शनिवार, ऑगस्ट 2, 2025
Home Blog Page 1537

विधानपरिषद कामकाज

संसर्गजन्य साथ आजाराच्या उपचारांसाठी नवीन रुग्णालयासाठी जागेचा शोध सुरू – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 24 : मुंबई शहरात संसर्गजन्य साथीच्या आजारावरील उपचारासाठी सध्या कस्तुरबा रुग्णालय उपलब्ध आहे. वाढत्या रुग्णांचा ताण कमी करण्यासाठी नवीन रुग्णालयासाठी जागेचा शोध सुरू असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.

विधान परिषदेत सदस्य विलास पोतनीस यांनी अर्धातास चर्चेच्या माध्यमातून म.वि.प. नियम ९२ अन्वये प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, ज्या ठिकाणी आरोग्य सुविधांचा अभाव आहे, तिथे आरोग्य सुविधा देण्याची आपली जबाबदारी आहे. त्यामुळे कस्तुरबा रुग्णालयासारखेच आणखी एका रुग्णालयाची गरज लक्षात घेऊन कार्यवाही सुरू आहे. जिथे जागा उपलब्ध असेल त्यापैकी योग्य जागेचा पर्याय शोधला जाईल.

या चर्चेत सदस्य सुनील शिंदे, सचिन अहिर, महादेव जानकर यांनी सहभाग घेतला.

000

दीपक चव्हाण/विसंअ/

चुनाभट्टी येथील टाटानगर वसाहतीतील १२३ कुटुंबाचे शिवशाही योजनेअंतर्गत पुनर्वसन करणार उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 24 : चुनाभट्टी येथील टाटानगर वसाहतीमधील १२३ कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात येणार असून शिवशाही योजनेतंर्गत रिक्त असलेली घरे या कुटुंबांना उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.

टाटानगर इमारत वसाहतीची तत्काळ देखभाल, दुरुस्ती बाबत कार्यवाही व उपाययोजना बाबत म. वि. प.नियम ९२ अन्वये विधान परिषद सदस्य सचिन अहीर यांनी सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीवर चर्चा उपस्थित केली होती.

उद्योग मंत्री श्री.सामंत म्हणाले की, चुनाभट्टी येथील टाटानगर वसाहतीमधील १२३ कुटुंबांच्या पुनर्वसनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली होती. त्यानुसार शिवशाही योजनेमध्ये उपलब्ध असलेली घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. चुनाभट्टी येथील टाटानगर वसाहतीच्या विकासासाठी महानगरपालिकेचा अथवा इतर कोणाचाही प्रस्ताव आलेला नाही. मुंबई महापालिकेतंर्गत उपकर प्राप्त इमारतींच्या प्रश्नाबाबत मुंबईतील लोकप्रतिनिधींची बैठक बोलावून सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री श्री. सामंत म्हणाले.

या चर्चेत विधानपरिषद सर्वश्री सदस्य सुनील शिंदे, महादेव जानकर यांनी सहभाग घेतला.

******

संरक्षण विभागाशी संबंधित विविध प्रश्नांसंदर्भात लवकरच बैठक – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. २४ : संरक्षण खात्याशी संबंधित राज्यातील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत राज्यातील कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल. तसेच केंद्रीय संरक्षण मंत्री यांची भेट घेऊन या प्रश्नांसंदर्भात पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.

विधानपरिषदेत सदस्य उमा खपरे यांनी अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून म.वि.प. नियम ९२ अन्वये प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री.सामंत म्हणाले की, संरक्षण विभागाने अनेक ठिकाणी संरक्षित ना – विकास क्षेत्र (रेड झोन) जाहीर केले आहेत. त्यामुळे त्या भागातील विकास योजना राबविताना अडचणी जाणवतात. देहू रोड ( जि. पुणे) येथील दारूगोळा कारखान्याच्या या रेड झोन मुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना अडचणी जाणवत आहेत. त्यामुळे या विषयावरही स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी यांच्याबरोबर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे लवकरच बैठक घेतील, अशी माहिती त्यांनी दिली.

या चर्चेत सदस्य विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, महादेव जानकर यांनी सहभाग घेतला.

0000

वर्षा आंधळे/विसंअ

 

मुंबईतील पाणी गळती रोखण्यासाठी उपाययोजना करणार – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. २४ : मुंबई शहराला नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी पाणी गळती रोखण्याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील. आतापर्यंत ३ वर्षात ९ हजार २८४ अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत, तर ९६ हजार ४७० ठिकाणची पाणी गळती दुरुस्ती करण्यात आल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.

सदस्य राजहंस सिंह यांनी अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून म.वि.प. नियम ९२ अन्वये प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, मुंबई शहराला सध्या तानसा, मोडकसागर, अपर वैतरणा, मध्य वैतरणा आणि भातसा धरणातून पाणीपुरवठा होतो. याशिवाय, गारगाई, पिंजाळ आणि दमणगंगा या तीन प्रकल्पाच्या माध्यमातून येत्या काळात शहराला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. या तीनही प्रकल्पाची कामे वेळेत पूर्ण करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

या चर्चेत विलास पोतनीस, महादेव जानकर, अनिकेत तटकरे यांनी सहभाग घेतला.

0000

सूरजागड येथील लोह उत्खनन प्रकल्पात स्थानिकांना रोजगार देण्यास प्राधान्य – बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. २४ : सूरजागड, जि. गडचिरोली येथे सुरू असलेल्या लोह उत्खनन प्रकल्पात स्थानिक लोकांना प्राधान्याने रोजगार दिला जात आहे, असे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. विधानपरिषदेत म. वि. प.नियम ९२ अन्वये झालेल्या चर्चेवर उत्तर देताना ते बोलत होते.

सूरजागड येथे गेले काही वर्षापासून लोह उत्खनन प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पामध्ये अवैध उत्खनन सुरू आहे. तसेच स्थानिक लोकांना रोजगार मिळत नाही. ज्या कंपनीद्वारे येथे उत्खनन होत आहे, तिथे संगणक प्रणालीद्वारे डॅशबोर्ड तयार करणे, जीपीएस आणि सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीने उत्खननाचे कार्य  वैधरित्या केले जावे, अशी चर्चा म. वि. प.नियम ९२ अन्वये सदस्य अभिजित वंजारी यांनी सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींवर उपस्थित केली होती.

मंत्री श्री.भुसे म्हणाले की, सुरजागड – एटापल्ली येथे 1993 पासून लोहखनिज उत्खनन केले जाते. मेसर्स लाईट मेटल्स ॲन्ड एनर्जी लिमिटेड या कंपनीला २००७ मध्ये काम देण्यात आलेले आहे. लोहखनिज उत्खनन ज्या कंपनीद्वारे सुरू आहे, त्यांच्या पाच वर्षे कामांची रूपरेषा ठरलेली आहे. 2008 -2009 ते 2020-21 मध्ये 4 लाख 49 हजार 463 टन इतके लोह उत्खनन करण्यात आले आहे, तर 2021,22 आणि 23 या वर्षात 57 लाख 59 हजार 528 टन इतके लोह खनिज उत्खनन करण्यात आले आहे. या खाणीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती केली जात आहे. 3209 लोकांना रोजगार प्राप्त झालेला आहे.

घुगुसाच्या खाणीत 900 टन दर दिवसाला उत्खनन होते. तिथे 1 हजार लोकांना रोजगार उपलब्ध होतो. या प्रकल्पाची क्षमता वाढवून  1300 टन रोज उत्खनन होईल. या ठिकाणी दोन हजार रोजगार वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. घोणसरी प्रकल्प एप्रिल-मे महिन्यामध्ये कार्यान्वित होईल. या प्रकल्पाच्या माध्यमातून 1500 लोकांना रोजगार उपलब्ध होईल. या ठिकाणी सुरू असलेल्या खाणीमध्ये 50 टक्के स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, यासाठी शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक प्रशासनाने कार्यवाही केली आहे. शासनाला या खाणी मधून स्वामीत्वधन पोटी (रॉयल्टी पोटी) 390.10 लाख रुपये मिळाले आहेत. डी. एम. एम. फंडा साठी 107.50 कोटी  निधी प्राप्त झाला आहे. एन मेट या फंडासाठी 6.42 कोटी मिळाले आहेत. सी एस आर मधून 6.25 कोटींची कामे करण्यात आलेली आहेत. या खाण प्रकल्पामध्ये कोणत्या प्रकारच्या त्रुटी असतील, तर त्याच्यावर कार्यवाही करण्यात येईल, असेही  मंत्री श्री. भुसे म्हणाले.

०००

संध्या गरवारे/विसंअ

सैन्य दलातील तीन पदक विजेत्यांना राज्य शासनातर्फे अनुदान मंजूर

मुंबई, दि. 24 :- महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत सैन्यातील 16 प्रकारच्या शौर्यपदक आणि सेवापदकधारकांना राज्य शासनामार्फत अनुदान देण्यात येते.

राष्ट्रपती सचिवालयाच्या आदेशाप्रमाणे मुंबई उपनगर येथील एअर कमोडोर देवेंद्र पुरुषोत्तम हिराणी यांना दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी शौर्यासाठी युद्ध सेवापदक प्रदान करण्यात आले आहे. त्यामुळे शासन निर्णयाप्रमाणे श्री.हिराणी यांना 24 लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे श्री.हिराणी यांना दिनांक 26 जानेवारी 2015 विशिष्ट सेवापदक प्रदान करण्यात आले होते. त्याकरिता श्री.हिराणी यांना रूपये 34 हजार अनुदान देण्यात येणार आहे.

मुंबई उपनगर येथील  मेजर अनुज वीर सिंह यांना दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी शौर्यासाठी सेना पदक प्रदान करण्यात आले आहे. त्यामुळे शासन निर्णयानुसार श्री.सिंह यांना 12 लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गडचिरोली येथील मेजर अक्षय प्रकाशराव पोतराजे यांना दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी मेन्शन इन डिस्पॅच हे शौर्य पदक प्रदान करण्यात आले आहे. त्यामुळे शासन निर्णयानुसार श्री.पोतराजे यांना 6 लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपरोक्त तिन्ही पदक धारकांच्या अनुसाठीची 50 टक्के रक्कम शासकीय अनुदानातून तर उर्वरित 50 टक्के रक्कम मुख्यमंत्री सहायता निधी (कारगिल) निधीतून घेण्यात आलेल्या व राष्ट्रीयीकृत बँकेत सद्यस्थितीत गुंतविण्यात आलेल्या रकमेच्या व्याजातून अदा करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णयाद्वारे कळविले आहे.

000

संजय ओरके/विसंअ

महाराष्ट्र शासनाचे ११ वर्ष मुदतीचे ३ हजार कोटींचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. 23 : राज्य शासनाच्या 11 वर्षे मुदतीच्या एकूण 3 हजार कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. ही रोखे विक्री शासनाच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येणार आहे. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा वापर शासनाच्या विकास कार्यक्रमासंबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाणार आहे, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

या कर्ज उभारणीस केंद्र शासनाची मान्यता घेण्यात आली असून या शासकीय रोख्यांची विक्री ही भारतीय रिझर्व बँक, फोर्ट, मुंबईद्वारे दि. 16 मे 2019 च्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचनेमध्ये निर्देशित केलेल्या कार्यप्रणालीनुसार लिलावाने करण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या सर्वसाधारण अधिसूचनेमधील अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल.

भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे दिनांक 28 मार्च, 2023 रोजी त्यांच्या फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात हा लिलाव आयोजित करण्यात येईल. लिलावाचे बीडस् दिनांक 28 मार्च, 2023 रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बीडस् संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. अस्पर्धात्मक बीडस् संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबईतर्फे त्यांच्या संकेतस्थळावर त्याचदिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान दिनांक 29 मार्च, 2023 रोजी करण्यात येईल.

यशस्वी झालेल्या बीडर्सकडून दिनांक 29 मार्च, 2023 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फोर्ट, मुंबई यांच्या कार्यालयात रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील. कर्जरोख्याचा कालावधी 11 वर्षांचा असेल.

रोख्यांचा कालावधी 29 मार्च, 2023 पासून सुरु होईल. कर्जरोख्याची परतफेड दिनांक 29 मार्च, 2034 रोजी पूर्ण किंमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यावरील दरसाल दर शेकडा कूपन दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दि. 29 सप्टेंबर व 29 मार्च रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम 1949 खालील कलम 24 अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाच्या 23 मार्च, 2023 रोजीच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे.

००००

महाराष्ट्र शासनाचे नऊ वर्ष मुदतीचे ३ हजार कोटींचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. 23 : राज्य शासनाच्या नऊ वर्षे मुदतीच्या एकूण 3 हजार कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. ही रोखे विक्री शासनाच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येणार आहे. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा वापर शासनाच्या विकास कार्यक्रमासंबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाणार आहे, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

या कर्ज उभारणीस केंद्र शासनाची मान्यता घेण्यात आली असून या शासकीय रोख्यांची विक्री ही भारतीय रिझर्व बँक, फोर्ट, मुंबईद्वारे दि. 16 मे 2019 च्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचनेमध्ये निर्देशित केलेल्या कार्यप्रणालीनुसार लिलावाने करण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या सर्वसाधारण अधिसूचनेमधील अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल.

भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे दिनांक 28 मार्च, 2023 रोजी त्यांच्या फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात हा लिलाव आयोजित करण्यात येईल. लिलावाचे बीडस् दिनांक 28 मार्च, 2023 रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बीडस् संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. अस्पर्धात्मक बीडस् संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबईतर्फे त्यांच्या संकेतस्थळावर त्याचदिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान दिनांक 29 मार्च, 2023 रोजी करण्यात येईल.

यशस्वी झालेल्या बीडर्सकडून दिनांक 29 मार्च, 2023 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फोर्ट, मुंबई यांच्या कार्यालयात रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील. कर्जरोख्याचा कालावधी नऊ वर्षांचा असेल.

रोख्यांचा कालावधी 29 मार्च, 2023 पासून सुरु होईल. कर्जरोख्याची परतफेड दिनांक 29 मार्च, 2032 रोजी पूर्ण किंमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यावरील दरसाल दर शेकडा कूपन दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दि. 29 सप्टेंबर व 29 मार्च रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम 1949 खालील कलम 24 अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाच्या 23 मार्च, 2023 रोजीच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे.

००००

न्यूज १८ लोकमतच्या विविध क्षेत्रातील ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कारांचे वितरण; जीवन गौरव पुरस्कार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान

मुंबई, दि. 23 : न्यूज 18 लोकमत वृत्त वहिनीच्यावतीने विविध क्षेत्रातील नामवंताना महाराष्ट्र गौरव आणि जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा सन्मान सोहळा यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे पार पडला. सोहळ्यात जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ व अध्यात्मिक गुरू तथा जीवन विद्या मिशनचे प्रल्हाद वामन पै यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. सोहळ्याला व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील, टिव्ही 18 चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौल उपस्थित होते.

याप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, हिंदी चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन सुपरस्टार आहेत. त्याप्रमाणेच मराठी चित्रपटांचे अशोक सराफ सुपरस्टार आहेत. त्यांनी साकारलेल्या भूमिका अजूनही जिवंत आहेत. त्यांच्या कार्याचा हा सत्कार आहे. त्यांचे मराठी चित्रपट सृष्टीसाठी खूप मोठे योगदान आहे. प्रल्हाद  पै यांचे आध्यात्मिक क्षेत्रातील कार्य खूप मोठे आहे. त्यांनी सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी आपली ताकद पणाला लावली आहे. समाजात अनेक व्यक्तिमत्व समाजाच्या कल्याणासाठी झटत असतात. मात्र त्यांचे कार्य समाजासमोर येत नाही.

श्री. फडणवीस पुढे म्हणाले, न्यूज 18 लोकमत वृत्तवाहिनीने महाराष्ट्र गौरव पुरस्काराच्या माध्यमातून अशी रत्ने शोधून समोर आणली.  अशा व्यक्तींचा सत्कार करणे हे महत्त्वाचे कार्य केले.

विधानसभा अध्यक्ष श्री. नार्वेकर म्हणाले, ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याला व्यासपीठावर सहभागी होता आले. हे माझे भाग्य समजतो. पुरस्कार प्राप्त सर्वांचे कार्य प्रेरणादायी आहे. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते विशेष पुरस्कार प्रदान

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते न्यूज १८ लोकमत वृत्त वहिनीच्या महाराष्ट्र गौरव विशेष पुरस्कार गायिका आर्या आंबेकर, अभिनेत्री अमृता खानविलकर, आशिष पाटील यांना प्रदान करण्यात आला. यावेळी दिग्दर्शक प्रसाद ओक व्यासपीठावर उपस्थित होते.

००००

निलेश तायडे/ससं/

हे आहेत महाराष्ट्राचे ‘महाराष्ट्र भूषण’…

विशेष लेख

गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमात 2021 रोजीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार पद्मविभषण आशा भोसले यांना प्रदान करण्यात येणार आहे. आतापर्यंत 19 जणांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.. तर मग जाणून घेऊया कोण आहेत महाराष्ट्राचे महाराष्ट्र भूषण’..

महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराची ओळख आहे. महाराष्ट्रात किमान 15 वर्षे वास्तव्यास असलेल्या आणि आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला हा सर्वोच्च बहुमान दिला जातो. आरोग्यसेवा, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान आणि समाजसेवा या  क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या व्यक्तीला सर्वोच्च अशा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने राज्य शासनाच्या वतीने गौरविण्यात येते.  10 लाख रुपये रोख, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचे स्वरुप होते. आता या पुरस्काराची रक्कम वाढविण्यात आली असून पुरस्कार रक्कम 25 लाख रुपये करण्यात आली आहे.

  1. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पु.ल.देशपांडे

साहित्यक्षेत्रातील भरीव योगदानाबददल महाराष्ट्र शासनाने 1997 साली पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना प्रदान करण्यात आला. मराठी लेखक, नाटककार, नट, कथा आणि पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांची ख्याती होती. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना अवघा महाराष्ट्र पु.ल.देशपांडे म्हणूनच ओळखतो.

  1. लता दीनानाथ मंगेशकर

आपल्या सर्वांना परिचित असलेल्या दीदी आणि भारतीय चित्रपट संगीताला अतिशय वरच्या दर्जावर नेण्याचं काम लता मंगेशकर यांच्या असामान्य आवाजाने केले. म्हणूनच भारतीय चित्रपट संगीतात लता मंगेशकर यांचे स्थान अजोड आहे. संगीत क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबददल महाराष्ट्र शासनाने कला आणि संगीत क्षेत्रातील योगदानासाठी सन 1998 मध्ये लता दीनानाथ मंगेशकर यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दैऊन गौरव केला. केंद्र सरकारनेही 2001 साली लता मंगेशकर यांचा भारतरत्न देऊन सन्मान केला आहे.

  1. डॉ.विजय पांडुरंग भटकर

परम महासंगणकाचे जनक अशी ओळख असलेले डॉ. विजय पांडुरंग भटकर हे महाराष्ट्रातील मुरंबा या गावचे.  डॉ. विजय भटकर यांनी माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळविली. भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्वल त्यांना पद्मश्री हा सर्वोच्च नागरी सन्मान 2000 मध्ये प्रदान करण्यात आला आहे. तत्पूर्वी सन 1999 मध्ये विज्ञान क्षेत्रातील भरीव योगदानासाठी “महाराष्ट्र भूषण“ हा महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च सन्मानाही डॉ.भटकर यांना प्रदान करण्यात आला आहे.

  1. सुनील मनोहर गावस्कर

सुनील मनोहर गावसकर यांना आपण ओळखतो ते भारताचा महान क्रिकेटर म्हणून.   फलंदाजीतल्या तंत्रशुद्धतेचा अंतिम शब्द म्हणजे सुनील गावसकर, एकाग्रतेचा महामेरू म्हणजे सुनील गावसकर. कसोटी सामन्यांच्या रणांगणात दहा हजार रन्सचा पल्ला ओलांडणारा पहिला फलंदाज. सर्वाधिक कसोटी शतकांचा विक्रम जवळजवळ वीस वर्षे मिरवणारा फलंदाज. सन 2000 मध्ये सुनील गावस्कर यांना त्यांच्या क्रीडाक्षेत्रातील योगदानासाठी महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

  1. सचिन रमेश तेंडुलकर

गेली जवळपास अडीच दशके भारतासह जगातील कोट्यवधी क्रिकेट रसिकांना आपल्या खेळाने परमानंद देणाऱ्या सचिन रमेश तेंडुलकर यांना क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल राज्य शासनाचा सन 2001 चा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यात आला. 2014 मध्ये सचिन रमेश तेंडुलकर यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

  1. पं.भीमसेन गुरुराज जोशी

लहानपणापासूनच संगीताचा ओढा असलेल्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांना महाराष्ट्र शासनाने सन 2002 मध्ये संगीत क्षेत्रात बहुमूल्य योगदान दिल्याबद्दल महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दिला. 60 वर्षाहून अधिक काळ संगीतात योगदान देणाऱ्या पंडितजींनी त्यांच्या गुरुजींच्या नावाने सवाई गंधर्व महोत्सव सुरु केला.  आज राज्य शासन पंडित भीमसेन जोशी यांच्या नावाने संगीत शिष्यवृत्ती देते.पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने 2008 मध्ये गौरविण्यात आले आहे.

  1. डॉ.अभय बंग आणि डॉ.राणी बंग

आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ.अभय बंग आणि राणी बंग यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे. समाजप्रबोधन या क्षेत्रात बहुमूल्य योगदान देण्यासाठी 2003 साली या दाम्पत्याला महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने गौरविण्यात आले. गडचिरोलीसारख्या मागास भागात जाऊन तेथील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी काम करणाऱ्या या डॉक्टर्सनी केलेल्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय मेडिकल जर्नल्सना घ्यावी लागली आहे.डॉ. अभय आणि राणी बंग यांचं काम एखाद्या रुग्णालयापुरतं सीमित न राहता, खेड्यापाड्यांत, देशा-परदेशात उपयुक्त ठरत आहे यातच त्यांच्या कामाचे यश आहे.

  1. डॉ.मुरलीधर देवीदास ऊर्फ बाबा आमटे

मुरलीधर देवीदास आमटे यांना त्यांच्या घरातच त्यांना लहानपणी बाबा म्हटले जायचे आणि एका क्षणी कुष्ठरोग्यांसाठी जीवन वेचण्याचा निर्णय घेऊन हा मुरलीधर लाखो कुष्ठरोग्यांना आपलासा वाटणारा ‘बाबा’ झाला. अनेकांच्या जीवनात चैतन्य निर्माण करणारे बाबा सदैव आपल्या कर्तव्य पथावर एका कर्मवीर योद्ध्याप्रमाणे अथक लढले. कुष्ठरोग्यांच्या सेवेचे व्रत अंगीकारले. 2004 साली महाराष्ट्र शासनाने समाज प्रबोधनासाठी डॉ. मुरलीधर आमटे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला.

  1. डॉ.रघुनाथ अनंत माशेलकर

अतिशय कष्टाने, प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत विज्ञान व संशोधन क्षेत्रातील अत्युच्च पदे डॉ. माशेलकरांनी यशस्वीपणे भूषविली आहेत. भारतातील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी बौद्धिक क्षमतेच्या आधारे ज्ञानाचे अर्थपूर्ण नियोजन करणारे डॉ.रघुनाथ माशेलकर हे भारतातील आघाडीचे शास्त्रज्ञ आहेत. यांनी भारताच्या विविध विज्ञान व तंत्रज्ञानविषयक धोरणांना योग्य आकार व दिशा देण्याचे महत्कार्य केले आहे. 2005 मध्ये विज्ञान क्षेत्रात अमूल्य योगदान देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने डॉ. माशेलकर यांना महाराष्ट्रभूषण देऊन त्यांचा सन्मान केला.

  1. रतन टाटा

राज्याच्या विकासात टाटा समूहाचे मोठे योगदान आहे. टाटा समूहाचे मानद अध्यक्ष आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्त्व असलेल्या रतन टाटा यांना उदयोग क्षेत्रातील योगदान मोठे असून त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र शासनाने 2006 साली महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दिला.

  1. रामराव कृष्णराव ऊर्फ रा.कृ.पाटील

भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांनी आय.सी.एस. सेवेचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी मध्य प्रांतात आमदार म्हणून काम केले होते. तसेच विविध खात्यांचे मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. जवाहरलाल नेहरूंनी स्थापन केलेल्या पहिल्या प्लॅनिंग कमिशनचे श्री. पाटील सदस्य होते. ऐतिहासिक नागपूर करारावर त्यांनी सही केली होती. त्यांनी स्वतःला सक्रिय राजकारणातून निवृत्त होऊन समाजसेवेला वाहून घेतले होते. त्यांचे वयाच्या 99व्या वर्षी, 31 मे, 2007 रोजी निधन झाले. त्यांना त्यांच्या मृत्यूनंतर 2007 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला.

  1. नारायण विष्णू ऊर्फ नानासाहेब धर्माधिकारी

नारायण विष्णु धर्माधिकारी ऊर्फ नानासाहेब धर्माधिकारी हे समर्थ रामदासांच्या दासबोधाचे निरूपणकार होते. त्यांनी आयुष्यभर अध्यात्म, शिक्षण, आरोग्य, समाजप्रबोधन व व्यसनमुक्ती क्षेत्रांत निरलसपणे कार्य केले. श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांचे जगभरात लाखो अनुयायी आहेत. समाजप्रबोधनासाठी 2008 साली महाराष्ट्र शासनातर्फे श्री. धर्माधिकारी यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. कै. नानासाहेब धर्माधिकारी यांचे सुपुत्र आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

  1. मंगेश केशव पाडगावकर

मंगेश केशव पाडगांवकर  यांना 2008 साली महाराष्ट्र शासनाने साहित्य क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबददल महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला. सलाम या कवितासंग्रहासाठी त्यांना 1980 साली साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली प्रेम म्हणजे प्रेम असतं ही कविता खूप गाजली. साठहून अधिक वर्षांच्या लेखन कारकिर्दीत पाडगावकरांनी इतर भाषांतील साहित्यकृतींचे अनुवादही भरपूर केले.

14.सुलोचना लाटकर

मराठी-हिंदी सिनेमांतून सोज्वळ भूमिका रंगवणा-या अभिनेत्री सुलोचना यांचा चेहरा आजही प्रेक्षक विसरलेले नाहीत. पासष्टहून अधिक वर्षाच्या कारकिर्दीत कलाकार-दिग्दर्शक-तंत्रज्ञांच्या अनेक पिढय़ांबरोबर त्यांनी काम केले आहे. मराठी चित्रपटात बहुमूल्य योगदान देणाऱ्या सुलोचना लाटकर यांना 2009 मध्ये महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रभूषण हा पुरस्कार दिला.

15.डॉ.जयंत विष्णू नारळीकर

जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ, ‘विज्ञाननिष्ठा’ हे मूल्य भारतात रूजवण्याचा सातत्याने प्रयत्न करणारे विज्ञान-प्रसारक आणि अभिमानाने मराठीत लेखन करणारे  ज्येष्ठ वैज्ञानिक-लेखक अशी डॉ. जयंत नारळीकर यांची ओळख आहे. विज्ञानातील सिद्धांत आपल्या लेखणीतून, व्याख्यानातून त्यांनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले. ‘आकाशाशी जडले नाते’ हे त्यांचे पुस्तक विशेष प्रसिद्ध आहे. मराठी विज्ञानकथेचे ते प्रणेते आहेत. 2010 मध्ये विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दिला.

  1. डॉ.अनिल पुरुषोत्तम काकोडकर

बदलत्या भारताची वेगाने वाढणारी ऊर्जेची गरज अणुशक्तीच पुरी करू शकेल, असा दृढ विश्वास असणाऱ्या डॉ. अनिल काकोडकर यांना भारताच्या अणु-कार्यक्रमाचे आघाडीचे शिलेदार मानले जाते. भारताच्या अणुशक्ती आयोगाचे दहा वर्षांहून अधिक काळ डॉ. काकोडकर अध्यक्ष होते. 2011 मध्ये डॉ. काकोडकर यांना विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यात आला.

  1. बाबासाहेब पुरंदरे

बळवंत मोरेश्वर ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे हे मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार आणि वक्ते आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन केले आहे.  पुरंदर्‍यांची दौलत, पुरंदऱ्यांची नौबत, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड, व राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांचे आजवर प्रकाशित झालेले साहित्य आहे. शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनी अथक संशोधनातून व परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सर्वसामान्यांपुढे ‘जाणता राजा’च्या माध्यमातून नेण्याचे काम शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले आहे.2015 मध्ये साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

  1. आशा भोसले

आशा भोसले यांनी चित्रपट गायनाची सुरुवात ‘माझा बाळ’ या चित्रपटातून केली. आपल्या सुमधूर स्वरांनी संगीत क्षेत्रात चौफेर कामगिरी आणि गेली सात दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. विविध छटा असलेली अनेक प्रकारची गाणी अजरामर करणाऱ्या आशा भोसले यांना संगीत आणि नाटकाचा वारसा लाभला.  बॉलीवूडध्ये तब्बल 1000 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी प्ले-बॅक सिंगर म्हणून आवाज दिला आहे. बॉलीवूडमध्ये आशाताईंना ‘मेलडी क्वीन’ म्हणून ओळखले जाते. आशाताईंनी आत्तापर्यंत 11,000 पेक्षा जास्त गाणी गायली असून आतापर्यंत त्यांनी 20 पेक्षा जास्त भाषांमध्ये गाणी गायली आहेत.सन 2021 या वर्षीचा पुरस्कार श्रीमती आशा भोसले यांना जाहीर झाला असून 24 मार्च 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.

  1. आप्पासाहेब धर्माधिकारी

आप्पासाहेब धर्माधिकारी, जन्मनाव दत्तात्रेय नारायण, हे महाराष्ट्रातील समाजसेवक आहेत. नाना धर्माधिकारींच्या पावलावर पाऊल टाकत, अप्पासाहेब महाराष्ट्रात अनेक वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, निशुल्क वैद्यकीय शिबीर, रोजगार मेळावे, स्वच्छता मोहिम, अंधश्रद्धा निर्मुलन, व्यसनमुक्ती केंद्र इत्यादी कार्यक्रमांच्या आयोजनास कारणीभूत ठरले. 2014 मध्ये डॉ. डी वाय पाटील विद्यापीठ, नेरुळने त्यांना विद्यालंकार ही मानद पदवी देऊन सन्मानित केले. 2017 मध्ये, ते चौथा, पद्मश्रीने सन्मानित झाले. सन 2022 या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर करण्यात आला आहे.

 

  • वर्षा फडके– आंधळे, विभागीय संपर्क अधिकारी (सांस्कृतिक कार्य)

महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे पुरस्कार प्रदान; साहित्यिक, लेखक पुरस्काराने सन्मानित

मुंबई, दि. २३ : हिंदी साहित्य क्षेत्रात मोलाचे कार्य व भरीव योगदान देणाऱ्या साहित्यिक आणि उत्कृष्ट वाड्मय निर्मिती करणाऱ्या लेखकांना महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सांस्कृतिक कार्य विभागाच्या अखत्यारित असलेल्या महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे तीन वर्षांचे पुरस्कार आज प्रदान करण्यात आले.

बांद्रा येथील रंगशारदा नाट्यमंदिरात आयोजित हा पुरस्कार प्रदान सोहळा आमदार आशिष शेलार, आमदार राजहंस सिंह, अभिनेता आशुतोष राणा, मनोज जोशी यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक आणि लेखकांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला.

यावेळी सन २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३ या तीन वर्षातील विविध साहित्य पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यात अखिल भारतीय सन्मान जीवनगौरव पुरस्कारांतर्गत महाराष्ट्र भारती अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार डॅा. विकास दवे, चित्रा मुद्गल, डॉ. कन्हैया सिंह यांना तर डॉ. राममनोहर त्रिपाठी अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार डॉ. अनिल मिश्र, आशुतोष राणा, सुधीर पराडकर यांना प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी राज्यस्तरीय सन्मान जीवनगौरव पुरस्कारासह विविध प्रकारातील पुरस्कार प्रदान करून पुरस्कार्थींना सन्मानित करण्यात आले.

०००

पवन राठोड/ससं/

लातूर विभागात सहा हजारांहून अधिक आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तकांना वाढीव मानधनाचा लाभ

लातूर, दि.23 (विमाका) : राज्याचे वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच राज्याचा 2023-24 सालचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक यांच्या मासिक मानधनात दीड हजार रूपयांची वाढ करण्यात आली. लातूर विभागातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील एकूण 6 हजारांहून अधिक आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तकांना या वाढीव मानधनाचा लाभ होईल.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक कार्यरत आहेत. आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था, ग्रामस्थ, समाजातील अन्य घटक यामध्ये आरोग्यासंदर्भात जागरूकता, सुसंवाद, समन्वय, प्रोत्सहन, वाटाघाटी निर्माण करण्याच्या दृष्टीने आशा स्वयंसेविका महत्त्वपूर्ण असा सामाजिक दुवा म्हणून काम करतात. स्थानिक रहिवासी असल्याने गावच्या आरोग्यविषयक अडचणी सोडवणुकीसाठी त्या योगदान देतात.

आरोग्य संस्थेतील प्रसुतीत वाढ करणे, मलेरिया, क्षयरोग, साथीचे रोग आदी उपचारासाठी मदत करणे, मोफत असलेल्या संदर्भ सेवेचा प्रचार करणे, कुटुंब कल्याणाचा प्रचार, गर्भनिरोधकाचे वाटप, किरकोळ आजारांवर उपचार, माता व बाल आरोग्यविषयक प्रबोधन, जसे की प्रसुतीपूर्व तपासणी, प्रसूती पश्चात तपासणी, बालकांचे लसीकरण आदी कामे करणे. जन्म मृत्यू नोंदणीमध्ये मदत करणे, ग्राम आरोग्य पोषण दिनामध्ये सहकार्य करणे इत्यादी कामे आशा स्वयंसेविका करतात. त्यांच्या कामावर देखरेख गट प्रवर्तक ठेवतात, म्हणून आरोग्य यंत्रणेत महत्त्वाचा दुवा म्हणून आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक यांच्याकडे पाहिले जाते.

राज्यात सुमारे 81 हजार आशा स्वयंसेविका व 3 हजार 500 गट प्रवर्तक आहेत. त्यापैकी लातूर विभागात एकूण 5 हजार 828 आशा स्वयंसेविका, 287 गट प्रर्वतक आहेत. लातूर जिल्ह्यात 01 हजार 906, नांदेड 01 हजार 645, उस्मानाबाद 01 हजार 207, हिंगोली जिल्ह्यात 01 हजार 70 आशा स्वयंसेविका आहेत. लातूर, नांदेड प्रत्येकी 89 तर उस्मानाबाद 61 आणि हिंगोलीत 48 गट प्रर्वतक आहेत. यापूर्वी आशा स्वयंसेविकांना 3 हजार 500 रूपये मानधन होते, ते आता अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे 05 हजार रूपये झाले. तर गट प्रवर्तकांना 04 हजार 700 रूपयांवरून 06 हजार 200 रूपये मानधन झाले आहे.

मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनीमुळे पडीक जमिनीतूनही शेतकऱ्यांना मिळणार प्रतिहेक्टरी ७५ हजार रुपयांचे वार्षिक उत्पन्न

लातूर, दि. 23 (जिमाका) : राज्यातील वीजेची वाढती मागणी लक्षात घेऊन राज्य शासनाने सौर ऊर्जा निर्मितीवर भर दिला आहे. शेतीला दिवसा वीज पुरविण्यासाठी महत्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेसाठी खासगी जमीन भाडेपट्ट्याने घेता येणार असून त्याचा मोबदला म्हणून शेतकऱ्यांना प्रत्येक हेक्टरला दरवर्षी 75 हजार रुपये भाडेपट्टा देण्यात येणार आहे.

शेतीला दिवसा वीज पुरविण्यासाठी महावितरणतर्फे विद्युत वाहिन्यांचे सौर उर्जीकरण केले जाणार असून यासाठी मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना सुरु करण्यात आली आहे. या अंतर्गत शेतकरी, ग्रामपंचायत, कारखाने यांच्याकडून जमीन भाड्याने घेण्याची तरतूद आहे. याठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी घेण्यात आलेल्या खासगी जमिनींना दरवर्षी प्रतिहेक्टरी 75 हजार रुपये भाडेपट्टा देण्यात येणार आहे. याबाबतचा पुनरुच्चार राज्याच्या नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पडीक जमिनीतूनही वार्षिक हेक्टरी 75 हजार रुपये उत्पन्न मिळणार आहे.

लातूर जिल्ह्यातून १०० प्रस्ताव सादर

प्रत्येक जिल्ह्यात महावितरणच्या कृषि वाहिन्यांपैकी किमान 30 टक्के कृषि वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण गतीने करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेसाठी लातूर जिल्ह्यातून आतापर्यंत 100 प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. त्यामधून सुमारे 1437.73 एकर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पातून 160.11 मेगावॉट विद्युत निर्मिती अपेक्षित आहे. यापैकी 21 ठिकाणी सुमारे 496 एकर शासकीय जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार असून यामधून सुमारे 87.75 मेगावॉट वीज निर्मिती होईल. तसेच 79 ठिकाणी एकूण सुमारे 941.73 एकर खासगी जागेवर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यामधून सुमारे 72.36 मेगावॉट वीज निर्मिती अपेक्षित आहे.

सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीतून रोजगार निर्मिती !

शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्याबरोबरच ग्रामीण भागातील तरुणांना, बेरोजगारांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी ‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना’ सुरु करण्यात आली आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करुन स्वत:च्या पायावर उभे राहत नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे होण्याच्या दृष्टीने या योजनेचा लाभ घेऊन आर्थिक संपन्नतेच्या दिशेने वाटचाल करता येऊ शकते. सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात उभारण्यासाठी कृषी विभाग सहाय्य करत आहे.

शेतकऱ्यांनी पिकवलेला माल विशेषतः नाशवंत शेतमाल बाजारात आल्यावर त्याला योग्य तो भाव मिळेलच असे नाही. त्यामुळे त्याच्या कष्टाचे चिज होत नाही. अशा नाशवंत शेतमालावर प्रक्रिया करून त्यातून त्या शेतकऱ्याला उत्पन्नाचे साधन मिळावे, यासाठी केंद्र शासनाची प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुण, शेतकऱ्यांनी  घेऊन आपली आर्थिक उन्नती साधावी यासाठी कृषी विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे.

66% अन्नप्रक्रिया उद्योग ग्रामीण भागात असून त्यापैकी 80 टक्के कुटुंब- आधारित उद्योग आहेत. या घरगुती उद्योगांमुळे ग्रामीण भागातील कष्टकरी लोकांच्या संसाराला आर्थिक हातभार लागतो आणि त्यांचे शहराकडे होणारे स्थालांतर टाळले जाते.  या योजनेसाठी लागणारा खर्च केंद्र आणि राज्य सरकार अनुक्रमे 60:40 अशा प्रमाणात करणार आहे. केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सन 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षात एक जिल्हा एक उत्पादन (ONE DISTRICT ONE PRODUCT) या धर्तीवर राबविली जाणार आहे.

योजनेचा उद्देश :

सध्या कार्यरत असलेले व नवीन स्थापित होणारे वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग तसेच शेतकरी उत्पादक गट /संस्था/कंपनी, स्वयंसहाय्यता गट व सहकारी उत्पादक गट यांची पतमर्यादा वाढविणे. उत्पादनांचे ब्रँडींग व विपणन अधिक बळकट करुन त्यांना संघटीत अशा पुरवठा साखळीशी जोडणे. सामाईक सेवा जसे साठवणूक, प्रक्रिया सुविधा, पॅकेजिंग, विपणन तसेच उद्योग वाढीसाठीच्या सर्वकष सेवांचा सूक्ष्म उद्योगांना अधिक लाभ मिळवून देणे. अन्न प्रक्रिया क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण यावर भर देणे. सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांनी व्यावसायिक व तांत्रिक सहाय्याचा अधिकाधिक लाभ घ्यावा, यासाठी प्रयत्न करणे ही या योजनेची उद्दिष्टे आहेत.

लाभार्थ्यांना प्रशिक्षण : या योजने अंतर्गत कर्ज मंजुरी झालेल्या लाभार्थ्यास 50 तासांचे प्रशिक्षण तर अन्न व प्रक्रिया उद्योगांमध्ये कार्यरत कामगार यांना 24 तासांचे प्रशिक्षण निवड केलेल्या जिल्हा स्तरीय प्रशिक्षण संस्थेत देण्यात येते.

अर्जासाठी ऑनलाईन पोर्टल : वैयक्तिक व गट लाभार्थ्यांसाठी – www.pmfme.mofpi.gov.in  बीजभांडवलासाठी – ग्रामीण भागासाठी www.nrlm.gov.in  आणि शहरी भागासाठी www.nulm.gov.in या संकेतस्थळांवर अर्ज करता येईल.

ताज्या बातम्या

लोककल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा -विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल

0
उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार विभागीय आयुक्तालयात महसूल सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ अमरावती, दि. ०२ : महसूल विभाग हा राज्य...

समाजसेवेसाठी शासकीय नोकरी हे महत्त्वाचे क्षेत्र -अपर मुख्य सचिव डॉ. विकास खारगे

0
ठाणे,दि. ०२ (जिमाका): समाजाची सेवा करण्यासाठी शासकीय नोकरी हे एक महत्त्वाचे क्षेत्र असून आपण प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे अपर मुख्य...

क्रांतिवीर शामादादा कोलाम यांच्या नावाने प्रत्येक प्रकल्प कार्यालयासाठी स्वतंत्र विशेष पॅकेज

0
यवतमाळ, दि.२ (जिमाका): आदिवासी समाजातील घटकांसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. यंदापासून क्रांतिवीर शामादादा कोलाम यांच्या नावाने प्रत्येक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत सूक्ष्म...

महसूल विभाग हा राज्याच्या कारभाराचा कणा – पालकमंत्री संजय राठोड

0
यवतमाळ, दि.२ (जिमाका): महसूल विभाग हा राज्याच्या कारभाराचा कणा असल्याचे गौरवोद्गार मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी महसूल दिनाच्या कार्यक्रमात...

जळगाव तहसील कार्यालयात प्रतीक्षालय, वाचनालय, सेतू केंद्र व क्षेत्रीय अधिकारी कार्यालयाचे लोकार्पण

0
जळगाव, दि.२ (जिमाका): नागरिकांना अधिक सुसंस्कृत, सुलभ व सकारात्मक शासकीय सेवा मिळाव्यात या उद्देशाने जळगाव तहसील कार्यालयात उभारण्यात आलेल्या प्रतीक्षालय, वाचनालय, सेतू सुविधा केंद्र...