बुधवार, जुलै 9, 2025
Home Blog Page 1150

मराठवाड्याचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लेझर शोच्या माध्यमातून मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या जागवल्या आठवणी

छत्रपती संभाजी नगर, दि. 16 :(विमाका) मराठवाड्याचा विकास हाच शासनाचा ध्यास असून मराठवाड्याच्या विकासाला शासनाचे प्रथम प्राधान्य आहे. त्यामुळे मराठवाड्यातील जवळपास ४५ हजारांहून अधिक कोटींच्या विविध विकास कामांना शासनाने मंजुरी दिली आहे. तर मराठवाड्यामध्ये पाणी वळविण्यासाठी १४ हजार कोटींची शासनाकडून तरतूद करण्यात येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव दिनाच्या पूर्व संध्येला मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा श्री. शिंदे यांनी सर्व नागरिकांना दिल्या. तसेच मुक्ती संग्रामात ज्यांनी हौतात्म्य पत्करले त्यांना विनम्र अभिवादन केले.

शहरातील क्रांती चौक येथे ‘गर्जा मराठवाडा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास केंद्रीय वित्त राज्य मंत्री डॉ. भागवत कराड, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक संचालनालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, महापालिका आयुक्त जी.श्रीकांत आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार यांच्या कार्याचे कौतुक केले. छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे राज्यात परत आणण्यासाठी श्री. मुनगंटीवार यांनी संकल्प केला आहे, त्यांचा संकल्प लवकरच पूर्ण होईल, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

चांगली काम करणाऱ्या गणेश मंडळांना यंदा एका वर्षाची परवानगी देण्याऐवजी पाच वर्षांची परवानगी द्यावी. निर्बंधमुक्त गणेशोत्सव, सण साजरे करण्यात यावेत, अशा सूचनाही महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांना यावेळी केल्या.

नाविन्यपूर्ण पद्धतीने लेझर शोद्वारे मराठवाडा मुक्ती संग्रामाची माहिती या कार्यक्रमात सादर करण्यात आली. महापालिकेतील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला. कलावंतांचा गौरवही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. या कार्यक्रमास नामवंत कलकारांची उपस्थिती होती. या कलाकारांनी कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली.यावेळी महानगरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहण, शासकीय सुटीसाठीचे आग्रही व्यक्तिमत्त्व : आर. डी. देशमुख 

15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले. संपूर्ण भारतभर हा क्षण हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. मोठ-मोठे कार्यक्रमही पार पडले. इंग्रजांची जुलमी राजवट उखडून टाकल्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान होताच. त्यामुळे देशातील प्रत्येकाला आनंदाचे, सुख, समृद्धीचे स्वप्न पडणे साहजिकच होते. असे असले तरीही मात्र या क्षणाचा उपभोग याच देशातील काही नागरिकांना घेता येत नव्हता. तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वात देश स्वतंत्र झाल्यानंतरही 13 महिने 2 दिवसांनी हैदराबादच्या निजामाची जुलमी राजवट उखडून टाकत, मराठवाड्याने पारतंत्र्यांचे जोखड फेकून देत मुक्त श्वास घेतला. मात्र हा क्षण साजरा करण्यासाठी मराठवाड्यातील नागरिकांना तब्बल अर्धशतकाची वाट पाहावी लागली. हा क्षण साजरा करता यावा, यासाठी परभणी येथील रामचंद्र देविदासराव देशमुख यांच्यासारख्या अनेक हाडाच्या कार्यकर्त्यांना प्रशासन आणि शासन दरबारी मोठा लढा देत पाठपुरावा करावा लागला…!

देशाला स्वातंत्र्य मिळाले; देशाने आणि देशवासीयांनी राष्ट्रध्वजही स्वीकारला. देशाचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होऊ लागला. त्या दिवशी राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण आणि त्यानिमित्त समस्त देशभर सार्वजनिक सुटीही उपभोगायला मिळू लागली. हे देशातील कोणाही नागरिकासाठी नवीन नाही. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक संस्थान निजामाच्या अधिपत्याखाली होते आणि ते होते तेव्हाचे हैदराबाद. निजामाच्या जोखडातून मुक्त करण्यापासून तो मुक्त‍िदिन राष्ट्रीय सणाप्रमाणे साजरा करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी मराठवाड्याला संघर्षच करावा लागलेला आहे.

 शासन दरबारी मराठवाडा मुक्ती दिन साजरा केला जावा, येथील जनतेला निजामाच्या जुलमी राजवटीतून स्वातंत्र्य मिळाल्याची माहिती व्हावी, या दिवसाचे भावी पिढीला चिरंतन ज्ञान व्हावे, त्यांना या दिनाचे महत्त्व कळावे, ही आंतरिक तळमळीची भावना आर. डी. देशमुख उर्फ अण्णा यांची होती. त्यामुळे त्यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू केला. आजघडीला संपूर्ण देश गत वर्षभरापासून भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. सोबतच हैदराबाद संस्थानातून मराठवाड्यालाही मुक्त होऊन 75 वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र, मराठवाडा मुक्ती दिन साजरा करण्याची कल्पना मनात येणे, त्या कल्पनेमागील देशभक्तीची भावना भावी पिढीमध्ये रुजण्यासाठी प्रयत्न करणे अतिशय महत्त्वाचे! त्या  देशभक्तीच्या भावनेची गरज आर. डी. देशमुखांसह इतरांना भासू लागली. त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले; ते 1991 हे वर्ष होय. त्यामुळे या भागात मराठवाड्याचा मुक्ती दिन साजरा करावा, या मागणीला सर्वप्रथम सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्या मागणीला हेटाळणीचा सूर लाभला.

देशात स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्र दिन साजरा केला जातोच की, आता हा नवीन मुक्तिसंग्राम दिन कशासाठी ? अशी प्रश्नार्थक कुत्सीत भावनाही काहींनी व्यक्त केली. मात्र, आर. डी. देशमुख त्याला बधले नाहीत. त्यांनी शासन दरबारी आपली ही मागणी लावून धरली. त्यासाठी ते राज्य शासनापाठोपाठ केंद्राकडे सतत पाठपुरावा करत राहिले. त्यांच्या या आंतरिक‌ तळमळ, आणि सततच्या पाठपुराव्यातून त्यांनी मराठवाडा मुक्ती दिनाचे महत्त्व केंद्र शासनाच्या लक्षात आणून दिले. राज्य व केंद्र शासन जर बधले नाही तर म्हणून मग आर. डी. देशमुखांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून न्यायालयीन पातळीवरही आपले प्रयत्न सुरुच ठेवले.

तत्कालीन मंत्रीमहोदय शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी आर. डीं.च्या या मागणीसंदर्भात मंत्रालयात बैठक बोलावली, हा या मागणीचा पहिला टप्पा होय. या बैठकीच्या माध्यमातून ध्वजारोहण आणि शासकीय सुटीच्या लढ्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

            याच लढ्याच्या भाग म्हणून तेव्हा आर. डी. देशमुखांनी तत्कालीन राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांची  मुंबई येथील राजभवनात भेट घेऊन याबाबत सविस्तर माहिती दिली. सोबतच केंद्र शासनाचे तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांची शिष्टमंडळासह नवी दिल्ली येथे भेट घेतली. त्यांनाही मराठवाडा मुक्त झाल्याच्या किमान 50 वर्षानंतर का होईना, या भागातील जनतेला निजामाच्या जाचातून मुक्त झाल्याचा आनंदोत्सव साजरा करता यावा. त्यासाठी स्वातंत्र्यसैनिकाचे, त्यांनी दिलेल्या लढ्याचे स्मरण व्हावे, त्या दिवशी राष्ट्रध्वज उभारून सलामी देत, सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, याबाबत अवगत केले.

रामचंद्र देविदासराव देशमुख यांच्या या प्रयत्नाला यश येऊन तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला आणि मराठवाड्यात 17 सप्टेंबर या दिवशी ध्वजारोहणासह सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याबाबत आदेश दिले. केंद्र आणि राज्य शासनाच्या झालेल्या पत्रव्यवहारानुसार 27 मार्च 1998 रोजी राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांच्या आदेशानुसार व नावाने शासनाचे उपसचिव शं. वि. नलावडे यांनी राज्य शासनाची अधिसूचना काढत 17 सप्टेंबर 1998 या दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. या अधिसूचनेचे महाराष्ट्र शासनाचे राजपत्र बुधवार दि. 6 मे 1998 रोजी काढले. आणि या राजपत्राचे स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक देण्याचे आदेशित केले. तत्पूर्वी मराठवाडा मुक्त‍िसंग्राम दिन ध्वजवंदनाने साजरा करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने 27 मार्च 1998 रोजी मराठवाड्यात दरवर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याची अधिसूचना काढली.

दि. 4 सप्टेंबर 1998 रोजी दरवर्षी 17 सप्टेंबरला ध्वजारोहणाच्या परवानगीबाबतचे परिपत्रक काढले. त्यानंतर दि. 14 सप्टेंबर 1998 रोजी मराठवाडा मुक्ती दिन कार्यक्रम साजरा करण्याबाबतच्या सविस्तर सूचना राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून प्रशासनाला देण्यात आल्या. सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव व सह मुख्य राजशिष्टाचार अधिकारी रे. शा. बेंजामिन यांच्या स्वाक्षरीने 4 सप्टेंबर 1998 रोजी मराठवाड्यात 17 सप्टेंबर 1998 या मुक्त‍िसंग्राम दिनी राष्ट्रध्वज लावण्याबबात एफ.एल.जी-1098/792/60 या क्रमांकाचे परिपत्रक काढले. या परिपत्रकात त्यांनी या परिपत्रकात त्यांनी सामान्य प्रशासन विभागाची 27 मार्च 1998 रोजीची अधिसूचना, गृह मंत्रालयाचे 19 ऑगस्ट 1998 च्या पत्राचा संदर्भ दिला आहे. सोबतच राज्य शासनाच्या 20 मार्च 1991, 5 डिसेंबर 1991 आणि ध्वजसंहितेबाबत 11 मार्च 1998 च्या सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकाचा उल्लेख आहे. तर भारत सरकारच्या गृह विभागाने दि. 16 सप्टेंबर 1999 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी ध्वजारोहण करण्यास परवानगी दिली. तेव्हापासून आता दरवर्षी सार्वजनिकरित्या ध्वजारोहण आणि त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी लागू झाली आहे.

त्यामुळे देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आता मराठवाडाही तितक्याच उत्साहाने गेल्या वर्षभरापासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. मात्र असे असले तरीही मराठवाडा मुक्त‍िसंग्रामाचे हे 75 वे वर्ष असले तरीही शासन दरबारी हा मुक्त‍िसंग्राम दिन म्हणून साजरा करण्याचे यंदाचे हे 25 वेच वर्ष होय.

17 सप्टेंबर 1998 पासून केंद्र आणि राज्य शासनाच्या राजपत्रानुसार पहिला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मराठवाड्यात शासनस्तरावर साजरा करणे सुरू झाले. केंद्र आणि राज्य शासनाच्या दृष्टीने प्रशासन पातळीवर पहिला मराठवाड्याचा मुक्ती संग्राम दिन हा नांदेड येथे 17 सप्टेंबर 1998 रोजी साजरा करण्यात आला. या दिवशी सकाळी 7.30 वाजता विविध शाळा-महाविद्यालयामधून प्रभातफेरी काढण्यात आली. ही प्रभातफेरी सकाळी 9 वाजता नांदेड येथील गुरु गोविंदसिंगजी क्रीडा संकुलात पोहचली. सकाळी 9.05 मिनिटांनी शासकीय विश्रामगृह येथून प्रमुख अतिथींचे विसावा उद्यानाकडे प्रयाण झाले आणि अवघ्या पाच मिनिटांमध्ये पोहचले. सकाळी 9.10 ते 9.25 वाजेपर्यंत येथील स्मृतीस्तंभाच्या प्रतिकृतीचे अनावरण व पोलीस बँडपथकामार्फत हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर प्रमुख अतिथी सकाळी 9.29 वाजता गुरु गोविंदसिंहजी क्रीडा संकुल येथे पोहचले. सकाळी 9.30 ते 9.32 दरम्यान प्रमुख अतिथींच्या हस्ते ध्वजारोहण झाले, नंतर राष्ट्रगीत झाले. त्यानंतर राष्ट्रीय सणांप्रमाणे प्रमुख अतिथींनी पोलीस विभाग, एनसीसी यांच्याकडून मानवंदना स्वीकारत चित्ररथाचे प्रदर्शन पाहिले.

सकाळी 9.45 वाजता सर्व प्रमुख पाहुणे मुख्य मंचावर विराजमान होताच त्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र गीत आणि मराठवाडा गीताचा कार्यक्रम पार पडला. सकाळी 10 वाजता तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे प्रास्ताविक आणि इतर उपस्थित मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे भाषण झाले. त्यानंतर मराठवाड्यातील 7 जिल्ह्यातील 7 ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्यात आला.

 या कार्यक्रमप्रसंगी आर. डी. देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांच्यासोबतच ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक श्रीमती सुशिलाबाई दिवाण आणि श्रीमती दगडाबाई शेळके यांचा सत्कार करण्यात आला. सोबत एका महिला स्वातंत्र्यसैनिकांनीही मनोगत व्यक्त केले. त्यानंतर स्वातंत्र्यसैनिक उच्चाधिकार समितीचे सभापती, माजी खासदार सुर्यकांत पाटील वहाडणे यांचे भाषण झाले. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे मुख्य भाषण आणि वंदे मातरम् ने पहिल्या मराठवाडा मुक्त‍िसंग्राम दिनाची सांगता झाली. रात्री 7 वाजता स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि आतिषबाजी करण्यात आली. या दिवसापासून सुरु झालेल्या मराठवाडा मुक्त‍िसंग्राम दिनाच्या येथील नागरिकांच्या अस्मिता, जोपासण्याच्या आणि ती भविष्यात अखंडपणे सांभाळण्याच्या दिनाला ख-या अर्थाने सुरुवात झाली. त्यामुळे हा कार्यक्रम साजरा करण्याचे यंदाचे हे 25 वे वर्ष होय.

        नांदेड येथे पहिला मराठवाडा मुक्त‍िसंग्राम दिनाचा कार्यक्रम प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या सुवर्ण महोत्सवी दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमातील सत्कार सोहळ्यास उपस्थित राहण्याबाबत राज्य शासनाच्या वतीने औरंगाबादचे विभागीय आयुक्त प्र. ग. कुर्से यांनी आर. डी. देशमुखांना दि. 11 सप्टेंबर 1998 रोजी पत्र पाठविले. विभागीय आयुक्त या पत्रात म्हणतात, या दिवशी शासनाने स्वातंत्र्य दिनाप्रमाणे कार्यक्रम घ्यावेत व सुट्टी जाहीर करावी, म्हणून आपण जे न्यायालयीन प्रयत्न केले व वृत्तपत्रातून जनजागृती केली, त्याबाबत कृतज्ञतापूर्वक महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपला सत्कार नांदेड येथील कार्यक्रमात प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्याचे आम्ही योजिले आहे. तरी कृपया या निमंत्रणाचा आपण स्विकार करावा, या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही विनंती.

या मुख्य कार्यक्रमासाठी तत्कालीन विभागीय आयुक्त प्र. ग. कुर्से यांनी परभणीचे जिल्हाधिकारी बलदेव सिंग यांना एका जबाबदार अधिकाऱ्याला आर. डी. देशमुख यांना परभणी येथून नांदेड येथे 16 सप्टेंबर 1998 रोजी घेऊन जाणे व 17 सप्टेंबर रोजीचा मुख्य कार्यक्रम संपल्यानंतर परत आणण्यासाठी नियुक्त करण्याचे आदेश‍ दिले होते.

    त्यामुळे या दिवशी ध्वजारोहण आणि सार्वजनिक शासकीय सुट्टी मिळाली. येत्या 17 सप्टेंबरला त्या घटनेला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. 17 सप्टेंबर 1998 रोजी मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्त झाला खरा. मात्र, त्यासाठी मराठवाड्याच्या स्वातंत्र्याचा ध्वजारोहण आणि शासकीय सुट्टीला 1998 पासून सुरुवात झाली आहे. आणि आर. डी. देशमुख यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्यांचा विजय झाला. म्हणून मराठवाड्याला हा क्षण मिळवून देणारे, त्याचा शासन दरबारी आणि न्यायालयीन पातळीवर पाठपुरावा करणारे खंदे समर्थक आर. डी. देशमुख आहेत, असे म्हणता येईल!

प्रभाकर बारहाते,                 

माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, परभणी

 

संदर्भ :-

1)      तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवानी यांचा तत्कालीन केंद्रीय उद्योगमंत्री मनोहर जोशी यांच्याशी केलेला 22 जुलै 2001 रोजीचा पत्रव्यवहार

2)     केंद्रीय उपसचिव एम. पी. सजनानी यांनी राज्याचे मुख्य सचिव ए.एल. बोंगीरवार यांच्याशी 16 सप्टेंबर 1999 केलेला पत्रव्यवहार

3)     विभागीय आयुक्त प्र. ग. कुर्से यांनी आर. डी. देशमुख यांना पहिल्या मुख्य शासकीय ध्वजारोहणासाठी दि. 11 सप्टेंबर 1998 रोजी दिलेले निमंत्रण

4)   सा.प्र.वि.चे उपसचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी रे. शा. बेंजामिन यांनी 1 दि.19 ऑगस्ट 1998 रोजी काढलेले परिपत्रक

5)    बुधवार 6 मे 1998 रोजी राज्यपालांच्या आदेशानुसार व नावाने शासनाचे उपसचिव शं. वि. नलावडे यांनी काढलेले राजपत्र

6)     मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आर. डी. देशमुखांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेतील कागदपत्रे सादर करण्याबाबत केंद्रीय गृह विभागाचे सहसचिव यशवंत राज यांच्याकडे 18 जुलै 2000 रोजी दिलेल्या वेळेबाबतचे उपसचिव जी. बी. सिंग यांनी आर. डी. देशमुख यांना दिलेले पत्र

7)    केंद्र शासनाचे कक्ष अधिकारी ए. के. शर्मा यांचा आर. डी. देशमुख यांच्याशी 12 जुलै 2000 रोजीचा पत्रव्यवहार

8)    मनोहर जोशी यांचे केंद्रीय गृह मंत्री लालकृष्ण अडवानी यांना 14 जानेवारी 2000 रोजी केलेला पत्रव्यवहार

महाष्ट्रातील ७ कलावंताना उपराष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, 16 : संगीत, नाटक, शास्त्रीय गायन आणि नृत्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या 84 कलाकारांना विशेष एक-वेळ पुरस्काराने उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांच्या हस्ते गौरविण्यात आले असून यात महाराष्ट्रातील सात कलावंताचा समावेश आहे.

ज्या कलाकारांना त्यांच्या कारकिर्दीत आतापर्यंत कोणताही राष्ट्रीय सन्मान मिळाला नाही, अशा कलाकारांना हा विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आझादी का अमृत महोत्सवांतर्गत  75 वर्षांवरील 84 कलाकारांना संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने गौरविण्यात आले. या दिग्गज कलाकारांमध्ये 70 पुरुष आणि 14 महिला उत्कृष्ट कलाकारांचा समावेश आहे. त्यामध्ये सर्वात वयस्क मणिपूरचे 101 वर्षांचे युम्नाम जत्रा सिंग आहेत. या यादीत गौरी कुप्पुस्वामी आणि महाभाष्याम चित्तरंजन या दोन महिला कलाकारांना हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला.

लोककलेसाठी डॉ. प्रभाकर भानुदास मांडे, सतारसाठी पं. शंकर कृष्णाजी अभ्यंकर, कथ्थकसाठी चरण गिरधर चाँद व डॉ. पद्मजा शर्मा, संगीतासाठी उस्ताद उस्मान अब्दुल करीम खान, तारपा लोकसंगीतासाठी भिकल्या लडक्या धिंडा आणि तमाशा लोकनाट्यासाठी डॉ. हरिश्चंद्र प्रभाकर बोरकर या  मान्यवरांचा कला क्षेत्रातील योगदानासाठी आज  संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने  गौरविण्यात आले.

येथील विज्ञान भवनात आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी उपराष्ट्रापती, केंद्रीय सांस्कृतिक राज्य मंत्री अर्जुन राम मेघवाल, केंद्रीय सांस्कृतिक राज्य मंत्री श्रीमती मिनाक्षी लेखी, संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा उपस्थित होत्या.  ताम्रपत्र, शाल आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

-पुरस्कार विजेत्यांबाबतची माहिती-

डॉ. प्रभाकर भानुदास मांडे

श्री प्रभाकर भानुदास मांडे यांना त्यांच्या मराठी लोककलातील विद्वत्तेबद्दल संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. प्रभाकर भानुदास मांडे हे लोककथा, लोकसंस्कृती आणि साहित्याचे ज्येष्ठ संशोधन अभ्यासक आहेत. त्यांनी 17 वर्ष मराठवाडा विद्यापीठात रीडर म्हणून काम केल्यानंतर 1993 मध्ये वरिष्ठ प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले. गांवगड्या बाहेर, रामकथेची मौखिक परंपरा, लोक रंगभूमी, मागणी त्याचे मांगते, सहित अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांच्या विविध प्रकाशनातून त्यांनी प्रचलित ज्ञान आणि कलेचे लपलेले पैलू शहरी लोकांसमोर आणले आहेत आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या  पदव्युत्तर स्तरावरील या अभ्यासक्रमात समावेश केला आहे.

डॉ. पद्मजा शर्मा

कथ्थक नृत्यातील योगदानाबद्दल डॉ. पद्मा शर्मा  यांना संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीमती पद्मा शर्मा यांनी 1959 मध्ये भातखंडे महाविद्यालयातून कथ्थकमधील नृत्य निपुराण ही पदवी  मिळवली होती. त्यांनी मुंबईतील ललित कला एज्युकेशन ट्रस्टमध्ये नृत्य शिक्षक आणि कोरिओग्राफर म्हणूनही काम केले आहे. त्या वल्लभ संगीत विद्यालय, मुंबईच्या नृत्य विभागाच्या प्रमुख म्हणूनही काम केले आहे.

शंकर कृष्णाजी अभ्यंकर

श्री शंकर कृष्णाजी अभ्यंकर यांना हिंदुस्थानी वाद्य संगीत सितारमधील योगदानाबद्दल संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री शंकर कृष्णाजी अभ्यंकर यांचा जन्म 1934 साली महाराष्ट्रातील सातारा येथे झाला, त्यांनी गांधर्व महाविद्यालय मंडळ सतार वादनात अलंकार ही पदवी मिळवली. त्यांचा संबंध ग्वाल्हेर घराण्याशी असून त्यांनी कुमार गंधर्व यांच्याकडून बंदिश आणि रचनेचे प्रशिक्षण घेतले आणि पंडित रविशंकर यांच्याकडून सतार वादनाचे प्रशिक्षण घेतले.

भिकल्या लडक्या धिंडा

महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातून भिकल्या लडक्या धिंडा, हे उत्कृष्ट तारपावादक म्हणून  त्यांची ओळख आहे. आपल्या वडिलांकडून मिळालेली ही कला त्यांनी तारपाची निर्मिती आणि वादन या दोन्ही कार्यांतून जोपासली. अनेक युवकांना ते वादनाचे धडे देतात. जवळपास दहा फूट लांबीचा तारपा हे धांडा यांचे वैशिष्ट्य. भिकल्या धिंडा यांनी आजपर्यंत अनेक ठिकाणी तारपावादनाने रसिकांना मोहवले आहे. ते स्वतः तारपा वाद्याची निर्मिती करून चरितार्थ करतात. आदिवासी संस्कृतीचे जतन आणि संवर्धनासाठी अवघे आयुष्य वेचणारे धिंडा यांच्यावर अमृत पुरस्काराने गौरव झाला.

हरिश्चंद्र प्रभाकर बोरकर

महाराष्ट्राच्या लोकरंगभूमीतील (खादी गंमत) योगदानाबद्दल श्री हरिश्चंद्र प्रभाकर बोरकर यांना संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात 11 ऑक्टोबर 1946 रोजी जन्मलेल्या श्री. हरिश्चंद्र प्रभाकर बोरकर यांनी विदर्भातील खडी गंमत, डडार आणि दहाका या जुन्या पारंपरिक लोकनाट्यांचे पुनरुज्जीवन करून, नव्या पिढीपर्यंत नेण्यात ते यशस्वी ठरले आहेत. श्री बोरकर यांना सांस्कृतिक मंत्रालयाची वरिष्ठ फेलोशिपही मिळाली आहे.

चरण गिरधर चाँद

श्री चरण गिरधर चाँद यांनी त्यांचे वडील नारायण प्रसाद यांच्याकडून कथ्थक नृत्याचे प्रारंभिक प्रशिक्षण घेतले. तसेच गायन आणि हार्मोनियम, तबला, पखावाज, नाळ आणि इतर वाद्ये शिकली. कथ्थक नृत्याच्या प्रचारासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर कार्यशाळा आणि व्याख्याने-प्रात्यक्षिके मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात आली आहेत. कथ्थक नृत्यातील योगदानाबद्दल श्री चरण गिरधर चाँद यांना संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

उस्मान अब्दुल करीम खान

श्री उस्मान अब्दुल करीम खान यांना हिंदुस्थानी वाद्य संगीत – सतारमधील योगदानाबद्दल संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुण्यातील श्री उस्मान अब्दुल करीम खान हे संगीतकारांच्या घराण्यातील आहेत. ते सहाव्या पिढीतील संगीतकार आणि तिसऱ्या पिढीतील शास्त्रीय सितार वादक आहेत. वयाच्या अवघ्या 6 व्या वर्षी सतार वादन शिकायला सुरुवात केली. 1985 मध्ये पॅरिसमध्ये 24 तासांचे राग सत्र आयोजित केले होते, ज्यामध्ये सितार वादक म्हणूनही त्यांनी भाग घेतला होता. 1988 मध्ये, त्याच शहरात 9 तासांच्या संपूर्ण रात्र त्यांनी मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. ललित कला मंदिर, मलेशियाच्या हिंदुस्थानी संगीताचे आंतरराष्ट्रीय डीन म्हणून त्यांचे नामांकन करण्यात आले असून, त्यांना ‘सतार नाद योगी’ ही पदवी देखील बहाल करण्यात आली आहे.

0000

अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र 172, दि.16.09.2023

छत्रपती संभाजीनगर येथे अल्पसंख्याक आयुक्तालय होणार – मंत्री अब्दुल सत्तार

मुंबई, ‍‍दि. 16 : छत्रपती संभाजीनगर येथे अल्पसंख्याक आयुक्तालय व जिल्हा स्तरावर स्वतंत्र कार्यालय केले जाणार असल्याचा निर्णय आज छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, राज्यातील मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी अल्पसंख्याक विकास विभागामार्फत डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येते. या योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात आली असून पारंपारिक शिक्षणाबरोबर बोर्डाच्या शालेय अभ्यासक्रमाचे शिक्षण देणारे मदरसांचे अनुदान दोन लाखावरुन 10 लाख करण्यात येणार आहे.

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी परदेशात पदव्युत्तर पदवी व पीएचडी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

गरजू रुग्णांच्या उपचारासाठी शासनाचे भरीव योगदान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती संभाजीनगर, दि. 16 (जिमाका): सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी शासन कटीबध्द असून समाजातील गरजू रुग्णांच्या उपचारासाठी शासनाचे भरीव योगदान आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून मागील एक वर्षात शासनाने सुमारे 112 कोटी रुपये गरजू रुग्णांच्या उपचारासाठी दिले असल्याचे, मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.
शहरातील गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदिपान भुमरे, आमदार हरीभाऊ बागडे, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवनिमित्त आज घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाडयाच्या विकासासाठी 46 हजार कोटीहून अधिक विकास कामांना मान्यता देण्यात आली. मराठवाडयाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. पश्चिमी भागातील नद्यांचे वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागात वळवण्याचा मोठा निर्णयही घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून अनेक रुग्णांना चांगल्या प्रकारचे उपचार मिळाले आहेत. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य विमा योजनेमध्ये रुपये पाच लाखांपर्यंत विमा संरक्षण देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जनतेने चिंता करु नये. सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी काम करणारे हे शासन आहे.
दरम्यान, जालना जिल्हयातील अंतरवाल सराटी येथे लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या काही रुग्णांवर गॅलक्सी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यावेळी मुख्यमंत्री यांनी जखमी रुग्णांची भेट घेऊन त्यांची सहानुभूतीपूर्वक चौकशी केली.

बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ‘इंडस्ट्री मिट’चे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूरात आयोजन

        नागपूर दि.16 : बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासोबतच उद्योगांना आवश्यक असलेला कुशल, अकुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी शासन आणि उद्योगसमूह, प्लेसमेंट एजन्सीज यांच्यात सामंजस्य करार उद्या रविवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता ‘इंडस्ट्री मिट’ च्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. यावेळी कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत.

             इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त  विद्यापीठाच्या परिसरातील गुरुनानक भवन येथे ‘इंडस्ट्री मिट’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘कौशल्य केंद्र आपल्या दारी’ या संकल्पनेतून नागपूर विभागातील विविध नामांकित उद्योग, उद्योजक संघटना व प्लेसमेंट एजन्सीज यांचेसोबत सामंजस्य करार करण्यात येणार आहे. या उपक्रमास कौशल्य रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अप्पर मुख्य सचिव, कौशल्य विकास आयुक्त, विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत दुपारी 2 वाजता या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगर येथे यापूर्वी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

            विभागातील नामांकित उद्योग विविध उद्योग संघटना व प्लेसमेंट एजन्सीज यांच्यामध्ये करार करण्याचे काम सुरु असून आजपर्यंत 700 पेक्षा जास्त उद्योजकांसोबत सामंजस्य करार करण्यात आले आहे.  राज्यातील विविध विभागांमध्ये ‘इंडस्ट्री मिट’चे आयोजन करण्यात येत आहे.

            जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटना, उद्योजक, मोठे हॉटेल्स, मॉल्स, प्लेसमेंट एजन्सीज, सेक्युरिटी एजन्सीज यांना आवश्यक ते कुशल मनुष्यबळ विनामूल्य उपलब्ध करणे, उद्योगाची मोफत जाहिरात करणे,  उद्योगांना रोजगार प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळवून देणे, उमेदवारांना रोजगार मिळण्यासाठी शासन आणि उद्योग समूह यांच्यात सामंजस्य व समन्वय साधने यासाठी  www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून माहिती उपलब्ध करुन देण्याचा या उपक्रमामागचा उद्देश आहे.   या उपक्रमात सहभागी होण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक 0712-2565479, 2531213 या क्रमांकावरही संपर्क साधता येईल.

आयटीआयचा पदवीदान समारंभ

दुपारी एक वाजता कवीवर्य सुरेश भट सभागृहात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा राज्यस्तरीय पदवीदान समारंभ  होणार आहे.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यावेळी उपस्थित राहणार आहेत.

            राज्य तसेच विदर्भ स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तसेच स्वच्छता पंधरवड्याचा शुभारंभही यावेळी करण्यात येणार आहे.

00000

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही, कोणताही अन्याय होणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

           नागपूर, 16 सप्टेंबर : ओबीसी समाजाला असलेल्या आरक्षणात कोणतेही नवीन वाटेकरी येणार नाहीत आणि ते कमी देखील होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात दिली.

            राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि सर्वशाखीय ओबीसी कुणबी ओबीसी महासंघाच्या वतीने नागपुरात सुरु असलेल्या साखळी उपोषणस्थळी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन त्यांच्या मागण्या समजून घेत त्यांना संबोधित केले. आ. प्रवीण दटके, आ. समीर मेघे, बबनराव तायवाडे, सुधाकरराव कोहळे, परिणय फुके, आशीष देशमुख व इतर नेते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

            यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज संभाजीनगर येथील उपोषणकर्त्यांची सुद्धा भेट घेतली. ओबीसींच्या आरक्षणात नवीन वाटेकरी येणार नाहीत किंवा ते कमी होऊ देणार नाही. ओबीसींवर अन्याय होणार नाही, ही राज्य सरकाची ठाम भूमिका आहे. मराठा समाजाची जी अपेक्षा आहे, ती मी मुख्यमंत्री असताना जे आरक्षण दिले होते, ते परत मिळावे, ही आहे. यासाठी क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यात आली असून, न्या. भोसले समितीने सूचविलेल्या उपाययोजना सुद्धा हाती घेण्यात आल्या आहेत.

            आता न्या. शिंदे समिती गठीत करण्यात आली. ज्यांचे मत आहे की ते आधी कुणबी होते आणि त्यांना नंतर मराठा ठरविण्यात आले, त्याची तपासणी करण्यासाठी ही समिती आहे. एक महिन्यात त्यांचा अहवाल येईल. दोन समाज एकमेकांसमोर उभे ठाकावे, अशी परिस्थिती नाही किंवा तशी सरकारची भावना नाही. प्रत्येक समाजाचे प्रश्न स्वतंत्रपणेच सोडविले पाहिजे, या मताचे आम्ही आहोत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

ओबीसी समाजासाठी 26 विविध जीआर आम्ही काढले होते. त्यातील अनेक निर्णय अंमलात आले आणि काहींवर अंमलबजावणी होते आहे. प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृहाबाबत परवाच बैठक झाली. काही ठिकाणी जागा किरायाने घेण्याची सुद्धा तयारी केली आहे. शिष्यवृत्तीचे प्रश्न सोडविण्यात आले आहेत. आता तर ओबीसींसाठी 10 लाख घरांची मोदी आवास योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. तुमच्या ज्या अन्य मागण्या आहेत, त्याबाबत येत्या आठवडाभरात मुंबईत राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि अन्य संघटनांची एकत्रित बैठक घेतली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ करणार आहे, ती ओबीसींच्या हिताची योजना आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

कंत्राटी भरती ही तात्पुरतीच!

            कंत्राटी भरतीसंदर्भात जाणिवपूर्वक अफवा पसरविल्या जात आहेत. एक बाब स्पष्टपणे सांगतो की, नियमित आस्थापनेवरील कोणत्याही जागा कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणार नाहीत. 75 हजार पदभरतीचा निर्णय आम्ही घेतला आणि कार्यवाही सुरु केली. आता ती भरती दीड लाखांच्या घरात जात आहे. ती कायमस्वरुपी भरती प्रक्रिया पूर्ण होईस्तोवर कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात पदभरती करावी लागते, कारण काम थांबू शकत नाही. कायमस्वरुपी भरतीला वर्ष-दीड वर्ष लागतात. राज्यात ही पद्धत फार पूर्वीपासून आहे. कंत्राटी भरतीचा हा निर्णय सुद्धा गेल्या सरकारनेच घेतलेला आहे, त्यात आम्ही केवळ कामगारांना थेट त्यांच्या खात्यात पैसे मिळतील, अशी सुधारणा केली. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका. ही केवळ तात्पुरती व्यवस्था आहे. युवकांवर कोणताही अन्याय होणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

0000

छत्रपती संभाजीनगर व धाराशिव नामकरणाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

छत्रपती संभाजीनगर, दि. 16 : छत्रपती संभाजीनगर व धाराशिव नामकरण फलकांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विविध मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे पार पडले.

औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामकरण धारशिव करण्याचा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि श्री. पवार यांच्या नेतृत्वाखालील शासनाने आज घेतला आहे. त्यामुळे जनतेच्या मनातील इच्छा पूर्ण झाल्याचे सुतोवाच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.

“औरंगाबाद” विभाग, जिल्हा, उप-विभाग, तालुका व गाव याचे नामकरण “छत्रपती संभाजीनगर” विभाग, जिल्हा, उप-विभाग, तालुका व गाव असे करण्याबाबतची अंतिम अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच “उस्मानाबाद” जिल्हा, उप-विभाग, तालुका व गाव याचे नामकरण “धाराशिव” जिल्हा, उप-विभाग, तालुका व गाव असे करण्याबाबतची अंतिम अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

०००

वर्षा आंधळे/विसंअ/

मुंबई, पुणे, पालघर, रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे आयोजन – पर्यटन मंत्री गिरीष महाजन

मुंबई, दि. 16 : पर्यटनाला चालना देण्यासाठी, पारंपारिक कला व संस्कृतीची ओळख देशी-विदेशी पर्यटकांना करुन देण्यासाठी तसेच गणेशोत्सवला आंतरराष्ट्रीयस्तरावर पर्यटनात्मक प्रसिद्धी आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. 19 ते 28 सप्टेंबर या कालावधीत मुंबई, पुणे, पालघर व रत्नागिरी येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, राज्यात पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करण्यासाठी पर्यटन संचालनालयाद्वारे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  गणेशोत्सव हा कला, सांस्कृतिक वारसा तसेच लोकांचे एकात्मतेचे दर्शन घडविण्याचे माध्यम आहे. पारंपारिक कला व सांस्कृतिक ठेवा  जगापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. महोत्सवा दरम्यान विविध राज्यातील पर्यटनाशी निगडीत भागधारक, ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर्स, प्रवासी पत्रकार व समाजमाध्यम प्रभावक तसेच विदेशी वाणिज्य दुतावासाचे प्रतिनिधी यांना आमंत्रित करण्यात येणार आहे.  त्यांना मुंबई, पुणे, पालघर व रत्नागिरी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच रत्नागिरीतील गणेश दर्शन तसेच सांस्कृतिक वैभव दाखविण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सदर महोत्सवांतर्गत गेटवे ऑफ इंडिया येथे श्री गणेशाच्या विविध स्वरुपांवर केंद्रीत विशेष सांस्कृतिक केंद्रांची उभारणी, वाळूशिल्प, मॉझेक आर्ट, स्क्रॉल आर्टचे प्रदर्शन, गेटवे ऑफ इंडियाच्या भव्य दर्शनी भागावर प्रोजेक्शन मॅपींगच्या माध्यमातून देशभक्तीपर यशोगाथा कथन करणारे कार्यक्रम, महाराष्ट्राचे पारंपारिक आदिवासी वारली संस्कृतीचे दर्शन घडविणारे वारली कलेचे कार्यशाळा, विविध कारागिरांद्वारे निर्मित हस्तकला वस्तुचे कलादालन, पारंपारिक कला व लोककला संस्कृतीचे दर्शन घडविणारे सांस्कृतिक कार्यक्रम 10 दिवसीय गणेशोत्सव महोत्सवांतर्गत विविध ठिकाणी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आयोजित करण्यात येणार आहेत.

आंतरराष्ट्रीय गणेशोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक पर्यटनात वाढ : प्रधान सचिव राधिका रस्तोगी

गणेशोत्सव या सणाला ऐतिहासिक वारसा आहे. राज्यात साजरा होणारा गणेशोत्सव हा अनेक देशी आणि विदेशी पर्यटकांना आकर्षित करत असतो. आपण आपली संस्कृती या महोत्सवाच्या माध्यमातून इतरांना सांगू शकतो. आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पर्यटक आणि सांस्कृतिक जाणकारांची उपस्थिती लाभणार आहे. महाराष्ट्राच्या विशाल आणि दहा दिवस चालणाऱ्या  या गणेश महोत्सवामध्ये गणेश भक्त, पर्यटन प्रेमी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीमती रस्तोगी यांनी केले केले.

००००

संध्या गरवारे/विसंअ/

१७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर या कालावधीत सेवा महिना राबविण्यात येणार

मुंबई, दि. १६ : राज्यात १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत सेवा महिना राबविण्याबाद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सूचना केल्यानुसार शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

राज्य शासनाच्या विविध क्षेत्रीय कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत नागरिकांना मोठ्या प्रमाणावर माहिती प्राप्त करून देणे, त्यांना विविध योजनांचा योग्य लाभ घेता येण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता वाढावी. यासाठी सेवा महिना अंतर्गत  विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार आहे.

या सेवा महिना कालावधीत आपले सरकार सेवा पोर्टल, महावितरण पोर्टल, डी. बी. टी. पोर्टल, नागरी सेवा केंद्र,सार्वजनिक तक्रार पोर्टल (पब्लिक ग्रिव्हियन्स पोर्टल), विभागाच्या संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या व प्रलंबित असलेल्या सर्व अर्जांचा मोहिम स्वरुपात निपटारा करण्यात येणार आहे.

यामध्ये तांत्रिक अडचणीमुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत प्रलंबित पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे, प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा करणे. पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वितरण, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे, नव्याने नळ जोडणी देणे, मालमत्ता कराची आकारणी करणे व मागणी पत्र देणे, प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजुरी देणे, मालमत्ता हस्तांतरणानंतर विद्युत जोडणीमध्ये नवीन मालमत्ताधारकाचे नाव नोंदविणे, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अंतर्गत सिंचन विहिरीकरिता अनूसुचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी, दिव्यांग प्रमाणपत्र देणे, अनूसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रलंबित वन हक्क पट्टे मंजूर करणे. (अपिल वगळून), नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देणे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे, आधार कार्ड सुविधा, पॅन कार्ड सुविधा, नवीन मतदार नोंदणी, जन्म-मृत्यू नोंद घेणे व प्रमाणपत्र देणे, शिकाऊ चालक परवाना, रोजगार मेळावा, सखी किट वाटप, महिला बचत गटास परवानगी देणे, महिला बचत गटास प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देणे, लसीकरण, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, प्रशिक्षित उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे आदी सेवांचा आता यामध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे.

सेवा महिन्यामध्ये सर्व शासकीय विभांगाकडील सेवा हक्क अधिनियमाअंतर्गत अधिसूचित केलेल्या सेवा विषयी प्रलंबित कामांचा विहित कालमर्यादेमध्ये निपटारा करण्याकरिता कार्यपद्धती निश्चित करण्याच्या व अंमलबजावणीकरिता सर्व संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे.

000

राजू धोत्रे/विसंअ/

ताज्या बातम्या

पूर्व विदर्भातील पूरस्थिती नियंत्रणात; एसडीआरएफ, एनडीआरएफ  यंत्रणा सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ९: मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पूर्व विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य...

नाशिक ‘मनपा’तील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील गैरप्रकार प्रकरणी चौकशी होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. 8 : नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर वेतनाबाबत अनेक गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात येईल. संबंधित...

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर

0
मुंबई, दि. 8 : राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण...

महाराष्ट्रातील सहा औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
विदेशी पतसंस्था करणार १२० कोटींची गुंतवणूक मुंबई, दि. ८ : बंदरे आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभाग, बंदरे विभाग आणि अटल...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेतील शब्दांचा युनेस्कोमधील राजदूतांकडून सन्मान

0
मुंबई, दि. 8 : - छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतील शब्दांचा गौरवपूर्ण उल्लेख हा तमाम शिवप्रेमी आणि महाराष्ट्रासाठी एक आनंददायी आणि अभिमानास्पद क्षण आहे. युनेस्कोमधील...