना शंभरकर/विसंअ

 

पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करून प्रशासक नेमणार – मंत्री उदय सामंत

 

नागपूर दि.२९; “रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक करण्यात येईल”, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व सदस्यांनी बेकायदेशीर आर्थिक व्यवहार व अनधिकृत व्यवसायिक जाळ्यांचे बांधकाम करून शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक केली आहे, अशा आशयाची लक्षवेधी सदस्य सर्वश्री महेश बालदी ,बच्चू कडू आदिंनी उपस्थित केली होती.

या लक्षवेधीला उत्तर देताना श्री. सामंत म्हणाले की “पणन संचालकांमार्फत या प्रकरणाची तीस दिवसात चौकशी केली जाईल. तसेच ही चौकशी पूर्ण होईपर्यंत इथे बांधलेल्या गाळ्यांचे कोणालाही वाटप करणार नाही.”

0000

अर्चना शंभरकर/विसंअ

 

हिंगोली शहरातील जलेश्वर तलाव भागातील अतिक्रमण प्रकरणाची उपायुक्तांमार्फत चौकशी करणार – मंत्री शंभूराज देसाई

 

नागपूर, दि. २९ : हिंगोली शहरातील जलेश्वर तलाव भागातील रहिवाशी सन १९५० पासून वास्तव्यास आहेत की अनधिकृत अतिक्रमित आहेत याची पडताळणी करण्यात येईल. यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयांतर्गत उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात येईल. त्यानंतर कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत एका लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले.

सदस्य संतोष बांगर यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री श्री. देसाई बोलत होते.

मंत्री श्री. देसाई म्हणाले, या जागेवर विकास आराखड्यात आरक्षण बदलले असेल तर तपासून इथल्या लोकांचे पर्यायी जागेवर पुनर्वसन करण्यासंबंधी निर्णय घेण्यात येईल.

००००

अर्चना शंभरकर/विसंअ

 

 

जमीन मालकांना भूसंपादनाचा मोबदला देण्याची कार्यवाही तात्काळ करावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

नागपूर, दि.२९ : धुळे येथील सर्व्हे क्रमांक ८०/५, ८०/६ व ८०/७/५ या आरक्षित जमिनीचे भूसंपादन व जमीन मालकांना मोबदला देण्याची कार्यवाही धुळे महानगरपालिकेने तात्काळ करण्याच्या सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केल्या.

धुळे येथील सर्व्हे क्रमांक ८०/५, ८०/६ व ८०/७/५ या जमिनीच्या भूसंपादनाबाबत आढावा बैठक विधानभवन येथे डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा (दूरदृश्य प्रणालीद्वारे), सह सचिव प्रतिभा भदाने, धुळे महानगरपालिका आयुक्त देविदास टेकाळे, शेतकरी घनश्याम खंडेलवाल व महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

धुळे येथील सर्व्हे क्रमांक ८०/५, ८०/६ व ८०/७/५ ही जमीन २००३ ते २०२२ पर्यंत म्हाडाच्या विविध योजना राबविण्यासाठी संपादित केली होती. परंतु म्हाडाने हे भूसंपादन रद्द केले. दरम्यान महानगरपालिकेने या जमिनी सार्वजनिक प्रयोजनासाठी आरक्षित केल्याने  महानगरपालिकेने या जमिनींचे भूसंपादन करून जमीन मालकांना मोबदला देण्याची कार्यवाही तात्काळ करण्याच्या सूचना डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.

याबाबत जमीन मालकांनी लेखी निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेऊन उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी संबंधित बैठक आयोजित केली. तसेच या आरक्षित भूखंडाबाबत प्रशासकीय बाबी व तांत्रिक बाबींची पूर्तता जिल्हा प्रशासन व महानगरपालिका प्रशासनाने लवकरात लवकर पूर्ण करावी असे निर्देश दिले.

समर्थ भारताची पायाभरणी अटलजी यांनी केली : सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

नागपूर, दि.28: भारत आज जागतिक महाशक्ती म्हणून उभा आहे, त्या समर्थ भारताची पायाभरणी भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी केली आहे, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केले. “राष्ट्रपुरूष अटल” या महानाट्याच्या वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित विशेष प्रयोगाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

श्री. मुनगंटीवार  पुढे म्हणाले  की, अटलजींच्या जीभेवर साक्षात सरस्वती वास करत होती.त्यांचा  प्रत्येक शब्द ऊर्जा देणारा, प्रेरणा देणारा होता. या महानाट्याच्या निमित्ताने अटलजींच्या गुणांची पुन्हा एकदा उजळणी करायला मिळेल, हे महद्भाग्य आहे. त्यांच्या सूर्यापेक्षा तेजस्वी आयुष्यावर थोडा प्रकाश या महानाट्यामुळे पडेल. त्यांच्या कवितेत त्यांनी म्हटल्याप्रमाणे “कदम मिलाकर चलना होगा” हे तत्व घेऊन शक्तीशाली भारतमातेसाठी सर्वांनी वाटचाल करावी ही प्रेरणा या महानाट्याने मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, अटलजींचा प्रभाव विद्यार्थी दशेतच अनुभवला होता. 13 दिवसांचे अटलजींचे सरकार ज्या दिवशी पडले त्याच दिवशी जम्मू इथल्या अभाविपच्या काश्मिर विषयक कार्यक्रमात जणू  स्वतः च्या सरकारविषयक काही घडतच नाहीये अशा रितीने  ते स्थितप्रज्ञतेने सहभागी झाले होते आणि काश्मिरविषयक मार्गदर्शन करणारे भाषण त्यांनी केले होते, अशी आठवण श्री. पाटील यांनी  सांगितली. अटलजींची ती स्थितप्रज्ञता, ते अध्यात्मिक वागणर खूप खोलवर प्रभाव करून गेले असे ते पुढे म्हणाले.

“हिंदू तन मन हिंदू जीवन रग रग हिंदू मेरा परिचय” अशी सिंहगर्जना वयाच्या आठव्या वर्षी करणाऱ्या आणि भारताला अण्वस्त्रधारी राष्ट्रांच्या पंक्तीत नेऊन बसवणाऱ्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावरील “राष्ट्रपुरूष अटल” या महानाट्याला काल नागपुरकरांनी उदंड प्रतिसाद दिला. सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीने येथील वसंतराव देशपांडे सभागृहात या महानाट्याचा विशेष प्रयोग आयोजित करण्यात आला होता.

यावेळी मंचावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार प्रवीण दरेकर, यांच्यासह सांस्कृतिक कार्य सचिव  सौरभ विजय, उप सचिव विलास थोरात हे उपस्थित होते. तर निवेदऩ श्रीमती रेणुका देशकर यांनी केले.शक्ती ठाकुर यांनी निर्माण केलेले हे महानाट्य प्रियंका ठाकुर यांनी दिग्दर्शित केले आहे.

महाराष्ट्रातील तीन साहित्य‍िकांना मराठी, संस्कृत आणि ऊर्दू भाषेसाठी साहित्य अकादमीचा ‘युवा साहित्य’ पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली,  २८ : महाराष्ट्रातील तीन युवा साहित्यिकांना मराठीसंस्कृत आणि उर्दू भाषेसाठी साहित्य अकादमीच्या प्रतिष्ठीत युवा साहित्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

येथील कमानी सभागृहात युवा साहित्यिक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष माधव कौशिक आणि प्रमुख पाहुणे प्रसिद्ध साहित्य‍िक ममता कालिया उपस्थित होते. कार्यक्रमात एकूण 24 भाषेसाठी युवा साहित्यिकांना वर्ष 2022 चा’ साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील तीन युवा साहित्यिकांचा समावेश आहे.

मराठी भाषेसाठी युवा साहित्य‍िक पवन नालट यांना मी संदर्भ पोखरतोय’ या काव्य संग्रहासाठी  युवा साहित्य’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या साहित्यकृतीत मी संदर्भ पोखरतोय या शीर्षकातूनच बऱ्याच गोष्टी व्यक्त होत असल्याचे श्री नालट म्हणाले.  मी म्हणजे सामान्य माणूसमी चा संदर्भ समाजातील राजकीयसामाजिकसांस्कृतिक,आर्थिक या सर्व घटकांमध्ये जे अनिष्ट आहे त्याला पोखरण्याचे काम हा सामान्य माणूस करू शकतो. अशा आशयाच्या कविता या काव्य संग्रहात असल्‍याचे श्री. नालट म्हणाले.

श्री. नालट हे मूळचे अमरावतीचे असून ते  शिक्षक आहेत. त्यांच्या याच कविता संग्रहाला के.बी. निकुंब काव्यसंग्रह पुरस्कारविदर्भ साहित्य संघाचा नवोदित साहित्य लेखनाचा पुरस्कार तसेच डॉ. किसनराव पाटील वाड;मय  पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

श्रीमतीचरित्रम्’ या संस्कृत काव्य संग्रहासाठी श्रुती कानिटकर यांना पुरस्कार

 मुंबईच्या श्रुती कानिटकर यांना त्यांच्या संस्कृत भाषेतील श्रीमतीचरित्रम्’ या काव्यसंग्रहासाठी युवा साहित्य’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. राधा-कृष्ण प्रेम हे सर्व परिचित आहे. कृष्णाबद्दल सर्वांना माहिती आहे. मात्रराधाबद्दल कमी लोकांना माहिती असल्याचे श्रुती यांनी सांगितले. त्या म्हणाल्याराधा या चरित्रावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या काव्य संग्रहात करण्यात आला आहे. हे काव्य सात विभागात आहे.  प्रत्येक भागाला लीला असे नाव देण्यात आलेले आहे. यात प्रेम भक्ती व्यक्त करण्यात आली आहे.

श्रुती कानिटकर या  आयआयटी मुंबईत  सहायक प्राध्यापक आहेत.  त्या वेदांतमध्ये पी.एच.डी करीत आहेत.  श्रुती यांनी वयाच्या 11 वर्षापासून लेखनाला सुरूवात केली. त्यांच्या श्रीमतीचरित्रम् (कविता संग्रह)सुभाषित – रत्नभांडागारम् (मराठीतील अनुवादाला)  श्रीपाद सेवा मंडळ काव्य लेखन स्पर्धेमध्ये सन्मानित करण्यात आलेले आहे.

गिरयाह’ ग़ज़ल संग्रहासाठी मक़सूद आफ़ाक़ यांना युवा साहित्य पुरस्कार

गिरयाह’ ग़ज़ल संग्रहासाठी मक़सूद आफ़ाक़ यांना वर्ष 2022 चा युवा साहित्य’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांचा ग़ज़ल संग्रह  सामाजिक संबंधमानवीय मूल्य,  श्रम आणि आधुनिक दुनियेतील भ्रम यावर आधारित आहे. हा संग्रह पारंपरिक आणि आधुनिक ग़ज़लांचे संयोजन आहे. जीवनातील चढ उतार ग़ज़लांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आलेले आहेत.

मुंबईचे मकसूद आफाक हे शिक्षक आहेत. त्यांचे ऐतबार आणि गिरयाह हे दोन ग़ज़ल संग्रह आहेत. त्यांनी वेब सीरीजसाठी गीत लिहिले आहेत. त्यांना महाराष्ट्र राज्य साहित्य अकादमीच्या पुरस्कारानेही सन्मानित करण्‍यात आले आहे.

000

जलजीवन मिशन कार्यक्रमाला गती देण्यासाठी १३१३ नवीन पदे निर्माण करणार – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

नागपूर, दि. 28 : राज्यामध्ये सुरु असलेल्या जलजीवन मिशन कार्यक्रमाला अधिक गतिमान करण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागात सुमारे १ हजार ३१३ नवीन पदे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत निर्माण करण्यात येत असल्याची घोषणा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानपरिषदेत केली

निवेदनात मंत्री श्री. पाटील म्हणाले, “यापूर्वी उप अभियंता संवर्गातील २०७ पदांपैकी १८२ पदांची व कनिष्ठ अभियंता संवर्गातील १ हजार १७२ पदांपैकी १ हजार ९४ पदांची वाढ करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामध्ये दोन-तीन तालुक्यांकरिता एक उप अभियंता कार्यालय होते. आता प्रत्येक तालुक्याला उप अभियंता कार्यालय देणार आहे. १७३ ऐवजी १८३ उप अभियंता कार्यालय होणार आहे. जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा विभाग अधिक मजबूत होणार असून जलजीवन मिशन कार्यक्रमाला गती मिळणार आहे”, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

००००

विधानसभा लक्षवेधी

चिबड निर्मूलन कार्यक्रमासाठी धोरण आणणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 28 : “शासनाने चिबड निर्मूलन कार्यक्रम हाती घेतला आहे. यासाठी निधी उपलब्ध करून दिला असून याबाबत नवीन धोरण आणणार आहोत. आवश्यकता भासल्यास यामध्ये जिल्हा नियोजन समितीचा समावेश करू”, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य राहुल कुल यांनी उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, खडकवासला धरणाची कामे प्रस्तावित आहेत. या कॅनॉल सिस्टीममध्ये खडकवासला व परसगांवबाबत 13 कोटीच्या योजनेला मान्यता  दिली आहे. याबाबत येत्या काळात ही कामे हातात घेणार असून पुढील तीन महिन्यात कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दहा टक्के लोकवर्गणीबाबत शासन गांभीर्याने विचार करेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले

राज्यातील पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामध्ये सिंचन पाणीवापरामुळे होणाऱ्या चिबड, खारवट व पाणथळ जमिनी निर्मूलन करण्याच्या अनुषंगाने दरवर्षी नियतकालीक निरीक्षणे घेण्यात येतात व त्या अनुषंगाने खराबाक्षेत्र निश्चित करण्यात येते. व हे खराबाक्षेत्र कमी करण्यासाठी चर योजनांची बांधकामे करण्यात येतात.

खडकवासला प्रकल्पांतर्गत सिंचन क्षेत्राची पुर्नस्थापना करण्यासाठी नवीन मुठा उजवा कालवा कि.मी. १ ते ३४ ला पर्यायी खडकवासला धरण ते फुरसुंगी बोगदा प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल विस्तार व सुधारणा कार्यक्रमांतर्गत तयार करण्यास शासन पत्र दि. १६/०२/२०२१ अन्वये शासनाची मान्यता प्रदान करण्यात आली आहे. तसेच खडकवासला फुरसुंगी बोगद्याच्या सर्वेक्षण व सविस्तर भूतात्रिक अभ्यास करण्यासाठी आवश्यक खर्चाची तरतूद महामंडळाच्या निधीतून करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे. खडकवासला धरण ते फुरसुंगी बोगद्याच्या प्राथमिक अन्वेषण अहवालास प्रदेश कार्यालयाने पत्र दि. ०८/०७/२०२१ रोजी मान्यता प्रदान केली आहे.

खडकवासला कालवा चाऱ्या पोटचाऱ्यांची व कालव्यांचे नियमित परिक्षण व दुरुस्तीची कामे करण्यात येतात. त्याद्वारे सिंचनासाठी पाणी पुरवठा केला जातो. तथापि, जुना मुठा उजवा कालवा १६१ वर्ष जुना आहे व नवीन मुठा उजवा कालवा ६१ वर्षे जुना आहे. त्यामुळे कालव्यास अस्तरीकरण व दुरुस्तीची कामे करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने नवीन व जुना मुठा उजव्या कालव्याच्या अस्तरीकरण / दुरुस्तीची काही कामे पूर्ण झालेली असून काही कामे विशेष दुरुस्ती, सिंचन पुनर्स्थापना निधी व बिगर सिंचन पाणीपट्टीतून हाती घेण्यात आलेली आहेत तसेच उर्वरित कालवा दुरुस्ती कामांची अंदाजपत्रके तयार करण्याची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर प्रगतीत आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

000

पुणे व पिंपरी चिंचवड शहर झोपडपट्टी मुक्त करुन झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने नवीन नियमावली आणणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 28 : पुणे व पिंपरी चिंचवड शहर झोपडपट्टी मुक्त करुन झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने नवीन नियमावली तीन महिन्यात आणणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य माधुरी मिसाळ यांनी उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण ४८६ झोपडपट्ट्या व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात ७१ झोपडपट्ट्या अशा एकूण ५५७ झोपडपट्ट्यांमध्ये सुमारे २.५ लाख झोपडीधारक आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या स्थापनेपासून आतापर्यंत एकूण २९९ झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे प्रस्ताव प्राधिकरणास प्राप्त झाले असून, त्यापैकी २४० प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. सदर २४० मंजूर प्रस्तावांपैकी १११ झोपु योजनांना बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र दिले असून त्यापैकी ५२ झोपडपट्टी पुनर्वसन योजना पूर्ण झालेल्या आहेत व १९ झोपडपट्टी पुनर्वसन योजना अंशत: पूर्ण झाल्या असून, ४० योजनेचे कामकाज सद्यःस्थितीत सुरु आहे. पूर्ण झालेल्या योजनांमधून १२७५४ झोपडीधारकाचे पुनर्वसन पूर्ण झाले आहे.

ते म्हणाले की, प्रस्तावित नियमावलीमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याकरिता ७० टक्के ऐवजी ५१ टक्के झोपडीधारकांची संमती, पुनर्वसन सदनिकांची घनता प्रती हेक्टरी ३६० ऐवजी किमान ४५० प्रती हेक्टर इतकी करणे, चटई क्षेत्र निर्देशांकाची मर्यादा ४.० किंवा प्रोत्साहनात्मक चटई क्षेत्र जेवढे निर्माण होईल तेवढे भूखंडावर अनुज्ञेय करणे, पुनर्वसन इमारतीची अनुज्ञेय उंची ४० मीटर ऐवजी कमाल ५० मीटर करणे असे प्रमुख बदल प्रस्तावित आहेत. तसेच प्रस्तावित नियमावलीमध्ये पुनर्वसन घटकामधील इमारतीच्या देखभालीचे मासिक शुल्क नियमितपणे अदा करणे. झोपडीधारकांची सहकारी संस्था स्थापन करणे, वीज, पाणी, उद्वाहक, इत्यादी संदर्भातील देयके मुदतीत भरणे तसेच परिसराची स्वच्छता ठेवणे अशी झोपडीधारकांची कर्तव्ये नियमावलीत प्रस्तावित करण्यात आलेली आहेत.

श्री.फडणवीस म्हणाले की, दरम्यानच्या कालावधीत पुनर्वसन सदनिकेचे क्षेत्रफळ २६९ चौ. फुट वरुन ३०० चौ. फुट करण्यास नगर विकास विभागाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ३७ (१) सह १५४ अन्वये दि.०८ मार्च२०२२ रोजी शासन निदेश दिले आहेत. पुणे व पिंपरी चिंचवड झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकरिता प्रस्तावित विकास नियंत्रण नियमावली, २०२१ साठी मान्यता देण्याची कार्यवाही अंतिम टप्यात आहे. झोपडपट्टी पुनर्वसनासंदर्भातील योजना या विकासकांमार्फत सादर होतात व योजना पूर्ण झाल्यानंतर झोपडी धारकांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेकडे हस्तांतरित होतात. सदर प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली जावी या दृष्टीने प्राधिकरणामार्फत आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. ३० दिवसात नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या. त्यानुषंगाने सुमारे ३४ नागरिक व विविध संस्था तसेच प्रतिनिधी यांच्याकडून ३०० हरकती व सूचना प्राप्त झाल्या. सदर हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन पुणे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने प्रारूप नवीन नियमावलीमध्ये २५ प्रमुख बदल अंतर्भूत करून सन २०२१ ची नियमावली शासन मान्यतेसाठी सादर केली आहे.

सदस्य गणपत गायकवाड यांनी या लक्षवेधी सूचनेबाबतच्या चर्चेत सहभाग घेतला.

0000

अलमट्टी धरणावर बंधारे बांधल्यास त्याचा कोल्हापूर – सांगली जिल्ह्यात विपरीत परिणाम; कर्नाटक सरकारला तत्काळ वस्तुस्थिती कळविणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. २८ : अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास दुसऱ्या कृष्णा पाणी तंटा लवादाने कर्नाटक सरकारला परवानगी दिली आहे. मात्र, त्यावर बंधारे बांधल्यास त्याचा विपरीत परिणाम कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात होईल. ही वस्तुस्थिती तात्काळ कर्नाटक सरकारच्या निदर्शनास आणून  देण्यात येईल आणि सर्वोच्च न्यायालयात ही वस्तुस्थिती मांडण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यासंदर्भात सिमुलेशन मॉडेल तयार करण्याचा राज्य शासनाचा विचार सुरू आहे. या तंत्रज्ञानामुळे बंधाऱ्यांची उंची वाढली तर त्याचा परिणाम किती होईल, किती क्षेत्र पाण्याखाली जाईल, हे कळण्यास मदत होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

सध्या वातावरण बदलामुळे दीड दोन महिन्यांतील पाऊस केवळ पाच सात दिवसात पडतो. मोठ्या प्रमाणात हे पाणी वाहून जाते. नवीन बंधारे तयार करून हे पुराचे पाणी दुष्काळी भागात नेता येईल का, याची योजना जागतिक बँकेच्या सहकार्याने तयार करण्यात येत आहे. जागतिक बँकेच्या संचालक यांच्यासोबत यासंदर्भात सकारात्मक बैठक झाल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जत तालुक्यातील म्हैसाळ प्रकल्पाच्या टप्पा २ मध्ये ४२ गावांना पाणी मिळणार आहे. त्यासाठी दोन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

या चर्चेत विक्रम सावंत, राहुल कुल यांनी सहभाग घेतला.

000

राज्यातील औद्योगिक ग्राहकांसाठी वीज दर अन्य राज्यांच्या तुलनेत समकक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. २८ : राज्यातील औद्योगिक ग्राहकांसाठी वीज वापराबाबत राज्य शासनाने दिलेल्या एकत्रित सवलतींचा विचार केल्यास अन्य राज्यांच्या तुलनेत राज्यातील औद्योगिक ग्राहकांचे वीज दर समकक्ष आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.

विधानसभेत सदस्य नरेंद्र भोजराज भोंडेकर यांनी लक्षेवधी सूचनेद्वारे वीज दरांमुळे स्टील उद्योगावर झालेल्या परिणामांविषयी मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. त्यांनी सांगितले की, वीज वितरण कंपनीच्या ग्राहकांची वर्गवारी व वीज दर, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगामार्फत नियामक पद्धतीचा अवलंब करून निश्चित केले जातात. सद्य:स्थितीत हे दर ३० मार्च २०२० नुसार लागू आहेत. औद्योगिक ग्राहकांना मोठ्या प्रमाणात सवलती उपलब्ध आहेत. इलेक्ट्रीक आर्क फर्नेससह चालणाऱ्या उच्चदाब पोलाद उद्योगांसाठी उच्चदाब औद्योगिक वर्गवारीसाठी मंजूर केलेल्या मागणी आकाराच्या ७५ टक्के मागणी आकार, रात्रीच्या कालावधीतील वीज वापरावर प्रति युनिट दीड रुपये सवलत, लोड फॅक्टर सवलत १५ टक्क्यांपर्यंत, वाढीव वीज वापर ७५ पैसे प्रति केव्हीएएच सवलत, ठोक वीज वापर सवलत एक ते दोन टक्के, एका पाळीत चालणाऱ्या उच्चदाब औद्योगिक ग्राहकांना स्थिर आकारात ४० टक्के सवलत, त्वरित वीज बिलाचा भरणा केल्यास एक टक्के सवलत आहे. या सर्व सवलतींचा एकत्रित विचार केल्यास आणि ग्राहकाने वीज वापराचे सुनियोजन केल्यास उच्चदाब औद्योगिक ग्राहकांचे सरासरी वीज देयक निश्चितच मोठ्या प्रमाणात कमी होवू शकते.

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, ‘डी’ व ‘डी प्लस’ क्षेत्रांतील औद्योगिक ग्राहकांना एक एप्रिल २०१६ पासून शासनामार्फत वीज दरात सवलत देण्यात येते. ही सवलत सन २०२४ पर्यंत देण्यात येईल. सन २०१६- १७ ते २०२१- २२ या कालावधीत औद्योगिक ग्राहकांना ७ हजार १४५ कोटी रुपयांची वीज दर सवलत देण्यात आली आहे. त्यात स्टील उद्योगांना तीन हजार २०० कोटी रुपयांची वीज दर सवलत देण्यात आली आहे. सद्य:स्थितीत विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, ‘डी’ व ‘डी प्लस’ क्षेत्रांतील औद्योगिक ग्राहकांच्या वीज दर सवलतीचे वार्षिक एक हजार २०० कोटी रुपयांच्या मर्यादेत सुसूत्रीकरण केले असून १ एप्रिल २०२२ पासून सुधारित वीज दर लागू केले आहेत.

विदर्भ, मराठवाड्याला औद्योगिकदृष्ट्या अविकसित समजून तेथे औद्योगिक गुंतवणूक आकर्षित होऊन रोजगार निर्मिती होण्यासाठी तसेच आर्थिक विकासासाठी विदर्भ, मराठवाडा येथे स्थापित होणाऱ्या मोठ्या व विशाल प्रकल्पांना गुंतवणूक व रोजगाराचे निकष किमान ठेवले असून प्रोत्साहन कालावधी वाढवून दिला आहे. विदर्भ व मराठवाड्यातील मोठ्या व विशाल प्रकल्पांकरिता राज्याच्या अन्य विभागांपेक्षा १०० टक्के ढोबळ वस्तू व सेवाकरावर प्रोत्साहने अनुज्ञेय केली आहेत. विदर्भ व मराठवाड्यातील सर्व तालुक्यांचे वर्गीकरण ‘ड’ प्लस वर्गीकृत केले आहे. विदर्भातील उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी खनिजावर आधारित धोरण आणण्यात येईल. त्याला पाठबळ देण्यासाठी खाण व ऊर्जा धोरण लवकरच आणण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री मदन येरावार, भास्करराव जाधव, बच्चू कडू, मुफ्ती मोहम्मद ईस्माईल, किशोर जोरगेवार, रणधीर सावरकार आदींनी सहभाग घेतला.

००००००००

नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही – उद्योग मंत्री उदय सामंत

नागपूर, दि. २८ : नवी मुंबई शहराच्या विकासासाठी शहरे विकास प्राधिकरण म्हणून सिडकोची नियुक्ती करण्यात आली आहे. नवी मुंबई प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या बदल्यात पात्र  प्रकल्पग्रस्तांना १२.५ टक्के विकसित भूखंडाचे वाटप लवकरात लवकर व्हावं. कुठल्याही शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही ही शासनाची भूमिका आहे. यासाठी दि.२७ ऑक्टोबर २०२२ मा. मुख्य सचिव (सेवानिवृत्त),  यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने  हे काम पुढील  90 दिवसात पूर्ण  करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.

सदस्य महेश बालदी यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती यावर उत्तर देताना मंत्री श्री.सामंत बोलत होते.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, नवी मुंबई शहर विकसित करण्याकरिता शासनाने ठाणे, उरण व पनवेल या तीन तालुक्यातील एकूण ९५ गावांची जमीन संपादित करून सिडको महामंडळाकडे वर्ग केली आहे. नवी मुंबई शहराचा विकास करण्यासाठी “शहरे विकास प्राधिकरण’ म्हणून सिडकोची नियुक्ती करण्यात आली आहे. नवी मुंबई प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या बदल्यात पात्र प्रकल्पग्रस्तांना शासन निर्णय दि.६.३.१९९० व दि.२८.१०.१९९४ मधील तरतूदीनुसार १२.५% योजनेंतर्गत विकसीत भूखंडाचे वाटप सिडकोमार्फत करण्यात येते. तसेच शासन निर्णय दि.६.३.१९९० नुसार १२.५% एवढ्या वाटप केलेल्या जमिनीची किंमत, संपादित जमिनीच्या मोबदल्याच्या (दिलेल्या व्याजासह) दुप्पट रक्कम अधिक विकास खर्चापोटी रू. ५/- प्रति चौ.मी. या दराने भूखंडधारकांकडून भाडेपट्ट्याची रक्कम वसूल करण्यात येते.

बहुतांश प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी संपादित जमिनीची नुकसान भरपाई प्राप्त केल्यानंतर वाढीव नुकसान भरपाईसाठी  मा. न्यायालयाच्या निर्देशानुसार संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडून वाढीव मोबदल्याच्या रकमेवरील व्याजासह देय वाढीव भूसंपादन मोबदल्याचे प्रस्ताव सिडको महामंडळास प्राप्त होतात. त्यानुसार सिडकोकडून सदरची रक्कम उपजिल्हाधिकारी, मेट्रो सेंटर यांचेकडे जमा करण्यात येते. मा. न्यायालयाकडून मंजूर करण्यात आलेल्या वाढीव भूसंपादन मोबदल्यामुळे सिडकोकडून १२.५% योजनेअंतर्गत वाटप केलेल्या विकसित भूखंडासाठी अतिरिक्त भाडेपट्ट्याची रक्कम वसूल करण्यात येते. ही रक्कम संबंधित भूधारकांस भाडेपट्टा करारनाम्यातील अटी व शर्तीप्रमाणे भरणे बंधनकारक आहे. परंतु, शासन निर्णय दि. २८.९.१९९८ मधील तरतूदीनुसार जमीनधारकांना वाटप करण्यात आलेल्या १२.५% विकसित भूखंडांसाठी हस्तांतरण शुल्क आकारून त्रिपक्षीय करारनाम्यान्वये अशा भूखंडाचे हस्तांतरण करण्यात आले आहे.

यासंदर्भात मा. उच्च न्यायालयात दाखल रिट याचिका क्र. ११८२०/२०१३ मध्ये मा. उच्च न्यायालयाने वाढीव नुकसान भरपाईच्या अनुषंगाने येणारी अतिरिक्त भाडेपट्ट्याची रक्कम भरण्याची जबाबदारी संबंधित भूखंडधारक/भाडेपट्टाधारक यांची असल्याबाबत निर्णय दिला आहे.

या लक्षवेधी सूचनेत सदस्य प्रशांत ठाकूर यांनी सहभाग घेतला होता.

000

 अंबरनाथ शहराच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी पद भरती करणार – उद्योग मंत्री उदय सामंत

नागपूर, दि. २८ : अंबरनाथ शहराच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी अंबरनाथ महानगरपालिकेतील पदभरती करण्याबाबत नगर विकास विकास व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला सूचना दिल्या जातील. संबधित विभाग या भरती बाबतीत योग्य निर्णय घेतील, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.

याबाबत सदस्य बालाजी किणीकर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना मंत्री श्री.सामंत बोलत होते.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, उल्हासनगर नदीच्या जवळ धरण बांधण्याबाबत मागणीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी सर्वेक्षण करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा टप्पा – २ बाबत नगरविकास विभागाने योग्य प्रस्ताव दिल्यास त्याबाबत योग्य तपासणी करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.

000

नवी मुंबई शहराच्या निर्मितीसाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबादला आणि सोयी-सुविधांबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत लवकरच बैठक घेणार – उद्योग मंत्री उदय सामंत

नागपूर, दि. २८ : नवी मुंबई शहराच्या निर्मितीसाठी संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्याबाबत आणि तेथील ग्रामस्थांना विविध नागरी व पारंपरिक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात याबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत लोकप्रतिनिधींची लवकरच बैठक घेणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.

याबाबतची सदस्य गणेश नाईक यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना मंत्री श्री. सामंत बोलत होते.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, सिडको व नवी मुंबई महापालिकेसंदर्भात हा प्रश्न असून स्थापनेपासून आतापर्यंत विविध निर्णय घेतले गेले. शहरे वसवण्याची जबाबदारी सिडकोची आहे. याबाबत हरकती आणि सूचना मागविल्या आहेत. त्याअनुषंगाने दहा ते बारा हजार हरकती प्राप्त झाल्या आहेत. त्याचा अहवाल देखील मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात येईल. पनवेल महानगरपालिकेकडे दुर्लक्ष केले जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सदस्य योगेश सागर, मंदा म्हात्रे, प्रशांत ठाकूर, सीमाताई हिरे यांनी या संदर्भातील चर्चेत सहभाग घेतला.

0000

कल्याण – शीळ फाटा मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न – मंत्री उदय सामंत

नागपूर, दि. २८ : कल्याण – शीळ मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मोठागांव डोंबिवली (प.) ते माणकोली रस्ता कमी लांबीचा व कमी खर्चाचा असल्याने हा पर्याय  निवडला असून तेथील काम सुरू असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य प्रमोद पाटील यांनी कल्याण – शीळ या मार्गावरील वाहतूक कोंडी संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. सामंत यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले की,  मोठागांव डोंबिवली (प) ते माणकोली रस्ता हा मोठागाव येथे कल्याण बाह्यवळण रस्त्याचा भाग – ३ येथे जोडला जातो.  हा बाह्यवळण भाग-३ रस्ता हा गोविंदवाडी, दुर्गाडी  किल्याजवळ कल्याण येथे भिवंडी – शीळ रस्त्यास जोडतो. तसेच, माणकोली येथे मुंबई-नाशिक महामार्गास जोडणार असल्याने मुंबई, ठाणे व नाशिक येथे जाणाऱ्या वाहतुकीस पर्याय उपलब्ध होणार आहे. डोंबिवली ते भिवंडी तसेच ठाण्याकडे होणाऱ्या वाहतुकीचा बराचसा वेळ यामुळे वाचणार आहे, अशी माहिती मंत्री श्री. सामंत यांनी दिली.

ते म्हणाले की,  प्रस्तावित कल्याण बाह्यवळण भाग-२ हा रस्ता मोठागांव डोंबिवली (प) येथून कटाईनाका, कल्याण-शीळ रस्ता येथे मिळतो. तसेच, ऐरोली ते कटाई नाक्याचे काम हाती घेण्यात आले आहे.  यामध्ये ऐरोली खाडीपूल ते राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ (जुना), मुंब्रा पर्यंतचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच, ऐरोली-कटाई नाका भाग-३ अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्र.४ (जुना) ते कटाई नाकापर्यंतचे रस्त्याचे काम प्रस्तावित आहे. याशिवाय, पनवेल कडून अंबरनाथ-बदलापूर येथे जाणाऱ्या वाहनांसाठी तळोजा एम.आय.डी.सी. ते खोणी या रस्त्याचे रुंदीकरण फेज-१ मध्ये पूर्ण करण्यात आले असून, उर्वरित रुंदीकरणाचे काम फेज-२ लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

ऐरोली-कटाई रस्त्याचे काम सप्टेंबर, २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे व कल्याण बाह्यवळण रस्ता भाग-३ च्या कामासाठी निविदा मागविण्यात आली असून, ते ३६ महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. कल्याण बाह्यवळण रस्त्याचे भाग- ४, ५, ६ व ७ चे काम ८० टक्के पूर्ण झाले आहेत. तसेच, माणकोली-मोठागांव खाडी पूल व जोड रस्त्याचे काम एप्रिल, २०२३ पर्यंत पूर्ण करुन वाहतूकीस खुला करण्याचे नियोजन आहे.  पनवेल-ठाणे राष्ट्रीय महामार्ग क्र.४ (जुना) वरील नावडे ते खोणी या रस्त्याचे काम सप्टेंबर, २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. ही सर्व कामे पूर्ण केल्यानंतर कल्याण-शीळ फाटा रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार असल्याची माहितीही मंत्री श्री. सामंत यांनी दिली.

000

विधानपरिषद लक्षवेधी

वांद्रे शासकीय वसाहतीमध्ये राहणाऱ्यांना वाजवी दरात सदनिका देण्यासाठी शासन सकारात्मक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. २८ : वांद्रे येथील शासकीय वसाहतीमध्ये 25 ते 30 वर्षापासून  राहणाऱ्या कर्मचारी, अधिकारी यांना मालकी हक्काच्या सदनिका वाजवी दरात  देण्यासाठी शासन सकारात्मक असून याबाबत बैठक घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.

वांद्रे वसाहत पुनर्विकास आणि तेथील रहिवाशी याबाबत सदस्य ॲड. अनिल परब यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. लक्षवेधीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले की, वांद्रे येथील शासकीय वसाहतीचा पुनर्विकास प्रजासत्ताक कोरिया यांच्या मदतीने करण्यात येणार आहे. यासाठी बृहत आराखडा आणि प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी दक्षिण कोरियाच्या कोरिया लँड अँड हौसिंग कॉर्पोरेशनसोबत करारनामा केला आहे.

25 ते 30 वर्षांपासून राहणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना वाजवी दरात सदनिका देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

००००

बाळगंगा प्रकल्पग्रस्तांवरील खटले मागे घेण्यासंदर्भात लवकरच निर्णय – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि. २८ : रायगड जिल्ह्यातील बाळगंगा धरण संघर्ष व पुनर्वसन समितीचे कार्यकर्ते आणि प्रकल्पग्रस्तावरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तावरील गुन्हे मागे घेण्याच्या अनुषंगाने सदस्य शशिकांत शिंदे यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यावेळी श्री.फडणवीस यांनी ही माहिती दिली.

याबाबत अधिक माहिती देतांना श्री. फडणवीस यांनी सांगितले की, राजकीय व सामाजिक आंदोलनामध्ये  ३१ डिसेंबर २०१९ पूर्वी दाखल झालेले व प्रलंबित असलेले सर्व खटले शासन निर्णयामध्ये नमूद अटीवर मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सदर खटले काढून घेण्याची कार्यवाही करण्यासाठी सविस्तर सूचना व कार्यपद्धती निर्गमित करण्यात आली आहे. त्यातील तरतूदीनुसार ज्या गुन्ह्यामध्ये दि. ३१.०३.२०२२ पर्यंत दोषारोपपत्र दाखल झाले आहेत. या शासन निर्णयामध्ये नमूद अटी व शतींची पूर्तता होत आहे, असे खटले मागे घेण्यासाठी कायदेशीर तरतुदीप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी शासन मान्यता देण्यात आलेली आहे.  तसेच सदर खटल्यांसदर्भात कार्यवाही करण्यासाठी पोलीस आयुक्तालय क्षेत्राकरिता व जिल्ह्याकरिता समिती गठित करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र वगळून जिल्ह्याकरिता महसूल उपविभागनिहाय महसूल उप विभागीय अधिकारी (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. त्यानुसार निर्णय घेण्यात येत आहे. याप्रकरणी लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

गिरणी कामगारांच्या संदर्भातही लवकरच निर्णय घेण्यात येईल, प्रकल्प ग्रस्तांच्या  प्रलंबित असलेल्या नोकऱ्यासंदर्भात वस्तुस्थिती तपासून त्यावर योग्य निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य जयंत पाटील, सचिन अहिर, एकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला.

00

मुंबईतील बीआयटी चाळी पुनर्विकासासाठी लवकरच सर्वसमावेशक निर्णय – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि. २८ :- मुंबईतील बीआयटी चाळी 100 वर्षापेक्षा जुन्या आहेत. या चाळीच्या पुनर्विकासासाठी रहिवाशी विकासकामार्फत मुंबई महानगरपालिकेकडे प्रस्ताव पाठवित आहेत. या संदर्भात सर्वसमावेशक निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.

बीआयटी चाळी पुनर्विकासासंदर्भात सदस्य सचिन अहिर यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. यावेळी उत्तर देतांना उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी ही माहिती दिली.

मुंबईतील बी.आय.टी. चाळीची निर्मिती होऊन जवळपास १०० वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यामुळे अशा चाळींचा पुनर्विकास हा विकास नियंत्रण नियमावली १९९१ अन्वये  करण्यात येत आहे. बी.आय.टी. चाळीतील रहिवाशांमार्फत सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करुन संस्थेमार्फत विकासकाची नेमणूक करण्यात येते. तद्नंतर विकासकामार्फत बृहन्मुंबई महानगरपालिकेस पुनर्विकास प्रस्ताव सादर करण्यात येतो, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत २२ वसाहतीमध्ये १३३ बी.आय.टी. इमारती आहेत, त्यापैकी ६१ इमारतींमध्ये महानगरपालिका भाडेकरुंच्या गृहनिर्माण संस्थांमार्फत नेमणूक केलेल्या विकासकांकडून पुनर्विकास प्रस्ताव महानगरपालिकेस प्राप्त झाले आहेत. सदर ६१ इमारतींपैकी १७ इमारतींचा पुनर्विकास झाला असून ४४ इमारतींच्या पुनर्विकासाचे काम प्रगतीपथावर आहे. उर्वरित ७२ इमारतींचे संरचनात्मक परिक्षण करुन महानगरपालिकेमार्फत नियमितपणे दुरुस्ती करण्यात येते. सद्य:स्थितीत १२ इमारतींच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेमार्फत सुरु असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.

या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य शशिकांत शिंदे यांनी सहभाग घेतला.

000

गोखले पुलासाठी लवकरच बैठक – मंत्री उदय सामंत

नागपूर, दि. २८ : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोखले पुलाची तपासणी करून सदर पूल जीर्ण अवस्थेत असल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. मात्र वाहतुकीसाठी मोठी समस्या निर्माण होत असल्याने रेल्वे प्रशासन आणि मुंबई महानगरपालिकेने यासंदर्भातील कामे लवकरात लवकर करावीत, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी लक्षवेधीच्या उत्तरात सांगितली.

गोखले पूल बंद असल्याने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, यासाठी पोलिसांना सांगून पर्यायी मार्गाचा वापर करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला तशा सूचना दिल्या जातील, असेही मंत्री श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.

यासंदर्भातील लक्षवेधी विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांनी मांडली तर सदस्य सचिन अहिर, ॲड.अनिल परब यांनी याबाबतच्या चर्चेत सहभाग घेतला.

0000

राज्यातील सर्व मनपा शाळेतील विद्यार्थ्यांची १०० टक्के आरोग्य तपासणी – मंत्री उदय सामंत

नागपूर, दि. २८ :  राज्यातील सर्व महानगरपालिकेत विद्यार्थ्यांची १०० टक्के आरोग्य तपासणी करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी आज लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

राज्यातील महानगरपालिकेच्या विद्यार्थ्याचे वजन कमी असणे, तसेच बऱ्याच मुलांना डोळ्यांची तसेच दातांची समस्या असल्याने विद्यार्थ्यांची तपासणी करण्यासंदर्भात महानगरपालिकेच्या आयुक्तांना सूचना देण्यात येईल, असेही मंत्री श्री.सामंत यांनी सांगितले.

बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सन २०१४-१५ मध्ये ६६.४१ टक्के, सन २०१५-१६ मध्ये ६६.८३ टक्के, सन २०१६-१७ मध्ये ७२.१२ टक्के, सन २०१७-१८ मध्ये ७७.६३ टक्के, सन २०१८-१९ मध्ये ७२.९५ टक्के तसेच सन २०१९-२० मध्ये ७९.४४ टक्के इतक्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असल्याची माहितीही मंत्री श्री.सामंत यांनी दिली.

000

शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी राज्यात मॉडेल स्कूल योजना राबविणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर 

नागपूर, दि. २८ : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी राज्यात मॉडेल स्कूल योजना राबविण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली.

शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता याबाबत सदस्य जयंत आसगावकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती, लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री श्री. केसरकर बोलत होते.

मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले की, राज्यातील शाळामधील गुणवत्ता वाढण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवित आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यात मॉडेल स्कूल करणार आहे. सेंट्रल बोर्ड यापद्धतीने ही मॉडेल स्कूल असतील. सद्यस्थितीत 50 टक्के शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे केली जाणार असून सर्व परीक्षांचा निकाल मार्चमध्ये लागल्यानंतर आणि आधार लिंकिंग पूर्ण झाल्यानंतर 80 टक्के भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.

पवित्र पोर्टलमध्ये कला आणि क्रीडा शिक्षक नाहीत, संच मान्यता झाल्यानंतर त्यांचा समावेश पोर्टलवर करू. संच मान्यता ही विद्यार्थी संख्येवर असून आधार लिंक केल्याने विद्यार्थी संख्या समजेल. 15 ते 20 वर्षे अनेक शाळांचे रोस्टर नव्हते. रोस्टर करून टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. उर्वरित अनुदान देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल, असेही श्री. केसरकर यांनी एका उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य निरंजन डावखरे, नागो गाणार यांनी सहभाग घेतला.

000

सीमावर्ती गावातील एक इंचही जमीन देणार नाही; कर्नाटकने आव्हानाची भाषा करू नये – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विधान परिषद इतर कामकाज : सीमाप्रश्न

नागपूर, दि. २८ : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती गावातील एक इंचही जमीन देणार नाही. कर्नाटक सरकारने आव्हानाची भाषा करू नये, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत सांगितले.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होते. या चर्चेत सदस्य सर्वश्री उद्धव ठाकरे, प्रविण दरेकर, ॲड. अनिल परब, शशिकांत शिंदे, सतेज पाटील, प्रसाद लाड आदींनी चर्चेत सहभाग घेतला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावासियांच्या पाठिशी राहण्याचा ठराव विधिमंडळाने एकमताने मंजूर केला आहे. यातून महाराष्ट्र सीमावासियांच्या पाठिशी खंबीर उभे असल्याचा संदेश सीमाभागात पोहोचला आहे. सीमाभागातील मराठी भाषिकावर अन्याय होऊ नये ही सामूहिक भावना सर्वांची राहिली आहे. महाराष्ट्र नेहमी संयम आणि समन्वयाच्या भूमिकेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न करतो. सीमा वाद सर्वोच्च न्यायालयात आहे. न्यायालयाचा अवमान होणार नाही याची दोन्ही राज्यांनी काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी उत्तरातून केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, सीमाप्रश्नी महाराष्ट्र शासनाचा मानवतावादी दृष्टिकोन राहिला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी इतक्या वर्षात पहिल्यांदाच केंद्र सरकारने हस्तक्षेप केला आहे.

मुंबई ही महाराष्ट्राचीच

मुंबई केंद्रशासित प्रदेश करा, या कर्नाटकातील मंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध, धिक्कार करून त्यांना कर्नाटक सरकारने समज द्यावी. मुंबई ही कुणाच्या बापाची नाही, महाराष्ट्राची आहे. मुंबईवर अनेक संकट आली. कोरोना संकटाही मुंबईतील लोक मदतीसाठी आले. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनीही मुंबईचे संरक्षण केले. १०५ हुतात्म्यांचे बलिदानही विसरता येणार नाही, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्रात कर्नाटकचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. या बांधवांनी भेट घेऊन महाराष्ट्राला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. सीमाभागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यांच्या भावनांशी कोणीही खेळण्याचा प्रयत्न करू नये. बेळगावसह सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठिशी महाराष्ट्र खंबीर उभा आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सीमाप्रश्नी गेल्या ६६ वर्षांपासून संघर्ष करावा लागत आहे. सीमाभागातील ८६५ गावे आपली आहेत. हा भाग महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण असल्याने न्यायालयाचा अवमान होता कामा नये. सीमाप्रश्न सोडविण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. यापूर्वी संघर्ष प्रत्येकाने गरजेनुसार, प्रसंगानुरूप केला आहे. आपलेच लोक आहेत त्यांना मदत व्हावी म्हणून संघर्ष आंदोलन केली आहेत. आमच्या सरकारला काही महिनेच झाले असलेतरी सीमाप्रश्न सोडविण्यासाठी आम्ही निर्णय घेवू. राज्य सरकार हे जनतेचे, काम करणारे सरकार आहे. सत्याची बाजू घेणारे सरकार आहे. कामातून उत्तर देवू, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उत्तरात सांगितले.

जत तालुक्यातील प्रश्न जुना असला तरी राज्य शासनाने ४८ गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्यात सिंचनाचे १८ प्रकल्प कार्यान्वित आहेत. या भागामध्ये रस्ते, सोयीसुविधा देणे ही राज्य शासनाची जबाबदारी आहे. आपल्या देशाबद्दल, राज्याबद्दल प्रेम असले पाहिजे.

सीमावर्ती गावातील एक इंचही जमीन देणार नाही, एक गावही कर्नाटकात जाऊ देणार नाही, ही राज्य शासनाची जबाबदारी आहे. सर्वांनी एकत्र येवून लढा लढला पाहिजे. कर्नाटक सरकारने आव्हानाची भाषा करु नये, कायदा व सुव्यव्यस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याची दक्षता घेतली आहे. सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. महाराष्ट्राच्या बाजूने न्याय मिळेल यासाठी सर्वोच्च न्यायालयात सर्व ताकद लावली आहे. सीमा भागातील गावातील एक इंचही जागा सोडणार नाही, सीमाभागातील मराठी भाषिकांच्या न्यायासाठी सगळं करू, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली.

सीमा भागातील प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र विभाग

राज्य शासनाने अनेक लोकहिताचे निर्णय घेतले आहे. हे सर्वसामान्य लोकांचे सरकार आहे. महाराष्ट्र- कर्नाटक सीमाभागातील ८६५ गावातील १५ वर्ष वास्तव्यास असलेल्या लोकांना राज्याचे अधिवास देण्यात येईल. त्यांना महाराष्ट्र शासनाच्या सर्व योजनाचे लाभ देण्यात येतील. शिक्षक पात्रता परीक्षेत पात्र करण्यात येईल. भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रात जागा राखीव ठेवण्यात येतील. सीमाभागातील मराठी बांधवांवरील विविध खटल्यांसंदर्भात वकीलांची फौज लावण्यात येईल, त्याचा खर्चही राज्य शासन देईल. सीमाभागातील बांधवांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र विभाग/कक्ष निर्माण करणार असल्याची घोषणा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.

००००

पवन राठोड/ससं/

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण रामेश्वर सब्बनवाड यांची उद्या मुलाखत

मुंबई, दि. २८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या रामेश्वर सब्बनवाड यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय गायकवाड यांनी ही मुलाखत घेतली आहे.

गुरुवार, दि. २९ डिसेंबर २०२२ रोजी रोजी सायंकाळी ७.३० वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब – https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या यशस्वी विद्यार्थ्यांकडे बघितले तर ग्रामीण महाराष्ट्राची पार्श्वभूमी असलेल्यांची संख्या लक्षणीय दिसून येते. अपार मेहनतीची तयारी आणि ध्येयावर लक्ष केंद्रीत करून अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते असे या विद्यार्थ्यांच्या यशाकडे बघितले तरी जाणवून जाते.  लातूर जिल्ह्यातील हंडरगुळी गावात जन्मलेल्या रामेश्वर सब्बनवाड यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा दुसऱ्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन ‘स्वप्ने बघा, साकार होतात’ हाच संदेश दिला. त्यांच्या या यशाबद्दल सविस्तर माहिती त्यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून  दिली आहे.

000

ताज्या बातम्या

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते नागपूर उच्च न्यायालय वकील संघाच्या नवीन बार रूमचे उद्घाटन

0
नागपूर, दि. २८:  उच्च न्यायालय वकील संघाच्या नवीन बार रूमचे उद्घाटन सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण आर. गवई यांच्या हस्ते नागपूर येथे पार पडले. उच्च न्यायालय दुसरा...

कोल्हापूर चित्रनगरीत पोस्ट प्रोडक्शनसाठी एफटीआयमार्फत चित्रपट शिक्षणाला सुरुवात होणार

0
मराठी सिनेमासाठी योगदान दिलेल्या कलाकारांची माहिती देणाऱ्या संग्रहालयाची स्थापना चित्रनगरीमधील ४४ कोटींच्या चित्रीकरण स्थळांचे लोकार्पण व भूमिपूजन कोल्हापूर, दि. २८: चित्रपट निर्मितीसमोर कलात्मकता, सृजनशीलता...

संविधानाच्या उद्देशिकेतील मूल्यांचा अंगीकार व्हावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मरणासाठी संविधान उद्देशिका पार्क एक महत्वाचे पाऊल - सरन्यायाधीश भूषण गवई संविधान उद्देशिका पार्कद्वारे संविधानातील मौलिक विचार जनतेपर्यंत पोहचतील -...

आदिवासी समाजाच्या विकासासाठी प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान – मंत्री डॉ. अशोक...

0
पुणे, दि. २८: आदिवासी जमातीच्या आर्थिक व सामाजिक विकासाकरीता ‘प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ राबविण्यात येत आहे. शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा नागरिकांना लाभ...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वैनगंगा कोरंबी येथील जलपर्यटन प्रकल्पाची पाहणी

0
भंडारा,दि. २८: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा कोरंबी येथील जलपर्यटन प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार नरेंद्र भौंडेकर,अतिरीक्त...