मंगळवार, मे 6, 2025
Home Blog Page 1150

जोखीमग्रस्त गावांसाठी शीघ्र प्रतिसाद पथके तत्पर ठेवावी – आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत

पुणे, दि. ९: राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे, या पावसाळ्यात साथरोगाच्या दृष्टिकोनातून जोखीमग्रस्त गावे ओळखून यादी करावी. त्याप्रमाणे गट तयार करून शीघ्र प्रतिसाद पथके सज्ज ठेवावीत, अशा सूचना आरोग्य मंत्री प्रा. डॉ .तानाजी सावंत यांनी दिल्या.

पावसाळ्यात उद्भवणारे आजार व पूर परिस्थिती यावर प्रभावीपणे त्वरित कार्य करण्यासाठी आरोग्य विभागाने जिल्हा व गावपातळीपर्यंत केलेल्या आरोग्य सेवा तयारीचा आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी पुणे येथे राज्यस्तरीय आढावा घेतला. यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांची उपस्थिती होती.

कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे व उद्रेक झाल्यास त्वरित उपाययोजना करण्यात यावी, तयारीसाठी जिल्हास्तरावरील अहवाल दररोज तयार करण्यात यावा व त्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात यावे. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत तपासून पाहावेत ज्यामुळे पिण्यायोग्य पाणी आहे किंवा नाही याची खात्री केली जावी, जिल्ह्यातील नोडल अधिकारी त्यांचे दूरध्वनी क्रमांकांची यादी तयार करून ती प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अद्ययावत ठेवावी व राज्यस्तरावरही पाठवावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

साथरोग नियंत्रणासाठीच्या किट वाटप करण्यात याव्यात व त्याचा अद्ययावत अहवाल तयार ठेवावा, आशासेविका व आरोग्य कर्मचारी यांच्या याद्याही जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे ठेवण्यात याव्यात. तसेच डास उत्पत्ती ठिकाणे यावरही लक्ष द्यावे व पाणी साठे चांगले राहतील यावरही लोकसहभागाद्वारे नियंत्रण ठेवावे. शीघ्रप्रतिसाद पथकाद्वारे करावयाचे कामे तसेच सूचनासाठी एक माहिती पुस्तक तयार करण्यात यावे व  मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात, औषध साठा अद्ययावत करून उपलब्ध ठेवण्यात यावा, साथरोगाबाबत जनजागृतीसाठी ग्रामपंचायत, नगरपंचायत येथे फलकही लावण्यात यावेत, असे निर्देशही यावेळी मंत्री डॉ. सावंत यांनी दिले.

अतिरिक्त मुख्य सचिव श्री. म्हैसकर यांनी साथ रोगाबाबतची माहिती लोकांपर्यंत जाण्यासाठी व्यापक जनजागृती करावी, असे सूचित केले. कठीण परिस्थितीत आरोग्य विभाग चांगली जबाबदारी पार पाडत असून पावसाळ्यातील आरोग्य परिस्थितीही व्यवस्थितपणे हाताळण्यास सर्वांनी सक्रिय रहावे, असेही यावेळी सुचविण्यात आले. आरोग्य विभागातील विभागीय आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी सर्व दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

आरोग्य विभागामार्फत पावसाळ्यातील डेंगू, मलेरिया, जापानी मेंदूज्वर, लेप्टोस्पायरोसिस अशा आजारांना नियंत्रित ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहे.

आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजना

  • जोखीमग्रस्त गावांची यादी तयार करण्यात आली आहे.
  • गृहभेटी व आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत सर्वेक्षण व रुग्णशोध मोहीम.
  • आश्रमशाळा यांना वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या मार्फत नियमित भेटी.
  • पाणी गुणवत्ता नियंत्रण 76 हजार पाणी नमुने तपासण्यात आले आहेत.
  • पाण्याच्या स्रोतांचा सर्व्हे व प्रत्येक गावांना हिरवे, पिवळे, लाल कार्ड देण्यात आले आहेत.
  • एकात्मिक कीटक व व्यवस्थापन यात परिसर स्वच्छता, डासांचे पासून वैयक्तिक संरक्षणसाठी मच्छरदाणी, डास प्रतिबंधक क्रीम, खिडक्यांना जाळ्या बसविण्याबाबत समुपदेशन करण्यात आले.
  • प्रयोगशाळा सिद्धता
  • पुरेसा औषध साठा
  • शीघ्र प्रतिसाद पथके यांची स्थापना .
  • गावपातळीवर साथरोग सर्वेक्षण तसेच अंतर विभागीय समन्वय व आरोग्य शिक्षण यावरही भर देण्यात येत आहे .

०००

मानवी संवेदनेतून कवितेचा उगम – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर,दि.९ : कायम माणसांच्या गर्दीत हरवणारे डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी मानवी संवेदनेतून विविध प्रकारच्या काव्यरचना करुन समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

वसंतराव देशपांडे सभागृह येथे डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्या ‘दिक्कालाच्या मांडवात’ आणि ‘काठावर दूर नदीच्या’ या काव्यसंग्रहांच्या प्रकाशन सोहळा तसेच डॉ. मनिषा कोठेकर यांच्या उंबरठ्यापल्ल्याड या लेखसंग्रहाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

मंचावर वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रकाशक चंद्रकांत लाखे, भारतीय स्त्री शक्तीच्या संस्थापक अध्यक्षा उर्मिला आपटे, कवि श्याम धोंड, डॉ. उपेंद्र कोठेकर, डॉ. मनिषा कोठेकर, मोरेश्वर निस्ताने उपस्थित होते. यावेळी डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्या सांजरंग व राष्ट्ररंग या काव्यरचनांच्या ध्वनिफीतीचेही विमोचन करण्यात आले.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, डॉ.उपेंद्र कोठेकर हे उत्तम संघटक असून त्यांच्यातील राष्ट्रभावना, राष्ट्रप्रेम व समाजाप्रती असलेले समर्पण अतुलनिय आहे. या समर्पण भावनेतून त्यांनी काव्यनिर्मिती केली आहे. प्रेम, मानवी भावभावनासह सखल रंगात्मक कविता डॉ. कोठेकर यांनी रचली आहे. माणसाच्या गर्दीत हरवलेल्या, संघटनकलेत निपुण असणाऱ्या, सिद्धहस्त कवीची मानवी संवेदना व्यक्त करण्याची कला कवितेत प्रतीत होत असल्याचे, ते यावेळी म्हणाले.

मनिषा कोठेकर यांचाही सामाजिक कार्यातील वाटा फार मोलाचा असून एका विचाराने प्रेरित होऊन त्यांनी स्त्रीशक्तीसाठी सतत लेखन केल्याचे उपमुख्यमंत्री श्री.  फडणवीस यांनी सांगितले.

श्री. मुनगंटीवार म्हणाले की, माणसाच्या गर्दीतील कवितेची निर्मिती डॉ. कोठेकर यांनी केली. विद्यार्थी असतांना त्यांनी उत्तम संघटन तयार करुन आपल्या कार्याला योग्य दिशा देण्याचे कार्य केले. यावेळी श्याम धोंड, उर्मिला आपटे यांनी आपले विचार व्यक्त केले. केंद्रीय भुपृष्ठ व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दृकश्राव्य संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सुरुवात आषाढरंग या सांगितीक कार्यक्रमाने झाली. श्वेता शेलगावकर व रेणुका देशकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी, रसिक, श्रोते उपस्थित होते.

०००

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ सायबर गुन्हे मुक्त करण्यासाठी २५ लाखांचा निधी देणार – पालकमंत्री दीपक केसरकर  

 मुंबई, दि. ९ : ज्येष्ठ नागरिक सायबर गुन्ह्यांचे बळी ठरलेले दिसून येतात. मुंबईतील हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून प्रायोगिक तत्वावर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ सायबर गुन्हे मुक्त करण्यासाठी २५ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली. याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरात विरंगुळा केंद्र उभारण्यात येणार असून तेथे ने-आण करण्यासाठी बेस्ट मार्फत १० बस उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बृहन्मुंबई पोलीस उपायुक्त परिमंडळ – ५ च्या वतीने शनिवारी सायंकाळी येथे आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमात मंत्री श्री. केसरकर यांनी दादर परिसरातील महिला व ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ज्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करणे शक्य आहे, त्या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

खासदार राहुल शेवाळे, आमदार सर्वश्री कालिदास कोळंबकर, सदा सरवणकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त रमाकांत बिरादार, पोलीस उपायुक्त मनोज पाटील, जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व संबंधित शासकीय विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस विभाग आदींचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, नागरिकांना त्यांच्या समस्यांवर तातडीने न्याय मिळावा, ही शासनाची भूमिका आहे. यासाठी मुंबईसह राज्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असून त्या अनुषंगाने शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याबरोबरच दर्जेदार सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचाही शासनाचा प्रयत्न आहे. मुंबईत स्वच्छता राहावी, नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, मुंबई सुंदर दिसावी यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. आपला दवाखाना योजनेच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी केली जात असून अधिकच्या तपासण्यासाठी फिरती तपासणी वाहने उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ नागरिकांना धान्य घेण्यासाठी लांब जाण्याची आवश्यकता भासू नये यासाठी १४ वाहने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगून मंत्री श्री. केसरकर म्हणाले, मुंबईतील नागरिकांच्या समस्या जाणून त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात येत आहेत. उद्याने, बाजारपेठांमध्ये उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मुंबादेवी, महालक्ष्मी, हाजीअली, सिद्धीविनायक आदी धार्मिक स्थळांच्या परिसराचा कायापालट करण्यात येणार आहे. कोळीवाड्यांचा विकास करण्यात येत असून उत्तम फिश मार्केटसह तेथे फूड कोर्ट सुरू करण्यात येणार आहेत. कामगारांसाठी असलेल्या कल्याण केंद्रामध्ये अत्याधुनिक सुविधा निर्माण केल्या जात आहेत. ड्रग्ज मुक्त मुंबईसाठी उपाय केले जात आहेत. रूग्णांच्या सोयीसाठी जे. जे. रूग्णालयात सुसज्ज वॉर्ड तयार करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली.

श्री. केसरकर म्हणाले, मंत्री हा नागरिकांचा प्रतिनिधी असतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी रहिवाशांच्या समस्या जागेवरच सोडविण्यासाठी प्रत्येक विभागात जाऊन जनतेशी सुसंवाद साधण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नागरिकांमध्ये जाऊन आणि त्यांच्या समस्या जाणून त्या तातडीने सोडविण्यात येत आहेत.

खासदार राहुल शेवाळे म्हणाले, राज्य शासनाने हाती घेतलेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यात सुमारे ४५ लाख नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळाला आहे. मुंबईत पालकमंत्री दीपक केसरकर हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याद्वारे नागरिकांच्या समस्या सोडविल्या जाऊन त्यांना दिलासा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. आपला लोकसभा मतदारसंघ हा सायबर गुन्हे मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार सदा सरवणकर यांनी यावेळी परिमंडळ ५ या पोलीस विभागाने चोरीचा मुद्देमाल कौशल्याने शोधून काढल्याबद्दल त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. तर आमदार कालिदास कोळंबकर यांनी पोलिसांचा घरांचा विषय अतिशय महत्त्वाचा असल्याचे सांगून शासनाने तातडीने याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी पालकमंत्री मंत्री श्री. केसरकर यांच्याकडे केली.

यावेळी मंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते पोलीस तपासात परत मिळविलेला ४० लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आला. यामध्ये कुर्ला पोलीस स्टेशन हद्दीतील मनोज जैन यांचे २८ लाखांचे दागिने, धारावी हद्दीतील तीन लाख रुपयांची कार यांसह दादर, माहीम आदी पोलीस स्टेशन हद्दीतील गहाळ झालेले अथवा चोरीला गेलेले विविध दागिने, मोबाईल, घड्याळ, वाहने आदी मुद्देमालाचा समावेश होता. सुमारे दोन कोटींहून अधिकचा मुद्देमाल आतापर्यंत परत करण्यात आल्याची माहिती यावेळी पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी प्रास्ताविकात दिली. पोलीस विभागाच्या या कामगिरीची मंत्री श्री. केसरकर यांनी प्रशंसा केली.

या सुसंवाद कार्यक्रमात परिसरातील नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. यात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, स्वच्छता, वाहतुकीच्या समस्या, कचरा निर्मूलन, फेरीवाले, पार्किंग आदींचा समावेश होता. या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. केसरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

०००

दिवंगत बाळासाहेब सावंत यांच्या स्वप्नातील विकसित कोकण घडविण्यासाठी कटिबद्ध – पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी दि. ८ (जिमाका):  राज्याचे माजी कृषी मंत्री दिवंगत बाळासाहेब सावंत यांच्या स्वप्नातील सर्वांगीण विकसित कोकण घडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

मौजे जाकीमिऱ्या येथे उभारण्यात आलेल्या बाळासाहेब सावंत बहुउद्देशीय सभागृह, वाचनालय व दिवंगत बाळासाहेब सावंत यांच्या स्मारकाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.

मंचावर जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, सार्वजनिक बांधकामच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, कार्यकारी अभियंता अमोल ओठणकर, रत्नागिरी न. पा.  मुख्याधिकारी तुषार बाबर, जाकीमिऱ्याच्या सरपंच आकांक्षा कीर, यांच्यासह सावंत कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले की, दिवंगत बाळासाहेब सावंत यांनी कोकणसह राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या विचारांवरच आपण वाटचाल करत राहू.

जाकीमिऱ्या येथे उभारण्यात आलेल्या वाचनालयामध्ये एमपीएससी, यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी पुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील. याकरिता सुमारे दहा लाख रुपयाचा निधी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ उपलब्ध करुन द्यावा, त्याचबरोबर ही बहुउद्देशीय इमारत समुद्रालगत असल्याने नौदल व फिशरीजच्या अनुषंगाने काही कोर्सेस सुरू करता येतील का ? याची चाचपणी प्रशासनाने करावी अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी  केली.

तत्पूर्वी पालकमंत्र्यांनी दिवंगत बाळासाहेब सावंत यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करुन सावंत कुटुंबीयांच्या निवासस्थानाला भेट दिली. तसेच मौजे जाकीमिऱ्या येथील विविध विकास कामांसाठी मंजूर करण्यात आलेल्या सुमारे २ कोटी २० लाख रुपये रक्कमेच्या विकास कामांचे, मौजे सडामिऱ्या येथील १ कोटी ५० लाख रुपयांच्या विकास कामांचे त्याचबरोबर शिरगाव जिल्हा परिषद गटासाठी सुमारे १७ कोटी रुपयांच्या निधीतून मंजूर करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

याप्रसंगी एमआयडीसीच्या प्रादेशिक व्यवस्थापक वंदना करमाळे, रत्नागिरीचे तहसिलदार राजाराम म्हात्रे, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव यांच्यासह संबधित गावांचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

आरोग्यमंत्र्यांकडून पुणे जिल्ह्याचा पावसाळ्यातील आरोग्यविषयक तयारीचा आढावा

पुणे दि. ८: पावसाळ्यात उद्भवणारे आजार व पूर परिस्थितीत तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाने जिल्हा व गाव पातळीपर्यंत केलेल्या आरोग्यसेवा तयारीचा आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी आढावा घेतला.

दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या बैठकीस आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर आदी उपस्थित होते.

आरोग्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, जोखीमग्रस्त गावे ओळखून तिथे शीघ्र प्रतिसाद पथके सज्ज ठेवावीत. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे व उद्रेक झाल्यास त्वरित उपाययोजना करण्यात यावी. पूर्वतयारीसाठी जिल्हा स्तरावरील अहवाल दररोज तयार करण्यात यावा व त्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात यावे. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत तपासून पाहावेत आणि पाणी पिण्यास योग्य आहे किंवा नाही याची खात्री करावी.

जिल्ह्यातील समनव्यक अधिकाऱ्यांच्या दूरध्वनी क्रमांकाची यादी तयार करून ती प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अद्ययावत ठेवावी व राज्यस्तरावरही पाठवावी. साथरोग नियंत्रणासाठीच्या किट वाटप करण्यात याव्यात व त्याचा अहवाल तयार ठेवावा. आशाताई व आरोग्य कर्मचारी यांच्या याद्यासुद्धा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे ठेवण्यात याव्यात.

डास उत्पत्ती ठिकाणांवरही लक्ष द्यावे व पाणीसाठे चांगले राहतील यावरही लोकसहभागाद्वारे  नियंत्रण ठेवावे. शीघ्रकृती पथकाद्वारे करावयाचे कामे तसेच इतर सूचनांसाठी एक पुस्तिका तयार करण्यात यावी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात. पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवण्यात यावा. ग्रामपंचायत, नगरपंचायत येथे साथ रोगाबाबतची माहिती देण्यासाठी फलक लावण्यात यावेत, अशा सूचना यावेळी  त्यांनी केल्या.

अतिरिक्त मुख्य सचिव श्री. म्हैसकर यांनी साथ रोगाबाबतची माहिती लोकांपर्यंत जाण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या. कठीण परिस्थितीत आरोग्य विभाग चांगली जबाबदारी पार पाडत असून पावसाळ्यातील आरोग्य परिस्थितीही व्यवस्थितपणे हाताळण्यास सर्वांनी सक्रिय रहावे, असेही यावेळी त्यांनी सांगितले.

बैठकीस आरोग्य विभागातील विभागीय आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

आरोग्य विभागामार्फत पावसाळ्यातील डेंगू, मलेरिया, जापानी मेंदूजवर, लेप्टोस्पायरोसिस या आजारांना प्रतिबंधासाठी जोखीमग्रस्त गावांची यादी तयार करण्यात आली आहे. गृहभेटी व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण व रुग्णशोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. आश्रमशाळांना वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांमार्फत नियमित भेटी देण्यात येत आहेत.  पाणी गुणवत्ता नियंत्रण ७६ हजार पाणी नमुने तपासण्यात आले आहेत. पाण्याच्या स्रोतांचे सर्वेक्षण करून प्रत्येक गावांना हिरवे, पिवळे, लाल कार्ड देण्यात आले आहेत.

परिसर स्वच्छता, डासांपासून वैयक्तिक संरक्षणसाठी मच्छरदाणी, डास प्रतिबंधक क्रीम, खिडक्यांना जाळ्या बसविण्याबाबत समुपदेशन करण्यात आले आहे. प्रयोगशाळा सिद्धता, पुरेसा औषध साठा, शीघ्र प्रतिसाद पथके यांची स्थापना आणि गाव पातळीवर साथ रोग सर्वेक्षण तसेच अंतरविभागीय समन्वय व आरोग्य शिक्षण यावरही भर देण्यात येत आहे, अशी माहितीही बैठकीत देण्यात आली.

०००

दामिनी पथक सक्षम करण्यासाठी सहकार्य करणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे दि. ८: पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेले दामिनी पथक सक्षम करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

 

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात आयोजित जिल्हा नियोजन निधीतून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी खरेदी करण्यात आलेल्या ५ स्कॉर्पिओ आणि १२ बोलेरो  वाहनांच्या  लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे,  दिलीप मोहिते, उमा खापरे, पोलिस आयुक्त विनय कुमार चोबे, सह पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, महिलांच्या सुरक्षेसाठी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत दामिनी पथकांची संख्या वाढवावी. त्यासाठी वाहने कमी पडू देणार नाही. सायबर क्राईम लॅबची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील दिशा उपक्रमात सहभागी ७ अशासकीय संस्थांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन त्यांच्या सहभाग वाढवावा. ज्येष्ठ नागरिक कक्षाद्वारे ज्येष्ठांच्या समस्या वेळेत सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत.

नवीन वाहनांच्या समायोजनामुळे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तलयातील बरासचा वाहतुकीचा प्रश्न मिटण्यास मदत होणार असून गस्त घालण्यासाठी वाहनांची मदत होईल.  पोलिसांच्या वसाहती, रिक्त पदे, जलद प्रतिसाद पथक, प्रलंबित प्रस्ताव व इतर मागण्या आणि समस्या याविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन प्रश्न निकाली काढले जातील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

यावेळी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

०००

विश्रामगृहातून उलगडणार चंद्रपूरचा वैभवशाली इतिहास – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि. ८ : नवीन शासकीय विश्रामगृहाच्या माध्यमातून चंद्रपूरचा वैभवशाली इतिहास उलगडणार असल्याची माहिती राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. नवीन विश्रामगृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमात आमदार सुधाकर अडबाले, देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, कार्यकारी अभियंता (विद्युत) पुनम वर्मा, उपविभागीय अभियंता प्रकाश अमरशेट्टीवार, भूषण येरगुडे, शाखा अभियंता श्रीकांत भट्टड, राखी कंचर्लावार, ब्रिजभुषण पाझारे, सुभाष कासनगोट्टूवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. मुनगंटीवार म्हणाले की, ‘चंद्रपुरात सार्वजनिक बांधकाम विभागाचे आकर्षक विश्रामगृह तयार होत आहे. या नवीन विश्रामगृहात चंद्रपूरची ऐतिहासिक पार्श्वभूमी उभारण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये देखील विश्रामगृहाचे आकर्षण असेल. विकासाच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा कायम पुढे राहावा, याच संकल्पनेतून नाविन्यपूर्ण कामे करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.’

नवीन विश्रामगृहाची वैशिष्ट्ये :

विश्रामगृह परिसरात नवीन विश्रामगृहाचे बांधकाम व अस्तित्वात असलेल्या विश्रामगृहाची दुरुस्ती करणे व पहिल्या मजल्याचे बांधकाम करणे, ही कामे होणार आहेत. नव्याने साकारण्यात येणाऱ्या विश्रामगृहाकरिता 16 कोटी 89 लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. सध्याच्या विश्रामगृहाच्या बाजुला दोन मजली अतिविशिष्ट व्यक्तींकरिता बांधकाम करण्यात येत आहे. तळमजल्याचे क्षेत्रफळ 1394 चौ.मी. असून पहिल्या मजल्याचे क्षेत्रफळ 953.40 चौ.मी. आहे. तळमजल्यावर सहा व्हीआयपी सुट, मिटींग हॉल, डायनिंग हॉल व पहिल्या मजल्यावर चार व्हीआयपी सूट आणि मिटींग हॉल आहे. हे बांधकाम 15 महिन्यांमध्ये पूर्ण करण्यात येईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

शाळांमधील सुविधा वाढणार :

जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे अद्यावतीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये संरक्षण भिंत, पिण्याचे स्वच्छ पाणी तसेच इतर सोयीसुविधा उत्तमोत्तम करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. यासाठी निधीची कमतरता मुळीच पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

विकासकामे अन् योजना :

– अडीच वर्षे रखडलेले चंद्रपूर बसस्थानकाच्या कामाला वेग

– ताडोबा परिसरातील बसस्थानकांवरील सुविधांमध्ये वाढ

– बाबुपेठ येथे गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र

– सोमनाथ येथे कृषी महाविद्यालय प्रस्तावित

– चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये जलसंधारणाची होणार कामे

– या कामांसाठी अर्थसंकल्पात होणार 400 कोटींची तरतूद

– नोवल टाटाकडून जिल्ह्यासाठी  10 कोटींचा सीएसआर निधी प्रस्तावित

०००

मुख्यमंत्री जेव्हा रुग्णाला आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देतात…

मुंबई,दि. ८: भर वाहतुकीत बिघाड झालेली रुग्णवाहिका, त्यातील रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांची घालमेल ओळखून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन त्यांना  रुग्णालयाकडे मार्गस्थ केले.

भरधाव वाहणाऱ्या वाहतुकीत खुद्द मुख्यमंत्रीच आपल्या मदतीला धावून आलेले पाहून रुग्णांचे नातेवाईक देखील गहिवरून गेले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज दिवसही नेहमीप्रमाणे व्यस्ततेचा होता. गडचिरोलीचा दौरा आटोपून ते मुंबईत परतल्यानंतर ते ठाण्याकडे जात होते. या दरम्यान चुनाभट्टी- कुर्ला येथील पुलावर एक रुग्णवाहिका बिघाडामुळे खोळंबल्याचे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आले. रुग्ण, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा , गरजूंना औषधोपचारासाठी मदत या गोष्टी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासाठी अत्यंत संवेदनशील असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. रुग्ण आणि रुग्णवाहिकेतील नातेवाईकांची अडचण ओळखून मुख्यमंत्री श्री. शिंदे आपल्या वाहनातून उतरले आणि थेट बिघाड झालेल्या रुग्णवाहिकेजवळ पोहचले. त्यांनी परिस्थिती जाणून घेतली. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना धीर देत त्यांनी तिथूनच ठाण्यातील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधला. त्याचवेळी त्यांनी आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देण्याचे निर्देश दिले. या रुग्णवाहिकेतून संबंधित रुग्ण आणि नातेवाईक ठाण्यातील रुग्णालयाकडे मार्गस्थ झाल्यानंतरच, मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा ताफा रवाना झाला.

 

प्रचंड वर्दळीच्या घाईत मुख्यमंत्रीच आपल्या मदतीला धावून आल्याचे पाहून, त्यांनी दिलेल्या धीरामुळे रुग्णाच्या नातेवाईकांचे हात आपसुकच जोडले गेले.

०००

रेल्वे लाईन परिसरातील नागरिकांसाठी पालकमंत्री आले धावून

चंद्रपूर,दि. ८- रेल्वे लाईनच्या परिसरात अनेक वर्षांपासून नागरिकांचे वास्तव्य आहे. त्यांना कोणतीही सुचना न देता रेल्वे प्रशासन दडपशाही करीत असल्याचा नागरिकांचा आरोप होता. यासंदर्भात नागरिकांच्या मदतीला जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार धावून आले. जिल्हा प्रशासनाच्या परवानगीशिवाय एकाही घराला हात लावायचा नाही, अशी तंबी त्यांनी रेल्वे प्रशासनाला दिली.

नियोजन भवन येथे रेल्वे प्रशासनाच्या संदर्भात नागरिकांच्या समस्यांवर आयोजित आढावा बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी त्यांनी रेल्वे प्रशासनाची दादागिरी खपवून घेणार नाही, असे स्पष्ट बजावले. या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे, सहाय्यक जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी मरुगानंथम एम., बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ. दिप्ती सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) अतुल जतळे , नामदेव डाहुले, सुभाष कासनगोट्टूवार आदी उपस्थित होते.

शहरातील महाकाली कॉलनी, आनंद नगर, रयतवारी कॉलनी, बुधाई बस्ती, पडोली आदी ठिकाणी रेल्वे प्रशासनकडून घरांच्या अतिक्रमणासंदर्भात धमकावले जात आहे, असा आरोप नागरिकांनी केल्याचे पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले. ‘रेल्वे समस्यांबाबत प्रशासनाने संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ पाठवावे. तसेच यापुढे जिल्हा प्रशासनाला विचारल्याशिवाय कोणत्याही घरावर मार्किंग करू नये. प्रकिया सुरू करण्यासाठी सुद्धा जिल्हा प्रशासनाची परवानगी घ्यावी. अतिक्रमण नोटीस आणि घरांच्या मार्किंगवरून जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे तशी नोटीस रेल्वे प्रशासनाला द्यावी,’ असे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

पूरपरिस्थितीचा आढावा :

गेल्यावर्षी चंद्रपूर व भद्रावती तालुक्यातील वर्धा नदी काठावरील माजरी, बेलसनी, देगुवासा, पाटाळा, चारगाव, पळसगाव आदी गावांना पुराचा फटका बसला होता. यावर्षीसुद्धा ही परिस्थिती उद्भवल्यास कोणत्या उपाययोजनांचे नियोजन आहे, यासंदर्भात पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. वेकोलीच्या ओव्हर बर्डन आणि डंपिंगमुळे वर्धा नदीचे पाणी गावांमध्ये घुसले, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या. पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही, यासाठी वेकोलीने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला का, तसेच लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत होण्यासाठी काय उपाययोजना केल्या, याचीही पालकमंत्र्यांनी विचारणा केली.  

सोयीसुविधांमध्ये उणिवा नको:

गेल्यावर्षी ज्या शाळांमध्ये नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले होते, त्या शाळांमध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. शौचालये, बाथरूम, पंखे, प्रकाश व्यवस्था, पिण्याचे पाणी आदींची चांगली व्यवस्था असायला हवी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

०००

प्राथमिक शाळा मुले घडवण्याचा पाया – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. ७ ( जिमाका):  मुले घडवण्याचा पाया हा प्राथमिक शाळेत रचला जातो. त्यामुळे तेथील वातावरण चांगले असणे गरजेचे आहे. चांगल्या वातावरणात चांगली मुले घडतात, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृहात पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमाचा शुभारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हाधिकारी  जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, नितीन धायगुडे आदी उपस्थित होते.

निधी खर्चाच्या बाबतीत बदल करून त्यामध्ये सुसूत्रता आणण्याची गरज होती असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले की, शाळा चांगल्या करणे गरजेचे आहे. शाळांसाठी चांगला निधी दिला जाईल. आपल्या शाळा आदर्श करण्यासाठी पालक आणि ग्रामस्थ यांनीही सहभाग घेणे गरजेचे आहे. त्यासाठी सरपंच, मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी लोकांमध्ये याविषयी माहिती द्यावी. आजच्या या कार्यक्रमात पहिल्या टप्यात ५० शाळांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात किमान ४०० आदर्श शाळा तयार करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्ह्याकडे विशेष लक्ष असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, हा एक चांगला उपक्रम असून यामध्ये लोकप्रतिनिधी, अधिकारी, शिक्षक व ग्रामस्थ या सर्वांनी सहकार्याने काम करावे. आदर्श शाळे सोबतच आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र ही जिल्ह्यात उभारण्यात यावीत. खासगी रुग्णालयांच्या धर्तीवर त्यांचा विकास करावा. शिक्षण व आरोग्य क्षेत्रात जिल्हा अग्रेसर बनवूया. ग्रामीण जनतेला सर्व सोयी सुविधा पुरवण्याच्या प्रत्येक कामात शासन आपल्या सोबत असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी खासदार श्री. पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी अशा आदर्श शाळा उभारण्यात येत आहेत. त्यामध्ये लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी गावातील दानशूर व्यक्तींना आवाहन करावे. सर्वांनी एकत्र काम करून हा उपक्रम राबवूया.

जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी या उपक्रमाची सविस्तर माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली. आदर्श शाळांमध्ये संगणक कक्ष, ग्रंथालय, प्रयोगशाळा, किचन गार्डन या सुविधा असणार आहेत. त्यासह संरक्षक भिंत, क्रीडांगण, सौर ऊर्जा यांचाही अंतर्भाव असणार आहे. मुलांच्या कौशल्य विकासासोबतच शैक्षणिक गुणवत्ता वाढीकडेही विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खिलारी यांनी या उपक्रमाची माहिती दिली. तसेच शाळांमध्ये ई – लर्निग स्टुडिओ उभारला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिक्षणाधिकारी श्रीमती मुजावर यांनी आभार मानले. यावेळी ई – लर्निग व ई – कामवाटप यांचाही शुभारंभ करण्यात आला.

यावेळी गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, आदर्श शाळा उपक्रम सुरू करण्यात आलेल्या ५० गावांमधील सरपंच, जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

ताज्या बातम्या

शासकीय कामात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी अनेक टूल्स – कृषी आयुक्त सुरज मांढरे

0
मुंबई, दि. ०६ : शासकीय कामात माहितीचे व्यवस्थापन, वेळेचे नियोजन, कामाचे निरीक्षण आणि अहवाल व्यवस्थापन करण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी अनेक टूल्स उपलब्ध आहेत...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मुख्यमंत्र्यांसह मंत्रिपरिषद सदस्यांचे अभिवादन

0
अहिल्यानगर, दि. ०६ : जिल्ह्यातील चौंडी येथे होणाऱ्या मंत्रिपरिषद बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ चौंडीत दाखल...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वैभवी देशमुख हिच्या बारावी परीक्षेतील यशाबद्दल अभिनंदन

0
मुंबई, दि. ०६: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हीने अत्यंत कठीण, आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जात इयत्ता बारावी परीक्षेत...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणी व चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

0
अहिल्यानगर, दि. ६ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते...

मत्स्यव्यवसाय विभाग आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

0
पुणे, दि. 5: राज्यातील मत्स्यव्यवसाय विभाग महत्त्वाचा विभाग असून हा विभाग आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अधिकाऱ्यांनी एकत्रिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. उत्पन्नवाढीसोबतच पश्चिम महाराष्ट्रातील मत्स्य...