सोमवार, जुलै 7, 2025
Home Blog Page 1082

पीक उत्पादकता वाढीसाठी कृषी विभागाने जबाबदारी घ्यावी  – पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर दि.२१,(जिमाका)  : दिवसेंदिवस पीक उत्पादकतेत घट होत असून ऊसासह सर्वच पीकांचा यात कमी अधिक प्रमाणात समावेश आहे. त्यामुळे कृषी विभाग, त्यातील तज्ज्ञांनी उत्पादकता वाढीची जबाबदारी घेण्याच्या सूचना कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या. वनामती नागपूरच्या अधिनस्त प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था अर्थात रामेती या संस्थेच्या प्रशिक्षणार्थी वसतीगृह इमारतीच्या उद्घाटनानंतर शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

कसबा बावडा येथील वसतीगृहाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते व खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यानंतर शेतकरी मेळावा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, प्राचार्य उमेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे, शेतकरी, निविष्ठाधारक, कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, हल्ली ऊस उत्पादनात एकरी उत्पन्न कमी होत आहे, कारखाने 5-6 महिनेच चालतात, कारखानदारांना काम न करताच कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे लागते. या वर्षी सर्वात कमी गाळप हंगाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना ऊस उत्पादनात, इतर पिकांमधे मार्गदर्शन करून कृषी विभागने उप्त्पादन वाढीसाठी ठोस काम करावे, असे ते म्हणाले.

बोगस बियाणे, खते व किटकनाशके यांना आळा घालण्यासाठी शासन कायदा करत असल्याचे सांगितले. बोगस बियाणांची पेरणी केल्यास शेतकऱ्यांचा संपूर्ण हंगाम वाया जातो. शेतकरी हाच आपला वाली आहे, तो राजा आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आपण चांगले कार्य करणे गरजेचे आहे. कृषी विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी स्वत:च्या शेतात चांगली शेती करून इतर शेतकऱ्यांसाठी एक आदर्श निर्माण करावा, असे आवाहनही त्यांनी केले. शेंडा पार्क येथे शासनाने कृषी विभागास कृषी भवन बांधण्यासाठी जागा दिली आहे. यासाठी पुढिल प्रक्रिया राबविण्यासाठी आवश्यक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.

उद्घाटन केलेल्या रामेतीच्या नवीन वसतीगृहात 80 प्रशिक्षणार्थींच्या व्यवस्थेसाठी 40 खोल्या, 2 व्हीआयपी सूट, डॉरमेटरी, डायनींग, किचन व लायब्ररीची व्यवस्था केली गेली असल्याची माहिती पालकमंत्री मुश्रीफ यांनी यावेळी दिली.

आमदारी सतेज पाटील यांनी कृषी विभाग, आत्माच्या तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांसाठी चांगले प्रयोग राबविण्यात येत असल्याचे सांगितले. रामेतीला आता प्रशस्त अशी प्रशिक्षणार्थी निवास व्यवस्था झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांसाठी आता कृषी भवनाची गरज असल्याचेही ते म्हणाले. रामेतीचे प्राचार्य उमेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रविण बनसोडे यांनी सुत्रसंचलन केले. या कार्यक्रमात एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि बदलते कृषी तंत्रज्ञान या पुस्तकांचे विमोचन पालकमंत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

गुणवत्ता प्रमाणपत्र वितरण – पालकमंत्री श्री. मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते निविष्ठा विक्रेत्यांसाठी कृषी विस्तार सेवा पदविका अभ्यासक्रम बॅच 3 व 4 मधील स्वप्निल पिरकाने, सुनिल जाधव, सोमनाथ पुजारी, प्रकाश साळोखे, विनोद ननवरे आणि दत्तात्रय पवार यांना गुणवत्ता प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

राजर्षी शाहू गव्हर्नमेंट सर्वंट को-ऑप. बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल कृषी अधिकारी अतुल जाधव यांचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.

०००

पुणे शहरातील वाहतुक सुविधा आणि पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. २१ :उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे महानगरपालिका क्षेत्रात सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात मुदतीत मिळकत कर भरलेल्या नागरिकांसाठी राबविलेल्या लॉटरी योजनेमधील विजेत्या मिळकतधारकांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. पुणे शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वर्तुळाकार महामार्गाचे काम लवकर सुरू व्हावे आणि मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील कामे गतीने पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे, असे प्रतिपादन यावेळी उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी केले.

सीओईपी विद्यापीठ मैदानावर आयोजित या कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, विकास ढाकणे, उपायुक्त अजित देशमुख आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले की, शहराचा विकास करण्यासोबत शहर सुंदर आणि हिरवेगार रहावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. शहराचा नियोजनबद्ध विकास करून नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा पहिला टप्पा ९  किलोमीटर क्षेत्रात सुरू करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना नदीच्या दोन्ही तटावर फिरण्यासाठी चांगली सुविधा मिळणार आहे. या परिसरात झाडे लावण्यात येणार आहेत. पुढील ५० वर्षाचा विचार करून विकासकामे करण्यात येत आहेत.

कचरा संकलनासाठी पर्यावरणपूरक विद्युत वाहने घेण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठीदेखील विद्युत बसेस घेण्यात आल्या आहेत. शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषण मुक्त करण्याच्या या प्रयत्नांना नागरिकांनीही प्रतिसाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

मुदतीत मिळकतकर भरलेल्या नागरिकांचे अभिनंदन करून उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले की, नागरिकांनी वेळेत मिळकत कर भरावा यासाठी प्रोत्साहन म्हणून १ कोटी रुपयांची ४५ बक्षिसे देण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत ६ लाख ६० हजार ७८५ मिळकतधारकांनी मुदतीत कर भरला.  त्यामुळे मिळकतकर संकलनात गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत ३०० कोटींपेक्षा अधिकची वाढ झाली आहे. यामुळे महापालिकेमार्फत नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देता येतील. इतरही महानगरपालिकांनी अशा स्वरूपाचा  उपक्रम राबवावा, असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविकात आयुक्त विक्रम कुमार यांनी लॉटरी उपक्रमाची माहिती दिली. मिळकतकरातून येणारी रक्कम शहराच्या विकासासाठी उपयोगात आणली जाते. वेळेवर कर भरणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबविल्याने यावर्षी मिळकतकरात गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत वाढ झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत पुणे महानगरपालिकेला प्राप्त झालेल्या निधीतून घनकचरा व्यवस्थापनासाठी खरेदी केलेल्या १० विद्युत वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. या वाहनांची किंमत सुमारे १ कोटी ७२ लाख असून एका फेरीत १.५ ते २ टन कचऱ्याची वाहतूक होणार आहे.

०००

पोलीस स्मृती दिनानिमित्त पालकमंत्री दादाजी भुसे यांचे शहिद पोलिसांना अभिवादन

नाशिक, दि. २१ (जिमाका): देशाप्रती कर्तव्य बजावतांना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलीसांच्या स्मरणार्थ दरवर्षी २१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृतिदिन पाळला जातो. यानिमित्त राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज पोलीस कवायत मैदान, नाशिक येथे पोलीस स्मृतिस्थळास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेश कुमार, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्यासह पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे यांनी या दिनाचे महत्त्व विषद करताना सांगितले की, २१ ऑक्टोबर, १९५९ रोजी लडाख येथे हॉटस्प्रिंग याठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलातील १० शिपायांच्या तुकडीवर चीनी लष्कराच्या सैन्याने पूर्वतयारीनिशी हल्ला केला होता. यात १० शूर शिपायांनी शत्रुशी निकराने लढा देत देशासाठी आपले देह धारातीर्थी ठेवले. तेव्हापासून २१ ऑक्टोबर हा दिवस देशातील विविध पोलीस दलाच्यावतीने स्मृतिदिन म्हणून पाळला जातो. कर्तव्यावर असताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व वीर पोलीस जवानांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस असल्याचे ते म्हणाले.

यावेळी मैदानावर उपस्थित पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांनीही स्मतिस्थळास अभिवादन केले.

०००

पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहीद पोलिसांना अभिवादन

मुंबई,दि.२१: देशभरात कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडलेल्या पोलीस दलातील अधिकारी, जवानांना स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नायगाव येथील पोलीस मुख्यालयाच्या हुतात्मा मैदानावरील स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

नायगाव येथील पोलीस मुख्यालयाच्या हुतात्मा मैदानावर आयोजित कार्यक्रमाला आमदार सदा सरवणकर, पोलीस महासंचालक रजनीश शेठ, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, शहिदांचे नातेवाईक उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी देशभरात गेल्या वर्षभरात शहीद झालेल्या १५ पोलीस अधिकारी, १७३ पोलीस जवानांच्या माहितीच्या संदेशाचे वाचन करून श्रद्धांजली अर्पण केली. मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शहिदांच्या नातेवाईकांची भेट घेवून सांत्वन केले.

यावेळी पोलीस महासंचालक श्री. शेठ, आयुक्त श्री. फणसळकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, प्रमुख अतिथी यांनीही शहिदांच्या स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. शहिदांना अभिवादन करण्यासाठी पोलीस दलातर्फे हवेत तीन वेळा बंदुकीच्या फैरी झाडण्यात आल्या. यावेळी विशेष पोलीस कवायतीचे संचलन पोलीस उपायुक्त श्रीमती तेजस्वी सातपुते यांनी केले. सूत्रसंचालन सहायक पोलीस निरीक्षक राजेश खोपकर, संतोष कालापहाड यांनी केले.

०००

ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीला विशेष अनुदान – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

मुंबई, दि. २० :- दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय आणि मराठी चित्रपट निर्माण केला. त्या चित्रपटासारखे दर्जेदार चित्रपट मराठीमध्ये तयार व्हावेत. मराठीमध्ये ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीला विशेष अनुदान देणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदीरमध्ये दर्जेदार मराठी चित्रपटांच्या निर्मितीला आर्थिक अनुदान वितरणप्रसंगी मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी तब्बल ८९ मराठी चित्रपटांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ अविनाश ढाकणे, सहसंचालक संजय पाटील, ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे, चित्रपट परीक्षण समितीचे सदस्य अभिजीत साटम, मधुरा वेलणकर, स्वप्निल दिगडे, विनोद सातव, गीतांजली ठाकरे आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री मुनगंटीवार म्हणाले, प्रथमच २९ कोटी ८५ लाख रुपयांचे ८९ चित्रपट निर्मात्यांना अनुदान देण्यात येत आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. मराठीमध्ये विविध प्रकारचे चित्रपट तयार होत आहेत. पात्र चित्रपटांना अनुदान देण्यासाठी वेगाने प्रयत्न करण्यात येत आहेत. चित्रपटसृष्टीचा विकास व्हावा यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत यापुढे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांना दुप्पट अनुदान तर चित्रपटाची महिला दिग्दर्शक असेल तर त्यांना पाच लाख रुपये जास्त अनुदान देण्याचा निर्णयही घेण्यात येणार आहे. शिवाय चित्रपटांसोबत डॉक्युमेंटरीसाठीही अनुदान देता येईल का, याची चाचपणी करण्याच्या सूचना त्यांनी सांस्कृतिक कार्य विभागाला दिल्या. मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शकांनी दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करून उत्तुंग भरारी घ्यावी.

मराठी चित्रपटांना थिएटर मिळण्यासाठी थिएटरचे परवाने रिन्यू करणार नाहीत त्यांना दंडात्मक कारवाई करण्यासाठी शासन प्रयत्न करेल, चित्रपटाच्या शूटिंगसाठी राज्यात ६५ ठिकाणे उत्तम असून त्यांचा विकास करून शूटिंगला देण्याचा विचार केला जाईल, यामुळे निर्मात्याचे पैसे वाचणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

मराठी चित्रपट निर्मात्यांनी केवळ मनोरंजन म्हणून चित्रपटाकडे न पाहता त्यातून संस्कार, ज्ञान मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले.

श्री. खारगे यांनी सांगितले की, संस्कृतीचे जतन, संवर्धन करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग कार्यरत आहे. लोकशिक्षण, समाज प्रबोधन मराठी चित्रपटातूनही होत आहे. यातून रोजगार निर्मिती सुद्धा होत असून कोल्हापूर आणि गोरेगाव येथील फिल्म सिटी अत्याधुनिक आणि कायापालट करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. आव्हाने खूप असली तरी दर्जेदार चित्रपटावर भर द्यावा. आंतरराष्ट्रीय स्तरावर, कान्समध्येही अधिकाधिक मराठी चित्रपटांची वर्णी लागावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी दशक्रिया चित्रपटाच्या निर्मात्या कल्पना कोठारी, अरुण नलावडे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ ढाकणे यांनी प्रास्ताविक केले.

फेब्रुवारी २०२३ ते जून २०२३ या कालावधीत एकूण १७४ चित्रपट परीक्षण करण्यात आले आहेत. त्यापैकी ‘अ’ दर्जा प्राप्त चित्रपट ३७, ‘ब’ दर्जा प्राप्त चित्रपट ४८, राज्य-राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त चित्रपट ०४ असे एकूण ८९ चित्रपटांना अनुदान वितरण करण्यात आले. यामध्ये दशक्रिया, बारडो, बापजन्म, रेडिमिक्स, बॉईज, सुरसपाटा, एक सांगायचंय, मिस यू मिस्टर, वेडिंगचा सिनेमा, स्माईल प्लिज, येरे येरे पावसा, मन उधान वारा आदींसह ८९ चित्रपटांना मान्यवरांच्या हस्ते २९ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला.

000

धोंडिराम अर्जुन, स.सं

शतकी परंपरा लाभलेल्या शिवाजी पार्क बंगाल क्लब दुर्गा पूजा मंडळाला राज्यपालांची भेट

मुंबई, दि. 20 : राज्यपाल रमेश बैस यांनी शुक्रवारी (दि. 20) शतकी परंपरा असलेल्या शिवाजी पार्क येथील बंगाल क्लबतर्फे आयोजित दुर्गा पूजा मंडळाला भेट देऊन देवीची पूजा केली.

यावेळी क्लबचे मानद सल्लागार जॉय चक्रवर्ती, अध्यक्ष दिलीप दास, सचिव मृणाल पुरकायस्थ व बंगाली भाषिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बंगाली समाजाने राज्याला उत्तम डॉक्टर, उत्तम शिक्षक, उत्तम संगीतकार, गायक, खेळाडू आणि विचारवंत दिले आहेत.  मुंबई आणि राज्याच्या विकासात  बंगाली भाषिक लोकांचे योगदान मोठे आहे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. सामाजिक सलोखा आणि बंधुभाव राखण्यासाठी दुर्गा पूजेसारखे सण महत्त्वाचे आहेत. विविध धर्म व पंथाच्या लोकांना निमंत्रित करून दुर्गोत्सव सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. बंगाल क्लब कडे खेळाच्या सुविधा आहेत. या क्लबच्या माध्यमातून देशासाठी उत्कृष्ट खेळाडू निर्माण व्हावे अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

बंगाल क्लबची स्थापन १९२२ साली करण्यात आली तर येथील दुर्गा पूजा १९३५ पासून सुरु असल्याची माहिती यावेळी आयोजकांनी दिली.

०००

Maharashtra Governor visits Centurion Bengal Club Durga Puja

 

Mumbai 20:  Maharashtra Governor Ramesh Bais today visited the Durga Puja organized by the Century old Bengal Club at Shivaji Park in Mumbai on Friday (20 Oct).

Joy Chakraborty, Honorary Advisor of Bengal Club, Dilip Das, President, Mrinal Purkayastha, Secretary and a large number of people were present.

Speaking on the occasion, the Governor said the Bengali community has given Maharashtra great doctors, teachers, musicians, singers, athletes and intellectuals. He said that the contribution of Bengali speaking people to the progress and development of Mumbai and Maharashtra is of a high order.

The Governor said that festivals like Durga Puja play an important role in maintaining social harmony and brotherhood. He said efforts should be made to make Durgotsav inclusive by inviting people from various religions and sects. The Governor said, Bengal Club has good infrastructure for sports and games. He expressed the hope that the Club will produce excellent sportspersons for the country in the years to come.

According to the organizers, the Bengal Club was founded in 1922 while Durga Puja was started in 1935.

000

देश आपला व आपण देशाचे ही भावना दृढ होण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, दि. २० ऑक्टोंबर (जिमाका) –  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी माझी माती – माझा देश या संकल्पनेतून संपूर्ण देश एकत्र करण्याचे काम केले असून देश आपला व आपण देशाचे ही भावना दृढ होण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम आहे. या उपक्रमातून देशाप्रती मायभूमीच्या माती विषयी कृतज्ञता व्यक्त करणारा उपक्रम असून  देशभक्तीची उज्वल परंपरा जोपासली जाणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. धरणगाव पंचायत समिती आवारात  माझी माती – माझा देश अंतर्गत अमृत कलशांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते तालुक्यातील अमृत कलश नेहरू युवा केंद्राच्या प्रतिनिधींकडे  सुपूर्द करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशात माझी माती – माझा देश अभियान राबवण्यात येत असल्याचे सांगून पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, माझी माती – माझा देश या संकल्पनेतून प्रधानमंत्री श्री. मोदीसाहेबांनी देशातील सर्व घटकांना, अबाल वृद्ध, सर्व वयोगटातील लोक, महिला यांना एकत्र  करण्याचे काम केले आहे. त्याला आपल्या जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. पालकमंत्री यांनी या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व शासकीय अधिकारी, विभाग, सर्व नागरिक, ग्रामस्थ यांचे आभार व शुभेच्छा दिल्या. या अमृत कलशांमध्ये तालुक्यांमधील प्रत्येक गावांमधील माती आणि तांदूळ जमा करण्यात आले आहेत. सुरुवातीस पंचायत समिती आवारामध्ये तालुक्यातील प्रत्येक गावातून  आणलेल्या अमृत कलशांचे स्वागत करण्यात आले.

धरणगावात ‘कलशाची’ निघाली भव्य मिरवणूक !

धरणगाव शहरातील पंचायत समिती कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकापर्यंत भव्य मिरवणूक काढत ‘माझी माती – माझा देश’ च्या कलशाचे पूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते  करीत नेहरू युवा केंद्राच्या प्रतिनिधीकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी पालकमंत्री यांच्यासह मान्यवर रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी देशभक्ती पर गीते  सादर करून, चौका – चौकात फटाक्यांची आतषबाजी करून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

यांची होती उपस्थिती

कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली. यावेळी पालकंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी मेरी माटी – मेरा देश कलश कार्यक्रमा बाबत सविस्तर माहिती विषद केली. सूत्रसंचालन  ग्रामविकास संघटनेचे सचिव पंजाबराव पाटील यांनी केले तर आभार  अध्यक्ष सी. एन. सोनवणे यांनी मानले. याप्रसंगी सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा कुडचे मॅडम, जिल्हा आरोग्य अधिकारी संजय डॉ. संजय भायेकर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण, गटशिक्षणाधिकारी भावना भोसले, तालुकाप्रमुख डी.ओ. पाटील, उपजिल्हाप्रमुख पाटील सर माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, शहरप्रमुख विलास महाजन, गट नेते पप्पू भावे, विस्तार अधिकारी कैलास पाटील, संजय धनगर, ग्रामविकास संघटनेचे अध्यक्ष सी. एन. सोनवणे, सचिव पंजाबराव पाटील, तालुक्यातील  सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर , ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000

जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून होणारी कामे लोकोपयोगी, पारदर्शी व दर्जेदार करावीत – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 20 (जि. मा. का.) : जिल्हा वार्षिक योजनेतून प्राप्त होणाऱ्या निधीमधून करण्यात येणारी कामे लोकोपयोगी, पारदर्शी व दर्जेदार करावीत. तसेच, काटेकोर नियोजन करून सर्व विभागप्रमुखांनी प्राप्त निधी विहित मुदतीत खर्च करावा, अशा सूचना राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिल्या.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस खासदार संजय पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अनिल बाबर, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुमनताई पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, महापालिका आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांच्यासह जिल्हास्तरीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक (सर्वसाधारण) योजनेतून ४०५ कोटी रूपये नियतव्यय मंजूर आहे. शासनाकडून अर्थसंकल्पित तरतुदीच्या ७० टक्के निधी प्राप्त झाला आहे. सप्टेंबर अखेर ८३ कोटी, ७७ लाख रूपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे मंजूर निधी त्या-त्या  विकास कामांवर विहित वेळेत खर्च झाला पाहिजे, याचे कटाक्षाने पालन करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, शेतकऱ्यांना पुरेशी वीज उपलब्ध व्हावी यासाठी आवश्यक यंत्र सामग्री, ट्रान्सफॉर्मरसाठी वीज वितरण कंपनीने सविस्तर प्रस्ताव तातडीने राज्य शासनास सादर करावा. या कामांसाठी आवश्यक अतिरीक्त निधीसह, संभाव्य टंचाईसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर उपलब्ध पाण्यातून पेयजल, सिंचन व वीजनिर्मिती आदिबाबतचे नियोजन, खरीप दुष्काळ मूल्यांकन अंतर्गत एकूण ८ तालुक्यांचा प्राधान्याने समावेश करावा यासंदर्भात जिल्ह्यासाठी विशेष बाब म्हणून धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी लवकरच माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याच्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

संभाव्य टंचाईसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर जिल्हा प्रशासनाने पाणी, चारा, टँकर अशा सर्व प्रकारचे नियोजन व व्यवस्था तयार ठेवावी, अशा सूचना करून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी शेवटच्या टोकांपर्यंत प्रथम पोहोचण्यासाठी नियोजन करावे. विद्यार्थिनींना एस. टी. बसची प्रतीक्षा करावी लागू नये, यासाठी एस. टी महामंडळाने पूर्वीप्रमाणे मार्ग आखावेतअशा सूचना त्यांनी दिल्या.

बैठकीत जलयुक्त शिवार योजनेबाबत आढावा घेण्यात आला. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन जलयुक्त शिवार योजनेमधील कामांचे नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. खाडे यांनी दिल्या. या योजनेसाठी प्राप्त निधी  मृद व जल संधारण, जिल्हा परिषद, वन विभाग आणि कृषि विभागाकडील मंजूर कामांसाठी वितरित करण्यात आला असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

दुष्काळी तालुक्यात पाणी योजनांचे पाणी पोहोचत आहे. मात्र, विजेअभावी पिकांना याची झळ बसू नये. थकबाकीमुळे कृषि पंपाची वीज खंडित करू नये, तसेच, उपसा सिंचन योजनांतील पाण्याचे व आवर्तनांचे मेअखेरचे नियोजन आतापासूनच करावे, अशा सूचना खासदार संजय पाटील यांनी बैठकीत दिल्या.

आमदार अनिल बाबर यांनी उपलब्ध पाण्याचे नियोजन, महावितरणअंतर्गत आवश्यक तेथे अतिरीक्त निधीसाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मंत्रालय स्तरावर बैठक आयोजित करण्याची सूचना केली. तसेच, घरकुलाची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी सूचित केले.

यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, आमदार विक्रम सावंत यांनी महावितरण कंपनीकडील कामे गतीने व्हावीत, नादुरूस्त ट्रान्सफॉर्मर बदलणे, मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेतील कामे गतीने व्हावीत, असे मत मांडले. आमदार सुमनताई पाटील यांनी एस. टी महामंडळाचे जुने मार्ग पूर्ववत सुरू करण्याची तर आमदार सुधीर गाडगीळ यांनी नांद्रे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याची मागणी केली.

उपसा सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देताना येणाऱ्या अडचणींचा आढावा उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उपसा सिंचन योजनेचे अधिकारी, भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी यासह संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे घ्यावा. त्या अडचणींतून मार्ग काढण्यासाठी शिबिर आयोजित करून निर्णय घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या.

या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ (सर्वसाधारण) करिता स्थानिक स्वराज्य संस्थांकडील आर्थिक व भौतिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला. सन २०२२-२३ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित करण्यात आलेल्या निधीमधून प्रशासकीय मान्यता दिलेली कामे तात्काळ पूर्ण करून निधी खर्च करण्याचे आदेश यावेळी डॉ. खाडे यांनी दिले. तसेच, चालू आर्थिक वर्षातील आतापर्यंत खर्चित निधीचा आढावा घेण्यात आला. १२ मे रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेच्या इतिवृत्तांतास व त्यावरील कार्यवाहीच्या अहवालास मान्यता देण्यात आली. तसेच, प्रस्ताव प्राप्त झालेल्या यात्रास्थळांना “क” वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता देण्यात आली.

मौजे भूड (ता. खानापूर), मौजे सालगिरी, पाच्छापूर (ता. जत) येथे आरोग्य उपकेंद्र बांधण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. गुड्डापूर (ता. जत) येथील धानम्मादेवी मंदिरास “अ” वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यासाठी शिफारस करण्यात आली.

वैरण व पशुखाद्य कार्यक्रम अंतर्गत दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्ध करणे तसेच लम्पी प्रादुर्भाव रोखण्यासाठी रु. १.२० कोटी पुनर्विनियोजनाव्दारे उपलध करुन देण्यास मान्यता देण्यात आली. “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” कार्यक्रम अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशव्दाराचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधकाम करणे या कामास मान्यता देण्यात आली.

जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांनी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण मधून तर सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांनी अनुसूचित जाती उपयोजनामधून सन 2023-24 मध्ये करण्यात येत असलेल्या कामांची व आतापर्यंत खर्चित निधीची माहिती सादरीकरणातून दिली.

प्रारंभी जिल्हा परिषदेअंतर्गत स्मार्ट पीएचसी व स्मार्ट स्कूलसंदर्भात माहिती देणारी चित्रफीत दाखविण्यात आली. तसेच, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त विटा येथील तिरंगा गणेशोत्सव मंडळाच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

000

शासन आपल्या दारी अभियानाच्या यशस्वीतेसाठी समन्वयाने काम करा – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि.20 (जिमाका) : सर्वसामान्य नागरिकांना कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ द्या. अभियानांतर्गत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम आयोजित असून या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागप्रमुख अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.

शासन आपल्या दारी अभियानाचा महसूल भवन येथे आयोजित बैठकीत पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक पियुष जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, बांधकामचे अधीक्षक अभियंता संभाजी धोत्रे, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीधर वाडेकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी वैशाली रसाळ यांच्यासह सर्व विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमामध्ये लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित राहणार असल्याने कार्यक्रमाच्या नियोजनाचा पालकमंत्र्यांनी सविस्तर आढावा घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. या समित्यांच्या प्रमुखांकडून तयारीची माहिती पालकमंत्र्यांनी घेतली.

जिल्हाभरातून येणाऱ्या लाभार्थ्यांची वाहतूक, भोजन, पाणी व्यवस्था प्रशासनाकडून केली जाणार आहे. कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांची निश्चिती करण्यात आली आहे. लाभार्थ्यांना सुखरून आणून त्यांना पोहोचविण्यात यावे. भोजन, पाणी व वाहतूक व्यवस्थेत त्रुट्या राहू नये, याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

आयोजनाच्या यशस्वीतेसाठी एकून 31 समित्या तयार करण्यात आल्या आहे. त्यात समन्वय समिती, सभा मंडप, वाहतूक, भोजन, वाहन, लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण, स्टॅाल व्यवस्थापन, वैद्यकीय सेवा, पाणी पुरवठा, वाहनतळ, निवेदन समिती, विद्युत व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध समित्यांचा समावेश आहे. या समित्यांसाठी समिती प्रमुखाची नेमणूक करण्यात आली असून समिती प्रमुखाकडून त्या-त्या समितीच्या तयारीचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला.

राज्यभर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी हा उपक्रम होत आहे. यवतमाळ जिल्ह्यात हा कार्यक्रम आगळ्या वेगळ्या पद्धतीने झाला पाहिजे. जिल्ह्याचे वैशिष्ट्य, नाविन्य या कार्यक्रमातून दिसले पाहिजे, असे पालकमंत्री म्हणाले. विविध विभागाचे जवळपास 35 स्टॅाल कार्यक्रमस्थळी राहणार आहे. याठिकाणी लाभार्थ्यांना त्या-त्या विभागाच्या योजना व इतर उपक्रमांची माहिती उपलब्ध होणार आहे.

कार्यक्रमस्थळी मुख्यमंत्री सचिवालयाचे दालन

लाभार्थ्यांना आपल्या अडीअडचणींची निवेदने मुख्यमंत्र्यांना द्यावयाची असतात. अशी निवेदने स्विकारण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालयाचे स्वतंत्र दालन कार्यक्रमस्थळी राहणार आहे. या ठिकाणी चार वेगवेगळी पथके राहणार असून त्यांच्याद्वारे निवेदन स्विकारून निवेदनकर्त्यांना पोच दिली जातील. सर्वसामान्यांची निवेदने स्विकारून त्यावर योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी बैठकीत दिले.

000

दिव्यांगांना स्वयंचलित तीनचाकी सायकल पुरविण्यासाठी लाभार्थींची माहिती संकलित करा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 20 (जि. मा. का.) : जिल्हा दिव्यांग कल्याण निधीअंतर्गत दिव्यांगांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजनेतून पात्र दिव्यांगांना स्वयंचलित तीन चाकी सायकल पुरविण्यासाठी लाभार्थींची माहिती संकलित करावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिल्या.

दिव्यांग कल्याण निधी  नियंत्रण समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस  जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत व समिती सदस्य उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले, जिल्हा परिषदेच्या ५ टक्के स्वीय निधीमधून जिल्हा दिव्यांग कल्याण निधीअंतर्गत जवळपास सव्वा तीन कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. वैयक्तिक लाभाच्या योजनेमधून स्वयंचलित तीन सायकल योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान ८० टक्के दिव्यांगत्व आवश्यक आहे. या अनुषंगाने यासाठी  महानगरपालिका, नगरपालिका आणि समाजकल्याण विभागाने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील लाभार्थींची यादी संकलित करावी. दिव्यांग व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. विटा, इस्लामपूर आणि कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांगासाठी प्रमाणपत्र देण्याबाबत तपासणीची सोय करण्याबाबत डॉ. खाडे यांनी या बैठकीत सूचिते केले.

अर्जदाराचे सर्व बाबींपासूनचे उत्पन्न एक लाखाच्या आत असावे. सर्व निकष पूर्ण करणाऱ्या पात्र अर्जदारांना लाभ देण्यात येणार आहे.

 बैठकीत दिव्यांग घरकुल योजनेबाबतही चर्चा करण्यात आली. दिव्यांग घरकुल योजनेंतर्गत ग्रामीण भागातील प्रति लाभार्थी एक लाख 20 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी किमान 40 टक्के दिव्यांगत्व आवश्यक आहे. जिल्हा परिषदेच्या 5 टक्के स्वीय निधीमधून तरतूद करण्यात आली आहे. यामधून दिव्यांग घरकुल योजना, दिव्यांगांच्या उन्नतीसाठी शिबिर व मेळाव्याचे आयोजन यासह वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजना राबवण्यात येणार आहेत. यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली.

000

ताज्या बातम्या

आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत जेईई – सीईटीची कोचिंग

0
चंद्रपूर, दि. 6 : ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाखाणण्याजोगी असते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे किंवा संधी उपलब्ध न झाल्यामुळे असे विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे...

पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडून आदिवासी विकास विभागाचा आढावा

0
चंद्रपूर, दि. 6 : पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शनिवारी, जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाचा आढावा घेतला. तसेच राज्य शासनाने सुरू केलेल्या 100 दिवस प्रशासकीय...

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रयाण

0
मुंबई, दि. ६ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने आज दुपारी २.०० वाजता कोची येथे प्रयाण झाले. यावेळी  अतिरिक्त मुख्य सचिव व...

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!

0
ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत मुंबई, दि.  : - ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ प्रकल्पांचे कौतुक

0
पंढरपूर दि. ६  : पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच व्हिडिओ...