शनिवार, जून 14, 2025
Home Blog Page 1453

नागपूर विभागाने देशात अव्वल येण्यासाठी १०० टक्के उद्दिष्टपूर्ती करावी –    विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी

नागपूर दि. 10 मार्च : नागरिकांना त्यांच्या स्वप्नातील घर उपलब्ध करून देण्यासाठी महाआवास योजनेंतर्गत नागपूर विभागाने आतापर्यंत 78 टक्के उद्दिष्टपूर्ती करून राज्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. यापुढे राज्य व राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करून अव्वल येण्यासाठी  घरकुल बांधकामाची 100 टक्के उद्दिष्टपूर्ती करून अजून चांगली कामगिरी करावी, अशी अपेक्षा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी व्यक्त केली.

            महाआवास अभियानांतर्गत 2021-22 च्या विभागस्तरीय पुरस्काराचे वितरण विभागीय आयुक्त यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आयुक्त बिदरी बोलत होत्या. भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गंगाधर जिभकाटे व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंदरे, विकास शाखेचे उपायुक्त कमलकिशोर फुटाणे, नागपूर जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकर, गडचिरोलीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, गोंदियाच्या प्रकल्प संचालक प्रमिला जाखलेकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

            आयक्त बिदरी यांनी पुढे सांगितले की लाभार्थ्याच्या नावे जमीन नसल्याकारणाने  प्रलंबित घरकुलाची कामे मार्गी लावण्यात यावी, यासाठी संबंधीत ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांनी वापरात नसलेल्या शासकीय जमीनीची शिफारस करून जमीन नसलेल्या लाभार्थ्यांना घरकुल मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्याचे त्यांनी सांगितले. अभियानात उत्कृष्ट कामगिरी करून पुरस्कार मिळविणाऱ्या जिल्हा व ग्रामपंचायतींचे त्यांनी अभिनंदन केले.

उपायुक्त कमलकिशोर फुटाणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकेतून महाआवास योजनेबाबत व संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाची माहिती दिली.

            यप्रसंगी महाआवास अभियानांतर्गत 2021-22 मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्ह्यांना आयुक्त बिदरी यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यात केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत दोन्ही योजनेत जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकासाठी भंडारा जिल्ह्याची  निवड करण्यात आली.  तसेच दोन्ही योजनेत तालुकास्तरावरील प्रथम तीन क्रमांक भंडारा जिल्ह्याने मिळवून अव्वल कामगिरी केली आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गंगाधर जिभकाटे यांनी जिल्ह्याचा प्रथम पुरस्कार स्विकारला.

जिल्हास्तरावर केंद्र पुरस्कृत योजनेत द्वितीय क्रमांक गोंदिया तर तृतीत क्रमांकासाठी गडचिरोला पुरस्कार देण्यात आला. तर राज्य पुरस्कृत योजनेत गडचिरोली ‍ जिल्ह्याला द्वितीय आणि  चंद्रपूरला तृतीत पुरस्कार देण्यात आले.  सर्वोत्कृष्ट तीन तालुक्यांसाठी केंद्र पुरस्कृत योजनेमध्ये भंडारा जिल्ह्यातील साकोली, लाखांदूर व मोहाडी तर राज्य पुरस्कृत योजनेत लाखनी, पवनी व भंडारा या पंचायत समित्यांना अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. सर्वोत्कृष्ट तीन ग्रामपंचायतींसाठी केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत  वडाळा ता. आष्टी, सिंदीविहीरी  ता. कारंजा व दारोडा ता. हिंगणघाट  या वर्धा जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींना पुरस्कार देण्यात आला. तसेच राज्य पुरस्कृत योजनेत वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर पंचायत समितीमधील धामनगाव व सेलू पंचायत समितीमधील सालईपेवठा तसेच चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभिड पंचायत समितीमधील मोहाडी  या ग्रामपंचायतींची प्रथम, द्वितीय व तृतीय स्थानासाठी निवड करण्यात आली. शासकीय जागा उपलब्धता व वाळू उपलब्धतेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन तालुक्यांनाही पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यात केंद्र पुरस्कृत योजनेत गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा व अहेरी आणि गोंदिया तालुक्याची निवड करण्यात आली तर राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत गडचिरोलीच्या देसाईगंज व गोंदियाच्या तिरोडा व सालेकसा या तालुक्यांची निवड करण्यात आली. यावेळी संबंधीत प्रतिनिधींनी  पुरस्कार स्विकारले.

यासोबतच संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन 2018-19 करीता निवड झालेल्या संस्थांनाही आयुक्त बिदरी यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. यात नागपूरच्या कामठी तालुक्यातील महालगाव ग्राम पंचायतीला प्रथम क्रमांकासाठी 10 लाख रुपयांचा धनादेश व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. गोंदियाच्या शिरेगावबांध व भागी या ग्रामपंचायतींना संयुक्तपणे द्वितीय पुरस्कार रुपये चार लाख व सन्मानचिन्ह देण्यात आले. तसेच तृतीय पुरस्कार नागपूरच्या चिकना व चंद्रपूरमधील आष्टा या ग्रामपंचायतींना संयुक्तपणे देण्यात आला.

पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे संचालन दिनेश मासोदकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार सहायक आयुक्त स्वाती इसाये यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला विभागातील उपायुक्त, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक,  गट विकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

विधानसभा प्रश्नोत्तरे

‘आरे’साठी सर्वंकष विकास आराखडा लवकरच तयार करण्यात येईल – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, दि. 10 : गोरेगाव येथील आरे कॉलनीच्या विकासासाठी सर्वंकष आराखडा लवकरच तयार करण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले.

सदस्य रवींद्र वायकर, सुनील राणे यांनी ‘आरे’च्या पुनर्वसनाबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, आरे वसाहतीच्या अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्त्यांचे डांबरीकरण न करता काँक्रिटीकरण करण्यात येईल. ‘आरे’ हा भाग पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रांतर्गत येत असल्याने या भागाचा विकास करताना पर्यावरण विभागाची परवानगी असणे आवश्यक आहे.

गोरेगाव चेकनाका येथे उभारण्यात येत असलेल्या प्रवेशद्वाराचे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार, असे नामकरण करण्यात आले आहे. मात्र याबाबतचा प्रस्ताव का प्रलंबित आहे हे तपासून पाहण्यात येईल. आरे परिसरात अनधिकृत पद्धतीने राहणाऱ्या नागरिकांना हटविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत  समिती गठित करण्यात येईल. ‘आरे’ येथील तलावांमधील गाळ बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून काढण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येईल, असेही श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

आरे वसाहतीत होणारे निष्कासन रोखण्यासाठी आरे प्रशासन आणि पोलीस यंत्रणेच्या सहाय्याने सातत्याने निष्कासनाची कारवाई करण्यात येते. आरे वसाहत ही केंद्र शासनाने पर्यावरणदृष्ट्या संवेदनक्षम क्षेत्र म्हणून घोषित केल्याने आरे वसाहतीतील पर्यटन स्थळांचे सुशोभीकरण करण्यासाठी असणाऱ्या मर्यादा विचारात घेऊन आरे दुग्ध वसाहतीच्या सुशोभीकरणासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण करुन सर्वंकष विकास आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याची कार्यवाही सुरु असल्याचेही श्री. विखे – पाटील यांनी सांगितले.

०००

वर्षा आंधळे/विसंअ/

 

अस्मिता योजना पुन्हा सुरू करणार – मंत्री गिरीष महाजन

मुंबई, दि. 10 : ‘अस्मिता’ योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार असून याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. लवकरच ही योजना पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचे ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्या नमिता मुंदडा यांनी राज्यात महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या अस्मिता योजनेच्या सुधारित प्रस्तावास मंजुरी देण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, ग्रामीण भागातील महिला आणि किशोरवयीन मुलींना स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यासाठी अस्मिता योजना सुरू करण्यात आली. महिलांच्या आरोग्याचा दृष्टीने ही महत्त्वाची योजना आहे. नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या योजनेत महिला व किशोरवयीन मुलींना एक रुपयात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेची प्रक्रिया सुलभ पद्धतीने करण्यासाठी सर्व महिला आमदारांसोबत अधिवेशन काळात बैठक घेण्यात येईल, असेही मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्या प्रा. वर्षा गायकवाड, डॉ. भारती लव्हेकर, सुलभा खोडके, यामिनी जाधव, सदस्य हसन मुश्रीफ, राजेश टोपे यांनी सहभाग घेतला.

***

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्ते सिमेंटचे करणार – मंत्री गिरीष महाजन

 मुंबई, दि. 10 : राज्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत येणारे रस्ते सिमेंटचे करण्यात येणार असल्याचे ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य सुनील राणे यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत केलेल्या कामांचे कंत्राटदारांकडून वस्तू व सेवाकराची रक्कम कपात न केल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री.महाजन म्हणाले की, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत होणाऱ्या कामाबाबत संबंधित कंत्राटदाराचे अंतिम देयक अदा करताना नियमानुसार वस्तू व सेवाकराची कपात करून कंत्राटदाराला देयके अदा केली जातात. कंत्राटदारांना काम देण्याअगोदर त्यांची बीड कॅपॅसिटी किती आहे हे तपासली जाते.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य सर्वश्री बाळासाहेब थोरात, बाळासाहेब पाटील, हरिभाऊ बागडे, नारायण कुचे, प्रशांत बंब, आशिष जयस्वाल यांनी सहभाग घेतला.

०००००

लांजा ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू – सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

मुंबई, दि 10 : ग्रामीण रुग्णालय लांजा येथे 28 मंजूर पदांपैकी 21 पदे भरण्यात आलेली असून रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य राजन साळवी यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदांबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री डॉ. सावंत म्हणाले की, ग्रामीण रुग्णालय लांजा येथील अधीक्षक पद रिक्त आहे. याबाबत विभागामार्फत चौकशी करून अहवाल मागविण्यात येईल. राज्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री अशोक चव्हाण, अनिल देशमुख, शेखर निकम, राम सातपुते, आदिती तटकरे, देवयानी फरांदे यांनी सहभाग घेतला.

000

शैलजा पाटील /व.स.अ

 

विधानसभा लक्षवेधी

परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग स्थळांच्या सर्वांगीण विकास व संवर्धनासाठी लवकरच बैठक घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 10 : परळी येथील वैजनाथ ज्योतिर्लिंग स्थळांच्या सर्वांगीण विकास व संवर्धनासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य धनंजय मुंडे यांनी याबाबत लक्षवेधी सूचना विधानसभेत मांडली होती.

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या ‘प्रसाद’ योजनेअंतर्गत परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचा समावेश करण्यासाठी याबाबतचा सविस्तर प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडून मागविण्यात आला आहे. केंद्रीय पर्यटन मंत्रालयास सादर करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी उत्तरात सांगितले आहे.

००००

काशीबाई थोरात/विसंअ

 

परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापनेबाबत सकारात्मक निर्णय घेणार – सहकार मंत्री अतुल सावे

 

मुंबई, दि. 10 : ब्राम्हण समाजाच्या गरीब कुटुंबातील तरुणांना शैक्षणिक व व्यवसायासाठी अर्थसहाय्य मिळण्यासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची अनेक दिवसांपासून मागणी आहे. याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे सहकार मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितले.

याबाबत विधानसभा सदस्य प्रकाश सोळंके यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री.सावे म्हणाले, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी ‘अमृत’ (ॲकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च, अपलिफ्टिंग अँड ट्रेनिंग) ही संस्था आहे. यामध्ये या तरुणांना संधी देण्यात येईल, असेही श्री. सावे यांनी यावेळी सांगितले.

००००

काशीबाई थोरात/विसंअ/10.03.2023

‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ प्रकरणातील प्रलंबित प्रॉपर्टीकार्डची प्रक्रिया लवकरच पूर्ण करणार – मंत्री शंभुराज देसाई

मुंबई, दि. 10 :- पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे विलिनीकरण पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या संस्थेमध्ये केले. या प्राधिकरणाअंतर्गत संपादित केलेल्या भूखंडाचे भूमापन प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे प्रॉपर्टीकार्ड देण्यासंदर्भात अडचणी आहेत. ही प्रक्रिया लवकर पूर्ण करुन प्रॉपर्टीकार्ड देण्यात येतील, असे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले.

याबाबत विधानसभा सदस्य महेश लांडगे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. देसाई म्हणाले, प्राधिकरणासाठी संपादित झालेले क्षेत्र हे प्राधिकरणाच्या ताब्यात असल्यामुळे नगर भूमापन चौकशी वेळीचे मिळकत पत्रिकांवरती (प्रॉपर्टीकार्ड) मूळ धारक पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण यांचे नाव घोषित करण्यात आलेले आहे. यात निवासी, वाणिज्य, औद्योगिक, सार्वजनिक सुविधा व इतर प्रयोजनाच्या भूखंडाचा ले-आऊट मंजूर करण्यात आलेला आहे. आतापर्यंत 8 हजार 300 भूखंडांचे 99 वर्षाच्या भाडेपट्याने नागरिकांना वाटप करण्यात आलेले आहे.याबाबत संबंधित विभागांची एकत्रित बैठक घेऊन ही सुविधा लवकरच पूर्ण करण्यात येईल, असेही मंत्री श्री.देसाई यांनी सांगितले.

000

काशीबाई थोरात/विसंअ/10.03.2023

 

कोल्हापूर चित्रनगरीचा कायापालट करण्यात येणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 10 : कोल्हापूर चित्रनगरीत मालिका तसेच चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी अद्ययावत सोयीसुविधा निर्माण करण्याबरोबरच येत्या काळात चित्रनगरीचा कायापालट करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य रोहित पवार, हरिभाऊ बागडे, हसन मुश्रीफ, दीपक चव्हाण यांनी  महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये लक्षवेधी सूचनेद्वारे कोल्हापूर चित्रनगरीत अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले की, येत्या काळात कोल्हापूरात 78 एकर परिसरात असलेल्या चित्रनगरीत चित्रीकरणासाठी चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देताना येथे उभारण्यात आलेले चित्रीकरणाचे सेट पर्यटकांचे आकर्षण ठरतील. सध्या मोठ्या प्रमाणावर येथे आधुनिकीकरणाची कामे हाती घेण्यात येत असल्याने रोजगार आणि महसूल निर्माण होण्यास मदत होत आहे.

कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक 18 जानेवारी 2023 रेाजी घेण्यात आली. या बैठकीत कोल्हापूर चित्रनगरीत रेल्वे स्थानकाचा तसेच रेल्वे स्थानकाच्या एका बाजूस शहर आणि एका बाजूस गाव वस्तीचा देखावा तयार करणे, कोल्हापूर चित्रनगरीच्या मुख्य प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण करणे, कोल्हापूर चित्रनगरी येथे रस्ते तयार करण्याबरोबरच पथदिवे बसविणे, तसेच येथील संपूर्ण परिसरात पाणी पुरवठ्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रंमाक 4 ते चित्रनगरीपर्यंत 100 मि.मि. व्यासाची जलवाहिनी टाकणे आणि पाण्याची टाकी बांधणे, टॉक शो स्टुडिओकरिता ध्वनी प्रतिबंध आणि अग्निशमन योजना करणे, येथे सोलर यंत्रणा बसविणे असे निर्णय घेण्यात आल्याचे श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज तसेच राष्ट्रपुरुष, समाजसुधारक यांच्या कार्यावर तयार करण्यात आलेल्या चित्रपटांना यापूर्वी 50 लाख रुपये अनुदान देण्यात येत होते हे अनुदान आता 1 कोटी रुपयांपर्यंत देण्यात येणार आहे. तसेच मालिका आणि चित्रपट यांनाही हे देण्यात येईल. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आपली संस्कृती जतन, संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर चांगले कन्टेंट यावे यासाठी 5 तज्ज्ञ लोकांची समिती नुकतीच करण्यात आली आहे. याशिवाय मराठीत दर्जेदार चित्रपट निर्मिती करणाऱ्यांना राज्य शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या अनुदानाचे वाटप नुकतेच करण्यात आले असून 41 मराठी चित्रपटांना अनुदान देण्यात आल्याचे श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

०००

वनक्षेत्रासंदर्भात मार्ग काढण्यासाठी महसूल विभागाबरोबर संयुक्त बैठक घेणार – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 10 : महसूल विभागाच्या ताब्यातील वनक्षेत्रासंदर्भात मार्ग काढण्यासाठी महसूल विभागाबरोबर संयुक्त बैठक लवकरच घेण्यात येईल, असे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य ॲड. राहुल कुल यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये लक्षवेधी सूचनेद्वारे महसूल विभागाच्या ताब्यातील वनक्षेत्र विविध सिंचन प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबातचा प्रश्न उपस्थित केला होता.

वन मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, राज्यातील एकूण वनक्षेत्रापैकी महसूल विभागाच्या ताब्यातील वनक्षेत्र विविध सिंचन प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी तसेच ग्रो मोअर योजना, भूमिहीनांच्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उपजीविकेसाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत वाटप करण्यात आले आहेत. वनक्षेत्राचे वाटप करताना अथवा केल्यानंतर प्रस्तुत क्षेत्राचे भारतीय वन अधिनियम, 1927 च्या कलम 27 अंतर्गत निर्वनीकरण करणे आवश्यक होते. तथापि, बहुतांश प्रकरणांमध्ये वाटप केलेल्या क्षेत्राचे निर्वनीकरण करण्यात आलेले नाही, त्यामुळे याबाबत लवकरच महसूल विभागाबरोबर संयुक्त बैठक घेण्यात येईल. वन (संवर्धन) अधिनियम, 1980 मध्ये आला. या कायद्यानुसार कोणतेही क्षेत्र निर्वनीकरण करणे तथा वनक्षेत्राचा वनेत्तर वापर करण्यासाठी केंद्र शासनाची पूर्व मान्यता घेणे आवश्यक आहे.

महसूल विभागाच्या ताब्यातील वनक्षेत्राबाबत वन विभागाचे धोरण स्पष्ट करुन महसूल विभागाच्या ताब्यात असलेल्या वनजमिनी वन विभागास परत करण्याबाबत तसेच वनजमिनीची नोंद अभिलेखात अद्ययावत करण्याची कालमर्यादा ठरविण्याबाबत मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महसूल विभागाच्या ताब्यातील जी वनजमीन काही करणास्तव वन विभागास वर्ग करणे शक्य झालेले नाही, अशा जमिनीची यादी तयार करुन कारणासह शासनास अहवाल सादर करणे तसेच महसूल विभागाने विविध प्रयोजनासाठी पूर्वी वाटप केलेले वनक्षेत्र आणि अतिक्रमित वनक्षेत्र नियमित करण्यासाठी यापूर्वी सूचना देण्यात आल्याचे वन मंत्री यांनी यावेळी सांगितले.

वन जमिनीतून पिण्याच्या पाण्यासाठी अथवा सिंचनासाठी पाईपलाईन टाकण्यासाठी प्रस्ताव सादर करणे आवश्यक असते. किती ठिकाणच्या गावात पाईपलाईन टाकण्याचे बाकी आहे, याबाबतची माहिती वन आणि महसूल विभागास दिल्यास याबाबत संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना कळविण्यात येईल. ग्रामीण भागात बिबट आणि तत्सम हिंस्त्र वन्यप्राण्यांचा होणारा धोका कमी करण्याकरिता वनालगतच्या संवेदनशील गावांच्या वन सीमेवर सौर ऊर्जा कुंपन, सोलर लाईटचे वाटप याचा पुरवठा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेंतर्गत वन विभागामार्फत करण्यात आल्याचे श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

०००

मागासवर्गीय गृहनिर्माण योजनेंतर्गत पुनर्विकास धोरण लवकरच – मंत्री संजय राठोड

मुंबई, दि. 10 : सर्वसामान्य मागासवर्गीयांसाठी सामाजिक न्याय विभागामार्फत मागासवर्गीय गृहनिर्माण योजना राबविली जाते. लवकरच मंत्रिमंडळासमोर मागासवर्गीय गृहनिर्माण योजनेंतर्गत पुनर्विकास धोरण आणण्यात येईल, अशी माहिती मंत्री संजय राठोड यांनी आज विधानसभेत दिली.

सदस्य वर्षा गायकवाड यांनी मुंबईतील विक्रोळी, कन्नमवार नगर येथील 45 वर्षांपूर्वी मागासवर्गीयांसाठी बांधण्यात आलेल्या गृहनिर्माण योजनेच्या पुनर्विकास कामाबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री. राठोड म्हणाले की, राज्यातील मागासवर्गीयांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने युद्धोत्तर पुनर्वसन योजना-219 सुरु केली. या योजनेंतर्गत मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थांना भूखंडाचे वाटप करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थांना अनेक सवलती जसे की, अनुदान, कर्ज, जमीन अनुदान तसेच सरकारी जमीन उपलब्ध असल्यास निशुल्क दिली जाते. या संस्थांबाबत मागासवर्गीय सभासदांचे प्रमाण 90 टक्के आणि अमागासवर्गीय सभासदांचे प्रमाण 10 टक्के इतके निश्चित करण्यात आले आहे.

मुंबईत सर्वसामान्य मागासवर्गीयांसाठी गृहनिर्माण योजनेंतर्गत इमारती बांधण्यात आल्या आहेत. या इमारतींना 40 ते 50 वर्षे होऊन गेली आहेत. या इमारतींच्या पुनर्विकासाबाबतचे धोरण ठरविण्यात येत आहे. पुनर्विकासाबाबत समाजकल्याण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली असून या समितीने केलेल्या शिफारशी शासनास सादर करण्यात आल्या आहेत. लवकरच याबाबतचे धोरण निश्चित करण्यात येईल, असे श्री. राठोड यांनी सांगितले.

०००

आरोग्य सेविकांची दोन महिन्यांत भरती – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

 मुंबई, दि. 10 : गेल्या तीन वर्षांपासून आरोग्य सेविकांची भरती झालेली नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र येत्या दोन महिन्याच्या आत ही भरती प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य रवी राणा, वैभव नाईक, मनीषा चौधरी यांनी आरोग्य सेविकांची पदभरतीबाबचा प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, भरती प्रक्रियेसाठी निवडण्यात आलेल्या संस्थेमार्फत अर्ज छाननी प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे.

०००

वर्षा आंधळे/विसंअ/

लोकनेते बाळासाहेब देसाई यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

मुंबई, दि. 10 : लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील पावनगड निवासस्थान येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, सर्वश्री आमदार अनिल बाबर, प्रताप सरनाईक, प्रवीण दरेकर, जयकुमार रावल, ज्ञानराज चौगुले यांनीही लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, वरिष्ठ अधिकारी यांच्यासह लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००

धोंडिराम अर्जुन/ससं/

दर्जेदार शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त अर्थसंकल्प – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. ९ : शालेय शिक्षण विभागासाठी २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात एकूण रूपये ७३,०२५ कोटी ५४ लाख ५८ हजार रुपये (त्र्याहत्तर हजार पंचवीस कोटी चौपन्न लाख अठ्ठावन्न हजार) इतकी तरतूद अर्थसंकल्पीत करण्यात आली आहे. यापैकी कार्यक्रमावरील खर्चासाठी दोन हजार ७०७ कोटी रूपये तर अनिवार्य खर्चासाठी ७० हजार ३१८ कोटी रूपये इतकी तरतूद करण्यात आली आहे. यामुळे दर्जेदार शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याचा अर्थसंकल्प उपयुक्त ठरणार असल्याची प्रतिक्रिया शालेय शिक्षण तथा मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. विभागासाठी भरीव तरतूद केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्यात आली असून यासाठी 40 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याअंतर्गत पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना पाच हजार रुपये तर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना 7500 रूपये इतकी भरघोस वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यासाठी 75 कोटी रूपयांची तरतूद केली आहे. राज्यातील शिक्षण सेवकांच्या मानधनात देखील भरघोस वाढ करण्यात आली आहे. यात प्राथमिकचे 16 हजार, माध्यमिकचे 18 हजार तर उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षण सेवकांचे मानधन 20 हजार इतके करण्यात आले आहे.

माय मराठीच्या सेवेसाठी देखील या वर्षाच्या अर्थसंकल्पात 65 कोटींची विशेष तरतूद करण्यात आली आहे. या अंतर्गत मुंबईत मराठी भाषा भवन, वाई येथे विश्वकोष कार्यालय, ऐरोली येथे मराठी भाषा उपकेंद्र आदी योजना राबविण्यात येणार असल्याचे मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/

 

बळीराजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा अर्थसंकल्प – कृषी मंत्री अब्दुल सत्तार

मुंबई, दि. ९ : राज्यातील शेतकऱ्यांना बळ देणारा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा असा हा अर्थसंकल्प आहे. राज्य शासन हे सर्वसामान्य लोकांचे आणि शेतकऱ्यांचे आहे हे यातून दिसून आले आहे. कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बळीराजा प्रती असणारी राज्य शासनाची बांधिलकीच दाखवून दिली आहे, अशा शब्दात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आजच्या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.

अमृत काळातील पहिला अर्थसंकल्प हा पंचामृत तत्वावर आधारित आहे. त्यातील पहिले अमृत हे ‘शाश्वत शेती समृद्ध शेतकरी’ हे आहे. कृषी विभागासाठी विविध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी प्रमाणेच त्या निधीत राज्य शासन प्रतिवर्ष प्रती शेतकरी ६ हजार रुपयांची भर घालून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर करण्यात आली आहे. त्या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना आता १२ हजार रुपयांचा सन्मान निधी मिळणार आहे. राज्यातील १ कोटी १५ लाख शेतकरी कुटुंबांना त्याचा लाभ होणार असून त्यासाठी ६९०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे, ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे.

याशिवाय, प्रधानमंत्री शेतकरी पीक विमा योजनेतील शेतकरी हिस्सा यापुढे राज्य शासन भरणार आहे. आधीच्या योजनेत विमा हप्त्याच्या २ टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागत होती. आता केवळ एक रुपया भरून शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी ३३१२ कोटी रुपयांचा आर्थिक भार राज्य शासन उचलणार आहे. याशिवाय, राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी महा कृषिविकास अभियान राबविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पीक, फळपीक घटकाच्या उत्पादनापासून ते मूल्यवर्धनापर्यंत  तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट, समूहांसाठी योजनांच्या अंमल बजावणीसाठी एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासाठी ५ वर्षांत ३००० कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय स्वागतार्ह असून कृषी विकासासाठी उपयुक्त असल्याचे कृषी मंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले.

०००

दीपक चव्हाण/विसंअ/

राज्याच्या आर्थिक विकासाला गती देणारा अर्थसंकल्प – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. ९ : राज्याच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात कृषी, सिंचन, महिला, आरोग्य, शिक्षण, मनुष्यबळ विकास, पायाभूत सुविधा, शिक्षण, दळणवळण, पर्यटन, सांस्कृतिक आणि उद्योग या प्रत्येक क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. सर्व घटक, सर्व विभागांना न्याय देणारा समतोल अर्थसंकल्प असून राज्याच्या आर्थिक विकासाला गती देणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

मंत्री श्री. देसाई म्हणाले की, अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित आहे. शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, रोजगार निर्मिती आणि पर्यावरणपूरक विकास या पंचामृत ध्येयावर आधारित हा अर्थसंकल्प राज्याला सर्व क्षेत्रांमध्ये अग्रेसर करेल.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

‘दिलखुलास’ कार्यक्रमात १०, ११ व १३ मार्चला उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत

मुंबई, दि. 9 : राज्याच्या विकासाला गती देणारा, कृषी क्षेत्र, पायाभूत सुविधा भक्कम करणारा पंचामृत अर्थसंकल्प आज सादर केला असून या अर्थसंकल्पामुळे  राज्यातील कृषी, आरोग्य, शिक्षण, उद्योग, रोजगार निर्मिती, पर्यावरण, पर्यटन अशा विविध घटकांना बळकटी मिळणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

विधिमंडळात उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात त्यांची मुलाखत घेण्यात आली आहे. या मुलाखतीतून त्यांनी अर्थसंकल्पाविषयी विस्तृत माहिती दिली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील  शेतकरी बांधव, महिला, अनाथ बालके, दिव्यांग बांधव, समाजातीलवंचित, उपेक्षित घटकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हा अर्थसंकल्प महत्वपूर्ण ठरणार आहे. शेतकरी बांधव विकासाचाकेंद्रबिदू असून शेतकरी बांधवांच्या सर्वांगीण प्रगतीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

ही मुलाखत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲप वर शुक्रवार दि. 10 व शनिवार दि. 11 व सोमवार दि. 13 मार्च 2023 रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत ‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार धर्मेंद्र जोरे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

अर्थसंकल्‍पातील ‘पंचामृत’ विकासाचे आणि समृद्धीचे – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई दि. ९ : उपमुख्‍यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्‍या अर्थसंकल्‍पातील पंचामृत हे विकासाचे, सामाजिक हिताचे आणि राज्‍याला समृद्धीच्‍या दिशेने नेण्‍यासाठी उपयुक्‍त ठरेल, असा विश्‍वास महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला. राज्‍यात प्रथमच गो-सेवा आयोगाची ऐतिहासिक घोषणा आणि नगर जिल्‍ह्यात नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय, महाराष्‍ट्र मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळाचे मुख्‍यालय स्‍थापन करण्‍याच्‍या निर्णयाचे त्‍यांनी स्‍वागत केले आहे.

मंत्री श्री.विखे पाटील म्‍हणाले की, या अर्थसंकल्‍पातून शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसी समाज घटकांच्‍या न्‍याय हक्‍कांचे संरक्षण तसेच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्‍या अंगणवाडी सेविकांच्‍या मानधनात समाधानकारक वाढ करण्‍यात आली. रोजगार निर्मितीला प्राधान्‍य आणि पर्यावरण पूरक विकास साध्‍य करताना भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा निर्माण करण्‍याला प्राधान्‍य दिले गेले असल्‍याने राज्‍याच्‍या विकासाचे एक व्हिजन मांडले गेले आहे.

महसूल विभागासाठी ४३४ कोटी रुपये आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. तसेच कोतवालच्या मानधनात वाढ करून सरसकट १५ हजार रुपये करण्यात आले आहेत. यासोबतच बांधकाम परवानगी घेते वेळी अकृषिक वापराची सनद नागरिकांना उपलब्ध होणार आहे, तर रोव्हर तंत्रज्ञानाद्वारे करून जमिनीची नोंदणी ९० दिवसांत पूर्ण होणार असल्याने महसूल विभागासाठी अतिशय महत्त्वाच्या तरतूदी करण्यात आल्या आहेत.

पशुसंवर्धन विभागाच्‍या दृष्‍टीने या अर्थसंकल्‍पात केलेल्‍या तरतुदी या अतिशय समाधानकारक असून, देशी गो-वंशाचे संवर्धन, संगोपन व संरक्षणासाठी महाराष्‍ट्र गो-सेवा आयोगाची स्‍थापना ही ऐतिहासिक बाब म्‍हणावी लागेल. विदर्भ, मराठवाड्यातील ११ जिल्‍हे दुग्‍ध विकासाच्‍या दुसऱ्या टप्‍प्यासाठी १६० कोटी रुपयांच्‍या तरतूदीमुळे या सर्व जिल्‍ह्यांमध्‍ये दूग्‍ध व्‍यवसाय विकासास चालना मिळेल, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला. नगर येथे नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय स्‍थापन करण्‍याच्‍या निर्णयाबद्दल मंत्री विखे – पाटील यांनी मुख्‍यमंत्री आणि उपमुख्‍यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

ग्रामीण भागातील रोजगारासाठी महाराष्‍ट्र मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळाची स्‍थापना करुन, यासाठी १० हजार कोटी रुपयांचे बिनव्‍याजी कर्ज उपलब्‍ध करुन देण्‍याच्‍या निर्णयामुळे शेतीपूरक व्‍यवसायास मदत होणार असून, या महामंडळाचे मुख्‍यालय अहमदनगर येथे करण्‍याच्‍या घोषणेमुळे ग्रामीण विकासाच्‍या नव्‍या संधी उपलब्‍ध होतील असे त्‍यांनी सांगितले.

शिर्डी येथील आंतरराष्‍ट्रीय विमानतळाच्‍या नवीन टर्मिनल इमारतीसाठी ५२७ कोटी रुपयांची तरतुद झाल्‍याने या विमानतळाचा चेहरामोहरा बदलण्‍यास मदत होणार आहे. ही बाब साईभक्‍त व जिल्‍ह्याच्‍या दृष्‍टीने अतिशय महत्‍त्वाची व गौरवपूर्ण ठरणार आहे.

०००

वर्षा आंधळे/विसंअ/

महिला विकास, पर्यटनाला चालना देणारा अर्थसंकल्प – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. ९ : राज्य शासनाच्या वतीने सन २०२३-२४ साठी मांडलेला अर्थसंकल्प महिला विकास, पर्यटनाला चालना देणारा आणि रोजगार निर्मितीला भर देणारा ठरेल, अशी प्रतिक्रिया महिला व बालविकास,पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्ष साजरे केले जाणार आहे. या महोत्सवासाठी ३५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यानासाठी 50 कोटी, मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्याने यासाठी 250 कोटी रुपये, शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय, शिवकालीन किल्ले संवर्धनासाठी 300 कोटी रूपयांची तरतूद केली आहे, असे त्यांनी सांगितले.

पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यातील 500 युवकांना जल, कृषी, कॅराव्हॅन, साहसी पर्यटन तसेच आदरातिथ्य क्षेत्राचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा नागपूर फुटाळा तलावाच्या धर्तीवर विकास करण्यात येईल. महत्त्वाच्या 10 पर्यटन स्थळांवर टेंट सिटी उभारण्यात येईल. पर्यटन विभागाने कॅलेंडर वर आधारित पर्यटन उपक्रम सुरू केले आहेत. त्याच अंतर्गत राज्याचा वार्षिक महोत्सव आराखडा तयार असून यात शिवजन्मोत्सव शिवनेरी, भगवान बिरसा मुंडा महोत्सव, जव्हार, वीर बाल दिवस महोत्सव नांदेड इत्यादींचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना आता नव्या स्वरूपात देण्यात आली आहे. महिलांना एसटी प्रवासात सरसकट 50 टक्के सुट देण्यात आली असून चौथे सर्वसमावेशक महिला धोरण लवकरच जाहीर केले जाणार आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर, कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर,मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण, माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी,औषधोपचार करण्यात येणार आहेत, ही बाब अतिशय उल्लेखनीय आहे.

शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने 50 वसतीगृहांची निर्मिती, महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना सुरू करण्यात येणार असून या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन सेवा देण्यात येनार आहेत. एकूणच महिलांचा सर्वांगीण विकास आणि पर्यटनातून रोजगार निर्मिती वाढण्यास या अर्थसंकल्पातून मदत होणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

ताज्या बातम्या

जागतिक शिक्षणाचा केंद्रबिंदू मुंबईत भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे शैक्षणिक हब महाराष्ट्रात

0
देशाच्या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत भारतात शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक परिवर्तनाची सुरुवात झाली आहे. देशातील एकूण नोंदणी गुणोत्तर (Gross Enrollment Ratio - GER)...

मुंबई उच्च न्यायालय मुख्य न्यायमूर्ती व न्यायमूर्ती मंडळ यांनी व्यक्त केल्या अहमदाबाद विमान दुर्घटनाप्रकरणी...

0
मुंबई, दि.१३ : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती तसेच न्यायमूर्ती मंडळ आणि नोंदणी विभागातील अधिकारी यांनी अहमदाबाद येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात प्राण गमावलेल्या...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सामाजिक न्यायाच्या विचारांना चालना देणारा ठरेल – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

0
नवी दिल्ली 13  : मुंबईतील इंदू मिल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक तयार होत असून या ठिकाणी 350 फूट उंच उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर...

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी समिती स्थापन करणार -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती, दि 13 (जिमाका): शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा गहण विषय आहे. तसेच कर्जमाफी करताना कोणत्या घटकाची कर्जमाफी करावी याबाबत क्लिष्टताही आहे. त्यामुळे गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सातारा जिल्ह्यात आगमन

0
सातारा दि.13- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून सातारा येथील बॉम्बे रेस्टारंट चौक येथे राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक...