शनिवार, जून 14, 2025
Home Blog Page 1450

पीएमपीएमएलची सेवा भविष्यात खंडित होऊ न देण्याचा पालकमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

पुणे दि.१२: पुणे  शहर  सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील प्रमुख असलेल्या पीएमपीएमएलची वाहतूक व्यवस्था भविष्यात खंडित होणार नाही याची पीएमपीएमएल प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. पीएमपीएमएलच्या चार ठेकेदारांकडून काही दिवसांपूर्वी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्री. पाटील यांच्या निवासस्थानी शहर बससेवेबाबत पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन, पीएमपीएमएल प्रशासन आणि ठेकेदारांसमवेत बैठक घेण्यात आली.

या बैठकीला आमदार सिद्धार्थ शिरोळे, पीएमपीएमएलचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, पुणे महापालिका आयुक्त डॉ. विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवडचे आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल रंजन महिवाल, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी राजेंद्र मुठे यांच्यासह पीएमपीएमएलचे प्रमुख ठेकेदार उपस्थित होते.

पुणे देशातील  जलदगतीने विकसीत होणारे शहर असून, वास्तव्यासाठीदेखील सर्वाधिक पसंतीचे शहर आहे. त्यामुळे शहराची लोकसंख्या पाहता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पीएमपीएमएलवर अवलंबून आहे. सर्वाधिक पुणेकर पीएमपीएमएलच्या बसेसमधून प्रवास करतात.

पीएमपीएमएलच्या ठेकेदारांचे गेल्या तीन महिन्यांचे देयक न मिळाल्याने काही दिवसांपूर्वी पीएमपीएमएलच्या ठेकेदारांकडून अचानक संप पुकारण्यात आला होता. या संपाचा विद्यार्थी, नोकरदारांसह प्रवाशांना फटका बसला. त्यानंतर तातडीने पालकमंत्री श्री. पाटील यांनी मध्यस्थी करून तातडीने हा संप मिटवला. त्यावेळी पीएमपीएमएलकडून ठेकेदारांना ६६ कोटी रुपये देण्यात आले.

उर्वरित देयक आणि पुढील धोरण निश्चितीसाठी आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. जानेवारी पर्यंतची तूट मार्च अखेरपर्यंत द्यावी, तसेच फेब्रुवारी आणि मार्चचे देयक १५ एप्रिलपर्यंत द्यावे अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पीएमपीएमएलच्या आयुक्तांना आयुक्त  दिल्या.

भविष्यात पीएमपीएमएलकडून दर महिन्याला देयक अदा केले जाईल याची दक्षता घेण्याबाबत सूचना दिल्या.  त्यावर पीएमपीएमएलच्या ठेकेदारांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी संबंधित सर्वांनीच संवेदनशीलता दाखवावी व बससेवा अखंडित आणि सुरळीत राहील याबाबत आवश्यक नियोजन करावे. प्रवाशांना चांगली सेवा मिळेल यासाठी आवश्यक उपाय करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.

०००

मधमाशीला राज्य कीटकाचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्नशील :  रवींद्र साठे

सातारा दि. १२ :  मधमाशीला राज्य कीटकाचा दर्जा मिळावा यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार असून  मधमाशीच्या परागीकरणाद्वारे होणारी कृषी उत्पादनातील वाढ व त्यामधे मध माशांचे अनन्यसाधरण महत्त्व लक्षात घेता मधमाशी उद्योग महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी केले.  महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि महाराष्ट्र राज्य औषधी वनस्पती मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियान अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा मध संचालनालय, महाबळेश्वर येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

उपस्थित शेतकरी मधमाशी पालनांना संबोधित करताना साठे म्हणाले की,  राज्य शासनाची मध केंद्र योजना सर्व समावेशक व सर्व घटकांसाठी असून ५० टक्के अनुदान देण्यात येते. लाभार्थीनी उत्पादित केलेल्या मध व मेणाची खरेदी मंडळ हमी भावाने करत आहे. नुकतेच मंडळाने खरेदीचे हमी भावात भरघोस वाढ केली असून आता सेंद्रिय मध खरेदी दर रू.४००/- वरून रू.५००/- , सातेरी मध खरेदी दर रू.३४५/- वरून रू.४००/- तर मेण खरेदी दर रू.१७०/- वरून रू.३००/- प्रती किलोग्राम, मेलिफेरा मधाचे दरही वाढविण्यात आला आहे .

सातेरी मध माशा वसाहत खरेदी दर रू.२७००/- वरून रू ३०००/- प्रती वसाहत या प्रमाणे दर वाढविण्यात आल्याची घोषणा केली व जास्तीत जास्त मधपालनांनी मंडळाकडे मध विक्री करावा, असे आवाहन केले.

महाराष्ट्र राज्य औषधी वनस्पती मंडळ पुणेचे उप संचालक प्रवीण गवांदे यांनी महाराष्ट्र सरकारच्या व केंद्र सरकारच्या विविध योजनां बद्दलची माहिती दिली. कृषी विभाग अंतर्गत मधुक्रांती पोर्टलद्वारे ऑनलाईन नाव नोंदणी करून केंद्र सरकारच्या मध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

संचालनालयाचे  संचालक दिग्विजय पाटील म्हणाले की, मध उद्योगाला खऱ्या अर्थाने चालना मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी मधमाशी पालन करणे व त्यांचे संवर्धन करणे फार महत्त्वाचे आहे. या कार्यक्रमास  उपविभागीय कृषि अधिकारी वाई तेजदीप ढगे, तालुका कृषी अधिकारी नितीन पवार, तंत्र अधिकारी राष्ट्रीय फलोत्पादन अभियान जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय सातारा समीर पवार, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी निसार तांबोळी,  अध्यक्ष मधुसागर संजय पारटे, नाना जाधव, श्री. नारायणकर, श्रीमती शारदा बावळेकर तसेच सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे २०० मधुमक्षिकालक शेतकरी उपस्थित होते.

दुपारच्या सत्रात, प्रा.हेमंतकुमार डुंबरे यांनी मध माशा व्यवस्थापन ,श्री.आर. पी. नारायणकर यांनी राज्यातील मध योजना, सौ. शारदा अनिल बावळेकर यांनी मधमाशा पालनातील उप उत्पादने, श्री.संजय कांबळे यांनी मध प्रक्रिया, मधाची साठवणूक व निगा राखणे इत्यादी विषयावर व्याख्यान दिले विजय कुंभरे यांनी मध माशा संगोपन प्रात्यक्षिके सादर केली.

यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप व  अर्थ सल्लागार व मुख्य लेखाधिकारी विद्यासागर हिरमुखे यांची भाषणे झाली.

०००

शहीद जवान स्मृती सन्मान हा प्रेरणादायी उपक्रम – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील            

सोलापूर, दि. १२ :  दिगंबरराव बागल प्रतिष्ठानने आयोजित केलेला शहीद जवान स्मृती सन्मान उपक्रम प्रेरणादायी व अनुकरणीय आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशु संवर्धन व दुग्ध विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केले. करमाळा येथे आयोजित कृषी प्रदर्शन व दिगंबरराव बागल जयंती महोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय पटांगण येथे आयोजित या कार्यक्रमास आमदार सर्वश्री रणजीतसिंह मोहिते – पाटील, सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार हर्षवर्धन पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष सरदेशपांडे, जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल हिरे, मकाई कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल, आदिनाथ कारखान्याच्या संचालक रश्मी बागल, विलासराव घुमरे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते शहीद जवानांचे वारस विमल वारे, प्रवीण जयहिंदे, गंगुबाई देविदास गात, सीताबाई चौधरी, अनुजा व अरविंद निलंगे, संगिता भारत काबंळे, धनाजी परबत यांचा सन्मान करण्यात आला.

पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, संपूर्ण देश हेच शहिदांचे कुटुंब आहे. त्यामुळे त्यांच्या वारसाचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. सन्मान झालेल्या सर्व वारसाच्या  शासन सदैव पाठीशी आहे. केंद्र सरकारने सर्वात मोठी आर्थिक तरतूद कृषि क्षेत्रासाठी केली आहे. शेती व्यवस्थेमध्ये परिवर्तन होऊन स्थैर्य आले आहे. तीन महिन्यात पाणंद, शिव रस्ते खुले करा. तसेच, मोजणीचे संपूर्ण काम विहित वेळेत पूर्ण करून नकाशे घरपोच करा, असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत, असे त्यांनी सांगितले.

‌‌यावेळी राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मान्यवरांनी अभिवादन केले. पालकमंत्र्यांनी कृषी महोत्सवातील विविध स्टॉलना भेट देऊन पाहणी केली. तसेच दिगंबरराव बागल यांच्या स्मृती जागृत रहाव्यात, यासाठी उभारण्यात आलेल्या आठवणीतले मामा या कलादालनास भेट देऊन त्यांच्या आठवणीना उजाळा दिला.

राज्यातील बांधकाम प्रकल्पामुळे बाधित मच्छिमारांसाठी राज्यस्तरीय नुकसान भरपाई धोरण लागू – मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. १२ : राज्यातील विविध बांधकाम प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाने धोरण निश्चित केले आहे. या धोरणास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून त्यासंदर्भातला शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. यामध्ये मच्छिमारांच्या नुकसानीसाठी सहा श्रेणी ठरवण्यात आल्या असून त्यानुसार मच्छीमारांना २५ हजार ते ६ लाखांपर्यंत नुकसान भरपाई मिळणार असून भरपाई देताना कुटूंब हा एक घटक विचारत घेऊन एकरकमी व एकदा देण्यात येईल, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

मच्छीमारांना देण्यात येणारी नुकसान भरपाई रकमेच्या 6 श्रेणी निश्चित करण्यात आल्या असून त्यापुढील प्रमाणे मासेमारी क्षेत्र कायमचे नष्ट झाले असल्यास – 6 लाख रुपये,  प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रापासून 500 मीटर त्रिज्येतील क्षेत्रामधील मासेमारीवर परिणाम झाल्यास-4 लाख रुपये, हाताने मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांचे झालेले नुकसान – 2 लाख रुपये, दैनंदिन मासेमारीस निर्माण होणारी अडचण, मासेमारी क्षेत्रापर्यंत पोचण्यास येणारा वाढीव खर्च इ.- 1 लाख रुपये, प्रकल्प बांधकामावेळी पाण्यामध्ये आलेली गढूळता यामुळे मासेमारीवर झालेला तात्पुरता प्रभाव 50 हजार रुपये तसेच बार्जेसमुळे मासेमारी नौका व जाळे यांचे नुकसान – 25 हजार रुपये मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

या धोरणातील मुख्य बाबी पुढीलप्रमाणे:

प्रकल्पबाधित मच्छिमारांची ओळख, मासेमारी नौकेचा प्रकार आणि इतर माहिती तांत्रिक मुल्यमापन, सामाजिक प्रभाव मुल्यांकन अमंलबजावणी संस्था, यंत्रणाद्वारे बेस लाईन सर्वेक्षण आदर्श कार्यप्रणाली,  मच्छिमारांना देण्यात येणारे नुकसान भरपाई, तक्रार निवारण यंत्रणा या बाबींचा धोरणात समावेश करण्यात आला आहे.

000

नैसर्गिक आणि गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याना संपन्न करणार  -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे दि.१२: शेती लाभाची व्हावी यासाठी विषमुक्त नैसर्गिक शेती आणि गटशेतीशिवाय पर्याय नाही. गटशेतीमुळे उत्पादन खर्च कमी होऊन यंत्र आणि नवे तंत्रज्ञान वापरण्याची क्षमता निर्माण होत असल्यामुळे शेतकऱ्यांना संपन्न करण्यासाठी गटशेतीला प्रोत्साहन देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पानी फाऊंडेशनतर्फे शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित ‘सत्यमेव जयते फार्मर कप 2022’च्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.  कार्यक्रमाला पानी फाऊंडेशनचे संस्थापक चित्रपट अभिनेते आमीर खान आणि किरण राव, पानी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, वातावरण बदलामुळे शेतीसमोर मोठी आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत अवर्षण, अतिवृष्टीच्या फेऱ्यातून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी शाश्वत शेतीला पर्याय नाही आणि त्यासाठी विषमुक्त, नैसर्गिक शेतीकडे जावे लागेल. उत्पादन खर्च कमी करून जमिनीचा पोत सुधारावा लागेल. या सर्व गोष्टी आपण नैसर्गिक शेतीद्वारे करू शकतो.

रासायनिक खतामुळे जमिनीची रोग प्रतिकारक शक्ती कमी झाली आणि अधिक उत्पादन देण्याची शक्ती संपुष्टात आली. दुसरीकडे राज्यात कॅन्सरचा प्रादुर्भाव वाढला. म्हणून आपल्याला नैसर्गिक शेतीकडे यावे लागेल. महाराष्ट्रात विषमुक्त नैसर्गिक शेतीचे मिशन सुरू केले आहे. 3 हजार कोटी रुपये खर्च करून 25 लाख हेक्टर शेती नैसर्गिक पद्धतीकडे वळविण्यात येणार आहे. यामुळे शेतीची उत्पादकता वाढेल. नैसर्गिक शेतीत देशी गायींचा मोठा वाटा असल्याने या संदर्भातील प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येईल.

शेतकरी केंद्रबिंदू असलेला अर्थसंकल्प

नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्याला केंद्रबिंदु  ठेवून अनेक योजना सादर केल्या आहेत. जलयुक्त शिवार 2.0 तसेच गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना सुरू केली आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेअंतर्गत केंद्राच्या पीएम किसान योजनेच्या 6 हजार रुपयांसोबत राज्य शासनही 1 कोटी 12 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 6 हजार रुपये टाकणार आहे.

शेतकऱ्यांना विम्याचा हप्ता भरण्याची आवश्यकता नाही. केवळ 1 रुपये भरून त्यांना विम्याची नोंदणी करता येणार आहे. शेतकऱ्यांना थोडी मदत केली तर ते चांगली प्रगती करू शकतात. म्हणून शेततळे, शेड नेट, पेरणी यंत्र, विविध साधने आणि इतर कृषि निविष्ठा देण्यासाठी 1 हजार कोटींची तरतूद करण्यात येणार आहे.

पानी फाऊंडेशनने शेती क्षेत्रात क्रांती आणली

आमिर खान यांनी पानी फाऊंडेशनची कल्पना मांडून शेतीच्या क्षेत्रात क्रांती आणली असे नमूद करून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पानी फाऊंडेशनने जलसंधारण अणि शेतकऱ्यांना समर्थ करण्याच्या कार्यात सातत्य दाखवले आहे. त्यांनी वॉटर कपच्या माध्यमातून जलस्वयंपूर्ण गावे तयार करणे, विषमुक्त शेती आणि शेतकऱ्यांचे गट तयार करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक कशी करता येईल याचे सुंदर मॉडेल तयार केले आहे.  फार्मर कपमध्ये भाग घेतलेल्या शेतकऱ्यांचा प्रशिक्षक म्हणून इतरांना मार्गदर्शन करण्यासाठी उपयोग होईल.

जलयुक्त शिवार ही शेतकऱ्यांची योजना

शासनाने जलसंधारणासाठी जलयुक्त शिवार योजना सुरू केली. जलयुक्त शिवार शेतकऱ्यांची योजना होती. 20 हजार गावात 6 लाख स्ट्रक्चर तयार होऊन जलस्वयंपूर्ण गावे झाली. त्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला.  त्यालाच जोड म्हणून वॉटर कपने शेतकऱ्यांना जलसंधारणासाठी प्रेरित केले. निसर्गाच्या फेऱ्यामुळे निराशेच्या गर्तेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये असलेल्या क्षमतेची आठवण करून देण्याचे कार्य वॉटर कपने केले आणि ग्रामीण भागातील अनेक गावे जलस्वयंपूर्ण झाली.

शासनाने शेतकऱ्यांसाठी कौशल्य प्रशिक्षण सुरू केले आहे. कृषि विद्यापीठाच्या माध्यमातून मागील काळात अडीच लाख शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते आणि गटांच्या संचलनाचे प्रशिक्षणही देण्यात आले होते. येत्या काळात मोठ्या प्रमाणात हे प्रशिक्षण देण्यात येईल.

सोलर फिडरद्वारे शेतकऱ्यांना 12 तास वीज

दिवसा 12 तास वीज देण्याची शेतकऱ्यांची मागणी योग्य आहे. यासाठी ॲग्रीकल्चर फिडर सौर ऊर्जेवर आणण्यात येतील. यावर्षी 30 टक्के फिडर सौर ऊर्जेवर आणण्यात येतील. पुढील दोन वर्षात  उर्वरित फिडर सौर ऊर्जेवर आणण्यात येतील आणि शेतीसाठी दिवसा 12 तास वीज मिळू शकेल. यासाठी सरकारी पडीक जमिनीचा उपयोग करण्यात येईल. त्यासोबत फिडरजवळ असलेल्या शेतात काही पिकत नसेल तर अशी शेतजमीन सोलरसाठी 30 वर्षे भाड्याने घेण्यास शासन तयार आहे. या जमिनीची मालकी शेतकऱ्याची असेल. 30 वर्षानंतर शेतकऱ्याला जमीन परत दिली जाईल. यातून शेतकऱ्यांना उत्पन्नही मिळू शकेल.

शेतकऱ्यांनी करून दाखविले

गेली तीन वर्षे अतिवृष्टीचा सामना केल्यानंतर हे वर्ष अल निनोचे असल्याने पाऊस कमी होऊ शकतो. म्हणून ग्रामस्थांनी जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घ्यावी, जलसमृद्ध गावातील  जुन्या स्ट्रक्चरची दुरुस्ती करावी. बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम करावे. कमी पाऊस झाला तरी संरक्षित सिंचन करता येईल अशी तयारी करावी. संकटावर एकत्रितपणे मात करता येते हे शेतकऱ्यांनी हे करून दाखविले आहे. तुमची कथा सांगितली, तुम्ही केलेले परिवर्तन दाखविले तर निराशेतील शेतकरी पुन्हा उभा राहील आणि हे करण्याकरिता शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील, असे श्री.फडणवीस यांनी सांगितले. पानी फाऊंडेशनने  4 लाख शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळविण्याचे उद्दीष्ट ठेवावे असे आवाहन त्यांनी केले.

आमिर खान म्हणाले, उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी पानी फाऊंडेशनच्या प्रवासात नेहमीच सहकार्य केले. त्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून दिलेल्या सहकार्यामुळे चांगले काम करता आले. शेतकऱ्यांनी गट तयार करून आपल्या क्षमता वाढवाव्यात. वैज्ञानिक आणि संशोधकांनी सांगितलेल्या गोष्टी आत्मसात करून पुढे जावे. येत्या काळात महाराष्ट्रात आणि भारतात हजारो कृषि उद्योजक तयार व्हावेत. शेतीला  व्यवसायाच्यादृष्टीने पाहून नवतरुणांनी शेतीकडे वळावे, यातील समस्यांवर मात करून पुढे जावे, असे त्यांनी सांगितले.

श्री.भटकळ आणि श्री.पोळ यांनी पानी फाऊंडेशनची माहिती दिली. कोविड संकटाच्या काळातही ग्रामस्थांनी जलसंधारणाची चळवळ सामूहिक प्रयत्नातून पुढे नेली असे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते कृषि क्षेत्रातील संशोधानाचे महत्वपूर्ण कार्य केल्याबद्दल महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ.प्रशांत पाटील आणि  डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉ.शरद गडाख, कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषि आयुक्त सुनील चव्हाण, सह्याद्री फार्मसीचे विलास शिंदे, विविध पिकांसाठी डिजिटल शेती शाळेचे मार्गदर्शक, विविध पिकांसाठी एसओपी देणारे मार्गदर्शक, कृषि विषयक माहितीपट पडताळणी करणारे तज्ज्ञ, पोकरा प्रकल्पाचे विजय कुवळेकर, एबीपी माझाचे राजीव खांडेकर, पानी फाऊंडेशनला सहकार्य करणाऱ्या संस्था, शेतकऱ्यांसाठी महितीपट निर्मितीत सहकार्य करणारे, कृषि तज्ज्ञ आदींचा सन्मान करण्यात आला.

यावेळी ध्वनीचित्रफीत आणि शाहीर अवधूत गांधी, नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर यांच्या पथकाने सादर केलेल्या नृत्याविष्काराच्या माध्यमातून पानी फाऊंडेशनच्या कार्याची माहिती देण्यात आली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कृषि विभागाचा सन्मान

पानी फाऊंडेशनतर्फे शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२२’च्या पुरस्कार वितरण सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  कृषि विभागाचा पानी फाऊंडेशनच्या विविध उपक्रमात सहकार्याबद्दल सन्मान करण्यात आला. कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आणि कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांचा यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला पानी फाऊंडेशनचे संस्थापक चित्रपट अभिनेते आमीर खान आणि किरण राव, पानी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, प्रमुख मार्गदर्शक डॉ.अविनाश पोळ आदी उपस्थित होते.

कृषि विभागाने पानी फाऊंडेशनच्या स्थापनेपासून विविध उपक्रमात सहकार्य केल्याचे यावेळी आमिर खान यांनी सांगितले.

000

 यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदनात अभिवादन

नवी दिल्ली, दि: १२ : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना त्यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्ली येथील दोन्ही महाराष्ट्र सदनात अभिवादन करण्यात आले.

कोपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनाच्या सभागृहातील यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस व कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील त्यांच्या पुतळ्यास प्रभारी निवासी आयुक्त तथा अपर निवासी आयुक्त  निवा जैन यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

०००

यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

 मुंबई,दि:१२ आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री व भारताचे माजी उपपंतप्रधान दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज विधानभवनातील त्यांच्या पुतळ्यास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव श्री. राजेन्द्र भागवत तसेच विधानमंडळ सचिवालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

000

बल्लारपूर परिसरातील रस्ते विकासासाठी ७५ कोटी रुपयांचा निधी

मुंबई, दि.१२ : बल्लारपूर परिसरातील पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या दृष्टीने भरीव निधीची तरतूद केल्याबद्दल परिसरातील जनतेच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

राज्याच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पात सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत बल्लारपूर परिसरातून जाणाऱ्या राज्यमार्ग मजबुतीसाठी ४१ कोटी तसेच प्रमुख जिल्हा मार्गांच्या विस्तारासाठी १४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून ग्रामीण भागातील रस्ते विकासाकरिता २०.१० कोटी असे एकूण ७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

याशिवाय हायब्रीड अन्युटी प्रोग्रॅम अंतर्गत सुमारे 800 कोटी रुपये किंमतीच्या 4 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून या प्रकल्पांचा डीपीआर तयार करण्यासाठी 1 कोटी 71 लाख रुपयांची सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तरतूद करण्यात आली आहे.या अर्थसंकल्पात विविध विकास योजना आणि समाजातील प्रत्येक माणसाला दिलासा मिळाला आहे.

000

 

कोरोना काळात नुकसान झालेल्या मच्छीमार बांधवांना राज्य शासनाकडून दिलासा – मत्स्यव्यवसाय मंत्री  सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. १२: सागरी व भूजल क्षेत्रातील मच्छिमार बांधवांनंतर आता गोड्या पाण्यातील तलाव किंवा जलाशयात मासेमारी करणाऱ्या मच्छीमार बांधवानादेखील राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. सन २०२०-२१ या कोरोना काळातील नुकसान लक्षात घेऊन तलाव ठेका माफ करण्याचा शासनाचा आदेश नुकताच निर्गमित करण्यात आला आहे. यामुळे मासेमारी करणाऱ्या बांधवांसाठी दिलासा मिळेल, असा विश्वास मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

मच्छीमार बांधवांना आर्थिक दृष्ट्या बळ देण्यासाठी राज्य शासन संपूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे असून त्यांच्या अडचणींचा संवेदनशीलपणे विचार करुन सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे. मागील पावसाळी अधिवेशनात मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी  यासंदर्भात आश्वासन दिले होते ; त्याची पूर्तता या निर्णयामुळे झाली आहे.  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घोषित टाळेबंदीमुळे मत्स्यव्यावसायिकांचे झालेले नुकसान लक्षात घेता राज्यातील मच्छीमार/ मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांची सन 2021-22 या वर्षात तलाव ठेका रक्कम भरणा केलेल्या तलावांची ठेका रक्कम सन 2023-24 या वर्षात समायोजित करण्यास व सन 2021-22 या वर्षात तलाव ठेका रक्कम भरणा करू शकलेले नाहीत अशा मच्छीमार/ मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांची सन 2021-22 या वर्षाची तलाव ठेका रक्कम माफ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील गोड्या पाण्याच्या तलावात किंवा जलाशयात मासेमारी करणाऱ्या बांधवांना सहकारी संस्थांच्या सभासदांना लाभ होणार आहे.

000

 

यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

मुंबई : दि. १२: देशाचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ११० व्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Governor Ramesh Bais pays tribute to Y B Chavan on 110th Birth Anniversary

Mumbai: Date 12-Maharashtra Governor Ramesh Bais offered floral tributes to the portrait of former Deputy Prime Minister of India and Maharashtra’s first Chief Minister Yashwantrao Chavan on the occasion of the 110th Birth Anniversary of late Shri Chavan at Raj Bhavan Mumbai on Sun (12 Mar). Officers and staff of Raj Bhavan were present.

 

000

ताज्या बातम्या

श्री विले पार्ले केळवणी मंडळाच्या दोन नवीन इमारतींचे उद्घाटन आणि नवीन शैक्षणिक संकुलाचे भूमिपूजन

0
मुंबई, दि. 14 : आज पैसा नाही तर माणूस हेच खरे भांडवल आहे. उद्योगधंदे तिथेच जातात जिथे प्रशिक्षित कामगार, संशोधन आणि नवकल्पना असतात. त्यामुळे गुणवत्तापूर्ण आणि बहुविध कौशल्य...

शिक्षकांनी आपली जबाबदारी ओळखून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
शैक्षणिक क्षेत्रात कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन पुणे, दि.१४: बदलत्या काळाची आव्हाने लक्षात घेता शैक्षणिक परंपरेला आधुनिकतेची जोड देण्याकरीता शैक्षणिक क्षेत्रात कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर...

२२ जुलै हा दिवस “शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन” म्हणून साजरा होणार

0
मुंबई, दि. 14 - राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी देशी गायींच्या संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, दरवर्षी २२ जुलै हा दिवस "शुद्ध...

राज्यात शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये १६ जून रोजी ‘शाळा प्रवेशोत्सव’आदिवासी विकास विभागाचा अभिनव उपक्रम –...

0
मुंबई, दि. १४  : आदिवासी विकास विभागामार्फत राज्यातील सर्व शासकीय आश्रमशाळांमध्ये १६ जून २०२५ या दिवशी नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात “शाळा प्रवेशोत्सव” या कार्यक्रमाद्वारे...

फळपीक विमा योजना मृग बहार २०२५ साठी शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा

0
मुंबई,दि.१४: फळपीक विमा योजना मृग बहार २०२५ साठी शेतकऱ्यांनी भाग घेण्यासाठी विमा एनसीआयपी (NCIP)  पोर्टल www.pmfby.gov.in सुरू झाले आहे. यात  भाग घेण्यासाठी प्रत्येक फळनिहाय...