रविवार, जुलै 6, 2025
Home Blog Page 15

बेळगाव स्मार्ट सिटीमध्ये महाराष्ट्राची दादासाहेब फाळके चित्रनगरी एनडी स्टुडिओमार्फत साकारणार कला प्रकल्प

मुंबई, दि. 29 : महाराष्ट्राची दादासाहेब फाळके चित्रनगरी बेळगाव येथील ‘बेळगाव स्मार्ट सिटी’ मध्ये नवीन कला प्रकल्प साकारत असून आज या कामांचा सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या उपस्थितीत पुन्हा शुभारंभ करण्यात आला.

कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून आणि एन.डी. स्टुडिओच्या माध्यमातून बेळगाव स्मार्ट सिटी प्रकल्पात सुमारे साडेतीन एकर मध्ये हा कलाप्रकल्प साकारण्यात येत होता. तांत्रिक कारणामुळे काही वर्षे या प्रकल्पाचे काम रखडले व नंतर नितीन देसाई यांचे दुर्दैवाने निधन झाले. त्यानंतर फायनान्स कंपनीकडे असलेला त्यांचा एन.डी. स्टुडिओ महाराष्ट्र शासनाने ताब्यात घेतला. आता त्याअंतर्गत बेळगाव स्मार्ट सिटीच्या उभारणीचे काम एन.डी. स्टुडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या चित्रनगरीकडे आले.

या साडेतीन एकरामध्ये होणाऱ्या कला प्रकल्पात भारतातील पाच विविध प्रांतातील खेडी, हवाई दालन , कलाप्रदर्शन असा वैविध्यपूर्ण हा प्रकल्प आहे. संस्कृती व आधुनिकता यांचा संगम असलेला प्रकल्प उभारणीचे काम गोरेगाव फिल्म सिटी करणार आहे. आज पुन्हा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांच्या उपस्थितीत कामांचा औपचारिक शुभारंभ करुन प्रकल्प उभारणीच्या कामांना सुरुवात करण्यात आली.

यावेळी गोरेगाव चित्रनगरीचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, वित्तीय सल्लागार मुख्य वित्तलेखा अधिकारी चित्रलेखा खातू, सहायक लेखा अधिकारी महेश भांगरे, त्याचबरोबर बेळगाव स्मार्ट सिटी व्यवस्थापकीय संचालक सईदा अफरीन उपस्थित होते.

प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी चित्रनगरी व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. स्थानिक आमदार अभय पाटील यांनी प्रकल्पासाठी समन्वय साधून प्रकल्प मार्गी लागावा म्हणून पाठपुरावा केला. याप्रसंगी काही स्थानिक लोकप्रतिनिधी देखील उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून गडचिरोली जिल्ह्यातील शाळांमध्ये साकारणार भिंतीवरील पुस्तकालय

मुंबई, दि. 29 – विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच त्यांच्यात राष्ट्रीयतेची भावना आणि जिज्ञासा वाढीस लागावी या उद्देशाने राज्य शासन विविध उपक्रम राबवित आहे. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक कथा वाचण्याची संधी देत एक हजार शाळांमध्ये भिंतीवरील पुस्तकालय प्रकल्प साकारण्यात येत आहे. रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून 50 हजार पुस्तके उपलब्ध करुन देण्याचा हा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात येत आहे. सुमारे एक लाख विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल.

‘सपनोंका पिटारा’ हे या ट्रस्टचे भिंतीवर लावता येणारे छोटे पुस्तकालय आहे. दुर्गम भागातील शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी याची रचना करण्यात आली आहे. प्रत्येक पुस्तकालयामध्ये विज्ञान आणि अंतराळ संशोधनातील अद्भूत गोष्टी, जीवनमूल्य, नेतृत्व, लोककथा, स्वातंत्र्यसैनिक आणि शूर सैनिकांच्या कथा, पुराणकथा, कल्पनारम्य जग आदी विषयांवर आधारित सुमारे 50 रंगीत, काळजीपूर्वक निवडलेली मराठी आणि इंग्रजी भाषेतील दर्जेदार कथा पुस्तके असून हा उपक्रम मुलांच्या वाचनाला आनंददायी आणि सहज बनवतो. या माध्यमातून वर्गखोल्यांना प्रेरणादायी, कल्पनाशक्तीला चालना देणाऱ्या आणि विचारक्षम शैक्षणिक जागांमध्ये रुपांतरीत करणाऱ्या बनविण्याचा आणि एक वाचन चळवळ उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे.

रत्ननिधी स्टोरीबुक प्रकल्प हा भारतातील बालसाहित्य वाचन क्रांती घडविण्यासाठीचा उपक्रम आहे. यामध्ये एक दशलक्ष दर्जेदार कथा पुस्तकांची निर्मिती, प्रकाशन आणि मोफत वितरण केले जात आहे. यामधून 5 ते 14 वयोगटातील मुलांसाठी दर्जेदार पुस्तके उपलब्ध करुन लहान वयात वाचनाची सवय लावणे, सर्जनशील आणि बौद्धिक जिज्ञासेची वाढ करणे आदी उद्देश साध्य केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून गडचिरोली जिल्ह्यासाठी एक हजार शाळांमध्ये पुस्तकालय सुरू करण्यात येत आहेत.

गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील शाळांमध्ये पुस्तकालये स्थापन करण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. पुढील आठवड्यापासून ही पुस्तकालये शाळांमध्ये बसविण्याचे काम सुरू होणार असून येत्या सहा महिन्यात हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. भविष्यात जिल्ह्यातील सर्व 1991 शाळांमध्ये असे पुस्तकालय सुरू करण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे.

सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्याकडून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील आरोग्य सेवेची पाहणी

सातारा दि.: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेची सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी पाहणी करून वारकऱ्यांची संवाद साधला.
सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना देण्यात आलेल्या सुविधांची पाहणी केली. आरोग्य विभागाकडून पालखी सोहळ्यामध्ये ठिकठिकाणी आरोग्य केंद्र उभारून वारकऱ्यांना औषध उपचारासह इतर सुविधा देण्यात येत आहेत याबद्दल सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्रीमती साकोरे बोर्डीकर यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी त्यांनी वारकऱ्यांशी संवाद साधून आरोग्यसेवा चांगल्या मिळत आहेत का याबाबत विचारणाही केली. यावर वारकऱ्यांनी आरोग्य, निवास सुविधा चांगल्या मिळत असल्याचे सांगितले.

सारथी संस्थेला निधी कमी पडू दिला जाणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. 29 : सारथी संस्थेच्या कामाला गती देण्याचे काम शासनामार्फत करण्यात येत असून त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. ही संस्था नवीन असून या संस्थेच्या विविध योजनांचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना होण्यासाठी सारथीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी येणाऱ्या काळात सामाजिक जबाबदारी म्हणून नवीन विद्याथ्यांना मार्गदर्शन करावे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात यूपीएससी व एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास सारथीचे संचालक उमाकांत दांगट, मधुकर कोकाटे, डॉ. नवनाथ पालकर, किशोरराजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, सारथीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शिवाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, यूपीएससी व एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रशासनात काम करताना लोकाभिमुख काम करुन, समाजातील दुर्बल व वंचित घटकांना मदत करावी. या कामात सातत्य ठेवून संस्थेचा नावलौकिक वाढवा. सारथी ही संस्था राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने कार्यरत असून, त्यांच्या नावाला साजेसे असे काम उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराने संस्थेची वाटचाल सुरू असून संस्थेचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे. संस्थेच्या माध्यमातून आपणास जे यश मिळाले आहे, त्या यशाचे अनुभव इतरांना सांगून, सारथीच्या माध्यमातून पुढील विद्यार्थ्यांना समर्पक भावनेतून मदत करावी, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक कार्य क्रांतिकारी असून ते विसरता येणार नाही. देशात अशा प्रकारची एकही सामाजिक संस्था नाही, जिच्या उद्दिष्टांमध्ये छत्रपती शाहू महाराजांचा विचार नाही. सामाजिक क्षेत्रात प्रत्येक संस्था व संघटना ही राजर्षी शाहू महाराजांचा विचार घेऊनच पुढे जाते किंवा जाऊ शकते, असे मत व्यक्त करुन राज्यातील शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्था या सर्वांच्या कार्याचा आदर्श हे राजर्षी छत्रपती शाहू महाराजच आहेत, असे श्री. पवार यांनी सांगितले.

सारथी संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर आपल्या मनोगतात म्हणाले, महाराष्ट्रात 1980 च्या दशकात यूपीएससी व एमपीएससी मध्ये निवड होण्याचे प्रमाण हे नगण्य होते. गेल्या 4 ते 5 वर्षात त्यामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. फक्त रोजगाराच्या बाबतीतच नाहीतर समाजाला पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टीने संस्थेचे संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. आगामी काळात सारथी संस्थेमार्फत मोठ्या प्रमाणात उत्तोमत्तम प्रशासकीय अधिकारी तयार होऊन महाराष्ट्राच्या विकासास मोठी गती देतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सारथीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शिवाजी पाटील यांनी केले. यावेळी संस्थेच्या विविध योजना, प्रशिक्षण कार्यक्रम व शिष्यवृत्ती यांचे सादरीकरण करण्यात आले. सारथीच्या यशोगाथांवर आधारित “विजयीभव” व “सारथी उपक्रम माहिती” या पुस्तकांचे प्रकाशन, तसेच 9 यूपीएससी व 91 एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी सारथीच्या मदतीने यश संपादन करू शकलो, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

कार्यक्रमास सारथी संस्थेचे व विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन स्वाती पाटणकर, तर आभार प्रदर्शन उपव्यवस्थापकीय संचालक अनिल पवार यांनी केले.

येत्या पाच वर्षात ‘जीएसडीपी’ ३५ लाख कोटींवर नेण्याचे ध्येय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. २८: शासन ही एक संस्था आहे. संस्था म्हणून याची क्षमता आणि संस्थात्मक बांधणी योग्य रीतीने झाली तर आपण मोठे परिवर्तन साध्य करू यात शंका नाही. या दृष्टीने अधिक विचार करून आपण 100 दिवस प्रशासकीय सुधारणा उपक्रम, त्यापाठोपाठ 150 दिवस उपक्रम हाती घेतले. आज ज्याचा प्रतिनिधिक शुभारंभ केला तो ‘महा स्ट्राइड’ हा उपक्रम राज्याच्या विकासाला दिशा देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मिहान येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या सभागृहात या प्रकल्पाचा प्रातिनिधिक शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल,  मित्राचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर,  उपाध्यक्ष राणा जगजीत सिंग पाटील, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविणसिंह परदेशी, अपर मुख्य सचिव राजेश कुमार मीना, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, जागतिक बँकेचे मारचीन पियाट्‌कॉस्की आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

संस्थात्मक विकास कामांचे नियोजन हे प्रदीर्घ काळ चालणाऱ्या निरंतर प्रक्रियेचा भाग असतो, तो पाया असतो. सरकारकडे संस्था, इन्स्टिट्यूशन म्हणून पाहताना विकासाचे दीर्घाकाल केलेले नियोजन हे अंमलबजावणी यंत्रणेतील माणसे बदलली तरी त्याची गती ही स्वयंचलित पद्धतीने पुढे सरकायला हवी. यातूनच दीर्घ नियोजनाला अर्थ उरेल व विकासाचे उद्दिष्ट आपण साध्य करू. या दृष्टीने विचार करून आपण महा स्ट्राईड प्रकल्पाचा शुभारंभ केला असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या निर्मितीपासून 2013 – 14 पर्यंत आपला जो जीएसडीपी होता तो 15 लाख कोटींपर्यंत पोहोचला. 2013 – 14 पासून ते 2019 – 20 पर्यंत तो 29 लाख कोटी पर्यंत पोहोचला. गेल्या पाच वर्षाचा जर विचार केला तर तो 45 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. या विकासाकडे आपण अभ्यासपूर्ण दृष्टीने जर पाहिले तर आपल्या लक्षात येईल की गत दहा वर्षात आपण 30 लाख कोटी रुपयांची वाढ साध्य केल्याचे निदर्शनास येते. याचा अर्थ महाराष्ट्राकडे विकासाची प्रचंड क्षमता असल्याचे स्पष्ट होते. विकासाच्या या टप्प्यामध्ये अजून एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. या एकूण 45 लाख कोटी जीएसडीपी मध्ये केवळ सात जिल्हे 50 टक्क्यांपर्यंत जीएसडीपी तयार करतात असे असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 2047 पर्यंत विकसित भारताचे तसेच राज्याचे ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे स्वप्न पूर्ण करायचे असल्यास राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचे विकासाच्या प्रक्रियेत योगदान गरजेचे आहे. राज्याच्या जीएसडीपीच्या वाढीमध्ये आपण कुठे आहोत हे जिल्हाधिकाऱ्यांनी पाहून आपल्या जिल्ह्याचे काय योगदान राहील याचा विचार केला पाहिजे असे मुख्यमंत्री म्हणाले.

आपल्याजवळ निधीची कमतरता नाही गरज आहे ती सुयोग्य डेटावर आधारित नियोजनाची. ज्या योजना परिपूर्ण आहेत त्या योजनांवर खर्च होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाची भूमिका ही सहकार्याची, शक्ती देण्याची आहे, असा विश्वास प्रशासनाकडून खाजगी क्षेत्राला मिळायला हवा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्याच्या प्रशासनात उत्तम क्षमता आहे, त्या क्षमतेला ओळखून सर्व जिल्हाधिकारी न्याय देतील हा प्रकल्प यशस्वी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मित्र या संस्थेच्या माध्यमातून हे स्वप्न साकार होण्यास मदत होईल, असे  मुख्यमंत्री पुढे म्हणाले.

नव्या महाराष्ट्राची उभारणी ‘मित्र’च्या माध्यमातून होईल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘मित्र’ ही संस्था महाराष्ट्राला विकासाकडे घेऊन जाणारा हा एक मोठा विकास रथ होऊ शकते.  ही चळवळ होऊ शकते. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यात सिंहाचा वाटा महाराष्ट्राला उचलायचा असून ‘मित्र’च्या माध्यमातून महाराष्ट्राची उभारणी होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

विकासामध्ये सर्वसमावेशकता असली पाहिजे. जिल्हा आणि तालुके हे विकासाची केंद्र होण्याची गरज असून सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून प्रशासनाला यातून अधिक गतिमान होता येईल. ‘मित्र’च्या माध्यमातून मागास जिल्ह्यांचा विकास होण्यास मदत होणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

विभागनिहाय जिल्हाधिकाऱ्यांचे सादरीकरण

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर राज्याच्या सहा विभागातील प्रत्येकी एका जिल्हाधिकाऱ्यांनी सादरीकरण केले. यात नागपूर विभागातून गडचिरोलीचे

जिल्हाधिकारी अविशांत पांडा, अमरावती विभागातून वाशिम जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस., संभाजीनगर विभातून धाराशिव जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार, नाशिक विभागातून जळगांवचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कोकण विभागातून ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पुणे विभागातून कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सादरीकरण केले.

०००

संपेल वीजबिलाचा अंक, मिळेल मागेल त्याला सौर पंप !

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये सध्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ या योजनेविषयी चर्चा सुरू आहे. राज्य सरकारने मागेल त्याला सौरपंप ही योजना आणली आहे. याअंतर्गत 9 लाख सौरपंप मंजूर करण्यात आले आहेत. आपण ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ ही योजना काय आहे, या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आणि लाभार्थी निवड कशी होणार, याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

मागेल त्याला सौर पंप योजना काय आहे?

शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध व्हावी, या हेतूने राज्य सरकारने मागेल त्याला सौर पंप योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीच्या क्षेत्रानुसार 3,5,7.5 अश्वशक्ती (HP) क्षमतेचे पंप दिले जाणार आहेत. सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप किंमतीच्या 10% रक्कम, तर अनुसूचित जाती जमातींच्या शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप किंमतीच्या 5 % रक्कम भरून सौर पंपाचा पूर्ण संच दिला जाणार आहे. उर्वरित रक्कम राज्य व केंद्र सरकारकडून अनुदान म्हणून दिली जाणार आहे.

पैशांच्या स्वरुपात पाहिल्यास साधारणपणे शेतकऱ्यांना भरावी लागणारी रक्कम पुढीलप्रमाणे असणार आहे.

3 HP क्षमतेचा पंप – 17,500 ते 18,000 रुपये

5 HP क्षमतेचा पंप – 22,500 रुपये

7 HP क्षमतेचा पंप – 27,000 रुपये

सौर कृषी पंपाची देखभाल व दुरूस्तीचा कालावधी 5 वर्ष राहणार आहे. या कालावधीत सौर कृषी पंप नादुरूस्त झाल्यास विनामुल्य दुरुस्ती करण्याची जबाबदारी अर्ज करताना शेतकरी जी एजन्सी निवडणार आहे, त्या एजन्सीची राहणार आहे. तसेच, वादळासारख्या नैसर्गिक आपत्तीत सौर पॅनेलचे नुकसान झाल्यास, त्याची चोरी किंवा तोडफोड झाली तर एजन्सीकडून विम्याचे संरक्षणही मिळणार आहे.

लाभार्थी निवड कशी होणार?

ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचा स्रोत (विहिर, शेततळे, बोअरवेल इ.) उपलब्ध आहे आणि ज्या ठिकाणी यापूर्वी पारंपरिक कृषी पंपाकरता वीज पुरवठा देण्यात आला नाही असे शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या क्षेत्रानुसार पंप दिले जाणार आहेत. त्यात, 2.5 एकरपर्यंत शेतजमीन असेल तर 3 HP क्षमतेचा पंप दिला जाईल. 2.5 ते 5 एकरपर्यंत शेतजमीन असेल तर 5 HP क्षमतेचा पंप दिला जाईल.  5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल तर 7.5 HP क्षमतेचा पंप देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना शेतीच्या क्षेत्रानुसार सौर पंप दिला जाणार आहे. शेतकऱ्यांना शेतीच्या क्षेत्रानुसार सौर पंप दिला जाणार आहे. याशिवाय, वैयक्तिक किंवा सामूहिक शेततळे, विहिर, बोअरवेल, बारमाही वाहणारी नदी/नाले यांच्या शेजारील शेतकरी या योजनेसाठी पात्र राहतील. तसेच अटल सौर कृषी पंप योजना-1, अटल सौर कृषी पंप योजना-2 आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेले शेतकरी देखील या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत.

अर्ज कुठे व कसा करायचा?

मागेल त्याला सौर पंप योजना राबवण्याची जबाबदारी महावितरण कंपनीची आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्ही कधीही अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी कोणतीही मुदत देण्यात आलेली नाही. ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो. ऑफलाईन अर्ज जवळच्या महावितरणच्या कार्यालयात जाऊन करता येतो. ऑनलाईन अर्ज महावितरणची अधिकृत वेबसाईट www.mahadiscom.in  वर शेतकरी स्वत: करू शकतात.

महावितरणची अधिकृत वेबसाईट

या वेबसाईटवर गेल्यास उजवीकडे ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यास नवीन पेज ओपन होईल. उजवीकडे वरती असलेल्या ‘भाषा’ पर्यायावर क्लिक करुन तुम्ही मराठी किंवा इंग्रजी भाषा निवडू शकता. इथल्या ‘लाभार्थी सुविधा’ पर्यायावर जाऊन ‘अर्ज करा’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर योजनेसाठीचा अर्ज तुम्हाला दिसेल. यात पुढील माहिती तुम्हाला भरायची आहे.

याआधीची कृषीपंप वीज जोडणी प्रलंबित असेल तर तो तपशील,अर्जदाराचा वैयक्तिक आणि जमिनीचा तपशील,अर्जदाराचा रहिवाशी पत्ता व ठिकाण, जलस्रोत आणि सिंचन माहिती, कृषी तपशील, विद्यमान पंप तपशील आवश्यक, तपशील बँक तपशील त्याखाली आलेले घोषणापत्र व्यवस्थित वाचून त्यासमोरील डब्ब्यात बरोबरची टिक करायची आहे.

आवश्यक कागदपत्रे

ही सगळी माहिती भरुन झाली की कागदपत्रे अपलोड करायची आहे. त्यात, सातबारा उतारा (विहीर/कुपनलिका शेतात असल्यास सातबारा उताऱ्यावर नोंद आवश्यक ) एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटादाराचे ना-हरकत प्रमाणपत्र 200 रुपयांच्या मुद्रांक कागदवर. आधारकार्ड प्रत, बँक पासबुक प्रत, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, अनुसुचित जाती/जमातीचे प्रमाणपत्र, ही सगळी माहिती भरुन झाली की, ‘अर्ज सादर करा’ या पर्यायावर क्लिक करायचं.

अर्ज केल्यानंतर पुढे काय?

अर्ज सादर केल्यानंतर अर्जदारास त्याच्या मोबाईल क्रमांकावर लाभार्थी क्रमांक व इतर तपशील पाठवला जाईल. हा लाभार्थी क्रमांक वापरुन या वेबसाईटवरील अर्जाची स्थिती या पर्यायावर क्लिक केल्यास, तुम्ही तुमच्या अर्जाची सद्यस्थिती पाहू शकता. सोबतच, तुम्हाला देय असलेली रक्कम भरू शकता आणि पुरवठादार एजन्सीची निवड करू शकता. एकूण 14 एजन्सीमार्फत ही योजना राबवण्यात येत आहे, त्यापैकी एक एजन्सी तुम्हाला निवडायची आहे. लाभार्थी अर्जदाराने अर्ज केला की तुम्ही निवडलेली एजन्सी आणि महावितरणचे कर्मचारी संयुक्तपणे तुमच्या शेतात करुन माहितीची पडताळणी करतात. सर्व्हे करतात. सर्व माहिती योग्य असेल तर मग तुम्हाला योजनेसाठी पात्र आहात की नाही ते ठरवलं जातं आणि मग सौरपंप इन्स्टॉलेशनचे काम सुरू होते. मागेल त्याला सौर पंप योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अडचणी आल्यास, सौर कृषी पंप नादुरुस्त झाल्यास, सौर कृषी पंपाच्या साहित्याची चोरी झाली किंवा नुकसान झाल्यास महावितरणचे अधिकृत टोल फ्री नंबरवर संपर्क करू शकता. ते नंबर असे आहेत…

1912 / 19120 किंवा 1800-212-3435 किंवा 1800-233-3435

०००

  • रणजितसिंह राजपूत जिल्हा माहिती अधिकारी, नंदुरबार

सूर्यकांत मांढरे यांच्या जुन्या मराठी सिनेमांचे मोफत प्रदर्शन – मंत्री ॲड. आशिष शेलार

कोल्हापूर, दि. २८ : येत्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून बाराशे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून, ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे यांचे जुने मराठी सिनेमे प्रेक्षकांना मोफत पाहण्याची संधी मिळणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.

कोल्हापूर येथे सांस्कृतिक कार्य विभागाकडून आयोजित ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष सांस्कृतिक कार्यक्रम ‘चित्रसूर्य’ पार पडला त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार अमल महाडिक, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई, विभीषण चवरे, सूर्यकांत मांढरे यांच्या कुटुंबातील सदस्य तसेच नागरिक व श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री ॲड. शेलार म्हणाले, कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात अशाच पद्धतीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. सूर्यकांत मांढरे यांचे जुने चित्रपट प्रखर राष्ट्रवाद, देव, देश, धर्म, समाज बांधणी, समाजातील विघटन वाद संपणे यांना प्रेरणा देणारे आहेत. यावेळी मांढरे यांच्या कुटुंबातील सदस्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.

‘चित्रसूर्य’ कार्यक्रमातून अभिनेते सूर्यकांत मांढरे यांच्या आठवणींना उजाळा

शाहू स्मारक, कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या संगीत कार्यक्रमातील संहिता लेखन आणि संशोधन डॉ. सुवर्णा चवरे यांनी केले तर, संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांनी केले. निवेदन सीमा देशमुख आणि श्रीरंग देशमुख यांनी केले. कार्यक्रमात मांढरे यांनी मराठी सिनेमात दिलेल्या योगदानाबाबत माहिती देण्यात आली.

सूर्यकांत यांच्यावर चित्रीत झालेली गाणी गायक मयूर सुकाळे, अभिषेक तेलंग, मधुरा कुंभार, शेफाली कुलकर्णी, पियुषा कुलकर्णी आणि कार्तिकी गायकवाड यांनी सादर केली.

०००

वसतिगृहातील विद्याथ्यांची प्रवेश क्षमता वाढविणार – मंत्री संजय शिरसाट

नागपूर, दि. २८: अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात प्रवेशासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यार्थी क्षमतेत वाढ करण्याची गरज लक्षात घेऊन वसतिगृहाची प्रवेश क्षमता वाढविण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश सामजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सामजिक न्याय मंत्री संजय शिरसाट याच्या अध्यक्षतेखाली विविध योजनांचा आढावा घेण्यात आला, त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी नागपूर विभागातील सर्व उपायुक्त व संशोधन अधिकारी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी उपस्थित होते.

बहुतांश वसतिगृहाची क्षमता ही केवळ शंभर विद्यार्थी आहे. त्यामुळे बऱ्याचदा विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येत नाही. त्याकरीता नवीन वसतिगृहाची निर्मिती ही कमीत कमी दिडशे ते दोनशे व जास्तीत जास्त हजार विद्यार्थी क्षमता असलेले निर्माण करा. वसतिगृह महाविद्यालयाच्या जवळपास निर्माण करा म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येईल, असे निर्देश त्यांनी दिले.

समाज कल्याण विभागाच्या योजनांचा आढावा घेतांना मंत्री शिरसाट म्हणाले की, वसतिगृहाचा लाभ हा सर्व विद्यार्थ्यांना घेता आला पाहिजे. जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया अधिक गतीमान करा. जात वैधता प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना वेळेत मिळण्यासाठी तत्परतेने कार्य करा. प्रत्येक अधिकाऱ्यांनी कार्य करतांना आपल्या विभागाविषयी व आपल्या कार्याविषयी चांगला संदेश लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येऊ नये असे आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे निर्देश विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिले.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानचे व्यवस्थापकीय संचालक सुरेंद्र पवार, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य डॉ. मंगेश वानखेडे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुकेशिनी तेलगोटे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

०००

क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कडबनवाडी येथे जिप्सी सफारी उपक्रमाचे उद्घाटन

पुणे, दि.२८: क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कडबनवाडी येथील गवताळ प्रदेशामध्ये जिप्सीमधून करण्यात येणाऱ्या सफारी उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. नागरिकांनी या सफारीचा लाभ घेण्याचे त्यांनी आवाहन केले.

यावेळी वनसंरक्षक आशिष ठाकरे, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहायक वनसंरक्षक मंगेश ताटे, इंदापुरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी भाग्यश्री ठाकूर आदी उपस्थित होते.

मंत्री भरणे यांच्या हस्ते पुणे वनविभागाकडून एकूण ३ जिप्सीधारकांना प्रत्येकी १ लाख रुपयाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले तसेच कडबनवाडी गवताळ प्रदेशाच्या लोगोचे अनावरणही करण्यात आले.

मंत्री भरणे यांनी कडबनवाडी येथील गवताळ प्रदेशाची स्वतः सफारी केली. नागरिकांनीही या सफारीचा आनंद घेऊन याबाबत इतर नागरिकांपर्यंत माहिती पोहचवावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी कडबनवाडी वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जलभूषण भजनदास पवार, सदस्य  दादासाहेब जाधव, सरपंच संगिता गावडे, उपसरपंच कडबनवाडी, अॅड. सचिन राउत, फ्रेंडस ऑफ नेचर क्लब, निमगाव केतकी व त्यांचे सदस्य आणि परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

०००

कोकण किनारपट्टीला ३.४ ते ३.८ मीटर उंच लाटांचा इशारा

मुंबई, दि. २८: भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे कोकण किनारपट्टीला 27 जून 2025 रोजीचे 5.30 पासून ते 29 जून 2025 रोजचे 11.30 पर्यंत 3.4 ते 3.8 मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर राज्यात पुढील 24 तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे.

राज्यात मागील 24 तासांमध्ये (28 जून 2025 रोजी सकाळपर्यंत) सिंधुदुर्ग जिल्ह्यात 19 मिमी पाऊस झाला आहे. तर पालघर  जिल्ह्यात 16.1,  रत्नागिरी जिल्ह्यात 15.2 मिमी, कोल्हापूर 15.2, आणि रायगड जिल्ह्यात 11.9 मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज 28 जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे  9.9, रायगड 11.9, रत्नागिरी 15.2,  सिंधुदुर्ग 19, पालघर 16.1, नाशिक 4.6, धुळे 9.4, नंदुरबार 1.6, जळगाव 1.9, अहिल्यानगर 0.4, पुणे 5.5, सोलापूर ०.१, सातारा ७.१,  सांगली ३, कोल्हापूर १५.२, छत्रपती संभाजीनगर ०.३, जालना ०.१, बीड १,धाराशिव ०.१, नांदेड २.१, परभणी ०.६, हिंगोली ०.४, बुलढाणा ०.१, अकोला ०.४, वाशिम ०.२, अमरावती ०.३, यवतमाळ ३.४, वर्धा १.६, नागपूर ८.२, बुलढाणा १६, गोंदिया २२, चंद्रपूर ४.४ आणि गडचिरोली जिल्ह्यात १०.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील फये (ता.भुदरगड) गावातील डोंगर उतारावर जमिनीस भेग पडली असून गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर गारगोटी – पाटगाव रस्ता प्रजिमा 52 किमी 5/400 चोपडेवाडी गावाजवळ डोंगरास मोठमोठ्या भेगा पडल्याचे आढळले आहे. सदर ठिकाण भूस्खलन प्रवण असून, संततधार पाऊस पडत असल्याने भूस्खलनाची शक्यता नाकारता येत नाही. सुरक्षा उपाय म्हणून प्रजिमा 52 रस्ता या ठिकाणी वाहतुकीस बंद करून वाहतूक पर्यायी मार्गे गारगोटी आकुर्डे करडवाडी कडगाव ममदापूर राज्यमार्ग क्रमांक 179 मार्गे वळवण्यात आली आहे.

धुळे जिल्ह्यात विज पडून एक प्राणी मृत्यू, नागपूर जिल्ह्यात रस्ते अपघातात नऊ प्राण्यांचा मृत्यू व 16 प्राणी जखमी झाले आहेत. पालघर जिल्ह्यात पाण्यात बुडून तीन व्यक्तींचा मृत्यू, यवतमाळ जिल्ह्यात पाण्यात पोहताना बुडून एक व्यक्तीचा मृत्यू आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरीत पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे.

०००

राजू धोत्रे/विसंअ/

ताज्या बातम्या

आषाढी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा

0
मुंबई, दि. ५ : "आषाढी वारी ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भक्तीची, वारकऱ्यांच्या शक्तीची, अध्यात्मातील शिस्तीची, समतेच्या विचारांवरील श्रद्धेची गौरवशाली परंपरा आहे. महाराष्ट्राच्या अध्यात्मिक, सांस्कृतिक समृद्धीची...

‘पर्यावरण वारी’तून विठ्ठल भक्तांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश गावोगावी घेऊन जावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पर्यावरणाची पूजा, रक्षण व संवर्धनाने जग वाचवण्याचा संतांचा संदेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह परिसरात वृक्षारोपण पंढरपूर, दि. 5 : ‘पर्यावरणाची वारी, पंढरपूरच्या दारी’ हा...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘एकात्मिक सनियंत्रण कक्ष’ व ‘हरित वारी’ ॲपचे उद्घाटन

0
पंढरपूर, दि. ५: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने पंढरपूर आषाढी वारीच्या संनियंत्रणासाठी शहर पोलीस ठाण्याच्या मागे स्थापन करण्यात आलेला एकात्मिक...

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पंढरपूर, दि.५:  सर्व संतांनी निसर्गप्रेम आणि स्वच्छतेचा संदेश दिला आहे, आपल्या नद्या, निसर्गांवर प्रेम करायला शिकवले आहे. त्यामुळे विठुमाऊलीच्या दर्शनाला येताना त्यांचा संदेश प्रत्यक्षात...

शेतीची उत्पादकता वाढविण्यावर शासनाचा भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पाच वर्षात कृषी क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक करणार पंढरपूर, दि. ५: शेतकऱ्याला शेती फायद्याची व्हावी, यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढावी असा...