मंगळवार, जून 17, 2025
Home Blog Page 1443

‘चला जाणूया नदीला’ अभियान देशभर जावे – राज्यपाल रमेश बैस

मुंबईता. १९ : नदी ही जीवनधारा आहे. विविध संतांनी नदीचे महत्व सांगितले आहे. देशातील या नद्यांचा सन्मान आणि संवर्धन व्हावे आणि  चला जाणूया नदीला‘ अभियान देशभर जावोअशी अपेक्षा राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून प्रारंभ करण्यात आलेल्या चला जाणूया नदीला‘ या अभियानाचा एक भाग म्हणूनसुप्रसिद्ध अभिनेत्रीनृत्यांगना आणि खासदार श्रीमती हेमामालिनी यांचा नाट्यविहार प्रस्तुत  गंगा‘ हा नृत्याविष्कार  कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राज्यपाल श्री. बैस बोलत होते.  सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवारराज्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरमुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तवस्वामी चिदानंद सरस्वतीसांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.

राज्यपाल श्री.बैस म्हणालेराज्यात या अभियाना अंतर्गत १ लाख ७८ हजार जनजागृती पर कार्यक्रम घेण्यात आले आहेत. राज्यात ८०० हून  अधिक नद्या आहेत. या नद्यांची काळजी घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. वाढते नागरीकरणशहरीकरण यामुळे आपले नदीचे स्त्रोत नष्ट होत आहेत. आपली जैवविविधता आपण जपली पाहिजेअसे त्यांनी यावेळी सांगितले.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणालेया प्रेक्षणीय आणि श्रवणीय कार्यक्रमातून गंगा  मिशनजल संवर्धननदी स्वच्छता यासंदर्भात लोकसहभाग वाढविण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न असून महाराष्ट्रात यासाठी गेल्या वर्षी महात्मा गांधी जयंती पासून व्यापक प्रयत्न सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहेत. जल संवर्धन आणि नदी जोड  प्रकल्प यासाठी राज्याने पुढाकार घेतला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अधिक व्यापक पद्धतीने हा विचार आपण पुढे नेऊ असा मला विश्वास आहेअसे त्यांनी सांगितले.

स्वामी चिदानंद म्हणाले कीनदी आपल्याला जीवन शिकवते. पाणी जपून वापरले पाहिजे. नद्या वाचविण्यासाठी आता कृती करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमा मालिनी यांनी नृत्याविष्कारातून गंगेची विविध रूपे प्रेक्षकांसमोर सादर केली.

कार्यक्रमानंतर यातील सर्व कलाकारांचे कौतुक मान्यवरांनी केले.या कार्यक्रमास कोकिलाबेन अंबानीराजश्री बिर्लाअभिनेते शत्रुघ्न सिन्हाजॅकी श्रॉफज्येष्ठ दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि सुभाष घई आदींसह कलासंस्कृतीउद्योग क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. आभार प्रधान सचिव श्री. खारगे यांनी मानले.

000

भाविकांसाठी स्वच्छतागृहासह विविध सुविधा देण्यावर भर – पालकमंत्री दीपक केसरकर

कोल्हापूर, दि.19(जिमाका) : श्रीअंबाबाईच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो भाविक येत असतात. याठिकाणी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होवू नये, यासाठी मंदिर परिसरात स्वच्छतागृहासह अन्य आवश्यक त्या सोयी सुविधा लवकरात लवकर देण्यासाठी भर दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
पालकमंत्री श्री. केसरकर यांनी आज श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन मंदिराच्या विकास कामांसाठी आवश्यक जागांची पाहणी केली. पागा इमारत येथे भाविकांसाठी उभारण्यात येत असलेल्या स्नानगृह, स्वच्छतागृह कामाची पाहणी करुन सद्यस्थितीची माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, उपविभागीय अधिकारी तथा देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
श्री अंबाबाई मंदिर जतन व संवर्धन तसेच परिसरातील विकास कामांबाबत त्यांनी चर्चा केली. गरुड मंडपाचे सर्व्हेक्षण, नगारखाना व मणिकर्णिका कुंडाच्या जतन व संवर्धनासाठी विकास आराखडा तयार करणे, दर्शन रांग, स्वच्छतागृहांची उभारणी व नूतनीकरण, भक्तनिवास उभारणी आदी सर्व सुविधा मंदिर परिसरातच उपलब्ध करुन देण्यासाठीची कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. भाविकांना चांगल्यात चांगल्या सुविधा देऊन मंदिर परिसराचा विकास करण्यावर भर द्या, असेही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. पुरातत्व विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यावर तज्ज्ञ व्यक्तींची समिती नियुक्त करुन श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीच्या संवर्धनाबाबत निर्णय घेतला जाईल. श्री अंबाबाई शक्तिपीठाचे महत्व जगभरात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी कार्यकारी अभियंता संजय पाटील उपअभियंता महेश कांजर, देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे, धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नेर्लेकर, स्थापत्य अभियंता सुयश पाटील तसेच पुरातत्व जतन व संवर्धन क्षेत्रातील स्थापत्य अभियंता गौरव ठाकरे यांच्यासह संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत पालकमंत्री श्री केसरकर यांनी चर्चा करुन सूचना केल्या.

सीपीआरला आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा गतीने उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री दीपक केसरकर

कोल्हापूर, दि. 19 (जिमाका) : श्रीअंबाबाई मंदिर, श्रीजोतिबा मंदिर, पंचगंगा नदी घाट परिसर विकास तसेच छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयासह (सीपीआर) अन्य रुग्णालयांना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सेवा सुविधा गतीने देवून कोल्हापूरला प्राचीन काळापासून असणारे वैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय येथे मॉड्युलर ओटी व बालरोग अतिदक्षता विभागाचे उद्घाटन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील कुरुंदवाडे, श्रीमती थोरात, आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले, येत्या काळात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय सुसज्ज व्हावे, यासाठी 38 कोटी रुपयांचा नवीन आराखडा तयार केला असून लवकरात लवकर त्याला मंजुरी देण्यात येईल. कोल्हापूरमध्ये उभारलेल्या वैद्यकीय महाविद्यालयामुळे जिल्ह्याच्या आसपासच्या जिल्ह्यांनादेखील फायदा झाला आहे. येत्या काळात सीपीआरच्या गरजा पूर्ण करुन सर्व जनतेचे स्वप्न पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या मॉडयुलर ओ.टी. व बालरोग अतिदक्षता विभागाचा लाभ कोल्हापूरसह शेजारील जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना होईल. नजिकच्या काळात या रुग्णालयामध्ये सांधेरोपण, अवयव प्रत्यारोपण, कानाचे कॉक्लींअर इंप्लॉट सारख्या महत्वाच्या शस्त्रक्रियाही पार पडतील, असे ते म्हणाले.

महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कोरोनासारख्या कठीण काळात या रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफने केलेल्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले, कोविड काळात रुग्णालयाची गरज ओळखून या ठिकाणी कोविड आयसीयू युनिट तयार केले. थोरला दवाखाना म्हणून हजारो लोक उपचार घेण्यासाठी इथं आपलेपणाने येतात. या रुग्णालयाच्या गरजा पाहून येत्या काळामध्ये हे रुग्णालय राज्यातील अग्रेसर रुग्णालय होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करुया.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, पालकमंत्री दीपक केसरकर व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सीपीआर मध्ये बदलत्या काळानुसार अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन दिली असून याचा सर्वसामान्यांना नक्की लाभ होईल. वैद्यकीय क्षेत्राला चालना देण्यासाठी अनेक योजना तात्काळ मंजुर केल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी पालकमंत्री श्री. केसरकर यांना धन्यवाद दिले. शेंडा पार्क मधील हॉस्पिटल लवकरच कार्यान्वित होईल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

स्वागत अधिष्ठाता डॉ. प्रदीप दिक्षीत यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शल्यचिकित्साशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वसंतराव देशमुख यांनी केले. छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयास सन २०२१ -२२ साली कोविडच्या तिस-या लाटेत लहान बालकांचे वाढते प्रमाण लक्षात घेता जिल्हा नियोजन समितीच्या कोविड निधिमधून बालरोग अतिदक्षता विभागाच्या श्रेणीवर्धनाकरीता ७५ लाख रुपये बांधकाम खर्च व १३४ लाख रुपये यंत्रसामुग्री, साधनसामुग्री खरेदी करण्याकरीता निधी प्राप्त झाला. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या सर्वसाधारण निधीमधुन दोन मॉड्युलर ऑपरेशन थिएटरच्या कामास मंजुरी मिळाली. यामधुन कान, नाक, घसाशास्त्र विभागाच्या मॉडयुलर ओ.टी. करीता १९३ लाख रुपये व ट्रामा केअर युनीटच्या मॉड्युलर ओ.टी. करीता २२२ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती त्यांनी दिली.

आभार अधिष्ठाता डॉ. प्रदीप दिक्षीत यांनी मानले. डॉ. प्रिया होंबाळकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. कार्यक्रमास वैद्यकीय अधिक्षक डॉ. गिरीष कांबळे, कान- नाक- घसा शास्त्र विभागप्रमुख डॉ. अजित लोकरे, अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागप्रमुख डॉ. राहुल, बालरोग चिकित्साशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुधीर सरवदे, प्रभारी अधिसेविका अंजली देवरकर तसेच इतर अध्यापक, महाविद्यालय व रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.

000

जिल्हा वार्षिक योजनेचा निधी ३१ मार्च पूर्वी खर्च करा – पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सूचना

कोल्हापूर, दि.19 (जिमाका) : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन 2022- 23 मधील सर्व कामे तात्काळ पूर्ण करुन घेवून प्राप्त निधी 31 मार्च पूर्वी खर्च करावा, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सर्व यंत्रणांच्या प्रमुखांना दिल्या.

जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना कामांची आढावा बैठक आज पालकमंत्री श्री केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री श्री केसरकर यांनी चालू वर्षी झालेली कामे व सुरु असलेल्या कामांचा आढावा घेवून कामाची सद्यस्थितीची माहिती विविध यंत्रणांच्या प्रमुखांकडून घेतली. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्राप्त निधीतून होणारी कामे गतीने पूर्ण करताना कामांचा दर्जा चांगला ठेवा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

इन्फ्लुएन्झा आजाराच्या परिस्थितीचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

पालकमंत्री श्री केसरकर म्हणाले, नव्याने उद्भवलेल्या इन्फ्लुएन्झा संसर्ग एच -३ एन- २ आजाराच्या रुग्णावर तात्काळ उपचार सुरु केल्यास तो लवकर बरा होतो. इन्फ्लुएन्झा प्रतिबंधासाठी व्यापक मोहीम राबवा. लसीकरण पूर्ण करुन घ्या. लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींच्या तपासण्या करा, पुरेसा औषधसाठा, वैद्यकीय सेवा सुविधा तयार ठेवा. प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याला प्राधान्य द्या. नागरिकांमध्ये सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे आढळल्यास तात्काळ तपासणी करुन घेवून औषध सुरु करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याबाबत व्यापक जनजागृती करा, अशा सूचना पालकमंत्री श्री केसरकर यांनी दिल्या.

कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत असणाऱ्या हेरिटेज वास्तूंचे संरक्षण, संवर्धन आणि सुशोभीकरण करण्यासंबंधीची संकल्पना खासदार धनंजय महाडिक यांनी मांडली. ते म्हणाले, महानगरपालिका क्षेत्रातील उद्योजकांच्या सहकार्याने त्या त्या प्रभागातील हेरिटेज वास्तूंची देखभाल, दुरुस्ती करता येईल. हेरिटेज वास्तूंच्या संवर्धनाच्या दृष्टीने हा उपक्रम राबवण्याची कार्यवाही करु, असे पालकमंत्री श्री केसरकर यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत करण्यात येणारी कामे व सद्यस्थितीची माहिती दिली. कोल्हापूर महानगरपालिका कामांची माहिती आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी तर जिल्हा परिषदेच्या कामांची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली.

जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2022 -23 साठी 425 कोटी रुपयांचा निधी मंजूर असून आत्तापर्यंत 320.22 कोटी रुपये निधी शासनाकडून प्राप्त झाला आहे. आज अखेर 242.89 कोटी रुपयांच्या प्रशासकीय मंजुरी झाल्या असून, कार्यान्वयीन यंत्रणांना आत्तापर्यंत 187.08 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोन अंतर्गत शासनाच्या सूचनेनुसार पुनर्विनियोजनाद्वारे 25.70 कोटी रुपये निधी तसेच लंपी रोग नियंत्रणासाठी 3 कोटी, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे यंत्र सामुग्री व साधनसामग्री खरेदीसाठी 8.28 कोटी, जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालयासाठी 2 कोटी व नगरपालिका, महानगरपालिकेत नगरोत्थान योजनेअंतर्गत 11 कोटी इतका निधी पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध करुन देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांनी दिली.

वारुळवाडी पाणीपुरवठा योजनेचे काम वेळेत पूर्ण करावे – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे, दि. १९ : वारुळवाडी पाणी पुरवठा योजनेअंतर्गत १७ वाड्यांचा समावेश करण्यात आला असून येत्या ३० वर्षातील या भागातील पाण्याच्या प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे या योजनेचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी समन्वयाने काम करावे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

जल जीवन मोहिमेअंतर्गत जुन्नर तालुक्यातील ग्रामपंचायत वारूळवाडी भूमीपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी सारंग कोडलकर, तहसीलदार रविंद्र सबनीस, गट विकास अधिकारी शरदचंद्र माळी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम भांडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, सरपंच राजेंद्र मेहेर, उपसरपंच ज्योती संते आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील नागरिकांना दूषित पाण्यामुळे आजार होतात. याचा विचार करता ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळण्याकरीता ७० हजार कोटीची ‘हर घर जल’ योजना कार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे राज्यातील ग्रामीण भागात प्रत्येक घरात नळजोडणी देण्यात येणार आहे. वारुळवाडी पाणी पुरवठा योजनेसाठी ४७ कोटी ४८ लक्ष ८७ हजार ७२६ रुपये मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये सन २०५४ पर्यंत लोकसंख्येचा विचार करुन प्रत्येक नागरिकाला ५५ लिटर दर दिवशी शुद्ध पाणी देण्याबाबत नियोजन करण्यात आले. यामध्ये जुन्या पाईपसोबत नवीन पाईप लाईनचे काम करण्यात येणार आहे. योजना पूर्ण झाल्यावर भागातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळणार आहे, असेही पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले.

वारुळवाडी पाणी पुरवठा योजनेद्वारे १२ हजार नागरिकांना पाणी

वारुळवाडी पाणी पुरवठा योजनेमध्ये ठाकरवाडी, गणपीरबाबा वस्ती, कोल्हेमळा, कळमजाई ठाकरवाडी, मळावाडी, शहाणे-रेपाळे वस्ती, ढेरेमळा, काडळेवस्ती, चिमणवस्ती, केदारवस्ती, वारुलेमळा, जाधव-काडले वस्ती, मेहेरमळा, कानडे-वारुले वस्ती, आनंदवाडी, वळणवाडी, नुंबरवाडीवाडी या वाड्यांच्या समावेश करण्यात आलेला आहे. योजनेअंतर्गत १२ हजार ४१० नागरिकांना शुद्ध पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. साठवण टाक्या, आरसीसी जॅकवेल, ब्रीज, जलसुद्धीकरण केंद्र, शुद्धपाणी पंपीग यंत्रणा, आदी कामे करण्यात येणार आहेत.सदरची योजना ३० महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

प्रत्येक गावाला मुबलक पाणी मिळणार – पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

नंदुरबार,दिनांक.19 मार्च,2023 (जिमाका वृत्तसेवा) : केंद्र व राज्य शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गाव, वाड्या,वस्ती व पाड्यांतील प्रत्येक कुटूंबाला मुबलक व स्वच्छ पाणी मिळणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी केले.

अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर, अक्कलकुवा, खापर, मोरंबा येथील जल जीवन मिशन अंतर्गत प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री डॉ. गावित बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ.हिना गावित,आमदार आमश्या पाडवी, जि.प.सदस्य सुरैय्या मक्राणी, आरिफ मक्राणी, किरसिंग वसावे, सरपंच  उषा बोरा (अक्कलकुवा), अशोक पाडवी (वाण्याविहीर ), किसन नाईक (अलिविहीर ),तहसिलदार रामजी राठोड, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उप अभियंता चैतन्य निकुंभ यांच्यासह लोकप्रतिनिधी व पदाधिकारी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, जलजीवन मिशनअंतर्गत प्रत्येक नागरिकांला शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्यासाठी केंद्र शासनाने भविष्यात वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करुन पुढील 30 वर्षांचे नियेाजन करुन जलजीवन मिशन  ही योजना सुरु केली आहे. या योजनेसाठी केंद्र शासनाकडून 60 टक्के व राज्य शासनाकडून 30 टक्के निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. बहुतांश आजार हे दुषित पाण्यामुळे होत असल्यामुळे या योजनेमुळे प्रत्येक कुटूंबाला शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असल्याने अनेक दुषित पाण्याच्या माध्यमातून आजारापासून मुक्ती मिळणार आहे. 55 लिटर दरडोई पाणी मिळणार असल्याने पाण्याचा वापर अधिक होईल व त्यातून सांडपाणीचा निचरा होण्याच्या दृष्टीने भूमिगत गटाराची व्यवस्था तसेच नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी येत्या दोन वर्षांत प्रत्येक वाडा, वस्ती व पाड्यांत जाण्यासाठी बारमाही रस्ते तयार करण्यात करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

गेल्या आठवड्यात सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, तलाठी व ग्रामसेवकांची बैठकीत ज्या गावांची लोकसंख्या 5 हजार पेक्षा अधिक आहे अशा गावांत भूमिगत गटारी बांधण्यासाठी तसेच गावाचा विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना  देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातुन ग्रामीण, तालुका व जिल्हास्तरावर सांस्कृतिक भवन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. अक्कलकुवा शहरातील विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. ज्या गरीब व्यक्तींना घरे नाही अशांना आदिवासी विकास विभागामार्फत मोठया प्रमाणात घरकुलाचे काम घेण्यात येत असून ज्या व्यक्तींचे ‘ड’ यादीत नाव सर्व आदिवासी बांधवांना 100 टक्के घरे देण्यात येईल. तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी तापी व देहली प्रकल्पातुन पाणी आणुन याभागातील सिंचन क्षेत्र वाढविण्यात येईल. तसेच देहली प्रकल्पा खालील क्षेत्रात लहान बंधारे बांधण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, खासदार डॉ.हिना गावित यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

000

पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी केली गारपीटग्रस्त भागाची पाहणी; तातडीने पंचनामे करण्याचे दिले प्रशासनाला निर्देश

नंदुरबार,दिनांक.19 मार्च,2023 (जिमाका वृत्तसेवा): नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी आज अवकाळी पावसाने झालेल्या ठाणेपाडा ,आष्टे , सुतारे, अजेपुर, हरिपूर, घोगळपाडा, अंबापुर या अवकाळी पाऊस अन गारपीटग्रस्त नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली.

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून अवकाळी पाऊस व गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ.गावित यांनी आज या भागाचा दौरा केला. यावेळी तहसिलदार भाऊसाहेब थोरात, तालुका कृषि अधिकारी स्वप्निल शेळके,मंडळ कृषी अधिकारी सुनील गांगुर्डे, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक शशिकांत गावित, मनीलाल सांबळे यांच्यासह जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ.गावित यांनी अवकाळी पाऊस, गारपीटग्रस्त भागाची पाहणी करून तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. याभागातील कांदा,केळी,पपई,मका,गहु टोमॅटो व इतर फळ पिकांचे नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. असेही पालकमंत्री  डॉ.गावित यांनी सांगितले.

 

000

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या प्रदर्शनास महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

ठाणे दि. 19(जिमाका) :- अनुसूचित जाती जमाती व नवबौध्द घटकांसाठी असलेल्या योजनांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी व या घटकांना त्याचा लाभ कशा प्रकारे घेता येईल, याची माहिती देण्यासाठी  जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय यांच्या मार्फत जिल्ह्यातील विविध महाविद्यालय व  औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रदर्शनाद्वारे जनजागृती केली जात आहे. महाविद्यालयांमधील या प्रदर्शनास विद्यार्थ्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून योजनांचा लाभ कसा घेता येईल या बद्दल विद्यार्थी जाणून घेत असल्याचे दिसून येत आहे.

सामाजिक न्याय विभागांच्या विविध योजनांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने अनुसूचित जाती उपयोजनेतून जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये एक दिवशीय प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येत आहे. या प्रदर्शनात सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचे स्टँडिद्वारे माहिती देण्यात आली आहे.

भाईंदर येथील प्रविण पाटील कॉलेज, कल्याणमधील बिर्ला महाविद्यालय, वाशी येथील एफ.आर.सी महाविद्यालय, उल्हासनगर येथील एस.टी कॉलेज, या महाविद्यालयांमध्ये आतापर्यंत या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनास महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भेट देऊन माहिती घेतली.

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजना व उपक्रमांची माहिती या प्रदर्शनाच्या माध्यमातून दिली जात आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती, रमाई आवास योजना, नवउद्योजकांसाठी असलेली स्टँडअप योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, स्पर्धा परिक्षांसाठी मार्गदर्शन, सैनिकी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती, शेतकऱ्यांसाठी असलेली मिनी ट्रॅक्टर योजना व डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना अशा विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे. महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही प्रदर्शनास भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.

शेतकऱ्यांना शासन काहीही कमी पडू देणार नाही – पालकमंत्री गिरीष महाजन

बारड, नागेली, पांढरवाडी, पाटनूर येथे केळी, खरबुज, टोमॅटो आदी पिकांचे नुकसान पाहून सारेच झाले हवालदिल

नांदेड (जिमाका) दि. १९ :- गेल्या तीन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यातील बारड, नागेली, पाटनूर व इतर भागात अति गारपिटीमुळे शेतकऱ्यांना हवालदिल व्हावे लागले. राज्याचे ग्रामविकास, पंचायतीराज, वैद्यकिय शिक्षण,  क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी जिल्ह्यातील या नुकसानीबाबत मंत्रालय पातळीवरून जिल्हा प्रशासनाला तात्काळ निर्देश दिले होते. ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांचे तात्काळ पंचनामे सुरू करून अधिकाधिक न्याय शेतकऱ्यांना कसा देता येईल हे पहावे, असे स्पष्ट केले. आज त्यांनी प्रत्यक्ष बारड, नागेली, पांढरवाडी, पाटनूर येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर दिला.

जिल्ह्यातील गारपीटग्रस्त भागाच्या या दौऱ्यात त्यांच्या समवेत आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार राजेश पवार, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, डॉ. अजित गोपछडे, प्रवीण साले, संबंधीत विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

झालेल्या नुकसानीची एक भुमिपूत्र म्हणून मला जाणीव आहे. मी सुद्धा केळी उत्पादक शेतकरी आहे. हाताशी आलेली केळी निसर्गाच्या अशा अवकृपेने निघून जाते तेंव्हा शेतकऱ्यांना होणारे दु:ख व सोसावे लागणारे आर्थिक नुकसान याची कल्पना करवत नाही. शेतकऱ्यांसाठी शासन अधिक सकारात्मक आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. त्याबाबत त्यांनी सभागृहालाही वस्तुस्थिती अवगत करून हे सरकार शेतकऱ्यांना काही कमी पडू देणार नाही, असे स्पष्ट केले आहे. या नुकसानीबद्दल आम्ही अधिक सजग असून जिल्हा प्रशासनातर्फे तात्काळ पंचनामे पूर्ण करून त्यांना मदतीबाबत तात्काळ कार्यवाही करू अशी ग्वाही पालकमंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

पाटनूर येथे परिसरातील सर्व शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. निसर्गाचा लहरीपणा हा अलिकडच्या काळात वाढत चालला आहे. यात विशेषत: मार्च, एप्रिल, मे मध्ये गारपीटमुळे होणारे नुकसान आव्हानात्मक झाले आहे. वादळ, वारे, अतिवृष्टीसह विमामध्ये गारपिटीचाही समावेश करणे आवश्यक आहे. याचबरोबर शेतकऱ्यांनीही आता विमाबाबत अधिक काळजी घेऊन गारपिटीचाही अंर्तभाव कसा होऊ शकेल याची काळजी घेण्याचे आवाहन पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले. अनेक शेतकऱ्यांच्या केळी पिकाची संपूर्ण पाने फाटून गेली आहेत. अशा स्थितीत केळीची फळधारणा ही अशक्य आहे. एकदा केळीची पाने फाटली एकप्रकारे हे संपूर्ण पिक हातातून गेल्यासारखे आहे. ज्याठिकाणी गारपिटीमुळे असे नुकसान झाले आहे त्यांना वास्तविक प्रत्येक झाड काढणेही आता खर्चिक आहे. या नुकसानीचा सर्व अंदाज शासनाने लक्षात घेतला असून अधिकाअधिक मदतीची भुमिका आमच्या शासनाची आहे, असे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी स्पष्ट केले.

पांढरवाडी शिवार येथे गोविंद चित्तलवाड यांच्या केळीचे झालेले नुकसान, कापावार शेंबोलीकर यांच्या टोमॅटोचे झालेले नुकसान तर पाटनूर शिवारातील जगदीश उपाध्याय, गोविंदराव देशमुख यांच्या शेतातील नुकसानीची त्यांनी पाहणी केली. प्रारंभी शासकीय विश्रामगृह येथे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पालकमंत्री गिरीष महाजन यांच्याशी चर्चा करून झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत कशी करता येईल ती करण्याचा आग्रह धरला.

नियोजन भवन येथे पालकमंत्री यांनी विभाग प्रमुखांकडून घेतला आढावा

नांदेड जिल्ह्यात बाधित शेतकऱ्यांची संख्या सुमारे 19 हजार 899 एवढी असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. यात जिरायत बाधित क्षेत्र 11 हजार 376 हेक्टर असून बागायत बाधीत क्षेत्र हे 10 हजार 636 असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुमारे 1 हजार 542 हेक्टर क्षेत्रावरील फळपिकाचे बाधित क्षेत्र असल्याचा अंदाज आहे. अर्धापूर, भोकर, मुदखेड, नांदेड, लोहा, हदगाव, देगलूर, हिमायतनगर, कंधार, किनवट आदी तालुक्यांचा यात समावेश आहे. या गारपिटीमुळे 917 शेतकरी बाधित आहेत. सद्यस्थितीत एकुण 698 हेक्टर बाधित क्षेत्राचे पंचनामे झालेले आहेत. उरलेले पंचनामे येत्या 4 दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री गिरीष महाजन यांनी दिले.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शेतकऱ्यांना अधिकाधिक न्याय मिळावा यादृष्टीने शासनाने प्रयत्न करावेत. याचबरोबर विमाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर जमा व्हावी यासाठी विमा कंपन्यांना निर्देश करण्याची मागणी करून लेखी निवेदन दिले. याचबरोबर आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार  राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहनअण्णा हंबर्डे, आमदार जितेश अंतापूरकर यांनी पालकमंत्री गिरीष महाजन यांना नुकसानीबाबत माहिती देऊन तात्काळ पंचनामे पूर्ण होऊन मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

000

ज्येष्ठांना जे-जे देण्यासारखे आहे ते-ते देण्याचा प्रयत्न – पालकमंत्री गिरीष महाजन

नांदेड (जिमाका) दि. १९ :- ज्येष्ठांना मान-सन्मानाची वागणूक देणे ही आपली संस्कृती असून ती आपण जोपासली पाहिजे. यासाठी शासन संवेदनशिल असून येत्या काळात शासनातर्फे महिला व जेष्ठांना आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरविण्यावर भर देण्यात येईल. शासनातर्फे जेष्ठांना जे-जे देण्यासारखे आहे ते-ते देण्याचा प्रयत्न राहील, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, पंचायतीराज, वैद्यकिय शिक्षण,  क्रीडा व युवक कल्याण  मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले.

महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेस्कामच्या ५ व्या राज्यस्तरीय महिला अधिवेशन आणि मनोहारी मनोयुवा आनंद मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार राजेश पवार, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार तसेच महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेस्कामचे अध्यक्ष अरुण रोडे, अशोक तेरकर, राज्यातील फेस्कामचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ महिला सदस्य आदींची उपस्थिती होती.

राज्यात अंदाजे १ कोटी ३६ लाख ज्येष्ठांची संख्या असून ज्येष्ठांना आवश्यक त्या मुलभूत गरजा पुरविण्यावर भर देण्यात येत आहे. यात प्रामुख्याने प्रवास आणि आरोग्याच्या सुविधा पुरविण्यावर भर देण्यात येत आहे. ७५ वर्षावरील ज्येष्ठांना राज्य परिवहन महामंडळाच्या बस मध्ये मोफत प्रवासाची सोय असून,  महिलांनाही प्रवासात ५० टक्के सवलत दिली आहे. येत्या काळात महानगरपालिका क्षेत्रात विरंगुळा सेंटर उभारण्यात येणार आहेत. तसेच राज्यात सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ज्येष्ठ नागरिकांच्या तपासणीसाठी ६५ वर्षाच्यावरील नागरिकांना वेगळी ओपीडीची व्यवस्था करण्याचा विचार असून ज्येष्ठांना नियमित तपासण्यासाठी रांगेत उभे राहण्याची आवश्यकता भासणार नाही, असे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी उपस्थित ज्येष्ठांना सांगितले.

शासनाच्यावतीने सध्या ब्रेस्ट कॅन्सर तपासणी मोहिम सुरु आहे. या आजारात महिलांनी पुढाकार घेवून आपली तपासणी करुन घ्यावी. जेणेकरुन वेळीच निदान होवून उपचार मिळाल्यास रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढण्यास मदत होईल. यासाठी ग्रामीण भागात आरोग्य विभागाच्या आशा कार्यकर्ती, आरोग्य सेविका यांच्यामार्फत तपासणी करण्यात येणार आहे. महिलांनी या मोहिमेचा अवश्य लाभ घ्यावा, असेही पालकमंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.

फेस्कामच्यावतीने वैद्यकीय सेवेत उत्कृष्ट कार्य केल्याबाबत डॉ. मायाताई कुलकर्णी यांना फेस्काम महिला भूषण पुरस्कार व अण्णासाहेब टेकाळे यांना जीवन गौरव पुरस्कार पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. फेस्कामचे अध्यक्ष अरुण रोडे यांनी ज्येष्ठांना शासनातर्फे दिलेल्या सुविधांबाबत आभार मानले. यावेळी फेस्कामच्या मनोहारी मनोयुवा पुस्तिकेचे प्रकाशन व यावल समाचार वृत्तपत्राचे प्रकाशन पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

000

ताज्या बातम्या

नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई पदांसाठी १ ते ८ जुलै दरम्यान ऑनलाईन परीक्षा

0
मुंबई, दि. १७ : नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई ‘गट-ड’ संवर्गात 284 पदे भरती करीता दिनांक 22 एप्रिल 2025 रोजीच्या वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात...

महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन तरुण उद्योजकांनी व्यवसाय सुरू करावा – मंत्री अतुल सावे

0
मुंबई, दि. १७ : इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत विविध महामंडळांच्या माध्यमातून राज्यातील ओबीसी समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. या...

टीआरटीआयच्या वार्षिक नियोजन आराखडा पुस्तिकेचे मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते प्रकाशन

0
मुंबई, दि. १७ : आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय), पुणे यांच्या वार्षिक नियोजन आराखडा पुस्तिकेचे प्रकाशन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या...

पालिका शाळांनी विद्यार्थ्यांना परकीय भाषा देखील शिकवाव्यात – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

0
मुंबई, दि. १७: लहान मुले तंत्रज्ञानस्नेही असतात तसेच ते नवनवीन भाषा देखील लवकर शिकतात. बृहन्मुंबई महानगर पालिका देशातील आर्थिकदृष्ट्या संपन्न महानगरपालिका असून पालिकेने आपल्या...

वर्सोवा खाडी येथील मासेमारी बंदराच्या कामाला गती द्यावी – मंत्री नितेश राणे

0
मुंबई, दि. १७ : वर्सोवा खाडी येथील प्रस्तावित मासेमारी बंदराच्या कामास गती देऊन लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यात यावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री...