मंगळवार, जुलै 1, 2025
Home Blog Page 1343

खासदार सुरेश धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक; चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची मोठी हानी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 30 : चंद्रपूर, आर्णी व वणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त दु:खद व धक्कादायक आहे. त्यांच्या निधनाने चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची मोठी हानी झाली आहे,अशी शोकसंवेदना राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

‘खासदार धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. लोकहितासाठी आक्रमक भूमिका घेणारे, अशी खासदार धानोरकर यांची ओळख होती. दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. तीनच दिवसांपूर्वी म्हणजे २७ मे रोजी खासदार धानोरकर यांच्या वडिलांना देवाज्ञा झाली. त्यानंतर आज धानोरकर यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या परिवारावर जो दु:खाचा डोंगर कोसळला आहे, त्यातून त्यांना सावरण्याची प्रार्थना करतो’, अशा शब्दात मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी धानोरकर यांच्याप्रति श्रद्धांजली व्यक्त केली.

0000

दीपक चव्हाण/विसंअ/

लोकसेवा हक्क आयोगाच्या सेवा जनसामान्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक- आयुक्त दिलीप शिंदे

पुणे, दि. 30 :- राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सेवा राज्यातील सामान्य माणसापर्यंत तत्परतेने, सहज व सुलभपणे पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य हक्क अधिनियम 2015 अंमलात आहे. या कायद्यातील  तरतूदींचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक असून त्यासाठी विविध माध्यमांतून लोकजागृती करावी, असे आवाहन राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त दिलीप शिंदे यांनी केले.

राज्य हक्क अधिनियम 2015 मधील तरतूदी, कार्यपद्धती व अधिसूचित सेवा ऑनलाईन पद्धतीने घेण्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित बैठकीत आयुक्त श्री. शिंदे बोलत होते. यावेळी  आयोगाच्या उप सचिव अनुराधा खानविलकर, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, पुणे मनपाचे उप आयुक्त सचिन इथापे, श्यामला देसाई, विक्रम महिते आदी उपस्थित होते.

या अधिनियमांतर्गत 511 सेवा अधिसूचित करण्यात आल्या असून त्यापैकी 387 सेवा ऑनलाईन पद्धतीने दिल्या जात असल्याचे सांगून श्री. शिंदे म्हणाले अधिनियमामध्ये पदनिर्देशित अधिकाऱ्याने पात्र व्यक्तींना कालबद्ध लोकसेवा देणे बंधनकारक असून सेवा देण्यासाठी निश्चित कालमर्यादा आहे. कालमर्यादेत माहिती देण्यास कसूर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना 5 हजार रुपयांपर्यंत दंड लावण्याची तसेच शिस्तभंगाची कारवाई करण्याची तरतूद असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. शिंदे म्हणाले, आयोग स्थापन झाल्यापासून 13 कोटी 62 लाख इतके अर्ज प्राप्त झाले असून 12 कोटी 94 लाख अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. तर पुणे विभागात एप्रिल 2023 पासून 7 लाख 27 हजार 471 अर्ज प्राप्त झाले असून 6 लाख 28 हजार 650 असे एकूण 86 टक्के अर्ज निकाली काढण्यात आले आहेत.  आयोगांतर्गत देण्यात येणाऱ्या सेवांचा लाभ आपले सरकार पोर्टलद्वारेही घेता येतो. सध्या पुणे शहरामध्ये 586 आपले सरकार सेवा केंद्रचालक असल्याचे सांगितले.

या कायद्यान्व्ये जिल्हाधिकारी यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. लोकसेवा हक्क अधिनियमाची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आठवडी बाजार, भित्तीपत्रके, शिबीरे, जाहिरात आदींच्या माध्यमातून प्रसिद्धी व लोकजागृती होणे आवश्यक आहे, असे श्री. शिंदे म्हणाले. पुणे जिल्ह्याने सेवा देण्यामध्ये चांगले काम केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी आयोगाची संरचना, अधिनियमाची उद्दिष्ट्ये, महत्त्वाच्या तरतूदी, आयोगाचे अधिकार, जिल्हाधिकारी यांची जबाबदारी,आपले सरकार पोर्टलमार्फत ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध असलेल्या सेवा, दैनंदिन वापरासाठी देण्यात येणाऱ्या पदनिर्देशित अधिकारी, नाविन्यपूर्ण उपक्रम याबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

बैठकीला आयोगाचे अधिकारी- कर्मचारी, नागरिक, सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

****

‘सारथी’मार्फत प्रशिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे मंत्रिमंडळ उपसमितीकडून अभिनंदन

मुंबई, दि. 30 : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी)कडून प्रशिक्षण घेऊन केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीकडून अभिनंदन करण्यात आले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज मंत्रालयात झाली.

यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष, माजी आमदार नरेंद्र पाटील,उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी) व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, सारथी संस्थेच्या १०३ गुणवंत विद्यार्थ्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून निवड झाली.आणि  सारथी संस्थेच्या एकूण ३९ विद्यार्थ्यांपैकी १७ विद्यार्थ्यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अंतिम यादीत निवड झाली आहे. ही अभिमानाची बाब आहे. या विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष सत्कार समारंभ आयोजित करावा, अशा सूचना मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सुविधा देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे  प्रलंबित असणारी प्रकरणे  व्याज परतावा प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. आवश्यक निधीची तरतूद करावी, असे निर्देश मंत्री श्री. पाटील यांनी दिले.

मा. सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका संदर्भातील प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.असेही या बैठकीत सांगितले. तसेच मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता येण्यासाठी यावर अभ्यास करून अहवाल देण्यासाठी अप्पर मुख्य सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

00000

काशीबाई थोरात/विसंअ/

शेती महामंडळाच्या जागांचा जनहितार्थ वापर करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, दि. 30 : महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील विनावापर जमिनी विविध सार्वजनिक प्रयोजनासाठी हस्तांतरित करुन त्याठिकाणी भविष्यात जनहितार्थ प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक असलेला जागा हस्तांतरण करण्याचा ठराव आज मंत्रिमंडळ बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील सुमारे ४७ हेक्टर क्षेत्र असलेल्या जमिनी शिर्डी, साकुरी, निमगाव, कोऱ्हाळे, शिरसगाव या गावात उपलब्ध असून तसेच त्या विनावापर आहेत. शिर्डी आणि आसपासच्या परिसरात असलेल्या शेती महामंडळाच्या जागांचा जनहितार्थ वापर व्हावा या स्थानिकांच्या मागणीचा आणि भविष्यातील नियोजनाचा धोरणात्मक विचार करून मंत्री विखे पाटील यांनी सदर प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर केला होता.या प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महसूल मंत्री श्री. विखे- पाटील यांनी आभार मानले आहेत.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे धार्मिकस्थळ व सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेल्या शिर्डी व परिसरात भविष्यकालीन दृष्टीने उत्तम सोयीसुविधा उपलब्ध करण्यावर  महसूल मंत्री श्री. विखे पाटील यांचा भर असणार आहे. शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल आणि इतर भाविकांच्या सोयी सुविधांसह अम्युझमेंट पार्क/लेझर तथा फाऊंटन शो/गार्डनची उभारणी करणे, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी वापर करणे, बाजर समिती, ग्रामपंचायत साकुरी, नगरपरिषद राहाता, ग्रामपंचायत निमगाव कोऱ्हाळे, ग्रामपंचायत बेलापूर वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी, मध्यवर्ती प्रशासकीय संकुल तसेच विविध शासकीय कार्यालय, अधिकारी/कर्मचारी यांच्या निवासस्थानासाठी सदर जागेचा सुयोग्य व सुनियोजित वापर करण्याचा सादर केलेल्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने आज मान्यता दिल्याचे मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

०००००

वर्षा फडके- आंधळे

‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत एका दिवसात १ लाख ८१ हजार नागरिकांना विविध सेवा व योजनांचा लाभ

पुणे, दि. 30: जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तालुक्यात एकाचवेळी ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत शिबिरांचे  आयोजन करण्यात आले. या अभियानाअंतर्गत एका दिवसात 1 लाख 81 हजार 376 नागरिकांना शासनाच्या विविध सेवा व योजनांचा लाभ देण्यात आला. जिल्ह्याला दिलेल्या उद्दीष्टापेक्षा दुप्पट  नागरिकांना अभियानांतर्गत लाभ देण्यात आल्याने अनेकांना समाधानाचे क्षण अनुभवता आले.

अभियानांतर्गत जिल्ह्याला 75 हजार नागरिकांना विविध सेवा व योजनांचा लाभ देण्याचे उद्दीष्ट देण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी हे अभियान यशस्वीपणे राबविण्याच्यादृष्टीने महसूल तसेच विविध शासकीय यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. जिल्ह्याला मिळालेल्या उद्दिष्टांपेक्षा अधिक नागरिकांना शासनाच्या विविध योजना व सेवेचा लाभ देण्याचा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. त्यादृष्टीने यंत्रणांनी विविध योजनांचा लाभ देण्यासाठी नागरिकांनाकडून अर्जही भरुन घेतले.

आज तालुकास्तरावरील शिबिराच्या माध्यमातून  नागरिकांना शासकीय योजना व सेवेचा लाभ देण्यात आला. या  सकाळी 11 वाजता शिबिरांना लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरूवात करण्यात आली. काही ठिकाणी सभागृह तर काही ठिकाणी मंडप उभारून विविध यंत्रणांचा कक्ष स्थापन करण्यात आला होता. जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आशेने आलेले नागरिक समाधानी होऊन परततांना दिसले. एकूण 1 लाख 81 हजार 376 नागरिकांना विविध सेवा व योजनांचा लाभ देण्यात आला.

 पुणे शहरात 10 हजार 929, हवेली 27 हजार 419, मुळशी 3 हजार 950, भोर 28 हजार 442, मावळ 3 हजार 68, वेल्हे 8 हजार 390, जुन्नर 3 हजार 523, खेड 10 हजार 837, आंबेगाव 24 हजार 203 शिरुर 33 हजार 223, बारामती 21 हजार 431, पुरंदर 5 हजार 517 आणि अपर तहसील कार्यालय पिंपरी चिंचवड येथे 442 लाभार्थ्यांना शिबिराचा लाभ झाला.

शिबिरात महसूल, कृषि, आरोग्य, जलसंपदा,  पशुसंवर्धन, पोस्ट, पंचायत समिती, निवडणूक शाखा, भूमी अभिलेख, सामाजिक वनीकरण, वन विभाग, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, एकात्मिक बालविकास विभाग, दुय्यम निबंधक सहकारी संस्था कार्यालय आदी विविध विभागांनी सहभाग घेतला. नागरिकांना शिधापत्रिका, दिव्यांग प्रमाणपत्र,  विविध दाखले, मतदार नोंदणी, नवीन वीज जोडणी, आधारकार्ड अद्ययावत करणे या सेवांसह संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री सन्मान निधी योजना, मनरेगा, दिव्यांगांना आधार कार्ड,  निर्वाह भत्ता, आदी शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला.  यावेळी  नागरिकांना शासकीय योजनांची माहितीदेखील देण्यात आली.

सूक्ष्म नियोजनावर भर

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख आणि निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी शिबिराचे सूक्ष्म नियोजन केले होते. तालुक्यातील विविध शासकीय यंत्रणांशी समन्वय साधून त्यांच्याकडील योजना, सेवा व लाभार्थ्यांची माहिती संकलीत करण्यात आली. तालुकास्तरावरील बैठकांमध्ये नियोजनाला अंतिम रूप देण्यात आले. उद्दीष्टापेक्षा अधिकाधिक लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी सर्व यंत्रणांनी गेला आठवडाभर परिश्रम घेतले.

जागेवरच सेवा मिळाल्याचा आनंद

‘शासन आपल्या दारी’ अभियांनाअंतर्गत भोर तालुक्यातील देगावच्या नाईलकर कुटुंबांना प्रथमच महादेव कोळी जातीचा दाखल्याचे वाटप करण्यात आले. याबद्दल नाईलकर कुटुंबानी समाधान व्यक्त करत शासनाचे आभार मानले. हितेश खुटवळ यांच्या बाळाचे आधार कार्ड तात्काळ तयार झाल्याने त्यांना वेळ वाचल्याचे समाधान होतो. अशा अनेक समाधानाच्या प्रतिक्रीया शिबिरात ऐकायला मिळाल्या.  ‘शासन आपल्या दारी उपक्रमात सर्व योजना एकाच छताखाली मिळत हायती..’ ही मांगदरीच्या लक्ष्मण मांगडे प्रतिक्रीया आणि पत्नीला दिव्यांगाचे कार्ड तात्काळ मिळाल्याने ‘शासनाचा उपक्रम लय भारी’ ही संपत मोहिते यांची प्रतिक्रीया शिबिराचे यश सांगणारी आहे.

डॉ.राजेश देशमुख, जिल्हाधिकारी- शिबिराच्या माध्यमातून अधिक संख्येने  नागरिकांना  लाभ देण्याच्या आनंदाएवढेच ज्यांना लाभ मिळाला त्या सामान्य  ग्रामीण भागातील नागरिकांचे कष्ट वाचले याचे समाधान जास्त आहे. सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी प्रयत्नपूर्वक चांगले नियोजन केले. यापुढेही असेच मोहिम स्तरावर सामान्य नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न असतील.

****

महामानवांच्या संयुक्त जयंतीचा उपक्रम कौतुकास्पद – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 30 : छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महामानवांनी महाराष्ट्र घडविला. त्यांनी महाराष्ट्रासह देशाला दिशा दिली. अशा महामानवांच्या जयंतीचा संयुक्त उपक्रम कौतुकास्पद आहे, असे उद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

अनु. जाती/जमाती/विजा – भज/ इमाव/विमाप्र शासकीय/ निमशासकीय अधिकारी/कर्मचारी संघटनेतर्फे छ्त्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती सोहळा आज दुपारी मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार भरत गोगावले, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे, उत्सव समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत ढोके, सविता शिंदे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा,  आमदार भरत गोगावले, आमदार संतोष बांगर, माजी आमदार शिरीष चौधरी आदींनी या सोहळ्यास भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात. अशाच प्रकारचा हा उपक्रम आहे. संघटनेच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, अनु. जाती/जमाती/विजा – भज/ इमाव/विमाप्र शासकीय/ निमशासकीय अधिकारी/कर्मचारी संघटनेतर्फे दरवर्षी प्रबोधनपर उपक्रम राबविले जातात. या संघटनेचे नेहमीच सहकार्य राहिले आहे. यावेळी व्याख्याते रवींद्र शिवाजी केसकर यांनी ‘माणसाची एकच जात, दोन पाय- दोन हात’ याविषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर संगीतकार जॉली मोरे, शाहीर सीमा पाटील यांनी ‘भारतीय संविधानाची गौरवगाथा’ या विषयावर प्रबोधनपर गीते सादर केली.

संघटनेतर्फे देण्यात येणारा सन २०२३ चा डॉ. बी. आर. आंबेडकर राज्यस्तरीय उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पाच हजार ५१ रुपये रोख, सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी शासकीय अधिकारी, कर्मचारी, संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००

गोपाळ साळुंखे/ससं/

मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचा १ आणि २ जूनला ‘जनतेशी सुसंवाद’!

मुंबई दि. 30 : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर ‘शासन आपल्या दारी’, ‘जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून येत्या गुरूवार आणि शुक्रवारी नागरिकांशी संवाद साधणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग कार्यालयात होणाऱ्या या कार्यक्रमात नागरिकांनी शासकीय योजना, आपल्या प्रभागातील विकासकामांबाबत सूचना व इतर समस्यांबाबतच्या निवेदन अथवा अर्जासह उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

केव्हा आणि कुठे होईल संवाद

गुरूवार दि 1 जून रोजी महानगरपालिकेच्या ‘ए आणि बी वॉर्ड’ मध्ये इंडियन रेडक्रॉस सोसायटी हॉल, 141, शहीद भगतसिंह मार्ग, फोर्ट, मुंबई येथे तसेच शुक्रवार दि. 2 जून रोजी ‘जी उत्तर वॉर्ड’ मध्ये कॉन्फरन्स हॉल, जी उत्तर विभाग कार्यालय, मुंबई येथे दुपारी 3 ते 5 या वेळेत तर ‘जी दक्षिण वॉर्ड’ मध्ये कॉन्फरन्स हॉल, जी दक्षिण विभाग कार्यालय, मुंबई येथे सायंकाळी 5 ते 7 वेळेत पालकमंत्री श्री.केसरकर नागरिकांशी संवाद साधण्यासाठी उपस्थित राहतील. त्याचप्रमाणे ‘जनतेशी सुसंवाद’ या कार्यक्रमास पालकमंत्री यांच्यासोबत संबंधित भागातील लोकप्रतिनिधी, सर्व विभागांचे शासकीय अधिकारी तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/

मुंबईत ठिकठिकाणी ‘हिरकणी कक्ष’ सुरू करणार – मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. 30 – रेल्वे स्थानक, बस स्थानक, रुग्णालये, पोलिस स्टेशन अशा गर्दीच्या ठिकाणी स्तनदा माता बालकांना स्तनपान करू शकत नाही. हे लक्षात घेऊन मुंबई शहरामध्ये माता आणि बालकांच्या सोयीसाठी अद्ययावत हिरकणी कक्ष सुरू करण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

बाळांना दूध पिण्याच्या मूलभूत अधिकारापासून त्यांना वंचित राहावे लागू नये, यासाठी मुंबई शहर जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजन समिती मार्फत 17 हिरकणी कक्ष स्थापन करण्यास मंजुरी मिळाली आहे. त्या अंतर्गत पहिल्या हिरकणी कक्षाचा शुभारंभ मुंबई सेंट्रल बसस्थानक येथे मंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राजीव निवतकर, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, महाव्यवस्थापक (वाहतूक) शिवाजी जगताप, जिल्हा नियोजन अधिकारी श्री.सुपेकर, मुंबई जिल्हा महिला बालविकास अधिकारी श्रीमती शोभा शेलार आदी उपस्थित होते.

मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी तीन टक्के निधी खर्च करण्यात येतो. त्याअंतर्गत मुंबईतील विविध बस स्थानकांमध्ये हिरकणी कक्ष सुरू करण्यात येतील. हे सर्व कक्ष वातानुकुलित केले जातील. या कक्षांमध्ये महिला आणि बालकांना विश्रांती घेता येईल. प्रत्येक जिल्ह्याला अशी सुविधा असावी, यासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

बस चालक तसेच वाहकांसाठी सुद्धा मागणीनुसार अद्ययावत विश्रांती कक्ष बनविण्यात येथील अथवा त्यांचे नूतनीकरण करण्यात येईल, असेही मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले. कामा हॉस्पिटल येथे मुंबईत येणाऱ्या निराश्रीत महिलांसाठी कक्ष उभारण्यात आला असल्याचे ते म्हणाले. कामगारांसाठी देखील सुविधा निर्माण करण्यात येत असल्याचे सांगून कामगार केंद्र अत्याधुनिक करून तेथे स्विमिंग पूल, रेस्टॉरंट, जीम, नेमबाजी सुविधा, ॲस्ट्राटर्फ तयार केले जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असल्याने येथील सोयी-सुविधा देखील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या असाव्यात असा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/

किनारी रस्ता प्रकल्प मुंबईकरांसाठी दिलासा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 30 :- मुंबई किनारी रस्ते प्रकल्पातील बोगदे खणनाचा टप्पा मावळा-टीबीएम यंत्राने पूर्ण केला आहे. या प्रकल्पामुळे मुंबईकरांचा प्रवास आरोग्यदायी, आरामदायी आणि वाहतूक कोंडीमुक्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. या प्रकल्पामुळे मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये एक महत्त्वपूर्ण अशी भर पडल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील स्वराज्यभूमी-गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क दरम्यानचा बोगदा खणण्याचा अखेरचा टप्पा- ब्रेक थ्रू मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते कळ दाबून करण्यात आला. याप्रसंगी मुंबई महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, एल ॲण्ड टी कंपनी तसेच या प्रकल्पातील सल्लागार कंपन्यांचे अभियंते, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. प्रियदर्शनी पार्क येथे टीबीएम यंत्राने खोदाईचा हा अखेरचा टप्पा पूर्ण करून बोगदा पूर्ण करताच, या ठिकाणी काम करणाऱ्या अभियंते, अधिकारी, कर्मचारी-कामगारांनी एकच जल्लोष केला.

मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस या दोहोंनीही मुंबई महापालिका आणि प्रकल्प अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या कंपन्या, सल्लागार तसेच अभियंते, कर्मचारी-कामगारांचे अभिनंदन केले. हे काम आव्हानात्मक होते. ते पूर्ण झाल्याने आपण सर्व एका महत्त्वपूर्ण क्षणाचे साक्षीदार ठरल्याचे कौतुकोद्गारही काढले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मुंबईसाठी हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. देशातील अशा प्रकारचा पहिलाच बोगदा आपण पूर्ण केला आहे. हा प्रकल्प आणि त्यातील बोगदा पूर्ण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरत आहोत. समुद्राखालून जाणाऱ्या रस्त्यांसाठी विविध सुविधाही अत्याधुनिक असतील. या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी आपण स्थानिक कोळीवाड्यातील भूमिपुत्रांनाही विश्वासात घेतले आहे. समुद्रातील दोन खांबामधील अंतरही त्यादृष्टीने १२० मीटरचे केले आहे. सर्वांना सोबत घेऊन हा प्रकल्प पुढे नेला आहे. पर्यावरणीय अशा सर्व गोष्टींची काळजी घेतली आहे. मुंबईत असे महत्त्वाचे अनेक प्रकल्प सुरु आहेत. त्यांना केंद्राकडून विशेषतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आवर्जून पाठबळ दिले आहे. मुंबई ही आंतरराष्ट्रीय नगरी आहे. देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मुंबईची वाहतूक कोंडीतून मुक्तता व्हावी, नागरिकांना दिलासा मिळेल, यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या किनारा रस्ता प्रकल्पाला छत्रपती संभाजीराजे यांचे नाव देण्याचे यापूर्वीच जाहीर केल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले की, एमटीएचएल हा समुद्री सेतूही आता पूर्ण होतो आहे. हा मार्ग पुढे वरळीला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम महामार्गावरील ताण कमी होणार आहे. मेट्रोचे विविध मार्ग, उड्डाणपूल यांचे काम पूर्ण होण्यामुळे पश्चिम उपनगरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मुंबईच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पातील हा बोगदा खोदाईचा टप्पा पूर्ण होणे एक महत्त्वाचा टप्पा आहे. या क्षणांचे साक्षीदार होण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे. या प्रकल्पाचे काम मार्गी लागावे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विशेष सहकार्य केले. मुख्यमंत्री श्री. शिंदे हे देखील या प्रकल्पाच्या कामावर सातत्याने लक्ष ठेवून होते. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होईल. तो जनतेसाठी खुला होईल, असे प्रयत्न आहेत. यामुळे नागरिकांच्या दैनंदिन वाहतूक सुविधेत एक महत्त्वाची भर पडणार आहे. हे आव्हानात्मक काम पूर्ण केल्याबद्दल या प्रकल्पासाठी झटणाऱ्या सर्वांचेच कौतुक करावे लागेल.

मुंबई किनारा रस्ता प्रकल्पाविषयी…

  • बोगदा खणणाऱ्या यंत्राने (TBM) खोदण्यात येणारा भारतातील सर्वात मोठ्या व्यासाचा (व्यास १२.१९ मी.) बोगदा आहे.
  • प्रकल्पातील बोगद्याला ३७५ मि.मी. जाड काँक्रिट अस्तर. त्यावर अग्निप्रतिबंधक उपाययोजने अंतर्गत फायरबोर्डची व्यवस्था. यामध्ये भारतात प्रथमच सकार्डो वायूविजन प्रणालीची व्यवस्था.
  • दुहेरी बोगद्यासाठी अद्ययावत वाहतूक व्‍यवस्‍थापन नियंत्रण प्रणालीची व्‍यवस्‍था. भारतामध्ये प्रथमच एकलस्तंभ (मोनोपाईल) बांधून पुलांची उभारणी.
  • प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सागरी सेतू वरळी टोकापर्यंतच्या या एकाच प्रकल्पामध्ये रस्ता, पूल, उन्नत मार्ग, उतरण मार्ग, आच्छादित बोगदा, समुद्र तसेच टेकडीखालून बोगदा, हरितक्षेत्राची निर्मिती.
  • पर्यावरणपूरक पद्धतीनं काम. प्रवाळ (Coral)स्थलांतर व अस्तित्व टिकविण्याची कार्यवाही यशस्वी.
  • या सागरी किनारी रस्त्यामुळे अंदाजे ७० टक्के वेळेची बचत, ३४ टक्के इंधन बचत. इंधन बचतीमुळे प्रती वर्षी विदेशी चलनाची मोठ्या प्रमाणात बचत.
  • ध्वनी प्रदूषण व वायू प्रदूषण कमी होण्यास मदत. अतिरिक्त जवळजवळ ७० हेक्टर हरितक्षेत्र निर्मितीमुळे प्रदूषण कमी होऊन पर्यायाने मुंबईकरांचे जीवनमान सुधारण्यास मदत. सुरक्षित, जलद, कमी खर्चात प्रवास
  • या प्रकल्पात हरितक्षेत्रात सायकल ट्रॅक (Cycle tracks), सार्वजनिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक, (Jogging tracks), खुले प्रेक्षागृह (Open Theatre) इत्यादी समाविष्ट
  • हाजीअली व महालक्ष्मी मंदिर या दोन्ही ठिकाणी वरळी येथे पार्किंगची सुविधा उपलब्ध
  • प्रकल्पाचा अंदाजित खर्च रु. १२ हजार ७२१/-कोटी (बांधकाम खर्च रु. ८४२९/- कोटी).
  • रस्त्याची लांबी – १०.५८ कि.मी. मार्गिका संख्या – ८ (४+४), (बोगद्यांमध्ये ३+३)

00000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती सोहळा श्रीक्षेत्र चौंडी येथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणार

मुंबई, दि. ३० : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी दिनांक ३१ मे २०२३ रोजी त्यांचे जन्मगाव श्रीक्षेत्र चौंडी, ता. जामखेड, जि. अहमदनगर येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जयंती सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यात अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील पुरस्कार विजेत्या महिलांचा सन्मान होणार आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यातील प्रत्येकी १५ ग्रामपंचायतींमधील ६० पुरस्कार विजेत्या महिलांचा सन्मानसोहळा महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथे दुपारी ३.०० वाजता  होणार  आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून या वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या दोन कर्तबगार महिलांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामपंचायतस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्याचा निर्णय महिला व बालविकास विभागाने घेतलेला आहे.

या पुरस्कारासाठी राज्यातील एकूण २७,८९७ ग्रामपंचायतींमधील १,३९,४८५ महिलांनी अर्ज सादर केले होते. शासन निर्णयानुसार गठित समितीच्या माध्यमातून छाननी करून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमधील सुमारे ५५,७९४ महिलांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ आणि रोख रक्कम रू. ५००/- देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामपंचायतस्तरावर पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. राज्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामपंचातस्तरीय पुरस्कार विजेत्या कर्तबगार महिलांचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अभिनंदन केले आहे.

****

संध्या गरवारे/विसंअ/

ताज्या बातम्या

विधानपरिषद लक्षवेधी

0
अहिल्यानगर महापालिकेतील २८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीस शासन सकारात्मक - मंत्री उदय सामंत राज्यातील सर्व महानगरपालिकांचा आकृतीबंध मंजूर करण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करणार मुंबई, दि. १ :...

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

0
घरकुलांसाठी स्थानिक वाळू घाटांमधून पाच ब्रास वाळू तहसीलदारार्फत मोफत मिळणार- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मुंबई, दि. १ : राज्य शासनाने राज्यात एक व्यापक वाळू धोरण...

विधानसभा प्रश्नोत्तरे 

0
अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. १ : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या...

विधानसभा इतर कामकाज

0
बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. १: बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी...

आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था – परिवहन मंत्री...

0
मुंबई, दि. ०१ : आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी एसटीच्या ५,२०० बसेसची व्यवस्था केली आहे. या...