शनिवार, जुलै 5, 2025
Home Blog Page 16

संविधानाच्या उद्देशिकेतील मूल्यांचा अंगीकार व्हावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  •  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मरणासाठी संविधान उद्देशिका पार्क एक महत्वाचे पाऊल – सरन्यायाधीश भूषण गवई
  • संविधान उद्देशिका पार्कद्वारे संविधानातील मौलिक विचार जनतेपर्यंत पोहचतील – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूर, दि. २८:  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जागतिक मूल्य आणि भारतीय शाश्वत मूल्य यांची उत्तम सांगड घालत भारतीय संविधानाची निर्मिती केली असून उद्देशिका हा संविधानाचा गाभा आहे. उद्देशिकेतील मूल्यांचा अंगीकार देशातील नागरिकांनी करावा त्यामुळे देशातील ९० टक्के प्रश्न कायमचे सुटतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉच्या परिसरात संविधान उद्देशिका पार्क आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, विधी व न्याय राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, सामाजिक न्याय विभागाचे प्रमुख सचिव हर्षदीप कांबळे, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे, माजी मंत्री नितीन राऊत, माजी खासदार जोगेंद्र कवाडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे-चवरे, संविधान उद्देशिका पार्क समितीचे अध्यक्ष गिरीष गांधी आणि या समितीचे सदस्य उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात भारतीय संविधानाचे धडे गिरविले व संवैधानिक मूल्य कृतीमध्ये आणले त्याच महाविद्यालयात संविधान उद्देशिका पार्क आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होत आहे, ही अत्यंत महत्त्वाची व समाधानाची बाब आहे. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात या पार्कची कार्यपूर्ती होऊन जनतेसाठी खुला होत आहे ही त्यातही महत्त्वाची बाब आहे. भारतीय संविधानाने सक्षम लोकशाहीची रचना करुन येथील नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मूलभूत अधिकार, समान संधीचा अधिकार व न्याय मिळवून देण्याची व्यवस्था केली आहे. यामुळेच संविधानातील मूल्यांवर चालत भारताने जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याचा मान मिळविला आहे.

उद्देशिका संविधानाचा गाभा आहे. यातील निहीत मूल्यांचा सर्व नागरिकांनी अंगिकार करण्याची गरज आहे व संविधान उद्देशिका पार्कच्या माध्यमातून याची प्रेरणा येथे भेट देण्याऱ्या प्रत्येकाला मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाची नवीन इमारत बांधण्यात येईल तसेच संविधान उद्देशिका पार्कला आवश्यक सर्व सोयी सुविधा पुरविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

संविधान उद्देशिका पार्कच्या माध्यमातून एक महत्त्वाचे पाऊल -सरन्यायाधीश भूषण गवई

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर शहरातच आपल्या आयुष्याच्या अंतिम काळात क्रांतिकारक धम्मप्रवर्तन केले. या घटनेचे स्मरण कायम राहण्यासाठी व यातून प्रेरणा घेण्यासाठी दीक्षाभूमी स्मारकाची स्थापना झाली. भौगोलिकदृष्टया भारताचा मध्यबिंदू असलेल्या झिरो माईल येथे संविधान चौक निर्माण झाला आणि आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ परिसरात संविधान उद्देशिका पार्क उभे राहिले आहे. ही वास्तूही येथे भेट देणाऱ्या प्रत्येक नागरिकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याचे स्मरण व प्रेरणा देईल. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात भारताचे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्विकारण्याचा व त्यानंतर पहिल्याच नागपूर भेटीत संविधान उद्देशिका पार्कच्या उद्घाटनाचा योग आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या पार्कमध्ये लावण्यात आलेली भित्तीचित्रे, बाबासाहेबांचे मौलीक विचार आदी बाबी उल्लेखनीय असल्याचेही त्यांनी सांगितले. भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती प्रक्रियेसह यात अंतर्भूत विविध महत्त्वाच्या मूल्यांबाबत त्यांनी सविस्तर माहिती देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

संविधानातील मौलिक विचार जनतेपर्यंत पोहचतील- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने संविधान उद्देशिका पार्क उभारण्यासाठी पुढाकार घेतला व राज्य शासनाच्या अर्थ सहाय्याने आणि लोकसहभागातून ही उत्तम संकल्पना प्रत्यक्षात आली. या पार्कच्या माध्यमातून संविधानातील मौलिक विचार या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह समस्त जनतेपर्यंत पोहचतील याचा महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी म्हणून सार्थ अभिमान व समाधान असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

नागपूर विद्यापीठाने देशाला पंतप्रधानांसारख्या महान व्यक्ती दिल्या. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश देशाला दिले. त्याच वास्तूमध्ये संविधान उद्देशिका पार्क उभे राहिल्याने या गौरवात वृद्धी झाल्याच्या भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. विद्यापीठाच्या ई-ग्रंथालयासाठी त्यांनी एक कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही केली.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी संविधान उद्देशिका पार्कच्या उभारणीसाठी सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीने करण्यात आलेल्या अर्थ सहाय्यासहीत अन्य बाबींचा परामर्श घेतला.

तत्पूर्वी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार करण्यात आला.

माजी विद्यार्थ्यांचा सत्कार

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधी व न्याय राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचे वरिष्ठ न्यायमूर्ती अनिल किलोर, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी, न्या. भारती डांगरे,  न्या. वाय. जी. खोब्रागडे, न्या. वृषाली जोशी, न्या. श्रीमती एम. एस. जावरकर, न्या. नितीन बोरकर, न्या. आर. एन लढ्ढा, न्या. ए.एन पानसरे आदींचा सत्कार करण्यात आला.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा संविधान उद्देशिका पार्क समितीचे अध्यक्ष गिरीष गांधी यांनी या वास्तूच्या निर्मितीतील विविध टप्प्यांची माहिती दिली. संविधान उद्देशिका पार्क समितीचे सदस्य पूरण मेश्राम यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉचे संचालक डॉ. रविशंकर मोर यांनी आभार मानले.

असा आहे संविधान उद्देशिका पार्क

संविधान उद्देशिका पार्कच्या मध्यभागी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान हातात धरलेली प्रतिमा स्थापित करण्यात आली आहे. उद्देशिका पार्कमध्ये संविधान उद्देशिकेतील भारतीय संविधान, आम्ही लोक, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, प्रजासत्ताक, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आदी दहा मूल्यांचे भित्तिचित्रे (म्युरल्स) लावण्यात आली आहेत. उद्देशिका पार्कमध्ये लोकशाहीचे मुख्य आधारस्तंभ असलेले राष्ट्रपती भवन, संसद भवन, सर्वोच्च न्यायालय यांच्या प्रतिकृती आणि अशोक स्तंभदेखील तयार करण्यात आला आहे. संपूर्ण संविधान प्रास्ताविका पार्क हा दोन एकर परिसरात ९.५ कोटी रुपये खर्चातून निर्माण करण्यात आला आहे. या पार्कमध्ये प्रवेश करण्यासाठी एक भव्य प्रवेशद्वार देखील उभारण्यात आले आहे.

०००

आदिवासी समाजाच्या विकासासाठी प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान – मंत्री डॉ. अशोक वुईके

पुणे, दि. २८: आदिवासी जमातीच्या आर्थिक व सामाजिक विकासाकरीता ‘प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ राबविण्यात येत आहे. शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा नागरिकांना लाभ देऊन जिल्ह्यात अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन पुणे जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आणण्याकरीता प्रशासनाचे काम करावे, याकरीता स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून हे अभियान यशस्वीपणे पूर्ण करावे, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास विभागाचे मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले.

प्रधानमंत्री जनजाती आदिवासी महान्याय अभियान आणि प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार उमा खापरे, दिलीप वळसे पाटील, सुनील शेळके, बापूसाहेब पठारे, शंकर मांडेकर, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लिना बनसोड, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त गोपीचंद कदम, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगावचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई आदी उपस्थित होते.

मंत्री डॉ. वुईके म्हणाले की, विकसित भारताकरीता आदिवासींचे योगदान विचारात घेता त्यांच्या सशक्तीकरणाकरिता ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ ३० जून पर्यंत राबविण्यात येत आहे. याच्या अंमलबजावणीसाठी १७ विभागाच्या माध्यमातून २५ योजना राबविण्याचे उद्दिष्ट आहे. या अभियानाअंतर्गत पुणे जिल्ह्यातील ९९ गावांची निवड करण्यात आली असून गावातील पात्र नागरिकांना शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा  लाभ देण्याकरिता गावनिहाय कृती आराखडा तयार करा. येत्या १५ ऑगस्ट रोजी आयोजित ग्रामसभेत हा कृती आराखडा मंजूर करुन त्यानुसार कार्यवाही करावी. या गावात योजनांची व्यापक स्वरुपात जनजागृती करावी.

पुणे शहरात आदिवासी जमातीतील विद्यार्थ्यांकरीताअद्ययावत वसतिगृह बांधण्याकरीता प्रशासनाने जागा उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करावी, याकरीता निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. आश्रमशाळेतील पारधी समाजाच्या विद्यार्थ्यांची आधार कार्डाकरीता नोंदणी करावी. आदिवासी बांधवांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासोबतच त्यांचे हक्क हिरावून घेणार नाही तसेच कातकरी समाजातील मुले शाळेपासून वचिंत राहणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी.

आदिवासी जमातीतील नागरिकांच्या कल्याणाकरीता पुणे जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त करत मंत्री डॉ. वुईके म्हणाले, आदिवासींच्या कल्याणाकरीता राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाकरीता निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. या बैठकीत लोकप्रतिनिधींनी केलेल्या सर्व सूचनांचा सकारात्मक विचार करण्यात येईल.

यावेळी आमदार सर्वश्री वळसे पाटील, शेळके, पठारे आणि मांडेकर यांनी आदिवासी जमातीतील नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात, याकरीता निधीची उपलब्ध करुन देण्याची सूचना केल्या.

बैठकीच्या अनुषंगाने माहिती देताना जिल्हाधिकारी डूडी म्हणाले, जिल्ह्यात प्रधानमंत्री जनजाती आदिवासी  महान्याय अभियानाअंतर्गत १०१ शिबीराचे आयोजन करुन त्यामध्ये  १ हजार ४४१ आधार कार्ड, ४८५ लाभार्थ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे वाटप, ३४ लाभार्थ्यांच्या वनहक्क दाव्यास मंजूरी, १३ हजार ४८६ नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र, १३८ लाभार्थ्यांना प्रधानमंत्री उज्जवला गॅस योजना, ९७१ लाभार्थ्यांना प्रधानमंत्री जनधन योजना, ४२७ नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड ,११ हजार १७० नागरिकांना शिधापत्रिका वाटप करण्यात आले आहेत.

प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाअंतर्गत  ३१ लाभार्थ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे वाटप, २७ लाभार्थ्यांना प्रधानमंत्री जनधन योजनांचा लाभ, २१४ नागरिकांचे आधार कार्ड, १०१ नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र तसेच ५३ नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड, १५९ शिधापत्रिका, २१ रहिवाशी प्रमाणपत्र आणि ९ नागरिकांना किसान क्रेडिट कार्डचा लाभ देण्यात आला आहे.

प्रधानमंत्री जनजाती आदिवासी महान्याय अभियान आणि प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानात स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक, सामजिक संस्था आदींना विश्वासात घेवून प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल, असेही डुडी म्हणाले.

डॉ. वुईके यांच्या हस्ते जिल्ह्यातील विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात धनादेश वाटप, कातकरी लाभार्थ्यांना घरकुलांकरीता वनहक्क दावा बहाल करण्यात आले. तसेच भिमाशंकर सेंद्रिय शेतकरी गट निगडाळे, ता. आंबेगाव येथील राईस मिलचे दृकश्राव्यप्रणालीद्वारे उद्धाटन करण्यात आले.

डॉ. वुईके यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील आंबेगाव व जून्नर तालुक्यातील आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी, निदान, प्रतिबंधात्मक उपचाराकरीता एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव आणि के.ई.एम. रुग्णालय संशोधन केंद्र पुणे यांच्या सामंजस्य करार करण्यात आला.

०००

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वैनगंगा कोरंबी येथील जलपर्यटन प्रकल्पाची पाहणी

भंडारा,दि. २८: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा कोरंबी येथील जलपर्यटन प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार नरेंद्र भौंडेकर,अतिरीक्त जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव, पोलीस अधिक्षक नुरुल हसन ,निवासी उपजिल्हाधिकारी  लीना फलके,अधिक्षक अभियंता राजेश पाटील, मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण उपस्थित होते.

जिल्ह्यातील कोरंबी गावाजवळ वैनगंगा नदीवर प्रस्तावित जलपर्यटन प्रकल्पाचे काम सुरू असून या कामाला आज उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी आमदार नरेंद्र भौंडेकर यांनी या प्रकल्पाविषयी माहिती दिली. विदर्भात जलपर्यटनाला वाव असून या प्रकल्पाचे काम दर्जेदार व्हावे,अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.

त्यानंतर भंडारा शहरातील खांब तलाव परिसरातील भव्य प्रभु श्रीराम मूर्तीचे त्यांनी दर्शन घेतले. सोबतच परिसरातील कामाची पाहणी केली.

प्रकल्पाविषयी थोडक्यात माहिती

  • गोसेखुर्द जलाशय मौजा मौदी, (जिल्हा भंडारा) येथे जागतिक दर्जाचे पर्यटन विकास करण्यात येत आहे.
  • या प्रकल्पात नाविन्यपूर्ण जल पर्यटन केंद्र, बोटीसाठी आणि पर्यटकांसाठी रॅम्प
  • पर्यटकांसाठी आसन व्यवस्था, वाहनतळ उपहारगृह, बगीचा
  • पर्यटकांसाठी विविध सुविधा, गावांना आणि इतर पर्यटन स्थळांना जोडण्यासाठी ठिकठिकाणी जेट्टी उभारण्यात येत असून एप्रिल 2026 पर्यत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

०००

मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क जेईई, नीट प्रशिक्षणाकरिता नोंदणी करण्याचे आवाहन

मुंबई, दि. २८: अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (आर्टी) वतीने राज्यातील अनुसूचित जातीतील मातंग व इतर तत्सम समाजातील पात्र उमेदवारांसाठी जेईई (JEE) आणि नीट (NEET) प्रवेश परीक्षांचे निः शुल्क अनिवासी ऑफलाईन प्रशिक्षण खाजगी व नामांकित संस्थांमार्फत दिले जाणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती व नागपूर या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र असतील.

त्याकरीता मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील जे उमेदवार सन- 2025 ची इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, अशा उमेदवारांचे सन 2025 ते मे 2027 या कालावधीसाठी जेईई (JEE) आणि नीट (NEET) या प्रवेश परीक्षांचे अर्ज मागविण्यात येत आहेत.

या प्रशिक्षणासाठी 10 वीच्या गुणांच्या आधारे व 8 लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या पात्र उमेदवारांची गुणानुक्रमे निवड केली जाईल. त्याकरीता इच्छुक व पात्र उमेदवारांनी 1 जुलै पासून 30 जुलै 2025 पर्यंत https://cpetp.barti.in  या लिंकवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी केले आहे.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

पाणी संवर्धन कार्यात स्वयंसेवी संस्थांचे योगदान महत्त्वाचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई,दि. २८:  विदर्भात जलसंधारण व जलस्रोत विकासाचे काम होणे आवश्यक आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे या भागातील शेतकरी संकटाच्या छायेखाली आहेत. अशा पार्श्वभूमीवर, या भागात पाणी टिकविण्यासाठी व त्याच्या संवर्धनासाठी स्वयंसेवी संस्थांनी हाती घेतलेले कार्य खरोखरच उल्लेखनीय असून भरीव काम गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, आगामी पाच वर्षांच्या कालावधीसाठी  प्रतिष्ठित स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून राज्यात जलसंधारणासाठी कामाचा व्यापक स्वरूपात विस्तार करावा. राज्यात गाव पातळीवरील पारंपरिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, नव्याने जलसाठवण व जलनियंत्रण रचनांची उभारणी, लोक सहभाग व वैज्ञानिक दृष्टिकोनातून दीर्घकालीन टिकाऊ जलव्यवस्थापन यांचा समावेश करावा.

गडचिरोली जिल्ह्यासाठी स्वयंसेवा संस्थासेाबत सामंजस्य करार

शासनाने गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात मे 2025 ते मार्च 2028 या कालावधीसाठी एक महत्त्वाचा सामंजस्य करार केला आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण 30 गावे समाविष्ट करण्यात आली असून सुमारे 3,000 शेतकऱ्यांना थेट लाभ होणार आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून 3,000 एकर क्षेत्रावर शेतीविकास, जलसंधारण, पायाभूत सुविधा आणि उत्पादनक्षमता वाढीसाठी विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणे, शेती टिकाऊ होणे आणि ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास घडवून आणणे अपेक्षित आहे.

जिल्हा प्रशासनाच्यावतीने अशा प्रकल्पांसाठी शासनाच्या निधीचा समन्वय साधून, अधिकाधिक लाभदायी रूपात मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी करण्यासाठी स्वयंसेवी संस्था व जिल्हा प्रशासन यांच्यात औपचारिक सामंजस्य करार देखील करण्यात यावा.

हिंदुस्तान युनिलिव्हर फाउंडेशनकडून दीर्घकालीन व सातत्यपूर्ण पाठींब्याची अपेक्षा व्यक्त करून राज्यातील दुष्काळग्रस्त भागांत पाणीटंचाईचे आव्हान अधिक प्रभावीपणे हाताळता येईल असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

०००

राजू धोत्रे/विसंअ/

सरन्यायाधीश पदापर्यंतच्या प्रवासात नागपूरचे योगदान महत्वपूर्ण – सरन्यायाधीश भूषण गवई  

नागपूर, दि २७ : नागपूर शहरासोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. दरवर्षी धम्मप्रवर्तन दिनी आई- वडीलांसोबत दिक्षाभूमीवर येत असे. पुढे वकिली व न्यायदान क्षेत्रात नागपूर जिल्हा व सत्र न्यायालय, जिल्हा वकील संघटना आणि उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ येथे काम करतांना बऱ्याच गोष्टी आत्मसात करता आल्या, अशा भावना भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज येथे व्यक्त केल्या.

जिल्हा व सत्र न्यायालय येथे नागपूर जिल्हा वकील संघटनेच्या वतीने सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई आणि पत्नी डॉ. तेजस्विनी गवई, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, न्यायमूर्ती अतुल चांदूरकर, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे, ज्येष्ठ न्यायमूर्ती अनिल किलोर, न्यायमूर्ती अभय मंत्री आणि नागपूरचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश दिनेश सुराणा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले, नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने देशाला महान वकील व न्यायाधीश दिले. जिल्हा वकील संघटनेच्या माध्यमातून रचनात्मक कार्य उभे राहिले आणि उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाद्वारे जनहित याचीकांचा प्रभावी उपयोग होवून जनहिताचे कार्य झाले. या तीनही संस्थांमध्ये कार्य करण्याची संधी मिळाली. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान होताच विदर्भातील झुडपी जंगलाचा प्रश्न सोडवून यामाध्यमातून गोरगरीब आणि शेतकऱ्यांना न्याय देता आला. याचे समाधान असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या                        भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात घटना समितीच्या सदस्यांनी भारत देशाला अभूतपूर्व अशी राज्यघटना दिली. समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधूता या मुल्यांद्वारे राज्यघटना देशाला मार्गदर्शन करीत असून सामान्य व्यक्तीच्या अधिकाराचे रक्षण न्यायपालिका करीत असल्याचे त्यांनी सांगितले. न्यायपालिकेच्या सर्वोच्च पदाची जबाबदारी सांभाळतांना प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका कायम ठेवणार असल्याच्या भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाच्या आदेशानुसार सन 2001 मध्ये झोपडपट्टया काढण्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात स्थगिती देण्यात बजावलेल्या भूमिकेची आठवण सांगत हजारो झोपडपट्टी वासीयांचा निवारा वाचवू शकल्याच्या भावना त्यांनी मांडल्या. नागपूर येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ उभारण्यासाठी प्रयत्न केले व त्यास यश आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. विधी क्षेत्रातील एकूण 40 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहकार्य लाभलेल्या सर्वांबद्दल कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली. विधी क्षेत्रातील वाटचाल व त्यातील विविध वळणांबाबत त्यांनी यावेळी मनमोकळे विचार मांडले.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायुमूर्ती न्या.अतुल चांदूरकर, न्या.प्रसन्न वराळे, न्या. दीपांकर दत्तो आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्या.आलोक आराधे आणि जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायमूर्ती दिनेश सुराणा यांनी आपल्या संबोधनात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्व व कार्यावर प्रकाश टाकला.

नागपूर जिल्हा वकील संघटना आणि  विदर्भातील विविध विधी संघटनांच्या वतीने यावेळी न्या. गवई यांचा सत्कार करण्यात आला. नागपूर जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. रोशन बागडे  यांनी प्रास्ताविक केले तर सचिव मनिष रणदिवे यांनी आभार मानले.

तत्पूर्वी, सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विस्तारित इमारतीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे अनावरण आणि इमारतीच्या परिसरात तीन भाषांमधील संविधान उद्देशिकेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांच्या हस्ते डिजिटल ग्रंथालयाचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.

00000

 

‘संवादवारी’च्या प्रदर्शनाला सणसर येथे वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे, दि.२७: डोक्यावर विठ्ठल-रुखमाईची मूर्ती, तुळशी वृंदावन, हातात टाळ, वीणा, भागवत धर्माचा पताका हाती घेत पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरकडे मार्गस्थ वारकऱ्यांची पाऊले माहिती व जनसंपर्क महासंचालनालयच्या ‘संवादवारी’कडेही वळत आहेत.

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत आयोजित ‘संवादवारी’ उपक्रमाअंतर्गत प्रदर्शन, चित्ररथ, एलईडी व्हॅन , कलापथक, पथनाट्याच्या माध्यमातून शासकीय योजनांचा जागर सुरू आहे. यापूर्वी कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, यवत, वरवंड, उंडवडी गवळ्याची, बारामती आणि सणसर येथे या उपक्रमाला वारकरी व ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

चित्ररथाचे विशेष आकर्षण

पालखी सोहळ्यासोबत असलेला चित्ररथही वारकऱ्यांसाठी विशेष आकर्षण आहे. अनेक ठिकाणी वारकरी चित्ररथासोबत छायाचित्र घेताना दिसत आहेत. चित्ररथावर दर्शनी भागावरील लामणदिवा, तुळशी वृंदावनाची प्रतिमा असल्याने वारीसोबत असलेल्या भाविकांची पावले चित्ररथाकडे वळतात.

चित्ररथरथाची रचना आणि त्यावर कलात्मकतेने दिलेली माहिती वारकरी बांधव कुतूहलाने पाहत आहेत. कलापथकाच्या सादरीकरणाला टाळ्या मिळत असून योजनांची माहिती व मनोरंजन अशी सांगड घातली जात आहे.

वारीसोबत चालणाऱ्या एलईडी व्हॅनवरील मोठ्या पडद्यावर दृकश्राव्य चित्रफीतीच्या माध्यमातून योजनांची माहिती दिली जात आहे. लोककला पथकाच्या माध्यमातून ठिकठिकाणी भजन, विठुनामाच्या गजरासोबत रंजक पद्धतीने शासकीय योजनांची माहिती दिली जाते आणि त्यासोबत स्वच्छता आणि आरोग्याचे संदेशही देण्यात येतात. त्यामुळे या पथकासभोवतीही गर्दी दिसून येत आहे.

वारकरी आणि नागरिक प्रदर्शनाला आवर्जुन भेट देत असून योजनांची माहिती जाणून घेत आहेत. प्रदर्शनाची मांडणी आणि मिळणाऱ्या नवीन माहितीमुळे प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

प्रदर्शनास भेट देणाऱ्या वारकऱ्यांना योजनांची माहिती देणारे पत्रके वितरण करण्यात येत आहेत. इंदापूर तालुक्यात २८ जून रोजी निमगाव केतकी आणि २९ जून रोजी इंदापूर पालखी तळ येथे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार असून या प्रदर्शनाचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रदर्शनात विविध योजनांची माहिती

प्रदर्शनात ३० फ्लेक्स पॅनेलचा समावेश आहे. पशुसंवर्धन विषयक किसान क्रेडिट कार्डची सुविधा पशुपालकांना देणे, पशुधन अभियानांतर्गत उद्योजकता विकासाला चालना, बळीराजा शेतकऱ्याच्या उन्नतीसाठीच्या योजना व घेतलेले निर्णय, नागरिकांना भेसळविरहित अन्नधान्य मिळावे यासाठी सुरक्षित अन्न तपासणीच्या सुविधा, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, कृषी योजनांच्या लाभासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी, ‘महाविस्तार- एआय’ ॲप, सायबर सुरक्षितता, जलसिंचनासाठीचे प्रकल्प, सामाजिक न्यायासाठी मंत्रालयात ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापना, तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण आणि कल्याणकारी मंडळाची पुनर्रचना, आदिवासींच्या उत्थानासाठी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना, प्रधानमंत्री आवास योजना टप्पा २ अंतर्गत ३० लाख घरे मंजूर, पीएम- जनमन, रमाई, शबरी, अटल बांधकाम कामगार वसाहत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, मोदी आवास योजना आदी योजनांची माहिती देण्यात आली आहे.

याशिवाय पशुसंवर्धन अंतर्गत मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना, राज्य स्तरावर कॉल सेंटरची स्थापना, पशु आरोग्य सेवांसाठी टोल फ्री क्रमांक, सहकार विभागांतर्गत आपले सहकार पोर्टलवर सहकार विभागाच्या ऑनलाईन सेवा उपलब्ध, परिवहन विभागांतर्गत महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२५, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना, गोवारी बांधवांच्या विकासासाठी स्वतंत्र योजना, दिव्यांगणसाठी स्वतंत्र विभाग, उच्च व तंत्र शिक्षण अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी आदी माहिती या प्रदर्शनात फ्लेक्स पॅनेलवर प्रदर्शित करण्यात आली आहे.

बाळासाहेब कुंजीर, मु. वळती, ता. हवेली: ‘आषाढी वारीतील ‘संवादवारी’ उपक्रमाअंतर्गत भरविण्यात आलेले प्रदर्शन, चित्ररथ, एलईडी व्हॅन , कलापथक, पथनाट्याच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती मिळत आहे, ही आनंदाची बाब आहे, याबद्दल राज्य शासनाचे आभार मानतो.’

ह.भ.प. ज्योतिराव कांबळे, मसला खुर्द, ता. तुळजापूर, जि. धाराशिव

‘राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने राज्यशासनाच्या योजनांची नागरिकांना माहिती होऊन त्यांना या योजनांचा लाभ मिळण्याकरिता आषाढीवारीत संवादवारी उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. या उपक्रमात ज्येष्ठ नागरिक, महिला, बालके, तरुणवर्गाकरिता योजना आहेत.अशाच प्रकारे नागरिकांना योजनांची माहिती देण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे इंदापूर तालुक्यात आगमन

पुणे, दि. २७: ‘हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी ‘ या भावनेसह, टाळ-मृदंगाच्या गजरात, ‘ज्ञानोबा- माऊली तुकाराम’….रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी… अशा जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज इंदापूर तालुक्यात आगमन झाले. यावेळी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी
भवानीनगर येथे पालखी रथ आणि दिंड्यांचे दर्शन घेऊन स्वागत केले.

यावेळी इंदापुरचे तहसीलदार जीवन बनसोडे, बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, इंदापुरचे सचिन खुडे, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रशासनातर्फे वारकऱ्यांसाठी सुविधा
इंदापूर तालुक्यात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम सणसर, निमगाव केतकी, इंदापूर शहर आणि सराटी या ठिकाणी आहे. आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तालुका प्रशासन, इंदापुर नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पंचायत समिती, पोलीस विभाग, आरोग्य विभागाच्यावतीने तयारी केली आहे.

जर्मन हँगर पद्धतीचे मंडप, शुद्ध पिण्याचे पाणी, वीज, फिरते वैद्यकीय पथके, मोफत औषधोपचार, चरणसेवा, हिरकणी कक्ष, निवारा केंद्र, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, फिरते सुलभ शौचालय, कचरा वाहतूक घंटागाडी, कचरा कुंडी, पोलीस मदत केंद्र, अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, सूचना फलक आदी व्यवस्था करण्यात आली असून ध्वनीक्षेपकाद्वारे सूचनाही देण्यात येत आहेत.
0000

नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी जिल्हा परिषदेच्या पाठीशी राहू – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली, दि. २७ (जि. मा. का.) : जिल्हा परिषदेच्या योग दिनाच्या कार्यक्रमात साडेपाच लाखांच्या आसपास नागरिक सहभागी झाले. यातून सांगली जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास 25 टक्के नागरिकांनी तीन विश्वविक्रम केले. याद्वारे सकारात्मक वातावरण निर्मिती झाली असून, असेच अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम आखावेत. आपण जिल्हा परिषदेच्या पाठीशी आहोत, अशी कौतुकाची थाप राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज जिल्हा परिषद प्रशासनाच्या पाठीवर दिली.

शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्यासाठी जागतिक योग दिनाचे औचित्य साधून सांगली जिल्हा परिषदेने विश्वविक्रमी भक्तियोग साधला. यानिमित्त आयोजित अभिनंदन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. वसंतरावदादा पाटील समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, चितळे डेअरीचे प्रतिनिधी विवेक काटेकर, विश्व योग दर्शन केंद्राचे योगविशारद बालकृष्ण चिटणीस आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, अकरा वर्षांपूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांपुढे मांडलेल्या प्रस्तावानंतर योगांचे महत्त्व जगाने अनुसरले. जगभरात दरवर्षी 21 जून रोजी जागतिक योग दिन साजरा केला जात आहे. यात जगभरातील 175 देशांतील सर्वोच्च नेत्यापासून सामान्य नागरिक अशा जवळपास 10 कोटी व्यक्ती सहभागी होतात. योग दिन एका दिवसापुरता न राहता कित्येकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. शारीरिक स्वास्थ्य, एकाग्रता, प्रखर बुद्धी असे अनेक फायदे योग केल्याने होतात. शरीर, मन, बुद्धी यांची ओळख करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे, असे त्यांनी सांगितले.

पुणे येथे दिंडीत सहभागी वारकऱ्यांच्या योग कार्यक्रमात सहभागी व्हायचे असल्याने सांगलीतील कार्यक्रमात उपस्थित राहता आले नाही. मात्र, आपण जिल्हा परिषद प्रशासनाच्या संपर्कात होतो व कार्यक्रमाची नियमित माहिती घेत होतो. विश्वविक्रम झाल्यानंतरही लगेचच आपण जिल्हा परिषदेचे अभिनंदन केले असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आवर्जून सांगितले.

दिनांक 21 जून या जागतिक योग दिनी वारकरी संगीतावर एकाच वेळी विविध ठिकाणांहून प्रत्यक्ष व दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी होऊन सर्वाधिक व्यक्तिंनी केलेला योग या नावाने सर्व सांगली जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील योगप्रेमींनी केलेला हा विश्वविक्रम वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंदला गेला. यात त्यांना चितळे डेअरी आणि विश्व योगदर्शन केंद्र यांची साथ लाभली. याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गौरवोद्गार काढले.

 जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी विश्वविक्रमी भक्तियोगाचा संकल्प ते प्रत्यक्ष विश्वविक्रम याचा प्रवास प्रास्ताविकात सांगितला. शहरी व विशेषतः ग्रामीण भागातून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, चितळे डेअरीचे प्रतिनिधी विवेक काटेकर, विश्व योग दर्शन केंद्राचे योगविशारद बालकृष्ण चिटणीस यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख व जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी यांचा भेटवस्तू देऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

00000

गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी पोलीस दलाने प्रभावी प्रतिबंधात्मक यंत्रणा कार्यान्वित करावी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पोलीस दादा, पोलीस दीदींनी घरोघरी प्रबोधन करण्याच्या सूचना

तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, पोलीस पाटील यांची कार्यशाळा घेण्याचे निर्देश

 सांगली, दि. २७ (जि. मा. का.) : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने, जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस दलाने प्रभावी व परिणामकारक प्रतिबंधात्मक यंत्रणा कार्यान्वित करावी, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. पोलीस मुख्यालय येथे आयोजित या बैठकीस पोलीस अधीक्षक संदीप घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार, महापालिका अतिरीक्त आयुक्त रवीकांत आडसूळ, सांगलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी विमला एम] मिरजचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व पोलीस पाटील यांची कार्यशाळा घेऊन, त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणिव करून देण्याच्या सूचना देऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्ह्यात अमली पदार्थ विरोधी कारवायांमुळे अमली पदार्थ तस्करीवर नियंत्रण मिळवण्यात जिल्हा प्रशासन व पोलीस दलाला यश मिळाले आहे. त्याचप्रमाणे घरगुती व अन्य गंभीर गुन्हे घडण्यापूर्वीच रोखण्याच्या दृष्टीने प्रभावी उपाययोजनांसाठी विचारमंथन करावे. हद्दपार गुन्हेगार व जामिनावर सुटलेल्यांवर नजर ठेवावी. संशयित हालचालींबाबत माहिती देण्यासाठी पोलीस दलाने गुप्त माहिती संकलन यंत्रणा अधिक बळकट करावी. पोलीस दादा व पोलीस दीदींना घरोघरी नागरिकांशी प्रभावी संवाद साधत प्रबोधनात्मक जनजागृती व समुपदेशन करावे, असे त्यांनी सूचित केले.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, नागरिकांत पोलिसांबद्दल सकारात्मक भावना निर्माण करावी. महिला व मुलींसाठी हेल्पलाईनबाबत प्रचार प्रसिद्धी करावी. शाळा–कॉलेजांमध्ये जनजागृती कार्यक्रम घ्यावेत. सायबर गुन्हेगारी, अमली पदार्थ, बालसुरक्षा याबाबत विद्यार्थी व पालक यांच्याशी संवाद साधून प्रशिक्षण द्यावे. समाजमाध्यमांवर निगराणी ठेवावी आणि त्याचा जबाबदारीने वापर करण्याबाबत जनजागृती करावी. गुन्हेगारी रोखण्यामध्ये प्रशासन, पोलीस यंत्रणा, सामाजिक संस्था व नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नातून प्रभावी उपाययोजना राबवून दिशादर्शक काम करावे, असे ते म्हणाले.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शहर व ग्रामीण भागातील गुन्हेगारी घटनांचा आढावा घेतला. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी याबाबत सादरीकरण करताना जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांची माहिती देऊन सर्व महत्वाचे गुन्हे उघडकीस आणले असल्याचे सांगितले.

यावेळी जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पोलीस विभागाने तयार केलेल्या जनजागृती लघुचित्रफितीचे अनावरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

00000

ताज्या बातम्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी – सरन्यायाधीश भूषण गवई

0
मुंबई दि ०५: विविध विषयांचे अभ्यासक व तज्ज्ञ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्त्व विधिज्ञ, अर्थतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ असे बहुआयामी होते. शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाबरोबरच डॉ. बाबासाहेब...

विद्यार्थी नात्याने नवीन विषयांचा प्रांजळपणे अभ्यास करणेही गरजेचे – सरन्यायाधीश भूषण गवई

0
मुंबई दि ०५:  विविध आव्हानात्मक परिस्थितींचा सामना करताना वेळप्रसंगी प्रत्येक नवीन विषयाचा विद्यार्थी या नात्याने प्रांजळपणे अभ्यास करणेही गरजेचे असल्याचे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन

0
पंढरपूर, दि. ५ (जिमाका): आषाढी शुद्ध एकादशी निमित्त वाखरी येथे पोहोचलेल्या आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट...

बिहारमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण यशस्वीरित्या सुरू

0
मुंबई, दि. ५ : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) उपक्रमांतर्गत बिहारमध्ये १.५ कोटी घरांना बूथ स्तर अधिकारी (Booth...

शेतकऱ्यांना आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील : कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

0
नाशिक, दि. 4 जुलै, 2025 (जिमाका वृत्तसेवा): रस्ते वीज व पाणी या शेतकऱ्याच्या मूलभूत गरजा असून पूर्ण करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आवश्यक उपलब्ध करून देण्यासाठी...