गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
Home Blog Page 1274

इरशाळवाडी दुर्घटनेत शोध न लागलेल्या ५७ व्यक्तींच्या नातेवाईकांना सानुग्रह अनुदान देणार – मदत व पुर्नवसन मंत्री अनिल पाटील

मुंबई, दि. ८ :- मौजे चौक मानवली, तालुका खालापूर या महसूली गावाच्या हद्दीतील इरशाळवाडी येथे भूस्खलन होऊन दरड कोसळल्याच्या दुर्घटनेत ५७ व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचा शोध न लागल्याने स्थानिक चौकशीच्या आधारे सदर बेपत्ता व्यक्तींच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 1 लाख रुपये व राज्य आपत्ती सहायता निधीतून 4 लाख रुपये असे प्रत्येकी 5 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

मंत्री श्री.पाटील म्हणाले की, संबधित प्रशासनाकडून बचाव व मदतकार्य पार पडल्यानंतर प्राप्त माहितीनुसार या ठिकाणी 228 व्यक्ती वास्तव्यास होत्या. त्यापैकी 144 व्यक्ती हयात असून दुर्घटनेमध्ये 84 लोकांचा मृत्यू झालेला आहे. त्यापैकी 27 मृतदेह सापडले. तर 57 व्यक्ती बेपत्ता आहेत. प्रत्यक्ष दुर्घटनाग्रस्त ठिकाणची परिस्थिती विचारात घेऊन 23 जुलै 2023 रोजी सायंकाळी बचाव व शोधकार्य थांबविण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला होता.

दुर्घटनेतील मृतदेह आढळून आलेल्या 27 व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून तसेच 20 व्यक्तींच्या वारसांना 1 लाख रुपये इतके अनुदान मुख्यमंत्री सहायता निधीतून वाटप करण्यात आलेले आहे. यामधील 7 मयत व्यक्ती आणि 57 बेपत्ता व्यक्तींना प्रशासनाने स्थानिक चौकशी करून अनुदान वाटप करण्याची मागणी मंजूर झाली असून या दुर्घटनेतील मयत व्यक्तींच्या वारसांना शासनाच्या निकषाप्रमाणे मदत करण्यात येणार आहे. हा निधी तत्काळ वितरित करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत, असे मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.

०००

संध्या गरवारे/विसंअ

शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य – पालकमंत्री दीपक केसरकर

कोल्हापूर, दि.8 (जिमाका) : शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी करण्याबाबत विचार सुरु असून त्याला लवकरच मूर्त स्वरुप येईल. तसेच शिक्षकांचे इतर प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी राजर्षी शाहू स्मारक भवन (दसरा चौक) येथे केले.

जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक) तर्फे देण्यात येणाऱ्या जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर खा. धैर्यशील माने, आ.जयंत आसगावकर, प्रशासक तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती मीना शेंडकर, राजेखान जमादार आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र हे शैक्षणिकदृष्ट्या प्रगत राज्य आहे. राज्यातील शिक्षकांच्या व शैक्षणिक प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या अनुषंगाने  शासनाने सुमारे 1100 कोटीहून अधिक रुपयांची तरतूद केली असून भविष्यात शैक्षणिक सुधारणांचे अनेक निर्णय घेणार असल्याचे सांगून यावर्षीपासून अभियांत्रिकी (इंजिनिअरींग) अभ्यासक्रम मराठीतून सुरु करण्यात येणार असल्याचेही श्री. केसरकर म्हणाले.

कोल्हापूर जिल्हा परिषदेने आदर्श शिक्षक पुरस्कारार्थींची निवड अतिशय पादर्शकपणे‍ केली असल्याचे खा. श्री. माने यांनी सांगितले तर कोल्हापूर जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा गुणवत्तापूर्ण असल्याचे गौरवोद्गार आ. जयंत आसगावकर यांनी काढले.

प्रारंभी भुदरगड तालुक्यातील सचिन देसाई, करवीर तालुक्यातील सुधीन आमनगी व नकुशी देवकर हातकणंगले तालुक्यातील शिवाजी पाटील यांना सन 2023 तर शाहूवाडी तालुक्यातील शोभा पाटील यांना सन 2022 चा सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल  शाल, श्रीफल, स्मृर्तीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

 

सन 2022-23 व 2023-24 या वर्षातील जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक :-

डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन जिल्हा शिक्षक पुरस्कार 2022- मारुती डेळेकर (आजरा), सचिन भोसले- (भुदरगड), राजेंद्र शिंदे- (भुदरगड), प्रशांत पाटील- (चंदगड), अर्चना देसाई- (गडहिंग्लज), गीतांजली कमळकर- (कागल), राजाराम नारींगकर- (राधानगरी), विश्वास भोसले-(गगनबावडा), सुषमा माने- (हातकणंगले), महेश बन्ने- (हातकणंगले), दत्तात्रय पाटील- (करवीर), तानाजी घरपणकर- (पन्हाळा), शिवाजी पाटील- (शाहूवाडी), अरुणा शहापुरे- (शिरोळ) सन 2023 पुरस्कार – श्रीमती सुरेखा नाईक- (आजरा), कविता चौगले- (भुदरगड), सरीता नाईक-(चंदगड), पद्मश्री गुरव- (गडहिंग्लज), स्नेहा चव्हाण- (कागल), गणेश पाटील- (राधानगरी), सायली तांबवेकर- (हातकणंगले), राजेंद्र तौदकर- (करवीर), किरण सुतार-(पन्हाळा), कविता मगदूम- (शाहूवाडी), साताप्पा नेजे- (शिरोळ), संजय देसाई- (गगनबावडा) यांना देण्यात आला.

विशेष जिल्हा शिक्षक पुरस्कार 2022 – विजय परिट, (कागल) ; जिल्हा शिक्षक पुरस्कार 2022 माध्यमिक शिक्षक गट-  संतोष सनगर (करवीर) तर उच्च माध्यमिक गट कुंडलिक जाधव (गगनबावडा)  व सुषमा पाटील (करवीर) यांना विभागून देण्यात आला.

विशेष जिल्हा शिक्षक पुरस्कार 2023 –   अनिल चौगले (राधानगरी) यांना तर माध्यमिक शिक्षक गट पुरस्कार विजया दिंडे (करवीर) यांना देण्यात आला.

यावेळी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत (सन 2019-20) हातकणंगले तालुक्यातील ग्रामपंचायत संभापूरला 5, शाहूवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत शिवारेला 3 तर आजरा तालुक्यातील श्रृंगारवाडी ग्रामपंचायतीला 2 लाख रुपये तसेच सन 2020-21 व 2021-22 साठी आजरा तालुक्यातील ग्रामपंचायत वाटंगीला 5, हातकणंगले तालुक्यातील अंबपवाडी ग्रामपंचायत 3 तर पन्हाळा तालुक्यातील ग्रामपंचायत पोखलेला 2 लाख रुपयांचे बक्षीस पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते देऊन यावेळी गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रशासक तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी तर आभार श्रीमती शेंडकर यांनी मानले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जयपूरच्या धर्तीवर कोल्हापूरच्या विकासासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री दीपक केसरकर

कोल्हापूर, दि.8 (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचार व कार्याचा वारसा जपणाऱ्या कोल्हापूरचा जयपूरच्या धर्तीवर सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन करुन पंचगंगा घाटावरील विकास व संवर्धनाचे काम पूर्ण झाल्यावर पंचगंगा घाटाच्या सौंदर्यात आणखीनच भर पडेल, असा विश्वास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

कोल्हापुरातील पंचगंगा घाटावर होणाऱ्या विकास व संवर्धन कामाचे भूमिपूजन मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते आज झाले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता हर्षजित घाटगे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजनेतून दोन कोटी पन्नास लाख रुपयांच्या निधीतून ही कामे होणार आहेत. पंचगंगेचा जूना 60 मीटर व नवीन 55 मीटरचा घाट अशा एकूण 115 मीटर लांब घाटाचा विकास व पायरीचे 11 टप्पे या निधीतून करण्यात येणार आहेत. यातील 115 मीटरचे 5 टप्पे होणार असून 55 मीटरचे 11 टप्पे होतील. घाटाचा हेरिटेज लुक कायम ठेवून कामे गतीने करावीत, अशा सुचना करुन हे काम पूर्ण झाल्यावर पंचगंगा घाटाच्या सौंदर्यात आणखीनच भर पडेल, असा विश्वास पालकमंत्री श्री. केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला.

केवळ औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील विकासाबरोबरच ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा म्हणून कोल्हापूरचा विकास करणे आवश्यक आहे. राज्यासह देशभरातील प्रत्येक नागरिक कोल्हापूरला आला पाहिजे या दृष्टीने कोल्हापूरच्या विकासावर भर देण्यात येत आहे, असे सांगून पंचगंगा घाट हे कोल्हापूरचे सौंदर्य आहे, त्यामुळे कोल्हापूरच्या पंचगंगा घाटाच्या विकासाबरोबरच जुना राजवाडा ते नवा राजवाडा मार्ग, अंबाबाई मंदिर परिसराचा विकास आदी विविध विकास कामे टप्प्याटप्प्याने करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी राहुल रेखावार व महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्या सहकार्याने कोल्हापूरचा विकास गतीने करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता

मुंबई, दि. 8 : गणेशोत्सवाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरुन 38 टक्के करण्याच्या प्रस्तावावर आज मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.

सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शासनाकडून अर्थसहाय देण्यात येते. त्यामुळे महागाई भत्त्यामध्ये 4 टक्क्यांची वाढ झाल्याने सरकारवर 9 कोटी रुपयांचा बोजा पडेल.  त्याचप्रमाणे असुधारित वेतन संरचनेतील राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना 212 टक्के महागाई भत्ता देण्यात येईल.

—–०—–

समर्पित भावनेने काम करून सामाजिक प्रश्न सोडवण्यात पुढाकार घ्यावा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सोलापूर, दि.8 (जिमाका):- प्रत्येक व्यक्तीने समाजात वावरत असताना या समाजाप्रती काही देणे आहे अशी समर्पित भावना ठेवून सामाजिक प्रश्न सोडवण्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन आयोजित शेतकरी, उत्कृष्ट अधिकारी व पदाधिकारी गौरव सोहळयात पालकमंत्री विखे पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, विजयराजे ढोबळे, सौ. शोभा पवार, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे मंगेश चिवटे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री विखे पाटील पुढे म्हणाले की, रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन द्वारा होत असलेल्या शेतकरी, उत्कृष्ट अधिकारी व पदाधिकारी गौरव सोहळ्यातील सर्व मान्यवरांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेले असून त्यांच्या कार्यामुळे समाजाला मोठा फायदा झालेला आहे. अधिकाऱ्यांनी प्रशासकीय कामकाज करत असताना चाकोरी बाहेर जाऊन त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांना मदत करून त्यांचे प्रश्न सोडवण्यास हातभार लावलेला आहे, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून शेती पिकाचे उत्पादन चांगले घेऊन अर्थव्यवस्थेला गती देण्याचा प्रयत्न केला आहे, अशा सर्व मान्यवरांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी पालकमंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते शेतकरी उत्कृष्ट अधिकारी व पदाधिकारी यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या वतीने त्यांच्या पत्नी सौ. शोभा पवार यांनी सत्कार स्वीकारला. मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी आशिष लोकरे, जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा, शेतकरी बाळासाहेब काळे, उद्योजक दत्तात्रय कोरे, संध्या खांडेकर, सीमाताई घाडगे व अन्य मान्यवरांचा सत्कार पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला.

प्रारंभी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील रुरल फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. सुनील गावडे यांनी प्रस्ताविक केले व या कार्यक्रमाचा उद्देश सांगितला.

‘शासकीय रोपवाटिका व्यवस्थापन’ या विषयावरील राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन

मुंबई दि. 8 : कृषी महाविद्यालय, पुणे येथील शिरनामे सभागृहात ‘शासकीय रोपवाटिका व्यवस्थापन’ या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन कृषी आयुक्त श्री. सुनील चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी फलोत्पादनचे संचालक डॉ.कैलाश मोते, सहसंचालक अशोक किरनळी, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे प्राध्यापक डॉ.पराग हळदणकर, कृषी अभियांत्रिकीचे  प्राध्यापक डॉ.रवींद्र बनसोडे उपस्थित होते.

शासकीय रोपवाटिकेमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचारी, सर्व संबंधित उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील तंत्र अधिकारी कार्यशाळेत सहभागी झाले होते.

00000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

बृहन्मुंबई महापालिका शाळांमध्ये रात्र अभ्यासिका सुरू; सुमारे ४ लाख विद्यार्थ्यांना लाभ होणार – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. ८ :- बृहन्मुंबई महापालिकेच्या शालेय इमारतींमध्ये सायंकाळच्या वेळेत रात्र अभ्यासिका सुरू करण्याचे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महापालिकेच्या शालेय शिक्षण विभागाला दिले होते. त्याची अंमलबजावणी विभागाने सुरू केली असून, त्या अंतर्गत अंधेरी पूर्व येथील कोल डोंगरी परिसरातील नित्यानंद मार्ग पब्लिक स्कूल येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत रात्र अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज नित्यानंद मार्ग पब्लिक स्कूल येथे या रात्र अभ्यासिकेचे उद्घाटन केले.

मंत्री श्री.लोढा म्हणाले की, मुंबई शहरात अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी जागा, आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध नाहीत, त्यामुळे इच्छा असताना सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास, प्रगती करण्यास अडथळे निर्माण होतात. त्यामुळे मुंबईमध्ये रात्र अभ्यासिकेची नितांत गरज होती. या अभ्यासिकेमुळे मुलांचे अनेक प्रश्न सुटणार आहेत. हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष आहे. त्यानिमित्ताने लवकरच आपल्या शहरात ३५० रात्र अभ्यासिका सुरू व्हाव्यात, यासाठी प्रयत्न करण्यात येतील. टप्प्याटप्प्याने महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सुरू होणार असून, त्याचा लाभ या शाळेत शिकणाऱ्या सुमारे ४ लाख विद्यार्थ्यांना होणार असल्याचे, मंत्री श्री.लोढा यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ही प्रथम रात्र अभ्यासिका सुरू झाली असून, यापुढे प्रत्येक वार्डमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही मंत्री श्री.लोढा यांनी सांगितले.

महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या तसेच परिसरातील खासगी शाळेत शिक्षण घेणाऱ्या नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमात प्रवेश घेता येणार आहे. उत्कर्ष शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहकार्याने, पालिकेच्या शाळांमध्ये तळमजल्यावर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र खोली उपलब्ध असेल अशा इमारतीतच ६ ते ८ या वेळात रात्र अभ्यासिका सुरू करण्यात येणार आहे. प्रवेशासाठी पालकांकडून संमती पत्र, त्याचबरोबर विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती आवश्यक असणार आहे.

या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार पराग आळवणी, माजी नगरसेवक अभिजित सावंत आणि संबंधित अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

0000

संध्या गरवारे/विसंअ

ग्रामविकास विभागाच्या भरतीप्रक्रियेतील उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये – मंत्री गिरीष महाजन

मुंबई, दि. ८ :- ग्रामविकास विभागाची संपूर्ण भरतीप्रक्रिया शासनाने मान्यता दिलेल्या आय.बी.पी.एस. या कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. त्यामुळे सदर परीक्षा अत्यंत पारदर्शक व काटेकोर पद्धतीने होणार आहे. तथापि, काही समाजविघातक प्रवृत्तींच्या व्यक्तींकडून प्रलोभने दाखवून आर्थिक फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा फसवणुकीपासून उमेदवारांनी दक्षता घ्यावी, तसेच अशाप्रकारच्या कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये, असे आवाहन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीष महाजन यांनी केले आहे.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत राज्यातील 34 जिल्हा परिषदांतर्गत गट – क मधील 30 संवर्गातील एकूण 19 हजार 460 इतकी रिक्त पदे सरळसेवेने भरण्याबाबतची जाहिरात दि. 05 ऑगस्ट, 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जाहिरातीनुसार दि. 05 ते 25 ऑगस्ट, 2023 पर्यत ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले आहे की, कोणतीही व्यक्ती परिक्षेसंदर्भात आर्थिक मागणी करीत असल्याबाबत निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुद्ध जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात यावी, फसवणूक झाल्यास शासन अथवा जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही.

००००

राजू धोत्रे/विसंअ

टोकियो येथील जागतिक कराटे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या चमूला मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

मुंबई, दि.८  :- जागतिक कराटे चॅम्पियनशिपध्ये सहभागी होणाऱ्या टीमला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.

ऑक्टोबर, २०२३ मध्ये जपानमधील टोकियो येथे होणाऱ्या जागतिक कराटे चॅम्पियनशिपमध्ये मुंबईच्या कराटेनोमिची वर्ल्ड फेडरेशन इंडिया संस्थेतील खेळाडू सहभागी होणार आहेत. या खेळाडूंनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. कराटे चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणाऱ्या संघातील या संस्थेचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्यासह ७ खेळाडू, २ पंच अधिकारी अशा ९ जणांच्या चमूला मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

00000

गुंजोटी येथे वेदप्रकाश हुतात्मा झाले ; मराठवाडा मुक्ती लढा तीव्र झाला

स्टेट काँग्रेसने स्वामी रामानंद तिर्थ यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष तीव्र झाला , जुलूम व अन्याय यांचा प्रतिकार करणे हीच खरी ईश्वरभक्ती आहे. असे स्वामीजींचे सूत्र होते. सत्याग्रहींच्या सर्व तुकड्यांमध्ये मराठवाड्यातील तरुण आघाडीवर होते. गोविंदभाई श्रॉफ, माणिकचंद पहाडे यांनी कुशलपणे सत्याग्रहीचे संघटन केले. मराठवाड्यातील ३५०  सत्याग्रहींनी भाग घेतला. सत्याग्रहासाठी तरुणांची मने प्रज्वलित करण्यासाठी गोविंदभाई श्रॉफ, माणिकचंद पहाडे , बाबासाहेब परांजपे, पुरुषोत्तमराव चपळगावकर, कर्वे गुरुजी यांनी मोलाचे योगदान दिले. स्टेट काँग्रेस व जातीयवादी संघटना यांच्या सत्याग्रहामध्ये गल्लत होऊन स्टेट काँग्रेसबद्दल गैरसमज वाटू लागले. म्हणून महात्मा गांधीजींच्या आदेशावरून स्टेट काँग्रेसचा सत्याग्रह स्थगित करण्यात आला.

आर्य समाजाचे कार्य :

संस्थानात आर्य समाजाने अखिल भारतीय स्वरूपाचा लढा दिला. हैदराबाद संस्थांनातील हिंदू प्रजेवरील अन्यायाकडे लक्ष वेधण्यात आर्य समाज सफल ठरला. आर्य समाजाने 24 ऑक्टोबर, 1938 पासून पुढे जवळपास दहा महिने सत्याग्रहाचा लढा चालवला. हिंदू संघटन करणाऱ्या आर्य समाजावर निजामाचा रोष होता. त्यामुळे संस्थांनात व मराठवाड्यात आर्य समाजाच्या शाखा वाढल्या.  आर्य समाजाला जात, पात भेद व स्त्री – पुरुष भेद मान्य नव्हता, म्हणून त्यांनी अनेक अस्पृश्यांना वैदिक धर्मात समाविष्ट करून घेतले. संस्थानात 1941 पर्यंत आर्य समाजाच्या 241 शाखा कार्यरत होत्या. आर्य समाजाचे 12 हजार पेक्षा अधिक सत्याग्रही तुरुंगात गेले. संस्थानात एकूण 40 हजार एवढे आर्य समाजाचे अनुयायी असल्याचे दिसून येते. तेलंगण, कर्नाटक विभागाच्या तुलनेत मराठवाडा विभागात आर्य समाज अधिक प्रभावी होता. आर्य समाजाने सक्तीच्या धर्मांतरास विरोध केला. आर्य प्रतिनिधी सभेने शिष्टमंडळ पाठवून संस्थांनातील परिस्थितीची पाहणी करण्यात यश मिळवले. मराठवाड्यात धारूर, गुंजोटी, निलंगा, उमरगा, उदगीर येथील आर्य समाजी लोकांवर अधिक अन्याय झाले. गुंजोटी येथील तरुण कार्यकर्ता वेदप्रकाश याची क्रुर हत्या झाली. हैदराबाद संस्थानातील पहिला हुतात्मा वेदप्रकाश  झाले, आणि मराठवाडा मुक्ती चळवळीने सशस्त्र लढा हाती घेतला. उदगीरला शामलाल यांनी आर्य समाजाच्या चळवळीचे प्रभावीरीत्या संघटन केले.  भाई शामलाल यांची बिदर तुरुंगात हत्या करण्यात आली. निझाम शासनाच्या अन्याय व अत्याचारामुळे संस्थानात आर्य समाजाची लोकप्रियता वाढत गेली व त्यातूनच चळवळीत नव-नवीन कार्यकर्ते व नेते उदयाला आले. आर्य समाजाने निजामाकडे केलेल्या 14 मागण्या केल्या होत्या. संस्थानात आर्य समाजाच्यावतीने पहिला सत्याग्रह दि. 31 जानेवारी, 1939 ला झाला. मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांतून आर्य समाजाच्यावतीने सत्याग्रह झाले. नारायण स्वामी, नरदेव शास्त्री, नरेंद्र देव, बन्सीलाल, शेषराव वाघमारे,  आनंद स्वामी, दिगंबरराव लाटकर, दिगंबरराव शिवणगीकर, निवृत्ती रेड्डी, गणपतराव कथले, शंकरराव पाटील अंधोरीकर यांनी आर्य समाजाच्या चळवळीत चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला ….

क्रमशः……

  • जिल्हा माहिती अधिकारी, उस्मानाबाद

 

ताज्या बातम्या

मिशन शक्ती अंतर्गत पाळणा योजनेची राज्यात अंमलबजावणी – महिला व बालविकास मंत्री आदिती...

0
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी ही पाळणाघरे सुरू करण्यास मान्यता मुंबई दि २१ : केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य या उपक्रमामध्ये महिलांना नोकरीदरम्यान मुलांची...

महाराष्ट्र सदनात लवकरच स्वयंसहायता गटांचे दालन

0
नवी दिल्ली, दि.21 : राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील स्वयं सहायता गटांच्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी एक स्वतंत्र दालन सुरू करण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश...

अमृत, नगरोत्थानच्या पायाभूत सुविधांच्या कामांची गती वाढवण्यासाठी महत्वाच्या सुधारणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलले...

0
मुंबई, दि २१ : केंद्राचे अमृत अभियान त्याचप्रमाणे नगरोत्थान महाभियानातील पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन नागरिकांना सुविधांचा लाभ जलद गतीने मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ...

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून निरीक्षकांची नियुक्ती

0
मुंबई, दि.२१ : भारतीय संविधानातील कलम ३२४ अंतर्गत प्रदत्त अधिकारांचा वापर करून भारताच्या निवडणूक आयोगाने (ECI) उपराष्ट्रपती निवडणूक २०२५ साठी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची निरीक्षक...

जीआय नामांकन प्राप्त पिकांच्या पॅकेजींग व ब्रँडींगसाठी मदत करण्यास शासन सकारात्मक फलोत्पादन मंत्री –...

0
पुणे दि.२१ : राज्यामध्ये उत्पादित होत असलेल्या फळ पिकाची निर्यात वाढविण्यासाठी फळ पिकाचे क्लस्टर वाढवावेत तसेच जीआय नामांकन प्राप्त पिकांच्या पॅकेजींग व ब्रँडींगसाठी मदत...