सोमवार, जून 30, 2025
Home Blog Page 1336

जून अखेर शिष्यवृत्ती वितरीत करा – पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी दि 1 (जिमाका):- येथील शिक्षण संस्थामधील महाविद्यालयीन तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृतीची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर येत्या 30 जून पर्यंत कशा पद्धतीने वितरीत करता येईल याचे सुयोग्य नियोजन संबंधित विभागाने करावे, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज शिष्यवृत्ती वाटपाबाबत आढावा बैठक घेण्यात आली.

ते पुढे म्हणाले सन 2022-23 या वर्षाकरिता शिष्यवृत्तीची रक्कम जमा आहे. या शिष्यवृतीमध्ये 60 टक्के केंद्राचा तर राज्य सरकारचा 40 टक्के इतका वाटा आहे, विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती न पाठविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. शिष्यवृत्तीपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही याची संबंधित यंत्रणेने दक्षता घ्यावी. याच्या अनुषंगाने 10 जूनपर्यंत संस्था चालक, प्राचार्य यांची बैठक घेण्यात यावी अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी केली

समाज कल्याण विभागाने शिष्यवृत्ती वाटपाच्या अनुषंगाने गुगलशीटमध्ये सर्व माहिती भरून ती यादी अद्ययावत करावी, अशी सूचना जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी केली.  या आढावा बैठकीसाठी अभिजित हेगशेट्ये अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी जे. पी जाधव, सहा आयुक्त (समाज कल्याण) यादव गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.) श्रीकांत व्हडे, (प्राथमिक) शिक्षणाधिकारी  सुनिता शिरभाते यांच्यासह  संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

——

पर्यटन, कृषी क्षेत्रासाठी जपानच्या सहकार्याचे स्वागतच – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि‌. १ :- जपान आणि महाराष्ट्राचे विविध क्षेत्रातील सहकार्य भारत -जपान सौहार्द संबंध आणखी दृढ करतील. त्यादृष्टीने जपानचे पर्यटन आणि कृषी क्षेत्रातील गुंतवणूक, उद्योग यांचे स्वागतच असेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

जपानचे भारतातील राजदूत सुझुकी हिरोशी यांच्या समवेतच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या भेटीप्रसंगी जपानच्या भारतातील दूतावास मंत्री श्रीमती हुकुगो क्योको, श्रीमती होम्मा मायू, दूतावास सचिव उसामी कोईची, मुंबईतील वाणिज्यिक दूतावास प्रमुख फुकाहोरी यासुकाटा, राजकीय सल्लागार विवेक कुलकर्णी तसेच राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी तथा राजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर-पाटणकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आदी उपस्थित होते.

या चर्चेत मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, भारत आणि जपानचे पूर्वापार चांगले संबंध आहेत. त्यातून दोन्ही देशाची अनेक क्षेत्रात उत्तम भागीदारी निर्माण झाली आहे. महाराष्ट्र हे भारतातील आघाडीचे राज्य आहे. महाराष्ट्राकडे उद्योग आणि गुतंवणुकीची दृष्टीने मोठी क्षमता आहे. राज्यातील विविध प्रकल्पांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही पाठबळ मिळत असते. बुलेट ट्रेन प्रकल्पाही आम्ही आता त्याच वेगाने गतीमान केले आहे. जपानकडे आधुनिक तंत्रज्ञान आहे. तर आमच्याकडे कुशल असे मनुष्यबळ आहे. त्यामुळे आपण एकत्र आलो तर खूप मोठा बदल घडवू शकतो. हे एमटीएचएल या भारतातील सर्वात लांबींच्या समुद्री सेतुचे उभारणीतून आपण दाखवून दिले आहे. महाराष्ट्रातील विविध औद्योगीक वसाहती आणि प्रकल्पांमध्ये जपानचे सहकार्य महत्वपूर्ण ठरू शकते. अशाच सहकार्यातून आपण मुंबई हे शहराला जगातील एक सर्वोत्तम शहर बनवू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील पर्यटन आणि कृषी क्षेत्रातील गुंतवणूक व उद्योग संधीसाठी जपानचे स्वागतच असेल असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात अजंठा लेणी परिसरात बुद्धीस्ट सर्कीट संकल्पनेतून पर्यटन सुविधा उभारल्याचेही माहिती दिली. तसेच राज्यातील विधिमंडळ सदस्यांनी नुकतीच जपानला भेट देऊन विविध क्षेत्रांची उपयुक्त माहिती घेतल्याचे सांगितले.


यावेळी चर्चेत जपानचे राजदूत श्री. हिरोशी यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा ‘स्ट्रांग लीडरशीप’ असा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले की, मुंबई विषयी आमच्याकडे मोठे कुतुहल आहे. महाराष्ट्रातही आम्हाला गुंतवणुकीच्या दृष्टीने मोठ्या संधी दृष्टीपथात आहेत. विशेषतः पर्यटन, वैद्यकीय क्षेत्र आणि कृषी या क्षेत्रातील आपल्याला एकत्र काम करता येईल. मुंबई आणि योकोहामा या शहराचे दृढ संबंध आहेत. सिस्टर सिटीज् म्हणून या दोन्ही शहरांमध्ये अदानप्रदानही सुरु आहे. या दोन्ही शहरांच्या विकासासाठी आम्हाला विविध संकल्पना राबवण्यात रस आहे. जपान-भारत संबंध आणि मुंबई-योकोहामा या दोन शहरांचे बंध दृढ व्हावेत यासाठी इन्डो-जपान सोसायटीच्यावतीने आगामी काळात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. एमटीएचएल हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प मुंबईचा कायापालट करणारा ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव श्री. कांबळे यांनीही दिल्ली-मुंबई कॉरिडॉर तसेच त्यावर विकसित करण्यात येणाऱ्या औद्योगिक नगरींची माहिती दिली. अतिरिक्त मुख्य सचिव श्री. गगराणी, श्रीमती म्हैसकर-पाटणकर, प्रधान सचिव श्री. सिंह यांनीही चर्चेत सहभाग घेतला.

जपानचे वाणिज्यीक दूतावास प्रमुख श्री. यासुकाटा यांनीही जपान आणि ‘जायका’च्या वित्तीय सहाय्यातून सुरु असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली.सुरवातीला मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जपानचे राजदूत श्री. हिरोशी यांचे हिमरू शाल आणि भगवान बुद्धांची प्रतिमा भेट देऊन स्वागत केले. श्री. हिरोशी यांनीही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना जपानी परंपरेतील एक वैशिष्ट्यपूर्ण वस्त्र भेट दिले.

000

नवी मुंबईतील घरांना मालमत्ता कर माफी देण्यासाठी प्रस्ताव सादर करावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि.१- मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफी देण्याकरिता नवी मुंबई महापालिकेने प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्या.

ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघातील विविध विषयांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला आमदार गणेश नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवासन, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की बारावी धरणाच्या प्रकल्पग्रस्तांना ज्याप्रमाणे कायमस्वरूपी नोकरी समाविष्ट करून घेण्यात आले त्याच धर्तीवर नवी मुंबई महापालिका आणि सिडको मध्ये कार्यरत प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. सिडकोतर्फे आकारण्यात येणाऱ्या अतिरिक्त भाडेपट्टा शुल्क भरण्यासाठी नागरिकांसाठी अभय योजना राबवावी अशाही सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. तसेच यावेळी मुख्यमंत्र्यांनी ऐरोली – कटाई उन्नत मार्गावर मुंबईच्या दिशेने येण्या आणि जाण्यासाठी मार्ग, पामबीच – घनसोली ऐरोली रस्त्याचे कामासह मतदारसंघातील विविध समस्या सोडवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या.

तसेच यावेळी बेलापूर मतदार संघातील विविध प्रश्नांबाबत आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी वाशी येथे होणारे महाराष्ट्र भवन उत्तमरित्या साकारावे. हे भवन राज्याच्या संस्कृतीचे ओळख करून देणारे असावे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

पंढरीच्या आषाढी वारीसाठी चोख नियोजन करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १ : – पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी चोख नियोजन करण्यात यावे. यंदा वारीसाठी अधिक गर्दी होऊ शकते. त्यामुळे वारकरी बांधवांना कोणतीही अडचण येऊ नये, याची काळजी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. वारीसाठी येणाऱ्या वाहनांना परतीच्या प्रवासासह टोल माफ करण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली. पंढरीत दर्शनासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना वेळेत दर्शन व्हावे यासाठी विशेष सुविधा करण्यात यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पंढरपूर आषाढी वारीसाठी निधीची कोणतीही कमतरता नाही. अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे नगरपालिकेसाठीच्या निधीत पाच वरून दहा कोटींची आणि ग्रामपंचायतींकरिता पंचवीस वरून पन्नास लाख रुपयांची अशी दुप्पट तरतूद केली आहे. याशिवाय रस्त्यांसाठीही वेगळा निधी दिला आहे. त्यामुळे रस्त्यांची परिस्थिती सुधारण्याबाबत काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

वारी मार्गावरील पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीना देण्यात येणारा निधी  दुप्पट केला आहे, हा निधी तत्काळ वितरीत करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. पंढरपूर आणि परिसरातील रस्ते वारीसाठी सुस्थितीत व्हावेत यासाठी १० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतून होणारी कामे वेळेत आणि दर्जेदार व्हावीत यासाठी मंत्रालयीन स्तरावरील नगर विकास विभागाच्या उपसचिवांनी प्रत्यक्ष पंढरपूर आणि क्षेत्रीयस्तरावर पोहचून देखरेख व संनियंत्रण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

पंढरीच्या आषाढीच्या वारीच्या अनुषंगाने तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली. बैठकीस महसूल मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह पुणे विभागीय आय़ुक्त सौरभ राव, अक्षय महाराज भोसले तसेच संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आदी वरिष्ठ अधिकारी दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, पालख्यांच्या प्रस्थानापूर्वीच वारीसाठीची सर्व सज्जता ठेवावी. यंदा वारीसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. वारी मार्गावर पाण्याच्या उपलब्धतेबाबत विशेष नियोजन करावे लागेल. कोणत्याही परिस्थितीत मनुष्यबळ, यंत्रसामुग्रीची कमतरता भासणार नाही, असे चोख नियोजन करावे. विभागातील आजुबाजुच्या महापालिका, जिल्हा परिषदा यांच्या यंत्रणाचीही मदत घ्यावी. वारी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी चांगल्या पद्धतीचे तंबू-निवारे उभे राहतील, पंखे आणि सावली याकरिता काळजी घ्यावी. वैद्यकीय पथके त्यातील तज्ज्ञ आणि रुग्णवाहिका यांचीही सज्जता ठेवावी. औषधे, पिण्याचे पाणी, अन्य आरोग्य सुविधा याबाबत वेळीच नियोजन करावे. पंढरपूरमधील रस्त्यांसाठी निधी दिला आहे. त्यातून पंढरपूर नगरपालिका आणि आजुबाजुच्या रस्त्यांचे डांबरीकरण करावे. त्यामध्ये नगरपालिकेचा रस्ता, ग्रामपंचायतीचा रस्ता असे हद्दीच्या विषयातून रस्त्यांची कामे मागे ठेवू नका. कोणत्याही परिस्थितीत रस्त्यांवर चिखल दिसता कामा नये याची दक्षता घ्यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पालखी मार्गासह वारीत येणाऱ्या वाहनांना टोल माफ करण्याबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी विशेष व्यवस्था करण्याचे निर्देशही संबंधित जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना दिले. ते म्हणाले की, वारीत सहभागी होणाऱ्या वाहनांना टोल द्यावा लागू नये यासाठी पोलीस विभागाने स्टीकर्स किंवा पासेसच्या माध्यमतून कार्यवाही करावी. टोल नाक्यांवर विशेष व्यवस्था करून, वारकऱ्यांना टोल द्यावा लागू नये असे नियोजन करावे. पालखी मार्गावरील टोल नाके सुरु होणार नाहीत. त्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधून त्यांना याबाबत कल्पना दिल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

जी-२० चे प्रतिनिधी मंडळ अनुभवणार वारी..

जी-२० चे प्रतिनिधी मंडळ आषाढी वारीच्या काळात पुण्यात येणार आहे. त्यांना पंढरपुरची वारी आणि त्या अनुषंगाने या संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. या प्रतिनिधींना आपल्या संस्कृतीतील या वैशिष्ट्यपूर्ण अशा वारीचे दर्शन घडवावे, त्यासाठी उत्तम नियोजन करावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत मंत्री श्री. विखे-पाटील, चंद्रकांत पाटील यांनीही सहभाग घेतला. वारीच्या नियोजनासाठी पालखी मार्ग आणि पंढरपूरसह, वारी मार्गावरील विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन नियोजनाची पाहणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

बैठकीत पुणे विभागीय आयुक्त श्री. राव यांनी पालखी मार्ग तसेच वारीच्या दृष्टीने करण्यात आलेल्या तयारीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यावर्षी वारीकरिता ६० टक्क्यांनी अधिकचे मनुष्यबळ तसेच पाण्याकरिता टँकर्सची संख्याही दुप्पट करण्यात येत असल्याची माहिती श्री. राव यांनी दिली. महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या सहकार्याने नियोजन करण्यात येत असल्याची माहिती दिली.

बैठकीस नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, नगर विकास विभागाच्या सचिव सोनिया सेठी, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन- नैनुटिया आदी उपस्थित होते.

०००

शिवविचारांचा जागर जगभर पोहोचणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. १ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त  राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने विशेष बोधचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज लोकर्पित करण्यात आले. वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमासाठी हे बोधचिन्ह वापरण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी उपस्थित होते. मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने हे बोधचिन्ह तयार करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी बोधचिन्हाचे कौतुक करुन शुभेच्छा व्यक्त केल्या.

 

शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्ष सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा जागर पुन्हा मराठी मनांमनात व्हावा, जगभरात जिथे – जिथे मराठी माणूस आहे तिथे या कार्यक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पोहोचावेत यासाठी राज्य शासनाने विविध  कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यासाठी खास हा लोगो (बोधचिन्ह) वापरण्यात येणार आहे.

शिवकालीन मंगल चिन्हे आणि महाराजांचा पराक्रम, शौर्य अधोरेखित करणारे संदर्भ या बोध चिन्हाचे वैशिष्ट्य असून राज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे सुनील कदम यांनी हे बोधचिन्ह तयार केले आहे. जगातील कानाकोपऱ्यात राहणारा प्रत्येक शिवप्रेमी या माध्यमातून जोडला जावा आणि महाराजांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा राज्य शासनाचा संकल्प आहे, असे यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. यावेळी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

000

दीपक चव्हाण/विसंअ/

सर्वांनी मिळून स्वच्छ, आरोग्यदायी मुंबई बनवूया – पालकमंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. १ : “आपण सर्वांनी एकत्र येऊन स्वच्छ, आरोग्यदायी मुंबई बनविण्याचा प्रयत्न करू या”, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमांतर्गत पालकमंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते स्थानिक लाभार्थ्यांना एकाच छताखाली शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

मुंबई शहर जिल्ह्यातील माटुंगा (प) येथील सिटी ऑफ लॉस एंजेलिस शाळेत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आयोजित या कार्यक्रमात स्थानिक आमदार सदा सरवणकर, जिल्हाधिकारी राजीव निवतकर, जिल्हा नियोजन अधिकारी जी.बी.सुपेकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले, शासनामार्फत नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. तथापि या योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे असते. त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. मुंबई शहरात विविध घटकांतील रहिवाशांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. युवकांसाठी रोजगार, महिलांच्या हाताला काम, आरोग्यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, कोळीवाड्यांसाठी फूड कोर्ट, ज्येष्ठ नागरिकांसाठी डे केअर सेंटर आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मुंबई शहरातील उंदिरांची संख्या कमी करण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या.

आमदार सदा सरवणकर यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रमांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश असल्याचे सांगितले. तर जिल्हाधिकारी श्री. निवतकर यांनी प्रास्ताविकाद्वारे विविध योजनांबाबत माहिती दिली. अशाच प्रकारचा उपक्रम दर महिन्याला आयोजित करून वंचित घटकांपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले.

कल्याणकारी राज्यव्यवस्थेच्या माध्यमातून राज्यातील सर्व नागरिकांच्या आर्थिक आणि सामाजिक कल्याण व सुरक्षेला प्राधान्य दिले जाते. या अनुषंगाने शासनस्तरावर जनकल्याणाच्या अनेक योजना घोषित करण्यात आल्या आहेत. शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबविण्याचे शासनाने ठरविले आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांना शासकीय योजनांशी निगडीत कार्यालयांचे प्रतिनिधी तसेच विविध दस्तऐवज उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ दिले जात आहेत.

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाद्वारे प्रामुख्याने दिव्यांगांना साहित्य वितरण, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत प्रमाणपत्र तसेच हयातीचा दाखला भरून घेणे, मतदार ओळखपत्र, बचत गटांना प्रमाणपत्र, अनाथ बालकांना प्रमाणपत्र, घरेलु सन्मानधन योजनेअंतर्गत धनादेश, शिधापत्रिका, शैक्षणिक कर्ज प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, आधारकार्ड वाटप तृतीयपंथीयांना प्रमाणपत्र वितरण आदी योजनांचा लाभ एकाच छताखाली प्रातिनिधिक स्वरूपात देण्यात आला.

000

बी.सी.झंवर/विसंअ/

मुंबईची पारंपरिक संस्कृती जतन करणार – पालकमंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. १ : मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर आहे. येथे अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे आहेत. या सर्व परिसराचे सुशोभिकरण करून पर्यटनाच्या दृष्टीने सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. या कामांच्या प्रगतीचा शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आढावा घेतला. या प्रकल्पांच्या माध्यमातून मुंबईची पारंपरिक संस्कृती जतन केली जाणार असून ही कामे कालबद्ध कार्यक्रम आखून पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

मुंबई शहरातील महत्त्वाच्या प्रकल्पांच्या सुशोभिकरणाच्या कामांच्या सद्यस्थितीचा पालकमंत्री श्री. केसरकर यांनी मंत्रालयात आढावा घेतला. यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेसह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.केसरकर म्हणाले, मुंबईमध्ये पर्यटन वाढीसाठी मोठी क्षमता आहे. महत्त्वाच्या प्रकल्पांच्या सुशोभिकरणाची जी कामे सुरू आहेत ती पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावीत. तसेच ज्या कामांच्या प्रस्तावांना अंतिम मंजुरी आवश्यक आहे ती तातडीने घ्यावी.

मुंबईतील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर, मुंबादेवी मंदिर, हाजीअली दर्गा, कोळीवाडे, माहिम रेती बंदर ते दादर चौपाटीपर्यंत सी साईड वॉक वे, वरळी समुद्र किनाऱ्यावरील इमारतींवर लाईट आणि लेझरद्वारे रोषणाई, तेथील सुशोभीकरण, शिवतीर्थ येथील परिसराचे सुशोभीकरण, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांच्या इमारतींची दुरूस्ती आणि सुशोभीकरण, खोताची वाडी येथे पारंपरिक पद्धतीने जतन आणि संवर्धन आदी प्रकल्पांबाबत या बैठकीत सादरीकरण करण्यात आले.

000

बी.सी.झंवर/विसंअ/

राजभवनात प्रथमच ‘तेलंगणा राज्य स्थापना दिन’ साजरा होणार

मुंबई, दि. १ : ‘एक भारत – श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून यंदा प्रथमच राजभवन येथे ‘तेलंगणा राज्य स्थापना दिन’ साजरा केला जाणार आहे.

राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. २ जून) सायंकाळी ५.३० वाजता  तेलंगणा राज्य स्थापना दिनानिमित्त एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

२ जून हा तेलंगणा राज्य स्थापना दिवस देशातील सर्व राजभवनांमध्ये साजरा केला जाणार आहे.  दिनांक २ जून २०१४ रोजी तेलंगणा राज्याची स्थापना करण्यात आली होती.

राजभवन येथे होणाऱ्या कार्यक्रमात ‘जय जय हे तेलंगणा’ नृत्य, ‘बथकम्मा’ व ‘बोनालू’ नृत्याचे सादरीकरण केले जाणार आहे. देशातील सर्व राज्यांच्या सांस्कृतिक परंपरा याविषयी माहिती व्हावी हा आयोजनामागचा उद्देश आहे.

राजभवन तसेच तेलंगणा शासन व फेडरेशन ऑफ तेलुगू असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (F – TAM) यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

०००

 

Maharashtra Raj Bhavan to celebrate

‘Telangana State Formation Day’ on Friday

 

Maharashtra Raj Bhavan will be celebrating the ‘Telangana State Formation Day’ at Raj Bhavan Mumbai at 5.30 pm on Friday (2 June).

Maharashtra Governor Ramesh Bais will preside over the cultural programme.

This is for the first time that Maharashtra Raj Bhavan will be hosting the ‘Telangana State Formation Day’ function. The Telangana State was formed on 2 June 2014.

The Telangana State Formation Day is being celebrated in all Raj Bhavans in the country as part of the ‘Ek Bharat Shreshtha Bharat’ initiative. The objective of the programme is to promote harmony and understanding among people about the cultural traditions and languages of other States.

The programme at Maharashtra Raj Bhavan is being organised in association with ‘Government of Telangana’ and the Federation of Telugu Associations of Maharashtra (F – TAM).

000

मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेंतर्गत इमारत पुनर्विकास धोरणाबाबत शासन निर्णय निर्गमित

मुंबई दि. १ : मागासवर्गीय व्यक्तींना घरे उपलब्ध करून देण्यासाठी मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेअंतर्गत इमारतींचे पुनर्विकास धोरण जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. याबाबतचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णय 31 मे 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थांनी त्यांना दिलेल्या भूखंडावर इमारतींचे बांधकाम करुन आता ५० ते ६० वर्षांचा कालावधी झाला असून या इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. त्यामुळे या इमारतींचा पुनर्विकास  होणे आवश्यक होते. आता अशा इमारतींच्या पुनर्विकासाबाबत नव्या धोरणाप्रमाणे कार्यवाही केली जाईल.

मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था (Post war rehabilitation – २१९ ) अंतर्गत येणाऱ्या इमारतींचा पुनर्विकास सुसाध्य व व्यवहार्य होण्यासाठी  अशा संस्थांमध्ये मूळ सभासदांच्या बाबतीत ९० टक्के मागासवर्गीय व १० टक्के अमागासवर्गीय हे प्रमाण जैसे थे ठेवून पुनर्विकासानंतर त्या जागेवर ज्या अतिरिक्त सदनिका तयार होतील. त्या अतिरिक्त सदनिकांमध्ये मागासवर्गीयांचे प्रमाण २० टक्के व अमागासवर्गीयांचे प्रमाण ८० टक्के राहील. कोणत्याही परिस्थितीत पुर्नविकासानंतर तयार झालेल्या अतिरिक्त सदनिकांमध्ये मागासवर्गीयांचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा कमी राहणार नाही व अमागासवर्गीयांचे प्रमाण ८० टक्क्यांपेक्षा जास्त राहणार नाही.

पुनर्विकासानंतर २०% मागासवर्गीय सभासदांसाठी आरक्षित केलेल्या सदनिका / गाळे यांची विक्री ही मागासवर्गीय सदस्यांसाठी करताना महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA) मार्फत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (MHADA) निश्चित केलेल्या दराप्रमाणे उच्च उत्पन्न गट (HIG) व मध्यम उत्पन्न गट (MIG) यानुसार तेथील जागा व इमारतीच्या आकारावर अवलंबून असेल त्याप्रमाणे दर आकारण्यात येतील. पुनर्विकासानंतर तयार होणान्या इमारतींमध्ये मागासवर्गीय सभासदांना देण्यात येणाऱ्या सदनिका व खुल्या प्रवर्गातील सभासदांना देण्यात येणाऱ्या सदनिका या सारख्याच दर्जाच्या व समान सोयी-सुविधांयुक्त असणे बंधनकारक आहे. मागासवर्गीय सभासदांकरिता वेगळी व खुल्या प्रवर्गातील सभासदांकरिता वेगळी इमारत करण्यात येऊ नये. यासर्व बाबींची दक्षता घेण्याची जबाबदारी विकासकावर बंधनकारक राहील, असेही या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

००००

शैलजा देशमुख/विसंअ/

 

आषाढी एकादशी पालखीमार्गात भाविकांना स्वच्छता – सुविधांसाठी ग्रामविकास विभागाकडून २१ कोटी रुपये – ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीष महाजन

मुंबई, दि. १ : आषाढी एकादशी निमित्त पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांतून मार्गक्रमण करणाऱ्या विविध संतांच्या पालख्यांसोबत असणाऱ्या भाविकांना स्वच्छता – सुविधा पुरविण्यासाठी मुक्कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था करण्याच्या कामांसाठी २१ कोटी रूपये निधीस  मंजुरी देण्यात आली असल्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी दरवर्षी पायी चालत पंढरपूरला जात असतात, यामध्ये विविध दिंड्यांचाही सहभाग असतो.पालखी सोहळ्यात अनेक ठिकाणी मुक्काम केला जातो. या ठिकाणी वारकऱ्यांना शासनाच्या वतीने सोयी सुविधा मिळाव्यात, यासाठी ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून ही तरतूद करण्यात आली आहे.

पालखी सोहळ्यातील संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत सोपान काका महाराज या प्रमुख पालख्यांचा प्रवास जवळपास २२ दिवसांपेक्षा जास्त दिवसांचा असतो. वारकऱ्यांना मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.

ग्रामपंचायतींना निर्मल वारीसाठी ४ कोटी २१ लाख रुपये

सोलापूर, पुणे व सातारा जिल्ह्यातील पालखी मार्गातील ग्रामपंचायतींना निर्मल वारीसाठी ४ कोटी २१ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यामध्ये वारी ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमधून जाणार आहे, त्या ग्रामपंचायतीतील स्वच्छता राखणे व भाविकांना सुविधा पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचातींवर असणार आहे.

पुणे जिल्हा परिषदेला १७ कोटी ६४ लाख रुपये निधीस मान्यता

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, या निधी मधून संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकोबाराय व संत सोपान देव या पालख्यांसोबत असणाऱ्या भाविकांसाठी तात्पुरते शौचालय, निवारा व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद, पुणे यांनी चालू वर्षात आषाढी वारीनिमित्त शासनास सादर केलेल्या १७ कोटी ६४ लाख रुपये इतक्या निधीच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.

000

राजू धोत्रे/वि.सं.अ.

 

ताज्या बातम्या

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ साजरा

0
मुंबई दि. 29 - स्वातंत्र्योत्तर काळात देशाचे आर्थिक नियोजन व सांख्यिकीय पध्दतीचा विकास यामध्ये विख्यात सांख्यिकी शास्त्रज्ञ प्रा. प्रशांत चंद्र महालनोबीस यांच्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल...

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाने जागतिक स्तरावर ओळख निर्माण करावी – सरन्यायाधीश भूषण गवई

0
नागपूर,दि.29 :  येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून यापुढील काळात उत्तम शैक्षणिक कामगिरी बजावण्यासह विधी क्षेत्रासाठी प्रतिभावंत विद्यार्थी घडवण्याची...

त्रिभाषा सूत्रासंदर्भात सांगोपांग अभ्यास करुन विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यासाठी डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती...

0
तृतीय भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द पावसाळी अधिवेशनात १२ विधेयके अधिवेशनात सविस्तर चर्चा करुन जनतेचे प्रश्न सोडविणार लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यासाठी ३६००...

बारामती येथील सायन्स अँड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर राज्याकरिता पथदर्शी ठरेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
बारामती, दि. २९: राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाच्या मदतीने ग्रामीण भागातील तरुणांना आधुनिक विज्ञानाची ओळख करुन देणाऱ्या सायन्स अँड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटरचा विद्यार्थ्यांना...

अन्न सुरक्षा हा सार्वजनिक आरोग्याचा पाया – जी. कमलावर्धन राव

0
मुंबई 29:- अन्न सुरक्षा हा सार्वजनिक आरोग्याचा पाया असून यामध्ये कोणतीही कसूर होऊ नये यासाठी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी कटाक्षाने व समन्वयपूर्वक काम करावे असे...