बुधवार, जून 18, 2025
Home Blog Page 1465

सतीश कौशिक यांनी सशक्त अभिनयाने अनेक भूमिका अजरामर केल्या – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. 9 : राज्यपाल रमेश बैस यांनी अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

“प्रसिद्ध चित्रपट व नाट्य अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक, पटकथा लेखक व हास्य अभिनेते सतीश कौशिक यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. एक मनस्वी कलाकार आणि विचारशील दिग्दर्शक असलेल्या सतीश कौशिक यांनी आपल्या सशक्त अभिनयाने अनेक भूमिका अजरामर केल्या आणि राष्ट्रीय पुरस्कारांवर नाव कोरले. जवळपास चार दशके त्यांनी केलेली चित्रपट व रंगभूमीची सेवा कधीही विसरली जाणार नाही. श्री. कौशिक यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवतो,” असे राज्यपाल बैस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

००००

Governor Ramesh Bais condoles demise of Satish Kaushik

Mumbai 9 : Maharashtra Governor Ramesh Bais has expressed grief over the demise of theatre and film personality Satish Kaushik. In a condolence message, Governor Bais wrote:

“The news of the demise of renowned film and theater actor, producer, director, screenplay writer and comedian Satish Kaushik is shocking.  Satish Kaushik immortalised many characters in films and plays with his powerful acting and won National awards. His four decades of service to the theater and film industry can never be forgotten. I pay my homage to the great actor and convey my deepest condolences to the members of the bereaved family.”

सतीश कौशिक यांच्या निधनाने अष्टपैलू कलाकार हरपला – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 9 :- सतीश कौशिक यांच्या निधनाने अष्टपैलू कलाकार हरपला आहे, या शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे.

मंत्री श्री. मुनगंटीवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, “सतीश कौशिक हे एक उत्कृष्ट अभिनेता आणि पटकथा लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता देखील होते.” मिस्टर इंडिया या चित्रपटातून त्यांना खरी ओळख मिळाली. ‘राम लखन’, ‘साजन चले ससुराल’ अशा अनेक चित्रपटात त्यांनी आपल्या कसदार अभिनयाची झलक दाखवून रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केले. सतीश कौशिक यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी प्रत्येक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र, त्यांच्या विनोदी भूमिका अधिक गाजल्या. त्यांच्या विनोदी भूमिका आजही लोकप्रिय आहेत आणि कायम राहतील, असे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी शोकसंदेशात नमूद केले आहे.

०००००

वर्षा आंधळे/विसंअ

विविध क्षेत्रातील अग्रेसर महिलांचा अभिमान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबईदि. ८ : सामाजिक कार्यराजकारणप्रशासनखेळासह प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांबरोबरीने कार्य करीत आहेत. त्यामुळे स्त्री शक्ती पुरुषांपेक्षा किंचितही मागे नाही. सर्वच क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. या महिलांचा आम्हाला अभिमान असून महिलांच्या सबळीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेतअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

            आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि इंडियन ऑइलच्या संयुक्त विद्यमाने आज रात्री गेट वे ऑफ इंडिया येथे महाराष्ट्रातील  कर्तृत्ववान महिलांच्या जीवनावर आधारित विशेष मल्टी मीडिया प्रकाश आणि ध्वनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंह पुरीउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसविधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरशालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरपर्यटनकौशल्य विकासमहिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा,  जी 20 महिला विभागाच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचाइंडियन ऑईलचे अध्यक्ष श्रीकांत वैद्यविपणन संचालक व्ही. सतीशकुमारमहिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. एस. कुंदनमुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडेपर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयसंचालक डॉ.बी. एन. पाटीलएसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू उज्ज्वला चक्रदेवसामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

 

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीमहिला कुटुंबात विविध जबाबदाऱ्यांसह कामाच्या ठिकाणी विविध भूमिका यशस्वीपणे सांभाळतात.त्यामागे त्यांचा त्याग असतो. महिलांच्या सर्वांगीण कल्याणासाठी राज्य शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येत आहेत. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या सहकार्याने राज्यात विकास योजना राबविण्यात येत आहेत. अलिकडेच केंद्रीय नगरविकास विभागातर्फे १५ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले.

            केंद्रीय मंत्री श्री. पुरी यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मराठीतून शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की भारताच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम अतुलनीय आहे. हा पराक्रम प्रेरणादायी आहे. महाराष्ट्र ही कर्तृत्ववान महिलांची भूमी आहे. महिला सुरक्षामहिला सशक्तीकरणस्वावलंबन आणि स्त्रियांचा सन्मान ही नवीन भारताची ओळख आहे. सन २०४७ पर्यंत भारताला विकसित देश म्हणून घडवायचे आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात महाराष्ट्रातील महिलांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. पुरेचाइंडियन ऑइलचे अध्यक्ष श्री. वैद्य यांनी मनोगत व्यक्त केले. मंत्री  श्री. लोढा यांनी आभार मानले.  यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांचे वितरण

            यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन २०१३- १४सन २०१४- १५सन २०१५- १६२०१६- १७२०१७- १८ या कालावधीतील राज्यस्तरीय व विभागस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पुरस्कार विजेत्यांमध्ये  सौ. नूरजहाँ बेगम हमीद अब्दुल हमीद पांडे (जि. वाशीम),  सौ. वासंती संपतराव महामुलकर (जि. सातारा). सौ. हर्षदा विद्याधर काकडे (जि. अहमदनगर),  श्रीमती वनमाला परशुराम पेंढारकर (जि. वाशीम),  शोभा गुंडप्पा पारशेट्टी (जि. लातूर) यांचा समावेश होता. कोकण विभागस्तरीय पुरस्कार प्राप्त स्वयंसेवी संस्था अशा : श्री सद्गगुरू सदन वाचनालय व अभ्यासिकाघाटकोपरमुंबई. वनवासी विकास सेवा संघउसरोलीमुरुडजि. रायगड. सहेली ग्रुपराधाकृष्ण सहनिवासवडनाका बापटआळीचिपळूण, जि. रत्नागिरीआश्रय सोशल फाऊंडेशन पनवेलजि. रायगड.

०००

गोपाळ साळुंखे/ससं/

मुंबईतील हवा प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजनांना गती द्यावी –अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार

मुंबई, दि. ८: बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये हवेतील प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांसह प्रस्तावित कामांना देखील गती द्यावी, विशेषतः बांधकामे आणि पाडकामांमधून निर्माण होणाऱ्या धुळीच्या नियंत्रणासाठी महानगरपालिकेची प्रमाणित कार्यपद्धती लवकरात लवकर तयार करावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी दिले आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मागील काही दिवसांपासून हवामान विषयक कारणांमुळे तसेच सर्वत्र सुरू असलेल्या विविध विकास कामांमधून निर्माण होत असलेल्या धुळीमुळे हवेचा गुणवत्ता स्तर खालावला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. इकबाल सिंह चहल यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका प्रशासनातील विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची आज (दिनांक ८ मार्च २०२३) महानगरपालिका मुख्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.

उपायुक्त (पर्यावरण) श्री.अतुल पाटील, विशेष कार्य अधिकारी श्री. सुनील सरदार यांच्यासह विकास व नियोजन, रस्ते व वाहतूक, यांत्रिकी व विद्युत, घनकचरा व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, बेस्ट उपक्रम इत्यादी खात्यांचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात हवा प्रदूषण नियंत्रणासाठी प्रशासनाने यापूर्वीच दीर्घकालीन स्वरूपाच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. तथापि अलीकडील हवा प्रदूषण नियंत्रणाची गरज लक्षात घेता अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये नव्याने काही बाबी समाविष्ट केल्या आहेत, तर काही कामे प्रगतीपथावर आहेत. या सर्वच बाबींचा एकंदरीत आढावा या बैठकीत घेण्यात आला.

बैठकीत झालेल्या सविस्तर चर्चेनंतर अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी निर्देश दिले की, हवेचा गुणवत्ता स्तर खालावण्याचे स्थितीतील प्रमुख कारण्यांपैकी एक कारण धूळ हे आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार धूळ नियंत्रणाची कार्यवाही होत असली तरी मुंबई महानगराचे भौगोलिक वैशिष्ट्य आणि गरज लक्षात घेता मुंबई महानगरासाठी महानगरपालिका प्रशासनाची स्वतंत्र प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) असणे आवश्यक आहे. त्यामुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या नियमांच्या अधीन राहून मुंबईतील बांधकामे आणि पाडकामे यातून निर्माण होणाऱ्या धूळ नियंत्रण संदर्भात प्रमाणित कार्यपद्धती तातडीने निश्चित करावी. तसेच याच अनुषंगाने महानगरपालिका प्रशासनातील सर्व संबंधित खात्यांचे अधिकारी व सर्व संबंधित भागधारक घटकांची पुढील आठवड्यात कार्यशाळा आयोजित करून धूळ नियंत्रणाची कामे तातडीने मार्गी लागतील असे पहावे, असे निर्देश डॉ. संजीव कुमार यांनी दिले आहेत.

मुंबईतील बांधकामे आणि पाडकामे यातून निर्माण होणारा कचरा/राडारोडा यावर प्रक्रिया करण्यासाठी पश्चिम उपनगरांकरिता गोराई येथे आणि शहर व पूर्व उपनगरे विभागाकरिता नवी मुंबईमध्ये प्रक्रिया केंद्र उभारले जाणार आहे. या दोन्ही ठिकाणच्या प्रक्रिया केंद्रांची मिळून एकूण क्षमता १,२०० मेट्रिक टन प्रतिदिन इतकी राहणार असून त्यासंदर्भातील कार्यादेश ७ फेब्रुवारी २०२३ रोजी दिले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली.

त्याचप्रमाणे, रस्त्यावरील धूळ हटवून स्वच्छता करण्यासाठी सध्या महानगरपालिकेकडे २७ यांत्रिकी झाडू आहेत. त्याद्वारे दररोज सुमारे २९३ किलोमीटर रस्त्यांची स्वच्छता केली जाते. याच धर्तीवर आता नवीन ९ इलेक्ट्रिक झाडू विकत घेण्यात येणार आहेत. प्रत्येक इलेक्ट्रिक झाडू द्वारे दररोज २८ किलोमीटर याप्रमाणे एकूण २५२ किलोमीटर अधिकच्या रस्त्यांची स्वच्छता करणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे रस्त्यांवर व वाहतूक चौकात पाणी फवारणी करून स्वच्छता करू शकणारे ५० संयंत्र तर सूक्ष्म पद्धतीने पाणी फवारणी करणारे ५० संयंत्र असे एकूण १०० वाहन आरूढ १०० संयंत्र खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, हवा शुद्धिकरण करणारी वाहन आरुढ सुमारे २०० संयंत्रे खरेदी करण्याची कार्यवाही देखील सुरु आहे. हवेतील धुळीला अटकाव करण्यासाठी कलानगर, मानखुर्द, हाजी अली, दहिसर आणि मुलुंड चेक नाका या पाच ठिकाणी धूळ कमी करणारी यंत्रणा उभारली जाणार असून त्याबाबतची कार्यवाही देखील प्रगतीपथावर आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहने धोरण २०२१ नुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रशासनाच्या वापरासाठी ३५ इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याची प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. मुंबईत विविध प्राधिकरणामार्फत वेगवेगळ्या ठिकाणी मिळून आतापर्यंत ४८६ चार्जिंग स्टेशन उभारली गेली आहेत. महानगरपालिकेच्या वतीने आणखी २५ ठिकाणी इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग सुविधा उभारण्याची कार्यवाही सुरू आहे. त्याचप्रमाणे बेस्ट उपक्रम अंतर्गत सुमारे २,१०० इलेक्ट्रिक सिंगल डेकर बसेस तर ९०० डबल डेकर इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्याची कार्यवाही सुरू आहे. सप्टेंबर २०२३ अखेरपर्यंत ही खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजित आहे. यामुळे सार्वजनिक वाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देऊन प्रदूषण नियंत्रित होण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे, शासनाच्या सूचनेनुसार जुनी वापरात असलेली डिझेलवर धावणारी वाहने सीएनजी मध्ये रूपांतरित करून घेण्याची कार्यवाही देखील करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या ६५२ वाहतूक दिवे चौक (ट्रॅफिक सिग्नल जंक्शन) पैकी आतापर्यंत २५८ वाहतूक दिवे चौक हे स्वयंचलित पद्धतीने कार्यरत करण्यात आले आहेत. उर्वरित वाहतूक दिवे चौक देखील टप्प्याटप्प्याने स्वयंचलित यंत्रणेवर कार्यरत करण्यासाठी आयआयटी मुंबई यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जून २०२३ पर्यंत त्यांच्याकडून अहवाल येणे अपेक्षित आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली.

घनकचऱ्यातून उद्भवणाऱ्या हवा प्रदूषणाविषयी देखील अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी संपूर्ण आढावा घेतला. महानगरपालिकेच्या वतीने देवनार क्षेपणाभूमी येथे ६०० टन प्रतिदिन घनकचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून त्याद्वारे ४ मेगावॅट ऊर्जा निर्मिती करण्याचा प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यासाठी कार्यादेश देण्यात आले असून या प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन ऑक्टोबर २०२५ मध्ये तो कार्यान्वित करण्याचे नियोजन केले आहे. घरगुती घातक कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्यासाठी देखील महानगरपालिकेच्या वतीने ओशिवरा, धारावी आणि मालाड येथे प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त आणखी आठ ठिकाणी अशा स्वरूपाचे केंद्र सुरू करण्यात येणार असून या नवीन आठ केंद्राद्वारे प्रत्येकी दररोज सुमारे ४ टन म्हणजे दररोज एकूण ३२ टन घरगुती घातक कचऱ्यावर प्रक्रिया करणे शक्य होणार आहे. या नवीन केंद्रासाठीचे कार्यादेश देखील देण्यात आले आहेत, असे संबंधित अधिकाऱ्यांनी नमूद केले.

मुंबई महानगरातील हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ११ ठिकाणी तर भारतीय हवामान खात्याकडून ‘सफर’ अंतर्गत ९ ठिकाणी केंद्र उभारण्यात आले आहे. याच धर्तीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून आता शिवडी, गोवंडी, पंतनगर (घाटकोपर), भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि चारकोप (कांदिवली) अशा पाच ठिकाणी हवा गुणवत्ता संनियंत्रण केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठीचे कार्यादेश देखील देण्यात आले आहेत. सदर पाचही केंद्र दिनांक १५ मे २०२३ पर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती देखील याप्रसंगी देण्यात आली.

०००

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदींची मुख्यमंत्र्यांकडून चौकशी

मुंबई, दि. 8 : पद्मश्री तसेच महाराष्ट्र भूषणने सन्मानित ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी लाटकर यांच्यावरील वैद्यकीय उपचाराच्या खर्चापोटी तीन लाख रुपये  मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून रुग्णालयाला देण्यात आले आहेत.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात संबंधितांना सूचना दिल्या होत्या.

सुलोचनादीदी (९४) या श्वसनाशी संबंधित संसर्गामुळे आजारी असून दादर येथील शुश्रुषा रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या आजारपणाविषयी माहिती कळल्यावर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्यांच्या परिवाराजवळ चौकशी केली तसेच तातडीने उपचारासाठीचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याच्या सूचना दिल्या होत्या.

राज्यातील सर्व निवासी, वाणिज्य इमारतींमध्ये हिरकणी कक्ष – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 8 : राज्यात यापुढे बांधण्यात येणाऱ्या निवासी आणि वाणिज्य इमारतींमध्ये हिरकणी कक्ष तयार करण्यात येणार असून, त्या जागेचा एफएसआय मोजण्यात येणार नाही. याशिवाय प्रत्येक पोलीस ठाण्यात हिरकणी कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जागतिक महिला दिनानिमित्त अध्यक्षांनी मांडलेल्या प्रस्तावास उत्तर देताना सांगितले.

मुख्यमंत्री श्री शिंदे यावेळी म्हणाले, राज्यात नवीन रस्ते बांधतांना नियमानुसार प्रत्येक ५० किमी अंतरावर शौचालय बांधण्यात येईल. तसेच महिला आयोग आणि महिलांशी संबंधित शासकीय कार्यालयांच्या इमारतींसाठी सुसज्ज जागा देण्याबरोबरच आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. मुंबईच्या दोन्ही फ्री वे वर महिला शौचालय बांधण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

विधानमंडळात महिलांसाठी एक विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार असून त्यामध्ये सर्व सुविधा पुरविण्यात येतील. हा कक्ष याच अधिवेशन कालावधीत सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. याबरोबरच मंत्रालयातदेखील विधिमंडळाच्या महिला सदस्यांसाठी एक विशेष कक्ष निर्माण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सर्व जिल्ह्यात महिला बचतगटांसाठी बाजार सुरू करण्यात येणार

महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

एका वर्षाच्या आत राज्यातील सर्व जिल्ह्यात बचतगटांच्या माध्यमातून महिलांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी मोफत 15 दिवस जागा देवून बाजार सुरू करण्यात येणार आहे. तसेच सर्व सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून 50 टक्के रक्कम महिलांच्या सोयीसुविधांसाठी वापरण्यात येणार असून राज्यात महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

राज्यात राबविण्यात येणाऱ्या महिला धोरणांची अंमलबजावणी करून त्याचा आढावा प्रत्येक वर्षी अधिवेशनात घेण्यात येणार आहे. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी राज्यात सुरु आहे. लवकरच महिला टुरिस्ट पॉलिसी राबविण्यात येणार आहे. आजच राज्यात 200 कोटी रुपयांच्या बीजभांडवल योजनेचे राज्यपाल महोदयांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. मुंबईमध्ये कंटेनर अंगणवाडी सुरू करण्यात आली आहे. तसेच चालते फिरते सुविधा केंद्र, महिला जीम, महिला अभ्यासिका, महिला स्किल सेंटर सुरू करण्यात आले आहेत. अशा अनेकविध योजना राज्यात राबविण्यात येणार असल्याचे श्री. लोढा यांनी सांगितले.

मंत्री श्री लोढा म्हणाले, महिलांच्या सर्व समस्या एकदाच सुटणार नाहीत. विधानसभेत सर्व महिला आणि पुरुष सदस्यांनी चांगल्या सूचना मांडल्या आहेत. सभागृहात सर्व सूचनां विचारात घेतल्या  आहेत. यावर अधिवेशन कालावधीत महिला सदस्या तसेच विरोधी पक्ष नेते यांच्यासोबत सविस्तर बैठक घेवून सर्व सुचनांचा सकारात्मक विचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सदस्यांच्या सुचनासांठी सरकार संवेदनशील असल्याचेही त्यांनी सांगितले. या सूचनांचा महिला धोरणात समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा उदय एका कामगार आंदोलनातून झाला. 1908 साली याची पहिली ठिणगी पडली होती. यावर्षी 15 हजार महिलांनी न्यूयॉर्क शहराच्या रस्त्यावर मोर्चा काढून कामाचे तास कमी करण्याची मागणी केली होती. तेव्हापासून 8 मार्च हा जागतिक महिला दिन साजरा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. यानिमित्ताने मंत्री श्री लोढा यांनी सर्व महिला सदस्यांना शुभेच्छा दिल्या.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने प्रस्तावावरील चर्चेत सदस्य यामिनी जाधव, सुलभा खोडके, माधुरी मिसाळ, सरोज आहिरे, गीता जैन, प्रतिभा धानोरकर, देवयानी फरांदे, सदस्य अबू आजमी, ऋतूजा लटके, अॅड. यशोमती ठाकूर, डॉ. भारती लव्हेकर, मंजूळा गावित, अदिती तटकरे, लता सोनवणे, प्रणिती शिंदे, मंदा म्हात्रे, वर्षा गायकवाड, मनीषा चौधरी, श्वेता महाले,सीमा हिरे, विरोधी पक्ष नेते अजित पवार, भास्कर जाधव, ज्ञानराज चौगुले, हरिभाऊ बागडे, छगन भुजबळ, आशिष शेलार, चेतन तुपे आदीनीं सहभाग घेतला.

००००

राजू धोत्रे/विसंअ/

महिला दिन आणि आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष हा एक सुरेख संगम – कृषि आयुक्त सुनील चव्हाण

पुणे, दि.८: आंतराष्ट्रीय महिला दिन आणि आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष हा एक सुरेख संगम असून यानिमित्ताने राज्यातील सर्व माता, भगिनी व  महिलांनी आपल्या कुटुंबाचे आरोग्य निरोगी ठेवावे असे आवाहन राज्याचे कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी आज येथे केले.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून राज्य कृषि आयुक्तालय व विभागीय माहिती कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील शासकीय मध्यवर्ती इमारतीमध्ये प्रवेशद्वारात सर्व महिला अधिकारी / कर्मचारी यांचा सन्मान स्वागत सोहळा संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला मुख्य अभियंता, अतुल चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे,  कृषिविस्तार  प्रशिक्षण संचालक विकास पाटील, कृषि संचालक निविष्ठा व गुणनियंत्रण दिलीप झेंडे, माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर, पर्यटन विभागाच्या उपसंचालक सुप्रिया करमरकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे आदी उपस्थित होते.

कृषि आयुक्त श्री. चव्हाण यांनी प्रारंभी महिला दिनानिमित्त मध्यवर्ती इमारतीमध्ये कार्यरत असलेल्या सर्व महिला अधिकारी -कर्मचारी यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन स्वागत केले. ते म्हणाले, संयुक्त राष्ट्रसंघाने यावर्षीचा आंतरराष्ट्रीय महिला दिन ‘डिजिटऑल-लिंग समानतेसाठी नाविन्यता आणि तंत्रज्ञान’ (डिजिटऑल- इनोव्हेशन ॲण्ड टेक्नॉलॉजी फॉर जेंडर इक्वॅलिटी) या संकल्पनेवर राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून सर्व महिलांना डिजिटल साक्षर करण्यासह त्यांच्या सर्वसमावेशक विकासाचे काम करणे अपेक्षित आहे.

भारताच्या प्रयत्नामुळे २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून राबवण्यात येत आहे. महिलावर्ग आरोग्याप्रती जागृत असतात. भरडधान्य हे पौष्टिक असल्याने महिलांनी आपल्या आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी त्यांचा पुरेपूर वापर करावा, असेही आवाहन त्यांनी केले.

माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर म्हणाले, महिला दिनाचे औचित्य साधून स्त्रीशक्ती प्रती आदर व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. स्त्री ही कुटुंबाचे आर्थिक, मानसिक स्थैर्य तसेच आरोग्यासाठी नेहमी झटत असते. त्यामुळे महिलांप्रती आपल्याकडे नेहमीच आदरभाव असला पाहिले. या उपक्रमाच्या माध्यमातून तृणधान्याचे महत्त्व महिलांपर्यंत पोहोचवण्याचे काम करण्यात येत आहे, असेही डॉ. पाटोदकर म्हणाले.

आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष व महिला दिनानिमित्त अतिशय चांगला उपक्रम राबविल्याबद्दल मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी कृषि आयुक्तालय व विभागीय माहिती कार्यालयाचे कौतुक केले. त्यांनी महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

शासकीय मध्यवर्ती इमारतीच्या प्रवेशद्वारातच रेड कारपेटद्वारे महिला वर्गाचे स्वागत करण्यात आले. त्यांचे गुलाबपुष्प, तुळशीचे रोप, पेढा तसेच तृणधान्यापासून बनविण्यात आलेले पौष्टिक पदार्थांचे पाकिटं देऊन स्वागत करण्यात आले.

नाविन्यपूर्ण उपक्रम – स्वागताने महिलावर्ग आनंदी

आंतरराष्ट्रीय महिला दिनी शासकीय मध्यवर्ती इमारतीत अशा प्रकारचा आगळावेगळा स्वागत सोहळा प्रथमच होत आहे. या स्वागत सोहळ्यामुळे  मनस्वी आनंद झाला. कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाबद्दल उपस्थित महिला कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल त्यांनी कृषि आयुक्तालय व विभागीय माहिती कार्यालयाचे आभारही मानले.

00000

महाराष्ट्र पोलिसांच्या नावलौकिकात महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ८:- आज सगळ्या क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. अनेक आव्हानांचा सामना करत महिला पोलीस कर्मचारी कामाच्या ठिकाणी चोख कर्तव्य बजावत असतात. पोलीस महिला कर्मचाऱ्यांसाठी ज्या आवश्यक सोयीसुविधा आहेत त्या प्राधान्याने पूर्ण केल्या जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. जागतिक महिला दिनानिमित्त विधिमंडळ प्रांगणात अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कर्तव्यावर असणाऱ्या महिला पोलिसांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

आगामी अर्थसंकल्पातदेखील राज्यातील महिलांसाठी विशेष तरतूद करण्यात येणार असून महिला पोलिसांच्या सोयीसाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून सर्व पोलीस स्थानकात हिरकणी कक्ष सुरू करण्यात येतील असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री. फडणवीस यांनीही महिला पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या कर्तृत्वाबाबत गौरवोद्गार काढले.

यावेळी उपस्थित महिला पोलीस अधिकारी यांचा मुख्यमंत्री श्री. शिंदे व उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार राम सातपुते, मुंबईचे सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी आदी उपस्थित होते.

विधानसभा लक्षवेधी

नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीबाबत शासन सकारात्मक  उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई दि. 8 : नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध विभागांमध्ये अधिकारी व कर्मचारी करार व कंत्राटी पद्धतीवर आहेत. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत शासन सकारात्मक असून अधिवेशन काळात याबाबत बैठक घेण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेतील करार व कंत्राटी पद्धतीवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशेष बाब म्हणून कायम करण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. सामंत म्हणाले, नवी मुंबई महानगरपालिकेतील करार व कंत्राटी पद्धतीवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनात पाच वर्षांपूर्वी वाढ करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे शक्य नसल्याने सध्या कार्यरत कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मानधन वाढीबाबत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांना आढावा घेण्याच्या सूचना देण्यात येतील.

००००

शैलजा पाटील/विसंअ/

कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढीच्या प्रस्तावावर निवडणुकीनंतर सकारात्मक निर्णय घेणार – उद्योगमंत्री उदय सामंत

 

मुंबई, दि. 8 : कोल्हापूर महानगरपालिकेच्या लगतच्या 42 गावांचा समावेश कोल्हापूर महानगरपालिकेत करून हद्दवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

याबाबतची लक्षवेधी सूचना विधानसभा सदस्य जयश्री जाधव यांनी मांडली होती.

उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत ज्या महिन्यात संपत असेल त्याच्या सहा महिने अगोदरच्या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रात आणि हद्दीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बदल करता येत नाही असा नियम असल्याने याबाबत निवडणूक झाल्यानंतर या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही श्री.सामंत यांनी सांगितले.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

नाशिक महानगरपालिकेच्या भूमापन प्रक्रियेत मातंग समाजाच्या जागेसंदर्भातील बदलाबाबत लवकरच निर्णय – उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 8 : नाशिक महानगरपालिकेतील सर्व्हे नंबर 491 (फायनल भूमापन क्रमांक 251) नगर रचना योजना भाग – एक ही जागा अनेक वर्षापासून मातंग समाजाची होती. या जागेचा सातबारा देखील या समाजबांधवांच्या नावावर होता. परंतु भूमापन प्रक्रियेत बदल झाल्याचे निदर्शनास आल्याने यात अंशत: बदल करून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

याबाबत विधानसभा सदस्य देवयानी फरांदे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

श्री. सामंत म्हणाले, या जागेच्या आरक्षणात झालेला बदलाबाबत लवकरच निर्णय घेऊन ही जागा मातंग समाजाच्या  नावावर देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

00000

काशीबाई थोरात/विसंअ/

खामगाव-जालना रेल्वे प्रकल्पासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींसमवेत बैठक घेणार – मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. 8 : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ते जालना हा महत्त्वाचा रेल्वे प्रकल्प असून या प्रकल्पामुळे त्या भागातील विकासाला चालना मिळेल. या प्रकल्पाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात येईल, असे मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य श्वेता महाले यांनी खामगाव-जालना रेल्वे प्रकल्पाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य संजय कुटे, संजय गायकवाड यांनी सहभाग घेतला.

या प्रकल्पाबाबतचा विकास आराखडा 31 मार्चपर्यंत रेल्वे बोर्डास सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर केंद्र शासनाने या प्रकल्पाला तत्वत: मान्यता दिल्यानंतर राज्याच्या हिस्स्यासंदर्भात शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

00000

शैलजा पाटील/विसंअ/

महिला दिनानिमित्त ऑनलाइन प्रश्नमंजूषा

मुंबई, दिनांक ८ : महिला दिनाचे औचित्य साधून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सर्व नागरिकांसाठी प्रश्नमंजूषा आयोजित केली आहे. ही प्रश्नमंजूषा स्त्री, पुरुष आणि पारलिंगी व्यक्ती यांच्यासाठी आहे. तरी या प्रश्नमंजूषेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.

या प्रश्नमंजूषेत स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांनी विवाहानंतर नाव बदलावे की नाही, पारलिंगी महिला (Transwoman), पारलिंगी पुरुष (Transman) या घटकासंबंधी प्रश्न विचारण्यात आले आहेत. या प्रश्नांच्या उत्तरांसाठी केवळ हो/नाही पर्याय आहे.

या प्रश्नमंजूषेत १४ मार्च २०२३ पर्यंत https://forms.gle/SsnJYKACXzNkmQr67 या लिंकद्वारे सहभागी होता येणार आहे. या प्रश्न मंजुषेत सर्व सहभागींना ई-मेलद्वारे प्रमाणपत्र देण्यात येईल. याबाबत काही अडचण आल्यास प्रणव सलगरकर यांच्या ८६६९०५८३२५ या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा, असेही श्री.देशपांडे यांनी कळविले आहे.

000

संजय ओरके/विसंअ/

ताज्या बातम्या

‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रमासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा- मंत्री चंद्रकांत पाटील

0
पुणे, दि. १८: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह शहरातील विविध शाळेत जागतिक योगादिनाचे औचित्य साधून २१ जून रोजी 'वारकरी भक्तीयोग' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे,...

सिंचन योजनांची कामे जलद गतीने करा – मंत्री गिरीश महाजन

0
मुंबई, दि. १७: राज्यातील  सिंचन योजनांची कामे विहित मुदतीत पूर्ण  होणे आवश्यक आहे. ही कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यासाठी त्याचे सूक्ष्म, सुयोग्य नियोजन करून...

‘मनरेगा’शी संबंधित मागण्यांबाबत सकारात्मक – मंत्री भरत गोगावले

0
मुंबई, दि. १७ : शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, विधवा महिला, बेरोजगार युवक, मेंढपाळ आणि मच्छीमार बांधव यांच्याशी संबंधित विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी रोजगार हमी योजना,...

स्वस्त धान्य दुकानदारांचे थकीत कमिशन देण्याची कार्यवाही करावी – मंत्री छगन भुजबळ

0
मुंबई, दि. १७: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे मागील थकीत कमिशन अदा करण्याची कार्यवाही करावी. केंद्राचा निधी प्राप्त झाल्यानंतर राज्याला द्यावयाचा हिस्सा तातडीने देवून कमीशन...

रत्नागिरी जिल्ह्यातील मृद व जलसंधारण प्रकल्पांच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवा – मंत्री संजय राठोड

0
मुंबई, दि.१७ : रत्नागिरी जिल्ह्यातील मृद व जलसंधारण प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवून काम सुरू करावे, असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले. मंत्रालयात...