मंगळवार, जून 17, 2025
Home Blog Page 1464

विधानपरिषद कामकाज

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई, दि. 9 : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शरणापूर, साजापूर, पंढरपूर, नक्षत्रवाडी  असा राज्यमार्ग असून, तातडीने या रस्त्याचे काम सुरू करणार असल्याची माहिती, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण यांनी विधानपरिषदेत दिली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काम पूर्ण करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे विलंब होत असल्याप्रकरणी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. यास उत्तर देताना मंत्री श्री. चव्हाण बोलत होते.

मंत्री श्री. चव्हाण म्हणाले, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रस्त्याचे रूंदीकरण तसेच चार पदरी सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करण्यासंदर्भात निविदा प्राप्त असून, निविदा प्रक्रिया पूर्ण करून तातडीने काम सुरू करण्यात येणार आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या इमारतीच्या कामाबाबत कार्यादेश दिला असून, फेब्रुवारी २०२५ ला हे काम पूर्ण होईल. तसेच विश्रामगृहाचे काम ही २०२४ पर्यंत पूर्ण होणार आहे.

विविध विभागाची कामे राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी ठेकेदार करत असतात. सर्व विभागांनी एकत्रित काम करणे गरजेचे असल्याने त्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसीत करण्यात येईल. यामुळे ठेकेदार काम अपूर्ण ठेवण्याच्या पद्धतीला आळा बसणार आहे. तसेच या सॉफ्टवेअरमुळे ठेकेदार निविदा भरतानाच  ती माहिती सर्व विभागांना मिळेल.

ठेकेदारामुळे काम अपूर्ण राहिले असेल किंवा क्षमता नसताना निविदा दिली असल्यास त्यासंदर्भात चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं/

राज्यातील मासळी उतरविण्याची ४३ ठिकाणे  गाळ उपासणी क्षेत्रासाठी निश्चित – मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई दि. 9 : राज्यात मासळी उतरविण्याची 173 बंदरे कार्यरत आहेत. या  बंदरांमधील गाळ काढून 24 तास ही बंदरे सुरु ठेवण्याच्या कामांचे सर्वेक्षण करण्यात आले असून राज्यात 43 ठिकाणे गाळ उपासणी क्षेत्र निश्चित करण्यात आले असल्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत सांगितले.

राज्यातील मत्स्य बंदरामधील गाळ काढून बंदरे सुस्थितीत करण्याबाबत सदस्य जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

मंत्री श्री मुनगंटीवार यांनी सांगितले की, मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील पायाभूत सुविधा विकास निधी योजनेंतर्गत हर्णे, साखरी नाटे, जीवना, भरडखोल, सातपाटी ही पाच कामे करण्यात येत आहेत. त्यासाठी आवश्यक त्या सर्व पूरक परवानगी घेण्यात येत आहेत. तसेच ही कामे विहीत कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश मेरीटाईम बोर्डाला देण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मागील दोन वर्षात लेखाशीर्षअभावी ही कामे प्रलंबित राहिली होती. त्यामुळे प्राधान्याने लेखाशीर्ष उघडण्याची कार्यवाही केली जाईल. तसेच सन 2018 च्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करून जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत हे 12 वे काम घेण्यासाठी अनुमती देण्यात येईल, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. तसेच राज्यातील समुद्र किनारा असलेल्या सात जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक घेऊन मत्स्यव्यवसायाशी संबंधित सर्व प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी चर्चा करण्यात येऊन धोरण निश्चित करण्यात येईल.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अनिकेत तटकरे, सचिन अहिर, रमेश पाटील यांनी सहभाग घेतला.

००००

मनीषा पिंगळे/विसंअ/

कालावधीपूर्वी गाळप केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करणार – सहकारमंत्री अतुल सावे

मुंबई दि.  9 – पुणे येथील बारामती ॲग्रो लि. शेटफळ या साखर कारखान्याने गळित हंगामाच्या प्रारंभीची निश्चित तारखेच्यापूर्वी गाळपास सुरुवात करून कारखान्यास वितरित करण्यात आलेल्या गाळप परवान्यामध्ये नमूद अटी शर्तींचा भंग केल्याने कायदेशीर सल्ल्यानुसार  सदर कार्यकारी संचालकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सविस्तर अहवाल मागविला असून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती, सहकार मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत दिली.

१५ ऑक्टोबरपूर्वी ऊस गाळप हंगाम सुरू करून कायद्याचा भंग केल्याप्रकरणी बारामती ॲग्रो लि. शेटफळ या साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात सदस्य प्रा.राम शिंदे यांनी लक्षवेधी मांडली. यास उत्तर देताना सहकार मंत्री अतुल सावे बोलत होते.

मंत्री सावे म्हणाले, संबंधित साखर कारखान्याने वेळेपूर्वी गाळप सुरू केल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून, प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे.  तसेच, किती गाळप करण्यात आले याचा अहवाल मागवून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री सावे यांनी दिली.

0000

श्रद्धा मेश्राम/स.सं

विधानसभा प्रश्नोत्तरे

शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज भरणे ही विद्यार्थी व शाळेची संयुक्त जबाबदारी – मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. 9 : राज्यातील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य करण्यासाठी एनएमएमएस (नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप) शिष्यवृत्ती देण्यात येते.

ही केंद्र शासनाची योजना असून अर्ज भरण्यासाठी शाळांनी विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्या आहेत. या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज भरणे ही विद्यार्थी व शाळा यांची संयुक्त जबाबदारी आहे, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य डॉ.राहुल पाटील यांनी परभणी येथील बाल विद्यामंदिर हायस्कूल या शाळेतील एनएमएमएस शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना अनुज्ञेय असणारी शिष्यवृत्तीची रक्कम मिळाली नसल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री केसरकर म्हणाले की, परभणी येथील बाल विद्यामंदिर हायस्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांच्या एनएसपी पोर्टलवरील ऑनलाईन अर्जांची पडतळणी करण्यात आली असून या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याबाबत केंद्र शासनास पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

००००

शैलजा पाटील/विसंअ/

गोरगरीब, शेतकरी, महिलांना न्याय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि ९ : गेल्या दोन अडीच वर्षातले राज्याच्या प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा आणि महाराष्ट्राला देशात एका उंचीवर नेऊन ठेवणारा हा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. अर्थसंकल्पातील ‘पंचामृत’ महाराष्ट्राच्या विकासाचे चक्र गतिमान करणारे आहे. गोरगरीब, शेतकरी, महिला यांना न्याय देताना उद्योग , पायाभूत सुविधांना वेग देणारा हा गेल्या दहा वर्षातील सर्वोत्कृष्ट अर्थसंकल्प असल्याचे ते म्हणाले.

राज्याच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की,  उत्तम अर्थतज्ञ, विकासाची दूरदृष्टी असलेल्या उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प राज्याला निश्चितपणे एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे नेण्यासाठी मार्ग सुकर करेल .

समाजातील सगळ्या घटकांवर विकासाच्या रंगांची उधळण करणारा हा अर्थसंकल्प घामाला दाम, कष्टाला मान, विकासाचे चोफेर भान देणारा असून तो शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पुसणारा आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

शेतीसाठी भरीव तरतूद

नमो शेतकरी महासन्मान निधीचा दीड कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार असून महाकृषी विकास अभियान योजनेमुळे राज्यात क्रांती होणार आहे. केवळ एक रुपयात पिक विमा घेता येणार असल्याने मोठा दिलासा शेतकऱ्याला मिळणार आहे.  मागेल त्याला शेततळेचा विस्तार वाढविणे असो किंवा विदर्भ, मराठवाड्यातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी रोख रक्कम देणे असो, ५००० गावांत जलयुक्त शिवार, सिंचनाचे विविध प्रकल्प पूर्ण करणे यासाठी या अर्थसंकल्पात केलेली तरतूद निश्चितच भरीव आहे.

महिलांचे सक्षमीकरण होणार

चौथ्या सर्वसमावेशक महिला धोरणाची अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय नोकरदार महिलांसाठी केंद्राच्या मदतीने ५० वसतिगृहे, निराधार व निराश्रित महिलांसाठी नवीन ५० शक्ती सदन, एसटी बस प्रवासात सरसकट ५० टक्के सूट, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ, महिला खरेदीदाराला स्टॅम्प ड्युटीमध्ये एक टक्का सवलत दिल्याने तसेच लेक लाडकी योजना पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलींना लागू केल्याने महिला सक्षमीकरण होणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दुर्लक्षित घटकांना न्याय

अर्थसंकल्पात दुर्लक्षित घटकांनासुद्धा न्याय देण्यात आला आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, धनगर समाजाला १ हजार कोटी, ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेचा लाभ देणे, ज्येष्ठांसाठी प्रत्येक पालिका क्षेत्रात  विरंगुळा केंद्र, महात्मा जोतिराव फुले जनारोग्य योजनेत उपचाराची मर्यादा ५ लाखापर्यंत वाढविणे, निराधारांना अर्थसहाय  वाढविणे, यामुळे  सर्वसामान्य नागरिकांना मोठा  दिलासा मिळणार आहे. प्रकल्पबाधित मासेमारांना नुकसानभरपाईसाठी धोरण राबविण्याचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. विविध असंघटित कामगार, विविध दुर्लक्षित समाजांसाठी महामंडळे स्थापल्यामुळे ते मुख्य प्रवाहात येतील. आदिवासी आश्रमशाळांनाआदर्श बनविण्याचा निर्णयही महत्त्वाचा आहे.

सर्वांसाठी घरे

यावर्षी १० लाख घरांचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आखण्यात येत असून इतर मागासवर्गीयांसाठी ३ वर्षात १० लाख घरांची ‘मोदी आवास घरकुल योजना’ सुरु केल्याने राज्यात मोठ्या प्रमाणावर घरांचे बांधकाम होऊन हक्काचा निवारा मिळेल.

पायाभूत सुविधांनी राज्यात बदल

राज्यात महामार्गांचा विस्तार, नवीन रस्ते मेट्रो प्रकल्प, बसस्थानकांचे आधुनिकीकरण, विमानतळांचा विकास, यामुळे राज्यात बदल दिसून यायला सुरुवात होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

रोजगारक्षम युवा शक्ती

उद्योगांना कुशल मनुष्यबळासाठी १० उत्कृष्टता केंद्रे , आयटीआयचे आधुनिकीकरण, ७५ हजार शासकीय पद भरती, स्टार्टअपसाठी नवी मुंबईत कळंबोली येथे निवासी प्रशिक्षण संशोधन संस्था तसेच राज्यात ६ प्रमुख शहरांत सर्क्युलर इकॉनॉमी पार्क उभारणे यासारख्या योजनांमुळे विशेषत: तरुणांना लाभ होईल आणि त्यांच्या करियरला मदत होईल, अशीही प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुंबईचा सर्वांगीण विकास

मुंबईच्या सुशोभीकरणासाठी १७२९ कोटींचा  खर्च अर्थसंकल्पात केल्याने मुंबईचे रूप बदलेल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक तसेच हिंदुह्र्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे यांच्या स्मारकाला त्याचप्रमाणे  राज्यातील इतरही स्मारकांना वाढीव निधी देऊन गती देण्यात येत आहे.

पर्यटनाला देखील चालना

श्री क्षेत्र रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्मृत्यर्थ आष्टी, वर्धा येथे स्मारक, धार्मिक क्षेत्रांचा विकास यामुळे महाराष्ट्राचे वैभव वाढेल. राज्याच्या पर्यटन आराखड्यामुळे पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे. विकास करतांना तो पर्यावरणपूरक असेल याची देखील काळजी घेण्यात आली आहे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी कर, व्याज, शास्ती, व विलंब शुल्क थकबाकीची तडजोड योजना व्यावसायिकांना दिलासा देणारी असेल असे सांगितले.

विधानपरिषद लक्षवेधी

राज्याचा समतोल औद्योगिक विकास साधण्याचे शासनाचे उद्दिष्ट – उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. ९ : राज्याचा समतोल औद्योगिक विकास साधणे आणि अविकसित भागाचा जलद विकास करणे हे  शासनाचे उद्दिष्ट आहे. एमआयडीसीचे वर्गीकरण करताना अविकसित भागात जास्तीत जास्त प्रोत्साहन निधी देण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. तसेच, संभाजीनगर एमआयडीसी परिसरात रस्ते विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला असून, एका महिन्यात रस्त्यांचे काम सुरू होणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.

राज्यात औद्योगिक वसाहतीमध्ये विकासाचा समतोल न साधल्यामुळे परिसरात सोयीसुविधा उपलब्ध होत नसल्याने या संदर्भात सदस्य सत्यजित तांबे यांनी लक्षवेधी मांडली. यास उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते. यावेळी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, जयंत पाटील, निरंजन डावखरे, अमोल मिटकरी यांनी चर्चेत सहभाग घेतला.

मंत्री सामंत म्हणाले की, वेगवेगळ्या प्रादेशिक विभागांतील उद्योगांना प्रोत्साहन देण्याकरिता सामूहिक प्रोत्साहन योजना राबविली जात असून, याअंतर्गत विदर्भ, मराठवाडा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे व नंदूरबार या औद्योगिकदृष्ट्या अविकसित भागांमध्ये सूक्ष्म, लघु व मध्यम तसेच मोठ्या व विशाल प्रकल्पांना आकर्षित करण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी अतिरिक्त वित्तीय प्रोत्साहने व अन्य प्रोत्साहने देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक राज्यात उद्योग व्हावेत, यासाठी दावोसमध्ये १ लाख ३७ हजार कोटींचे करार उद्योगांसमवेत करण्यात आले आहे.

संभाजीनगर येथील एमआयडीसी भागात रस्त्यांचे काम एक महिन्यात त्याचे सुरू होईल. तसेच, एमआयडीसीने मूल्यांकन केलेल्या कराची ५० टक्के रक्कम नियमाप्रमाणे ग्रामपंचायतीला देण्यात येणार आहे. तसेच, ऑरिक सिटीला जोडणारा रस्ताही लवकर करणार असल्याचेही मंत्री सामंत यांनी यावेळी सांगितले.

राज्यात २८९ औद्योगिक वसाहती असून,  त्यापैकी विदर्भ – ९७, मराठवाडा – ४५, नाशिक – २८ व रत्नागिरी-सिंधुदूर्गमध्ये १० अशाप्रकारे या भागामध्ये एकूण १८० वसाहती निर्माण करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक वसाहतींमध्ये एकूण सुमारे ३२५८ कि.मी. लांबी रस्ते बांधलेले असून २४६१ दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणीपुरवठा क्षमता असणाऱ्या पाणीपुरवठायोजना कार्यान्वित आहेत.

औद्योगिकदृष्ट्या अविकसित भागातील उद्योग वाढविणे व प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने या औद्योगिक क्षेत्रातील विशाल प्रकल्पांकरिता रु. ३५० कोटी गुंतवणूक किंवा किमान ५०० रोजगाराचे निकष विहित करण्यात आले आहे. तसेच “उद्योग नसलेले जिल्हे, नक्षलप्रभावित क्षेत्रे व आकांक्षित जिल्हे” या प्रवर्गातील विशाल प्रकल्पांकरिता रु. २०० कोटी गुंतवणूक किंवा किमान ३५० रोजगाराचे निकष विहित करण्यात आले असल्याची माहिती मंत्री सामंत यांनी  यावेळी दिली.

०००

श्रद्धा मेश्राम/स.सं/

सिडको तीनच्या जमिनी अधिसूचीतून काढणार – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 9 : वाळुंज छत्रपती संभाजीनगर सिडको तीनच्या विकासाकरता सिडको प्रशासनाने  शेतकऱ्यांच्या घेतलेल्या जमिनी पुढील अधिवेशनापर्यंत अधिसूचीतून काढण्यात येतील, असे उत्तर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिले.

छत्रपती संभाजीनगर वाळुंज येथील सिडको महानगर तीनच्या विकासाकरिता सिडको प्रशासनाने  गेली ३४ वर्षे कोणतीच कार्यवाही केली नाही, त्यामुळे सिडकोने शेतकऱ्यांच्या घेतलेल्या जमिनी अधिसूचीतून काढाव्यात (डी नोटिफाय कराव्यात) अथवा याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अशी लक्षवेधी विधानपरिषद सदस्य सतीश चव्हाण यांनी विधान परिषदेत उपस्थित केली होती या लक्षवेधीसूचनेवर उत्तर देताना उद्योग मंत्री उदय सामंत बोलत होते.

मंत्री उदय सामंत म्हणाले की, सिडको एक, दोन, तीन व चार नंबरपैकी सिडको एक, दोन व चार पूर्णपणे विकसित झालेले आहे. मात्र सिडको महानगर 3 विकसित व्हायचे बाकी आहे. सिडको तीनच्या विकासासाठी गेले 34 वर्षांपासून शासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे या जमिनी आम्हाला परत कराव्यात अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता सिडको ने शेतकऱ्यांकडून विकासासाठी घेतलेली जमीन पुढील अधिवेशनापर्यंत कार्यवाही करून अधिसूचीतून कमी करण्यात येईल. तसेच सिडको एक दोन व चार मधील विकासासाठी 89 कोटी रुपयांच्या निविदा काढल्या आहेत असेही मंत्री उदय सामंत म्हणाले.

लक्षवेधीच्या अनुषंगाने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपप्रश्न उपस्थित केला होता.

0000

संध्या गरवारे/विसंअ/

मुंबई महापालिकेतील रस्त्यांच्या कामांची टेंडर ही विहित पद्धतीनेच –  मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 9 : मुंबई महापालिकेतील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया विहित पद्धतीचा अवलंब करून राबविण्यात आलेली असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले.

मुंबई महापालिकेतील टेंडरमध्ये अनियमितता तसेच राणीच्या बागेचे आरक्षण बदलणे याबाबत विधानपरिषद सदस्य सचिन अहिर यांनी लक्षवेधी सूचना  उपस्थित केली होती याला उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत बोलत होते.

मंत्री श्री. उदय सामंत म्हणाले की, मुंबई महापालिकेने ज्या निविदा काढलेल्या आहेत त्यामध्ये विधानपरिषद सदस्य सचिन अहिर यांनी उपस्थित केलेल्या AW 252 व AE 144 या दोन निविदा यामध्ये समाविष्ट नाहीत. पावसाळ्यापूर्वी ज्या रस्त्यांची डागडुजी केली जाते, त्या संदर्भातील या सर्व निविदा आहेत. तरीही याबाबत प्राप्त तक्रारींची तपासणी केली जाईल. राणीच्या बागेच्या आरक्षणाबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल, असेही मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या लक्षवेधीच्या अनुषंगाने उपप्रश्न उपस्थित केला होता. मुंबईतील 19 हजार विहिरींपैकी अनेक विहिरी नामशेष झाल्या आहेत. त्यांची परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यांची अद्ययावत माहिती घेऊन पुढील अधिवेशनात सभागृहाच्या पटलावर ठेवावी, असे निर्देश दिले.

विधानसभा इतर कामकाज

बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी गुन्हा; संबंधित शिक्षकांचे निलंबन  शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. 9 : बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी राज्य मंडळाच्या मौखिक आदेशानुसार आणि अमरावतीच्या विभागीय मंडळाच्या लेखी आदेशानुसार बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी आतापर्यंत सात संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून संबंधित शिक्षकांच्या निलंबनाचे निर्देश देण्यात आल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत सांगितले.

बारावीच्या गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता, त्यासंबंधी श्री. केसरकर यांनी विधानसभेत निवेदन केले.

मंत्री श्री केसरकर म्हणाले, “उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा गणित या विषयाचा पेपर दि.०३.०३.२०२३ रोजी सकाळी ११.०० ते २.१० या वेळेत आयोजित करण्यात आला होता. पेपर चालू असतानाच साधारणतः दुपारी १२.३० च्या दरम्यान एका वृत्तवाहिनीवर या पेपरची ६ आणि ७ नंबरची पाने व्हायरल झाल्याची बातमी प्रसारित करण्यात आली. ही पाने साधारणात: सकाळी १०.३० नंतर व्हायरल झाल्याचे वृत्तवाहिनीवर प्रसारित करण्यात आले. आरोपींपैकी ३ आरोपी शिक्षक आहेत. हे स्वयंअर्थसहाय्यित शाळेतील शिक्षक आहेत. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि. बुलढाणा यांना संबंधित शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्याबाबत विभागीय मंडळ, अमरावती यांच्यामार्फत कळविण्यात आले असून त्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प. बुलडाणा यांनी संबंधित शिक्षकांना तात्काळ निलंबित करण्याबाबत संबंधित संस्था / शाळांना निर्देश दिले आहेत.”

डिसिल्वा हायस्कूल, कबुतर खाना, दादर पश्चिम, मुंबई या केंद्रावर एका विद्यार्थ्याकडे मोबाईल आढळून आला व या मोबाईलवर इयत्ता १२ वी गणिताच्या पेपरचा काही भाग आढळून आला. यासंदर्भात केंद्र संचालक यांनी दि.०४.०३.२०२३ रोजी शिवाजी पार्क, पोलीस ठाणे, दादर, मुंबई येथे फिर्याद दाखल केली आहे. या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलीस गुन्हे शाखेकडे गेला असून या गुन्ह्यामध्ये तीन अल्पवयीन व्यक्ती आरोपी आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत असल्याचेही श्री. केसरकर यांनी सांगितले.

००००० 

दिव्यांग मूल असलेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ७३० दिवसांच्या बालसंगोपन रजेची तरतूद  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

मुंबई, दि.९ : दिव्यांग मूल असलेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे मूल २२ वर्षांचे होईपर्यंतच्या कालावधीमध्ये एकूण ७३० दिवसांच्या बालसंगोपन रजेची तरतूद करण्यात आली असल्याचे उच्च व  तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत म.वि.स. नियम ४७ अन्वये निवेदन केले.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, ”सन १९९५ च्या कायद्यानुसार दिव्यांगांचे ७ प्रकार मान्यताप्राप्त होते. त्यामध्ये वाढ होऊन एकूण २१ प्रकारांना २०१६ च्या कायद्यान्वये मान्यता दिलेली आहे. त्याचा अंतर्भाव आदेशात करणे आवश्यक झाल्याने सुधारित आदेश निर्गमित करण्यात येत आहे. तसेच ७३० दिवस बालसंगोपन रजा घेण्यासाठी दिव्यांग पाल्याची वयोमर्यादा २२ वर्षे अशी होती. केंद्र शासनाच्या धर्तीवर सदर वयोमर्यादा काढून टाकण्यात येत आहे. याचा लाभ २२ वर्षांपेक्षा जास्त वयाचे दिव्यांग पाल्य आहेत, अशा शासकीय महिला कर्मचारी/ पुरुष अधिकारी कर्मचारी यांना होईल असे त्यांनी सांगितले.

००००

काशीबाई थोरात/विसंअ

राज्यात जिल्हानिहाय दूध तपासणी प्रयोगशाळा उभारणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

मुंबई, दि. 9 : राज्यात दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत नियमित कार्यवाही केली जाते. येत्या काळात दुधातील भेसळ रोखण्यासाठी विभागांमार्फत विविध मोहिमा राबवण्यात येणार आहेत. राज्यात जिल्ह्यानिहाय दूध तपासणी प्रयोगशाळा उभारणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य अतुल भातखळकर यांनी कांदिवली येथून भेसळयुक्त दूध साठा जप्त केल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री राठोड म्हणाले की, मुंबई शहरामध्ये येणारे दूध मानकाप्रमाणे आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी नाका मोहीम राबवण्यात येते. या मोहिमेत दुधाची चाचणी त्याच ठिकाणी करून दूध कमी दर्जाचे आढळल्यास त्याची कायदेशीररित्या विल्हेवाट केली जाते. या विभागातील रिक्त पदे येत्या तीन महिन्यात भरण्याची कार्यवाही करण्यात येईल, तसेच दुधातील भेसळ तपासण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. याबाबतची लवकरच एसओपी तयार करण्यात येईल. दुग्धविकास मंत्री यांच्या समवेत लवकरच याबाबत बैठक घेण्यात येईल असेही मंत्री राठोड यांनी यावेळी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री रवींद्र वायकर, हरिभाऊ बागडे, राम कदम, राम सातपुते, जयकुमार रावल, देवयानी फरांदे, पृथ्वीराज चव्हाण यांनी सहभाग घेतला.

००००

शैजला पाटील/विसंअ/

अवकाळी पाऊस झालेल्या भागात पंचनामे करण्याचे आदेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 9 : अवकाळी पाऊस, गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता संबधित जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे काम चालू असून पंचनामे झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य नाना पटोले, छगन भुजबळ यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता.

मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार आहे. शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (NDRF) च्या निकषांच्या दुप्पटीने नुकसानभरपाई दिली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत वेळोवेळी शासनाने दिली आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

००००

शैजला पाटील/विसंअ

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

लोककलावंतांना मानधन देण्यासाठी जिल्ह्यातील प्रचलित कला आणि कलावंतांची संख्या विचारात घेणार -मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. ९ – महाराष्ट्रात लोककलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. लोक कलावंतांच्या समस्यांबाबत सर्वंकष निर्णय घेण्यासाठी समिती नेमण्यात आली असून त्याचा अहवाल विभागास नुकताच प्राप्त झाला आहे. या अहवालातील निष्कर्ष तपासून प्रत्येक जिल्ह्यात जपली जात असलेली कला आणि कलावंत यांची तर्कावर आधारित संख्या विचारत घेऊन मानधन देण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानपरिषदेत याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

याबाबत अधिक माहिती देताना मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, राज्यात कलावंतांना अ गटासाठी ३१५० रूपये, ब गटासाठी २७०० रूपये तर क गटासाठी २२५० रूपये इतका सन्मान निधी देण्यात येतो. इतर राज्यांपेक्षा हा निधी जास्त आहे. तथापि याबाबत आणखी वाढ करता येईल का याबाबत अहवालातील निष्कर्ष तपासून निर्णय घेण्यात येईल. कलावंतांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीलाही सन्मान निधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या विविध निवृत्ती वेतन योजनांसाठी वय मर्यादा ६० वर्षांहून अधिक आहे. तथापि राज्यात कलावंतांसाठी ही मर्यादा ५० वर्ष ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. कलावंतांची सविस्तर माहिती एकत्रित असावी यासाठी पोर्टल तयार करण्यात येत असून निवृत्तीच्या वेळी याचा उपयोग होईल, असेही श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. कलावंतांचे जानेवारी २०२३ पर्यंतचे अनुदान वितरित करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई जगताप, सचिन अहिर, विलास पोतनीस, सतेज पाटील, अभिजित वंजारी, श्रीमती उमा खापरे आदींनी सहभाग घेतला.

00000

बी.सी.झंवर /विसंअ

जालना येथे बियाणे पार्क उभारताना लहान कंपन्यांनाही प्रोत्साहन देणार – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

मुंबई, दि. 9 : “राज्यात बियाणे उत्पादन क्षेत्रात पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी जालना येथे बियाणे पार्क उभारण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी एमआयडीसीची जागा उपलब्ध आहे. याअंतर्गत लहान कंपन्यांना सुद्धा उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने कृषी विभागाच्या जागेवर सवलतीच्या दरात जागा देता येईल का, याबाबत विचार करणार” असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानपरिषदेत याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींसमवेत बैठक घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

विधानपरिषद सदस्य सतीश चव्हाण यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, जालना येथे बियाणे पार्क उभारण्याबाबत समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानंतर डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण अधिक असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात देखील बियाणे पार्क उभारण्याबाबत समिती स्थापन करण्यात येईल, असेही त्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

यासंदर्भात झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,  सदस्य ॲड. मनीषा कायंदे, वजाहत मिर्झा आदींनी सहभाग घेतला.

00000

बी.सी.झंवर/विंसअ/

 

नवनिर्वाचित सदस्यांना विधानसभेत शपथ

मुंबई, दि 9 : नवनिर्वाचित विधानसभा सदस्य अश्विनी लक्ष्मण जगताप व रविंद्र हेमराज धंगेकर यांना विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज सदस्यत्वाची  शपथ दिली.

००००

शैलजा पाटील/विसंअ

विधानसभा लक्षवेधी  

ठाणे शहरात समप्रमाणात पाणी पुरवठ्याचे नियोजन करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 9 : ठाणे शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्याबाबत विविध भागातून तक्रारी येत आहेत. त्यासाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याचे समप्रमाणात नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी दिले.

याबाबत विधानसभा सदस्य संजय केळकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, ठाणे शहराला मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी काळू धरण प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यासाठी या प्रकल्पाच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर करुन काळू धरणाचे काम गतीने करण्यात येईल. पाण्याची गळती थांबविण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येतील.

ठाणे शहराची वाढती लोकसंख्या पाहता स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचे नियोजनही करण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य सर्वश्री प्रताप सरनाईक, डॉ. जितेंद्र आव्हाड, वर्षा गायकवाड, रईस शेख यांनी सहभाग घेतला होता.

००००

काशीबाई थोरात/विसंअ/

शेत, पाणंद, शिवरस्ते खुले करण्यासाठी विशेष मोहीम राबविणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, दि. 09 : शेतकऱ्यांच्या शेतीला दळणवळणासाठी रस्त्याच्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यासाठी गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडीवाट, रस्ते, पाणंद, पांधण, शेत रस्ते, शिवार रस्ते, शेतावर जाण्या-येण्याचे रस्ते खुले करण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य अभिमन्यू पवार यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले, राज्यातील शेत जमिनीची मोजणी, जमीन महसुलाची आकारणी व प्रथम जमाबंदीची कार्यवाही सन 1892 ते 1930 दरम्यान पूर्ण करण्यात आलेली आहे. त्यामध्ये शेतजमिनीचे सर्व्हे निहाय गाव नकाशे तयार करण्यात आलेले आहेत. हे सर्व्हे नंबरचे गाव नकाशावर मुळ जमाबंदीवेळचे विविध प्रकारचे रस्ते, गाडीवाट, पायवाट दर्शविलेले आहेत. मूळ जमाबंदीचे वेळी तयार झालेले गाव नकाशे जीर्ण होत असल्याने  ‘डिजिटल इंडिया भूमी अभिलेख अद्ययावतीरण कार्यक्रम’ अंतर्गत राज्यातील भूमापन नकाशांचे डिजीटालायजेशनचे काम सुरु करण्यात आले असून 6 जिल्ह्यांमध्ये डिजीटायजेशन काम  पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरीत 28 जिल्ह्यातील भू-नकाशांचे डिजिटालायजेशन करण्याची कार्यवाही सुरु आहे.तसेच हे रस्ते खुले करुन देण्यासाठी अभ्यासगट नेमण्यात येईल, असेही महसूलमंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

या चर्चेत विधानसभा सदस्य सर्वश्री दिलीप वळसे-पाटील, विजय वडेट्टीवार, आशिष जैस्वाल यांनी सहभाग घेतला होता.

००००

काशीबाई थोरात/विसंअ/

स्थानिक औषध खरेदीच्या मर्यादेत वाढ  वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

 

मुंबई, दि. 09 : शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या स्थानिक औषध खरेदीची मर्यादा वाढविण्यात आली असून ती 10 टक्क्यांवरुन 30 टक्के करण्यात आली आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत दिली.

याबाबत सदस्य किशोर जोरगेवार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर या संस्थेच्या काही वॉर्डातील पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यामुळे पाणीपुरवठा बंद झाला होता आणि शस्त्रक्रिया बंद होत्या, अशी तक्रार आहे. मात्र, दि. 3 फेब्रुवारी 2023 रोजी नेत्र शस्त्रक्रियागृहाला पाणीपुरवठा करणारा पाईप फुटलेला आढळला. तरीही बाहेरुन पाणी पुरवठा करुन त्यादिवशी 17 रुग्णांवर मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अडचणी आहेत. त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात येतील. तसेच याबाबत औषध खरेदीला लागणारा वेळ लक्षात घेऊन तमिळनाडूच्या धर्तीवर स्वतंत्र औषध खरेदी प्राधिकरणाची निर्मिती करण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.

या चर्चेत सदस्य सर्वश्री विजय वडेट्टीवार, नाना पटोले, डॉ.देवराव होळी यांनी सहभाग घेतला.

000

काशीबाई थोरात/विसंअ/

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची उत्पन्न मर्यादा दीड लाखावरुन पाच लाख रुपये – आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

मुंबई, दि 9 : महाराष्ट्रात 2 जुलै 2012 पासून राबविण्यात येणारी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची उत्पन्न मर्यादा दीड लाखावरुन पाच लाख रुपये करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य डॉ. राहुल पाटील महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये लक्षवेधी सूचनेद्वारे या योजनेबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

प्रा.डॉ. सावंत म्हणाले की, 23 सप्टेंबर 2018 पासून प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसोबत एकत्रितपणे राबविण्यात येत आहे. ही योजना अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना वैद्यकीय उपचारांसाठी अंगीकृत रुग्णालयांमधून नि:शुल्क गुणवत्तापूर्ण उपचार देण्याच्या हेतूने राबविण्यात येते. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये 996 उपचार सामायिक असून प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभार्थींसाठी अतिरिक्त 213 उपचार मिळून एकूण 1,209 उपचार समाविष्ट करण्यात आले आहेत. योजना सुरु झाल्यापासून म्हणजेच 2 जुलै 2012 ते 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत ॲलोपॅथीमध्ये 51 लाख 90 हजार उपचार आणि 10 हजार 330 कोटी रुपये रुग्णांना अदा करण्यात आले आहेत.

एकत्रित योजनेमध्ये रुग्णांना गंभीर, गुंतागुंतीच्या आणि तातडीच्या आजारांवर उपचार करुन रुग्णाचे प्राण वाचविण्याच्या हेतूने 34 विशेषज्ञ सेवांमध्ये द्वितीय आणि तृतीय स्तराचे वैद्यकीय उपचार आणि विविध शस्त्रक्रिया यांचा समावेश करण्यात आला आहे. एकत्रित योजनेमध्ये ॲलोपॅथी उपचारांचा समावेश करण्याबाबत निर्णय राज्य शासनमार्फत घेण्यात आला असल्याचेही डॉ. सावंत यांनी सांगितले.

०००

वर्षा आंधळे/विसंअ

 

अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या कामाला गती देणार मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

 

मुंबई दि 9:  अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालय हे या जिल्ह्यातील गर्भवती महिला, प्रसृत माता तसेच नवजात बालकांसाठी आरोग्य संजीवनी आहे. या रुग्णालयात केवळ अमरावतीच्या नव्हे तर धारणी, मेळघाटासह अनेक महिला उपचारांसाठी येत असतात, त्यामुळे अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या कामाला गती देण्यात येईल असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य ॲड. यशोमती ठाकूर, सुलभा खोडके, विकास ठाकरे यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये लक्षवेधी सूचनेद्वारे अमरावती रुग्णालयाबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

प्रा.डॉ. सावंत म्हणाले की,अमरावती येथे सध्या 189 खाटांचे रुग्णालय कार्यान्वित आहे.28 ऑगस्ट 2009 च्या शासन निर्णयानुसार अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयास 189 खाटांवरुन 400 खाटा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय 12 एप्रिल 2013 च्या शासन निर्णयानुसार याच रुग्णालयात अतिरिक्त 200 खाटांच्या बांधकामाकरिता 45 कोटी 61 लाख 58 हजार इतक्या रकमेच्या अंदाजपत्रक आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या इमारतीचे बांधकाम 90 टक्के पूर्ण झाले असून इमारतीस विद्युतीकरण आणि अनुषंगिक कामे करण्यात येत आहेत. याशिवाय वाढीव 200 खाटांकरिता अतिरिक्त मनुष्यबळाकरिता पदनिर्मितीचा प्रस्ताव आयुक्तालयाकडून अप्राप्त आहे.

अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या 400 खाटांच्या नतून इमारतीमध्ये भौतिक सुविधांची कामे आणि आरोग्य साधनांची पूर्तता यावर भर देण्यात येत आहे. मे 2023 पर्यंत रुग्णालय बांधकामाचे काम पूर्ण करण्यात येईल. यानंतर इलेक्ट्रिक काम 1 महिन्यात पूर्ण करण्यात येईल. याच दरम्यान आवश्यक उपकरण खरेदी करण्याचे काम येत्या दीड महिन्यात करण्यात येईल. तसेच आवश्यकतेनुसार पदभरतीलाही गती देण्यात येईल. सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये फेज 2 इमारतीमध्ये न्युरोसर्जरी आणि कॅन्सर रुग्णांसाठी केमोथेरपी युनिट यासाठी लागणारा आवश्यक निधी पुरवणी मागणीद्वारे मागण्यात येईल, असेही डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.

०००

वर्षा आंधळे/विसंअ

जलसंधारणाच्या कामात गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई – मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत

मुंबई, दि 9 : जळगाव येथील पारोळा उपविभागामध्ये जलसंधारणाच्या विविध कामांमध्ये कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता यांनी गैरव्यवहार केल्याचे दिसून येत असून याबाबत चौकशी सुरु आहे. दरम्यान येथे कार्यरत कार्यकारी अभियंता यापूर्वीच निवृत्त झाले असून उपअभियंता यांना निलंबित करण्यात येईल, असे मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य अनिल पाटील, विजय वडेट्टीवार, प्राजक्त तनपुरे, अनिल देशमुख यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये लक्षवेधी सूचनेद्वारे जळगाव येथील जलसंधारणाच्या कामांमध्ये अनियमितता याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

प्रा. डॉ. सावंत म्हणाले की, मृद व जलसंधारण विभागाअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील जिल्हा नियोजन निधीअंतर्गत प्रशासकीय मान्यताप्राप्त दोन योजनांच्या कामांमध्ये कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता यांनी संगनमताने गैरव्यवहार केल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे 24 ऑगस्ट 2022 रोजी प्राप्त झाली होती. या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी 29 ऑगस्ट 2022 रेाजी त्रिसदस्यीय त्रयस्थ चौकशी स्थापन केली होती. या समितीने आपला चौकशी अहवाल 28 सप्टेंबर 2022 रेाजी शासनास सादर केला आहे. या अहवालानुसार अनियमितता झाल्याचे नमूद करण्यात आले आहे तसेच या कामांचे विशेष लेखापरीक्षण करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार 26 डिसेंबर 2022 रेाजी जिल्हाधिकारी यांनी या कामांचे विशेष लेखापरीक्षण करुन अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. विशेष लेखापरीक्षण समितीने याबाबतचा अहवाल 3 मार्च 2023 रोजी शासनास सादर केला आहे.या अहवालात विशेष लेखापरीक्षण समितीने वित्तीय अधिकारी नियम पुस्तिकेतील अटी व नियमांचे पालन न केल्याबाबत तसेच अनियमितता झाल्याचे नमूद केले आहे. त्याअनुषंगाने संबंधित विभागामार्फत प्रशासकीय कार्यवाही करण्याची तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी करण्याची कार्यवाही करण्यासाठी जळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडून 6 मार्च 2023 रोजी दोषारोपपत्र मागविण्यात आले आहेत.

०००

वर्षा आंधळे/विसंअ 

१०० आदिवासी विद्यार्थ्यांना पीएचडी अभ्यासक्रमासाठी संशोधन अधिछात्रवृत्ती मिळणार आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

मुंबई दि 9:  राज्यातील 100 आदिवासी विद्यार्थ्यांना पीएचडी अभ्यासक्रमासाठी संशोधन अधिछात्रवृत्ती मिळणार आहे. 3 फेब्रुवारी 2023 रोजी याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री  डॉ. विजयकुमार गावित यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य रोहित पवार, विजय वडेट्टीवार, डॉ. देवराव होळी, योगेश सागर, सुरेश वरपुडकर यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये लक्षवेधी सूचनेद्वारे संशोधन अधिछात्रवृत्तीबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

डॉ. गावित म्हणाले की,राज्यातील 100 आदिवासी विद्यार्थ्यांना दरवर्षी संशोधनासाठी अधिछात्रवृत्ती दिली जाते. यावर्षासाठीच्या निवडप्रक्रिया कार्यवाहीबाबत 24 फेब्रुवारी 2023 रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. त्याअनुसार 1 मार्च 2023 पासून अजर्‍ येण्यास सुरुवात झाली असून ३१ मार्चपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी विद्यार्थ्यांच्या अर्जांची संख्या १०० पेक्षा अधिक प्राप्त झाली, तर विद्यार्थी संख्येवाढ करण्यात येईल.सद्यस्थितीत सुरू असलेल्या संशोधन अधिछात्रवृत्तीमध्ये अन्य विद्याशाखांचा समावेश केला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना दरमहा ३१ हजार रुपये अधिछात्रवृत्ती दिली जाते. दिव्यांगांना अतिरिक्त दोन हजार रुपये सहाय्य अनुदान दिले जाते. विशेष म्हणजे हे सगळे लाभार्थींना त्यांच्या खात्यात थेट दिले जाते.

0000

येत्या आर्थिक वर्षात खावटी योजना राबविण्याचे प्रस्तावित आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

मुंबई दि 9:  राज्यातील आदिवासी लोकांना सहाय्य करण्यासाठी 12 ऑगस्ट 2020 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 1 वर्षासाठीच (2020-21) खावटी अनुदान योजना सुरु करण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली होती. यानुसार 9 सप्टेंबर 2020 रोजी खावटी अनुदान योजना सुरु करण्यात आली. येत्या आर्थिक वर्षात खावटी योजना राबविण्याचे प्रस्तावित असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य धर्मरावबाबा आत्राम, विजय वडेट्टीवार, रोहित पवार, सुलभा खोडके, डॉ. देवराव होळी, ॲङ यशोमती ठाकूर यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये लक्षवेधी सूचनेद्वारे खावटी कर्ज वितरीत करण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

डॉ. गावित म्हणाले की, सन 2020-21 मध्ये राबविण्यात आलेल्या खावटी अनुदान योजनेअंतर्गत अनुसूचित जमाती लाभार्थींना 4 हजार रुपये लाभ अनुज्ञेय होता. यामध्ये 2 हजार रुपये रकमेचे वस्तू स्वरूपात वाटप करण्यास तसेच 2 हजार रुपये इतकी रक्कम लाभार्थ्यांच्या राष्ट्रीयकृत बँकेमधील किंवा डाक खात्यात जमा करण्यात आले होते.

जून ते सप्टेंबरमध्ये ऐन पावसाळयात रोजगार उपलब्ध होत नसल्याने आदिवासींची उपासमार होऊ नये यासाठी खावटी कर्ज योजना लागू करण्यात आली. यासाठी शासनाने महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळास फिरता निधी उपलब्ध करुन दिला होता. सन 2009-10 ते 2013-14 या कालावधीत 244.60 कोटी रुपये खावटी कर्ज आणि त्यावरील व्याज 116.57 कोटी रुपये असे एकूण 361.17 कोटी रुपयांचे खावटी कर्ज शासनाने 6 जून 2019 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे माफ केले असल्याचे डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.

0000

वर्षा आंधळे/विसंअ

 

ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अन्थोनी अल्बानीज यांचे मुंबईत आगमन

मुंबई, दि. 9 :- ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अन्थोनी अल्बानीज यांचे मुंबईत दुपारी 12.05 वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले.

यावेळी मुंबईचे उपनगरचे पालकमंत्री तथा पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा, अतिरिक्त मुख्य सचिव व महानगर आयुक्त मुंबई महानगर विकास प्राधिकरण श्री. एस. व्ही. आर. श्रीनिवास, अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, मुंबई मेट्रो रेलच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आदींनी स्वागत केले.

यावेळी राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी व पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रमासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा- मंत्री चंद्रकांत पाटील

0
पुणे, दि. १८: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह शहरातील विविध शाळेत जागतिक योगादिनाचे औचित्य साधून २१ जून रोजी 'वारकरी भक्तीयोग' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे,...

सिंचन योजनांची कामे जलद गतीने करा – मंत्री गिरीश महाजन

0
मुंबई, दि. १७: राज्यातील  सिंचन योजनांची कामे विहित मुदतीत पूर्ण  होणे आवश्यक आहे. ही कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यासाठी त्याचे सूक्ष्म, सुयोग्य नियोजन करून...

‘मनरेगा’शी संबंधित मागण्यांबाबत सकारात्मक – मंत्री भरत गोगावले

0
मुंबई, दि. १७ : शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, विधवा महिला, बेरोजगार युवक, मेंढपाळ आणि मच्छीमार बांधव यांच्याशी संबंधित विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी रोजगार हमी योजना,...

स्वस्त धान्य दुकानदारांचे थकीत कमिशन देण्याची कार्यवाही करावी – मंत्री छगन भुजबळ

0
मुंबई, दि. १७: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे मागील थकीत कमिशन अदा करण्याची कार्यवाही करावी. केंद्राचा निधी प्राप्त झाल्यानंतर राज्याला द्यावयाचा हिस्सा तातडीने देवून कमीशन...

रत्नागिरी जिल्ह्यातील मृद व जलसंधारण प्रकल्पांच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवा – मंत्री संजय राठोड

0
मुंबई, दि.१७ : रत्नागिरी जिल्ह्यातील मृद व जलसंधारण प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवून काम सुरू करावे, असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले. मंत्रालयात...