सोमवार, जून 30, 2025
Home Blog Page 1337

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, दि. १ : नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे, शेळीपालन, कुक्कुटपालन प्रशिक्षण आणि पशु शक्ती प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्याचा शासनाचा मानस आहे, असे महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

महिलांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ आणि  जीआयझेड (GIZ)  व नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मस्त्य विज्ञान विज्ञापीठ यांच्यात सामंजस्य करार सह्याद्री अतिथिगृह येथे करण्यात आला, त्यावेळी मंत्री श्री. लोढा बोलत होते. महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए.कुंदन, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) च्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. इंदू जाखड, महाव्यवस्थापक (प्रकल्प) कुसुम बाळसराफ, (माविम), नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मस्त्य विज्ञान विद्यापीठाचे  संचालक शिक्षण विस्तार डॉ.अनिल भिकणे, जीआयझेडचे जर्मनीचे वाणिज्यदूत अचिम फबीग, जीआयझेडचे संचालक राजीव अहाळ, रणजित जाधव, जितेंद्र यादव, ओमकार शौचे यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, जीआयझेड (GIZ) या संस्थेबरोबर करार केल्यामुळे नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देऊन शाश्वत शेतीसाठी उपक्रम राबविण्यास मदत होणार आहे.माविमने शाश्वत शेती व बचतगट क्षेत्रात राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती जीआयझेड या संस्थेला देण्यात येईल. दोन्ही संस्था व राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून परस्पर संवादातून महिला बचत गटांना आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य, जिल्हा, तालुका व गावस्तरावर योग्य मार्गदर्शन करण्यात येईल. नागपूर येथील महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या विविध प्रशिक्षणाच्या संधी महिलांना मिळतील. या विद्यापीठांतर्गत असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये महिलांना शेळीपालन, पोल्ट्री प्रशिक्षण आणि पशुशक्ती प्रशिक्षण देण्यात येतील.या प्रशिक्षणाचा महिलांना नक्कीच आर्थिक स्वयंपूर्ण होण्यासाठी मदत होईल, असेही मंत्री श्री.लोढा म्हणाले.

000

संध्या गरवारे/विसंअ/

पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये जपानचे योगदान मोठे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि १ :- देशातील विशेषतः मुंबईतील विविध पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये जपानचे योगदान मोठे असून जपानसोबतचे सहकार्याचे संबंध अधिक दृढ करण्यावर भर देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

जपानचे राजदूत सुझुकी हिरोशी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध क्षेत्रातील सहकार्याच्या संधींबाबत उभयतांमध्ये चर्चा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सांस्कृतिक, उद्योग, व्यापार आणि आर्थिक क्षेत्रासह विविध क्षेत्रात महाराष्ट्राचे जपानशी सहकार्याचे संबंध आहेत. जपानने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर राज्यातील अनेक प्रकल्पांमध्ये होत असून या माध्यमातून जपान आणि महाराष्ट्राचे संबंध अधिक वृद्धिंगत होत आहेत, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

भारत आणि विशेषतः महाराष्ट्राशी विविध क्षेत्रात संबंध वृद्धिंगत करण्यास उत्सुक असल्याचे जपानचे राजदूत सुझुकी हिरोशी यांनी सांगितले. सांस्कृतिक देवाणघेवाण, उद्योग, व्यापार यांसारख्या विविध क्षेत्रामध्ये सहकार्य वाढविण्याबाबत आणि संबंध अधिक दृढ होण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली.

000

गोसीखुर्द जलपर्यटन प्रकल्प २०२४ पर्यंत पूर्ण करावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई, दि. १ : राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत विविध पर्यटन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. राज्यात पर्यटनवाढीसाठी मोठा वाव असून प्रत्येक विभागातील पर्यटनस्थळांचा दर्जा वाढवितानाच पर्यटकांच्या सोयीसाठी त्याठिकाणी चांगले रस्ते, दळणवळणाची साधने, निवासाची दर्जेदार व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीत गोसीखुर्द येथे जलपर्यटन, नागपूर येथील सोनेगाव तलावाचे सुशोभीकरण, कार्ला लोणावळा येथे चाणक्य सेंटर फॉर एक्सलन्स, मिठबाव येथील गजबादेवी मंदिर सुविधा प्रकल्प यांना मंजुरी देण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

गोसीखुर्द जलाशय जिल्हा भंडारा येथे जागतिक दर्जाचे जलपर्यटन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यावेळी या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. गोसीखुर्द जलाशयात ४५ किमी जलप्रवास पात्र आहे. याठिकाणची नैसर्गिक विविधता, मोठ्या बेटांची आणि बंदरांची उपलब्धता असल्याने आंतरराष्ट्रीय जलपर्यटन विकसित करण्यात येणार आहे.

देशातील सर्वोत्तम असा हा जलपर्यटन प्रकल्प वेळेपूर्वी जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. हा प्रकल्प भंडारा आणि नागपूर या दोन्ही जिल्ह्यांच्या किनाऱ्यावर होत असून याठिकाणी सुरू असलेला अंभोरा मंदीर विकास प्रकल्प आणि जलपर्यटन प्रकल्प एकत्रित करण्याची सूचना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केली.

एमटीडीसीच्या माध्यमातून लोणावळा कार्ला येथे करण्यात येणारे एमआयसीई सेंटर आणि चाणक्य सेंटर फॉर एक्सलन्स संदर्भात सादरीकरण करण्यात आले. कार्ला येथील एमटीडीसी पर्यटक निवासाला एमआयसीई (मिटींग, इन्सेटिव्ह, कॉन्फरन्स, एक्झीबिशन) सेंटर करण्यात येणार आहे. मुंबईच्या जवळ हा परिसर असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक येतात त्यांना याठिकाणी दर्जेदार सुविधा मिळायला हवी, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

कोयना बामणोली येथे स्कुबा डायव्हिंग तातडीने सुरू करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. नागपूर येथील सोनेगाव तलावाच्या सुशोभीकरणाबाबत सादरीकरण करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मिठबाव येथील गजबा देवी मंदिर परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याबाबत आराखडा सादर करण्यात आला. भाविकांसाठी चांगल्या सुविधा देतानाच बगीचे, रस्ते करून पर्यटनवाढीसाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

बैठकीस महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय आदी उपस्थित होते. यावेळी नागपूर, भंडारा, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी सादरीकरण केले.

०००

‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत कृषि विभागाच्या विविध योजना

राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येणार असून त्यासाठी महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून  नोंदणी करता येणार आहे.

कृषि यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. कृषि विभागाने अशा योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबीच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतकऱ्यांनी शेतीशी निगडीत विविध बाबींकरिता अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांतर्गत यांत्रिकीकरणाच्या अनेक बाबींकरिता अर्थसहाय्य करण्यात येते. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना एका अर्जाद्वारे सर्व योजनांसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व योजनांसाठी यांत्रिकीकरण घटकामध्ये ट्रॅक्टर, पॉवर टिलर, स्वयंचलित यंत्र व अवजारे, ट्रॅक्टर, पॉवर टिलर चलित अवजारे, पीक संरक्षण साधने, मनुष्य व बैल चलित अवजारे, प्रक्रिया युनिटस्, भाडे तत्त्वावर कृषि व अवजारे सेवा पुरवठा केंद्राची उभारणी व  अवजारे बँक इत्यादींचा समावेश केला आहे.

 यंत्रसामुग्रीसाठी अर्थसहाय्य

ट्रॅक्टर (८ पेक्षा जास्त ते ७० पीटीओ एच.पी.), पॉवर टिलर (८ पेक्षा जास्त), स्वयंचलित यंत्रे,  ट्रॅक्टर/पॉवर टिलर चलित अवजारे अंतर्गत जमीन सुधारणा व पूर्वमशागतीसाठीची अवजारे, पेरणी, पुनर्लागवड व काढणीसाठीची अवजारे, आंतर मशागतीसाठीची अवजारे, पिकांचे अवशेष व्यवस्थापन किंवा गवत आणि चारा उपकरणे, काढणी व मळणीसाठीची यंत्र आणि अवजारे, पेरणी, पुनर्लागवड, आंतरमशागत, काढणी व मळणीसाठी सर्व प्रकारची मनुष्य, बैलचलित यंत्र आणि अवजारे, पीक संरक्षण उपकरणे इत्यादी यंत्र अवजारे खरेदी करण्यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प, अत्यल्प भूधारक व महिला शेतकऱ्यांसाठी ५० टक्के व इतरांसाठी ४० टक्के अर्थसहाय्य/अनुदान  दिले जाते.

अन्नधान्य, तेलबिया आणि फळपिकांसाठी काढणी पश्चात प्रक्रिया उपकरणासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प, अत्यल्प भूधारक व महिला शेतकऱ्यांसाठी ६०  टक्के व इतरांसाठी ५० टक्के अर्थसहाय्य/अनुदान  दिले जाते.

कृषि अवजारे बँक

राज्यात पीक रचनेनुसार पिकाच्या पेरणीपासून काढणीपासून प्राथमिक प्रक्रियेपर्यंत शेतकऱ्यांना माफक दराने यांत्रिकीकरणाची सेवा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्यासाठी अद्ययावत यंत्रसामुग्री असलेली कृषि अवजारे बँक स्थापन करण्यास अर्थसहाय्य करण्यात येते. कृषि अवजारे बँक स्थापन करण्यासाठी कृषि अवजारे खरेदीसाठी भांडवली खर्चाच्या ४० टक्के इतकी अनुदान मर्यादा असून कृषि अवजारांवरील १० लाख, २५ लाख, ४० लाख, व ६० लाख भांडवली गुंतवणुकीच्या अवजारे बँकेस अनुक्रमे ४ लाख, १० लाख, १६ लाख व  २४ लाख रुपये इतके अनुदान अनुज्ञेय आहे.

अनुदान अदा करण्याची कार्यपद्धती

जिल्ह्यास प्राप्त लक्ष्यांकानुरूप लाभार्थीची निवड महाडीबीटी पोर्टलवर संगणकीय सोडत पद्धतीने केली जाते. लाभार्थी म्हणून निवड झाल्यांनंतर विहित कालावधीत आवश्यक कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकित प्रती सादर करावयास लागतात. अवजारे खरेदीकरिता पूर्वसंमती मिळाल्यानंतर एक महिन्याच्या आत देयक सादर करणे आवश्यक आहे. औजारे खरेदीकरिता पूर्वसंमती मिळाल्यानंतर अवजारे यंत्राची खुल्या बाजारातून खरेदी करताना स्वतःच्या बँक खात्यातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने,  धनादेश किंवा धनाकर्षाद्वारे विक्रेत्यास रक्कम अदा करणे बंधनकारक आहे.

पूर्वसंमती प्राप्त झाल्यानंतर लाभार्थींनी अवजारांची खुल्या बाजारातून सुरुवातीस संपूर्ण रक्कम भरून स्वतः खरेदी करावी. अशा प्रकरणी अवजारांच्या गुणवत्तेबाबत व दर्जाबाबत सर्वस्वी जबाबदारी संबंधित लाभार्थी संस्था व गटाची राहील.

अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि सहायक यांच्याशी संपर्क करावा.

संकलन – जिल्हा माहिती कार्यालय, सातारा

शहरातील नाट्यगृहांच्या नूतनीकरणासाठी नागरिकांकडून सूचना मागवा

पुणे, दि.१: शहरातील नाट्यगृहांचे नूतनीकरण करण्यासाठी जून अखेरपर्यंत नागरिक तसेच नाट्यकलावंतांकडून सूचना मागवाव्यात आणि १५ जुलैपर्यंत दुरुस्तीची कामे सुरू करून ऑगस्ट अखेरपूर्वी पूर्ण करावीत, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

पुणे शहरातील सर्व नाट्यगृहांच्या सध्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, उपायुक्त चेतना केरुरे आणि महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, बालगंधर्व रंगमंदिराच्या मूळ वास्तूचे नूतनीकरण करण्यात यावे. रंगमंदिराच्या स्वच्छतेसाठी अनुभवी संस्थेची नेमणूक करून नीटपणे स्वच्छता राखली जाईल याची दक्षता घ्यावी.  रंगमंदिराच्या दुरुस्तीसाठी नागरिकांकडून सूचना मागवाव्यात आणि जून अखेरपर्यंत सर्व कामांच्या निविदा काढण्यास सुरुवात करावी. दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर करण्यात यावी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची संख्या लक्षात घेता नाट्यगृह दुरुस्ती कामासाठी बंद करण्याबाबत एक महिनापूर्वी पूर्वसूचना देण्यात यावी.

श्री गणेश कला क्रीडा मंच येथे वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात यावी. प्रत्येक नाट्यगृहातील कामांसाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. नूतनीकरणाची कामे करताना नाट्यकलावंतांकडूनही त्यांच्या अपेक्षा जाणून घ्याव्यात. पं. भीमसेन जोशी कलामंदिराच्या रॅम्पचे काम त्वरीत करावे. अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचे दुरुस्तीचे कामही करण्यात यावे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या नूतन इमारतीचे उर्वरित काम पुढील तीन महिन्यात पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

पाषाण भागातील समस्यांचा आढावा

पाषाण-सूस रोडवरील अतिक्रमणाचे काम जून अखेरपर्यंत करावे. स्मार्ट सिटीअंतर्गत जनतेच्या दृष्टीने आवश्यक कामांना भेट देऊन त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात. पाषाण परिसरातील रस्त्यांची कामे तेथील जागेचे प्रश्न सोडवून तात्काळ सुरू करावीत. नागरिकांच्या समस्या सोडविताना त्यांच्याशी संवाद साधावा आणि कामात येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर कराव्यात. १० जूनपर्यंत बाणेर-बालेवाडी आणि पाषाण भागातील पाण्याची समस्या दूर होईल याचे नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.

०००

३५० वा शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा : गेट वे ऑफ इंडिया येथे शिवकालीन शस्त्र प्रदर्शनासह ‘जाणता राजा’ महानाट्याचे आयोजन

मुंबई, दि. 31 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 1 जून रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आणि त्यानंतर ‘जाणता राजा’ हे महानाट्य सादर केले जाणार आहे. हे प्रदर्शन ६ जूनपर्यंत सुरु राहणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम होणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा ऐतिहासिक ठरावा, पुन्हा तो क्षण विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून राज्यातील जनतेपर्यंत पोहोचावा, छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर व्हावा यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यासाठी मौजे पाचाड, किल्ले रायगड याबरोबरच मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुरातत्व व वस्तूसंग्रहालय संचालनालय यांच्यावतीने दिनांक १ जून ते ६ जून या कालावधीत गेट वे ऑफ इंडिया येथे शिवकालीन वस्तू आणि शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी 9-30 ते सायंकाळी 7-30 वाजेपर्यंत नागरिकांना पाहता येणार आहे. या प्रदर्शनात तलवार, पट्टा, कट्यार, गुर्ज, भाला, खंजीर, चिलखत आदी चारशेहून अधिक शिवकालीन शस्त्रे नागरिकांना पाहता येणार आहेत. याशिवाय, प्रदर्शनाच्या ठिकाणी दररोज दिवसातून चार वेळा युद्ध कला सादरीकरण आणि शस्त्रांची माहिती देण्यात येणार आहे.

याचबरोबर, दिनांक 01 जून ते 07 जून या कालावधीत सायंकाळी 6-30 ते रात्री 9-30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील विविध घटना “जाणता राजा” महानाट्याच्या माध्यमातून अनुभवता येणार आहेत. या महानाट्यासाठीच्या प्रवेशिका शहरातील प्रमुख नाट्यगृहात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

0000

दीपक चव्हाण/विसंअ/

महिला अत्याचाराच्या तक्रारीबाबत संवेदनशील राहावे – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, दि. 31 : महिलांच्या सुरक्षेबाबत जास्तीत जास्त भर देऊन महिला अत्याचाराच्या तक्रारींची संवेदनशील राहून सखोल चौकशी करावी, दोषींवर तत्काळ कडक कारवाई करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (शासन आपल्या दारी) कार्यक्रमात एच पूर्व वॉर्ड सांताक्रूझ (पूर्व) येथे आज ५७८ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी १५४ तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यात आले आहे. उर्वरित तक्रारीदेखील वेळेत निराकरण करून समस्या प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश मंत्री श्री. लोढा यांनी दिले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, कलिना शास्त्रीनगरमध्ये इमारत पुनर्विकासासाठी नवीन विकासक नेमण्यात यावा, प्रभात कॉलनी येथे सहा वर्षाच्या मुलीवर झालेल्या अत्याचारासंदर्भात तत्काळ कडक कारवाई करण्यात यावी.

यावेळी महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती महिलांना देण्यात आली.

श्रीमती अनुराधा रोकडे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

*****

संध्या गरवारे/विसंअ/

अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

अहमदनगर, दि. 31 मे (जि.मा.का.वृत्तसेवा) :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी उत्तम राज्य कारभाराचा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी भारताला प्रशासकीय संरचनेची मोठी देणगी दिली आहे. अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे  नाव देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. त्यांच्या नावामुळे जिल्ह्याचा मान मोठा होणार असल्याचेही ते म्हणाले.

चौंडी, ता.जामखेड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार प्रा.राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुरेश धस, माजी खासदार विकास महात्मे, माजी आमदार भीमराव धोंडे, अण्णासाहेब डांगे, बाळासाहेब मुरकुटे, लक्ष्मणराव ढोबळे, पोपटराव गावडे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेले आपले राज्य असून या भूमीचा वसा आणि वारसा वाहणाऱ्यांची मोठी मांदियाळी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे काम आणि कर्तृत्व खूप मोठे होते. सर्वसामान्यांसाठी त्यांनी केलेला त्याग सर्वश्रुत आहे. त्या काळात जमीन महसूल, शेतसारा, चलन व्यवस्था, डाकसेवा यासारख्या व्यवस्था त्यांनी उभारल्या. शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या हितासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांनी जन्म घेतलेल्या या मातीचे आपल्यावर खूप मोठे ऋण असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

सर्वसामान्यांना न्याय देणारे हे सरकार असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, सर्वसामान्यांच्या हितासाठी शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य शासनाने “नमो शेतकरी सन्मान योजना” सुरू केली असून केंद्र सरकारचे सहा हजार व राज्य शासनाचे सहा हजार असे 12 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी तत्वावरील महामंडळासाठी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

अहिल्यादेवी होळकरांनी न्यायप्रिय शासन व्यवस्था निर्माण केली – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची ज्योत पेटवली. आपला आत्मभिमान, आत्मविश्वास व आत्मसन्मान जागृत करून हिंदवी स्वराज वाढवले. पुण्यश्लोक अहिल्यादेवीनी आपल्या कार्याच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याचा विस्तार संपूर्ण देशभर केला. न्यायप्रिय शासन व्यवस्था उभारून सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचे काम केले. अहिल्यादेवी होळकर यांचे राज्य परिवर्तनवादी व पुरोगामी होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी त्या काळात न्यायप्रिय शासन व्यवस्था निर्माण केली.त्यांनी राज्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच हुंडाबंदी, मद्यबंदी बाबत जागृतीचे काम केले. देशभरातील विविध मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांनी केला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्य शासनाने मेंढपाळांसाठी कर्ज योजना मंजूर करत त्यांच्यासाठी  पावसाळ्यात चराई रान राखून ठेवण्याचा निर्णय घेतला.राज्यातील धनगर वाड्यांना मुख्य रस्त्यांशी जोडण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली. धनगर समाजातील व्यक्तींसाठी दरवर्षी 25 हजार घरे बांधण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पालकमंत्री श्री. विखे पाटील, आमदार श्री. पडळकर यांचीही समयोचित भाषण झाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार प्रा. शिंदे यांनी केले.

यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील पुरस्कार विजेत्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

सर्वप्रथम मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच मान्यवरांनी परिसरात उभारण्यात आलेल्या शिल्पसृष्टीची पाहणीही केली.

प्रति थेंब अधिक पीक

शेती हा निसर्गाच्या भरवशावर चालणारा व्यवसाय आहेअसे म्हटले जाते. निसर्गाच्या बेभरवशावर मात करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या सिंचन व शेततळे यासारख्या योजना शेतकऱ्यांच्या मदतीला आल्या आहेत. राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक हे ध्येय घेऊन या योजना काम करतात. या योजनांची माहिती या लेखात देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना ठिबक सिंचन व मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना तुषार सिंचन या दोन्ही योजनांचा उद्देश सिंचनाखालील लागवडीयोग्य क्षेत्र वाढविणे, उपलब्ध पाण्याची कार्यक्षमता वाढविणे, पिकांच्या उत्पादनात व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे, हा आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व खातेदार शेतकरी पात्र लाभार्थी आहेत. मात्र, त्यांनी यापूर्वी त्याच क्षेत्रावर मागील ७ वर्षांत लाभ घेतलेला नसावा. यासाठी पाण्याचा स्त्रोत आवश्यक असून, ७/१२, ८ अ चा उतारा, संवर्ग प्रमाणपत्र (एससी, एसटीसाठी) ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

दोन्ही योजनांसाठी अनुदान : अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना खर्च मर्यादेच्या ८० % व इतर शेतकऱ्यांना खर्च मर्यादाच्या ७५% अनुदान देय आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेतून ५५% / ४५% व उर्वरित पूरक अनुदान मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना २५% / ३०% देय आहे.

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना ठिबक सिंचन योजनेची खर्च मर्यादा :  

अ.क्र अंतर (मि. मी. मध्ये) क्षेत्र 0.2 हे. क्षेत्र 0.4 हे. क्षेत्र 1 हे.
1 १.२ x ०.६ ३१४३६ रू. ५७२४१ रू. १२७५०१ रू.
2 १.८ x ०.६ २४५६९ रू. ४२९९२ रू. ९१५६० रू.
3 १.५ x १.५ २८१०६ रू. ४६९९५ रू. ९७२४५ रू.
4 ३ x ३ १५७९२ रू. २६१९० रू. ४७७५१ रू.

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना तुषार सिंचन खर्च मर्यादा :    

 

क्षेत्र पाईपचा व्यास (Pipe Dia) मि. मी. मध्ये
  63 75 90
0.4 हे.पर्यंत 13211 रू. लागू नाही लागू नाही
1 हे. पर्यंत 21588 रू. 24194 रू. 0
2 हे. पर्यंत 31167 रू. 34657 रू. 0
3 हे. पर्यंत लागू नाही लागू नाही 46779 रू.
4 हे. पर्यंत लागू नाही लागू नाही 58995 रू.
5 हे. पर्यंत लागू नाही लागू नाही 66789 रू.

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे –

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर किमान 0.60 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक असून, ती जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक आहे. अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी मागेल त्याला शेततळे, सामूहिक शेततळे अथवा भात खाचरातील बोडी किंवा इतर कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे या घटकाकरिता शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. या योजनेसाठी उपलब्ध अनुदानाच्या प्रमाणात संगणकीय प्रणालीतून होणाऱ्या सोडतीनुसार लाभ देण्यात येतो.

शेततळ्यासाठी आकारमान : या योजनेअंतर्गत शेततळ्याच्या आकारमानानुसार देय होणारी अनुदानाची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. अनुदानाची कमाल रक्कम रुपये 75000 इतकी राहील. त्यापेक्षा जास्त खर्च झाल्यास सदर अतिरीक्त खर्च संबंधित लाभार्थीने स्वतः करणे अनिवार्य राहील.

अर्ज सादर करण्याची पद्धत : अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून महाडीबीटी पोर्टलचे http://mahadbtmahit.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा, शेतकरी स्वतःचा मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र CSC ग्रामपंचायतमधील संग्राम केंद्र यासारख्या माध्यमातून संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतील.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण –

फलोत्पादन पिकांसाठी संरक्षित सिंचन सुविधा निर्माण करणे, दुष्काळी भागांमध्ये फलोत्पादन पिकांच्या क्षेत्र विस्तारासाठी सिंचन सुविधा निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश आहे. यासाठी मनरेगा, आरकेव्हीव्हाय, मागेल त्याला शेततळे, इतर योजना व स्वखर्चाने खोदकाम केलेल्या तळ्यांना प्लास्टीक अस्तरीकरण करणारे शेतकरी हे पात्र लाभार्थी आहेत. तर ७/१२, ८ अ, आधार कार्ड छायांकित प्रत, आधार संलग्न बँक खात्याचा पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत, संवर्ग प्रमाणपत्र (अनु.जाती व अनु.जमाती प्रवर्गाकरिता) ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

आकारमान व अनुदान

अ.क्र आकारमान प्रकल्प खर्च रक्कम रूपये अनुदान रक्कम रू.
१५x१५x३ ५६५५१/- २८२७५/-
२०x१५ x ३ ६३१९६/- ३१५९८/-
२०x२०x३ ८२४३६/- ४१२१८/-
२५x२०x३ ९९३४२/- ४९६७१/-
२५x२५ x ३ ११७३९९/ ५८७००/-
३०x२५ x ३ १३५४५७/- ६७७२८/-
३०x३०x३ १५६१२७/- ७५०००/-

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (सामूहिक शेततळे) –

फलोत्पादन व (फळे, फुले, भाजीपाला, मसाला पिके ई.) पिके असणारे संबंधित शेतकरी समूह या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत. त्यासाठी ७/१२, ८ अ चा नमुना, आधार कार्डची छायांकित प्रत, आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँक खाते पास बुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत, हमीपत्र, संवर्ग प्रमाणपत्र ( अनु. जाती व अनु. जमाती करिता ) ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

३४ x ३४ x ४.७० मीटर आकारमानाच्या सामूहिक शेततळ्यासाठी रक्कम रूपये ३.३९ लाख असे १०० टक्के अनुदान आहे. २४ × २४ × ४ मीटर आकारमानाच्या सामूहिक शेततळ्यासाठी रक्कम रूपये १.७५ लाख असे १०० टक्के अनुदान आहे.

अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क करावा.

(संकलन – उपमाहिती कार्यालयपंढरपूर)

ताज्या बातम्या

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ साजरा

0
मुंबई दि. 29 - स्वातंत्र्योत्तर काळात देशाचे आर्थिक नियोजन व सांख्यिकीय पध्दतीचा विकास यामध्ये विख्यात सांख्यिकी शास्त्रज्ञ प्रा. प्रशांत चंद्र महालनोबीस यांच्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल...

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाने जागतिक स्तरावर ओळख निर्माण करावी – सरन्यायाधीश भूषण गवई

0
नागपूर,दि.29 :  येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून यापुढील काळात उत्तम शैक्षणिक कामगिरी बजावण्यासह विधी क्षेत्रासाठी प्रतिभावंत विद्यार्थी घडवण्याची...

त्रिभाषा सूत्रासंदर्भात सांगोपांग अभ्यास करुन विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यासाठी डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती...

0
तृतीय भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द पावसाळी अधिवेशनात १२ विधेयके अधिवेशनात सविस्तर चर्चा करुन जनतेचे प्रश्न सोडविणार लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यासाठी ३६००...

बारामती येथील सायन्स अँड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर राज्याकरिता पथदर्शी ठरेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
बारामती, दि. २९: राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाच्या मदतीने ग्रामीण भागातील तरुणांना आधुनिक विज्ञानाची ओळख करुन देणाऱ्या सायन्स अँड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटरचा विद्यार्थ्यांना...

अन्न सुरक्षा हा सार्वजनिक आरोग्याचा पाया – जी. कमलावर्धन राव

0
मुंबई 29:- अन्न सुरक्षा हा सार्वजनिक आरोग्याचा पाया असून यामध्ये कोणतीही कसूर होऊ नये यासाठी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी कटाक्षाने व समन्वयपूर्वक काम करावे असे...