गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
Home Blog Page 1271

‘मराठवाडा मुक्तीसंग्राम-अमृत महोत्सवी वर्ष’सांगतानिमित्त होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीच्या अनुषंगाने पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

औरंगाबाद, दि :9 (जिमाका)- ‘मराठवाडा मुक्ती संग्रामा’च्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने येथे होत असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीच्या अनुषंगाने पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज सर्व विभागांचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात ही बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय, मनपा आयुक्त जी श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना ,पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्यासह ,जलसंधारण कृषी, शिक्षण , विविध विभागाचे विभाग प्रमुख बैठकीस उपस्थित होते.

मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रकल्पासाठी आवश्यक निधीची मागणी, तसेच विविध विभागातील वेगवेगळ्या कामासाठीचे प्रस्ताव याबाबत आढावा पालकमंत्री भुमरे यांनी घेतला. जिल्ह्यातील शिक्षण विभागाअंतर्गत शाळा खोल्या बांधकाम , कृषी, रस्ते विकास , पर्यटन, वैद्यकीय शिक्षण,  आरोग्य विभाग यांच्यामार्फतही काही प्रस्ताव सादर करण्याबाबत संबंधितांना सूचना करण्यात आल्या. शासकीय दंत महाविद्यालय, पर्यटन, पोलीस स्टेशनसाठी, पोलिसांच्या निवास व्यवस्थेसाठी प्रस्ताव, महापालिकेचे, भूमिगत गटार योजना,स्मशानभूमी, कचरा व्यवस्थापन प्रकल्प, शहरात 5 प्रवेशद्वाराचे निर्मिती याबाबत मागणी प्रस्ताव,  जिल्हा परिषद अंतर्गत जलसंधारण आणि आरोग्य विभागाच्या आरोग्य विभागाच्या बळकटी करणासाठी, क्रीडा विद्यापीठ, सार्वजनिक बांधकाम विभागाचा रिंगरोड उड्डाणपूल ,रस्ता अशा प्रस्तावांचा आढावा घेतला.

०००००

मोफत कॅन्सर तपासणी ओ.पी.डी.तून गोरगरिबांना चांगली सुविधा मिळेल – मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर, दि. 9 (जिमाका):  छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयामध्ये सुरु झालेल्या मोफत कॅन्सर तपासणी ओपीडीतून गोरगरिबांना चांगली सुविधा मिळेल असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. सीपीआरमध्ये बाह्यरुग्ण विभाग इमारतीत मोफत होमिओपॅथिक तपासणी ओ.पी.डी. क्र.111 व कॅन्सर तपासणी ओ.पी.डी. क्र.119 चे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शुभारंभ झाले.

यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले की, सद्यस्थितीत विविध प्रकारच्या कॅन्सरच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्ह्यात सुविधा नसल्याने कर्करोगी रूग्णांना उपचारासाठी जिल्ह्याबाहेरील पुणे, मुंबई व चांगल्या सुविधा मिळणाऱ्या खर्चिक ठिकाणी उपचारासाठी जावे लागते. आता, याठिकाणी सर्वसामान्यांना कॅन्सर प्रकारातील तोंड, घसा, फुफ्फुस, स्तन, गर्भाशय, आतडे, किडणी व मुत्राशय कर्करोग यावरील उपचारांचा लाभ मिळणार आहे. तसेच येथील उपचार फक्त बुधवारीच सुरू न ठेवता सोमवार ते शुक्रवार सुरू करण्याबाबत वैद्यकीय अधिष्ठाता श्री. गुरव यांना त्यांनी सूचना दिल्या.

अधिष्ठाता डॉ. गुरव यांनी शासकीय रूग्णालयातील होमिओपॅथिक तपासणीची ओ.पी.डी. ही राज्यात प्रथमच छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात उपलब्ध करून दिल्याबद्दल वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांचे आभार मानले. सोमवार ते शुक्रवार दुपारी 3 ते 5 या वेळेत रूग्णांची तपासणी करून मोफत औषध दिली जाणार आहेत. तसेच रुग्णांना कर्करोगावर मोफत  तपासणी व उपचार उपलब्ध करून दिल्याबद्दल मंत्री हसन मुश्रीफ यांचे आभार मानले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांनी अशा रुग्णांनी नियमित शिजवलेले अन्न खावे व नियमित व्यायाम करून आजारांना दूर करावे असे सांगितले. कर्करोगाच्या सर्वसाधारण लक्षणांवर दुर्लक्ष झाल्यास गंभीर आजार उद्भवतो म्हणून वेळेत तपासणी व निदान करावे असे पुढे सांगितले.

कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या कार्यकारी संचालिका डॉ. रेश्मा पवार यांनी कर्करोगावर छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात कॅन्सर तज्ज्ञामार्फत मोफत तपासणी नियमित सुरू राहून कर्करोगावर महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत कॅन्सर उपचारासह निदान करून रूग्णास जीवदान देण्यात येणार असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाला प्रमुख अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, वैद्यकीय अधिक्षक डॉ. शिशीर मिरगुंडे, वैद्यकीय उपअधिक्षक डॉ. गिरीष कांबळे, कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या कार्यकारी संचालिका डॉ. रेश्मा पवार, कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर्स, कोल्हापूर न्यू इंटीग्रेटेड होमिओपॅथिक असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. शितल पाटील, सेक्रेटरी डॉ. चेतन गुरव तसेच छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील वैद्यकीय परिचारिका व कर्मचारी तसेच रूग्णांचे नातेवाईक यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ताज मुल्लाणी तर आभार प्रदर्शन डॉ. मिरगुंडे यांनी केले.

00000

जिल्ह्यातील तब्बल ७ लाख ७८ हजार लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’चा लाभ मिळणार : मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दिनांक:9सप्टेंबर, 2023 (जिमाकावृत्त): नाशिक जिल्ह्यातील तब्बल ७ लाख ७८ हजार लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’ चा लाभ मिळणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. आज शहरातील वीर सावरकर हॉल, सावतानगर, सिडको येथे आंनदाचा शिधा वितरण शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी मंत्री छगन भुजबळ बोलत होते.

या कार्यक्रमास आमदार सीमा हिरे, पुरवठा विभागाच्या उपायुक्त प्रज्ञा बढे-मिसाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, सहाय्यक पुरवठा अधिकारी कैलास पवार, रास्तभाव दुकानदार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले, नाशिक रोड येथील पुरवठा अधिकारी कार्यालय आहे त्याच ठिकाणी ठेवून शहरातील नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने शहर पुरवठा अधिकारी पदाचे श्रेणीवर्धन करून जिल्हाधिकारी कार्यालय आवारात शहर पुरवठा अधिकारी कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. गौरी-गणपती, दिवाळी आणि गुढीपाडवा या सणांना शिधा पत्रिका धारकांना 1 किलो रवा, 1 किलो साखर, 1 किलो चणाडाळ व 1 किलो तेल या चार जिन्नसाचा समावेश असलेला संच वितरीत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

गणेशोत्सवानिमित्त सप्टेंबरमध्ये आनंदाचा शिधाचे प्रति शिधापत्रिका धारकांना ई-पॉस प्रणालीद्वारे केवळ 100 रूपयांत वितरीत केला जाणार असून जिल्ह्यातील तब्बल ७ लाख ७८ हजार लाभार्थ्यांना हा लाभ मिळणार आहे.  त्याचप्रमाणे बीपीएल, पिवळे, प्राधान्य केसरी शिधापत्रिकाधारकांनाही याचा लाभ होणार आहे. शहरातील 230 रास्त भाव दुकानांतून या शिधासंचाचे वाटप होणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिली.

मंत्री श्री. भुजबळ पुढे म्हणाले, आनंदाचा शिधा हा शिधा पत्रिकाधारकांचा हक्क असून प्रत्येक शिधा पत्रिकाधारकांपर्यंत हा लाभ पोहचला पाहिजे, या कामात कोणतीही हयगय होणार नाही याची अधिकारी व रास्त भाव दुकानदार यांनी दक्षता घ्यावी अशा सूचनाही मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिल्या. येत्या दोन ते तीन दिवसांत रास्त भाव दुकानदारांनी आनंदाचा शिधा वितरण पूर्ण करावे अशा सूचनाही मंत्री श्री. भुजबळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आंनदाचा शिधा वाटपाचा घेतलेल्या निर्णयामुळे सणांचा गोडवा निश्चितच वाढणार असल्याचे आमदार सीमा हिरे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हापुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी केले. यावेळी मंत्री छगन भुजबळ व मान्यवरांच्या हस्ते नागरिकांना प्रातिनिधीक स्वरूपात आनंदाचा शिधा संचाचे विरतण करण्यात आले.

000000

शिक्षक आणि पालकांनी चारित्र्यसंपन्न पिढी घडविण्यासाठी योगदान द्यावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. 9: विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी शासनाकडून आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत; शिक्षणाच्या माध्यमातून चारित्र्यसंपन्न पिढी घडविणे ही काळाची गरज असून शिक्षक आणि पालकांनी यासाठी योगदान द्यावे. तसेच विद्यार्थ्यांनी नव्या काळातील आव्हाने ओळखून पारंपरिक विचार न करता नवे आणि आवडीचे क्षेत्र निवडावे,असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

अल्पबचत भवन येथे आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार व अध्यक्ष चषक पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, सुनंदा वाखारे, कमलाकांत म्हेत्रे, रणजित शिवतारे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असते. शिक्षकांनी चांगली कामगिरी करत विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य करावे. गरीब कुटुंबापर्यंत चांगले आणि दर्जेदार शिक्षण पोहचविण्याची जबाबदारी शिक्षकांची असून शिक्षकांनी त्यासाठी विशेष प्रयत्न करावे. विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा उत्तमरीतीने शिकविता यावी यासाठी ती भाषा आत्मसात करावी आणि चांगले उपक्रम राबवावे. कौशल्याचे आणि नैतिकतेचे शिक्षण देऊन विद्यार्थी गुणवंत, ज्ञानवंत आणि चारित्र्यसंपन्न व्हावा यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन देशाचा नावलौकिक उंचवावा. यशाची शिखरे गाठताना शाळेला किंवा शिक्षकांना विसरू नये. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करताना चांगले मित्र निवडावे. नैतिकतेचा विसर पडू देऊ नये आणि नियमित व्यायाम करावा. व्यसनापासून दूर रहात आवडते छंद जोपासावे. आपल्या उत्तम कामगिरीत सातत्य राखत शाळेचा आणि देशाचा नावलौकिक उंचवावा, असा संदेश उपमुख्यमंत्री पवार यांनी विद्यार्थ्यांना दिला.

राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत इंग्रजी भाषेतूनही शिक्षण देण्यावर भर देण्यात येत आहे. मातृभाषा महत्वाची असून जागतिक संवादाची भाषा म्हणून इंग्रजीलाही महत्व देण्याची गरज आहे. त्यासाठीही शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावे, असेही श्री.पवार म्हणाले. शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी व्हावे यासाठी अधिक प्रयत्नांची गरज आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणाची पुढील वर्षांपासून 100 टक्के अंमलबजावणी करण्यात येणार आहे. परंपरागत शिक्षण पद्धतीत रोजगार देण्याची क्षमता आणि विद्यार्थ्याच्या संशोधक वृत्तीला कमी वाव होता. नव्या शैक्षणिक धोरणात या बाबींवर भर देण्यात आला आहे. शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना पुढील वर्षांपासून पहिलीच्या आधीची तीन वर्षे महत्वाची मानली जाणार आहेत. या तीन वर्षात मातृभाषेतून शिक्षण देण्यावर भर  आहे.

शिक्षणाच्या माध्यमातून परंपरेविषयी अभिमान निर्माण व्हावा असा प्रयत्न आहे. संस्कारावर भर, शालेय स्तरापासून व्यवसायाभिमुख शिक्षण आणि मातृभाषेतून शिक्षण या बाबींवरही लक्ष देण्यात येणार आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी   नव्या शैक्षणिक प्रवाहांचा विचार करण्याची गरज आहे.  जगाला ज्ञानवान, कर्तृत्ववान आणि आपल्या कामाप्रति निष्ठा असणाऱ्या कुशल मनुष्यबळाची गरज आहे. असे विद्यार्थी घडावेत यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे, असे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले.

प्रास्ताविकात श्री.चव्हाण म्हणाले, जिल्ह्यात 3 हजार 668 शाळा असून प्रत्येक गणातून 2 शिक्षकांची निवड पुरस्कारांसाठी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्व तालुक्यातील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी व्हावे यासाठी जिल्हाभर मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

उपमुख्यमंत्री श्री.पवार आणि पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते जिल्हा शिक्षक पुरस्कार व अध्यक्ष चषक पुरस्कार, शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शक शिक्षक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तसेच शिष्यवृत्ती परीक्षा राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांनाही यावेळी पुरस्कार देण्यात आले.

0000

 

कवठेमहांकाळ एस.टी. आगारात १८ एस.टी. बसेसचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

सांगली दि. 9 (जि.मा. का.):- सामान्य माणसाच्या रोजच्या प्रवासामध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महत्त्वाचा घटक आहे.  प्रवाशांचा सुरक्षित आणि सुखकर प्रवास व्हावा यासाठी कवठेमहांकाळ आगारासाठी नवीन  18 एस.टी.बसेस देण्यात आल्या असून या बसेसचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते आज करण्यात आले.

कवठेमहांकाळ बसस्थानक येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी खासदार संजय पाटील, तहसिलदार अर्चना कापसे, विभागीय वाहतूक अधिकारी वृषाली भोसले, कवठेमंकाळ आगार व्यवस्थापक आश्विनी किरगत, वाहतूक निरीक्षक अजिंक्य पाटील, सहायक वाहतूक निरीक्षक शाहिद भोकरे, सहायक कार्यशाळा अधीक्षक अजितकुमार गोसराडे यांच्यासह पदाधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी या नवीन प्राप्त झालेल्या बसेस उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.     

००००००

शासन आपल्या दारी उपक्रमामुळे कामगारांना मिळाली सुरक्षेची हमी…

‘शासन आपल्या दारी’ या अभियानाचा मुख्य उद्देश हा शासनाच्या योजनांचा, उपक्रमांचा लाभ सर्वसामान्यांना त्वरीत मिळावा हाच आहे. सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध शासकीय योजनांचे लाभ मिळावेत यासाठी शासन आता थेट जनतेच्या दारी येत आहे. राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक यांचे प्रश्न त्वरित निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या संकल्पनेतून राज्यात हे अभियान प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

धुळे जिल्ह्यात 10 जुलै, 2023 रोजी भव्य जिल्हास्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तसेच जिल्हा सरकारी कामगार अधिकारी, धुळेमार्फत कामगारांना जोखमीचे काम करीत असतांना कामगारास शारिरीक इजा होऊ नये याकरिता मंडळामार्फत शासन आपल्या दारी कार्यक्रमात 1 हजार 19 सुरक्षा संचाचे वाटप करण्यात आले. या योजनेचा धुळे जिल्ह्यातील वंदना पांडुरंग पाटील (कापडणे, ता. धुळे), मंगलबाई संतोष पाटील (बाळापूर, ता.धुळे), विध्याबाई राकेश पाटील, (सौदाणे, ता. धुळे), भाऊसाहेब बापू मासुळे (गोताणे, ता.धुळे), नानाभाऊ शालिग्राम वाघ, नानाभाऊ पाटील (सैताळे, ता. जि. धुळे), आशा पाटील, मगंलाबाई निंबा पाटील (माळीच, ता. शिंदखेडा) यांच्यासह इतर नोंदणीकृत कामगारांना अत्यावश्यक सुरक्षा संचाचा लाभ मिळाला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या वतीनं अत्यावश्यक संच व सुरक्षा संच मिळाल्यामुळे आता बांधकाम साईटवर काम करताना त्यांना सुरक्षेची हमी मिळाली असल्याची भावना संबंधितानी व्यक्त केली आहे. कामगार विभागाच्यावतीने अत्यावश्यक संचामध्ये चटई, जेवणाचा डबा, पाण्याची बॉटल, बॅटरी, मच्छरदाणी व बॅग दिली जाते. तर सुरक्षा संचात हेल्मेट, रिफ्लेक्टिव जॅकेट,सेप्टी हार्नेस, सेफ्टी शूज, सेफ्टी बेल्ट, एअर प्लॅग, मास्क व सेप्टीहॅन्ड ग्लोज अस साहित्य दिलं जाते. मजुरी काम करणाऱ्या बांधकाम कर्मचाऱ्यांना 10 हजार 240 रूपये किंमतीचे हे साहित्य घेणं परवडणारं नसतं त्यामुळे कोणत्याही सुरक्षा साहित्याविना कामगार काम करतात. आता मात्र कामगार विभागाने हे साहित्य दिल्याने कामगार हरखून तर गेलेच आहेत पण त्यांना सुरक्षाही मिळालयाने त्यांनी शासनाचे आभार मानले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी करणे आवयक आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी https://mahabocw.in तसेच जवळच्या जिल्हा सरकारी कामगार कार्यालयात संपर्क साधावा.

 

जिल्हा माहिती कार्यालय, धुळे

000000

 

अमरावतीत साकारणार नवीन विभागीय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत

अमरावती, दि. 8 : विभागीय आयुक्त कार्यालयाची जुनी शिकस्त इमारत तोडण्यात येणार असून त्याठिकाणी नवीन विभागीय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने बांधकाम करण्यात येणाऱ्या जागेची व अनुषंगिक नियोजनाची पाहणी विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज केली. नवीन इमारतीचे बांधकाम कुठल्याही उणीवा न ठेवता, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावे, असे निर्देशही विभागीय आयुक्तांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागीय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत बांधकामासंबंधी आढावा डॉ. पाण्डेय यांनी घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. सामान्य प्रशासन उपायुक्त संजय पवार, तहसीलदार वैशाली पाथरे, संतोष काकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे, सहायक अभियंता तुषार काळे यांच्यासह कार्यान्वयन यंत्रणेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

डॉ. पाण्डेय म्हणाल्या की, विभागीय आयुक्त कार्यालयाची जुनी शिकस्त इमारत पाडण्याचे काम नागरिकांना व कर्मचाऱ्यांना धुळीचा त्रास न होता, अगदी सुरक्षित व सुरळीतपणे करण्यात यावे. सभागृह क्रमांक एक व दोन मध्ये साउंड सिस्टम, एलईडी टि.व्ही. तसेच व्हिडीओ कॉन्फरसिंगकरिता प्रोजेक्टर इत्यादी यंत्रसामुग्री बसविण्यात यावीत. कार्यालयातील कंट्रोल पॅनलमधील चेंज ओव्हर बदलविण्यात यावे. कार्यालयातील सर्व स्वच्छतागृहांत एक्झॉस्ट फॅन बसविण्यात येऊन दर महिन्याला स्वच्छतेचा व किरकोळ दुरुस्तीचा आढावा घेण्यात यावा. दिव्यांग व्यक्तींना कार्यालयात येणे-जाणे सोयीचे होण्यासाठी लिफ्टची व्यवस्था करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.

            यावेळी विभागीय आयुक्तांनी इमारत बांधकाम करण्यात येणाऱ्या जागेची तसेच बैठक सभागृहाची व तेथील सोयी-सुविधांची पाहणी केली.

बांधकाम व्यावसायिकांनी असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा – उद्योगमंत्री उदय सामंत

पुणे,दि.८:- असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. शासकीय योजनांचा कामगारांना लाभ मिळावा यासाठी मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेने पुढाकार घ्यावा असे आवाहन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.

मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेच्या वतीने ‘पुणे शहर व परिसरात होणाऱ्या संभाव्य औद्योगिक विकास व पायाभूत सुविधांचा बांधकाम क्षेत्रावर होणारा परिणाम’ या विषयावर आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेचे एस.आर.कुलकर्णी,  नंदू घाटे,  प्रमोद पाटील, अंकुश आसबे आदी उपस्थित होते.

उद्योग मंत्री श्री.सामंत म्हणाले, बांधकाम क्षेत्रामुळे रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या आहेत.  बांधकाम व्यावसायिक सर्वसामान्यांना घरे उपलब्ध करुन देतात.  बांधकाम क्षेत्रातील असंघटित कामगारांनाही घरे उपलब्ध करुन देण्यासाठी संघटनेने पुढाकार घ्यावा.  संघटनेने त्यांच्या क्षेत्रातील कामगारांची,  महिला कामगारांची नोंदणी करावी. त्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा फायदा मिळेल. मराठी माणसाने मराठी माणसाला व्यवसायामध्ये सहकार्य करावे अशी अपेक्षा श्री.सामंत यांनी व्यक्त केली. बांधकाम क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

खासदार श्रीरंग बारणे यांनी पुणे परिसरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे होत असून याचा लाभ बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांना होणार असल्याचे सांगितले.

संघटनेचे अध्यक्ष नंदू घाटे यांनी प्रास्ताविकात संघटनेच्या कार्याची माहिती दिली.

‘मी सुपरहिरो भारताचा नागरिक’ या मतदार जागृतीसंबंधी पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते ११ सप्टेंबर रोजी प्रकाशन

मुंबई, दि. 8 :   मतदार जागृतीचा उपक्रम म्हणून ‘आगम’ या सामाजिक संस्थेने किशोर आणि युवा पिढीला भारतातील निवडणूक यंत्रणा, मतदानाचे महत्त्व याची माहिती देण्यासाठी ‘मी सुपरहिरो भारताचा नागरिक! (Me The Superhero Indian Citizen!)’ हे पुस्तक तयार केले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन दि.11 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 4.00 वा. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन येथे होणार आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम आयोजित करत असते. त्यासाठी विविध सामाजिक संस्था, शाळा-महाविद्यालये, खाजगी व शासकीय आस्थापने यांचे सहकार्य घेतले जाते. मतदार जागृतीचे हे पुस्तक मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असून त्यांतील भाषा तरुण पिढीला सहज समजणारी आहे. हे एक ‘कॉमिक बुक’ असून साध्या सोप्या उदाहरणांतून निवडणूक यंत्रणा, मतदानाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व, निवडणूक प्रक्रिया, सुजाण नागरिकाच्या जबाबदाऱ्या इ. समजावून सांगण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालये, विद्यार्थी आणि पालक यांनी हे आवर्जून वाचावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.

पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी, आगम संस्थेच्या सहसंचालक भारती दासगुप्ता आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

००००

संध्या गरवारे/विसंअ

लसीकरण करा, पशुंमधील लाळ खुरकत रोग टाळा

लाळ खुरकत रोगाचा प्रादुर्भाव हा पशुपालन फायदेशीर होण्यामधील प्रमुख अडसर आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे देशात वार्षिक सुमारे 12 ते 14 हजार कोटी इतके आर्थिक नुकसान होत असते. या आजाराविषयी जनजागृती व उपाययोजनांसाठी राष्ट्रीय लाळ खुरकत रोग नियंत्रण जागृती सप्ताहाचे 11 ते 17 सप्टेंबरदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. त्याविषयी जाणून घेऊया..!

लाळ खुरकत रोगाचे सन 2025 पर्यंत नियंत्रण आणि 2030 पर्यंत निर्मूलन या उद्देशाने राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम (एनएडीसीपी) हा महत्वाकांक्षी कार्यक्रम केंद्र शासनाने 11 सप्टेंबर 2019 रोजी सुरु केला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील सर्व गो व म्हैस वर्गीय पशूंचे लसीकरण केले जात असून यानंतर शेळ्या, मेंढ्या आणि वराहांचे लसीकरण हाती घेण्यात येणार आहे.

लाळ खुरकत रोगामुळे प्रामुख्याने पशूंची मर्तुक, दुग्धोत्पनात घट, वंध्यत्व समस्या, वासरांतील कायम स्वरूपी खुंटणारी वाढ, मांस व लोकर उत्पादनातील घट, औषधोपचारावरील खर्च आणि पशुजन्य पदार्थाच्या निर्यातीवरील बंदी या बाबींमुळे नुकसान  होते.  मोहीम स्वरूपातील रोगाच्या प्रादुर्भावाचे प्रमाण कमी झाले आहे. तथापि, लाळ खुरकत रोगाचा प्रादुर्भाव काही भागांमध्ये कमी जास्त तीव्रतेने होत आहे.

लाळ खुरकत रोगाचे नियंत्रण आणि निर्मुलनकरण्याकरिता रोग निदान कौशल्य, रोगांचा प्रतिबंध आणि नियंत्रण, संनिरीक्षण, रोग नियंत्रणाबाबत असणाऱ्या कायदेशीर बाबींचा प्रभावी वापर आणि भागधारकांचा (स्टेक होल्डर्स) सहभाग ही पंचसूत्री महत्वाची आहे. भागधारकांचा सहभाग हा लाळ खुरकत रोग निर्मूलनातील मुख्य तांत्रिक घटक व आधार आहे. 2030 पर्यंत ‘लाळ खुरकत रोग मुक्त भारत’ करण्याकरिता या कार्यक्रमाशी संलग्न सर्व तांत्रिक मनुष्य बळाचे प्रबोधन, पशुपालनाशी संबधित सर्व भागधारकांची जनजागृती ही सर्वोच्च प्राथमिकता आहे.

लाळ खुरकत रोग (एफएमडी)

लाळ खुरकत रोग अर्थात लाळ्याखुरकत, तोंडखुरी-पायखुरी हा गायवर्ग, म्हैस वर्ग, शेळ्या, मेंढ्या, वराह यासारख्या दोन खूर असलेल्या प्राण्यांमधील एक अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे. लाळ खुरकत विषाणूच्या सात उपप्रकारापैकी ओ, ए, शिया- एक हे तीन उपप्रकार भारतामध्ये आढळून आले आहेत.

विषाणूचा  प्रसार  हवेतून, श्वासोच्छ्वासाद्वारे, पशूंच्या पाण्याची भांडी, शेण, मुत्र, दूध चारा, गव्हाणी, गोठ्यावर येणाऱ्या व्यक्ती, वाहने, पाळीव प्राणी, नवीन खरेदी केलेली जनावरे यांच्याद्वारे रोगाचा प्रसार होतो. गावातील जनावरे चराईसाठी आणि पाणी पिण्यासाठी एकत्रित सोडली जातात त्या ठिकाणी रोगाचा प्रसार वेगाने होतो.

रोगाची लक्षणे

रोगाचे विषाणू शरीरात प्रवेश केल्या नंतर एक ते पंधरा दिवसात रोगाची प्रत्यक्ष लक्षणे दिसू शकतात. पशूंना 102-106 अंश पर्यंत तीव्र ताप येतो. जनावरे चारा खाणे बंद होते, तोंडातून दोरीसारखी लाळ गळू लागते. जिभेवर, हिरड्यावर, तोंडातील आतील भागावर, कासेवर, खुरामध्ये फोड येतात. एक दोन दिवसात हे फोड फुटतात आणि त्या ठिकाणी अल्सर सारखी जखम होते. या जखमांमुळे जनावरांना चारा खाता येत नाही, जनावरे अशक्त होतात.

पायातील खुराच्या मधील जखमा वेदनादायी असल्याने बऱ्याच वेळा जनावरे पाय वर धरतात. या जखमांवर माश्यांनी अंडी घातली तर तिथे अळ्या पडतात. या अवस्थेत जीवाणूंची बाधा होऊन जखमा चिघळतात व कित्येक दिवस त्या बऱ्या होत नाहीत. लहान वासरांमध्ये या रोगाची बाधा झाली तर हृदयाचे स्नायू निकामी झाल्याने ती काहीही लक्षणे न दाखविताच मरण पावतात. लहान वासरांमध्ये  50 टक्के पर्यंत मरतुक होऊ शकत असल्याने त्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे.

रोग प्रतिबंधक उपाय

लाळ खुरकत रोग येऊ नये म्हणून जनावरांना दर सहा महिन्यांच्या अंतराने वर्षातून दोन वेळा लसीकरण करावे. गाभण गाई / म्हशींना लाळ खुरकत रोग प्रतिबंधक लस दिली गेली तर त्या गाईच्या होणाऱ्या वासरांचे जन्मानंतर काही काळ या रोगापासून संरक्षण होते. वासरे चार महिन्यांची झाली की त्यांना लसीची पहिली मात्रा द्यावी आणि एक महिन्यानंतर लसीची दुसरी मात्रा ( बुस्टर डोस ) द्यावी. लसीचा योग्य प्रभाव दिसण्यासाठी लसीकरणापूर्वी एक महिना जनावराना जंत नाशके पशुवैद्यकांच्या सल्ल्याने द्यावीत. जनावरांना पुरेसा सकस चारा व पशूखाद्य द्यावे.

लसीकरण कार्यक्रम मोहीम स्वरुपात राबविला जात असल्याने लस टोचण्यासाठी आपल्याकडे अधिकारी- कर्मचारी आले असता न चुकता त्याच वेळी आपापल्या पशूना लसीकरण करून घ्यावे. लसीकरण सकाळी अथवा संध्याकाळी थंड वातावरणात करावे. पशूच्या स्वास्थ्य कार्डावर लसीकरणाचा तपशील नोंद करावा.

रोगावर उपचार

एखाद्या गावात, गोठ्यावर लाळ खुरकत सदृश्य आजार दिसल्यास त्या जनावराना कळपापासून वेगळे करावे व त्याचे चारा पाणी स्वतंत्ररित्या करावे. नजीकच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात कल्पना द्यावी व पशुवैद्यकांच्या सल्ल्याने औषधोपचार करावा. बाजारातून होणारी जनावरांची खरेदी विक्री हे रोगाच्या प्रसाराचे एक प्रमुख कारण असलेने बाजारातून नवीन जनावरे खरेदी करू नये.

तोंडातील जखमांवर बोरो ग्लिसरीन लावावे (850 मिली ग्लिसरीन व 120 ग्राम बोरक्स ). मध, लोणी व नाचणीचे पीठ यांचा लेप तोंडातील व्रणांवर द्यावा. तोंड व पायातील जखमा लवकर बऱ्या होण्याकरिता 2 टक्के खाण्याचा सोडा, 1 टक्के पोटशीयम परमंग्नेट किंवा तुरटीच्या 1 टक्के द्रावणाने दिवसातून दोन तीन वेळा धुवाव्यात.

जैवसुरक्षा

हा रोग येऊच नये म्हणून आधीपासूनच जैवसुरक्षा उपायांची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. जनावरांसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू जसे की भांडी, वाहने, तसेच पशूंची देखभाल करणाऱ्या व्यक्तींचे बूट, कपडे, चप्पल इत्यांदीचे निर्जंतुकीकरण दिवसातून दोन वेळा करावे. या करीता 4 टक्के सोडियम बाय कार्बोनेट (400 ग्रम सोडियम बाय कार्बोनेट 10 लिटर पाण्यात ) किंवा 2 टक्के सोडियम हायड्रोक्साइड द्रावण वापरावे. गोठ्याभोवती दहा फुट पट्ट्यात चुना किंवा ब्लिचिंग पावडर फवारावी.

आजारी जनावरांची स्वतंत्र व्यक्तीद्वारे देखभाल करावी. गोठ्यामध्ये इतर लोकांना प्रवेश देऊ नये. आजारी जनावरांना स्वतंत्र ठेवावे. रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी या सर्व उपाययोजना रोग प्रादुर्भाव थांबल्या नंतरही 21 दिवसापर्यंत चालू ठेवाव्यात. लाळ खुरकत रोगाने आजारी व आजारातून बऱ्या झालेल्या पशूंना सामुदायिक पाणवठे,सामुदायिक गायराने या ठिकाणी किमान दीड महिना प्रवेश देवू नये.

लाळ खुरकत हा विविध पशूंच्या प्रजाती मध्ये आढळणारा, वेगाने पसरणारा, मोठ्या प्रमाणावर पशूंची हानी करणारा रोग आहे. या रोगावर नियंत्रण करण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. आपल्या सर्व पशुंचे  लाळ खुरकत रोग प्रतिबंधक लसीकरण करून राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम योजनेसाठी योगदान द्यावे.

– डॉ.याह्या खान पठाण, सह आयुक्त पशुसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग,

ताज्या बातम्या

जिल्ह्यात औद्योगिक विकासासाठी सदैव कटिबद्ध – मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक, दि. २१ ऑगस्ट, (जिमाका वृत्तसेवा): नाशिक जिल्ह्यात नवीन मोठ्या उद्योगांसह मोठे प्रकल्प येण्यासाठी  पोषक वातावरण असून औद्योगिक विकासासाठी सदैव सकारात्मक व कटिबद्ध आहे,...

‘दिलखुलास’‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची मुलाखत

0
मुंबई, दि. २१ : महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि त्यांच्या हक्कांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग सातत्याने कार्यरत आहे. त्याच धर्तीवर मुंबईत राष्ट्रीय पातळीवरील क्षमता बांधणी...

शेत/ पाणंद रस्ते मजबुतीकरणाच्या शिफारशीसाठी अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन

0
मुंबई, दि. २१ : शेत/ पाणंद रस्ते यांचे मजबुतीकरण करण्यासंदर्भात समग्र योजना तयार करण्यासाठी महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीचे निर्देश/ सूचना तपासून समितीस...

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

0
मुंबई, दि. २१ : यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२५...

कुंभमेळा निमित्त होणारी विकास कामे वेळेत पूर्ण करावीत – मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक, दि. २१ ऑगस्ट, (जिमाका वृत्तसेवा):    कुंभमेळ्यानिमित्त नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे कोट्यवधी रुपयांच्या निधीतून विविध विकास कामे होणार आहेत. ही सर्व कामे गुणवत्तापूर्ण आणि...