शुक्रवार, जून 20, 2025
Home Blog Page 1430

शासन स्तरावर नमो शेतकरी महासन्मान निधीचे नियोजन

नागपूर,दि. 29 :  राज्य शासनाने नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, पूर्ण वेळ शेतीवर विसंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत सहा हजार रुपये वार्षिक देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता वर्षाला 12 हजार रुपये सानुग्रह निधी मिळणार आहे.

या नव्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आता केंद्र व राज्य शासनाकडून आर्थिक सानुग्रह निधी मिळणार आहे. कृषी विषयक विपरीत परिस्थितीत असहायतेची भावना निर्माण होऊ नये, यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून दरवर्षी सहा हजार रुपये मिळायचे. 2018 मध्ये केंद्र शासनाने ही योजना सुरु केली. तर राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना नव्याने घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे केंद्र शासनातील योजनांचे 6 हजार व आता नमो शेतकरी महासन्मान निधीतून आणखी 6 हजार असा हा निधी 12 हजार झाला आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा जाहीर केली आहे.  

लाभार्थी शेतकरी कोण ?

सामान्यत: या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत असेल, अशा सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ दिला जाईल, अशी माहिती देण्यात आलेली आहे. 

महाराष्ट्रात 1.15 कोटीनागपूरमध्ये 80 हजार

नव्या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात जवळपास 1.15 कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारने ज्यांच्याकडे शेती आहे व ज्यांचे उदरनिर्वाहाचे साधन शेती आहे. अशा सर्व शेतकऱ्यांना यामध्ये समाविष्ट केले आहे. नागपूर जिल्ह्यात ही संख्या जवळपास 80 हजाराच्या आसपास जाते आहे. राज्य शासनाला या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 6 हजार 900 कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे.

नमो शेतकरी सन्मान निधी योजना

शासनाच्या या नवीन नमो शेतकरी सन्मान निधी योजनेमुळे शेतकऱ्यांना दुप्पट फायदा होणार आहे. कारण यापूर्वी शेतकऱ्यांना फक्त पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून सहा हजार रुपये वार्षिक दिले जायचे; परंतु आता या नवीन योजना मुळे बारा हजार रुपये वार्षिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’साठी ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. २९ : राज्यातील काही खेळाडूंचे फेडरेशन कप स्पर्धांचे गुणांकन होत नसल्याकारणाने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन २०१९-२०, २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षाकरिता ते अर्ज सादर करू शकले नाहीत. त्यांचे नुकसान होऊ नये व हे खेळाडू पुरस्कारापासून वंचित राहू नये, याकरिता अशा पात्र खेळाडूंनी त्यांचे प्रस्ताव व विहीत नमुन्यातील अर्ज दि. ३१ मार्च, २०२३ पर्यंत संबंधित जिल्ह्यांचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेकडे सादर करावेत, असे आवाहन क्रीडा विभागामार्फत करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासनामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

दि. १४ डिसेंबर, २०२२ च्या शासन निर्णयान्वये शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी नियमावली जारी केली आहे. या नियमावलीनुसार सन २०१९-२०, २०२०-२१ व २०२१-२२ या तीन स्वतंत्र वर्षांच्या पुरस्कारासाठी राज्यातील खेळाडू (ज्या खेळाच्या फेडरेशन कप स्पर्धा होतात असे सहभागी/प्राविण्यप्राप्त खेळाडू फक्त) यांच्यामार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचा विहीत नमुना https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन, डाऊनलोड करून घेऊन, व्यवस्थितरित्या भरुन संबंधित जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावयाचा आहे.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याची मुदत दि. ३१ मार्च, २०२३ पर्यंत अशी ठेवण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी क्रीडा विभागाच्या करण्यासाठी https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ताज्या बातम्या मधील लिंकवर पहावे. पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्या-या खेळाडू, यांनी विहीत मुदतीत अर्ज सादर करण्याबाबत क्रीडा विभागामार्फत आवाहन करण्यात  आले आहे.

000000

राजू धोत्रे/विसंअ

निरोगी आहारासाठी पौष्टिक तृणधान्यांचा वापर

महाराष्ट्रात तसेच भारताच्या इतर राज्यांत पूर्वीपासून विविध प्रांतात अन्नधान्याची विविधता आढळून येते.  सकस आहारावर पूर्वीच्या काळी जास्त भर दिला जायचा. हळूहळू ही पद्धत बदलत गेली आणि जंक फूड किंवा फास्ट फूडचे अधिक प्रमाणात सेवन वाढले. रोजची धावपळ, कामाचे व्यवस्थापन यामध्ये नाईलाज म्हणून यावर भर दिला जाऊ लागला. त्यातून वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण मिळाले. त्यामुळेच आता पुन्हा पूर्वापार चालत आलेल्या काही पद्धती आपण अंगीकारत असल्याचे दिसते आहे. शरीराला पौष्टिक मानल्या गेलेल्या तृणधान्याचा वाढता वापर हे त्याचेच द्योतक आहे. हे महत्त्व अधिक ठळकपणे अधोरेखित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष आनंदाची बाब ही की, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्र संघाने हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून घोषित केले आहे.

आपला देश हा जगातील सर्वात मोठा पौष्ट‍िक तृणधान्य उत्पादक देश आहे. या पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये पौष्टिक तृणधान्याबद्दल जागरुकता वाढविणे आणि  तृणधान्य उत्पादन अधिकाधिक वाढविणे यासाठी प्रोत्साहन देण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. राज्यात त्यादृष्टीनेच ‘महाराष्ट्र मिलेट मिशन’चा प्रारंभ करून ‘श्री अन्न अभियान’ सुरू केले आहे. त्यासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. भरड धान्याच्या उत्पन्न वाढीसाठी तंत्रज्ञानाचा प्रसार, प्रात्यक्षिक, यांत्रिकीकरण करणे, प्रक्रिया करणे, मूल्यसाखळी विकास याचा यामध्ये समावेश आहे.

शेतकऱ्यांनी अधिकाधिक उत्पादन घेणे आणि दैनंदिन आहारात सर्वांनी त्याचा वापर करणे गरजेचे आहे. तरच हा केवळ या एका वर्षापुरता उपक्रम न राहता लोकचळवळ बनेल. सध्या  राज्याच्या विविध भागांत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून या पौष्टिक तृणधान्याचे महत्व पटवून दिले जात आहे.

आपल्याकडे परंपरेनुसार आहारात अनेक प्रकारचे धान्य वापरतात. यामध्ये गहू, तांदुळ या रोजच्या धान्याबरोबरच ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, राजगिरा, कोडो, कुटकी अशा तृणधान्यांचा देखील समावेश होतो. या तृणधान्यांमुळे आहारात विविधता राखली जाते. पौष्टिक तृणधान्यांचा उपयोग आपल्या रोजच्या ऊर्जेच्या गरजा भागविण्यासाठी आवश्यक आहे. आपला आहार हा कर्बौदिके, प्रथिने, जीवनसत्वांनी समृद्ध हवा, ही गरज तृणधान्य भागवतात.

या पीकांचे उत्पादन हे प्रामुख्याने कोरडवाहू भागात होते. या शेतकऱ्यांची पीक पद्धती टिकून राहावी याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुधारित बियाणे आणि अवजारे यांचा विविध योजनांद्वारे पुरवठा करुन उत्पादकता वाढविण्यावर राज्य शासनाचा भर आहे. यासंदर्भात कृषीमंत्री अब्दुल सत्तार नियमितपणे आढावा घेत असतात.

महाराष्ट्रात नगदी पीक घेण्याचा कल जास्त आहे. पीक पद्धतीचा अभ्यास केला तर लक्षात येईल की, तृणधान्यांचे उत्पादन इतर धान्यांच्या तुलनेत कमी वाढलेले आहे. या धान्यांत सूक्ष्म आणि स्थूल पोषकतत्त्वे असल्यामुळे सर्वच वयोगटांतील व्यक्तिंसाठी या धान्यांचा आहारात समावेश असणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, आपल्या राज्यासोबतच देशाच्या इतर भागांतही पौष्टिक तृणधान्यांचा प्रति व्यक्ति वापर दर वर्षी कमी कमी होत चालल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते. वाढती लोकसंख्या आणि अन्नधान्याची मागणी यामध्ये होणारी तफावत, पौष्टिक तृणधान्यांच्या जास्त वापराने काही प्रमाणात भरुन काढता येऊ शकते. कारण पौष्टिक तृणधान्य इतर धान्यांच्या तुलनेत स्वस्त असतात तसेच पौष्ट‍िकतेच्या दृष्टीने देखील समृद्ध असतात, हे विशेष!

पौष्टिक तृणधान्य ही पर्यावरणास अनुकूल आहेत. या पिकांच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांचे धान्य उत्पादन वाढविण्यास मदत होते. शिवाय शेतीतील जैवविविधता आणि टिकाव वाढविणारी मिश्र पीक प्रणाली करणे आवश्यक असते. या पद्धतीमुळे जमिनीची सुपीकता वाढून पीके अधिक मजबूत होतात, आणि शेतीची उत्पादकताही वाढते. आपल्या राज्याच्या कोरडवाहू भागात अनेक शेतकरी अशा पीकपद्धतीचा अवलंब करताना आपण पाहतो.

सन 1991 ते 2000 या दशकात खरीप हंगामात सोयाबीन, तूर व ऊस पिकांमध्ये तर रबी हंगामात हरभरा पिकाखालील क्षेत्रात वाढ झाल्यामुळे पौष्टिक तृणधान्य पिकांखालील क्षेत्रात मोठी घट होण्यास सुरुवात झाली. सन 2010-11 ते 2020-21 कालावधीत पौष्टिक तृणधान्य पिकाचे क्षेत्र 57 टक्के, उत्पादन 52 टक्के घटले आहे. तथापि उत्पादकतेत 12 टक्के वाढ झाल्याचे दिसून येते.

खरिप ज्वारी पिकाचे क्षेत्र 80 टक्के, उत्पादन 87 टक्के तर उत्पादकतेत 37 टक्के घट झालेली आहे. रब्बी ज्वारी पिकाचे क्षेत्र 53 टक्के, उत्पादन 27 टक्के घटले आहे, तथापि उत्पादकतेत 55 टक्के वाढ दिसून येते. बाजरी पिकाचे क्षेत्र 51 टक्के, उत्पादन 59 टक्के तर उत्पादकतेत 17 टक्के घट झालेली आहे.  नाचणी पिकाखालील क्षेत्र 39 टक्के, उत्पादन 21 टक्के घटले आहे, तथापी उत्पादकतेत 29 टक्के वाढ दिसून येते. पौष्टिक तृणधान्य पिकांखालील क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली तरी पिकांच्या सुधारित व संकरीत वाणांचा प्रसार तसेच, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे उत्पादकतेत झालेल्या वाढीमुळे उत्पादनात तेवढ्या प्रमाणात घट जाणवली नाही.

पौष्टिक तृणधान्य पिकांखालील क्षेत्र विस्ताराद्वारे क्षेत्र व उत्पादकता वाढविणे, नवीन वाणांच्या बियाणे/वाण बदलाच्या दरात वृद्धी करणे. सन 2018-19 पासून केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – पौष्ट‍िक तृणधान्य (न्युट्री सिरीयल) अंतर्गत ज्वारी, बाजरी व रागी या पिकांसाठी राज्यात 31 जिल्ह्यात अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये पिक प्रात्यक्षिके, सुधारित वाणांचे बियाणे वितरण, सुधारित बियाणे उत्पादन, एकात्मिक अन्नद्रव्ये व कीड व्यवस्थापन व कृषि यांत्रिकीकरण या बाबींचा समावेश आहे.

तृणधान्यांमधील पोषणमूल्यांमुळे त्यांना आहारामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असून त्यांची गणना पौष्टिक तृणधान्य अर्थात ‘श्री अन्न’ अशी करण्यात आली आहे. या अंतर्गत ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई व इतर लघु तृणधान्ये (कोडो, सावन, कुटकी, राळा) ही पिके मोडतात. या पिकांच्या उत्पादनात वाढ करून लोकांच्या आहारातील त्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी विविध उपक्रम राज्याचा कृषी विभाग राबवित आहे.

केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून तृणधान्य उत्पादनाला चालना देणे, आपल्या या पारंपरिक अन्नाकडे अधिकाधिक नागरिकांना पुन्हा वळविणे यासाठी सातत्याने प्रयत्न राज्य शासनामार्फत केले जात आहेत. समाजातील विविध घटकांचा सहभाग यामधे घेतला जात आहे. ग्रामीण आणि शहरी भागातही कृषी विभाग, आत्मा, ग्रामविकास यासह विविध विभागांच्या सहकार्याने या अभियानाला गती दिली जात आहे.

सर्वसाधारणपणे पौष्टिक तृणधान्ये ही ग्लुटेन फ्री असून त्यांचा ग्लायसिमिक इंडेक्स कमी आहे. या पिकात मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ (Fibers), विविध खनिजे (Minerals), आवश्यक जीवनसत्वे (Vitamins) व समतोल प्रथिने (Protins) आहेत. पौष्टिक तृणधान्ये लोह, कॅल्शियम, झिंक, आयोडीन इ. सारख्या सूक्ष्म पोषक घटकाने समृद्ध असल्याने पौष्टिक तृणधान्ये ही विविध आजारांवर गुणकारी असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात, ही बाब अधिक महत्त्वाची आहे.

राज्यात पौष्टिक तृणधान्य पिकांचे क्षेत्र व उत्पादनात वृद्धी करणे व या पिकांचे आरोग्यविषयक महत्त्व व आहारातील वापर वाढविण्याकरिता प्रचार-प्रसिद्धी करणे हे उद्देश आहेत. राज्य शासनाच्या विविध विभागांचा यामध्ये समावेश आहे. कृषी विभागासोबतच शालेय व उच्च शिक्षण, महिला व बालविकास, अन्न व नागरी पुरवठा, आदिवासी विकास, ग्रामविकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, सार्वजनिक आरोग्य, पर्यटन, इतर मागास व बहुजन कल्याण विभाग, माहिती व जनसंपर्क यांच्याबरोबरच राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालये, हॉटेल असोसिएशन, शेफ असोसिएशन, वैद्यक संघटना, राज्यातील सर्व महानगरपालिका, सामाजिक संस्था व प्रक्रीयाधारक यांचे सहकार्याने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात

येत आहे,

राज्य शासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हास्तरीय कृषी महोत्सव,  मिलेट दौड (रन / वॉक फॉर मिलेट), पाककला स्पर्धा, आहारतज्ज्ञांची व्याख्याने, मिलेट ऑफ दि मंथ म्हणजेच “महिन्याचे तृणधान्य” संकल्पना राबविणे, महानगरपालिका/नगरपालिका क्षेत्रामध्ये होर्डिंग्स, बिलबोर्डस, बॅनर्स इ. द्वारे प्रचार प्रसिद्धी, मध्यान्ह भोजन आहार इ. मध्ये पौष्ट‍िक तृणधान्याचा समावेश करणे, शेफ असोशिएशनच्या माध्यमातून पाककृती तयार करणे, प्रचार-प्रसार करणे,  विद्यार्थ्यामध्ये आरोग्य व आहारविषयक जागरुकता निर्माण करणे या उपक्रमांचा प्राधान्याने समावेश करण्यात आला आहे.

लोकांच्या आहारात पौष्टिक तृणधान्यांचा जास्तीत जास्त वापर वाढावा, त्यांनी आरोग्याबाबत अधिक जागरूक व्हावे आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही त्यामुळे भर पडेल.

 

दीपक चव्हाण

विभागीय संपर्क अधिकारी

००००

आपत्ती व्यवस्थापनाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता यांची ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या मुलाखत

मुंबई, दि. 29 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत गुरूवार दि. ३० मार्च २०२३ रोजी सायं ७.३० वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

जागतिक हवामान बदलामुळे उष्ण लहरींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याअनुषंगाने वेळीच खबरदारीच्या उपाययोजना म्हणून राज्य शासनामार्फत यासंदर्भातील माहिती संकलित करण्यात येत असून त्यावर कोणत्या उपाययोजना राबविता येतील यासंदर्भात आराखडा तयार करण्यात येत आहे. उष्ण लहरींच्या वाढत्या प्रभावाने मनुष्यजातीचे शारीरिक, मानसिक, आर्थिक अशा विविध पद्धतीने नुकसान होताना दिसत आहे. उष्णतेच्या बचावासाठी असलेल्या कृती आराखड्याबरोबरच माहितीचा प्रसार, पायाभूत सुविधा, वर्तणूक, संस्थापक क्षमता निर्माण करणे, तांत्रिक, नैसर्गिक घटकांचा वापर करुन उष्माघातापासून कसे वाचता येऊ शकेल, अशा विविध विषयांवर आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव श्री. गुप्ता यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे. निवेदक रिताली तपासे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

००००

रायगड-अलिबाग कुटुंब न्यायालयाच्या कार्यकक्षेत विस्तार

मुंबई दि. 29 : रायगड-अलिबाग येथील कुटुंब न्यायालयाच्या कार्याचा विस्तार पेण-मुरूड तालुक्याच्या क्षेत्रापर्यंत करण्यात आला आहे. यामुळे या क्षेत्रातील रहिवाशांच्या कौटुंबिक प्रकरणांचा जलदगतीने निपटारा होण्यास सहकार्य लाभणार आहे.

राज्य शासनाने उच्च न्यायालयाशी विचारविनिमय करून, रायगड-अलिबाग कुटुंब न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राच्या स्थानिक मर्यादा, पेण व मुरूड तालुक्याच्या संपूर्ण क्षेत्रापर्यंत वाढविल्या आहेत. या न्यायालयाच्या अधिकारितेच्या स्थानिक मर्यादा अलिबाग नगरपालिका क्षेत्राच्या मर्यादेशी समकक्ष तसेच तालुक्याच्या संपूर्ण स्थानिक सीमांतर्गत क्षेत्राशी तसेच मुरूड तालुक्याच्या संपूर्ण स्थानिक सीमांतर्गत क्षेत्राशी समकक्ष असतील, असे विधी व न्याय विभागाने अधिसूचनेद्वारा कळविले आहे.

००००

श्रद्धा मेश्राम/ससं/

राजकारणातील मित्रत्व जोपासणारे लोकाभिमुख नेतृत्व गमावले – राधाकृष्ण विखे पाटील यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. 29 : “भाजपचे नेते आणि खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने राजकारणातील मित्रत्व जोपासणारे लोकाभिमुख नेतृत्व गमावले” अशी भावना महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

आपल्या शोकसंदेशात मंत्री विखे पाटील म्हणाले की, गेली अनेक वर्षे विधिमंडळात त्यांचा सहवास लाभला. विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना त्यावेळी श्री. बापट संसदीय कामकाज मंत्री म्हणून काम पाहायचे. राजकारणात फार कटूता येऊ न देता सभागृहातील निर्माण होणाऱ्या पेचप्रसंगावर संवादाने मार्ग काढण्याची त्यांची हातोटी होती.

महानगरपालिका ते लोकसभा हा गिरीश बापट यांचा राजकीय प्रवास त्यांच्या लोकाभिमुख कार्याचा होता. पुणे आणि गिरीश बापट हे एक अतूट नाते होते. त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाचे मोठे नुकसान झाले असून पक्षाच्या वाटचालीतील एक अनुभवी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची संवेदना व्यक्त करून मंत्री विखे पाटील यांनी गिरीश बापट यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

००००

जमिनीशी नाळ असलेले राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व हरपले – खासदार गिरीश बापट यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. 29 : “भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने जमिनीशी नाळ असलेले राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे. विकास हाच त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता”, अशी शोकसंवेदना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

आपल्या शोकसंदेशात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, पक्षनिष्ठ, पण पक्षापलिकडे जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारे, सातत्याने जमिनीशी नाळ ठेवणारे, राजकारणातील एक उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे. देशाच्या सार्वभौम सभागृहातील त्यांचा खासदार म्हणून प्रवेश हा तळागाळातून होता. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, मंत्री आणि नंतर ते खासदार झाले. 2014 ते 2019 या कार्यकाळात ते संसदीय कामकाज मंत्री होते. त्यांचा हजरजबाबीपणा आणि सर्व पक्षांत समन्वय, यामुळे कोणताही प्रसंग आला तरी योग्य मार्ग काढण्याची त्यांची हातोटी होती. पुण्याच्या समग्र विकासाचे चिंतन करीत असतानाच कामगार आणि शेतकरी हे त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय होते. महाराष्ट्राच्या राजकारणात वावरत असताना अमरावती जिल्ह्यात त्यांनी शेती सुद्धा केली. प्रत्येक कामात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या उभारणी करणाऱ्या नेत्यांमध्ये ते अग्रणी होते. जनतेचे त्यांना भरभरुन प्रेम मिळाले.

पुण्याच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. या आजारालाही त्यांनी लढवय्यासारखी झुंज दिली. यातून ते बाहेर येतील, अशी आशा होती. पण, आज ते आपल्याला सोडून गेले. आजारी असतानासुद्धा सातत्याने मतदारसंघावर त्यांचे लक्ष असायचे. त्यांचे निधन ही भारतीय जनता पक्षाची अपरिमित हानी आहे. एक उत्तम संसदपटू, उत्तम वक्ते आपल्यातून निघून गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकीय आणि सर्व कार्यकर्त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदनेत म्हटले आहे.

००००

खासदार गिरीश बापट यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना शोक

मुंबई, दि. 29 : राज्यपाल रमेश बैस यांनी खासदार गिरीश बापट यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

“लोकप्रिय खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. आपल्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत गिरीश बापट यांनी संसद सदस्य, राज्य विधानसभेचे सदस्य, कॅबिनेट मंत्री, संसदीय समित्यांचे सदस्य यांसह विविध पदांवर उल्लेखनीय कार्य केले. कामगार संघटनेच्या माध्यमातून राजकारणात आलेले गिरीश बापट हे कुशल संघटक होते. त्यांचा जनसंपर्क अतिशय व्यापक होता. राजकारणात ते अजातशत्रू होते. त्यांच्या निधनामुळे राज्याने एक लोकप्रिय नेता व अनुभवी संसदपटू गमावला आहे”, असे राज्यपाल बैस यांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.

००००

 Maharashtra Governor condoles demise of Pune MP Girish Bapat

             Mumbai, 29th March : The Governor of Maharashtra Ramesh Bais has expressed condolences on the demise of Member of Parliament from Pune Girish Bapat. In a condolence message, the Governor has said:

“I am deeply saddened to learn about the demise of Member of Parliament Girish Bapat in Pune. In his long and illustrious political career, Girish Bapat left his indelible imprint as an MP, as a member of Maharashtra State Legislature, as Cabinet Minister in Maharashtra and as member of various Parliamentary Committees. Starting as a trade union leader, Bapat rose the ranks in politics due to his hard work and mass contact. An organisation man, Shri Bapat had friends across the political spectrum. The State has lost a popular leader and an experienced parliamentarian.”

0000

सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये ‘मिशन थायरॉईड अभियान’ राबविण्यात येणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

मुंबई, दि. 29 : वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागांतर्गत रुग्णसेवेसाठी व विविध रोगांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी विविध अभियाने सुरु केली असून राज्यात 30 मार्च 2023 पासून ‘मिशन थायरॉईड अभियान’ राबविण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.

‘मिशन थायरॉईड’ या अभियानाचे उद्दिष्ट थॉयराईड रोगासंदर्भात जनजागृती करणे व त्यासंबधात सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये थायरॉईड उपचारांसाठी विविध सोयी उपलब्ध करुन देणे हे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दर गुरुवारी दुपारी 12 वाजता औषधवैद्यकशास्त्र विभागाअंतर्गत विशेष थायरॉईड ओ.पी.डी. चालविली जाणार असून त्यामध्ये Physician, Surgeon, Endocrinologist, Pathologist, Sonologist व Biochemist अशा विविध तज्ज्ञांचा एकत्र समावेश राहणार आहे. थायरॉईडच्या विविध आजारांच्या औषधोपचारांची व बऱ्याच दृश्य स्वरुपातील थायरॉईडचे विविध परिणाम जसे अन्न घेताना त्रास होणे, श्वास गुदमरणे तसेच थायरॉईडचे विविध कॅन्सर यांसंबधी शस्त्रक्रियाची सोय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

थायरॉईडच्या विविध रोगांनी ग्रस्त असलेल्या गरजू रुग्णांनी दर गुरुवारी दुपारी 12 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील औषधवैद्यकशास्त्र विभागाअंतर्गत थायरॉईड क्लिनिकच्या सोयीचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी केले आहे.

साधारणपणे प्रत्येकी 1 लाख महिलांमागे अंदाजे 2 हजार महिलांना दृश्य स्वरुपात थायरॉईडची गाठ मानेवर दिसून येते. त्याचप्रमाणे अनेक महिलांना थायरॉईडची गाठ मानेवर दिसत नसताना देखील विविध थायरॉईडचे आजार झालेले आहेत. त्यातील बऱ्याचशा थायरॉईडच्या आजारांचे दीर्घकाळापर्यंत निदानदेखील होत नाही. अशा सर्व महिला, पुरुष आणि बालकांनादेखील या संपूर्ण अभियानाचा फायदा होणार आहे. अनेकदा थायरॉईडच्या रोगांनी ग्रस्त महिला आणि पुरुषांना आळस, सुस्तपणा, शरीरावर सूज येणे, भूक न लागतादेखील वजन वाढणे, आवाजात एकप्रकारचा जाडपणा अथवा घोगरेपणा येणे ही लक्षणे थायरॉईड ग्रंथींचे काम मंदावल्याचे दर्शवितात. अनेकदा अशा महिलांना वारंवार गर्भपाताला सामोरे जावे लागते. नवजात बालकांमध्ये थायरॉईड ग्रंथींच्या स्त्रावाअभावी मानसिक दुर्बल्य येऊन अशी बालके लहान खुरी व मंदबुद्धी होऊ शकतात. थायरॉईड ग्रंथींच्या अतिस्त्रावामुळे अतिजास्त रोडपणा, छाती धडधड करणे व क्वचितप्रसंगी डोळे बाहेर येणे अथवा अंधत्वदेखील येऊ शकते.

००००

वर्षा आंधळे/विसंअ/

गोसीखुर्द प्रकल्पामध्ये होणार ‘जलपर्यटन प्रकल्प’; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी

मुंबई, दि. 29 : “राज्यातील जलसंपदा प्रकल्पांच्या परिसरात पर्यटन विकासासाठी संधी असून या संधी विकसित करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. याचाच भाग म्हणून भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पात जलपर्यटन विकास करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येईल”, असे जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यात भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पात जलपर्यटन विकासाबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

या कार्यक्रमास पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार नरेंद्र भोंडेकर, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेंद्र मोहिते, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, पर्यटन विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालक श्रद्धा जोशी उपस्थित होत्या.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, विशेषतः, दुर्गम भागात कमी वेळेत पर्यटनस्थळाच्या विकासात जलपर्यटन महत्त्वाची भूमिका बजावते आणि त्यामुळे अर्थव्यवस्था गतिमान होण्यास मदत होते तसेच रोजगाराच्या संधी वाढतात. आज झालेल्या सामंजस्य करारामुळे गोसीखुर्द जलाशय आणि परिसराचा जागतिक दर्जाच्या जलपर्यटन प्रकल्पाच्या माध्यमातून विकास करता येणार आहे.

“जगातील बहुतेक देशांच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पर्यटन हा मुख्य घटक मानला जातो आणि राज्य शासन राज्यातील पर्यटन विकासावर विशेष लक्ष देत आहे. या सामंजस्य कराराद्वारे, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला जागतिक दर्जाचे जलपर्यटन विकसित होऊन स्थानिक तरुणांसाठी 80 टक्के रोजगार निर्मिती होईल. तसेच पर्यावरणास अनुकूल आणि शाश्वत पद्धतीने जलपर्यटन निर्माण होईल. राज्याच्या दुर्गम भागातील स्थानिक समुदायांच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा आहे”, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री. मोहिते यांनी १०१ कोटी रूपयांच्या या प्रस्तावित प्रकल्पातंर्गत राबविण्यात येणारे उपक्रम, प्रकल्पाची प्रस्तावित माहिती, पायाभूत सुविधा, जलपर्यटन, पर्यटकांची व वाहतुकीची अंदाजित संख्या, प्रकल्पाचे लाभ याविषयी सविस्तर माहिती दिली.

यावेळी जलसंपदा विभागाचे सहसचिव संजय टाटू, उपसचिव नमिता बसेर, कार्यकारी अभियंता सोनल गायकवाड आदी उपस्थित होते.

******

संध्या गरवारे/विसंअ/

 

 

ताज्या बातम्या

जिल्ह्यात दीडशे दिवसांच्या कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करा – पालक सचिव एकनाथ डवले

0
नाशिक, दि. १९ : राज्य शासनाने अलीकडेच दिलेल्या 100 दिवसांच्या कार्यक्रमात विविध विभागांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. आता शासनाने 150 दिवसांचा कार्यक्रम दिला आहे....

ढेबेवाडी येथील बस अपघातातील जखमींवर तात्काळ उपचार

0
सातारा दि. १९:  पाटण तालुक्यातील सळवे, ढेबेवाडी, पाटण मार्गावर जानुगडेवाडी गावच्या हद्दीत आज सकाळी पाटण आगार बसचा अपघात झाला. या अपघातात 20 जण जखमी...

मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाचे अनेक नवे उपक्रम यशस्वी

0
मुंबई, दि. १९ : भारत निवडणूक आयोगाने (ECI) आज घेतलेल्या पाच विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण नवकल्पनांची यशस्वी अंमलबजावणी केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश...

नोंदणी विधेयक मसुद्यात सुधारणेसाठी नोंदणी अधिकाऱ्यांची कार्यशाळा

0
मुंबई, दि. १९ : नोंदणी विधेयक मसुदा २०२५ वर सुधारणा सुचविण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाच्यावतीने पुणे येथे नुकतीच एकदिवसीय कार्यशाळा पार पडली. राज्यातील उपविभागीय...

निधी चौधरी यांच्या चित्रातून पर्यावरण संवर्धनाचे वास्तव उभे – मंत्री मंगल प्रभात लोढा

0
मुंबई, दि. १९ : पर्यावरण संरक्षण या वैश्विक प्रश्नावर विविध प्रकारे जनजागृती होते. नॅशनल गॅलरी ऑफ आर्टच्या संचालक निधी चौधरी यांच्या बोलक्या चित्रातून पर्यावरण...