सोमवार, जून 30, 2025
Home Blog Page 1304

विदर्भातील ४१९९.७२ कोटी रुपयांच्या ११ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता

मुंबई, दि. 19 :- उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर नियामक मंडळाच्या 83 व्या बैठकीत 4199.72 कोटी रुपयांच्या 11 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, सचिव आणि कार्यकारी संचालक रा. द. मोहिते, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी उपस्थित होते.

बैठकीत एकूण 73 विषय मंजूर करण्यात आले. तसेच रु. 240.02 कोटीचे १२ दायित्व प्रस्ताव मंजूर करण्यात आले.  8 सिंचन प्रकल्प सौर उर्जेवर कार्यान्वित करण्यासाठी रु. 681.68 कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. सिंचन प्रकल्पांतर्गत विविध कारणांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई किंमत 3.79 कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. प्रकल्पाच्या भूसंपादन निवाड्यामधून सुटलेल्या मालमत्तांची मूल्यांकन रक्कम तसेच फळझाडे व वनझाडांचा मोबदला तसेच पुनर्वसनबाधित कुटुंबांना मोबदल्यातून सुटलेल्या, मालमत्तांचे मोबदला रक्कम १४८.४८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. असे एकूण 5273.69 कोटी रूपयांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले.

—-000—–

विद्यापीठांनी पदव्युत्तर विभाग, संशोधन संस्था बळकट कराव्यात – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. 19 : अनेक भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षण व संशोधनासाठी विदेशात जातात. यापैकी अनेकजण विदेशात स्थायी होण्याचा प्रयत्न करतात. आयआयटीतील अनेक विद्यार्थी विदेशात स्थायिक होतात. बुद्धिवंतांचे हे स्थलांतर थांबविण्यासाठी विद्यापीठांमधील पदव्युत्तर विभाग व संशोधन संस्था बळकट करण्याची गरज आहे. त्या दृष्टीने उद्योग आणि विद्यापीठांचे सहकार्य वाढले पाहिजे, माजी विद्यार्थ्यांना विद्यापीठाशी जोडले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी आज येथे केले.

रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा (बाटू) पंचविसावा दीक्षांत समारंभ राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या दूरस्थ उपस्थितीत सोमवारी (दि. १९) संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

दीक्षांत समारंभास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री तसेच रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. कारभारी काळे, प्राध्यापक व स्नातक उपस्थित होते.

जगात कुशल मनुष्यबळाची मागणी वाढत आहे. अनेक देशांमधील लोकसंख्येचे सरासरी वयोमान वाढत असल्यामुळे या देशांमध्ये युवा कुशल मनुष्यबळाची गरज भासत आहे.  एकट्या जर्मनीला वर्षाकाठी चार लाख कुशल मनुष्यबळ हवे आहे. या दृष्टीने जगात कोणत्या कौशल्याची मागणी आहे हे ओळखून त्यानुसार कौशल्य अभ्यासक्रम आखावे, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

देशाला आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी केवळ नोकरी करणारे युवक नको, तर उद्योजक, स्टार्टअप उद्गाते व नवोन्मेषक हवे आहेत, असेही राज्यपालांनी सांगितले.

गेल्या शतकात वेगवेगळ्या देशांच्या औद्योगिक उत्पादनांचा बोलबाला होता. पूर्वी जर्मनीच्या उत्पादनांना मागणी होती, कालांतराने ‘मेड इन जपान’ व अलिकडे ‘मेड इन चायना’ उत्पादनांची बाजारात उपलब्धता होती, असे नमूद करून एकविसावे शतक भारतात तयार झालेल्या उत्पादनांचे असेल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

विद्यापीठात कान्होजी आंग्रे अध्यासन सुरु करणार – उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त रायगड जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठामध्ये ‘शिवसृष्टी’ उभारणार आहे. तसेच सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या नावाने विद्यापीठात अध्यासन केंद्र सुरु केले जाणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले. या अध्यासनाच्या माध्यमातून सागरी विज्ञान, युद्धकला आदी विषयांचे अध्ययन केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

आज जगातील अनेक कंपन्यांचे मुख्याधिकारी भारतीय वंशाचे आहेत. परंतू अनेक उत्पादनांचे पेटंट दुसऱ्या देशांकडे असल्यामुळे देशाचा मोठा पैसा रॉयल्टीच्या रूपाने विदेशात जातो. विद्यापीठाने नाविन्यतेच्या माध्यमातून पेटंट प्राप्त केल्यास विदेशातून रॉयल्टी प्राप्त होऊन देश श्रीमंत होईल, असे श्री. पाटील यांनी सांगितले. राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये ‘बाटू’च्या उपकेंद्रांसाठी जागा देण्याबाबत आदेश काढण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यापीठ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आपले योगदान असल्याचे नमूद करून पुतळ्याच्या सुशोभिकरणासाठी आपण जिल्हा नियोजन निधीतून दिड कोटी रुपये विद्यापीठाला देणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले. कोकणातले तंत्रशास्त्र  विद्यापीठ देशात पहिल्या क्रमांकाचे विद्यापीठ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विद्यापीठाशी २७३ महाविद्यालये व संस्था संलग्न असून एकूण एक लाख अडतीस हजार विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे कुलगुरु डॉ.कारभारी काळे यांनी आपल्या अहवालात सांगितले. विद्यापीठाने संशोधन केंद्रे स्थापन केल्याचे सांगून विद्यापीठाचा ‘सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क’सोबत शैक्षणिक करार झाल्याचे त्यांनी सांगितले.

दीक्षांत समारंभात २२ हजार २६७ स्नातकांना अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, वास्तुशास्त्र, फार्मसी, हॉटेल व्यवस्थापन आदी विषयांमधील पदवी, पदव्युत्तर पदव्या व पदविका प्रदान करण्यात आल्या. यामध्ये १३ उमेदवारांना पीएच.डी. पदव्या प्रदान करण्यात आल्या.

**

Maharashtra Governor presides over 25th Annual Convocation of Dr Babasaheb Ambedkar Technological University

Maharashtra Governor and Chancellor of State universities Ramesh Bais presided over the 25th Annual Convocation of the Dr. Babasaheb Ambedkar Technological University (BATU), Lonere Dist Raigad through online mode on Mon (19 June).

Minister of Higher and Technical Education Chandrakant Patil, Minister of Industries Uday Samant, Vice Chancellor of BATU Dr. Karbhari Kale and Members of the Executive and Academic Council, members of faculty, invitees and graduating students were present.

Degrees, Post Graduate Degrees and diplomas were awarded to 22267 graduating students on the occasion. These include 13 candidates who were awarded Ph.D.

**

सांस्कृतिक कार्य विभागात आता शंभर टक्के ई-ऑफिस; प्रशासन होणार पारदर्शी आणि गतिमान

मुंबई, दि. 19 : राज्य शासनाने मंत्रालयातील विविध विभागात प्रत्यक्ष फाईल्सचा होणारा प्रवास, त्यासाठी नागरिकांना वारंवार मारावे लागणारे हेलपाटे आदी बाबींतून मुक्त होऊन ही प्रक्रिया अधिक सोपी, सुलभ होण्यासाठी सर्व पत्रव्यवहार ई-ऑफिस प्रणालीमार्फत करण्याचा निर्णय घेतला. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली आता सांस्कृतिक कार्य विभागात शंभर टक्के ई-ऑफीसचा वापर सुरु करण्यात आला आहे. यामुळे आता सर्व प्रत्यक्ष स्वरुपातील फाईल्स आणि टपाल बंद करण्यात आले असून आता ते केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेच हाताळले जात आहे.

सामान्य प्रशासन विभागाने मंत्रालयीन सर्व विभागांना ई-ऑफिस प्रणालीचा वापर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अनावश्यक पत्रव्यवहार टळावा, विभागांतर्गत विविध फाईल्सचा जलद निपटारा व्हावा, नागरिकांकडून विविध विषयांवर आलेल्या पत्रव्यवहारांबाबत गतीने निर्णय व्हावेत, या उद्देशाने ई-ऑफिस प्रणाली सुरु करण्याच्या सूचना होत्या. सांस्कृतिक कार्य विभागाने यासाठी पुढाकार घेतला. याबाबत ई-ऑफिस सुरु करण्याच्या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून प्रधान सचिव विकास खारगे यांनी विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. सांस्कृतिक कार्य विभाग ई-ऑफिस सुरू करण्यात आघाडीवर ठरला आहे.

सांस्कृतिक कार्य विभागाकडे आलेल्या विविध पत्रव्यवहारांचे स्कॅनिंग करुन ते विषयवार संबंधित कक्ष अधिकारी, त्यानंतर उपसचिव, सहसचिव अशा पद्धतीने ई- प्रणालीद्वारे संबंधितांच्या टिपणीसह पुढे पाठविली जातात. यामुळे संबंधित विषयांवर निर्णयातील दिरंगाई आता पूर्णपणे कमी होण्यास मदत होणार आहे. सर्व प्रत्यक्ष (फिजीकल स्वरूपातील) फाईल्स व टपाल बंद केले असून आता ते केवळ इलेक्ट्रॅानिक पद्धतीनेच हाताळण्यात येते. ई-ऑफिसमुळे कोणत्याही ठिकाणाहून कॅाम्प्युटर, लॅपटॅाप अथवा मोबाईल फोनवरून ई-फाईल्स व ई-टपाल हाताळता येते. यामुळे प्रशासन पारदर्शी व गतिमान होण्यास मदत होणार असल्याचे प्रधान सचिव श्री. खारगे यांनी सांगितले.  सांस्कृतिक कार्य विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी ही प्रणाली राबविण्यात सक्रिय सहभाग घेतल्याने शंभर टक्के ई-ऑफिस करणे शक्य झाले आहे.

यापूर्वी प्रधान सचिव श्री. खारगे यांनी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक असताना त्या विभागाचे राज्यातील पहिले शंभर टक्के ई-ऑफिस केले होते. त्या अनुभवाचा फायदा सांस्कृतिक कार्य विभागात ई-ऑफिसचे काम करताना झाल्याचे श्री. खारगे यांनी सांगितले.

0000

दीपक चव्हाण/विसंअ/

शालेय विद्यार्थ्यांच्या सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – आदिवासी विकास मंत्री ना. डॉ विजयकुमार गावित

धुळे, दि. 19 (जिमाका वृत्तसेवा) : आदिवासी समाजातील मुलांचे शिक्षण थांबू नये याकरिता शालेय विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृह तसेच आश्रमशाळा इमारतीसाठी शासनाकडून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री ना. डॉ. विजयकुमार गावित यांनी केले.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे अंतर्गत साक्री तालुक्यातील साक्री, सुकापूर, वार्सा येथील शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह इमारतीचे भूमिपूजन ना. डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती अश्विनी पवार, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी तृप्ती धोडमिसे, तहसीलदार श्रीमती आशाताई गांगुर्डे, गट विकास अधिकारी शशिकांत सोनवणे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती हर्षवर्धन दहिते यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

ना. डॉ. गावित म्हणाले, आश्रमशाळा व वतीगृहातील विद्यार्थ्यांच्या संगोपन, जेवण, संरक्षण यासाठी रोजंदारी तत्वावरील कार्यरत 52 वर्ग चारचे कर्मचारी यांना शासन सेवेत नियमित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा देण्यासाठी आदिवासी विकास विभाग सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. शासकीय वसतिगृह इमारतीमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर राहण्याची व्यवस्था सुध्दा चांगली होणार आहे. मुलांनी स्वत:हुन शिक्षणाची गोडी अंगीकारली पाहिजे. शासकीय सवलतीच्या लाभाबरोबरच शिक्षणाकडेही लक्ष दिले पाहिजे. पालकांनी आपल्या मुलांना शाळा सुरु असतांना वारंवार घरी घेऊन जाणे योग्य नसल्याचेही ते म्हणाले. यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊन शिक्षणात खंड पडल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्री. गावीत म्हणाले शासकीय आश्रम शाळा, वार्सा या शाळेचा निकाल सलग पाच वर्ष 100 टक्के लागत आहे ही आनंददायी बाब आहे. याबद्दल त्यांनी शिक्षक, विद्यार्थी तसेच पालकांचे कौतून केले. तसेच 10 व 12 फेब्रुवारी 2023 महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे पार पडलेल्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळा वार्सा या शाळेतील 12 मुले व 16 मुली असे एकूण 28 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यातून 24 खेळाडू राज्यस्तरीय प्राविण्य प्राप्त झाले आहेत. राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेत वैयक्तिक खेळातही सहा विद्यार्थ्यींनीनी यश मिळविले आहे. त्या विद्यार्थ्यांना ना. गावित यांच्या हस्ते पारितोषिक वितरित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी केले. या कार्यक्रमास संबंधित गावचे लोकप्रतिनधी, ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अनियमिततेची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी समिती स्थापन करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

मुंबई, दि. 19 : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध विभागांमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे.

महानगरपालिकेमध्ये नोव्हेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये राबविण्यात आलेल्या विविध कामांमध्ये रुपये १२ हजार २४ कोटी इतक्या रकमेची अनियमितता झाल्याचे महालेखापाल (कॅग) ने विशेष लेखापरिक्षा अहवालामध्ये निदर्शनास आणून दिले आहे. यासंदर्भात अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन अपहाराचा तपास करण्यासाठी विशेष चौकशी समिती स्थापन करून संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याबाबत निवेदन दिले होते.

यासंदर्भात स्थापन करण्यात येणाऱ्या विशेष चौकशी समितीत आर्थिक गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

००००

‘दिलखुलास’ कार्यक्रमात योग तज्ज्ञ सानिका बाम यांची २० व २१ जून रोजी मुलाखत

मुंबई, दि. 19 : ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ आणि ‘आंतरराष्ट्रीय संगीत दिवस’ हे दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरे केले जातात. माणसाला तणावमुक्त राहण्यासाठी योग आणि संगीत खूप फायदेशीर ठरते. या दिनानिमित्त योग तज्ज्ञ सानिका बाम यांची विशेष मुलाखत ‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रसारित होणार आहे.

राष्ट्रीय स्तरावरील योग तज्ज्ञ सानिका बाम यांनी योग दिनाचा मुख्य उद्देश, योगाचे प्रकार, संगीत थेरपी अशा महत्त्वपूर्ण विषयावर सविस्तर माहिती दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत मंगळवार दि.20 आणि बुधवार दि. 21 जून, 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक रिताली तपासे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

000

जयश्री कोल्हे/स.सं./

पंढरपूर यात्रेनिमित्त आषाढीवारी मार्गावरील खासगी दवाखाने सुरु ठेवावेत – आरोग्यमंत्री डॉ. प्रा. तानाजी सावंत

मुंबई, दि. 19 : पंढरपूर वारी सोहळ्यातील कोणीही वारकरी आरोग्य सुविधापासून वंचित राहू नये यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग सर्वार्थाने सज्ज असून, या वर्षी शासनाच्या आरोग्य यंत्रणेबरोबर, खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना वारी दरम्यान आपले दवाखानेही सुरु ठेवावेत, असे आवाहन आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आरोग्य सुविधेबाबत नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत केले.

वारीच्या कालावधीत पंढरपूर परिसरातील व वारी मार्गावरील काही खासगी वैद्यकीय व्यावसायिक आपले दवाखाने बंद ठेवत असल्याचे आढळून आले आहे. शासकीय यंत्रणा सज्ज असली तरी वारी दरम्यान रुग्णसंख्या वाढल्यास वा साथीची परिस्थिती निर्माण झाल्यास उपलब्ध शासकीय यंत्रणेवर ताण पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी आषाढीवारी मार्ग, पंढरपूर शहर व परिसरातील खासगी दवाखाने व रुग्णालये सुरु ठेवण्याबाबत सूचना केल्या आहेत. वैद्यकीय व्यावसायिकांसमवेत बैठक आयोजित करून रुग्णालये व दवाखाने सुरु ठेवण्याच्या सूचना देण्याबाबत त्यांनी जिल्हास्तरीय यंत्रणांना सूचित केले. तसेच याबाबतची जनजागृती करणे, खासगी रुग्णालये व दवाखाने कार्यरत असल्याची खात्री करण्यासाठी धडक पथके पाठवणे याबाबत सोलापूरचे जिल्हाधिकारी,  महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. ठोस कारणाशिवाय दवाखाना व रुग्णालये बंद ठेवल्यास साथरोग अधिनियम 1897, साथरोग अध्यादेश 2020 (Amendment) तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये योग्य ती कारवाई करण्याबाबतदेखील सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी वारकऱ्यांच्या सोयीसाठी दवाखाने सुरू ठेवण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आलेले आहे.

आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी पंढरपूरात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, व देशाच्या इतर भागातून लाखो वारकरी येत असतात. बहुसंख्य वारकरी पायी चालत पंढरपूरला येत असतात, तसेच वारकऱ्यांमध्ये वृद्ध स्त्री व पुरुष भाविकांची संख्या मोठी असते. त्यामुळे वारकऱ्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यास त्यांना तत्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने आरोग्यमंत्री प्रा. डॉ. सावंत यांचे संकल्पनेतून “आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी” हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे.

या उपक्रमांतर्गत पालखी मार्गावर आरोग्य विभागाने आवश्यक त्या सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध केलेल्या असून वारी मार्गावर फिरत्या वैद्यकीय पथकाची सोयही केलेली आहे. तसेच यात्रेदरम्यान 27 ते 29 जून 2023 या कालावधीत पंढरपूर शहरात भव्य “महाआरोग्य शिबिराचे” आयोजन केलेले आहे. प्रतिवर्षी पंढरपूर यात्रेला सुमारे 15 ते 20 लाख लोक येत असतात.

०००००

निलेश तायडे/विसंअ

आंतरराष्ट्रीय योगदिनी विधानभवनाच्या प्रांगणात ‘योगप्रभात @विधानभवन’ कार्यक्रमाअंतर्गत योगासनांची प्रात्यक्षिके

 मुंबई, दि. 19 : यंदाच्या आंतरराष्ट्रीय योगदिनी बुधवारी (दि.21) विधानभवनाच्या प्रांगणात योगासन प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे.

21 जून 2023 रोजी होणारा हा कार्यक्रम विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची प्रमुख उपस्थिती तसेच विशेष निमंत्रित म्हणून सर्व मंत्री, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी विधिमंडळ सदस्यांसह सुमारे 2 हजार योगप्रेमी उपस्थित राहणार आहेत. सकाळी 7 ते 9 यावेळेत ‘योगप्रभात @विधानभवन’ हा कार्यक्रम होईल.

योगविद्या आणि ध्यानधारणा ही भारतीय संस्कृतीकडून अखिल विश्वाला लाभलेली अनमोल देणगी आहे. 21 जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणे ही सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद अशी घटना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार जगातील सर्वच देशांमध्ये या दिवशी सामूहिक योगासनांचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि आरोग्यसंपन्न जीवनशैलीसाठी योगाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. याच पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम यंदा मुंबईतील विधानभवन येथे आयोजित करण्यात आल्याचे विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले. अधिकाधिक सदस्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. योगप्रसार कार्यात उल्लेखनीय योगदान देत असलेल्या शतकमहोत्सवी कैवल्यधाम, मुंबई या संस्थेचा विशेष सहभाग या उपक्रमासाठी लाभला आहे.

000

‘जी-२०’ शिक्षण कार्यगटाच्या बैठकीअंतर्गत ‘संमिश्र शिक्षणाद्वारे मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र ज्ञानाच्या सुनिश्चिती’बाबत चर्चासत्रे संपन्न

पुणे, दि. १९: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे ‘जी-२०’ शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीनिमित्त ‘संमिश्र शिक्षणाद्वारे मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र ज्ञानाची सुनिश्चिती’ या विषयावर आयोजित चर्चासत्राअंतर्गत आज तीन वेगवेगळ्या सत्रात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

पहिल्या सत्रात भारत सरकारच्या शालेय शिक्षण विभागाचे सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली, ‘मिश्र पद्धतीने मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र शिकवण्याचे शिक्षण, दृष्टिकोन आणि अध्यापनशास्त्र’ या विषयावर चर्चा झाली. त्यामध्ये स्पेन, ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमिरात, इंडोनेशिया आणि दक्षिण आफ्रिकेतील सदस्य चर्चेत सहभागी झाले.

दुसऱ्या सत्रामध्ये ‘मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राचा अभ्यास घरामध्ये राहून (होम लर्निंग) करताना पालक, मुलांची काळजी घेऊन त्यांना सांभाळणारे आणि समुदायातील  सदस्यांच्या भूमिका’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. यामध्ये सामाजिक-भावनिक कौशल्ये आणि मुलांचे आरोग्य आणि पोषण, याविषयावर वक्त्यांनी विचार मांडले. महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव अदिती दास राउत यांच्या अध्यक्षतेखाली या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी अमेरिका आणि चीनचे प्रतिनिधी गट चर्चेत सहभागी झाले.

तिसरे सत्र केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई)  अध्यक्षा  निधी छिब्बर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.  हे चर्चासत्र बहुभाषिकतेच्या संदर्भात मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्रासाठी शिक्षकांची क्षमता बांधणी आणि प्रशिक्षण यावर केंद्रित होते. या सत्रातील चर्चेत ब्रिटन, आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना (ओईसीडी), सौदी अरेबिया आणि युनिसेफचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

‘पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र’ प्रदर्शनाला प्रतिनिधींची भेट

दरम्यान ‘मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेस जोडून आयोजित शिक्षण, मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र, डिजिटल उपक्रम, संशोधन आणि कौशल्य विकासातील सर्वोत्तम पद्धती आदींचे सादरीकरण असलेल्या बहुमाध्यम प्रदर्शनाला प्रदर्शनाला ‘जी-२०’ बैठकीला आलेल्या देश विदेशातील प्रतिनिधींनी भेट देऊन विविध दालनांची माहिती घेतली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित या प्रदर्शनात भारतातील शैक्षणिक क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान आणि उपक्रमात परदेशी प्रतिनिधींनी विशेष रुची दाखविली. भारतातील संशोधन आणि शिक्षण क्षेत्रातील प्रगतीचा जगातील इतर देशांना लाभ मिळत असल्याने या क्षेत्रात भारताकडून येणाऱ्या काळात सहकार्य मिळेल अशी अपेक्षा यावेळी प्रतिनिधींनी व्यक्त केली. युनिसेफ, ओईसीडी, स्पेन, बांगलादेश, चीन, इंडोनेशिया आणि युएई च्या प्रतिनिधींनी आयुका, एनसीईआरटी, सीबीएसई, गुवी, आयुका, आयसरच्या उपक्रमांची माहिती उत्सुकतेने घेतली.

आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नाविन्यपूर्ण शैक्षणिक साधनांबरोबरच भारतीय ज्ञान परंपरेतील बाबींचा प्रदर्शनात समावेश आहे.  पुणे विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुलात २२ जूनपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत  प्रदर्शन सर्वांसाठी  खुले राहणार आहे.

विद्यार्थ्यांना मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राची ओळख करून देणे आवश्यक – केंद्रीय मंत्री राजकुमार रंजन सिंह

पुणे दि.19: लिहिण्याची-वाचण्याची क्षमता आणि अंकाद्वारे मूलभूत व्यवहार करणे हा भविष्यातील शालेय शिक्षणासाठी आणि जीवन विकासासाठी आवश्यक पाया आहे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांना पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राची ओळख करून देणे आणि त्यासाठी स्पष्ट उद्देश समोर ठेवून तातडीने उपाययोजना करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षण व परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे जी-20 शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीनिमित्त ‘संमिश्र शिक्षणाद्वारे मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राची शाश्वती’ या विषयावर आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क सुकाणू समितीचे सदस्य प्रा.मंजुल भार्गव, केंद्रीय उच्च शिक्षण सचिव संजय मूर्ती, केंद्रीय शालेय शिक्षण सचिव संजय कुमार, केंद्रीय कौशल्य विकास सचिव अतुल कुमार, युनिसेफचे चिफ ऑफ एज्युकेशन टेरी डर्नीअन, विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.सुरेश गोसावी आदी उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री श्री.सिंह म्हणाले, ‘संमिश्र शिक्षणाद्वारे मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राची शाश्वती’ हा विषय शिक्षण कार्यगटाच्या प्राधान्याच्या विषयापैकी एक आहे. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राची (एफएलएन) ओळख नसल्याची बाब विविध सर्वेक्षणाच्या माध्यमातून समोर आली आहे. ‘एफएलएन’च्यादृष्टीने मूलभूत कौशल्यावर  आधारीत कृतियोजना निश्चित करण्यासाठी गरज आहे. अध्ययन आणि अध्यापनाचा दृष्टीकोन, पालक व समाजघटकांची भूमिका आणि शिक्षकांची क्षमतावृद्धी आणि प्रशिक्षण या तीन उद्दीष्टांवर विशेष लक्ष द्यावे लागेल. मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राच्या अध्ययनासाठी मुलांना सहाय्यभूत ठरणाऱ्या  आणि त्यासाठी वातावरण निर्मितीत उपयुक्त ठरणाऱ्या उत्तम कल्पना चर्चासत्राच्या माध्यमातून पुढे याव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, भारताच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात प्रत्येक व्यक्तीच्या क्षमता विकासावर भर देण्यात आला आहे. शिक्षणाद्वारे मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राची उत्तम प्रकारे ओळख व्हावी यावर विशेष लक्ष देण्यात येत आहे. 2025 पर्यंत मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राची प्राथमिक शिक्षणाच्या स्तरावर विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट कालबद्धरित्या गाठण्यासाठी भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी कार्यक्रम आखला आहे. भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या कालावधीत शिक्षण क्षेत्रातील त्रुटींवर लक्ष केंद्रित करून त्या दूर करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीद्वारे पुण्यातून शिक्षण पद्धती अधिक सहज, समावेशक आणि नाविन्यपूर्ण करण्यासाठीचा  संदेश दिला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रा.भार्गव म्हणाले, भूक आणि दारिद्र्याची समस्या दूर करण्यासाठी मुलांना मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राचे ज्ञान आवश्यक आहे. याबाबतीत मागे पडल्याने शाळा सोडण्याचे प्रमाण वाढते. जगातील 56 टक्के आणि युरोपासारख्या प्रगत भागातही या विषयाचे ज्ञान नसलेल्यांची संख्या 14 टक्के आहे. विद्यार्थ्यांचे योग्य अध्ययन, प्रयोगशीलता, नवनिर्मितीचे ज्ञान आणि कौशल्य विकसित केल्यास शाश्वत विकासाचे उद्दीष्ट गाठता येईल. त्यासाठी वैशिष्ठ्यपूर्ण अभ्यासक्रमावर भर देत शिक्षकांची अध्यापन क्षमताही विकसीत करावी लागेल.

विद्यार्थ्यांच्या संतुलित आहार आणि आरोग्यावर भर दिल्यास शाळा सोडण्याचे प्रमाण कमी होऊ शकेल. लवचिक, बहुपर्यायी, मनोरंजक, क्रियाशीलतेवर आधारीत, आणि शोधप्रवृत्तीला चालना देणारा अभ्यासक्रम विकसीत करणे, लहान वयात विविध भाषांची ओळख करून देणे, तंत्रज्ञानाचा वापर निश्चित करणे आणि पूर्व प्राथमिक शिक्षणावर एकूण शिक्षण खर्चाच्या 10 टक्के खर्च करणे ‘एफएलएन’ साठी आवश्यक आहे असेही प्रा. भार्गव यांनी सांगितले.

युनिसेफचे चिफ ऑफ एज्युकेशन टेरी डर्नीअन यांनीदेखील ’मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र’ या विषयावर सादरीकरण केले.  विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान विकसीत होण्यासाठी शिक्षणातील नाविन्यता, विविध घटकात समन्वय आणि नव्या शैक्षणिक पद्धती आवश्यक आहेत.  विद्यार्थ्यांचा प्रवासाचा वेळ कमी करणे, पूर्व प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे, शैक्षणिक साहित्याची उपलब्धता, शिक्षणाच्या गुणवत्तावृद्धीसाठी कार्यक्रम आखणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

प्रास्ताविकात शिक्षण सचिव संजय कुमार यांनी चर्चासत्राविषयी माहिती दिली. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारताच्या अध्यक्षतेखालील जी-20 परिषदेच्या घोषवाक्यानुसार जगभरात सर्वत्र समानरितीने गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यादृष्टीकोनातून कार्यगटाच्या पहिल्या तीन बैठकांमध्ये चर्चा करण्यात आली. चौथ्या बैठकीत ‘मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र’ या विषयावर चर्चा होणार असल्याने देशभरातील साडेचार कोटींपेक्षा अधिक विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांपर्यंत हा विषय पोहोचविण्यात आला आहे. यानिमित्ताने आयोजित प्रदर्शनात 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील उत्तम शैक्षणिक संकल्पना प्रदर्शित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

चर्चासत्राला जी-20 शिक्षण कार्यगटाच्या बैठकीसाठी आलेले सदस्य आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती उपस्थित होते.

पाहुण्यांचे महाराष्ट्रीय पद्धतीने स्वागत

यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले आणि उपस्थित प्रतिनिधींशी संवाद साधला. बैठकीस उपस्थित झालेल्या परदेशी प्रतिनिधींचे ढोल ताशांचा गजरात स्वागत करण्यात आले.

ताज्या बातम्या

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ साजरा

0
मुंबई दि. 29 - स्वातंत्र्योत्तर काळात देशाचे आर्थिक नियोजन व सांख्यिकीय पध्दतीचा विकास यामध्ये विख्यात सांख्यिकी शास्त्रज्ञ प्रा. प्रशांत चंद्र महालनोबीस यांच्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल...

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाने जागतिक स्तरावर ओळख निर्माण करावी – सरन्यायाधीश भूषण गवई

0
नागपूर,दि.29 :  येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून यापुढील काळात उत्तम शैक्षणिक कामगिरी बजावण्यासह विधी क्षेत्रासाठी प्रतिभावंत विद्यार्थी घडवण्याची...

त्रिभाषा सूत्रासंदर्भात सांगोपांग अभ्यास करुन विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यासाठी डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती...

0
तृतीय भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द पावसाळी अधिवेशनात १२ विधेयके अधिवेशनात सविस्तर चर्चा करुन जनतेचे प्रश्न सोडविणार लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यासाठी ३६००...

बारामती येथील सायन्स अँड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर राज्याकरिता पथदर्शी ठरेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
बारामती, दि. २९: राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाच्या मदतीने ग्रामीण भागातील तरुणांना आधुनिक विज्ञानाची ओळख करुन देणाऱ्या सायन्स अँड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटरचा विद्यार्थ्यांना...

अन्न सुरक्षा हा सार्वजनिक आरोग्याचा पाया – जी. कमलावर्धन राव

0
मुंबई 29:- अन्न सुरक्षा हा सार्वजनिक आरोग्याचा पाया असून यामध्ये कोणतीही कसूर होऊ नये यासाठी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी कटाक्षाने व समन्वयपूर्वक काम करावे असे...