रविवार, जून 29, 2025
Home Blog Page 1307

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली स्वातंत्र्य सैनिक भास्कर नायगांवकर यांची सदिच्छा भेट

उस्मानाबाद, दिनांक 16 (जिमाका) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या  उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यात स्वातंत्र्यसैनिक भास्कर सांभराव नायगांवकर यांच्या घरी जावून त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार सर्वश्री  राणा जगजितसिंह पाटील, प्रविण दरेकर, अभिमन्यू पवार आदी मान्यवर  उपस्थित होते.

उपमुख्यमंत्र्यांनी श्री.नायगांवकर यांच्याशी संवाद साधतांना त्यांचे स्वातंत्र्य लढयातील अनुभव जाणून घेतले. श्री. नायगावकर यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उपमुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना भेटण्यासाठी वेळ दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. त्यांनी उस्मानाबाद येथे केंद्रीय विद्यापीठ स्थापन करण्याची, मराठवाडा मुक्ती संग्रामावर आधारित चित्रपट निर्मिती करण्याची, स्मारके उभारण्याची मागणी केली. याप्रसंगी चिलवडी येथील स्वातंत्र्य सैनिक बुबासाहेब जाधव यांनीही उपमुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.त्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामात चिलवडी व उस्मानाबाद जिल्ह्याच्या योगदानाबाबत माहिती दिली. यावेळी श्री.जाधव यांनी  “असे झुंजलो आम्ही” आणि जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्रकाशित करण्यात आलेली “वैभवशाली उस्मानाबाद” ही पुस्तके भेट दिली तर उपमुख्यमंत्र्यांच्या  हस्ते श्री. नायगांवकर यांच्या “माझा मी चा शोध” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी त्यांनी  “हा एक जन्म”, “एक जिज्ञासा” आणि “सागरातील निवडक रत्ने” ही पुस्तके उपमुख्यमंत्र्यांना  भेट दिली.

****

तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामांचे उपमुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण

उस्मानाबाद, दि. 16 (जिमाका) : तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता मंदीर आणि शहर परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबर भाविकांचे तुळजाभवानीचे दर्शन सुलभ आणि जलदगतीने व्हावे यासाठी प्रस्तावित तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात सुयोग्य नियोजन करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.

आज उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि उपस्थित मान्यवरांनी तुळजाभवानी चे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिर सभागृहात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांसमोर तुळजापूर तीर्थक्षेत्र विकासाच्या  पहिल्या टप्प्यातील १ हजार १७४ कोटी रुपयांच्या प्रस्तावित आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीस आमदार सर्वश्री  प्रवीण दरेकर, राणा जगजितसिंह पाटील, अभिमन्यू पवार, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

मंदिराच्या सध्याच्या वास्तुचे जतन आणि संवर्धन, सेवा सुविधांमध्ये दर्जात्मक वाढ, मंदिर परिसर आणि शहरातील पायाभूत सुविधांचा विकास, भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन सध्याच्या सोयी सुविधांचा विकास आणि विस्तार, गर्दीचे व्यवस्थापन या मुद्दांचा प्रामुख्याने प्रस्तावित आराखड्यात विचार करण्यात आला आहे.

मंदिर गाभारा आणि परिसरातील काही भागाच्या नुतनीकरण आणि दुरूस्तीच्या कामांबरोबरच वाहनतळ व्यवस्था, ऑडीटोरियम, सीसीटीव्ही, नागरिक संबोधन कक्ष, वातानुकूलित सभागृहे ज्यातून दर्शन रांग पुढे जाईल व टप्प्या टप्पयाने भाविकांना मंदिरात प्रवेश मिळेल अशी व्यवस्था यासारखी कामे आराखड्यात प्रस्तावित करण्यात आली आहेत.    तुळजापूर शहरालगत असलेल्या रामदरा परिसरात उद्यान साकारले जाणार असून येथे  कुलस्वामिनी तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देतानाचा भव्य पुतळा उभारण्याचे नियोजन आहे.  शहराच्या प्रत्येक प्रमुख मार्गावर दगडी कमानी उभारण्याचेही आराखड्यात प्रस्तावित आहे. मंदिर, तुळजापूर शहर परिसरातील संपूर्ण भागाचा विकास करणे, धार्मिक पर्यटनाला चालना देऊन स्थानिकांना रोजगाराच्या संधीचा विकास करण्याच्यादृष्टीने आराखड्यात कामे प्रस्ताविक करण्यात आली असल्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सादरीकरण करतांना सांगितले.

*****

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना योजना, सेवांच्या लाभाचे वाटप

पुणे, दि. १६: ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यत शासकीय योजना पोहचविण्यासाठी शासन व प्रशासन प्रयत्नशील असून शेवटच्या नागरिकाला विविध योजनांचा लाभ मिळेपर्यंत हे अभियान सुरू राहील, अशी ग्वाही  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील  ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते शासकीय योजना व विविध सेवांच्या लाभाचे प्रातिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, महेश लांडगे, अश्विनी जगताप, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त राहुल महिवाल, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणा गतीमान करण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. पुणे जिल्ह्यात 2 लाख 86 हजार 278 लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यात आले. आतापर्यंत राज्यात 35 लाख नागरिकांपर्यंत शासन पोहोचले आहे. 104 शिबिराच्या माध्यमातून 286 कोटी रुपयांचा लाभ नागरिकांना देण्यात आला आहे. या अभियानामुळे कोणीही लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही.

 मंत्रिमंडळाच्या माध्यमातून अनेक जनहिताचे निर्णय

मंत्रिमंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. शेतकरी, कष्टकरी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव, महिला भगिनींसाठी महत्वाचे निर्णय घेतले. ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी प्रवास मोफत व महिलांसाठी प्रवास शुल्कात 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. शासनाच्या निर्णयांचा सर्वसामान्य जनतेला लाभ होत आहे.

‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेनुसार राज्य शासनही 6 हजार रुपये भर घालणार असल्याने 12 हजार इतका वार्षिक लाभ पात्र शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे. राज्यातील 18 हजार कोटी रुपयांच्या 29 सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली, त्यामुळे 6 ते 7 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून एनडीआरएफच्या निकषांच्या दुप्पट निधी देण्याचा आणि सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई देता यावी यासाठी 1 हजार 500 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड परिसर विकासासाठी महत्वाचे निर्णय

पिंपरी चिंचवड विकासासाठी अनेक निर्णय घेतले. 2018 ते 2023 पर्यंतचे विकास आणि बांधकामाचे अतिरिक्त विकास शुल्क 100 टक्के माफ करण्याचा निर्णय. एप्रिल 2023 पासून क्षेत्रनिहाय तपासून आकारणीचा निर्णय घेण्यात आला आहे. मोशी येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी अडीच एकर जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील अनधिकृत बांधकामासाठीचा 460 कोटी रुपयांचा शास्तीकर माफ करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या भूसंपादनामुळे बाधित झालेल्या भूमिपूत्रांचा प्रश्न सोडविण्यात येईल, असेही ते म्हणाले.

जिल्ह्याच्या विकासाला गती

पालखी मार्ग आणि पुणे-मिरज रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. चांदणी चौकातील कामही पूर्ण होत आहे. जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आणि वढू बुद्रुक येथे संभाजी महाराज स्मारक काम लवकरच सुरू करण्यात येईल. यशवंतराव चव्हाण स्मारकासाठी 5 कोटी रुपये देण्यात येतील. पुण्यातील नद्यांमधील पाणी निर्मळ राहावे यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जलशुद्धीकरणासाठी निधी देण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

महिला सक्षमीकरणासाठी महत्वाची पाऊले

‘लेक लाडकी लखपती’ ही योजना महिला व मुलींच्या विकासासाठी सुरु करण्यात आली आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. प्रशासनाने बचत गटाच्या उत्पादनांना बाजार उपलब्ध करून देण्याचा आणि फिरता निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात येईल. राज्यात 2 कोटी पेक्षा अधिक महिलांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न आहे. संजय गांधी निराधार योजनेसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची मुदत 5 वर्ष करण्यात येईल, असेही श्री.शिंदे यांनी सांगितले.

राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना

लोकांचे जीवन सुखी, आनंदी करणे आणि त्यांच्या आयुष्यात अनुकूल बदल घडवून आणणे हे शासनाचे उद्दीष्ट आहे. म्हणूनच सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी घेवून त्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात येत आहेत.  राज्यात पायाभूत सुविधांचे अनेक मोठे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र प्रथम स्थानावर असून गेल्या सुमारे 11 महिन्यात 1 लाख 18 हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आणल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

शिबिरांतर्गत नागरिकांना विविध योजना आणि सेवांचा लाभ

मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत प्रातिनिधीक स्वरुपात शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वाटप, महापालिकेच्या समाजविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनेअंतर्गत लाभांचे वितरण तसेच विविध दाखल्यांचे मोफत वाटप करण्यात आले. जेएनएनयुआरएम योजनेअंतर्गत महापालिकेच्यावतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनेतील सहा इमारतींमधील 252 सदनिकांचे वाटप यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात करण्यात आले. कोविड संकटाच्या काळात महानगरपालिकेमार्फत नियुक्त केलेल्या मयत कामगारांच्या वारसांना कोरोना विषाणू विमा कवच योजनेच्या प्रत्येकी 25 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. शेवटी कृषि यांत्रिकीकरण योजनेंतर्गत शेतकरी लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले.

शिबिरात विविध योजनांची माहिती

या कार्यक्रमासाठी थेरगाव येथील पदमजी पेपर मिलजवळ भव्य मंडपात विविध कक्ष तयार करण्यात आले होते. नागरिकांना याठिकाणी विविध योजनांची माहिती देण्यात आली. उत्पन्नाचा दाखला, नवीन मतदार नोंदणी, रहिवासी दाखला, सातबारा, आठ अ, हवेली तालुक्यातील रहिवाशांकरिता जातीचा दाखला, वय, अधिवास आणि राष्ट्रीयत्व दाखला, 33 टक्के महिला आरक्षण दाखला, ज्येष्ठ नागरिकत्वाचा दाखला देण्याची सुविधा करण्यात आली होती.  आधार कार्डमधील नवीन दुरूस्ती व अद्यावत करणे, मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक करणे, शिधापित्रकेवरील नाव कमी करणे, रेशनकार्डवरील नाव वाढविणे, संजय गांधी निराधार अनुदान योजना, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचा दाखला, नॉन क्रिमीलिअर, उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचा दाखला देणे आदी सेवाही यावेळी देण्यात आल्या.

****

 

 

‘दिलखुलास’ कार्यक्रमात मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती

मुंबई, दि. 16 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर सोमवार दि.  19 जून, 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत हा ‘दिलखुलास’ कार्यक्रम प्रसारित होईल.

0000

 

 

मुंबई उपनगर जिल्ह्यातील शिष्यवृत्ती, फ्री-शिप योजनेंतर्गत प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑफलाईन अर्ज करावेत – सहायक आयुक्त प्रसाद खैरनार

मुंबई दि. १६ : मुंबई उपनगर जिल्ह्यातील सन २०१८-१९ ते सन २०२१-२२ या वर्षात ज्या इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती/फ्रिशीप योजनेअंतर्गत अर्ज केले होते, त्यांचे या योजनेंतर्गत प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑफलाईन अर्ज आपल्या संबंधित महाविद्यालयास दि.२० जून २०२३ पर्यंत  सादर करावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार  यांनी केले आहे.

महाडिबीटी प्रणालीवर अर्ज नोंदणी करताना येणाऱ्या विविध अडचणींमुळे (महाविद्यालय बदल, शिक्षणात खंड इ), अर्ज ऑटो रिजेक्ट होणे या कारणामुळे अनेक पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला नाही. तरी या विद्यार्थ्यांनी वेळेत ऑफलाईन अर्ज महाविद्यालयात जमा करावयाचे असून ते अर्ज मुंबई उपनगर अधिनस्त सर्व महाविद्यालयांनी दि.२२ जून २०२३ पर्यंत  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, चेंबूर, मुंबई-४०००७१ कार्यालयाकडे करावयाचे आहेत, असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण  प्रसाद खैरनार यांनी कळविले आहे.

000

शैलजा पाटील/विसंअ/

शिवतीर्थाला धक्का न लावता लोकनेते बाळासाहेब देसाई या नावाने नव्याने आयलँड तयार करणार- पालकमंत्री

सातारा, दि.16-शिवतीर्थाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता पूर्वीच्या परंतु आत्ता काढून टाकण्यात आलेल्या आयलँडच्या ठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावे नव्याने आयलँड तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

पोवईनाका परिसरात लोकनेते बाळासाहेब देसाई आयलँड सुशोभीकरण करण्याबाबत आढावा बैठक नियोजन भवन,जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी,मुख्य कार्यकारी अधिकारी  ज्ञानेश्वर   खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख,नगरपालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

युनायटेड वेस्टर्न बँकेचे पूर्वी एक आयलँड होते हे आयलँड ग्रेड सेपरेटच्या कामांमध्ये काढून टाकण्यात आले आहे. त्याठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावाने आयलँड तयार करण्यात येणार आहे. यामध्ये बगीचा यासह  अत्याधुनिक पद्धतीचा वापर करून आयलँड तयार करण्यात येणार आहे. याबाबत राजघराण्याची काय शंका असल्यास त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली जाईल असेही पालकमंत्री श्री देसाई यांनी सांगितले.

प्रौढ मूकबधिर प्रशिक्षणार्थींसाठी सन २०२३-२४ या वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरु

मुंबई, दि. १६ : शासकीय प्रौढ मूकबधीर प्रशिक्षणकेंद्र उल्हासनगर-५, जि. ठाणे या संस्थेत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरीता प्रौढ मूकबधिर प्रशिक्षणार्थींना प्रवेश देण्यात येणार आहेत. इच्छुकांनी २० जुलै २०२३ पर्यंत अर्ज  करावेत, असे आवाहन अधीक्षक शासकीय प्रौढ मूकबधिर प्रशिक्षण केंद्र उल्हासनगर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे अंतर्गत असलेल्या शासकीय प्रौढ मूकबधिर प्रशिक्षणकेंद्र उल्हासनगर-५, जि. ठाणे या संस्थेत १६ ते ४५ वर्ष या वयोगटातील, इयत्ता ६ वी (वरिष्ठ) उत्तीर्ण, कोणताही गंभीर आजार नसलेले व जिल्हा शल्य चिकित्सक यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र, किमान ४० टक्के कर्णबधीर असलेल्या मुलांना औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या धर्तीवर सुतारकाम, जोडारी, तारतंत्री यासंबंधी एक वर्षीय प्रशिक्षण विभागांमध्ये देण्यात येते.

प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क वगळता निवास, भोजन व शैक्षणिक साहित्य विनामूल्य पुरविण्यात येते.

प्रवेश अर्जाचे वाटप कामकाजाचे दिवशी शासकीय सुट्ट्या वगळून कार्यालयीन वेळेत शासकीय प्रौढ मूकबधिर प्रशिक्षण केंद्र, शांती भवन, निजधाम आश्रम समोर, तहसिल कार्यालयाजवळ, गांधीरोड ५. उल्हासनगर, जि. ठाणे या कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. टपालाने अर्ज मागवावयाचे असल्यास वरील पत्त्यावर रु.१०/- चे पोस्टाचे तिकीट लावलेले व स्वतःचा संपूर्ण पत्ता असलेला (पिनकोडसह) लिफाफा पाठवावा. अर्ज व्यक्तिशः किंवा टपालाद्वारे दिले जातील. असे  अधीक्षक शासकीय प्रौढ मूकबधिर प्रशिक्षण केंद्र उल्हासनगर- ५ यांनी कळविले आहे. (संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक- ९२८४९३७८१३, ९०२१४०३९३८, ८६०००११४८९)

०००००

शैलजा पाटील/विसंअ/

विविध विकास कामांचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा

सातारा दि. 16. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सातारा लोकल बोर्ड इमारतीचे प्रस्तावित नूतनीकरण, भूस्खलनग्रस्त गावांचे पूनर्वसनासाठी जमिनी ताब्यात घेणे व एमएमआरडीए कडून घराचे मॉडेल तयार करणे, वन जमिनींना सौर कुंपण प्रस्ताव शासनास पाठवणे आदी विषयांचा आढावा घेतला.

या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्री. देसाई म्हणाले, भूस्ख्लन, पुरामुळे बाधित झालेल्या नऊ गावातील 614 कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.  त्यांच्या घरांच्या कामाचा शुभारंभ सप्टेंबर 2023 मध्ये  घेण्यात येणार आहे. तसेच वन विभागाच्या हद्दी जवळील शेतमालांचे वन्य प्राण्यांकडून नुकसान होत आहे. हे नुकसान थांबविण्यासाठी सौर कुंपणाच्या प्रस्तावाला शासनाकडून मान्यता देण्यात येईल.

जिल्हा परिषदेमधील जुन्या लोकल बोर्डाची इमारतीची डागडुजी करून पूर्वी जशी इमारत होती तशीच जुन्या इमारतीचे सौंदर्य व्यवस्थित जतन करण्यात येणार आहे. त्यामध्ये लोकल बोर्डाचे पहिले अध्यक्ष ते शेवटचे अध्यक्ष यांचे छायाचित्रे व कार्यकाल, इतिहास या इमारतीमध्ये लावावे, अशा सूचनाही पालकमंत्री श्री देसाई यांनी  दिल्या.

देशाला आत्मनिर्भर बनविण्यात वालचंद हिराचंद यांचे योगदान मोठे – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. 16 : स्वयंचलित वाहन निर्मिती, विमान निर्मिती, जहाज निर्मिती यांसह अनेक पायाभूत क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी पृथ्वी, जल, आकाश अशा तिन्ही लोकात भारताचा झेंडा रोवला. देश पारतंत्र्यात असताना प्रतिकूल परिस्थितीत उद्योगविश्व निर्माण करणाऱ्या हिराचंद यांचे योगदान सुवर्णाक्षरांनी लिहावे इतके मोठे असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

वालचंद हिराचंद यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरच्या वतीने राजभवन येथे ५० व्या  वालचंद स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला प्रामुख्याने उपस्थित होते.

आपण शाळेत असताना ‘मेड इन जर्मनी’च्या वस्तूंचा बोलबाला होता; पेनाची निब सुद्धा जर्मनीची असायची. कालांतराने ‘मेड इन जपान’चा काळ आला व अलीकडे ‘मेड इन चायना’चे दिवस आले. परंतु एकविसावे शतक ‘मेड इन इंडिया’चे असेल असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.  आज भारत आत्म-निर्भर देश होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे, त्याचे मोठे श्रेय वालचंद हिराचंद यांचेकडे जाते, असे राज्यपालांनी सांगितले.

वालचंद हिराचंद यांनी जहाज वाहतूक क्षेत्राला संजीवनी दिली. त्यांनी सुरु केलेल्या  महाराष्ट्र चेंबरने उद्योग व वाणिज्य या शिवाय कृषिक्षेत्राला महत्व दिले असे सांगून चेंबरने फलोत्पादन, फुलशेती, भरडधान्य शेती यांसह सेंद्रिय शेतीला चालना द्यावी असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

 

वालचंद हिराचंद यांचे जीवन प्रेरणादायी : ओम बिरला 

भारत ही संत, शूरवीर योद्धे आणि समाज सुधारकांची जशी भूमी आहे, तशीच ती महान उद्योजकांची देखील भूमी आहे. वालचंद हिराचंद यांनी बिकट परिस्थितीत उद्योग उभारणीसह नवीनता व संशोधनाचे काम केले. उद्योग विकासाची दूरदृष्टी असलेल्या वालचंद हिराचंद यांचे जीवन प्रेरणादायी असल्याचे उद्गार ओम बिरला यांनी याप्रसंगी काढले.

आज देश स्वातंत्र्याच्या अमृतकाळातून प्रवास करीत असताना भारत प्रत्येक क्षेत्रात नवीनता व संशोधन करीत आहे. कोविड लसीकरण मात्रा जगाला उपलब्ध करुन भारताने जगाला वाचवण्याचे काम केले आहे. तंत्रज्ञान व जागतिक हवामान बदल आदी क्षेत्रांमध्ये देखील भारत जगाला दिशा देण्याचे काम करीत असल्याचे सांगून सामूहिक प्रयत्न केल्यास विकसित भारताचे स्वप्न साकार होईल, असे ओम बिरला यांनी यावेळी सांगितले.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते वालचंद हिराचंद यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ उद्योगपती अजित गुलाबचंद, अरविंद दोशी, वालचंदनगर वसाहतीचे प्रमुख चिराग दोशी, पद्मश्री  शरयू दोशी व पल्लवी झा यांचा सत्कार करण्यात आला.

चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी प्रास्ताविक केले तर माजी अध्यक्ष अरविंद दोशी यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमाला चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिल कुमार लोढा, विविध देशांचे वाणिज्यदूत तसेच निमंत्रित सदस्य उपस्थित होते.

००००

Governor, Lok Sabha Speaker pay tributes to Walchand Hirachand

Maharashtra Governor Ramesh Bais and Lok Sabha Speaker Om Birla paid rich tributes to industrialist Walchand Hirachand at the 50th ‘Walchand Memorial Lecture’ at Raj Bhavan, Mumbai on Fri (16 Jun).

The Walchand Memorial Lecture on the theme of ‘Atma Nirbhar Bharat’ was organised by the Maharashtra Chamber of Commerce, Industry and Agriculture. The Chamber was founded by Walchand Hirachand in the year 1927.

The Governor felicitated members of the Walchand family including Chairman of Hindustan Construction Ltd. Ajit Gulabchand, former President of MACCAI Arvind Doshi, Chirag Doshi, Sarayu Doshi and Pallavi Jha.

President of the Chamber Lalit Gandhi, Senior Vice President Anil Kumar Lodha, Consul Generals of various countries and Members of the Chamber were present.

0000

 

 

सावित्रीदेवी फुले शासकीय वसतिगृहातील मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत

मुंबई, दि. 16 : सावित्रीदेवी फुले शासकीय वसतिगृहामध्ये घडलेल्या घटनेच्या तपासासाठी गठीत केलेल्या समितीच्या प्राथमिक अहवालानुसार या  वसतिगृहाच्या अधीक्षिकेचे निलंबन करण्यात येत आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मंत्री श्री. पाटील यांनी आज मृत विद्यार्थीनीच्या कुटुंबियांची दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे भेट घेतली. त्यांचे सांत्वन करून न्याय देण्याचे आश्वासन यावेळी मंत्री श्री. पाटील यांनी दिले.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, “या घटनेची शासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. त्याच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली असून समितीच्या प्राथमिक अहवालानुसार वसतिगृहाच्या अधीक्षिका यांचे निलंबन करण्यात येत आहे.

यावेळी मंत्री श्री. पाटील यांनी कुटुंबियांना तपासाची सविस्तर माहिती दिली. तसेच पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. कुटुंबीयांनी खचून जाऊ नये, त्यांना मदत व्हावी म्हणून त्यांच्या मुलाला कंत्राटी पद्धतीने तात्पुरती नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारितील सर्व शासकीय वसतिगृहांच्या सुरक्षेचा सखोल आढावा घेऊन महिला सुरक्षा रक्षक देण्यात येतील, असेही यावेळी त्यांनी सांगितले. रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर, मृत विद्यार्थीनीचे नातेवाईक यावेळी उपस्थित होते.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

ताज्या बातम्या

सारथी संस्थेला निधी कमी पडू दिला जाणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
पुणे, दि. 29 : सारथी संस्थेच्या कामाला गती देण्याचे काम शासनामार्फत करण्यात येत असून त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. ही संस्था नवीन...

येत्या पाच वर्षात ‘जीएसडीपी’ ३५ लाख कोटींवर नेण्याचे ध्येय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, दि. २८: शासन ही एक संस्था आहे. संस्था म्हणून याची क्षमता आणि संस्थात्मक बांधणी योग्य रीतीने झाली तर आपण मोठे परिवर्तन साध्य करू...

संपेल वीजबिलाचा अंक, मिळेल मागेल त्याला सौर पंप !

0
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये सध्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ या योजनेविषयी चर्चा सुरू आहे. राज्य सरकारने मागेल त्याला सौरपंप ही योजना आणली आहे. याअंतर्गत 9...

सूर्यकांत मांढरे यांच्या जुन्या मराठी सिनेमांचे मोफत प्रदर्शन – मंत्री ॲड. आशिष शेलार

0
कोल्हापूर, दि. २८ : येत्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून बाराशे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून, ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत...

वसतिगृहातील विद्याथ्यांची प्रवेश क्षमता वाढविणार – मंत्री संजय शिरसाट

0
नागपूर, दि. २८: अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात प्रवेशासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यार्थी क्षमतेत वाढ करण्याची गरज लक्षात घेऊन वसतिगृहाची प्रवेश क्षमता वाढविण्यासाठी प्रस्ताव...