मंगळवार, जुलै 1, 2025
Home Blog Page 1301

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह कुटुंबियांची सुरक्षा कमी केलेली नाही -गृह विभागाचे स्पष्टीकरण

मुंबई, दि. 21 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कुटुंबियांची सुरक्षा व्यवस्था कमी केल्याची बातमी काही माध्यमांमध्ये प्रसारित करण्यात आली आहे. याबाबत गृह विभागाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, शासन निर्णय २७ ऑक्टोबर २०२२ नुसार मान्यवरांना वर्गीकृत संरक्षण पुरविण्यात येते. त्यानुसार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात येत आहे. तसेच श्रीमती रश्मी ठाकरे यांना वाय प्लस एस्कॉर्ट, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना झेड, तेजस ठाकरे यांना वाय प्लस एस्कॉर्ट ही वर्गीकृत सुरक्षा पुरविण्यात येत आहे.

सदरचे वर्गीकृत संरक्षण हे केंद्रीय यल्लो बुक नियमानुसार विशेष सुरक्षा विभाग, महाराष्ट्र राज्य मार्फत पूर्णपणे देण्यात येत आहे. वर्गीकृत संरक्षणाचे कुठलेही घटक कमी करण्यात आले नाही, असे स्पष्टीकरण नियंत्रण कक्ष अधिकारी, विशेष सुरक्षा विभाग, दादर, मुंबई यांनी दिलेल्या खुलाशात नमूद केले आहे.

शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा पुरविण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील

मुंबई, दि. 21 : राज्यात खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज झाला असून शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा माफक दरात उपलब्ध होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे, असे कृषी आयुक्तालय, पुणे येथिल निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक विकास पाटील यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून सांगितले आहे.

खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा हंगाम असतो. या हंगामात पीक पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना बियाणे व कृषी निविष्ठांची गरज भासत असते. अशावेळी निविष्ठा व गुणनियंत्रण विभागामार्फत खरीप हंगामात होणाऱ्या पीक पेरणीसाठी कशाप्रकारे नियोजन करण्यात आले आहे, बियाणाबाबत होणारी फसवणूक टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत याबाबत सविस्तर माहिती श्री.पाटील यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरूवार, दि. 22, शुक्रवार दि.23 आणि शनिवार दि. 24 जून 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक महेश जगताप यांनी ही मुलाखत घेतली आहे.

000

जयश्री कोल्हे/ससं/

परदेश शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यास ५ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई, दि. 21  :  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रतिवर्षी अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील 75 विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी ‘राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजने’अंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. या योजनेसाठी सन २०२३-२४ या वर्षाकरिता अर्ज करण्यास विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात आली असून दि. ५ जुलै २०२३ पर्यंत विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पी.एच.डी.) विशेष अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत असून अर्ज सदर करण्याची अंतिम मुदत ही दिनांक २० जून २०२३ पर्यंत होती, परंतु विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार मुदतवाढ देण्यात आली असून दि. ५ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज  करता येणार आहेत.

या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील अनूसूचित जाती प्रवर्गातील पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी.साठी अद्ययावत (Qx World University Ranking)  300 च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. विद्यार्थ्यांने विहीत नमुन्यातील अर्ज शासनाच्या  www.maharashtra.gov.in  या अधिकृत संकेतस्थळावरील रोजगार या लिंकवरुन डाऊनलोड करुन घ्यावा.  परिपूर्ण आवश्यक त्या कागदपत्रांसह, समाज कल्याण आयुक्तालय 3, चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे- 411001 या पत्यावर अर्ज  करावेत.

या योजनेसाठी पात्र असण्याऱ्या विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाडे, परदेशातील शैक्षणिक संस्थेची शिक्षण फी, निर्वाह भत्ता, आकस्मिक खर्च याचा लाभ मिळणार आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्ष व पीएचडीसाठी 40 वर्ष ही कमाल वयोमर्यादा असेल. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावरील MD व MS अभ्यासक्रमच प्रवेशासाठी पात्र असतील. अधिक माहितीसाठी संकेतस्थळास भेट द्यावी.

0000

शैलजा पाटील/विसंअ/

पंढरपूर दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी ‘विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना’; शासन निर्णय जारी

मुंबई, दि. 21 :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या पंढरपूर येथील वारीमध्ये दरवर्षी सुमारे १५ ते २० लक्ष वारकरी सहभागी होतात. पंढरपूर दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचे आजारपण, अपघात किंवा मृत्यू झाल्यास या संदर्भात संबंधितांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना’  सुरु करण्याचा निर्णय घेतला. या योजनेच्या माध्यमातून विमा छत्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

या निर्णयानुसार ‘विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना’ याची अंमलबजावणी, संनियंत्रण तसेच विमाहप्ता भरण्याची कार्यवाही शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून करण्यात येणार आहे. या संदर्भात आज वित्त विभागाने शासन निर्णय जारी केला आहे.

 विमा योजनेचे स्वरुप

विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजनेंतर्गत दिंडीच्या दरम्यान झालेल्या दुर्घटनेत / अपघातात वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसास प्रत्येकी पाच लाख रुपये शासनाकडून सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.

याव्यतिरिक्त, खाजगी क्षेत्रातील विमा कंपनीच्या सहाय्याने विमा योजना राबविण्यात येणार आहे.  दिंडीच्या दरम्यान अपघातात कायमचे अपंगत्व आल्यास विमा कंपनीकडून  प्रतिव्यक्ती विमा रक्कम प्रदान करण्यात येईल. दोन्ही हात, दोन्ही पाय, दोन्ही डोळे, एक हात/पाय व एक डोळा निकामी झाल्यास एक लाख रुपये तर एक हात, एक पाय किंवा एक डोळा निकामी झाल्यास ५० हजार रुपये देण्यात येणार आहे.

वैद्यकीय उपचारासाठी प्रत्येकी ३५ हजार रुपये किंवा प्रत्यक्ष वैद्यकीय खर्च यापैकी जी कमी असेल तेवढी रक्कम विमा कंपनीकडून प्रदान करण्यात येईल, असे या योजनेचे स्वरुप असणार आहे.

या विमा योजनेसंबंधीच्या अटी, शर्ती व अन्य तरतुदी शासन निर्णयात नमूद करण्यात आल्या आहेत.

या विमा योजनेबाबत आवश्यकतेनुसार विमा संचालनालयाचा सल्ला घेण्यात येईल, असे वित्त विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

००००

वंदना थोरात/विसंअ/

खरीप हंगामातील पीक नियोजनाबाबत शेतकऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी – कृषि आयुक्त सुनील चव्हाण

पुणे, दि.21 : यावर्षी मान्सूनचे आगमन काहीसे लांबल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करताना विशेष दक्षता घ्यावी. तसेच पेरणी संदर्भात नियोजन करावे. साधारणत: 80 ते 100 मि.मी. पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी, पेरणीची घाई करु नये, असे आवाहन कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.

आपत्कालीन पीक परिस्थितीत शेतकऱी बांधवांनी कशा प्रकारची काळजी घ्यावी यासंदर्भात कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक संपन्न झाली. याबैठकीत कृषि विभागाचे अपर मुख्य सचिव, सर्व कृषि विद्यापिठांचे कुलगुरु त्याचप्रमाणे भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के. एस. हौसळीकर आदी उपस्थित होते. हवामान बदलानुसार सामान्यपणे पाऊस येण्याचा कालावधी पुढे सरकला आहे. त्यामुळे नवीन सामान्य पाऊस कालावधी (New Normal Mansoon period) हा 24 ते 25 जून असेल असा अंदाज वेधशाळेने सांगितला आहे. या हवामान विभागाच्या अंदाजानुसार 24-25 जूननंतर अरबी समुद्रावरुन येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांना गती मिळण्याची शक्यता असल्याने सर्वत्र चांगला पाऊस पडण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक नियोजनासंदर्भात योग्य ते नियोजन करणे आवश्यक आहे.

योग्य पीक नियोजन

या नवीन सामान्य पाऊस कालावधीचा विचार करता शेतकऱ्यांनी पेरणी करताना लवकर येणाऱ्या व पाण्याचा ताण सहन करणाऱ्या वाणांची लागवडीसाठी निवड करावी. पाऊस उशीरा आल्यामुळे शेतकऱ्यांनी धूळ पेरणी करु नये. पेरणीसाठी साधारणपणे 20 टक्के जादा बियाणांचा वापर करावा. सलग संपूर्ण क्षेत्रावर एकच पीक न घेता आंतरपीक पद्धतीचा वापर करावा. पेरणी करताना रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी करावी.

त्याप्रमाणे जमिनीतील ओलाव्याचे संवर्धन करण्यासाठी आच्छादन सारख्या तंत्राचा वापर करावा. हवामान खात्यामार्फत पुढील पाच दिवसांचा पावसाचा अंदाज दिला जातो. या पावसाच्या अंदाजाची माहिती प्रसिध्दी माध्यमांद्वारे शेतकऱ्यांना देण्यात येईल. कृषि विद्यापीठ, कृषि विद्यापीठांचे संशोधन केंद्र व कृषि विज्ञान केंद्र यांच्या सहाय्याने स्थानिक आपत्कालीन पीक नियोजन करण्यात येणार आहे. क्षेत्रीय यंत्रणांना या माहितीचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार करण्याबाबत सूचना कृषि विभागामार्फत देण्यात आल्या आहेत.

राज्यात मान्सूनचा अंदाज घेऊन पेरणीच्यावेळी पुरेशा प्रमाणात उत्तम दर्जाचे बी-बियाणे, खते व किटकनाशके शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार व रास्त दरात उपलब्ध करुन देण्याची खबरदारी कृषि विभागाकडून घेण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी लागणाऱ्या कृषि निविष्ठांचा साठा उपलब्ध होईल यासाठी क्षेत्रीय यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून       1800-2334000 या टोलफ्री क्रमांकावर शेतकऱ्यांनी संपर्क साधावा, असेही कृषि आयुक्त श्री. चव्हाण यांनी कळविले आहे.

कृषी आयुक्तालय अधिनस्त 2 हजार 70 कृषी सेवकांची पदभरती लवकरच 

कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त गट-क मधील विविध संवर्गातील सरळसेवा पदभरती बाबत प्रक्रिया सुरु झाली असून त्याची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच पेसा क्षेत्रातील पदे निश्चित करण्याची कार्यवाही देखील अंतिम टप्प्यात आहे. या सरळसेवेच्या कोट्यातील 2 हजार 588 रिक्त पदे विचारात घेता याच्या 80 टक्के म्हणजे 2 हजार 70 कृषी सेवक पदासाठी प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी देण्यात आला आहे.  तो प्राप्त होताच जाहिरात व पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती राज्याचे कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली आहे.

कृषि विभागाचा सुधारित आकृतीबंध अद्याप अंतिम झाला नसल्यामूळे शासन निर्णयातील तरतूदीनुसार वाहनचालक व गट-ड संवर्गातील पदे वगळून इतर सरळसेवा कोट्यातील रिक्त पदांच्या 80 टक्के मर्यादित पदभरती करण्यात येणार आहे. गट- क संवर्गातील सरळसेवा पदभरती आय. बी. पी. एस या कंपनीमार्फत राबविण्यास शासन मान्यता मिळाली आहे. या संस्थेसोबत सामंजस्य करार देखील करण्यात आला आहे. त्यानुसार वरिष्ठ लिपिक, सहायक अधिक्षक,  लघुलेखक ( निम्नश्रेणी) व लघुलेखक ( उच्चश्रेणी) या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पेसा क्षेत्रातील पदे भरणार

        राज्यपाल महोदयांच्या दि. 29 ऑगस्ट 2019 च्या अधिसूचनेनुसार अनुसुचित / आदिवासी क्षेत्रातील          (पेसा) 17 संवर्गातील सरळसेवेची पदे भरणेबाबत कळविण्यात आले आहे. त्यामध्ये कृषि सहायक संवर्गाचा समावेश आहे. शासन निर्णयानुसार विभागीय कृषी सहसंचालक ठाणे, पुणे, नाशिक,अमरावती, नागपूर व लातूर या विभागातील पेसा क्षेत्रातील मुख्यालय निश्चिती व पदसंख्या निश्चित करण्याबाबतच्या प्रस्तावास प्रशासकीय विभागाची मान्यता प्राप्त करुन घेणेबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे कृषी सेवक पदांसाठी जाहिरात देणे शक्य झालेले नाही, मात्र मान्यता मिळताच भरती संदर्भातील पुढील कार्यवाही केली जाईल, असे श्री. चव्हाण यांनी सांगितले.

000

निरोगी व दीर्घायुष्यासाठी नियमितपणे योग करण्याची गरज – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

           सांगली, दि. 21, (जि. मा. का.) :   निरोगी राहण्यासाठी आणि दीर्घायुष्य मिळवण्यासाठी सर्वांनी नियमितपणे योग करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.

            जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका, सांगली, पतंजली योग समिती आणि केंद्रीय सूचना ब्यूरो यांच्या सहकार्याने नव महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनि. कॉलेज, लक्ष्मी मंदीर जवळ, कुपवाड रोड, सांगली येथील मैदानावर आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यामध्ये ते बोलत होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, महानगरपालिका आयुक्त सुनिल पवार, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

            पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, योगाभ्यासामध्ये सातत्य आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील व त्यातून आपल्याला दीर्घायुष्याचा लाभ मिळेल. यावेळी पतंजलीच्या योग साधकांनी उपस्थित सर्वांकडून योग प्रोटोकॉल म्हणजे विशिष्ट योगाभ्यास करून घेतला. केंद्रीय संचार ब्यूरोच्या कोल्हापूर कार्यालयाने आयोजित केलेल्या योग विषयक स्पर्धांच्या विजेत्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली तसेच केंद्रीय संचार ब्यूरोने  यावेळी प्लास्टिक टाळा पर्यावरण वाचवा आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व या गोष्टी मांडणाऱ्या कापडी पिशव्यांचे वितरण केले.

            दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय योग दिन हा एक महत्त्वाचा उत्सव  आहे, यामुळे जगभरात योगाभ्यास आणि त्याच्या लाभांविषयी जनजागृती होत आहे.  योग, त्याच्या एकता आणि परस्परांशी जोडले जाण्याच्या मूलभूत तत्त्वांसह, “वसुधैव कुटुंबकम” या संकल्पनेचे मूर्त स्वरूप आहे. योगाच्या सरावाद्वारे, व्यक्ती इतरांशी आणि जगाशी असलेले त्यांचे संबंध ओळखून त्यांच्या अंतर्मनात  प्रवेश करतात. योग सर्व प्राणी आणि पर्यावरणाप्रती सहानुभूती, करुणा आणि जबाबदारीची भावना प्रोत्साहित करतो. त्यामुळे यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची योग फॉर वसुधैव कुटुंबकम अशी संकल्पना आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनामुळे  वसुधैव कुटुंबकमची तत्त्वे स्वीकारण्याची आणि जागतिक सलोख्यासाठी काम करण्याची प्रेरणा मिळते.

00000

महिला व बालविकास विभागामार्फत चेंबूर येथे योग दिन उत्साहात साजरा

मुंबई, दि. २१ : महिला व बालविकास विभागामार्फत चेंबूर येथील बालविकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प येथे योगदिन उत्साहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे योगदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला.

००००

संध्या गरवारे/विसंअ/

राज्यातील युवतींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे  

मुंबई, दि. २१ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यात 3 लाख 50 हजार शाळकरी, महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिला व बालविकास विभाग आणि राज्यातील सर्व विद्यापीठे व स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून 3 ते 15 जुलैदरम्यान तीन दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालयातील दालनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त राहुल मोरे, उपसचिव श्री. ठाकूर, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी, मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी महिला विद्यापीठ, भारतीय स्त्री शक्ती संस्‍था आणि विद्यार्थी निधी ट्रस्ट यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री  श्री. लोढा म्हणाले, अलीकडील काळात महिला व मुलींवर होणारे अत्याचार व त्यातून केली जाणारी त्यांची हत्या हे शासनासमोरील व समाजासमोरील आव्हान ठरत आहे. याला आळा बसण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे खूपच आवश्यक आहे.  शाळकरी व महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी राज्यात राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. आयुक्त, महिला व बाल विकास या कार्यालयामार्फत राज्यातील सर्व विद्यापीठे व स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने महाविद्यालयीन युवतींसाठी तालुकास्तरावर विद्यापीठांच्या मदतीने स्वसंरक्षण शिबीरांचे आयोजन करण्यासाठी  नियोजन करण्यात आलेले आहे.

युवतींचे मनोबल उंचविण्यासाठी  तीन दिवस समुपदेशन सत्र आयोजित करण्यात येणार आहेत

पहिला दिवस

महिला व मुलींवरील हिंसाचार-संकल्पना व सद्यस्थिती या विषयावर भारतीय स्त्री शक्ती संस्था   मार्गदर्शन करेल. सकाळी 11 ते दुपारी 12.30 या वेळेत होणाऱ्या प्रशिक्षणात 1 हजार युवती सहभागी होतील.

तंत्रज्ञान व महिला व मुलींना असलेले धोके या विषयावर सायबर सेल तज्ज्ञ अधिकारी मार्गदर्शन करतील. दुपारी 12.30 ते 1.30 या वेळेत होणाऱ्या प्रशिक्षणात 1 हजार युवती सहभागी होतील

दुसरा दिवस

स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणाचे वेळापत्रक

स्वसंरक्षणाचे प्राथमिक प्रशिक्षण सकाळी 9.00 ते 9.45   या वेळेत होणार असून  1 हजार युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी 20 प्रशिक्षक असतील.

आधुनिक प्रशिक्षण या विषयावर सकाळी 10.05 ते 10.50 या वेळेत प्रशिक्षण होणार असून 1 हजार युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी 20 प्रशिक्षक असतील.

तिसरा दिवस          

प्रात्यक्षिक आणि सराव सकाळी 9.00 ते 9.45 या वेळेत प्रशिक्षण होणार असून 1 हजार युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी 20 प्रशिक्षक असतील.

प्रात्यक्षिक आणि सराव   सकाळी 10.05 ते 10.50 या वेळेत होणार असून 1 हजार युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी 20 प्रशिक्षक असतील.

या तीन दिवसाच्या शिबीरानंतर ज्या युवतींना अधिक स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणात रुची असेल, अशा युवतींची संख्या लक्षात घेऊन त्यादृष्टीने पुढील दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन विभागामार्फत करण्यात येईल.

मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी, भारतीय स्त्री शक्ती संस्‍था आणि विद्यार्थी निधी ट्रस्ट यांच्यात सामंजस्य करार

महात्मा गांधी प्रशासन प्रशिक्षण संस्था या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयुक्त, महिला व बाल विकास यांच्या स्तरावर अव्यावसायिक तत्वावर आज मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी, भारतीय स्त्री शक्ती संस्‍था आणि विद्यार्थी निधी ट्रस्ट यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आला. वेळोवेळी या प्रशिक्षण कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्यासाठी सर्व विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी निधी ट्रस्ट, भारतीय स्त्री शक्ती संस्‍था यांचेसोबत आवश्यकतेनुसार सामजंस्य करार करण्यात येतील. या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व विद्यापीठ, स्वयंसेवी संस्थांना देखील या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले.राज्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये ४० लाख बालक,अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी उस्फूर्तपणे योग दिवस साजरा केला असेही मंत्री श्री.लोढा यांनी सांगितले.

****

संध्या गरवारे/विसंअ/

नद्या आपल्या जीवनचक्रातील अविभाज्य घटक – जलपुरूष डॉ.राजेंद्र सिंह

गडचिरोली,(जिमाका)दि.21:आजच्या काळातील शुद्ध पाण्याची आवश्यकता, आणि उपलब्ध पाण्याची सद्यस्थिती लक्षात घेता पाणी विकत घेणे सर्वांनाच शक्य नाही. माणसांव्यतीरीक्त पशु, पक्षी तसेच जंगल, जमीन यांनाही पाण्याची गरज असतेच. त्यामुळे नद्यांना अमृत वाहिनी केल्याशिवाय पर्याय नाही. नद्या आपल्या जीवनचक्रातील अविभाज्य घटक आहेत असे मत जलपुरूष डॉ.राजेंद्र सिंह यांनी केले. ते चला जाणूया नदीला याअंतर्गत नदी संवाद यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमात बोलत होते. आपल्यासह सभेावताली असलेल्या निसर्गातील सर्वांनाच पाण्याची गरज आहे. नद्या या प्रत्येक भागात पाणी पोहोचविणाऱ्या अमृत वाहिन्या आहेत. त्यामुळे त्यांचे आरोग्य सुधारण्यापासून त्यांच्यावर होणारे अतिक्रमण व प्रदूषण रोखण्यासाठी आपणाला त्यांच्या जवळ जावून अभ्यास करावा लागेल असे ते पुढे म्हणाले. यावेळी कार्यक्रमाला पद्मश्री परशुराम खुणे, खासदार अशोक नेते, आमदार कृष्णाजी गजबे, मुख्य वनसंरक्षक डॉ.किशोर मानकर, उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, कार्यकारी अभियंता पाटबंधारे राहूल मोरघडे, डॉ.सुमन पांडे, प्रविण महाजन, नरेंद्र चूग, रमाकांत कुलकर्णी उपस्थित होते.

राजेंद्र सिंह पुढे म्हणाले, नदीला जाणून घेत असताना अतिक्रमण, प्रदुषण रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा अभ्यासही आपणाला करावा लागेल. यासाठी शासन व प्रशासन आणि नागरीकांनी एकत्र येवून प्रयत्न केले पाहिजेत. महाराष्ट्र असे एकमेव राज्य आहे की त्यांनी चला जाणूया नदीला या उपक्रमात प्राधान्याने सहभाग घेवून एक चांगली योजना शासन निर्णय काढून सुरू केलेली आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी करीत असताना नद्यांबाबत असलेले सत्य आपणाला समोर आणून त्यावर उपाययोजना करावयाच्या आहेत. त्यामुळे आपण सत्य स्थिती अभ्यासून आपल्या नद्यांना खऱ्या अर्थाने अमृत वाहिन्या करूयात असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पुर रेषा निश्चित करून नदीची जमीन किती आहे ते पाहिले पाहिजे, नदीमधील रेतीचा शास्त्रीय अभ्यास करून त्याचे मोजमाप निश्चित केले पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.

खासदार अशोक नेते यांनी चला जाणूया नदीला या सारख्या कार्यक्रमांची गरज असल्याचे नमूद करून नद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी नद्यांचा अभ्यास महत्त्वाचा असल्याचे मत व्यक्त केले. पद्मश्री परशुराम खुणे यांनी नद्यांबाबतचा गावकऱ्यांबरोबरचा संवाद कायम ठेवून पाण्याचे महत्त्व पटवून देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.किशेर मानकर यांनी जलपुरूष राजेंद्र सिंह यांचे कार्य उपस्थितांना सांगितले. तसेच नद्यांमधील प्रदुषण रोखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. आमदार कृष्णाजी गजबे यांनी नदींचा अभ्यास, जैवविवीधता, पर्यावरण संतुलनाचे महत्व उपस्थितांना सांगितले.

नदी प्रहरी कठाणी नदी मनोहर हेपट, पोटफोडी नदी प्रकाश अर्जुनवार, खोब्रागडी नदी केशव गुरूनुले, सती नदी डॉ. सतिश गोगुलवार यांचा कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी संवाद यात्रेत केलेल्या कामाचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलीश शर्मा यांनी केले तर आभार राहूल मोरघडे यांनी मानले. सुत्रसंचलन दहीकर यांनी केले.

स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान- उत्कृष्ट लोकसहभागाबद्दल चारही नदींवरील गावांमधून प्रत्येकी दोन दोन गावांचा सन्मान करण्यात आला. यात खोब्रागडी नदीवरील प्रथम क्रमांक डोंगरगाव तर व्दीतीय क्रमांक नवरगाव या गावाचा आला. कठाणी नदीवरील जेप्रा प्रथम तर व्दीतीय आलेल्या दुधमाळा गावाचा सन्मान केला. पोहार पोटफोडी नदीवरील प्रथम क्रमांक शिवनी गावाला तर व्दीतीय पुरस्कार जांभळी गावाला मिळाला. तसेच यावेळी निबंध, चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांनाही प्रशस्तिपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

****

कागदावरच्या योजना गरिबांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ अभियान – कृषि मंत्री अब्दुल सत्तार

नांदेड (जिमाका) दि. 21 :- राज्यातील गोर-गरीब सर्वसामान्य जनतेला शासकीय योजनांच्या माध्यमातून लाभ मिळावा, त्यांना विकासाची कास धरता यावी यासाठी शासन धरपडत असते. या योजना प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी होईपर्यंत पूर्णत्व येत नाही. कागदावरच्या योजना प्रत्यक्ष गावकुसातील बांधावर राहणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना न्याय देण्यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान असल्याचे प्रतिपादन कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
येत्या 25 जून रोजी नांदेड येथील अबचलनगर येथे होणाऱ्या या भव्य उपक्रमाबाबत आज त्यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करून जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली. डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. एस. एम. महावरकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त महेश डोईफोडे, परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी देवयानी, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
ज्यांच्यासाठी शासन योजना आखते, त्याला स्वरूप देते, त्यासाठी आर्थिक तरतूद करते त्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचवणे ही त्या-त्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. शासकीय योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी हाच या उपक्रमापाठिमागचा उद्देश असल्याचे कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले. शासन आपल्या दारीच्या महामेळाव्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शासकीय योजनांचा विश्वास घेता येईल. प्रत्येक विभागाचे स्टॉल्स याठिकाणी असल्याने नागरिकांना ज्या योजना हव्या असतील त्या योजनांबाबतची परिपूर्ण माहिती 25 जून रोजी होणाऱ्या कार्यक्रमात त्या-त्या विभाग प्रमुखांकडून, अधिकाऱ्यांकडून करून घेता येईल, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास येणारा प्रत्येक व्यक्ती हा आपल्यासाठी तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यांच्या प्रवासात कोणतीही अडचण येणार नाही, त्यांची कुठलीही गैरसोय होणार नाही यासाठी संबंधित विभागाने आपआपले जबाबदार कर्मचारी देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. माझी मुलगी माझा अभिमान हा उपक्रम केवळ दारावर पाटी लावून चालणार नाही तर या पाठीमागचा जो मुळ उद्देश आहे तो जनसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुलीचे नाव केवळ पाटीपुरते नाही तर प्रॉपर्टी व शेतीच्या सातबारावर घेण्याचा हा निर्णय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीत त्यांनी प्रत्येक विभागनिहाय अधिकाऱ्यांकडून योजनांचा आढावा घेतला.
जिल्ह्यातील 103 महसूल मंडळात आजवर शासन आपल्या दारीबाबत शिबीरे झाली आहेत. तालुका पातळीवरील अधिकारी या शिबरांमधून नागरिकांना मार्गदर्शन करत आहेत. जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख टिमवर्कने काम करत असून या योजनेत सहभागी होणारा प्रत्येक लाभार्थी, नागरीक हा महत्त्वाचा व्यक्ती असेल असे समजून नियोजन केले जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.
00000

ताज्या बातम्या

आर्थिक अडचणीतील जिल्हा बँकांसाठी निधीची गरज

0
नवी दिल्ली, दि. ३०: राज्यातील आर्थिक अडचणीत असणाऱ्या सात जिल्हा बँकांना शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी वर्ष 2004 प्रमाणे किंवा वर्ष 2014 मध्ये केंद्र...

विकिरण केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवण्यासाठी नियोजन करा – पणन मंत्री जयकुमार रावल

0
मुंबई, दि. ३०: निर्यातीला चालना देण्यासाठी वाशी येथील विकिरण सुविधा केंद्रात अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर आणि आवश्यक मनुष्यबळ या माध्यमातून गतीने चालवण्यात यावे. अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय...

सर्वांच्या सहकार्याने विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार – मुख्य सचिव राजेश कुमार

0
मुंबई, दि. ३०: महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून 2047 च्या विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या संकल्पनेच्या दिशेने सर्वांच्या सहकार्याने काम...

नवे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी पदभार स्वीकारला

0
मुंबई, दि. ३०: शासनाने राज्याच्या मुख्य सचिवपदी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती केली आहे. मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात मावळत्या मुख्य...

पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते बोरी येथील उड्डाणपुलाचे लोकार्पण

0
यवतमाळ, दि.३० (जिमाका): दारव्हा तालुक्यातील बोरी अरब गावाजवळ अडान नदीच्या पुलावर बांधण्यात आलेला उड्डाणपूल व पोहोच मार्गाच्या कामाचे लोकार्पण पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण...