शुक्रवार, जून 27, 2025
Home Blog Page 1321

‘दिव्यांगांच्या दारी’ अभियानाचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्या शुभारंभ

मुंबई, दि. ६ : दिव्यांगांच्या विविध कल्याणकारी योजना थेट दिव्यांगांच्या दारी पोहचविण्यासाठी शासन स्तरावरून दिव्यांग कल्याण विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी या अभियानाचा उद्या बुधवार दिनांक ७ जून २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते शुभारंभ होणार आहे.

या कार्यक्रमास सामाजिक न्याय व अधिकारिता विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन आणि कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बाल विकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक (मंत्री दर्जा) आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, खासदार गजानन कीर्तिकर, आमदार श्रीमती विद्या ठाकूर उपस्थित राहणार आहेत.

दिव्यागांचे शिबीर दिनांक ७ जून २०२३ बुधवार रोजी, वेळ सकाळी १०:०० ते ०३:०० स्थळ:- हॉल क्र. ५, नेस्को एक्झीबीशन अॅण्ड ट्रेड सेंटर, गोरेगांव (पूर्व) मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे.

मुंबई महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय व इतर शासकीय कार्यालये, विविध महामंडळे व इतर संस्था यांच्याकडून दिव्यांगांना आवश्यक असणारी प्रमाणपत्रे, रोजगार नोंदणी तसेच त्यांचे प्रश्न सोडविण्याकरीता त्यांच्या मागण्या घेऊन त्यांच्या सोयीकरिता उपकरणे व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत व त्या मागण्यांची नोंद करुन घेण्यात येणार आहे. दिव्यांगांनी सोबत येताना दिव्यांग प्रमाणपत्र, यूडीआयडी (UDID) कार्ड व आधार कार्ड घेऊन यावे, असे आवाहन दिव्यांग कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.

****

शैलजा पाटील/विसंअ/

राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंगमध्ये महाराष्ट्रातील ६७ शैक्षणिक संस्थांचा समावेश

नवी दिल्ली, 6 : भारतातील उच्च शिक्षण संस्थांच्या मानांकनाचा सन 2023 चा अहवाल केंद्रीय शिक्षण आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री डॉ.राजकुमार रंजन सिंग यांनी सोमवारी  जाहीर केला.

शिक्षण आणि संसाधने, शोध आणि व्यावसायिक कार्यप्रणाली, पदवी परिणाम, संपर्क आणि समावेशिता, कल्पना या मापदंडांवर एकूण 13 श्रेणींमध्ये  सर्वोत्कृष्ट 850 संस्थांची यादी जाहीर करण्यात आली  आहे. यात राष्ट्रीय संस्थात्मक रॅकिंगमध्ये महाराष्ट्रातील 67 शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे.

सर्वोत्कृष्ट समग्र संस्थांमध्ये महाराष्ट्राच्या  11  संस्था

संस्थात्मक रँकिंगच्या यादीत देशातील 100 शैक्षणिक संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 11 शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे या क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे तर होमी भाभा राष्ट्रीय संस्था,मुंबई  30 व्या स्थानावर आहे. पुणे येथील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन या संस्थेस 34 वे  स्थान मिळाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (35), रासायनिक तंत्रज्ञान संस्था-मुंबई(41), सिम्बायोसिस इंटरनॅशनल – पुणे (59), डॉ.दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था- वर्धा  (75), डॉ .डी.वाय.पाटील विद्यापीठ – पुणे (81), विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी- नागपूर  (82), नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (88),  मुंबई विद्यापीठ – मुंबई  (96)

 विद्यापीठ रँकिंग मध्ये राज्यातील 10 विद्यापीठे

देशातल्या 100 सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये महाराष्ट्रातील 10 विद्यापीठांचा समावेश आहे. होमी भाभा राष्ट्रीय संस्था- मुंबई  हे विद्यापीठ रँकिंगमध्ये 17 व्या स्थानावर आहे. पुणे  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ  या विद्यापीठास 19 वे स्थान मिळाले आहे, तर रासायनिक तंत्रज्ञान संस्था, मुंबई ला 23 वी रँकिंग देण्यात आली आहे.  सिम्बायोसिस इंटरनॅशनल –पुणे  (32), दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था –वर्धा (39), डॉ .डी.वाय.पाटील विद्यापीठातील–पुणे (46), एस.व्ही.के.एम नरसी मॉन्जी इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज –मुंबई  (47), मुंबई विद्यापीठ –मुंबई (56),  भारती विद्यापीठ – पुणे (91),  आणि मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस  98 व्या क्रमांकावर  आहे.

संशोधन संस्थांच्या रॅकिंग मध्ये राज्यातील 5 संस्था

संशोधन संस्थांच्या रँकिंग मध्ये देशातील 50 संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 5 संस्थांचा समावेश आहे. मुंबई इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे 4  व्या स्थानावर आहे . तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च – मुंबई 10  व्या स्थानावर असून होमी भाभा राष्ट्रीय संस्था – मुंबई 15 व्या , भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे  27व्या आणि इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी- मुंबई  37 व्या स्थानावर आहे.

अभियांत्रिकी संस्थांच्या रँकिंगमध्ये राज्यातील 8 संस्था

अभियांत्रिकी शिक्षण संस्थेच्या रँकिंग मध्ये देशातील 100 अभियांत्रिकी संस्थांमध्ये महाराष्ट्रातील  8 संस्थांचा समावेश आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे ही संस्था तिसऱ्या क्रमांकावर तर मुंबई स्थित इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी संस्थेला 37 वे स्थान मिळाले आहे. नागपूरच्या विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला 41 वी रँकिंग प्राप्त झाली आहे. डिफेंस इन्स्टिटयूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी-पुणे (57), तर कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग- पुणे (73) क्रमांकावर आहे.

महाविद्यालयांच्या रॅकिंगमध्ये राज्यातील तीन महाविद्यालये

महाविद्यालयांच्या रँकिंग मध्ये देशातील 100 महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रातील तीन महाविद्यालयांचा समावेश आहे. मुंबई येथील कॉलेज ऑफ सोशल वर्क निर्मला निकेतन 57 व्या स्थानावर आहे . तर पुण्यातील  फर्ग्युसन कॉलेज (स्वायत्त) 79 व्या आणि नागपूर येथील शासकीय विज्ञान संस्था 83 व्या स्थानावर आहे.

उत्कृष्ट व्यवस्थापन संस्थांमध्ये राज्यातील 9 व्यवस्थापन संस्था

देशातील 100 उत्कृष्ट व्यवस्थापन संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 9  संस्थांचा समावेश आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, मुंबई ही संस्था 7 व्या स्थानावर तर मुंबईची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी 10 व्या स्थानावर आहे. सिंबायोसीस इस्टिटयूट ऑफ बिजनेस मॅनेजमेंट-पुणे (17),  आणि एस.व्ही.के.एम नरसी मोन्जी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज –मुंबई (20) ,  SVKM  नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज- मुंबई (21) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट – नागपूर (43), के.जे.सोमय्या इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च –मुंबई(45), प्राचार्य एल एन वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च –मुंबई (73)  आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट –पुणे (76)

औषधीय संस्थांमध्ये राज्यातील 18 संस्था

देशातल्या उत्कृष्ट 100 औषधीय संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 16  संस्थांचा समावेश आहे. पहिल्या 10 औषधीय संस्थांमध्ये मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीने पाचव्या क्रमांकावर नाव कोरले. एस.व्ही.के.एम नरसी मोन्जी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज-मुंबई  11 व्या स्थानावर तर पुना कॉलेज ऑफ फार्मसी 29 व्या स्थानावर आहे. एसव्हीकेएम डॉ. भानुबेन नानावटी एज्युकेशन ऑफ फार्मसी –मुंबई(38), डॉ. डी.वाय. पाटील   इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासीट्युकल सायन्स अँड रिसर्च –पुणे  (45, आर.सी.पटेल इन्स्टिटयूट ऑफ फार्मासीटयुकल एज्युकेशन अँड रिसर्च –शिरपूर  (50), राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ -नागपूर(51), बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी –मुंबई (55), श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी –नागपूर (68), भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ फार्मसी –नवी मुंबई  (79), वाय.बी.चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी –औरंगाबाद  (80), प्रिन्सिपल के.एम. कुंदनानी कॉलेज ऑफ फार्मसी-मुंबई (91), ए.आय.एस.एस.एम.एस. कॉलेज ऑफ फार्मसी-पुणे (93), डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी -पुणे (94), सी.यू.शाह कॉलेज ऑफ फार्मसी-मुंबई (95), आणि मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी- पुणे 96 व्या स्थानावर आहे.

वैद्यकीय महाविद्यालयांच्या रॅकिंगमध्ये 2 महाविद्यालय

वैद्यकीय महाविद्यालयांच्या रँकिंग मध्ये देशातील 40 महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रातील दोन महाविद्यालयांचा समावेश आहे. पुणे येथील डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठ 15व्या स्थानावर आहेत तर दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था, वर्धा 25व्या स्थानावर आहे.

दंत महाविद्यालयांच्या रॅकिंगमध्ये 7 महाविद्यालय

दंत महाविद्यालयांच्या रँकिंग मध्ये देशातील 40 महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रातील सात महाविद्यालयांचा समावेश आहे. पुणे येथील डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठ तिस-या स्थानावर आहे. शासकीय दंत महाविद्यालय, नागपूर 15व्या स्थानावर आहे.   दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था-वर्धा (17), नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज-मुंबई (19), शासकीय दंत महाविद्यालय-मुंबई (29), पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ –मुंबई (38) आणि भारती विद्यापीठ (डिम्ड युनिव्हर्सिटी) डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल-पुणे  39 व्या स्थानावर आहे.

देशातील 30 सर्वोत्कृष्ट विधी महाविद्यालयांमध्ये राज्यातील पुण्याच्या सिम्बायोसिस विधी माहाविद्यालयाला 6 वे रँकिंग प्राप्त झाले आहे. देशातील 30 सर्वोत्कृष्ट वास्तुकला आणि नियोजन महाविद्यालयांमध्ये विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर 12 वा क्रमांक पटकाविला आहे.  कृषी आणि संबंधित क्षेत्रे या श्रेणीमध्ये सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, फिशरीज युनिव्हर्सिटी-मुंबई 7 व्या क्रमांकावर तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी 36व्या क्रमांकावर आहे. तसेच नाविन्य श्रेणीमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई 7 व्या क्रमांकावर आहे.

0000

अमरज्योत कौर अरोरा/वृत्त क्र.99 /6.6.2023

शिवराज्याभिषेक  दिनाच्या ३५० व्या वर्ष सोहळ्यानिमित्त विशेष टपाल तिकिटाचे अनावरण

मुंबई, दि. ६ : लोककल्याणकारी राजे छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण भारताचे महानायक होते. महाराजांच्या राज्याभिषेक  दिनाच्या ३५० व्या वर्ष सोहळ्यानिमित्त सुवर्ण आणि रौप्य मुद्रा काढण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

सांस्कृतिक कार्य विभाग आणि राजभवन, महाराष्ट्र यांच्यावतीने ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त विशेष टपाल तिकिटाचे अनावरण राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर,सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे,  राज्यपाल महोदयांचे प्रधान सचिव संतोषकुमार, मुंबई परिक्षेत्राच्या पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.

राज्यपाल श्री. बैस म्हणाले की,  छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचा दूरदर्शीपणा,  न्यायप्रियता, सर्वसामान्यांना न्याय देणारे आणि त्यांच्यात नवचेतना जागवणारे राजे होते.  स्वतःचे आरमार तयार करून त्यांनी  स्वराज्याच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली. त्यांचाच आदर्श घेऊन महाराष्ट्रातून विविध नेत्यांनी स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व केले.  त्यांच्या काळातील गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी प्रयत्न व्हावेत तसेच  १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य निर्मिती वेळी विशेष सुवर्ण आणि रौप्य पदक काढण्यात आले होते. आता राज्याभिषेक  दिनाच्या ३५० व्या वर्ष सोहळ्यानिमित्त  तसे प्रयत्न व्हावेत, असे ते म्हणाले.

विशेष टपाल तिकीट हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला वंदन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की,  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिन वर्षानिमित्त विशेष टपाल तिकिट अनावरण हे महाराजांच्या कर्तृत्वाला वंदन आहे.  महाराजांनी रयतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी राज्याभिषेक केला. लोकांच्या कल्याणासाठी काम करण्याचा त्यांनी घालून दिलेल्या आदर्श समोर ठेवून राज्य शासन काम करत आहेत. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना विविध लाभ देत आहोत. रायगडाचे जतन, संवर्धन करतोय. त्यासोबत शिवसृष्टीसाठी ५० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला. राज्यातील गड किल्ल्याच्या जतनासाठी प्राधान्य देत आहे. त्यासाठी जे काही आवश्यक आहे, ते सर्व करणार असल्याचे ते म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिन सोहळ्याला किल्ले रायगडावर उपस्थित राहता आले हे भाग्य आहे.  छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजा, कुशल संघटक, कुशल प्रशासक होते. ते असामान्य युगपुरुष होते.  त्यांच्याबरोबर जीवाला जीव देणारे मावळे होते. त्यामुळे त्यांनी इतिहास घडवला, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

राज्य शासन सातासमुद्रपार छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पोहोचवण्याचे काम करीत आहे. येत्या वर्षभरात त्यासाठी विविध कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्याचा कारभार करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत.  राज्य शासनाने सर्व निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे घेतल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

ते म्हणाले, औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजी नगर असे केले. कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. कष्टकरी, शेतकरी, महिला या घटकांना मदतीची भूमिका राज्य शासनाने  घेतली आहे. राज्यातील २९ सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली त्यामुळे सहा लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देणारे काम राज्य शासन करत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर राज्याची वाटचाल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, आजच्या दिवशी विशेष टपाल तिकिट निघतेय ही आनंदाची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. अनेक जण मुघलांचे मांडलिकत्व पत्करून काम करीत असताना त्याकाळी छत्रपतींनी स्वकियांसाठी  स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात आणले.

ते म्हणाले की, साडेतीनशे वर्षांपूर्वी हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. त्यानंतर मराठी माणूस थांबलाच नाही. मराठी साम्राज्याचा अटकेपार झेंडा फडकवत ठेवण्याचे काम त्याकाळी झाले. छत्रपतींनी बीजारोपण केलेल्या विचारांमुळे आज देशात महाराष्ट्र प्रगत राज्य आहे. आपल्याला शक्ती, ऊर्जा देणारे नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर ‘टॉकिंग बुक’  सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, जगातील १९३ देशात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पोहोचवण्याचा संकल्प दिन  या राज्याभिषेक सोहळा वर्षाच्या निमित्ताने आपण केला आहे. आमच्या विभागाने वर्षभरात विविध कार्यक्रम करण्याचे नियोजन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘टॉकिंग बुक ‘ (Talking book) आपण करत आहोत. देशासह जगाच्या विविध भागात आज राज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे, जगदंब तलवार भारतात परत आणण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे, शिवकालीन नाणी संग्राहक प्रवीण मोहिते, इतिहास अभ्यासक सुनील कदम यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री. खारगे यांनी केले. यावेळी श्रीमती पांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. आज प्रकाशित करण्यात आलेल्या विशेष टपाल तिकीटाची किंमत पाच रुपये इतकी असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेका वेळी असलेले सुवर्ण चलन होन हे या टपाल तिकिटावर घेण्यात आले आहे.  विशेष म्हणजे केवळ सहा दिवसात ही टपाल तिकिट प्रकाशित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

या विशेष टपाल तिकिट अनावरण कार्यक्रमानंतर शिववंदना हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.

000

दीपक चव्हाण/पवन राठोड/विसंअ

Governor releases postage stamp on 350th year of Coronation of Chhatrapati Shivaji Maharaj

 

Maharashtra Governor Ramesh Bais released a special postage stamp on the occasion of the 350th Year of the Coronation of Chhatrapati Shivaji Maharaj at Raj Bhavan, Mumbai on Tue (6 June).

Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Speaker Rahul Narwekar, Minister of Culture Sudhir Mungantiwar, Ministers Mangal Prabhat Lodha, Deepak Kesarkar and Dadaji Bhuse, Principal Secretary, Culture Vikas Kharge, Postmaster General, Mumbai Region Swati Pandey  and senior officers were present.

A cultural programme ‘Shiv Vandana’ depicting the life and work of Chhatrapati Shivaji Maharaj and his Coronation Ceremony was presented on the occasion.

००००

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त ‘दिलखुलास’ कार्यक्रमात अमित वाडेकर यांचे व्याख्यान

मुंबई, दि. 6 : राज्य शासनाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने ‘दिलखुलास’ कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचे शेती, सिंचन विषयक धोरण या विषयावरील वनराई मासिकचे कार्यकारी संपादक अमित वाडेकर  यांचे व्याख्यान  प्रसारित होणार आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून हे व्याख्यान बुधवार दि.7, गुरुवार दि. 8 आणि शुक्रवार दि. 9 जून 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे.

0000

 

त्रिलोकेश फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून मंगेश पाटील यांची गगन भरारी

स्पर्धेच्या युगात कल्पकतेला विशेष महत्व आहे. त्यानुसार प्रत्येक गोष्टीत नाविण्य शोधणे हा मानवी स्वभाव आहे. हिंगोली येथील एम.ए, बीएड उच्च शिक्षण घेतलेल्या मंगेश प्रकाश पाटील या तरुण युवकांनी कल्पतेचे रुपांतर व्यवसायामध्ये केले आहे.

दोन वर्षापूर्वी  राज्यासह देशात कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी त्यांना कोरोनाने ग्रासल्यामुळे त्यांचा स्कोअर जवळपास 17 झाला होता. या परिस्थितीत त्यांनी शासकीय रुग्णालयात दीड महिना कोरोनाशी झुंज दिली. कोरोनाच्या या आजारातून बरे झाल्यानंतर नव्या उमेदीने त्यांनी आपल्या मित्रांना सोबत घेऊन 10 लोकाची त्रिलोकेश या नावाने फार्मर प्रोड्यूसर कंपनी स्थापन केली. हिंगोली येथील प्रविणनगर मध्ये उच्च शिक्षण घेतलेल्या मंगेश प्रकाश पाटील या तरुण युवकाने दोन वर्षापूर्वी भुसार माल खरेदी-विक्री करण्याच्या अनुषंगाने 10 जणाची सदस्य संख्या असलेली  त्रिलोकेश फार्मर प्रोड्यूसर कंपनीची  स्थापना केली  होती. सहा ते सात महिन्यापूर्वी कृषि विभागातील आत्माचे प्रकल्प संचालक युवराज शहारे यांच्याकडून माहिती मिळताच त्यांनी नानाजी देशमुख कृषि संजीवनी  योजना (पोखरा) अंतर्गत धान्य प्रक्रिया युनिट (स्वच्छता व प्रतवारी युनिट) स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु केल्या. तसेच धान्य स्वच्छता व प्रतवारी युनिट कोठे उपलब्ध होते. याची ऑनलाईन माहिती घेतली. शेतकऱ्यांचा व आपला फायदा झाला पाहिजे यासाठी  धान्य स्वच्छता व प्रतवारी युनिट स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी कंपनीच्या एका सदस्याची 1200 स्क्वेअर फुटाची जागा भाड्याने घेतली. तसेच सर्व सदस्यांनी मिळून पैशाची जुळवाजुळव करुन राजकोट येथून धान्य स्वच्छता व प्रतवारी मशीन आणली. याचे उद्घाटन हिंगोली जिल्ह्याचे पालक सचिव नितीन गद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी  शिवराज घोरपडे, आत्माचे प्रकल्प संचालक युवराज शहारे उपस्थित होते.

धान्य स्वच्छता व प्रतवारी  मशीनद्वारे एका तासाला 15 क्विंटल धान्याची स्वच्छता व प्रतवारी करण्याची क्षमता आहे. संपूर्ण मशिनरी युनिट व बांधकामासाठी जवळपास 20 लाख रुपये खर्च करण्यात आला. यासाठी नानाजी देशमुख कृषि संजीवनी (पोखरा) योजनेतून 60 टक्के म्हणजेच 12 लाख रुपयाचे अनुदान मिळाले आहे.

पहिल्या वर्षी मनावा तेवढा प्रतिसाद मिळत नव्हता. हळूहळू सोयाबीन, हरभरा, गहू या बियाण्याची स्वच्छता करुन मोफत बीज प्रक्रिया करुन दिली.

लोकांना चांगल्या प्रतीचा गहू, ज्वारी उपलब्ध व्हावा यासाठी हिंगोली पासून जवळच असलेल्या जवळा बाजार येथून सहा ते सात हजार क्विंटल गव्हाची खरेदी केली. या गव्हाची स्वच्छता व प्रतवारी करुन पॅकींग करुन विक्री करण्यास सुरुवात केली.

सध्या त्रिलोकेश फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या प्रत्येक सदस्यांनी आपापल्या शेतात प्रत्येकी पाच एकर गव्हाची लागवड केली. कंपनीच्या सर्व सदस्यांना फायदा व्हावा यासाठी सदस्याचे गहू बाजारभावापेक्षा 200 रुपये जास्तीचे दर देऊन खरेदी करण्यात येत आहे. तसेच काही सदस्यांनी सेंद्रीय पध्दतीने पिकविलेल्या गव्हाला पुणे येथे मागणी असून हा गहू 3500 रुपये क्विंटल दराने पाठविण्यात येणार आहे. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत आहे.

या मशीनद्वारे दिवसाला 60 ते 80 क्विंटल धान्याची स्वच्छता व प्रतवारी करण्यात येत आहे. या मशीनवर काम करण्यासाठी चार कामगार आहेत. त्यांना सर्वांना प्रत्येकी 10 हजार याप्रमाणे दरमहा पगार दिला जातो. त्यामुळे सर्व खर्च वजा जाता दिवसाला सात ते आठ हजार रुपये निव्वळ नफा होत आहे.

धान्य ठेवण्यासाठी  जागा कमी पडत असल्याने  सध्या असलेल्या जागेला लागून परत 1200 स्क्वेअर फुटाची  जागा भाड्याने घेतली आहे. तसेच नरसी फाटा येथे 150 मेट्रिक टन क्षमतेचे एक गोडाऊन भाड्याने घेतले आहे.

तसेच सोयाबीन, हरभरा, गहू ब्रीडर शेडपासून बियाणे निर्मिती चालू आहे. सोयाबीन, हरभरा व इतर अधिक उत्पादन देणारे दोन हजार क्विंटल बियाणे तयार होणार आहे. धान्याची स्वच्छता व प्रतवारी करुन शिल्लक राहिलेल्या चुऱ्यापासून पीठ व कोंबड्यासाठी भरडधान्य तयार करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. तसेच साखरेला पर्याय म्हणून गुळ पावडर तयार करण्याचे नियोजन असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

हिंगोली येथे आयोजित जिल्हास्तरीय कृषी महोत्सवात त्रिलोकेश फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलवर वेगवेगळ्या जातीचे जसे लोकवण, काळा गहू, खपली गहू,अजित, 2189 व इतर विविध प्रकारचे गहू विक्रीसाठी  ठेवण्यात आले होते. या प्रदर्शनात 200 ते 250 क्विंटल गव्हाची विक्री झाली आहे. भविष्यात नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील डीमार्ट, रिलायंस मॉल यांना गहू उपलब्ध करुन देण्याची तयारी सुरु असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

अवघ्या सहा ते सात महिन्याच्या अल्प कालावधीत श्री. पाटील यांनी त्रिलोकेश फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या धान्य स्वच्छता व प्रतवारी यंत्राच्या माध्यमातून त्यांनी गगन भरारी घेत ते आज इतरांसमोर आदर्श ठरले आहेत.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी  प्रकल्प अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संघ, शेतकरी, महिला, भूमीहीन व्यक्तींचे इच्छूक गट,  बचत गट यांच्या व्यवसायिक प्रस्तावांना अर्थसहाय्य दिले जाते. पोखरा अंतर्गत शेतकरी, उत्पादक कंपनी किंवा शेतकरी गटांनी प्रकल्प उभारण्यासाठी  या अनुदान योजनेचा लाभ घेऊन आर्थिक सक्षम होण्याची गरज असल्याचे ते सांगतात.

                                                                                                            — चंद्रकांत कारभारी

                                                                                                                 माहिती सहायक

                                                                                                     जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

रवींद्र कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठ; डॉ. सुरेश गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

मुंबई, दि. ६ : मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. रवींद्र दत्तात्रय कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे; तर डॉ सुरेश वामनगीर गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी डॉ. रवींद्र कुलकर्णी व डॉ. सुरेश गोसावी यांच्या नियुक्तीची घोषणा केली. तसेच डॉ. संजय घनश्याम भावे यांची डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली आहे.

डॉ. रवींद्र कुलकर्णी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे वरिष्ठ प्राध्यापक आहेत तर डॉ. सुरेश गोसावी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिक शास्त्र विभागात वरिष्ठ प्राध्यापक आहेत. डॉ. संजय भावे हे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे ऍग्रिकल्चरल बॉटनी विभागाचे विभागप्रमुख आहेत.

००००

 

Dr Ravindra Kulkarni to be new Vice Chancellor of University of Mumbai ; Dr Suresh Gosavi to be VC of SPPU

Dr Sanjay Bhave appointed as Vice Chancellor of Konkan Krishi Vidyapith

 

Dr Ravindra Dattatray Kulkarni has been appointed as the Vice-Chancellor of the University of Mumbai; while Dr. Suresh Wamangir Gosavi has been appointed as the Vice-Chancellor of Savitribai Phule Pune University.

Maharashtra Governor and Chancellor of public universities in the State Ramesh Bais announced the appointment of Dr Ravindra Kulkarni and Dr Suresh Gosavi.

The Governor has also declared the appointment of Dr. Sanjay Ghanshyam Bhave as the new Vice-Chancellor of Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth Dapoli.

Dr Ravindra Kulkarni is a Senior Professor at Institute of Chemical Technology while Dr Suresh Gosavi is a Senior Professor at the Department of Physics, Savitribai Phule Pune University.

Dr. Sanjay Bhave is the Head of Department of Agricultural Botany at Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth.

0000

अन्न प्रक्रिया उद्योजकांसाठी संधी : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत केंद्र शासनाची ‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना’ ही कृषी विभागाची महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांचा समावेश आहे. सर्व प्रकारच्या सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना या योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी, शेतकरी कंपन्या, उत्पादन संस्था, स्वयंसहाय्यता गटांना उद्योग सुरु करता येतो. सध्या कार्यरत असलेल्या व नवीन सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांचा विस्तार वाढविण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि नवीन सूक्ष्म  अन्न प्रक्रिया सुरु करणे हे या योजनेचे ध्येय आहे. पारंपारिक व स्थानिक उत्पादनांना यात प्रोत्साहन देण्यात येते. या योजनेचा लाभ वैयक्तिक लाभार्थी तसेच गट लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

केंद्र शासनाने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना देशभरामध्ये राबविण्याचे नियोजन केले आहे. सन 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षासाठी ही योजना राबविली जात आहे. सध्या कार्यरत असलेले व नवीन स्थापित होणारे वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग तसेच शेतकरी उत्पादक गट, संस्था, कंपनी, स्वयंसहाय्यता गट व सहकारी उत्पादक गट यांची पतमर्यादा वाढविणे, उत्पादनांचे ब्रँडींग व विपणन अधिक बळकट करून त्यांना संघटित अशा पुरवठा साखळीशी जोडणे, अन्न प्रक्रिया उद्योगांना औपचारिक रचनेमध्ये आणण्यासाठी सहाय्य करणे, सामाईक सेवा जसे साठवणूक, प्रक्रिया सुविधा, पॅकेजिंग, विपणन तसेच उद्योग वाढीसाठीच्या सर्वंकष सेवांचा सूक्ष्म उद्योगांना अधिक लाभ मिळवून देणे, अन्न प्रक्रिया क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण यावर भर देणे तसेच सूक्ष्म  अन्न प्रक्रिया उद्योगांनी व्यावसायिक व तांत्रिक सहाय्याचा अधिकाधिक लाभ घ्यावा यासाठी प्रयत्न करणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.

वैयक्तिक लाभार्थी निवडीचे निकष

या योजनेंतर्गत अर्जदाराचा उद्योगावर मालकी अधिकार (प्रोपायटरी, भागीदारी, प्रायव्हेट लि.) असावा. अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असावे. शिक्षणाची अट नाही. एका कुटुंबातील एकच व्यक्ती पात्र असेल. उद्योगाला औपचारिक दर्जा प्राप्त करुन देण्याची तयारी असावी. तसेच प्रकल्प किमतीच्या किमान 10 टक्के लाभार्थी हिस्सा देण्याची व उर्वरित बँक कर्ज घेण्याची तयारी असावी. वैयक्तिक लाभार्थी, भागीदारी संस्था, बेरोजगार युवक, नवउद्योजक, कार्यरत उद्योजक, महिला, प्रगतशील शेतकरी, शेतकरी उत्पादन संस्था, स्वयंसहाय्यता गट, गैर सरकारी संस्था, सहकारी संस्था, खाजगी कंपनी इ. यांना एकूण प्रकल्प किंमतीच्या 35 टक्के जास्तीत जास्त 10 लाखपर्यंत क्रेडीट लिंक सबसिडी आधारावर अनुदानाचा लाभ देय आहे.

गट उद्योजकांसाठी निकष

सामाईक पायाभूत सुविधा अंतर्गत शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था, स्वयंसहाय्यता गट आणि त्यांचे फेडरेशन, शासकीय संस्था लाभ घेऊ शकतात. या घटकासाठी 3 कोटी कमाल मर्यादेसह पात्र प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के क्रेडीट लिंक कॅपिटल सबसिडी देय आहे.

समाविष्ट प्रक्रिया उद्योग

या योजनेंतर्गत फळे व भाजीपाला उत्पादन प्रक्रिया, दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया, बेकरी उत्पादने, धान्ये प्रक्रिया, मसाले, लागवड पीके, मासे व सागरी उत्पादने प्रक्रिया, तेलबीया प्रक्रिया, मांस व पोल्ट्री उत्पादने, किरकोळ वन उत्पादने प्रक्रिया यांचा समावेश होतो.

ग्रामीण व शहरी भागातील सूक्ष्म  अन्न प्रक्रिया उद्योगातील स्वयंसहायता गटातील सदस्यांना बीज भांडवल अंतर्गत खेळते भांडवल किंवा गुंतवणीसाठी 40 हजार रुपये प्रति सदस्य व प्रति स्वयंसहायता गटास कमाल रक्कम 4 लाख रुपये देय आहे.

संपर्क कोठे साधावा ?

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा वैयक्तिक लाभार्थी तसेच स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्यांनी बीज भांडवलासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा. www.pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक (आत्मा), जिल्हा नोडल अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

अपर्णा यावलकर

माहिती अधिकारी,

जिल्हा माहिती  कार्यालय,

अमरावती.

नीती आयोगाकडून महाराष्ट्र ब्लॉकचेन जात प्रमाणपत्र प्रकल्पाचे कौतुक

मुंबई, दि. ६ : महाराष्ट्र राज्य नाविन्यता  सोसायटी, एटापल्ली उपविभाग व झुपल लॅब्ज (Zupple Labs) च्या संयुक्त विद्यमाने एटापल्ली येथे जात प्रमाणपत्र ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर निर्गमित करण्याचा प्रकल्प राबवण्यात येत आहे. हा प्रकल्प देशातील एक विशेष आणि एकमेव ब्लॉकचेन प्रकल्प असून नीती आयोगाने त्याला मॉडेल ई-गव्हर्नन्स प्रकल्प म्हणून घोषित केले आहे.

भारतातील सार्वजनिक धोरण क्षेत्रात उच्चस्तरीय थिंक टँक असणाऱ्या नीती आयोगाने महाराष्ट्र ब्लॉकचेन जात प्रमाणीकरण प्रकल्पाला डिजी-लॉकर, उमंग ॲप इत्यादींमधे मान्यता दिली आहे तसेच भारतातील एक मॉडेल ई-गव्हर्नन्स प्रकल्प म्हणून त्याची निवड केली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली उपविभागात राबविण्यात आलेला हा प्रकल्प, आदिवासी रहिवाशांना जात प्रमाणपत्रे देण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करतो ज्यामुळे या प्रमाणपत्रासोबत छेडछाड करणे शक्य होत नाही आणि हे प्रमाणपत्र काही सेकंदात पडताळता येतात.

महाराष्ट्र राज्य देशातील सर्वाधिक औद्योगिकरण असलेले राज्य आहे आणि औद्योगिकतेला नाविन्यतेची साथ देऊन, महाराष्ट्रातील स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासासाठी, नाविन्यपूर्ण संकल्पनांना, उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच प्रशासनात नाविन्यता आणण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता  सोसायटी कार्यरत आहे.

स्टार्टअप्सना शासनासोबत काम करण्याची संधी देण्यासाठी तसेच प्रशासनात नाविन्यता आणण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप वीक वार्षिक उपक्रम आहे. या अंतर्गत विजेत्या स्टार्टअप्सना त्यांच्या उत्पादन / सेवेंच्या प्रकल्पांची प्रायोजिक तत्वावर अंमलबजावणी शासनाच्या विविध विभागांबरोबर करण्यासाठी सहाय्य केले जाते. स्टार्टअप वीक २०२० चे विजेते झुपल लॅब्ज (Zupple Labs) चा उपक्रम गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली उपविभागामध्ये राबवण्यात आला.

शासकीय सेवांची कार्यक्षमता आणि पारदर्शकता सुधारण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या नाविन्यपूर्ण वापरासाठी नीती-आयोगाने या प्रकल्पाची निवड केली आहे. आदिवासी रहिवाशांना शासकीय सेवांचा लाभ मिळणे सोपे झाल्यामुळे या प्रकल्पाचा महत्त्वपूर्ण सामाजिक परिणामही झाला आहे.

महाराष्ट्रातील ब्लॉकचेन जात प्रमाणीकरण प्रकल्पाचे यश हे भारतातील ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी एक पथदर्शक टप्पा मानला जात आहे. या प्रकल्पाने शासकीय सेवांची कार्यक्षमता आणि पारदर्शकता सुधारण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची क्षमता दाखवून दिली आहे आणि त्यामुळे इतर शासकीय उपक्रमांमध्ये ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा मार्ग आता मोकळा होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. एन.रामास्वामी यांनी सांगितले की, “प्रशासनात नाविन्यता आणण्यासाठी नाविन्यता सोसायटीकडून विशेष उपक्रम राबवविले जात आहेत. या नाविन्यपूर्ण यंत्रणेमुळे, अनुसूचित जाती आणि जमातींसाठी असलेल्या कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी, जात प्रमाणपत्रांच्या गैरवापरास आळा बसेल तसेच येणाऱ्या काळात प्रशासनद्वारे इतर प्रमाणपत्रे ब्लॉकचेनद्वारे निर्गमित केले जातील”

गडचिरोली जिल्ह्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी शुभम गुप्ता यांनी  सांगितले की “महाराष्ट्र ब्लॉकचेन जात प्रमाणीकरण प्रकल्पाचे यश हे महाराष्ट्र राज्यासाठी एक मोठा विजय आहे. हा प्रकल्प हे दर्शवितो की शासन आपल्या नागरिकांचे जीवन सुधारण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्यास वचनबद्ध आहे.”

नीती आयोगाच्या अहवालामध्ये, “सामाजिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट पद्धती” या शीर्षकाने महाराष्ट्रातील ब्लॉकचेन जात प्रमाणीकरण प्रकल्प इतर राज्यांनी अनुसरण्यासाठी एक मॉडेल म्हणून दर्शवला आहे. इतर राज्यांनी त्यांच्या जात प्रमाणपत्र प्रक्रियेची कार्यक्षमता आणि पारदर्शकता सुधारण्यासाठी या प्रकल्पाची पुनरावृत्ती करावी. अशी शिफारस अहवालात करण्यात आली आहे. नीती आयोगाच्या पूर्वीच्या शिफारशी जसे की डिजिटल इंडिया मोहीम (उदा: ई-डिस्ट्रिक्ट, ई-प्रोक्योरमेंट, ई-कोर्ट), नॅशनल डेटा अँड अॅनालिटिक्स प्लॅटफॉर्म (NDAP), युनिफाइड लॉजिस्टिक इंटरफेस प्लॅटफॉर्म (ULIP) इत्यादींना देशभरात यश प्राप्त झाले आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर स्वीकारण्यात आले आहे.

*****

संध्या गरवारे/विसंअ/

 

जिल्ह्यातील विकास कामांना गती देत वेळेत प्रकल्प पूर्ण करा – पालकमंत्री संदिपान भूमरे

औरंगाबाद, दि. 05 (जिमाका) : शहरासाठी महत्वपूर्ण असणारी पाणीपुरवठा योजना, गरीबांसाठीची घरकुल योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजना, पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान अशा अनेक प्रकल्पांचे काम सुरू आहे. ह्या विकासात्मक कामांना गती देत  सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री संदिपान भूमरे यांनी दिले.

पालकमंत्री संदिपान भूमरे यांनी महानगर पालिका, एमएसईबी, विभागीय क्रिडा संकुल, ब्रम्ह गव्हाण उपसा सिंचन येाजना, पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान, धुळे-सेालापुर महामार्गाची दुरूस्ती अशा अनेक  विविध विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय, मनपा प्रशासक जी.श्रीकांत तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले शहरासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचे काम संथगतीने सुरू आहे. हे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी अधिकची यंत्रणा लावून जलद गतीने कामे पूर्ण करावेत. तसेच अंतर्गत पाईपलाईनचे काम गतीने करावे. योजनेची पाईपलाईन पूर्ण झाल्यावरच रस्त्यांची कामे हाती घ्यावेत तसेच काम करणाऱ्या संस्थेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन दिलेल्या काल मर्यादेत काम पूर्ण करावे. हर्सुल भागातील पाणीपुरवठ्याचे काम ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देखील संबंधितांना दिले.

मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी रामनगर तसेच सिग्मा हॉस्पिटल परिसरात वाहतूकीस अडथळा ठरणाऱ्या वृक्षांचे पुनर्रोपण करण्याबाबत पालकमंत्री यांना  सुचविले. तसेच  महापालिकेच्या नवीन इमारतीबाबत प्रस्ताव तयार करुन  संमतीसाठी पाठविणार असल्याचेही जी. श्रीकांत म्हणाले.

महानगरपालिकेची इमारत बांधताना अत्याधुनिक पद्धतीचा अवलंब करुन दर्जेदार इमारत उभारण्याचे निर्देश देखील पालकमंत्र्यानी यावेळी दिले.

नवीन प्रशासकीय संकुल तसेच पैठण येथील प्रशासकीय इमारतीच्या कामाला गती द्या

जिल्हा प्रशासनाच्या नवीन प्रशासकीय संकुलाच्या कामाला गती द्यावी तसेच पैठण येथील प्रशासकीय इमारत आणि नाट्यगृहाचे देखील काम लवकर सुरू करण्याचे निर्देश त्यांनी योवळी दिले.

जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी शहरातील नवीन विश्राम गृहाच्या सद्यस्थितीबाबत पालकमंत्री यांना माहिती दिली. ह्या विश्रामगृहाचे काम अंतिम टप्प्यात असून नोव्हेंबर पर्यंत हे विश्रामगृह तयार होणार आहे. तसेच पैठण येथील नवीन विश्रामगृहासाठी देखील जागा अंतिम करुन लवकरच काम सुरू करणार असल्याचेही ते म्हणाले.

घरकुल योजनेसाठी जागांची पाहणी करण्याचे निर्देश

पालकमंत्री यांनी घरकुल योजनेचा आढावा घेतला. मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी या प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली. गरीबांना स्वस्तात घरे मिळावे यासाठी जास्त घरे बांधणे आवश्यक आहे. हर्सुल परिसरात  घरकुलासाठी अधिकची जागा उपलब्ध होऊ शकते. सुंदरवाडी परिसरातील आरक्षण उठवले तर मोठी घरकुल योजना होऊ शकत असल्याचे जी. श्रीकांत यांनी सांगितले. यासंबधी महापालिका स्तरावर कार्यवाही करुन शहरातील लोक प्रतिनिधीं सोबतच्या बैठकीचे नियोजन करावे. गारखेडा परिसरात धर्मवीर आनंद दिघे यांचे स्मारक बनविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी तसेच माहेश्वरी समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांच्या प्रतिनिधीची बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले.

विभागीय क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करा

विभागीय क्रीडा संकुलामध्ये सिंथेटीक ट्रॅक उभारण्यासाठी तसेच इतर सुविधांसाठी 17 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या सिंथेटीक ट्रॅकचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. खेळाडूंसाठी खरेदी करण्यात आलेले साहित्याचे वाटप करा. तसेच खेळाडू घडविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा निर्माण करुन खेळांडूमध्ये सकारात्मक भावना वृध्दीगंत करा असे देखील त्यांनी सांगितले.

ब्रम्हगव्हाण उपसा जल सिंचन योजनेच्या उर्वरित भूसंपादनाची प्रक्रीया तात्काळ पूर्ण करा.

ब्रम्हगव्हाण उपसा जल सिंचन योजनेअंतर्गत सोनवाडीसह 10 गावांच्या भूसंपादनाची प्रक्रीया पुर्ण झाली आहे. पुढील प्रक्रीया तात्काळ पूर्ण करुन गांवकऱ्यांना एका महिन्यात मावेजा देण्याचे निर्देश देखील पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान सुशोभिकरणाचे कामे पूर्ण करा-

पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या सुशोभिकरणासाठी शासन आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्यात आलेला आहे. उद्यानाच्या सुशोभिकरणाची काम देखील सुरू आहेत. उद्यान पूर्ववत सुरू होण्यासाठी दिलेल्या वेळेत कामे पूर्ण करा जेणेकरुन पर्यटक शहरात येतील आणि शहरांमध्ये रोजगाराच्या संधीत वाढ होईल.  उद्यानात निर्माण करण्यात येत असलेल्या सुविधांचा संपूर्ण विकास आराखडा सादर करा उद्यानाच्या विकासासाठी निधीची कमतरता पडणार नाही.  पैठण प्रवेशव्दाराबाबत देखील महावितरणणे तात्काळ कार्यवाही करुन नियोजित वेळेत प्रवेशव्दाराचे काम पूर्ण करावे. धनगाव तसेच ओवा याठिकाणी तात्काळ ट्रासफार्मर बसविण्याच्या देखील सूचना केल्या.

 सोलापुर-धुळे महामार्गाची करणार पाहणी

सोलापुर-धुळे ह्या महामार्गाची जिल्ह्याच्या विकासात महत्वाची भूमिका आहे. सोलापुर ते औरंगाबाद रस्त्याचे काम उत्कृष्ट आहे. परंतु औरंगाबाद ते कन्नड  दरम्यान रस्त्यांवर खड्डे पडले असल्याने अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. तसेच पैठण रस्त्याचं देखील काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिले.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची कामे तातडीने पूर्ण करावीत

प्रधानमंत्री ग्रामसडक योजना तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अनेक कामे अपूर्ण अवस्थेत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागांनी अपूर्ण रस्त्यांच्या कामांना गती देत  तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले.

‘शासन आपल्या दारी’ राज्यात क्रांती आणणारा कार्यक्रम- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सिंधुदुर्गनगरी दि. ६ (जि.मा.का) :- ‘शासन आपल्या दारी’  या कार्यक्रमाला होणाऱ्या गर्दीने सर्व विक्रम मोडले आहेत. राज्यात क्रांती आणणारा हा कार्यक्रम ठरेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी कुठेही मागे हटणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

जिल्हास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ चा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आज कुडाळ येथे झाला. या प्रसंगी केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, क्रीडा व युवक कल्याण, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, आमदार भारत गोगावले, रविंद्र फाटक, नितेश राणे, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्‍य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी, ‘माका ही गर्दी बघून खूप आनंद झालो. कसे असात… बरे असात ना…’ अशी मालवणी बोलीतून आपल्या भाषणाची सुरुवात करुन उपस्थितांची मने जिंकली. ते म्हणाले, कोकणी माणूस बाहेरुन फणसासारखा व आतून  गोड गऱ्या सारखा असतो. शासन आणि लाभार्थी यातील अंतर मिटवून टाकण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ याची सुरुवात पाटण येथून झाली. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच असा कार्यक्रम होतोय. एकाच छताखाली लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

सर्वसामान्य लोकांना सरकार दरबारी चकरा माराव्या लागता कामा नयेत, अशा पध्दतीने राज्य कारभार केला पाहीजे. त्याच धर्तीवर शासन काम करीत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी विविध योजनांसाठी ६७९ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे. यात प्रामुख्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय इमारत बांधकाम, मौजे मिठबांव- गजबा देवी मंदिर परिसर, सिंधुरत्न समृध्द योजना, बॅ. नाथ पै स्मारक यांचा समावेश आहे.

पहिल्या कॅबिनेटपासून लोकाभिमुख निर्णय घेतले. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, विद्यार्थी, महिला, तरुण ज्येष्ठ नागरिक यांचं काहीतरी देणं लागतय म्हणूनच तुमच्या दारापर्यंत सरकार येवून तुम्हाला लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे.

जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ कसा देता येईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्याच्या अनेक योजनांना केंद्राचे शंभर टक्के पाठबळ मिळत आहे. ७ टीएमसी पाणी समुद्राला वाहून जाते. त्या प्रकल्पालाही निधी लागणार आहे. त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना विनंती करीत आहोत. निश्चितच कोकणाला पाठबळ मिळेल. कोकण विकास प्राधिकरणाचा निर्णय घेतला आहे. कोकणातला विकासाचा अनुशेष भरुन काढतोय. नोकरी, रोजगारांच्या माध्यमातून कोकण समृध्द करायचा आहे. रखडलेले पुनर्विकास प्रकल्प शासनाने घ्यायचे, असा निर्णय घेतला आहे. एलएनजीच्या माध्यमातून वातानुकुलित एसटी केल्या जातील.

सिंधुदुर्गातील पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकार कुठेही मागे राहणार नाही. विकास असा झाला पाहिजे की, जगाला हेवा वाटला पाहीजे, असा संकल्प करुया, असेही मुख्यमंत्री शेवटी म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लाभार्थीना प्रातिनिधिक स्वरुपात  शासन योजनांच्या लाभाचे प्रमाणपत्र, वाहनांच्या चाव्या, धनादेश वितरीत करण्यात आले.

केंद्रीयमंत्री श्री. राणे म्हणाले, पायाभूत सुविधा, आरोग्य, साधनं, व्यवसाय-नोकरी, कोणत्या क्षेत्राची आवश्यकता आहे. हे विचारण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे स्वत: आले आहेत. जिल्ह्याला २०० कोटीचं प्रशिक्षण केंद्र दिलं आहे. त्याचे महिन्याभरात काम सुरु होईल. या सेंटरच्या जागेसाठी १३ कोटीचे शुल्क मुख्यमंत्र्यांनी माफ करुन लवकर सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. कोकणी माणसांची मुले आज नोकरीसाठी परदेशी जात आहेत. यातून जिल्ह्याची प्रगती दिसून येते. राज्याच्या तिजोरीत भर टाकणारा जिल्हा आहे. आणखी रोजगार वाढल्यास उत्पन्न वाढेल पर्यांयाने जीडीपी वाढेल. कोकणात येणाऱ्या मोठ्या प्रकल्पांचे स्वागत केले पाहिजे.

पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जनसामान्यांचे सरकार एकाच छताखाली लाभ देवू शकते, याचं उदाहरण ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाने दाखवून दिले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमातून शासन योजनेचा थेट लाभ लाभार्थीना मिळत आहे. १९ रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण लवकरच करण्यात येणार आहे. येथील स्थलांतर थांबण्यासाठी पर्यटन जिल्ह्यातील युवकाला काम मिळाले पाहीजे. त्यासाठी पर्यटन पॅकेज जाहीर करावं, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, राज्यात विकास कामांची घोडदौड सुरू आहे. राज्याचा सर्वसमावेशक विकास करताना सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून योजना राबविण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधे ५० टक्के सवलत देवून राज्य शासनाने महिलांना सन्मान दिला आहे. तर ७५ वर्ष पूर्ण असलेल्या नागरिकांना एस. टी. प्रवास मोफत केला असल्याचे ते म्हणाले.

शालेय शिक्षणमंत्री श्री. केसरकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून  राबविण्यात येत असलेल्या शासन आपल्या दारी या उपक्रमातून योजना सर्व सामान्यांच्या दारी पोहचविण्यात येत आहेत. शासन योजनांचा लाभ देण्याच्या माध्यमातून शासन लाभार्थ्यांपर्यंत पोहचत आहे,  हे या उपक्रमाचे यश आहे, असे ते म्हणाले. येथून जाताना आपल्या योजनांचा लाभ जाताना घेवून जाल, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी प्रास्ताविकात विविध योजनांमधून देण्यात येत असलेल्या लाभाची माहिती दिली. प्रारंभी मुख्यमंत्री राज्य जन कल्याण कक्षाचे समन्वयक डॉ. अमोल शिंदे यांनी योजनादूत आणि शासन आपल्या दारी बाबत माहिती दिली. शेवटी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी आभार मानले.

०००००

 

ताज्या बातम्या

पणन महामंडळाच्या योजनेची कमाल; देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार शेतमाल!

0
महाराष्ट्राचा शेतकरी मेहनतीचा मानबिंदू आहे. अपार कष्टाच्या घामातून ओली झालेली त्याची कपाळरेषा केवळ अन्नधान्य नाही, तर अखिल देशासाठी जीवनाधार निर्माण करते. मात्र हा शेतमाल...

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला- पद्मश्री डॉ.जब्बार पटेल

0
स्मारकाच्या नूतनीकरणासाठी पाच कोटींच्या निधीची पालकमंत्र्यांची घोषणा कोल्हापूर, दि. 26 (जिमाका): तळागाळातील वंचित,शोषित समाजाला सत्तेच्या मार्गातून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराज यांनी देशाला दिला आहे....

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – सरन्यायाधीश न्या.भूषण गवई

0
छत्रपती संभाजीनगर, दि.२६ (जिमाका)- न्यायाधीशाने समाजाशी एकरुप राहून समाजाचे प्रश्न जाणून घेतले तर अधिक योग्य न्यायदान होईल. त्यासाठी न्यायाधीशाने समाजाशी एकरुप असावे, अलिप्त राहू नये,असे...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमीपूजन...

0
ठाणे, दि.26 (जिमाका) : ठाणे शहर बदलते आहे. सोयी सुविधा येत आहेत. क्लस्टर योजनेच्या रूपाने २०२० पर्यंतच्या सगळ्यांना घर मिळणार आहे. त्यामुळे आजचा हा...

खरीप हंगामासाठी शेतकऱ्याना मुबलक प्रमाणात बियाणे व खते  उपलब्ध करून द्यावे : मंत्री छगन...

0
नाशिक, दि.26 जून, 2025 (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची शेतात पेरणी सुरू झाली आहे. या खरीप हंगाम शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बियाणे...