रविवार, जून 8, 2025
Home Blog Page 143

मंत्रिमंडळ निर्णय

नागपूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर प्राधिकरणांना त्यांच्या हद्दीतील शासकीय जमिनी मिळणार

राज्यातील नागपूर, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या हद्दीतील शासकीय जमिनी संबंधित प्राधिकरणांच्या नावावर वर्ग करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

या निर्णयानुसार, महानगर प्रदेशातील सर्व भारमुक्त शासकीय जमिनी राज्य शासनाच्या अटी व शर्तींनुसार प्राधिकरणांना हस्तांतरित करण्यात येणार आहेत. संबंधित प्राधिकरण या जमिनींचा उपयोग मंजूर प्रादेशिक किंवा विकास योजनेनुसार पायाभूत सुविधांसाठी निधी उभारण्याच्या स्रोत म्हणून करू शकतील.

प्राधिकरणांकडे वर्ग होणाऱ्या जमिनींची विल्हेवाट विहित नियमावलीनुसार करण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, राज्य शासनाच्या मान्यतेने प्रत्येक प्राधिकरणानाला स्वतंत्र जमीन विल्हेवाट नियमावली तत्काळ तयार करावी लागणार आहे.

या जमिनींच्या वापराबाबत महसूल व वन विभागाच्या स्तरावर स्वतंत्र अभिलेख ठेवले जातील आणि त्याचे डिजिटायझेशन केले जाणार आहे.

गायरान, गुरचरण, देवस्थान किंवा वन जमिनींचा समावेश असल्यास, त्या जमिनींवर सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसारच कार्यवाही करावी लागेल, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे.

तसेच, जर हस्तांतरित होणाऱ्या जमिनी स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषदेच्या ताब्यात असतील, तर त्यांचा विकास करण्याआधी संबंधित संस्थेची परवानगी किंवा ठराव घेणे प्राधिकरणांना अनिवार्य राहील.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे महानगर प्रदेश विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणीसाठी निधी उभारण्यास प्राधिकरणांना मोठा आधार मिळणार आहे, यातून विकास कामांना वेग येणार आहे.

०००

विविध योजनांमधील घरकुलांच्या लाभार्थ्यांसाठी ५ ब्रासपर्यंत मोफत वाळू; वाळू-रेतीबाबचे धोरण जाहीर, डेपो पद्धती ऐवजी लिलाव पद्धतीने विक्री

विविध योजनांमधील राज्यातील घरकूल लाभार्थ्यांसाठी ५ ब्रास पर्यंत मोफत वाळू उपलब्ध करुन देण्याच्या निर्णयासह आज राज्याच्या वाळू-रेती निर्गती धोरणास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या पुढे नदी, खाडीपात्रातील वाळू, रेतीचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन विक्री (डेपो पद्धती) ऐवजी लिलाव पद्धतीद्वारे करण्यात येणार आहे.

नैसर्गिक वाळूचे पर्यावरणीय महत्त्व, नैसर्गिक वाळूचा तुडवडा विचारात घेता कृत्रिम वाळूस प्रोत्साहन देण्यात येईल. यासाठी सुरवातीस विविध शासकीय/निमशासकीय बांधकामामध्ये २० टक्के कृत्रिम वाळू वापरणे बंधनकारक करण्यात येईल. या बांधकामामध्ये पुढील ३ वर्षात कृत्रिम वाळू बंधनकारक करण्यात येणार आहे.

या धोरणानुसार आता पर्यावरण विभागाच्या परवानगीनंतर नदीपात्रातील वाळू गटांसाठी जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व वाळू गटांचा एकत्रितरित्या एकच ई-लिलाव प्रसिद्ध करण्यात येईल. या लिलावाचा कालावधी २ वर्षासाठी राहणार. तसेच खाडीपात्रातील वाळू गटांसाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने निश्चित केलेल्या प्रत्येक वाळू गटासाठी ई-लिलाव पद्धतीने कार्यवाही करण्यात येईल. या लिलावाचा कालावधी ३ वर्ष इतका राहील.

लिलावाद्वारे उत्खनन करण्यात येणाऱ्या प्रत्येक वाळू गटामधील १० टक्के वाळू विविध घरकूल लाभार्थ्यांसाठी ५ ब्रास पर्यंत मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांच्या दि.२८ मार्च, २०२० च्या अधिसूचनेत परिशिष्ट-९ मध्ये अनुक्रमांक ४ नुसार निश्चित केले गेलेले वाळूगट तसेच, ज्या वाळू गटांना पर्यावरण विभागाची परवानगी मिळालेली नाही व जे वाळू गट लिलावामध्ये गेलेले नाहीत अशा नदी, नाले, ओढे इत्यादी वाळू गटामधील वाळू शासनाच्या गृहनिर्माण योजनेच्या लाभार्थ्यांना (घरकूल लाभार्थी), गावकऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक व सामुहिक कामासाठी तसेच, शेतकऱ्यांना त्याच्या स्वतःच्या विहिरीसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

हातपाटी-डुबी या पारंपरिकपद्धतीने वाळू उत्खननासाठी वाळू गट राखीव ठेवण्यात येणार असून, ते विनानिविदा परवाना पद्धतीनुसार वाटप केले जाणार आहेत.

पूर परिस्थिती अथवा इतर नैसर्गिक कारणामुळे शेत जमिनीमध्ये वाळू जमा झाल्यास, अशी शेतजमीन पुन्हा लागवड योग्य करण्यासाठी वाळूची निर्गती करण्यात येणार आहे.

केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या खाणीमधील ओव्हरबर्डमधून निघणाऱ्या वाळू/रेती (Wash Sand) साठी प्रती ब्रास २००/- रुपये व इतर गौण खनिजासाठी प्रती ब्रास रुपये २५/- प्रमाणे स्वामित्वधनाची रक्कम आकारण्यात येणार आहे. तसेच परराज्यातून येणाऱ्या वाळूचे सनियंत्रण करण्यात येणार आहे. ट्रॅक्टरद्वारे अवैध गौण खनिज वाहतूक केल्यास १ लाख रुपयांची दंडाची रक्कम कायम ठेवण्यात आली आहे.

राज्यात १९ एप्रिल २०२३ व १६ फेब्रुवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार वाळू डेपो धोरण राबविण्यात येत होते. या धोरणांतर्गत शासनामार्फत वाळूचे उत्खनन, वाहतूक डेपो निर्मिती व विक्री करण्यात येत होती. या धोरणाचा विभागीय आयुक्त नाशिक यांच्या समितीने अभ्यास करून अहवाल तयार केला होता. या अहवालावरून राज्याचे वाळू-रेती निर्गती धोरण-२०२५ चे प्रारुप तयार करण्यात आले. त्यावर हरकती, सूचना मागविण्यात आल्या. अशा १९१ हरकती व सूचना विचारात घेऊन सुधारित वाळू धोरण-२०२५ तयार करुन ते आज मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आले. या धोरणास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

०००

म्हाडाच्या वांद्रे रिक्लेमेशन, आदर्श नगर येथील इमारतींच्या एकत्रित पुनर्विकासासाठी मान्यता

वांद्रे रिक्लेमेशन आणि वरळी येथील आदर्श नगर या दोन म्हाडा अंतर्गत असलेल्या इमारतींचा एकत्रित पुनर्विकास करण्यासाठी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

वांद्रे रिक्लेमेशन आणि आदर्श नगर वरळी येथील म्हाडा अंतर्गत असलेल्या काही सहकारी गृहनिर्माण संस्थांना पुनर्विकास करण्यासाठी परवानगी दिली आहे. असे परवानगी देण्यात आलेले भूखंड वगळून उर्वरित एकल इमारतींच्या पुनर्विकासाकरिता मंजुरी न देता म्हाडा मार्फत बांधकाम आणि विकसन संस्था ( कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी) नियुक्ती करण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

या एकत्रित पुनर्विकासासाठी चार चटई क्षेत्र निर्देशांक शासनाच्या पूर्व मान्यतेने मंजूर करण्यात येईल. चारपैकी एक चटई क्षेत्र निर्देशांक गृहसाठ्याच्या स्वरुपात मंजूर येईल. त्यामुळे म्हाडास जास्तीत जास्त गृहसाठा देण्याची तयारी दाखवणाऱ्या आणि निविदा प्रक्रियेतील आर्थिक आणि भौतिक अटींची पूर्तता करणाऱ्या निविदाकाराची पुनर्विकास करण्यासाठी म्हाडाकडून नियुक्ती करण्यात यावी. निविदा प्रक्रिया राबविताना सर्व शासन निर्णयांचे पालन करणे, आवश्यक राहणार आहे. वांद्रे रिक्लेमेशन परिसरातील जागा १,९७,४६६ चौरस मीटर तर आदर्श नगरची (वरळी) ६८,०३४ चौरस मीटर क्षेत्र आहे. म्हाडाकडून नियुक्ती करण्यात आलेल्या विकासकास दोन्ही परिसरातील एकूण सभासदांच्या ५१ टक्के सभादांची संमती पत्रे म्हाडास सादर करणे बंधनकारक राहणार आहे.

सदर प्रकल्पांमधील मूळ गाळेधारक आणि रहिवाश्यांचे पुनर्वसन करणे, त्यांच्या तात्पुरत्या निवासाची सोय करणे, पर्यायी जागेचे भाडे देणे, कॉर्पस फंड, सर्व पायाभूत सुविधांचा विकास करण्याची जबाबदारी बांधकाम आणि विकसन संस्थेची राहणार आहे.

०००

सिंधी निर्वासितांच्या जमिनींचे पट्टे नियमित करण्यासाठी विशेष अभय योजना

राज्यातील सिंधी समाजातील निर्वासितांच्या जमिनींचे पट्टे ‘विशेष अभय योजना-२०२५’ अंतर्गत नियमित करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयामुळे सिंधी निर्वासित बांधवांच्या राज्यातील ३० ठिकाणच्या वसाहतींमधील जमिनींचे पट्टे नियमित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही अभय योजना वर्षभरासाठी लागू राहणार आहे.

भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी पश्चिम पाकिस्तानातून आलेल्या निर्वासितांसाठी महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणच्या मालमत्ता भरपाई संकोष मालमत्ता म्हणून घोषीत करण्यात आल्या आहेत. अशा जमिनी नियमित करण्याबाबत विशेष मोहिम राबविण्याबाबत शासनाच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यामध्ये समावेश केला होता. त्याअनुषंगाने ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर वगळून २४ जानेवारी १९७३च्या राजपत्रात घोषित ३० अधिसूचित क्षेत्रात ही विशेष अभय योजना राबविण्यात येणार आहे. यात सिंधी निर्वासितांच्या निवासी व वाणिज्यिक जमिनींचे पट्टे नियमित करण्यात येणार आहेत. या जमिनी नियमित (मालकी हक्काचे पट्टे नियमानुकुल/फ्री होल्ड (भोगवटादार वर्ग-१/सत्ता प्रकार-अ) करण्याकरिता १५०० चौ. फुटापर्यंत सवलतीचे दर लागू करण्यात आले आहेत. जमीन १५०० चौ. फुटांपर्यंत निवासी वापरात असल्यास ५ टक्के अधिमूल्य तर वणिज्यिक प्रयोजनासाठी वापरात असल्यास १० टक्के अधिमूल्य आकारले जाणार आहे. तर १५०० चौ. फुटांपेक्षा जास्त क्षेत्रफळासाठी या दराच्या दुप्पट अधिमूल्य आकारले जाणार आहे. या योजनेस आवश्यकता वाटल्यास पुढे एक वर्षापर्यंत मुदतवाढ देण्यात येणार आहे.

०००

शासकीय आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी महाविद्यालयांतील अध्यापकांच्या मानधनात वाढ

राज्यातील शासकीय आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी तसेच योग व निसर्गोपचार महाविद्यालयांतील कंत्राटी अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

शासकीय महाविद्यालयांतील सेवानिवृत्ती, राजीनामा, पदोन्नती व इतर कारणांमुळे पदे सातत्याने रिक्त होत असतात. या रिक्त पदांवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नियमित भरती होईपर्यंत २०२२ मध्ये कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार ठोक मानधन तत्वावर अध्यापकांची नियुक्ती करण्यात येत आहे.

काही विषयांसाठी पात्र उमेदवार सहज उपलब्ध होत नसल्याने ठोक मानधनात वाढ करण्याची आवश्यकता जाणवत होती. या पार्श्वभूमीवर ठोक मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवीन मानधन पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे – प्राध्यापक -१ लाख ५० हजार रुपये, सहयोगी प्राध्यापक १ लाख २० हजार रुपये, सहाय्यक प्राध्यापक – १ लाख रुपये मानधन देण्यास मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे रिक्त पदे भरताना अधिक पात्र उमेदवार आकर्षित होण्यास मदत होणार असून, शैक्षणिक गुणवत्ताही कायम राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

०००

खासगी अनुदानित आयुर्वेद, युनानी संस्थांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना

राज्यातील खासगी अनुदानित आयुर्वेद व युनानी संस्थांमधील गट-ब, क व ड संवर्गातील शासन मंजूर पदावरील शिक्षकेतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एक व दोन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा मुदतीनुसार निश्चित वेतनवाढीचा लाभ मिळणार असून, त्यांच्या आर्थिक व सेवाविषयक स्थैर्यात वाढ होणार आहे. वेतनामध्ये येणारी कुंठितता टळणार आहे.

वित्त विभागाच्या दि. ०१ एप्रिल २०१०, ०५ जुलै २०१० व ०६ सप्टेंबर २०१४ च्या शासन निर्णयांमध्ये नमूद केलेल्या सर्व अटी व तरतुदी पूर्वलक्षी प्रभावाने या योजनेत लागू केल्या जातील.

ही योजना आयुष संचालनालय, मुंबईच्या अधिपत्याखालील संबंधित खासगी अनुदानित संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या शासन मंजूर पदावरील पात्र कर्मचाऱ्यांसाठी लागू असेल.

या योजनेचा लाभ देताना संबंधित कर्मचाऱ्यांची सेवा भरती ही संस्थेमार्फत प्रचलित सेवाप्रवेश नियमांनुसार करण्यात आलेली आहे की नाही, तसेच त्यांची पात्रता तपासण्याची जबाबदारी आयुष संचालनालयाची राहणार आहे.

या निर्णयामुळे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागणीला दिलासा मिळाला आहे.

०००

ग्रामपंचायत, पंचात समिती, जिल्हा परिषद सदस्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ

राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. याबाबत अध्यादेश काढण्यास बैठकीत मंजूरी देण्यात आली.

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या परंतु, जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने सदस्यत्व रद्द झालेल्या सदस्यांना प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी अनेक लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली होती.

त्यानुसार ग्राम पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या १ ऑगस्ट २०२२ रोजी किंवा त्यानंतर अध्यादेश जारी होईपर्यंत झालेल्या सर्वसाधारण निवडणुका अथवा पोट निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आणि त्या अनुषंगिक बाबींसाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आली.

यासाठी महाराष्ट्र जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास तात्पुरती मुदतवाढ अध्यादेश, २०२५ काढण्यास मान्यता देण्यात आली.

०००

झोपडपट्टी मुक्त महाराष्ट्र योजनेला गती देण्यासाठी अधिनियमात सुधारणा

झोपडपट्टी घोषित झाल्यानंतर पुनर्वसनाचा प्रस्ताव ६० दिवसांत द्यावा लागणार

राज्यातील झोपडपट्टी पुनर्वसनाला गती देऊन महाराष्ट्र झोपडमुक्ती करण्यासाठी महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र सुधारणा व पुनर्वसन कायद्यात सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

या निर्णयानुसार महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सुधारणा निर्मुलन व पुनर्वसन) अधिनियम-१९७१ मधील तीन तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. झोपडपट्टीची जमीन झोपडपट्टी क्षेत्र घोषित केल्यानंतर, जमीन मालक, विकासक किंवा सहकारी संस्थेला या जमिनीवरील पुनर्वसनाचा प्रस्ताव १२० दिवसात सादर करावा द्यावा लागत असे. ही मुदत आता ६० दिवसांची करण्यात येणार आहे. या ६० दिवसांत संबंधितांनी प्रस्ताव न दिल्यास झोपडपट्टीचे क्षेत्र पुनर्विकासासाठी इतर प्राधिकऱणास सोपवू शकणार आहेत, याबाबतची दुरूस्ती कलम १५(१) मध्ये केली जाणार आहे.

मुंबई महानगर प्रदेशातील झोपडपट्टी पूनर्वसन योजना शासकीय, निमशासकीय महामंडळे, प्राधिकरणे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत संयुक्त भागीदारी तत्वावर राबवण्यात येत असल्यास, त्यांना आता योजनेला आशयपत्र दिल्यानंतर ३० दिवसांच्या आत ही जमीन ३० वर्षांच्या भाडेपट्ट्याने उपलब्ध करून दिली जाईल. जेणेकरून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी बँक किंवा वित्तीय सस्थांकडून कर्ज, अर्थसहाय्य मिळवणे शक्य होणार आहे. याबाबतची दुरूस्ती कलम १५ – अ मध्ये केली जाणार आहे.

झोपडपट्टी पुनर्वसन योजना व प्रकल्पांमध्ये स्वेच्छेने सहभागी न होणाऱ्या झोपडपट्टीवासियांबाबत करावयाची कार्यपद्धती आता कलम ३३-अ मध्ये विस्ताराने समाविष्ट करण्यात येत आहे.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमध्ये झोपडीधारकांना संक्रमण शिबीराऐवजी भाडे देण्यात येते. पण झोपडपट्टी धारकांना विकासकांकडून हे भाडे वेळेत दिले जात नाही. त्याची थकबाकी वाढत जाते. संक्रमण शिबीराचे भाडे किंवा इतर देणे विकासकाकडून वसूल करता यावे यासाठीची कायदेशीर तरतूद करण्यासाठी कायद्यात ३३-बी नव्याने समाविष्ट करण्यात येणार आहे. यात विकासकांकडून भाडे थकबाकीची वसुली महसुली कायद्यानुसार केली जाणार आहे.

०००

नागपूर येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेची स्थापना

राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था नागपूर येथे स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थे (NIDM) च्या धर्तीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था (State Institute of Disaster Management) स्थापन करण्यात येणार आहे. राज्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींना सक्षमपणे प्रतिसाद देण्यासाठी आपत्ती पूर्व तयारी, सौम्यीकरण, आपत्ती प्रवणता, धोका, आपत्तीनंतर मदत व पुनर्वसन, पुनर्बांधणी, तसेच प्रतिसाद, प्रशिक्षण ह्या बाबींचे व्यवस्थापन व नियोजन राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेमार्फत (एसआयडीएममार्फत) होणार आहे.

संस्थेसाठी नागपूर येथील महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण (मिहान) येथे दहा एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संस्थेच्या इमारतीच्या बांधकामासाठी १८७ कोटी ७३ लाख रुपयांच्या निधीच्या तरतूदीस मंजूरी देण्यात आली. तसेच संस्थेसाठी कामाच्या स्वरुपानुसार आवश्यक असणारी संवर्गनिहाय नियमित व कंत्राटी/पदे तसेच तांत्रिक सल्लागार इत्यादी मनुष्यबळ घेण्यास व त्यासाठीच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. राज्याच्या मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील राज्य कार्यकारी समिती ही या संस्थेसाठी नियामक समिती म्हणून काम पाहणार आहे.

०००

ठाणे शहरात ३ बेकायदेशीर हुक्का पार्लरवर कारवाई

मुंबई, दि. ०८: ठाणे पोलीस दलाकडून हुक्का पार्लरच्या आड चालणाऱ्या बेकायदेशीर धंद्यांवर सातत्यपूर्ण कारवाई करण्यात येत आहे. ठाणे पोलीस दल गोपनीय छापे, गुन्हे दाखल करणे, परवाने तपासणे अशा अनेक स्तरांवर कारवाई करीत आहे. ठाणे शहरामध्ये जाने २०२५ ते अद्यापपर्यंत एकूण ३ बेकायदेशीर हुक्का पार्लरवर छापे टाकून संबधितांवर कोटपा कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

ठाणे शहरामध्ये तरूणांमध्ये प्रसिद्ध असलेल्या मॉल्स, कॅफे आणि हँग आऊट्स येथे विशेष गस्त व गुप्त तपासणी सुरू आहे. अशा ठिकाणी होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे निर्देश स्थानिक पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत. ठाणे पोलीस दलाने अशा बेकायदेशीर प्रवृत्तींवर ‘ झिरो टोलरन्स’ धोरण अवलंबिले आहे. पुढील काळातही अशा हुक्का पार्लरच्या आड सुरू असणाऱ्या बेकायदेशीर धंद्यांवर कारवाई करण्याची मोहिम अधिक गतीने राबविण्यात येत आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांनी दिली आहे.

०००

नीलेश तायडे/विसंअ/

जलजीवन व स्वच्छ भारत मिशनचे काम कालबद्धरित्या पूर्ण करा – मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. ०८ : नागरिकांना पाणी पुरवठा योग्य प्रमाणात होण्यासाठी जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशनचे काम कालबद्धरित्या गतीने पूर्ण करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच १०० दिवस कृती आराखडाबाबतही आढावा घेवून कामांमध्ये प्रगती करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

मंत्रालयात जलजीवन मिशन योजना, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-२ आणि विभागाच्या १०० दिवस कृती आराखड्याबाबत आयोजित आढावा बैठकीत मंत्री पाटील बोलत होते.

यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशनचे अभियान संचालक ई.रवींद्रन व विभागाचे मुख्य अभियंता, सह सचिव बी.जी.पवार, जलजीवनच्या अतिरिक्त अभियान संचालक सुषमा सातपुते, स्वच्छता मिशनचे अतिरिक्त अभियान संचालक शेखर रौंदळ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अंगणवाड्यांना १५ एप्रिलपर्यंत नळजोडणी करा

मंत्री पाटील म्हणाले की, पाणी पुरवठा व स्वच्छ भारत अभियानाच्या सर्व योजना पूर्ण होण्यासाठी विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे. राज्यात ३१ मार्चपर्यंत एक कोटी ३१ लाख ३५ हजार ९६६ कुटुंबांना नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला आहे. राज्यातील ९९ टक्के शाळांमध्येही नळजोडणी करण्यात आली असून अंगणवाडीमध्ये ९८.५९ टक्के नळजोडणी झाली आहे. उर्वरित नळजोडण्या १५ एप्रिलपर्यंत पूर्ण कराव्यात.

जलजीवन मिशनचे विशेष उपक्रम

इलेक्ट्रो क्लोरीनेशन युनिट, सेन्सर आधारित पाणी पुरवठा योजनांचे संनियंत्रण करण्यासाठी कामे प्रगतीपथावर आहेत. यासाठीचे सॉफ्टवेअरही तयार करण्यात आले असून यामध्ये मोबाईल ॲपद्वारे माहिती अद्ययावत करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

स्वच्छ भारत मिशनमध्ये ३११७६ गावे हागणदारीमुक्त म्हणून घोषित केली असून राज्याचा २० वा क्रमांक आलेला आहे. यामध्ये उर्वरित गावांची पडताळणी पूर्ण झाली असून घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन प्रकल्प आणि प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत. ही कामे दर्जेदार होण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावेत. घनकचरा व्यवस्थापनात कामे कमी असणाऱ्या बीड, बुलढाणा, यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यात लक्ष केंद्रीत करावे. सांडपाणी व्यवस्थापनातही कामे बाकी असणाऱ्या जिल्ह्याकडे लक्ष देवून कामे करून घ्यावीत. घनकचरा प्रकल्पात चांगले काम करणाऱ्या सकारात्मक यशकथाही प्रसिद्ध कराव्यात, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

गोबरधन प्रकल्पांची कामे ९९ टक्के झाली असली तरी कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. वैयक्तिक घरगुती शौचालयांची ९ टक्के कामे अपूर्ण असून यासाठी प्रयत्न करा, सामुदायिक शौचालयांच्या जागा, पाणी, सोयीसुविधांच्या निधी वाढीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

०००

पशुधन विकास अधिकाऱ्यांची २७९५ पदे भरणार – मंत्री पंकजा मुंडे

Virendra Dhuri DGIPR,Mantralaya

मुंबई, दि. ०८: पशुसंवर्धन विभागाचे काम पूर्ण क्षमतेने करण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले असून विभागातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्याअंतर्गत पशुसंवर्धन सेवा गट अ मधील पशुधन विकास अधिकारी संवर्गातील २७९५ पदे भरण्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणी पत्र सादर करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

ग्रामीण भागात पशुसंवर्धन विभागाचे काम गतीने व पूर्ण क्षमतेने होण्यासाठी पशुसंवर्धन विभागातील पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय आयुक्तालय तसेच त्यांच्या अधिनस्त क्षेत्रिय कार्यालयातील पशुधन विकास अधिकारी पद महत्त्वाचे आहे. सुधारित आकृतीबंधानुसार महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ अंतर्गत पशुधन विकास अधिकारी संवर्गात एकूण ४६८४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सद्यःस्थितीत १८८६ पदे भरलेली असून २७९८ पदे रिक्त आहेत. तसेच ३१ डिसेंबर २०२५ अखेर ८ पदे सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणार आहेत, अशी एकूण २८०६ पदे रिक्त होणार आहेत. ही पदे रिक्त असल्याने कामकाजावर परिणाम होत होता. या गोष्टीची दखल घेत पशुसंवर्धन मंत्री मुंडे यांनी पाठपुरावा करून पशुधन विकास अधिकारी संवर्गातील पदे भरण्याचा निर्णय घेतला. यापैकी सरळसेवा जाहिरात क्र. १२/२०२२ मधील प्रतिक्षायादीतील ११ पदे उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. उर्वरित २७९५ पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणीपत्र सादर करण्यात आले आहे.

पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश देण्यात आले असून लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबविण्यात यावी, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला कळविण्यात आले आहे. ही रिक्त पदे भरल्यानंतर विभागाचे कामकाज अधिक वेगाने होऊन ग्रामीण भागातील पशुपालक तसेच शेतकरी बांधवांना चांगल्या दर्जाची सेवा उपलब्ध होईल, असा विश्वास मंत्री मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.

०००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

 

जनसमर्थन पत्रकार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

18व्या आणि 19व्या शतकात इंग्लंड, फ्रान्स, इटली, जर्मनी आणि अन्य पाश्चिमात्य राष्ट्र आणि भारतामध्ये ज्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय चळवळी किंवा परिवर्तन झालीत, त्यात वृत्तपत्राचे योगदान मोलाचे आहे. जागतिक, राष्ट्रीय आणि स्थानिक घडामोडी समाजापर्यंत येणारे वृत्तपत्र हे एक प्रमुख साधन होते आणि आहे. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी “संपादकांनी घेतलेली स्वयंदीक्षा म्हणजे पत्रकारिता होय” असे म्हटले आहे. वृत्तपत्रे किंवा पत्रकारिता म्हणजे वर्तमानाची व्याख्या करणारी आणि भविष्य घडविणारी एक घटना आहे.

वृत्तपत्रामुळे समाजातील निर्भयता, स्पष्टपणा आणि स्वातंत्र्याचा उदय होतो. मानवी समाज वृत्तपत्रातील घटना, लेख-अग्रलेख वाचून प्रभावित होतो. अर्थातच त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, त्याप्रमाणे संपादकाला स्वयंदीक्षा घ्यावी लागते. कारण संपादकाच्या बौद्धिक, सामाजिक, जागृती आणि जाणीवेवरच हे सगळं अवलंबून असते. वृत्तपत्रांच्या कार्यानुसार आणि पत्रकाराच्या ध्येयानुसार पत्रकारितेला विविध भागात विभागीत करण्यात आले आहे. त्यात ‘ॲडव्होकेसी जर्नालिझम’ म्हणजे जनसमर्थन पत्रकारिता ही महत्त्वाची पत्रकारिता आहे.

‘ॲडव्होकेसी जर्नालिझम’ मध्ये पत्रकार एखाद्या विषयावर ठाम भूमिका घेतात आणि त्यांच्या लिखाणाने वाचक किंवा प्रेक्षकांना त्यांचा दृष्टिकोन स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करतात. सामाजिक प्रश्न वा समस्या सोडवणुकीसाठी न्याय मिळवून देईपर्यंत सातत्यपूर्ण केलेली पत्रकारिता म्हणजे ‘ॲडव्होकेसी जर्नालिझम’ जनसमर्थन पत्रकारिता होय. या दृष्टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेचा विचार करता, भारताला राष्ट्र म्हणून उभे राहायचं असेल, जगायचे असेल, तर सर्वप्रथम भारतातल्या प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्याची संधी प्राप्त करून द्यावी लागेल. हा ऐतिहासिक महामंत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेने जगाला दिलेला आहे. माणूसपणाच्या भोवती असलेली विषबंदी, तिचा त्याग करण्याचा संकल्प प्रत्येक भारतीयांनी करून राष्ट्रभक्ती, राष्ट्रशक्ती, राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्राच्या ऐक्याचा संकल्प करावा, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूणच पत्रकारितेचे उद्दिष्ट होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक परिवर्तनाचा दृष्टिकोन स्वीकारून तत्कालीन स्पृश्य-अस्पृश्य समाज, राजकीय नेते, त्यांचे राजकीय विचार प्रवाह आणि ब्रिटिश सरकार यांच्या परस्पर वैचारिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, द्वन्दाची अधिक सटीक पद्धतीने मांडणी करून समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय मिळवून दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वलिखित अग्रलेखातील विविध पैलू हे समकालीन इतर पत्रकारांच्या पेक्षा भिन्न आहेत. त्यांची दृष्टी, विषय मांडणी, दूरदृष्टीची परिणामकारकता भेदक आणि मार्मिक आहे. त्यांचे लेखन बहुआयामी बहुविषयी स्पर्शित आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जनसमर्थन पत्रकारितेने माणूस घडविण्याच्या आणि एक नवीन भारत निर्मितीच्या महान क्रांतिकारी कार्यात अमूल्य योगदान दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेचा विचार करता 1920 ला त्यांनी ‘मूकनायक’ द्वारे मुक्यांना बोलके केले, तर ‘बहिष्कृत भारत’ ने बहिष्कृत समाजाला प्रबोधित करून अन्यायाविरुद्ध संघर्षासाठी तयार केले. याच बहिष्कृत भारतातील जनतेला त्यांच्या ‘जनता’ ने अधिकारांची आणि न्याय हक्काची जाणीव करून दिली. या देशातील मुक असलेल्या माणसाची प्रगती अशा पद्धतीने करत, माणसाला प्रबुद्ध नागरिक आणि देशाला प्रबुद्ध भारत बनविण्याचे महान कार्य ‘प्रबुद्ध भारता’तून त्यांनी केले आहे. त्यामुळेच एक नवा इतिहास घडला. असे कार्य त्यांच्या जनसमर्थन पत्रकारितेमुळे घडले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेचे उद्दिष्ट समाज परिवर्तन, समाज सुधारणा करणे, हे असल्यामुळे त्यांनी लोकप्रबोधन आणि लोक शिक्षण, सामाजिक जाणिवेच्या अनुषंगाने आपल्या अग्रलेखांचे लेखन केले आहे. त्या विषयाच्या मांडणीमध्ये त्यांचे सामाजिक परिवर्तन हेच ध्येय आहे. एकूण समग्र परिवर्तन आणि मानवी कल्याणाचे ध्येय हस्तगत करण्यासाठीच त्यांनी अग्रलेखाचे लेखन केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्राला एकसंघ ठेवण्यासाठी महान राज्यघटना देऊन, एक स्वयंपूर्ण लोकशाही लोकराज्य म्हणून निर्माण केले आहे.  त्यामुळे खऱ्या अर्थाने ते जनसंपर्क पत्रकारितेचे जनक ठरतात.

प्रा. संजय घरडे

9130377511

sanjaygharde@gmail.com

संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती

000000

रायगड जिल्ह्यातील विकासकामांना गती द्या – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. ०८: रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील जामगाव येथे उभारण्यात येत असलेल्या डॉ. सी. डी. देशमुख जैवविविधता, वने व उद्यान प्रकल्पात राखीव वने तसेच निसर्ग पर्यटनस्थळांच्या विकासाचा ८० कोटींचा सुधारित प्रस्ताव तात्काळ सादर करावा. वित्त विभाग प्रस्तावाची पडताळणी करुन त्वरित मान्यता देईल तसेच आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध केला जाईल. उपलब्ध ३० कोटींच्या निधीतून सध्या सुरु असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगड जिल्ह्यातील विविध विकासकामांना गती देण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

रायगड जिल्ह्यातील विकासकामांबाबत बैठकीत चर्चा

रायगड जिल्ह्याच्या  रोहा तालुक्यातील जामगाव येथील डॉ. सी. डी. देशमुख जैवविविधता, वने व उद्यान प्रकल्पातील विकासकामे, रोहा तालुक्यातील मौजे तिसे येथील केदारजननी माता देवस्थानाच्या ठिकाणी रोपवेची उभारणी करणे, रोहा तालुक्यातील मौजे संभे या दरडप्रवण गावाचे सुरक्षिततेच्या कारणास्तव पुनर्वसन करणे, तळा तालुक्यात गिरणे येथे डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठांतर्गत खारभूमी संशोधन केंद्राची उभारणी, श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे केंद्र शासन पुरस्कृत स्वदेश दर्शन योजनेतून मत्स्यालय, पर्यटक निवारा केंद्राची निर्मिती, मुरुड तालुक्यातील पद्मदुर्ग किल्याचा समावेश गडकोट किल्लेसंवर्धन योजनेत करण्यासह मुरुड किल्ला परिसर आणि राजापूरी ग्रामपंचायत क्षेत्रातील अडचणी सोडवण्यासंदर्भात आज एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, खासदार सुनील तटकरे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव डॉ. सोनीया सेठी,  वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरव विजय, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, कोकणचे विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे आदींसह शासनाच्या संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

डॉ. सी. डी. देशमुख जैवविविधता, वने व उद्यानाचा विकास

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत संबंधित विषयांचा सखोल आढावा घेतला. कोकणचे सुपुत्र, थोर अर्थतज्ज्ञ डॉ. चिंतामणराव देशमुख यांच्या कार्याच्या स्मतीप्रित्यर्थ जामगाव येथे उभारण्यात येत असलेल्या जैवविविधता आणि वनउद्यानासाठी निधीची उणिव भासू देणार नाही. सध्या सुरु असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत. निसर्गपर्यटनाचा प्रस्ताव तात्काळ शासनाकडे पाठवावा. प्रस्तावाची पडताळणी करुन तातडीने मान्यता देण्यात येईल. आवश्यतेनुसार टप्प्याटप्याने निधी उपलब्ध केला जाईल. यासंदर्भातील प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

तिसे येथील केदारजननी माता देवस्थान परिसरात रोपवे

रोहा तालुक्यातील मौजे तिसे येथील केदारजननी माता देवस्थानाच्या ठिकाणी रोपवे उभारणीसंदर्भातही बैठकीत चर्चा झाली. केंद्र शासनाच्या पर्वतमाला योजनेंतर्गत राज्यात कळसूबाई, हरिश्चंद्रगड, माथेरान, सिंहगड, शिवनेरी, राजगड, भीमाशंकर, लेण्याद्री, जेजुरी, निमगाव खंडोबा आदी 45 ठिकाणी रोपवे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. या यादीत तिसे येथील केदारजननी माता देवस्थानचा समावेश करण्यासंबंधीचा प्रस्ताव सादर करावा.  तो शासनाच्या मंजूरीसह केंद्र शासनाकडे पाठविण्यात येईल. हा प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी वनविभागाकडून आवश्यक परवानगी मिळविण्याची कार्यवाही तातडीने सुरु करावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.

संभे गावाचे सुरक्षित स्थलांतर व पुनर्वसनाचे निर्देश

रोहा तालुक्यातील मौजे संभे गावाला भूस्खलन आणि दरड कोसळण्याचा असलेला धोका लक्षात घेऊन सुरक्षिततेसाठी सदर गावाचे स्थलांतर आणि पुनर्वसनाची कार्यवाही युद्धपातळीवर करावी. यासाठी आवश्यक प्रशासकीय बाबी तातडीने पूर्ण करुन घ्यावात. राज्य शासनासाठी नागरिकांचा जीव वाचवणे सर्वात महत्वाचे असल्याने धोकादायक गावांच्या स्थलांतर, पूनर्वसनासंदर्भात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिला.

तळा तालुक्यातील गिरणे येथे खारभूमी संशोधन केंद्र

तळा तालुक्यात गिरणे येथे डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठांतर्गत खारभूमी संशोधन केंद्राची उभारणीबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. विद्यापीठाची जमीन अधिग्रहीत करताना सिडकोकडून देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात येईल. विद्यापीठाला शेती, शेतीसंशोधन, शेती विस्तार, खारभूमी संशोधन केंद्रासाठी आवश्यक जमीन आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. त्यासाठी लागणारा निधी सिडको आणि राज्य शासन देईल. यासंबंधीचा वस्तूनिष्ठ प्रस्ताव विद्यापीठाने सादर करावा, त्यावर राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल, असेही बैठकीत ठरले.

पद्मदुर्गचा समावेश गडकोट किल्ले संवर्धन योजनेत करणार

मुरुड तालुक्यातील पद्मदुर्ग किल्याचं ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन या किल्ल्याचा समावेश गडकोट किल्लेसंवर्धन योजनेत करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला पद्मदूर्ग किल्ला बघण्याची अनेक इतिहासप्रेमी व पर्यटकांची इच्छा असते, जेट्टीचा अभाव आणि पुरेशा सोयींअभावी त्यांना पद्मदूर्ग किल्ल्यावर जाता येत नाही. त्यासाठी पद्मदूर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी पर्यटनजेट्टी उभारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे विचाराधीन आहे. त्यास केंद्र शासनाच्या पूरातत्व विभागाकडून मंजूरी मिळवण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. मुरुड किल्ला परिसर आणि राजापूरी ग्रामपंचायत क्षेत्रातील अडचणी सोडवण्यासंदर्भात  तसेच श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे केंद्र शासन पुरस्कृत स्वदेश दर्शन योजनेतून मत्स्यालय, पर्यटक निवारा केंद्र उभारण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित विभागांचे अधिकारी तसेच रायगडचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना दिले आहेत.

०००

नव तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आपत्कालीन कार्य केंद्र अधिक सक्षम-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ०८: राज्य आपत्कालीन कार्य केंद्रात आधुनिक तंत्रज्ञान, वेगवान संवादव्यवस्था आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वापरामुळे आपत्ती व्यवस्थापनाला तंत्रज्ञानाचे बळ मिळाले आहे. या नव्या अद्ययावत आपत्कालीन कार्य केंद्रामुळे आपत्तीच्या वेळी जलद, अचूक आणि समन्वित प्रतिसाद देणे अधिक प्रभावी होणार आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्रातील नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे केवळ आपत्तीच्या वेळी नाही, तर आपत्तीपूर्व सजगतेपासून पुनर्वसनापर्यंतची परिस्थिती व आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षमपणे हाताळता येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी केले.

मंत्रालयात नवीन तंत्रज्ञानाने अद्ययावत केलेल्या राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, पर्यटन, खनिकर्म माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास अपारंपरिक ऊर्जामंत्री अतुल सावे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, मुख्य सचिव सुजाता सौनिक, ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, मदत व पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सोनिया सेठी,आपत्ती व्यवस्थापन संचालक सतीशकुमार खडके आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री फडवणीस म्हणाले की, हवामानातील बदलामुळे आपत्तीचे स्वरूप, तीव्रता आणि वारंवारता बदलत आहे. त्यामुळे ‘मिटिगेशन’ आणि घटनांनंतर तात्काळ प्रतिसाद यावर भर देणे आवश्यक आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी एक सशक्त ‘कमांड आणि कम्युनिकेशन सिस्टीम’ असणे महत्त्वाचे असून, निर्णय लवकर घेता यावेत, जलद प्रतिसाद देता यावा, यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातही अशा प्रकारची आधुनिक व्यवस्था उभारण्याचे काम सुरू असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच नागपूर येथे प्रस्तावित आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या स्थापनेच्या निर्णयाचेही मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले.

आपत्ती येऊ नये, हीच आपली इच्छा आहे; पण आलीच, तर तिच्याशी सक्षमपणे लढण्यासाठी आपली व्यवस्था पूर्णपणे सज्ज असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी या आपत्कालीन केंद्राच्या उभारणीत योगदान दिलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच अत्यंत आधुनिक आणि सुसज्जित व्यवस्था उभी केल्याबद्दल आपत्ती व्यवस्थापन विभागास त्यांनी शुभेच्छा दिल्या.

मदतीसाठी धावून जाणारा आपत्ती व्यवस्थापन कक्ष नव्याने सुरू केला त्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागास शुभेच्छा दिल्या.

आपत्ती व्यवस्थापनाच्या संस्थात्मक बळकटीकरणात महाराष्ट्र अग्रेसर

नवे आधुनिक तंत्रज्ञान आणि व व्यवस्थापनमुळे सुसज्ज झालेले राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्रांचे आधुनिकीकरण आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेला मंत्रीमंडळाची मान्यता या त्रिसूत्रीमुळे आपत्ती व्यवस्थापनाच्या संस्थात्मक बळकटीकरणामध्ये महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमात आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संकेतस्थळाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, आपत्ती सहाय्यक मोबाईल ॲपचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तर Geo-DSS या प्रणालीचे उद्घाटन आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

अद्यावत राज्य आपत्कालीन कार्य केंद्राबाबाबत…

आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन मानकांनुसार हे केंद्र नव्याने उभे करण्यात आले आहे. नव्या SEOC मध्ये बेझल-फ्री व्हिडिओ वॉल, उच्च क्षमतेचे AV कॉन्फरन्सिंग, डेटा सर्व्हर, हाय-स्पीड संगणक, SATPHONES, हॅम रेडिओ, VHF/UHF वायरलेस सेट यांचा समावेश आहे. हे सर्व घटक आपत्तीच्या वेळी वेळेवर प्रतिसाद देण्यासाठी आणि सर्व यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

तसेच Geo-DSS या प्रणालीद्वारे AI आणि मशीन लर्निंगवर आधारित ‘चेंज डिटेक्शन’ प्रक्रिया राबवली जात आहे. ही प्रक्रिया उपग्रह इमेजरीवर आधारित असून, आपत्तीच्या ठिकाणी जवळपास प्रत्यक्ष वेळेत परिस्थिती समजून नुकसान मूल्यांकन व मदत कार्याची दिशा ठरवणे अधिक सोपे होणार आहे.

विशेष म्हणजे, ‘आपत्ती सहाय्यक’ नावाचे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आले असून, यामार्फत नागरिक आपत्तीच्या वेळी SOS अलर्टद्वारे माहिती देऊ शकतात. हे अ‍ॅप द्वि-मार्गी संवादाचे एक महत्त्वाचे माध्यम ठरणार आहे.

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या नवीन संकेतस्थळावर आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व माहिती, मार्गदर्शक तत्त्वे व उपक्रम सहज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे संकेतस्थळ नागरिक, स्थानिक प्रशासन आणि यंत्रणा यांच्यात अधिक सुसूत्रता निर्माण करण्यासाठी  मोलाची भूमिका बजावणार आहे.

राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था (SIDM)

नागपूर येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या (SIDM) इमारत बांधकामासाठी राज्य निधीमधून रुपये १८४ कोटींच्या निधीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. ही संस्था राज्यातील सर्व घटकांसाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यासाठी आणि आपत्ती संबंधित विविध विषयावर संशोधन केंद्र म्हणून कार्य करेल.

जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र

जागतिक बँकेच्या साहाय्याने महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रमांतर्गत ३४ जिल्ह्यांमध्ये (मुंबई शहर आणि मुंबई उपनगर वगळता) आणि ३ महानगरपालिका (सांगली-मिरज-कुपवाड, कोल्हापूर आणि इचलकरंजी) जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्रांचे (DEOC) आधुनिकीकरण करण्यात येत आहे.  यामध्ये एकात्मिक आपत्कालीन व्यवस्थापन प्रणाली (IEMS), आपत्ती रेझिलियन्स नेटवर्क आणि ऑडिओ व्हिज्युअल आणि माहिती संप्रेषण आणि तंत्रज्ञान (ICT) घटकांचा समावेश असेल.ज्यामुळे जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र हे राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राशी अखंडपणे जोडले जातील, असे यावेळी सांगण्यात आले.

०००

एकनाथ पोवार/विसंअ

 

जळगाव जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या कार्याचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला आढावा

जळगाव, दि. ८: जळगाव जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागामार्फत उत्तम सोयी-सुविधांनी युक्त वसतीगृहे उभारण्यात आलेली आहेत. मात्र, जळगावसारख्या मोठ्या शहरात वसतीगृहांसाठी प्रवेश मागणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने, नव्या वसतीगृहांची आवश्यकता निर्माण झाली आहे. यासाठी नवीन प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज दिले.

ते नियोजन भवन, जळगाव येथे झालेल्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाला, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी राजू लोखंडे, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील तसेच इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत मंत्री आठवले यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, भारत सरकार शिष्यवृत्ती योजना, प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना, आवास योजना आणि इतर सामाजिक न्याय योजनांचा आढावा घेतला.
ते म्हणाले की, आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून अनुदान दिले जाते, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनकडूनही अडीच लाख रुपये देण्यात येतात. यासाठी जिल्ह्यातून अधिकाधिक अर्ज येण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
यावेळी ऍट्रॉसिटी प्रकरणांची माहिती घेऊन, समाजात जनजागृतीसाठी लोककला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाची माहिती सादर केली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी ऍट्रॉसिटी प्रकरणांची सद्यस्थिती सांगितली. सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी विभागाचे सादरीकरण करत सविस्तर माहिती दिली.

जळगाव जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करत, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुढील कार्यवाहीसाठी सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले.

प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांची ‘दिलखुलास’ व ‘जय महाराष्ट्र’ मध्ये मुलाखत

मुंबई दि. ०८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती दिनानिमित्त’ ‘सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजना व अंमलबजावणी’ या विषयावर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदिप कांबळे यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत बुधवार दि. ९, गुरूवार दि. १०, शुक्रवार दि.११, शनिवार दि. १२ आणि सोमवार दि. १४ एप्रिल २०२५ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. १५ एप्रिल २०२५ रोजी रात्री ८.०० वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब –  https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

या लिंकवर ही मुलाखत पाहता येणार आहे.

निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे. राज्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग यांच्या आर्थिक शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक उन्नतीसाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत विविध योजना आणि उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली या दोन्ही विभागाच्या शंभर दिवसांच्या कामकाजाचा आराखडा देखील सादर करण्यात आला. या आराखड्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालान्त पूर्व शिष्यवृत्ती योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, भारतरत्न डॉ. आंबेडकर स्वाधार योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना अशा विविध योजनांच्या अंमलबजावणीवर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल २०२५ रोजी १३४ वी जयंती साजरी करण्यात येत आहे. त्या निमित्ताने सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागाच्या योजना, उपक्रम आणि त्यांची अंमलबजावणी याविषयावर प्रधान सचिव डॉ. कांबळे यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात माहिती दिली आहे.

०००

जयश्री कोल्हे/ससं/

पोलादपूर, महाड, माणगाव तालुका क्रीडा संकुलाच्या कामास गती द्या – मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. ०८: तालुका क्रीडा संकुल पोलादपूरसाठी आरक्षित जागेची पाहणी करून संकुलासाठी जागा संपादित करण्याची कार्यवाही करण्यात यावी. माणगाव, महाड येथील क्रीडा संकुलात खेळाडूंसाठी अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या कार्यवाहीस गती देण्याचे निर्देश क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

रायगड येथील पोलादपूर, महाड, माणगाव येथे तालुका क्रीडा संकुल उभारण्यासंदर्भातील कामकाजाचा आढावा मंत्री भरणे यांनी घेतला. यावेळी रोजगार हमी योजना, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले, विभागाचे उपसचिव सुनिल पांढरे, उपसंचालक नवनाथ फरताडे, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ आदी उपस्थित होते.

मंत्री भरणे म्हणाले की, माणगाव येथील क्रीडा संकुलात खेळाडूंसाठी बहुउद्देशीय सभागृहात बॅडमिंटन कोर्टसह चेंजिंग रूम व प्रसाधनगृह, बंदिस्त प्रेक्षागृह, बॅडमिंटन कोर्ट, धावनमार्ग, विविध खेळाचे मैदान अद्ययावत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच महाड क्रीडा संकुलाची डागडुजी करण्यात यावी. अद्ययावत टर्फचे फुटबॉल, क्रिकेट मैदान व त्या परिसरातील प्रचलित असलेल्या खेळांच्या क्रीडांगणांसाठीची कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

 

ताज्या बातम्या

“आमची प्रक्रिया पारदर्शक आणि उत्तरदायित्वपूर्ण आहे” – भारत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

0
मुंबई, ८ :  भारत निवडणूक आयोगाने काँग्रेस पक्षाला २४ डिसेंबर २०२४ रोजी सविस्तर उत्तर पाठवले असून, त्यात त्यांच्या उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर स्पष्ट आणि...

प्लास्टिकचे वापर टाळा, कापडी पिशवी वापर करा, पर्यावरणाचे संरक्षण करा -पंकजाताई मुंडे

0
सोलापूर, दि. ७ - श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट येथे पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी भेट देऊन प्लास्टिक बंदी बाबत सर्व भक्तांना आवाहन...

नवउद्योजकांसाठी डॉ.प्रमोद चौधरी यांचे पुस्तक प्रेरक ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. ७ : भारताची भविष्यातील  वाटचाल आणि कार्बनचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आवश्यक वाटचालीचा रोडमॅप डॉ. प्रमोद चौधरी यांच्या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. पुस्तकात...

मॉडेल सोलर व्हिलेज योजना

0
सूर्यघर मुफ्त बिजली योजनेंतर्गत ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ ही गावांना प्रोत्साहन देणारी योजना राबवित आहे. या योजनेविषयी ही माहिती... आपला भारत देश‌ पर्यायाने महाराष्ट्र राज्य आणि...

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामांना वेळेत पूर्ण करा -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे...

0
नागपूर, दि.७ : ज्यांना निवारा नाही त्यांना साध्या दोन खोलीच्या घराची अपेक्षा असते. गावठान व गावठाणांच्या बाहेर घरकुलांसाठी समान न्यायांची भुमिका शासनाची आहे. घरकुलासाठी...