रविवार, जून 29, 2025
Home Blog Page 1308

शासन सोबत असल्याची निर्माण झाली भावना- आदिवासी ग्रामस्थ सुरज कदम यांची प्रतिक्रिया

नांदेड (जिमाका) दि. 16 :- नांदेड जिल्ह्यातील ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमानिमित्त तेलंगणाच्या काठावर असलेल्या किनवट पासून कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या देगलूर तालुक्यापर्यंत अनेक महसूल मंडळातील गावे शासन आपल्या दारी उपक्रमाची अनुभूती घेत आहेत. आज किनवट तालुक्यातील जलधारा मंडळातील सावरगाव येथे हा उपक्रम पार पडला. सर्व घरे आदिवासी असलेले हे सावरगाव आज तालुक्यातील शासकीय विभागाच्या प्रतिनिधींनी गजबजून गेले. “ज्या निष्ठेने लोककल्याणकारी भूमिका घेऊन शासन शेवटच्या टोकावर असलेल्या माणसाच्या भल्यासाठी योजना राबविते त्याची खरी प्रचिती शासन आपल्या दारी योजनेतून आली” अशी प्रतिक्रिया आदिवासी बांधव सुरज कदम यांनी दिली.

किनवट तालुक्यात 9 मंडळे असून प्रत्येक भागात शासन आपल्या दारीचा विश्वासार्ह दुवा पोहचावा यासाठी आम्ही नियोजन केले आहे. यातील 5 मंडळाच्या ठिकाणी प्राथमिक स्तरावरील शासन आपल्या दारीचे उपक्रम पार पडले आहेत. यातून पात्र लाभार्थ्यांचीही निवड झाली आहे. या उपक्रमामुळे प्रशासनालाही एक दिशा मिळाली असून आदिवासी भागातील लाभधारकांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच या अभिनव उपक्रमाचे मोठे यश असल्याची प्रतिक्रिया किनवट येथील सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले यांनी दिली.

येथील ग्रामीण भागात पांदण रस्ते, शेतासाठी जाणारे रस्ते, जमीन विषयक फेरफार, निराधार योजना, पीएम किसान योजना याबाबत या भागातील लोकांना अधिक उत्सुकता आहे. याचबरोबर केंद्र शासनासह राज्य शासनाच्या योजना त्या-त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचाव्यात यासाठी महसूल, कृषि विभाग, पंचायत समितीमधील संबंधित कर्मचारी तत्पर झाले आहेत.

रात्री दीडपर्यंत पालकमंत्र्यांनी घेतला जनतेच्या तक्रारींचा आढावा

यवतमाळ, दि १६ जिमाका:- नेरमध्ये झालेल्या जनता दरबारमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी रात्री दीड वाजेपर्यंत जनतेच्या तक्रारी ऐकून त्यांचे निराकरण केले. यावेळी आजंती गावातील पारधी समाजाच्या नागरिकांना घरकुलासाठी जागा देण्याचा प्रलंबित प्रश्न तत्काळ निकाली काढण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले.

या जनता दरबारमध्ये जुन्या ५३६ तक्रारी निकाली काढण्यात आल्या तर नव्याने ३१९ तक्रारी  प्राप्त झाल्या. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक डॉ. पवन बनसोड,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी क्रांती काटोले, तहसिलदार शिवाजी मगर,  गटविकास अधिकारी राजीव शिंदे उपस्थित होते.

यावेळी जनतेशी संवाद साधताना पालकमंत्री म्हणाले, कि जनतेच्या आशिर्वादाने  तिनदा मंत्री म्हणुन काम करण्याची संधी मिळाली. पालकमंत्री म्हणुन समाधान शिबिराच्या माध्यमातुन जनतेच्या तक्रारी निकाली काढण्याचा प्रयत्न मी पूर्वीही केला होता. त्यावेळी वणी पासुन उमरखेड पर्यंत तक्रारी प्राप्त झाल्यात आणि प्रशासनाने त्या निकाली काढण्यात आल्या. अनेक प्रलंबित कामे मार्गी लावण्यात आली होती.

यावेळी सुद्धा जनता दरबारच्या माध्यामातुन नागरिकांकडून त्यांच्या तक्रारी मागवल्या होत्या. मात्र काही कारणास्तव ठरलेल्या  दिवशी जनता दरबार घेता आला नाही. दरम्यानच्या काळात प्रशासनाने प्राप्त  तक्रारी सोडवल्या. तरीही नागरिकांच्या तक्रारींचा आढावा घेऊन त्यांचे समाधान झाले की नाही याची विचारणा करणे जिल्ह्याचा पालक म्हणुन माझे काम आहे. नेर तालुक्यात ५३६ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या पैकी सर्व तक्रारी निकाली निघाल्यात. उपस्थित नागरिकांच्या काही  नवीन निवेदन, अडचण, तक्रार असेल तर करू शकतात. प्रशासन त्यावर लगेच कार्यवाही करून त्या निकाली काढतील असा मला विश्वास आहे.

याठिकाणी अनेक विभागाचे प्रमुख हजर आहेत. जुन्या तक्रारींचा आढावा तुमचा प्रतिनिधी म्हणून मी घेणारच आहे, पण नवीन तक्रारी सुद्धा आपण दिल्या तर त्याचाही आढावा प्रशासन या ठिकाणी घेईल. आपले विकासाचे काम असेल वैयक्तिक काम असेल प्रशासनाकडून या सर्व गोष्टींची दखल घेऊन त्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि सर्व विभागाच्या विभाग प्रमुखांना त्यांनी निर्देश दिलेत.

हे सर्वसामान्य जनतेचे राज्य आहे,सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून आज राज्य सरकार अनेक निर्णय घेत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे होणारे शेतीचे नुकसान भरपाई देण्यासाठी राज्यशासनाने क्रांतिकारी निर्णय घेतला. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकारने केले आहे. शेतकऱ्यांना पीएम किसान च्या माध्यमातून  ६ हजार रुपये देण्यात येत होते त्यात राज्य शासनाने आपली योजना सुरू करून आता शेतकऱ्यांना दरमहा दोन हजार रुपये मिळतील म्हणजे वार्षिक १२ हजार रुपये शेतकऱ्यांच्या हातात पडणार आहेत.

सरकार आपलं आहे, आणि सरकार आपल्या दारी आहे. या शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी स्वत: आणि प्रशासनाचे सर्व प्रमुख अधिकारी या ठिकाणी आले आहेत. आपल्या तक्रारी निकाली निघाल्या पाहिजेत ही भूमिका शासनाची आणि प्रशासनाची आहे, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

या जनता दरबारमध्ये नविन ३१९ तक्रारी प्राप्त झाल्या. त्या १५ दिवसात निकाली काढण्याचे निर्देश पालकमंत्री श्री राठोड यांनी दिले. तसेच जुन्या ५३६ तक्रार दारांचे म्हणने ऐकुन घेऊन त्यांच्या तक्रारी निकाली निघाल्यात कि नाही, त्यांचे समाधान झाले की नाही याची खातरजामाही केली. यावेळी नागरिकांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

पोलीस दलाच्या बळकटीकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही- पालकमंत्री संजय राठोड

           यवतमाळ,दि.१६ (जिमाका) :- जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चांगल्या वाहनांची गरज लागते. या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने माझ्या जिल्ह्याच्या पोलीस दलाचे बळकटीकरण करणे माझे प्रथम कर्तव्य आहे. म्हणूनच जिल्हा नियोजन समितीमधून आज पोलीस दलाला २९ वाहने उपलब्ध करून दिली आहेत. आपल्या जिल्ह्याच्या पोलीस दलाचे बळकटीकरणासाठी आवश्यक ती सर्व मदत करायला तयार असल्याची ग्वाही अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली.

            आज पोलीस मुख्यालयात यवतमाळ जिल्हा पोलीस विभागासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या नऊ चार चाकी वाहने,दहा टी.व्ही.एस.मोपेड तर दहा हिरो मोटर सायकल अशा एकोणतीस गस्ती वाहनांचे हस्तांतरण पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी आमदार मदन येयेरावर,जिल्हा पोलीस अधिक्षक पवनकुमार बनसोड,अपर पोलीस अधिक्षक पियुष जगताप,तसेच पोलीस विभागातील पोलीस अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री यांनी वाहनांचे पूजन करून वाहनांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.

यावेळी बोलताना मंत्री श्री राठोड म्हणाले, आजही आपल्या जिल्ह्यातील काही पोलीस स्थानके ही ब्रिटिश कालीन असून, त्या पडायला आलेल्या इमारती मधुन आपली कामे चालतात, ही खेदाची बाब आहे. नविन  पोलिस इमारतींसाठी प्रस्ताव सादर करावे,लागलीच निधी प्राप्त करून देतो असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर पोलीस बांधवांच्या निवासस्थानाच्या दुरुस्तीचे कामे, सी.सी.टीव्ही.कॅमेरे किंवा ड्रोन कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही.पोलिस विभागाने दोन ड्रोनची मागणी केली होती परंतु जिल्ह्याला पाच ड्रोनची गरज आहे. पाच ड्रोनचा प्रस्ताव सादर करण्यासही त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्याच्या पोलीस दलाचे बळकटीकरण करणे व काही उनिवा असल्यास त्या दूर करणे हे त्यांचे कर्तव्यच असल्याचे पालकमंत्री यावेळी म्हणाले.

यावेळी प्रास्ताविक करताना जिल्हा पोलीस अधिक्षक पवन बनसोड यांनी सांगितले की, जिल्हा नियोजन समिती मधून २ कोटी २८ लाख ४३ हजार निधी प्राप्त झाला असून,या  गस्ती वाहनामुळे जिल्ह्याच्या पोलीस दलाला बळकटी प्राप्त होणार आहे. तसेच डायल ११२ च्या माध्यमातून संकटकालीन वेळेत सामान्य जनतेपर्यंत पंधरा मिनिटात पोहचणे शक्य होणार आहे. तसेच पालकमंत्री महोदयांनी यासाठी निधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.  अपर पोलीस अधिक्षक पियुष जगताप यांनी आभार मानले.

‘शासन आपल्या दारी’ उपक्रम चळवळ म्हणून राबवा- पालकमंत्री गुलाबराव पाटील

        जळगाव, दि. १६ (जिमाका वृत्तसेवा) : ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम अधिकारी व कर्मचारी यांनी समन्वयातून चळवळ  म्हणून यशस्वी करावा. शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यांला देऊन  “शासन आपल्या दारी” चा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. येथील हेडगेवार नगरातील जी.एस. मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अमन मित्तल होते.

दोन महिन्यात तालुक्यातील विविध शासकीय योजनांच्या १८१८९ लाभार्थ्यांपैकी प्रातिनिधीक स्वरूपात २५७ लाभार्थ्यांना ना. पाटील व जिल्हाधिकारी यांच्या हस्ते लाभाचे वाटप करण्यात आले. लवकरच जिल्हा स्तरावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.

प्रास्ताविक तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी केले. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी लोककल्याणकारी योजना सर्वसामान्यांना मिळवून देण्यासाठी जाणवपूर्वक प्रयत्न करावेत असे आवाहन केले. सूत्रसंचालन मंडल कृषी अधिकारी किरण देसले यांनी केले. तर  आभार नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते यांनी मानले.

लाभार्थ्यांमध्ये श्रावणबाळ, संजय गांधी निराधार, कुटुंब लाभ, जात प्रमाणपत्र, इतर प्रमाणपत्रे, पोटखराब प्रकरणांचे प्रमाणपत्र, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र आदींचा समावेश होता. पंचायत समितीच्या अंतर्गत ३०७७ लाभार्थ्यांमध्ये जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, नमुना ८-अ आणि विवाह प्रमाणपत्र, शबरी आवास योजना, दारिद्रयरेषेखाली प्रमाणपत्र, वैयक्तीक शोषखड्डे, गोठे बांधकाम, सिंचन विहिरी, बायोगॅस बांधकाम, वैयक्तीक शौचालय, यांचा समावेश होता. नगरपालिका अंतर्गत ४८३ योजना लाभार्थ्यांमध्ये जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, प्रधानमंत्री आवास योजना, दिव्यांगांना लाभ, बचतगटांना एन.ओ.सी. आदींचा समावेश होता. आरोग्य विभागामार्फत पाच लाख रूपयांपर्यंतच्या लाभासाठी आरोग्य खात्याचे गोल्डन कार्ड तर महावितरण कंपनीतर्फे ३० नवीन वीज जोडणी प्रदान करण्यात आली. कृषी विभागामार्फत फळबाग, ठिबक, यांत्रीकीकरण व आत्मागट यांचे लाभार्थी होते.

कार्यक्रमाला प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, तालुका कृषी अधिकारी प्रदीप चव्हाण, नगरपालिकेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार, पी. एम. पाटील, गजानन पाटील, चंद्रशेखर अत्तरदे, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, जिजाबराव पाटील, नगरपालिकेचे अधिकारी संजय मिसर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया बोरसे, तालुका निबंधक विशाल ठाकूर, महावितरणचे सुनील रेवतकर, वर्ड व्हिजनचे जितेंद्र गोरे, मंडल कृषी अधिकारी किरण देसले,  मंडळ अधिकारी भरत पारधी आदींसह नागरिक,  लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन मंडल कृषी अधिकारी किरण देसले यांनी केले. तर आभार नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते यांनी मानले.

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या मुलाखत

मुंबई, दि. 16 : राज्यात 15 जूनपासून यंदाच्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. या शैक्षणिक वर्षात राज्य शासन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली आहेत.

ही विशेष मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत उद्या शनिवार, दि. 17 जून  2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक विवेक भावसार यांनी ही मुलाखत घेतली आहे.

000

 

 

सरळसेवा भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातच मिळणार रहिवासी दाखला – मंत्री डॉ. विजयकुमार गावित

मुंबई दि. १६ : अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित १७ संवर्गातील सरळसेवेची पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सरळसेवेच्या पद भरतीसाठी अर्ज करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) रहिवासी दाखला हा संबंधित  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात  विहित मुदतीत उपलब्ध होणार असल्याचे, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.

मंत्री डॉ. गावित म्हणाले, मा. राज्यपाल  यांच्या दि.२९.०८.२०१९ च्या अधिसूचनेनुसार अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) १७ संवर्गातील सरळसेवेची पदे भरण्याची  मान्यता मिळाली आहे. राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या ५० टक्के पेक्षा अधिक आहे, अशा सर्व गावांमध्ये १७ संवर्गातील सरळसेवेची १०० टक्के पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय झालेला आहे. सरळसेवेच्या पद भरतीसाठी अर्ज  करणाऱ्या उमेदवारांना  प्रकल्प कार्यालयात रहिवासी दाखला मिळणार आहे. याबाबतचे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या  संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

0000

शैलजा पाटील/विसंअ/

राष्ट्रीय आमदार संमेलनात नाविन्यपूर्ण माहितीच्या प्रदर्शनाचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, दि. १६ : देशातील विधानपरिषदांचे सभापती आणि विधानसभांचे अध्यक्ष, लोकप्रतिनिधी यांच्या राष्ट्रीय आमदार संमेलनात आयोजित नाविन्यपूर्ण माहितीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आले.

एमआयटीच्यावतीने जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, वांद्रे येथे आयोजित पहिल्या राष्ट्रीय आमदार संमेलन प्रदर्शन कार्यक्रमाला विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, पद्मविभूषण तथा जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, पद्मश्री अनिल गुप्ता, एमआयटीचे विश्वनाथ कराड आदी मान्यवर उपस्थिती होते.

संमेलनात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सामाजिक नाविन्यपूर्ण प्रदर्शनात सर्वोत्कृष्ट काम केलेल्या देशभरातील ७५ मंत्री, आमदारांच्या कामाची माहिती, उत्कृष्ट ७५ स्टार्टअप, जगभरातील लोकशाही देशांची माहिती आणि भारतीय छात्र संसद याबाबतची माहिती देण्यात आली. या प्रदर्शनाची पाहणी मान्यवरांनी केली.

माती आणि पाण्याच्या उपक्रमाचे श्री. बिर्ला यांच्याकडून कौतुक

देशभरातून विविध मान्यवरांनी आणलेल्या माती आणि पाणी यांची पाहणी मान्यवरांनी केली. देशातील ५० आमदारांनी युथ पार्लमेंट स्थापन करणार असल्याचे यावेळी सांगितले. या उपक्रमाचे लोकसभा अध्यक्ष श्री. बिर्ला यांनी कौतुक केले. १५ जून ते १७ जून या कालावधीत आयोजित या संमेलनात अनेक मान्यवर आपले विचार मांडणार आहेत. यात राज्यातील विकासकामांबद्दल चर्चा, अनुभव, कल्पना आणि विविध योजना या विषयांवर विचारमंथन होणार आहेत. तसेच महत्त्वाच्या विषयांवर परिसंवाद होणार आहेत.

000

काशीबाई थोरात/विसंअ/

गुन्हेगारांवर कायद्याची वचक निर्माण करा- पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

           सांगली दि. 16 (जि.मा.का.) :-  गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आहेतपोलीस दलाने याबाबत अधिक दक्षता  घेतली पाहिजे. जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून गुन्हेगारांवर कायद्याची वचक निर्माण कराअशा सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिल्या.

        पोलीस मुख्यालयातील सभागृहात पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेलीसांगली शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधवविटा व तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदमइस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाणजत उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल साळुंखेपोलीस निरीक्षक सतीश शिंदेसतीश कदम उपस्थित होते.

            पालकमंत्री डॉ. खाडे यांनी सांगितलेगुन्हेगारीकरण रोखण्यासाठी पोलिसांनी व्यापक मोहीम हाती घ्यावी.  गुन्हेगारांवर कायद्याची वचक निर्माण झाली पाहिजे यासाठी  कोणताही मुलाहिजा न ठेवता कडक कारवाई करण्यात यावी. नशेखोर लोकांवर कारवाई केल्यास गुन्हेगारीचे प्रमाण कमी होईल असेही त्यांनी सांगितले.

            अवैध धंदे बंद झाल्यास गुन्हेगारीला आळा बसू शकेल, असे सांगून पालकमंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले,  गुन्हे का घडतात याचीही उकल होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसापासून खुनाचे प्रमाण वाढले आहे ही चिंतेची बाब आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन जनतेला असुरक्षितता वाटू नये यासाठी पोलीस दलाने अधिक जागरूक राहणे आवश्यक आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटी स्थापन करण्यात यावी, अशा सूचनाही पालकमंत्री डॉ. खाडे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.

            पोलीस अधीक्षक डॉ. तेली यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थे संदर्भात पालकमंत्र्यांना माहिती दिली. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच व गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस दलामार्फत व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहेअसे त्यांनी सांगितले.

कोणतेही गाव पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही यासाठी दक्षता घ्या- पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

        सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : सद्यस्थितीत पाऊस लांबला आहे. अलनिनोचे संकट आले तर जुलै अखेर पुरेल एवढा पिण्याच्या पाण्याचा साठा कोयना धरणात ठेवण्यात आला आहे. माणसे आणि जनावरे यांच्या पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात आल्याने टप्प्याटप्प्याने उपसा बंदी करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत शेतीला पाण्याचा पुरवठा करणे अवघड असून जनतेने पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.

        ताकारीटेंभूम्हैसाळआरफळ  या योजनांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुखनिवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटीलउपजिल्हाधिकारी विजया पांगारकरपाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकरम्हैसाळ २ उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता  सचिन पवार, टेंभू उपसा सिंचन १ चे कार्यकारी अभियंता अभिनंदन हरूगडे, ताकारी उपसा सिंचन योजनेचे राजन डवरी, टेंभू उपसा सिंचन योजना २ चे उपविभागीय अभियंता सुशील गायकवाड व ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे उप विभागीय अभियंता अमित डवरी, एमएसईबीचे श्री. पेठकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

        पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, जूनचा मध्यावधी संपला तरी पाऊस झालेला नाही. आणखी काही दिवस पाऊस लांबल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे माणसे आणि जनावरे यांना पिण्याचे पाणी कमी पडणार नाही व पिण्याच्या पाण्यापासून एकही गाव वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊन यंत्रणांनी आवश्यक नियोजन करावेअसे निर्देश पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले. या बैठकीत त्यांनी टेंभूताकारीम्हैसाळआरफळ या योजनांचा आढावा घेतला. कोयना धरणात 11.74 टीएमसी तर वारणा धरणात 11.28 टीएमसी पाणीसाठा आहे. कोयनेतून सध्या 1050 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. टेंभू योजनेचे 9 पंप सुरू असून 12 टीएमसी पाणी उचलले गेले आहे. तर ताकारी योजनेतून 4.85 टीएमसी पाणी उचलले आहे. म्हैसाळ योजनेतून  7.20 टीएमसी पाणी उचलले आहे. तर नदीवरील उपसा 21 टीएमसी  असा एकूण 45 टीएमसी पाण्याचा उपसा झालेला आहे.

कोयनेतून 1050 क्युसेक्स पाणी सोडणे सुरू असले तरी  नदीतील डोह भरल्याशिवाय पाणी पुढे प्रवाहीत होत नाही त्यामुळे नदीपात्रात पाणी अत्यंत अत्यल्प आहे. पिण्यासाठी पाणी राखीव ठेवणे सद्यस्थितीत आवश्यकच असल्याने उपसा बंदी लागू करण्यात आल्याची माहिती या बैठकीत जलसंपदा अधिकाऱ्यांनी दिली. म्हैसाळ योजनेतील रखडलेले पाईपलाईनचे काम तातडीने मार्गी लावा त्यासाठीचा आवश्यक ड्रोन सर्व्हेमोजणी करून घ्या. भूसंपादनासाठी नोटीसा बजावाकागदोपत्री प्रक्रिया त्वरीत पूर्ण करून घ्याअसे निर्देशही पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले.

            नदीकाठच्या गावांना पिण्याचे पाणी कमी पडणार नाही, जेथे तलावातून पाणी पुरवठा होतो तेथे यंत्रणांनी संबंधित गावांमध्ये बैठका घेवून पाण्याची स्थिती लोकांना समजावून सांगावी आणि तलाव कोरडे पडू नयेत यासाठी तातडीने लोकांना विश्वासात घेवून पाण्याचे नियोजन करावे, असे निर्देश यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले. यावेळी त्यांनी आवश्यकता भासल्यास टँकरची तजवीज करा, त्यासाठी आराखडे तयार करा.  गावनिहाय पाण्याचा उपलब्धतेचा अहवाल तयार करा पण कोणत्याही स्थितीत पिण्याच्या पाण्याची  कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्याअसे सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लातूर पोलीस दलाला १५ चारचाकी वाहने सुपूर्द

लातूर, दि. १६ (जिमाका) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अत्याधुनिक १५ चारचाकी वाहने लातूर पोलीस दलाला सुपूर्द करण्यात आली. जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त सुमारे १ कोटी २४ लाख रुपये निधीतून ही वाहने खरेदी करण्यात आली आहेत.

विविध कार्यक्रमांसाठी तुळजापूरकडे रवाना होण्यासाठी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे लातूर विमानतळावर आगमन झाले होते. यावेळी त्यांच्या हस्ते पोलीस दलाच्या वाहनांना हिरवी झेंडी दाखविण्यात आली.

आमदार प्रवीण दरेकर, आमदार रमेश कराड, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यावेळी उपस्थित होते.

लातूर पोलीस दलाच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेली १५ चारचाकी वाहनांमुळे ‘डायल ११२’ अंतर्गत पूल प्राप्त तक्रारीची दखल घेवून  गुन्ह्याच्या ठिकाणी तातडीने पोहचण्यास उपयोग होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यास मदत होणार आहे.

00000

ताज्या बातम्या

येत्या पाच वर्षात ‘जीएसडीपी’ ३५ लाख कोटींवर नेण्याचे ध्येय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, दि. २८: शासन ही एक संस्था आहे. संस्था म्हणून याची क्षमता आणि संस्थात्मक बांधणी योग्य रीतीने झाली तर आपण मोठे परिवर्तन साध्य करू...

संपेल वीजबिलाचा अंक, मिळेल मागेल त्याला सौर पंप !

0
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये सध्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ या योजनेविषयी चर्चा सुरू आहे. राज्य सरकारने मागेल त्याला सौरपंप ही योजना आणली आहे. याअंतर्गत 9...

सूर्यकांत मांढरे यांच्या जुन्या मराठी सिनेमांचे मोफत प्रदर्शन – मंत्री ॲड. आशिष शेलार

0
कोल्हापूर, दि. २८ : येत्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून बाराशे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून, ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत...

वसतिगृहातील विद्याथ्यांची प्रवेश क्षमता वाढविणार – मंत्री संजय शिरसाट

0
नागपूर, दि. २८: अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात प्रवेशासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यार्थी क्षमतेत वाढ करण्याची गरज लक्षात घेऊन वसतिगृहाची प्रवेश क्षमता वाढविण्यासाठी प्रस्ताव...

क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कडबनवाडी येथे जिप्सी सफारी उपक्रमाचे...

0
पुणे, दि.२८: क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कडबनवाडी येथील गवताळ प्रदेशामध्ये जिप्सीमधून करण्यात येणाऱ्या सफारी उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. नागरिकांनी...